बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2432. करार

 पर्स खांद्याला लटकवून माही ओरडली,"आई,मी निघाले. तू मागे लागलीस म्हणून मी त्या पोराला बघून येते. मला अजिबात लग्न करायची इच्छा नाही, पण तू मला न विचारता सगळं ठरवलं,म्हणून जाते आहे."
लेकीचा अवतार बघून मानसीच्या कपाळावर आठ्या पडल्या. "पोराला भेटून येते काय ग? मुलाला तरी म्हण. आणि काय ही विटकी जीन्स,तो आखूड टी शर्ट. कुठून मी रेखाला कबूल केलं,असं झालंय मला.  तुझा मुलगा आणि माझी मुलगी एकमेकांना भेटतील, त्यांचे विचार जुळले तर पुढचं बघू,असं मीच तिला म्हटलं,त्यामुळे आता काही पर्याय नाही."
"अशा जीन्सची फॅशन आहे हल्ली." माहीच्या मनात आलं,पंधरा मिनिटात तर मी त्या मुलाला कटवते. एक तर मला लग्नच करायचं नाही. त्यात आईने मला न विचारता हा नसता उद्योग केला आहे.
"भिकेचे डोहाळे सगळे." मानसी पुटपुटली.
"कसले डोहाळे म्हणालीस ग?"
"काही नाही. जा भेटून ये विराजला. आणि नीट बोल त्याच्याशी."
                         ..........
      माही ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचली. वीस  मिनिटं झाली तरी विराजचा पत्ता नव्हता. माही हॉटेलच्या बाहेरच उभी होती. दुरून एक मुलगा धावत येताना दिसला. तिने आणि विराजने एकमेकांचे फोटो बघितले होते. जवळ आल्यावर कळलं,तो विराजच होता. बर्म्युडा पॅन्ट, पायात स्लीपर, टी शर्ट,अशा अगदी कॅज्युअल ड्रेसमधे तो आला होता.
"ए हाय,सॉरी थोडा उशीर झाला." इअरफोन काढत विराज म्हणला.
"थोडा? मी वीस मिनिटं बाहेर उभी आहे." माही चिडून म्हणाली.
"चिल माही. अशा वेळी रस्त्यावरचे हँडसम मुलं बघायचे." विराज डोळे मिचकावत म्हणाला.
"फालतू जोक्सवर मला हसायला येत नाही."
"ओके मॅम,चल आत बसू."
    टेबलवर बसल्यावर माही लगेच म्हणाली, "मी स्पष्टच सांगते,मला लग्न करायचं नाही. तुझ्या आणि माझ्या आईने हा नसता घोळ करून ठेवलाय. म्हणून मला यावं लागलं."
"सेम हिअर,दे टाळी. मला पण लग्न करायचं नाही. म्हणजे तसं करायचं आहे,पण इतक्यात नाही." विराज जोरात हसत म्हणाला. "पण मला खरं खरं सांग. तेरा दिल किसीपे आया तो नही?"
"तसं काहीही नाही. मला ते लग्न वगैरे बोअर होतं. तुम्ही मुलं बायकोकडून सगळ्या टिपिकल अपेक्षा करताच. मी तसा नाही वगैरे आधी खूप कबूल करता पण लग्न झालं की तुमच्या अंगात नवरा शिरतोच."
     विराजने माहीचा फोटो बघितला, तेव्हाच त्याला ती प्रचंड आवडली. सरळ सोनेरी केसांचा छोटासा पोनी, गोरा वर्ण,थोडंस अपरं नाक. पण सगळ्यात आवडले होते,ते तिचे डोळे. टपोरे, काळेभोर. प्रत्यक्षात माहीला बघितल्यावर तर तो तिच्या प्रेमातच पडला. मनात आलं,आता माहीला बघितल्यावर दुसरी मुलगी आवडणं कठीणच आहे. काहीतरी करायला हवं. आता माहीशिवाय दुसरी बायको नकोच.
   माहीने विराजकडे चोरून बघितलं. तिच्या मनात आलं. तसा हँडसम आहे. टिपिकल साऊथ इंडियन हिरो वाटतोय. टॉल,डार्क आणि हँडसम. शिवाय अतिशय हुशार. आय टी कंपनीत उत्तम पॅकेज असलेला लग्नाळू मुलगा. पण नाही,मला त्या लग्नाच्या जाळ्यात अडकायचं नाही.
"काही म्हणालीस माही?"
"नाही, काहीच नाही. पण मला एक सांग, आपण नकाराचे कारण काय द्यायचे?"
"विचार करावा लागेल. पण तूच मला नकार दे की. लग्न तुलाच नको आहे. मी तयार आहे.पण छान वाटलं तुला भेटून. आपले बरेचसे विचार जुळतात. एक मैत्रीण म्हणून तुला परत भेटायला मला आवडेल." विराज सॅक उचलत म्हणाला.
   माहीला वाटलं, नकार देणं इतकं सोपं असतं तर मी भेटायला सुध्दा आली नसती. माही घरी आली आणि मानसीने तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. माहीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला विराजशी लग्न करायचं नाही,हे ती दोन दिवसांनी सांगणारच होती.
  पण त्या दोन दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या. मानसी आणि माहीचे बाबा शेखर,विराजला भेटून आले. साधा,स्वभावाने अगदी दिलखुलास असलेला विराज दोघांनाही खूपच आवडला.  विराजने देखील त्याच्या आईवडिलांना माही खूप आवडल्याचे सांगून टाकले. लगेच रेखाचा मानसीला फोन आला.
"मानसी,अग विराज माहीवर फिदाच झालाय. माही काय बोलली ग?"
"काहीच बोलत नाहीय. तिला लग्नच करायचं नाही. मीच तिला जबरदस्ती पाठवलं,विराजला भेटायला."
"अग, सगळ्याच मुली असं म्हणत असतात. आपण देखील तेच केलं होतं. पण लग्नानंतर कळलं की,आयुष्यात लाईफ पार्टनर किती महत्वाचा असतो. तिचं मन मी वळवते. तू काळजी करू नको."
                         .............
   रेखामावशीचा नंबर बघून माहीने नाराजीनेच फोन उचलला. "हाय मावशी."
 "माही, विराज तुझ्यावर फिदा झालाय. लग्न करेन तर माहीशीच,नाहीतर नाही, असं म्हणाला. आता बोल." रेखा हसत म्हणाली.   माही चिडलीच. ही काय जबरदस्ती !
"मावशी, मी अजून विचार केला नाहीय. मला थोडा वेळ दे."
"हो ग,तू जरूर वेळ घे, पण चुकीचा निर्णय घेऊ नकोस."
  माही गोंधळून गेली. विराजमधे नाकारण्यासारखं काही नव्हतंच. आईवडिलांनी नकाराचे कारण विचारले,तेव्हा ती उत्तर देऊ शकली नाही. पण स्वभाव एका भेटीत कुठे कळतो? तिने परत विराजला भेटायचं ठरवलं.    त्याच ठिकाणी दोघे परत भेटले.
"विराज, माझ्या काही अटी आहेत,त्या तुला मान्य असतील तरच मी तुझ्याशी लग्न करायला तयार होईन. तसा आपल्या दोघांमधे लेखी करार असेल."
"इंटरेस्टिंग. मी तयार आहे. अटी काय आहेत?"
"लग्न झाल्यावर सहा महिने आपण एका खोलीत असलो तरी नवरा बायकोचं नातं आपल्यात नसेल. मी स्वभावाने हट्टी आहे. सहसा माघार घेत नाही. टीपीकल नवऱ्याचं ऐकून घेणं वगैरे मला जमणार नाही. आपण एकमेकांना पूरक आहोत,हे कळल्यावरच मी तुझा नवरा म्हणून स्वीकार करेन. नाहीतर आपण वेगळे होऊ."
"सहा महिन्यात तुला कळेल माझा स्वभाव? कशावरून मी तुझ्याशी खोटं वागणार नाही? आणि घटस्फोट झाला तर तुझी बदनामी जास्त होईल,कारण तू मुलगी आहेस. भीती नाही वाटत का तुला? माझं काय,मी आईला सांगून टाकलंय,लग्न करेन तर माहीशी,नाहीतर एकटा जीव सदाशिव."
"घटस्फोटापेक्षा, ओढून ताणून केलेल्या संसाराची भीती वाटतेय. मी स्वतः कमावते. मी आयुष्यभर एकटी राहू शकते."
  माहीचं गर्वाने बोलणं विराजला खटकलं. पण त्याचा निर्णय झाला होता." तुझ्या लेखी करारावर सह्या करायला मी तयार आहे माही." विराज माहीकडे बघत  म्हणाला.
    माही लग्नाला तयार झाली, हा आनंद मानसीसाठी इतका मोठा होता की ती उत्साहाने तयारीला लागली. लग्न अगदी थाटात झालं.  सप्तपदी चालताना माहीला तिचा हात विराजच्या हातात द्यावा लागला,तेव्हा विराज तिच्याकडे बघून मिश्कीलपणे हसला. तिचा हात त्याने जोरात दाबला,आणि माही त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागली. विराजला मनातल्या मनात हसू आवरत नव्हतं.
    लग्न छान पार पडलं. विराज आणि माहीची जोडी, दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. हनिमूनला कुठे जाणार,हे सगळ्यांनी विचारल्यावर,सध्या खूप काम आहे, रजा नाही असं म्हणून विराजने वेळ मारून नेली.
     रेखा आणि शेखर,माहीवर कौतुकाचा वर्षाव करत होते. रेखामावशी तर सासू वाटतंच नव्हती. विराज आणि माही दोन दिवसांनी कामावर रुजू झाले. माहीच्या रुटीनमधे फार काही फरक पडला नव्हता. फक्त घरातली माणसं बदलली होती. विराजचा हसतमुख,खेळकर स्वभाव ती अनुभवत होती. अतिशय सकारात्मक, मदतीला तत्पर,लोकप्रिय विराज ती बघत होती. त्याने शब्द दिला त्याप्रमाणे, तिच्या बोटालाही त्याने स्पर्श केला नव्हता. त्याच्या स्वभावात दोष तरी काय काढणार? 
    लग्नाला चार महिने होऊन गेले होते. एक दिवस ऑफिसमधून घरी आल्यावर माहीला खूप हसण्याचा आवाज आला. ती किचनमधे आली. टेबलवर रेखा,शेखर,विराज आणि एक अनोळखी तरुण मुलगी गप्पांमध्ये रंगले होते. माहीने तिच्याकडे निरखून बघितलं. नितळ त्वचा,गव्हाळ रंग,केसांचा स्टेपकट, ओठावर हलकी गुलाबी लिपस्टिक आणि आधुनिक पेहेराव. फुलासारखी टवटवीत दिसत होती. 
"ओह माही ! तुझी ओळख करून देतो. ही माझी सख्खी आते बहीण ऋता. यु एस ला जॉब करतेय. आत्ता काही दिवस भारतात आली आहे. आपल्या लग्नात नव्हती." विराज माहीला बसायला खुर्ची देत म्हणाला.
  माहीने हळूच तिच्या गळ्याकडे बघितलं. मंगळसूत्र तर दिसत नव्हतं. पण हल्ली लग्न झालं तरी काही मुली मंगळसूत्र पण घालत नाहीत. माहीचा हात नकळत तिच्या गळ्याकडे गेला.तिने मंगळसूत्राच्या वाट्या घट्ट धरल्या.
"माही, ऋताचं फ्रेंड सर्कल उद्या गोव्याला जायचा प्लॅन करताहेत. ती आपल्या दोघांना इनव्हाइट करायला आली आहे. पण तुला तर रजा नसेलच न? मी जायचा प्लॅन करतोय."
"ओके,हाय ऋता,ग्लॅड टु मीट यु." माही ऋताला शेकहॅन्ड करत म्हणाली.
"हाय माही, तू आणि विराज आम्हाला जॉईन व्हा. यु विल एन्जॉय." ऋता म्हणाली.
   माहीने हसत मान डोलावली. चहा घेताना ती ऋता आणि विराजकडे बघत होती. दोघेही गप्पांमध्ये इतके मश्गुल झाले होते की माही तिथे आहे,हे विसरून गेले. माहीने सगळ्यांचे कप विसळले आणि ती खोलीत आली. तिला आतल्याआत उमासे येत होते. रडावंसं वाटत होतं पण कारण कळत नव्हतं.
  दुसऱ्या दिवशी सकाळी माही उशीरा उठली. आज ऑफिसला दांडी मारायचं तिने ठरवलं.ती कॉटवर उठून बसली. तिला विराज बॅग भरताना दिसला. 
"विराज, कुठे निघालास?"
"कुठे म्हणजे? गोव्याला. काल बोललो की आपण." विराज कपाटातले कपडे काढत म्हणाला. "मी जाऊन येतो. मला पण चेंज हवा आहे. आणि ऋताची कंपनी फार छान आहे. शी इज अ लव्हेबल पर्सन." विराज माहीकडे पाठमोरा होऊन बॅग भरत होता. माहीला काय वाटलं,कुणास ठाऊक! ती ताडकन कॉटवरून उठली आणि म्हणाली, "मला एकदाही तुला विचारावं असं वाटलं नाही विराज? परस्पर निर्णय घेतला. आणि मी येणार नाही,हे तुम्ही दोघांनी गृहीतच धरलं. मी बायको आहे न तुझी?" माहीला रडू अनावर झालं आणि  विराजला मागून घट्ट मिठी मारून हुंदके देऊ लागली. विराज वळला,त्याने माहीचा चेहरा हातात घेतला आणि तिची चेष्टा करत म्हणाला,"पण तुझ्या कराराला अजून दोन महिने बाकी आहेत. त्याचं काय?"
  विराजची ती खट्याळ नजर बघून माही त्याचे हात स्वतःभोवती लपेटत म्हणाली," माझा करार मी रद्द करतेय. तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही."
  विराज तिला घट्ट कवटाळत म्हणाला,"तुझ्या कराराबरोबर मी पण एक करार केला होता. प्रेमाचा करार. तुला आजन्म साथ देण्याचा."
"विराज बॅग परत भर,माझे पण कपडे बॅगेत टाकायचे आहेत."
"ऑलरेडी टाकले आहेत मॅडम " 
  माही धावत बॅगजवळ गेली. तिने बघितलं, विराजने तिचे चार ड्रेसेस बॅगमध्ये ठेवले होते. ती विराजजवळ आली आणि रडत त्याच्या छातीवर डोकं ठेऊन म्हणाली,"लव्ह यु.".....
             ×××××××××××
  ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

2431. बॉयफ्रेंड कथा

 नमस्कार...
असे म्हणतात की आपल्याकडे दुसऱ्यांच्या समस्यांना नेहमीच उत्तर असते, त्यामुळे सल्ले देणं सोपे असते पण स्वतःच्या समस्यांना लवकर उत्तर मिळत नाही. मग आपल्याच समस्या, प्रश्न इतरांच्या नजरेतून पाहिले तर सुटतील का असा विचार मनात आला. आणि त्याच विचारातून ही कथा तयार झाली. ही कथा जनस्वास्थ्य दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाली आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------

घरातलं आवरून रागिणी ऑफिसला वेळेवर बाहेर पडली खरी पण लोकल पकडण्याची धडपड कुठेच नव्हती. स्टेशनवर पोचल्यावर पळत पळत लोकल पकडणारी रागिणी आज फलाट वरच्या बाकावर स्वतःत हरवून विचार करत होती. पती राघव बरोबर हल्ली सारखी होणारी वादावादी तिला कशातच लक्ष लागून देत नव्हती. क्षुल्लक कारणावरून होणारी भांडणं रोजची सवय झालेली. ऑफिसमध्ये ही चुका वाढत चालल्या होत्या. कदाचित सहकाऱ्यांच्याही लक्षात आलं होतं म्हणून हिला काही दिवस सुट्टी घेऊन आराम करायची ही सूचना आलेली. आजही सकाळी वाद झाला म्हणून मूड नसताना ऑफिस मध्ये जाऊन काही चुक व्हायला नको म्हणून रेल्वे फलाटवर प्रवासी बघत बसुन राहिली. मध्येच तिला रेल्वेखाली उडी घेऊन सगळं संपवावं असं वाटल्याचं जाणवताच ती भानावर आली. तिनं आजूबाजूला पाहिलं.
पर्स मधून मोबाईल काढून ऑफिसला फोन केला. मला हाफ डे लंच पर्यंत सुट्टी हवी म्हणून सांगितलं. आणि फोन पर्स मध्ये ठेऊन दिला. 
राघव आणि रागिणी ची ओळख अशीच लोकल मध्ये झालेली. मग याच फलाटावर त्याच्याशी ऑफिस सुटल्यावर घरी जाण्याआधी भेटण्याची सवय. मग न संपणारी आणि संपू नये वाटणारी बकबक. दोघांना एकमेकांची सवय होत आहे हे दोघांनीही ओळखलं. मग अशीच एक वेळ साधून राघवनं विचारणा केली आणि रागिणीही हो म्हणून मोकळी झाली.
हे आठवून तिला त्रास व्हायला लागला तसा तिने मोबाईल परत काढून मेसेजेस बघायला चालू केलं. राघवचा एकही मेसेज नाही हे पाहून तिला वाईट वाटलं. हल्ली मेसेजेस पण कमी होत आहेत. ज्या दिवशी भांडण होईल त्यादिवशी तर शून्य मेसेज. Hi पण नाही. सॉरी तर खूप लांबच. 
राघवचा आधीचा जॉब गेल्यानंतर 5-6 महिने घरीच होता तो. त्यावेळी किती नेटानं घर चालवलं. त्याच्या जॉब साठी पण प्रयत्न केले. किंवा त्याला स्वतःचं काही करायचं असेल तरीही त्याला साथ दिली असती. पण नंतर  जॉब म्हणून नक्की काय करतो अजून कळलं नाही. सांगतही नाही. घरखर्च रागिणी कडे. राघव महिन्याला घरभाडे, आणि इतर खर्च करतो म्हणून ठीक. पण सगळं लपवून ठेवतो म्हणून आणखी त्रास होतोय. शिवाय हल्ली तो सरळ ऐकूनही घेत नाही. काही बोलूही देत नाही. आपल्याला त्याची काळजी वाटते हे त्याच्या मनातही का येत नाही?
विचार करून त्रास व्हायला लागला म्हणून तिनं व्हाट्सअप्प बंद केलं आणि नेट सर्फिंग, मेल चेक करू लागली. स्पॅमबॉक्स भरून गेलेला. एकेक मेल डिलीट करू लागली. त्यात एका मेलचं टायटल वाचून तिला आश्चर्य वाटलं. लोन, क्रेडिट कार्डच्या ऑफर भरपूर असायच्या. त्यात ही असली ऑफर. ? तिनं मेल ओपन केला.
 " बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल". 
मेल पाहून तिला हसू आलं. मोबाईल बंद केला पण उत्सुकता वाढलेली. असा एखादा जॉब असेल अशी कल्पनाही नव्हती तिची. त्या उत्सुकतेपोटी तिने परत मेल पाहिला. खाली संपर्क नंबर होता. ऑफिस पत्ता तर जवळच आहे असे वाटत होतं. तिची पाऊलं नकळत  ऑफिसकडे वळू लागली.
10 मिनिटात ऑफिसला पोचली ती. फार गर्दी नव्हती. तिथल्या रिसेप्शनिस्टने समोर बसवलं. " तुम्हाला बॉयफ्रेंड भाड्याने हवा आहे काय म्हणून विचारलं "?
" नाही. नको आहे ?"
" मग नोकरीसाठी आलाय का ?".
" नाही, मला नोकरी आहे . पण हा जॉब मला नवीन वाटला म्हणून एक उत्सुकता म्हणून या जॉबचे काय स्वरूप आहे हे विचारावं वाटलं म्हणून इथे आली आहे". 
" ओके. Thats good." म्हणून तिनं खुलासा करायला चालू केलं ," हे बघा आमच्याकडे बॉयफ्रेंड ( मित्र / मैत्रीण ) भाड्याने देणे हा प्रकार खूप वेगळा आहे. नॉनसेन्स काही नसतं. ज्या मुलींना, स्त्रियांना गप्पा मारायला, मन मोकळं करायला कोण नसतं , त्यांच्याशी गप्पा मारायला आम्ही मित्र किंवा मैत्रिणी पुरवतो. गप्पा या फक्त सार्वजनिक जागी म्हणजे ठराविक आईस्क्रीम शॉप ठिकाणी असतात. हातात हात घेणं सुद्धा निषिद्ध आहे.  तिथेच समोर बसून 2 तास गप्पा किंवा मन मोकळं करायचं. मित्र मैत्रिणी तुमचं सगळं ऐकून घेतात. एकत्र आईस्क्रीम खाऊ शकता. मुख्य म्हणजे तुमचं सगळं बोलणं हे गुप्त राहतं. आणि तिथेच विसरून दिलं जातं. हल्ली लोकांना आपल्या किंवा दुसऱ्याचे ऐकायला वेळ नाही म्हणून ही सेवा आहे. "
" लोकांचा प्रतिसाद कसा आहे हो ?". रागिणी.
" अपेक्षेपेक्षा उत्तम. वास्तविक प्रेमभंग झालेल्या मुली, कुटुंबात कुचम्बना झालेल्या स्त्रिया आणि अडगळीत पडलेले वृद्ध सगळे ग्राहक आहेत. शिवाय मित्राचे मैत्रिणीचे , ऑफिस मध्ये वाईट अनुभव आलेले पण आहेत ?".
" फारच विशेष आहे हे ?". रागिणी..
"  विशेष नाही हो, भयानक आहे ". 
" कसं काय ?".
" अहो बघा ना, लोकांना 24 तास ऑनलाईन असूनही मन मोकळं करायला कोणी नाही हे जरा विचित्रच ना ? त्यातही काही गुपितं ,मानसिक अपराधिपणा, किंवा घरच्या खाजगी  गोष्टींना सल्ला हवा आहे पण ऐकून घ्यायला कुणाला नाही असं झालंय. पूर्वी वृद्ध लोकांशी बोलायला कुणी नसायचं आता तरुणांची सेम अवस्था झाली आहे. आता तर घरी मोठे लोकही नाहीत ".
" हो, खरं आहे हे. पण जे मित्र असतात ते भरवशाचे असतात का ?. रागिणीची शंका.
"हो , शक्यतो या खूप मानसिक संतुलित व्यक्ती असतात. ज्या तुमच्या बोलण्याला रिऍक्ट करत नाहीत, योग्य रिस्पॉन्स देऊन तुम्हाला बोलतं करून तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर शोधायला मदत करतात. हे म्हणजे आपण एखाद्या समुपदेशकला शेअर करून सल्ला घेण्यासारखं वाटतं लोकांना.
" ओके. मग छान आहे हे सगळं ".
" धन्यवाद मॅडम. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आजही एका मित्राला किंवा मैत्रिणीला भेटू शकता. फी फक्त 500 रुपये आहे .
रागिणी परत विचारात गेली. नक्की काय करू कळेना. तिचा प्रॉब्लेम कुणी ऐकून घेणारं नव्हतं पण आता अनोळखीशी बोलायचे म्हणजे जरा अवघडच झालं होतं. पण खरेच उत्तर मिळाले तर या अपेक्षेनं तिला एकदा ट्राय करावा वाटलं. नाहीतर ऑफिसला अजून वेळ होताच. शेवटी मनाची तयारी करून तिने 500 रुपये फी भरली.
रिसेप्शन ने तिला एका आईस्कीम पार्लर चा पत्ता दिला. अर्ध्या तासाने भेटीची वेळ दिली. रागिणीने बॉयफ्रेंडचा नांव नंबर मागितला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, आम्ही नाव नंबर शेअर नाही करत. तुमचे नांव नंबर बॉयफ्रेंडला पण माहित नसेल. त्याला फक्त आईस्क्रीम पार्लरचा पत्ता व टेबल नंबर दिला जाईल. रागिणी आणि जरा निर्धास्त झाली. एका उत्सुकतेपोटी तिथे वेळेआधी पोहोचली. तिथं थांबून वाट पाहत असताना तिला तिचा आवडता चित्रपट आठवला. "एक उनाड दिवस". रोजचा दिवस आपण नेहमीपेक्षा वेगळा जगलो तर आयुष्य 5 वर्षांनी वाढते असा संदेश देणारी मुव्ही. तिला आजचा दिवसही नेहमीपेक्षा वेगळा वाटू लागला. तीला सहज वाटून गेलं कि दोन तास सार्थकी लागले तर राघव सोबतचं नातं अजून 5 वर्षे तरी घट्ट राहावं. 
तिला रिसेप्शनचा कॉल आला. पार्लर मधील 9 नंबरचा टेबल बुक केला आहे म्हणून कळवलं. रागिणी आत जाऊन खुर्चीवर बसून वाट पाहू लागली. उत्सुकता आणि अनामिक भीती दोन्ही भाव दाटलेले. त्या तंद्रीत ती काय बोलू काय नको याचा विचार करत असतानाच
आणखी पाच मिनिटातच तिच्यासमोर कोणीतरी येऊन बसलंय याची जाणीव होताच तिनं वर पाहिलं आणि बोलली, " राघव ? तू इथे ?.
राघवही आश्चर्यचकित. " तू इथं? . आईस्क्रीम खायला ?."
" नाही. पण तू इथे कसा काय ?".
राघवला सगळा अंदाज आला आणि म्हणाला , ओके, कळलं मला. तू ज्या बॉयफ्रेंडला भेटायला आली आहेस तो मीच आहे".
" म्हणजे गेली काही महिने तू हेच काम करतोस "? रागिणीनं विचारलं.
राघवने एक पॉज घेऊन हळूच " हो" म्हणाला. 
मग यात लपवण्या सारखं काय होतं ?. रागिणी.
राघव शांत होता. तीला थांबू कि नको कळत नव्हतं. शांततेतील काही सेकंद पण खूप मोठी वाटू लागली. कुणाला काय बोलू कळत नव्हतं. रागिणी म्हणाली, " मी निघू ?".
राघव म्हणाला, " प्लिज थांब, दोन तास बोलत बस.".
रागिणी, "नको, बोअर होशील तू, नेहमीसारखा. त्यापेक्षा जाते मी ". 
राघवला टोमणा ऐकून कसेतरी झालं तरीही तो अवसान आणून म्हणाला, " हे बघ रागी, 2 तास झाल्यानंतर मला क्लाएंट चा फीडबॅक फॉर्म भरून सही घ्यावी लागते. तो ऑफीसमध्ये दिल्यानंतर त्यानुसार माझं रेटिंग वाढतं किंवा कमी होतं आणि पैसेही. तू अशीच गेलीस तर निगेटिव्ह मार्किंग होईल. सो प्लिज थांब ना ". 
"आज खूप दिवसांनी मला रागी म्हणालास, थँक्स अ लॉट. पण मध्ये बंद का केलंस रागी म्हणून हाक मारायची, ?. रागिणीनं विचारलं.
राघवही ओशाळला. नाईलाजानं परत त्यानं सावरून विचारलं, " थांबशील ना दोन तास ?. 
"पण तुझ्या स्वार्थासाठी मला किती वेळा तडजोड करावी लागेल अजून ?". तिचा दुसरा प्रश्न.
राघव निरुत्तर होता. शेवटी त्याने मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि म्हणाला, " हे बघ, मोबाईल बंद ठेऊन बोलतो. नो गेम, नो चाट.".
या निमित्तानं का असेना खूप दिवसांनी राघव मोबाईल बंद ठेऊन बोलतोय हे तिच्यासाठी खूपच झालं. ती म्हणाली, " तुझ्या मोबाईलविना दोन तासासाठी फक्त 500 द्यावे लागतील माहित असतं तर मी तुला रोज 500 दिले असते की. सरळ मलाच मागायचे ना ?." 
राघव सलग तिसऱ्या प्रश्नावर आऊट झाला होता. तिची चीड दिसत होती पण त्याला चीडता येत नव्हतं. फक्त " सॉरी " एवढंच त्याच्या तोंडातून आलं. 
राघवनं आज प्लिज, सॉरी म्हणणं तिला अनपेक्षित आणि सुखद होतं. याआधी तो प्लिज, सॉरी कधी म्हणाला होता हे आठवत असताना राघव म्हणाला, " हे बघ रागी, मी इथं माझा बॉयफ्रेंडचा रोल सोडून बाहेर येणार नाही. पती म्हणून काही रिऍक्ट करणार नाही. तू काहीही बोलू शकतेस, सांगू शकतेस. आम्ही हे इथेच ठेवतो.".
रागिणीलाही तेच हवं होतं. नाहीतरी नातं इतकं टोकाला गेलं आहे की आज आपण संधी  असूनही बोललो नाही ही खंत मनात राहू नये म्हणून तिनं आज दोन तास पुरेपूर वापरून घेऊ हा निर्धार केला. आता जे आहे त्यापेक्षा काय वाईट होणार नाही हाही विश्वास होता. 
" ठीक आहे, बोलू आपण ?"..रागिणी म्हणाली.
" थँक्स. अर्धा तास झाला आहे. इथून पुढे 1.30 तास मी तुझा पती नाही. आपण अरेतुरे ऐवजी अहोजाहो बोलू शकतो. म्हणजे तसा आमचा नियम आहे.".. राघव.
" ओके ". रागिणी म्हणाली.
" ठीक आहे मॅडम, बोला ".
कुठून सुरु करू म्हणत थोडा वेळ रागिणी शांत होती. अचानक ती म्हणाली, " मला एक तासापूर्वी रेल्वेखाली जीव द्यावा वाटलं होता. ".
राघव उडालाच. इतकं गंभीर असेल अशी कल्पना नव्हती त्याला. सीरीयसली ?".
" हो. सिरियसली".
 
" प्लिज असं परत कधी करू नका. चांगलं घडेल पुढे. विश्वास ठेवा." राघव धीर देत बोलला. आतून दुखावलोय हे त्याला दाखवताही येत नव्हतं. पण रागिणीच्या ते लक्षात आले.
" पण का ?. एनी प्रॉब्लेम मॅडम?".
" हो, मला ना हल्ली एकटं, एकाकी पडल्यासारखं झालंय. दुर्लक्षित असल्यासारखं वाटतं. माझं कुणीच नाही असेही होतं "..
" कशामुळे वाटतं असं तुम्हाला".
" पती राघव आणि माझा प्रेमविवाह. 3 वर्षे झाली लग्नाला. त्या आधी 2 वर्षे अफेअर. म्हणजे 5 वर्ष ओळखतो आम्ही एकमेकांना. पळून लग्न केल्यामुळे माहेर बंद आहे. त्याच्यासाठी मी मित्र मैत्रिणी पण टाळत आले. त्यामुळे कुणाशी बोलावं असं कुणी नाही. आणि ज्याच्यासाठी हे केलं, त्याला माझ्याशी बोलायला पण इच्छा नाही असं वाटतं. कारणे काढून टाळतो असं वाटतं. माझ्याशिवाय एक क्षण न राहणारा, एकही दिवस न भेटता राहणारा, रात्री 2 तास फोनवर बोलणारा माझा राघव हरवलाय". बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.
 
राघवला आधीची 2 आणि नंतरची 3 वर्ष आठवू लागली. त्याच्यातला बदलही जाणवला. आपल्याला दुसऱ्यातले बदल कळतात , स्वतःतले नाही असं झालं त्याला. राघवला काही करता येत नव्हतं. परत बाऊन्सर पडला होता. थोडा वेळ शांततेत गेला. रागिणीने रुमालाने डोळे पुसले. राघवनं शांतता भेदून संवाद सुरु केला, " हे असं कधीपासून बदलत गेलं असं वाटतं ". 
" माहित नाही. पण आजच्यासारखंच पूर्वीही त्याचं ऑफिस माझ्या नंतर असायचं आणि तो माझ्या आधी घरी परत यायचा. आजही असेच आहे. पण पूर्वी मी ऑफिसला जात असेल तर तो मला सोडायला यायचा. नको म्हणाले तर तेवढीच वेळ तुझी सोबत मिळेल, का सोडू ?म्हणायचा. तू गेलीस कि तासभर घरी नाही करमत म्हणायचा. ऐकायला बरं वाटायचं. त्याला असं बोलताना पाहून मी नशीबवान आहे असं व्हायचं. संध्याकाळी ऑफिसवरून तो आधी परत यायचा. मी तासभर नंतर. तर स्टेशनला न्यायला येतो म्हणून मागे लागायचा. मीच म्हणायचे, नको, दमला असशील. बस घरी. येते तासाभरात. तासाभराने घरी पोचली तर दार उघडताच त्याचं "वेलकम माय जान" म्हणून स्माईल विथ मिठी ठरलेलं. दिवसभरचा कंटाळा, थकवा कुठल्या कुठे निघून जायचा. वर सरप्राईज म्हणून त्याच्या हातचा गरम चहा आणि बिस्कीट. अर्धं अर्धं एकमेकाना भरवत खायचं. मलातर स्वर्गात आहे असं व्हायचं. मी म्हणायचे त्याला, इतकं लाड नको करू, तर म्हणायचा कि माझ्या लाडीचे लाड करतोय. उद्या एखादं मूल झालं की तू बसशील त्याला भरवत, खेळवत. मला वेळ कमी देशील. म्हणून आता मिळेल तितका वेळ घेतोय. माझ्या आठवणी तयार करतोय. फ्रेश होऊन किचन मध्ये गेले तर हा तिथेच आजूबाजूला घुटमळत असायचा किंवा बाजूला चिकटून उभा राहायचा नाहीतर किचन कट्ट्यावर बसून माझ्याकडे बघत बसायचा. मला ते आवडायचं. भारी वाटायचं. मला ना कुणीतरी स्पेशल असल्यासारखं वाटायचं. मी लाजून चुर व्हायचे आणि त्याला ते फार आवडायचं."
हळूहळू सगळं कमी झालं आणि आता मात्र यातलं काही नाही. मूल होण्याआधीच सगळं बदलत गेलंय."
तिची मान खालीच होती. आवाज बदलला होता. भरून आल्यासारखा. राघवला काय बोलू कळत नव्हतं. स्वतःला सावरू कि रागिणीला  हे त्याला कळेना. सगळ्यात वेगळी आणि अवघड केस होती आजची. 
आपण स्वतःला रोज पाहतो त्यामुळे बदल जाणवत नाही पण 2 वर्षांपूर्वीचे फोटो पाहिले की कळतं , बरंच बदलतंय. वजन असेल, रूप असेल. मग स्वभाव बदल स्वतःला जाणवत का नाही ?. का त्याला आपण अपडेटेड प्रोफेशनल राहण्याचं गोंडस नाव देतो ?. 
आताही त्याला कारण कळेना, म्हणून त्याने तिला विचारलं, " तुम्हाला असं वाटत नाही का कि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळं त्याच्या स्वभावात बदल झाला असेल ?. भविष्याची काळजी जास्त असेल ना ".
" हो असेलही. माझी आणि भविष्याची काळजी असणार त्याला. पण जॉबसाठी स्वतःचा घरातला स्वभाव कशाला बदलायचा ?. आणि जगासाठी पती पत्नी असलो तरी घरी आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसारखं राहू शकतो की.  ".
" इतकं सोपं होतं हे ?. त्याला मनोमनी वाटलं." हो, तेही बरोबर आहे तुमचं". राघव नाईलाजाने बोलून गेला. पण बदलाची सुरुवात कधी झाली असेल असं वाटतं तुम्हाला ?.
" नक्की माहित नाही पण 6 महिन्यांपूर्वी त्याचा जॉब गेला. सगळा भार आनंदाने माझ्यावर घेतला. घरखर्च , भाडं सगळं पेललं. बराचसा  खर्च कमी केला. मुलाचं प्लॅनिंग पुढं गेलं. मुलाखतीसाठी तो वणवण फिरत राहिला. नसेल तर दिवसभर घरी असायचा. मग टीव्ही आणि मोबाईल गेम्सचं व्यसन लागलं. त्याला त्यातच आनंद वाटू लागला. जॉबही नको वाटू लागला. मी सगळं करते म्हणून त्याला असं बरं वाटलं असेल. मुलाखत नसेल त्या दिवशी तो सकाळी जाताना किंवा यायच्या वेळी पण मोबाईल गेम्स मध्येच बुडालेला असायचा. मी गेली आली याकडे लक्ष नसायचं. त्यामुळे हाय बाय नाही , वेलकम तर दुर्मिळ. मला वाटलं जॉब नसल्याचं टेन्शन असेल म्हणून मन रमवत असेल पण आता जॉब मिळाल्यावर पण ती सवय कायम आहे. मी त्याला नकोशी झाली आहे असं वाटतं, चुकीचे असेल माझे पण लक्षणं तीच वाटतात. काय करू ?. जॉब मिळण्यापूर्वी झालेल्या छोट्या छोट्या वादामुळं त्याचा जॉब काय, वेळ काय आहे , पगार किती आहे हे अजून मला कळू दिल नाही. पूर्वी त्याला मला कोणतीही गोष्ट कधी सांगू असं व्हायचं, आता किती, काय लपवू असं होतंय. असं नव्हतं आधी आमच्यात ". रागिणीने मन मोकळं केलं.
इतक्यात तिथल्या वेटरने दोन मिल्क शेक दोघांच्या पुढ्यात आणून ठेवले. रागिणीनं पाहिलं तर तिचं बटरस्कॉच आईस्क्रीम विथ मिल्क शेक. हे का ?. तिनं विचारलं.
"सगळ्यांना देतो हे. नो एक्स्ट्रा कोस्ट.". राघवचा खुलासा .
" ओके, पण फ्लेवर कुणी निवडला. तुम्ही कि तुमच्या ऑफिसने ".
" मी माझ्या क्लाएंटला हेच देतो." राघव म्हणाला.
" थँक्स. यू नो, हे माझं सर्वात आवडतं आईस्क्रीम आहे. राघव सोबत खूप खाल्लंय. पण याच्या आधी कधी ते आठवत नाही".. रागिणी सहज बोलली. " निदान नवीन जॉब लागल्यावर मला पार्टी म्हणून इतकं पुरेसं होतं ".
राघवला थोडं खजील अपराधी झाल्यासारखं वाटलं. यात बरीचशी चूक आपली आहे हे त्याला वाटायला लागलं. पण स्वतःची बाजू सावरायला म्हणून काहीतरी बचाव म्हणून बोलणं गरजेचं होतं. ," कदाचित , कदाचित त्याचा नवीन जॉब , पगार तुम्हाला आवडणार नाही म्हणून सांगितलं नसेल ?".
" असेलही तसं. पण त्याने अंतर वाढत गेलं हे का कळू नये त्याला. नात्यातला पारदर्शीपणा निघून नेल्यावर उरणार काय ? शिवाय आता नवीन जॉब आहे , मग घरी आल्यावर मोबाईल गेम्स, टीव्ही यात कशाला वेळ वाया जाऊ द्यावा. बाकीची करण्यासारखं असेल की काही ?.
हो पण तो काहीतरी घरखर्च करत असेल की मदत म्हणून..?
" त्याला शक्य तेवढं करतो आणि तो सगळं करेल. तेवढा विश्वास आहे मला. पण सांगितलं असतं तर बरं झालं असतं फ्युचर प्लॅनिंगला. ".
"ते कसं काय ?." राघव.
" त्याच्या नव्या जॉबचे स्वरूप, टेंशन कळलं असतं तर मी ऍडजस्ट करायला माझ्यात बदल केला असता कि. काही मदत करता आली असती तर आनंदाने केली असती ना? त्याच्या इन्कमला मर्यादा असेल तर मी अजून ओव्हरटाईम करून चार पैसे जास्त कमवायचा विचार करेन.  त्याला जॉब आवडत नसेल तर दुसरा जॉब , बिझनेससाठी मदत केली असती. त्याला जे आवडतं तेही करायला सपोर्ट केला असता. त्यानं खंबीर , आनंदी असावं याशिवाय वेगळं काय हवं होतं मला "?. रागिणीचा प्रश्न.
 " पगार कळला कि बायका खर्चाचं काढतात म्हणून त्याने लपवला असेल तर ?.
" त्याला वाटणं चुकीचं नाही. पण मी असं नसतं मानलं,  कदाचित पगार कमी असेल पण हे थोडंच कायम राहणार आहे? नंतर वाढेल कि पगार. मी तर दोन पगार एकत्र करून त्याला आपणाला पगार म्हटलं असतं, तुझामाझा नाही. नाहीतर खर्च, बचत सगळं ठरवून केलं असतं. पण मला वाटतं की अजून मूल नाही, स्वतःचं घर नाही म्हणून जास्त प्लॅनिंग हवं. पगार कळला तर मला अजून किती बचत करायची, काय खर्च कमी करायचा ते तरी कळलं असतं इतकंच. त्याच्यासाठी आनंदानं करेन सगळं. बाकी काही नाही. मला त्याची, आमच्या भविष्याची काळजी वाटते म्हणून मनात शंका, गैरसमज येतात त्याला मी काय करू ?.
" मग शंका, गैरसमज जायला त्यानं काय करावं असं वाटतं तुम्हाला ?.
" मी एकदा वाचलं होतं, वाघाला मारायचं असेल तर तो छोटा बछडा असताना मारणे सोपं असतं. मला वाटतं शंका, गैरसमज मारून टाकायला पण तेच करायला हवं. मोठया होण्याआधी संपवून टाकाव्यात. आणि ज्याला वाटतं आपण शंका, गैरसमज निर्माण व्हायला जागा देतोय त्यानं त्या दूर कराव्यात.".
आता दोघांचाही सवांद आधी चर्चा, प्रश्नोत्तर, संवादकडून सुसंवादाकडे चालली होती. दोघांच्याही बोलण्यात मोकळेपणा यायला लागला.  रागिणीचं बोलून मन मोकळं होत होतं, त्यानं इतकं ऐकून घेतलं म्हणून तिला हलकं वाटत होत. राघवला चूक कळत होती. त्यालाही तिच्या अपेक्षा कळत गेल्या. सगळं सोपं होतं आपण अवघड करून घेतलं असं वाटून गेलं त्याला. आपल्याला स्वतःच्या समस्या सुटत नाहीत पण तीच समस्या दुसऱ्याची असेल तर सल्ले सुचतात ना ?. मग स्वतःच्या समस्येकडे दुसऱ्याची समस्या म्हणून पाहिलं तर ?.
" आता तुम्हाला त्याचा जॉब , पगार कळला तर काय कराल ?.
" जॉब त्याला आवडत असेल तर त्यानं जरूर करावा. त्यात चुकीचं काय नाही. कुठलंच काम छोटंमोठं नसत आणि पगार म्हणाल तर आधी मी त्याला, स्वभावाला पाहून प्रेम केलंय. पगार पाहून नाही. जॉबलेस असतानाही मी त्याच्यावर प्रेम केलं आहेच की". रागिनींने खुलासा केला.
" हो ते तर आहेच. पण त्याचा बॉयफ्रेंडचा जॉब चालेल का तुम्हाला ?.
" माझं त्याच्यावर प्रेम आहे. सर्वात आधी तो माझा बॉयफ्रेंड होता. त्यामुळे जॉब काहीही असुदे ,घरी तो माझा, बॉयफ्रेंड हवा एवढीच अपेक्षा. "
रागिणीला मन मोकळं केल्याचा आनंद झालेला. दोन तास वेळ संपत आलेली. राघवने फीडबॅक फॉर्म काढला. रागिनींने फक्त बिग बिग थँक्स विथ बिग स्माईल लिहिलं. राघवही खुश झाला.
त्यानं सहज विचारलं, " आता कुठं जाणार ?".
ती म्हणाली, हाफ डे ऑफिस. मग घरी ".
" ओके ", तुमच्या मिस्टरांना काही निरोप ?.
" अप्रत्यक्ष प्रश्न छान वाटला तिला. ती म्हणाली, ऑफिस जॉब घरी केला तर आवडेल म्हणून सांगा. "
" म्हणजे ?". राघव गोंधळला.
" म्हणजे घरीही बॉयफ्रेंड म्हणून काम कर, पती म्हणून नको". रागिणी खळखळून हसली. आणि राघवही . खूप दिवसांनी दोघे मनमुराद हसले. 
रागिणी ऑफिसला निघून गेली. जाताना विचार करत होती की हेच असं आधी का बोललो नाही ?. असुदे, आज बोलले तरी. फक्त राघव आता काय मानून घेतो याचं तिला टेन्शन आलं होतं. ती ऑफिसला गेली पण कामात लक्ष लागेना. घरी गेल्यावर काय होईल याचा विचार तिला त्रास देऊ लागला.  राघव त्याच्या नेक्स्ट इकडे क्लाएंटसाठी वाट पाहू लागला. त्याच्याही मनात विचाराचं काहूर दाटलेले. रागीने आधी हे सांगायचा प्रयत्न केला होता की नाही कळत नव्हतं. 
सहा वाजलेले. सगळे ऑफिसमधून बाहेर निघत होते. तेवढ्यात तिचा मेसेज टोन वाजला. राघवचा मेसेज होता. " मी घरी आलोय. वेटींग फॉर यू".
 मन हलकं झालं पण तरीही सगळं आलबेल असावं या अपेक्षेनं रागिणी घरी पोहोचली तर राघवनं दरवाजा उघडून  "माय जान" म्हणून वेलकम केलं तशी रागिणी आनंदानं रडू लागली. टेबलवर गरम चहा, बिस्कीट होतं. राघवनं तिचे डोळे पुसत तिला पहिला घास भरवला आणि लपवून ठेवलेला गुलाब आणि गजरा तिला देत म्हणाला, विल यु बी माय गर्लफ्रेंड?. 
 तिला आनंदानं भरून आलं. आणि म्हणाली, " येस्स्स, फॉरेव्हर माय बॉयफ्रेंड ".

लेखक ©विकास चव्हाण  कोल्हापूर 
9422748271.

2430. मैत्री

 "लागवडीचं मधेच काय काढलंय?" बायको ओरडली, "उद्या रविवार आहे, कामाला बाया मिळणार नाहीत. आणि उद्या तुमचं गेटटुगेदर पण आहे ना?" 
"मला गेटटुगेदरला जायचं नाही!" मी शांतपणे बोललो, "उद्याच्याला लागवड करून घेऊ." 
"इतके दिवस गेटटुगेदर, गेटटुगेदर नाचत होता आणि आज काय झालं?" अचानक काढलेल्या कामाने बायको वैतागली होती. 
"मला जायचं नाही. विषय संपला!" 
"रविवारच्या दिवशी दिवस आणि सवयीनी बायका रोज पण जास्त मागतील..." मला बाहेर जाताना बघून बायको कुरकुर करू लागली. रविवारची लागवड करायची तिची इच्छा नव्हती. 
"बायांनी किती पण रोज घेऊ दे. लागवड उद्याच करायची!" 
मागच्या काही वर्षांत दहावीचं स्नेहसंमेलन घेण्याची टूम निघाली आहे. आमच्याही वर्गमित्रांनी स्नेहसंमेलन घ्यायचं ठरवलं. माझ्यासह गावातील काहीजण एकत्र आले आणि कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. स्नेहसंमेलनाच्या आयोजक समितीत मीही होतो. 
गावात राहणारे वर्गमित्र सोडले तर दहावीच्या बॅचमधली बरीचशी मुलं संपर्कात नव्हती. मुलींचंही तसंच. लग्न होऊन त्या सासरी नांदत होत्या. क्वचित एखाद दुसरीची भेट व्हायची. 
"दादा, उद्या तुमचं गेट-टुगेदरहे ना?" रविवारच्या दिवशी मालकाने कांदा लागवडीचा घाट घातल्याने गडी बावरला होता. त्या बिचाऱ्यालाही रविवारची सुट्टी हवी असते. 
"उद्या कार्यक्रम आहे पण मी जाणार नाही. आपली लागवड महत्त्वाची आहे." मी तिरसटपणे बोललो. माझा मूड बघून तो गप्प बसला. रविवारचं काम करणं कुणाला आवडतं? 
स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला आणि व्हाट्सअप ग्रुपवर मॅसेजचं प्रमाण वाढलं. कोण कुठे आहे, काय करत आहे याची कल्पना येऊ लागली. 
गावातली म्हणजे आमच्याच वर्गातली कितीतरी पोरं-पोरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होती. काही पदव्यांनी मोठे झाले होते, काही अधिकारांनी तर काही पैशांनी. आमच्यातले काही कंपनीत कामगार झाले, काही नोकरदार, काही डॉक्टर, काही इंजिनियर, काही प्राध्यापक तर काही सरकारी अधिकारी. दोन वर्गमित्र तर सैन्यात भरती झाले होते. काही पोरीदेखील पोरांना लाजवतील अशा पदांवर काम करत होत्या. 
स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला तसा माझ्यातला न्यूनगंड जागा होऊ लागला. 
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी, शनिवारी संध्याकाळी, आम्ही सात-आठ जण शाळेत जमलो. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. दिलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडली होती. आता कार्यक्रमात उपस्थित राहणं एवढाच भाग शिल्लक होता. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी माझ्याकडे कसलीच जबाबदारी नव्हती. 
त्या रात्री मला झोप येईना. वर्गात माझ्या शेजारी बसणारा, अभ्यासातही कायम माझ्या मागे असणारा बोराटे आता महसूल अधिकारी झाला होता. आमच्या वर्गातला साळवे, ज्याच्या घरी त्या काळात खाण्यापिण्याचे वांधे असायचे, किलोस्कर न्यूमॅटिकमध्ये सिनिअर इंजिनियर झाला होता. कायम मागच्या बेंचवर बसून धिंगाणा घालणारा जाधव आता मोठा बिल्डर झाला होता. 
एवढंच कशाला? केदारी नावाची मुलगी, जी कुणाला आठवतही नव्हती, झेडपीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परीषद सदस्या झाली होती. ढेरंगे आडनावाचा पोरगा, ज्याला शाळेत असताना चप्पल घालायला मिळाली नाही, आता क्लास-वन ऑफीसर झाला होता. 
मला खरं कौतुक वाटलं परटाच्या मोडकाचं! आम्ही एकमेकांना आडनावानेच हाका मारायचो. तो मला लोखंडे म्हणायचो आणि मी त्याला मोडक. खालच्या आळीत त्यांची लाॅन्ड्री होती. त्या काळात कोण रोज कपड्यांना इस्त्री करत होतं? मोडकाची लाॅन्ड्री फारशी चालत नसे. त्याच्या घरी कायमची तारांबळ. ज्या दिवशी तो डबा आणत नसे, त्या दिवशी त्याला मी माझ्या घरी जेवायला नेत असे. 
तोच एके काळचा गरीब मोडक आता जर्मनीत नोकरी करत होता. इंग्रजीबरोबर जर्मन भाषा शिकला होता. दहावीनंतर तो शहरात मामाकडे शिकायला गेला आणि त्यानंतर आमचा संपर्कच झाला नाही. आता व्हाट्सअप ग्रुपवर पोरं-पोरी त्याचं कौतुक करत होते. खास स्नेहसंमेलनासाठी भारतात येणार म्हणल्यावर मोडक आमच्यासाठी सेलिब्रिटी झाला होता. 
एकदा मला मोडकला व्हाट्सअपवर "हाय" करावसं वाटलं होतं. पण नंतर म्हणलं आता मोडक मोठा माणूस झालाय. त्याने आपल्या "हाय"ला रिप्लाय दिला नाही तर? एक मन असंही सांगत होतं की मोडक स्वतःच मला फोन करेल. पण त्याचा फोन आला नाही. 
वर्गातल्या बऱ्याचशा मुला-मुलींनी केलेली प्रगती बघून मला प्रश्न पडले. मला काय कमी होतं? मी का प्रगती करू शकलो नाही? वर्गात माझी गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत होती. आमच्या घरची परिस्थिती चांगली होती. वडील मोठे शेतकरी होते. तरीही मी एवढा मागे का राहिलो? 
मी शिकलो नाही असं नाही. माझं पोस्टग्रॅज्युएशन झालं. पण करिअर म्हणून जी जडणघडण व्हायला हवी होती ती झाली नव्हती. मला चिंता लागली. आयुष्यात यशस्वी ठरलेल्या मित्र-मैत्रिणीना उद्या तोंड कसं दाखवायचं?" 
सर्वजण विचारणार, "तू आता काय करतो?" त्यांना काय सांगायचं? शेवटी मी ठरवलं. गेट-टुगेदरला जायचंच नाही.
त्या रात्री नीट झोप आली नाही. पहाटेच उठलो. हळूहळू उरकलं. सहा वाजता ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून शेतात गेलो. बरोबर गडी होताच. सकाळी सकाळी आम्ही कांद्याचं रोप उपटायला सुरुवात केली. आठ वाजता रोजंदारीवरच्या बायका हजर झाल्या. बायको त्यांच्यामागे होतीच. मी पाण्याच्या बाऱ्यावर तर गडी कांद्याचं रोप वाफ्यांनी टाकत होता. वावरात लागवड चालली असली तरी माझं मन शाळेतच होतं. 
फोन सायलेंट मोडवर ठेवलेला. आज मी कुणाचा फोन घेणार नव्हतो. दहा वाजेपर्यंत कुणाचा फोन आलाही नाही. साडेदहानंतर मात्र खिशात ठेवलेला मोबाईल थरथरू लागला. दोन-तीन वेळा तसं झाल्यावर मोबाईल चेक केला तर मित्रांचे मिस्ड कॉल. न पाहिल्यासारखं करून मोबाईल खिशात ठेवला. 
अकरा वाजल्यानंतर एसएमएस येऊ लागले. नेट चालू केलं तर व्हाट्सअपवर धडाधड मॅसेज पडू लागले. कार्यक्रमालाच जायचं नाही त्यामुळे मॅसेजला उत्तर द्यायचा किंवा कॉलबॅक करायचा प्रश्न नव्हता. 
विहिरीवरून आणलेल्या पाईपलाईनचं पाणी पाटाने खळखळत पुढे सरकत होतं. बारं दिल्यावर लोण्यासारख्या मऊ मातीचे गादीवाफे पाण्याने टरारून भरत होते. माझंदेखील मन शाळेच्या आठवणींनी भरून आलं होतं. 
पहिली ते चौथी मराठी शाळा आणि पाचवी ते दहावीतली हायस्कूलची वर्षे डोळ्यांपुढे उभी राहिली. मला माझ्या मित्र-मैत्रिणींना खरंच खूप भेटावंसं वाटत होतं. पण काय करणार? मी शेतकरी माणूस. त्यांच्यापुढे कसा जाणार? त्यांना काय सांगणार? स्वतःबद्दल सांगताना "एवढं शिकूनसुद्धा मी मातीत मरतोय" हे सांगू? 
आता सर्वजण हॉलमध्ये बसले असतील. आता दीपप्रज्वलन चाललं असेल. आता प्रमुख पाहुणे सरस्वती पूजन करत असतील. आता आमची वयोवृध्द शिक्षक मंडळी व्यासपीठावर बसली असतील. आता माझे मित्र व मैत्रिणी समोरच्या खुर्च्यांवर बसून शिक्षकांची मनोगतं ऐकत असतील. सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतलेला बर्वे आत्ता डायसपुढे उभा बोलत असेल. 
कार्यक्रमाचा आराखडा आम्हीच बनवला असल्याने ते नियोजन मला पाठ होतं. मनगटावरच्या घड्याळात बघून 'आता तिथे काय चालू असेल' याचा अंदाज मी बांधत होतो. कांद्याची लागवड चालू असलेल्या वावरात उभा असतो तरी मनाने मी शाळेतच होतो. 
पुढे जाणाऱ्या प्रत्येक मिनिटाबरोबर स्नेहसंमेलनात काय घडत असेल याचं चित्र डोळ्यांपुढे उभं राहत होतं. 
मला मित्रांची, मैत्रिणींची आठवण क्षणोक्षणी येत होती. पण कार्यक्रमात बिझी असलेल्या मित्रमैत्रिणींना माझी आठवण येत असेल का? माझी शंका निराधार होती. जसा इथे मी त्यांना मिस करत होतो, तसं तेदेखील मला मिस करत होतेच की! त्याशिवाय का एवढे मिस्ड कॉल आणि मॅसेजेस आलेत? 
अचानक विचार आला. आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर? त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर? गावातल्या एका मोठ्या, श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय! पाण्याची बारी देतोय! चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय! 
या कल्पनेनेच मला कसंतरी झालं. 
बघता बघता दुपार उलटली. कार्यक्रम सोडून आपल्याला बोलवायला कुणी येणार नाही हा विश्वास खरा ठरला. चुकून जर कुणी आलंच तर लागवडीला माणसं कमी आहेत, बाया घेतलेल्या आहेत, मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगता आलं असतं. 
लागवडीचं काम जोरात चाललं होतं. रविवार असल्याने बायांना काम उरकून घरी जायची घाई होती. तसं बघता दुपारपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक काम झालं होतं. चार वाजताच लागवड उरकली तर? मग काय करायचं? 
बायको म्हणेल, "गेटटुगेदरला जा." पण मी तर तिथे जाणार नव्हतो. आता तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालू असेल. मुलं-मुली एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारत असतील. जुन्या आठवणी काढून हसत असतील. एकमेकांचं कौतुक करत असतील. 
नकळत मी माझी तुलना मोडकशी करू लागलो. तो जर्मनीत सेटल झाला असला तरी मीही गावातला एक मोठा शेतकरी होतो. आम्हाला मूळचीच जमीन जास्त. त्यात मी माझ्या कष्टाने अजून भर घातली होती. आज गावात माझ्याइतकं क्षेत्र कुणालाही नव्हतं. पण मोठा शेतकरी असूनही वावरात काम करायची माझी खोड मोडली नव्हती. स्वतःच्या वावरात काम करायला कसली लाज? 
चार वाजता लागवड संपली. बायामाणसं घरी गेली. गडी संध्याकाळच्या धारांची तयारी करायला गोठ्यावर गेला. बायको "घरी चला" म्हणाली पण मी गेलो नाही. तिथेच बांधावर बसून राहिलो. डोक्यात पुन्हा एकदा तेच विचारचक्र सुरू झालं. 
एव्हाना कार्यक्रम उरकला असेल. चारपर्यंतचीच वेळ होती. आता पाच वाजून गेले होते. आता सगळे घरी निघाले असतील. मी सुटकेचा निश्वास टाकला. 
पण नंतर माझ्या विचारांची दिशा बदलली. मला स्वतःचा राग आला. आपण आपल्या आयुष्यात काही करू शकलो नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपली मित्रमंडळी 'ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही केलं आहे' त्यांचं मला कौतुक का करावं वाटलं नाही? 
शाळेत ज्या मित्रांबरोबर खेळलो, अभ्यास केला, मार खाल्ला, त्यांच्या यशाचा मला हेवा वाटावा? त्यांचं कौतुक करण्याचा मोठेपणा माझ्यात नाही?
विचारांच्या या वेगळ्या प्रवाहाने स्नेहसंमेलनाला न जाऊन आपण चूक केल्याचं लक्षात आलं. जे नशिबात होतं, ते आपल्याला मिळालं. पण ज्यांनी स्वःतचं नशीब घडवलं, त्यांचं कौतुक मी करायलाच हवं! 
विहिरीवर जाऊन हातपाय धुवावेत, घर गाठावं आणि कपडे बदलून शाळेत जावं. तिथे गेल्यावर सांगता येईल की अचानक लागवडीचं ठरलं. 
मी धावतच विहिरीवर गेलो. मोटर चालू केली. विहिरीजवळचा एक आउटलेट खोलला. पाटात उतरून हातपाय धुवू लागलो. हातपाय धुताना मला जुने दिवस आठवू लागले. 
आमच्या घरापुढे पाण्याचा हापसा होता. शाळा घराजवळच असल्याने पोरं सकाळ संध्याकाळ हापशावर यायची. सकाळी पाणी प्यायला हापशावर, दुपारी डबे धुवायला हपश्यावर, संध्याकाळी हातपाय धुवायला हापशावर. घरापुढच्या बाभळीवर जशा दिवसभर चिमण्या दिसायच्या तशीच हापशावर दिवसभर पोरं दिसायची. आमचं घर माझ्या मित्रांसाठी "आओ जाओ, घर तुम्हारा" होतं. 
हापशाच्या आठवणींनी मी पुन्हा एकदा लहान झालो होतो. स्वतःचं देहभान हरवून बसलो होतो. माझ्यातला लहान मुलगा पाटातल्या पाण्यात खेळत होता. 
पाईपमधून बदाबदा पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने बांधावरून चालत येणाऱ्या बडबडीकडे माझं लक्ष गेलं नाही. मान वर करून पाहिलं तर काय दिसलं? सणवाराला घालावेत तसे खास कपडे घातलेल्या मित्र-मैत्रिणी बांधावरून चालत माझ्याकडे येत होत्या. 
त्या सगळ्यांना शेतावर आलेलं बघून मला गुदमरल्यासारखं झालं. आपण कार्यक्रमाला गेलो नाही म्हणून सर्वजण इकडे आले काय? 
आज स्नेहसंमेलनाला सत्तर विद्यार्थी आल्याचं समजलं. त्यातले वीस जण माझ्याकडे आले होते. एवढ्या सगळ्यांत मी मोडकला लगेच ओळखला. तो माझ्याकडे बघून हसला पण काही बोलला नाही. तो वेळ काढून माझ्याकडे आला होता हेही महत्त्वाचं होतं. 
मला मोडकशी बोलावं वाटत होतं. पण एवढी पोरं-पोरी खास माझ्यासाठी आलेली. कोण काय बोलतंय कळत नव्हतं. एवढ्यातून एकट्या मोडकचीच चौकशी कशी करायची? तसा मोडकही फारसा बोलका नव्हता. 
शाळेत असताना मोडक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा होता. आजही तो गालातल्या गालात हसत होता. क्षणभर वाटलं, मोडक त्याची पोझिशन दाखवायला तर आला नाही? "लोखंडे, बघ, आज मी कुठे आणि तू कुठे!" 
"गेटटुगेदरला का आला नाहीस? एवढा कामदार लागून गेलास की काय?" बोरावकेने विचारलं. ही बोरावके वर्गातसुध्दा खूप बडबड करायची. 
"तू आम्हाला भेटायला आला नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो" असं म्हणून जांभळेने मला लाजवलं. 
आता खरं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय मित्रांशी खोटं बोलणं मला जमणारही नव्हतं. 
"तुमच्यापैकी बरेच जण नावाजलेल्या कंपन्यांत, मोठमोठ्या पदांवर काम करत असताना मी मात्र आहे तसाच राहिलो. त्यामुळे कार्यक्रमाला यायची लाज वाटली." मी खरं ते सांगितलं. 
"अरे राजा, आम्ही करतोय ते तर कुणीही करेल. पण तुझ्यासारखा शिकला-सवरलेला मुलगा शेती करतोय याहून चांगली गोष्ट कोणती? तू सुध्दा पोस्टग्रॅज्युएट झाला आहेस. ठरवलं असतं तर तुही हवी तशी नोकरी मिळवली असती! पण तू शेती करायचं ठरवलं. तू नुसती शेतीच केली नाहीस तर तुझ्या वडिलांच्या सातबाऱ्यातलं क्षेत्रही वाढवलं!" बर्वेने मोठं भाषणच दिलं. 
"मुख्याध्यापकांनी तर भाषणात तुझं आवर्जून कौतुक केलं. तू शेती करतोय याचा त्यांना अभिमान आहे." कोलतेने त्या भाषणाची आठवण करून दिली आणि इतरांनी माना हलवून माझ्याकडे कौतुकाने पाहिलं 
"तुला आमचा अभिमान आहे की नाही माहित नाही," शाळेत असताना वर्गात कधीच न बोललेली वरपे म्हणाली, "पण आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे." 
खरं तर मी मित्रांची चौकशी, कौतुक करायचं तर तेच माझी चौकशी, कौतुक करू लागले. मी एकटा आणि ते एवढे सगळे. ते मला बोलूही देईनात. मग विचार केला, हॉटेलात नेऊन सर्वांना चहा पाजावा. तिथं सर्वांशी बोलता येईल. 
"काय लोखंडे, ओळखलं का नाही?" बराच वेळ माझ्याकडे बघत असलेला मोडक शेवटी बोलला. 
"तुला ओळखणार नाही असं कधी होईल का?" इथेसुद्धा माझा इगो आडवा आला होता. मोडक बोलल्यावरच मी त्याच्याशी बोललो होतो. "एक काम करू. इथं एक नवीन हाॅटेल झालंय. आपण तिथं चहा घेऊ." मी पुढे म्हणालो. 
"दोस्ता, शाळेत असताना मला घरी नेऊन जेवायला घालायचा आणि आता इथे हॉटेलवर चहा पाजून परत पाठवणार का?" मोडकच्या प्रश्नाने मला लाजवलं. माझी त-तं-म-मं झाली. मोडकने पुढे केलेला हात मी माझ्या हातात घेतला. त्या हस्तांदोलनात तीच पूर्वीची उब होती, प्रेम होतं, आपुलकी होती. 
"मी मिसेसला सांगून आलोय की भारतात गेल्यावर लोखंडेच्या घरी जाऊन बाजरीची भाकर उडदाच्या आमटीत चुरून खाणार..." मोडक असं बोलताच माझे डोळे भरून आले. त्याला भाकर चुरून खायला, बुक्कीत कांदा फोडायला मीच शिकवलं होतं. मोडक अजून काही बोलला असता तर मी पोरींसारखा रडलो असतो.
"काय रावऽ तुझं आडनाव लोखंडे आणि वाफ्यात पाणी शिरल्यावर ढेकूळ विरघळावं तशी तुझी अवस्था व्हावी?" असं विचारताना घेनंदने हसण्याचा प्रयत्न केला पण तो डोळ्यांच्या खालच्या कडा बोटांनी कोरड्या करत होता. त्या क्षणी बऱ्याच जणांच्या डोळ्यांत पाणी आलेलं. आपलं रडकं तोंड दिसू नये म्हणून सर्वजण इकडे-तिकडे बघत होते. 
शेवटी मीच कसंबसं हसलो. खिशातला रुमाल काढून तोंड पुसण्याच्या निमित्ताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मित्र-मैत्रिणींना "चला, माझ्या घरी जाऊ" म्हणालो. 

साभार स्नेहबंध
संडे_स्टोरी

2429. अपमानाचे बाळकडू

     दिल्लीच्या एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षक बोलले म्हणून स्वतःचे आयुष्य संपवले. कारण काय तर शिक्षक त्याचा जाच करत होते असे त्यानेच मृत्यूपूर्वी लिहून ठेवले आहे. जे काही घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे . असं घडायला नको होतं . मुळात त्याने शिक्षकांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी जो मार्ग निवडला तोच मुळी चुकीचा आहे याबद्दल कुणाचंच दुमत असू शकत नाही. शिक्षकांनी जाच केला म्हणजे नक्की काय केलं?  तर ते त्याला सर्व विद्यार्थ्यांसमोर काही अपमानास्पद बोलले. यामुळे त्या विद्यार्थ्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्याची परिणती म्हणजे त्याचे आयुष्य कायमचे संपले .
     शिक्षकांच्या काही बेजबाबदार वक्तव्याने कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनावर अनेकदा खोल परिणाम होऊ शकतो. सगळेच विद्यार्थी काही बिनधास्त अथवा कोडेगे नसतात. काही अतीसंवेदनशील असतात त्यामुळे शिक्षकाने  सहज उच्चारलेल्या एखाद्या वाक्याचा किंवा शब्दाचा या मुलांवर मोठा आघात होतो .  त्यामुळे शिक्षकांच्या या कृत्याचे समर्थन नाही कोणीच करू शकत नाही .
      पण या प्रकारच्या घटनेच्या दुसऱ्या बाजूचाही आपल्याला आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे . गेल्या पंचवीस तीस वर्षांपूर्वी आणि त्या आधी कितीतरी वर्षांपूर्वी घरातल्या वडिलधाऱ्यांच्या तापट स्वभावाची चव न चाखलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही . जाणते अजाणतेपणी आपल्या हातून छोटीशी जरी चूक झाली तरी आई बाबांची खूप बोलणी खावी लागत . वर काका देखील ओरडत . अशावेळी आपली चूक नसतानाही आपण गप्प बसत असू. कारण आपल्याला माहित असे की हा राग काही कायमचा असणार नाही . शिवाय अशावेळी आजी आजोबांचा अधिक आधार वाटत असे. यामुळे शाळेतील शिक्षकांचा बेदम मार आणि अभ्यास न केल्याने ऐकून घ्यावी लागणारी त्यांची बोलणी याचे त्याकाळी काहीच वाटत नसे.
    मुळात कोणत्याच घरात मुलांचे मग तो मुलगा असो की मुलगी , कधीच फाजील लाड होत नसत. याचाच परिणाम म्हणजे मुलांमध्ये एक प्रकारे सहनशक्ती वाढीस लागे . बरं असंही नाही की  आपल्याच घरातील वडीलधारी मंडळी रागवत . मित्राच्या घरीही तीच परिस्थिती असे . त्यामुळे अशा रागवण्याचा कोणत्याच मुलांवर काहीच परिणाम होत नसे. काहीवेळेस तर शिव्यांचा तीर्थप्रसाद देखील तीर्थरूपांकडून मिळत असे  पण त्याचेही काही वाटत नसे . कधी कधी तर शेजारचे काका किंवा गावातील एखादी ओळखीची ज्येष्ठ व्यक्ती देखील आपल्या चुकीच्या वागण्याबद्दल आपल्याला तिथल्या तिथे बोलत. तेव्हा त्यांच्याकडे मान वर  करून पहाण्याची हिंमत देखील होत नसे. उलट आपल्या घराच्या मंडळींना ही गोष्ट कळू नये याची दक्षता घेतली जायची. चुकून जर घरच्यांना कळलेच तर आणखी बोलणी खावी लागायची .
     त्यावेळी घरची आर्थिक स्थिती देखील जेमतेमच असे. त्यामुळे ' पॉकेट मनी ' हा प्रकारही अस्तित्वात नव्हता . मग चंगळवादाचा प्रश्नच उद्भवत नसे . आज चित्र पूर्णपणे बदलले आहे . एक तर एकच मूल आणि तेही अति लाडाकोडात वाढवलेले. मग काय त्याला नाही ऐकायची सवयच नसते . त्याला मारणे तर दूरच  साधे डोळे सुध्दा वटारले जात नाहीत . शिवाय भरपूर पॉकेट मनी त्याच्या खिशात बळे बळेच अक्षरशः कोंबला जातो . आता तर काय त्याच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन खातेच उघडून दिले जाते. अशाने ही मुलं इतकी शेफारतात की आई वडिलांचे एटीएम कार्डही तेच वापरतात. आणि अशा गोष्टींना आई वडिलच प्रोत्साहन देत असतात. ही मुलं पुढे जाऊन अधिक हट्टी बनतात. यांना बाहेरचं सोडाच घरच्या मोठ्या माणसांनी देखील बोललेलं चालत नाही. चुकून जर कुणी बोललेच तर हे त्यांच्याकडे मारक्या बैलासारखे शिंगे उगारून बघत असतात . यांना कुणीच यांच्या विरुद्ध बोललेलं चालत नाही .
   अशावेळी जर एखादा शिक्षक यांच्या भल्यासाठी यांच्यावर ओरडत असेल तर तो शिक्षक यांच्या भाषेत डोक्यात जातो . कोणताही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात काही खानदानी वैर नसते. उलट आपल्या विद्यार्थ्याला सगळं कळावं , तो अभ्यासात पुढे यावा , त्याने स्वतःचं आणि त्याच्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे असेच प्रत्येक शिक्षकाला वाटत असते. कधी कधी काही शिक्षक सुद्धा बोलताना भान विसरून जातात आणि रागाच्या भरात बरंच काहीसं उलट सुलट बोलून जातात. मात्र थोड्यावेळाने ते हे विसरूनही जातात. पुन्हा त्या विद्यार्थ्याला ते जवळ घेतात आणि प्रेमाने त्याला समजावून सांगतात. अशावेळी विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांची ही बाजू समजून घ्यायला हवी . मात्र समजून घेणं म्हणजे नेमकं काय हेच मुळी या लाडात वाढलेल्या मुलांना समजत नाही . त्या विद्यार्थ्यांच्या मनात अशा शिक्षकाबद्दल कोणताही आदर राहत नाही.  आपल्या सरांनी आपला सगळ्यांसमोर अपमान केला एवढेच त्याच्या डोक्यात राहते . आता आपण कुणाला तोंड दाखवू शकत नाही . मित्रांशी बोलू शकत नाही . ही भावनाच त्याला मग गैरकृत्य करण्यास प्रवृत्त करीत असते.  अखेर त्याच्या बालसुलभ भावनांचा कडेलोट होऊन तो स्वतःचे मोलाचे आयुष्य कायमचे संपवून टाकतो. 
   मात्र असे करत असताना त्याच्या हे लक्षात येत नाही की या शाळा कॉलेजच्या अपमानापेक्षाही प्रत्यक्ष बाह्य जगात अर्थात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी या पेक्षाही मोठ्या अपमानाचे कढ सोसावे लागतात. या व्यतिरिक्त समाजात वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात जेव्हा आपण येतो तेव्हा अनेकांच्या भिन्न आणि विचित्र स्वभावांमुळे कित्येकदा आपल्याला अपमानित व्हावे लागते. त्यावेळी तो अपमान सहन करता यायला हवा . काहीवेळेस आपल्याला डावलून पात्रता नसलेल्या कुणाला वरच्या पदावर बढती दिली जाते तेव्हा झालेला अपमान गपगुमान  गिळावा लागतो. आयुष्यात असे अपमानाचे कित्येक प्रसंग येत असतात त्याला सामोरे जाण्याची तयारी बालवयातच करायला हवी. अन्यथा या स्पर्धेच्या युगात वावरणे आणि टिकून राहणे फार कठीण होऊन जाईल. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशिकता. ती सोशिकता अंगी येण्यासाठी पालकांनी आपल्या मुलाला कणखर बनवले पाहिजे. 
    आज मुलं जराशा बोलण्याने बिथरतात आणि मागचा पुढचा विचार न करता एकदम टोकाचे पाऊल उचलतात . त्यामुळे पालक आणि शिक्षक दोघांनीही या कोवळ्या वयातल्या मुलांची मानसिकता प्रथम समजून घेऊन त्यांना बाहेरच्या जगाची ओळख करून द्यायला हवी. मोबाईलच्या आभासी दुनियेतून  त्यांना बाहेर काढून वास्तवाची जाणीव करू द्यायला हवी . 
     शिवाय शिक्षकांनी देखील आता परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःमध्ये बदल करून घ्यायला हवा .  सध्या अनुभव संपन्न शिक्षकांची एक पिढी आता निवृत्त झाली आहे आणि  तरुण अतिउत्साही शिक्षकांची एक नवी फळी तयार होऊ लागली आहे . यापैकी बऱ्याच शिक्षकांचे त्यांच्या विषया खेरीज अन्य कसलेच वाचन नसते . त्यामुळे आपल्या विषया व्यतिरिक्त इतर कोणत्या विषयावर हे शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकत नाहीत की त्यांना वेगळं काही सांगू शकत किंबहुना विद्यार्थ्यांशी निखळ मैत्रीपूर्ण गप्पा देखील यांना मारता येत नाहीत. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतात . मुळात त्यांच्यात विद्यार्थ्यांना समजून घेण्याची ती प्रगल्भताच विकसित झालेली नसते. कदाचित म्हणूनच शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये काही अंतर असावं लागतं याचंही भान यांना नसतं . 
    आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत जगात सध्याच्या विद्यार्थ्याला बरीच माहिती असते . ती कशी मिळवावी हे देखील त्यांना चांगलंच उमगलेलं असतं‌. परंतु माहिती आणि ज्ञान या दोन भिन्न बाबी आहेत हे आधी शिक्षकाला समजले असेल तरच तो खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानसंपन्न करू शकतो.
    आधीच शिक्षणक्षेत्रात अनागोंदी कारभार चालू आहे . त्यात शिक्षकांच्या विपरीत वागण्याची भर जर अशा प्रकारच्या घटनांनी पडत राहिली तर शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेवर जो काही उरलासुरला विश्वास आहे तोही धुळीस मिळेल. शिक्षण आणि समाजव्यवस्था या एकमेकांना पूरक आहेत.  त्यामुळे त्यांचा परिणाम आपल्यावर होणार हे ओघाने आलेच . मात्र यातील जे काही गुणदोष आहेत ते वेळीच दूर केले तरच आपण एक नवीन समाज निर्माण करू शकतो . आणि या नवनिर्मितीसाठी तरुणाईची सर्वात निर्णायक भूमिका ठरणार आहे. पण ही निर्णायक भूमिका निभावण्यासाठी मुळात ही तरुणाई सक्षम असली पाहिजे - कणखर असली पाहिजे.  एवढ्या तेवढ्या कारणावरून जर ही पिढी स्वतःला संपवू लागली तर पुढचं भविष्य काय , याचाही यादृष्टीने विचार व्हावयास हवा.  छोट्या मोठ्या अपमानाने जर आपण खचून जाणार असू तर भविष्यातील आव्हानांना तोंड देणार कसे ?
       संन्याशाची पोरं म्हणून अपमान ज्यांच्या पाचवीला पुजलेल्या अशा चार भावंडांनी जर समाजापासून दूर पळ काढत कुठे तरी जाऊन जीवन संपवले असते तर निवृती , ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे वारकरी संप्रदायाच्या चौरंगाला लाभलेले  चार आधारस्तंभ कसे आकाराला आले असते आणि त्यावर ज्ञानेश्वरी नावाच्या माऊलींच्या ग्रंथाचे पूजन आणि पारायण कसे केले असते? बादशहाच्या दरबारात झालेल्या अपमानाने शिवराय खचले असते तर त्यांची ओळख आज छत्रपती म्हणून कधीच झाली नसती. खालची जात म्हणून सतत अपमान सहन करावा लागत असल्याने जर भीमराव ने शिक्षण सोडून दिले असते तर आज आपल्याला संविधान लिहिणारे  डॉ. आंबेडकर कधीच कळले नसते . मुलींची शाळा सुरू केल्याने अंगावर होणाऱ्या शेण आणि चिखल फेकीच्या अपमानाने जर फुले दांपत्याने शाळाच बंद केली असती तर आजही कित्येक स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या . काळया पाण्याची शिक्षा करून इंग्रजांनी माझा फार मोठा अपमान केला आहे असे म्हणून विनायकने कारावासात आत्महत्या केली असती तर स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला कधीच कळले नसते.  रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून इंग्रजांनी ' काळा ' म्हणून  सामानासकट स्टेशनवर फेकल्याने फार मोठा अपमान झाला झाला असे समजून जर मोहनदासने त्याच रेल्वे खाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली असती तर आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी कधीच  कळले नसते.
    अर्थात अपमानाचे विष प्राशन करून जो पुन्हा पेटून उठतो त्यालाच यशाचे अमृत चाखावयास मिळते.  ते अमृत वाट्याला येण्यासाठी आयुष्यात एकदा तरी अपमान व्हायलाच पाहिजे आणि त्या अपमानाचे बाळकडू आता घराघरांतून दिले पाहिजे...!!

 ©  मार्तंड औघडे
 ( भाईंदर )
२३ नोव्हेंबर २०२५
                    
🪧 विचार करायला प्रवृत्त करणारी पोस्ट आहे.. कृपया सर्वांना नक्कीच फॉरवर्ड करा आणि आपल्या ग्रुप वर शेअर करा..

2428. चांदण्यांची ओटी

  ती चहाचा कप घेऊन अंगणात झोपाळ्यावर येऊन बसली. आईचा चौदावा कालच झाला होता. आता ह्या घराचं काय करायचं ते सगळं शेजारी असणाऱ्या काकांशी बोलुन ती उद्या परत जाणार होती.
         काल पर्यंत सगळे घरात येणारे जाणारे असल्याने वेळ गेला आता मात्र आईची आठवण जास्त तिव्रतेने येत होती. झोपळ्याच्या उजव्या बाजुला पुजेसाठी लागणारी सगळी फुलं होती. कान्हेरी तर किती आवडायची तिला. म्हणायची, 'रूप आणि गधं नसला तरी बारा महिने देवाला सेवेत हजर असते हि. फिकट गुलाबी अगदी अंगोपांगी बहरलेली...' मोरपिसासारखा निळा गोकर्ण तर लाडाने गच्चीत चढवून दिला होता तिने...पांढऱ्या चांदण्यांचा  चांदणी पाट टोपलीभर फुलं देतो. 
        तुळशी तर किती आल्या आहेत. मागे आपण म्हणालो होतो 'आई तुळशी काढून टाक. एखादी ठिक आहे' तर म्हणाली होती,"माझं ऑक्सिजन हब आहे ते. सकाळचा पेपर मी तिथेच बसुन वाचते आणि सावळ्या विठ्ठलाला गळाभर तुळशीमाळ घातली कि छान दिसतो तो...
       आईचं फुलांचं झाडाचं वेड तिला कायम हिरवंगार ठेवायचं. आण्णा गेल्यावर आपण किती म्हंटल होतं 'चल माझ्याकडे रहायला' पण नाही आली,...
        घरातल्या वस्तू वस्तू मध्ये ती होती... छोटीशीच खोली आणि हे अंगण... आपलं लग्न, बाळंतपण, बारसे, आपलं दोन लेकरासोबत माहेरपण, सगळं हौशीने करायची... आपली लेकरे आज एवढे मोठे झाले तरी एक दिवस तरी राहून जायचे सुट्टीत... प्रत्येकाच्या वयाचं होऊन वागता यायचं तिला, म्हणून जावाई काय.. आपल्या सासरची माणसं काय, सगळ्यांना हळहळ वाटली आहे तिच्या जाण्यानं...
       जाण्याच्या काही दिवस आधीतर बोलली होती आपल्याशी.."ह्या वर्षी अधिकमास आहे... तू जरा निवांत ये गं.. तुझी ऑफिस धावपळ नको... तुला गरम गरम गुळाचे अनारसे खाऊ घालेन.. हातपाय धड आहेत आईचे तो पर्यंत माहेर आहे गं बाई.. 
        या वेळी तुला साडी नाही, तर सुंदर पुस्तकं देणार आहेत.. वामनराव गेले, त्यांची गावातली लायब्ररी बंद केली.... तुला आवडणाऱ्या सगळ्या लेखिकांची पुस्तक घेतली आहेत अर्ध्या किमतीला विकत... तू लग्नाआधी किती जात होतीस तिथे... नंतर मात्र विसरलीस तुझं  वाचन वेड, ते काही मला पटलेलं नाही..
        बायकांनी गुरफटून नाही घ्यायचं.. आपलं अस्तित्व टिकवून संसार करता यावा.. जगण्याला आनंद देणारी आपली आवड जोपासावी..... माझं शिवणकाम, बागकाम मी टिकवण्यासाठी प्रयत्न केले, तू बघत होतीस ना..
         तुम्हाला तर खुप सुख सोयी आहेत... अगदी नळ उघडला कि पाणी , बटन दाबला कि मिक्सर... आम्ही मात्र सगळी कामं करून आवडी टिकवल्या म्हणुन शेवटपर्यंत आनंदी राहू शकलो.... संसार सगळयांना आहे गं, पण त्या सोबत आनंद सापडला तर खरी मजा आहे....'
        "तुझी चिमणी येईल ना धोंड्याला या वेळी ???" तिने विचारलं होतं.. त्यावर आपण म्हणालो, "नाही गं 10 वी आहे... क्लास असतील..." 
       त्यावर आई म्हणाली, "आपल्या ह्या तिसऱ्या पिढीशी बोलायचं आहे मला आता. ती पण आता मोठी झाली आहे.. मागच्या वर्षी आली नाही ती. तिला सांग आजीने गम्मत ठेवली आहे करून तुझ्यासाठी.  तिची पाळीपण सुरू झाली ना, स्त्रीपणाकडचा प्रवास तिचा, काही गुजगोष्टी करेल तिच्याशी... बघ.. जमलं तर घेऊनच ये.."
       ह्या फोननंतर आई गेल्याचाच फोन आला. ती चहाचा कप ठेवायला आत आली.. छोटासा ओटा, देवघर, शिलाई मशिन, सगळीकडे प्रसन्नता होती.. ती सगळीकडे हात फिरवत होती.. मध्येच डोळे झरझर वाहात होते... 
        तेवढयात रमाबाई आल्या "ताईसाहेब. आजीबाईने निरोप ठेवला होता तुमच्या साठी. ती तुमच्यासाठी आणलेली पुस्तकं आणि त्या ट्रँकेत एक ओटी आहे, ती तुमच्या लेकीसाठी ठेवली आहे. आठवणीने घेऊन जा, येते मी.."
      तिनं अधाशी पणाने पुस्तकं छातीशी धरली. ती लोखंडी पेटी उघडली.. एका रेशमी कापडात काही तरी बांधलं होतं. तिने पटकन उघडलं तर त्यात.. छोट्या छोट्या चांदण्या शिवलेल्या होत्या, चमकणाऱ्या कपड्याच्या.. तिला प्रश्न पडला.. हे कापड बघितल्यासारखं वाटतं?? 
       त्यात एक चिठ्ठी होती,.. तिने उघडली... सुंदर अक्षर आईचं, अगदी मोत्यासारखं.. चिठ्ठी नातीसाठी होती....
'प्रिय चिमणे,
        तु एकदा तुझा चंदेरी फ्रॉक इथेच विसरून गेली. नंतर तुला तो लहान झाला म्हणुन नकोच म्हणालीस. एकदा गच्चीत झोपलो तर म्हणाली होतीस, "आजी ह्या चांदण्या ओंजळीत घेता आल्या तर..." मला तेंव्हा आवडली तुझी कल्पना. आपल्या स्त्री आयुष्याशी निगडीत वाटली. 
    तुला आता पाळी आली. स्त्रीच्या पूर्णत्वाकडचा तुझा प्रवास. तुला आजी म्हणून समजवताना तुझ्याच चांदण्यांच्या कल्पनेने तुला समजावणं मला सोपं वाटलं. ह्या चांदण्यांच्या मागे मी काही लिहिलं आहे. आईने तुझ्या ओटीत दिलं कि बघ...'
        तिने चांदण्या वळवून बघितल्या. ती चिठ्ठी पुढे वाचू लागली. 'सुख, समाधान, दुःख, राग, चैतन्य, हळवेपणा, कठोरपणा. अश्या अनेक चांदण्या आता स्त्रीच्या प्रवासात ओटीत असतात. ह्या सगळ्या सांभाळायच्या आणि ह्यात सगळ्यात वरती ठेवायची ती शुक्राची चांदणी. तुला आठवते ना आपण आवर्जून बघायचो तिला. चमकदार अशी... त्या चांदणीवर मी लिहिलंय "आनंद".. काही झालं तरी तो शोधत राहायचा. प्रत्येक परिस्थितीत.‌‌ मग बघ सगळ्या चांदण्या ओंजळीत आल्याचा कसा आनंद भेटतो... 
तुझी आजी....
(ता. क. -- तुझ्या त्या चंदेरी फ्रॉकच्याच शिवल्या आहेत चांदण्या...)
      तिला आईचं कौतुक वाटलं. 75 वयाची आई किती विचारपूर्वक वागते... जगणं सहज सोपं करून सांगते... तिला हि नव्याने स्त्रीपणाचा अर्थ सापडला. डोळे पुसत तिने ती ओटी आपल्या पर्समध्ये ठेवली...

2427. तुझ्या प्रेमात… पण स्वतःसह

 तो तिच्यावर प्रचंड प्रेम करायचा.
एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीवर जितकं प्रेम करतो, त्यापेक्षा अनेक पटींनी. जणू वडील आपल्या लाडक्या मुलीवर करतात तसं.
तिला छोटंसंही दुःख झालं, तर त्याचा जीव कासावीस व्हायचा.
रात्रभर तो तिला मेसेज करत, फोनवर तिच्या गोष्टी ऐकत बसायचा.
ती हसली की त्याचं जग उजळून जायचं.
तो तिचं मन जपायचा, तिची स्वप्नं जपायचा… तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत तो पाठराखा व्हायचा.
पण ती मात्र नेहमीच थोडी गोंधळलेली असायची.
"जर मी याला हो म्हटलं, तर मी फसणार नाही ना?"
असा विचार तिच्या मनात रेंगाळत राहायचा.
कधी कधी ती त्याला टाळायची, बोलणं कमी करायची… पण त्याला थेट सांगायची हिंमत तिला कधीच झाली नाही.
कारण ती जाणून होती, तिच्या एका शब्दाने त्याचं मन तुटेल.
त्याला हे सगळं जाणवत होतं.
पण तो स्वतःला समजवायचा 
"प्रेम दिलं की माणसं जवळ येतात."
हळूहळू मात्र त्याला जाणवायला लागलं… कधी कधी जास्त प्रेम गुदमरवतं.
आणि मग तो दिवस आला.
लहानसं कारण होतं… पण वाद वाढला.
ती संतापून म्हणाली 
"माझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नकोस"
तो काही क्षण तिला पाहत राहिला… डोळ्यांत वेदना होत्या, पण आवाज शांत
"ठीक आहे… तू सुखी राहा.
माझ्यामुळे तुला त्रास होऊ नये, एवढंच मला हवं आहे.
मी तुझ्यासमोर कधीच येणार नाही, पण देवाजवळ रोज तुझ्या आनंदाची प्रार्थना करीन."
तो निघून गेला.
तिच्या चेहऱ्यावर राग होता… पण मनात काहीतरी तुटलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली…
फोनमध्ये त्याचा मेसेज नव्हता.
पहिल्यांदाच.
पहिला दिवस गेला… दुसरा… तिसरा.
ना मेसेज, ना कॉल.
तिला जाणवलं ती त्याच्या मेसेजची सवय झाली होती.
तो नसताना दिवसच अपूर्ण वाटत होता.
शेवटी, न राहवून तिने त्याला "हाय" पाठवलं.
तो ऑनलाइन नव्हता.
काही तासांनी आला… मेसेज वाचला… पण उत्तर नाही.
तिचं मन आणखी अस्वस्थ झालं.
तिने पुन्हा मेसेज केला
"सॉरी… माझी चूक झाली."
या वेळी त्याने उत्तर दिलं –
"सॉरी कशासाठी? तू असं बोलू नकोस."
ती 
"मी तुला टाळत होते… रागावत होते… पण आता कळलं, तुझ्याशिवाय मी किती अपूर्ण आहे."
तो शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला 
"मलाही कळलं आहे…
तू माझ्या जीवनाचा भाग आहेस, पण तुझ्यावर माझ्या प्रेमाचं ओझं टाकून नाही.
या वेळी मी तुझ्यासोबत राहीन, पण तुझ्या मोकळ्या श्वासाला जागा देऊन.
तुला जेव्हा माझी गरज वाटेल, मी नक्की येईन…
पण मी तुझ्यावर ओझं नाही बनणार, फक्त आधार बनेन."
तिच्या डोळ्यात अश्रू आले.
ती थरथरत्या आवाजात म्हणाली 
"मला तू सोडून जायचं नाही…"
तो हलकेच हसला, पण त्या हसण्यात वेदना लपल्या होत्या.
एक पाऊल तिच्या जवळ जात, तो म्हणाला 
"मी कुठे जातोय गं?
तुला प्रेम करायचं म्हणजे तुझ्या बाजूला राहणं असतं…
पण कधी कधी बाजूला राहण्यासाठी थोडं दूर उभं राहावं लागतं.
मी इथेच आहे… तुझ्या प्रत्येक हाकेला उत्तर देण्यासाठी.
फरक इतकाच… की आता मी तुला धरून ठेवणार नाही,
पण तुझ्यासोबत चालत राहीन, जोपर्यंत तू मला रहा म्हणशील."
त्याने तिच्या गालावरचा अश्रू अलगद पुसला आणि हलक्या आवाजात कुजबुजला
"तू माझं जग आहेस… पण मी स्वतःलाही हरवणार नाही.
कारण तुझ्यासोबत चालायचं आहे मला… तुझ्या सावलीसारखं, ओझ्यासारखं नाही."
तिला त्या क्षणी जाणवलं
प्रेम फक्त मिळवणं नाही, तर जपणं असतं…
आणि कधी कधी, जपण्यासाठी थोडं अंतरही आवश्यक असतं.
त्या दिवसापासून त्यांचं नातं नव्या रूपात फुललं
जिथे प्रेम होतं, पण गुदमरवणारं नव्हतं.
जिथे जवळीक होती, पण स्वातंत्र्याला मान होता.
आणि सर्वात महत्त्वाचं
तो तिचा होता… पण स्वतःसह. ❤️

©® सचिन कमल गणपतराव मुळे.
परभणी, ९७६७३२३३१५

2426. उशीरा उमललेलं फूल

 संतोष चाळीशीच्या उंबरठ्यावर उभा होता. नोकरीत स्थिर पण मनाने थोडासा एकटा. लग्न झाले होत, बायको गेल्यानंतर घरात शांतता जास्त आणि बोलणारा कुणीच नव्हत कारण त्याला एक मुलगी होती ती सासरी गेली तीच लग्न झालेलं होतं बायको गेल्यानंतर बायकोसोबत नातं तुटलेलं नव्हतं, पण ते जिवंतही नव्हतं - फक्त एक समजुतीचा करार.
दररोजच्या दिनक्रमात त्याला फक्त एकच गोष्ट नवी वाटायची -सकाळी जाण्याचा बसचा रस्ता. त्या रस्त्यावर थांबलेली एक स्त्री. साधा सलवार, केस हलके बांधलेले, डोळ्यात थोडासा थकवा पण चेहऱ्यावर शांतता. तिचं नाव सुवर्णा - ती पण चाळीसची. नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झालेलं. मुलगा होस्टेलमध्ये शिकत होता. दिवस-रात्रच्या धकाधकीत तीही एकटीच.
पहिल्यांदा ते दोघं बोलले ते एका साध्या कारणावर—बस लेट झाली होती.
“आजही दहा मिनिटं उशीर… रोजचंच झालंय,” संतोष हसत म्हणाला.
सुवर्णा चक्क हसली. त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं—थोडं संकोच, थोडी ओळख, थोडी माणसाळलेली उब होती.
हळूहळू गप्पा वाढत गेल्या. दोघांनाही उमजायला लागलं की आयुष्यभर ज्याची कमतरता होती, ती म्हणजे तीच ऐकणारा एखादा माणूस.’ ते दोघं बसस्टॉपवर भेटायचे, ऑफिसची, घराची, छोट्या छोट्या गोष्टींची चर्चा करायचे. कुठेही प्रेमाचा गहिवर नव्हता—फक्त सोबत.
एक दिवस संतोषला जाणवलं 
“यांच्याशी बोलल्यानंतर दिवस मस्त जातो… ही भावना मी वर्षानुवर्षांनी पहिल्यांदा अनुभवतोय.”
सुवर्णाच्या मनातही काहीतरी हलत होतं. पण सोबतच एक भितीदेखील
“माझं वय… माझी जबाबदारी… समाज काय म्हणेल?”
एकदा मुसळधार पावसात बसच आली नाही. संतोषने छत्री पुढं केली. पण सुवर्णा मागे सरकली.
“लोक काय म्हणतील संतोषजी?”
“लोकांनी माझं आयुष्य कधी जगून बघितलंय का?” तो शांतपणे म्हणाला.
त्या वाक्यानं तिला जणू आतून उभारी मिळाली.
काही महिन्यांनी दोघांनी ठरवलं
प्रेमाची घोषणा करायची नाही… फुलांच्या गुच्छांत फोटो काढायचे नाहीत… फक्त एकमेकांच्या आयुष्यात ‘सोबत’ म्हणून राहायचं.
सुवर्णाने मुलाला सांगितलं तेव्हा तो हसून म्हणाला,
“आई, बाबा गेलेत… पण तुझं आयुष्य अजून उरलंय. खुश रहा.”
संतोषने पत्नीशी (ती गेलेली होती पण अजून सोबत होती )बोललं; तिला ही नात्यासंबंधी विरोध नव्हता.
“जगण्यात कुणीतरी जवळचं असावं, हे मला कळतं,” ती म्हणाली.
आणि अशा साधेपणाने, कोणत्याही ढोल-ताशाशिवाय, या दोघांच्या आयुष्यात प्रेम शिरलं.
ते आजही एकत्र आहेत - एकत्र बसस्टॉपपर्यंत चालतात, एकत्र चहा घेतात, पण कुठेही दिखावा नाही. दोघांनीही नव्याने प्रेम केलेलंच नाही… फक्त आयुष्याची उरलेली वाट सोबत चालायची ठरवली.
खरं प्रेम मोठ्या घटना किंवा धडाक्यात नसतं;
कधी कधी ते फक्त दोन एकट्या माणसांच्या शांत गप्पांमधून जन्म घेतं.

✍️माणिक उचित, नाशिक


2425. निर्णय

     राजीव आणी स्वप्नाली यांचा लौकीक अर्थाने अरेंज्ड मॕरेज असला तरी ते लग्नाआधी पासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचा एक सामायिक मित्र, विशालच्या घरी ते भेटले होते. दोघांच्या घरी तेंव्हा लग्नाची लगबग सुरु होतीच. पहिल्या भेटीपासुन दोघे क्लिक झाले. काही दिवस एकमेकांना भेटल्यावर स्वप्नालीने  त्याला लग्नाबद्दल विचारले. जात वेगळी असली तरी दोघांच्या घरचे सुधारवादी असल्याने यथावकाश दोघांचे लग्नही झाले. 
लग्नाच्यावेळी दोघांचे वय तिशीच्या आसपास होते. दोघात फक्त  एखाद वर्षे अंतर. दोघेही करिअरला प्राधान्य देणारे त्यामुळे लग्नाला आधीच उशीरच झालेला. त्यानंतर मुल होउ द्यायचं की नाही इथुन सुरु झालेला विचार प्रत्यक्ष मुल होई पर्यंत आणखीन चार वर्ष गेली.. वयाच्या पस्तीशीत झालेली मुलगी..स्वरा..दोघांच्या नावाची आद्याक्षरे घेउन ठेवलेलं नाव.  स्वरा थोडी प्री-मॕच्युअर जन्मल्याने नाजूकच होती. ती थोडी मोठी होइपर्यंत काळजी घ्यावी लागणार होती. 
     डिलीव्हरीसाठीची सहा महिने रजा संपवून स्वप्नाली परत कामावर रुजू झाली.  इंजिन्स बनवणा-या  एका मोठ्या मल्टीनॕशनल इंजिनिअरींग कंपनीत,  युनीट डिजाइन हेड असल्याने स्वप्नाली ब-यापैकी जबाबदारीच्या स्थानावर होती. तिचे  इंजिनियरींग पूर्ण झाल्या नंतर, कंपन्या न बदलता गेले दहा वर्ष या कंपनीत ती जिद्दीने व आपल्या अंगभूत हुशारीने, एक एक पाय-या चढत आज खूपच चांगल्या पोजीशनवर पोचली होती. त्यामुळे तिचं करिअर हे तिला अतिशय महत्वाचं होतं...अगदी स्वरा आणि राजीव इतकच…!
मल्टीनॕशनल कंपन्या 'वर्क फ्राॕम होम' म्हणजे घरुनही काम करायची मुभा देतात त्यामुळे स्वप्नाली स्वराच्या दुखण्या खुपण्यात घरुन काम करत आपलं काम संभाळत होती.
      राजीवला अर्थात ते स्वातंत्र्य  नव्हते. त्याची खाजगी बँकेतली नोकरी होती. कस्टमर फेसींग रोल असल्याने रोज आॕफीसला जाणे क्रमप्राप्त होतेच.  कामाच्या वेळाही जास्त व कामाचे स्वरुप अतिशय तणावपूर्ण होते. तो ब्रँच बँकींग मधे रिजनल हेड होता. बँकेत बराच जुना व सिनीअर असल्याने नव्याने रुजू होणा-या ब्रँच मॕनेजर ना ट्रेनींग देण्यासाठी देशभरात जे मोजके लोक होते त्यात तोही एक होता. तोही एम.बी.ए नंतर खडतर परिश्रम व उपजत टॕलेंटच्या जोरावर आज या ब-यापैकी सिनीअर पदावर पोचला हौता. स्वरा झाल्यापासून मात्र तो घरी लवकर यायचा आटोकाट प्रयत्न करायला लागला होता. 
      स्वराचा पहिला वाढदिवस दोघांनी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. दोघांच्याही घरचे, नातेवाइक, मित्र-मैत्रीणी व आॕफिसचे सहकारी झाडून हजर होते. स्वरा अद्याप बोलत नव्हती पण एवढी गर्दी पहायची सवय नसल्याने ती आधी घाबरली, मग तिने रडून दंगा घातला व नंतर आजीच्या मांडीवर झोपूनही गेली. तिचा वाढदिवस म्हणजे काय असते हे कळण्याचे तिचे तसेही वय नव्हते. आपण आपल्या हौसेसाठी उगाच स्वराला वेठीला धरले व तिचे हाल झाले असे त्यांना नंतर वाटले. तिला कळेपर्यंत तिचा असा मोठा  वाढदिवस करायचा नाही हे स्वप्नालीने ठरवून टाकले. राजीवनेही त्याला दुजोरा दिला. 
       स्वराच्या वाढदिवसानंतर साधारण एक महिन्यानंतर स्वप्नालीच्या कंपनीची ग्लोबल डिजाइन टीम  भारतात एका अभ्यास दौ-यासाठी आली होती. भारतीय ट्रक्स व बसेसमधे जाणारे त्यांचे इंजिन्स आता भारत-6 या नव्या एमिशन स्टँडडसाठी पात्र होतील त्यासाठी इथल्या डिजाइन विभागाने केलेली तयारी पहायला ते मुख्यतः आले होते.  इथल्या टीमने जे इंजिन विकसीत केले होते ते  भारतात विकले जाणारे डिझेल, भारतीय रस्ते यांचा विचार करुन,  शिवाय भारत-6 मानकाच्या सर्व प्रदुषण चाचण्यांमधेही यशस्वी होइल, असे विकसीत केले होते. या प्रोजेक्टसाठी कंपनीतर्फे जी सहा लोकांची कोअर टीम बनवण्यात आली होती त्यात स्वप्नाली एकमेव महिला होती. तिने केलेला भारतीय रस्त्यावर धावणा-या ट्रकच्या गरजांचा अभ्यास, भारतात विविध वातावरणात धावणारे ट्रक्स किंवा बसेस  यांचा सखोल अभ्यास व त्याबरहुकुम डिजाइन मधे तिने केलेले बदल., हे सर्व पाहून ग्लोबल डिजाइन हेड डाॕ.फ्राॕस्ट हे खूपच प्रभावीत झाले. तिच्या डिजाइनला व ब-याचश्या सुचनांना मान्यता देत नव्या इंजिनचे डिजाइन त्यांच्याकडून फायनल करण्यात आले. 
      अमेरिकेला निघण्याआधी चार दिवस, डाॕ.फ्राॕस्टनी स्वप्नालीला बोलवून घेतलं. त्यांच्या बरोबर कंपनीचे भारतातील पूर्ण कारभार पाहणारे भारतीय सी.इ.ओ हरमीत बक्षी देखील होते.  डाॕ.फ्राॕस्टनी नव्या इंजिनच्या डिजाइन मधे तिने केलेल्या कामगिरीची वाहवा केली व तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मग त्यांनी हरमीत बक्षींकडे पाहिले. जणू सुचवले की पुढे त्यांनी बोलावे. 
हरमीत बक्षींनीही  तिचे अभिनंदन केले...पण ते वेगळ्या कारणासाठी. त्यांनी जे सांगीतले ते ऐकून स्वप्नालीला एक प्रचंड सुखद धक्का बसला. 
डाॕ फ्राॕस्टनी तिला अमेरीकेच्या त्यांच्या ग्लोबल डिजाइन टिम मधे पुढील दोन वर्षांसाठी जगभरच्या त्यांच्या युनीट्स साठी चाललेल्या खूप महत्वाच्या प्रोजेक्टस वर काम करण्यासाठी निमंत्रीत केलं होतं ज्यामधे तिचा सारा खर्च अर्थातच कंपनी करणार होती. 
एकदा इथलं नवीन इंजिन पुढील महिन्यात प्रोडक्शनाइज झाले की तिचे इथले काम संपवून तिला अमेरिकेला, कोलंबसला रवाना व्हायचं होतं. 
ही लाखात एक अशी संधी होती. अचानक समोर एखादी अलीबाबाची गुहा उघडावी व आपण लहान मुलासारखं भांबावून जावं अशी तिची अवस्था झाली होती. 
'मला कृपया  दोनच  दिवस विचार करायला द्या.. ' अशी विनंती करुन ती त्यांच्या केबीन बाहेर पडली. 
ती बाहेर येउन आपल्या आॕफीसमधे, आपल्या सीटवर येउन बसली. एखाद्या स्वप्नासारखं भासत होतं सारं तिला. बराच वेळ ती तशीच बसून राहिली. राजीवला फोन करुन हे सांगावं असे तिला वाटले. पण तिने काही विचार करुन त्याला फोन केला नाही. 
मग तिचं लक्ष गेलं तिच्या डेस्कवर तिने अलिकडेच फ्रेम करुन ठेवलेल्या एका फोटोकडे. फोटोमधे वाढदिवसा दिवशी रडण्याच्या बेतात असणारी स्वरा व तिला कडेवर घेतलेला हस-या चेह-याचा राजीव तिच्याकडेच पहात होते..जणू तिला चिडवत होते.
अचानक तिव्रतेने तिला वास्तव  समोर दिसू लागलं...
"किती वेडी आहे मी..राजीव शिवाय जगणं किती आवघड आहे आता मला. आणि...स्वरा..!! तिच्याशिवाय दोन वर्षे..? कसं शक्य आहे स्वप्नाली..?? तु असा विचार सुद्धा कशी करते आहेस? स्वरापासून आई व राजीवपासून त्याच्या बायकोला दूर करते आहेस..!! केवळ तुझ्या वैयक्तिक करिअरमधे तुला पुढे जायला मिळते आहे म्हणून तू खुशाल आपल्या नव-याला, पोरीला मागे सोडून दोन वर्षांसाठी सात समुद्र ओलांडून इतक्या दूर जाणार आहेस की उद्या त्यांना किंवा तुला इच्छा झाली तरी भेटता येणार नाही"
नाजूक तब्येतीच्या स्वराला बरोबर अमेरिकेला  घेउन जाणे हा पर्याय तर अतार्किक व स्वराच्या तब्येतीसाठी अतिशय धोकादायक होता कारण स्वराची तब्येत दर दोन महिन्यांनी सिजन बदला बरोबर बिघडत होती..
तिचे डोळे भरुन आले. 
अश्रु पुसत एका निर्धाराने ती उठली व सी.इ.ओ बक्षींच्या केबीनमधे जाउन तिने त्यांना आपला निर्णय सांगितला. 
'साॕरी सर..मला कोलंबसला जाता येणार नाही...आय हॕव माय फॕमिली कमिटमेंट्स..'
 त्यावेळी डाॕ फ्राॕस्ट त्यांच्या केबिनमधे नव्हते. हरमीत बक्षींनी तिला समजावलं की अशी संधी एखाद्याच्या आयुष्यात एकदाच दार ठोठावते. तेंव्हा असे निर्णय भावनीकपणे नाही तर अतिशय शांत डोक्याने घ्यायचे असतात. पुढे दोन दिवस शनिवार, रविवार सुट्टी होती.  या दोन दिवसात तिने पुन्हा या आॕफरचा विचार करावा, घरच्यांशी बोलावं आणि मगच अंतीम निर्णय घ्यावा असे त्यांनी तिला समजावले.  
एका प्रचंड  द्विधा मनःस्थितीत  स्वप्नाली बक्षींच्या केबिनमधून बाहेर पडली. 
स्वप्नाली घरी पोचली तशी तिच्या सासुबाईंनी दरवाजा उघडत म्हंटलं..' काय गं..आज लवकरशी आलीस? तब्येत बरी आहे ना?'
'हो आई..मी अगदी नाॕर्मल आहे..' स्वप्नाली आपल्या मनातली खळबळ लपवत म्हणाली 'काम लवकर संपलं होतं..पुन्हा पुढे विकेंड आहे..म्हणून आज जरा लवकरच आले..'
'बरं झालं बाई..' सासुबाई म्हणाल्या..' थोडा आराम कर दोन दिवस आता स्वप्नाली. अलिकडे महिनाभर खूप पळापळ चाललीय तुझी त्या कुठल्याशा प्रोजेक्टसाठी… शेवटी शरीरही इंजिनच ना गं..? त्यात आपल्या बायकांच्या बाबतीत तर अजूनच काॕम्पलिकेशन्स असतात. संधी मिळाली की या इंजिनालाही  आराम द्यावा आपण.'
'हो आई..पूर्ण आरामच करणार आहे आता दोन दिवस' स्वप्नाली हसत म्हणाली. मग इकडे तिकडे पहात म्हणाली 
'स्वरा झोपलीय का?' 
'हो..ग..तासाभरापूर्वीच खेळून खेळून  झोपलीय..उठवते तिला आता..तू फ्रेश होउन ये बरं....' सासुबाई बोलल्या. 
सासु सासरे आणि राजीव-स्वप्नाली यांचे फ्लॕट एकाच बिल्डींगमधे वर खाली होते. त्या दोघांचा खूप आधार होता त्यांना. स्वराला दिवसभर सांभाळत असल्याने अद्याप तिच्यासाठी आया ठेवायची गरज तिला भासली नव्हती. तिच्या करियरसाठी हा एक मोठा आधार होता. 
स्वप्नाली आवरुन आली तोवर स्वरा जागी होउन आजीकडून दूध पित होती. स्वप्नालीला पाहताच ती आजी शेजारुन उठून पळत तिच्याकडे यायला गेली त्यात तिचा हात आजीच्या हातातल्या दुधाच्या पेल्याला लागला व पडला. दूध पडलेले पाहून स्वरा जोरात रडायला लागली. तिला समजावून शांत करेपर्यंत सासू सुनेच्या नाकी नउ आले.
काही वेळाने सासुबाई व स्वतःसाठी स्वप्नालीने काॕफी बनवून आणली ती पिताना सासुबाई सहज म्हणाल्या..
'स्वप्नाली..स्वरा भारीच हट्टी आणि दंगेखोर होतीय बरं..जरा काही मनासारखं झालं नाही की बाईसाहेब मोठ्याने रडायला सुरु. कशी मोठी होणार ग ही आजकालची मुले..?? आमची राजीव आणि राजश्री कधी मोठी झाली आम्हाला कधी कळलं देखील नाही..'
स्वप्नाली बोलता बोलता विचारात मग्न झाली. स्वरा खरीच हट्टी आहे. तिला रात्री लवकर झोपायचं नसायचं. त्यात तिला रात्री अपरात्री काहीतरी हट्ट करुन मोठ्याने गळा काढून रडायची सवय लागली होती. राजीव आणि तिला खूप कसरत करायला लागायची तिला रात्री झोपवायला. दोघेही थकलेले असायचे त्यात वर  स्वराचा हट्टी स्वभाव त्यामुळे कधी कधी वैतागून जायची ती.
 पण राजीव शांतपणे परिस्थिती सांभाळायचा. स्वराला घेउन टेरेसमधे नेउन चांदोमामा दाखवायचा..जमेल तशी अंगाई गायचा..तिच्याशी बडबड बोल बोलायचा..व शेवटी ती झोपली की मग झोपायला यायचा. तोवर ब-याचदा स्वप्नालीला झोपही लागली असायची. 
ती विचारात मग्न होती ते पाहून सासुबाई बोलता बोलता थांबल्या व म्हणाल्या..'काय ग बाळा..तुझं चित्त था-यावर नाहीय आज..! काही प्राॕब्लेम आहे का..?आॕफिसमधे काही टेन्शन?'
'नाही..नाही..हो आई..' स्वप्नाली पटकन सावरत म्हणाली..'मी  स्वराच्याच हट्टीपणा बद्दलच विचार करत होते..  पण ते जाउ दे..तुम्ही काय सांगत होतात?'
'हो..अगं बघ म्हणजे कसं आहे आमच्या ह्यांची गोंदवलेकर महाराजांवर खूप श्रद्धा आहे हे तर तुला ठाउक आहेच. त्यांचं गेले दोन वर्षे मनात होतं की आम्ही दोघांनी गोंदवल्याला सहा महिने राहून आपली सेवा द्यावी..महाराजांच्या सानिध्यात रहावं..पण गेले दोन वर्षे आम्ही जाउ शकलो नाही कारण आधी तुझं बाळंतपण व मग स्वरा लहान होती त्यामुळे तिलाही पहायला घरचं माणूस हवंच. पण आता स्वरा थोडी मोठी झालीय..म्हणजे आपल्याला तिला सांभाळायला एखादी चांगली बाई किंवा मुलगी मिळाली तर आम्ही यंदा महाराजांच्या उत्सवापासून पुढे सहा महिने राहून यावं म्हणतोय.' सासुबाई अपराधी भावनेने पुढे म्हणाल्या.. 'म्हणजे स्वप्नाली..मला ठाउक आहे गं की तुझी थोडी तारांबळ होईल..पण कसं आहे...अजून सेवा करायची उमेद व ताकत आहे आमच्यात तोवर एकदा हे व्रत पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे..'
सासुबाई हे  बोलताना चाचरत होत्या हे स्वप्नालीला कळत होतं. 
हे बरोबर होतं की तिच्या करिअरला मदत म्हणून त्यांनी स्वराची जबाबदारी गेली सात आठ महिने आनंदाने स्वतःवर घेतली होती. पण शेवटी त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या स्वतःच्या आवडी होत्या, पण स्वरामुळे त्यांनाही  बांधल्यासारखं झालं होतं. 
ती हसत म्हणाली..
'अहो आई..तुम्ही काळजी करु नका..तुम्ही आणि बाबा जा गोंदवल्याला निश्चिंतपणे..आपण स्वरासाठी चांगली केअर टेकर मुलगी किंवा पाळणाघर यापैकी काहितरी नक्की करु शकतो. शिवाय प्रश्न सहा महिन्यांचाच आहे.'
समाधानी होउन आई खाली त्यांच्या मजल्यावर गेल्या आणि स्वप्नाली स्वतःशीच हसली. तिची उरली सुरली आशाही संपुष्टात आली होती. आपल्याला अमेरिकेला पुढे जाता येणार नाही हे वास्तव आता तिने एव्हाना मान्य केलं होतं. पण मनात विचारांचं काहूर होतं. तिला आपलं मन मोकळं करायचं होतं त्यासाठी ती राजीवची आतुरतेने वाट पहात होती. राजीव येईपर्यंत तिने स्वराशी खेळण्यात मन रमवलं. 
संध्याकाळी आठ वाजता राजीव घरी आला. 
तो आल्यावर फ्रेश होउन लगेच जेवायला बसायचा. त्याने स्वप्नालीच्या एकंदर बाॕडी लँग्वेजवरुन ओळखलं की वादळ घोंगावतय. ते आता बाहेर येउन कधी धडकतय याची तो ही वाट पहात होता. वरवरचं बोलत जेवण पार पडलं. ओटा आवरुन व स्वराला घरच्या लॕपटाॕपवर नर्सरी -हाइम्स लावून देउन ती टिव्ही वर बिझनेस न्यूज पहाणा-या राजीव शेजारी येउन बसली. कसं सुरवात करु अशा विचारात ती असतानाच तिच्या खांद्यावरुन हात टाकत राजीवने तिला आपल्या जवळ ओढले. 
मग मात्र एवढा वेळ बांधून ठेवलेला तिचा बांध फुटला. ती त्याच्या मिठीत शिरुन रडू लागली.  तिच्या डोळ्यातल्या आसवांनी राजीवचा टी शर्ट भिजू लागला. . 
राजीवने तिला थोपटत जवळ धरुन ठेवलं. आपली बायको मनस्वी आहे हे त्याला अनुभवाने माहित होतं. रडून तिची खदखद दूर झाली की ती मन मोकळं  करेल हे माहित असल्याने त्याने तिला मनसोक्त रडू दिलं. काही मिनीटांनी ती शांत झाली. मग हळूच तिचा चेहरा आपल्याकडे वळवत राजीव म्हणाला..
'ए वेडाबाई..झालीस का शांत..? की अजून इकडचा खांदाही ओला करायचा आहे माझा?' 
तिने डोळे पुसत लटक्या रागाने त्याच्या छातीवर हलकेच मारल्यासारखं केलं. 
'चेष्टा नको करुस राज..मी सिरीयस आहे..'
राजीवने टिव्ही बंद केला व तिचा हात धरत म्हणाला..
' बरं बोल आता..! काय झालय..मला सगळं व्यवस्थित सांग..'
स्वप्नालीने तिला कंपनीकडून मिळालेल्या आॕफर बद्दल त्याला सांगितलं. तसा राजीव एकदम स्तब्ध झाला.  तिचा हात त्याने सोडला व  काही क्षण शांत झाला. 
स्वप्नाली पुढे बोलणार इतक्यात त्याने हाताने तिला थांबवले..
मग एकदम हर्ष वायू झाल्यासरखं जागेवरच उभे रहात त्याने स्वप्नालीला  घट्ट मिठीत घेतलं व तिचा चेहरा समोर धरत म्हणाला..
'ब्लडी हेल..स्वप्स...इतकी मोठी..इतकी ब्रिलिअंट न्यूज तु मला आता सांगते आहेस...दिस इज दी न्यूज आॕफ द डे. काँग्रॕच्यूलेशन्स..!! अँड आॕफ आॕल थिंग्ज..असली भारी बातमी तू मला रडत रडत  देते आहेस….ते ही आता..कसली आहेस ग तू स्वप्स..?' 
स्वप्नालीने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं व हाॕलमधेच  लॕपटाॕपवर गुंग होउन खेळणा-या स्वराच्या केसातून हात फिरवत ती शांतपणे म्हणाली..
'मी नकार दिलाय राज...मी नाही म्हणून सांगितलय आमच्या सि.इ.ओ ना. मी नाही जात आहे..रादर मला जायचं नाहीय कोलंबसला..तुम्हा दोघांना सोडून…' 
राजीव काही क्षण पुन्हा स्तब्ध झाला.तो जोरात प्रतिक्रिया देणार होता..पण मग हळूच म्हणाला..
'स्वप्स...मला वाटतं तु हा निर्णय घेण्यात घाई केलीस. माझ्याशी डिस्कस न करता हा निर्णय घेउन तू मोकळी झालीस..असं कधी केलं नाहीस तू आपलं लग्न झाल्यापासून...मग यावेळी का…?'
राजीव दुखावलाय हे लक्षात आलं तसं स्वप्नाली पटकन त्याच्याजवळ आली व त्याचा हात धरत त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसत म्हणाली..
' आय नो..राज मी तुला कन्सल्ट करायला हवं होतं..पण मला हिच भिती होती की तू मला ही आॕफर घ्यायला सांगशील. पण तू माझ्या अँगलने पहा..अरे आपल्या दोघांची गरज आहे स्वराला..या वयात..ती आॕलरेडी किती टँट्रम्स करतीय तुला ठाउक आहे..शिवाय आई बाबा तिच्यामुळे अडकून पडलेत इथे स्वरासाठी..स्वरा त्यांच्या पायाताला गुंता झालेले मला आवडणार नाही. आणि राज तुझं अन माझं काय..? वी निड इच आदर मोर दॕन एवर बिफोर. अरे वयाच्या पस्तीशित आता आपल्याला सिंगल रहायची सवय पुन्हा करायची..किती आवघड आहे..!! सगळा विचार करुनच मी निर्णय घेतलाय राज. मोठी संधी आहे..पण त्यासाठी एवढं मोठ बलिदान..एवढा त्याग करायची माझी तयारी नाहीय.  नाही..नाही..मी नाही राहू शकत आता तुझ्या आणि स्वराशिवाय राज..!' असं म्हणत ती पुन्हा रडत राजीवच्या कुशीत शिरली. 
राजीवला तिचं बोलणं पटत होतं.तिची घालमेल समजत होती.
पण त्याला हेही ठाउक होतं की ही संधी स्वप्नालीला एका इतका मोठ्या प्लॕटफाॕर्मवर नेणार होती की  तिथून ती आकाशाला गवसणी घालू शकत होती. तिने एवढ्या वर्षात कंपनीसाठी व स्वतःच्या टॕलेंटच्या वाढीसाठी घेतलेले प्रचंड परिश्रम त्याने पाहिलेही होते व इतरांकडून त्याबद्दल ऐकलंही होतं. आता त्याचं चिज होणार होतं आणि नेमकं या क्षणी आपले पंख पसरण्याऐवजी स्वप्नाली त्यांना छाटू पहात होती. ही संधी गेल्यावर ती अशी भरारी पुन्हा घेउ शकेल की नाही..जगभर टॕलेंट शोधणा-या एका मल्टी नॕशनल कंपनीत तशी संधी तिला पुन्हा मिळेल की नाही या सा-या गोष्टींचा विचार स्वप्नाली भावनेच्या आहारी गेल्याने करत नव्हती असे त्याला वाटत होते.
त्या रात्री स्वप्नाली व स्वरा झोपल्यावरही तो बराच वेळ जागा होता. त्याला लक्षात आलं की आता निर्णय घ्यायची वेळ त्याची होती. आणि त्याक्षणी त्याने तो घेतला..
दोन महिन्यांनी रात्री बारा वाजता स्वप्नालीला घेउन एअर इंडियाचे विमान छत्रपती शिवाजी इंटरनॕशनल एअरपोर्टवरुन अमेरिकेला झेपावले. तिला सी-आॕफ करायला आलेले राजीवचे व स्वप्नालीच्या आई वडिलांचे डोळे त्यावेळी पुन्हा एकदा पाणावले. 
स्वप्नाली अमेरिकेवरुन येइपर्यंत आपली नोकरी सोडायचा निर्णय घेणा-या राजीवच्या खांद्यावर स्वरा शांतपणे झोपी गेली होती. 

© सुनी़ल.

2424. स्थितप्रज्ञ

   सदानंदांचं हृदयाचं ऑपरेशन होऊन जेमतेम दोन महिने झालेत नी तेवढ्यात सावित्रीबाईंचा पाय फ्रॅक्चर झाला. नाश्ता आणि स्वयंपाक करायला ताई होत्या पण तरीही बरीचशी कामे सदानंदांना करावी लागत. खरं तर सदानंदांना चार महिने आराम करा, अजिबात धावपळ करू नका असे डॉक्टरांनी सांगितले होते पण आता ते अशक्यच होते.
      दिल्लीला राहणाऱ्या सूनेने फोन करून त्यांना धीर दिला. पुढच्या आठवड्यात आम्ही दोघं येऊ नी महिनाभर तुमच्या बरोबर राहू. आईंना चिकन सूप पाजू, लवकर बऱ्या होतील त्या. आम्ही आल्यावर तुमचं निम्मं दुखणं कमी होईल. 
      सांगितल्याप्रमाणे राज आणि नेहा आले. सदानंद आणि सावित्रीबाईंचा वेळ छान जाऊ लागला. चार दिवसांनी नाश्ता नी स्वयंपाक करणाऱ्या ताईंचा दीड दोन महिने कामाला येणार नाही असा फोन आला. नशीब, नेहा असल्याने काही टेंशन नाही. "नेहा तू करशील ना मॅनेज?" सदानंदांनी विचारले.
     "बाबा मला ऑफिस कामाचा खूप ताण आहे, आणि जवळ जवळ वर्षाने पुण्याला आल्याने मैत्रिणी आणि नातेवाईकांना भेटायचं आहे शिवाय शॅापिंगही करायचं आहे. मी बाहेरून फूड ऑर्डर करत जाईल. दिल्लीला पुण्याच्या स्पेशल डिशेस मिस करतो आम्ही."
     "नेहा बेटा, बाबांना बाहेरचं अन्न चालणार नाही, त्यांच्यासाठी कमी तेल आणि मीठ टाकावं लागतं."
    "आई, मला हे अजिबात जमणार नाही, तुम्ही तुमचं कसं करायचं ते बघा. मी जाऊ का? माझ्या आईचा फोन येतोय."
     सदानंदांना खूप वाईट वाटले पण तसे अजिबात न दाखवता त्यांनी यावर मार्ग काढला. सकाळी खूप लवकर उठून, देवपूजा करून मुलगा नी सून उठायच्या आत ते चहा नाश्ता तयार करून स्वतःच्या हाताने सावित्रीबाई, मुलगा आणि सूनेला देऊ लागले. मुलगा नी सून अकरा वाजता जिमला गेल्यावर दुपारचं जेवण आणि ते संध्याकाळी शॅापिंगसाठी बाहेर पडल्यावर रात्रीचे जेवण बनवू लागले. आजारातून पुरते बरे झाले नसल्याने त्यांची खूप दमछाक व्हायची पण त्यांनी ते अजिबात जाणवू दिले नाही. जेवणानंतर मात्र त्यांचा डोळा पटकन लागायचा. आईंना चिकन सूप देऊ म्हणणाऱ्या नेहाने चिकन सूपचा विषयही कधी काढला नाही.
      बघता बघता चार आठवडे गेले. नेहा आधी आणि दुसऱ्या दिवशी राज परत जाणार होता. नेहा गेली त्या दिवशी कॅब्जचा बंद होता. जवळ जवळ एक किलोमीटर चालत जाऊन सदानंदांनी नेहाला एअरपोर्टला जाण्यासाठी रिक्षा आणली.
      दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे चहा नाश्ता तयार केला आणि चक्कर येत होते म्हणून सदानंद कॅाटवर आडवे झाले. "बाबा, तुम्ही खूप झोपतात. किती उशीर झालाय, अजून झोपलात काय? नाश्ता द्या ना", राज म्हणाला. 
     बाबांचा डोळा लागलेला दिसतो म्हणत त्याने नाराजीने स्वतःच प्लेट भरली नी पहिला घास खाताच तो ओरडला, "किती मीठ टाकलंय, बाबांना मीठ कमी खा असं सांगितलंय डॉक्टरांनी." राजने चिडून नाश्ता बनवणाऱ्या ताईंना फोन केला नी विचारले, "ताई आज किती मीठ घातलंस नाश्त्यात? तुला माहित नाही का, बाबांना कमी मीठ खायला सांगितलंय डॉक्टरांनी?"
     "राज दादा, अरे मला बरं वाटत नाही म्हणून गेले ४ आठवडे मी कामाला येत नाही."
     "मग कोण बनवतं नाश्ता नी जेवण?"
    "मला काहीच माहित नाही", ताई म्हणाली.
      आईने ताईचा फोन आल्यावर नेहा काय म्हणाली ते आणि म्हणून अजून पूर्ण बरे झाले नसतानाही सकाळी लवकर उठून, अगदी दिवसभर बाबा किती कष्ट करतात ते सांगितले. 'म्हणूनच नाश्ता आणि जेवण केल्यानंतर ते विश्रांती मिळावी म्हणून लगेच बेडवर आडवे होतात. डॅाक्टरांनी त्यांना कष्ट करू नका सांगितले आहे पण माझ्या मेलीचं फ्रॅक्चर आडवं आलं. त्यांची धावपळ बघवली जात नाही रे माझ्याकडून' म्हणताना आईंचा स्वर रडवेला झाला होता. 
     "आई, नेहा खरंच बिझी असते, पण मला सांगितलं असतं तर मी केलं असतं ना."
     "बेटा, मुलाने करावं आणि आपण खावं असं कोणत्या आई-बापाला वाटेल? अरे, किती लाडात वाढवलं आहे आम्ही तुला. तुझ्या बाबांच्या काळजाचा तुकडा आहेस रे तू."
    "बेटा, पोह्यांत थोडा टोमॅटो आणि खोबऱ्याचा कीस टाकलाय, आता खारटपणा कमी झाला असेल", पोह्यांची प्लेट राजला देत बाबा म्हणाले. 
     "बाबा, पण तुम्हाला खोबरं चालणार नाही ना". 
    "माझं पोट ठीक नाही म्हणून मी नाही खाणार बेटा".
     बाबा इतके शांत नी स्थितप्रज्ञ कसे राहू शकतात? राजला समजत नव्हते. घरातून पाय निघत नव्हता पण केवळ फ्लाईटची वेळ झाली म्हणून राज खिन्न मनाने घराबाहेर पडला. 
      घरी पोहोचल्यावर राजने हे सर्व नेहाला सांगितले तेव्हा नेहाचे बाबा देखील उपस्थित होते. "नेहा बेटा, चूकलीस तू. अगं नुकतंच ऑपरेशन झालेल्या सासऱ्यांनी एवढे कष्ट घेतलेत आणि तुला पत्ताही लागला नाही? आय सॅल्युट दॅट ओल्ड मॅन ॲंड हेट यू नेहा. फोन करून माफी माग त्यांची".
      नेहाने सासूबाईंना फोन लावला. "आमच्या काही मनात नाही आणि तूही विसर", आई म्हणाल्या.
    "आई, मग नाश्ता, जेवण कोण बनवतं? बाबाच करतात का? मी येऊ का ७-८ दिवस?" 
     "नको बेटा. नशीबाने आमची सोय झाली आहे. कालपासून बाबांच्या मित्राची सूनबाई पाठवते नाश्ता नी जेवण."
     "आई, नोकरी न करणाऱ्या बायकांना जमतं हे. ती नोकरी करत नसेल ना?" 
    "करते की नोकरी".
    "सरकारी नोकरी असेल?"
    "नाही, तुझ्याच कंपनीत काम करते ती."
     "क्लर्क किंवा खालच्या पोस्टवर असणार ती".
    "मला नाही वाटत तसं, कारण तीला घ्यायला नी सोडायला स्पेशल कार येते".
    "काय नांव आहे तीचं?"
   "रीना", आई म्हणाल्या.
    "मध्यम उंची, थोड्याशा स्थूल, गोऱ्यापान नी बॅाब कट आहे का त्यांचा?"
    "हो", आई म्हणाल्या.
    "त्यांचं नांव रीना जोशी आहे का?"
    "हो, बरोबर."
    "आई, रीना मॅम माझ्या बॅासच्या बॅास आहेत. पुढच्या महिन्यात आमचं परफॅारमन्स ॲप्रेजल आहे. माझं इन्क्रीमेंट आणि प्रमोशन त्यांच्या हातात आहे. तुम्ही प्लीज सांगाल का त्यांना मी तुमची सूनबाई आहे म्हणून".
     त्यानंतर नेहा रोज फोन करून सासू सासऱ्यांची चौकशी करू लागली. घसघशीत इन्क्रीमेंट नी प्रमोशन झालं. काम वाढलं, जबाबदारी वाढली, साहजिकच रोज येणारा नेहाचा फोन बंद झाला. 
     सदानंद आणि सावित्रीबाईंना ना राग आला ना वाईट वाटलं. ते दोघेही शांत नी स्थितप्रज्ञ होते, गेल्या काही वर्षांत तशी सवयच लागली होती त्यांना.

©® दिलीप कजगांवकर, 
पुणे, 7770025596

2423. ह्यांना वर आणू नका

आबा सकाळची न्याहरी उरकून नेहमीप्रमाणे वाडीतून चक्कर मारत होते. आबांची चक्कर मारण म्हणजे वाडीची देखरेख करणच असायचं, आबांनी मराठे काकूंना झाडाचे आंबे उतरवताना पाहिलं. आणि लगेच ते बोलले,
“हे पहा आमच्या झाडाची फांदी तुमच्या कंपाऊंड मध्ये आली याचा अर्थ तुम्ही त्याचे आंबे चोरून काढून घ्यायचे असा नाही होत. प्रामाणिकपणे तुम्ही ते आमच्याकडे आणून द्यायला हवे. आणखी एक आठवण करतो, तुम्ही बारश्यासाठी हॉल घेतला होता, त्याचे भाडे सोसायटीकडे जमा केले ना? कारण आशा गोष्टी तुम्ही सोयीस्करपणे विसरता हो, म्हणून आपली जाता जाता आठवण केली.”
आबांच्या ह्या बोलण्याने मराठे काकूंचा चेहरा लालबुंद झाला. फणकारत काकूंनी आबांना कोपऱ्या पासून नमस्कार केला आणि म्हणाल्या, “ मी नीलाकडे पैसे दिले आहेत म्हणल आबा! हद्द झाली या माणसाची अस पुटपुटत मराठे काकू घरात निघून गेल्या.
आबांच हे नेहमीच होत. वाडी मधल कुणी भेटल की आबा असेच प्रत्येकाशी खवचटपणे बोलत रहायचे. प्रत्येकाच्या वर्मावर बोट ठेवायचे. आख्या वाडीला याची सवय झाली होती.रस्त्यात भेटलेल्या बाळू काकांना म्हणायचे,
“काय बाळोबा ह्या वर्षी तरी लेकीच्या लग्नाचे लाडू मिळणार का?”
तर जाधव वहिनींना म्हणायचे, “मुलीच सार ठीक आहे ना? कारण पळून जाऊन लग्न केल ना? काय पाहिलं त्या मुलात कुणास ठाऊक? न नोकरी न धंद, गावभर उनाडक्या करत असतो.” जाधव वहिनी यावर म्हणाल्या होत्या, “आबा, अहो तुमच्या दारात नाही भिक मागायला येत माझी मुलगी.”
त्यामुळे आबा दिसले की प्रत्येकजण वाट बदलून पुढे चालता व्हायचा. आणि मनात म्हणायचा, ‘बर झालं सावित्रीबाई ह्या माणसाच्या तावडीतून सुटल्या ते. पण बिचारी सुनबाई नीलाताई कशी सहन करते या माणसाला देव जाणे, आता एवढ वय झालं आता तरी स्वभाव बदलावा ना? वगैरे .....
मराठे काकू तसराळ्यात आठ आंबे घेऊन घरी आल्या आणि नीला ताईना म्हणाल्या,
“हे घ्या तुमच्या झाडाचे आंबे आमच्या अंगणात पडले होते. आमच्या पोटात गेले तर उगाच पोटदुखीचा त्रास सुरु व्हायचा.” काय झालं असेल याची नीलाताईना कल्पना आली. त्या मवाळ स्वरात म्हणाल्या, “ सुधा अग अस काय करतेस? इथे अंबे सडून जातात. आणि तू परत काय म्हणून आणून देतेस? आबांचा स्वभाव सर्वांनाच माहीत आहे. दुर्लक्ष करायचं तिकडे!” पण मराठे काकू त्यावर काहीच बोलल्या नाही. तसराळ्यामधले आंबे ओट्यावर काढून ठेवले. आणि म्हणाल्या, “निघते बाई बरीच कामे पडली आहेत.”
तेवढ्यात आबा देवघरातून धूप घेऊन बाहेर येत होते. बाहेर येता येता म्हणाले,
“केदार हे बघ तुझ्या मुलाला संध्या कर आणि नंतर शुभंकरोती म्हण म्हणून सांगितल तर मला तोंड वेडावून निघून गेला बघ. आणि काय त्या मोबाईलवर गेम खेळत बसला आहे. काय पण तुमचे संस्कार!”
केदारने आबांचे बोलणे काना निराळे टाकले आणि पुन्हा कॉम्प्युटर मध्ये डोके खुपसून बसला. कारण नुकत्याच घडलेल्या प्रसंगाकडे केदारचे आणि रमाचे लक्ष होतेच. त्यांना आबांचा मनापासून राग आला होता.
“जाऊ दे आबा, सार जगच त्या मोबाईलच वेड झालय, तिथ ह्या मुलांना बोलून काय उपयोग आहे? तुमची नातवंड तुमचं ऐकत नाहीत तिथ प्रतवंड काय ऐकणार आहेत? आता जमाना बदलला आहे आबा” विश्वासराव आपल्या शहाणव्व वर्षाच्या वडिलांना उद्देशून बोलत होते.
“ अरे विश्वासा एक तर मुंज उशिरा बाराव्या वर्षी केली. केवढा मोठा सोहळा केला त्या मुंजीचा! सगळा शो ऑफ! मुंज होऊन चार दिवसही झाले नाही. पण एक दिवसही ह्या भामट्याने संध्या केली नाही. निदान सोळा दिवस तरी पाळावे.पण काही बोलायची सोय राहिली नाही. मला म्हाताऱ्याला कोण विचारतय? सावित्री फक्त माझं ऐकायची. बाकी कोणी कोणी ऐकत नाही. पाहतेस ना ग सावित्री वरून सार काही.”
नीला ताई स्वंयपाक घरातून आबांच बोलण ऐकत होत्या. त्या विश्वासरावांना म्हणाल्या,
“ काय करतील बिचाऱ्या न ऐकून असा जमदग्नी नवरा भेटल्यावर! ह्या वयात आबा स्वत:च्या जीवाचा एवढा संताप करून घेतात तर तरुणपणीच्या जोशातला संताप किती त्रासदायक असेल. धन्य त्या सावित्री माउलीची ! आता पण सारख, ‘पाहतेस ना ग सावित्री अस म्हणत राहतात.’ वरती सासूबाईंना उचक्या लागत असतील! तिथही त्यांना हे शांत राहू देत नाहीत.”
“ आबा पण ना कशाला तोंडाची वाफ वाया घालवतात? आपला मान ठेवून रहाव खर तर! सगळे जण आपण शेवटी त्यांच्या मनाप्रमाणेच करत असतो तरी आपलं घोड पुढे दामटत रहातात. आई काय गरीबच होती स्वभावाने. सगळ्याचं ऐकून घ्यायची बिचारी आणि आबांचा तर शब्द खाली पडू देत नव्हती.”
“खर आहे. मी पण सासूबाई असेपर्यंत त्यांना मान द्यायचा म्हणून आबांच सगळ ऐकत होते. पण किती दिवस ना? आता आपल्या नातवाची मुंज झाली. आपण सुध्दा ह्या मुलांच्या प्रपंचात लक्ष घालत नाही. हे कशाला घालतात? केदार आणि त्याच कुटुंब परवा परत जाईल मुंबईला. तिथ जाऊन थोडीच तो संध्या करणार आहे? मुंज तरी इथ कोकणात येऊन करावीशी वाटली हेच खुप समजा म्हणाव. आबा मुंबईला यायला तयार नाहीत म्हणून केदारने तेवढा तरी आजोबांचा आणि आपला मान ठेवला आणि इथ मुंज केली.”
विश्वासरावांनी नातवाला जवळ बोलावलं. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले,
“आर्य बाळा तू शहाणा मुलगा आहेस ना? मग इथ दोन दिवस आहेस तोपर्यंत तरी पणजोबांच ऐकायचं. ते आपल्या सर्वांपेक्षा मोठे आहेत ना? मोठ्यांचा मान ठेवायचा असतो. आणि परवाच मुंज झाली ना तुझी? चल बस बघू संध्येला मी सांगतो तुला संध्येची नाव.”
आर्यने आजोबांच्या बोलण्याला मान डोलावली आणि ताम्हण पळी आणायला गेला.
आबांनी तपकिरीची चिमुट ओढली आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली.
“ विश्वासा, तुझ्या बायकोला तोंड संभाळून बोल म्हणाव. हिनेच आधी माझी घरातली किंमत कमी केली. सारखी आपली दारातल्या गड्या सारखी डाफरत असते. सावित्री बघ बाई तुझ्या नवऱ्याचे हाल, पाहतेस ना वरून सार!”
“ह्यांना कशाला मध्ये घेता आबा? माझ्याशी बोला ना! घरात तुम्ही वडील म्हणून सार तर तुमच्या मनाप्रमाणे करत असतो. पण तुमच्या मनासारखं होई पर्यंत तुम्हाला दम नसतो. अगदी लहान मुलासारख वागता हल्ली.! अहो, लहान मुलांच्या कलाने काही गोष्टी घ्याव्या लागतात. पण आर्यच्या आधी तुम्हीच लहान झाला आहात.”
“ काही बोलू नकोस सकाळी मी चांगल दिनूला सांगून त्याच्याकडून आंबे उतरवून घेत होतो. केदारला मुंबईला बरोबर न्यायला होतील म्हणून तिथही आडवी आलीस मांजरी सारखी. म्हणे दिनूला बर नाही. मराठे काकूंचा गडी बोलावते. झालं का काम? आला का तो? सावित्री बघ बाई मला कुणी समजूनच घेत नाही.”
“अहो आबा एवढे हायपर होऊ नका, उद्या सकाळी येणार आहे मराठे काकूंचा गडी, आम्हाला काळजी आहे ना! तुम्ही कशाला चिंता करता? तुमचा आजचा जप उरका म्हणजे जेवायला वाढते तुम्हाला.” मग आपल्या सुनबाई कडे वळत नीलाताई तिला म्हणाल्या,
“रमा रस झाला का काढून आंब्याचा? आवर लवकर म्हणजे तुलाच तुझ्या सामानाची आवरा आवर करता येईल.”
“ बघा बघा मी आहे, माझा मुलगा आहे तरी हीच आपली साऱ्या वाडीवर सत्ता चालवत असते. सावित्री तुला असे कधीच जमले नाही ग!” अस पुटपुटत आबा देवघराकडे चालते झाले.
रात्रीची जेवणे उरकली. सगळे टीव्ही बघत बसले. रमाची सामानाची आवराआवर करण्यासाठी लगबग सुरु झाली. नीलाताई पण तिच्या मदतीसाठी आल्या. रमा म्हणाली,
“ अहो आई पाहिला ना केवढा पसारा आवरायचा आहे.”
“अग चालायचं, घरात एवढ मोठ कार्य झालं, तेव्हा पसारा तर होणारच. तरी इथे कामाला लोक मिळतात. आणि मनापासून झडझडून काम करतात. त्यांची मदत असते, म्हणून तर मी हा सारा व्याप संभाळू शकते बाई. पण आता तुमचे कपडे लत्ते, आहेर, सामानाची आवरावर हे आपल्यालाच बघावे लागणार ना!”
“ हो खर आहे आई तुमचं! तरी प्रत्येक वेळी कुणाला काय काम सांगायचं आणि कसं करवून घ्यायचं, या कडे जातीने लक्ष द्यावे लागतेच ना! आणि आपली एवढी मोठी वाडी आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी सगळ्याचा उलामाला करायचा, त्यात पुन्हा बाबांनी लॉज सुरु करून ठेवल आहे.” बॉक्स मधून कोकम,काजूगर, अंब्याच साट, फणसपोळी सार भरून देता देता नीलाताई म्हणाल्या,
“हो ना, तिथे लागणाऱ्या गोष्टीची पण सगळी खरेदी करायचीच आहे. पुढच्या महिन्यात चक्कर टाकेन मी मुंबईला, सगळी कडून लोक येतात आपल्या गावाला भेट द्यायला. निवांत रहायला, सुमुद्राचा आनंद लुटायला. घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर समुद्र पण तासभर तिथ जाऊन निवांत बसाव म्हणल तर वेळ मिळत नाही. तू हळू हळू केदारच मन वळव बाई. आम्हां दोघांना सारा व्याप वरचेवर झेपायचा नाही. काही कमी नाही आपल्याला, नोकरी सोडून इकडे व्यवसायात लक्ष घाल म्हणावं.”
“ तो म्हणतो, एवढ शिक्षण घेतलं, इंजिनिअर झालो त्याचा काय उपयोग? मध्ये मी बोलले तेव्हा म्हणाला, अजून पाच सहा वर्षे तरी मुंबईत काढू मग जाऊ आपल्या गावी. तसही आई- बाबांच्या खांद्यावरचा भार कमी करायला हवाच ना! असं म्हणत होता. माझा काही प्रश्न नाही. मला करमत इकडे.”
“बर झालं बाई. आई आर्यादुर्गेची कृपा! तुम्ही इथे आल्यावर घर कसं भरून जाईल. नाहीतर एवढ्या मोठ्या घरात आम्ही तिघच, त्यात आता आबांच वय झालय.”
“काही होणार नाही आबांना! सेन्चुरी मारणार आबा. आपण त्यांची शंभरी जोरदार, मोठ्या थाटात करायची.” हॉल मधून आत येत केदार म्हणाला.
“ काही हरकत नाही, आपण तुझ्या आजोबांची शंभरी जोरदार साजरी करूयात. ते जगले तर आम्हाला हवेतच, घरी सणावाराच नमस्काराला मोठ माणूस असल की बर वाटत. पण अजूनही बारीक सारीक गोष्टीत कसं लक्ष घालतात ते पाहिलस ना? मी सकाळपासून शिस्तीत सगळी कामे उरकत असते. पण तरी तोंडाचा पट्टा चालू असतो. घरात काम करणारी नोकर माणस पण त्यांची टिंगल करत राहतात. मग ते मला आवडत नाही. जरा म्हणून कुठल्या गोष्टी सबुरीने घेत नाहीत.सारख येता जाता नोकर माणसांच्या अंगावर खेकसत राहतात. ही लोक आमच्या दोघांकडे बघून गप्प बसतात. प्रत्येक गोष्टीची घाई असते त्यांना, अंघोळ सकाळी सहा वाजता झालीच पाहिजे. देवपूजा सात पर्यंत उरकलीच पाहिजे. त्याशिवाय चहा घेणार नाहीत. चहा झाला की पेपर वाचन. मग नाश्ता. नाश्त्याला आटवल भातच हवा.तर तुझ्या बाबांना पोहे, उपमा हवा असतो. माझी आपली तारांबळ उडते. आठ वाजेपर्यंत सगळ उरकून वाडीत चक्कर मारायला तयार.”
“बर आहे ना ह्या वयात अजूनही सगळे प्रोग्रॅम शिस्तीत चालू आहेत ते!” केदार म्हणाला.
“ अरे बाबा त्याचं ठीक आहे पण त्याचं सार शिस्तीत उरकण्यासाठी मला पहाटे साडेपाच वाजल्यापासून नाचानाच करावी लागते ना! ते अजूनही रोज रात्री दहा वाजता घोरायला लागतात. मला रोज रात्री सगळ आवरून झोपायला बारा वाजत्तात. गौराबाई पहाटे यायला आणि आबांच्या सेवेत थांबायला तयार असते. पण त्याचं सोवळ आडव येत.मीच रोज त्यांच्या बरोबरीने अंघोळ उरकून स्वयंपाकघरात पाऊल ठेवाव ही त्यांची अपेक्षा असते. नाहीतर सकाळपासून सावित्रीचा जप सुरु होतो. आणि हल्ली ‘सावित्री मला तुझ्याकडे घेऊन चल ग बाई! हे नव्याने सुरु केल आहे.’ तुझे बाबा पूजा करायला तयार असतात, पण नाही! अजूनी मीच पूजा करणार हा आबांचा अट्टाहास असतो. ह्या वयात आरामात उठाव, आरामात सगळ उरकाव अस कितीतरी वेळा मी सुचवलं पण लगेच मला बोलतात, ‘तुला माझं करायला नको आहे हे कबुल कर’. आता मी पण वय वर्षे पासष्ठ आहे. किती दिवस रेटायच सार? अजूनी सकाळी पाच साडेपाच वाजता उठते आणि रात्री बारा वाजता पाठ टेकते.” नीलाताईना मध्येच रमाने विचारलं,
“आबांच बायकोवर खुप प्रेम होत का हो? कारण सारखं सावित्रीच नाव तोंडात असत.”
“ छे ग, बायको होती तेव्हा तिची किंमत कधी कळली नाही. त्या खऱ्या पतिव्रता होत्या. त्या कायम आबांच्या मागे सावली सारख्या असायच्या. त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हत्या. त्या स्वर्गात गेल्यानंतर त्यांना त्यांची किंमत कळली. आपण सारे आबांच्या मनासारखे करत असतोच पण एवढ्या मोठ्या व्यापात कधी तरी मागे पुढे होणारच ना! आता घरात सगळ्या सोई सुविधा आल्या आहेत. घरात सगळीकडे चकचकीत टाइल्स आहेत, बाथरूम चकचकीत आहेत. घरात लाईट, फ्रीज, टीव्ही, सगळी मशीन्स आहेत. विहिरीवर पंप बसवले आहेत. गोबर gas प्लांट आहे. पण आमच्या सासु बाईंनी खुप कष्ट काढले. शेणाने सारवलेली जमीन, चूल, रहाट, पाटा वरवंटा या जमान्यात वावरत, व्यसन लागल्यासारखं कामाला जुंपून घेण, पै पाहुणा सांभाळण हे सार त्या करायच्या आणि तेही हसतमुखाने. न कुरकुरता. कामाचं जाऊ दे पण आबांच्या आणि त्यांच्या आईचा कहारी स्वभाव, दोघांचा जाच निमूटपणे सहन करत त्या राहिल्या. कधी प्रत्युत्तर नाही. मनातल्या मनात घुसमटत राहण्याने त्या मनाने आणि त्याच बरोबर शरीराने लवकर थकल्या. आणि वयाच्या साठव्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून मी हा संसाराचा गाडा ढकलत आहे. त्यात मला ह्याचं पाठबळ भरपूर मिळालं. बाजारात नवीन कुठलीही गोष्ट आली की माझी सोय बघण्यासाठी ती प्रथम आमच्या घरात हे घेऊन यायचे. प्रत्येकवेळी आबा म्हणायचे सुध्दा हा विश्वास ना अगदी बाईलवेडा आहे. पण ह्यानी तिकडे दुर्लक्ष केल. सासूबाई लवकर गेल्या आणि आबांची तब्येत मात्र ठणठणीत.
चल बाई रमा बोलता बोलता आपलं सगळ आवरून झालं. बारा वाजले. मी जाते झोपायला आणि हो तुम्ही पण लवकर झोपा.” नीलाताई झोपायला निघून गेल्या. केदार रमाला म्हणाला,
“ खरच रमा सगळे म्हणतात, ‘ आजकाल मुल आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात, पण बघ ना आई अजूनी किती करते आबांच! त्यांचा सगळा जाच सहन करत. वृद्धांनी सुध्दा आपला हेका कमी करायला नको का? माणस ऐकतात म्हणून आपल्या अपेक्षांचं ओझ सतत त्यांच्यावर लादत रहायचं का? थोडी तडजोड स्कीकारायला नको का? आईची दया येते मला.”
“ जाऊ दे अरे आबांचे आता किती दिवस राहिले आहेत?”
“अस काही म्हणू नकोस सेन्चुरी गाठणार बघ ते!” म्हणत केदारने अंगावर पांघरूण ओढून घेतले.
***********
स्वर्गात यमदेव आपल्या दरबारात उद्विग्न अवस्थेत बसले होते. मधूनच आपले आसन सोडून येरझारा घालत होते पुन्हा बसत होते. आणि यमदूतांना झापत होते.
“ त्या सत्यवान उर्फ आबांच काय झालं? दोनदा तुम्ही त्यांना उचलायला गेला आणि हात हलवत परत आला. आता मी जाऊ की काय त्याला उचलायला? शंभरी पार केली त्याने. परवा हृदयक्रिया बंद पडली होती ना? तेव्हाच का नाही झडप घातली? पुन्हा कशी हृदयक्रिया सुरु झाली.” दूत खाली मान घालून म्हणाला,
“ माफ करा देवा! परवा तो सत्यवान चांगला स्वर्गाच्या वरच्या पायरीवर येऊन उभा होता. पण त्याच्या सावित्रीने त्याची वाट अडवली. म्हणाली, ‘पृथ्वीवरच ठीक आहात, वर येऊ नका.’ मग काय मी नेऊन सोडल पुन्हा जागच्या जागी!”
आपल्या जाड मिशांना पीळ देत,चेहरा क्रूर करत, यमदेव गरजले, “तुला काय खेळ वाटला होय? अस का केलस? त्याचा पृथ्वीवरचा मुक्काम संपला आहे.”
“ ते माहीत आहे देवा, पण त्याला तुम्ही सुध्दा आणू शकत नाही. त्याची पृथ्वीवरची बायको सावित्री इथ स्वर्गात आल्यापासून तपश्चर्येत रममाण झाली आहे. इथल्या स्वर्गसुखाचा उपभोग न घेता वनात तपश्चर्या करत बसली आहे.”
“ते का म्हणून?”
ती म्हणते, “पृथ्वीवर त्याने तिचा खुप छळ केला. आता पुन्हा स्वर्गात मला ह्याचा ससेमिरा नको आहे. आम्ही त्याला आणायला निघालो की, ही हात जोडून म्हणते, “कृपा करा पण ह्यांना वर आणू नका ना!” ह्यावर यमदेवांचा दुसरा दूत म्हणाला,
“ देवा त्या सावित्रीच तप सामर्थ्य लई भारी बघा आम्ही निघालो की आमची वाट आपोआप ढगातच हरवून बसते.”
*********
मागच्या महिन्यातच आबांची शंभरी त्यांच्या मुला-सुनांनी, नातवंडानी, प्रतवंडानी मोठा जंगी समारंभ करून साजरी केली. एकशे एक ब्राह्मण बोलावून त्यांना यथोचित दानधर्म करून मोठा याग केला. सर्व स्नेही, नातेवाईक, घरच्या लोकांचा मित्र परिवार, गावकरी झाडून सर्व लोक उपस्थितीत होते.ते आबांकडे पाहून नव्हे तर नीलाताई आणि विश्वासराव यांच्याकडे पाहून आले होते. मुख्य म्हणजे आबांची तब्येत ठणठणीत होती. ते खवचट पणे तरिही हसून खेळून सर्वांशी बोलत होते. म्हणत होते, “आमची सावित्री असायला हवी होती हो!” नीलाताई मनात म्हणत होत्या, “ कशाला हवी होती? तुमचा छळवाद सहन करायला?” आबांच्या बोलण्याच्या घाईत त्यांची पाव भाजी खाण्याची घाई सुध्दा चालू होती. परिणामी पाव घश्यात अडकला आणि जोरात ठसका लागला. त्यांनी डोळे फिरवले. सगळ्यांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले. नाडी लागत नव्हती. डॉक्टर नर्सला म्हणाले. ह्यांच्या नातेवाईकांना सांगा, ही इज नो मोअर आणि काय आश्चर्य इकडे आबांनी डोळे उघडले. डॉक्टरांचाच हार्ट फेल होता होता वाचला.
मागच्या दोन – तीन महिन्यात आबांना दोनदा हॉस्पिटल मध्ये ठेवण्याची वेळ आली. आता म्हातारा गचकणार म्हणताना पुन्हा आबा सहीसलामत हॉस्पिटल मधून घरी आले.
नीलाताईची धाकटी मुलगी केतकी तिचा अमेरिकेतून आबांच्या शंभरी निमित्ताने फोन आला होता. ती आईला अमेरिकेला येण्याचा आग्रह करीत होती. लग्नानंतर तेरा वर्षांनी मूल होण्याची आशा सोडून दिल्यानंतर तिच्याकडे गुड न्यूज होती. साहजिकच घरात आनंदी आनंद होता. अजूनी तीन महिन्यांनी तिची ड्यू डेट होती. त्यासाठी तिचा नीलाताईना बोलावून घेण्याचा घायटा चालू होता. नीलाताई रमाला म्हणाल्या,
“मला केतकीकडे जाव लागेल ग! तू इकड येऊन राहशील का? इथला व्याप कोण संभाळणार? इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली आहे बघ.”
“आई सगळ सांभाळण सोप आहे पण आबांच संभाळण अवघड आहे मला.”
कधी नव्हे ते नीलाताईच्या मनात येऊन गेले, आबा आता सुटले असते तर माझा प्रश्नही सुटला असता. ‘देवा तूच मार्ग काढ बाबा!’ नीलाताईनी देवी अर्यादुर्गेला साकडे घातले. आकाशाकडे बघत हात जोडत त्या म्हणाल्या, अजून किती अंत पाहणार सासूबाई, तुमच्या पेक्षा जास्त वर्ष मी आबांना सहन केल ना? शेवटी विश्वासराव सुनेला म्हणाले,
“रमा अग तू आबांची चिंता करू नकोस. मी त्याचं सगळ करेन, हिला जाऊदे अमेरिकेला.”
रमा कशीबशी हो नाही करत तयार झाली. नीलाताईनी सुटकेचा श्वास सोडला. आबांना बातमी लागली, नीलाताई अमेरिकेला जाणार असल्याची. त्यांना काही सुचेनास झालं. आता रमाच्या तावडीत राहण त्यांना कठीण वाटू लागल. आपली आईच आपल्या सोडून जात असल्या सारखे ते कासावीस झाले. अगतिकपणे म्हणाले,
“सावित्री बघते आहेस ना माझे हाल? आता मी काय करू?”
यमदेवानी सावित्रीला सवाल केला. “सावित्रीदेवी आता तरी तपश्चर्या थांबणार का?”
सावित्री यम देवांना म्हणाली, “माझ्या तपश्चर्यचे फळ म्हणून मला आता पृथ्वीवर पाठवा आणि मग ह्यांना स्वर्गात आणा.”
यमदेव म्हणाले.
‘तथास्तु’

 लेखिका © जयश्री देशकुलकर्णी 

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...