बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

1457. मूर्तीचे विसर्जन…अमूर्ताचा प्रवास !

आज अनंत चतुर्दशीला ठिकठिकाणचे श्रीगणेश विसर्जित होताहेत. ‘विसर्जन’ म्हणजे काय, हे काय सांगणारा श्री स्वानंद पुंडशास्त्रीं यांचा अप्रतिम लेख…
सर्जन आणि विसर्जन 
हा प्रकृतीचा स्वभाव आहे!
दूरचित्रवाणीवर गणेशविसर्जनाचा सोहळा सुरू होता. चिरंजीवांचा त्यांच्या बालबुद्धीनुसार स्वाभाविक असा प्रश्‍न होता
“इतके दिवस पूजा केलेल्या बाप्पाला पाण्यात का बुडवायचं?” 
पुढचा प्रश्‍न अधिक सखोल- 
“बाप्पा मरणार नाही का?” 
प्रश्‍न हसू येण्यासारखाच होता. आता त्याला, ‘परमेश्वरी सत्तेचं अमरत्व’ वगैरे सांगून उपयोग नव्हता. त्याच्या पातळीवरून सुरू केलं…
आमची प्रश्‍नोत्तर मालिका सुरू झाली…
“बाप्पाची मूर्ती कशाची बनवली?”
तो म्हणाला, “मातीची.” 
“आपण माती कुठून घेतली?” 
“शेतातून.” 
“आता पाण्यात टाकल्यावर मूर्तीचं काय होतं?” 
“ती विरघळते.” 
“विरघळल्यावर माती कुठे जाते?” 
“पाण्यात.” 
“पाण्यासोबत कुठं जाते?” 
“सगळीकडे.” 
“आता आपला बाप्पा दिसतो का?” 
“नाही.” 
“पण, त्याची झालेली माती सगळीकडे दिसते की नाही?” 
“हो.” 
“या मातीत बाप्पाची माती आहे की नाही?” 
“हो.” 
“म्हणजे ही मातीच आता बाप्पाची माती आहे की नाही?” 
“हो.” 
“म्हणजे ही मातीच आता बाप्पा आहे की नाही?” 
“हो.” 
“कालपर्यंत बाप्पा एका मातीच्या गोळ्यातच दिसत होता… बरोबर?” 
“हो, बरोबर!” 
“आता बाप्पा कसा झाला?” 
त्यानं त्याच्या बालसुलभ आनंदासह घोषणा केली- 
“बाप्पा मोठ्ठा झाला!” 
तो उड्या मारत निघून गेला.
—🌼—
बालशैलीचं एक जाऊ द्या… पण, विसर्जनाचं विज्ञान हेच आहे! मूर्ती कितीही सुंदर असली, तरी ती ‘माध्यम’ आहे. माध्यमात अडकणं, ही मर्यादाच आहे! 
मूर्ती ही माध्यम आहे, अमूर्ताच्या उपासनेचं! अमूर्ताला थेट गवसणी घालता येत नाही म्हणून ‘आलंबन’ रूपात मूर्ती घडवली.
लहान बाळाला थेट चंद्र दिसत नाही. मग आई म्हणते…
‘तो पाहा फांदीच्या मागे!’ 
फांदी ‘माध्यम’ आहे लक्ष केंद्रित करण्याचं. तशीच मूर्ती हे ‘माध्यम’ आहे मनाला केंद्रित करण्याचं! 
अनेक स्थानी विखुरलेल्या ‘त्याला’ मूर्तीच्या ठायी केंद्रित करायचं आणि मग मूर्तीच्या द्वारे अमूर्ताकडे न्यायचं’, हेच मूर्तिपूजनाचं रहस्य आहे.
मूर्ती मातीचीच असते. या व्रताला ‘पार्थिव गणेशव्रत’ म्हणतात. पृथ्वीची, मातीची ती ‘पार्थिव’. तिचं विसर्जन जलातच व्हायला हवं. 
(प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वा त्यानिमित्ताने होणार्‍या पर्यावरणाच्या र्‍हासाच्या ओरड्याशी धर्मशास्त्राचा कवडीचाही संबंध नाही. धर्मशास्त्र प्लास्टरची मूर्ती सांगतच नाही. सांगूही शकत नाही. कारण, धर्मशास्त्र लिहिलं तेव्हा हा पदार्थच नव्हता! मूर्तिकारांच्या सोयीकरिता आलेल्या या विषयाकरिता धर्मशास्त्राला वेठीस धरणं निरर्थक आहे. ३६४ दिवस काहीही न करता एक दिवसच पर्यावरणाचा उमाळा येणंही हास्यास्पद आहे आणि त्याकरिता धर्मशास्त्राला गृहीत धरणं तर सर्वस्वी गैर आहे! भारतीय संस्कृतीही निसर्गपूजक संस्कृती आहे. ती पर्यावरणाला जोपासते. नाशाचा तर प्रश्‍नच येत नाही.)
मातीची मूर्ती जलात विसर्जित. कारण, जलतत्त्व हे मृत्तिकातत्त्वापेक्षा अधिक व्यापक आहे. 
‘भूमी-आपो-अनलो-अनिलो-नभ:’ ही अथर्वशीर्षात वर्णिलेली चढती विकासयात्रा आहे. 
'मूर्तिविसर्जन'. 
‘भूमी’पासून आरंभ करत ‘भूमा’ अर्थात असीम, अनंतापर्यंत जाणं आहे, 'विसर्जन'!
विसर्जन मूर्तीचं आहे, मूर्ततेचं आहे. मूर्ताचा त्याग करत अमूर्तात परमात्म तत्त्वाचं दर्शन घेणं आहे, 'विसर्जन'!
सान्त मूर्तीला विरघळवून अनंताशी नाळ जोडणं आहे, 'विसर्जन'!
साकाराला द्रवीभूत करत निराकाराला गवसणी घालण्याची मनीषा आहे, 'विसर्जन'!
संतश्रेष्ठ नामदेवरायांना स्वत: पंढरीनाथांनीच तीर्थयात्रा करायला लावत, ‘अणुरेणूत मीच आहे’, हा जो संदेश दिला, तो आचरणात आणण्याची पद्धती आहे, 'विसर्जन'!
सर्जनातून पार्थिवत्त्वापर्यंत आलेल्या निर्मितीला उलट्या दिशेनं फिरवत पुनरपी मूळ आत्मरूपात सुस्थिर होण्याच्या साधकाच्या अन्तर्यात्रेचे प्रतीक आहे, 'विसर्जन'!
कणाकणात ईश्वरी सत्तेच्या विश्वरूपदर्शनाचा मार्ग आहे, 'विसर्जन'!

🌷 जय गजानन! 🌷

~ श्री स्वानंद पुंडशास्त्री

1456. आपले आवडते देवाचे नाम जप करत असेल त्यांना

 "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती. 
आता तिला एकेक आठवू लागले.
***
 ती एक ५५ वर्षीय स्त्री. तिला एक लग्नाला आलेली एक मुलगी आणि कॉलेजात जाणारा एक मुलगा. छान चौकोनी कुटुंब होते. करोना काळात नवरा गेला आणि हे तिघेच राहू लागले. तेव्हा तिची आईही तिला सोबत म्हणून येऊन राहू लागली होती. तसा तिचा गोंदवल्याचा अनुग्रह ४५ व्या वर्षी झाला होता. नवऱ्यानेही नंतर घेतला. राहता राहिले मुलगा मुलगी.. ते ही जरा मोठे झाल्यावर त्यांनाही महाराजांनी आपले म्हटले होते. घरात रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाली की रामरक्षा, रामपाठ, रामहृदय, विष्णुसहस्त्रनाम, म्हणून नंतर कान्होबाला, रामरायाला , महाराजांना दूध देऊन आरती केली जायची. मुलांनाही ही सवय लागली होती. रोज एक तास सगळे आपापल्या वेळेनुसार जपाला बसायचे आणि रात्री एकत्रित नामसंकीर्तन करायचे. हा रोजचाच परिपाठ होता. पण नवरा गेल्यावर तिचे नाम जरा जास्तच उत्कटतेने होऊ लागले होते. 
गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत झाल्याने तिला कालच ज्युपिटर हॉस्पिटलला ICU मध्ये  ऍडमिट करण्यात आले होते. नाका-तोंडात नळ्या घालण्यात आल्या होत्या. डॉक्टर मिनिटामिनिटाला पल्स चेक करत होते. एकीकडे मॉनिटर, इकेजी मशीन ची टिक टिक ऐकू येत होती. एकूणच भयावह वातावरण झाले होते. 
"आई आई ग! डोक्यातली कळ सहन होत नाहीये". ती दोन्ही हातांनी डोके दाबून धरत कण्हत होती. सलाईनमधून पेन किलर देऊनही कळा थांबत नव्हत्या. आई तिला शांत करत होती. "बाळ, नाम घ्यायला सांगितले आहे ना महाराजांनी. मनातल्या मनात नाम चालू ठेव बरं ! काही होणार नाही तुला. महाराज आहेत पाठीशी, हे बघ तुला महाराजांचा अंगारा लावते. आणि तोंड उघड बघू जरा.. हे समाधीचे तीर्थ आणले आहे , ते देते. ! 
डायबेटीस असल्याने मेंदूतला रक्तस्त्राव थांबत नव्हता.अन त्यामुळे मेंदूला सूज आलेली होती.  दोन डॉक्टर, १ नर्स ची टीम तिच्याभोवती थांबली होती. त्यांनी तिच्या आईला बाहेर थांबायला सांगितले होते. तिची मुलगी, मुलगा ही बाहेर उभे होते.
"काय बरे आई म्हणत होती? "श्रीराम जयराम जय जय राम" , महाराज " .... आणि डोक्यात एकच जीवघेणी कळ उठली. भोवळ डोळ्यापुढे अंधार दाटला. मशीनवरची टिकटिक एकसलग येऊ लागली. आणि झालं.. डॉक्टरांची पळापळ सुरु झाली. "Sister, ward boy .. keep OT ready! Check BP First ! आपल्या रक्तपेढीतून बी पॉजिटीव्ह रक्ताच्या ६ बॉटल्स लगेच मागवून घ्या. स्ट्रेचर आणा ताबडतोब!  "त्यांनी लगोलग ऑपरेशनचा निर्णय घेतला. चार तास ऑपरेशन चालले. 
ऑपरेशन थिएटर बाहेर तिची आई, मुलगा मुलगी तिघेही महाराजांचा धावा करत जप करत बसले होते. थोड्याच वेळात मुख्य डॉक्टर बाहेर आले.  ' हे बघा..आम्ही आमच्या लेव्हलला प्रयत्न केलेत पण  प्रमाणाबाहेर रक्तस्राव होऊन ब्लड क्लॉटिंग झाल्याने आणि ब्लड शुगर लेव्हल लो झाल्याने  she is now in deep unconsciousness state . थोडक्यात तिचा मेंदू झोपी गेला आहे. हा पिरियड म्हटले तर दोन दिवसाचा ही असू शकतो आणि म्हटले तर ३ महिनेही ... अन म्हटले तर अनेक वर्ष ही जाऊ शकतात. 
दोघा मुलांवर जसे आभाळ कोसळले.. तिची आई मटकन खाली बसली. मुलगी आज्जीच्या कुशीत येऊन हुंदके देत रडू लागली. मुलगा सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसला.   
*
डोळ्यापुढे अंधारी आल्याबरोबर तिला वेदनांची जाणीव नष्ट झाली. या स्थितीत खूप वेळ गेल्यावर तिला आपला देह पिसासारखा हलका झाल्याची जाणीव होऊ लागली. संवेदना नव्हत्याच.. हा पिसासारखा देह आता तरंगत अंतराळात विहरु लागला होता. इथून जाता जाता तिला तिची हतबल होऊन बसलेली आई दिसली, रडणारी गोजिरवाणी लेकरे दिसू लागली... काडी काडी जमवून केलेला संसार, कित्येक वर्ष घराचे कर्ज घेऊन नुकतेच आता कर्ज फिटून पूर्णपणे तिच्या नावावर झालेला तिचा आटोपशीर फ्लॅट, हे सगळं सगळं दिसू लागले. इथून निघताना हे सगळे इथेच सोडून जायचे असते. बरोबर काहीही न्यायची मुभा नाही. हो ! नाही म्हणायला एक गाठोडे तिच्या पाठीला बांधून दिल्यासारखे वाटले. चाचपून पाहिले तर त्यात आजवर केलेले नाम आढळले. "  .... इथून फक्त नामच न्यायची परवानगी आहे तर,"ती मनाशी उद्गरली. 
दोन आडदांड काळेकभिन्न दूत आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण अंधाऱ्या, खोल, अश्या अंत नसलेल्या भुयारातून जात आहोत.. या स्थितीत किती काळ गेला कुणास ठाऊक. अचानक गुहेच्या तोंडाशी डोळे दिपतील असा लख्ख प्रकाश दिसू लागलाय. खूप वेळ अंधारातून चालल्याने अचानक आलेला हा प्रकाश डोळ्यांना असह्य होतोय.. त्याची सवय व्हायला वेळ लागेल असे उगाचच तिला वाटून गेले. त्यामुळे बाजूचे दोन्ही अस्तित्वाच्या चेहर्यावर प्रखर प्रकाश आल्याने तेही दिसत नाहीयेत. 
अचानक एक झटका लागावे तसे एका सिंहासनाच्या समोर आपल्याला उभे केलय. सिंहासनावर बसलेली व्यक्ती या दोघांपेक्षा क्रूर दिसत आहे. बाजूला मोठेच्या मोठे अवाढव्य बाड घेऊन बसलेली व्यक्ती, त्या बाडमध्ये डोके खुपसून बसली आहे. तेवढ्यात ती सिंहासनाधिष्टीत व्यक्ती अगम्य भाषेत बाडधारी व्यक्तीला काहीतरी विचारते. बाड धारी व्यक्ती सगळा हिशेब मांडते. आपल्याला कळेल अश्या भाषेत सगळा पाप- पुण्याचा हिशेब सांगितला जातोय. "महाराज, सुमारे १३५० वेळा दुसऱ्याचे मन दुखावणे, १७७५ वेळा परनिंदा,  २१० वेळा खोटेनाटे बोलून, लाच देऊन, दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन  काही मिळवणे, ५७ वेळा प्राण्यांना इजा करणे, ८५ वेळा फुकटचे घेणे अश्या गोष्टी सदरहू महिलेच्या नावावर आहे. 
आता तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्याचा भूतकाळ झळकू लागला. गतायुष्यातली कर्मे लख्खपणे समोर आली. 
पुन्हा तो बाडधारी त्या क्रूर दिसणार्या व्यक्तीच्या कानाला लागला. आता पुण्यकर्म किती केली आहेत त्याची यादी. १५ वेळा भुकलेल्याला अन्नदान केले, २२ वेळा वृद्धास सहकार्य केले, दरवर्षी मन्दिरात दानधर्म, आणि नामजप केलेला आहे. वयाच्या ४५व्या वर्षी सद्गुरूंचा अनुग्रह ... रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार .  १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला.  नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. 
तेवढ्यात एक दूत सिंहासनाधिष्टित व्यक्तीशी बोलताना ऐकू येते," महाराज, वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे. सिंहासनाधिष्ठित व्यक्ती ताडकन उठून तिथेच नमस्कार करते. आणि विचारते, काय निरोप आहे? 
आणि ते दोघे त्यांच्या कानाला लागतात. पुन्हा अगम्य भाषेत खूप वेळ बातचीत झाल्यावर, सगळ्या गोष्टीचा उहापोह झाल्यावर मग ते निर्णयावर येतात आणि तिला जवळ बोलावून म्हणतात, " हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती. 
"जी महाराज ' एवढेच अस्पष्टसे तिच्या तोंडून उद्गार निघाले. 
तरीही आम्ही तुला तुझ्या नामस्मरणाच्या पुण्यबळावर एक संधी देत आहोत. पृथ्वीवर जाण्यापूर्वी तुझी काही इच्छा आहे काय? त्यानुसार जन्म मिळेल. नसेल तर तुझ्या उर्वरित कर्तव्यपूर्तीची संधी म्हणून आहे त्याच देहात परत जावे लागेल. एका लोकांतून दुसऱ्या लोकात जाताना आत्म्याकडे इच्छा विचारतात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. 
" मला माझ्या सद्गुरूंना परमपूज्य ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांना भेटण्याची इच्छा आहे. " ती एवढेच बोलू शकली. 
यावर पुन्हा त्यांची अगम्य भाषेत चर्चा झाली. तिला सिंहासनासमोर आणण्यात आले. 'हे बघ, तुझे सद्गुरू येथून अंतराळात खूप दूरवर आहेत. त्यांना भेटण्याइतकी पुण्याई तुझी नाही.  फक्त एक करू शकतो... त्यांनी पोह्चवलेले १३ जीव .. जे ज्येष्ठ शिष्योत्तम होते अश्या साधकांशी आम्ही तुझी भेट घडवू शकतो. फक्त ६० विपळे. 
"विपळे म्हणजे?' तिने उत्सुकतेने विचारले. 
"इथे काळाची परिमाणे वेगळी आहेत. तरीही सांगतो. भारतीय कालमापनानुसार एक पळ म्हणजे ६० विपळे. थोडक्यात एक पळ म्हणजे तुमचे २४ सेकंद. फक्त २४ सेकंद तुला त्यांना भेटायची परवानगी आहे, मंजूर आहे?." समोरून उत्तर आले. तिने होकारार्थी मान हलवली. 
"ए, कोण आहे रे तिकडे? या बाईंना इथून ३३ अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या 'अँड्रोमीडा सुदर्शन 'आकाशगंगेवरील 'सिग्नेट बी ' ताऱ्यावर घेऊन जा. 
आपले डोळे बांधण्यात आल्याची जाणीव तिला आज पहिल्यांदाच झाली. बरोबर पुन्हा तेच दोन काळेकभिन्न व्यक्तित्व. अंधारात किती काळ अवकाशात तरंगत होते कुणास ठाऊक. काही वेळातच ते एका मोठ्या दालनात उभे होते. दोन्हीही दूत दालनाच्या दारात हात मागे घेऊन जरा अदबीने झुकून उभ्या राहिले . तिच्या डोळ्यावरचा कपडा दूर झाला. सुरवातीला धुक्यासारखे काहीतरी दिसले.. ते धुके दूर झाल्यावर तिला एकेक सूक्ष्मदेह दिसू लागले. 
सगळ्यांच्या हातात जपमाळ होत्या. सगळे गोलाकार बसलेले होते. आता पूर्वी कधीतरी फोटोत पाहिलेले एकेक चेहरे दिसू लागले. 
अरे बापरे, हे तर पूज्य भाऊसाहेब, त्यांच्या बाजूला पूज्य तात्यासाहेब, ... पु. रामानंद महाराज, पलीकडे पूज्य आनंद सागर महाराज, आणि चक्क पु प्रल्हाद महाराज, पु. जिजामाय, आणि इतरही श्रीमहाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिलेले असे १३ सूक्ष्मदेह तिथे होते. विशेष म्हणजे सर्व जण ध्यानमग्न होते. 
तिने भीत भीतच सर्वांना " जय श्रीराम " म्हणून साष्टांग नमस्कार घातला. 
"बाळ... " धुक्यातुनच एक हाक कानावर आली. पु. तात्यासाहेब बोलत होते. ती नखशिखांत हादरली. 
"बाळ, आज तुझे जन्मजन्मांतरीचे नामाची पुण्याई फळाला आली म्हणून इथे येण्याची संधी तुला मिळाली. पृथ्वीवरील गुरुपौर्णिमेचा आज दिवस आणि आज श्रीमहाराज इथे आता भेट देणार आहेत. तुला जी २४ सेकंद भेटण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच."
"महाराज, महाराज...तिने आर्ततेने हाक मारली. 
भानावर आल्यावर "इथे पू. बुवा दिसत नाहीत"!! तिने चाचरत विचारले. 
"बाळ, महाराजांच्या जवळच्या ताऱ्यावर त्यांचे वास्तव्य आहे. 
श्रीमहाराजांचे वास्तव्य इथून सुदूर लोकात आहे. इथून ४२८ लक्ष महापद्म अंतरावर असलेल्या "केनिस बटू- जी या चक्राकार आकाशगंगेतील केप्लर या सूर्यमालेतील 'एपसिलोन  विराट' या जीवसृष्टी असलेल्या ताऱ्यावर त्यांचे सध्या वास्तव्य आहे. आणि तिथे त्यांचा नामाचा प्रसार सुरु आहे. पृथ्वीवर जसे त्यांचे १११ वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतरचे तुमचे पृथ्वीवरचे आताचे २०२४ साल म्हणजे १११ वर्ष वास्तव्य विराट ताऱ्यावर झाले. लवकरच त्यांची तेथील अवतारासमाप्तीची तिथी आलेली आहे. त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य कुठे असणार हे ते स्वतः ठरवणार आहेत. तत्पूर्वी इथे आज ते भेट देणार आहेत. तुला त्यांचे दर्शन होईलच.
 
आणि एकाएकी एक अत्यंत प्रखर, डोळे दिपून जातील असा  आगीचा लोळ तिथे येऊन कोसळतो. त्यातून सहस्ररश्मीला लाजवेल असे तेज:पुंज , तेजस्वी,सुवर्णकांती, प्रसन्न चेहऱ्याचे असे श्रीमहाराज  दिसू लागतात. कपाळावर त्रिपुंड, पीतवर्ण, उंचेपुरे, गळ्यात रुद्राक्ष माळ, पुष्पमाला, अंगात पांढरी शुभ्र कफनी , डोक्यावर गणेश टोपी असे  श्रीमहाराज दमदार पावले टाकीत पुढे होतात. . सर्वजण साश्रू नयनांनी साष्टांग दंडवत घालतात. 
श्रीमहाराज प्रत्येकाची जातीने चौकशी करतात, ख्याली खुशाली विचारतात. अन सर्वात शेवटी तिच्याकडे वळून म्हणतात, "माय, श्रीरामरायाने तुझ्यावर कृपा करून तुझे आयुष्य आणखी १५ वर्षांनी वाढवले आहे बरं. तू आता जोमाने नामाला लाग. तुमच्या मनात काय चालले आहे ते तुम्हाला कळत नाही, तितके मला कळते. त्यामुळे दुश्चित्त होऊ नका. तुम्ही दुश्चित्त झालात की मी इकडे अस्वस्थ होतो. भगवंताच्या इच्छेने आपला प्रपंच चालला आहे असे समजा. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका,मी तुमचा भार घेतला आहे, असे समजा. मनापासून मला हाक मारा, तळमळीने नाम घ्या की मी तुमच्या जवळच आहे याचा प्रत्यय तुम्हाला येईल. तुम्ही नाम घ्या की मी तुमच्या जवळच घुटमळत असतो. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला मीच प्रेरणा देत असतो, तुमच्या कानाने मीच ऐकतो असे समजा, बरे का बाळ! "
" जी " डोळ्यांतुन ओघळणारे अश्रू ती आता थोपवत ही नाहीये. 
"महाराज....  एक विनंती! ती कसेबसे उच्चारते. 
महाराज, आपल्या मुखातून 'श्रीराम जयराम, जय जय राम' हे ऐकण्याची इच्छा आहे.  एक माळ जप आपल्यासोबत.... !  
" हो हो "सगळे जण एकमुखाने मान्यता देतात.  "आम्ही तुमच्या मागून म्हणतो". 
धीरगंभीर आवाजात श्रीमहाराज सुरु करतात, "श्रीराम जय राम, जय जय राम " ... श्रीराम जयराम जय जय राम.... श्रीराSSSSSम जयराSSSSSम  जय जय राSSSम!
सगळे जण श्रींचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांच्यामागोमाग म्हणत आहेत. आणि श्रीमहाराज स्वतःच्या हृदयावर हात ठेवून उपस्थित प्रत्येकाकडे दोन क्षण प्रेमाने कृपादृष्टी टाकत म्हणत आहेत,  "श्रीराSSSSSम जयराSSSSSम  जय जय राSSSम!" जणू काही म्हणत आहेत, माझ्या हृदयातले प्रेम मी तुम्हाला देतो आहे. 
***
तब्बल तीन महिने १३ दिवस महिने उलटून गेलेत तिच्या कोमात जाण्याला. हॉस्पिटलमध्ये रोज येऊन तिच्याजवळ बसून त्रिकाळ जप करण्याचा परिपाठ आजही तिच्या आईने, मुलाने, मुलीने सुरु ठेवला आहे. सकाळ संध्याकाळ रात्र असे तिघांनी वाटून घेतलेत. आजही तिची आई तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन नाडीवर बोट ठेवून जप करतेय. आणि एकाएकी तिची बोटे हलू लागल्याचे तिच्या आईच्या ध्यानात येते. 
"सिस्टर.....? डॉक्टर...? इकडे या! हे बघा... " अश्या हाका मारत लगबगीने आई बाहेर धाव घेते. . पुन्हा आत लेकीजवळ येते. तिची बोटे आता हातात माळ फिरवावी तशी हलू लागली आहेत. आणि तिच्या मुखातून अस्पष्टसे उद्गार बाहेर येऊ लागलेत. आई, तिच्या तोंडाजवळ आपला कान नेते तर "श्रीराम..." असा खोल खोल गेलेल्या आवाजात अस्पष्टसा उच्चार ऐकू येतो. जाणिवेच्या प्रांतात ती परत येत होती..! आई तर आनंदाने वेडीच होते.  डॉक्टर येऊन तपासतात, आणि तिथेच किंचाळतात, " Oho, Oho ...  Its a miracle ... तिच्या आईला खांद्याला धरून गदागदा हलवत म्हणत आहेत, "आई, तुमचा पेशंट आज कोमातून बाहेर येतोय! त्यांच्या मुलीला, मुलाला कळवा.. ! डॉक्टर स्वतः  आनंदाच्या  घाईघाईने हॉस्पिटलमध्ये सर्वांना कळवायला निघतात. 
ती परत आली ... पण आता भरपूर नाम घ्यायचे आणि हे उर्वरित आयुष्य नामाला वाहून घ्यायचे हा निश्चय करूनच. श्रींनी दिलेले १५ वर्षाचे बोनस आयुष्य ती आता प्रपंचाच्या इतर भानगडी मध्ये वाया घालवणार नव्हती, कारण त्यातले  काहीही बरोबर येणार नव्हते, फक्त नामच बरोबर येते याची तिला खात्री पटली होती. ! 
एव्हाना आय सी यु मधील चार नंबर बेडवरचा कोमातला पेशंट साडे तीन महिन्यांनी शुद्धीवर येतोय ही बातमी अख्ख्या हॉस्पिटलभर पसरली होती.
**
जय श्रीराम ! 
~महाराज कन्या नयना
परमपूज्य श्री नाना महाराज 
कृपाभिलाशी 
मिलिंद दीक्षित

1455. हृदयशल्य !

 तो केवळ दहा वर्षांचा असताना त्याला प्रेमाचा नव्याने शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं ! वडील नवल आणि आई सुनी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटा उरला. डोक्यावर केवळ छप्पर असून चालत नाही.मायेची सावली लागते माणसाला. 
आई-बाप हयात असतानाही त्याच्या वाट्याला हा असा पोरकेपणा आलेला होता. सोबत एक धाकटा भाऊ होता पण धाकटा. मग तो स्वत:च स्वत:चा वाटाड्या झाला. निवृती,ज्ञानदेव,सोपान यांना आईची जागा घेणारी मुक्ताई होती. याला मात्र आपल्या मनालाच मुक्ता बनवून ‘साही अपराध जनाचा’ असं स्वत:ला म्हणावं लागलं. 
आईने आपला स्वतंत्र संसार नव्याने मांडला. तिच्या आईच्या आईने मग या दोघा भावांना आपल्या पदराखाली घेतलं. दत्तक घेतले गेले त्याला.
 नियतीने त्यांच्या आयुष्याची तुटलेली दोरी एक गाठ मारून पुन्हा सांधण्याचा हा प्रयत्न होता. 
पैशांची कमतरता म्हणजे काय हे ठाऊक नसलेल्या घरांत बालपण गेल्याने सुदैवाने या माणसाला जगण्यासाठी संघर्ष नाही करावा लागला. पण त्याच्या भावनिक आयुष्यात फक्त एकच स्त्री होती ती म्हणजे त्याची आजी. तिच्या सावलीतून जरासे बाहेर निघून तो परदेशी गेला..स्वत:च्या पायांवर उभं राहायला. देखणा,राजबिंडा तरुण. सालस,सभ्य आणि आपल्या आजोबांकडून नर्मविनोदी स्वभावाची देणगी लाभलेला. त्याच्या प्रेमात कुणी न पडेल तेच नवल. परदेशात शिकत असताना एक अमेरिकन तरुणी त्याच्या आयुष्यात आली. प्रेमाचे रंग दाही दिशांना पसरले. भारतीय प्रेम आणि पाश्चिमात्य प्रेम यात फरक असतो हे त्याच्या तोवर ध्यानी आलं नव्हतं. पश्चिमेकडे व्यवहार सर्वाधिक वरची जागा पटकावून असतो त्यांच्या जगात. हा मात्र अस्सल भारतीय माणूस. ज्याला आपलं मानलं त्यासाठी आपलं सर्वस्व अगदी हक्कसोड पत्र करून देऊन मोकळा होणारा. त्याला परदेशी जाऊन सहा-सात वर्षे झाली होती. आणि याच दरम्यान त्याच्या मायेचा पदर इथं विरत चालला होता. आज्जी खूप आजारी पडू लागली. तिने सांगावा धाडला. आणि त्याच दरम्यान भारतावर युद्धाच्या ढगांनी गर्दी केली. त्याने प्रेयसीला लग्नाचे वाचन दिले होतेच. आणि ती सुद्धा तयार होती. पण परिस्थिती बदलली आणि तिचे व्यावहारिक संस्कार तिला बदलायला पाडू लागले. भारतात कायमचे राहायला जायचे,शिवाय तिथे तर युद्धाची स्थिती आहे. जीवनाचा भरवसा नाही,सुखाची शाश्वती नाही. तिच्या पालकांनी तिला पायाजवळ पहायाला उद्युक्त केलं आणि तिने मग दूरवर पाहण्याचं बंद केलं......त्याची प्रेमकहाणी विवाहात परावर्तीत होण्याआधी समाप्त झाली. तिच्यासाठी हा निर्णय अगदी नैसर्गिक होता. पण याने मात्र आपल्या काळजातील एक मोठा कप्पा कायमचा दुखावून घेतला होता. 
तो आला तसा इथलाच झाला. आजी,धाकटा भाऊ यांच्या सहवासात त्याने आपले एकाकीपण कमी केले..पण ही त्याची त्याने काढलेली समजूत होती. 
कौटुंबिक व्यवसायात त्याने स्वत:ला इतके बुडवून घेतले की काळजाला वैय्यक्तिक आयुष्याचा विचार करण्याची सवडच गावेना. स्वत:चं घर वसवण्याचं जणू तो विसरत चालला होता. उद्यमशील स्वभाव शांत बसू देईना.....लक्ष्मी प्रसन्न होतीच आता ती त्याच्याकडेच कायम वस्तीला आली होती. 
लाखो लोकांच्या संसाराशी आता तो नकळत बांधला गेला. मालक कामगारांचा पगार कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. हा मात्र पगार किमान चांगला असलाच पाहिजे या भूमिकेत असताना प्रत्यक्ष आपल्याच व्यावसायिक सहका-यांशी वाद घालणारा निघाला आणि आपले म्हणणे पटवू शकणाराही निघाला.
काळीज करपलेलं असलं की ते आपल्या मनाविरुद्धही कुठेतरी ओलावा शोधत असतं. त्याच्याही मनाच्या कोरड्या रानात काही श्रावणसरी बरसल्या...पण नशिबाचं ऊन नेमकं त्याच वेळी ऐन भरात होतं. संसार उभारायच्या अगदी जवळ असताना नियतीने त्याचा पाय अनेकदा मागे खेचला....त्याला प्रचंड मोठ्या संसाराला हातभार लावायचा होता बहुदा. आणि वैय्यक्तिक एकल संसारासाठी त्याला वेळ द्यावा लागला असता...ते नियतीने टाळले. मोठ्या हितासाठी नशीब छोट्या स्वप्नांचा असा बळी घेते! 
अगदी तसंच झालं.....देश-विदेशात त्याने व्यवसायाचं जाळं उभारलं. 
नवं जंगल उगवू लागलं की हळू हळू रोपे मोठी होतात,त्यांची झाडं होतात,त्यांना बहर येतो,कळ्या उमलू लागतात आणि मग फुलपाखरे आली की जंगल संपूर्ण होतं.....अनेकांचं आश्रयस्थान बनतं.
हा आता स्वतःच एक मोठा वृक्ष बनला होता. त्याला स्वत: आणखी उंच व्हावं लागलं. पण म्हणून सूर्य सर्वाधिक झेलला तो यानेच. त्याच्या छायेखाली मात्र गडद थंड सावली होती. आणि या सावलीत जो आला तो कधीच माघारी फिरला नाही. आज असे लाखो संसार त्याच्या आधारावर उभे आहेत. लाखो रुग्ण त्याच्या देणग्यांच्या आधारे जगले. अर्थाअर्थी थेट संबंध नसतानाही त्याने अगणित माणसांना जगवले आणि त्यांच्यात आपले प्रेम शोधले...नव्हे प्राप्त केले. माणसासोबत त्याने प्राणीमात्रही मित्र मानले.   
आपल्या मनातील प्रेमाच्या,त्यागाच्या,समर्पणाच्या भावनेला त्याने एक अलौकिक आभाळ दिलं....त्यात त्याने जमिनीवर राहून मनानेच विहार केला. आपल्या शब्दांतून एकाकीपणा सहसा जाणवू दिला नाही. तो प्रत्येकाला आपला वाटला आणि तरीही त्याचं स्वत:चं रक्ताचं होण्याचं भाग्य कुणाला लाभलं नाही....! हे प्राक्तन! पण यामुळे त्याचा अंश आता मागे उरला नाही. 
तो जणू कर्ण कलियुगातला. त्याने श्रीमंतीची कवच कुंडले कुणी न मागताही समाजाला दिली...एका हाताचं दान दुस-या हातालाही समजू नये याची नेहमी काळजी घेतली. स्वत:चं म्हणावं असं कुणीही मागे न ठेवता या जगाचा निरोप घेणारा मात्र सा-या देशाला स्वत:चं करून गेला....हा त्याला नियतीने दिलेला न्याय म्हणावा लागेल. 
रतनजी टाटा....नावाला साजेसं कर्तृत्व करून दाखवण्याचे भाग्य तुम्ही मिळवलेत....विश्व जाले वन्ही....संते आपण व्हावे पाणी....हे मुक्ताईचे शब्द त्यांनी जगून दाखवले....भारतमातेच्या कंठातील एक अनमोल रत्न निमाले!
(संभाजी बबन गायके. 9881298260.)

माहिती समाज माध्यमांतून साभार.
या लेखाचे भाववाचन सौ.सुवर्णा बोडस (आकाशवाणी निवेदिका) यांनी खूप छान केले आहे. त्याची link हवी असल्यास पाठवेन.



1454. अगतिक मातृत्व

      दुपारचा दिड वाजत आला होता. आज सुमनला सकाळची धुण भांड्यांची काम आटोपुन घरी जायला जरा वेळच झाला होता. चार वाजता तीला परत सिन्हा बाईंकडे कीटी पार्टी असल्यामुळे कामावर जायचे होते, तीला सध्या काळजी लागली होती ती घरी एकटा असलेल्या आपल्या पोराची, दिपकची. सुमनचा नवरा रिक्षा चालवायचा त्यामुळे त्याची घरी येण्याची अशी ठराविक वेळ नव्हती. दिपकचे सगळे काम सुमनलाच करावे लागत असे.दिपक, सुमनचा मुलगा तेवीस, चोवीस वर्षांचा होता.आता एवढ्या मोठ्या मुलाची कसली काळजी करायची?  बाब त्याच्या वयाची नव्हती.  तो सामान्य मुलांसारखा नसल्यामुळे काळजीची होती. तो वयाने आणि शरीराने जरी वाढला होता तरी बुद्धीने विकसीत नव्हता. तो अॅबनाॅर्मल होता. त्याचे मन व बुद्धी अगदी चार पाच वर्षांच्या मुलासारखी होती. त्याला आपल्या शरीराचे अजिबात भान नसायचे. कपडे घालून देण्यापासुन ते अगदी त्याला आंघोळ घालुन देण्यापर्यंतची सगळी काम सुमनला करावी लागत होती. त्याला समज अशी नव्हतीच. तो सगळयांच्या टिंगल टवाळीचा विषय होता. दिसायला जरी बरा असला तरी ओंगळवाणा असल्यामुळे त्याच्याजवळ फारसं कोणी येत नसे. लोकांच सोडा पण त्याचा बापही त्याच्याकडे ढुंकून पहात नसे. त्याची सगळी जबाबदारी संपुर्णपणे सुमनवरच होती. तो कसाही असला गलीच्छ, गचाळ, अजागळ, अर्धवट तरी तीचा पोटचा गोळा होता., ती आई होती त्याची. सुमन भरभर चालत घरात शिरली. तीला घरचे सगळे काम आटोपुन परत जायचे होते.
    तीने पटकन चुलीवर पाणी गरम करायला ठेवले. पाणी गरम होईतोवर तीने आपल्या घराच्या दोन छोट्या खोल्या आवरुन घेतल्या.  घर कसले, पडवीवजा झोपडीच होती ती.  नंतर गरम पाणी बादलीत काढुन तीने दिपकला आंघोळ घालण्यास बसवले. पण आज तो नेहमीसारखा सामान्य वाटत नव्हता. त्याच्या डोळ्यात चमत्कारिक भाव होते. आज दिपक सहजासहजी सुमनला ऐकत नव्हता. सुमनला त्याच्या असल्या वागण्यात काही विशेष जाणवल नाही, तो असा हट्टीपणा कधीकधी करायचा. तीच्या डोक्यात फक्त दिपकचे आवरुन परत सिन्हा बाईककडे कामावर जाण्याचा विचार चालु होता त्यामुळे तीने दिपकला रागावुन जबरदस्तीने आंघोळीला बसवले आणि ती त्याला आंघोळ घालायला लागली त्यासरशी त्याने तीचा हात धरुन "नको त्या जागी" लावायला सुरुवात केली. त्यासरशी सुमन एकदम दचकली, ती भानावर आली. आज तीची तीलाच लाज वाटली, ती जरी दिपकची आई होती तरी ती प्रथम एक स्त्री होती. आज तीला पहिल्यांदा दिपकचा खुप राग आला. संताप अनावर होऊन तीने त्याला खुप मारले. पण दिपकला त्यातले काहीच कळत नव्हते. आज शरीरधर्माने आपले काम बजावले होते. निसर्गनियमानुसार त्याच्यातील नर शरीराने जागृत केला होता. दिपकला जर एवढी समज असती तर तो वेडा राहीलाच नसता. आईने कशाला मारले हेदेखील त्याला कळले नाही. मुकाट्याने आईजवळ येऊन तीच्या हातातील टाॅवेलने अंग पुसायचा त्याचा प्रयत्न चालला होता. सुमन मात्र गलितगात्र होऊन त्याच्याकडे नुसतीच पहात बसली होती.
      कसबस स्वतःला सावरुन सुमनने दिपकला स्वच्छ केले. त्याला कपडे घालुन पलंगावर बसवले आणि त्याला जेऊ घालुन ती घराला कुलुप लावुन सिन्हा बाईंकडे कामाला गेली.आज तीचे चित्त थारयावर नव्हते. काही केल्या तीच्या डोक्यातुन दिपकच्या कृतीचा विचार जात नव्हता. कोणाला सांगायची देखील सोय नव्हती. ती रात्री उशिरा घरी आली तर तीचा नवरा नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आला व सुमनची कसलीही चौकशी न करता तीने सिन्हा बाईकडुन आणलेला डबा स्वतःच फस्त केला. पलंगावर लोळागोळा होऊन पडलेल्या दिपककडे रागाने एक कटाक्ष टाकुन तो अंगणात जाऊन झोपला. सुमनला त्याला दुपारची गोष्ट सांगायची होती पण तीचा नवरा ऐकण्याच्या अवस्थेतच नव्हता. त्यादिवशी सुमन ओक्साबोक्षी खुप रडली पण तीला सावरायला कोणीच आल नाही.  दुसरया दिवशी सुमनने आदल्या दिवशीची गोष्ट नवरयाला सांगितली तसा तो संतापुन उठला व दिपकला लाथाबुक्क्यांनी तुडवु लागला. दिपकला प्रतिकारदेखील करता येत नव्हता. तो नुसता एखाद्या ढोरासारखा ओरडत होता. त्याची ती केविलवाणी अवस्था पाहुन शेवटी सुमनच आडवी आली व तीने नवरयाला थांबवले तसा दिपक एखाद्या लहान निरागस मुलाप्रमाणे तीच्या कुशीत शिरला व रडु लागला. त्याच्या डोळ्यातील गरम अश्रुं सुमनच्या हातावर पडले व त्या अश्रुंनी तीचे मन पिळवटुन टाकले. पण तीला दिपकला आवरणे भाग होते कारण त्याच्या त्या एका कृतीने तो पुरुष असल्याचे सिद्ध केले होते. सुमनला काय करावे तेच सुचत नव्हते. दिपक सुमनच्या मांडीवर डोक ठेवुन रडत रडत झोपी गेला होता, त्याचा बापही अंगणात बाजेवर घोरत पडला होता.झोप फक्त सुमनलाच येत नव्हती. 
     असेच सात आठ दिवस गेले. दिपकला मार बसल्यानंतर तो शांत झाला आहे अस सुमनला वाटल पण नाही. त्याच्यातील त्या विकृतीने परत डोक वर काढल होत. इतक्यात तो पहीलेपेक्षा जास्त सुमनला त्रास देऊ लागला. त्याला तीचा स्पर्श समजत होता पण आता आई म्हणुन नाही तर एक स्त्री म्हणुन  त्याच्या शरीराला नैसर्गिक लिंगभेद समजायला लागला होता. सुमन त्याच्यासमोर एकटीच दिसत असल्यामुळे व ती त्याला जास्त जवळची असल्यामुळे तीचा त्रास वाढला होता. सुमन त्याला मार मार मारायची पण तो रात्री लहान बाळासारखा कुशीत शिरुन झोपला की सगळं विसरायची. परंतु दिवसेंदिवस जसजशी त्याची विकृती बळावली तशी सुमन मनोमन धास्तावली. तीला आता दिपकसोबत एकट राहण्याची भीती वाटु लागली होती. तीच्या नवरयाला या तीच्या लाचार परीस्थितीशी काहीच घेणदेण नव्हते. तीला कुठेतरी मन मोकळं करायच होत. 
     दिवसेंदिवस दिपक जास्त आक्रमक होत चालला होता. सुमनला आता स्वतःपेक्षा जास्त तीच्या शेजारी राहणारया लहान मुलींची काळजी वाटत होती. सुमन तरी दिपकला मारुन मुटकुन गप्प करायची पण त्याने जर लोकांच्या पोरीबाळींवर अतिप्रसंग केला तर काय करायचे हा प्रश्न तीला जास्त सतावत होता. तीच्या मनातील भीती एक दिवस खरी ठरली. ती कामावर गेली असतांना तीच्या शेजारची मुलगी सहज दिपकला पहायला त्याच्या घरात डोकावली तर दिपकने तीला गच्च पकडुन ठेवली. घाबरल्यामुळे ती मुलगी मोठमोठ्याने रडायला, ओरडायला लागली त्यासरशी तीचे आई वडील धावत तीथे आले आणि दिपकला त्या अवतारात पाहुन संतापले, त्या मुलीच्या वडीलांनी जे हातात मिळेल त्याने दिपकला मारले.संध्याकाळी सुमन घरी आल्यावर तुमची पोलिसांत तक्रार करतो म्हणुन धमकावुन गेले. तो सगळा प्रकार खरच लाजिरवाणा होता. आता सुमनला आपली ममता बाजुला ठेवून दिपकला शिक्षा देणे अनिवार्य होते. दुसरया दिवशी ती मनाशी एक निर्धार करुनच उठली. तीने सकाळीच दिपकला घेऊन पोलीस स्टेशन गाठले.तीने ठाणेदार साहेब व त्यांच्या पुर्ण स्टाफसमोर आपली कर्मकहाणी सांगितली, तीचा नवरा काय करतो म्हणुन पोलीसांनी विचारले तर ती बोलली," साहेब, तो रिक्शा चालवतो, दिवसाला शंभर दिडशे कमावतो, अर्धे पैसे दारुत गमावतो व उरले सुरले तर घरात देतो, मी आपली लोकाचे धुणीभांडी करुन यांना पोसते." तीची सगळी परीस्थिती समजल्यावर तीथे उपस्थित असलेल्यांची मन हेलावली. तीच्या नवरयाला तीथे बोलावुन घेतल्यानंतर विचारपुस केली तर तो निर्लज्जपणे म्हणाला," साहेब, सुमनलाच जास्त पडल होत या पोट्टयाच. हा झाला तेव्हापासुनच असा आहे, मी इला म्हटल की दुसर मुल होऊ दे तर ही यालाच बाबु, सोन्या करत बसली. हा देवाच रुप आहे यालाच आपण वागवु म्हणाली, मंग आता काय ? वागव म्हणाव, आपल्या करणीची फळ भोगतीया, मी काय करणार याच्यात?" त्याने अस म्हणताच तीथे उभ्या असलेल्या एका अधिकरयाने त्याच्या कानफटात एक मारली, त्यासरशी तो चवताळुन सुमनला म्हणाला," इथ मला बोलावून कशाला आपली इज्जत दाखवतिया? मी म्हणल तेच खर आहे, हे पोलीस काय करणार या दिपकच? यांच्याकडबी याच्यावर उपाय नाही आहे, हे सोंग आपल आपल्यालाच निभवाव लागणार आहे," ते सगळं ऐकुन तीथे जमा असलेल्या सगळयांचीच मन सुन्न झाली. खरच त्यांच्थाकडे तरी या समस्येवर काय तोडगा होता? हे सर्व होत असतांना दिपकच्या गावी काहीच नव्हतं, तो आपल्याच दुनियेत होता. सुमनला राहावल गेल नाही, ती बोलती झाली," साहेब,  नशिबाने काय भोग मांडुन ठेवलेया पहा, एक पोरग दिल ते अस. ज्याला स्वतःच्या राहण्याची, खाण्यापिण्याची अक्कल नाही पण त्याच्यातल जनावर मात्र जागेवर आहे, त्याला बाकी काही समजत न्हाई पण समोरची बाई समजते. त्याला " देवरुप" मानुन मी लहानाच मोठ केल, त्याच सगळं अगदी हागण्या, मुतण्यापासुन ते आंघोळ घालुन देण्यापर्यंत सगळं सगळं केल. हा देवरुप होता. याचच करण्यात आयुष्य जाईल म्हणुन नवरयाने म्हटल तरीबी मी दुसर मुल होऊ दिल नाही. यालाच देव मानलं पण याच्यासोबत नशिबाने एक राक्षसपण जन्माला घातला आहे, हे मला त्यावेळेस समजलं नाही. याच्यातल्या देवासोबत मी एका सैतानालापण मोठ करत होते हे मला आत्त्ता समजल. याने पहील्यांदा मला जेव्हा आई न समजता बाई म्हणुन पाहील. माझा हात याने याच्या शरीराच्या नको त्या ठिकाणी लावला तेव्हाच मला समजल की हा आता देव न्हाई राहीला, याच्यातला सैतान आता जागा होणार. मला त्या दिवशी याच्या अशा वागण्याने रात्रभर झोप आली नाही. पण काय करावे ते समजत नव्हते. मी एक दिवस घरी नसतांना याने शेजारच्या लहान मुलीसोबत तोच प्रकार करायचा प्रयत्न केला. मी न याच्या बापाने, त्या पोरीच्या बापाने लाथाबुक्क्यांनी तुडवला याला. एखाद चार पायाच जनावर असत तर मारुन टाकल असत पण हा माणुस आहे. माझा पोटचा गोळा आहे. हा कसाबी असला तरी माझा खुप जीव आहे याच्यावर. मारुन तर टाकु शकत नाही, आई आहे ना मी, पण दुसरया कोणी याला मारण्या अगोदर तुम्ही तरी याचा काहीतरी निर्णय करा. मला याच काय कराव ते समजल न्हाई म्हणुन तुमच्याकडे आले. मला तुमच्याकडे बोलुन लई हलकं वाटतया आत्ता. मला काही मदत करता आली तर पहा." तीच ते बोलण ऐकुन ते सगळेच अधिकारी, काॅन्स्टेबल्स भारावले. तीथले एक अनुभवी वरीष्ठ अधिकारी तीला दिलासा देत म्हणाले," बाई, तुम्हाला पटत असेल तर बघा, या तुमच्या मुलाला तुम्ही मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या संस्थेच्या कडे सोपवुन देऊ शकता." सुमनला ते  कितपत समजल ते तीच तीलाच माहीती पण साहेब काहीतरी चांगलं करायला सांगतात आहे हे मात्र तीला समजल. तीने आपल्या दिपकच्या भल्याकरता लगेच होकार दिला. त्या साहेबांनी एका त्यांच्या माहीतीतल्या अशा संस्थेला फोन लावुन बोलावुन घेतले व सुमनची सर्व परीस्थिती त्यांना सांगितली. दोन दिवसांनी सुमनला तुमच्या घरी त्या संस्थेचे लोक येतील म्हणुन सांगितले. 
  त्या दोन दिवसांत सुमनने दिपकला नवीन कपडे आणले, त्याला चांगल चांगल गोडधोड करुन खाऊ घातले, आपल्या कुशीत त्याला घट्ट बिलगुन घेत झोपली. तीचा जीव एकीकडे तो जाणार म्हणुन आक्रंदत होता आणि दुसरीकडे त्याच काहीच तरी कल्याण होईल म्हणुन आनंदलापण होता, तीची द्विधा मनःस्थिती होती. त्या संस्थेने सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांनी त्यांची माणसं दिपकला घेण्याकरता आले .त्यादिवशी दिपकला मात्र आपल्यासोबत काहीतरी वेगळं होत आहे इतक जाणवल होत. तो त्या माणसांना जवळ येऊ देत नव्हता, सुमनच्या पाठीमागे सारखा लपत होता. एकाने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर त्याने त्याच्या हाताला इतका जोरात हिसका दिला की तो माणुस खाली पडला. दिपक आटोक्यात येत नाही हे पाहुन त्यांनी सुमनलाच गाडीमधे बसायला सांगितले, त्याचा परीणाम असा झाला की दिपक तीच्या मागोमाग  गाडीत जाऊन शांतपणे बसला. तो गाडीत बसल्याबरोबर त्याला दोन माणसांनी घट्ट धरुन ठेवले व सुमनला गाडीतुन उतरायला सांगितले. ती उतरल्याबरोबर त्यांनी गाडी लाॅक केली व गाडी निघाली. दिपक गाडीच्या मागच्या काचाजवळ उभा राहुन मोठमोठ्याने रडत होता.  सुमनच्या दिशेने हात पसरुन बघत होता. सुमनला आपल्या देवत्वाची साक्ष देत होता पण सुमनला आपल्या डोळ्यातील अश्रुंमुळे दिपक धुसर दिसत होता. त्याच्या शरीरात वसलेल्या राक्षसाला आता शिक्षा मिळणार होती पण सुमनचा देव मात्र आपले देवपण सिद्ध करायला टाकीचे घाव सोसायला सुमनपासुन लांब निघाला होता. कदाचित त्याच्यातला असुरी वृत्तीला देवत्व प्राप्त होऊन तो सुमनकडे परत आला असता. 

सौ.माधवी जोशी माहुलकर.🙏🏻🙏🏻
( माझी पोस्ट माझ्या नावासकट शेयर करण्यास माझी काहीच हरकत नाही. )🙏🏻🙏🏻

1453. भ्रष्ट पैसा आपल्या पिढ्या बरबाद करतो

 आयुष्यभर मजबूत पैसे खाऊन, अतोनात भ्रष्टाचार करुनही माणसं सुखासमाधानाने आणि मजेत रहातात त्यामुळे कर्मसिध्दान्त वगैरे सगळं झूट यज्ञ आहे” असा अनेकांच्या विचारांचा ट्रेन्ड सध्या दिसून येतो. मी अजिबात जजमेंटल नाही पण माझा अशा कितीतरी लोकांशी संपर्क आणि संवाद असल्याने मी याची एक्झॅक्टली दुसरी बाजू सांगतो. पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या....
माझ्या परिचयातील असेच एक गृहस्थ...आयुष्यभर फक्त अतोनात भ्रष्टाचार केला. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पैसे खाल्ले. रिटायरमेंटपर्यंत एकही इनक्वायरी नाही की कसली चौकशीही नाही. खाल्लेला पै न पै नीट पचवून, इन्वेस्ट्मेंट करुन आणि पुढच्या दोन पिढ्यांची व्यवस्था करुन पेन्शनीत मस्त आयुष्य जगत होते. कसलीही ददात नाही की काही नाही....वरवर पाहता अतिशय सुखी आणि उत्तम आयुष्य. रोज स्कॉच आणि सिगारेटी वगैरे असूनही तब्येत धडधाकट. सहा परदेशप्रवास, आलिशान कार, मुलाचा बिझनेस...मज्जानू लाईफ.
एकदा अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे आले. पत्रिका दाखवायला... बसले आणि इकडचं तिकडचं बोलून थेट रडायलाच लागले. मला समजेचना...मग विषयाला हात घातला. ते त्यानंतर जे काही म्हणाले ते मला तरी खूप आंतर्मुख करुन गेलं...
“सचिन, वरवर बघता मी म्हणेन माझ्याइतका सुखी माणूस कोणी नाही. वारेमाप पैसा, तीन फ्लॅट्स, गावाकडे बंगला, पैसा अडका सगळं काही आहे. पण तुला सांगू? माझं मन आता गेले काही दिवस मला अतिशय खात आहे. मी कोणालाही सांगू शकत नाही, बायकोलाही सांगितले नाही... अरे, आता मला रोज आयुष्य जगताना, बँक बॅलन्स बघताना, बायकोचे दागिने बघताना, मी आयुष्यभर ज्यांना ज्यांना लुटलं, ज्यांच्याकडून पैसे खाल्ले त्यांचे चेहरे उभे रहातायत. म्हणजे मी जेव्हा अगदी ज्युनियर असल्यापासून एका खेड्यातल्या गरीब बाईकडून साहेबांच्या सहीला पन्नास रुपये लागतील असं बोलून जिच्याकडून पैसे खाल्ले त्या बाईचा चेहराही उभा रहातो. मी जिथून जिथून पैसे खाल्ले, लोकांची अडवणूक केली आणि पैसा दिला नाही म्हणून कामं केली नाही ते सगळे मला दिसतात... माझा कॉन्शस मला खायला लागला आहे. मी झोपलो तरी मला आता मन शांत बसू देत नाही.... एका बाईने मला लाच म्हणून हजार रुपये दिले नाही. मी तिचं काम केले नाही ती बाई दिवसभर आमच्या ऑफिसबाहेर झाडाखाली हतबलपणे बसून होती ते आठवतं, तेव्हा काही वाटलं नव्हतं पण आता मला कमालीची बेचैनी येते. तिचा हतबल म्लान चेहरा आठवतो. अत्यंत लबाडीने आणि साळसूदपणे लोकांना लुबाडून केलेल्या खरेद्या आठवतात. गोरगरिबांना लुटून मी युरोपवारी केली त्याचा गिल्ट मला आतून कुरतडतो आहे...
सगळं मजेत चाललंय असं तुम्हाला जगाला दिसतंय ते तसंच दिसत रहाणार याची काळजी मी घेतोच आहे. पण परवा मुलगा माझ्या सुनेसमोर मला म्हणाला, पपा तुम्ही गप बसा हो. तुम्हाला काय कळतंय? माझा कचरा झाला तिच्यासमोर. पण पुन्हा हसरा रिलॅक्स मुखवटा घेऊन मी वॉकला बाहेर पडलो रे...
वाल्या कोळ्यासारखी गत झाली आहे माझी. माझं आंतर्मन मला सांगतंय... आत्ता आनंदी मुखवटा घालून मी हसत खिदळत फिरतोय पण आतून पोखरत चाललो आहे मनाने. मला अन्नपाणी गोड लागत नाही. मी अबोल होत चाललो आहे. हरिद्वारला जाऊन गंगास्नान पण करुन आलो.... काय जे मनात येईल ते करतो. अन्नदान करतो, होमहवन करतो पण मला आतून माहित आहे... हे डाग निघणार नाहीत. मी आतल्या आत कोंडून मरणार आहे सचिन....”
मी पत्रिकेवर नजर टाकली. शनि महादशा सुरु होऊन जेमतेम सहा महिनेच झाले होते. शनि महाराजांचा अंमल सुरु झाल्यावर देवांचे देव महादेवही जिथे वरमले आणि हत्तीचं रुप घेऊन जंगलात लपले तिथे असल्या छाटछूट रावसाहेब आणि तात्यालोकांची काय अवस्था होणार? आजही ते गृहस्थ दिसतात... नजरेतला भकासपणा आणि एकटेपणा आताशा जास्त गडद होत चालला आहे...
बाकी सगळं छान सुरु आहे!!!

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

1452. रतन टाटा

 भारतीय समाजमनात श्रीमंतीविषयी आणि श्रीमंत लोकांविषयी काही कॉम्प्लेक्स आहेत. जसे की, श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही ! अधिक पैसा कमवून काय करणार !, श्रीमंत माणसं सतत अस्वस्थ असतात, त्यांच्या घरची पोरेबाळे अधू अपंग असतात (!), ते सतत कसल्या तरी भीतीने ग्रासलेले असतात, श्रीमंती हराम कमाईमधून येते (!), श्रीमंती वाईट नाद शिकवते, श्रीमंतांना मिजास असते ते माजोरडे असतात (!), त्यांची सुखे पोकळ असतात (!) आणि शेवटचे म्हणजे श्रीमंतांना माणुसकी नसते! आणखीही काही ऍडिशन यात करता येतील. एकंदर भारतीय माणसाला श्रीमंतीविषयी असूया असते मात्र तो ती व्यक्त करत नाही. केवळ चडफडत राहतो, आपली गरिबी त्यांच्या श्रीमंतीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे याची अकारण तुलना तो करत राहतो. पैसेवाला म्हणजे माजलेला असे एक सूत्र आपल्याकडे रुजलेले आहे अर्थातच ही सर्व सूत्रे गृहीतके रुजण्यामागे काही श्रीमंत व्यक्तींची वर्तणूकदेखील कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. जागतिक दर्जाच्या श्रीमंत व्यक्तींविषयी आपल्याकडे सातत्याने बोललं जातं. त्यात गॉसिप असतं नि दुस्वासही असतो. अनेक मोठमोठी नावे या संदर्भात घेता येतील. मात्र एक अख्खं  घराणं यास अपवाद आहे आणि त्या घराण्यातला एक  हिमालयाएव्हढा माणूस तर अतिव अपवाद मानला जाईल तो म्हणजे रतन टाटांचा.  त्यांचे देहावसान झाले. 
टाटांचं मीठ खाल्लं नि त्यांचा ब्रॅंड असणारी ‘बाटा‘ची चप्पल घातली इथून सामान्य माणूस त्यांच्याशी जोडला जातो! मुळात इतिहासाच्या पुस्तकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले जमशेदपूर आणि तिथले टाटा घराण्याचे योगदान बाल वयापासूनच आपल्या सर्वांवर ठळक बिंबले आहे. टाटा घराण्याने भारतीय औदयोगिक संरचनेचा मजबूत पाया रचला. स्वातंत्र्य चळवळीस पूरक अशी आर्थिक भूमिका त्यांनी वठवली. त्यामुळे पूर्वापार टाटा या नावाविषयी भारतीय मनात एक आस्था आहे! टाटांचा ट्रक असेल वा अगदी महागडी जॅग्वारची कार असेल नाहीतर छोटा हत्ती नावाने ओळखलं जाणारं कनिष्ठवर्गीयांच्या पोटाचं साधन असेल भारतीय माणूस त्यांना आपलं मानत आलाय! टाटा सुमोची, सफारीची क्रेझ अफाट होती. वाहन क्षेत्रात त्यांची भरारी उत्तुंग होती, सामान्य माणसाच्या आवाक्यात चारचाकी यावी म्हणून केवळ लाखाची नॅनो कार बाजारात आणली. टाटांनी कधीही आपल्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन केले नाही या गोष्टीचा समाजावर बराच प्रभाव पडला. सामान्य माणसांच्या कार्यक्रमात सहभागी होताना त्यांचा वावर अत्यंत सुखद नि अनुकरणीय असायचा. त्यामुळे लोकांना हा माणूस आपला वाटायचा. 'हे अफाट श्रीमंत आहेत पण आपल्यासारखेच साधे आहेत!‘ ही भावना या व्यक्तीला अत्यंत उच्चस्थानी घेऊन गेली. आपल्या कर्मचाऱ्यांसोबतचं त्यांचं वर्तन नेहमी चर्चेचा विषय राहिलंय, 'धिस पर्सन इज डाऊन टू अर्थ' याचा दाखला देण्यासाठी त्यांच्यासारखा माणूस नव्हता.
टाटांच्या घरातही लग्ने झालीत, सोहळे झालेत, धार्मिक विधी झालेत मात्र त्यांनी त्याचे प्रदर्शन मांडले नाही. इव्हेन्टबाजीवर त्यांनी फुली मारलेली! आताच्या उठवळ श्रीमंतांच्या वखवखत्या प्रदर्शनाच्या तुलनेत ही असामी नि यांचं घराणं सोबर नि सात्विक वाटतं ते याचमुळे! भारतीय जनमानसाला याची अधिकची ओढ असल्याने टाटांची श्रीमंती कधी कुणाच्या डोळ्यात खुपल्याचे माझ्या तरी पाहण्यात वाचनात आलं नाही !  
    ‘टाटा म्हणजे विश्वास‘ हे सूत्र आपल्याकडे रुळले कारण त्यांच्या उत्पादनाच्या दर्जाची, गुणवत्तेची खात्री ! पिढी दर पिढी याला कधी तडा गेला नाही त्यामुळे लोकांनी त्यांच्या उत्पादनावर भरवसा ठेवताना मागेपुढे पाहिले नाही. कळत नकळत भारतीय माणूस कोणत्या ना कोणत्या उत्पादनामुळे या समूहाशी जोडला गेला. टाटांनी बाजारात आणलंय म्हणजे चांगलंच असणार असं लोक नेहमी मानत राहिले. गरीबांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गवारीचे लोक त्यांच्याशी जोडले गेले. खरेतर हा एक पूल होता जो अनेक विषम आर्थिक वर्गवारीतल्या लोकांना एकाच अदृश्य मंचावर जोडायचा! लोकांना याचं एक छुपं आकर्षण असण्यामागचं हे एक महत्वाचं कारण होय. 'कर लो दुनिया मुठ्ठी में' असं म्हणत लोकांच्या खिशावर हात साफ करण्याची नियतही त्यांनी ठेवली नाही. सारं काही ओरबाडून खाण्यासाठी देशाची धोरणे आपल्याला अनुकूल करण्यासाठी त्यांनी कसरती केल्याचे वा आर्थिक हेराफेरी केल्याचेही कधी ऐकिवात नाही. दारिद्र्यरेषे खालील माणसांपासून ते उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत भारतात एक गृहीतक प्रचलित आहे ते म्हणजे कष्ट, सचोटी, विश्वास, जिद्द यांना मेहनतीची जोड लाभली की माणूस यशस्वी होतोच! सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या टाटांनाही हे ठाऊक असावे म्हणून त्यांनी वाममार्ग कधी निवडले नसावेत. त्यामुळे सामान्य भारतीय माणसांना हा माणूस वंदनीय होता.  
     टाटांचे नाव आणखी एका विलक्षण हळव्या कारणाने साऱ्या देशाशी जोडले गेले ते म्हणजे 'टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल'! देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे रुग्ण येतात. आपण इथे बरे होणार नि आपला उपचारही वाजवी दरात होणार याची त्यांना जबर खात्री असते! इथे टाटांना ज्या दुवा मिळाल्या आहेत त्या अनंत आहेत! त्यांचे अनुकरण करत आताच्या काही औद्यगिक घराण्यांनी विनू मांडके यांचे हॉस्पिटल घेऊन त्याचा जेव्हा बाजार मांडला तेव्हा या खऱ्या हिऱ्याची लकाकी अजून तेजस्वी वाटू लागली. टाटांनी आपल्या देशासाठी योगदान दिले आहे नि आपल्या बापजाद्यांना नोकऱ्याही दिल्या आहेत ही भावना अनेक शहरी मध्यमवर्गीयांच्या ठायी असण्याचं कारण म्हणजे टाटा समुहाच्या कोणत्याही शाखेत नोकरी मिळताच माणसं आश्वस्त होतात. 'चला, आता आपली गाडी मार्गी लागली' ही भावना त्यामागे असते. नव्या सहस्रकाचं वर्ष आलं नि मध्यमवर्गीय माणसाची नवी पिढी टाटांच्या 'टीसीएस'च्या नावाशी खिळून राहिली. त्यांच्या आधीची पिढी 'टेल्को'साठी श्रमलेली ! हरी नरके सातत्याने टेल्कोविषयी लिहायचे, ही असते कृतज्ञतेची नोंद ! आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना एका परिवारासारखं जपणारं घराणं म्हणजे टाटा.      
भारतीय बाजारपेठेत फास्ट्रॅक घड्याळे आणि तनिष्क ज्वेलरी आली तेव्हा लोक त्यांना हसले होते! मात्र ही उत्पादने चालली कारण त्या त्या वर्गाची नस त्यांनी ओळखली होती. या अनुषंगाने अलीकडच्या पिढीचा टाटांशी असणारा जवळचा संबंध म्हणजे 'वेस्टसाइड'च्या मॉलमधली खरेदी! आपल्या बापाने, आज्ज्या - पणज्याने ज्यांची उत्पादने खरेदी केलीत त्यांची नाळ पुन्हा एकदा अधिक जोरकसपणे जोडण्याचे काम या क्लॉथ-चेनने केले आहे. भारतीय गृहिणींची नि घरगुती बाजाराची नाडी ठाऊक असणाऱ्या टाटांनी बिग बास्केट, क्रोमा, स्टार बाजार, स्टार क्विक, टाटा क्लिक यांचं गारुड उभं केलं. औषधे पुरवठा करण्यासाठी 'वन - एमजी'ची सेवा सुरु केली. एअर इंडिया ते विस्तारा नि पुन्हा एअर इंडिया हा त्यांचा हवाईसंबंध भारतीय माणसाला लोभस वाटतो कारण त्यामागची आत्मीयता नि आपुलकीचा व्यवहार! गृहनिर्माण, वित्तसहाय्य, पायाभूत संसाधने, पोलाद उद्योग, टेलिकम्युनिकेशन यातही त्यांनी जी भरारी घेतली त्याला कारण त्यांची कल्पकता! मानवी जीवनाशी निगडित सर्व महत्वाच्या क्षेत्रात त्यांनी आपलं योगदान देताना त्याला बाजारू स्वरूप येऊ दिलं नाही हे विशेष होय. दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला तेव्हा ताज हॉटेल निवडलं होतं कारण भारतीय आदरातिथ्याचं ते सर्वोच्च नाव होतं नि आहे! अनेकांना तेव्हा हळहळ वाटली होती. टाटांच्या हॉटेलवर हल्ला झाला नसून आपल्याच कुणाच्या तरी जवळच्या माणसाच्या व्यवसायावर हल्ला झाला अशी लोकभावना होती. आजही ताज हॉटेल्सची अद्भुत अपूर्वाई टिकून आहे. व्यापार आणि सेवा हातात हात घालून चालत राहतील यासाठी टाटा दक्ष राहिले, लोकाभिमुख सेवा देताना मान झुकलेली असली पाहिजे पण छाती अभिमानाने फुललेली असली पाहिजे अशी काहीशी त्यांची देहबोली होती! एखाद्या देखण्या राजकुमारासारखं राजबिंडं व्यक्तिमत्व असणारे रतन टाटा छानछोकी वा दिखाऊ भपकेबाजीत कधी दिसले नाहीत. ममत्वाने भारलेला एक थकलेला वृद्ध वटवृक्ष, ज्याची मृदू देहबोली नि सात्विक तेज, पाहता क्षणी थकवा दूर करे असं रतन टाटांचं वर्णन करता येईल. कुणाचं निधन होताच आपल्याच घरातलं कुणीतरी गेल्याचं फील आजकाल येत नाही मात्र रतन टाटा याला अपवाद आहेत. 
 अलीकडील काळात माणूस मेल्याची बातमी अगदी ताजी असली तरी त्याची कुचाळकी सुरु होते! निव्वळ बोथट बधीर कालखंडात आपण सारेच जगत आहोत नि एका उत्तुंग उद्योगपतीच्या निधनाने अवघा देश शोकविव्हळ झालाय ही रतन टाटांची कमाई आताच्या अन्य कोणत्याही औद्योगिक घराण्यातील व्यक्तीस मिळेल याची सुतराम शक्यता नाही. अमुक एका राज्याचा, भाषेचा, जातीचा, धर्माचा नि राजकीय विचारधारेचा अभिनिवेश त्यांच्या ठायी नव्हता! ते कोणत्या राज्याचे वा भाषेचे प्रतिनिधी कधीच वाटले नाहीत! कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ते एकाच भावनेने ओळखले गेले ते म्हणजे अस्सल भारतीय. एकशे चाळीस कोटी लोकांना व्याकुळ करून एक लक्ष्मीपुत्र त्याच्या विसाव्याकडे कायमचा गेलाय नि देश शोकमग्न झालाय हे रतन टाटांनाच जमलेय. 
'सारी सोंगे आणता येतात मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही' अशा अर्थाची म्हण आहे, त्यात वाढ करून असंही म्हणता येईल की ‘कैक लोक श्रीमंत होतील पण  रतन टाटा कुणाला होता येणार नाही!‘
कारण हा माणूस अफाट श्रीमंत होता एव्हढीच यांची ओळख नव्हती. एकशेचाळीस कोटी लोकांच्या हृदयात  त्यांना स्थान होते, ते इतरांना कसे लाभेल !        
     अलविदा रतन टाटा !     

  - समीर गायकवाड सोलापूर

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

1451. मॅकेनिक

 " गजा..,नालायका !  यावर्षी तरी गणपतीच्या कमीतकमी एक दिवस आधी घरात ये, नाहीतर पुढचे सात दिवस गणपतीचे पाय ही दृष्टीस पडू देणार नाही." आईचा खणखणीत फोनवरचा आवाज ऐकून गजा समजून गेला यावर्षी काही खरे नाही. आई जास्तच सिरीयस होऊन बोलतेय. अहो, का बोलणार नाही ती? गजानन पावसकर  मुंबईत गेली तीन वर्षे  एकटाच राहतोय. मुळात कोकणातला गजानन उर्फ गजा गावात भागत नाही म्हणून मुंबईत नोकरीसाठी आला. दहावी पास हेच शिक्षण आणि बाईक चालविण्याचे लायसन्स हीच पात्रता.  शिक्षणात असा तसाच असणारा गजा काय पुढे शिकणार होता. त्यातच घरातली परिस्थिती जेमतेमच. दोन मोठ्या बहिणी संगिता आणि योगिता आणि त्यांच्या मागचा गजा. आईवडील गणेश भक्त. कोकणात घरोघरी गणपती बसवण्याची प्रथा फार पूर्वापारपासून चालू आहे. घरातल्या अडीअडचणी ऐकणारा, सोडवणारा त्यांचा  गणपती बाप्पा. त्याच्याकडेच तर नवस बोलले होते मुलासाठी आणि थोडी उशिरा का होईना बाप्पाने पण त्यांची प्रार्थना ऐकली.  तर नवसाने झालेला असा हा गजा. जास्तच लाडावलेला. पण वर्तणुकीने चांगला. म्हणून शिक्षण घेतलं नाही तरी घरात कोणी त्याला काही बोललं नाही. करेल काहीतरी पुढे मागे असं सर्वांनाच वाटत होतं. बहिणींची पण त्याच्यावर खूप माया. मोठ्या बहिणीचेही संगीताचे दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्यानंतर ती शेती भातीच्या कामात मदतीला तयार झाली. नाकीडोळी सुरेख असणाऱ्या संगीताला शेती भातीच्या कामाचे हे चांगले वळण होते. त्यामुळे तिच्यासाठी लवकरच मागणी येऊ लागली. योग्य वर येताच तिचे तसे लवकरच हात पिवळे करून देण्यात आले होते. मुलगा शेजारच्याच गावातला होता. गावातच त्याचे किराणा मालाचे दुकान होते.  ती तशी सुखात होती. कोकणात सासरी त्रास होत नाही म्हणजे ती सुखाने नांदतेय असेच म्हटले जायचे. कोकणात पैशाने श्रीमंत म्हणजे सुखी असे अजूनही समजले जात नाही. गावातलीच असल्यामुळे रीतीभाती जाणून होती त्यामुळे लवकरच ती सासरी रुळली.
     आता दुसऱ्या मुलीसाठी योगितासाठी स्थळ शोधणे सुरू झाले. शोधणे यासाठी कारण योगिता त्यामानाने शिकलेली होती. कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात होती. थोडी तिची मतं तयार झाली होती. तरीही आई-वडिलांच्या मतांचाही आदर करणारी होती. हुंडा द्यायचा प्रश्नच नव्हता पण पोरीच्या अंगावर दोन दागिने हवेत. त्यासाठी सध्या घरच्यांची जास्त मेहनत चालू होती. गजालाही  या सर्वांची जाणीव होतीच. त्याचाच परिणाम म्हणून गजा मुंबईत आला होता. आता दहावीच्या जीवावर कोणती नोकरी मिळणार? शेवटी गाववाल्याने डिलिव्हरी बॉय म्हणून एका कंपनीत चिकटवले आणि आपल्या सोबत राहण्याची सुद्धा सोय केली. शाळेतल्या एका खोलीत गावातलेच सात आठ जण एकत्र राहत होते. त्यामुळे सगळ्यांच्याच खर्चात थोडीफार बचत होत होती. गावातलेच असल्यामुळे सगळ्यांच्या खाण्याच्या  आवडीनिवडी जवळपास सारखाच होत्या. गप्पाटप्पा करत सगळेजण गुण्यागोविंदाने राहत होते. गजाचे आईवडील साधे. अर्ध्या एकरात जमेल ते पिकवायचे. तीन  कलमं, एक फणस ,चार माड  यावरच उत्पन्न. पण गावात मान .प्रत्येक सण हौसेने साजरा करायचे.दारात आलेला जेवल्याशिवाय बाहेर जायचा नाही .गणपती उत्सवात तर धमाल असायची.  पण गजा गेली दोन वर्षे गणपतीत उशिरा घरी येत होता.मागच्या वर्षी तर विसर्जनाच्या एक दिवस आधी घरात शिरला होता.म्हणून यावर्षी आईने आताच फोन करून लवकर येण्याची ऑर्डर दिली होती.
"आहो, पोराक काय वाईट संगत तर लागली नसा ना ?" आईने रात्री झोपताना  काळजीने विषय काढला.
" गप गो ! काहीतरी काय बोलूक नको .आपलो झील हाय तो आणि नाव पण त्याच्या नावावरून ठेवलंय आपण. आता त्याची काळजी त्यालाच " देवघरातल्या गणपतीच्या मूर्तीकडे हात करीत बाबा म्हणाले आणि झोपेची तयारी करू लागले.
"आयला , मुलगा ह्यांचा. हेच मागे लागले मुलगा हवा म्हणून. चांगली माणसे आहेत.दरवर्षी मनोभावे पूजा करतात म्हणून होय म्हटले तर माझ्याच अंगावर जबाबदारी टाकली." देवघरातील तो स्वतःशीच चिडून म्हणाला. बाजूला खुसखुस ऐकू आली म्हणून पाहिले तर उंदीर फुटाणे खात हसत होता.
"प्रत्येकवेळी तुम्हाला सांगतोय कोणाचेच ऐकू नका. लोक वाटेल ते मागतात आणि नंतर आपल्यालाच कामाला लावतात. तुम्ही तर भोळ्या वडिलांचे भोळे पुत्र. जाता त्यांना मदत करायला. आता तो जीवाची मुंबई करत असेल आणि त्याच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी तुमची." तो आपली शेपटी आपटत म्हणाला.
जगात सर्व बदलेल पण ह्याला कोणी बदलू शकत नाही. उंदराकडे पाहत त्याने हताशपणे मान डोलावली. इकडे गजा मात्र टेन्शनमध्ये होता. यावर्षी बहिणीच्या लग्नासाठी जमेल तितके पैसे गोळा करायचे म्हणून जीवापाड मेहनत करीत होता. मोटारसायकल वरून पूर्ण मुंबईत डिलिव्हरी करत होता. रोज बारा ते पंधरा तास डिलिव्हरीची कामे करीत होता. त्यात सण आले की जास्त काम पण इंसेंटिव्हही जास्त मिळायचा.  सणाच्या दिवशी बहुतेकजण दांडी मारायचे पण हा मुंबईत एकटा म्हणून यालाच कामाला जुंपायचे. त्यामुळेच दोन वर्षे गणपतीला उशिराच घरी जात होता.आईचा फोन येताच तो चिंतेत पडला.
"गजाभाऊ , यावेळी खूप काम आहे हो." सकाळीच मॅनेजर साहेबांनी संभाव्य धोक्याची कल्पना दिली.
" साहेब यावर्षी  गणपतीच्या दोन दिवस आधी घरी जायचे आहे. मला सुट्टी लवकर हवीय." गजा केविलवाणा चेहरा करीत म्हणाला .
"दिली असती हो, पण यावेळी एका कंपनीचे लाडूचे बॉक्स वाटायची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ती ऑर्डर जितक्या लवकर पूर्ण कराल तितक्या लवकर मोकळे करेन मी तुम्हाला. बस फक्त तीच ऑर्डर पूर्ण करा. ऑर्डर मुंबईतलीच आहे पण पूर्ण मुंबईत फिरावे लागेल"  मॅनेजर छद्मी हसत म्हणाला .
" फक्त एकच ऑर्डर ना ? मग हरकत नाही" गजा उत्साहाने म्हणाला .
"ऑर्डर चोवीस तास चालू आहे.  जितक्या लवकर करशील तितक्या लवकर मोकळा होशील." मॅनेजर म्हणाला.
गजाने खुश होऊन ऑर्डर स्वीकारली आणि बाईकला किक मारली. पुढचे दोन दिवस तो ऑर्डर डिलिव्हरी करत होता. कोणा एका श्रीमंताने उकडीचे मोदक आपल्या आप्तजनांना आणि मित्रांना घरपोच डिलिव्हरी करण्याचे ठरविले होते. तीच ऑर्डर गजा डिलिव्हर करत होता. गणपती आगमनाला दोन दिवस राहिले होते. बहिणीच्या लग्नाची बोलणी ही त्याचवेळी होणार आहेत म्हणून घरी हजर राहा अशी धमकीवजा सूचनाही घरून आली होती. आता रात्रीचे दोन वाजले होते. डिलिव्हरी करून तो घरीच निघाला होता. अचानक त्याला डुलकी लागली आणि बाईक रस्त्यावरून उतरली. वेळीच सावध होऊन त्याने बाईक कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण ती घसरत गेलीच. त्याला फारसे लागले नाही पण बाईकची मोडतोड झालीच.
"देवा आता काय करू? बाईकची अवस्था पाहता  एक दिवस तरी गॅरेजमध्ये जाणार हे निश्चित. म्हणजे डिलिव्हरी अजून दोन दिवस पुढे जाणार.
हताश होऊन तो रस्त्याच्या कडेला बसला. अधून मधून एखादं दुसरे वाहन जात होते पण ही मुंबई आहे. उगाच कोणासाठी थांबणार नाही. पण तो तरुण गजाला पाहून थांबला .
"आपटली का ?" बाईककडे पाहत त्याने विचारले ."चल टो करून नेऊ ."
त्याने  बाईक पायाने ढकलत जवळच्या गॅरेजमध्ये आणली. गॅरेज कसले ते. एका झाडाखाली पत्र्याची उघडी शेड होती. दोन टायर, एक पाण्याचे पिंप आणि चार पाच उंदीर इकडे तिकडे फिरत होते.
" मी विनायक, या गॅरेजचा मालक." त्याने बाईक स्टॅण्डला लावून तिचे निरीक्षण करत सांगितले.
"गॅरेज? " गजाने भुवया उंचवीत विचारले.
समोरचा तरुण थोडासा अंगाने सुटलेला, बुटका होता.कान वाजवीपेक्षा जास्तच मोठे होते. हसताना तुटलेला दात दिसत होता. खोचक बोलत होता पण डोळ्यात शांत भाव होते.
" हो .काय हरकत आहे ? गॅरेज म्हटले की गाड्या दिसायला हव्याच का " त्याने खिशातील चपातीचा तुकडा उंदरांच्या दिशेने फेकत विचारले. 
" गाडी आता होणार नाही .दोन दिवस लागतील ." त्याने जाहीर केले.
" च्यायला ,उद्या माझ्या डिलिव्हरी आहेत हो" उद्याचे काम संपले की परवा गावी निघतोय .यावर्षी गणपतीच्या आधी घरात पाहिजे अशी घरच्यांची ऑर्डर आहे ".गजा कळवळून म्हणाला.
"मग मी काय करू ?  मला ही जायचंय गणपतीला चार लोकांच्या घरी. पण हे मी तुला सांगितले का" तो चिडक्या स्वरात म्हणाला .
"पण एक होईल. तो कपाळावर बोटे मारीत म्हणाला. "तू माझी बाईक घे .उद्याची डिलिव्हरी पूर्ण कर आणि गावाला जाण्यापूर्वी बाईक परत कर. तोपर्यंत मी तुझी बाईक तयार करून ठेवीन." 
" चालेल." गजा आनंदाने ओरडला आणि मन बदलायच्या आत त्याची बाईक घेऊन निघालाही.
दुसऱ्या दिवशी रात्री गजा बाईक घेऊन त्या गॅरेजमध्ये आला. विनायक त्याची बाईक चेक करत होता .
" ही बघ झाली तुझी बाईक तयार" त्याने गजाच्या हातात चावी दिली.
गजाने हात जोडले आणि हातातील लाडूचा बॉक्स त्याच्या हाती दिला.
"अरे ह्याच बॉक्सची डिलिव्हरी करत होतास का?" विनायक लाडूचा बॉक्स हातात घेऊन म्हणाला.
" होय मालकाने सर्व डिलिव्हरी वेळेत पूर्ण केल्या म्हणून मलापण एक बॉक्स दिला. पण तुमच्या मदतीशिवाय हे पूर्ण झाले नसते म्हणून या बॉक्सचा मान तुमचा" गजा हात जोडून म्हणाला.
"पण इतकी काय घाई आहे गावी जायची ?" विनायकने विचारले.
"बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमविले आहेत. ते गणपतीच्या पुढ्यात ठेवायची इच्छा आहे. आईबाबांना शब्द दिला होता मुंबई जाऊन कष्ट करून पैसे साठविन आणि तेच बहिणीच्या लग्नाला देईन त्यासाठी गेली तीन वर्षे मुंबईत राहतोय. दोन वर्षे तर गणपतीच्या विसर्जनालाच गेलो. पण बाप्पाला घरी आणण्यात जे सुख आणि आनंद आहे ते विसर्जनात नाही. आता बहिणीच्या लग्नाला गावी जाईन तो पुन्हा मुंबईत येणार नाही. आपला गाव बरा" गजा डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला.
" अरे पण माझ्या बाईकबद्दल  काही सांगितले नाहीस. कशी वाटली?" तो आपल्या बाईककडे वळत म्हणाला. "तुमची बाईक स्पीड घेत नाही. सतत बुजत असते. मध्येच स्पीड घेते तर मध्येच हळू होते आणि चीचीची असा इंजिन मधून आवाज येतो. त्या पेट्रोल टॅंकवर लावलेल्या उंदरांच्या चित्रसारखीच बाईक वागते" गजा हसत उत्तरला.
चेहरा पाडून विनायकने  पाठ वळवली.
"ही असली मॅकेनिकची काम करायला तुम्ही चार दिवस आधीच इथे आलात का ? बरे तू काम करतोस आणि मला ही कामाला लावलेस. त्याला पाठीवर बसवून अर्धी मुंबई फिरलो मी. ती पृथ्वी प्रदक्षिणा घातली तेव्हाही इतका दमलो नव्हतो." उंदीर पाठीवर शेपटी आपटत कुरकुरला.
पण यावर्षी गजाच्या डोक्यावर बसून घरात शिरताना तो जास्तच खुश होता.

© श्री.किरण कृष्णा बोरकर 🙏

1450. सॉरी मॅडम

        निनाद आजगांवकर कोहिनूर हॉस्पिटलच्या पायर्‍या चढत होता. कोहिनूर हॉस्पिटलमधील डॉ. अंजली या दुपारी १२ वाजता फक्त चार मेडिकल रिप्रेझेटेंटीव्हना भेटत होत्या. निनादने पंधरा दिवसापूर्वी बाहेरच्या रिसेपशनिस्टकडे आपले नाव दिले होते. कोहिनूर हॉस्पिटल हे या शहरातील प्रसिध्द हॉस्पिटल आहे. डॉ. विजय पाटील आणि डॉ.सौ. स्नेहलता पाटील यांचे हॉस्पिटल गेली ३० वर्षे या शहरात सेवा देत आहे. ३० वर्षापूर्वी डॉ. विजय पाटील हे स्त्रीरोग तज्ञ आणि डॉ.सौ. स्नेहलता पाटील या बालविकार तज्ज्ञ म्हणून या शहरात आले. सुरुवातीला फक्त कन्सलटिंग करणार्‍या पाटील दाम्पत्याने नंतर शहारात जागा घेऊन हॉस्पिटल बांधले. गेल्या ३० वर्षात या हॉस्पिटलची खूप प्रगती झाली. हॉस्पिटलवर अजून मजले चढवले गेले. तसेच आजूबाजूची जमीन खरेदी करुन हॉस्पिटलची शाखा काढण्यात आली. सर्व अत्याधुनिक मशिनरी, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, लॅबोरटरी, मेडिकल शॉप, अ‍ॅम्ब्युलन्स यांनी हॉस्पिटल परिपूर्ण झाले. डॉ. अंजली या पाटील दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या. अंजली ही लहानपणापासून अत्यंत हुशार. तिने पुण्यात बी.जे. मेडिकलमधून एम.बी.बी.एस. केले. आणि नंतर एम.डी. (स्त्रीरोग) ह्या पदव्या घेतल्या. त्यानंतर गेली ५ वर्षे या आपल्या घरच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात. डॉ. अंजली या ३२ वर्षाच्या असून अविवाहित आहेत. डॉ. अंजली या पुण्यासारख्या शहरात बरीच वर्षे राहिल्याने त्यांचे विचार आईवडिलांपेक्षा वेगळे आहेत. त्यांच्याकडे गरिबांसाठी कळवळा आहे. ज्यांची ऐपत नाही त्यांना कमीत कमी खर्चात उपचार मिळायला हवेत यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.
निनाद आजगांवकर हा मूळ मुंबईचा मुलगा एका प्रतिथयश औषध कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून काम करत आहे. याआधी तो संघाचा कार्यकर्ता म्हणून नागालँडमध्ये काम करत होता. त्या कामात तो रमला होता. कदाचित आयुष्यभर त्याने ते काम आवडीने केले असते. पण तीन वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याच्यावर आईची जबाबदारी आली. मग तो मुंबईत आला आणि बी.फार्म. शिकला असल्यामुळे या औषध कंपनीत त्याला नोकरी मिळाली आणि महाराष्ट्रातील या शहरात तो आईसह आला. एका भाड्याच्या घरात तो राहतो आहे. मूळचाच हुशार असल्याने त्याचे त्या कंपनीत चांगले काम आहे. 
निनादने वेटिंग हॉलमध्ये पाहिले. त्याच्या बरोबरीने अजून ३ वेगवेगळ्या कंपन्यांचे एम.आर. आले होते. सर्वजण त्याच्या ओळखीचे असल्याने त्याने हाय, हॅलो केले. बाहेरच्या मुलीने चौघांची कार्डे घेतली आणि आत डॉ. अंजलीच्या टेबलवर ठेवली. एक एक एम.आर. आत जाऊ लागला. आज निनाद थोडा चिडलेला होता. त्याला डॉ. अंजलीबरोबर सविस्तर बोलायचे होते म्हणून तो सर्वात शेवटी आत गेला. त्याने डॉ. अंजलीला गुडमॉर्निंग केले आणि तो मॅडमना म्हणाला, 
‘‘मॅडम, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. विचारु का?’’ 
डॉ. अंजली - विचारा
निनाद - ‘‘मॅडम, मी तुम्हाला गेली ३ वर्षे नियमित भेटतो आहे. माझ्या कंपनीच्या प्रॉडक्टस बद्दल तुम्ही उत्सुकता दाखवता, आमच्या आर्यन कॅप्सुल्सचे दर सर्वात कमी आहेत हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. आमची कंपनी ही भारतातील नामवंत कंपनी आहे. असे असताना तुम्ही आमचे प्रॉडक्टस का लिहित नाहीत.’’
डॉ. अंजली - तुम्ही असे मला डायरेक्ट विचारण्याआधी केमिस्टकडे चौकशी करायला हवी होती.
निनाद - कसली चौकशी ?
डॉ. अंजली - तुमची औषधे उपलब्ध असतात का नाही याची.
निनाद - मॅडम, आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टस शहरातील सर्व केमिस्टकडे उपलब्ध आहेत. फक्त....
डॉ. अंजली - फक्त काय?
निनाद - फक्त या हॉस्पिटलच्या केमिस्टकडे ते उपलब्ध नाहीत.
डॉ. अंजली - तुम्हाला माहिती आहेच की या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स जे प्रिस्क्रीप्शन लिहितात ते आमच्या हॉस्पिटलमधील केमिस्टकडेच जाते. आमच्या हॉस्पिटलचा तसा नियम आहे. आम्ही पेशंटना सक्त ताकीद दिलेली असते, औषधांची खरेदी आमच्या केमिस्टकडेच करायची. कारण बाहेरुन औषधे आणली तर बाहेरचे केमिस्ट दुसरीच औषधे देऊ शकतात. 
निनाद - सॉरी डॉक्टर, पण तुमचा गैरसमज झालाय. एकवेळ बाहेरचे केमिस्ट तुम्ही लिहिलेली औषधे बरोबर देतील, पण तसे तुमच्या हॉस्पिटलमधील केमिस्टबद्दल सांगता येणार नाही. 
डॉ. अंजली - सांभाळून बोला मिस्टर. 
निनाद - मॅडम, तुमची परवानगी घेऊनच हा विषय तुमच्याशी बोलतोय. राग नसावा.
डॉ. अंजली - ओके. मी तुमचे दोन प्रॉडक्टस लिहिले होते. परंतु आमच्या केमिस्टनी फोन करुन सांगितले, हे उपलब्ध नाहीत. दुसरी औषधे लिहा. 
निनाद - का उपलब्ध नाहीत हे तुम्ही विचारले नसेल. 
डॉ. अंजली - एवढा वेळ मला नसतो. पेशंट तपासायचे असतात, ऑपरेशन्स असतात आणि त्या टाईपचे दुसरे औषध मिळत असेल तर मी गप्प राहते.
निनाद - या बाबतीत मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुमच्या वडिलांना किंवा आईला हे बोलून उपयोगाचे नाही. कारण त्यांना सर्व माहिती आहे. किंवा या दोन सिनिअर डॉक्टरांच्या परवानगीने हे सर्व सुरु आहे. पण तुमच्याबद्दल आशा आहे. तुमच्या या केबिनमध्ये तुम्ही साने गुरुजींचा फोटो लावलाय.
डॉ. अंजली - होय. माझे आदरस्थान आहेत साने गुरुजी. पुण्यात असताना डॉ. अनिल अवचट यांच्या शिबिरात मी जॉईन झाले होते. त्यांचे समाजासाठीचे काम बघून मी नतमस्तक झाले. आम्ही कॉलेजमधील मित्रमंडळी आनंदवन मध्ये डॉ. बाबा आमटेंकडच्या शिबिरात सामिल झालो होतो. डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांचे काम पाहिले. त्यामुळे ज्यांची ऐपत नाही अशा पेशंटचे पैसे मी घेत नाही. ऑपरेशनमध्येपण त्यांना मी सवलत देते. 
निनाद - मॅडम, मला आपले कौतुक आहे. परंतु तुमच्या हॉस्पिटलमधील फार्मसीमध्ये ठरवीक कंपन्यांची औषधे का मिळतात? माझ्या कंपनीसारख्या अनेक कंपन्यांची औषधे का मिळत नाहीत? याची आपण चौकशी केली नसेल. 
डॉ. अंजली - खरचं सांगते. मी फार्मसीच्या व्यवहारात लक्ष घालत नाही. किंवा खरतर मी आमच्या हॉस्पिटलच्या व्यवहारातपण लक्ष घालत नाही. आईबाबा सर्व पाहत असतात. बाबा म्हणतात, यात लक्ष घाल. तू एकच मुलगी आमची म्हणून तुलाच हे पहायचे आहे. पण का कोण जाणे पैशाच्या व्यवहारापासून मी अलिप्त असते. त्यापेक्षा माझे पेशंट, त्यांना कमीत कमी खर्चात कसे बरे करता येईल हे मी पाहते. पण तुमची औषधे आमच्या फार्मसीमध्ये का मिळत नाहीत?
निनाद - ते तुमच्या फार्मसीमधील केमिस्टना विचारा.
डॉ. अंजलीने केमिस्टला फोन करुन केबिनमध्ये बोलावून घेतले. दोन मिनिटात केमिस्ट हजर झाला. 
डॉ. अंजली - सातपुते, मला सांगा हे आजगांवकर म्हणत आहेत की, आपल्या फार्मसीमध्ये ठरावीक कंपन्यांचीच औषधे उपलब्ध असतात. या आजगांवकराच्या कंपनीची औषधे मी लिहिते, पण तुम्ही दुसर्‍याच कंपनीची औषधे देता असे का?
सातपुते - मॅडम, सरांची तशी ऑर्डर आहे. ते सांगतील त्याच कंपनीची औषधे आम्ही ठेवतो. 
डॉ. अंजली - अहो, पण अनेक कंपन्यांची औषधे मी लिहिते ती मिळत नाहीत. काय चाल्लय हे? 
सातपुते - ते आपण सरांना विचारा मॅडम. मी नोकर माणूस.
डॉ. अंजली - ठीक आहे सातपुते. तुम्ही या. आजगांवकर, आज शुक्रवार आहे. मला पप्पांशी या बाबत सविस्तर बोलावे लागेल. आज उद्या जमणार नाही कारण आज पप्पांची ऑपरेशन्स आहेत. उद्या सकाळपासून माझी आहेत. आम्ही तिघे एका घरात राहत असलो तरी आमची व्यवस्थित भेट रविवारी होत असते. रविवारी सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी आम्ही तिघे व्यवस्थित भेटतो. त्यावेळी आम्ही रोजच्या कटकटीपासून रिलॅक्स असतो. अनेक विषयांवर गप्पा होतात. मग कुठे जायचे असेल किंवा काही खरेदी करायची असेल तर ते सर्व रविवारी. तेव्हा आजगांवकर तुम्ही रविवारी सकाळी ८ वाजता आमच्या घरी या. 
निनाद - मॅडम, मी तुमच्या घरी ? मला असे मोठ्या माणसांकडे नाश्त्याला, जेवणाला जायची सवय नाही. 
डॉ. अंजली - तुम्ही कसलीच काळजी करु नका. रविवारी आम्ही आमच्या डिग्री, व्यवसाय, मोठेपणा विसरलेलो असतो. त्यादिवशी सर्वसाधारण पाटील कुटुंबीय असतो. तुमचा मोबाईल नंबर या कार्डावर आहे ना?
अस म्हणून डॉ. अंजलीने निनादचा फोन त्याच्या कार्डावरुन सेव्ह केला. 
डॉ. अंजली - तुम्ही रविवारी आमच्या सदाशिव नगरमधील घरी या. सकाळी ८ वाजता. मी वाट पाहते.
निनाद ओके म्हणून उठला. 
रविवारी सकाळी ८ वाजता निनाद डॉ. पाटील यांच्या सदाशिव नगर मधील घरी पोहोचला. काल रात्रौ डॉ. अंजलीने स्वतः फोन करुन रविवारी सकाळी ८ वाजता येण्याची आठवण केली. तसेच व्हॉटस्अ‍ॅपवर लोकेशन मॅप पाठविला. निनादला डॉ. अंजलीचे कौतुक वाटले. श्रीमंत आणि खूप शिकलेल्या मुलींमध्ये जो अहंगंड असतो तो या मुलीमध्ये अजिबात नाही. पुण्याच्या शिक्षण काळात तिच्यावर झालेले संस्कार हे कारण असेल कदाचित. डॉ. पाटील यांच्या घरी मोठं दगडी कंपाऊंड त्यावर आकर्षक वेल सोडलेले, मोठ्ठे लोखंडी गेट उघडून व्यवस्थित कापलेल्या फुलांच्या ताटव्यामधून असलेल्या वाटेने निनाद आत गेला. मोठ्ठा बंगला समोर दिसत होता. समोरील सुंदर बाग आणि हिरवेगार लॉन. निनाद त्या लॉनवरुन चालत बंगल्याच्या दिशेने जाऊ लागला. एवढ्यात त्याचे लक्ष गेले. कोपर्‍यात एक टेबल लावले होते आणि सभोवती पाच खुर्च्या. एका बाजूला कॉफी मशिन आणि छोट्या गॅसवर एक जीन्स आणि टॉप घातलेली तरुणी पॅनवर काहीतरी पदार्थ करत होती. आपण नेमके कुठे जावे बंगल्यात की बागेतील खुर्चीत बसावे असा विचार करत असताना त्या तरुणीने मोकळे सोडलेले केस झटकले आणि तिने मागे पाहिले. निनादला पाहताच गुडमॉर्निंग आजगांवकर असे म्हणताच, निनाद आश्चर्यचकित झाला. ती तरुणी डॉ. अंजली होती. हॉस्पिटलमध्ये अंजली नेहमी सुती साड्या आणि लांब कोपरापर्यंत ब्लाऊज अशा वेशात असायची. आजच्या या वेशात ती खूपच तरुण आणि आकर्षक दिसत होती. तो पटकन म्हणाला, गुडमॉर्निंग डॉक्टर. ‘‘नाही नाही, रविवारी आम्ही कुटुंबीय डॉक्टर नसतो. रोजच्या व्यापातून वेगळे होण्यासाठी हा रविवार असतो. आज मी फक्त अंजली. या दिवशी आम्ही तिघे भरपूर गप्पा मारतो. रोज आम्ही तिघेजण एवढे घाईत असतो की, एकत्र जेवण किंवा गप्पा शक्यच नसतात. बसा ना. पप्पा एवढ्यात येतील. तो पर्यंत आपण कॉफी घेऊ.’’ तिने कॉफी मशीन मधून कॉफी कपात घेतली आणि एक कप निनादच्या हातात दिला. अंजली पण एका कपातून कॉफी घेऊ लागली. 
‘‘कोण कोण असतं घरी तुझ्या?’’
‘‘मी आणि आई’’
‘‘अच्छा! म्हणजे लग्न झालं नाही का?’’
‘‘नाही अजून.’’
का?
नाही कारण असं काही नाही, मी सहा वर्षे संघाचा प्रचारक होतो नागालँडमध्ये. तीन वर्षापूर्वी या लाईनमध्ये आलो. 
अरे व्वा ! मी समाजवादी विचारसरणीची असले तरी संघाच्या प्रचारकांबद्दल आदर आहे माझ्या मनात. आणि कौतुकही आहे. मोठे मोठे शिक्षण घेतलेली तरुण-तरुणी आपलं कुटुंब, करिअर सोडून संघ कार्यासाठी झोकून देतात. सोप नाही ते. मग तू या प्रोफेशनमध्ये कसा आलास. 
वडील वारले आणि आईची जबाबदारी माझ्यावर आली. तिच्यासाठी पैसे मिळवणं आवश्यक होतं. 
बरोबर आहे. ते आवश्यकच आहे. असे अंजली म्हणेपर्यंत डॉक्टर पाटील पती-पत्नी बाहेर आली. त्यांना आदर दाखविण्यासाठी निनाद खुर्चीतून उठला. डॉ. पाटील यांनी त्याला पाहिले. ते म्हणाले -
‘‘अरे बस बस, रविवार आम्ही कोण डॉक्टरवगैरे नसतो. आमच्याकडे जो येतो तो आमचा पाहुणा. पण मी तुला ओळखलं नाही.’’
‘‘पप्पा, हा निनाद आजगांवकर. एम.आर. आहे. मला हॉस्पिटलमध्ये नेहमी भेटतो.’’
‘‘अरे व्वा ! आजगांवकर. मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह हा मेडिकल प्रोफेशनमधील महत्त्वाचा घटक आहे. तो औषध कंपन्या आणि डॉक्टर्स यामधील दुवा असतो. त्याच्याकडून औषध कंपनीमध्ये नवीन काय तसेच औषधांमधील नवीन नवीन शोध समजतात. नाहीतर मेडिकल जर्नल्स वाचतय कोण?’’
‘‘पण पप्पा, आज मी निनादला मुद्दाम बोलावलयं. त्याच्यापण काही तक्रारी आहेत.’’
एवढ्यात गॅसजवळ जाऊन पॅनवर डोसे करणार्‍या मिसेस पाटील पटकन म्हणाल्या, डॉक्टरांबद्दल खूपच तक्रारी असतात समाजात. आम्हाला पण आवडेल अशा तक्रारी समजल्यावर.
तसं नाही आई. याची तक्रार आहे की, याच्या सारख्या अनेक औषध कंपन्यांचे प्रॉडक्टस् आपल्या हॉस्पिटलमधील केमिस्टकडे उपलब्ध नसतात याबाबत. 
अग मग ते सातपुतेंच्या कानावर घालायला हवं. मी लिहिलेली कित्येक औषधे ते बदलून देतात. मी आपलाच केमिस्ट म्हणून गप्प बसते. 
अग आई, मी सातपुतेंना विचारलं त्याबद्दल. त्यांचे म्हणणे, डॉक्टर साहेबांनी सांगितले त्याच कंपन्यांची औषधे ठेवतो आपण. तुम्ही काहीही प्रॉडक्ट लिहिला तरी आमच्याकडील कंपन्यांची औषधे देतो त्याबद्दल. पप्पा ! हे काय चालले आहे? परवा हा निनाद माझ्याशी वाद घालू लागला. तो मला दर महिन्याला नियमित भेटतो. त्याचे प्रॉडक्टस् खरोखरच चांगले आहेत, काही प्रॉडक्टस् रिसर्च आहेत, दर सर्वांपेक्षा कमी आहेत. असे असून मी का लिहीत नाही म्हणून. त्याचे बरोबर आहे. मी त्याला म्हटले, मी त्याच्या कंपनीचे प्रॉडक्टस् लिहिते पण ते उपलब्ध नसतात. म्हणून सातपुतेंना बोलावले तेव्हा ते म्हणाले, डॉक्टर साहेब सांगतात त्याच कंपनीची औषधे आम्ही ठेवतो. असं का होतं? 
डॉ. पाटील - अंजली आम्हा डॉक्टर्स लोकांचा एक ग्रुप आहे. ग्रुपमधील काही डॉक्टर्स भारतातील एका राज्यात ही औषधे बनवून घेतात. त्या राज्यात टॅक्स कमी आहे. त्याचे १०-१५ टक्के वाचतात. शिवाय मार्वेâटिंग वगैरे काही नसल्यामुळे त्याचे जवळ जवळ २० टक्के वाचतात. 
निनाद - आणि ते २० टक्के तुम्हा डॉक्टर्समध्ये वाटतात हे खरे ना?
डॉ. पाटील - खरे आहे. आपण जी औषधे वापरतो त्यातील ७० टक्के औषधे वारंवार आणि सतत लागणारी असतात. अशी औषधे या कंपन्या बनवतात. 
निनाद - डॉक्टर साहेब, आता मी बोलतो. या कंपन्या रॉ मटेरियल बी ग्रेड मॅन्युफॅक्चरर्स कडून खरेदी करतात. कदाचित त्यात भेसळ असू शकेल अशा मॅन्युफॅक्चरर्स कडून. 
अंजली - पप्पा, हे भयानक आहे. पेशंट बिचारे पैसे देऊन औषधे खरेदी करतात. कारण डॉक्टर्स ते लिहितात म्हणून. सामान्य जनता डॉक्टर्सना देव मानते आणि तो देव पैशासाठी पेशंटच्या जीवावर खेळतो?
डॉ. पाटील - पण आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला औषधामुळे त्रास झालेला नाही. 
डॉ. मिसेस पाटील - नाही कसा ? हल्ली जो लहान मुलांचा डायरिया आलाय तो आपल्या हॉस्पिटलमधील औषधांनी बराच होत नाही. मग त्या मुलांना अ‍ॅडमिट कराव लागतं. सलाईनमधून औषधं सोडून मुलं कसबसं बर होतं. मला फार टेंशन येतं. 
निनाद - म्हणजे, स्टँडर्ड कंपनीच्या एका बाटलीत म्हणजे साधारण ८० रुपयाच्या औषधाने जे बाळ बर होणार असतं त्याला सात आठ हजार रुपये विनाकारण खर्च होतात. 
अंजली - माझ्या पण लक्षात येत. माझ्या स्त्री पेशंटना मी अ‍ॅनिमियासाठी जे आर्यन गोळ्या लिहून देते त्याने त्यांच हिमोग्लोबीन समाधानकारक वाढत नाही. मला वाटत की ह्या बायका औषधाचा कोर्स व्यवस्थित करत नाहीत म्हणून त्यांना मी बोलते. पप्पा, हे बंद करता येत नाही का?
डॉ. पाटील - अंजली, कस असतं, आपण डॉक्टर्स लोक एकमेकांवर अवलंबून असतो. या शहरातील आणि लहान गावातील अनेक डॉक्टर्स आपल्याकडे पेशंट पाठवत असतात. त्यामुळे या डॉक्टर्सना आपण दुखवू शकत नाही. त्यांच्या बरोबरच रहावं लागतं.
अंजली - पप्पा, आपल्या हॉस्पिटलला ३० वर्षे झाली, या जिल्ह्यात स्त्रियांच्या आजाराबाबत नंबर १ च हॉस्पिटल आहे. शिवाय लहान मुलांसाठी आईचे हॉस्पिटल आहे. मी गेली ५ वर्षे इथे पेशंट तपासते. आता आपल्याला झेपत नाहीत एवढी ऑपरेशन्स करतो आपण. सायंकाळी तुम्ही थकून जाता. जेवणाच्या वेळा पाळता येत नाहीत. कशाला हवेत अजून पेशंट. स्व-इच्छेने येतील तेवढे बस. इतर नवीन डॉक्टर्स आलेत त्यांच्याकडे जातील पेशंट.
डॉ. पाटील - अग हॉस्पिटलचा खर्चही प्रचंड असतो. एवढ्या स्टाफचे पगार, मेन्टेनन्स.
अंजली - मला कल्पना आहे त्याची. मी आजच फार्मसीकडे पाहते. आजपासून स्टॅण्डर्ड कंपन्यांची औषधे आपण वापरणार.
डॉ. अंजलीने दुसर्‍याच दिवशी हॉस्पिटलमधील फार्मसी मध्ये जाऊन औषधे चेक केली. सातपुतेंना सांगून चांगल्या कंपन्याची औषधे, सलाईन्स ठेवायला लावली. कित्येक कंपन्यांची औषधे या फार्मसीमध्ये मिळायची नाहीत त्या सर्व कंपन्यांनी डॉ. अंजलीचे आणि त्याकरिता धडपडणार्‍या निनादचे आभार मानले. 
अंजली निनादला म्हणाली, आपल्या हॉस्पिटलमधून सुरुवात झाली हे खरे पण हे पुरेसे नाही. आपण या शहरात आणि जिल्ह्यात अजून प्रयत्न करु. निनादने अंजलीच्या निदर्शनास आणले की, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने २००२ साली व्यवसाय निष्ठा, शिष्ठाचार व नैतिक बंधने या अंतर्गत व्यक्तिगत डॉक्टरांवर कोणत्याही औषध कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचा लाभ व लाच घेण्यास प्रतिबंध केला आहे. असे केल्याचे लक्षात आल्यास त्या डॉक्टरांचा परवाना रद्द होऊ शकतो. असा प्रतिबंध असूनही अनेक फार्मा कंपन्या डॉक्टरना प्रलोभने दाखवतात आणि काही डॉक्टर्स प्रलोभने स्वीकारतात. 
अंजली निनादला म्हणाली, मी डॉक्टर्स असोसिएशनची मेंबर असून या असोसिएशन तर्पेâ पहिल्यांदा या शहरातील डॉक्टर्सना आमंत्रित करते. मात्र तू माझ्या मदतीला हवास किंबहुना तू या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घे. निनाद ने आनंदाने जबाबदारी स्वीकारली. डॉक्टर्स असोसिएशन तर्पेâ एका सायंकाळी एका हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला गेला. डॉक्टर अजंलीने प्रत्येक डॉक्टरने इथिकल प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे हे पटवून दिले. एकेकाळी डॉक्टरला देव मानले जाते होते. परंतु आता समाजात जागृती झाली आहे की, डॉक्टर पैशांच्या मागे लागून गरज नसलेल्या तपासण्या आणि गरज नसलेली औषधे पेशंटच्या माथी मारत आहेत. काही कंपन्या आपली दर्जाहिन औषधे डॉक्टर्सनी लिहावीत म्हणून डॉक्टर्सना कमिशन देत आहेत. आणि डॉक्टर्स ती कमिशने आणि भेटवस्तू यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, कार, फॉरेन ट्रीप, गोल्डन कॉईन्स आणि पैसे इत्यादी स्वीकारुन दर्जाहिन औषधे लिहीत आहेत. या संबंधी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ने डॉक्टर्सवर कडक बंधने घालूनही आपल्यातील काही डॉक्टर्स त्याचे उल्लंघन करीत आहेत. तेव्हा पेशंटच्या मनातून डॉक्टरने उतरण्यापूर्वी आणि कायदेशीर कारवाई होऊन परवाना रद्द होण्याआधी आपण पेशंटच्या हितासाठी सर्व काही करण्याची गरज आहे. डॉ. अंजलीच्या बोलण्याचा बराच परिणाम झाला. काही डॉक्टर्स जे औषध कंपन्यांकडून कमिशने किंवा भेटवस्तू स्वीकारत होते ते बंद झालं. 
डॉ. अंजलीने मग मेडिकल जर्नल्स मधून हा विषय पोटतिडकीने मांडायला सुरुवात केली. ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन जर्नल्सच्या संपादिका डॉ. शीला मेहता यांनी तिचे कौतुक केले. हा विषय भारतभर गाजला. अनेक वृत्तपत्रात, टि.व्ही. चॅनेल्सवर याबाबत चर्चा घडल्या. कलकत्त्याच्या खासदार डॉ. बॅनर्जी यांनी राज्यसभेत हा प्रश्न विचारला. अनेक खासदारांनी या चर्चेत भाग घेतला. आरोग्य मंत्र्यांनी याची नोंद घेतली आणि सरकार याबाबत कडक कायदे करील असे आश्वासन दिले. डॉ. अंजलीची अनेक चॅनेल्सनी मुलाखती घेतल्या. त्यामुळे घराघरात या विषयी जागृती झाली. 
अंजलीला माहीत होत की आपण एवढा लढा लढू शकलो कारण निनाद सोबत होता. निनाद भेटला नसता तर तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि एकंदर डॉक्टर व्यवसायात काय चाललय याची कल्पनापण नसती. हल्ली वेळ मिळेल तेव्हा अंजली निनादच्या घरी जाऊ लागली होती. जन्मापासून अंजलीने श्रीमंतीच पाहिली. घरी, मामाकडे, मावशीकडे मोठे मोठे बंगले, गाड्या, नोकरचाकर. निनादच्या घरी तिने मध्यमवर्गीय राहणीमान पाहिले. निनादची आई करायची ते मालवणी जेवण तिला आवडू लागले. कुळीथाची पिठी, काळ्या वाटाण्याची उसळ, तांदळाच्या शेवया, मालवणी मसाला घालून केलेले माशाचे कालवण तिला फार आवडायचे. 
खूप वर्षांनी अंजलीला लग्नाची ओढ लागू लागली. कॉलेजकाळात उमेश बरोबर प्रेम केलं. लग्नाच्या आणाभाका घेतल्या पण एमबीबीएस झाल्यानंतर वरच्या जातीच्या उमेशला आईवडीलांनी आपल्यासोबत लग्नाला कडकडून विरोध केला. आणि केवळ परजातीतील म्हणून अंजलीला स्वीकारले नाही. उमेशचे त्याच्याच जातीतील मुलीशी लग्न लावून टाकले. ती भळभळती जखम सांभाळत अंजली एवढी वर्षे राहिली. आईबाबांनी अनेक डॉक्टर्सची स्थळे सुचविली. पण अंजलीने इंटरेस्ट दाखविला नाही. कोणी मनासारखे मिळेपर्यंत ती लग्न करणार नव्हती. गेली सहा महिने निनादचा सहवास मिळाला. निनाद तिच्या मानाने कमी शिकलेला, मध्यमवर्गीय असला तरी त्याचा ती फारसा विचार करत नव्हती. त्याच्यातील धडाडी, स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकता आणि राष्ट्रप्रेम तिला आकर्षित करत होतं. हे असलं तरी निनादच्या मनाचा ठाव तिला लागत नव्हता. परंतु आत निनाद समोर आपलं मन मोकळ करायचं तिने ठरवलं. 
दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी सोनं देण्याच्या निमित्ताने अंजली निनादच्या घरी गेली. निनादला आणि निनादच्या आईला तिनं सोनं दिलं. निनादच्या आईने तिच्या घरची सर्व चौकशी केली. आईबाबांची चौकशी केली. त्यावर अंजली उद्गारली, ‘‘आईबाबा बरे आहेत. त्यांचं नेहमीप्रमाणे चाल्लयं... रोजचे पेशंट, ऑपरेशन्स चालू आहेत. पण हल्ली आई माझ्यामागे लग्नासाठी लागलीय. कुठली कुठली स्थळं मला आणून दाखवत असते. 
अगं बरोबर, मुलीच्या लग्नाची काळजी आईवडिलांना असणारचं. आता वेळ काढू नकोस बाई. कुठ काही ठरलयं का? - आई म्हणाली. 
खरं सांगायला हरकत नाही, पण कॉलेजच्या काळात म्हणजे सात वर्षापूर्वी मी वर्गातील एका मुलाच्या प्रेमात होते. आम्ही खूप स्वप्ने बघितली होती. कॉलेज काळात आम्ही सतत सोबत असायचो. तो फिजीशिएन होणार होता आणि मी गायनॉकॉलॉजिस्ट होणार होते. परंतु त्याचे आईवडील फार कर्मठ होते. वर्गातील कुणीतरी मुलाने आमच्या मैत्री विषयी त्याच्या आईवडिलांकडे चुगली केली. आणि त्याच्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर तो गेला नाही. आणि नात्यातल्या आणि जातीतल्या मुलीशी लग्न करुन मोकळा झाला. खरंतर मी उद्ध्वस्त झाले. काही काळ झोपेच्या गोळ्यापण घेत होते. पण नंतर आईबाबांचा विचार आला आणि मी सावरले. व्यवस्थित अभ्यास केला. एम.डी. झाले. अनेक डॉक्टर्सनी माझ्याशी लग्न करायची तयारी दाखविली. पण खर सांगू मला कुणातच इंटरेस्ट वाटला नाही. एकदा मन पोळलं होतं त्यामुळे लग्न करायचच नाही असं ठरवलं होत पण....
पण काय गं? आई म्हणाली. 
‘‘गेल्या सहा महिन्यापासून पुन्हा माझ्या जीवनात हिरवळ आल्यासारखी वाटू लागलय. मी चक्क प्रेमात पडलेय. फक्त माझ्या प्रियकराच्या मनातले निश्चित काही कळत नाहीय. त्याला मला आता विचारायचे आहे. 
अंग मग त्याला विचार, वेळ कशाला काढतेस? कुठे असतो तो? - आई म्हणाली.
हा काय माझ्या समोरच बसलाय. निनादकडे बोट दाखवून अंजली म्हणाली. 
कोण मी? छे ! छे ! निनाद उडालाच.
निनाद, मला कल्पना आहे, तू तुझ शिक्षण, माझं शिक्षण किंवा श्रीमंती गरिबी असा विचार करत असशील तर तुला माहिती आहे इतर मुलींसारखी मी नाही. गेल्या सहा महिन्यापासून तू मला जवळून पाहतो आहेस. दोघांची मन जुळावी लागतात रे.’’ 
अंजली, आपल्यात शिक्षण, श्रीमंती यात मोठा फरक आहे हे खरेच पण याबद्दल मला काही फरक पडला नसता. तुझ्यासारखी उच्चशिक्षित, श्रीमंत मुलीचे पाय किती जमिनीवर आहेत हे मी पाहतोय. तू किती साधी सरळ मुलगी आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्या आईला पण तू फार आवडतेस हे मला माहिती आहे. पण अंजली मॅडम मी संघाचा कार्यकर्ता आहे. ५ वर्षे नागालँडमध्ये आदिवासी भागातील काम अर्धवट ठेवून मी आलो आहे माझ्या आईसाठी. ज्या दिवशी माझ्या आईचा हात माझ्या हातातून सुटेल त्या दिवशी मी माझे अर्धवट काम पुरे करण्यासाठी जाईन. मॅडम, तुम्ही पुढे केलेला हात न स्वीकारणारा मी करंटा असेन कदाचित. पण सॉरी मॅडम... आम्ही कार्यकर्ते वेडे असतो. आमची आयुष्य आम्ही संघटनेसाठी दिलेले असते. आमची संघटना सांगेल तेथे आम्ही काम करतो. अशा वेळी कुठलेही पाश आमच्याभोवती नको असतात. सॉरी मॅडम...
खोलीत शांतता पसरली. फक्त तिघांचे निःश्वास ऐकू येत होते. आईचे, अंजलीचे डोळे भरुन आले होते. दोन मिनिटं त्या खोलीत स्तब्धता पसरली. मग ‘‘येते’’ म्हणत अंजली बाहेर पडली. अंजली गेलेल्या दिशेकडे आई शून्य नजरेने पाहत राहिली.

प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९

1449. कलंक

      त्या वृद्धाश्रमात आज नेहमीपेक्षा जास्तच गडबड दिसत होती. कारणच तसे होते. आजपासून गणेशोत्सव चालू होणार होता. सर्व वृद्ध स्त्रीपुरुष आपल्यापरीने गणेशाच्या आगमनाची तयारी करत होते. गणेशाची पूजा करायला का होईना काहीजणांनी मुले नातेवाईक येणार होते. आता दहा दिवस वृद्धाश्रम उत्साहाने फुलून जाणार होता. थरथरत्या हाताने आरती ओवाळली जाणार होती तर अडखळत का होईना पण उत्साहात आरती म्हटली जाणार होती. शहराबाहेर तो वृद्धाश्रम बांधला होता. कोणी बांधला होता याची माहिती फारशी कोणाला नव्हती. पण नको झालेल्या वृद्धांना हा आश्रम सहारा देतो हे बहुतेकांना माहीत होते. त्यामुळे बरेच वृद्ध स्त्रीपुरुषांच्या हक्काचे ठिकाण बनले होते.इथे अति वृद्ध ,आजारी, रोगी, जखमी असे सर्वजण एकमेकांना सांभाळत राहत होते. इथला खर्च कोण कसा चालवतो याची माहिती कोणाला नव्हती पण एक दोन केयरटेकर नियमितपणे वृद्धाश्रमाची काळजी घेत होते. बापू राणे साधारण नव्वदीच्यावर होते. आता त्यांचे उरलेले आयुष्य अंथरुणात आणि व्हीलचेयरवर होते. दरवर्षी गणपती आला की ते आयुष्यातून सुटका मागत होते. पण अशी सुटका त्यांच्या नशिबात अजूनतरी दिसत नव्हती. आश्रमातील इतर वृद्ध त्यांच्यापासून लांबच राहत होते. तर काही ओळखीचे त्यांना चोर म्हणून ओळखत होते.
 खरे आहे, बापूंनी आपली उमेदीची काही वर्षे तुरुंगात काढली होती. त्यावेळी तुरुंगवास झालेल्या व्यक्तींना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान होता. पण बापूंच्या ते ही नशिबात नव्हते. टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील एका मूर्तीचे दागिने चोरल्याचा आळ त्याच्यावर होता आणि त्याचीच शिक्षा त्यांनी भोगली होती. ते दागिने अजूनपर्यंत कधीच सापडले नव्हते आणि बापूनी ते कुठे आहेत हे सांगायला अजूनही तोंड उघडले नव्हते. त्यांच्या या कृतीची शिक्षा कुटुंबीयांनी भोगली होती. घरदार सोडून दूर या शहरात यावे लागले होते. पण इथेही त्यांची अपकीर्ती पाठ सोडत नव्हती. काळ बदलला. हळूहळू वातावरण निवळू लागले. त्यांच्या नातवंडांनी ही गोष्ट कधीच फारशी मनाला लावून घेतली नव्हती. ते सर्व आता उच्चवर्गीय झाले होते आजोबांचा घरात त्रास होऊ लागला होता. मग त्यांची रवानगी ह्या वृद्धाश्रमात झाली होती. दुर्दैवाने इथेही त्यांच्या कामगिरीची बातमी पोचली होती. काही वृद्ध त्यांना ओळखत होते आणि त्यांनीच ही बातमी संपूर्ण वृद्धाश्रमात फैलावली होती. त्यामुळे प्रत्येकाची त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली होती. म्हणूनच बापू राणे आयुष्याला कंटाळले होते. कधी एकदा गणपती येतो आणि त्याच्याकडून सुटका करून घेतो असे झाले होते.
      बाप्पा मोरयाच्या गजरात सिंहासनावर बसून तो आत शिरला तेव्हा त्याच्या मनात धडधड सुरू झाली. दोन्ही बाजूला पाट धरून उचलणारे म्हातारे स्वतःला तरी सांभाळतील का याचीच भिती त्याला मखरापर्यंत पोचेपर्यंत वाटत होती. हताश नजरेने तो नेहमी आपल्या बाजूला असणाऱ्या उंदराला शोधू लागला .तेव्हा ते महाशय आधीच मखरात जाऊन स्वतःची जागा पटकावून बसले होते. त्याच्या नजरेतील छद्मी भाव पाहून तो हसला आणि अलगद जागेवर जाऊन बसला.
"तुम्हाला या म्हाताऱ्यांच्यात बसायला बरे आवडते." प्रसादासाठी आणलेल्या उकडीच्या मोदकाकडे तो आशाळभूत नजरेने पाहत म्हणाला .
"अरे बरेच हिशोब बाकी आहेत यांच्याकडे, म्हणून मुद्दाम आलोय इथे" तो लोडाला टेकून आजूबाजूला नजर फिरवीत म्हणाला .
"आरती तरी फिरवतील ना नीट. नाहीतर पेटता दिवा आपल्याच अंगावर पडायचा. आरती स्पष्ट तरी म्हणता येईल का त्यांना" त्याने शेपटी हलवीत नाक मुरडत विचारले.
"हीच ती माणसे आहेत ज्यांनी आपल्याला घरातून बाहेर काढून सार्वजनिक बनविले आणि स्वातंत्र्यसंग्राम पेटविला हे विसरू नकोस मूषका" कठोर आवाजात त्याने आपल्या अधिकाराची जाणीव करून दिली. त्यानंतर रोज त्याची आरती झाल्यावर वेगवेगळे कार्यक्रम होत होते. तोही तल्लीन होऊन त्याचा आनंद घेत होता. बापू राणे मात्र खोलीतूनच त्याच्या पाया पडत होते. विसर्जनाच्या दिवशी एक तरुण वृद्धाश्रमात शिरला. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामावर  काही व्याख्यान द्यायची इच्छा होती. स्वातंत्र्यसंग्राम हे नाव ऐकताच बापू राणे व्हिलचेयर वरून बाहेर आला. त्यांना पाहून तो तरुण हसला. त्याचे आश्वासक हास्य पाहून बापू भारावून गेला.
"भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामचा तो ऐन भराचा काळ होता. महात्माजींनी करो या मरो अशी हाक दिली होती. काही ठिकाणी हिंसा चालू होती. इंग्रज अधिकारी त्याचा फायदा घेऊन घरदार लुटत होते तर काही इंग्रज, स्त्रियांची अब्रू खुलेआम लुटत होते. अश्याच एका घरात ते चार इंग्रज अधिकारी शिरले आणि त्या घरातील दोन छोट्या मुलींची आणि त्यांच्या आईची अब्रू लुटून त्यांना ठार केले. पण काही काही महिन्यातच त्याच घरात त्यांची गोळ्यांनी छिन्न झालेली प्रेते सापडली होती. आजपर्यंत त्यांना कोणी ठार केले याचा शोध लागला नाही. अजूनही ती केस ब्रिटिश दप्तरी ओपनच आहे. पण त्या घटनेच्या काही दिवस आधी त्या गावातील सार्वजनिक गणपतीच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले होते त्या चोराला मात्र इंग्रजांनी पकडले काही वर्षे तुरुंगवास भोगून तो कुठे गायब झाला ते कळलेच नाही." तो तरुण रंगून व्याख्यान देत होता.
" हे काय ते महान चोर बापू राणे." कोपऱ्यात केविलवाणा चेहरा करून  बसलेल्या बापूंच्या दिशेने बोट करीत एक वृद्ध म्हणाला .
"तुम्हाला फक्त त्यांची अर्धवट कथा माहितीय. त्यांनी चोरी केली हे खरंय पण त्या दागिन्यांतून त्याने बंदूक आणि काडतुसे खरेदी केली आणि त्या चार अधिकाऱ्यांसह पुढे कित्येक इंग्रजांना ठार केले हे कितीजणांना माहीत आहे." त्या तरुणाने शांतपणे प्रश्न विचारला. ते ऐकताच सर्व स्तब्ध झाले. सर्वांनी उठून बापूंपुढे हात जोडले आणि माफी मागितली. बापूनी भरल्या डोळ्यांनी त्या तरुणांकडे पाहत हात जोडले आणि खोलीत नेण्याची खूण केली.
त्या तरुणाने व्हीलचेयर ढकलत खोलीत आणली. "हे सर्व तुला कसे कळले? माझ्याशिवाय ही गोष्ट कोणालाच माहीत नाही" बापूनी त्याच्या डोळ्यात नजर रोखून विचारले.
"आहो बापू माझेच तर दागिने त्या दिवशी चोरले होते तुम्ही आणि त्या दागिन्यांचे तुम्ही काय करणार याचीही माहिती होती मला." तो हसत म्हणाला .
"मग इतकी वर्षे का आला नाहीस? गेली कित्येक वर्षे माझी सुटका कर म्हणून हात जोडून विनंती करतोय तुला? खरे सांग कोण आहेस तू ? बापूनी रागानेच विचारले.
"कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते बापू. आज ती वेळ आलीय पण जाण्यापूर्वी तुमच्या नावावर लागलेला कलंक ही मिटला पाहिजे. कळू द्या जगाला स्वातंत्र्यलढ्यात तुमचे काय योगदान आहे ते आणि जाता जाता मी कोण हे ही दाखवतो तुम्हाला." असे बोलून त्याने आपले खरे रूप प्रकट केले. बापूनी  मान  वर करून पाहिले तर तो आपल्या मूळ रुपात उभा होता. त्याचे ते तेजस्वी रूप बापूंना सहन झाले नाही. समाधानाने त्यांनी डोळे मिटले .
" काय  गरज होती त्याला आपले खरे रूप दाखवायची" नेहमीप्रमाणे उंदीर चिडून म्हणाला .
"अरे आज त्याचा शेवटचा दिवस आहे या जगात. त्याने केलेल्या कार्याची कदर व्हावी म्हणून त्याला खरे रूप दाखवून समाधान दिले" तबकातील एक मोदक तोंडात टाकीत तो हसत म्हणाला .

© श्री. किरण कृष्णा बोरकर

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...