शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

1557. शमा

       खिडकीतून गार वाऱ्याचा झोत आला आणि मी शहारलो. घड्याळात बघितलं. पहाटेचे साडेपाच झाले होते. पांघरूण वर ओढून परत झोपण्याचा प्रयत्न केला. पण झोप येईना. शेजारी बघितलं. शमा गाढ झोपली होती. तिला सुरू असलेल्या गोळ्या इतक्या स्ट्रॉंग होत्या की ती नऊ वाजेपर्यंत उठत नसे. झोपेत तिचा हात तिच्या कपाळावर आला होता. तो हळूच उचलून मी तिच्या छातीवर ठेवला. कधीकाळी कॉलेजची ब्युटीक्वीन असलेली शमा आज बघवत नव्हती. तिचे विरळ झालेले केस,काळवंडलेला चेहरा बघून माझ्या घशात आवंढा आला. कॉफीचा मग घेऊन खिडकीजवळ बसलो. बाहेर झुंजूमुजु झालं होतं. पक्ष्यांची मधुर चिवचिव सुरू होती.अशाच एका रम्य पहाटे शमा आणि मी भेटलो होतो.
     पुण्यातील कसबा पेठेत एका मोठ्या वाड्यात आम्ही राहत होतो. बाबा सरकारी कारकून. पगार महिन्याला जेमतेम पुरायचा. आई खरं तर गरीब घरातूनच आलेली,पण तिला श्रीमंतीची आणि पैशाची प्रचंड हाव होती. बाबांनी नोकरी सोडून काहीतरी व्यवसाय करावा ह्यासाठी सतत त्यांच्या मागे लागायची. आणि बाबा नकार द्यायचे. सुरक्षित सरकारी नोकरी सोडून त्यांना पळत्याच्या मागे धावायचं नव्हतं. त्यावरून सतत दोघांचे वाद व्हायचे. मला समज आली तसा मी मित्रांबरोबर सतत बाहेरच असायचो. जेवण आणि झोप,ह्यापुरता माझा घराशी संबंध होता. आईबाबांच्या वादाला मी कंटाळलो होतो. ग्रॅज्युएट झालो आणि ट्रॅव्हल कंपनीत काम करणाऱ्या माझ्या एका मित्राने मला ऑफर दिली. त्याच्या टूर्ससाठी त्याला एक ऑर्गनायझर हवा होता. मी तात्काळ होकार दिला. दुसरीकडे नोकरी बघण्यापेक्षा मला ही ऑफर स्वीकारावीशी वाटली. टूर्सच्या निमित्ताने मी सतत घराबाहेर राहायला लागलो. नवीन माणसं भेटत होती, ओळखी वाढत होत्या. अशाच कोकणच्या एका टूरमधे माझी शमाशी ओळख झाली होती.
     गुहागरच्या समुद्रकिनारी पहाटे साडे पाचला मी फिरायला निघालो होतो. एक मुलगी वाळूवर मांडी घालून समुद्राकडे एकटक बघत बसली होती. टूरमधल्या प्रवाशांचे चेहरे ओळखीचे होतातच.ती शमा कान्हेरे होती. मी शमाजवळ गेलो, "तुमची हरकत नसेल तर इथे बसू का?"
शमाने चमकून वर बघितलं. मला बघून हसली.
"अहो विचारताय काय? मला पण गप्पा मारायला कंपनी मिळेल."
" पण इतक्या पहाटे तुम्ही एकट्या इथे समुद्रकिनारी?" मी आश्चर्याने विचारलं.
"अशा शांत वेळी,समुद्राची गाज आणि त्यात पक्षांची किलबिल,मन प्रसन्न होतं. समुद्र डोळ्यात साठवावा असं वाटतं. आयुष्यात स्थित्यंतरे येतच असतात पण आपण असंच खळखळत राहायचं,हेच जणू तो शिकवतो."
 "भीती नाही वाटली एकटीला इतक्या पहाटे अंधारात यायची? कोकणातले रस्ते सामसूम असतात." 
"वाटली एका क्षणी,पण पावलं इकडे ओढ घेत होती."
 शमा वाळूवर रेघोट्या ओढत म्हणाली.
 "आज टूरचा शेवटचा दिवस. संध्याकाळी पुण्यात सगळे आपापल्या घरी. ह्या व्यवसायामूळे खूप ओळखी होतात. काही माणसं मनात ठसली आहेत. त्यांच्याशी मी संपर्कात असतो. ह्या पाच दिवसात तुम्हाला पण जवळून बघितलं. निसर्गप्रेमी दिसताय." मी तिचा सुरेख चेहरा निरखीत म्हणालो.
 "हो, मला खूप आवडतं निसर्गाशी संवाद साधायला. पुन्हा तुमच्याबरोबर टूरवर जायला आवडेल. तुमची मॅनेजमेंट फारच छान आहे. माझा मोबाईल नंबर आहेच तुमच्याकडे."
"शुअर ! निघूया ? वाटेत परशुराम करून मग पुण्याला परतायचं आहे. आठ वाजता तरी निघावं लागेल."
   पुण्यात परतल्यावर शमा कुठेतरी दिसावी,भेटावी असं सतत वाटायचं. मला तिचं निरागस रूप खूप आवडलं होतं. एक दिवस मीच तिला फोन करून विचारलं, "उद्या भेटता येईल तुम्हाला?"
 "कधी,कुठे?" तिने अगदी सहज विचारलं, जणू काही ती माझ्या फोनची वाटच बघत होती.
 "डेक्कन कॉर्नर, जागा मी कळवतो."
   शमाला भेटलो आणि खूप दिवसांची ओळख असल्यासारखं दोन तास बोललो. शमाचे वडील एक यशस्वी बिझिनेसमन होते.  होम डेकोरचा व्यवसाय होता. पुणे, मुंबई, दिल्ली चेन्नई ह्या ठिकाणी मोठ्या शोरूम्स होत्या. शमा एकुलती एक,लाडात वाढलेली. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेली पण अतिशय साधी होती. पहिल्याच भेटीत माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलली, "आयुष्य उपभोगायला पैसा हवाच पण त्याची हाव सुटली की माणूस भान विसरतो. पपांचं तसंच काहीसं झालंय. आता फक्त पैसा मिळवणे हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय झालंय. ममाला पण तेच आयुष्य आवडतं. पण मला असं वाटतं की ध्येय साध्य झाल्यावर कुठेतरी थांबावं. तो थांबा कुठे असावा हे आपणच ठरवायचं असतं." शमा असं बोलली आणि मला वाटलं, ही मुलगी वेगळी आहे. विचारात, आचारात एक प्रगल्भता आहे. शमाला काहीतरी कारण काढून मी भेटायला लागलो. मला तिच्याशी बोलताना एक प्रकारचं मनस्वास्थ मिळायचं. दिवाळीत उदयपूरच्या टूरवर येण्यासाठी मी शमाला आग्रह केला. तिची अनामिक ओढ वाटायला लागली होती. ती सतत माझ्यासमोर असावी असं वाटू लागलं. उदयपूरला पॅलेसमधे शमा दिवाळीच्या पणत्या अनिमिष नेत्रांनी बघत होती. मी शमाजवळ गेलो आणि तिच्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यात मी तिच्यावर असलेलं माझं प्रेम व्यक्त केलं होतं. एकच ओळ लिहिली होती.
'ये शमा ऐसीही जलती रहे. परवाना उसके प्यार के लिये तरस रहा है'
"रूमवर गेल्यावर ही चिठ्ठी बघ." मी तिच्या कानात पुटपुटलो आणि बाकीच्या टुरिस्टशी बोलायला गेलो.
    रूमवर गेल्यावर शमाने ती चिठ्ठी वाचली आणि मला मेसेज केला. 
'अगर परवाना ना हो,तो शमा की खूबसुरती किस काम की'.
     थोड्याच दिवसात लग्नबंधनात अडकलो. दोघेही प्रेमात आकंठ बुडालो होतो. माझ्या डोक्यात वेगळी टुरिस्ट कंपनी काढायचा विचार आला आणि शमाने पण मला साथ दिली. वर्षभरात मला चांगलाच रिस्पॉन्स मिळू लागला. मी एक मोठं भाड्याचं ऑफिस घेतलं. आनंदात भर म्हणजे शमाला बाळाची चाहूल लागली होती. सगळं छान चाललं होतं पण दैवं आड आलं. शमाचे अबॉर्शन झाले आणि आम्ही खचलो. एक दोन टूरबरोबर शमाला चेंज हवा म्हणून तिला मुद्दाम घेऊन गेलो.  मी माझ्या व्यवसायात इतका गुंतलो की मला शमाला वेळ देणं अवघड झालं. शमाला मी नोकरी करण्याचा आग्रह केला पण ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. सगळी काळजी, सगळी पथ्य पाळूनही शमाचे परत अबॉर्शन झाले. 
    माझ्या कंपनीच्या परदेशी टूर्स वाढू लागल्या. मला व्यवसायात प्रचंड पैसा मिळू लागला आणि मला त्याची हाव सुटली. शमाच्या पपांसारखं मला यशस्वी व्हायचं होतं. मी एक आलिशान ऑफिस विकत घेतलं. शमाकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं. तिला माझ्याकडून कशाची अपेक्षा होती हे मी विसरून गेलो. तिला पैशाचं अप्रूप नव्हतं. माझा सहवास हवा होता. तिच्या ह्या मानसिक अवस्थेत तिला साथ द्यावी असं वाटत होतं. पण ती आईसारखी वाद घालणारी नव्हती. सतत सहन करत आली, मनात कुढत राहिली आणि तिला डिप्रेशनचा अटॅक आला. तासनतास कोणाशीही न बोलता खोलीत झोपून राहायची. मला खाडकन जाग आली पण उशीर झाला होता. डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली, पण शमामधे काही फरक पडत नव्हता.
      पहाट संपून सुर्याची किरणे खिडकीतून आत यायला लागली. सगळं आठवलं आणि शमाच्या ह्या स्थितीला मीच जबाबदार आहे, ह्या भावनेने मला घेरलं. जुने अल्बम चाळायला घेतले. त्यात उदयपुरला मी शमाला चिठ्ठी देताना, टूरमधल्या एका खट्याळ व्यक्तीने फोटो काढला होता. तो मला त्याने मोबाईलवर फॉरवर्ड केला होता. मी त्याची प्रिंट काढून तो अल्बममधे लावला होता. डोळ्यातला एक अश्रू त्यावर पडला. मी पान उलटले आणि एक कागद खाली पडला. शमाजवळ मी माझ्या भावना व्यक्त केलेला तो कागद होता. मला भरून आलं. शमाचा परवाना भरकटला होता. इतक्यात शमाची चुळबुळ ऐकू आली.  मी तो कागद घेतला आणि शमाजवळ आलो. तिचा हात हातात घेतला. तिने डोळे किलकिले करून बघितलं. मी तो कागद तिच्यापुढे धरला आणि म्हणालो, "काही आठवतंय का शमा? इस शमा की खूबसुरती का, दिवाना हुआ था एक परवाना. वो दिवानगी फिर से चाहता हुं."  
शमाने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात मला चमक दिसली. माझा थांबा मला गवसला होता. आता फक्त शमाला जपायचं होतं, तिच्यासाठी जगायचं होतं.

© ® सौ मधुर कुलकर्णी, पुणे

1556. किन्नर - एक सजीव मनुष्य प्राणी

 " लक्ष्या नालायका काय करतोस तू हे गाढवा.." तात्याराव कडक आवाजात कडाडले.
ओठांना लिपस्टिक लावलेला, डोक्यावर ओढणी घेतलेला आरशासमोर स्वतःला न्याहाळत उभा असलेला लक्ष्या तात्यांच्या कडक आवाजाने चपापला. तात्यांचा क्रोधावतार पाहून त्याच्या हातातील लिपस्टिक खाली पडली आणि तो उभ्या उभ्या थरथर कापायला लागला.
" हरामखोर कसले उद्योग लावलेस हे?...काय अवतार करून घेतलास हा? लाज नावाचा प्रकार शिल्लक आहे की नाही?...क्सक्सक्सक्स..." तात्या संतापाने ओरडत लक्षावर धावून गेले. हातात येईल त्या वस्तूने तात्यांनी त्याला बदडायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून स्वयंपाकघरात काम करत असलेल्या मालतीबाई धावत बाहेर आल्या. तात्याराव लक्ष्याला अक्षरशः ढोरासारखे लाथाबुक्क्यांनी तुडवत होते. त्यांचा तो अवतार पाहून मालतीबाई दारातच थबकल्या. दरवाजाला घट्ट धरून लक्षाचा विकल आलाप ऐकत त्या अगतिक होत अस्वस्थपणे उभ्या राहील्या. लक्षाला वाचवायची त्यांची हिम्मत झाली नाही. लक्ष्या तात्यारावांच्या हातापाया पडून दीनपणे जिवाच्या आकांताने आर्जव करत होता पण तात्यारावं त्याला हातातल्या काठीने कोणताही विचार न करता सपासप मारत होते. तेवढ्यात अचानक रमाकांत धावतपळत घरात आला आणि तो मध्ये पडला.
" तात्याsss,  तात्या नका मारू त्याला. मी माफी मागतो. तात्या जाऊ द्या." तो लक्ष्यासाठी गयावया करू लागला पण तात्याराव काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. लक्ष्याला वाचवायच्या नादात दोन चार फटके रमाकांतलाही बसले. कसंबसं स्वतःला सावरत त्याने लक्ष्याला उचलले आणि तात्यारावांच्या तावडीतून कसेबसे सोडवत तो त्याला घराबाहेर घेऊन गेला. ते दोघे बाहेर जाताच तात्याराव उद्विग्नपणे मटकन सोफ्यावर डोके धरून बसले. त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. दारात भेदरून उभ्या असलेल्या  मालतीबाईंकडे त्यांची नजर गेली अन तात्याराव अजून कडाडले.
"कसली अवलाद पैदा केलीत हो ही. जन्म झाला झाल्या याला मारून का नाही टाकला. ही असली नालायक औलाद असल्यापेक्षा नसलेली बरी. गावात तोंड दाखवायची सोय राहिली नाही या पोरामुळं..." 
तात्याराव डोकं धरून हमसून हमसून रडू लागले आणि मालतीबाई तिथेच उंबऱ्यावर बसून डोळ्याला पदर लावून मुसमुसत राहिल्या. 
     तात्यारावांना अन मालतीबाईंना यांना दोन मुलं. थोरला रमाकांत आणि त्यानंतर दोन वर्षांनी झालेला लक्ष्मीकांत. खरंतर त्यांना मुलगी हवी होती म्हणून त्यांनी दुसरा चान्स घेतला पण दुसराही मुलगा झाला त्यांच नाव लक्ष्मीकांत. लहानपणी सगळं आलबेल होत पण जसजसा लक्ष्मीकांत मोठा होऊ लागला तसतसा त्याच्यात बदल होत चालला होता. तो घराबाहेर जास्त रमायचा नाही. सारखा सारखा घरातच असायचा. बाहेर मुलांमध्ये खेळायचा नाही की कोणती दंगामस्ती नाही. कोणताही मैदानी खेळ तो खेळलाच नाही. तो कायम एकतर घरात आईला स्वयंपाक मदत करत असायचा किंवा घरातच काही चित्र वगैरे काढत बसायचा. सुरुवातीला कोणी हे जास्त मनावर घेतलं नाही पण जसजसा तो मोठा होतं गेला तसतसे त्याचे वागणे बदलत गेले. एक दिवस त्याने डोक्याला टिकली लावलेली तात्यारावांनी पाहिली आणि हे काहीतरी भलतंच प्रकरण आहे याची त्यांना जाणीव झाली होती पण ते त्यांना पचवता येत नव्हते. लक्ष्मीकांतचे चालणे, बोलणे, वागणे अगदी बायकी होत चालले होते. गावात त्याची आता चर्चा व्हायला लागली होते. चार लोक जाता येता हसत होते अन हेच दुःख तात्यारावांना बोचत होतं. गावात त्याचा स्वतःचा व्यवसाय होता, चार लोकांत त्यांच्या शब्दाला मान होता पण या एका गोष्टीमूळे त्यांना मान खाली घालावी लागतं होती. त्यामुळे त्यांचा संताप संताप होत होता. ते रोज लक्ष्मीकांतला घालूनपाडून बोलायचे. उठता बसता त्याचा पाणउतारा करायचे. त्याने सर्वसाधारण मुला प्रमाणे असावे म्हणून त्याला प्रचंड बोलायचे पण त्याच्यात काही फरक पडत नव्हता.
     या उलट थोरला रमाकांत हा सगळ्या बाबतीत पारंगत होता. अभ्यासात अगदी हुशार, शाळेपासून कॉलेजपर्यंत तो नेहमी सगळ्या बाबतीत अव्वल असायचा. खेळ वगैरे अवांतर गोष्टीतही तो अग्रेसर असायचा. अनेक पुरस्कार, बक्षीस,  प्रमाणपत्रे त्याला मिळालेली होती आणि इतकं सगळं असुनही त्याचे पाय जमिनीवर होते, तो स्वभावाने खूप चांगला होतो. त्याने कधी लक्ष्मीकांतला कमी लेखलं नाही की कधी त्याला उलटसुलट बोलला नाही. तात्यारावांपासून तो कायम त्याला वाचवत आला होता. त्याला समजून घेत होता. रमाकांत पुढील शिक्षणासाठी कॉलेजला म्हणून मुंबईला गेला. शिक्षण संपवून तो आता नोकरीच्या शोधात होता पण इकडे गावाकडे लक्ष्मीकांतचे हाल सुरू झाले. त्याला आजकाल रोजच मार पडत होता. त्याचे घराबाहेर जाणे बंद झाले होते. आजच्या या प्रकाराने तर कळस झाला होता. तात्याराव पूर्णपणे तुटून गेले होते. रमाकांत लक्ष्मीकांतला आपल्या मित्राच्या घरी सोडून पुन्हा घरी आला. घरातील वातावरण अजूनही गंभीर होत. तात्याराव आणि त्याची आई मालतीबाई आहे तसेच खिन्नपणे बसून होते. रमाकांत घरी आला आणि आईच्या शेजारी जाऊन बसला. आईच्या खांद्यावर हात टाकत तिला थोपटवत तो तात्यारावांना म्हणाला,
" तात्या, मी लक्ष्मीकांतला माझ्या बरोबर मुंबईला घेऊन जातोय. रोजच्या या कटकटीमुळे उगाच तुम्हाला येथे त्रास नको."
"अरे पण तुझेच तिथे कसेबसे भागत त्यांत तू याला घेऊन गेलास तर कसं होईल." मालतीबाई काळजीने म्हणाल्या.
"आई मी बघून घेईन, चिंता करू नकोस. मी सांभाळीन त्याला." रमाकांत आश्वासक सुरात आईचा हात हातात घेत म्हणाला.
"घेऊन जा त्या दिवट्याला. पुन्हा आयुष्यात त्याला माझ्या डोळ्यासमोर आणि या गावात आणू नको. तिकडे मुंबईत त्याचं काय करायचं ते कर पण ही अशी औलाद पुन्हा इकडे आणू नको. माझ्यासाठी तो मेला. घेऊन जा." तात्याराव वैतागून चिडून म्हणाले. मालतीबाईंनी रमाकांतकडे पाहिले आणि आपल्या आईच्या खांद्यावर थोपटवत तिला आश्वस्त करत तो उठला. दुसऱ्याचं दिवशी रमाकांत लक्ष्मीकांतला घेऊन मुंबईला रवाना झाला.
     दिवसा मागून दिवस जात होते. रमाकांतला आता छोटीशी नोकरी लागली होती त्यात त्या दोघांचे जेमतेम भागत होते. रमाकांत त्याच्या परीने लक्ष्मीकांतचे नवे आयुष्य बसवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ख्याली खुशाली आईला कळवत होता. असेच अजून दोन चार वर्षे गेले. रमाकांत अधूनमधून गावात यायचा पण घरात लक्ष्मीकांतचा विषय काढत नव्हता. तो काय करतोय वगैरे कसल्याच गोष्टी तात्यारावांमुळं बोलतं नव्हता. लक्ष्मीकांत आपल्या भावाकडे सुखरूप आहे या विश्वासावर मालतीबाई आश्वस्त होत्या. पुढच्या दोन वर्षात रमाकांत चांगलाच स्थिरस्थावर झाला आणि त्याला परदेशात जायची संधी चालून आली आणि बघता बघता तो निघूनही गेला.
"मी लक्ष्मीकांतची छान सोय करून दिली आहे तू चिंता करू नको"  असे आश्वासन आईला देऊन तो कायमचा परदेशात निघून गेला. पुढच्या एक दोन वर्षात त्याने तिकडचं असलेल्या त्याच्या एका कॉलेज मैत्रिणीबरोबर लग्न केले. आता रमाकांत परदेशात स्थिरस्थावर झाला होता. त्याला आता एक मुलगीही झाली होती. लक्ष्मीकांत काळाच्या ओघात विस्मरणात गेला होता.
     तात्याराव आता जरा वयस्कर झाले होते. त्यांनी आपला गावातला व्यवसाय आटोपता घेतला. घर देवपूजा, मंदिर आणि गावातील चार मंडळी यांत त्यांचा दिवस सरत होता. रमाकांत वेळोवेळी भरभरून पैसे पाठवत होता. त्याच पैशातून तात्यारावांनी आपल्या गावातल्या घराचं नूतनीकरण केलं होतं. सगळं काही आलबेल होत. मालतीबाई आपल्या घर संसारात मग्न होत्या. लक्ष्मीकांत नाव मनात ठसठसत होत पण तात्यारावांमूळे त्या कधी विषय काढत नव्हत्या. सगळं कसं छान सुरू असताना अचानक एक दिवस तात्याराव घरात पेपर वाचत असताना छातीत कळ येऊन कोसळले. मालतीबाई जाम घाबरल्या. त्यांनी लगबगीने शेजारीपाजार बोलावून तात्यारावांना दवाखान्यात नेलं. त्यांना हृदविकाराचा झटका आला होता. रमाकांतला फोन गेला. रमाकांतने गावातल्या आपल्या काही मित्राच्या मदतीने त्यांना ताबडतोब गाडी करून शहरात मोठ्या दवाखान्यात भरती केलं. वेळेत उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल अशी सूचना केली. रमाकांतने झटपट पैसे पाठवले. त्याचे मित्र दवाखान्यात सोबतीला होतेच आणि यथावकाश अगदी वेळेत तात्यारावांचे ऑपरेशन यशस्वी पार पडलं. रमाकांतला परदेशातून ताबडतोब येणे शक्य नव्हते. तो तेथूनच फोनवरून ही सगळी व्यवस्था पहात होता, सांभाळत होता. ऑपरेशन्स यशस्वी झाले. तात्याराव एका मोठ्या जिवावरच्या संकटातून वाचले. रमाकांतने परदेशात असूनही वेळेत घेतलेल्या योग्य निर्णयामुळे आज तात्याराव सुखरूप घरी परत आले होते. तात्यारावांना आणि मालतीबाईंना आपल्या या मुलाचा अभिमान होता.
     पुढे सहा महिने गेले. तात्याराव आता चांगले ठणठणीत बरे झाले होते. आता ते व्यवस्थित हिंडायला फिरायला लागले होते. दिवाळीचा सण जवळ आला होता. तात्यारावांनी रमाकांतला सहकुटुंब दिवाळीसाठी भारतात येण्याचा आग्रह केला. रमाकांतने विचार केला की तात्याराव इतक्या मोठ्या आजारातून बाहेर पडलेत, आपण भेटायला हवं आणि त्यात दिवाळी ही सहकुटूंब साजरी करता येईल. म्हणून त्याने होकार भरला आणि दिवाळीच्या चांगले चार दिवस आधी तो सहकुटुंब गावात दाखल झाला. त्याला गावात येऊन एक दोन दिवस झाले असतील. सगळं घर आनंदाने भरून गेलं होतं. नातवंड घरात खेळत बागडत होती ते पाहून तात्याराव आणि मालतीबाई हरखून गेले होते. मुलासाठी, नातवंडासाठी, सुनेसाठी काय काय करू आणि काय नको असे त्या दोघांना झाले होते. दिवाळीच्या आधीच्या रात्रीची वेळ. सगळे जेवण करून गप्पा मारत बसले होते. मुलं झोपी गेले होती. दिवाणखान्यात जमिनीवर गाद्या टाकून त्यावर ऐसपैस बसत गप्पा सुरु होत्या. बोलता बोलता विषय कसा कोण जाणे लक्ष्मीकांतवर येऊन थांबला. त्याचं नाव निघताच मालतीबाईंच्या चेहऱ्यावर एक करूण चिंता उमटली. तात्यारावांचा चेहऱ्यावर एक त्रस्त आणि उद्विग्न भाव दिसून आले. रमाकांत आपल्या जागेवरून उठला आणि तात्यारावांच्या जवळ जाऊन बसला. तात्यारावांचा हात आपल्या हातात घेत तो अगदी धीरगंभीर आवाजात म्हणाला.
" तात्या तुम्ही विसरून नाही जाऊ शकत का? माफ करा , सोडून द्या. तुम्हाला माहीत आहे का, की मी या वेळी दिवाळीत का आलोय भारतात. मी आलोय ते फक्त लक्ष्मीकांतसाठी. तात्या आज तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो जी तुम्हाला माहीत नाही. आजपर्यंत मी हे तुम्हां पासून लपवून ठेवलं पण आज सांगणे भाग आहे आणि त्यांचसाठी मी आलोय.तात्या तुम्हाला माहीत आहे का तुमच्या हृदयाचे यशस्वी ऑपरेशन कोणी केलं?"
" होय माहीत आहे, एका निष्णात तज्ञ अशा  महिला सर्जन डॉक्टर लक्ष्मी रावं यांनी" तात्याराव  म्हणाले...
"अहो तात्या, या डॉक्टर लक्ष्मी रावं म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला लक्ष्मीकांत आहे. अहो तो आता साधा लक्ष्मीकांत नाही राहिला. प्रख्यात सर्जन डॉक्टर लक्ष्मी रावं म्हणजे हा आपला लक्ष्मीकांत, ज्याने तुमचे ऑपरेशन केलं. त्यानं नुसतंच ऑपरेशन केलं नाही तर तुमच्या सर्व गोष्टींची देखभाल केलीय. सगळं खर्च त्यानेच उचलला. मी तिकडे परदेशात होतो पण सगळं काही सहजपणे डॉक्टर लक्ष्मीमुळे पार पडले. तुमच्या समोर यायचं नाही म्हणून अहोरात्र पंधरा दिवस पडद्यामागून सगळी सूत्र डॉक्टर लक्ष्मी बघत होत्या. हाच तो आपला लक्ष्मीकांत. तात्या अजून काय करायला हवं त्यानं. माफ करा तात्या पण आज तो नसता तर तुम्हीही हयात नसता. त्यानं जे केलं ना ते मी येथे असतो तरी करू शकलो नसतो."
बोलता बोलता रमाकांतच्या गळ्यात आवंढा दाटून आला. त्याचे डोळे भरून आले. तो बोलता बोलता थबकला. तसं त्याची बायको पटकन पाणी घेऊन आली. ते पाणी नवऱ्याला देत त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती तात्यांना म्हणाली.
"तात्या, तुम्हाला काही गोष्टी माहीत नाहीत पण आज मी तुम्हाला सांगते. लक्ष्मीकांतला मुंबईला नेऊन यांनी त्याच्या सगळ्या आयुष्याची सोय केली. त्याला वेळ दिला. लक्ष्मीकांतला जे हवं ते करू दिलं. लक्ष्मी मुळातच हुशार होता आणि आहे पण परिस्थितीमुळे बुजला गेला होता. रमाकांतने मोठ्या भावाच्या नात्याने त्याला पुन्हा उभा केला. त्याला त्याच खासगी आयुष्य सांभाळू देत त्याच्या शिक्षणाची सोय केली. पहिले दोन वर्षे स्वतः खस्ता खाल्या पण त्याच्या शिक्षणाचे पैसे उभे केले. रमाकांत आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकलो,प्रेम करायचो. परदेशात खूप आधीच सहज लग्न करू शकलो असतो पण लक्ष्मी स्वतःच्या पायावर उभा रहावा आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करणार नाही हा रमाकांतचा दृढ निर्णय म्हणून आम्ही आमचं लग्न दोन वर्षे पुढे ढकलले. लक्ष्मी डॉक्टर झाला आणि मग यांनी माझ्याशी लग्न केलं. तात्या, माफ करा आणि त्याला पोटात घ्या. आपल्याचं घराचा अंश आहे. मला सांगा उद्या जर रमाकांत आंधळा बहिरा असता तर तुम्ही त्याला असाचं वाऱ्यावर सोडला असता का? अहो काही माणसं खास असतात, देवाने त्यांना खास बनवलेलं असतं मग आपण त्यात लुडबुड का करायची? तात्या जरा आईचा विचार करा. इतके वर्षे त्यांनी तुमच्यासाठी, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून काळजावर दगड ठेऊन लक्ष्मीबद्दल चकार शब्द काढला नाही. पण आता तरी त्यांना भेटू देत. एका लेकराला आईपासून लांब ठेऊ नका.आईचे काळीज काय असतं हे आई म्हणून मी चांगले जाणते. तेंव्हा ही हात जोडून विनंती की हा राग सोडा आणि लक्ष्मीला पदरात घ्या." सुनेच्या या बोलण्याने मालतीबाई डोळ्याला पदर लावून रडू लागल्या. तात्याराव मात्र मख्ख चेहऱ्याने ऐकत होते. ते काहीच बोलले नाहीत. बहुदा अजूनही त्यांना या गोष्टी पटत नव्हत्या.
"चला झोपुयात सकाळी अभ्यंग स्नानाला लवकर उठायचे ना?" तात्याराव निर्विकारपणे म्हणाले. तात्यारावांची अशी रुक्ष प्रतिक्रिया पाहून सगळेजण हताश होत झोपायला गेले. पहाटे एक एक करून सगळे उठून आपआपल्या कामाला लागले. तात्याराव घरात नव्हते. नेहमीप्रमाणेच लवकर उठून फिरायला बाहेर गेले असतील म्हणून कोणी लक्ष दिले नाही. बरोबर नऊ साडे नऊ वाजता तात्यारावांच्या घरासमोर एक आलिशान गाडी येऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून सगळे बाहेर आले. तात्याराव गाडीतून खाली उतरले, त्यांनी गाडीचा मागचा दरवाजा उघडला. हाताला धरून त्यांनी लक्ष्मीला बाहेर आणले. तिचा हात हातात धरत ते तिला दरवाजात घेऊन आले. सगळे अचंबित होऊन बघत होते. सगळ्यांच्या तोंडाचा आ झालेला होता. दरवाजात येताच त्यांनी जोरात मालतीबाईंना आवाज दिला...
"अहो अशा भुतासारख्या बघत काय उभ्या राहिलात.आज दिवाळी आहे, दारात लक्ष्मी आलीय. तिला काय अशीच ताटकळत दारातच उभी करणार का? जा पटकन औक्षणाचे ताट घेऊन या.आज माझी लक्ष्मी घरात येतेय तिच्या स्वागताची तयारी करा." 
मालतीबाईं डोळ्याला पदर लावत लगबगीने औक्षणाची तयारी करायला आत गेल्या. रमाकांतच्या डोळ्यात कृतार्थ भाव पसरले होते. तात्याराव लक्ष्मीच्या खांद्यावर हात ठेवून तिला कवेत घेऊन अभिमानाने बघत होते. लक्ष्मीच्या डोळ्यात लक्ष लक्ष दिव्यांची आतिषबाजी झळकत होती.

कुलकर्ण्यांचा " कथाकार " प्रशांत

तळटीप - किन्नर हे सुध्दा एक सजीव मनुष्य प्राणी आहेत. त्यांनाही आपल्यासारखाच जगण्याचा अधिकार आहे. त्याचा सन्मान केला गेला पाहिजे आणि जमेल तशी त्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी हीच अपेक्षा.

© हलकं फुलकं

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

1555. केविलवाणे वृद्धत्व नव्हे तर सन्माननीय ज्येष्ठत्व

      जयंतराव व विनायकराव दोघे अगदी जिगरी दोस्त. जवळजवळ चाळीस वर्ष एकाच ठिकाणी नोकरी करून महिन्याभराच्या फरकाने दोघेही सेवानिवृत्त झाले होते. सरकारी नोकरी, त्यात मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे दोघानाही अगदी घसघशीत पेन्शन मिळत होती. दोघांचेही निवृत्ती नंतरचे आयुष्य मजेत चालले होते. सकाळ संध्याकाळ दोघे मित्र व त्यांचा ग्रुप एका ठिकाणी जमायचे, मग काय गप्पा टप्पा, खाणे पिणे उरकून रमत गमत घरी परतायचे हा त्यांचा रोजचा शिरस्ता.जयंतराव व विनायकराव हे जरी अगदी जिगरी दोस्त असले तरी दोघांचे स्वभाव अगदी भिन्न होते. जयंतराव समजूतदार, मृदुभाषी, प्रत्येकाला मदत करणारे होते तर विनायकराव अत्यंत चिडखोर, हेकेखोर, आपले तेच खरे करणारे होते. त्यांच्या स्वभावात 'मी' पणा काठोकाठ भरलेला होता. असे असले तरी याचा त्यांच्या मैत्रीवर काही परिणाम झाला नव्हता.रोजच्या सारखेच दोघे एका ठिकाणी भेटणार होते. विनायक रावांना येऊन अर्धा तास उलटला पण जयंत रावांचा पत्ता नव्हता. वाट बघून विनायकरावांचा पारा चढायला लागला. ते रागारागात निघणार तितक्यात समोरून त्यांना जयंतराव येताना दिसले. "अरे ही काय वेळ झाली यायची"? रागातच विनायक रावांनी जयंतरावांना विचारले.
    "चुकलो चुकलो, अरे नातवाला कराटेच्या क्लासला सोडायचे होते. इकडेच निघालोच होतो तेंव्हा सुनेला म्हंटले मीच सोडतो. उगाच तिला चक्कर झाली असती रे." जयंतरावांनी स्पष्टीकरण दिले."तुला काय करायची आहेत रे नसती कामे अंगावर घेऊन, त्यांचे ते बघतील की. आता आपले दिवस  आराम करायचे आहेत, उगाच पळापळ सांगितली आहे कुणी." विनायकराव म्हणाले."त्यांचे ते बघतील म्हणजे?" काहीश्या नाराजीनेच जयंतराव म्हणाले." ते काही परके आहेत का? आणि माझ्याच नातवाला सोडले ना मी क्लासला, त्याने माझ्याच सुनेचे काम हलके झाले ना. आणि काय होते रे जरा मदत केली तर?""हं... मदत म्हणे, अश्याने तुला गृहीत धरतील सगळे.  मी बघ सगळ्यांना कसे धाकात ठेवले आहे. कोणाची बिशाद आहे का मला असली आलतू फालतू कामे सांगायची. आपल्या रुबाबात रहायचे  नेहेमी." काहीश्या घमेंडीने विनायकराव म्हणाले.जयंत रावांना त्यांचा स्वभाव माहीत होता त्यामुळे जास्त वाद न वाढवता त्यांनी विषय बदलला, थोडा वेळ गप्पा मारून दोघे आपापल्या घरी परतले.दोघांचेही एकत्र कुटुंब होते. पण जयंत रावांच्या घरी हसते खेळते वातावरण होते तर विनायकरावांच्या घरी त्यांच्या स्वभावामुळे एकप्रकारचा दडपलेपणा आला होता. त्यांच्या या स्वभावाचा मुलगा अविनाश व सून प्राची हिला खूप त्रास होई, पण त्यांना बोलायची कोणाचीच टाप नसे, मुलगा, सून काय पण त्यांची बायको उमा हिलाही बोलायची मुभा नसे. कोणी काही बोलले की विनायकरावांनी जमदग्नीचा आवतार धारण केलाच म्हणून समजा.हे माझे घर आहे, हे मी माझ्या स्वकमाईने बांधले आहे, या घरातील एक ना एक वस्तू मी कष्टाने घेतलेली आहे, या सगळ्यांवर माझा हक्क आहे, त्यामुळे माझ्या घरात मला कोणी अक्कल शिकवायची नाही, मी म्हणेल तीच पूर्वदिशा. मी काहीही करेन, कसेही वागेन मला कोणी काहीच बोलायचे नाही हा त्यांचा अट्टाहास होता, आणि त्यांच्या याच स्वभावाला सगळे कंटाळले होते.
        कितीवेळा अविनाशला वाटायचे हे इतके ऐकून घेतल्या पेक्षा दुसरीकडे राहायला जावे, त्यालाही चांगला पगार होता पण आईसाठी त्याला इकडेच थांबणे भाग पडले होते. तो एकुलता एक होता आणि वडील कसेही असले तरी आई त्यांना सोडून त्याच्याकडे कधीच येणार नाही त्याला माहित होते आणि तिला एकटीला त्यांच्या तावडीत सोडून आपण निघून जावे हे त्याला पटत नव्हते. पण इथे राहणेही दिवसेंदिवस कठीण होत जात होते. कारणं साधिशीच असायची पण विनायकराव कधी ती समजूनच घ्यायचे नाहीत.नातवाच्या अभ्यासाच्या वेळी मोठ्या आवाजात टीव्ही लाऊन बसायचे मग दहा वर्षाचा नातू भले दुसऱ्या खोलीत अभ्यासाला बसला असेल त्याची चुळबुळ चालू व्हायची, त्यांना टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितल्यास ते करायचे नाहीतच, उलट माझ्याच घरात मलाच कसे वागायचे, कसे राहायचे हे तुम्ही कोण सांगणार? असे ऐकवायचे. सुनेने कधी भाजी आणा म्हणून म्हंटले तर अशी हलकी कामे मला सांगायची नाहीत म्हणून तिच्यावर डाफरायचे. त्यांच्याशी नेमके कसे बोलावे हेच कोणाला कळायचे नाही.असेच एक दिवशी अविनाशचा कॉन्फरन्स कॉल चालू होता रूममध्ये रेंज येत नव्हती म्हणून तो बाहेर हॉलमध्ये आला तर बाहेर नेहेमी सारखाच मोठ्या आवाजात टीव्ही चालू होता. अविनाशने दोनदा सांगूनही विनायक रावांनी टीव्हीचा आवाज काही कमी केला नाही त्यांच्या अश्या वागण्यामुळे अविनाशला खूप लाजिरवाणे वाटले. त्रासून गेलेल्या अविनाशने विनायकरावांना यावेळी जाब विचारला पण नेहमीसारखेच उत्तर आले घर माझे आहे मी वाट्टेल ते करेन, अविनाशचा संयम यावेळी सुटला तो म्हणाला माझा महत्त्वाचा कॉल चालू होता, त्यावर अतिशय कुत्सितपणे विनायक राव म्हणाले "नोकरी काय तूच करतोस का? मी देखील नोकरी केली आहे, ती देखील मोठ्या हुद्द्यावर आमच्यावेळी नव्हती अशी सोंगे, नोकरीची मिजास मला नको सांगूस.""अहो बाबा, तुमच्या वेळी अशी परिस्थिती होती का? आता नोकरीत किती अनिश्चितता आहे, किती ताण आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? आहे ती नोकरी टिकवणे किती मोठा टास्क आहे माहीत आहे का तुम्हाला? दिलेले टार्गेट पूर्ण करता करता किती नाकीनऊ येतात हे तुम्हाला कसे माहीत असणारं?" आता रागात येऊन अविनाश बोलत होता.
     "तुझ्या नोकरीची टिमकी माझ्यासमोर नको वाजवू आणि हे बघ माझ्या घरात उभे राहून माझ्याशी अश्या भाषेत बोलायचे नाही आणि नसेल पटत तर इथून चालते व्हायचे." रागाने लालबुंद होत विनायकराव कडाडले.हद्द झाली होती. इतकी वर्ष आईसाठी गप्प असणाऱ्या अविनाशने घर सोडायचे ठरवले आणि यात त्याची साथ त्याची आई उमाबाईंनी सुद्धा दिली. त्याही विनायकरावांच्या हेकेखोर स्वभावाला कंटाळल्या होत्या. अविनाशची काहीही चूक नाही हे त्यांना दिसत होते, यावेळी सर्वांनीच विनायकरावांना निक्षून सांगितले, येत्या आठ दिवसांत सगळेजण हे घर सोडून जाणार होते.यावेळीही नेहमीसारखे सगळे गप्पच बसणार या भ्रमात असणाऱ्या विनायकरावांना हा मोठा धक्काच बसला. घाईतच ते आपला मित्र जयंतरावांना भेटायला गेले, त्यांना सगळी हकीकत सांगितली. मित्राचा स्वभाव माहित असलेल्या जयंतरावांनी सगळे ऐकून घेतले."अरे गप्प का? बोल ना काहीतरी, तुलाही माझे म्हणणे पटले ना? घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी बोलायची ही का पद्धत आहे? चुकले की नाही अविनाशचे." विनायकराव जयंतरावांना म्हणत होते.किंचित हसत जयंतराव म्हणाले, "ज्येष्ठ.... तू ज्येष्ठ नाहीस तू म्हातारा झाला आहेस." "म्हणजे?....मी समजलो नाही.""अरे ज्येष्ठ म्हणजेच वृद्ध ना." विनायकराव न समजून म्हणाले."अजिबात नाही. ज्येष्ठत्व म्हणजे वृद्धत्व नव्हेच.अरे ज्येष्ठत्व अनुभव संपन्न, विनम्र, संयमी असते तर वृद्धत्व अहंकारी व हेकेखोर असते. ज्येष्ठत्व दुसऱ्यांना आधार देते तर वृद्धत्व दुसऱ्यांचा आधार शोधते. अरे माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हायचे असते म्हातारे नाही.""तुझे वागणे तपासून बघ एकदा. तुझ्यात किती अहंकार, किती 'मी ' पणा ठासून भरला आहे. वास्तविक तुझी पत्नी, तुझा मुलगा, तुझी सून, तुझी नातवंडे सगळीच किती समजूतदार आहेत, किती आदर करतात तुझा, किती मान देतात तुला पण तुला ते कधी समजलेच नाही. खरे म्हणजे तुझा मुलगाही उत्तम कमावतो तरी सुद्धा त्याला  "आमच्या वेळेस हे असे नव्हते"असे म्हणून आपल्या तालावर नाचवायचे हे कितपत बरोबर आहे? अरे स्वतःच्या पेन्शन वर इतकी मिजास करतोस, कधी मुलाच्या, सुनेच्या अगदी नातवाच्या वाढदिवसाला कधी त्यांना एखादी छोटीशी भेटवस्तू दिली आहेस का? सतत त्यांचेच घेत आलास उलट."
      "तरुणपणी आपण आपल्या मनाप्रमाणे वागलो निर्णय घेतले हे विसरून स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आपल्या मुलांना सतत उपदेशामृत पाजले तर तीही आपल्या मनाप्रमाणेच वागणार ना. घरातील वितंडवाद इथेच सुरू होतो. अरे सतत मी हे केले, मी ते केले, मी घर घेतले, मी तुम्हाला शिकवले असे म्हणत असतोस पण हे सर्व गृहस्थाश्रमात असलेला प्रत्येक व्यक्ती करतो त्यात तू असे वेगळे काय केलेस? आपला इगो सांभाळताना दुसऱ्याचा अहंकार आपल्याकडून दुखावला जाणार नाही याचा विचार कधी केलास का? व्यक्ती कितीही लहान असली तरी तिलाही आत्मसन्मान असतोच ना. पण हे तुझ्या गावीही नाही रे.""जवळजवळ प्रत्येक माणसात एक अवगुण लपलेला असतो तो म्हणजे 'सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स '. हा अवगुण तेव्हाच ठरतो जेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या कोणालाही आपली जागा घेऊ देत नाही. हे असे काहीसे तुझे झाले आहे. तू तुझी जागा तुझ्या मुलालाही घेऊ देत नाहीस.""काय रे स्वतः ला जेष्ठ म्हणतोस, ज्येष्ठ म्हणजे काय फक्त टीव्ही बघत आरामात लोळणे असते का? आपली शारीरिक स्थिती जर चांगली असेल तर मुलांना मदत केली तर काय हरकत आहे. लोळत पडून लोकांना नुसत्या ऑर्डर देणे म्हणजे ज्येष्ठत्व असते का? आणि या ऑर्डर कोणी पाळल्या नाहीत तर गावभर सांगत सुटायचे मुलगा आणि सून आम्हाला मान देत नाहीत म्हणून. पण मान देण्यासारखे खरोखर आपण वागतो का हे कोण तपासून बघणार?" विनायक रावांना काहीसे उमगत चालले होते, खूप मोठे हातातून निसटून जात आहे असे वाटायला लागले होते. आज पहिल्यांदा त्यांची कोणीतरी इतकी खरडपट्टी काढली होती. त्यांच्या डोळ्यांवर असलेली अहंकाराची पट्टी बाजूला सारली होती.घाईतच ते घराकडे निघाले. घराबाहेर पडणाऱ्या पावलांना त्यांना थांबवायचे होते. घराचे घरपण ज्या व्यक्तींमुळे होते त्यांच्या जवळ अगदी माफीच नाही पण केलेल्या चुकांची कबुली द्यायची होती. घरी गेल्या गेल्या त्यांनी रागात असलेल्या मुलाला, सुनेला, बायकोला बोलावले आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाले ज्येष्ठत्वाच्या भ्रामक कल्पना मनामध्ये होत्या माझ्या. पण आता मला समजले आहे ज्येष्ठत्व तरुणांना समजून घेण्यात आहे, त्यांचे मार्गदर्शन करण्यात आहे, विचारले तरच त्यांना सल्ला देण्यात आहे, त्यांना आधार देण्यात आहे. मला केविलवाणे वृद्धत्व नको तर सन्माननीय ज्येष्ठत्व हवे आहे." अविनाश चकित होत बाबांचे बोलणे ऐकत होता,  त्याला कळून चुकले होते जयंतरावांनी त्याच्या बाबांना खूप चांगले समजावले होते. आता त्यांच्या कुटुंबात आनंदाचा एक निखळ झरा वाहणार होता हे निश्चित.
धन्यवाद. 

© अश्विनी रितेश बच्चूवार

1554. प्रवास

  वास्तविक ध्येय गाठण्यासाठी किती वेळ लागेल, हे कशावर अवलंबून आहे? एकदा एक साधू रस्त्याच्या कडेला बसले होते, तेव्हा एक प्रवासी त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांना एक कागद दाखवून विचारले, 
"महाराज, हे ठिकाण किती लांब आहे ते सांगाल का?"
आपल्या दोन्ही हातातल्या त्या दोन भल्या मोठ्या सुटकेसेस सांभाळत त्या व्यक्तीने पुढे विचारलं,
"तिथे पोहोचायला किती वेळ लागेल?" 
त्या साधूने काहीही उत्तर दिले नाही. ते उठले आणि प्रवाशाला इशाऱ्याने आपल्या बरोबर येण्यास सांगितले आणि ते त्याच्यासोबत चालू लागले. साधूच्या अशा विचित्र वागण्याने तो प्रवासी आश्चर्यचकित झाला आणि थोडासा भयभीतही. तो साधूला म्हणाला, 
"कृपया आपण स्वतःला त्रास करून घेऊ नका. मला फक्त अंतर जाणून घ्यायचे आहे. मी तिथे एकटा जाऊ शकेन."
तरीही साधू काही न बोलता त्या  प्रवाश्याबरोबर चालत राहिला. पंधरा मिनिटांनी ते थांबले आणि साधू म्हणाला, "तुला तुझ्या ठिकाणी पोहोचायला इथून दोन तास लागतील."
"हे तुम्ही मला आधीच सांगू शकला असता. माझ्या बरोबर एवढ्या लांब चालत येण्याची आवश्यकता नव्हती."  प्रवासी साधूला म्हणाला. 
ते म्हणाले, "तुझा चालण्याचा वेग जाणून घेतल्याखेरीज तुला गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज मी कसा सांगू शकलो असतो? कुठल्याही स्थानी पोहचण्याची वेळ ही रस्त्याच्या लांबीवर नाही तर चालणार्‍याच्या वेगावर अवलंबून असते. तू या दोन मोठ्या सुटकेसेस घेऊन  चालत आहेस, साहजिकच त्यामुळे तुझा वेग थोडा कमी होईल. आता तुझ्या सोबत चालल्यानंतर मी तुला सांगू शकतो, की गावात पोहोचायला तुला दोन तास लागतील."
असं बोलून तो साधु आपल्या वाटेने निघुन गेला. प्रवाश्याने  त्याचे आभार मानले आणि  काहीवेळ त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिला. जणूकाही त्या साधूने त्याला ‘जीवनाचे ध्येय’ गाठण्याची योग्य वेळ सांगितली होती. 
      प्रत्येक गोष्ट आपल्या वेगावर अवलंबून असते आणि आपला वेग आपल्या स्थितीवर अवलंबून असतो. धावत जाऊन आपण आपल्या गंतव्यस्थानी लवकर पोहोचू शकतो. आपण चालतही अंतर कापू शकतो, अशावेळी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ थोडा जास्त असेल. आपला वेग असाही असू शकतो की आपण आपल्या गंतव्यस्थानी लगेच पोहोचू शकू. हीच गोष्ट आंतरिक प्रवास (जीवनाचे खरे ध्येय) साध्य करण्यासाठीही लागू होते.  आपणच ते प्रवासी आहोत ज्यांच्या हातातील दोन मोठ्या सूटकेसेस म्हणजे - एक आपल्या भूतकाळातील अनुभवांनी भरलेली आणि दुसरी म्हणजे भविष्यातील आपल्या आशा-आकांक्षांनी भरलेली. आपण भूतकाळाच्या आणि भविष्यकाळाच्या या ओझ्यातून मुक्त झालो, की  वर्तमानात जगू लागतो आणि मग आपल्या जीवनाच्या प्रवासाचा वेग उत्साहाने आणि आनंदाने वाढतो. अत्यंत तळमळीने आणि तीव्र इच्छेने जर आपण सर्वोत्तम प्रयत्न केले तर आपण आपल्या ध्येयापर्यंत इथेच आणि ह्याच क्षणी पोहचू शकू.
  ♾            
 एक माणूस धावत जाऊन आपले ध्येय गाठतो आणि दुसरा चालत जाऊन आपले ध्येय गाठतो, ह्यात काय फरक आहे?  एक आपला वेळ वाचवतो, तर दुसरा वेळ खर्च करतो.

बाबूजी                  
Heartfulness Meditation💌
मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक

1553. लाडकी बहीण

    यशची विजुमावशी हॉस्पिटलमध्ये जायची तयारी करत होती. तिची ताई म्हणजेच यशची आई दुसऱ्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये होती आणि काल रात्रीच तिला कन्या झाली होती, यश नंतर आठ वर्षांनी. यशची आई हॉस्पिटलमध्ये असल्याने त्याच्या बाबांनी यशला त्याच्या विजुमावशीकडे ठेवले होते. काल रात्री यशच्या बाबांचा फोन आला, कन्या झाल्याचा. ताईला भेटायला आणि छोटीला पहायला मावशी निघाली होती, सोबत यशला पण त्याची बहीण दाखवणार होती. यश अजून झोपून होता, म्हणून मावशी त्याला हाका मारू लागली.
"यश, लवकर उठ.. हॉस्पिटल मध्ये जायचंय.".
"मी नाही येत.."
"अरे तुला बहीण मिळणार आहे नवीन. तिला पहायला जाते आहे मी, चल.. लवकर उठ '
"मी नाही येत... मला कुणाला पहायचे नाही.'
"अरे असे काय करतोस ? तूझ्या बाबांनी तुला आणायला सांगितलंय, तुझी आई पण वाट पहाते आहे तुझी '
"अग मावशी, मला यायचे नाही, तू जा '.. असं म्हणत यशने पांघरून डोकयावरून घेतले. शेवटी विजुमावशी एकटीच हॉस्पिटलमध्ये गेली. तिला एकटीच आलेली पाहून यशची आई तिला म्हणाली 
"अग विजू, यशला नाही आणलंस?"
"अग ताई, तो यायलाच तयार होईना....करणार काय?"
"चार दिवस मी हॉस्पिटलमध्ये आहे मला पण त्याला भेटावसं वाटतय, बरं उद्या घेऊन ये त्याला. सांग आई वाट पहातेय, तुझ्यासाठी बाहुली आणली आहे हाडामासाची 'आपल्या कालच जमलेल्या कन्येकडे पहात यशची आई म्हणाली. दुसऱ्या दिवशी पण यश मावशीसोबत आला नाही मग सायंकाळी त्याचे बाबा विजुमावशीकडे गेले आणि यशला स्कुटरवर बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. बाबांनी यशला हाताला धरून पहिल्या मजल्या वरील रूममध्ये आणले. रूममध्ये यशचे काकाकाकू पण छोटया पुतणीला पहायला आले होते, हास्यविनोद सुरु होते, एव्हड्यात त्याना यश दिसला.
यशला पहाताच त्याच्या आईला फार आनंद झाला, पाच सहा दिवस तो मावशीकडे होता. आई म्हणाली 
"यश, तुझी आम्ही वाट पहात होतो, मावशीबरोबर का आला नाहीस काल? इकडे ये, ही बघ तुझी बहीण."
त्याची आई त्याचा हात पकडून पाळण्यातील नवीन जन्मलेली मुलगी दाखवू लागली तसा यशने आईच्या हाताला हिसडा दिला आणि तो लांब जाऊन बसला. मग त्याची काकी त्याच्या जवळ गेली आणि ती त्याला छोटीकडे नेऊ लागली पण तो तिच्या हातातून सुटला आणि खोलीच्या बाहेर गेला.
शेवटपर्यत यशने पाळण्यातील बहिणीला पाहिले नाहीच. आठ दिवसांनी यशची आई छोटीला घेऊन घरी आली मग बारसं झालं नाव चिन्मयी ठेवलं पण सर्वांची चिनू झाली.
यशच्या आईबाबांच्या लक्षात आल, यशला बहीण आवडलेली नाही किंवा आईवडिलांच्या मायेत त्याला पार्टनर नको होता म्हणून असेल पण तो तिला टाळू लागला. तिचा द्वेष करू लागला, ती जर रांगत असेल तर तिला लाथ मारून पुढे जाऊ लागला. यशची आई घरीच असायची त्यामुळे तीच लक्ष असायचे. दुसरीत असे पर्यत यश अभ्यासात हुशार होता, वर्गात पाहिला दुसरा यायचा पण आता तो मागे पडू लागला. घरात सतत चिडचिड करू लागला, भरपूर खायला लागला, हट्ट करू लागला. एकलकोंडा होतं गेला, मित्रांत मिसळेना, पुस्तके वाचेना. फक्त टीव्ही आणि मोबाईल गेम्स मध्ये अडकला. त्याच्या आईबाबांना त्याची काळ्जी वाटू लागली. दिवसेंदिवस त्याचा अभ्यासातील आलेख खाली घसरू लागला.
छोटी चिनू मात्र दादाकडे प्रेमाने पाही. ती बोलायला शिकली द.. द.. दाद्दा.. दाद्द.. दादा. पहिले अक्षर आ.. आ.. करायची सोडून ती दादा म्हणायला शिकली. चिनू लुटूलुटू चालू लागली.. धावत धावत दादाकडे जाई आणि तिचा दादा तिला फटका मारी.. मग ती मोठ्याने ओरडे, आई हातातील काम टाकून धावत येई आणि चिनुला उचले "भाऊ आहेस का सैतान.. का तिच्या मागे लागला आहेस?
चिनूच्या आईला रडू येई. चिनचे आईबाबानी यशसाठी मनसोपचारतज्ञ डॉक्टरची मदत घेतली. डॉक्टर म्हणाले "तो पहिला मुलगा असल्याने तुम्ही मुलाचे खुप लाड केलेत, मग हळूहळू त्याला समज येत होती, या काळात त्याला बहीण झाली. त्यामुळे त्याच्या लक्षात आले. आई वडिलांच्या प्रेमात आणि लाडात भागीदार आला आहे. म्हणून तो विचलित झाला. तो बहिणीचा द्वेष करू लागला. पण हेही दिवस जातील. तो योग्य वयात आल्यावर त्याला बहिणीची माया कळेल, तोपर्यत धीर धरा.
      मात्र एका प्रसंगाने चिनूची आई हादरली. चिनूची आई वॉशरूम मध्ये गेलेली, एव्हड्यात यशने छोटया चिनुला उचलले आणि तिचा हात पेटत्या निरंजनावर धरला. चिनू किंचाळली, आई धावत आली. तिने चटकन चिनूचा हात बाजूला केला आणि किचनमधील नळाखाली धरला. चिनूची दोन बोटे भाजली. चिनूच्या आईने यशला दोन फटके दिले आणि चिनुला जवळ घेऊन ती रडू लागली. मग मात्र पुढील दोन वर्षे त्याला विजुमावशीकडे ठेवले. त्याची शाळा बदलली.यश छोटया गावातील शाळेत शिकू लागला, तोपर्यत चिनू शाळेत जायला लागली. चिनुला दादाची आठवण येई मग ती ", दादा.. दादा म्हणत रडू लागे. विजुमावशींच्या गावात दहावी नंतर शाळा नव्हती, त्यामुळे अकरावीत यश पुन्हा घरी आला. त्यावेळी चिनू तिसरीत जात होती. आता तशी ती मोठी होती, त्यामुळे तिच्या आईबाबांना काळ्जी वाटतं नव्हती. यश अकरावीत गेला आणि बाबांची मोपेड शिकू लागला. न सांगता मुख्य रस्त्यावर गाडी नेऊ लागला. असाच भर दुपारी तो गाडी घेऊन क्लासला जाताना त्याला रिक्षाने उडवले. कोणीतरी शेजारील हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केले.
     बातमी कळताच त्याची आई हॉस्पिटलकडे धावली, वडील ऑफिस मधून आले विजुमावशी आली, शेजारी पाजारी धावले.सुदैवाने मेंदूला मार नव्हता. पण हात मोडला होता. पाय पुरा मोडला होता. शाळेत गेलेली चिनू घरी आली, घराला कुलूप म्हणून तिने शेजारच्या काकूंकडे चौकशी केली, तेंव्हा तिचा दादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याने आईबाबा तिकडे गेल्याचे तिला कळले. मग शेजारच्या काकू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. दादाची अशी व्यवस्था पाहून चिनू रडू लागली. तिच्या विजुमावशीने कशीबशी तिची समजूत घातली. डॉक्टरनी हाताला प्लास्टर घातले, कंबरेचा बॉल बदलायचा होता तसेच प्लेट्स घालव्या लागणार होत्या. या गोष्टीना वेळ लागणार होता. सुमारें दीड महिना यश हॉस्पिटलमध्ये होता.
    चिनू रोज शाळेला जाताना या हॉस्पिटलमध्ये जायची, तिला दादाची भीती वाटायची म्हणून हळूच दार उघडून दादाला पहायची. मग तिथल्या नर्सना दादाच्या तब्येती विषयी विचारायची. कधी कधी डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन किंवा डॉक्टर राउंडवर असायचे, तेथे जाऊन डॉक्टरना सांगायची "माझ्या दादाला लवकर बरा करा.'
डॉक्टर रोज येऊन यशची प्रगती अजमावत होते, त्याच्या जखमा किती भरल्यात ते पहात होते, औषधे देत होते. एक दिवस डॉक्टर यशजवळ आले ते हसत हसत. यशला डॉक्टर म्हणाले "तूझ्या बहिणीसारखी बहीण सर्वाना मिळावी, मला बहीण नाही रे. म्हणून मला जास्त वाटत. मी राऊंडवर असताना माझ्या मागे मागे येते आणि तुला केंव्हा बरे वाटेल, माझा दादा परत केंव्हा चालायला लागेल, असे विचारत असते. आज तर हद्दच झाली. नेहेमीसारखे मला विचारत होती "माझा दादा केंव्हा चालायला लागेल? मी म्हंटल अजून स्वतःच्या पायाने चालायला चार महिने तरी लागतील तोपर्यत तो कुबड्या घेऊन चालू शकेल. मग एक मिनिट विचार करून ती म्हणाली, मग डॉक्टर माझा पाय कापा आणि दादाच्या पायाला जोडा. मी कुबड्याने चालेन :
"काय?" यश किंचालळा.
"माझा पाय कापा म्हणाली माझी बहीण? आणि दादाच्या पायाला जोडा म्हणाली.
"होय बाबा, यालाच बहिणीची माया म्हणतात. तू नशीबवान. म्हणून तुला बहीण मिळाली. मी दुर्दैवी या बाबतीत."
डॉक्टर आणि नर्स गेले.
यशच्या डोळ्यात पाणी आले. या चिनू चा मी द्वेष केला ती घरात आल्यापासून. त्याच्या नजरेसमोर पाळण्यातील चिनू आली.. मग दा. दा.. म्हणणारी चिनू आली. ढोपराने चालणारी चिनू आली. ती लहान होती तेंव्हा आपण तिला लाथ मारून पुढे जात होतो. एकदा तिचा हात पेटत्या निरंजनावर धरला. ती मोठ्याने रडू लागली, त्याचा आपल्याला आनंद झाला. आपण खदखदा हसू लागलो. तीच चिनू. माझी लाडकी बहीण डॉक्टरना सांगते, माझा पाय कापा आणि दादाच्या पायाला जोडा?
आपलं चुकलं, आपण दुष्ठपणाने वागलो.. डॉक्टर काका म्हणतात", अशी बहीण आपल्याला हवी होती '.
आणि मला अशी बहीण मिळाली तर. मी दुष्ठ. मला लाडकी बहीण कळलीच नाही. बहिणीचे प्रेम. 
    असे विचार मनात येत असताना यशने पाहिले, दार किलकीले उघडले जात होते आणि त्या फटीतून दोन डोळे त्याच्याकडे पहात होते.
यश हळूच बोलला "चिनू, इकडे ये..चिनुला दादाच्या अश्या प्रेमाच्या हाकेची सवय नव्हती.. म्हणून ती घाबरत घाबरत पुढे गेली. ती जवळ येताच यशने तिला मिठीत घेतलं आणि तो रडू लागला.
त्याचवेळी यशचा डबा घेऊन आलेले त्त्यांचे आईबाबा हे दृश्य पाहून गहिवरले आणि त्यानी दोन्ही मुलांना जवळ घेतले आणि ते रडू लागले.

 प्रदीप केळुस्कर 9307521152 / 9422381299

1552. समाजाचं देणं

      मी जवळच्या फार्मसीच्या दुकानात औषध आणायला गेले होते. तिथे वरती एक बोर्ड लावला होता. Employee of the month & most helpful customer care representative लिहलेल्या बोर्डावर खाली "मेरी” असे नाव लिहले होते. मी त्या बोर्डाकडे बघत असताना एक बाई मला म्हणाली, “May I help you“? ती फार्मसी क्लार्क मेरीच होती. मध्यम वजन, कुरळे केस, कानात चांदीचे खडे, निळ्या रंगांचा चष्मा आणि अत्यंत विनयानं बोलणारी मेरी ४५-४६ वर्षाची असावी. 
“आहे का माझं prescription तयार?” मी विचारलं. ती मुख्य फार्मसिस्ट ला काहीतरी विचारून आली. 
 “तुझं औषध तयार नाही. तुझ्या डॅाक्टरकडून तुझी prescription order आलेली नाही.” तिने कंप्यूटर मधे बघत सांगितलं.  क्षणभर वाटून गेलं की हिचे काम तसं कठीण नसावं..त्यासाठी बक्षिस वगैरे म्हणजे जरा जास्तच झालं !  
माझ्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली,“बसायला वेळ आहे का तुला? मी तुझ्या डॅाक्टरला फोन करून तुझं  prescription लगेच पाठवायला सांगते म्हणजे तुला हेलपाटा नको.”मी बसले. मेरीने मला वाचायला एक मासिक आणून दिले. “हल्ली लोकं फोनवर वाचतात पण मासिक वाचण्यातली मजा काही औरच. किती सुंदर चित्रं आहेत बघ.” म्हणत मेरी पुढच्या गिऱ्हाईकाला मदत करण्यात गुंतली.
पुढचं गिऱ्हाईक एक  ७५ वर्षाचे आजोबा होते. ते त्यांच्या तब्येतीमुळे आणि औषधाच्या वाढलेल्या किंमती ऐकून चिडले होते.”एवढं महाग कसं झाले हे औषध? ते चिडून मेरीला म्हणाले. हा देश दिवसेंदिवस खाली चालला आहे.औषधाच्या किमती वाट्टेल तशा वाढवताना काही वाटत नाही त्यांना”आजोबा रागाने थरथरत म्हणाले.
मेरी ला याची सवय असावी. ती आजोबांना म्हणाली, ”बरोबर आहे तुमचे. माझी आई पण हे औषध घेते त्यामुळे मला माहित आहे. पण बघा दोन महिन्यात याचं Generic औषध येणार आहे. ते खूप स्वस्त असेल. या वेळी तेवढा खर्च करा. आत्ता हे कुपन वापरा.” म्हणत तिने आजोबांचे थोडे पैसे वाचवले. आजोबा थोडेसे शांत होऊन बाहेर पडले.
मेरी माझ्या डॅाक्टरकडून prescription अजून आलेलं नाही हे मला अधून मधून सांगत होती. तिने डॅाक्टरला फोन केलेला मी ऐकला होता.
पुढच्या गिऱ्हाईकाच्या औषधाचे कंम्पुटर वर बिल करत असताना तिला एक फोन आला. तिचा मुलगा असावा बहुतेक.  ती म्हणाली, “ तुझी स्कूल बस चुकली असेल तर आता लायब्ररी मध्ये बसून होमवर्क संपव.  मी काम संपले की येईन तुला घ्यायला.”
ती परत कामात गढली. समोर आलेल्या प्रत्येक गिऱ्हाईकाशी शांत आवाजात बोलणं, प्रेमानं त्यांची चौकशी करणं, डॉक्टरांच्या ऑफिसला फोन, हेल्थ इन्शुरन्स औषधाचे किती व तेवढेच पैसे का देईल हे त्यांना समजावून सांगणे सतत सुरू होतं. माझं prescription पण तयार झालं होतं.  मी ते घेऊन पैसे दिले व तिथून बाहेर पडू लागले.
“तुला अर्धा तास  बसायला लागलं याबद्दल sorry!  आम्ही prescription तयार झालं की text पाठवतो. तुला त्या लिस्ट मधे अॅड करते म्हणजे पुढच्या वेळी असा  वेळ जाणार नाही.” ती म्हणाली. मी होकार दिला.
तिनं माफी मागण्याचा प्रश्नच नव्हता. “तुझ्या डॅाक्टरने prescription पाठवलं नाही तर मी काय करू?” म्हणून ओरडली असती तरी चाललं असतं. पण तसं काही झालं नाही. 
“Mrs Ranade, Have a wonderful day. ”मी निघताना ती म्हणाली.  मी तिच्याकडे बघून म्हटलं,
”अग तुला मुलाला आणायला जायचं नाही का? त्याची स्कूल बस चुकली ना?"
ती म्हणाली,” तो नववी मधे आहे. लायब्ररीमध्ये बसून करेल अभ्यास माझी ड्युटी संपेपर्यंत. मला जाऊन त्याला आणता आलं असतं पण काम सोडून कसं जाणार?आज गर्दी खूप आहे. मी कॉफी ब्रेक ही घेतला नाही. नवऱ्याची कंपनी पण खूप लांब आहे त्यामुळे त्यालाही जमणार नाही.”
माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली,” माझे काम तसे सामान्य वाटेल पण मी त्याच्याकडे लोकांची सेवा म्हणून बघते. समाजाचे देणं म्हणून बघते. 
औषधं, हेल्थ इन्शुरन्स, prescriptions, तब्ब्येत बरी नसताना फार्मसी मधे जाणे, तिथं वेळ लागणे या किचकट गोष्टी असतात. त्यांचे पटकन काम करून देणं महत्वाचे असते. आणि जिथे काम पटकन व छान होतं ना त्या दुकानाची वेगळी जाहिरात करावी लागत नाही! लोकच सांगतात इतरांना!”
मी बाहेर पडले. वाटलं.. प्रत्येकानं समाजाचं देणं असतं ही जाणीव ठेऊन आपलं काम असं चोख केलं तर हे जग किती सुंदर होईल. मेरीच्या काम करण्यात एक आपलेपणा होता. समोरचा माणूस अगदी घरातला असल्या सारखं सर्वांशी दिवसभर प्रेमाने बोलणं सोपं का आहे? 
आपल्या वाट्याला आलेलं काम न कंटाळता मनापासून कसं करायचं कुठल्या कॅालेजमधे शिकवत नाहीत. ती वृत्ती असावी लागते. हे समाजाचं देणं आहे ही जाणीव असावी लागते.  आपण ज्या समाजाचा भाग आहोत तिथे वरपासून खालपर्यंत प्रत्येकाने उत्कृष्ट दर्जाचे काम केले तर देशात केवढी सुबत्ता नांदेल. मग ते देशाचे पंतप्रधान असोत किंवा कचरा उचलणारा कर्मचारी असो. रोजच्या कामात सौंदर्य शोधणं ही कला आहे आणि ती मेरी जवळ होती.
अभिनेता राजकुमारला म्हणे कोणी तरी प्रश्न विचारला होता. "तू अभिनेता नसतास तर कोण बनला असतास?" त्यावर त्यानं दिलेलं उत्तर आठवलं. “जे केलं असतं ते इतकं उत्तम केलं असतं की त्याचं सुध्दा लोकांनी कौतुकच केलं असतं. अगदी बुटाला पॅालीश केलं असतं तरी ते इतकं चकचकीत केलं असतं की त्या चमकणाऱ्या  बुटात माणसाला त्याचा चेहरा बघता आला असता.”
मी बाहेर जाऊन कॅाफी विकत घेतली. परत फार्मसी मधे गेले. मेरी पुढच्या गिऱ्हाईकाला स्पॅनिश भाषेत काही गोष्टी समजावून सांगत होती. तिला कॉफी दिली व सांगितलं, ”Mary,  you deserve that award. You truly are the best customer care representative!” मेरीचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. ती हसत म्हणाली,” Thank you. आता तू आलीस की मला कॅाफी ब्रेक मिळणार का नाही याची काळजी करायला नको !
परत दोन महिन्यांनी फार्मसी मधे गेले होते तेव्हा मेरी मॅनेजर झाल्याचं कळलं. A very well deserved promotion! महान फुटबॅाल खेळाडू पेले म्हणाले आहेत,”Success is no accident..It is hard work and to love what you are doing ! 
मनापासून केलेल्या कामाचे चीज झाल्याशिवाय राहत नाही हेच खरे ! 

© ® ज्योती रानडे

1551. मुखवटा

    अमेरिकेतून मुलगा-सून व मुलं भारतात परत येणार हे ऐकून लेले पती पत्नी फारच आनंदात होते. अमर अमेरिकेत दहा वर्षे होता. मध्यंतरी शिक्षण पूर्ण होताच त्याचं सईशी लग्न झालं. MBA केलेली तरतरीत सई अमेरिकेत छान रूळली होती पण दोघांना आपल्या देशात परत जाण्याची इच्छा होती. अमर-सई व त्यांची दोन मुलं ठरवल्याप्रमाणे भारतात आले. जज्ज लेलेंना कोर्टातील वकिलांनी आजवर एवढे आनंदी बघितले नव्हते. शशीताई लेले पण फारच खुषीत आहेत हे त्यांच्या भजनाच्या मैत्रिणींना जाणवलं. विशाखाताईंना गप्प बसवलं नाही. “फार सुनेच्या कलाने घेऊ नका हं! माझे काय झालय बघताय ना?" हा उपदेश शशीताईंच्या आनंदाच्या फुग्याला व्यवहाराची टाचणी टोचून गेला ! सई आणि शशीताईंचं पहिले काही महिने अगदी गळ्यात गळा होता पण हळूहळू काही ना काही खटके उडू लागले. एक दिवस नातवंडांनी बरच अन्न वाया घालवण्याचं निमित्त झालं व शशीताईंनी सई बरोबर अबोला धरला. हो/नाही पलिकडे त्या तिच्याशी बोलत नसतं. पंधरा दिवस सईनं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तिला यश आले नाही. बराच विचार करून तिने त्यांना एक टेक्स्ट पाठवला.
“प्रिय आई ! आपण दोघी एका छताखाली राहतो पण आपली एकमेकीशी फारशी ओळख नाही असं मला वाटतं. दोन मैत्रिणीं सारखं आपण कॅफेला जाऊन फक्त गप्पा मारू व let’s get to know each other!” आपण जे करतो आहोत ते पूर्ण अमेरिकन आहे. भारतीय संस्कृतीमधे याला अगाऊपणा म्हणतील याची तिला कल्पना होती. या टेक्स्ट वरून घरात रामायण होईल असं वाटत असताना अचानक शशीताईंचं उत्तर आलं..”हो जाऊया पण एक अट आहे..घरचे विषय बोलायचे नाहीत.” सईने ते कबूल केलं.
     त्या रविवारी सई कॅफेला जाण्यास तयार झाली. फिका गुलाबी सलवार कमीस, सडसडीत बांधा, सावळा तजेलदार रंग व रेशमी केस बघून शशीताईंना ही मुलगी खूप नीटनेटकी आहे असं वाटलं. दोन मुलं झाल्यानंतर एवढा सुडौल बांधा टिकवणं आपल्याला कधीच जमलं नव्हतं. त्यांनी ड्रायव्हरला कॅफे जवळ सोडायला सांगितलं. सईनं कोपऱ्यातील एक छान टेबल आधीच निवडलं होतं. खिडकीतून दिसणारे पाण्याचं कारंजं, त्यात लीलया फिरणारे लाल,सोनेरी मासे व हिरवीगार झाडे बघून शशीताई सुखावल्या होत्या. व्हेज कटलेट्स व फेसाळलेल्या बदामी कॉफीवर शुभ्र हार्ट चे चित्र काढलेली गरम कॉफी टेबलवर आली.
टेबलावर गॅागल ठेवत सई म्हणाली, “आई, छान आहे हं तुमची साडी!"
त्यानंतर थोडावेळ कुणीच काहीच बोललं नाही.
सईनंच परत विचारलं, “तुम्हाला गाणं कुणी शिकवलं? रामा रामा रटते रटते.. भजन तुम्ही किती छान म्हणता ! ”
शशीताई एकदम खुलल्या. गाण्याची शिकवणी, त्यातल्या जागा, आवडती भजने यावर बोलत राहिल्या. सईला पण त्यांनी अमेरिका आवडायची का वगैरे प्रश्न प्रथमच विचारले आणि सईनी परदेशी अनुभवांचं पोतं उपड केलं..सोपं का असतं परदेशी बस्तान बसवणे? त्या थक्क झाल्या. घरातील एकही विषय न बोलता फक्त एकमेकीला समजून घेणं चाललं होतं. कॉफी व व्हेज कटलेट खात बाईचा जन्म, तडजोड यावर खूप गप्पा झाल्या.. दोन पिढ्यातलं अंतर कमी होत होतं.. दोघी खुषीत घरी आल्या. घरी येताच मात्र शशीताई परत सासुबाई बनल्या व अगदी घुमेपणाने वावरू लागल्या. घरात जेमतेम बोलणं व बाहेर मात्र महिन्यातून दोन वेळा जाणं सुरू होतं. नाटक, सिनेमा, अध्यात्म श्रवण अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या पण घरी येताच मात्र शशीताईंमधली मैत्रीण लुप्त होत असे व मुखवटा घातलेली घुमी सासु अवतरत असे.
सुमनताईंनी त्यांना कॅफेमधे बघितलं होतं. भजनाला भेटताच त्यांचं सुरू झालं, “शशीताई, अहो हे अति प्रेम कशासाठी? योग्य अंतर ठेवा तिच्या बरोबर ! या शिकलेल्या मुली ना स्वत:ला फार शहाण्या समजतात.”
कुसूमताई म्हणाल्या, “शशीताई, मी पण माझ्या सुनेला अगदी लेकीसारखं वागवलं होतं सुरूवातीला. काही उपयोग होत नाही.” त्यांनी डोळे पुसले.
सईबरोबर अंतर ठेवलं नाही तर ती डोक्यावर बसेल हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता.
एक दिवस सई घरी नसताना अमर आईला म्हणाला, “आई, कशी आहे ग तुझी नवी मैत्रीण सई?”
“मैत्रीण म्हणून छान आहे रे ! पण सून म्हणून फार कमी पडते बघ. ते पॅन्ट शर्ट घालणं काय, ते नॅान व्हेज शिजवणं काय, मुलांना वळण नाही. मी जर असं केलं असतं ना तर तुझ्या आजीनं मला बाहेर काढलं असतं घरातून !” शशीताई भडाभडा बोलल्या. 
“आई, आजीनं तुझं चालवून घेतलं नसतं म्हणून तू तशीच वागणार? कपड्यांचे काय घेऊन बसली आहेस? तिचे मन बघ. ती प्रयत्नपूर्वक तुझ्याशी कनेक्ट होऊ पाहतेय. बाहेर तुला ती आवडते पण घरी तू तिच्याशी बोलत नाहीस. तुझे ताईशी वाद होतात ना? ताईशी तू किती वेळा अबोला धरला आहेस? आणि मुलांना वळण नाही कसं? तुझ्यासारखं नसेल पण तिला जसे लावायचे तसे वळण नक्की आहे."
शशीताई काही बोलल्या नाहीत. अमरचं बरोबर होतं. त्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या पण बरं वाटतं नव्हतं म्हणून त्या तासभर आधी घरी परतल्या व दारातच थबकल्या..
त्या दिवशी त्यांच्या घरी सईच्या मैत्रीणी येणार हे सईनं सांगितलं होतं. सई त्यांना सांगत होती, “माझ्या सासूबाई मला खूप सांभाळून घेतात..माझं नक्कीच चुकत असेल पण त्या मला आजवर कधी बोललेल्या नाहीत. आम्ही दोघी मैत्रिणींसारख्या हिंडतो,फिरतो! आपण नोकरी, मुलं यात कितीही बिझी असलो तरी सासुबाईं सासरे यांना वेळ दिला पाहिजे..ज्याच्यावर प्रेम करून हा संसार उभा केला आहे त्याला घडवणाऱ्या व्यक्तीना आपण समजून घेतलंच पाहिजे ! मतं जुळत नसली तरी.”
तिची मैत्रीण आभा म्हणाली,”आपण कामावर टिम वर्क नाही का करत? न पटणारे किती जण असतात ग्रूपमधे. घरात पण united front असेल तर किती छान होईल !
उषा म्हणाली, “घरचा एखादा प्रॅाब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्वाचं आहे.”
शशीताईंचे डोळे भरून आले. देवाची भजने म्हणत सुनांच्या कागाळ्या करणारा भजनाच्या बायका कुठं आणि या उच्चशिक्षित मुली.. नोकरी करून घराचं घरपण कसे जपायचं याचा चर्चा करणाऱ्या सुना कुठं! अमेरिकेहून आलेली सून डोक्यावर बसणार हे या भजनाच्या बायकांनी ती येण्यापूर्वीच आपल्या डोक्यात भरून ठेवलय..आपली दृष्टी ती येण्यापूर्वीच गढूळ होती..ती बदलली पाहिजे.
त्या चपला काढून आत आल्या व आपल्या खोलीकडे जात असताना सई म्हणाली,
 “आई, लवकर आलात? बरं वाटतंय ना? चहा घ्यायला येता का? मैत्रिणींशी ओळख करून देते."
“आले असते ग..पण डोकं दुखतंय..पडते मी जरा !” म्हणून त्या खोलीत आल्या..
एवढचं ऐकायची अपेक्षा असते.
“बरं वाटतय ना?” त्यानचं बरं वाटायला लागतं !
पुढच्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या तेव्हा कुसुमताई सूनेबद्दल तक्रार करत होत्या. शशीताई एकदम म्हणाल्या, "कुसुमताई, सुनेबद्दल कागाळ्या करणे बंद करा. काय मिळणार आहे त्यातून? अहो, आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समजून घ्यायला नको का?  लहान आहे. चुकेल. पण त्यांना भजनापूर्वी नावं ठेऊन घरचं काही बदलेल का? आणि या चर्चेनंतर “दर्शन दे रे, दे रे  भगवंता... गाताना मन शांत असेल का?” कुसूमताई नाक मुरडून गप्प बसल्या.
“घरचा एखादा प्रॅाब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्वाचं आहे.” हा मुद्दा बायकांना पटला ! शशीताई प्रसन्न होऊन भजन संपवून घरी आल्या. आज कुठे शोधिशी रामेश्वर अन्.. गाताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं होतं सगळ्यांच्या ! अंगणातील मोगरा किती सुंदर फुलला आहे ते बघत त्या घरात आल्या.
सईला म्हणाल्या, “सई, एक नवं नाटक आलं आहे. खूप छान आहे म्हणे. दोन तिकीटं काढू का?”
सई आनंदाने हो म्हणाली. तिनं अमरकडे कौतुकानं बघितलं. आज एक मुखवटा गळून पडला होता.
“सई, चहा प्यायला ये ग टेरेस वर..आज कॅफेमधे नको.. घरीच गप्पा मारू!” तिच्या कामावरच्या गमती ऐकायला शशीताई उत्सुक होत्या.. “आलेऽऽऽ हो.. म्हणत सई पळत वर गेली.
अमर आणि बाबा कौतुकाने त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या बायकांकडे बघत राहिले ! घरातल्या बायका मैत्रिणी झाल्या की घराचं नंदनवन होतं हे दोघांना जाणवत होतं.

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved

1550. अखेर वर्तुळ पूर्ण झाले

        सुरेश पुण्यात एका चाळीमध्ये भाड्याने राहत होता. आयटीआय ची परीक्षा दिल्यानंतर त्याला त्याच्या उत्तम स्किलनुसार एका चांगल्या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. कंपनी मोठी असल्यामुळे चांगला पगार मिळू लागला. त्यामुळे त्याने कर्ज काढून पुण्यातच एक फ्लॅट घेतला. स्वतःचा फ्लॅट व नामांकित कंपनीत नोकरी यामुळे त्याला लग्नासाठी चांगली बायको मिळाली. लग्न थाटामाटात पार पडले. बायको पण जॉब करत होती. दोघेही खूप परिश्रम करून पैसे कमवत होते. त्यांना एक मुलगा झाला. त्या मुलाला त्यांनी खूप उच्च शिक्षण दिले. व त्याला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले. अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन तेथेच मुलाला नोकरी मिळाली. अमेरिकेतच त्याच्या कंपनीतील एका भारतीय मुलीशी त्याची मैत्री वाढली. व त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या घरची परवानगी मिळाली. पुण्यातच लग्न खूप थाटामाटात पार पडले. सुरेश खूप खुश होता. नंतर सुरेश चा मुलगा हा अमेरिकेतच स्थायिक झाला. सुरेश व त्याची पत्नी अमेरिकेत एक दोन वेळा जाऊन आली. परंतु सुनबाई कडून त्यांना म्हणावी तशी वागणूक मिळाली नाही. त्यामुळे सुरेशला थोडे दुःख झाले होते. 
      अशातच सुरेश च्या पत्नीला कॅन्सर झाला. व त्यात तिचे निधन झाले. दशक्रिया विधीला मुलगा एकटाच आला होता. दोन दिवस थांबून तोही परत अमेरिकेत निघून गेला. सुरेश एकटा पडला. कंपनीत नाश्ता व जेवण मिळत होते. संध्याकाळची त्याने मेस लावली. एकटेपणा त्याला सतावत होता. त्याला नैराश्य येत होते. अशातच तो रिटायर झाला. रिटायरमेंट नंतर मिळालेल्या पैशातून त्याने मुलाच्या शिक्षणासाठी, गाडीसाठी व फ्लॅटसाठी घेतलेले लोन फेडले. व थोडेफार जे पैसे मिळाले होते त्याची गुंतवणूक केली. कंपनीची पेन्शन स्कीम नव्हती. सुनबाईच्या धाकामुळे मुलाने देखील सुरेशला पैसे पाठवणे बंद केले. व हळूहळू कम्युनिकेशन देखील बंद केले. सुरेशला पत्नी व मुलाची व नातवंडाची सारखी आठवण यायची. कधी कधी तो एकटा रडत बसायचा. अशा मानसिक असंतुलनामुळे त्याला ब्रेन ट्युमर झाला व मेडिकल पॉलिसी नसल्यामुळे त्याने जमा केलेली सर्व रक्कम संपली.. औषधाचा व इतर खर्च वाढला. फ्लॅटमध्ये एकट्याला राहणे त्याला मेंटेनन्स, लाईट बिल, टॅक्स परवडत नव्हते. व एवढे मोठे घर त्याला खायला उठत होते.
     अशातच त्याचा अपघात झाला व अपघाताची तीव्रता जास्त असल्याने त्याला वैद्यकीय बिलासाठी फ्लॅट विकायची वेळ आली. कारण आर्थिक नियोजनाकडे देखील त्याने प्रॉपर लक्ष दिले नव्हते. त्याचा मित्र राजेश सर्व गोष्टीत त्याला भरपूर मदत करत होता. परंतु सर्व गोष्टीचे सोंग करता येते परंतु पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे राजेशच्या मदतीने त्याने फ्लॅट विकून टाकला. व राजेशने सुरेश ला एजंटच्या मदतीने एका चाळीत भाड्याने जुने घर घेऊन दिले. व त्याला मेस लावली. अधून मधून वेळ मिळेल तसा राजेश त्याच्या घरी जात असतो, त्याचं मनोबल वाढवत असतो..
     मित्रांनो सुरेशने आपल्या संपूर्ण जीवनपटाचा अभ्यास केल्यानंतर त्याला लक्षात आलं. एवढा मी आयुष्यभर पळालो. परंतु एका चाळीमधून भाड्याच्या घरातून आयुष्याला सुरुवात केली. मर मर पळालो. स्वतःकडे दुर्लक्ष केले. आज मी एकटा पडलो. ज्या चाळीमधून मी प्रवासाला सुरुवात केली त्याच चाळीत मी शेवटी भाड्याने राहू लागलो. आता येथेच माझा अंत होईल. जीवनसाथी अर्धवट साथ सोडून गेली. जो मुलगा म्हातारपणाचा आधार होईल असे वाटले त्याने कम्युनिकेशन बंद केले. सुरेश आज एकटा पडला आहे व त्याला लक्षात आलं अखेर वर्तुळ पूर्ण झाले. 
      मित्रांनो जीवन प्रवास हा असाच असतो. भगवान बुद्ध म्हणतात सर्व काही बदलत असते. जीवन म्हणजे आपल्या कर्माचा खेळ असतो. त्यामुळे आयुष्य एक वर्तुळ आहे. वर्तुळाच्या परिघावर वर गेल्यानंतर शेवटी ठराविक उंची नंतर परत खाली जावे लागते. व वर्तुळ पूर्ण होते. त्यामुळे आपल्या कर्माने जे आपल्या वाट्याला आलं. कुणालाही दोष न देता ते भोगून मोकळे व्हा. व आहे त्या परिस्थितीत सत्कर्मांची पेरणी करत अंधारातून प्रकाशाकडे जा.. जसे आपले कर्म तसे फळ. रामकृष्ण परमहंस म्हणतात, कुणाच्याही पायातील खडाव तुटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस खाली यावेच लागते.
त्यामुळे सर्वकाही आबादी आबाद असेल तर फार गर्व व हुशारी करू नका. 
तु लाख करे चतुराई ,करम का खेल मिटे ना रे भाई...

डॉ. दत्ता कोहिनकर 
माईंड पॉवर ट्रेनर 
लेखक. 
Mob. ९८२२६३२६३० 

1549. ध्येय

 "अवनी, हे रिपोर्ट्स तू कसे काय अप्रूव्ह केलेस?"
"काय झालं सर? काही चुकलंय का?"
"हो, बरंच काही. हे रीडिंग्ज बघ. त्यांत अजिबात consistency नाहीये. शिवाय पुढच्या calculations मध्येही गडबड झालीये. पूर्ण automated सिस्टम असली तरी ती वापरताना माणसाला डोकं जागेवर ठेवावं लागतंच ना. कसं काम करतात तुझे इंजिनिअर्स ? जरा दम ते त्यांना आणि या सगळ्या टेस्ट परत करून घे."
सर बोलत असताना अवनी अस्वस्थपणे ते रिपोर्ट बघत होती. खरंच त्यात बऱ्याच चुका होत्या. या आपल्याला कशा दिसल्या नाहीत? 
"अवनी, तुझ्याकडून या चुका कशा सुटल्या? Is everything alright? यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून बघतोय मी तू अस्वस्थ असतेस. काही स्ट्रेस आहे का? कशाचा त्रास होतोय का? मला तू मोकळेपणाने सांगू शकतेस." 
"नाही सर तसं काहीच नाही."
"नक्की?"
"हो, सर."
"जर तसं काही नसेल तर मी सांगतो, काय झालंय ते. तुला एका ब्रेकची गरज आहे. किती दिवसांत तू सुट्टी घेतलेली नाहीयेस. मला तुझ्या कामावर असलेल्या तुझ्या श्रद्धेची पूर्ण कल्पना आहे. तुला तुझं काम खूप आवडतं आणि तीच तुझी मुख्य प्रायोरिटी आहे हे मला माहिती आहे. पण त्यातही जरा चेंज हवा गं. Think about it seriously and get this retesting done." असं म्हणून सरांनी विषय संपवला.
"Yes, Sir" म्हणून अवनी केबिनबाहेर आली आणि टेस्ट लॅबकडे निघाली. 
सर म्हणत होते त्यात काही चूक नव्हतं. अवनी सध्या खरंच अस्वस्थ होती. पण ते नक्की कशाने ते तिचं तिलाच कळत नव्हतं. तिला जसं हवं होतं अगदी तसंच आयुष्य ती जगत होती. तिच्या आवडीचं काम तिला मिळालं होतं जे ती जीव ओतून करत होती. अमर सारख्या हुशार, देखण्या आणि कर्तृत्ववान मित्राशी तिचं लव्ह मॅरेज झालेलं होतं. अमरचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि त्याने तिला ती जशी आहे तसं स्वीकारलेलं होतं. शिवाय तिच्या कधीही मुल न होऊ देण्याच्या निर्णयाला त्याचा पूर्ण पाठींबा होता. In fact त्यालाही कधीच मूल नको होतं. लग्नानंतर अवनीच्या आईवडलांनी आणि सासूसासऱ्यांनी दोघांचं मन वळवायचा हर प्रकारे प्रयत्न केला होता. पण ते बधत नाहीत म्हंटल्यावर त्यांनी यांचा हा जगावेगळा निर्णय स्वीकारून टाकला होता. 
अवनी आणि अमर दोघांनाही मुलाला जन्म देऊन त्याच्या मागे आयुष्य घालवायचं नव्हतं. आयुष्यभराची पालकत्वाची जबाबदारी नको होती. त्यांना फक्त त्यांच्या दोघांच्याच जगात सुखी राहयचे होते. जे ते होतेही. पण तरीही हल्ली कसली तरी उणीव भासत होती. 
विचार करत करत अवनी लॅबमधे आली. लेटेस्ट टेकनॉलॉजिने सज्ज असलेली ही आद्ययावत लॅब कंपनीसाठी अवनीने उभारली होती. अगदी शून्यातून. त्यामुळे अवनी लॅबबद्दल बोलताना It's my baby असं अभिमानाने म्हणायची. लॅब इन चार्ज म्हणून आनंदाने मिरवायची. अवनीची सगळी भावनिक गुंतवणूक तिच्या करीअर मधे होती आणि मुख्यत्वाने या लॅबमधे होती. अगदी हल्ली हल्ली पर्यंत. पण गेल्या काही महिन्यांपासून तिला आयुष्य अगदी संथ झाल्यासारखं वाटत होतं. करीअर एका उंचीवर पोचून त्यात स्टेबिलीटी आली होती. अमर आणि तिच्या नात्यातही एक ठेहाराव आला होता. आयुष्यात नाविन्य, नवचैतन्य असं काही उरलंच नव्हतं. कशासाठी, कोणासाठी आपण धावतोय तेच कळत नव्हतं. जवळच्या मैत्रीणी मुलाबाळात, संसारात आकंठ बुडाल्या होत्या. त्यांच्याकडे अवनीसाठी वेळ नव्हता. आईशी काहीही शेअर करायला गेलं तर तिची गाडी फिरून फिरून मुलावर यायची आणि दोघीत वादच व्हायचे. त्यामुळे तिच्याशीही फार शेअरिंग होतं नव्हतं. अमर त्याच्या कंपनीत कंट्री हेड झाल्याने वाढलेल्या जबाबदाऱ्या निभावण्यात बुडालेला होता. आहेच कोण माझ्याजवळ माझ्या हक्काचं? माझ्यावर अवलंबून असलेलं, माझी वाट बघणार? हल्ली ही पोकळी अवनीला फार जाणवायला लागली होती. 'आहे मनोहर तरी गमते उदास' अशी अवस्था झाली होती. 
सर म्हणतायत ब्रेक घे, पण तो घेऊन करु काय? अवनी खिन्नपणे हसली आणि तिने मगाचच्या फाईल मधे डोकं खुपसलं. 
खिन्न मनानेच अवनी घरी पोचली तर लिफ्टमध्ये तिला आपटे आजी भेटल्या. 
गुलाबी साडी नेसून प्रसन्न मनाने त्या जवळच्याच देवळात निघाल्या होत्या, श्रीसूक्ताच्या आवर्तनांसाठी. अवनीला पाहून त्या म्हणाल्या, "अरे वा आज लवकर आलीस वाटतं. चल येतेस का देवळात माझ्याबरोबर? आपल्या सोसायटीतल्या बऱ्याच बायका येणार आहेत. भोंडलाही आहे आज"
नाहीतरी घरी जाऊन करायचं काय हा प्रश्न होताच त्यामुळे अवनी आपटे आजीबरोबर देवळात गेली. संपूर्ण देऊळ आज गुलाबी रंगात नाहून निघालं होतं. 
देवीला गुलाबी साडी नेसवली होती. अवनी देवीसमोर हात जोडून उभी राहिली. देवीच्या चेहऱ्यावर कोमलता, करूणा, वात्सल्य या स्त्रीत्वाच्या भावनांतून आलेली परिपूर्णता झळकत होती. देवीच्या त्या प्रसन्न, प्रेमळ चेहऱ्याकडे पाहता पाहता अवनीला एकदम जाणवलं की तिच्या आयुष्यात काय कमी आहे.
'मी इतरांवर प्रेम करण्याची, त्यांची काळजी घेण्याची, त्या काळजीत, प्रेमात जीवाला गुंतवून टाकण्याची म्हणजे माझ्यातल्या स्त्रीत्वाची मूळ भावनाच दाबून टाकली आहे. स्वतःला विसरून निरपेक्ष प्रेम करण्याचा अनुभव नाकारला आहे आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात ही पोकळी आहे.' अवनी विचारांत हरवली.
काही वेळातच श्रीसूक्त आवर्तनांना सुरवात झाली. श्रीसूक्त ऐकता ऐकता अवनीच्या मनातली विचारांची वलय शांत होत गेली. आवर्तनांनंतर आपटे आजींनी त्याचा अर्थही सांगितला.
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
आजी म्हणाल्या, या मंत्रामध्ये देवीचे वर्णन केलेलं आहे. यात लक्ष्मीला आर्द्रां असं म्हटलं आहे. आर्द्रां म्हणजे ओली. लक्ष्मीला ओली म्हणण्यामागचे तीन अर्थ घेता येतात. एक ती समुद्रमंथनातून आलेली आहे म्हणून, दुसरा ती आर्द्रां नक्षत्रावर आलेली आहे म्हणून आणि तिसरा म्हणजे स्नेहाचा ओलावा तिच्यामध्ये आहे म्हणून. अशी ही चंद्राप्रमाणे शितल असलेली, आनंद देणारी लक्ष्मी परिपूर्ण आहे.
अवनी श्रीसूक्तातल्या एकेका मंत्राचा अर्थ ऐकत गेली आणि तिच्यासमोर तिचे भविष्यातले ध्येय अधिकाधिक स्पष्ट होत गेले.
माझ्या आयुष्यातली ही अपूर्णता भरून काढणं माझ्यासाठी सहज शक्य आहे. जगात कितीतरी लोक निस्वार्थ, निरपेक्ष प्रेमासाठी झुरत आहेत. कित्येक अनाथालयं, हॉस्पिटल्स, वृद्धाश्रम असे असतील जिथे लोकांना प्रेमाने काळजी घेणाऱ्या माणसांची गरज असेल. अशा एखाद्या संस्थेसाठी मी माझा वेळ दिला तर.. इतरांना मायेचा ओलावा देण्यात मनाची गुंतवणूक केली तर. नक्कीच माझंही आयुष्य परिपूर्ण होईल. 
या विचाराने अवनीचा मूड बदलला आणि तिने लवकरच त्या बाबत पावलं टाकायची असा निश्चय केला. 
"हे देवी माते, माझ्या या निश्चयाला साध्य करण्याचं सामर्थ्य मला दे." अशी देवीकडे मनोमन प्रार्थना करून अवनी आनंदात घरी जायला निघाली. 
मायेचा ओलावा जपणारा आजचा गुलाबी रंग अवनीची संध्याकाळ गुलाबी करून गेला. 

©® धनश्री दाबके 

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

1548. टाईमपास....!

 "अज्जिबात चांगल्या नाहीत तुम्ही. नाहीत आवडत तुम्ही मला..!"
असं मोठयाने, चिडून म्हणत तो त्याच्या जागेवर जाऊन बसला.
अन् मी अवाक् होऊन बघत होते त्याचं हे रूप....!
एका क्षुल्लक कारणासाठी आपल्या एखाद्या विद्यार्थ्याने असं आणि इतकं उद्धटपणे रिऍक्ट व्हावं, हे माझ्यासाठी खूप आश्चर्याचं, मन दुखावणारं, अन् काहीसं क्रोध आणणारं होतं ! 
त्याने मला असं म्हणणं , हे माझ्यातल्या शिक्षकाचं खूप मोठं अपयश होतं !
१७ वर्षांत आजतागायत असा आणि इतका वाईट अनुभव एकाही विद्यार्थ्याने दिला नव्हता!
खूप बेचैन होते मी चार दिवसांपासून.
पण स्वतःवर, स्वतःच्या  'शिक्षक' असण्यावर माझा नितांत विश्वास आहे.
या वाक्याच्या मुळाशी जाऊन, त्याची कारणमीमांसा जाणून, या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसवेना मला!
तर.
झालं असं की.
मागच्या काही दिवसांपासून दररोज लंच ब्रेक नंतर लगेच दर अर्ध्या अर्ध्या तासांनी तो बाथरूमला बाहेर जाण्यासाठी विचारायचा मला.
अन् त्याच्यामुळे शिकवताना मध्येच डिस्टर्ब व्हायचे मी. 
त्या दिवशीही मी शिकवत असताना जागेवरून उठून हाताची करंगळी दाखवत तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला.
आता मात्र चिडून मी त्याला रागावले. "आत्ताच तर ब्रेक झाला होता ना! तुला बाहेर जाऊन timepass करायचा असतो ना? गेलास की १०-१५ मिनिटे तर बाहेरच असतोस... बस जागेवर...!"
अन् यावर ते सुरुवातीचं , माझ्यातल्या शिक्षकाला गदागदा हलवून सोडणारं वाक्य ओटीत पडलं माझ्या...!
परत दुसऱ्या दिवशी त्याने तेच विचारण्याची हिम्मत केली... पण आज मात्र मी थोडं सौम्यपणे घेतलं... आणि जाण्याची परवानगी दिली...!
तिसऱ्या मजल्यावर आहे माझा वर्ग. आणि प्रत्येक मजल्यावर टॉयलेट ची सोय..!
पण तो मात्र खाली गेला. माझं आज बारकाईने लक्ष होतं त्याच्याकडे.
वरून  वाकून पाहत होते मी त्याला.
अन् जे पाहिलं, ते खूपच अनपेक्षित होतं मला!
शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर त्याची बालवाडीतली बहीण बसली होती १ वाजता शाळा सुटुनही ती अजूनही इथेच होती. तो तिच्या दप्तरातला त्याचा मध्यंतरात मिळालेल्या, जाणीवपूर्वक जास्तीची घेतलेल्या खिचडीचा डबा उघडून तिला भरवत होता ! परत आला. आणखी अर्ध्या तासाने. त्याचा तोच प्रश्न....माझा तोच सौम्य होकार. त्याचं तिच्याकडे जाणं...माझं वरून वाकून पाहणं...!
यावेळी तो तिला काहीतरी समजावत होता, तिला झोप येत होती, पण तो तिला झोपू देत नव्हता. ओंजारत, गोंजारत होता..
"इकडे तिकडे कुठेही जाऊ नको, इथेच बसून रहा, मी अजून एकदा येतो", असं (हातवाऱ्यांवरून) म्हणत होता!
परत वर आला.
रोजच्याप्रमाणेच मला "किती वाजलेत?" विचारले. मी दररोज अडीच च्या पुढची वेळ सांगितल्यावर तिथून पुढे मात्र मन लावून अभ्यास करायचा. (हे माझं रोजचं निरीक्षण!)
त्यानंतर दोन दिवस शाळेत आलाच नाही तो! आज त्याची आई आली त्याला घेऊन.
तिच्याशी केलेल्या चर्चेअंती हे समजले की,
ती एक single mother आहे....
अलिखित घटस्फोटिता..! आणि तिची ही दोन मुलं.
नुकतीच ती एका हॉस्पिटलमध्ये कामाला लागली आहे, अन् सकाळची ओपीडी २.३० ला संपल्यावर मगच तिला तिथून सुट्टी मिळते. तोवर मुलीची शाळा सुटते. मग पुढील दीड तास आई येईपर्यंत ते ५ वर्षांचं लेकरू शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर बसतं.... माझ्या शाळेच्या आसऱ्याला ! आपल्या चिमुकल्या बाळासाठी माझ्या शाळेची पायरीही सुरक्षित वाटत होती त्या माऊलीला ! अन् आई येईपर्यंत तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती माझ्या वर्गातल्या त्या १० वर्षांच्या भावावर ! त्या दिवशी अचानक ताप आला होता त्याच्या बहिणीला. अन् अशा परिस्थितीत, अशा या कडाक्याच्या थंडीत ती झोपी गेली होती त्या पायरीवरच. झोपेत पायरीवरून पडून कपाळाला टेंगुळ आलं होतं तिच्या ! त्यामुळे पुढचे दोन दिवस आई कामाला गेल्यावर तिच्याजवळ बसून आजारपणात काळजी घेत होता तो तिची. त्याच्या 'त्या' मला चिडून बोललेल्या वाक्यातली तीव्रता, त्यातली तगमग आज अधिक स्पष्टपणे जाणवली आहे मला..
खरंच....
का म्हणून आवडायला पाहिजे होतं मी त्याला??
किती कठोर वागले होते मी त्याच्याशी, त्याच्यातल्या जबाबदार, पण हतबल भावाशी....!
असो,
(मुख्याध्यापकांच्या अलिखित परवानगीने)
उद्यापासून त्याची ती गोंडस, गुबगुबीत बहीण तिची शाळा सुटल्यावर दीड तास माझ्या वर्गातल्या शिल्लक डेस्कवर बसणार आहे.
तो बाहेर जाण्यासाठी मला वारंवार विचारणार नाही. मला व इतर मुलांना डिस्टर्ब होणार नाही. तो व त्याची आई कुठल्याही भीती व विवंचनेखाली दीड तास जगणार नाहीत. ....आवडेल ना आता तरी मी त्याला.....??

 © संध्या

1547. सीमोल्लंघन

 " हं सांगा मला काय काय आणायचं ते, मी घेऊन येतो." बापुसाहेब तयार होऊन सरलाताईंना म्हणाले.
"अहो तुम्ही राहू द्या. वसंताला पाठवते मी"
"आम्हांला तरी कोणतं काम आहे? द्या ती लिस्ट आमच्याकडे."
"वसंताला तरी घेऊन जा सोबत."
"नको नको. तुमच्या मदतीला राहू द्या."
सरलाताईंनी थोड्या नाखुषीनेच सामानाची यादी त्यांना दिली. बापुसाहेब घराबाहेर पडले. सरलाताई त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिल्या. एवढा मोठा माणूस, आज भाजी आणि किराणा आणण्यासारख्या क्षुल्लक कामांसाठी बाहेर पडावा हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं.
     आज दसऱ्यानिमित्त ड्रायव्हरला सुटी दिली असल्याने बापुसाहेबांनी स्वतःच गाडी काढली आणि ते बाजाराकडे निघाले. आज दसऱ्याचा बाजार तुडूंब भरला होता. एका गल्लीत गाडी पार्क करुन ते बाजारात शिरले. त्यांना आपल्या तरुणपणाची आठवण झाली. दसऱ्याच्या दिवशी ते असेच भाजीबाजारात येऊन खरेदी करायचे. सोबत मुलं असली की अजुनच मजा यायची. त्यांचे प्रश्न आणि मागण्या यांचा भडीमार असायचा.
"एकट्याने खरेदी करण्यात मजा नाही" ते मनाशीच पुटपुटले. मग त्यांनी भरपूर भाज्या, झेंडूची फुलं खरेदी केली. एका किराणा दुकानात जाऊन सरलाताईंनी लिहून दिलेल्या वस्तू खरेदी केल्या. स्वीट मार्टमध्ये जाऊन त्यांचे आवडीचे मोतीचुरचे लाडू आणि संध्याकाळी भेटायला येणाऱ्यांसाठी पेढे घेतले. लहान मुलांसाठी चाॅकलेट्स घेऊन ते घरी आले. पिशव्या भरभरुन त्यांनी आणलेला बाजार पाहून सरलाताईंना आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं.
"अहो इतक्या भाज्या? घरात आपण इनमीन दोन माणसं ! कधी संपणार हे?"
"असू द्या हो. आज इतक्या वर्षांनी बाजारात गेलो. इतक्या ताज्या हिरव्यागार भाज्या पाहून मोह आवरला नाही."
सरलाताईं मनाशीच हसल्या. आपल्या नवऱ्याने असं सामान्य माणसासारखं वागलेलं पाहून त्यांना समाधान वाटलं. 
विश्वासराव शिंदे उर्फ  बापूसाहेब म्हणजे जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ. एका सहकारी बँकेचे चेअरमन. बापूसाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते. जिल्ह्यात कोणत्याही पक्षाची सत्ता येवो बँकेत मात्र विश्वासरावांचंच पॅनल जिंकून यायचं. पॅनलमध्ये इतर सदस्य कोण आहेत याचं बँकेच्या सभासदांना काहिही देणघेणं नसायचं. त्यात बापूसाहेब आहेत म्हणजे झालं इतकी लोकप्रियता बापूसाहेबांची होती. बापूसाहेबांचं संघटन कौशल्य वादातीत होतं. कोणत्या माणसाला कसं ताब्यात ठेवायचं हे त्यांना माहित होतं. अगोदर फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली त्यांची बँक जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात पोहोचली होती. प्रत्येक शाखा आधुनिक होती आणि जवळजवळ प्रत्येक गावात बँकेचं एटीएम होतं. या सर्वामागे बापुसाहेबांचं अफाट कर्तृत्व होतं. जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदार, खासदारापासून ते खेड्यापाड्यातल्या गरीब शेतकऱ्यापर्यत सगळ्यांशी बापूसाहेबांचे प्रेमाचे संबंध होते. कर्जवाटपात जशी बँक जिल्ह्यात अव्वल होती तशीच कर्जफेडीतही आघाडीवर होती. बँकेचा एनपीए अतिशय कमी होता. कारभार तर इतका पारदर्शी होता की रस्त्यावरच्या माणसाने जरी चौकशी केली तरी त्याला एकही चुक दिसू नये. बँकेतला भ्रष्टाचार म्हणजे फक्त चहापाणी करणं किंवा खुप झालं तर सगळ्या स्टाफला पेढे वाटणं. बापूसाहेबांची लोकप्रियता बघून त्यांना बऱ्याचदा राजकीय पक्षाकडून लोकसभा, विधानसभा निवडणूक लढायच्या ऑफर्स यायच्या. पण बापुसाहेबांना बँकेला निवडणूकीचा आखाडा बनवायचं नव्हतं किंवा बँकेच्या कारभारात राजकीय पक्षांना शिरुही द्यायचं नव्हतं. ते स्वतः जन्मजात गर्भश्रीमंत होते. गावाकडे प्रचंड शेती होती. शहरात दोन थ्री स्टार हाॅटेल्स होती. वडिलांच्या नावाचं एक इंजीनियरींग काॅलेज होतं. मुलीचं लग्न होऊन ती जर्मनीत स्थायिक झाली होती. मुलगाही साॅफ्टवेअर इंजीनियर होऊन हैदराबादला एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होता. त्याची बायकोही डाॅक्टर होती. बापूसाहेबांनी एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून त्यांची सर्व कर्तव्य पार पाडली होती. त्यात ते समाधानी होते. बँकेसोबतच बापुसाहेब किमान डझनभर संस्थांचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे सर्वच संस्था भरभराटीला आल्या होत्या.
    असं म्हणतात की हवा फिरायला आणि नशीब बदलायला वेळ लागत नाही. यावेळी बँकेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तसं बँकेतलं वातावरणही बदललं. संचालक मंडळातल्या तरुण संचालकांच्या महत्वाकांक्षा जागृत होऊ लागल्या. अनेक वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या बापूसाहेबांनी आता तरुणाईला संधी द्यावी असं खाजगीत बोललं जाऊ लागलं. पण इतक्या मेहनतीने डबघाईला आलेली बँक उत्कर्षाला आणणारे बापूसाहेब सहजासहजी पद सोडणार नव्हते. त्यांना निवडणुकीत हरवणंही कठीण होतं. ही गोष्ट माहित असणाऱ्या संचालकांनी नको ती गोष्ट केली आणि राजकीय पक्षाची बँकेत एंट्री करुन दिली. बापूसाहेबांचे सगळ्याच राजकीय पक्षांशी चांगले संबंध असले तरी बँकेच्या व्यवहारांपासून बापूसाहेबांनी त्यांना दुरच ठेवलं होतं हीच गोष्ट या पक्षांना खटकत होती. तर बऱ्याच संचालकांना बापुसाहेबांचं "मी खाणार नाही आणि कुणाला खाऊ देणार नाही" हे तत्व खटकत होतं. बापुसाहेबांना खाली खेचायचे प्लॅन्स शिजू लागले. संचालक मंडळातल्या सदस्यांची चाचपणी सुरु झाली. बापुसाहेबांबद्दल कुणाची तक्रार नसली तरी बदल सगळ्यांनाच हवा होता. मग बापुसाहेबांच्या सर्वात विश्वासू संचालकाला फोडण्यात आलं. चेअरमनपदाची लालुच त्याला देण्यात आली. एवढ्या मोठ्या बँकेचं चेअरमनपद कुणाला नको होतं? त्यात आपल्या महाराष्ट्राला विश्वासघाताची फार मोठी परंपरा लाभलेली. मासा अगदी सहजासहजी गळाला लागला. गुप्त बैठक झाली. बाकीच्या संचालकांनी भावी चेअरमनकडून आपल्याला सोयीचे, कमाईचे विभाग मागून घेतले. बापूसाहेबांना काहीतरी घडतंय याची कुणकुण लागली होतीच पण प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असंतुष्ट, महत्वाकांक्षी, दुखावलेले लोक अडचणी निर्माण करतातच हे त्यांना माहित होतं. आपल्याच गटातली माणसं आपल्याविरुद्ध कारस्थानं करताहेत याची मात्र त्यांना कल्पना नव्हती. निवडणूक झाली. अपेक्षेनुसार विरोधी पॅनल भुईसपाट झालं आणि बापुसाहेबांचं पॅनल सर्वच जागा मिळवून विजयी झालं. पदाधिकारी आणि संचालक मंडळ निवडण्यासाठी सभा झाली. सभेच्या सुरुवातीलाच ठरल्यानुसार बहुतेक जणांनी "आता वयस्कर सदस्यांनी थांबावं आणि तरुण रक्ताला संधी द्यावी" असा सुर आळवायला सुरुवात केली. सगळ्या पदांसाठी निवड झाल्यावर चेअरमनपदासाठी उत्सुक असणाऱ्या चार जणांची नांवं घेण्यात आली. ही बँकेची पध्दतच होती. त्यात हरकत घेण्यासारखं काही नव्हतं.त्याच वेळी एक सदस्य उभा राहिला आणि म्हणाला
"मला वाटतं बापूसाहेबांनी गेली पंधरा वर्ष या बँकेचं चेअरमनपद भुषवलं आहे आणि बँकेला फार मोठ्या उंचीवर पोहोचवलं आहे. त्यांच्याबद्दल आम्हांला नितांत आदर आहे. पण जशी मागणी होतेय यावेळी त्यांनी मोठ्या मनाने तरुण रक्ताला संधी द्यावी. सल्लागार म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आम्हांला यापुढेही राहील यात शंका नाही. मी यावेळी चेअरमनपदासाठी सुधाकर देशमुखांचं नाव सुचवू इच्छितो "
बाकीच्या सदस्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या सुचनेचं स्वागत केलं. बापूसाहेबांना धक्का बसला. चेअरमनपदातून त्यांना वगळण्यात येईल अशी त्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती. निवडणूक अधिकारीही अचंबित झाले. बापूसाहेबांव्यतिरिक्त कुणाचं नाव पुढे येईल असं त्यांनाही वाटलं नव्हतं कारण तसं कधी घडलंच नव्हतं. ते उभे राहिले.
"ठिक आहे. आपण बँकेच्या नियमानुसार हात उंचावून मतदान घेऊया. मी चेअरमनपदासाठी जे उत्सुक आहेत त्यांची नावं एक एक करुन घेतो."
बापुसाहेबांनाच सर्वाधिक मतदान होईल अशी त्यांना आणि बापुसाहेबांनाही अपेक्षा होती. पण अगोदरच ठरल्याप्रमाणे सगळ्यात जास्त हात सुधाकर देशमुख या नावाला वर झाले आणि बापूसाहेब हरले. सभागृहात एकच जल्लोष झाला. देशमुखांना सगळ्यांनी वर उचलून घेतलं. बापूसाहेबांचा चेहरा काळाठिक्कर पडला. सुधाकर देशमुख पुढे झाले. आपल्या भाषणांत त्यांनी सर्वांचे आभार मानले. बापूसाहेबांना संचालक मंडळात राहण्याची विनंती केली. बापुसाहेबांनी ती अर्थातच नाकारली. सर्वात विश्वासू असलेल्या सुधाकर देशमुखाने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याची त्यांना जाणीव झाली. विषण्ण मनाने ते घरी परतायला निघाले. बँकेसाठी त्यांनी केलेला त्याग, बँकेच्या प्रगतीसाठी झपाटल्यासारखी घेतलेली मेहनत, त्यामुळे कुटुंब, नातेवाईक, मित्र यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष, शेतीची झालेली हेळसांड सगळं त्यांना आठवू लागलं. आजच्या या दगाफटक्याने हे सगळं मातीमोल करुन टाकलं होतं. विचारा-विचारात घर कधी आलं तेच त्यांना कळलं नाही."साहेब घर आलं. उतरताय ना?"ड्रायव्हरच्या बोलण्याने ते भानावर आले. कारचा दरवाजा उघडून ते आत शिरणार तोच ड्रायव्हरने त्यांना आवाज दिला.
"साहेब एक मिनिट" 
वळून त्यांनी ड्रायव्हरकडे पाहिलं. तो पुढे आला आणि त्याने एकदम त्यांचे पाय धरले.
"अरे हे काय करतोहेस?"
"उद्यापासून मला नवीन चेअरमनसाहेबांच्या गाडीवर जावं लागेल. माझ्याकडून काही चुकलंबिकलं असेल तर माफ करा साहेब" आणि एकदम तो रडू लागला.
"काय झालं का रडतोहेस?" बापुसाहेबांनी त्या तरुण ड्रायव्हरला जवळ घेतलं.
"साहेब या हरामखोरांनी तुम्हांला कट करुन बाजुला केलं. तुम्ही बँकेसाठी काय काय केलं याची कदर नाही ठेवली या नालायकांनी.साहेब आम्ही सगळे ड्रायव्हर आणि स्टाफ हे कळल्यावर खवळून गेला आहे. तुम्हांला सांगतो साहेब ,यांच्या बापाकडून ही बँक सांभाळली जाणार नाही. पहा तुम्ही पाच वर्षात यांचे काय हाल होतात ते."
बापूसाहेबांना त्याच्या भावना कळत होत्या. किंबहूना त्या सर्वच सभासदांच्या भावना होत्या. त्यांनी त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाले
"बघुया. योग्य-अयोग्य काळ ठरवेलच "
ते आत गेले. उत्सुकतेने सरलाताई बाहेर आल्या. आपल्या नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहून त्यांनी काय ओळखायचं ते ओळखलं. त्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून बापूसाहेबच म्हणाले.
"आम्ही आता चेअरमन नाही राहिलो, सुधाकर देशमुख नवीन चेअरमन झाले"
बापुसाहेबांचे सर्वात विश्वासू म्हणून सरलाताई  सुधाकर देशमुखांना ओळखत होत्या. त्यांना झालेल्या दगाफटक्याची कल्पना आली. अशावेळी बायका उत्तेजित होतात. नको ते प्रश्न विचारुन हैराण करतात. दगाबाजी करणाऱ्याला शिव्यांची लाखोली वाहतात. पण हे सगळं करुन काहीच साध्य होणार नाही याची सरलाताईंना जाणीव होती. त्या एवढंच म्हणाल्या
" जे होणार होतं ते झालं. तुम्ही फारसं मनावर घेऊ नका. फ्रेश व्हा. आपण जेवायला बसू"
त्या दिवसानंतर बँकेचा विषय मनातून काढून टाकायचा बापूसाहेब प्रयत्न करु लागले. वर्तमानपत्रात येणाऱ्या बँकेच्या बातम्याही वाचणं त्यांनी सोडून दिलं होतं. बँकेव्यतिरीक्तही जीवन आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली. ते अजुनही त्यांच्या काॅलेजचे अध्यक्ष होते. दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दोन हाँटेल्स फारशी चालत नव्हती. त्यांचं नुतनीकरण आवश्यक होतं. शेतीही आजकाल बेभरवंशाची झाली होती. बेरोजगारी वाढलेली असतांना कामाला मजूर मिळत नव्हते. शेतीचं उत्पन्न घटलं होतं तिकडेही लक्ष देण्याची गरज होती. बापूसाहेबांचा दिवस शेती, काॅलेज, हाॅटेल्स यात संपू लागला. असं म्हणतात की नियती जेव्हा एक दार बंद करते तेव्हा दुसरी दोन दारं उघडत असते. ही उघडलेली दारं फक्त आपल्या लक्षात यायला हवीत. बापूसाहेबांच्या ती लक्षात आली होती. बापूसाहेबांचं चेअरमनपद गेलं आणि त्यांच्या जीवावर चालणाऱ्या सामाजिक संस्थाही हळूहळू बंद पडू लागल्या. त्यांच्या समाजाची संस्था बापूसाहेबांनी मृतावस्थेतून पुनर्जीवित केली होती. संस्थेचे अनेक कार्यक्रम बँकेच्या प्रायोजकत्वावर चालायचे. बापूसाहेबांचं चेअरमनपद गेल्यावर बँकेने त्यांना प्रायोजकत्व देणं बंद केलं. संस्थेच्या संचालकांमध्ये दुसरीकडून प्रायोजकत्व मिळवण्याची धमक नव्हती. संस्थेचे कार्यक्रम बंद पडले. याचा ठपका संचालकांनी बापूसाहेबांवर ठेवला आणि त्यांना अध्यक्षपदावरुन काढून टाकलं. एक एक संस्था हातातून जात असतांना बापूसाहेब हे सगळं निर्विकार मनाने पहात होते. वाघ जखमी झाला की त्याच्या शिकारीवर जगणारे कोल्हे वाघाची किंमत ठेवत नाहीत याचा अनुभव ते घेत होते. खोट्या मोठेपणासाठी आपण ही बांडगुळं पोसली याचा त्यांना आता पश्चाताप होत होता. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी बापुसाहेबांकडे प्रचंड गर्दी असायची. बँकेचे संचालक, कर्मचारी, हाॅटेल, काॅलेजचा स्टाफ, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची नुसती रेलचेल असायची. सगळ्यांना चहा काॅफी देतादेता सरलाताई थकून जायच्या. रात्री बारा वाजेपर्यंत लोकांची ये जा सुरुच असायची. आता मात्र लोकांच्या या समुद्राला ओहोटी लागली होती. मागच्या वर्षी तर बोटावर मोजण्याइतकी माणसं आली होती. नाही म्हणायला जुने विश्वासू सहकारी अजुनही यायचे पण त्यांची संख्या अतिशय कमी होती शिवाय त्यात सातत्यही नव्हतं.
     काळ कुणासाठी थांबत नाही. बँक सोडून बापूसाहेबांना आता साडेचार वर्षं होत आली होती. बापूसाहेब आता चांगलेच रुळले होते. या दरम्यान त्यांच्या काॅलेजला उत्कृष्ट काॅलेजचा पुरस्कार मिळाला. नुतनीकरणामुळे हाॅटेलचा दर्जा वाढला होता. धनाढ्य लोकांची लग्न, समारंभासाठी पहिली पसंती त्यांच्या हाॅटेलला मिळू लागली. कमी पाऊस पडूनही विविध तंत्रज्ञानामुळे आणि चांगल्या नियोजनामुळे बापुसाहेबांच्या शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं होतं. पुढच्या वर्षी बँकेची निवडणूक होती. आपण उभे राहिलो तर नक्कीच निवडून येवू याची बापूसाहेबांना खात्री होती मात्र बँकेचं राजकारण कोणत्या वळणावर गेलंय हे सांगता येत नव्हतं. निवडून आलो तरी विद्यमान संचालक मंडळ त्यांना चेअरमनपदाची संधी देईलच याची खात्री देता येत नव्हती.
   संध्याकाळी बापूसाहेब तयारी करुन एकटेच देवीच्या मंदिरात गेले. देवीच्या पाया पडतांना " आई भवानी या वर्षी तरी माझं चेअरमनपद मला परत मिळू दे" असं मागणं मागायची त्यांना तिव्र इच्छा झाली पण का कुणास ठाऊक, मागणं मागतांना त्यांची जीभ काही रेटली नाही. आपट्याच्या पानांचं "सोनं " घेऊन ते परतले. सरलाताईंनी नेहमीप्रमाणेच घर छान सजवलं होतं. अंगणात सुंदरशी रांगोळी काढली होती. आयुष्यात प्रथमच बापूसाहेबांनी ती रांगोळी निरखुन पाहिली. त्यांना ती फार आवडली. घरात आल्यावर ते सरलाताईंना म्हणाले देखील.
"व्वा फार सुंदर रांगोळी काढलीये आणि घरही छान सजवलंय."
सरलाताई हसल्या
"अहो त्यात नवल ते काय? दर दसऱ्याला असंच असतं आपलं घर. यावर्षी तुम्ही लक्ष देऊन पाहिलं म्हणून तुम्हांला ते जाणवतंय." 
     लग्न होऊन आता तीस वर्षं लोटली होती आणि बायकोतल्या कलागुणांची आपल्याला आता ओळख व्हावी याची बापूसाहेबांना खंत वाटली. हळुहळू काॅलनीतले रहिवासी, काॅलेज, हाॅटेलचा स्टाफ सोनं द्यायला घरी येऊ लागले. इतक्या फुरसतीने बापूसाहेब त्यांच्याशी पहिल्यांदाच गप्पा मारत होते. मग नातेवाईकांची येजा सुरु झाली. बापूसाहेबांचं चेअरमनपद जाऊन आता चार वर्ष झाली होती तरीसुध्दा "बापूसाहेब तुम्ही आता चेअरमन नाही ना?परत कधी आहेत निवडणुका? परत चेअरमन व्हायचे तुमचे चान्सेस किती आहेत?"असे प्रश्न वारंवार विचारुन जखमांवर मीठ चोळण्याचे प्रकार चालुच होते. चेअरमन असतांना बापूसाहेबांचे वारंवार वर्तमानपत्रात झळकणारे  फोटो, बातम्या पाहून कुणी कौतुक केल्याचं बापूसाहेबांना आठवत नव्हतं. ते प्रश्न ऐकून संताप येत असतांना देखील बापूसाहेब हलकसं हसून टोलवाटोलवी करत होते. तुमचं उत्तम चालू असतांना कुणाला त्यात इंटरेस्ट नसतो पण थोडंसं काही वाईट होऊ द्या, चांभारचौकशा करुन उपदेशाचे डोस पाजण्यात नातेवाईकांना असुरी आनंद मिळत असतो हे त्यांना माहीत होतं. साडेनऊ झाले. आता कुणी येणार नाही या विचाराने सरलाताई स्वयंपाक करायला किचनमध्ये गेल्या. तेवढ्यात बाहेर दोनतीन गाड्या पाठोपाठ उभ्या राहिल्याचा आणि त्यानंतर गेट उघडण्याचा आवाज आला. कोण आलं या विचारात असतांनाच मंडळी आत आली.
"येऊ का आत बापूसाहेब?"
बँकेचे २-३ संचालक आणि  १०-१२ अधिकारी आल्याचं पाहून बापूसाहेबांना आश्चर्य वाटलं.
"या या बसा" असं म्हणून बापूसाहेब बसत नाही तोच एक संचालक त्याच्यासमोर हात जोडून उभे राहिले .
"बापूसाहेब माफ करा.आम्ही चुकलो.आता बँकेला संकटातून तुम्हीच बाहेर काढू शकता"
"संकट? कसलं संकट आलंय बँकेवर?"
"कमाल करता बापुसाहेब !पेपरमधल्या बातम्या नाही वाचल्या तुम्ही?"
दुसऱ्या संचालकाने आश्चर्याने विचारलं.
"नाही. गेली चार वर्ष मी बँकेच्या बातम्याच वाचत नाही."
"बापूसाहेब बँकेची स्थिती अतिशय नाजुक झालीये. खेड्यापाड्यातल्या बऱ्याचशा शाखा बंद पडल्याहेत. एटीएममधे खडखडाट आहे. भ्रष्टाचार बोकाळलाय. कुणी कुणाचं ऐकेनासं झालंय. कर्जांची वसुली जवळपास बंद झाली ये आणि मुदत ठेवींचे पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदार रोज येऊन भांडणं करताहेत. कर्मचाऱ्यांचे पगार दोनदोन तीनतीन महिने करता येत नाहियेत "
"अहो तुम्ही पण तर संचालक आहात. का नाही तुम्ही पदाधिकाऱ्यांना खडसावत?"
बापूसाहेब संतापून म्हणाले.
"अहो चेअरमनच भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालताहेत म्हंटल्यावर आम्ही तरी काय करणार?"
" आणि तुम्ही?" कर्मचारी युनियनच्या अध्यक्षाकडे पाहून बापूसाहेब म्हणाले "तुमची युनियन काय करतेय?"
"साहेब आम्ही त्यांना नोटीस दिलीये. आमचे पगार रेग्युलर झाले नाहीत तर आम्ही संपावर जाणार आहोत."
बापुसाहेबांनी कपाळावर हात मारुन घेतला.
"अहो बँकेच्या भल्यासाठी कुणी काहीच करणार नाही का? बापरे फार भयंकर परिस्थिती आहे. बँकेची केवढी बदनामी होत असेल. नाही? पण हे एवढं झालं कसं?"
"बापूसाहेब, तुम्ही निघालात आणि बऱ्याच ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढून घ्यायला सुरुवात केली. त्यात संचालक मंडळात गटबाजी सुरु झाली. कुणी कोणताही निर्णय घ्यायला लागलं. चेअरमनसाहेबांचा कुणावर वचक राहिला नाही. अधिकाऱ्यांना कुणाचे आदेश पाळायचे हे समजेनासं झालं."
क्षणभर शांतता पसरली. थोड्या वेळाने एकजण म्हणाला.
"बापूसाहेब येत्या जुलै-आँगस्टमध्ये निवडणुका आहेत. यावेळी तुम्हीच चेअरमन होणार हे नक्की. बॅंकेला तुमच्याशिवाय पर्यायच नाही बापूसाहेब"
"हो बापुसाहेब आमच्यावर दया करा आणि परत या. तुम्हीच या संकटातून बॅंकेला वाचवू शकता "
"ठिक आहे. मला कळवत रहा. बघुया काय करता येईल ते "
"खुप खुप धन्यवाद बापुसाहेब" सगळे उठून बापूसाहेबांच्या पाया पडू लागले.
त्यांना निरोप देऊन बसत नाही तोच बऱ्याच संस्थांचे पदाधिकारी येऊन बसले. विषय तोच, बंद पडलेल्या किंवा निष्क्रिय झालेल्या संस्थांना सक्रीय कसं करायचं ! थोड्या वेळाने त्यांच्या समाजाच्या संस्थेचे कार्यकर्ते आले.बापूसाहेबांची माफी मागून म्हणाले.
"बापूसाहेब तुम्ही परत एकदा बँकेचे चेअरमन होणार अशी बातमी सध्या पसरलीये. झालं गेलं विसरुन जा. आम्ही सर्वांनी तुम्हांला परत एकदा अध्यक्ष करायचा निर्णय घेतलाय."
"सध्याच्या अध्यक्षांचं काय?"
"अहो त्यांना काय अध्यक्ष म्हणायचं? चार वर्षात एकही कार्यक्रम घेतला नाही त्यांनी. कुणाकडून शंभर रुपये आणायचीसुध्दा लायकी नाही त्यांची."
बापूसाहेब हसले. आपल्यामागेही हे असंच आपल्याबद्दल बोलत असतील याची त्यांना खात्री होती. तेवढ्यात बँकेतल्या विरोधी पॅनलचे लोक आले. त्यांना पाहून बापूसाहेब आश्चर्यचकीत झाले.
"बापूसाहेब तुमच्याच विश्वासू मित्रांनी तुमच्याशी दगाबाजी केली. बघितलंत ना काय धुळधाण उडवली बँकेची. आता त्या पॅनलमध्ये जाऊच नका. आमच्या पॅनलमध्ये या. आपण त्यांना धडा शिकवू. यावेळी विजय आपलाच आहे आणि हो आमचे चेअरमन तुम्हीच बरं का !"
 बापूसाहेब फक्त हसत होते.
चहा पिऊन ते सगळे गेल्यावर सरलाताईंनी स्वयंपाकाला सुरुवात केली. टेबलावर ताटं घेतली तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बापूसाहेबांनी स्वतःच उठून दार उघडलं. बाहेर सुधाकर देशमुख आणि चारपाच पदाधिकारी उभे होते.
"बापूसाहेब ssss"जोरात ओरडून देशमुखांनी बापूसाहेबांना मिठी मारली आणि ते रडू लागले. त्यांच्या खोट्या रडण्याची बापूसाहेबांना मोठी गंमत वाटली.
"बापूसाहेब आमच्याकडून फार मोठा अपराध घडला. चपलांनी मारा बापूसाहेब आम्हांला पण तुमच्यापासून दुर करु नका. नको आम्हांला ते चेअरमनपद. त्याच्यावर खरा हक्क तुमचाच आहे बापूसाहेब."
बापूसाहेबांनी सगळ्यांना बसवलं. सरलाताईंनी पाणी आणलं.ते पिऊन देशमुख म्हणाले
"बापूसाहेब आम्ही असं ऐकतोय की तुम्ही विरोधी पॅनलकडून निवडणूक लढवताय?"
बापुसाहेब सावध झाले. पण तोंडावर हसू आणून म्हणाले
"तसं काही नाही. त्यांच्याकडून ऑफर आलीये. बघुया काय निर्णय होतो ते"
"नाही बापुसाहेब. आपल्या पुर्वीच्या मित्रांना दगा देऊ नका आणि आम्ही म्हंटलंय ना आमचे चेअरमन तुम्हीच !करुन पाहिलं आम्ही. नाही जमलं तुमच्यासारखं."
"हो बापूसाहेब तुमच्यासारखं कुणीच नाही. तुम्हीच बॅंकेचे खरे तारणहार आहात " एक पदाधिकारी मध्येच तोंड खुपसत म्हणाला.
"ठिक आहे. मी तयार आहे. पण संचालक मंडळात मी माझ्याच पसंतीची माणसं घेणार.चालेल?" देशमुखांकडे रोखून पहात बापुसाहेब म्हणाले. देशमुखांसह सगळ्यांचेच चेहरे भकास दिसू लागले. सत्तेची हाव काही जात नाही हे बापूसाहेबांच्या लक्षात आलं.ते हसले.
"अहो मी गंमत करत होतो. एवढं सिरीयस होऊ नका"
त्यांनी असं म्हंटल्यावर प्रचंड हशा पिकला. सगळे त्यांच्या परत पाया पडून निघाले.
जेवणाच्या ताटावर बसल्यावर सरलाताई म्हणाल्या
"वा आज तर मजा आली. परत एकदा चेअरमन बनणार तुम्ही. खुप खुश असाल ना?"
बापूसाहेब गंभीर झाले.
"नाही सरलाजी, आम्ही उलट आज सिमोल्लंघनाचा निर्णय घेतलाय."
" सिमोल्लंघन? म्हणजे? मी नाही समजले"
"आम्ही या बँकेच्या राजकारणातून आणि समाजकारणातून निवृत्ती घेऊन सामान्य माणसाचं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलाय"
"काय सांगताय? अहो पण कशासाठी? आता आलीये ना संधी परत चेअरमन बनायची? ती सोडायची कशाला?"
सरलाताईंनी आश्चर्याने विचारलं.
"नाही सरलाजी, आम्हांला नाही व्हायचं चेअरमन. तुम्हीच विचार करा, इतिहासच काय अगदी रामायण, महाभारताच्या काळापासून अनेक मोठमोठे राजे, महाराजे आले आणि गेले. मुघल आले ते गेले, इंग्रज या देशातून जातील असं वाटत नव्हतं त्यांनासुद्धा जावं लागलं."
"अहो ते तर होणारच. जगात शाश्वत असं काय आहे?"
"मी तेच तर म्हणतोय. एवढ्या मोठमोठ्या सम्राटांना सत्ता सोडावी लागली. मी तर एका सहकारी बँकेचा साधा चेअरमन. मी का सत्तेची हाव करायची? या बँकेच्या कल्याणाकरता मी रक्ताचं पाणी केलं. कुटुंब, नातेवाईक, शेती, स्वतःचं सुख यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही समजदार आणि खमक्या होत्या म्हणून सगळे नातेसंबंध टिकून राहिले. मुलं चांगल्या मार्गाला लागली. एवढं सगळं करुन शेवटी मला काय मिळालं? जरा कुठे बँकेचे चांगले दिवस आले होते तर या नालायक लोकांनी सत्ता माझ्या हातातून हिसकावून घेतली आणि खड्यासारखं मला बाहेर फेकून दिलं.आज त्यांची अवस्था वाईट आहे तर माझे पाय धरताहेत."
"जगरहाटी अशीच असते बापूसाहेब. सत्ता असली की शिरजोर व्हायचं, सत्ता गेली की लाचारी दाखवायची"
"मला वीट आलाय या स्वार्थी लोकांच्या टोळ्यांचा."
"पण मग हा तुमचा उलटा प्रवास होईल. शिखराकडून पायथ्याकडे"
"शिखरावर कोण टिकून राहिलंय आजपर्यंत सरलाजी? मोठमोठे अभिनेते, खेळाडू, पाच वर्षापुरतीचे पंतप्रधान, राष्ट्रपती सगळ्यांना याच अनुभवातून जावं लागतं."
"पण म्हणून कुणी हातात येणारी संधी किंवा सत्ता सोडून देत नाही."
"मान्य ! पण खुर्चीला किती चिकटून रहायचं,गात्रं थकलेली असतांनाही तिच्यावर बसून रहायचं की धडधडीत असतांना तिला रामराम ठोकायचा हे आपण ठरवायचं असतं. पंधरा वर्षात आपण बँकेचा एक रुपया कधी घरी आणला नाही. ती पंधरा वर्ष आम्ही बँकेला वाहून टाकली. वैयक्तिक सुख,आनंद याकडे लक्ष दिलं नाही. मागची चार वर्ष आम्ही विस्कटलेली घडी नीट बसवण्यात घालवली. आता ती घडी आम्हांला बिघडू द्यायची नाहिये. आता आम्हांला वीट आलाय या स्वार्थी, संधीसाधू राजकारणाचा. आम्ही चेअरमन नाही झालो तर काय होईल? विरोधी पॅनल सत्तेवर येईल. त्यांनीही बँकेला सांभाळलं नाहीतर बँकेला टाळं लागेल. समजा आमचं काही बरंवाईट झालं असतं तर यांनी काय केलं असतं? एक अजून लक्षात घ्या सरलाजी, या जगात कुणाचं कुणावाचून अडत नाही. बँकेचंही होईल सगळं व्यवस्थित. एवढंच होईल की त्यात काही वर्ष निघून जातील."
सरलाताई निशब्द झाल्या.बापूसाहेबांच्या विचारात तथ्य होतं.
"पण मग तुम्ही ठरवलंय तरी काय?"
"खड्डयात गेली ती बँक आणि खड्डयात गेल्या त्या संस्था. मला आता सामान्य माणसाचं आयुष्य जगायचंय. आज मी बाजारात गेलो होतो. खुप आवडलं मला तसं जगणं. खुप वर्षात आपण सहलीला गेलो नाहिये. परदेशात जायची तुमची इच्छा आहे ना? चला आपल्या मुलीकडे जर्मनीत जाऊ. तिच्या बाळांना बघून बरेच दिवस झालेत. तिथून संपूर्ण युरोप बघून येवू. आपले चिरंजीव काय म्हणताहेत? लावा बरं त्याला फोन. मला आपल्या नातीशी बोलायचंय"
"अहो आता रात्रीचे अकरा वाजलेत.झोपली असेल ती"
"असू द्या. मुलगा,सुनबाईशी तरी बोलून घेऊ"
सरलाताईंनी मुलाला फोन लावला. मुलाशी बोलून त्या सुनेशी बोलल्या आणि एकदम ओरडून बापुसाहेबांना म्हणाल्या
"अहो आनंदाची बातमी आहे. सुनबाई गरोदर आहेत"
"काय सांगता काय? द्या फोन आम्हांला"
सुनेचं अभिनंदन करुन ते म्हणाले
"सुनबाई तुमच्या पहिल्या बाळंतपणाला आम्ही येऊ शकलो नाही. पण यावेळी तुम्ही काही काळजी करु नका. तुम्हांला सातवा महिना लागला की आम्ही दोघंही येवू.आणि तुमचं बाळंतपण झाल्यावर आमचा नातू वर्षाचा होईपर्यंत तिथंच राहू. आम्हांला आता आजोबांचं कर्तव्य पार पाडायची ओढ लागलीये."
त्यांच्या मुलाने फोन घेऊन त्यांना बँकेबद्दल विचारलं.
"आता बँकबिंक काही नाही. आता फक्त कुटुंब. आम्ही आता युरोपला जातोय. तिकडून आलो की येतोच तुमच्याकडे. आमची नात जागी आहे वाटतं. थांबा जरा मी व्हिडीओ काॅल करतो "
आणि मग व्हिडीओ काॅल सुरु करुन ते पिटुकल्या नातीशी बोलत बसले. तिचं ते गोड बोलणं, चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहून त्यांना त्यांच्या मुलांच्या बालपणाची आठवण आली. त्या आठवणीने त्यांना एकदम भरुन आलं. शेवटी आपल्या नातवांमध्येच तर आपण आपली मुलं बघत असतो. त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले. पण त्यांनी ते थांबवले नाहीत. सामान्य माणसाचं जीवन खरंच सुखद असतं याचा त्यांना प्रत्यय येऊ लागला होता.

©️ दीपक तांबोळी
      9503011250
(ही कथा माझ्या " हा खेळ भावनांचा " या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करायला माझी हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी  क्रुपया वरील क्रमांकावर संपर्क करावा )

1546. पॉलिसी

     ऑफिसमधून बाहेर पडून घरच्या रस्त्यावर असताना नेहमीचा स्टॉप सावंत चष्मेवाल्यांचा. आज पण अरुण सावंतच्या दुकानासमोर गाडी उभी केली आणि बॅग घेऊन आत गेलो. नेहमीसारखी अरुणची चेष्टा केली एवढ्यात चष्म्याची काडी तुटली म्हणून आलेला एक माणूस मला म्हणाला ‘‘काय ओ तुम्ही एलआयसीवाले मा...!’’ मी म्हटले - होय. काय तुमची पॉलिसी काढायची आहे काय? ‘‘नाय ओ माझ्या बायकोचा कायतरी काम आसा, तिची पॉलिसी मोडूची आसा बहुतेक, तुम्ही आमच्या घराकडे येशात एकदा?’’ मी म्हटले - ठीक आहे, मी जातो तुमच्या घरी, पॉलिसीचा काय प्रॉब्लेम आहे बघतो. तुम्ही कुठे रहाता? असे विचारुन मी त्याचा पत्ता घेतला. 
चार दिवसानंतर दौलतनगर भागात मी गेलो होतो. मला त्या दिवशी सावंत चष्मेवाल्याच्या दुकानात त्या माणसाकडून घेतलेला पत्ता आठवला. मी पत्ता शोधत शोधत झोपडपट्टीसदृश्य एका चाळीत पोहोचलो. अमृत कांबळीची खोली एका मुलाने लांबून दाखविली. दार लोटलेले होते. मी दारावर टकटक केली. थोड्यावेळ्याने वीस-बावीस वर्षाच्या गाउन घातलेल्या एका मुलीने दार उघडले. त्या मुलीच्या चेहर्‍याकडे मी पाहातच राहिलो आणि हा चेहरा कुठेतरी पाहिला आहे असे वाटू लागले. नुसता पाहिला नाही तर माझ्या जवळच्या ओळखीचा चेहरा होता. पण कोण असेल? कारण या भागात मी कधी आलो नव्हतो. या मुलीला आधी पाहण्याची शक्यता नव्हती. ‘‘कोण हवं?’’ ती मुलगी मला विचारत होती. ‘‘मी सामंत. एलआयसी एजंट आहे. अमृत कांबळी त्या दिवशी मला भेटले होते. त्यांनी त्याच्या बायकोचे एलआयसी संदर्भात काही काम आहे असे म्हणाले, त्यांनी पत्ता दिला म्हणून मी आता आलो.’’ ‘‘होय माझेच काम आहे एलआयसीमध्ये, तुम्ही करुन देणार काय?’’ हो, बघू तर - मी म्हणालो. 
मी आत गेलो. एका मोडक्या प्लॅस्टिक खुर्चीवर बसलो. घरात नजर टाकली. कशीबशी दहाबारा भांडी चटईवर मांडली होती. एक लहान मोरी होती. त्यात रात्रीची भांडी धुवायला ठेवली होती. एक स्टोव्ह होता. त्यावर काहीतरी शिजत होते. दोरीवर कपडे सुकत होते. एक ट्रंक होती. त्यावर कपड्याचे बोचके होते. त्या मुलीने ट्रंक उघडून एक पॉलिसी बाहेर काढली. आणि त्यावरील धुळ झटकून माझ्या हातात दिली. मी पॉलिसी हातात घेतली. ‘‘ही पॉलिसी मोडायची आहे.’’ ती मुलगी म्हणाली. मी ती पॉलिसी चाळली. आणि तिला म्हणालो - ‘‘तुमची पॉलिसी अजून २५ वर्षांनी संपणार आहे. आता ही बंद केलीत तर तुम्हाला फारसे काही मिळणार नाही. तुमचे खूप नुकसान होईल.’’ ‘‘ही पॉलिसी माझ्या आईने वडिलांच्या मागे लागून सुरु केली. पण मला आता त्याचे हप्ते भरणे शक्य नाही, मला पैशांची फार गरज आहे.’’
मी एलआयसी मध्ये गेली २५ वर्षे काम करणारा माणूस तशी सहजा सहजी ही पॉलिसी कसा बंद करु देईन.
मी थोडा विचार केला आणि तिला म्हणालो, ‘‘तुझे आई बाबा कुठे राहतात?’’ शिरोड्याला - ती म्हणाली.
काय नाव त्यांचे? ती म्हणाली - ‘‘उत्तम साळगावकर आणि आई सुवर्णा साळगावकर.’’ सुवर्णा हे नाव ऐकताच मला
काहीतरी ओळखीचे वाटले. सुवर्णा म्हणजे माहेरची कोण? मी विचारले. ‘माहेरची सुवर्णा आजगावकर.’ सुवर्णा
आजगावकर म्हणजे वेंगुर्ल्याची काय? होय - वेंगुर्ल्यात भटवाडीत माझे आजोळ. मी एकदम थरारलो. डोके
झिणझिणले. मन पंचवीस वर्षे मागे धावू लागले. 
सावंतवाडीतील कॉलेज दिवस आठवले. खेडेगावातून आलेला मी आठवलो. कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना कुणीतरी सांगितले, कॉलेजतर्पेâ आकाशवाणीवर शृतिका होणार आहे. त्यासाठी चांगले बोलू शकणारे कलाकार हवे आहेत. प्राध्यापक अवसरे हे वाचन घेत आहेत. गावात असताना छोटी मोठी नाटके करत होतो. खूप इच्छा होती आणखी काही करायची. धाडस करुन गेलो. अवसरे सर मुलांचे वाचन घेत होते. मी धडधडत्या काळजाने माझे नाव दिले. मला नाटकातला एक प्रवेश वाचायला दिला. बहुतेक सरांना माझे वाचन आवडले असावे. सरांनी दुसर्‍या दिवशी भेटायला बोलावले. सरांनी शृतिकाच वाचायला दिली. आणि उद्या संध्याकाळी ४ वाजता वाचनाच्या तालमी होतील असे सांगितले. आम्ही दोन मुलगे निवडले गेलो होतो. आम्ही सरांकडे वाचन करत होतो तेवढ्यात काळीसावळी पाणीदार डोळ्यांची तरतरीत मुलगी आणि तिची मैत्रिण हजर झाली. सरांनी आमची ओळख करुन दिली. ‘‘ही सुवर्णा आजगावकर, दुसर्‍या वर्षाला आहे.’’ ही या शृतिकेत तुम्हा दोघांबरोबर असणार आहे. सुवर्णाने माझ्याकडे पाहून हलकेसे स्मीत केले. त्यानंतर रोज सायंकाळी अवसरे सरांच्या केबीनमध्ये आमचे वाचन सुरु झाले. मी आणि सुवर्णा प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत. त्यामुळे आम्हा दोघांचे संवाद जास्त व एकत्र. दोन दिवसात लक्षात येऊ लागले मी प्रियकराच्या भूमिकेत जास्त मन लावून संवाद म्हणू लागलो आहे. सर खुश होते. त्यांच्या मनासारखे दोनही कलाकार आपल्या भूमीकेत रंगू लागले होते. मला आता सायंकाळी ४ वाजण्याची घाई होत होती. मी साडेतीन वाजताच सरांच्या केबीन बाहेर उभा राहू लागलो. माझ्या लक्षात आले सुवर्णापण हातात पुस्तके घेऊन हजर असायची. हळूच हसायची. तिची चुळबुळ सुरु असायची. शृतिकेसाठी आम्हाला पणजी आकाशवाणीवर जायचे होते. सर येणार नव्हते. कॉलेजतर्पेâ गाडीची सोय केली होती. गाडीमध्ये ड्रायव्हर आणि शृतिकेत भाग घेणारे आम्ही तिघे आणि सुवर्णाची मोठी बहीण. गाव, कॉलेज सोडून विशेष बाहेर न पडणार्‍या आम्हांला गोव्याच्या हद्दीत प्रवेश करताना कानात वारं शिरलेल्या वासरासारखी परिस्थिती झाली. गाणी काय, विनोद काय, नाटकांतले संवाद, शिक्षकांच्या नकला एकंदरीत सुवर्णा माझ्या नकलांवर आणि विनोदावर जास्त प्रतिसाद देत होती. हळूहळू तारा जुळत होत्या. 
पणजी आकाशवाणीवर रेकॉर्डिंग छान झाले. कॉलेजतर्पेâ हॉटेल टुरिस्टमध्ये जेवण झाले आणि वेळ होता म्हणून कळंगुट बीचवर जाण्याची टुुम निघाली. कळंगुट बीचवर सगळे उन्मादक वातावरण. सगळीकडे हातात बियर घेतलेले अर्धनग्न हिप्पी नाचत होते, गाणी म्हणत होते. आमच्या ड्रायव्हरने दोन बियर टीन आणले. एक स्वतः संपवला आणि एक आम्हा दोघांना. सुवर्णा आणि तिच्या बहिणीने कोकाकोला घेतला. त्या समुद्राकडे पाहत प्यायलेली ती अर्धी बियर आज कित्येक वर्षे लक्षात आहे. कळंगुट ते सावंतवाडी परत प्रवासात आयुष्यात प्यायलेली अर्धी बियर तिची किक आणि गाडीत शेजारी सुवर्णा असा योग पुन्हा आयुष्यात आला नाही. 
पणजी आकाशवाणीची शृतिका लागण्याची तारीख जवळ आली आणि कॉलेजच्या सर्व गेटवर त्याचे बोर्ड लागले. बोर्डावर माझा आणि सुवर्णाचा जवळ-जवळ फोटो लावला होता. कॉलेजमध्ये माझे आणि सुवर्णाचे नाव सर्वमुखी झाले. आणि मुलगे मला आणि मुली सुवर्णाला एकमेकांच्या नावांवरुन चिडवू लागले. तो काळ रेडिओचा होता. अजून कोकणात दूरदर्शन आले नव्हते. सिंधुदुर्गाच्या सर्व पेपरमध्ये या शृतिकेसंबंधी छापून आले. आणि घराघरात ही शृतिका ऐकली गेली. सावंतवाडीत आम्ही दोघे हिरो-हिरोईन असल्यासारखे कौतुक झेलत होतो. सर्व काही आनंदात चालले होते. पण आठ दिवसात सुवर्णात कॉलेजमध्ये यायची बंद झाली. माझी नजर तिला शोधत होती. भयंकर अस्वस्थ झालो. कुणाकडे चौकशी करावी हे कळेना. असाच केमिस्ट्री लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत होतो. तिथे सुवर्णाची मैत्रीण मला भेटायला आली. मला बाहेर घेऊन ती म्हणाली - सुवर्णाचे उद्या लग्न आहे. खरं तर सुवर्णाला तू आवडत होतास पण सुवर्णाने शृतिकेत काम केलेले तिच्या घरी सांगितले नव्हते. तिचे वडील कॉलेजात येऊन गेले. तिथे तुमचे दोघांचे लागलेले फोटो त्यांनी पाहिले. त्या रागाच्या भरात ते सुवर्णाला घरी वेंगुर्ल्याला घेऊन गेले. आणि दोन दिवसात नात्यातील माणसाशी तिचे लग्न जमवले. तिचे वडील माथेफिरु आहेत. तिच्या आईने खूप सांगून पाहिले. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. सुवर्णाने मुद्दाम मला तुझ्याकडे पाठविले. ही घे सुवर्णाची चिठ्ठी. मी चिठ्ठी उघडली. सुवर्णाने लिहिले होते. ‘‘मला विसरुन जा. नाईलाजाने मला लग्न करावे लागत आहे. माझ्या वडिलांसमोर कोणाचे काही चालत नाही. तुझ्यासारख्या मुलाबरोबर आयुष्य काढायची इच्छा होती. तुझ्यासारखा पुस्तकं वाचणारा, कविता पाठ करणारा, नाटकात काम करणारा जीवनसाथी मला हवा होता. पण आता सर्व हे विसरुन जा.’’ - सुवर्णा आजगावकर. 
सुवर्णाची मैत्रीण गेली. मी हातातील चिठ्ठी किती वेळ वाचत होतो. सुवर्णाची ही पहिली आणि शेवटची चिठ्ठी. काय करणार होतो मी? हिंदी सिनेमातल्या हिरोसारखा आदल्या रात्री घोड्यावरुन बसून हिरॉईनला पळवून नेणार होतो की भर लग्नमंडपात नवरीला उचलून नेणार होतो? जेमतेम २० वर्षाचा खेडेगावातला मुलगा काय करेल यावेळी? सुन्न होऊन बसलो होतो. गेल्या दोन महिन्यातली सुवर्णाची ओळख. पण ती खूप जवळची वाटत होती. दोन दिवस सावंतवाडी सोडून गावी आलो. आणि डोकं शांत करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णा हा विषय थांबवून अभ्यासावर लक्ष द्यायचे हे ठरविले. परीक्षा दिल्या, ग्रॅज्युएट झालो. एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसरची भर्ती होती, तिकडे अर्ज केला, परीक्षा दिली आणि एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून रुजू झालो. यथावकाश लग्न झाले. मुलगी झाली. चारचौघांसारखा संसार सुरु होता. ऑफिसमध्ये कामात प्रगती करत होतो. नवीन नवीन टार्गेट मिळत होती. ती पुरी करण्याचा आटापीटा सुरु होता. मुलीचे शिक्षण सुरु होते. मुलगी हुशार होती. पत्नी संमजस होती. जिल्ह्याच्या ठिकाणी चांगले घर झाले. गाडी आली. सर्व काही होते. पण कातरवेळी एकटा असताना सावंतवाडीच्या कॉलेजच्या जवळून जाताना सुवर्णाची आठवण होत होती. 
आणि आता समोर सुवर्णाची मुलगी हातात पॉलिसी घेऊन उभी होती, तिला पाहिले तेव्हाच वाटले होते, या मुलीला कुठेतरी भेटलोय. सुवर्णाची मुलगी थेट सुवर्णासारखी दिसत होती. फक्त थोडा रंग सावळा होता इतकेच.  मागील आठवणीतून मी बाहेर आलो आणि सुवर्णाच्या मुलीस म्हटले, ठीक आहे मी ही पॉलिसी सोबत नेतो काय करता येईल ते पाहतो आणि कळवितो. मी तिथून निघालो आणि ठरविले आता शिरोड्याला जाऊन सुवर्णाला भेटायचे. २५ वर्षे झाली सुवर्णाला पाहून कशी दिसत असेल सुवर्णा? ओळखेल का मला ती?   दुसर्‍याच दिवशी मी शिरोड्याला पोहोचलो. चौकशी करत उत्तम साळगावकरांचे घर शोधून काढले. समुद्राच्या बाजूला मच्छिमार वस्तीत त्यांचे घर होते. माझे काळीज धडधडत होते. जवळपास २५ वर्षांनंतर सुवर्णा दिसणार होती. ओळखेल का मला ती? 
मी साळगावकारांच्या घराजवळ गाडी उभी केली आणि बॅग घेऊन त्यांच्या आवारात प्रवेश केला, बाहेरच्याच बाजूला ओसरीवर साडी नेसलेली एक स्त्री तांदूळ निवडत होती. माझ्या पावलांचा आवाज ऐकून तिने मान वर केली, नजरा नजर झाली, मी सुवर्णाला एका क्षणात ओळखले. खूप फरक पडला होता सुवर्णात, जराशी स्थूल झाली होती. केस कमी आणि पांढरे व्हायला लागले होते. माझ्याकडे निरखून पाहत ती हसली. तिने मला ओळखले असावे. ‘‘ये, किती वर्षांनी आलास? जेव्हा यायचे होते तेव्हा आला नाहीस, ये आत ये.’’ मी तिच्या घरच्या ओसरीवर बसलो. तिने घरातून एक खुर्ची आणली आणि म्हणाली, बस. आज कसा काय आलास? आणि पत्ता कोणी दिला? मी म्हणालो, पत्ता तुझ्या मुलीने दिला. मी एलआयसी मध्ये नोकरी करतो. मी बॅगेतून ती पॉलिसी बाहेर काढली. तुझ्या मुलीने ही पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ही पॉलिसी अजून २५ वर्षे चालणारी आहे. आता पॉलिसी बंद केली तर त्याचे फार नुकसान होईल. फार काही रक्कम मिळणार नाही. हे सर्व मी तुझ्या मुलीला सांगितले. हप्ते वेळेवर भरुन पॉलिसी चालू ठेवण्यात तिचे भले आहे पण ती काही ऐकायलाच तयार नाही. ही पॉलिसी तिच्या वडिलांनी सुरु केली असे ती म्हणाली. मी तिच्या आई वडिलांचा पत्ता मागितला. तिने दिलेल्या पत्त्यावर मी आलो. पण इथे तू भेटशील याची कल्पना नव्हती. 
‘‘खूप उशिरा आलास, मी २५ वर्षापूर्वी तुला चिठ्ठी पाठविली होती. मला वाटलं होतं तू काही धावपळ करशील, शेवटच्या क्षणापर्यंत मी वाट पाहत होते. शेवटी बाबांपुढे कुणाचे काही चालले नाही. माझे लग्न झालेच ! माझे पती गोव्याला कामाला असतात. पण हल्ली त्यांचीपण नोकरी सुटली. निलिमा माझी एकुलती एक मुलगी. शिक्षणात काही फार हुशार नव्हती. बारावीनंतर तिने शाळा सोडली. इथून सगळे ट्रक रेडीला मायनिंग भरायला जातात. ते ट्रक ड्रायव्हर जेवायला माझ्याकडे येतात त्यामुळे त्याचे दोन पैसे आमच्या संसाराला मिळतात. अशाच एका तुमच्या शहरातील ट्रक ड्रायव्हर बरोबर माझ्या मुलीचे सूत जमले. त्या दोघांचे प्रेम पाहून मीच त्या लग्नाला पाठिंबा दिला. माझे प्रेम असफल झाले तसे तिचे व्हायला नको. मला माहिती आहे की, माझा जावई गरीब आहे पण तो प्रामाणिक आहे. माझी मुलगी कष्टाळू आहे. दोघेही मेहनत करतील. माझा नवरा तिच्या लग्नाला परवानगी देणार नव्हताच. म्हणून मीच तिला पळून लग्न करण्याचा सल्ला दिला. तिच्या बाबानी खूप आरडाओरड केला, गोंधळ केला पण शेवटी करणार काय? आता त्यांनी तिचे नाव टाकले. आता गप्प बसलेत. माझा जावई कमी शिकलेला आणि गरीब असला तरी हिंमतवान आहे तुझ्यासारखा नाही.’’
मी खाली मान घालून ऐकत होतो. तिच्या शेवटच्या वाक्याने मी शरमिंदा झालो. माझ्या हातातील पॉलिसीकडे बघून ती म्हणाली ‘‘मीच मागे लागून ह्यांना निलिमा साठी ही पॉलिसी घ्यायला लावली, आता तिला पॉलिसीचे पैसे भरता येत नाहीत. पण तू माझ्यासाठी एक काम कर ही पॉलिसी तुझ्याचकडे ठेव, या पॉलिसीचे हप्ते तू भर आणि तुझ्या शहरात निलिमासाठी नोकरी बघ. मला माहिती आहे ती फार शिकलेली नाही पण तू एवढ्या मोठ्या कंपनीत आणि मोठ्या पदावर आहेस तू तिला कुठे ना कुठे नोकरी बघशिलच.
मी मान हलवत होतो. तेव्हा ती म्हणाली, ‘‘हां आणि परत इकडे येऊ नकोस. माझ्या नवर्‍याला ते आवडणार नाही.’’
मी बॅग घेऊन बाहेर पडलो. गाडी स्टार्ट करता करता दोन गोष्टी ठरविल्या. मी निलिमासाठी नोकरी पाहणार होतो आणि पॉलिसीचे पुढील सर्व हप्ते मीच भरणार होतो.

प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...