नेमकी तारीख आठवत नाही, पण तीन वर्षांपेक्षा जास्त झाले असतील, दिवस मात्र पावसाळ्याचेच...!
सकाळपासून आकाश निरभ्र होते, सोबत मी रेनकोट नेला नव्हता.
भिक्षेकर्यांचे सर्व काम आटपायला त्या दिवशी चार वाजले, पोटात अन्नाचा कण नव्हता.
आकाश अजूनही निरभ्र होते, आता पटकन घरी जायचे आणि काहीतरी खायचे असा विचार करून मोटारसायकलवर बसलो.
दोन लोक छान छान काहीतरी बोलत असताना, मध्येच काहीतरी व्हावं आणि अचानक हमरी तुम्ही वर यावं, एकमेकांवर जोरजोरात ओरडायला सुरुवात करावी, तसंच काहीसं वर झालं असावं.
निरभ्र असलेलं आकाश आता काळं कुट्ट झालं, दोन विजांमध्ये भयानक भांडणे सुरू झाली, त्याचा आवाज खालीपर्यंत येत होता. याचा परिणाम म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले, पावसाच्या रूपात....!
आणि जोरदार पाऊस सुरू झाला. सोबत मी रेनकोट आणला नव्हता.
कमरेला एक पिशवी लावलेली असते, त्यात थोडेफार पैसे आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे असतात. पावसात हि बॅग भिजू नये म्हणून मी गाडीला अडकवलेल्या कुठल्याशा बॅगेत ही बॅग घुसवली.
दोन विजांच्या भांडणात आपण पडायला नको, हा शहाणा विचार करून, आता भिजत निघणार तेवढ्यात एका भिक्षेकर्याने त्याच्या जवळचे रेनकोटचे जॅकेट मला दिले, नको नको म्हणत असतानाही त्याने ते घालायला लावले. हे मीच त्याला कधीतरी दिले होते, पण आता ते डाव्या काखे पासून पूर्णपणे खाली पर्यंत उसवले होते फाटले होते. दोन ठिकाणी भोकं पडली होती...
त्याचं मन मोडायचं नाही म्हणून आणि जाऊदे बुडत्याला काडीचा आधार म्हणत मी निघालो, पावसाचा जोर प्रचंड होता. मोटर सायकलच्या विरुद्ध दिशेने येणारा आडवा पाऊस वेगाने तोंडावर आपटत होता.
दोन्ही गाल झापडून निघत होते.
एखादा निष्णात ढोलकी पटू रंगात आल्यानंतर त्या ढोलकीच्या दोन्ही बाजूला ज्या वेगाने थपडा मारेल, तसा पाऊस मला ढोलकी समजून दोन्ही गालावर थपडा मारत होता.
आजूबाजूची झाडं त्याच्या या कलाविष्काराला झुकून दाद देत होती , तर काही इकडून तिकडे जोरजोराने माना हलवत होती, बेभान होऊन ....!
काही महाभागांनी तर रस्त्यावरच लोटांगण घातलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं, पण त्या "ढोलकीपटूला" याचे काही सोयर सुतक नव्हते.
रसिकांची दाद मिळाल्यावर कोणत्याच कलाकाराची थांबायची इच्छा नसते, तसंच या पावसाचं झालं.
इकडे प्रचंड पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी....
आणि तिकडे माझ्या पोटात भुकेचा वणवा पेटलेला....
काय विरोधाभास...!
पाठीवर जवळपास 100 किलोच्या बॅगचे ओझे, बाईकच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या आकाराच्या बॅगा खचाखच भरलेल्या, या बॅगेच्या आजूबाजूने जागा मिळेल तिथे काठ्या कुबड्या अडकवलेल्या.....
हे सर्व सांभाळत रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून कसाबसा मार्ग काढत असताना, पावसाने अजूनही ढोलकी वाजवणे थांबवले नव्हते. जणू त्याची माझ्याशी जुगलबंदी चालू होती...
मुळात काळा सावळा असलेला मी, आज या पावसाने मला गोरा मोरा केला...!
शेवटी या जुगलबंदीत मी जाहीर हार पत्करली आणि गाडी साईडला लावून थांबलो .
संपूर्ण भिजलो होतो, रेनकोटच्या जॅकेटचा काहीही उपयोग नव्हता, आता अंगात ओल्या कपड्यांमुळे अंगात थंडी भरली. मी कुडकुडायला लागलो.
शेजारीच चार तकलादु बांबू रोवून त्यावर फ्लेक्स अंथरलेली एक मोडकी तोडकी वडापावची टपरी होती, एक आजी तिथे वडे तळत होती आणि त्याचा खमंग सुवास सुटला होता.
शाळेत न जायचा हट्ट करणाऱ्या मुलाला, त्याच्या आईने हाताला धरून फरपटत ओढत न्यावं, तसं भुकेने मला या वडापावच्या गाडीपर्यंत नेलं.
आजी वडे तळण्यात गुंग होती, वय असेल सत्तरीचं, चेहऱ्यावर सुरकुत्या, प्रत्येक सुरकुती दुष्काळी भागातल्या जमिनीसारखी भेगाळलेली, तरीही चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात ममता....!
'वडापाव खायचा आहे का रे बेटा...?'
आजीच्या वाक्याने माझी तंद्री भंगली.
'हो आजी'....
आजी मला बेटा म्हणाली, मला कौतुक वाटलं.
कढईतला गरम गरम एक वडा तिने पावात खोचून दिला, पावातून निम्मा बाहेर आलेला तो गरमागरम वडा जणू माझ्याचकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत होता.
"गरम गरम" वडा पोटातली "आग" विझवणार होता... इथेही पुन्हा विरोधाभासच ..!
'वडा गरम आहे बेटा, सावकाश खा तोंड भाजेल...'
आजीचं मायेचं वाक्य ऐकून या थंडीतही मला ऊब जाणवली.
'अजून एक खा बेटा धर', म्हणत तिने दुसरा गरम गरम वडापाव माझ्या हाती न मागता दिला.
आजीला कसं कळलं मला भूक लागली असावी...?
मी विचार करत राहिलो.
आजी आजीच असते, नातवांसाठी ती घोडा घोडा होते, झुक झुक आगीनगाडी होते.... जेवू घालताना तिच्या हातावर मोर सुद्धा येतो, आणि तो नाचतो.... हो मी पाहिलंय मोराला नाचताना....!
ती कधी उंट होते, कधी मांजराचे आवाज काढते, डावा हात उजव्या कानाला धरून, उजवा हात त्यामधून घालून सोंड दाखवत ती हत्ती सुद्धा होते....आजीला सगळंच कसं येतं बुवा ...?
आजीच्या मांडीवर तिच्या मऊसूत पदराखाली झोपताना कशाचीही भीती वाटत नाही. गालावरून फिरणारा तीचा खरबरीत हात मात्र तिच्या भूतकाळाची जाणीव करून देत असतो, पण ती कधीच सांगत नाही....
आई बाबा कधी ओरडून एखादा फटका मारायला आले तर आजी नातवंडाना पाठीमागे उभी करून, स्वतः पुढे येते आणि त्यावेळी ती ढाल होते.... खरंच आजीला सगळंच कसं येतं...?
आजीला हिशोब मात्र येत नाही...
एक चपाती हाताने खायला घालून म्हणते, आत्ताशी कुठं अर्धी खाल्ली, जेवताना एक चपाती मागितली तर ती दोन देते आणि म्हणते खा एकच आहे....
कधी साडी घेऊ का म्हटलं तर म्हणते, नको रे बाबा ट्रंकेत तर पाच पन्नास पडून आहेत.... ट्रंकेत बघितलं तर, आजोबांनी घेतलेल्या तीन-चार विरलेल्या साड्या असतात फक्त ..
आजीला सगळं येतं, मात्र हिशोब काही येत नाही...!!!
माझी आजी अशीच होती, हि सुद्धा का कोण जाणे पण मला तशीच भासली ...
बरोबरच आहे, "आजी" हे एक मायेचं आभाळ आहे, आणि जगातून कुठूनही पाहिलं तरी आभाळ सारखंच दिसतं ना...?
'अजून एक खाणार का बेटा...'
आजीने पुन्हा माझी तंद्री तोडली.
नम्रपणे मी नको म्हणत, आजीला किती पैसे झाले विचारले.
म्हणाली, 'दोन वडापाव ना ? तीस रुपये झाले बेटा'
पैसे देण्यासाठी पॅन्ट मधल्या एका खिशात मी हात घातला तिथे पैसे मिळाले नाहीत, मी दुसऱ्या खिशात हात घातला, मागच्या खिशात हात घातला, गडबडीने रेनकोट काढून शर्टाच्या खिशात हात घातला, पैसे कुठेही सापडले नाहीत. मी बावचळलो.... गोंधळलो...!
हां, आठवलं, आपण पैशाची बॅग मोटरसायकलवर अडकवलेल्या बॅगांमध्ये ठेवली आहे.... मग मी मोटरसायकलवर ठेवलेल्या बॅगांची उचकापाचक करायला लागलो. ती सुद्धा बॅग काही केल्या सापडेना....
गडबडीत पडली की काय...? या विचाराने माझा थरकाप झाला.... त्यात अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असतात.
तावातावाने मी बॅग शोधत होतो आणि बॅग मिळत नव्हती.
बॅगेच्या विचाराने मी अक्षरशः रडकुंडीला आलो...
आजीचं लक्ष होतं, म्हणाली, 30 रुपयांसाठी एवढं रडकुंडीला येऊ नको बाळा, नंतर दिले तरी चालतील.
'तसं नाही आजी पण...'
माझं वाक्य तोडत आजी मृदू आवाजात, मायेनं म्हणाली, ' अरे बाळा कळतंय मला, कधी पैसे असतात तर कधी नसतात. तू एखाद्या खेड्यातल्या गरीबा घरचा दिसतोस.'
' गावाकडचं घर सोडून, नशीब काढायला इथं कुठल्यातरी कंपनीत कमी पगारावर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असशील ना...?
अशी खूप मुलं आजी आजी म्हणत येतात माझ्याकडं, ती पदराला हात पुसत म्हणाली...'
डिलिव्हरी बॉय....?? आजी मला डिलिव्हरी बॉय का समजली असेल....?
ओह, माझ्याकडची एक मोठी बॅग, गाडीला अडकवलेल्या तशाच दोन मोठ्या बॅगा, जशा Swiggy Zomato किंवा कुरिअर यांच्या डिलिव्हरी बॉईज कडे असतात तशा.... हे पाहून आजीने अंदाज बांधला मी सुद्धा डिलिव्हरी बॉय आहे.
हाताने बॅग शोधणे सुरूच होते.
आजीकडे दुसरे गिऱ्हाईक नव्हते, ती उघड्या डब्याचे झाकण लावत, उघड्या कढईवर मोठं भांड ठेवत, पदराला हात पुसत आपुलकीने विचारू लागली, 'तु अमुक अमुक दुष्काळी भागातला ना रे ? माझ्याकडे खूप मुले येतात त्या भागातली बेटा .'
'आई वडील काय शेताकडे मजुरी करतात का...?
शिक्षण किती झालंय तुझं ? दहावी तरी पास आहेस का...? लग्न झालंय का? पोर बाळ काही आहे का?'
आजीचे प्रश्न संपत नव्हते. आजी टपरीतलं इकडं तिकडं पडलेलं साहित्य आवराआवरी करत विचारत होती. मध्येच पदरानं तोंड पुसत होती.
मी तिला म्हणालो, 'आजी मी डॉक्टर....
पुढचं बोलू न देता ती मला म्हणाली ' हां, अरे सगळीच खेड्यातली गरीब मुलं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी व्हायची स्वप्न घेऊन येतात, पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत बाळा'
'असू दे, आता जिथे नोकरी करतोयस तिथे करत रहा, पुढे नशीब पालटेल, फक्त कष्ट करत रहा प्रामाणिकपणे... रडायचं नाही बेटा लढायचं....'
'आता ज्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोस तिथे किती दहा-बारा हजार तरी देतात का ? एवढ्या पैशात पुण्यात राहायचं कसं आणि गावाकडे आई बापाला पैसे कसे पाठवायचे ...?' खरंच तिच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.
थोड्या वेळात माझ्यासारख्या "डिलिव्हरी बॉय" ची दुःख तिची होऊन गेली... काही मिनिटातच ती मला आपलंसं करून गेली.
आजीचे प्रश्न अजूनही थांबत नव्हते.
तीच्याकडे गिऱ्हाईक म्हणून येणाऱ्या इतर सगळ्या डिलिव्हरी बॉईज मुलांचे अनुभव ऐकून, मीही त्यातलाच एक आहे हे समजून, तीने त्यांच्या व्यथा तिच्याही न कळत मला चिटकवून टाकल्या होत्या.
एव्हाना माझी बॅग सापडली, मी आजीला पैसे काढून देणार, इतक्यात विचार आला, आजी मला जो डिलिव्हरी बॉय समजत आहे, तेच तिच्या मनात राहू दे.
माझे भीक मागणाऱ्या लोकांमध्ये बसून मळलेले आणि चुरगाळलेले कपडे, पावसाने चेहऱ्याचा आणि केसांचा केलेला विकृत मेकअप, डिलिव्हरी बॉईज सारख्या बॅगा, कुठल्याही खिशात न सापडलेले पैसे आणि त्यात फाटलेला रेनकोट....!
या सर्वांमुळे गरीब घरातला आहे, हे समजून आजी माझ्याशी प्रेमाने बोलत होती आणि वागत होती.
मी डॉक्टर आहे वगैरे सांगितलं तर क्षणार्धात तिची माझ्याबद्दलची माया, कणव संपून जाईल.
आणि मी माझ्याबद्दल तिला सांगून तरी काय झेंडे लावणार होतो ?
कारण ती स्वतः गरीब होती, आणि कष्ट करून जगत असलेल्या गरीब मुलांबद्दल तिला आपोआपच जिव्हाळा वाटत होता.
मलाही ती तेच समजली होती....
ती आईच्या रूपाने, देत असलेल्या जिव्हाळ्याच्या या दुधात, मी डॉक्टर आहे, असं सांगून मला मिठाचा खडा टाकायचा नव्हता.
तीच्या मनात जो गरीब मुलगा तिने रंगवला होता, मला ते चित्र पुसायचे नव्हते....!
आपलंसं समजून मनातल्या मनात माझ्याबद्दल वाळूचं घरटं जे तिने बांधलं होतं, मला ते विस्कटायचं नव्हतं
खरंतर तीनं माझं रंगवलेले रूप मला आवडलं होतं...
हाच तर खरा आहे भिक्षेकर्यांचा प्रतिनिधी....!!!
पैशाची बॅग होती तिथे ठेवून आजीला म्हणालो, 'आजी तीस रुपये माझ्यावर उधार... दोन दिवसात देतो.'
'दे रे पगार झाल्यावर दिले तरी चालतील. मला कोणी फसवत नाही.'
नाही म्हणताना, उजव्या हाताचा पंजा, नाही, अशा अर्थाने, माझ्या चेहऱ्यासमोर नाचवत ती बेदरकारपणे म्हणाली.
'फसवणारे फसवून गेले... ते सगळे माझेच होते, गोड बोलून माझ्याकडचं सर्व घेऊन निघून गेले, कुठे गेले मला माहित नाही.' हे बोलताना मात्र ती भाऊक झाली.
'कधीतरी वाटतं, भेटावं त्यांना शोधावं त्यांना... नातवंडं आता मोठी झाली असतील'
हे वाक्य बोलताना आजीच्या आवाजाला कंप सुटला, पुढे तिला बोलताच येईना, पुढचं सगळं आजीच्या डोळ्यातल्या पाण्याने सांगितलं... आजीनं डोळ्याला पदर लावला.
पुन्हा खाली मान घालून पदराने तिने डोळे पुसले.
पण पुढच्याच क्षणी पदर झटकून, खंबीरपणे चढ्या आवाजात म्हणाली, 'जाऊदे शोधायचं तरी कशाला ? शोध हरवलेल्यांचा घ्यायचा असतो, स्वतःहून गेलेल्यांचा नाही....!
'हरवलं असेल तर नक्की सापडतं पण लपवून ठेवल्यावर माणसानं करायचं काय....?' हुंदका देत ती म्हणाली.
'माझं जाऊ दे तुझं सांग' म्हणत शेजारच्या पातेल्यातून ओंजळीत पाणी घेऊन ते तिने चेहऱ्यावर सपासप मारलं.
मघाशी पाऊस माझ्या चेहऱ्यावर मारत होता तसंच....
फरक इतकाच, की मी पावसापुढे हार पत्करली आणि थांबलो या जागेवर....
आजीने परिस्थिती पुढे हार न मानता नवीन आयुष्याला सुरुवात केली होती याच जागेवर....
पाऊस आता थांबला होता तिच्या डोळ्यातलाही आणि आभाळातलाही....!
चार-पाच गिर्हाईकं आली होती. मी गाडीला किक मारून निघालो, तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, ती वडे तळण्यात पुन्हा गुंगून गेली.
पैसे मिळतील की नाही याची तिला फिकीर नव्हती, तिच्या दृष्टीने तिने एका भुकेल्या नातवाला घास भरवला होता, आणि आजी कधी भरवलेल्या घासाचे पैसे मागत नाही.....!
काय योजना होती ही पावसाची ?
का मला निसर्गाने या आजीची भेट घालून दिली असावी....??
आणि पुन्हा पैसे परत करण्याच्या उद्देशाने परत भेटण्याची योजना सुद्धा करून ठेवली होती.....
सगळंच अकल्पित आणि अतर्क्य....!
दोन दिवसांनी मी तिला भेटलो डिलिव्हरी बॉय म्हणूनच, मी 50 ची नोट काढून तिच्या हातावर ठेवली, उरलेले वीस राहू दे म्हणालो.
काय जहागीरदार आहेस का कुठला ? ती माझ्यावर डाफरली.
'असाच पैशाला पैसा जोडून घरी पाठवत जा' उरलेले वीस रुपये देत ती मायेनं म्हणाली.
(मनात म्हटलं, 'तुला देऊन घरीच पाठवतोय आजी... कसं सांगू तुला ?')
यानंतरही तिच्याकडे बऱ्याच वेळा गेलो, कधी वडापाव खायला, तर कधी गप्पा मारायला.
या गप्पांमधून चेहऱ्यावरच्या, एक एक सुरकुतीची कहाणी उलगडू लागली .... हळू हळू धुकं विरळ होत गेलं आणि रस्ता स्वच्छ दिसू लागला....
सुरकुत्यांच्या या जाळ्यात खूप काही साठलं होतं, आणि आजी या जाळ्यात अडकली होती कोळ्यासारखी....!
आजी खरंतर एका श्रीमंत घरातली, तीला दोन मुलं. पतीने सर्व इस्टेट या आजीच्या नावे करून ठेवली होती.
मुलांची लग्न होईपर्यंत सर्व ठीक होतं, पण एकदा लग्न झाल्यानंतर घरामध्ये दोनाची चार डोकी झाली.
हि चार डोकी पद्धतशीरपणे आजीकडे स्वतःचा वाटा मागू लागली, त्यासाठी रोज वाद विवाद आणि भांडणे, मारामाऱ्या होऊ लागल्या.
घरातली भांडणे थांबवण्यासाठी आजीने सर्व प्रॉपर्टी दोन्ही मुलांमध्ये वाटून टाकली.
प्रॉपर्टी वाटली तरी सुद्धा मरेपर्यंत मी याच घरात राहणार अशी अट आजीने घातली.
घरात राहूनही, यानंतर आजीला कोणती सून जेवण देणार यावरून वादविवाद होऊ लागले. त्यातही पुन्हा मारामाऱ्या.
स्वाभिमानी आजी रागाने एका साडीवर घराबाहेर निघाली आणि एका फुटपाथ वर राहू लागली.
ओळखी पालखीचे लोक तेवढ्यापुरते सांत्वन करून पुढे जात, त्यातीलच एकाने, आजी तुम्हाला वडे करायला चांगले जमतात, तुम्ही हाच व्यवसाय का नाही करत असे सुचवले.
स्वाभिमानाने जगायचं तर काहीतरी करायला हवं, या विचाराने, ओळखीच्या लोकांकडून उधारीवर काही पैसे घेऊन व्यवसायाला लागणारी सामग्री घेतली आणि पुढे थोड्या अंतरावर रस्त्यावरील फुटपाथवर हा व्यवसाय सुरू केला. गोड बोलण्याने हळूहळू जम बसत गेला.
ऊन वारा पावसाचा त्रास होऊ लागला, म्हणून जी जोडलेली माणसं होती, त्यातील तरुणांनी चार काठ्या आणून त्यावर एक फ्लेक्स टाकून दिला.
आजीला निवारा मिळाला.
साधारण पाचशे रुपये रोज कमावते आजी....
बाकी सर्व नातवंडं समजून आमच्यासारख्या डिलिव्हरी बॉईज ना.... उधारीवर....!
कोणी पैसे आणून देते, कोणी बुडवते तिला काही फरक पडत नाही....!
दर भेटीत मला वाईट वाटायचं, स्वतःची ओळख सांगायची सुद्धा चोरी....
एकदा मी तिला म्हणालो, 'तुझी हि टपरी आपण छान करून घेऊया का ? या चार काठ्या फेकून देऊन आपण छान काहीतरी कायमस्वरूपी करू....
ती भडकली, तु माझ्या शॉप ला टपरी म्हणतो....?
हि टपरी नाही माझं शॉप आहे..... शॉप....!
सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती....!
हि टपरी म्हणजे तिचे शॉप होते...
या टपरीकडे पाहण्याचा आता माझा सुद्धा दृष्टीकोन बदलला.... आता मलाही ते शॉपच वाटू लागले...दृष्टिकोनाचा फरक...!
चार काठ्यांपैकी, लहान बाळाच्या डोक्यावरून फिरवतात तसा हात त्यातल्या एका काठी वरून फिरवत ती म्हणाली, 'इतकी वर्ष साथ दिली रे यांनी.... यांना तू फेकायचं म्हणतोस....?'
या चार काठ्यांचे ऋण कसे फेडायचे ? आधी फुटपाथ वर उघड्यावर राहत होते. घरातल्यांनी डोक्यावरचं छप्पर काढलं, पण याच चार बांबूंनी सावली दिली....
मी इथल्या लोकांना सांगून ठेवलं आहे, जेव्हा मी मरेन त्यावेळी तिरडी बांधताना याच चार बांबूंसह मला जाळा....!
माझ्या अंगावर काटा आला.
कृतज्ञता असावी तर अशी....
आजीची या कृतज्ञतेची भावना इतकी तीव्र आणि तीक्ष्ण होती की निर्जीव काट्यांना सुद्धा ती समजली असावी ....
का कोण जाणे दर वेळी आलो की या काठ्या मला कायम झुकलेल्या दिसतात....!
तरीही अवसान आणून मी म्हणालो, 'मी जिथे काम करतो तिथला साहेब चांगला आहे, मला तो बिनव्याजी कर्ज देईल, आपण हळूहळू कर्ज फेडू साहेबाचे.... बघ तुझा फायदा होईल.... आता आहे त्यापेक्षा आणखी जास्त सुख मिळेल.....
मी खडा टाकत, चाचपडत, बुटाने जमीन टोकरत आजीशी खोटं बोललो....
कारण माझ्यातला भिक्षेकर्यांचा डॉक्टर काही माघार घेईना....!
वा रे वा तालेवार, आला मोठा कर्ज फेडणारा, असं म्हणून आजीनं छद्मीपणाने माझ्या तोंडासमोर गोल गोल हात फिरवला.
ती पुन्हा भाऊक झाली, तिच्या डोळ्यात पाण्याचे थेंब होते, ती म्हणाली, ' लेकरा या पांढऱ्या केसांनी आणि चेहऱ्यावरचे सुरकुत्यांनी जे मंत्र शिकवले ते आज तुला सांगते गाठ मारून ठेव'.
मी कान टवकारून ऐकायला लागलो
खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, 'आयुष्यभर कोणाच्यातरी ऋणात रहा, पण कोणाच्या कर्जात राहू नकोस'... बघ... अर्थ कळतोय का....?
'आयुष्यात जगताना दूरदृष्टी ठेवून जगावं.... बाळा, दूरचं बघता यावं म्हणून निसर्गानं आपल्याला डोळे कपाळावर दिले आहेत, नाहीतर अंगठ्यालाच दिले नसते का...?.... बघ समजतंय का...?
तीचे डोळे आता शून्याकडे लागले होते....
"शून्यातच कदाचित तिचा भूतकाळ असावा...."
बाळा, तू त्या काठ्यांबद्दल बोललास, ' अरे एखादं झाड फळ देत नसलं म्हणून काय झालं, सावली तर देतच की.... म्हाताऱ्या माणसाला चालताना आधार देते ती ही काठीच असते....आपण ऋणात राहायचं असतं त्या सावलीच्या, मिळालेल्या त्या आधाराच्या...!
आंबा खाऊन लोक कोय फेकतात, अरे या कोयी वरच तर सगळा गर असतो.... आणि कोय म्हणजे तरी काय तर बीज रे .... या बीजाला काहीच किंमत नसते का रे ? ती आकाशाकडे पाहत म्हणाली.
हे वाक्य तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित होतं हे मला कळायला वेळ लागला नाही
तु म्हणालास शॉप नीट केलं तर आणखी फायदा होईल, 'पण बेटा कायम लक्षात ठेव फायदा हा कायम खाली असतो, म्हणून त्याला "उचलावं" लागतं.... वाकावं लागतं.... वाकलास की संपलास...!
'अरे वाकायचं, पण त्यांच्यापुढे, जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात, जे आपलं शुभ व्हावं म्हणून आपल्या मागेपुढे शरीराने किंवा मनाने उभे असतात, त्यांच्यापुढे वाकायचं, नव्हे लोटांगण घालायचं.... मग ते सजीव असोत का निर्जीव....!'
'शुभचिंतक खूप असतात... परंतु एखाद्याचे शुभ होऊ नये म्हणून चिंता करणारेच जास्त असतात, हे कायम लक्षात ठेव बाळा'
अवाक होऊन मी हे सगळं ऐकत होतो...!
'अश्रूंना काही किंमत नसते, किंमत असते अश्रू पुसणाऱ्याला.... हा जो अश्रू पुसणारा आहे ना, त्याला देव समजायचं, आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं बेटा'
मी नि:शब्द झालो, काय बोलावं मला पुढे कळेना.
शिक्षण फक्त वाचायला शिकवतं, आयुष्यात आलेले अनुभव जगायला शिकवतात हेच खरं...!
' तू म्हणतोस शॉप आणखी मोठं करू, तुला सुख मिळेल....काही वर्षांनी वाटेल त्याला आणखी मोठं करू, हि महत्त्वाकांक्षा कधी संपणार आहे का...?
सिकंदर सारखा सिकंदर, सुख शोधता शोधता शेवटी जाताना हाताच्या मुठी उघड्या ठेवून गेला, सर्व असूनही मी काहीही वर घेऊन चाललो नाही हे त्याला सांगायचं होतं, आपण कोण रे बेटा.....?
सुख मानण्यावर असतं बेटा ....
आधी रस्त्यावर उघड्यावर झोपत होते, मच्छर चावायचे, आता रस्त्यावरच मच्छरदाणी लावून झोपते, आता मच्छर चावत नाहीत हे सुख नाही का...?
पुर्वी इथपर्यंत येताना हातात सामानाचे डबे घेऊन चालत, उठत, बसत, कण्हत यायचे ....
आता जोडलेले कितीतरी गिऱ्हाईक लोक मला रिक्षाने किंवा त्यांच्या मोटरसायकलीवर आजी आजी म्हणत जागेवर सोडतात.... माझा त्रास किती कमी झाला......
हे सुख नाही का...?
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असलेली पोरं रोज मला धंदा लावायला मदत करतात, माझं हे शॉप माझं नाही, ते त्यांचं समजतात हे सुख नाही का ?
आई आजी काकू मावशी म्हणत रोज इथे लोक येतात, चार भिंतीच्या बाहेरही माझं एक कुटुंब आहे, हे सुख नाही का...?
माझ्या घरातल्या लोकांनी माझी जबाबदारी घेतली नाही, पण कोण कुठला तू गरिबा घरचा मुलगा.... माझ्यासाठी तू कर्ज घ्यायला तयार झालास.... हे सुख नाही का....?
बेटा सोन्या म्हणत इथल्या प्रत्येक माणसाला मी माझा मुलगा करून घेतला आहे, एकाच जन्मात इतक्या लोकांची आई होऊ शकले....हे सुख नाही का....?
अजून किती सुख मिळवायचं बेटा ?
किती छोट्या छोट्या गोष्टीत आजी सुख शोधत होती.
सुखी माणसाचा सदराच आजीने माझ्या पुढे आणून ठेवला....
' बेटा कधीतरी कुठेतरी थांबावंच लागतं की, आयुष्यात पळताना ब्रेक कुठे लावायचं याचं भान राखता आलं पाहिजे सोन्या. नुसतं शिकलं म्हणून कोणी ज्ञानी होत नाही बेटा...
"काय करावं याचं भान म्हणजे ज्ञान...."
"आणि काय करू नये याचं ज्ञान म्हणजे भान..."
ऐकून मी स्तिमीत झालो....!
मी डॉक्टर, कधी काळचा अंतरराष्ट्रीय संस्थेचा महाराष्ट्र प्रमुख....
हि आजी रस्त्यावर वडापावची गाडी चालवते....
तरीही हुशार कोण शहाणं कोण यातला भेद आज समजला...
सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो याची आजीने जाणीव करून दिली.
मी या माऊलीच्या पायाशी झुकलो, तिला नमस्कार केला.
खाली बसून मी वर तीच्या चेहऱ्याकडे पाहिले मला ती हिमालयाप्रमाणे उंचच उंच वाटली....!
मी तिला म्हणालो आजी तू हे शिकलीस कुठं....?
ती म्हणाली, पूर्वीच्या नववी पर्यंत माझं शिक्षण शाळेत झालं, थोडं वाचलं.... बाकी जगाने न शिकवताच शिकवून दिलं....!
तोंडाला पदर लावत ती हसत म्हणाली.
पदराआडचं करुण हास्य बहुदा तिला मला दाखवायचं नसावं, मी समजून गेलो.
या स्वाभिमानी आजीला मी पुन्हा एकदा नमस्कार करून गाडीला किक मारली... तेवढ्यातूनही ती म्हणाली सांभाळून जा रे बेटा....!
यावेळी पाऊस नव्हता तरीही जुगलबंदी सुरू होती माझी आणि माझ्या डोळ्यांची.... !
यानंतरही मी त्या बाजूला जायचो परंतु आजीच्या "शॉप" वर थांबायचो नाही, वडे करण्यात किंवा कोणाशी तरी बोलण्यात ती गुंग असायची.
मधल्या काळात मुद्दाम तिला भेटण्यासाठी चक्कर मारली, त्यावेळी आजीच्या शॉप ची जागा रिकामी होती.
मोटरसायकल थांबवून मी शेजारी आजी बद्दल विचारले, ते म्हणाले, 'आजी गेली.'
कद्धी, मी जवळपास ओरडलो.....
माझ्या पायाखालची जमीन सरकली....
तिथे छप्पर म्हणून असलेला फ्लेक्स नव्हता, फ्लेक्स ला टेकू देणाऱ्या त्या चारही काठ्या नव्हत्या....
अर्थातच त्यांची आहुती पडली असेल....
शॉप ओस पडले होते.....
आजी, काकू, मावशी या शब्दांचा किलबिलाट तिथे नव्हता... झाडंच नाही तर पक्षी कुठून येणार...?
आता ती जाईल तिथे सोन्या बेटा म्हणत नवीन नाती निर्माण करेलच...
पण मी आणि माझ्यासारखे अनेक डिलिव्हरी बॉय पोरके झालो त्याचं काय....???
आजही मी त्या टपरीच्या / शॉपच्या रिकाम्या जागेभोवती फेऱ्या मारतो....
पण ती नसते... कुठेच नसते... कुठे कुठेही नसते...
तरीही काव काव करत मी घिरट्या मारत राहतो,
त्या जागेभोवती.....पिंड शोधणाऱ्या त्या कावळ्यासारखा....!!!
15 मे 2026
आपला स्नेहांकित,
डॉ अभिजीत सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे
9822267357
*sohamtrust2014@gmail.com
(An ISO 9001: 2015 certified organisation)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा