एकदा एका कारखान्यातील महत्वाचे इंजिन बंद पडले. कंपनीतील सर्व हुशार इंजिनियर्स, कुशल कामगार सगळे झटत होते पण इंजिन काही दुरुस्त झाले नाही. इंजिन महत्वाचे असल्याने पूर्ण उत्पादनच थांबले होते अन प्रतिदिन लाखो रुपयांचे नुकसान होत होते. तीन दिवस झाले तरी इंजिन सुरु होईना. त्या दिवशी जेवणाची सुट्टी झाल्यावर गेटबाहेरच्या चहाच्या टपरीवर मेन मेन इंजिनियर चहा घ्यायला गेले. तिथं त्यांच्यात बंद पडलेल्या इंजिनबद्दल चर्चा सुरु होती की काय करावं म्हणजे इंजिन सुरु होईल ? तिथेच पलीकडे एक आजोबा बसून यांचे बोलणे ऐकत होते.
शेवटी न राहवून ते आजोबा इंजिनियरच्या घोळक्याजवळ येऊन म्हणाले,
"साहेब, ते इंजिन मी पाहू शकतो का ?"
त्यावर मुख्य इंजिनियर साहेब म्हणाले,
"अहो, आजोबा.... आम्ही इतके शिकलेले, फॉरीन रिटर्न... तरी आम्हाला जे जमलं नाही ते तुम्हाला कसे जमेल ? राहू द्या."
तरी आजोबांनी विनंती केली की, " मी फक्त इंजिन पाहतो. एक संधी तर द्या"
शेवटी त्यांच्या जिद्दीला पाहून सर्वजण त्यांना कारखान्यात नेतात, इंजिन दाखवतात.
आजोबा एक मिनिटभर बारकाईने निरीक्षण करतात. इंजिनभोवती एक फेरी मारतात आणि "एक हातोडा मिळेल का ?" असं विचारतात.
एका कामगाराने हातोडा आणून दिला. (इथं मला एक इंग्रजी म्हण आठवली.)
"Life doesn't change in ONE MINUTE, but taking decision after thinking for ONE MINUTE can change life."
आणि मग त्या आजोबानी इंजिनच्या एका स्क्रूच्या बाजूला हातोड्याने ठोका टाकला. आणि स्टार्टरचे बटन दाबले.
आणि काय आश्चर्य. इंजिन झटक्यात सुरु झाले. हे पाहून सगळेच उडाले. मात्र खुशही झाले. कारखान्याचा मालकही खुश झाला की त्याचे रोजचे लाखोंचे नुकसान वाचले म्हणून.
आणि मग आजोबाला त्या मुख्य इंजिनियरने विचारले की "किती पैसे देऊ?"
यावर शांतपणे आजोबा म्हणाले, "एक लाख रुपये"
हे ऐकून सगळेच लटपटले. तरी एकजण बिचकत बिचकत त्यांना म्हणाला,
"अहो आजोबा, हातोड्याचा एक ठोका तर टाकलाय. त्याचे एक लाख रुपये ??"
यावर आजोबा म्हणाले,
"साहेब. हातोड्याचा ठोका तर मी एकच मारला. हे खरं आहे. पण केव्हा, कुठे आणि कसा मारायचा असतो, हे फक्त मला माहित होते. तुम्हाला कुणालाच नाही"
(इथंहि मला एक इंग्रजी फ्रेज आठवली.)
Effort is important, but knowing where to make an effort in your life, makes all the difference.
गोष्ट इथं संपलीय.
डॉ. डीडी क्लास : आपला घोळ कुठं होतो माहितीय का ? की आपण दुसऱ्याचे अनुभव घेत नाही अन कुणाचे ऐकत पण नाही आणि ऐकण्याची इच्छा पण नसते. आपल्यापैकी अनेकजण "सेल्फ इगो" नावाच्या रोगाने ग्रस्त आहेत. त्यातही जर एखादी अडचण आली तर आपण त्याबद्दल कुणाला विचारतो ? तर आपल्या समवयीन मित्रमैत्रिणींना. आता विचार करा की तुमच्या वयाचेच ते लोक असल्याने (एखादा अपवाद वगळता) त्यांनाही साधारण तुमच्याइतकीच बुद्धी असणार न. मग ते काय वेगळा मार्ग तुम्हाला सांगणार अन अडचणीतून बाहेर काढणार?
इथेच आजूबाजूला जरा डोकावून पहा. अनेकांच्या घरात "त्या" आजोबासारखे अनुभवी लोक नक्की असतील पण त्यांच्या मताला किती किंमत दिली जाते ? त्यांच्या अनुभवाचा फायदा किती लोक घेतात ? मला नक्की माहित आहे की याचे प्रमाण फारच कमी आहे. याचे कारण म्हणजे "सेल्फ इगो" रोग आणि "त्यांना यातलं काय कळत. आऊटडेटेड आहेत ते" असा शिक्का मारून आपण मोकळे होतो. विश्वास ठेवा मंडळी, जिथं तुमचा गुंताडा तुम्ही दोन्ही हाताने सोडवू शकत नाही तिथं हि बुजुर्ग मंडळी तोच गुंताडा डाव्या पायाच्या करंगळीच्या मदतीने सहज सोडवून दाखवतात. कारण त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात. तुम्ही त्यांना एक अडचण सांगून पहा.ते त्यावर तुम्हाला पाच सोल्युशन्स देतील. यातून फायदा तुमचाच आहे आणि नकळत त्यातून पुन्हा एकदा नात्याची वीण अधिक घट्ट होत जाईल.
अजून एक महत्वाचे सांगतो. आपण अशा बुजुर्गांचा अनुभव पैशाने खरेदी करू शकत नाही. पण तुमचे होणारे लाखोंचे नुकसान मात्र बुजुर्ग मंडळी थांबवू शकतात. तसेही तुम्ही अडचणीत असलात आणि सगळीकडून कोंडी झालीय, बाहेर निघायचा मार्ग दिसत नाहीये तर अशावेळी एकदा शांतपणे बुजुर्ग मंडळींशी बोलून तर पहा. ९९% खात्रीने सांगतो. तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्या बुजुर्ग मंडळींचा अनुभवच कामाला येणार आहे. कारण असं म्हणतात की, म्हातारे झालेले झाड फळ देत नसले तरी सावली तर नक्की देते न.
डॉ. धनंजय (डी. डी.)