शनिवार, ३१ मे, २०२५

1933. पैशाला हवी कष्टाची साथ

       पांडू तात्यांची नात केतकी हीचं यावर्षी पदवीचे शिक्षण पूर्ण झालं होतं त्यामुळे तिच्या लग्नाचा विषय घरामध्ये सुरू होता. केतकी हुशार आणि दिसायला सुंदर होती. यावर्षी तिचं लग्न करायचं असल्यामुळे तिच्यासाठी वर संशोधन सुरू होतं. जवळपासच्या मित्रमंडळी आणि पाहुण्यांना तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ शोधण्यासाठी सांगितलं होतं. लग्नासाठी बायोडाटा तयार करून तो मित्रमंडळी आणि पाहुण्यांमध्ये देण्यात आला होता. 
      पुण्यातील एका पाहुण्यांनी एक स्थळ आणलं होतं. पाहुण्यांनी आणलेलं स्थळ श्रीमंत होतं. मुलाने सुद्धा पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. दोन्ही बाजूला एकमेकांची पत्रिका पाठवण्यात आली होती. विवाहासाठी आवश्यक असणारे गुण जुळल्यामुळे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. पुढच्याच आठवड्यात पाहुणेमंडळी केतकीला पाहण्यासाठी आली. पाहुण्यांचा रुबाब काही वेगळाच होता. पाहुण्यांचा एकंदरीत पेहराव पाहून त्यांच्याकडे चांगली श्रीमंती असावी असा एक वेगळाचं रुबाब त्यांच्या वागण्यात होता. एका अलिशान गाडी मधून सर्व पाहुणे मंडळी आली होती. मुलाचे वडील, आई, बहीण, नवरदेव मुलगा आणि लग्नासाठी मध्यस्थी असणारे पाहुणे, अशी मंडळी मुलगी  पाहण्यासाठी आली होती. 
      मुलाच्या आईच्या अंगावर खूप सोन्याचे दागिने होते. वडिलांच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन, हाताच्या बोटात अंगठ्या तसेच नवऱ्या मुलाच्या हाताच्या बोटात सुद्धा सोन्याच्या अंगठ्या, गळ्यामध्ये सोन्याचा गोफ, हातामध्ये सोन्याचे ब्रेसलेट असा सगळा एकंदरीत थाट होता. एवढं सगळं सोनं पाहून पांडुतात्या आणि त्यांच्या घरच्या मंडळीच्या वर एक प्रकारचे दडपण आल्यासारखे वाटत होते. जरी दडपण आले असले तरी एक चांगलं मातब्बर स्थळ आपल्या मुलीला मिळतंय याचा एक वेगळा आनंद सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर होता. पाहुण्यांच्या सरबराईत मध्ये कुठेही कमी पडायचं नाही, असं मनोमन त्यांच्या घरच्या मंडळींनी ठरवलं होतं. तात्यांच्या घरी सर्व पाहुणे मंडळी आल्यानंतर तात्यांच्या मुलांनी पाहुण्यांना पाणी दिले. नंतर केतकी स्वतः पाहुण्यांसाठी चहा घेऊन आली. चहा पाणी झाल्यानंतर पाहुण्यांना खाण्यासाठी कांदेपोहे देण्यात आले. कांदेपोहे खाल्ल्यानंतर मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम होणार होता.
पाहुण्यांमध्ये आणि तात्यांमध्ये पोहे  खाता खाता गप्पा सुरू झाल्या. लग्नाची मध्यस्थी  करणारे पाहुणे पाहुण्यांची ओळख करून देत होते. पाहुण्यांबद्दल माहिती सांगत होते .पोहे खाताखाता तात्यांनी मुलाच्या वडिलांना विचारले, "पाहुणे तुम्ही काय व्यवसाय करता?"
त्यावर मुलाचे वडील म्हणाले, "आम्ही काहीच व्यवसाय करत नाही. आम्हाला व्यवसाय करायची गरजच काय ?"
"म्हणजे, मी काही समजलो नाही. तुम्ही एवढे श्रीमंत आहात म्हणजे तुमचा काहीतरी व्यवसाय असेलच ना ?" तात्यांनी पाहुण्यांना प्रतिप्रश्न केला.
"आम्ही औद्योगिक परिसरात राहतो. आमच्या भागात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. आमच्याकडे जमिनीला खूप मोठा भाव आहे त्यामुळे आम्ही काही काम धंदा करत नाही." मुलाचे वडील हातातल्या बोटात असणारी अंगठी फिरवत बोलले.
"काम धंदा करत नाही, मग एवढं वैभव आलं कुठून तुमच्याकडे" तात्यांनी पुन्हा विचारले.
"अहो आमच्याकडे पाच एकर जमीन होती. त्यातली तीन एकर आम्ही विकून टाकली. त्यातून सोनं-नाणं, बंगला, गाडी असं खरेदी केलं आणि राहिलेले पैसे बँकेमध्ये टाकलेले आहेत आणि त्याचं व्याज आम्हाला येत आहे. त्यामुळे आम्हाला काम करण्याची काहीच गरज नाही." मुलाच्या वडिलांनी तात्यांच्या प्रश्नावर अधिक खुलासा करत म्हटले.
"अहो मग मुलगा काय करतो ? तो तरी काही काम धंदा करत असेल ना?" तात्यांनी पुन्हा विचारले.
तात्यांच्या या प्रश्नावर मध्यस्थी असणारे पाहुणे म्हणाले, "अहो तो सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे. मागच्या निवडणुकीत तो चांगल्या मतांनी निवडून आला आहे. गावचे  राजकारण बर्‍यापैकी तोच सांभाळत असतो."
"असं होय, त्याचा भविष्यकाळासाठी काय प्लॅन आहे?"
तात्यांनी पाहुण्यांना विचारलं.
"अहो तात्या, पुढच्या महिन्यात होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तो उभा राहणार आहे. त्याचा लोकांशी आणि तरुणांशी चांगला संपर्क आहे आणि निवडणुकीसाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे आहे त्यामुळे भविष्यकाळात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि कदाचित आमदार सुद्धा होऊ शकतो." पाहुणे मुलांबद्दल अधिक माहिती देत म्हणाले.
"अरे वा...अगदी चांगलं आहे म्हणायचं, किती पैसे आहेत म्हणायचं तुमच्याकडे? जरा अधिक खोलात विचारतोय म्हणून राग मानू नका" तात्या  म्हणाले.
"तसं काही नाही बिनधास्त विचारा, आम्हाला राग येणार नाही. आमचे पन्नास लाख रुपये बँकेत शिल्लक होते पण आत्ताच ग्रामपंचायत निवडणुकीला एक दहा बारा लाख रुपये खर्च झाले आणि आता शिल्लक पैसे बँकेमध्ये आहेत आणि पैशाची काही चिंता नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही. अजून आपली दोन एकर जमीन शिल्लक आहे, वेळप्रसंगी कमी पडली तर ती वापरू" पाहुण्यांनी अधिक खुलासा करत सांगितले.
"अहो तात्या, तुमच्या नातीला या घरात कसलंच काम करावं लागणार नाही, घरात सगळ्या सुखसुविधा आहेत, मुलगा चांगला आहे, विशेष म्हणजे त्यांच्याकडे चांगली संपत्ती आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका." मध्यस्थी पाहुण्यांनी माहिती दिली.
बोलता-बोलता पोहे कधी संपले ते कळलेच नाही. तात्या पाहुण्यांशी अधिक संवाद साधत होते तेवढ्यात नवरी मुलगी तयार होऊन बाहेर आली. मुलाने, मुलाच्या वडिलांनी, त्याच्या आईने काही प्रश्न मुलीला विचारले. मुळातच केतकी ही दिसायला सुंदर हुशार आणि सोज्‍वळ असल्यामुळे पाहुण्यांना ती पसंत पडली होती. मुलीला पाहून एक वेगळा आनंद पाहुण्यांच्या चेहऱ्यावरती जाणवत होता. मध्यस्थी पाहुण्यांच्या मार्फत  मुलगी आवडली असल्याचा निरोप त्यांनी तात्यांना आणि त्यांच्या घरच्यांना दिला.
       लवकरच लग्नाची पुढची बोलणी सुरू करण्याचा विचार होता परंतु तात्यांनी एक आठवड्याचा अवधी मागून घेतला. पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुणे त्यांच्या घरी निघून गेले. तात्यांच्या घरी लग्नाच्या पुढच्या बोलणीसाठी सगळे एकत्र जमले होते. त्यांचा मुलगा तात्यांना म्हणाला, 
"तात्या, चांगलं स्थळ आपल्या मुलीला मिळाले आहे, त्यामुळे हे चांगलं स्थळ हातचं जाऊन द्यायचं नाही, त्यामुळे थोडेफार कर्ज झालं तरी हे लग्न आपण जमवायचं, तुमचं काय मत आहे, पाहुण्यांना कधी बोलवायचं लग्न पक्कं करण्यासाठी ?"
"अरे जरी हे स्थळ चांगलं वाटत  असलं तरी मला मात्र हे मुळीच पसंत नाही. मला वाटतं आपली केतकी या घरांमध्ये देऊ नये" तात्यांनी आपले मत मांडले.
"अहो तात्या काय म्हणताय तुम्ही, एवढं चांगलं स्थळ आहे आणि त्याला तुम्ही नकार देत आहात," तात्यांचा मुलगा थोडासा रागानेच म्हणाला.
"अरे बाबा, स्थळ जरी चांगल असलं तरीपण या पाहुण्यांकडे किंवा मुलाकडे कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व नाही, यांच्याकडे सगळा पैसा हा बिना कष्टाने मिळालेला आहे, त्यामुळे यांना पैशाची किंमत नाही, कष्टाची किंमत नाही आणि असा पैसा कितीही असला तरी तो पुरत नाही, त्यामुळे अशा घरी आपण आपली मुलगी देऊ नये" तात्यांनी आपले मत मांडत म्हटले. 
"अहो तात्या, त्यांच्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे म्हणून ते काम करत नाहीत‌. एवढा पैसा असल्यानंतर कोण माणूस काय काम करेल, आणि शेवटी पैसाच महत्त्वाचा आहे ना? आपल्या मुलीला सगळी सुखं मिळतील मग आपल्याला आणखी काय पाहिजे!"
तात्यांचा मुलगा या स्थळाच समर्थन करत म्हणाला.
"अरे बाबा, असा किती पैसा असला तरी त्याला कर्तृत्वाची आणि कष्टाची जोड नसेल तर तो पैसा पुरत नाही आणि सहजपणे ज्यांना पैसा उपलब्ध झाला आहे ती माणसं पैसा सुद्धा अगदी सहजपणे उधळत असतात आणि भविष्य काळामध्ये यांच्यावर वाईट प्रसंग येत असतात. आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवून तो अधिक कसा वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला कष्टाची जोड दिली तर तो अधिक काळ टिकत असतो, त्यातून प्रगती होत असते, परंतु या पाहुण्यांच्या बाबतीत मला तसं काही दिसत नाही, त्यामुळे आपण या स्थळाला नकार दिलेला बरा."
तात्यांचं हे म्हणणं तात्यांच्या घरच्यांना आणि मुलांना पटले. त्यामुळे तात्यांनी पाहुण्यांना नकार कळवला.
      पुढे दुसऱ्या एका मुलाशी केतकीचा विवाह संपन्न झाला. एका सामान्य आणि होतकरू मुलाबरोबर त्यांच्या नातीचा विवाह झाला. दहा बारा वर्षानंतर एका कार्यक्रमात तात्यांना केतकीला पाहायला आलेले पाहुणे भेटले. खरंतर दहा-बारा वर्षातच त्यांची खूप अधोगती झाली होती. राहिलेली दोन एकर जमीन सुद्धा त्यांनी विकून टाकली होती. निवडणूक आणि इतर मोठेपणाच्या गोष्टी याच्यावर त्यांच्याकडचा बराच पैसा खर्च झाला होता आणि त्यांचा सगळा पैसा संपून गेला होता. त्या पाहुण्यांना कुठेतरी एक नैराश्य आल्यासारखं जाणवत होतं.
      तात्यांनी आपल्या मुलांना त्या पाहुण्याबद्दल माहिती सांगितली. त्या वेळेस तात्यांचा तो निर्णय कसा योग्य होता, याची खात्री मुलांना पटली. तात्या आपल्या मुलांना त्या पाहुण्यांबद्दल सांगत असताना म्हणाले, 
"अरे जीवनात पैसा कमवत असताना त्या पैशाला कष्टाची, प्रामाणिकपणाची जोड हवी. अचानकपणे आलेला पैसा हा माणसाला बेधुंद बनवत असतो. ज्या पैशाला कष्टाची परिश्रमाची जोड असते तो पैसा कसा खर्च करावा याची जाणीव त्या व्यक्तीला असते. त्यामुळे ती व्यक्ती तो पैसा योग्य कारणासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी वापरत असते आणि यातून जी प्रगती साधली जाते ती दीर्घकाळ आणि चिरकाल टिकणारी असते हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे."
      तात्यांचं म्हणंण घरातल्या सर्व मंडळींनी ऐकून घेतलं आणि खरंच घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्यासाठी जो सल्ला देत असतात, जे काही सांगत असतात तो किती अनमोल असतो याची त्यांना जाणीव झाली.

1932. शिक्षण: समाज आणि Knowledge

      लहानपणी त्यांचा मुलगा काही केल्या शाळेत जायला तयार होईना. तो सतत नकार द्यायचा. अनेक प्रकारे वडिलांनी त्याला समजावलं पण तो काही केल्या ऐकेनाच. त्या मुलाचं म्हणणं होतं शाळेत अनेक तासांत जो माझा अभ्यास होतो तो मी घरी राहून काही वेळेतच करू शकतो. मग मी शाळेत का जाऊ? वडिलांनी मुलाला बरंच समजावलं. एक वेळ ओरडलेदेखील पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग वडिलांनी बराच विचार केला आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. एक प्रकारची जणू काही मुलाला त्याचं म्हणणं पटवून देण्याची संधी ते त्याला देत होते. त्यांनी मुलाला सांगितलं तू काही दिवस घरी बसून अभ्यास कर. मी शाळेतल्या मुख्याध्यापकांशी बोलून तुला केवळ परीक्षेला बसता येईल याची सोय करतो. वडील मुख्याध्यापकांशी सविस्तर बोलले आणि किमान एक परीक्षा त्याला अशाप्रकारे देण्याची विनंती केली. वडील स्वतः उच्चशिक्षित असल्यामुळे आणि गावातील मोठं प्रस्थ असल्यामुळे कदाचित मास्तरांनी त्यांची विनंती मान्य केली. मात्र हे झाल्यावर वडिलांनी आपल्या मुलाला एक अट घातली की शाळा सुटल्यावर शाळेतल्या मुलांबरोबर खेळण्याच्या वेळा मात्र पाळायच्या. मित्रांबरोबर गाव भटकावंसं वाटत असेल तर भटकायचं. आता मुलगा खेळण्यासाठी का बरं नाही म्हणेल? तो होच म्हणाला. मुळात अनेक विचारसरणी असलेल्या मुलामुलींबरोबर राहिल्याने अनेक अनुभव पदरी पडतात हे वडील जाणून होते. मुलगा शाळेत न जाता घरी बसूनच अभ्यास करू लागला. अगदीच काही अभ्यासात अडचण आली तर वडिलांच्या मदतीने ती अडचण दूर करू लागला. परीक्षा झाली. पठ्ठ्या त्यावर्षी आपल्या वर्गातच नव्हे, तुकडीतच नव्हे, शाळेतच नव्हे तर अख्ख्या तालुक्यात, जिल्ह्यात पहिला आला आणि हे असं एकदाच नव्हे तर पुढील सगळ्यावर्षी तो पहिला आला. पुढे तर तो मुलगा परदेशात जाऊन शिकून डॉक्टर झाला आणि गावात परतून गावाची सेवा करू लागला.
वडिलांप्रमाणेच, उच्चशिक्षित असूनही, गाव प्रगल्भ करणं हाच हेतू त्या मुलाचादेखील होता आणि तो हेतू साध्य करण्याचा तो प्रयत्न करू लागला.
     वरील घटना लक्षात घेता कुणा अतिसाधारण विचारसरणी असलेल्या माणसांच्या आयुष्यात असं घडलं तर त्यांना एखाद्वेळी आनंदच होईल. आपला मुलगा शाळेत न जाता पहिल्या नंबराने पास होत आहे आणि दप्तर, जेवणाचा डबा, Water Bag/Bottle यांसारख्या अनेक गोष्टींचा खर्च वाचतो आहे मग का आनंद होणार नाही? पण आपण आता वरील घटनांचा सारासार किंवा व्यापक पातळीवर विचार करूया. खरं तर जे घडलं ते खूप चिंताजनक आहे. ही चिंता आताच्या शिक्षणपद्धतीबद्दलची आहे हे आपल्याला कळून चुकेल. वरील घटनांमधून बरेच प्रश्न उद्भवतात. शाळेची गरजच उरली नाही तर काय होईल? आता शाळेत नक्की कोणतं शिक्षण दिलं जात आहे? शाळा आणि शिकवणी (Tuition Classes) यांमधील शिक्षणाची पद्धत आणि त्यातील दरी वाढत चालली आहे का? शाळा हा एक केवळ दिखावा झाला आहे का? नक्की शाळेत जे दिलं जातं त्याला शिक्षण म्हणता येईल का? शाळेत होणारे बदल नेमके कुठल्या दिशेने जात आहेत? मुळात मुलांनी शाळेत नेमकं का जायचं हे पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत आणि एकंदरीतच शिक्षण पद्धतीतील सगळ्या घटकांपर्यंत पोहोचलं आहे का? अशा अनेक प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची आता आपण चिकित्सा करण्याचा प्रयत्न करूया.
      आपण मर्यादित स्वरूपातच बघूया म्हणजेच प्राथमिक पातळीवरचा विचार करूया. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. असं उदाहरण ज्यामध्ये शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचं सोप्या पद्धतीने मांडलेलं उत्तर आहे. हे उदाहरण भारतरत्न विनोबा भावे यांनी एके ठिकाणी मांडलं होतं किंवा नमूद केलं होतं आणि आपण त्याचाच आधार घेणार आहोत. अगदी प्राथमिक अवस्थेशी निगडित असं हे उदाहरण आहे. कारण जर सुरुवात योग्य झाली तर पुढे सगळंच योग्य होईल.
     लहान मुलांसाठी वेगवेगळ्या चित्रांची पुस्तकं असतात. आजकाल चित्रांऐवजी फोटो असलेली पुस्तकंदेखील मिळतात. त्यातलाच एक फोटो किंवा चित्र आपण घेऊया. समजा पुस्तकातील चित्र आहे घोड्याचं. आईवडील, नातेवाईक, ओळखीचे लोक, Nursery, Playgroup, Preschool किंवा Day Care Centers मधील शिक्षक मुलाला किंवा मुलीला काय विचारतात बाळा या समोरील चित्रातील प्राणी कोणता? जर मुलांना माहीत असेल किंवा लक्षात राहिलं असेल तर ते उत्तरं देतात किंवा पहिलीच वेळ असेल तर त्यांना उत्तर सांगितलं जातं की याला घोडा म्हणतात. यानंतर अनेकदा याची उजळणी होते. मुलांच्या पक्कं डोक्यात बसतं आणि घोडा हा प्राणी सगळ्या चित्रांमध्ये नेमका कोणता ते मुलं ओळखू लागतात. असाच काहीसा इतर प्राण्यांविषयी किंवा वस्तुंविषयीचा प्रवास असतो.
     आता आपण असं समजूया की, चित्रामध्ये असलेला घोडा हा तबेल्यात उभा आहे. म्हणजेच तबेल्यात उभ्या असलेल्या घोड्याचं चित्र किंवा घोड्याचा फोटो आहे. त्या चित्रात जर त्या घोड्यासमोर त्याचं खाद्य आणि पेयं असेल (गवत/चारा/पाणी वगैरे) किंवा त्याच्या पाठीवर खोगीर असेल किंवा त्याला बांधलेला लगाम असेल किंवा घोड्याची काळजी घेणारा आणि स्वारी करणारा घोडेस्वार त्याच्या बाजूला उभा असेल किंवा अशा काही मोजक्या गोष्टी ज्या घोड्याशी संलग्न असतील ज्या त्या चित्रात किंवा फोटोमध्ये जर दाखवल्या असतील तर काय होईल? असं चित्र असलं तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यांच्या मनात प्रश्नांची साखळी निर्माण होईल. एखाद्वेळी प्रत्येक मुलगा किंवा मुलीच्याबाबतीत हे घडेलच असं नव्हे. परंतु बहुतेक किंवा बहुतांशी मुलांच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण होतील. जेव्हा मुलांना वर सांगितल्याप्रमाणे घोड्याच्याबाबतीत आणि त्याच्याशी निगडित गोष्टींची माहिती मिळेल तेव्हा त्याचे परिणाम पुढील चित्रांमध्येसुद्धा दिसतील. म्हणजे नेमकं काय? समजा पुढील चित्र हत्तीचं असेल तर मूल एखाद्वेळ विचारेल हत्ती काय खातो? हत्तीला कोण सांभाळतं? त्याची काळजी कोण घेतं? असे अनेक प्रश्न ते मूल विचारू लागेल. थोडक्यात सांगायचं तर शोध घेण्याची प्रवृत्ती त्याच्यात निर्माण होईल आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर चिकित्सा या संज्ञेत होईल. मुलांना प्राणी दाखवण्यासाठी जर जंगलात नेलं तर काहीशा प्रमाणात वर म्हटल्याप्रमाणे प्रचिती येईल. मग ते जंगल नैसर्गिक असो किंवा कृत्रिम असो. कृत्रिम जंगल म्हणजे एकप्रकारे मूळ जंगलाची छोटीशी प्रतिकृती जिथे प्राण्यांना माणसांची थोडीफार सवय झालेली असते. मुळात हा मुद्दा केवळ प्राण्यांपर्यंत सीमित नसून तो अन्य कुठल्याही विषयाशी निगडित असू शकतो.
     आधी सर्वप्रथम प्रत्येक पालकाने किंवा शिक्षकाने हे प्रश्न स्वतःला विचारावे की सगळ्या प्राण्यांची, पदार्थांची, वस्तुंची किंवा अन्य कुठल्याही बाबींची ओळख करून देणारी अनेक किंवा सगळी पुस्तकं मुळात असतातच का? केवळ वाचता येणं, ओळख होणं एवढ्यासाठी पुस्तकं असतात का? जर एखादं निरक्षर/अशिक्षित मूल असेल तर त्याला कधीच कुठलाच प्राणी, पक्षी, पदार्थ ओळखता येणार नाही का? ज्यांना लिहिता, वाचता येत नाही त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा असत नाही का? मग पुस्तकांवर खर्च का करायचा? शाळेचा खर्च कशासाठी? या पठडीतले अनेक प्रश्न आधी पालकांनी स्वतःला आपापल्या कुवतीनुसार विचारावे. 
       आता आपण वरील उदाहरणातील चित्रांच्या पुस्तकाकडे पुन्हा वळूया. आजकाल मिळणारी चित्रांची पुस्तकं जशी असतात ती तशी का बरं असतात? याचं साधं उत्तर आहे ते म्हणजे शिक्षणाचं झालेलं व्यवहारीकरण किंवा व्यावसायिकीकरण. चित्रात जर तबेल्यात उभा असलेला घोडा दाखवला तर पुस्तकाची दृश्य स्वरूपातील पात्रता (Quality) कमी होते आणि त्यामुळे त्या पुस्तकाची किंमतदेखील कमी होते. पुढे जाऊन म्हणायचं तर जास्त किंमत असलेलं पुस्तक जर पालकांनी खरेदी केलं नाही तर त्यांना मुलांसाठी काही केल्याचं समाधान मिळत नाही. यामागे मानसिकता अशी आहे की जर काही पालक मुलांसाठी वेळ खर्च करू शकत नसतील तर त्यांना गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करून त्यात समाधान मिळवावं लागतं. त्यामुळे चित्र किंवा फोटो यांचा दर्जा हा शक्यतो दिसण्यावर अवलंबून असतो. मग यावर उपाय काय? उपाय सोपा आहे. जरी चित्रात अनेक गोष्टी दाखवल्या नसल्या तरी त्या गोष्टी आईवडील, आजी-आजोबा, शिक्षक वगैरे अशा सगळ्या मोठ्या व्यक्तिंना माहीत असतातच ना? किंवा मोठ्या व्यक्तिंनादेखील जरी माहीत नसलं तरी ते माहिती काढू किंवा मिळवू शकतात ना? चित्र जरी केवळ पांढर्या शुभ्र धावत्या घोड्याचं असलं आणि जरी ते मुलांनी ओळखलं तरी त्यात काय नाही किंवा काय हवं होतं ते आपण मुलांना विचारू शकतो ना? म्हणजेच,
बाळा हा प्राणी कोणता?
उत्तर, घोडा
शाब्बास, आता मला सांग घोडा काय खातो? किंवा घोडा काय पितो? वगैरे. 
काही महाभाग म्हणजे प्रकाशक असेही आहेत जे घोड्याचं किंवा अन्य प्राण्यांचे चित्र किंवा फोटो हे समोरून काढलेले पुस्तकात दाखवतात. काय म्हणणार अशा लोकांना? पण मग अशावेळी मुलांना विचारावं बाळा सांग घोड्याला पाय किती असतात? घोड्याला शेपूट असतं का? वगैरे. असं केल्याने मुलं स्वतःहून शोध घेऊ लागतात. हा शोध सुरुवातीला उपलब्ध असलेल्या ज्ञानाशी (Knowledge) निगडित असतो जो पुढे जाऊन नवीन शोध घेण्याकडे म्हणजेच उपलब्ध ज्ञानात भर टाकण्याकडे वाटचाल करू लागतो. समोरील प्राण्याला किंवा वस्तुला किंवा अन्य कोणत्याही गोष्टीला काय म्हणतात किंवा जे काही म्हणतात ते ओळखणं यास ज्ञान (Knowledge) संपादन करणं म्हणतात. परंतु ज्ञान (Knowledge) मिळवणं हा शिक्षणाचा केवळ एक भाग आहे. शिक्षणाचा खरा हेतू आहे तो म्हणजे शोध घेणं आणि घेतलेल्या किंवा लागलेल्या शोधाची चिकित्सा करण्याची प्रवृत्ती निर्माण करणं. आजकाल जे शिक्षण आहे ते पूर्णपणे व्यावहारिक किंवा व्यावसायिक शिक्षण आहे. ज्याचा पूर्ण भर हा निव्वळ ज्ञान (Knowledge), निव्वळ यश, निव्वळ पदवी, निव्वळ हुशारी, निव्वळ मोठेपणा मिळवण्यावर आहे. अर्थात, शिक्षण हा विषय एवढाच मर्यादित नाही तर पुढे जाऊन खूप व्यापक आणि तितकाच गंभीरदेखील आहे. शिक्षणातील यश-अपयशाशी संबंधित असलेला ताणतणाव, मुलांमध्ये वाढत जाणार्या ताणतणावांमुळे होणार्या आत्महत्या, शिक्षणसंस्थेकडून मागितली जाणारी भरमसाठ फी/शुल्क वगैरे. एकंदरीत शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण आणि त्या बाजारीकरणाला मिळालेलं अवास्तव महत्त्व याला आपण बळी तर पडत नाही ना याचा विचार प्रत्येक पालकाने करणं गरजेचं आहे.
      आपण आता केवळ प्राथमिक पातळीवरती शिक्षणाची चिकित्सा केली आहे. या पुढील शिक्षण या विषयाशी संबंधित चिकित्सा प्रत्येक पालकाने आपापल्या पातळीवर समाजातील सर्व स्तरातील मुलांसाठी जरूर करावी ही विनंती.

1931. दूधभात

        घरात स्मशान शांतता पसरली होती. ओट्यावर कोपऱ्यात बसलेल्या अमोलचें मुसमुसणे तेवढे ऐकू येत होते. त्याचे आजोबा आराम खुर्चीत बसून अधूनमधून "श्रीराम श्रीराम 'म्हणत होते. आतल्या खोलीतून अमोलच्या आईचा भांडी धुण्याचा आवाज तेवढा आवाज अधूनमधून ऐकू येत होता, बाकी सारे शांत.
ही शांतता मोडत आई पदराला हात पुसत बाहेर आली आणि कोपऱ्यात मुसमुसणाऱ्या अमोलकडे पहात म्हणाली
"अम्या, हयाच्या पुढे गोठ्यात वासरू, रेडकू आणू नको हां, तुका सांगन ठेवतंय, माका आता झेपणा नाय तेंचा शेण मूत काढुक, माजा पण आता वय झाला '.
"पण आई, देवान असा काय केला, आमचो गोठो रिकामो केलो, चार महिन्यात चार गाई, दोन वासरा मारून टाकल्यानं '
तेवढ्यात आजोबा उदगारले " देवाक दोष देव नको रे, एकदा गळती सुरु झाली की झाली, रोग पसारलो काय थांबणा नाय, तिठ्या वरच्या मांजरेकराच्या गोठ्यात पण हीच तरा, तेची पण चार गुरा मेली चार महिन्यात.
"पण आमचा मैना काय हुशार होता हो, काळो रंग, तोंडार पांढरा बिस्कीटसारखो डाग, कान नुसते आवाज ऐकत, माजो आवाज इलो काय काय मागचे खूर जमिनीत घुसवी आणि दाव्यावर हिसके मारी '.
तेवढ्यात आई म्हणाली " खरंच मैना म्हणजे अस्सल गाय, अशी गाय या गोठ्यात कधीच दिसाक नाय '.
आजोबा -तेका दृष्ट लागली त्या सावतीनीची, जाता येता तेच्या पाठीर थापटा मारी, माका पण अशी गाय होई म्हणून सांगत रवा.
अमोल - पण आजोबा, सहा महिन्यात आमचो भरलेलो गोठो रिकामो झालो हो, बाबा व्हते तेवा बारा गुरा होती. बाबा गेले आणि वर्षात सहा वर आकडो इलो. मी किती काळजी घेय सगळ्यांची.
आजोबा - होय बाबा, रमेश गेलो तरी तू त्याचाच सारखी काळजी घेस, डॉक्टरक बोलावून कसली कसली इंजेकशन देस तेंका, शेतात मको लावलास, गुरंका हिरव्या खाऊक होया म्हणून, तेंका ओढ्यार नेऊन आंघोळ घालीस, कुंडो पेंड कसलीच कमी नाय केलंस, पण इतक्या करून..
अमोल -बाबा काय म्हणतीत,? हय माझ्या झिलाक गुरंका सांभाळूक जमला नाय, हो पण इतर मुलांसारखो मोबाईल बघित बसलो.
आजोबा -नाय बाबा नाय, तुझी काय चूक नाय, आता नवीन पोरा बघुचे तेवा मोबाईल मधी असतात पण तू गोठ्यात गुरा भोवती.
आई - म्हणून मी सांगताय, तू अभ्यासर लक्ष दी, खायतरी नोकरीक लाग, हय गाई गुरंचा वेड बरा नाय बाबा, तुज्या बाबान पण ह्याच केलान, आजोबानी ह्याच केल्यानी. शेती बागायती आणि गाई म्हशी.
आजोबा - म्हणून या घरात भरपूर दूधदुभाता कायम होता, माझी मुला, नातू हय गाईचा दूध पिऊन मोठे झाले.
अमोलच्या आजोबांना गुरांची आवड, गोठ्यात नेहेमी गाई, म्हशी, त्त्यांची वासरे असायची, मात्र गाईने किंवा म्हशीने पाडा जन्माला घातला तर तो त्याचे आईचे दूध पिणे थांबले की कुणातरी शेतकऱ्याला देऊन टाकीत, त्याचे पैसे कधी घेत नसतं, फक्त तो शेतकरी त्याचे खाण्याचे हाल करणार नाही, अशालाच तो देत.
त्यांची ही गाई गुरांची आवड त्यांच्या मुलात म्हणजे अमोलच्या बाबांना पण लागली. ते विदयुत खात्यात नोकरीं करत आणि आपली गाईम्हशीची आवड पण सांभाळत. अमोलची आई बालवाडी शिक्षिका होती, गावातल्या गावात नोकरीं होती.
अमोल त्त्यांचा एकच मुलगा, अभ्यासात हुशार पण इतर त्याच्या वयाच्या मुलांसारखा टी व्ही, मोबाईल मध्ये अडकला नाही, तर गोठ्यात रमला, वेळ मिळेल तेंव्हा तो गाईच्या वासरा बरोबर खेळत राहायचा, त्याना मळ्यात फिरवून आणायचा,चारा घालायचा, त्यांना ओढ्यावर नेऊन धुवून काढायचा.
अमोलचे बाबा स्कुटर अपघातात गेले आणि कुटुंबाला मोठा झटका बसला. आता कुटुंबात आजोबा, अमोलची आई आणि अमोल ही माणसे राहिली.
   गोठ्यात बारा गुरे होती, आजोबानी त्यातली सहा गुरे कमी केली म्हणजे आपल्या लांबच्या नातेवाईकांना देऊन टाकली. आता दोन दुभत्या गाई आणि त्यांची चार वासरे. रोज दूध काढावे लागे, अमोलचे बाबा एवढी वर्षे दूध काढायचे. आता अमोलची आई आणि अमोल दूध काढायला शिकले.
  रोज सहा सात लिटर दूध येत होते, आपल्याला ठेऊन बाकी डेअरीला देत होते. शाळेतून आल्यावर अमोल मळ्यात भाजी लावू लागला, विहीर होतीच, त्या पाण्यावर वाली, मुळा, लाल भाजी, वांगी पिकवून तिठावरच्या हरमालकराच्या दुकानात ठेऊ लागला, भाजी हातोहत खपत होती.
पण गेले सहा महिने साडेसाती हात धुऊन मागे लागली होती, एक एक गाय नाहीतर तिचे वासरू मरू लागले, अमोलने कुडाळच्या सरकारी गुरांच्या डॉक्टर ना बोलावून आणले., त्याचे कडून उपचार करून घेतले, डॉक्टर नी सलाईन लावले, एन्टीबीओटीक दिली, इंजेकशन दिली पण काही उपयोग झाला नाही, शेवटी आज शेवटची गाय मेली आणि गोठा उजाड झाला.
अमोलचे घर शांत होते, पण अमोलच्या डोक्यात विचार सुरु होते, काही झाले तरी गोठा रिकामा ठेवायचा नाही, तसा ठेवला तर बाबा क्षमा करणार नाहीत, पण आईने निर्वाणीचे सांगितले आहें, गोठ्यात यापुढे गुरे नकोत... पण आजोबा आपल्याला साथ देतील, त्याना सुद्धा रिकामा गोठा पाहवणार नाही, अमोलच्या मनात आले,, आईने कितीही विरोध केला तरी पुन्हा गोठ्यात गाय आणायचीच, आई सुरवातीला चिडेल, शिव्या देईल पण तिला पण गोठा भरलेला पाहायचा आहें.
दुसऱ्या दिवशी अमोल सायकल घेऊन गोंधळ्यात पोहोचला. तेथे त्याच्या बाबाचा मित्र अहमद चाचाचें घर होते, अहमद चाचाचा गाई, बैल, म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. कुठे दिसतील तेथून गुरे खरेदी करायची आणि गुरांच्या बाजारात विकायची. एखादे गोरू खपले नाही तर मडगावच्या खाटीक खान्यात विकायचे. अमोलचे बाबा बऱ्याच वेळा अमोलला घेऊन अहमद कडे येत, त्याच्याकडील गाई, म्हशी पहात, त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचा अंदाज घेत. अमोलचे बाबा गेले तेंव्हा अहमदचाचा धाय मोकलून रडला होता.
आज जवळजवळ दोन वर्षांनी अमोल अहमदचाचा कडे आला होता. अहमदचाचा गुरांना पाणी पाजत होते. त्यांना गवत घालत होते. अमोलला पहाताच त्यांना आनंद झाला.
अहमदचाचा -आरे मेरे दोस्त का बच्चा आया, बडा हो गया रे तू? कितनी में पढताहौ?
अमोल - बारावी मध्ये.
अहमदचाचा - माँ कैसी है 'तेरी, और आजोबा?
अमोल - वो ठीक है मगर...
अहमदचाचा - मगर क्या रे?कुछ ताखालीप है क्या?
अमोल - चाचा, मेरे साब गाय, वासरू साब मर गये, कुछ भी राहा नयी
अहमदचाचा -ये बहुत बुरी खबर है,, मगर ऐसा कभी कभी होता है,, जो हो गया सॊ हो गया, अभी मेरे पास जो गाय, भैस है, उसमेसे तुम्हे जो चाहोये वो लके जावं, पैसा नाही देणेका
अमोल - चाचा, मैं ले जाऊंगा मगर थोडे दिन बात, मगर फुकटका नहीं, पैसे देके ले जाऊंगा.
अहमदचाचा - आरे मेरे दोस् का बच्चा ना तू, तेरेसे कैसे पैसा लू? तोबा तोबा...
अमोल - ते त्यावेळी बघूया हो.
अमोल अहमदचाच्या गुरात मिसळला एक एक गाय, वासरू निरखून पाहू लागला, अहमदचाचा त्याचाकडे कौतुकाने पाहत होते, मनात म्हणत होते 'रमेशसे उस्का बच्चा जादा हुशार है.
अमोल सर्व गुरांना निरखीत होता, त्याला एक गाभण जर्सी गाय दिसली, त्या बरोबर अमोल म्हणाला
अमोल - चाचा, ये तो गाभण गाय है ना, इसको किसीने लिया नाही..
अहमदचाचा - वो बुढी हो गयी ना इसलिये कोई लेता नही..
अमोल - मगर चाचा, ये तो गाभण है ना, इसको क त्त ल खानेमे देनेका नही हा..
अहमदचाचा - ठीक है, तेरे खातीर नहीं दूंगा..
अमोल - यदी इसको पाडी हुई तो मैं ले जाऊंगा..... मगर दो मैना बाद, अभी मेरी परीक्षा है, किसीको देना नही.
अहमदचाचा -हा रे बच्चा mai किसीको नही दूंगा.
अमोल अभ्यासाला लागला, तो तसा हुशार पण गोठ्यात गाई म्हशी नाहीत याची त्याला आणि त्याच्या आजोबांना खन्त वाटतं होती, कित्येक वर्षा नंतर दुसऱ्या कडून दूध आणावे लागत होत.
दोन महिने अमोलने चांगला अभ्यास केला, शेवटचा पेपर दिला आणि त्याच दिवशी तो अहमदचाचाकडे गेला.
चाचा बाहेर चालले होते, त्याला पहाताच ते मागे आले आणि त्या म्हाताऱ्या जर्सी गाईच्या शेजारी उभ्या असलेल्या पाडी कडे त्यांनी बोट दाखवले, अमोल धावत त्या पाडीकडे गेला आणि त्याने त्या पाडीला उचलून घेतले.
अमोल - चाचा, मै इसको लेके जाता हू, कितना पैसा बोलो.
चाचा - तू तो रमेशका बेटा, तुमसे क्या लेनेका..
अमोल -चाचा, ऐसा नहीं, पैसा तो लेनाही पडेगा, नहीं तो मै नहीं लेके जाता.
चाचा - तुमसे क्या बताऊं, जो चाहे वो देना..
ठीक आहें, म्हणत सायकल वळवून अमोल आजोबा कडे गेला आणि एक हजार रुपये घेऊन आला.
दोन्ही हाताने त्या वासराचे चारही पाय पकडून छातीकडे धरून अमोलने वासराला घरी आणले. आजोबा ना कल्पना होतीच, त्यामुळे ते खळ्यात उभे राहून वाट पहात होते.
छातीकडे धरून आणलेले ते वासरू आजोबानी चाचपून पाहिले.चांगल्या जातींचे वासरू असल्याने त्यांनी खुशीने मान हालवली.
आई शाळेत गेली होती, ती चिडणार हें अमोलला माहित होते, त्याने त्या वासराला ओट्यावर ठेवले, घरातून बाटलीतून पाणी आणून त्या वासराची मान दोन्ही मांड्यामध्ये पकडून त्याला पाणी पाजले.
आजोबानी वासरासाठी चांगले गाईच्या दुधाचा रतीब लावायला सांगितला.सुधा गावंडे कडे जाऊन रोज दोन लिटर दुधाची व्यवस्था अमोलने केली.पाण्यासारखे दूध पण तो बाटलीने पाजू लागला.
  हळूहळू वासरू मोठ होऊ लागलं, आता सर्वाना त्याचा लळा लागला, सुरवातीला चिडलेली आई सुद्धा त्याला खेळवू लागली. आता वासरू अमोलचा, आजोबांचा, आईचा आवाज ओळखु लागलं.
वासरू दिढ वर्षाचं झाल, तस अमोल तिला इतर गुरा मध्ये मिसळू लागला, ते आता इतर गुराबरोबर खेळू लागलं. 
    दोन वर्षात वासराची गाय झाली, जर्सी जातीची गाय असल्याने भली उंच झाली, देखणी दिसायला लागली, रोज हिरवा चारा, पेंड आणि व्हिटॅमिन्स च्या गोळया अमोल तिला घालीत होता.
आणि गाय गाभण राहिली, अमोलच्या आईचे लक्ष होतेच, आजोबा तिच्या खाण्याकडे लक्ष ठेऊन होते.
अमोलचे सकाळचे कॉलेज असे, त्यामुळे गाईने आपण घरी असताना व्यावे अशी त्याची इच्छा होती. एका शनिवारी गाय सकाळपासून कणहत होती.
अमोलची आई लगबगिने घरी आली, तेव्हड्यात गोठ्यातील गाय हंबरू लागली, आईने अमोलला फोन करून बोलावून घेतले, अमोलची सायकल खळ्यात आली एव्हड्यात गाईला वासरू झाले, आई, अमोल पुढे झाले.
     अमोलने अंदाज घेतला, गाईने पाडी घातली होती, त्याने ओरडून आजोबांना ही बातमी सांगितली, आजोबा काठी टेकत टेकत गोठ्याकडे आले आणि त्या वजनदार वासराकडे पहात राहिले.
आजोबानी तोंडाने " श्रीराम श्रीराम 'म्हणत देवाला हात जोडले, आई आंनदीत झाली, पाडी झाली म्हणजे गोठ्यात अजून भर पडणार होती. अमोलला आता वेळ नव्हता, त्याने नवीन चाकू केंव्हा पासून आणून ठेवला होता, त्याने चाकूने गायीची नाळ तोडली. वासराला अलग केल आणि त्याला जुनी चादर घालून झोपवलं. तो पर्यत आईने कढत पाणी तयार ठेवले होते, त्या पाण्याने तिने अमोलच्या मदतीने गाईला आंघोळ घातली.
सायंकाळी अमोलने वासराला दुधाला सोडल. वासराचे पूर्ण पोट भरून सुद्धा गाईच्या आचलातून दूध ठिबकत होत.
  रात्री अमोलने पाडीला बाटलीने तिची मान दोन्ही मांड्यात घेऊन पाणी पाजलं.
दुसऱ्या दिवशी आई शाळेत गेली तसा अमोल गाईच्या आचलाजवळ बसला, सोबत मोठा तांब्या घेतला, अचळाच्या एका बोंबाला हात लाऊन त्याने तो पाण्याने धुऊन घेतला आणि तो दूध काढू लागला, एका मिनिटात त्याचा तांब्या दुधाने भरला, तो घरात गेला आणि मोठी पातेली आणली आणि त्याने तो दूध काढायला बसला, एक बोंब ओढता ओढता त्याची पातेली भरली. परत तो घरात गेला, जाताना आजोबांना बोलावून घेतले, आता त्याने परत तोच बोंब ओढू लागला, दोन बोंब ओढून झाले नाहीत तो पर्यत बादली दुधाने भरली.
आजोबा कौतुकाने दुधाकडे पहात होते, त्यानी खूण केली तशी अमोलने दूध काढायचे थाम्बवले आणि पाडीला दुधाला सोडले.
एवढे बदलीभर दूध दोन वर्षानंतर घरात येत होते, त्या दुधाचा खरवस अख्या वाडीतल्या प्रत्येक घराने खाल्ला.
अमोलच्या घरात आता दुधाचा महापूर आला असे म्हंटले तर चुकीचे ठरू नये, ती जर्सी गाय दोन वेळेस मिळून सतरा अठरा लिटर दूध देत होती. तरी अमोल किंवा त्याची आई आचलतला एक बोंब वासरासाठी ठेवत होते.
  दोन वर्षांनी ते वासरू गाय झाली आणि एकाच वेळी एक महिन्याच्या अंतराने दोन्ही व्यायल्या. योगायोग म्हणजे दोघानीं पाड्या घातल्या. आणि दोन वर्षांनी त्या गोठ्यात चार जर्सी गायी झाल्या.
आता सतत अमोलच्या घरात दूधदुभते असे, रोज कमीतकमी 20 ते 25 लिटर दूध डेअरी ला जात होते. मध्ये मध्ये पाडा पण जन्मत होता, पण अमोल पाडा कुणातरी शेतकऱ्याला देत असे.
अमोल ग्रॅज्युएट झाला, B. Ed झाला आणि पाच किलोमीटर वरील शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला. आजोबा आता खूपच म्हातारे झाले होते, त्यामुळे जास्त वेळ झोपून असत. अमोलच्या आईने नोकरीं सोडली होती, त्यामुळे ती घरी राहून गाईंची काळजी घेत होती.
       आता अमोलच्या लग्नाचा विषय घरात बोलला जाऊ लागला होता, विशेषतः आजोबा आल्या गेल्याला अमोलसाठी मुलगी पहायला सांगत होते, अमोलची अट होती, मुलगी शेतकऱ्याची मुलगी हवी, तिला गाई गुरांची आवड हवी, गाईचे शेण काढायला तिला लाज वाटता नये.
    सुदैवाने खानोलीच्या प्रभू ची मुलगी हवी तशी होती, मुलगी बारावी शिकलेली होतीच शिवाय माड बागायती वाल्याची मुलगी होती, त्यांच्या घरात गाई बैल होते.
 नोव्हेंबर मध्ये अमोलचे लग्न झाले, दूध काढण्यासाठी अजून एक घरातली बाई मिळाली. आता गोठ्यात आठ गाई आणि दोन वासरे होती. रोज भरपूर दूध घरात येत होते, घरात दूधची रेलचेल होऊन डेअरी ला जात होते.
आजोबा आता अगदीच थकले होते, एक वेळ थोडा दूधभात खात होते, आता त्यांना पणतु बघायची घाई झाली होती.
आणि अपेक्षित बातमी आलीच, अमोलच्या पत्नीला दिवस गेले. तिला मुलगा झाला, आजोबा आंनदीत झाले. आता थोडे थोडे उठून बसू लागले, परत "श्रीराम श्रीराम ' म्हणु लागले.
अमोलचा मुलगा घरच्या गाईचे दूध पितो याचा आनंद त्यांना होता. अमोलचा मुलगा हळूहळू वळत होता, काही दिवसांनी ढोपराने पुढे जायला लागला.
अचानक आजोबांची तब्येत बिघडली, सकाळी ते उठेनात. कुडाळच्या डॉ सवदात्तीना अमोलने आणले. डॉ आले, त्यानी तपासले, ब्लड प्रेशर खाली आले होते. डॉ नी इंजेकशन दिले, सलाईन लावले. दोन तासानंतर आजोबा शुद्धीवर आले. डॉ सवदात्ती बसूनच होते. आजोबांचे हें डॉक्टर नेहेमीचे. डॉ आजोबांना हसत हसत म्हणाले
"आजोबा, गोळया चुकवू नका, नशीब मला वेळेत कळलं, नाहीतर वर जाण्याची वेळ आलेली '.
आजोबा डॉक्टर ना म्हणाले " डॉक्टर काळजी करू नका, जो पर्यत माझो पणतु घरच्या गाईचो दूधभात खाना नाय, तो पर्यत मी वर जायचंय नाय '. डॉक्टर हसत हसत निघून गेले.
  औषधं घेऊन आजोबा थोडे थोडे सावरत होते.
एक दिवस अमोलच्या आई च्या मनात आले, नातवाला दूधभात भरवूया. जेवतो काय पाहूया. तिने नुकतेच काढलेले दूध गरम गरम भातात मिसळले आणि नातवंच्या तोंडात घास भरवला आणि नातवाने तो गिळला सुद्धा. आजीला खुप आनंद झाला तिने आजोबांना ओरडून सांगितलं
"अहो आज बाळ दूधभात जेवलो, अगदी सगळो भात संपवल्यानं.''
आजोबानी ते ऐकले आणि "श्रीराम श्रीराम'' म्हणत समाधानाने प्राण सोडला.
                
प्रदीप केळुस्कर 9422381299/9307521152

शुक्रवार, ३० मे, २०२५

1930. युद्ध संपलं होतं

 युद्धभूमीवरून शोधून आणलेल्या बाणांची, त्यांच्या लोखंडी आणि तांब्याच्या टोकांची रास कमरेपेक्षा उंच झाली होती. इतस्ततः पडलेले, मातीत मिसळलेले बाण सैनिक उचलून आणत होते. त्यांच्या लाकडी दांड्या उपसून काढत होते आणि पिसांच्या शेपट्या असल्याच तर एका पिशवीत भरून ठेवत होते. जर मृत योध्याच्या शरीरात शिरलेला बाण खरंच मौल्यवान असेल तर त्याची पारखही ह्याच पिसांच्या शेपटीवरून होत होती आणि तोही उपसून काढून आणला जात होता. त्याचं रक्त पुसून त्या ढिगात टाकला जात होता. ते रक्त कधी जेत्याच्या सैनिकांचे होते, कधी पराजिताच्या.
ते रक्त ज्याला पुसले जात होते त्या सुतळी कापडाला त्याची पर्वा नव्हती, जो पुसत होता त्या सैनिकालाही त्याची जाण नव्हती. दोघंही फक्त आपले काम करत होते.
लोहयुगाची आत्ताशी सुरवात झाली होती. तांब्यापेक्षा दणकट आणि कठीण असलेलं लोह मौल्यवान होतं, दुर्मिळ होतं. बाणांच्या माथ्यावर लावलेले लोखंडी टोक सहजपणे परत वापरता येणार होतं. स्वतः अर्जुन त्या ढिगाऱ्याच्या शेजारी बसला होता, एकेका अस्त्रमुखाला जोखत होता. त्याची धार, त्याचे वजन, त्याचा आकार, तोल.. आवडलेले शर अर्जुन बाजूला काढत होता. त्याचाही एक छोटा गंज लागला होता. 
अर्जुनाने वर पाहिलं तेंव्हा युगंधर आपल्या घोड्यांच्या डोळ्यात काहीतरी वाचत होता. ते अश्वही आपल्या सारथ्याच्या डोळ्यांत कसलीतरी पावती शोधत होते. त्यांची क्लांत शरीरं त्या कमळासारख्या डोळ्यांत सैलावत होती. शब्दांवाचून चाललेला तो संवाद अर्जुन बघत होता, आपल्या हातात असलेल्या बाणाच्या धारेवर सावकाश तर्जनी फिरवत होता.
“पार्था, पुढच्या लढाईची तयारी करतो आहेस?”
घोड्याच्या डोळ्यांतली नजर न काढताच मधुसूदन बोलले. त्यांच्या ओठांच्या कडेवर एक खोडकर आणि खेळकर हसू होतं.
अर्जुन चपापला. मागचे अठरा दिवस चाललेला भीषण संगर त्याला आठवला. पाठीच्या मणक्यातून एक शिरशिरी गेली. बाणांची टोकं बाजूला ठेवतांना हा विचार त्याने केला नव्हता. श्रीकृष्णाचा प्रश्न जणू त्याच्या मनात खोल रुतला. एक विवश भाव त्याच्या चेहऱ्यावर साचून आला. अर्जुन निरुत्तर होता पण भगवंतालाही उत्तर नकोच होते. तो प्रश्न जिथे लागायचा तिथे लागला होता. तो प्रश्न नव्हता, एक शंखनाद होता.
“युद्ध खरंच संपलं का?” अर्जुनाचा प्रश्न स्वतःलाही होता आणि कृष्णालाही होता.
“युद्ध कधी संपतं का?” कृष्णाच्या प्रश्नातच उत्तर होते. अर्जुनाच्या हातातील धारदार शरअग्रावर त्याची नजर होती. घोड्यांच्या कपाळावर हात फिरवून तो गोपाळ पार्थाच्या समोर येऊन बसला. अर्जुन सैलावला.
“तू करतो आहेस ते बरोबरच आहे कुंतीपुत्रा. युद्ध कधीही संपत नसतं. कुठलंच युद्ध शेवटचं नसतं. जय आणि पराजय अंतिम नसतो. राजकारणाच्या एका सांध्यावर युद्ध होतं आणि तो सांधा बदलतो. राजकारण तसंच पुढे चालू राहतं. युद्ध म्हणजे राजकारणाचा कुरकुरलेला सांधा.. तो सांधा बदलताना झालेला खडखडाट. युद्ध हा राजकारणाचा पर्याय नाही, युद्ध हे अंतिम राजकारणही नाही पण तरीही युद्ध अनावश्यक नाही.”
आपली दोन्ही कोपरं आपल्या गुढग्यांवर टेकवत, दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा ठेवत अर्जुन ऐकत राहिला. श्रीकृष्ण बोलत राहिले.
“हे काही शेवटचं युद्ध नाही आणि हे काही पहिलं युद्ध नव्हतं, हे पहिलं महायुद्धही नव्हतं. सहस्त्र वर्षांपूर्वी दशराज्ञ युद्धात तुझे पूर्वज पराभूत झाले आणि कुरुजंगलातून अजून पलीकडे निघून गेले. ज्यांनी हा पराभव केला त्या सुदासाचे वंशज काल ह्या युद्धात, कुरुक्षेत्रावर लढत होते.. कौरव काय नी पांडव काय, त्यांच्यासाठी तर ते कुरुवंशीच ना? दशराज्ञ युद्ध शेवटचं नव्हतं आणि हे कुरुक्षेत्रावरच युद्धही शेवटचं नसणार. राजकारणाचा सांधा बदलला, कुरकुरला की हिंसा होणार, युद्ध होणार आणि मग परत वरवर दिसणारी शांतता असणार. पावसाळ्यानंतर पाणी पाझरत राहते तशी रक्त वाहू न देणारी हिंसा पाझरत राहणार. शोषण होणार, अन्याय होणार, अपमान होणार. माणसांचे हट्ट आणि माणसांचेच नकार एकमेकांना भिडणार. जमीन पुन्हा पुन्हा तापणार आणि लाव्हा पुन्हा पुन्हा उकळणार..
कौरव संपले असतील पण त्यांच्या बाजूने लढलेले शेकडो राजे, त्यांचे वंशज, त्यांची प्रजा.. सगळे आजही जिवंत आहेत. ते युद्धातून निघून गेलेत पण ते कधीतरी परतून येतील. तुझ्या बाजूने लढले तेही परतून येतील. कदाचित त्यांचे पक्ष बदलतील कारण त्यांच्या लढायांची कारणं बदलतील. जग बदलेल, लोकं बदलतील पण युद्ध संपणार नाही, कायमचं थांबणार नाही.
म्हणून अर्जुना, बाणांची टोकं शोधून ठेव, घासून ठेव. लोकांना कळू दे की तुझ्या भात्यात अजूनही ब्रम्हास्त्र आहेत, शत्रूला आणि मित्रांनाही ठाऊक असू दे की तुझी तपश्चर्या अजून सुरूच आहे. ज्या जमिनीत लाव्हा असतो तिथे कोणी नांगर चालवत नाही, ज्वालामुखीच्या तोंडात कोणी भुयार खोदत नाही. तुझ्या पोटातला लाव्हा अजून विझला नाही हे जगाला ठाऊक असू दे,
पण त्याच बरोबर सतत ज्वालामुखीचे स्फोट घडवून स्वतःची राख करू नकोस. लोक म्हणतील युद्ध कर तेंव्हा कधीही लढू नकोस. युद्ध आणि शांतता, दोन्ही नेहमी तुझ्या अटींवर असू दे, शत्रूच्या नाही आणि मित्रांच्याही नाही. शत्रूचे प्रत्येक आव्हान स्वीकारायचे नसते आणि मित्रांच्या प्रत्येक ललकारीत आवाज द्यायचा नसतो. रण आणि रणांगण आपल्या सोयीचे आपल्या आवडीचे असावे. लढण्याची लालसा नसावी आणि भीतीही नसावी. शक्यतो आपल्याशी लढण्याची कुणाची हिंमतच होणार नाही इतकी तयारी कर. 
अजून एक कर, माझ्या द्वारकेसारखा ह्या हस्तिनापुरातून दशदिशांना व्यापार कर, जगाचा पैसा सांभाळण्यासाठी, वाढवण्यासाठी तुझ्या तिजोरीत येऊ दे. तुझा पैसा जगभर लोकांच्या कामी पडू दे. एकवेळ एकाच वंशाचे रक्त एकमेकांविरुद्ध उभे राहिल, पण एकाच रंगाचा पैसा कधीही एकमेकांशी लढत नाही. असा पैसा वाढव. त्यातून चतुरंग सेना घडव. लक्ष्मीच्या हातात तराजू असू दे आणि मागे गजांत सेनाही असू दे. अर्जुना, युद्धाची सज्जता ठेव आणि तितकीच प्रामाणिक, तितकीच अस्सल युद्ध टाळण्याची इच्छाही ठेव.
युद्ध कर, क्षमाही कर कारण तुझ्याकडे फारसा पर्याय नाही, पार्था हे जग जितकं न्याय केल्याने पुढे जातं त्यापेक्षा जास्त सहन करण्यामुळे टिकून राहतं, अनेकदा सहन करून जिंकलेली शांतता लढून मिळवलेल्या न्यायापेक्षा सोयीस्कर असते, मानवी असते. ”
पार्थाच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून श्रीकृष्ण उठत होते तेंव्हा त्यांचे लक्ष दूर, फार दूर असलेल्या एका प्रचंड वृक्षाच्या बुंध्याशी गेले. खांदे पडलेला एक योद्धा तिथे कसलातरी विधी करत होता. त्याच्या हालचालीत एक अधीर निश्चय होता, त्याच्या चालण्यात एक बेपर्वा सूड होता.
बहुदा तो अश्वत्थामा होता.

-शैलेंद्र कवाडे.
Photo Credit - Meta AI


1929. मुलीच्या डोळ्यात तरळतंय

 ब्रिटीश फोटो जर्नालिस्ट हॅझेल थॉमसन 2002 मध्ये मुंबईच्या रेड लाईट एरियात आली होती तेव्हा कित्येक रात्री ती झोपू शकली नाही. 2013 मध्ये ती परत तिथेच आली. दरम्यानच्या 11 वर्षात अगदी किंचित फरक झाल्याचे तिला जाणवले. योगायोगाने ती कामाठीपुऱ्याच्या ज्या चौदाव्या लेनमध्ये आली होती तिथल्या एका बिल्डिंगमध्ये ती गेली. त्या कुंटणखाण्याची मालकीण हॅझेलला पुन्हा तिथे आलेली पाहून तडक आतल्या खोलीत निघून गेली. ती संधी साधत आठ फूट उंचीच्या त्या खोलीतील पोटमाळयाकडे गेली. पोटमाळ्याच्या अर्धवट उघड्या दिसणाऱ्या फळीलगत लाकडी तुकडयांची शिडी उभी करुन ठेवली होती. हॅझेलने शिताफीने शिडी त्या माळ्याला लावली. झपाझपा पायऱ्या चढत ती वर गेली. आणि तिला पहिल्यांदा बॉक्स केज (कपाटवजा भिंतीमध्ये बंदिस्त केलेली जागा) दिसली. तिने केजची झडप उघडली तर आत एक तेरा चौदा वर्षाची मुलगी होती. हॅझेलने तिथे येताना भारतीय वेष परिधान करून त्यातल्या ओढणीत कॅमेरा लपवला होता. त्या कॅमेऱ्यानेच तिने त्या मुलीची छबी टिपली. नंतर तिने जेव्हा कधीही हा फोटो पाहिला तेव्हा तिचा जीव कासावीस झाला, कारण फोटोतल्या कुमारीकेचे आर्त, करुण, भावविभोर डोळे! असे वाटते की आता निमिषार्धात त्यातून अश्रू वाहू लागतील... 
पूर्वी केवळ दिल्लीच्या जीबी रोडवर, मुंबईच्या कामाठीपुऱ्यात आणि कोलकत्याच्या सोनागाछीत आढळणारे बॉक्स केजेस आता सर्वत्र कॉमन झालेत. काही दिवसापूर्वी आपल्या औरंगाबादमध्ये खबरी मित्रांच्या निरोपाच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या रेडमध्ये देखील या छळपेट्या आढळल्या होत्या. सोनागाछीत तर मुली दिवसा वर कोंडल्या की भिंतीला लाकडी खिळे मारून प्लायवूड पक्के केले जाते, ते अंधार पडल्यावरच खोलले जाते. हा अंधारच त्यांना मोकळा श्वास घेऊन येतो. इतर सर्व वेश्या अंधाराला कंटाळून गेलेल्या असतात आणि या कोवळ्या मुली अंधाराची वाट बघत घुस्मटत जगत असतात. एनजीओंची ताकद नखाएव्हढी आणि समस्या डोंगराएव्हढी असा सगळा कारभार आहे. पोलीस आणि स्कीन करन्सीचे दलाल यांचे इतके मोठे रॅकेट देशभर आहे की त्याला धक्का लागणे देखील कठीण झालेय. मोबाईलने त्यात भर घातलीय. या मुलींची दुःखे आणि त्यांचं जगणं यावर लिहवत नाही. असो ...
त्या मुलीचे फोटो काढून हॅझेल जेव्हा इंग्लंडला परत गेली तेव्हा तिला डिप्रेशन आल्यासारखे झाले होते. जर फोटो काढणारा कासावीस होतो, पाहणाराही त्यांच्या दुःखासाठी व्याकुळ होतो मग त्या तलम पंख छाटलेल्या कोवळ्या फुलपाखरांची काय अवस्था होत असेल ?... फोटोतल्या मुलीशी हॅझेलला बोलता आले नाही ही बाब तिला अस्वस्थ करत होती. 
ती तिसऱ्यांदा पुन्हा तिथे गेली. तिने त्या मुलीच्या मालकिणीचे हात ओले केले अन् त्या मुलीशी दुभाषाच्या मदतीने संवाद साधला. नंतर तिची सुटकाही केली. पुढे जाऊन आपल्या अनुभवावर पुस्तक लिहिले. (तिच्या ईबुकची लिंक कमेंटमध्ये आहे.) ....अगतिकता, निराशा, वैफल्य, थकवा, भूक, उदासीनता, परात्मभाव, दुःखवेदनांचे अनेक कढ, हे सगळं या फोटोतल्या मुलीच्या डोळ्यात तरळतंय. तिचं कुस्करलेलं बालपण आणि विदीर्ण झालेलं भविष्य यांची विमनस्कता तिच्या चेहऱ्यावर साफ दिसते... तिला प्रतीक्षा आहे अंधाराची...खोल खोल काळ्या कुट्ट अंधाराची....  
म्हणूनच सांजेला घरी असलो की कधी कधी अंधार लवकर व्हावा म्हणून मी प्रार्थना करतो... उजेड असतानाच तुळशीपाशी दिवा लावायचा आग्रह बायकोजवळ धरतो.. ती दिवा लावते तेव्हा अशा मुलींचे डोळे त्या ज्योतीत तरळतात आणि माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावतात....
  
समीर गायकवाड.

( हॅझेल थॉमसनने काढलेला 'तो'च फोटो पोस्टसोबत दिला आहे.. या विषयावर लेखन करताना मी आजवरचे फोटो ब्लर्ड करून वा स्त्रियांचे/ मुलींचे चेहरे न दिसतील अशा पद्धतीने दिलेले आहेत पण हा फोटो मलादेखील खूप अस्वस्थ करून गेला आणि विथ परमिशन इथे शेअर केला. कारण, नुसतं सांगून हे अनेकांना तंतोतंत पटलं नसतं. आता या मुलीने संसार थाटलाय, हॅझेलने तिला नवी ओळख दिलीय, स्वावलंबी केलेय आणि स्वाभिमान मिळवून दिलाय. ही पोस्ट आठ वर्षांपूर्वीची आहे, मात्र या व्यवसायातली स्थिती आणि स्वरूप सारेच नव्या रंगात पण जसेच्या तसे आहे)



1928. युनिव्हर्सल बेसिक इनकम की युनिव्हर्सल हाय इनकम?

 अरब अमिरातीत नुकत्याच झालेल्या एका समारंभात एलॉन मस्कला UBI म्हणजेच युनिव्हर्सल बेसिक इनकम बद्दल विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की AI आणि रोबोटिक्स मुळे उत्पादकता एवढी वाढेल की युनिव्हर्सल बेसिक इनकम ऐवजी युनिव्हर्सल हाय इनकमचा विचार आपल्याला करावा लागेल !
ही काय भानगड आहे ते पाहण्यासाठी UBI ची संकल्पना समजावून घेऊया !
आपण सारे "मानव". पोटापाण्यासाठी काही काम करतो. आपले श्रम, बुद्धी, कौशल्य वापरून पैसे कमावतो आणि त्यातून उदरनिर्वाह चालवतो. माणसाने शेतीनिमित्त हजारो वर्षांची भटकंती थांबवली आणि तेव्हापासून "काम > पैसे > उदरनिर्वाह" ही रचना उदयास आली. आणि हजारो वर्षे आपण या संरचनेला सरावलो आहोत.
पण आता AI आणि रोबोटिक्समुळे जग झपाट्याने बदलतंय.  कामाचं स्वरूप बदलतंय, रोजगाराचं गणित बदलतंय, आणि सर्वात मोठं म्हणजे — मूल्यनिर्मितीची (Value Creation) व्याख्या बदलतेय. जर बहुतांशी सर्वच कामं मशिन्स कडे गेली (आणि ती जाणारच असे दिसतंय !) तर माणसाला करण्यासाठी कामच नसेल किंवा जगण्यासाठी कामाची आवश्यकताच नसेल. उत्पादकता एवढी वाढेल की त्यापासून झालेली संपत्तीनिर्मिती सर्व लोकसंख्येत वाटणे शक्य होईल आणि गरजेचे ही होईल. इथे युनिव्हर्सल बेसिक इनकम ही संकल्पना उपयुक्त ठरेल.
युनिव्हर्सल बेसिक इनकम (UBI) म्हणजे प्रत्येक नागरिकाला, कोणत्याही अटीशिवाय, दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळणं — केवळ तो समाजाचा सदस्य आहे म्हणून.
ही रक्कम:
कोणत्याही कामाच्या बदल्यात नाही. 
गरिबीच्या रेषेखाली असणाऱ्यांपुरती मर्यादित नाही
आणि कोणत्याही सरकारी योजनेसारखी अर्ज करून मिळणारी नाही.
UBI म्हणजे मूलभूत गरजांसाठी एक आर्थिक आधार असेल. एक नवीन प्रकारचा हक्क.
“कष्ट न करता पैसे मिळवायचे?” ही संकल्पना पटणे तसे कठीण आहे. त्यामुळे आपण आळशी होऊ हीच  बहुतेक लोकांची पहिली प्रतिक्रिया असते. पण UBI ही आळशीपणाला प्रोत्साहन देणारी संकल्पना नाही. ती मानवी मूल्याचा स्वीकार करणारी संकल्पना आहे.  
कारण आज माणूस स्वतःचा डेटा, भावना, वर्तन, संवाद – हे सगळं जगासमोर ठेवतोय आणि AI त्यातूनच शिकत आहे. AI मॉडेल्स — जसं ChatGPT — केवळ कोडिंगने तयार होत नाहीत. ते तयार होतात आपल्या सामूहिक संवादावर, रिसर्चवर, आणि वापरकर्त्यांच्या अनुभवावर.
जर AI सामूहिक डेटा मुळे तयार झाला असेल तर मग त्यामुळे मिळणारे उत्पन्न केवळ एका कंपनीच्या खिशात का जावं?
ही संकल्पना लांबच्या भविष्यातील वाटत असेल कदाचित. पण यापूर्वीच अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात देखील आली आहे. अगदी भारतातही !
SEWA (Self Employed Women’s Association) संस्थेने 2011-12 मध्ये मध्य प्रदेशातील 8 गावे यासाठी निवडली. या गावांतील 6,000 हून अधिक महिलांना  प्रत्येकी ₹300 दरमहा पुढील १ ८  महिन्यांकरिता दिले. जवळच्या 12 गावांना काहीच दिलं गेलं नाही – तुलना करता यावी म्हणून !
## काय परिणाम झाले?
 शिक्षणात वाढ:
शाळेतील उपस्थिती वाढली. मुलांना कामावर पाठवण्याऐवजी शाळेत ठेवण्याची सुरुवात झाली.
 पोषण सुधारलं:
घरांमध्ये अन्नखरेदी अधिक सकस झाली. महिलांचं आणि लहान मुलांचं आरोग्य सुधारलं.
 स्वच्छतेत बदल:
काहींनी शौचालय बांधले, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर घेतले.  
स्वच्छतेची सवय लागली.
 स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य:
महिलांनी शिवणकाम, मसाले तयार करणं, शेळीपालन असे व्यवसाय सुरू केले.  
आर्थिक निर्णय स्वतः घेऊ लागल्या.
 बचत आणि गुंतवणूक:
बरेच लोक बँकेत खाते उघडून पहिल्यांदाच बचत करू लागले.  
काहींनी शेतीसाठी नवीन साधनं विकत घेतली.
 निर्णयक्षमता वाढली:
UBI मुळे कुटुंबांनी धोका पत्करून नवे पर्याय निवडले. व्यसनांमध्ये घट झाली.
---
मग लोक आळशी झाले का? नाही. उलट, कामाचा उत्साह वाढला.
UBI मुळे लोकांना आत्मविश्वास मिळाला.  
जे पूर्वी शक्य नव्हतं, ते करण्याची हिंमत मिळाली.  
## असेच प्रयोग जगभरात इतरत्रही करण्यात आले ?
  फिनलंड
→ 2,000 बेरोजगार नागरिकांना UBI दिलं  
→ कमी तणाव, अधिक आनंद, आणि नोकरी शोधण्याची प्रेरणा वाढली
 कॅनडा (ओंटारियो)
→ लोकांनी शिक्षण पूर्ण केलं, व्यसने टाळली, मानसिक आरोग्य सुधारलं
## पण UBI चा प्रश्न तितका सोपा नाहीये !
AI, डेटा, आणि ऑटोमेशन जेव्हा इतकं सामर्थ्यवान होईल, तेव्हा त्यातून निर्माण होणारी संपत्ती आणि नियंत्रण जर फक्त एका सरकार किंवा कंपन्यांकडे राहिलं, तर…
UBI असेल — पण ते चालविण्याचा हक्क कुणाकडे?” हा खरा प्रश्न राहील.
एका सरकारकडे ?
एका कंपनीकडे ?
एका देशाकडे ?
कुणाला UBI मध्ये समाविष्ट करायचे ?
किती पैसे द्यायचे ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून शोधायची आहेत !
UBI ही फक्त आर्थिक योजना नसून, ती मानवी हक्क, पारदर्शकता आणि सहनिर्णयाची लढाई आहे.
आपण भविष्यात आपली स्वप्न पूर्ण करायला मोकळे असू, की कुणाच्यातरी सिस्टममध्ये एक ‘USER ID’ बनून राहू?
UBI ही सुरुवात आहे - एका नव्या अर्थव्यवस्थेची, जिथे माणूस काम न करताही मूल्य निर्माण करतो  आणि त्यात त्याचा वाटा मिळतो !

1927. माणूसकी

 संध्याकाळचा फेरफटका मारून गोपाळराव घरी परतले. ते घरात शिरताच सावित्रीबाईंची तुफान एक्सप्रेस सुरू झाली.......
थोड्या वेळापूर्वी वकील साहेब घरी आले होते . त्यांनी हे ॲप्लिकेशन दिले आहे आणि हे ॲप्लिकेशन कलेक्टर ऑफिसमध्ये सबमिट करण्याची उद्या शेवटची मुदत आहे. अॅप्लीकेशन सबमिट करताना आपल्याला चार डॉक्युमेंट्सचे ओरिजिनल लावावे लागेल आणि कलेक्टर ऑफिसमध्ये रोज फक्त दहा लोकांनाच अपॉइंटमेंट मिळते म्हणजेच थोडक्यात उद्यालाच तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आणि तेही लवकर जावे लागेल.
सावित्री, आपल्याकडे फक्त दोनच डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळे माझा कलेक्टर ऑफिसला जाऊन काहीच उपयोग होणार नाही. 
अहो जाऊन तर बघा, कधी कधी कामं होऊन जातात. ठीक आहे बाईसाहेब, जसे तुम्ही म्हणता आहात तसेच मी करतो गोपाळराव म्हणाले.
सकाळी गोपाळराव लवकरच उठले आणि झटपट तयारी करून बस स्टॉप कडे जायला निघाले. जलद चालण्याच्या नादात त्यांच्या चपलेचा अंगठा तुटला आणि साहजिकच त्यांच्या चालण्याचा वेग मंदावला. 
गोपाळराव बस स्टॉपवर पोहोचण्या आधीच बस  सुटली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी समोरून येणाऱ्या बसला हात दिला आणि काय ते सुदैव! बस चक्क त्यांच्या जवळ येऊन थांबली. ड्रायव्हरचे आभार मानत गोपाळराव पुढच्या दरवाजानेच बसमध्ये चढले.
त्यांनी मागितलेले कलेक्टर ऑफिसचे तिकीट कंडक्टरने दिले. पैसे देण्यासाठी म्हणून गोपाळरावांनी खिशात हात घातला. निघण्याच्या घाई गडबडीत पैशाचे पाकीट घ्यायला ते विसरले होते. 
साहेब तिकिटाचे पैसे लवकर द्या, कंडक्टर जरा चिडूनच म्हणाला. कंडक्टर साहेब मी पैशांचे पाकीट घरीच विसरलो म्हणत त्यांनी कंडक्टरकडे केविलवाणी नजर टाकली. पैसे नाही तर बसमधून उतरा, कंडक्टर रागावून म्हणाला आणि त्याच क्षणी जवळच बसलेल्या एका मुलाने गोपाळरावांना शंभर रुपयांची नोट देत सांगितले काका, मी वरद तुमच्या सोसायटीच्या मागच्या चाळीत राहतो. हे पैसे असू द्या, परत येताना पण लागतील तुम्हाला. थँक्स बेटा म्हणणाऱ्या गोपाळरावांना वरदने स्वतः उभे राहत त्याची जागा दिली. काका मी पुढच्या स्टॉप वर उतरणार आहे, बसा तुम्ही.
वयाची साठी पार केलेल्या गोपाळरावांचा सीटवर बसताच डोळा लागला. काका, कलेक्टर ऑफिस आले, तुम्हाला उतरायचं ना असे म्हणत कंडक्टरने त्यांना जागे केले. कंडक्टरचे आभार मानत गोपाळराव कलेक्टर ऑफिस मध्ये शिरले तेव्हा अपॉइंटमेंटचे ९ टोकन्स दिले गेले होते आणि शेवटचे एक टोकन बाकी होते. या धावपळीचे चीज होणार म्हणून त्यांना मनापासून आनंद झाला. रिसेप्शन काउंटर आता फक्त वीस-पंचवीस फुटांवर होता. तेवढ्यात मागून एक तरुणी लगबगीने त्यांच्या पुढे गेली, फक्त दोन-तीन सेकंदांचा फरक. सर, हे शेवटचे टोकन मी या ताईला देतेय, ती तुमच्या आधी पोहोचली, रिसेप्शनिस्ट म्हणाली. 
भरभर चालल्यामुळे गोपाळरावांना धाप लागली होती. ते काही बोलणार तेवढ्यात ती तरुणी म्हणाली, काका टोकन तुम्ही घ्या, तुम्ही माझ्यापुढे होतात, हे टोकन मी तुम्हाला देतेय. थँक्स बेटा म्हणताना गोपाळरावांचे मन भरून आले. 
आजचा दिवस त्यांचा होता. प्रथम बस ड्रायव्हरने, नंतर वरदने, त्यानंतर कंडक्टरने आणि आता या तरुणीने त्यांना सुखद धक्का दिला होता. जगात माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय आज त्यांना जागोजागी आला होता. 
त्यानंतर पाच मिनिटांत कलेक्टर साहेबांचे आगमन झाले. केबिनकडे जाताना त्यांचे लक्ष त्यांच्या भेटीसाठी आलेल्या उपस्थितांकडे गेले. साहेब केबिनमध्ये गेल्यानंतर दोन मिनिटांनी साहेबांचा सेक्रेटरी बाहेर आला आणि त्याने सांगितले की आजच्या सर्व अपॉइंटमेंट्स कॅन्सल करायला लागताहेत कारण साहेबांना आज मिनिस्टर साहेबांबरोबर मिटींग आहे. तुम्हाला उद्या परत अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही आजच्या अपॉइंटमेंट्स उद्याला चालतील. आपल्यात गोपाळराव जोशी कोण आहेत? साहेबांनी त्यांना आत बोलावलं आहे. 
आपलं नांव पुकारलेलं बघून गोपाळराव आश्चर्यचकित झाले. ते साहेबांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा साहेबांनी उठून उभे राहत त्यांना नमस्कार केला. परत एकदा आश्चर्याचा सुखद धक्का त्यांना बसला.
काका ओळखलंत का मला? मी राज,  राज मराठे, शंकर मराठेंचा मुलगा. 
गोपाळराव क्षणात भूतकाळात शिरलेत. त्यांचा मित्र शंकर सांगत होता, गोपाळ अरे हा माझा मुलगा राज. याला अमेरिकेत एका चांगल्या युनिव्हर्सिटीत अॅडमिशन मिळतेय. पुढच्या महिन्यात त्याचा व्हिसा इंटरव्यू आहे. व्हिसा मिळण्यासाठी मला तगडा बँक बॅलन्स दाखवावा लागेल. त्यासाठी मला तुझ्याकडून पाच लाख रुपये मिळतील का, साधारणतः एक ते सव्वा महिन्यासाठी.
शंकर, अरे तू फक्त सांग, कधी पैसे पाहिजेत तुला, गोपाळराव म्हणालेत. मला पैसे पुढच्या आठवड्यात लागतील, शंकर म्हणाला. 
दुसऱ्याच दिवशी शंकर मराठेंच्या मृत्यूची बातमी आली. हार्ट अॅटॅकमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दहा दिवस झाल्यानंतर शंकर मराठेंचा मुलगा, राज गोपाळरावांकडे पैसे मागायला आला. राज, तू उद्या ये, मी तुला पैसे देईन गोपाळराव म्हणाले. दुसऱ्या दिवशी राज गोपाळरावांकडे पैसे मागायला गेला परंतु गोपाळराव बाहेर गेले होते. सावित्रीबाईंनी राजला पुढच्या दिवशी यायला सांगितले. राज परत दुसऱ्या दिवशी गोपाळरावांकडे गेला परंतु गोपाळराव बाहेरगावी निघून गेले होते दोन ते तीन आठवड्यांसाठी. राजचा अमेरिकेत शिक्षण घेण्याचा प्लॅन पूर्णपणे उध्वस्त झाला होता, गोपाळरावांनी माणूसकी न दाखविल्याने आणि दिलेला शब्द न पाळल्यामुळे. 
त्यानंतर गोपाळरावांनी राजची कधीही चौकशी केली नाही आणि राज देखील त्यांच्याकडे कोणतीही मदत मागण्यासाठी कधीही फिरकला नाही. गोपाळरावांनी शंकर बरोबरच्या अतुट मैत्रीचे नाते, शंकर जाताच निर्दयपणे तोडले होते, माणूसकीला तडा देत.
काका चहा घ्या ना, चहा गार होतोय. राजच्या बोलण्याने गोपाळराव भानावर आलेत.
काका माझ्या ऑफिसला तुम्ही का आलात? काय काम आहे तुमचे? राजने विचारले. 
राज या अॅप्लीकेशन वर मला तुझे अॅप्रुव्हल हवे आहे. खरंतर यासाठी चार डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते परंतु माझ्याकडे फक्त दोनच डॉक्युमेंट्स आहेत. दोन डॉक्युमेंट्स माझ्याकडे घरी नक्कीच असतील परंतु मला ती येथे आणता आली नाहीत. गोपाळरावांच्या अॅप्लीकेशनवर "अॅप्रूव्ह्ड"असे लिहून त्याखाली स्टॅम्प मारताना राज म्हणाला, काका त्या न आणलेल्या डॉक्युमेंट्स पेक्षा तुमच्या शब्दांवर माझा जास्त विश्वास आहे. राजचे ते शब्द ऐकून गोपाळराव मनोमनी शरमले. आज राजने गोपारावांच्या त्याच्या वडिलांबरोबरच्या मैत्रीचा मान ठेवला होता आणि म्हणूनच अगदी अशक्यप्राय असणारे गोपाळरावांचे काम एका क्षणात झाले होते. 
राजला बाय करून गोपाळराव जायला निघालेत आणि तेवढ्यात राजचे लक्ष्य गोपाळरावांच्या तुटलेल्या चपलेकडे गेले. काका तुम्ही दोन मिनिटं थांबा. मला तुमच्या घराकडच्याच भागात जायचे आहे मी तुम्हाला घरी सोडतो. राजने त्याच्या आलिशान गाडीतून गोपाळरावांना घरी सोडताना त्यांना सांगितले, काका यापुढे कोणतेही काम असेल तर तुम्ही येण्याची गरज नाही, मी स्वतः येईल किंवा माझ्या सेक्रेटरीला पाठवीन. राज खूप मोठ्या पदावर होता पण तरीही हवेत गेला नव्हता आणि माणूसकी विसरला नव्हता.
काम झाल्याचा आनंद होता पण तरीही गोपाळराव मनोमनी खजील झाले होते. सावित्रीबाईंना सर्व वृत्तांत सांगताना काही वर्षांपूर्वी त्यांनी माणूसकी विसरत केलेल्या अक्षम्य चुकीच्या पश्चातापामुळे त्यांचे डोळे पाणावलेत.

-दिलीप कजगांवकर, पुणे

गुरुवार, २९ मे, २०२५

1926. पप्पा… नका जाऊ ना…

 हे तीन शब्द ऐकून खोलीत एक क्षणभर शांतता पसरली.
रुग्णालयात अर्धवट उघड्या डोळ्यांतून शेवटचा श्वास घेत असलेले पप्पा, बाजूला उभा डॉक्टर, आणि त्याच्या हातात हळूहळू तिरकी होत चाललेली ECG लाइन…
सगळं संपत होतं… आणि एक मुलगी ओरडून रडत होती – “पप्पा… नका जाऊ ना…”
काही वेळापूर्वीच त्या पप्पांनी तिला म्हटलं होतं –
"तू फक्त तुझ्या करिअरकडे लक्ष दे. मी ठिक आहे गं, फारसं काही नाही."
पण खरं म्हणजे ते ठिक नव्हते… ते हळूहळू आतून तुटत होते. पण पप्पा कधी आपली वेदना बोलून दाखवत नाहीत.
कारण घरासाठी खंबीर असणं हे त्यांनी स्वतःवर लादलेलं उत्तरदायित्व असतं.
बाबा म्हणजे काय?
पप्पा म्हणजे दररोज ९-१० तासांची नोकरी, घराची EMI, मुलांचं शिक्षण, आईचं औषध, आणि स्वतःच्या इच्छा कायम बाजूला ठेवणारा माणूस.
कोणी विचारत नाही – "पप्पा, तुम्ही ठीक आहात का?"
कोणी म्हणत नाही – "थोडं विश्रांती घ्या ना..."
कारण आपण मान्य केलंय – पप्पा म्हणजे मशीन… तो चालत राहतो… तो दमला तर?
“आईला वेळ द्यावा, पण पप्पांना का नाही?”
आईच्या प्रेमात ओलावा असतो.
पण पप्पांच्या प्रेमात झळ असते –
झळ सहन करून सावली बनून उभं राहण्याची.
पप्पा कधी "मी थकलोय" असं बोलत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यांखालचे काळे वर्तुळे ओरडून सांगतात –
“माझीही थोडी काळजी घ्या ना…”
पुरुष रडत नाहीत, पण ते मोडतात…
आपल्या समाजाने पुरुषांना अश्रू गाळण्याची परवानगीच दिली नाही.
पप्पा हे शब्दच काहीसं "भावनाविरहित" मानलं जातं, कारण ते त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये भावना व्यक्त करणं विसरून गेलेले असतात.
ते ऑफिसमध्ये ताण सहन करतात, बाहेरच्या जगाशी लढतात, आणि घरी येऊन गप्प राहतात –
कारण त्यांना वाटतं – "आपण कमजोर झालो तर घर मोडेल..."
आता तरी जागा व्हा…
एक दिवस असा येतो, जेव्हा हातात असतं त्यांचं निधनपत्र, आणि मनात असते हजारो अपुरी राहिलेली वाक्यं…
“पप्पा, तुम्हाला वेळेवर डॉक्टरकडे नेलं असतं तर…”
“पप्पा, त्या दिवशी जरा थांबून बोललो असतो तर…”
“पप्पा, तुमचं ऐकलं असतं तर…”
पण ‘तर’ काहीच बदलू शकत नाही. कारण पप्पा निघून गेलेले असतात… कायमचे…
काय बदलायला हवं?
त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नका करू
त्यांच्याशी रोज बोलण्यासाठी वेळ द्या
त्यांचं हसणं पुन्हा दिसेल याची काळजी घ्या
आणि अधूनमधून त्यांना एकदाच का होईना, मिठी मारा…
कारण त्या मिठीत हजार अश्रू गाळूनही काहीच न बोलणारा माणूस आहे – तुमचे पप्पा…
पप्पा… नका जाऊ ना…
हे वाक्य शेवटी नसावं… ते रोजचं असावं… जिथे ‘पप्पा’ अजूनही आपल्या सोबत असतील, हसत असतील, आणि जिवंत असतील.

श्री. संदीप चव्हाण 




1925. जसं कर्म तसंच फळ

 "बाबा, जे काही मी बनवलंय ते शांतपणे खाऊन टाका. रोजच्या रोज तुमचे नखरे सहन करायला मी इथे बसलेली नाहीये..." कविता बडबडतच खोलीतून बाहेर निघून गेली. सकाळच्या नाश्त्याची वेळ होती आणि कविताने थोडीशी करपलेली, कडक पोळी आणि कोरडी भाजी वाढली होती.
कमलेशजींनी फक्त एवढंच म्हटलं होतं, "सूनबाई, या वयात दात साथ देत नाहीत ग, थोडी मऊ पोळी द्यावी ना किंवा दूध द्यावं , त्यात भिजवून खाईन ना ग." 
हे रोजचंच झालं होतं. ताटात खाण्यायोग्य जेवण क्वचितच असायचं. बनावट दात होते आणि पचनसंस्थाही कमजोर झालेली होती, त्यामुळे जर कधी खिचडी, उपमा किंवा काही मऊ पदार्थ मिळाला असता, तर जरा चवही बदलली असती आणि पचनातही आराम मिळाला असता.
पण त्यांचं जेवण जणू कुठल्या मुक्या प्राण्यापुढे अन्न टाकल्यासारखं वाढलं जायचं. करणार तरी काय? कमलेशजींनी मुलाच्या आग्रहाखातर गावातलं घर विकून टाकलं होतं आणि त्याच पैशातून शहरातलं हे घर घेतलं होतं. संध्याकाळी फिरायला गेले की पार्कमध्ये त्यांचे काही मित्र भेटायचे, जरा गप्पाटप्पा व्हायच्या. वृद्धत्वातील सुखद आठवणी आणि काळज्या यांचा खेळ चालूच असायचा.
आज कमलेशजी थोडे उदास वाटत होते. रंजन बाबूंनी ते ओळखलं आणि विचारलं, पण कमलेशजींनी तब्येतीचं कारण दिलं. घरातल्या गोष्टी सार्वजनिक करणे म्हणजे स्वतःच्याच घराची बदनामी होती. कोण काय बोलेल, कोण कसं समजून घेईल, ह्याचं काही सांगता येत नव्हतं.
त्यांच्या मनात विचार आला "आपल्या संस्कारांवरच प्रश्न उभा राहील... आपण आपल्या मुलांना कसं वाढवलं? की ज्यांना आपल्या बापाचीच काळजी नाही!" औषधं, जेवण सगळं काही त्यांच्याच कृपेवर चाललेलं आहे की..असा विचार करत करतच संध्याकाळी लवकरच ते घरी परतले.
रात्री जेवताना मुलाशी काही बोलायचं ठरवलं होतं, पण कविताने मध्येच बोलत म्हटलं, "बाबा, त्यांना तरी शांततेने जेवू द्या. दिवसभर काम करतात ते." कमलेशजींनी काही न बोलता डोळ्यांत पाणी आणून जेवण केलं आणि आपल्या खोलीत गेले.
त्यांच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या. ललिता तिच्या हाताने गरम गरम पोळ्या करत असे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वयंपाक करत असे. या सुनेला ज्याचे नखरे वाटतात, त्याच मुलासाठी ललिता स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता त्याच्या आवडीची दुसरी भाजी पण करत असे.
त्या रात्री त्यांना वाटलं, जणू ललिता त्यांच्याशी बोलत आहे, "तुम्ही गावाला परत जा ओ... रामू (नोकर) तुम्हाला जास्त चांगलं सांभाळेल." ते विचारात पडले — रोज रोजची ही अपमानाची थाळी खाण्यापेक्षा मृत्यूच चांगला.
सकाळ झाली तसं त्यांनी ठामपणे ठरवलं — "जो पर्यंत श्वास आहे, तो पर्यंत सन्मानाने जगावं." 
नाश्ता आला, त्यांनी थाळी डोक्याला लावली आणि म्हणाले, "सूनबाई, हे अन्न परत घेऊन जा."
कविताने तुच्छतेने विचारलं, "काय झालं? आधी सांगितलं असतं भूक नाहीये तर, उगाच अन्नाची नासाडी नसती ना झाली."
कमलेशजी म्हणाले, " सुनबाई इज्जतीची कोरडी भाकरी जास्त चांगली असते ग, बेईज्जतीच्या पकवानांपेक्षा. मी इथून निघून जायचं ठरवलंय.  गावाकडे परततोय. जिवंत राहण्याइतका पैसा आहे, आणि जगणं शिल्लक आहे. आज सायंकाळचीच गाडी पकडतोय."
कविताचा थरकाप उडाला. जर रवी (पती) ला हे कळलं, तर तो तिच्यावर नक्कीच रागावेल. कमलेशजी समजूतदार होते, त्यांनी रवीला फक्त एवढंच सांगितलं — "बेटा, शेताचं काही काम आहे, म्हणून जातोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव — नोकरीसोबत वडिलांसाठी वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं असतं बेटा."
रवी चिंतेत पडला. बाबा अचानक का जात आहेत? दिवसभर त्याचं मन कामात लागलं नाही. त्याने दुसऱ्या दिवशी गावाला जायचं ठरवलं. रात्री घरी येऊन त्याने कविताला सांगितलं, "मी काही दिवस ऑफिसच्या कामासाठी जातोय."
कविता लगेच म्हणाली, "मग मला पण घेऊन चल, जरा आउटिंग होईल. बाबांनी मला नुसतं बांधून टाकलं होतं इथं त्यांची सेवा करण्यासाठी. आता सुटले एकदाची बंधनातून.."
रवी बोलला, "बंधन? बाबांच्या उपस्थितीत काय बंधन होतं? खरं सांग - बाबांनी घर का सोडलं?"
कविता चिडून म्हणाली, "मी कंटाळले होते त्यांच्या नखऱ्यांना. काल तर जेवण सुद्धा परत केलं."
रवीला सगळं समजलं. तो म्हणाला, "तू एकदा तरी फोन करून सांगायचं होतंस ना की बाबा काहीही न खाता घर सोडून गेलेत. मी उद्या गावाला जातोय. बाबांनी मला  काहीच संगीतलं नाही, पण मी त्यांचं मन नक्की जाणून घेईन."
कविताला पश्चात्ताप झाला. ती म्हणाली, "चूक माझी आहे, मीच सुधारेल. मीही येईन बाबांना परत आणायला."
दुसऱ्या दिवशी दोघंही गावाला पोहोचले. तेव्हा कमलेशजी शेत विकण्याची तयारी करत होते. कविता त्यांच्या पायावर पडून रडत माफी मागू लागली. रवीही माफी मागू लागला.
कमलेशजी म्हणाले, "बेटा, म्हातारपणात काय लागतय माणसाला - फक्त इज्जतीची भाकरी!!  तुमच्या घरात ती पण मिळत नव्हती. म्हणून मी आता ठरवलंय की मी आश्रमात जाईन आणि माझ्या नातवंडांच्या नावावर पैसा ठेवीन. जेणेकरून त्यांना अशी वागणूक मिळणार नाही."
रवी म्हणाला, "मला काही नको, पण कृपया एक संधी द्या. मी वचन देतो, तुमच्या सन्मानात कधीही कमी पडू देणार नाही." खूप विनवण्या करून रवी आणि  कविताने त्यांना परत घरी आणलं.
सर्वांनी परत एकत्र राहायला सुरुवात केली. कविता आता कमलेशजींच्या सन्मानात कधीच कमी पडत नाही. रवीलाही वडिलांसोबत वेळ घालवायची सवय लागली.
हे खरं आहे — 'जसं कर्म तसंच फळ'. जे आज आपण आपल्या आई वडिलांशी वागतो, उद्या आपल्यावर परत तीच वेळ येणार ."


1924. आपली स्पर्धा आपल्याशीच आहे

 एकदा अकबर बादशहाने बिरबल कडे एक कोंबडा दिला, आणि सांगितले, "हा कोंबडा तू घेऊन जा. एक महिना सांभाळ. आणि एका महिन्याने हा कोंबडा परत घेऊन ये. जेव्हा तू हा कोंबडा आणशील, तेव्हा या कोंबड्याची झुंज दरबारातील शाही कोंबड्याशी होणार आहे. यात तुझा कोंबडा हरला नाही पाहिजे. पण अट मात्र एकाच गोष्टीची आहे, झुंज शिकण्यासाठी या कोंबड्याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी येऊ द्यायची नाही."
हे खूप अवघड काम होतं. कोणताही कोंबडा किंवा कोंबडी या कोंबड्याच्या संपर्कात न येऊ देता त्याला झुंज शिकवणे. बिरबलाने त्या कोंबड्याला घेतले. आणि आपल्या घरी नेले. एका महिन्याने तो आपल्या कोंबड्याला घेऊन आला. आता झुंज होणार होती. सर्व लोक ही झुंज पाहण्यासाठी दरबारात जमा झाले होते.
बिरबलचा कोंबडा आणि अकबरचा कोंबडा अशी झुंज सुरू झाली. बिरबलचा कोंबडा अकबरच्या कोंबड्या बरोबर असा काही झुंज देत होता की, अकबरचा कोंबडा खूपच कमी पडला. बिरबलच्या कोंबड्याचा प्रत्येक घाव शाही कोंबड्यावर असा काही लागत होता की, तो कोंबडा पूर्णपणे गडबडून गेला. परंतु बिरबलचा कोंबडा एवढी चांगली झुंज कशी काय देऊ शकतो? हा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात येत होता. कारण झुंज शिकण्यासाठी कोणताही कोंबडा किंवा कोंबडी त्या कोंबड्याच्या संपर्कात नव्हती, तरी देखील एवढी चांगली झुंज तो कसा काय शिकला. अखेरीस बिरबलचा कोंबडा हा वरचढ ठरला, त्यामुळे बिरबलचा कोंबडा झुंजी मध्ये जिंकला आणि अकबरचा कोंबडा रक्तबंबाळ होऊन पळून गेला. 
त्यानंतर अकबराने बिरबलला विचारले, "बिरबल हा कोंबडा कोणताही कोंबडा किंवा कोंबडी यांच्या संपर्कात न येता, एवढी तरबेज झुंज कसा काय शिकला?"
बिरबल म्हणाला, "महाराज तुम्ही मला कोंबडा दिला आणि सांगितलेत की या कोंबड्याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी येऊ न येता झुंज शिकला पाहिजे. मी या कोंबड्याला घरी नेले, आणि एका खोलीत कोंडून ठेवले, आणि त्या खोलीला चारी बाजूने आरसे बसवून घेतले. या कोंबड्याने आपल्या स्वतःचे प्रतिबिंब त्या आरशात पाहिले, तेव्हा तो खवळून उठला आणि झुंज शिकला. तो स्वतःशी झुंजत होता. पण त्याला वाटायचे, तो दुसऱ्या कोंबड्या बरोबर झुंजत आहे. रक्तबंबाळ होई पर्यंत तो स्वतःच्या प्रतिमेशी रोजच झुंजत होता. आणि आज हे त्याचेच प्रतीक आहे, तो इतका चांगला झुंज खेळला."
       आयुष्यात जो स्वतःशीश स्पर्धा करतो तो नेहमी यशस्वी होतो. आपली स्पर्धा ही खरं आपल्याशीच असते. गेल्या वर्षी माझ्याकडे किती ज्ञान होतं आणि यावर्षी त्या ज्ञानात किती भर पडली, या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा आपण आपल्या मनात करायला पाहिजे. माझ्याकडे कोणते गुण आहेत, आणखी कोणते गुण कमी आहेत, ते अंगीकार करणे आणि कोणते दुर्गुण आहेत, ते दूर करणे, हे झुंज स्वतः माणूस स्वतःशीच करून आपली प्रगती करू शकतो. आणि तोच खरा माणूस असतो.

1923. बिघाड

फ्रिज बिघडला.
टीव्ही बंद.
वाय-फाय डाऊन.
शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.
"आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.
सहा वेळा प्लग काढून लावला.
टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.
नेट कनेक्शन गायब.
सगळीकडे जणू "No Signal".
तो चिडून म्हणाला,
"हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय."
त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.
ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,
"काय झालं?"
"काय झालं? बघ ना, फ्रिज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये?"
ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडी थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.
ती म्हणाली—
"तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?"
क्षणभर तो गोंधळला.
काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एका जाणीवेचा प्रकाश पडला.
त्या एका वाक्यानं तो आत कुठे तरी ढवळून निघाला.
फ्रिज बंद झाला, म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं...
टीव्ही बंद झाला, म्हणून क्रिकेटचं स्कोअर समजलं नाही...
नेट गेलं, म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या…
पण ती?
ती अजूनही सकाळी उठून उठून सगळं करत होती.
गरम चहा, पोळीभाजी, मुलांची तयारी, सासूबाईंची औषधं…
सगळं 'नॉर्मल' चालू.
ती बिघडत नाही? ती थकत नाही?
ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं, पण त्याचा अर्थ खोल होता.
"तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?"
ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं.जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते,
ती कधी ‘डाऊन’ होते का विचारतो आपण?
ती तापातही उठते.
पाळीच्या दुखण्यातही काम करते.
मनात राग असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवते.
सासूबाई टोचून बोलल्या तरी चुप राहते.
कारण हे घर तिचं आहे… ती ‘चालू’ ठेवते.
तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला.
काही वर्षांपूर्वी
तो नवीन नोकरीला लागला होता.
तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे.
ती लग्नानंतर शहरात आली, नवीन माणसं, नवीन रस्ते, नवीन भाषा… पण एकही तक्रार नाही.
सगळं ती शिकत गेली.
रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पहायची.
त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांचं हसवणं, खेळणं, स्वतः थकलेली असूनही करत राहायची.
एकदा ती तापात होती… तरी सकाळी उठून स्वयंपाक केला.
तो म्हणाला होता, “आराम कर ना थोडा…”
ती म्हणाली होती, “तू कामावर जातोस, मी घरी राहते… आराम माझ्या वाट्याला नाहीच.”
---
आणि आत्ताच…
तो फ्रिज उघडून पाहतो, "कसं जमवायचं आता सगळं?"
पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं—
“माझ्या आयुष्याचा तापमान बिघडत असताना… किती वेळा हिने 'फ्रिज'सारखं स्थिर राहून सगळं थंड केलंय!”
तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो.
ती पोळ्या लाटत आहे. डोळ्यांत थकवा आहे, पण हात स्थिर आहेत.
"कधी बिघडशील गं तू?" तो हळूच म्हणतो.
ती थांबते. थोडा वेळ शांत.
मग म्हणते—
"बिघडले होते… पण तुमच्यासाठी परत चालू केले स्वतःला!"
त्याच्या छातीत काहीतरी  धडधडतं.
दुपारी...
तो स्वतः स्वयंपाकघरात जातो.
मुलाला विचारतो, "तुला सॅंडविच खायचंय का?"
मुलगा म्हणतो, "पप्पा, तुम्ही बनवाल?"
तो म्हणतो, "हो, आई विश्रांती घेत आहे."
ती हसते, पण त्या हसण्यात प्रश्न असतो—
"उद्या काय? पुन्हा मीच चालू?"
तो म्हणतो,
"नाही. आता मीही चालू राहीन."
रात्री...
ती शांत झोपलेली असते.
तो तिच्या पायाशी चादर घालतो.
लपवून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो.
आणि स्वतः मोबाईलच्या नोट्समध्ये लिहितो—
"तू चालू होतीस… म्हणून घर चाललं.
पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू… कारण आता समजलंय—
तू बिघडलीस तर मीही संपलो!"
या जगातली सगळी यंत्रं बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो.
पण जी व्यक्ती रोज चालू आहे – आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी… तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का?
तिचा बिघाड टाळायचा असेल, तर अधूनमधून तिला थांबू द्या.
कारण ती जर एक दिवस खरंच "Shutdown" झाली,
तर घर चालणार नाही… फक्त 'जगणं' चालू राहील… पण त्यात 'जीव' नसेल.
घराच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही, कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर, ज्याला कुणी कधीच ऑफलाईन करू शकत नाही.”
सौ तृप्ती देव

शनिवार, २४ मे, २०२५

1922. लग्न झालेल्या कांहीं मुलींच्या व्यथा

     लग्न मोडून, नवऱ्याशी सासरशी संबंध तोडून आईवडिलांकडे परतू इच्छिणाऱ्या विवाहित मुलींना माहेरचे दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत असा सूर  मागील काही दिवसांत अनेकांनी व्यक्त केलाय. हे म्हणणे अगदी बरोबर आहे, मी याच्याशी शतप्रतिशत सहमत आहे. ही गोष्ट मी वैयक्तिक जीवनात अनुभवलीय आणि या भूमिकेस पाठिंबाही दिला आहे. मात्र ह्या म्हणण्यामागची दुसरी एक बाजू आहे त्याविषयीचे दोन शब्द.
    माझ्या ओळखीतल्या मुलीची सॅाल्व केलेली एक केस. मुलगी अहमदनगरमधली. नवरा व सासरचे लोक छळू लागले म्हणून आई वडिलांनी तिला माहेरी ठेवून घेतले. काही महिन्यांनी तिच्या सासरच्या लोकांनी ती बदचलन असल्याची वावडी उठवली. सगळीकडे त्या मुलीच्या बदफैल असण्याची खमंग चर्चा होऊ लागली. लोक त्यात मीठमसाला घालून वाढून चढवून सांगू लागले. मुलीच्या आईवडिलांनी घरी कोंडून घेतले. त्या मुलीच्या धाकट्या बहिणीचे आधीच ठरलेले लग्न मोडले. नांदायचं सोडून माहेरी आलेल्या थोरल्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले, धाकट्या मुलीचे लग्न मोडले परिणामी मुलीच्या आईला शॅाक बसला. तिचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वडील दारूच्या आहारी गेले. मुलीच्या मामाने कुठून तरी धाकट्या मुलीचे लग्न जमवले. धाकट्या बहिणीचे लग्न व्हावे म्हणून मोठ्या मुलीने घर सोडले. पुण्याबाहेरील एका  आश्रमात तिने आसरा घेतला. सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले मात्र तिथेही तिचे शोषण झाले. तिच्या शोषणाच्या क्लिप्स इंटरनेटवर व्हायरल झाल्या. तिला तिथून जावे लागले. ज्यांनी तिला सुरक्षित आसरा देण्याचे आमिष दाखवले त्यांनीच फसवले. पिंपरी चिंचवडनजीक एका अपार्टमेंटमध्ये ती सेक्सवर्किंगच्या दलदलीत रूतली. 
      या मुलीविषयीची माहिती कळल्यावर तिच्या मामाशी आणि आता संसार करत असलेल्या धाकट्या बहिणीशी संपर्क साधला. त्यांनी तिला दरवाजे बंद केलेले. आई तिच्यामुळेच गेली नि दरम्यानच्या काळात तिचे वडीलही मरण पावले. अशा अपसमजामुळे धाकट्या मुलीच्या मनावर आघात झाला. थोरल्या मुलीला या सर्व गोष्टी कळाल्या तेव्हा ती उन्मळून पडली. आता ती स्वेच्छेने धंदा करते. ती स्वतःवर सूड उगवते असे मला राहून राहून वाटते. या मुलीच्या केसमध्ये ॲडव्होकेट सावंत यांची मदत झाली होती. तिचे कौन्सिलिंग करण्यात आले तरीही तिने निर्णय बदलला नाही. आजही स्वतःला अपराधी मानतो कारण तिचे वडील हयात नाहीत हे सत्य तिला माझ्यामुळेच कळाले आणि धाकटी बहीण तिचा तिरस्कार करते हे देखील तिला अकारण कळाले. आता या गोष्टींचे ओझे घेऊन ती हयातभर स्वतःला कोसत राहणार या विचाराने कासावीस व्हायला होतं.       
       सर्व प्रश्न, सर्व समस्या एकरेषीय उत्तरात आपण ढकलू शकत नाही. प्रत्येक गोष्टीस अनेक कंगोरे असतात, त्यातही बहुतांश करून सामाजिक संरचनेशी संबंधित असतात. हलकी समजली जाणारी कामे जसे की आचारीकाम वा केटरर्सकडे काम करणाऱ्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला, रोजंदारीवरच्या महिला, बांधकामाच्या साईटवरच्या एकल स्त्रिया, ही यादी मोठी आहे, या महिलांकडे त्याच क्षेत्रातले पुरूष एक भोगवस्तू म्हणून पाहत असतात हे वास्तव आहे. सासर सोडून घरी परतलेल्या मुलींनाही समाज नावे ठेवतो. अशा मुलींच्या आईवडिलांना किती दिव्यातून सामोरे जावे लागते हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! सासर कायमचे सोडून परतलेल्या मुलीच्या डोक्यात हजार प्रश्न असतात. भाऊ, भावाची बायको यांच्याशी ती कसे जुळवून घेणार? उरलेल्या आयुष्यात स्वावलंबी कशी होणार?  'आईवडील हयात असेपर्यंत मुलींचे माहेर असते' हे जुने लोक सांगत असत, त्यात अपवाद वगळता काहीच बदल झालेला नाही हे समाजाने खळखळ न करता मान्य केले पाहिजे. मुलींच्या ठायी स्वावलंबी होण्याची धमक असली पाहिजे. कुटुंबानेही त्यांना सपोर्ट केले पाहिजे.              
       'समाजाला फाट्यावर मारून जगता आले पाहिजे' असे तर मीही म्हणतो, मात्र प्रत्यक्षात ज्या मुलीला आणि तिच्या माहेरच्या लोकांना हे करायचे असते त्यांची भंबेरी उडते हे वास्तव आहे. त्यासाठी आधी तिच्या संपूर्ण कुटुंबातील लोकांनी मुलीला आणि तिच्या आईवडिलांना भक्कम आधार दिला पाहिजे. कुटुंब एकसंध होऊन त्यांच्यामागे उभे राहिले की समाजाची कोल्हेकुई फार काळ राहत नाही. या मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन जोवर बदलत नाही तोवर माहेरचे लोक अगदी खुलेपणाने त्यांच्यासाठी दारे खुली ठेवणार नाहीत. ही दारे आपण सर्वांनी मिळून किलकिली केली आहेत, ती सताड उघडी राहावीत म्हणून आपल्या दृष्टिकोनात आधी बदल व्हायला हवा ! अशा घटना घडल्या की वैयक्तिक पातळीवर बोलताना आपण सारेच प्रबोधनपर उपदेश देऊ लागतो, असे केले पाहिजे तसे केले पाहिजे, हे योग्य नि ते अयोग्य असे सांगू लागतो, मात्र समाजाचा घटक म्हणून जगताना आपली भूमिका तशीच आणि तीच असली पाहिजे यासाठी अपवाद वगळता आपण दक्ष नसतो ही आपली शोकांतिका आहे. असो. 
      पोस्टच्या सुरुवातीला ज्या मुलीचा उल्लेख केला आहे, तिला समजून घेणारा अनुरूप जोडीदार मिळाला आहे. दिवाळीत ते दोनाचे एक होतील. हे सुख दलदलीत रुतलेल्या हरेक जिवास मिळत नाही. कारण बहुतांश जीव पायदळी तुडवून आणि आतल्या आत घुसमटून कुढून संपून जातात. समाजात बदल होण्यासाठी आपण जे वक्तव्य करतो वा ज्या अपेक्षा मांडतो त्या  आपल्या सर्वांच्या शब्दांना कृतीची जोड लाभावी हीच मनोकामना. मग अनेक कळ्यांना नीट फुलता येईल !

1921. कांहीं माणसं अशीही असतात

 १ मे  १९९८ ची  निवांत सकाळ उजाडलेली. उन्हाळयाच्या सुट्टीचा तो पहिला दिवस. आता महिनाभर तरी मला कॉलेजला व लेकाला शाळेत जायचं नाही याचा आनंद. दारावरील बेल वाजली मी दार उघडले तर माझ्या कॉलेजातील मोरगावकर मॅडम दारात उभ्या. त्यांच्या चेहऱ्यावर ताण व संताप. त्या आत येवून त्या बसल्या आणि सांगू लागल्या 
"अग आपल्या कॉलेजातल्या प्राध्यापक जाधवांची पत्नी सिव्हील हॉस्पीटला ॲडमीट आहे. आज पहाटे चार वाजता ती स्टोहवर पाणी तापवायला गेली. स्टोहचा भडका उडाला त्यात ती बरीच जळाली आहे."
"स्टोह? आपल्या घरात सुद्धा आता गॅस आहे. कित्येक वर्षापूर्वीच स्टोह वापरणे आपण बंद केलं आहे आणि हे जाधव सर तर बागायतदार शेतकरी. पुन्हा त्यांची दोन-चार दुकानं, कॉलेजातून मिळणारा पगार म्हणजे त्यांचा पॉकेट मनी. त्यांच्या घरात का स्टोह असेल? आणि हे महाशय कधीही कॉलेजमध्ये साडेसातला आलेले नाहीत .कायम नऊ वाजता डूलत डूलत येणार  प्रिन्सिपॉलचे पेल्यातील खास मित्र त्यामुळे त्यांना सर्वच सूट.  मग सुट्टीच्या दिवशी एवढ्या पहाटे उठून त्यांची बायको पाणी तापवायला का गेली असेल ?          
"वेडी आहेस का तू? अग  जाळलं त्यांनी आपल्या बायकोला आणि त्यांचा बाल बाका होणार  नाही. कारण आपल्या प्रिन्सिपॉलच्या राजकारणी पोलीस सगळीकडे उत्तम ओळखी आहेत. दाबून टाकेल बघ तो हे मित्राचं  प्रकरण. पेपर मध्ये एका ओळीची बातमी येणार नाही ."   
     दुर्दैवाने सर्व काही तसेच घडलं. अर्धवट जळालेल्या त्या स्त्रीने पोलिसांना 'माझी मीच स्टोचा भडका उडून जळाले' असा जवाब दिला .तिची माहेरची परिस्थिती गरिबीची होती गावावरून तिचे म्हातारे आई बाप लेकीला  भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते तेव्हा त्यांनीच तिला समजावले की नवऱ्याच्या विरुद्ध काही पोलीसांना बोलू  नको. कारण तुझ्या पाठीमागे तुझा एक पाच -सहा वर्षाचा मुलगा आहे. त्याचा सांभाळ तुझा नवराच करणार आहे."
'आता नवरा तुरुंगात जाऊन बसला आणि आपण मरून गेलो तर लेकराचं काय?' असा विचार त्या माऊलीने पण केला. सारं अंग  जळून गेलेल्या अवस्थेत  कशीबशी तिने दोन-तीन दिवस  तग धरली आणि मग ती चुपचाप मरून गेली. बायकोच्या मृत्यूनंतर महिनाभराच्या आत जाधव सराच जिच्याशी प्रेमप्रकरण होतं तिच्याशी लग्न लावून तो उजळ माथ्याने नवी नवरी घेऊन घरी घेऊन आला. १५ जूनला कॉलेज सुरू झालं तेव्हा जाधव सरांच्या पाठीमागे स्टाफरूममधे या साऱ्या रसभरीत चर्चा रंगल्या. एक दिवस मधल्या सुट्टीत स्टाफरूम मधे चहा घेवून प्राध्यापकांशी गप्पा मारायला म्हणून प्रिन्सिपॉल महोदय दाखल झाले आणि त्यांनी जाधव सरांचे नवीन लग्न केल्याबद्दल अभिनंदन केले .
"आता जे दुर्दैवाने घडलं ते घडलं पण लेकराला आई नको का ? बर झालं जाधव सर तुम्ही लग्न केलं.आता आम्हाला लग्नाच जेवण द्या बरं साऱ्यांना ! "असं प्रिन्सिपॉलने  म्हटल्यावर जाधव बुवाने  आनंदाने होकार दिला.        
     मी अवाक् होऊन सारं काही पहात होते .जाधव यांना पाठीमागे जे नावं ठेवत होते त्या तमाम मास्तर मास्तरणींनी त्यांना भरभरून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या शनिवारी संध्याकाळी कॉलेज इमारतीच्या गच्चीवर सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन पंगती करून जाधवाने जेवण दिलं. जेवणानंतर सर्वांना आईसक्रीम वाटपही झालं. मी सोडून मोरगावकर बाईंसह सर्व मास्तर आणि मास्तरणी भोजनाला उपस्थित होते. मोरगावकर बाई मला म्हणाल्या ,
"अगं साहेबाच्या घरच्या कुत्र्याला पण सलाम करावा लागतो. हा तर साहेबांचा मित्र. जेवणाचं  निमंत्रण नाकारलं आणि  प्राचार्य महोदयांनी करून टाकली कुठेतरी लांब खेड्यापाड्यात बदली तर काय करणार? तू आली नाहीस ना जेवायला आता बघ तुला त्रास होईल."  आणि झालं पण तसंच. कुठलीतरी खुसपट काढून दोन-चार प्रेमपत्र ( मेमो ) मला प्रिन्सिपॉलने. देऊ केली.  मी नसताना
"या बाई  इतरांच्या घरच्या कार्यक्रमाला येत नाहीत. उद्या यांच्या घरी कोणी मेल तरी दारावर कुत्रं जायचं नाही." अशी भविष्यवाणीही केल्याचे माझ्या कानावर आले. यथावकाश जाधव सरांचा संसार बहरला. त्यांच्या संसार वेलीवर अजून एक फुल फुलले म्हणजे त्यांच्या नवीन पत्नीला एक मुलगा झाला. नंतर दोन्ही मुलांना घेऊन बस स्टॉप वर शाळेच्या बसची वाट पाहताना अनेकदा मी त्यांच्या नूतन पत्नीला पाहिलं होतं.     
        त्या सुमारास  पाचवा वेतन आयोग लागू झाल्याने  मी जरा स्वतःचं घर घ्यावं असा विचार करू लागले होते . आमच्या ज्युनियर कॉलेजातील एक प्राध्यापक कुठल्याही स्वार्थाशिवाय इतरांना घर प्लॉट शेती प्रॉपर्टी घेण्यासाठी मदत करायचे. मी आत्ता जेथे राहते आहे तेही घर त्यांनीच मला बघून दिलेलं आहे. आमच्या कॉलेजतील  बहुतेक जणांची घर त्यांच्यामुळे झालीत. तर हे गृहस्थ मला एका रो हाऊसच्या कॉलनीत घेऊन गेले. फक्त दहा टुमदार रो हाऊसची ती कॉलनी होती. दहाव्या नंबरचं रो हाऊस रिकामं होतं. जागा अगदी मोक्याची आणि अत्यंत प्रतिष्ठित वस्तीत होती .मी ते घर घेण्याचा विचार करत असताना  ते सर म्हणाले  
"अहो येथील पहिल्या नंबरचं रो हाऊस आपल्या कॉलेजातील जाधव सरांनी घेतलं आहे. यां ना आपण बघूया. अजून ते रहायला आलेले नाहीत. पण किती हौशनी सजवत आहेत ते नवं घर ..पहा तरी !"
      मी निमुटपणे  त्या रो हाउसमधे शिरले. कोरी करकरीत वास्तु, सारीकडे रंगाचा वास, स्वयंपाक घरामध्ये हौसेने केलेल्या ग्रॅनाईटच्या ओट्यामागे फळांच्या चित्राच्या टाइल्स बसवलेल्या. संगमरवरी जीन्याने वरती गेल्यावर ती मास्टर्स बेडरूम. तेथील नु कताच तयार झालेला मोठ्ठा लाकडी बेड, वॉडरोब्स. बेडच्या मागेच अगदी अर्धी भिंत व्यापून टाकणारे जाधवांचे आपल्या नवपरिणीत पत्नीसहचे हसरे पोट्रेट. मी कधीही न पाहिलेल्या आणि जळून तडफडून मरून गेलेल्या जाधव सरांच्या प्रथम  पत्नीच्या आठवणीने माझ्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं होतं. जणू  कधीच काही घडलंच नाही इतक्या आनंदाने राजा राणीचा नवा कोरा संसार सजवला जात होता.  मी एवढेच म्हटलं , 
"सर मला नको इथे घर .कॉलेजमधील कोणी आसपास रहात नसेल अशा ठीकाणी मला शोधून द्या घर ! "
      कितीतरी वर्ष या घटनेला उलटून गेली आहेत. तरी प्रत्येक एक मे ला मला हे सारं आठवतं आणि  या घटनेबद्दल माझ्यासकट कोणीही ब्र न उच्चारता किती आनंदाने या बायकोचा खून करणाऱ्या माणसाला आपल्यात आपल्या स्वार्थासाठी सामावून घेतलं आहे  याबद्दल शरम वाटते. 

(इथे नावं काल्पनिक वापरली असली तरीही यातील व्यक्ती, घटना आणि वास्तव यात काही साम्य आढळल्यास अजिबात योगायोग समजू नये )

1920. राणीमाशी

 “काय गं कांचन? आज घरी बाबांची चौकशी करायला फोन नाही केलास तो?” नेत्रा कांचनला विचारत होती.  
एकाच क्युबिकलमध्ये दोघी बसत असल्याने नेत्राच्या ते लक्षात आलं होतं. कांचन रोज साडेदहाला बाबांना ऑफिसातून फोन करायची. ‘आंघोळ झाली का?’ ‘दुसरा चहा प्यायलात का?’ ‘दरवाजा नीट लावून घ्या’ वगैरे वगैरे. कांचनची आई जाऊन जवळजवळ पाच वर्षं झाली होती. आई गेल्यापासून कांचन आपल्या भावाची व वडिलांची आईच झाली होती जणू.  
बँकेत क्लार्क म्हणून लागलेली कांचन आता क्लास वन ऑफिसर होती. खरं तर तिला पाच वर्षांपूर्वी पुढचं ब्रँच मॅनेजरचं प्रमोशनही मिळालं होतं. तिची बदली नाशिकला होणार होती. त्याच वेळेस तिची आई अचानक हार्ट अटॅकने गेली होती. नाशिकला जाण्यासाठी पूर्ण तयारी, अगदी बॅगसुद्धा भरून झाली होती तिची.  
नेत्राला कांचनची सर्व कहाणी माहीत होती. आई असताना कितीतरी वर्षं ती कांचनच्या लग्नाचं पहात होती. पण कुठलेतरी आडमुठे ग्रह आड येत होते नि एवढ्या हुशार, सुस्वभावी मुलीचं दिसायला चांगली असूनही जमत नव्हतं. आई गेल्यानंतर तिच्या लग्नाचे प्रयत्नही बंद झाले होते. कांचनचे वडील थोडे स्वार्थी असावेत आणि भाऊ कार्तिक स्वतःच्या विश्वात रमणारा असावा, असा नेत्राचा कयास होता. पण कांचनचं त्याच्यावरचं प्रेम पाहून नेत्राने तिला असं कधी बोलून दाखवलं नव्हतं. 
नाही म्हणायला तिने कांचनाच्या मागे लग्न कर असा धोशा मात्र लावला होता. खरं तर ऑफिसातल्या सामंतनं तिला लग्नासाठी विचारलंही होतं. तिने त्याला नकार दिला होता. ह्या नकारामागे घरच्यांसाठीचा त्याग होता की त्याचं तिच्यासारखं क्लास वन नसणं नव्हतं हे तिचं तिलाच माहित होतं. नेत्रा मात्र तिला समजावून थकली होती. तरीही तिने आशा सोडली नव्हती.   
पुढे कार्तिक इंजिनिअर बनून त्याला छानशी नोकरीही मिळाली होती. वर्षभरात त्याने आपली जीवनसाथीही निवडली होती. स्वतः लग्न ठरल्यावर त्याला कांचनच्या लग्नाची आठवण झाली होती. तीही बहुधा बायकोनेच करून दिली असावी. पण एव्हाना पस्तीस वर्षांच्या कांचनचा लग्नातला रसच गेला होता.  
“कांचन, का लग्न करत नाहीयेस तू? जरा आजूबाजूला पहा. जो तो आपल्या सुखी संसारात रमलाय.” पूर्वी एकदा नेत्राने तिला विचारलं होतं.  
“तू म्हण ‘सुखी संसार’ वगैरे. पण चक्क तडजोड आहे ती. मी पाहिलाय ना माझ्या आईबाबांचा संसार. कायम कष्ट करणारी आई आणि पत्त्यांच्या व्यसनात बुडालेले बाबा. लहानपणी रात्री साडेबारा-एक वाजेपर्यंत त्यांची वाट बघत बसणाऱ्या आईच्या डोळ्यांतील पाणी अजून विसरता येत नाहीये मला.” 
“अजूनही खेळतात का गं पत्ते?” 
“छे गं! आता कसले खेळताहेत? निवृत्त झाल्यानंतर तब्येत साथ देईना, मग सोडले. नंतर मग सारखे घरात असायचे. मग प्रत्येक गोष्टीवर आईवर अवलंबून. आता शेवटी शेवटी आईला त्यांचा थोडा तरी सहवास मिळाला होता. जरा कुठे सुख-समाधान तिच्या वाट्याला येत होतं आणि तेवढ्यातच..” 
“हो, माहीत आहे मला. तुमची चाळ पाडून टॉवर झाला. तुम्हाला छानपैकी वन बीएचके फ्लॅट मिळाला. आणि तुझं सर्व सेव्हिंग खर्च करून तू तो आईच्या आवडीप्रमाणे सजवून घेतलास ते. खरंच अजून थोडी वर्षं तरी आई हवी होती गं तुझी. तुझं लग्न, तुझा संसार पाहिला असता तर…” 
“आलीस परत माझ्या लग्नावर? चल, हात धुवायला. लंच टाइम संपलाय आता.” 
अशा प्रकारे प्रत्येक वेळेस कांचन लग्नाचा विषय उडवून लावत होती. आई असेपर्यंत ती निदान सांगून आलेले मुलगे बघत तरी होती. पण आई गेल्यापासून मात्र तिने आपल्या मनाचा तो कप्पा बहुधा पूर्ण बंद केला होता. अर्थात, घरून कोणी तिच्या लग्नाच्या बाबतीत फार उत्साही नव्हतं ही गोष्ट वेगळीच. नेत्रा कांचनच्या सर्व सुखदुःखाची साक्षीदार होती. म्हणूनच अलीकडे कार्तिकचं लग्न झाल्यापासून बदललेली कांचन तिला जाणवत होती.  
कार्तिकच्या लग्नानंतर कांचनबरोबरच तिच्या वहिनीचा, गार्गीचाही हात किचनमध्ये वावरू लागला होता. एकाच घरात राहणाऱ्या दोन स्त्रियांमध्ये जर काही वादविवाद असतील तर त्याचं मोठं कारण ‘किचन’ हेच असतं हे नेत्राला चांगलंच माहीत होतं.  
असाच एक दिवस ऑफिसात पार्टीचा बेत चालला होता. व्हेज किती, नॉनव्हेज किती मोजणं चालू होतं. नेत्राने कांचनचं नाव नॉनव्हेजमध्ये दिलं तेव्हा कांचननं ते बदलायला लावलं.  
“काय गं ? चिकन, मटणाची एवढी भोक्ती तू आणि आज काय झालं?” नेत्राने विचारलं.  
“उबग आलाय गं. हल्ली घरी जवळजवळ रोज नॉनव्हेज असतं. गार्गीला आवडतं म्हणून. तिच्याबरोबरीने घरातले सगळेच खातात. गुरुवार म्हणू नको, मंगळवार म्हणू नको, संकष्टी म्हणू नको. सारखे जिभेचे चोचले.” 
“तिला सवय असेल गं माहेरी. लग्न झालं तरी पटकन सवयी बदलत नाहीत. जड जातं जरा. आणि तू कधीपासून एवढी ओरॅथोडॉक्स झालीस? तू काही देवाधर्माचं अवडंबर माजवणारी नाहीस.” 
“देवाधर्मासाठी नको, पण आपल्या तब्येतीसाठी तरी आपण ही बंधनं पाळली पाहिजेत ना? रोज तेलकट, मसालेदार चांगलं आहे का तूच सांग.” 
खरंच होतं कांचनचं. बाबाना बीपी, डायबेटीस आहे म्हणून ती नेहमी पौष्टिक पण चविष्ट स्वयंपाक करीत असे. सूप्स, सॅलड्स, ज्युसेस, फळं, पालेभाज्या सारं आहारात असेल ह्याची ती काळजी घेत असे. 
“जाऊदे गं. समजेल तिला हळूहळू.” 
“काही समजत नाही. लग्नानंतर दोघांचंही वजन चांगलं सात आठ किलोंनी वाढलं आहे. लोक कौतुक करतात. “वा! लग्न चांगलं मानवलंय हं! आणि ही दोघं खुश होतात.” कांचन चांगलीच वैतागली होती.  
“जाऊदे कांचन. त्या नवराबायकोना त्यांचं काय ते बघून घेऊ दे. तू तुला आणि बाबांना काय हवं ते बनव म्हणजे प्रश्नच मिटला.” नेत्राने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. 
“तिथेच तर घोडं पेंड खातंय ना? आता त्या दिवशी तुमची भटांची आंबटगोड अळूची भाजी बाबांना आवडते म्हणून मुद्दाम तुझ्याकडून रेसिपि घेऊन केली. पण गार्गीने आदल्या दिवशीचं चिकन गरम केलं तर ह्यांना चिकनपुढे ती भाजी नकोशी झाली. अळू आणा, साफ करा, भाजी करा माझे कष्ट वाया गेले गं. आणि कष्टापेक्षाही जास्त मला डावललं जातंय म्हणून वाईट वाटलं गं.” कांचनचे डोळे ओलावले होते.  
नेत्रालाही कांचनचं आता वाईट वाटत होतं. तिनं आई गेल्यापासून किती जपलं होतं दोघांना. वडिलांची मोठी आजारपणं रजा घेऊन काढली होती. कार्तिकच्या शिक्षणाला हातभार लावला होता, त्याच्या आवडी निवडी सांभाळल्या होत्या. त्यांच्यासाठी स्वतःचं प्रमोशन, लग्न ह्या महत्त्वाच्या गोष्टीही बाजूला ठेवल्या होत्या तिनं. आणि आता त्यांना असलेली हिची गरज संपली होती. म्हणूनच सारं बदलत होतं का? 
कार्तिकचं लग्न ठरलं तेव्हा आधी खूप खुश असलेली कांचन हल्ली मात्र नाराज दिसत होती. लग्न झाल्याझाल्या पहिली कुऱ्हाड आली ती तिच्या बेडरूमवर. एकमेव बेडरूम लग्न झालेल्या भावाला खाली करून देणं आवश्यकच होतं. त्याच्या लग्नाआधी रात्री उशिरापर्यंत टीव्ही पहायचा असतो म्हणून बाबा आणि कार्तिकला उशीर होतो म्हणून तो असे दोघेही बाहेर हॉल मध्ये झोपत असत. शिवाय सकाळी लवकर उठून कांचन बेडरूममध्ये सतारीवर रियाजही करत असे. आता ती हॉलमध्ये झोपायला लागल्यापासून बाबांना सकाळी जाग येईल म्हणून तिला रियाज सुद्धा बंद करावा लागला होता. तिचं कपाट तिला हॉल मध्ये आणावं लागलं होतं. तिचं वाचन, गाणं, सातारवादन. व्यायाम साऱ्याच्या वेळांवर बंधनं आली होती. जोडप्याला प्रायव्हसी लागते तशी एकट्या माणसालाही लागतेच ना? 
बेडरूम कब्जात घेऊन झाल्यावर गार्गीने आपला मोर्चा किचनकडे वळवला होता. कार्तिक तर तिच्या ताब्यात गेलाच होता पण आता बाबांनाही सुनेचं अप्रूप वाटू लागलं होतं. ती त्यांच्या जिभेचे सारे लाड पुरवत होती ना! त्यामुळे कांचनची आहाराची बंधनं त्यांना डाचत होती. ह्या सर्व गोष्टींचा कांचनला त्रास होत होता. पण ह्यात खरं तर गार्गीची काही चूक नाही आहे हे कांचनला समजावण्याचा नेत्राने प्रयत्न केला होता.  
नेत्रा तिच्या नणंदेशी जशी प्रेमाने वागते तशी गार्गी आपल्याशी का वागू शकत नाही हा प्रश्न कांचनला पडला होता. पण सातआठ दिवस माहेरपणाला आलेल्या नणंदेची सरबराई करणं वेगळं आणि आपल्या संसारात कायमस्वरुपी असलेल्या नणंदेचं मन सांभाळणं वेगळं हे कांचनला समजावणं नेत्राला अलीकडे गरजेचं वाटू लागलं होतं.  
दर दहा पंधरा दिवसांनी काहीतरी व्हायचं तसं परवाही झालं. कार्तिकचा वाढदिवस म्हणून दरवर्षीप्रमाणे कांचन ऑफिसातून लवकर निघाली. जाताजाता त्याच्या आवडीचं श्रीखंड आणि बर्डीज चा केक घेऊन गेली. गेल्यागेल्या तिनं झटपट पुलाव, छोले, अळूवड्या असा सगळा कार्तिकच्या आवडीचा मेनू तयार केला. जेवायच्या वेळेस गरमगरम पुऱ्या तळायच्या ठरवून ती हॉलमध्ये टीव्हीसमोर येऊन बसली.  
तेवढ्यातच बाबाही देवळातून आले म्हणून चहा बनवण्यासाठी ती उठली. मनातल्या मनात गार्गीचं आश्चर्य करत होती. नेहमी सहा वाजता येते. आता सात वाजून गेले तरी पत्ता नाही मॅडमचा. लग्नानंतरचा नवऱ्याचा पहिला वाढदिवस. सकाळी एक ऑफिसची घाई असते, पण संध्याकाळी तरी वेळेवर यायचं. नवऱ्याच्या आवडीचं काही बनवायचं. काय म्हणावं हिला?  
नेहमीप्रमाणे गार्गीला नावं ठेवण्याचं काम कांचनचं मन मनापासून करत होतं. मध्येच आपण गार्गीत उगाचच खोटं काढतोय असंही तिला जाणवत होतं. पण परत काहीना काही सबब काढून आपलंच कसं बरोबर हे ती मनाला पटवत होती.  
मनाचं असं आंदोलन चालू असतानाच फोन खणखणला.  
“हॅलो ताई, अगं कधीपासून फोन लावतोय. नीट ठेवला नव्हता का? आणि पर्समधला मोबाईल बाहेर काढून ठेवायचा असतो म्हंटलं घरी आल्यावर. बरं, ते जाऊदे. ऐक, आज आम्हाला उशीर होईल घरी यायला. हॉटेलात जातोय आम्ही. तुम्ही दोघं जेऊन घ्या. लॅचची किल्ली आहे माझ्याकडे. तुम्ही झोपलात तरी चालेल.” 
“अरे, सगळा स्वयंपाक तयार आहे पण…” 
“प्लिज गं ताई, आता पण नको आणि परंतु नको,” आणि मग अगदी हलक्या आवाजात पुढे म्हणाला, “आता गार्गीच्या माहेरचे आहेत आमच्याबरोबर. नंतर बोलू आपण. चल, गुडनाईट.” कांचनच्या बोलण्याची वाटही न पहाता त्याने फोन ठेऊन दिला.  
कांचन आता चांगलीच वैतागली. बाजूलाच बसलेल्या बाबांना म्हणाली, “पाहिलंत बाबा, मी एवढी दमले असतानाही खपून ह्याच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि हा हॉटेलात जेवतोय बायकोबरोबर.” 
“कांचन, आता लग्न झालंय त्याचं. तो आता बायकोबरोबरच जाणार. साहजिकच आहे ते. तू त्याला आधी विचारलं होतंस का रात्रीच्या जेवणाचं?” 
बाबा नेहमी त्यांची बाजू का घेतात? स्वतः कधी बायकोबरोबर गेले का? कधी फिरायला जाणं नाही. कधी सिनेमा, नाटक नाही. बायकोचा वाढदिवस तर दूरच पण पत्त्यांच्या व्यसनापायी कधी मुलांच्या वाढदिवसालाही हजर नसायचे. आणि आता नवरा-बायकोच्या नात्याच्या गोष्टी करताहेत! सून आल्यावर ह्यांची सगळी मतं बदलली? आपण इतके कष्ट घेऊन सगळं जेवण बनवलं, त्याचं ह्यांना काहीच वाटत नाही? 
मन खूप आक्रन्दू लागलं तेव्हा तिने नेत्राच्या दृष्टीने विचार करायचं ठरवलं. नेत्रा नक्की म्हणाली असती, “अगं, हल्ली वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला हॉटेलात जायचीच पद्धत आहे. तू बघतेस ना ऑफिसात सर्वजण तसाच साजरा करतात वाढदिवस. तू कशाला मनाला लावून घेतेस?” आणि मग पुढे कोपरखळी मारली असती, “उद्या तू आणि सामंत तेच करणार आहात.” 
सामंतचा विचार मनात आला आणि कांचनला एकदम वेगळीच जाणीव झाली. आपण आणि सामंत… ह्या वर्षी सामंतचं प्रमोशन ड्यू आहे. तोही कष्टाळू आहे. त्याला प्रमोशन मिळेलच. मग तोही आपल्यासारखा क्लास वन ऑफिसर होईल. तिच्या मनात वेगळ्या दिशेने वारे वाहू लागले.  
“काय गं कांचन, तू मागे प्रमोशन नाकारलंस म्हणून आता तुला प्रमोशन देणारच नाही का तुझी बँक?” बाबा विचारत होते.  
“नाही हो. देईल ना. पण परत मुंबईच्या बाहेरच होईल पोस्टिंग.” 
“मग होऊ दे की. क्वार्टर्स मिळतात ना? जायचं पुढेपुढे आयुष्यात. थांबायचं नाही एका जागी.” तिचा अदमास घेत बाबा म्हणाले.  
बाबांचं हे मत ऐकून कांचन अवाक झाली. मागच्या प्रमोशनच्या वेळी विरोध करणारे हेच का ते बाबा? आई गेली तेव्हा नाशिकला कुठे जाऊ दिलं ह्यांनी आपल्याला? म्हणताना म्हणाले, “बायकांची नोकरी म्हणजे गाजराची पुंगी. वाजली तर वाजवली नाही तर फेकून दिली.” पण खरं कारण तर वेगळंच होतं. तेव्हा घरात करतंसवरतं कुणी नव्हतं. स्वयंपाकपाणी, भाजी आणणं, बाहेरची कामं कोण करणार होतं सारं? म्हणून… म्हणून अडवलं ह्यांनी आपल्याला तेव्हा? तेव्हा नाही म्हणाले ते “पुढे पुढे जायचं आयुष्यात.” 
कांचनला परत एकदा गहिवरून आलं. स्वतःचीच कीव आली. म्हणजे आपण मूर्ख ठरलो. आपला गैरफायदा घेतला ह्या दोघांनी. इतके वर्षात आपल्यासाठी स्थळंही पाहिली नाहीत. आणि आता कार्तिक मुलांवर मुलं सुचवतोय ते माझ्या ब्याद जावी म्हणून? त्याचं जाऊदे. तो गार्गीचा नवरा आधी आहे आणि मग आपला भाऊ हे तर सिद्ध झालंच आहे. पण बाबा… आता ते सुद्धा आपले राहिले नाहीत? त्यांनाही मी इथे राहू नये असं वाटतंय? की माझ्या आणि गार्गीच्या मतभेदांची भीती वाटतेय त्यांना? प्रत्येक नात्याला एक आयुष्य असतं हेच खरं, ह्यांच्यातलं आणि आपल्यातलं नातं आता वृद्ध होत चाललंय का? 
विचाराच्या शृंखलेत कांचन अडकत चालली होती. तेवढ्यात बाबांनी टीव्ही लावला. मधमाश्यांवर माहिती देणारी कुठलीतरी फिल्म चालली होती. माहिती देणारा सांगत होता.  
“ही पहा ह्या पोळ्यातील राणीमाशी. ही राणीमाशी ह्या पोळ्याची मालकीण. इथे हिचंच राज्य, पण पुढे कधीतरी ह्याच पोळ्यातील इतर कामकरी आणि नरमाश्याना दुसऱ्या राणीमाशीची गरज भासेल तेव्हा ते नवीन राणीमाशी शोधतील. मग ह्या दोन राणीमाश्यांमध्ये तुंबळ युद्ध होईल. युद्धात जी जिंकेल ती ह्या पोळ्याची मालकीण बनेल. नवीन राणीमाशी जर जिंकली तर ही निरुपयोगी झालेली राणीमाशी हे पोळं सोडून निघून जाईल. एका नव्या पोळ्याच्या शोधार्थ. ज्याची मालकीण फक्त तीच असेल. कारण एका पोळ्यात दोन राणीमाशा कधीच राहू शकत नाहीत.” 
कांचन आश्चर्यचकित होऊन ही माहिती ऐकत होती आणि विचार करत होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसात शिरताच नेत्राने तिला बातमी दिली, 
“कांचन, गुड न्युज. तुझं प्रमोशन झालं. अभिनंदन. आणि अजून एक गुड न्यूज. सामंतचंही प्रमोशन झालं. आणि तिसरी आणि महत्त्वाची गुड न्युज म्हणजे तुम्हा दोघांचंही पोस्टिंग पुण्यात झालंय. आता आम्हाला प्रमोशनचेही पेढे मिळणार आणि लग्नाचे लाडूही. होय ना? बोल ना कांचन, पुण्याला जायची तयारी आता करणार ना?” 
“करायलाच हवी नेत्रा. दुसरं पोळं बांधायलाच हवं गं. कारण एका पोळ्यात दोन राणीमाशा कधीच राहू शकत नाहीत.” खिडकीतून दिसणाऱ्या वडाच्या झाडावरच्या मधमाश्यांच्या पोळ्याकडे बघत कांचन म्हणाली आणि तिच्या बोलण्याचा अर्थ न समजून नेत्रा फक्त तिच्याकडे पहात राहिली.

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...