शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

2528. मातृत्वाचे दान

पंधरा वर्षं झाली होती. 
सरिताच्या घरी पाळणा यायचं नाव घेत नव्हतं. सकाळ झाली की ती चुलीवर बसायची, भाकर थापायची, पण मन मात्र रोज रिकामंच राहायचं. गावातल्या बायका बोलायच्या, कुणी टोमणे मारायचं, कुणी कीव करायचं, पण सरिताचं काळीज रोज नव्यानं तुटायचं.
तिचा नवरा, फारसं बोलायचा न्हाय. पण रात्री अंथरुणावर वळताना त्याचा सुस्कारा सरिताच्या काळजाला टोचायचा. दोघंही देवाकडं मागणं सोडत नव्हते. प्रत्येक वारी, प्रत्येक मंगळवार, प्रत्येक उपास… सरिता फक्त एकच मागणं मागायची — आई म्हणायला एक जीव.
सासू शकुंतला बाई रोज देवळात दिवा लावायची. देवापुढं हात जोडून म्हणायची, “देवा, माझ्या सुनेचं पदर रिकामं ठेवू नकोस.” पण दिवस सरायचे, वर्षं बदलायची, आणि आशा मात्र हळूहळू थकायची.
डॉक्टरांनी एक दिवस साफ सांगितलं, “आता फार अपेक्षा ठेवू नका.”
त्या दिवशी सरिता काही बोलली न्हाय. देवळाच्या पायरीवर बसून फक्त एवढंच म्हणाली, “देवा, माझ्या नशिबात नसलं तरी चालेल, पण मला सहन करायचं बळ दे.”
आणि नेमकं त्याच सुमारास, नियतीनं वेगळाच डाव टाकला.
एका सकाळी सरिताला चक्कर आली. तिला वाटलं थकवा असेल. पण तपासणी झाली आणि डॉक्टरांचे शब्द कानात पडताच तिच्या पायाखालची जमीन सरकली — ती आई होणार होती.
सरिता देवळात धावत गेली. डोळ्यात अश्रू, ओठांवर नाव. तिला वाटलं स्वप्न असेल. पण नाही… हे मातृत्वाचं दान होतं. पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवाने दिलेली भीक नव्हे, तर अमूल्य वरदान होतं.
नऊ महिने सरिता श्वासाश्वासात लेकरू जपलं. चालताना पोटावरून हात फिरवायची, झोपताना हळूच कुशी बदलायची. प्रत्येक रात्री एकच भीती — देवा, काही होऊ देऊ नकोस.
डिलिव्हरीचा दिवस आला तेव्हा सरिताच्या वेदना असह्य झाल्या. पण त्या वेदनांपेक्षा मनातली प्रार्थना मोठी होती. आणि अखेर, एका क्षणी बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर पडला.
तो आवाज नव्हता… तो सरिताच्या आयुष्याचा श्वास होता.
नर्सनं बाळ हातात दिलं तेव्हा सरिता थरथरत होती. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. एवढ्या वर्षांची वाट पाहिलेला तो जीव तिच्या छातीत विसावला होता. तिनं कपाळ टेकवलं आणि मनातच म्हणाली, 
“इतका उशीर केलास यायला… पण आलास ना रे.”
तिचा नवरा डोळे पुसत उभा होता. शकुंतला बाई पाळणा हलवत म्हणत होत्या, “आज घरात देव उतरला.”
त्या दिवशी सरिताला कळलं —
मातृत्व हे नुसतं नशीब न्हाय…
ते देवाचं दान हाय…
आणि जे दान उशिरा मिळतं,
त्याची किंमत काळजाला जास्त कळते.
आता लोक मला आई म्हणतात.
पण या दोन अक्षरांमागं माझं अख्खं आयुष्य लपलेलं हाय.
बाळ जन्माला आल्यावर सगळे आनंदात होते. नवऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं, शकुंतला माई पाळणा हलवत होत्या, घरात दिवे लावले गेले. पण माझ्या मनात एक वेगळीच भीती घर करून बसली होती. इतक्या वर्षांनी मिळालेलं सुख… कुठं हिरावून घेतलं जाईल का, ही धाकधूक मला रात्री झोपू देत नव्हती.
रात्री बाळ जरा हाललं की मी दचकून उठायचे. त्याचा श्वास ऐकायला कान जवळ न्यायचे. छाती वरखाली होतेय ना, हे बघूनच मला चैन पडायची. लोक म्हणायचे, “सरिता, एवढी काळजी करू नकोस.” पण ज्याचं मातृत्व पंधरा वर्षं देवाकडं मागितलेलं असतं, त्याचं काळीज एवढं सहज शांत बसत न्हाय.
एक दिवस बाळ तापानं फणफणलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याला उराशी धरून मी रडतच दवाखान्यात गेले. डॉक्टर बोलत होते, पण मला काही ऐकू येत नव्हतं. माझ्या कानात फक्त बाळाचा हलकासा श्वास घुमत होता.
“काही गंभीर न्हाय,” डॉक्टर म्हणाले तेव्हा माझ्या जीवात जीव आला.
मी देवळात जाऊन पाया पडले. त्या दिवशी पहिल्यांदा मी देवाला काही मागितलं न्हाय. फक्त मनात म्हणाले, धन्यवाद.
घरात परतल्यावर मी पाळण्याजवळ बसून त्याला बघत राहिले. एवढंसं लेकरू, पण माझ्या आयुष्याचा सगळा भार त्याच्यावर विसावलेला. मी त्याच्या बोटाला माझं बोट दिलं, त्यानं घट्ट पकडलं. त्या पकडीत मला माझं सगळं आयुष्य दिसलं.
नवरा कधी कधी म्हणायचा, “सरिता, तू आता स्वतःसाठीही जगायला शिक.”
मी हसायचे. माझं स्वतःसाठी जगणं आता ह्याच पाळण्यात झुलत होतं.
कधी कधी अंगणात उभी राहून मी आकाशाकडं पाहायचे. इतकी वर्षं जे आकाश मला रिकामं वाटायचं, तेच आज भरलेलं वाटायचं. मला उमगलं — देव उशीर करतो, पण तो मन मोडण्यासाठी न्हाय, तर मन मजबूत करण्यासाठी.
आजही मी माझ्या लेकराकडं बघते तेव्हा मनात एकच भीती उरते — कुठं नजरेला लागेल का? पण त्याच वेळी एक समाधानही हाय. कारण आता माझं काळीज बाहेर फिरतंय, श्वास घेतंय, हसतंय.
मी सरिता…
खूप उशिरा आई झाले,
पण आज कळतंय —
मातृत्व हे मिळालं न्हाय,
ते मला देवाने विश्वास म्हणून सोपवलं आहे.
आता गावात माझ्याकडं बघायची नजर बदलली हाय, हे मला रोज जाणवतं.
ज्या ओट्यावर बसून बायका एकेकाळी माझ्या कुशीत डोकावून हळू आवाजात बोलायच्या, आज त्याच ओट्यावर त्या हसत बोलतात. तेच तोंड, पण शब्द वेगळे. आधी जे प्रश्न होते, आज तेच आशिर्वाद झालेत.
“सरिता, नजर लागू देऊ नकोस गं…”
“इतकं गोड लेकरू देव सगळ्यांना देत न्हाय.”
मी हसायचे.
पण मनात आठवायचं — हीच माणसं काही वर्षांपूर्वी शांततेत टोचायची.
एक दिवस विहिरीवर पाणी भरायला गेले. लेकरू काखेत होतं.
ताई, जी कधी माझ्याशी डोळे मिळवून बोलायची न्हाय, म्हणाली,
“देव फार मोठा हाय गं… वेळ घेतो, पण देतो.”
माझं काळीज थोडंसं हललं.
मी मनात म्हणाले, हो… पण तो वेळ आमच्यावर किती भारी पडतो, ते तुम्हाला कधी कळलं न्हाय.
पूर्वी माझ्या घरासमोरून जाताना बायका कुजबुजायच्या.
आज थांबून बाळाकडं बघतात.
कोणी गालावरून हात फिरवतं,
कोणी डोळ्यात पाणी आणतं.
एक दिवस शेजारची रेखा म्हणाली,
“सरिता, आम्ही तुला न कळत खूप बोललो असू… माफ कर हं.”
त्या एका वाक्यानं माझ्या पंधरा वर्षांचा भार हलका झाला.
मी काही बोलले न्हाय.
फक्त एवढंच वाटलं — माफी मागायला पण मोठं काळीज लागतं.
आज त्या बायका इतर कुणी रिकाम्या पदराची बाई दिसली की म्हणतात,
“बोलू नका तिच्याबद्दल… देवाची मर्जी कधी बदलते सांगता येत न्हाय.”
मी ते ऐकून थबकते.
मनात एक कडू गोड हसू येतं.
उशीर झाला… पण समज आली.
माझं लेकरू कुशीत हलतं.
मी त्याला घट्ट धरते.
कारण त्यानं फक्त मला आई बनवलं न्हाय,
तर गावातल्या बायकांनाही माणूसपणाची आठवण करून दिली.
मी सरिता…
माझ्या पाळण्यात फक्त लेकरू न्हाय झुलत,
तर आज विचारही बदलतायत.
आज गावाकडं बघताना मला माझंच जुने दिवस आठवतात. फरक एवढाच हाय, ते दिवस आता माझ्या पाठीशी उभे राहिल्यासारखे वाटतात.
त्या दिवशी देवळात भजन होतं. सगळ्या बायका जमल्या होत्या. मी लेकराला कुशीत घेऊन मागं बसले. भजन सुरू होतं, पण माझ्या कानात वेगळाच आवाज घुमत होता — रिकाम्या पदराचं रडणं.
तेवढ्यात ललिता दिसली. नवं लग्न झालं होतं तिचं. डोळ्यात भीती, चेहऱ्यावर ओढाताण. बायका कुजबुजायला लागल्या.
“आता वर्ष झालं तरी बातमी न्हाय…”
“आजकालच्या पोरींचं काय भरोसा…”
माझं काळीज धडकलं.
तोच सूर… तेच शब्द… फक्त पात्र बदललं होतं.
मी उठले.
माझा आवाज थरथरत होता, पण मन ठाम होतं.
“ए बायकांनो… थांबा जरा.”
सगळ्यांनी माझ्याकडं बघितलं.
मी ललिताकडं पाहिलं, मग सगळ्यांकडं.
“आज तुम्ही बोलताय… काल मी होते त्या जागी.
तेव्हा माझ्या घरात पाळणा हलला न्हाय, पण काळजात वणवा होता.”
देवळात शांतता पसरली.
“मातृत्व हे नशिबावर टाकून मोकळं व्हायचं कारण न्हाय.
ते देवाचं दान हाय… आणि दान कधी, कुणाला, कसं मिळेल — ते कुणी सांगू शकत न्हाय.”
ललिताच्या डोळ्यात पाणी आलं.
ती माझ्या जवळ येऊन उभी राहिली.
“माझ्या लेकरानं मला फक्त आई बनवलं न्हाय,”
मी पुढं म्हणाले,
“त्यांनी मला आवाज दिला.
आज कुणाच्या पदरावर बोलाल, तर लक्षात ठेवा —
तो पदर रिकामा न्हाय, तो फक्त प्रतीक्षेत हाय.”
कुणी काही बोललं न्हाय.
काही बायकांनी मान खाली घातली.
काहींच्या डोळ्यात पश्चात्ताप दिसला.
त्या दिवशी भजन संपलं, पण मनात वेगळंच काही सुरू झालं.
घरी परतताना ललिता माझ्या पायाशी पडली.
“ताई, आज तुमच्या शब्दांनी मला जगायचं बळ दिलं.”
मी तिला उचललं.
“बळ माझं न्हाय…
ते त्या दिवसांचं हाय, जे मी रडत काढले.”
रात्री मी पाळण्याजवळ बसले.
माझं लेकरू शांत झोपलेलं.
मी त्याच्या केसांवरून हात फिरवला.
“तुला माहीत हाय का रे…
तू जन्माला येण्याआधीच
खूप आई घडवल्यास.”
मी सरिता…
आज मला कळतंय —
मातृत्वाचं दान
फक्त लेकरापुरतं मर्यादित न्हाय…
ते विचारांनाही जन्म देतं.
आज अंगणात उभी राहून मागं वळून पाहते तेव्हा वाटतं — आयुष्य मला मोडायला आलं होतं, पण मी तुटले न्हाय.
ज्या रात्री उशी भिजायची, त्या रात्रींनीच मला कणखर केलं. ज्या प्रश्नांनी मला खाली खेचलं, त्याच प्रश्नांनी मला उभं राहायचं शिकवलं. आणि जे मातृत्व मला उशिरा मिळालं, तेच मला इतरांसाठी आधार बनवून गेलं.
आज माझं लेकरू पाळण्यात झुलतंय. पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त तो पाळणा न्हाय… तर माझा संघर्ष झुलतोय. मला कळतं — देव प्रत्येकाला सारखं देत न्हाय, पण तो प्रत्येकाला योग्य वेळी देतो.
आज गावात कुणी रिकाम्या पदराची बाई दिसली, तर माझं काळीज आपोआप तिच्याकडं धाव घेतं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि सांगते,
“तू अपुरी न्हायस… तुझा वेळ अजून यायचा हाय.”
कारण मी अनुभवातून शिकलेय -
मातृत्व हे फक्त शरीराचं न्हाय,
ते मनाचं, संयमाचं, आणि विश्वासाचं असतं.
जर वाट पाहायची हिंमत असेल,
जर अपमान सहन करूनही माणूसपण जपायचं बळ असेल,
तर देवाला दान द्यावंच लागतं.
मी सरिता…
आज अभिमानानं म्हणते -
माझ्या आयुष्यात मातृत्व उशिरा आलं,
पण जे आलं, ते इतकं मजबूत आलं
की त्यानं मला आईच न्हाय,
तर इतरांसाठी आशा बनवलं.
आणि म्हणूनच…
हार मानू नका.
वेळ लागतो, पण नशिब कधीच रिकाम्या हातानं पाठवत न्हाय.

©️ कैलास मोरे ✍️ ✍️ ✍️

2527. आकर्षण आणि प्रेम

 मानवी जीवनात भावना फार महत्त्वाच्या असतात. त्या भावना कधी क्षणिक असतात, तर कधी आयुष्यभर साथ देणाऱ्या ठरतात. अशाच दोन भावना म्हणजे आकर्षण आणि प्रेम. वरवर पाहता या दोन्ही भावना सारख्या वाटतात; पण त्यांच्या मुळाशी गेल्यावर त्यांच्यातला फरक स्पष्ट जाणवतो. अनेकदा आकर्षणालाच प्रेम समजून माणूस फसतो आणि नंतर निराश होतो. त्यामुळे आकर्षण आणि प्रेम यांतील नेमका फरक समजून घेणं फार आवश्यक आहे.
आकर्षण ही भावना सहसा पहिल्या नजरेत निर्माण होते. एखाद्या व्यक्तीचं रूप, बोलणं, वागणं, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास किंवा एखादी सवय आपल्याला आवडते आणि आपण त्या व्यक्तीकडे ओढलो जातो. हे आकर्षण शारीरिकही असू शकतं आणि मानसिकही. आकर्षणात उत्सुकता असते, थोडी अधीरता असते आणि त्या व्यक्तीला अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा असते. पण आकर्षण बहुतेक वेळा स्वतःपुरतं मर्यादित असतं. म्हणजे मला काय आवडतं, मला काय मिळतं, मला कसं वाटतं या केंद्राभोवती आकर्षण फिरतं.
प्रेम मात्र वेगळं असतं. प्रेम ही हळूहळू उमलणारी भावना आहे. ती वेळ मागते, अनुभव मागते आणि समजूत मागते. प्रेमात फक्त समोरच्या व्यक्तीचं चांगलंच नाही, तर तिच्या कमतरताही स्वीकारल्या जातात. आकर्षणात आपण समोरच्याला जसा आहे तसा पाहत नाही, तर जसा आपल्याला हवा आहे तसा पाहतो. प्रेमात मात्र वास्तव स्वीकारण्याची ताकद असते. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणं, तिच्या दुःखात सहभागी होणं.
आकर्षण बहुतेक वेळा बाह्य गोष्टींवर आधारलेलं असतं सौंदर्य, व्यक्तिमत्त्व, आर्थिक स्थैर्य, प्रसिद्धी किंवा सामाजिक स्थान. या गोष्टी बदलल्या की आकर्षणही कमी होऊ शकतं. प्रेम मात्र अंतर्मनाशी जोडलेलं असतं. परिस्थिती बदलली, अडचणी आल्या, संघर्ष वाढले तरी प्रेम टिकून राहतं. कारण प्रेमाची मुळे खोलवर रुजलेली असतात.
आकर्षणात अपेक्षा जास्त असतात. “तिने असंच वागावं”, “त्याने माझ्यासाठी हे करावं”, “माझ्या भावना समजून घ्याव्यात” अशा अपेक्षांचा डोंगर उभा राहतो. अपेक्षा पूर्ण झाल्या तर आनंद, नाही झाल्या तर राग आणि दुरावा. प्रेमात अपेक्षा असतातच, पण त्यासोबत समजूतही असते. प्रेम करणारा माणूस परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वीकारण्यावर भर देतो.
आकर्षणात “मी” जास्त असतो, प्रेमात “आपण” असतो. आकर्षणात स्वतःच्या भावना, स्वतःचा अहं, स्वतःच्या गरजा केंद्रस्थानी असतात. प्रेमात मात्र नात्याला महत्त्व दिलं जातं. “आपलं नातं टिकावं”, “आपण एकमेकांना समजून घ्यावं” असा विचार प्रेमात असतो. त्यामुळे प्रेमात समर्पण येतं, तर आकर्षणात मालकीभाव जास्त दिसून येतो.
आकर्षणात उत्साह जास्त आणि संयम कमी असतो. सर्व काही पटकन हवं असतं वेळ, लक्ष, प्रतिसाद. प्रेमात मात्र संयम असतो. प्रेम करणारा माणूस थांबायला शिकतो, वाट पाहायला शिकतो. तो जाणतो की प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. नातं खोल व्हायला, विश्वास निर्माण व्हायला घाई चालत नाही.
आकर्षण कधी कधी स्वार्थीही ठरू शकतं. “तो/ती माझ्यासाठी योग्य आहे का?” हा प्रश्न आकर्षणात महत्त्वाचा असतो. प्रेमात मात्र प्रश्न बदलतो “मी त्याच्यासाठी/तिच्यासाठी योग्य आहे का?” हा विचार प्रेमाची खोली दाखवतो. प्रेमात देणं महत्त्वाचं असतं, आकर्षणात मिळवणं.
आकर्षण तुटलं की माणूस सहज पुढे निघून जातो. दुसरी एखादी व्यक्ती आवडली की जुनं आकर्षण मागे पडतं. प्रेम तुटणं मात्र सोपं नसतं. प्रेम संपलं तरी त्याच्या आठवणी, शिकवण आणि भावनिक ठसे मनावर राहतात. कारण प्रेम फक्त भावना नसून एक अनुभव असतो.
आजच्या वेगवान जीवनात आकर्षणाला प्रेम समजण्याचं प्रमाण वाढलं आहे. सोशल मीडिया, झटपट संवाद, बाह्य आकर्षण यामुळे नाती पटकन जुळतात आणि तितक्याच पटकन तुटतात. अशा काळात प्रेम आणि आकर्षण यामधला फरक ओळखणं फार गरजेचं आहे. कारण चुकीच्या अपेक्षा, गैरसमज आणि भावनिक दुखापती यांचं मूळ अनेकदा या गोंधळात असतं.
शेवटी असं म्हणता येईल की आकर्षण वाईट नाही. ते प्रेमाची पहिली पायरी ठरू शकतं. पण प्रत्येक आकर्षण प्रेमात बदलतं असं नाही. आकर्षण क्षणिक ओढ आहे, तर प्रेम दीर्घकाळ टिकणारा भावबंध आहे. आकर्षण डोळ्यांनी सुरू होतं, प्रेम मनापासून वाढतं. आकर्षणात चमक असते, प्रेमात उब असते.
म्हणूनच आयुष्यात नातं जपताना स्वतःला हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं ठरतं “ही भावना फक्त आकर्षण आहे की खरंच प्रेम?” कारण या प्रश्नाचं उत्तरच आपल्या नात्याची दिशा ठरवतं.

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५


2526. एकाकी

 विलासरावांच्या डोळ्यांतून अक्षरशः अश्रू सांडत होते. आता कंटाळले होते ते, या एकाकीपणाला आणि गुडघ्याच्या दुखण्याला. हे सर्व त्यांना आता असह्य होत होतं….
आपण केव्हा मरून पडू कुणाला माहिती ही होणार नाही. आपले शरीर जागेवरच सड़ते की काय ? अशी भिती त्यांना नेहमीच वाटायची. वयाची ७५ वी गाठली होती त्यांनी. त्यांना जवळचे असे कुणीच राहिले नव्हते. दोन वर्षांपूर्वीच अल्पशा आजाराने पत्नी वारली तेव्हापासून खूपच एकटे पडले होते विलासराव.
एक मुलगा होता, परंतु तो ही कार ऍक्सीडेन्ट मध्ये मरण पावला पाच वर्षापूर्वीच. मुलगी विदेशात राहते… तिला खूप काळजी वाटते बाबांची पण ती ही काही करू शकत नाही लांब असल्यामुळे. पंधरा दिवस झालेत नोकर काम सोडून गेला. खूप गयावया केल्या विलासरावांनी त्याच्या… पगार वाढवून देतो म्हणाले. परंतु घरकामा व्यतिरिक्त काहीच करणार नाही म्हणाला.
विलासरावांना गुडघे दुखीचा त्रास असल्याने संडास बाथरूमला नेणे आणणे, आयुर्वेदिक तेलाने मालिश करणे इत्यादी कामांसाठी आगाऊ पैसे देण्याचे ही कबूल केले, तरी तो नाही म्हणाला आणि काम सोडून निघून गेला. कुणीच यायला तयार होत नाहीत कामावर.
सकाळ संध्याकाळ फक्त जेवणाचा डबा घेऊन तो मुलगा येतो, बेल वाजवतो आणि डबा ठेऊन निघून जातो. त्या व्यतिरिक्त घरात कुणीच येत नाही. पंधरा पंधरा दिवस तर त्यांना माणसांचे दर्शन घडत नाही. गुडघेदुखी मुळे चालणे फिरणे, घराबाहेर पडणे बंद झाले.
मोठ्या त्रासाने वाॅकरच्या मदतीने संडास बाथरुम पर्यंत पोचतात. होणाऱ्या त्रासामुळे अक्षरशः रडतात ते, पण काय करणार, आजार आणि हा एकाकीपणा आता त्यांना असह्य होत चालला होता. प्रचंड संपत्तीचे मालक होते ते. परंतु पैसे देऊनही त्यांची सेवा करायला यायला कुणीच तयार होत नव्हते.
नोकरीत असताना वेगळीच ऐट होती, दरारा होता त्यांचा ऑफिसमध्ये. सगळे कर्मचारी लांबूनच राहत. कामाव्यतिरिक्त सहसा कुणी त्यांच्यासोबत जास्त बोलत नसे. शासकीय कार्यालयात क्लास वन ऑफिसर पदावरून निवृत्त झाले ते. छान सेंड ऑफचा कार्यक्रम झाला पण तदनंतर ऑफिस मधून कुणी त्यांना भेटायला किंवा तब्बेत विचारायला आले नाही.
नातेसंबंधात आधीपासूनच त्यांना फारसे स्वारस्य नव्हते. त्यामुळे नातेवाईक फारसे कुणी त्यांच्याकडे भटकत नसत. गावाकडे लहान भाऊ आणि त्याचा परिवार आहे. परंतु संपत्तीच्या वादावरून कोर्टात केस सुरू असल्याने त्यांनी ही संबंध तोडले. एक लहान बहीण येत होती दरवर्षी भाऊबीज, रक्षाबंधनला परंतु दहा वर्षांपासून ती सुद्धा आली नाही.
स्वभावामुळे मित्रही फारसे जुळले नाही. वयानुसार रक्तातील रग उतरत गेली विलासरावांची पण आता खूप वेळ झाली होती. पैसा बक्कळ होता त्यांच्याकडे पण आता म्हातारपणात हवी हवीशी वाटणारी प्रेमाची माणसे उरलीच नव्हती त्यांच्याजवळ, त्यांच्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे.
आता हा एकाकीपणा त्यांना असह्य वाटत होता… कुणीतरी म्हटले आहे, ‘एकांतवास ही खूप मोठी शिक्षा आहे माणसाकरिता… माणूस सर्व सहन करू शकतो परंतु खूप काळ एकांत सहन करू शकत नाही…’
म्हणूनच प्रेमाची माणसे जपा… तीच तुम्हाला तुमच्या कठीण वेळेत सहाय्य करतील…
लेखक: अज्ञात...🙏

2525. हस्तिदंती मनोऱ्यातील राजकन्या

 त्याचे जिवाभावाचे मित्रच त्याला माझ्याकडे घेऊन आले होते कारण त्याच्या आई - वडिलांनी त्याची आशा पूर्ण सोडून दिली होती. तो आपल्या वृद्धापकाळाचा आधार होईल अशी शक्यता आता त्यांना अजिबात वाटत नव्हती. त्याच्या साध्याभोळ्या आईने तर हाय खाऊन अंथरुण धरले होते. 
त्याच्या मित्रांनी सांगितलेली त्याची हकीकत मोठी विलक्षण होती. 
तो एका नामवंत व्यवस्थापनशास्त्राच्या शिक्षणसंस्थेत मॅनेजमेंटच्या फायनल इयरला शिकणारा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. ती संस्था शिक्षणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही सुप्रसिद्ध होती. अशाच एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची शहरातील एका नामवंत कोट्यधीश व्यावसायिकाच्या मुलीशी ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. दोघंही एकमेकांना आवडत होते. पण दोघांच्या आवडण्याची जातकुळी वेगळी होती. ती त्याला जीवनसाथी म्हणून हवी होती पण तो तिला फक्त एक उमदा मित्र म्हणून प्रिय होता. तिच्या मनमोकळ्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावून त्याने तिला एक दिवस प्रपोज केलं. अर्थातच त्या गर्भश्रीमंत तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला.
तिच्या नकारानंतर त्याचं भावविश्व उध्वस्त झालं. त्याने अभ्यास करणं , काॅलेजला जाणं सोडून दिलं. तो दिवसभर निराश अवस्थेत इकडंतिकडं भटकत राहायचा. रात्री  - अपरात्री त्याला वाटेल तेव्हा घरी परत यायचा. वाटलं तर जेवायचा नाही तर उपाशीपोटी भटकत राहायचा. हे सगळं पाहून त्याच्या आई - वडिलांच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं.एकुलता एक हुशार मुलगा आपल्या डोळ्यांदेखत हाताबाहेर जात असलेला पाहून ते अक्षरशः हतबल झाले होते. अशा स्थितीत त्याचे जिवलग मित्र त्याला आता माझ्याकडे घेऊन आले होते. 
मी त्याची जन्मपत्रिका बघितली. अजून दहा - बारा वर्षे राहू महादशेचा काळ होता. पंचम स्थान सध्या पापग्रहांची दृष्टी असल्याने कमकुवत बनलं होतं. अशा ग्रहस्थितीत अजून काही वर्षे तरी त्याचं प्रेम यशस्वी व्हायची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती. पण याक्षणी त्याला हे सगळं सांगून काहीच उपयोग होणार नव्हता. त्यामुळे मी त्याला खूप वेगळ्या पद्धतीने समजावण्याचं ठरवलं.
मी त्याला म्हणालो , " ती तुझ्याशी लग्न करायला तयार होईल असा उपाय मी तुला देऊ शकतो. पण त्याआधी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. 
मला सांग की लग्नानंतर तू तिला कुठं ठेवणार आहेस  ?? "
तो आश्चर्याने माझ्याकडे बघत म्हणाला , " माझ्या घरीच ठेवणार ना. माझ्या वडिलांचा टू बीएचके फ्लॅट आहे. "
मी म्हणालो , " तुझ्या अख्ख्या घराएवढी तिची बेडरुम आहे. तुझ्या घरात महिन्याला जेवढे पैसे येतात तेवढा तिचा पाॅकेटमनी आहे. लग्नानंतर तुझ्या गळ्यात हात टाकून तिने लाडिकपणे तुला एखादा ड्रेस मागितला तर ती वापरत असलेले हजारो रुपयांचे डिझायनर ड्रेस तू विकत घेऊन तिला देऊ शकणार नाहीस. त्यामुळे ती दुःखी होईल. अशाप्रकारे ती दुःखी झालेली तुला चालेल का  ?? "
माझे अनपेक्षित बोलणे ऐकून त्याला प्रचंड धक्का बसला होता.
मी पुढे बोलायला सुरुवात केली , " ती दुःखी झालेली जसं तुला आवडणार नाही तसंच तिच्या माहेरच्या लोकांनाही आवडणार नाही. मग तिची आई दर महिन्याला आलिशान घेऊन तुझ्या घरी येईल. तिच्या लाडक्या लेकीसाठी ती अत्यंत महागड्या वस्तू घेऊन येईल. तू जावई असल्यामुळे तिची आई तुला थेट काहीच बोलणार नाही. फक्त जाताना तुझ्याकडे एक नजर टाकेल. त्या नजरेत तुला एक प्रश्न दिसेल की तुझी ऐपत नसताना तू माझ्या मुलीशी का लग्न केलंस  ??
तिच्या नजरेत दिसणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे आहे का  ?? "
त्याने नकारार्थी मान हलवली. आता तो खाली मान घालून बसला होता. तो कुठेतरी आतून हलला होता.
मग मी त्याला शेवटचा धक्का दिला , " ती हस्तिदंती मनोऱ्यात राहणारी राजकन्या आहे हे तू समजून घे. तिच्याशी लग्न करायचं असेल तर आधी तुला हस्तिदंती मनोरा बांधावा लागेल. त्यासाठी खूप पैसे कमवावे लागतील. तू हुशार आहेस आणि तुझ्याकडे टॅलेंट आहे. त्यामुळे तू हे नक्कीच करु शकतोस. फक्त हे आव्हान स्वीकारण्यासाठी तुला मनाची तयारी करावी लागेल. "
महाभारत युद्धाआधी अर्जुन हतबल होऊन बसला भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीता सांगितली होती. माझ्यासमोर प्रेमाच्या रणांगणात हातपाय गाळून बसलेल्या या एकविसाव्या शतकातील अर्जुनाला मी कर्माचे महत्व समजावले होते.
त्यानंतर मला अपेक्षित होते तेच घडले. तो अक्षरशः पेटून उठला. त्याच्या स्वाभिमानाला डिवचल्याने तो आवेशाने उठून उभा राहिला. त्याच्या पुरुषार्थालाच आव्हान मिळाल्याने त्याचे बाहू स्फुरण पावू लागले. क्षणार्धात तो ताडताड पावले टाकत निघून गेला.
त्याचे जिवलग मित्र तो गेलेल्या दिशेकडे आ वासून बघत राहिले. भानावर येत त्यांच्यापैकी एकाने माझी पत्रिका पाहण्याची फी दिली आणि ते सगळे निघून गेले.
या घटनेला जवळपास पंधरा वर्षे लोटली. रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो. 
एक दिवस मी रस्त्याने जात असताना एक आलिशान मर्सिडीझ कार अगदी माझ्या जवळ येऊन थांबली. मी वळून पाहिले तर कारचा दरवाजा उघडून एक व्यक्ती उतरुन माझ्याकडेच येत होती. माझा स्वतःच्या डोळयांवर विश्वास बसत नव्हता. तो तोच होता. पण याक्षणी मात्र थ्री पीस सूटमध्ये फारच रुबाबदार दिसत होता. 
त्याने विचारले , " ओळखलंत का मला  ?? "
मी प्रत्युत्तरादाखल मान डोलावली. 
तो पुढे म्हणाला , " तुमच्या भेटीनंतर माझ्या अंगात जणू वीजच संचारली होती. मी मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करुन काही वर्षे भारतात नोकरी करुन थेट अमेरिकेची वाट धरली. तिथं काही वर्षे नोकरी करुन स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर काही वर्षातच तुम्ही दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी आलिशान हस्तिदंती मनोरा बांधला. "
मी हसून गमतीने विचारले , " मग आता तुला मी राजकन्येला वश करण्यासाठी उपाय देऊ का  ?? "
यावर त्याने फार मार्मिक उत्तर दिले. 
तो म्हणाला , " हस्तिदंती मनोरा बांधल्यावर राजकन्येला वश करण्याची गरज नसते. ती आपोआप स्वतःहून येत असते. अशीच एक राजकन्या स्वतःहून आली आणि तिच्याशी लग्न करुन मी आता माझ्या मुलांसह खूप सुखात आहे. "
हे ऐकून मला खूप आनंद झाला. 
त्याने स्वतःच्या हिंमतीवर राजकन्येला जिंकले होते याचे मला फार समाधान वाटले.
मग त्याच्याशी थोडावेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो. 

-  जितेंद्र अभ्यंकर
    8605396156

2524. योग जुळून यावा लागतो

     बाबा मॅरेज ब्युरोत तुम्ही माझं नाव नोंदवलं त्याला आता पांच वर्ष झालीत. अजून ना मी कोणाला पसंत पडली ना मला कोणी अजून हवं तसं मिळालं. अजूनही मला बघायला मुलं तर येत आहेत ना मग तुम्ही का एवढं टेन्शन घेता? योग जुळून येईल तेव्हा जमेल, असेल नशिबात लग्न तर होईल नाहीतर नाही. मला काही फरक पडणार नाही, नाही झालं तरी, पण बघायला येणाऱ्या मुलांना मी जे पाच प्रश्न विचारते. त्यांची मला अपेक्षित असलेली उत्तरं यायलाच हवीत, जो पर्यंत ते येणार नाहीत तो पर्यंत मी त्यांना नवरा म्हणून निवडणार नाही हे मी आधीही सांगितलं होतं तुम्हाला, आत्ताही सांगते आहे. तरी तुम्ही सांगत असता आजचा पस्तीसाव्वा झाला, चाळीसाव्वा झाला , तुम्ही मोजत बसू नका, मला पटेल त्याच्याशीच मी लग्न करीन नाहीतर अशीच राहीन लग्न न करता एकटी..! " 
"अगं बेटा तसं नाही, वाईट वाटून घेऊ नकोस पण तू ही थोडा विचार कर ना. तू गोरी, उंचपुरी, देखणी सुंदर असतीस तर एकवेळ एवढ्या अपेक्षा ठेवायला हरकत नव्हती पण तू देखणी नाहीस हे तुलाही माहितीये. गोरी नाहीस. तुझी हाईटही कमी आहे इनमिन पांच फूट. असं असतांना इतक्या अपेक्षा ठेवणं बरोबर नाही असं एक मला वाटतं. काहींनी तुला पाहूनच रिजेक्ट केलं आणि ज्यांनी पसंत केलं ल्यांना तू ही प्रश्न विचारून रिजेक्ट केलस..! आता वयाच्या पस्तीशीत आहेस तू , वय वाढेल तसे पुढे प्रॉब्लेम्स ही येतात लग्नानंतर..! " 
"म्हणजे तुम्ही म्हणताय की देखण्या नसणाऱ्या मुलींनी कुठल्याच अपेक्षा ठेवायला नकोत. मुलाकडून पसंती आली आणि तो ठिकठाक असला की लगेच हो म्हणून टाकावं असंच ना ..? माझ्या सारखीला माझा चॉईसच नसावा , बरा असेल तरी खूप झालं, हो म्हणून टाकावं हेच सुचवायचं आहे ना तुम्हाला..? अन् लग्नानंतर तशा मुलींना जर नवऱ्याच्या खटकणाऱ्या म्हणा किंवा न आवडणाऱ्या गोष्टी दिसू लागल्या अन् त्याचा स्वभावही आवडला नाही तर तिने काय करायचं, कोणाला सांगायचं ..? एकटीनेच सहन करत रहायचं चुपचाप , त्याबद्दल कोणाला  बोलायचं ही नाही , हो ना..? " 
" थोडं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं भैरवी अशा गोष्टीं मधे , त्यात काही कमी पणा नाही सगळं आपल्याला हवं तसंच मिळेल असं फार क्वचित होतं..! " 
"नाही बाबा सॉरी, पण माझ्या प्रश्नांवर मी कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही .त्यावर त्यांची मला हवी असलेली योग्य उत्तरं आलेली दिसली तरच मी लग्नाचा विचार करीन नाहीतर नाही, एकटी राहीन मी. त्यात काय एवढं, मुलगी तिशीत येई पर्यंत तिचं लग्न झालंच पाहिजे नाहीतर समाजात बरं दिसणार नाही वगैरे अशा गोष्टीशी मला काही देणं घेणं नाही. अशा फालतू दडपणा खाली मी माझ्या आयुष्याचा ताबा कोणाच्याही हाती सोपवून माझं आयुष्य नेहमी साठी मला नको होतं तसं होऊ देणार नाही, ते मला हवं तसंच घडवायचं आहे बाबा मला..! "
***
भैरवी एक अतिशय हुशार आणि गुणी मुलगी होती. ती तिच्याच एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीची सी.इ.ओ. होती. वर्षाला चार करोड रुपये तिच्या बँक खात्यात जमा व्हायचे पण तिला तिच्या श्रीमंतीचा अजिबात अहंकार नव्हता. अगदी साधी रहाणी होती तिची. ती जी आहे ते तिच्याकडे बघून कोणाला वाटणार नाही. ती दाखवायचीही नाही तिचं मोठेपण..!
 कंपनीच्या कामा निमित्त किंवा काही ग्लोबल कॉन्फरन्सेस मुळे अधेमधे तिला आउट ऑफ इंडिया जावं लागायचं..!
एकदा असंच न्यूयॉर्कला जातांना फ्लाईट मधे तिच्या बाजूच्याच सीट वर जाड फ्रेमचा चष्मा घातलेला उंच म्हणता येणार नाही पण थोडा लठ्ठ असा काळा सावळा पण स्मार्ट, एक साधारण चाळीशीत असलेला एकजण येऊन बसला, प्लेन ने गेट सोडलं होतं पण सिग्नल नसल्याने थोडं पुढे येऊन थांबलं होतं..!
भैरवीच्या सीट समोरचा टीव्ही लागत नव्हता, टीव्ही , रिमोटशी तिनी बरीच खटपट करून पाहिली पण काही लागेना, बाजूला बसलेला तो सगळं बघत होता...
" मॅडम मी ट्राय करून पाहू का..? "
भैरवी ने हो नाही म्हणायच्या आत त्याने तिच्या जवळ असलेलं रिमोट घेऊन ते कुठलीतरी वायर जोडून दुरुस्त करून दिलं ...
" मी चिन्मय जोशी, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे, माझी स्वतः ची कंपनी आहे हिंजवडीत..! "
थोडा गपिष्ट असावा असं वाटलं..!
पिक्चर दिसायला लागलं पण कलर्ड न दिसता ब्लॅक अँड व्हाईट दिसत होतं. त्यातही ब्लॅक जास्त असल्याने हिरो हिरोईन सावळेच दिसत होते म्हणून तिने नकळत त्याच्याकडे बघितलं.
"तुम्हाला सावळे लोक आवडत नाहीत का ..? "
तिच्याकडेच बघत म्हणाला ...
"बघा ना खरं सौंदर्य सावळ्या लोकांमधेच खुलून दिसतं नाही का मॅडम ..? " 
मंद स्मितहास्य देऊन त्याने तिच्यावरून नजर हटवली ..! 
भैरवी ला अंगावर शहारे आल्याचं जाणवलं , तिने थोडं लाजत ..
"नाही नाही तसं काही नाही अन् दिसण्यात काय असतं. माणसाचं कर्तृत्व त्याला घडवत असतं, मोठं करतं, चेहरा पट्टी नाही ..! "
"अगदी मनातलं बोलतात मॅडम , मी ही त्याच मताचा आहे , बाय द वे न्यूयॉर्क मधे कुठे असता मॅडम..? "
" मी पुण्याची आहे. न्यूयॉर्कला माझ्या कंपनी च्या कामानिमित्त जात आहे..! " 
" हो का , अरे वा..! छान , मीही पुण्याचा. मलाही माझ्या कंपनीच्या कामासाठी न्यूयॉर्कला जावं लागतं दर दोन चार महिन्यांनी, मोठी कंपनी आहे माझी. डॉलर्स ने बिलिंग होतं त्यामुळे पैसा मुबलक येतो. सध्या एकटा असल्यामुळे सगळं जमतं. घरी आई आणि माझ्याहून लहान भाऊ असतो पण तो पॅराप्लेजिक आहे. आपल्या मनानी त्याला धड उठून बसताही येत नाही. दिवसभर बेड वर पडून असतो. त्याच्यासाठी म्हणून मी लग्नही नाही केलं अजून. मी नसलो की आईच बघते त्याला पण ती ही आता थकली आहे. चाललंय झालं आपलं कसतरी...! "
" ओह माय गॉड ..! "
" का..? काय झालं..? " 
" नाही काही नाही पण सहज वाटून गेलं आपल्या बऱ्याच गोष्टीत बरंच साम्य आहे. मीही जोशी, भैरवी जोशी , माझीही स्वतः ची कंपनी आहे. माझ्याहून लहान असलेला माझा लहान भाऊ पण अनफॉरच्यूनेटली पॅराप्लेजिक आहे. मी नसतांना वडील बघतात त्याचं सगळं..! मला पण त्याच्यासाठी लग्न करावसं वाटत नाही. वडील आहेत तोवर ठीक आहे. नंतर कसं काय करायचं हा प्रश्नच आहे..! " 
मधे जवळपास एक तास असाच गेला की जेव्हा दोघेही शांत होते ..! 
" मॅडम, तुम्हाला राग येणार नसेल , तुमची हरकत नसेल तर एक गोष्ट विचारू? तुम्हाला नाही आवडलं तर स्पष्ट सांगा, मी वाईट वाटून घेणार नाही .! "
भैरवीला तो नेमकं काय विचारणार आहे ह्याची कल्पना आली होती. त्या कल्पनेनेच पुन्हा एकदा तिला शहारून आलं ..!
"मॅडम तुम्हाला बघताक्षणीच मला तुम्ही आवडल्या होत्या. आपल्या बऱ्याच गोष्टीत साम्य ही बरंच आहे. आपले प्रॉब्लेम्स ही सारखेच आहेत. आपण दोघे मिळून एकमेकांच्या मदतीनेते व्यवस्थित हॅण्डल करु शकू असा मला विश्वास आहे फक्त त्यासाठी तुम्ही तयार आहात का हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे मला ..! "
भैरवीला तिच्या मनात असलेल्या पाचही प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून न विचारताच मिळून गेली असल्याने ती मनोमनी खुश होती ..! लाजून त्याच्याकडे न बघताच ती थरथरत्या आवाजात हळूच बोलली ..
"हो मी तयार आहे ..! "
तिने बाबांना फोन करून सांगितले.
" बाबा , मला हवा होता तसा जोडीदार मिळालाय, फ्लाईट मधे आहोत , आल्यावर सविस्तर बोलू ..! " 
दोघांनीही एकमेकांकडे बघत हात मिळवले अन तेवढ्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. दोघेही आश्चर्याने बघू लागले. एअर होस्टेस चा बर्थडे होता..!
तिकडे प्लेनचा ही मार्ग मोकळा झाला होता. हवा असलेला सिग्नल त्यालाही मिळाला आणि रनवे वर तुफान वेग घेत उंच आकाशात त्याने झेप घेतली..!

 संजय जहागिरदार .     ✍️

2523. गोल्डन स्त्रिया

 या दोन सख्ख्या बहिणी आहेत. दोघीही ॲम्बुलन्स चालवतात... मृतदेह उचलतात, रात्री-अपरात्री अपघात झालेल्या रुग्णांना तातडीने दवाखान्यापर्यंत पोहचवतात! पिंपरी चिंचवड, पुणे-मुंबई हायवे परिसरात दिवसा-रात्री सायरन वाजवत कोणी स्त्री जर ॲम्बुलन्स चालवताना तुम्हाला दिसली असेल तरी ती या दोघींपैकी एक असेल !
कोविड नंतर काही कारणांनी यांचं कौटुंबिक आयुष्य बदललं आणि या दोघी बहिणींनी ॲम्बुलन्स चालवण्याचा निर्णय घेतला. स्त्रीनं ॲम्बुलन्स चालवणं ही साधी गोष्ट नाही, त्यांच्या डोक्यात अशी संकल्पना येणं खरंतर हीच मोठी क्रांतिकारी घटना आहे. हे काम करणं खरंतर पुरुषांची मक्तेदारी... आणि का असू नये? वेळी-अवेळी कधीही इमर्जन्सी येते, रुग्ण गंभीर असतात, रस्त्यावर कोण कसं असेल माहीत नाही, गुन्हेगार असतात, मदतीला कोणी आहे, नाही. हायवेवरील अपघात असेल, एखाद्या झोपडपट्टीच्या गल्लीतील इमर्जन्सी रुग्ण असेल किंवा कुठून एखादा फाशी घेतलेला मृतदेह घेऊन येणं असेल... कोणत्याही परिस्थितीत काम करावं लागतं. एका स्त्रीनं हे काम करणं किती अवघड असेल याची कल्पना करून बघा... इथं दोघी आहेत!
कुठूनतरी अचानक फोन येतो, ठिकाण सांगितलं जातं, ताबडतोब ॲम्बुलन्स काढली जाते आणि त्या ठिकाणी जाऊन रुग्णाला उचलून गाडीत टाकलं जातं. मदतीला कोणी व्यक्ती , पोलिस असेल तर ठीक, नाहीतर स्वतःच ते काम करायचं. गरज पडली तर ऑक्सिजन लावायचा, सीपीआर सुद्धा द्यायचा. अपघात झाल्यानंतर दवाखान्यात पोहचेपर्यंतचा जो 'गोल्डन पिरेड' असतो तो रुग्णाच्या जीवासाठी फार महत्त्वाचा असतो. या दोघी देवदूत बनून ते काम करतात. आजवर यांनी शेकडो रुग्ण मरणाच्या दारातून दवाखान्यापर्यंत पोचवलेले आहेत, लोक वाचवलेले आहेत.
माझ्या बाजूला ज्या ताई उभ्या आहेत त्यांचा एक अनुभव अगदी कमी शब्दात इथे देतोय. काही दिवसांपूर्वी मध्यरात्री एका ठिकाणी काहीतरी घडले आहे म्हणून त्यांना एक फोन आला आणि त्या ताई एकट्या तिथे पोहोचल्या. एका सुमसान ब्रिजखाली एक माणूस पडलेला होता, त्याचं अख्खं शरीर रक्तानं भरलं होतं. जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की त्या माणसाने काचेची बॉटल स्वतःच्याच गळ्यामध्ये खूपसुन घेतली होती, तो अजूनही स्वतःला हानी पोहोचवत होता. अशावेळी एकटी स्त्री, समोर अशी गंभीर परिस्थिती... खरंतर त्यांनी तो कॉल घेतला नसता तरी चाललं असतं, यात त्यांचा काही आर्थिक फायदाही नव्हता पण त्याचा जीव गेला असता. त्या अवस्थेत यांनी त्याला एकटीनं उचलून ॲम्बुलन्समध्ये टाकलं. तो एक मनोरुग्ण होता हे गाडी सुरू केल्यानंतर त्यांना समजलं. तो रक्ताने माखलेला माणूस मागच्या सीटवर बसून मोठ्याने ओरडत होता... खरंतर आता यांच्याच जीवाला धोका होता! तरीही त्यांनी त्या माणसाला बाहेर न काढता अवघ्या काही मिनिटांत आमच्यासमोर आणलं... त्या माणसाला त्यांनी कसं आणलं हे त्यांनाच माहीत पण तो 'माणूस वाचवला'!
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे रेल्वे कटिंग! त्यांची ॲम्बुलन्स अपघात विभागासमोर लागली आणि त्या घाई गडबड न‌ करता चालत येताना दिसल्या की माझा पहिला प्रश्न असतो... रेल्वे कटिंग आणलंय का? आणि त्या 'हो' म्हणून मान हलवतात.  बरेच लोक स्वतः रेल्वेमधून पडलेले असतात, काहींचा अपघात असतो, काहींना ढकलून दिलेलं असतं. अक्षरशः शरीराच्या चिंधड्या झालेल्या असतात! घटनास्थळावर जायचं, ज्या रेल्वे स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे तिथलं कोणीतरी मदतीला घ्यायचं, नसेल तर स्वतःच ते सगळे विखुरलेले भाग गोळा करून कपड्यात गुंडाळायचे आणि घेऊन यायचं. आपण कल्पनाही करू शकत नाही की प्रत्यक्षात तो कसा अनुभव असेल!
आयुष्यात काहीतरी परिस्थिती आली आणि त्यांनी हा मार्ग निवडला. या सगळ्या गोष्टीत त्यांच्या आर्थिक गोष्टीही असतील. कुटुंब सांभाळत हे काम करणं फार मोठी गोष्ट आहे. चित्रपटात आपण डॅशिंग काम करणाऱ्या नायिका बघतो... वास्तव जीवनातील या दोघी खऱ्या नायिका आहेत ज्यांनी आजवर असंख्य स्त्री-पुरुषांना वाचवलं, मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं. 
खूप अनुभव आहेत सगळंच नाही लिहिता येणार. खऱ्या आयुष्यातील या योद्ध्या आहेत... आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना असंही कोणीतरी बाहेरच्या जगात आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यांची कुठेतरी नोंद व्हावी म्हणून हा लिखाणाचा प्रयत्न. त्यांना म्हटलं तुमच्यावर एक लेख लिहायचा आहे, परवानगी द्या... आणि त्यानंतर हा सुंदर फोटो काढला. 
गरजूंना 'गोल्डन पिरेडमध्ये' वाचवणाऱ्या अशा 'गोल्डन स्त्रियांना' अभिवादन 🙏🏼

डॉ. प्रकाश कोयाडे



2522. भिक्षा

      आज ही त्याला आठवतोय तो दिवस. अगदी लख्खपणे. गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या गेटपाशी झोळी घेऊन उभा राहिलेला तो. भिक्षा घेण्यासाठी झोळी पसरवलेला तो. आतुरतेने साठे काकूंची वाट पहात होता. काकूही त्याची वाट पहायच्या. त्याचं गोजिरवाणे रुप अगदी मनाला स्पर्शून जायचं. खुप कमी वयात पोरका झालेला श्रीधर पाचवी कक्षेत शिकत होता. गावातील एका मराठी शाळेत शिकताना मास्तरचा खरपूस मार खाणंही त्याला गोड वाटे. घरी रागावणारं आपलं असं कोणी नव्हतं. कोकणातील एका छोट्या गावात त्याचं घर होतं. डोक्यावर घरं होतं. पण स्वयंपाक रांधायला कुणी नव्हतं. घरातील  साफसफाई करायचा. ज्याला मदत लागेल तशी कामंही करुन द्यायचा. जिथे कमी तिथे श्रीधर. गावातील माणसंही प्रेमळ होती. पण कुणी जास्त श्रीमंत तर कोणी खुप गरीब. 
      साठे काकू म्हणजे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या सुविद्य पत्नी होत्या. भिक्षा मागून जगणाऱ्या श्रीधरबद्दल अपार माया दाटून येई त्यांच्या मनात. घरात आर्थिक सुबत्ता होती. मुलंही शहरातील चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती.कशाचीच कमी नव्हती. माहेरुन गरीबी होती. तरीही त्या काळात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. पण पुरुषी अहंकारापुढे स्त्रियांना नतमस्तक व्हावे लागे. काय कमी आहे आपल्याला ? सगळं काही तर आहे. असे म्हणून घरातील चार भिंतींमध्ये कोंडले गेलेले जीवन होते साठे काकूंचे. घरातील कामे आवरली की पुस्तके, वर्तमानपत्र वाचण्यात वेळ घालवायच्या. पण पुढे शिकण्याची मनातील सुप्त इच्छा कधी कधी उफाळून यायची. एक दिवस श्रीधर दारात आला. भिक्षां देही म्हणत. घरातील भाजी पोळी देण्यासाठी दरवाजा उघडला. मग विचारपूस केल्यावर समजलं की त्यालाही शिकण्याची प्रचंड आवड आहे. खूप छान वाटले त्यांना. पण तरीही त्यांनी दटावले. हे बघ बाळा तुला जर मोठा साहेब व्हायचे असेल तर  कष्ट करावे लागतील.
         आजपासून तुला मी भिक्षेऐवजी एक पुस्तक वाचायला देईल. तुझी पोटाची भुक भागेल पण बुद्धीच्या भुकेचे काय ? दर वेळी काकूंकडून नवीन नवीन पुस्तके मिळायला लागली. कधी शाळेची फी तर कधी वह्या-पुस्तके तर कधी गणवेषही, श्रीधर अनाथ असला तरी मेहनती होता. अभ्यासात हुशार होता. पण पोटात काही नसले की काही सुचायचे नाही त्याला. सहावी सातवीपर्यंत भिक्षा मागून त्याचे पोट भरे. तो गावातील सर्व काकूंचा खरंच ऋणी होता. पण साठे काकूंकडून मिळालेली पुस्तकरुपी भिक्षा त्याला आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. दहावीला श्रीधर तालुक्यातून पहिला आला. आनंद कुणाला सांगावा असं त्याचं आपलं कोण होते त्याला. साठे काकूंना बाहेरुनच आवाज दिला. काकू, आज मला भिक्षा नको. फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. काकूंनी आतून आवाज दिला. श्रीधर बाळ, क्षीण आवाज आला आतून. श्रीधर आत गेल्यावर त्यानं काकूंना तापाने फणफणलेले पाहिले. पटकन मीठ-पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेऊ लागला. एक तासानं काकूंना बरंचसं हायसं वाटू लागले. आता त्याला स्वयंपाकही छान जमायला लागला होता. काकूंना त्यानं कणकेची पेज बनवून खाऊ घातली. तेवढ्यात साठे काका आले. अतिशय अहंकारी माणूस. श्रीधरसारखा गरीब मुलगा तोही घरात बघून संतापले. श्रीमंत गरीबीमधली दरी कधी मिटणार होती ? असो.
     श्रीधरचं पुढील शिक्षण स्कॉलरशिपवर पुर्ण झालं. म्हणतात नं लोहाचे सोने व्हायला एखाद्या परीसस्पर्शाची गरज असते. तसेच काही तरी काम साठे काकूंनी केलेले होते. श्रीधरनं महाविद्यालयात शिकताना एका दुकानात नोकरी धरली. कमवा व शिका ह्या प्रेरणेतून तो द्विपदवीधर झाला. तिथेही चांगला गुणांनी पास झाला. एम.पी.एस.सी.पास झाला. लवकरच जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून रुजू झाला. सुखाचे दिवस आले. पण गावातील ते जुने दिवस तो कधीच विसरू शकत नव्हता. ज्या वळणावर तो येऊन ठेपला होता ते वळण अतिशय सुंदर होते. अनेक हालअपेष्टा,कष्ट. वेळी खाण्यास काहीच न मिळाल्याने पाणी पिऊन झोपणे सर्व काही त्याच्या डोळ्यात पाणी आणि. साठे काकूंची ती भिक्षा खुप महत्वाची ठरली त्याला आत्मनिर्भर होण्यासाठी. आज त्याची पावलं गावाकडे वळली. गावातलं घर तसंच होते उभे त्याची वाट पहात. घरातील धूळ झटकली. घर डोळे भरुन पाहून घेतले. गावात फेरफटका मारताना साठे काकूंना आवर्जून भेटला. आयुष्याच्या महासागरातील दिपस्तंभ होत्या त्या. काळ पुढे सरकला होता. पण त्या तिथेच होत्या स्थितप्रज्ञं. साठे काकांना जाऊन दोन वर्षे लोटली होती. एकट्याच होत्या. दोन्ही मुलं अधुनमधून यायची. पण बाकी अशा एकट्याच रहायच्या तिथे त्या. 
     श्रीधरनं वाड्याच्या दरवाजाची कडी वाजवली. तशी पाच मिनिटांत दरवाजा उघडला. काकूंनी प्रथम ओळखलंच नाही. उंच,रुबाबदार, सुटबुटातला साहेब माणूस. काकूंसमोर नतमस्तक झाला. श्रीधर काकूंच्या पदस्पर्शाने कृतकृत्य झाला. त्यांचे थकलेले हात डोक्यावरुन फिरले आणि श्रीधरच्या डोळ्यातील अश्रुंना वाट मिळाली. काकू आज मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जायला आलोय. तुम्ही नाही म्हणणार नाहीत. ही आशा वाटते. 
नाही रे बाळा मी ह्या वाड्यातच ठिक आहे. आमची स्वप्नपुर्ती इथेच तर झाली. सवयीचं आहे हे घर. पण आता मला तुमच्या मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे. तुम्ही केलेल्या भिक्षारुपी मदतीची परतफेड करायची आहे. 
खुप आग्रहानंतर साठे काकू शहराकडे निघाल्या. तिथे शहरातही त्या आजुबाजुच्या झोपडपट्टीतील मुलांना असंच मार्गदर्शन करणार आहेत. असं वाक्यं श्रीधरनं म्हणताच काकूंना कोण आनंद झाला माहिती आहे. त्यांची पावलं आपोआप शहराकडे वळाली.

प्रांजली .....

2521. नाती जपण्यासाठी

 "आज जर त्या बाईचा निकाल लावला नाही तर नावाची 'सरिता' नाही मी! माझ्या लग्नाला दहा वर्षं झाली, कपाळाचं कुंकू जपलं, पण आज माझ्याच घरातून, माझ्याच तिजोरीतून माझ्या सासूबाईंची सोन्याची पाटली गायब झालीया... आणि ती कुणाकडे गेली हे मला चांगलंच माहितीये! त्या नदीकाठच्या 'मंजुळा'साठी माझं सोनं विकणाऱ्या माझ्या नवऱ्याला आज जाब विचारल्याशिवाय ऱ्हायची नाही मी."
सरिताने रागाने डोळे पुसले आणि अंधारात कंदील घेऊन ती घराबाहेर पडली.
कोल्हापूर जवळचं एक सधन गाव. गावात सरपंचांचा मुलगा म्हणून 'प्रतापराव' यांची मोठी इज्जत होती. घरात सरितासारखी लाखमोलाची बायको आणि दोन मुलं. पण गेल्या सहा महिन्यांपासून प्रतापरावांचे वागणे बदलले होते. ते कोणालाही न सांगता अधूनमधून गायब व्हायचे. घरातून कधी पैसे, तर कधी धान्य कमी व्हायचं.
सरिताला संशय होताच, पण आज तर हद्द झाली होती. कपाटातून सासूबाईंची आठवण असलेली सोन्याची पाटली गायब होती. सरिताला पक्की खबर मिळाली होती की, नदीच्या पलीकडे झोपडीत राहणाऱ्या 'मंजुळा' नावाच्या एका परक्या बाईला प्रतापराव भेटायला जातात. लोकांच्या तोंडी चर्चा होती की, ती बाई खूप गरीब आहे आणि प्रतापराव तिच्यावर पैसे उधळत आहेत.
आज राखी पौर्णिमा होती. अख्खं गाव सण साजरा करत होतं, पण प्रतापराव घरात नव्हते. सरिताला समजलं की ते नदीकाठी गेले आहेत. रागाच्या भरात ती नदीकाठच्या त्या पडक्या झोपडीजवळ पोहोचली.
तिथे जे दृश्य दिसलं, ते बघून सरिताच्या अंगाचा तिळपापड झाला.
प्रतापराव त्या बाईच्या (मंजुळाच्या) समोर बसले होते आणि स्वतःच्या हाताने ती सोन्याची पाटली तिच्या हातात देत होते. ती बाई रडत होती आणि प्रतापरावांचे हात हातात घेऊन काहीतरी बोलत होती. सरिताला वाटलं, हेच ते पाप! तिने रागाने दरवाजा लोटला आणि आत घुसली.
"वाह रे कारभारी! घरी बायको पोरांना सोडून या परक्या बाईचे लाड पुरवतायसा? आणि ते ही माझ्या सासूच्या दागिन्यांनी?"
सरिता वाघिणीसारखी ओरडली. ती मंजुळाच्या अंगावर धावून गेली. "ए मे*ली, तुला लाज वाटली नाही का ग? दुसऱ्याचा संसार मोडताना? आज तुझा जीवच घेते बघ."
मंजुळा घाबरून कोपऱ्यात सरकली. प्रतापराव ताडकन उठले आणि त्यांनी सरिताचा हात पकडला.
"सरिता ! खबरदार तिला बोट लावलस तर ! ती परकी नाही... ती माझी सख्खी बहीण आहे!"
प्रतापरावांच्या या वाक्याने सरिता जागीच थिजली.
"काय? बहीण? पण तुमच्या घरात तर कुणीच बहीण नाही, असं तुम्ही सांगितलं होतं."
प्रतापरावांचे डोळे भरून आले. ते बोलू लागले,
"सरिता, ही मंजुळा. माझी धाकटी बहीण. पंधरा वर्षांपूर्वी तिने एका दुसऱ्या जातीच्या मुलाशी प्रकाशशी प्रेमविवाह केला होता. आपल्या बाबांचा (सरपंचांचा) जातीचा अभिमान आडवा आला. त्यांनी मंजुळाला घरातून हाकलून दिलं आणि सांगितलं की, 'आजपासून आमची मुलगी मे*ली'. त्यांनी जिवंतपणी तिचं श्राद्ध घातलं आणि मला शपथ घातली की मी कधीच हिचं तोंड बघणार नाही."
प्रतापराव पुढे म्हणाले, "मी बाबांच्या शब्दापुढे लाचार होतो. पण सहा महिन्यांपूर्वी प्रकाशचा (मंजुळाच्या नवऱ्याचा) कॅ*न्स*रने मृ*त्यू झाला. ही पोरगी रस्त्यावर आली. लहान लेकराला घेऊन ती नदीकाठी या झोपडीत राहू लागली. मला जेव्हा कळलं, तेव्हा भावाचं काळीज राहवलं नाही ग."
मंजुळाने रडत सरिताचे पाय धरले. "वहिनी, दादाचा काहीच दोष नाही. मीच त्याला सांगितलं होतं की कुणाला काही सांगू नकोस, नाहीतर बाबा तुम्हाला पण घराबाहेर काढतील. प्रकाशच्या इलाजात सगळं गेलं ओ... आज माझ्या लेकराला ताप आलाय, दवाखान्याला पैसे नव्हते म्हणून दादाने..." तिने ती सोन्याची पाटली सरिताच्या पायावर ठेवली. "हे घ्या तुमचं सोनं. मला नको. फक्त माझ्या दादाला दोष देऊ नका. आज राखी पौर्णिमा होती, म्हणून दादा आला होता."
सरिताच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्याला ती अनैतिक संबंध समजत होती, ते तर र*क्ताच्या नात्याची आर्त हाक होती. एका भावाने बापाच्या भीतीने लपवून ठेवलेलं हे पवित्र नातं होतं. तिला स्वतःच्या संकुचित विचारांची लाज वाटली.
पण खरी कथा इथेच संपत नाही. सरिताचा चेहरा बदलला. ती रडली नाही, तर तिचे डोळे एका वेगळ्याच निश्चयाने चमकू लागले. सरिताने खाली वाकून ती सोन्याची पाटली उचलली. प्रतापरावांना वाटलं ती आता पाटली घेऊन घरी जाईल. पण सरिताने ती पाटली पुन्हा मंजुळाच्या हातात दिली. आणि वरून स्वतःच्या गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र काढून मंजुळाच्या हातात ठेवलं.
"सरिता, हे काय करतेस?" प्रतापराव ओरडले.
सरिता करारी आवाजात म्हणाली,
"हे मंगळसूत्र माझ्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी आहे. आणि माझ्या नवऱ्याचं आयुष्य, त्याचा जीव त्याच्या बहिणीत अडकलाय. जर बहीण उपाशी असेल, तर भावाच्या सुखाला काय अर्थ?"
सरिता मंजुळाचा हात पकडून तिला उठवत म्हणाली, "चल मंजू."
प्रतापराव घाबरले, "अगं पण कुठे? बाबांना कळलं तर..."
सरिताने पदर खोचला आणि म्हणाली,
"कारभारी, बाबांना कळू द्या ! आजवर तुम्ही 'मुलगा' म्हणून कर्तव्य निभावलंत, आता मी 'सून' म्हणून निभावणार. ज्या घरात लेकीला जागा नाही, त्या घरात या सरिताला तरी काय मान मिळणार? आज राखी पौर्णिमा आहे. आज या बहिणीची ओवाळणी इथे या झोपडीत नाही, तर वाड्याच्या मुख्य दरवाजातून होणार."
सरिताने मंजुळाला आणि तिच्या लेकराला सोबत घेतलं.
"जोपर्यंत मंजुळाला तिचा हक्क आणि सन्मान मिळत नाही, तोपर्यंत मी सुद्धा वाड्यात अन्नपाणी घेणार नाही. बघूया गावचे सरपंच आपल्या र*क्ताला नाकारतात की सुनेच्या जिद्दीपुढे झुकतात."
त्या रात्री सरिताने मंजुळाला वाड्यात नेलं. सरपंचांचा राग, गावाचा विरोध, या सगळ्याला ती एकटी पुरून उरली. कारण तिच्या मनात आता संशय नव्हता, तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीसाठी घेतलेला ठाम निर्णय होता. प्रतापरावांनी चोरून जपलेलं नातं, सरिताने उजळ माथ्याने जगासमोर स्वीकारलं होतं.
नाती जपण्यासाठी फक्त र*क्ताची गरज नसते, तर कधीकधी एका खंबीर 'मनगटाची' आणि समजूतदार 'जोडीदाराची' गरज असते. 💯🙏

2520. रक्ताची ओढ

 "आरं साहेब, काच खाली घ्या की जरा. आज तरी मोगरा घ्या ! लई घमघमाट हाय बघा, तुमच्या गाडीतल्या एसीपेक्षा भारी वास हाय याचा !"
"नको, गजरा नको. हे घे १०० रुपये."
"आरं, पण साहेब, रोज फुकटचे पयशे कशाला देताय? म्या काय भिकारी हाय का? कष्टाचं खाती मी."
"ठेव ग वेडे, तुझ्या कष्टाचेच आहेत हे. उद्या भेटू..."​
​पुण्यातील डेक्कनचा सिग्नल. दुपारची रणरणती ऊन असो किंवा संध्याकाळची गर्दी, १८ वर्षांची 'पारू' तिथेच असायची. हातात मोगऱ्याचे गजरे आणि गुलाब घेऊन ती गाड्यांच्या मागे धावायची. तिचं आयुष्य त्या सिग्नलच्या हिरव्या आणि लाल दिव्यांमध्येच अडकलं होतं. ​पण गेल्या काही महिन्यांपासून पारूच्या आयुष्यात एक वेगळीच गोष्ट घडत होती. रोज संध्याकाळी ६ वाजता सिग्नलला एक चकचकीत लाल रंगाची मोठी कार येऊन थांबायची. त्यातून एक रुबाबदार तरुण, 'विक्रम', काच खाली करायचा. तो पारूकडून कधीच गजरा घ्यायचा नाही, पण न चुकता तिच्या हातावर १०० रुपयांची कडक नोट ठेवायचा.
पारूला सुरुवातीला नवल वाटायचं, मग संकोच वाटायला लागला. "हा माणूस गजरा का घेत न्हाय? आणि रोज १०० रुपये का देतो?" तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. तिला वाटू लागलं की या श्रीमंत साहेबाचं आपल्यावर प्रेम जडलंय. ती आरश्यात बघून स्वतःचे केस नीट करू लागली. फाटक्या कपड्यातही ती स्वतःला सजवायचा प्रयत्न करू लागली. तिच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या, "ए पारू, तुझा तो 'राजपुत्र' आला बघ!" पारू लाजून चूर व्हायची. तिला वाटायचं, एक दिवस हा साहेब मला या सिग्नलवरून घेऊन जाईल आणि राणीसारखं ठेवेल.​
​एक दिवस ६ वाजले, ७ वाजले, पण ती लाल कार आलीच नाही. पारूचे डोळे वाटेकडे लागले होते. दुसरा दिवस उजाडला, तिसरा दिवस गेला... आठवडा उलटला. साहेब आलेच नाहीत. पारू अस्वस्थ झाली. तिला जेवण गोड लागेना. ​दहाव्या दिवशी, तीच लाल कार सिग्नलवर आली. पारू धावत गेली. "साहेब, इतके दिवस कुठं व्हता?"
पण कारची काच खाली झाली तेव्हा आत विक्रम नव्हता. ड्रायव्हर होता. ड्रायव्हरचे डोळे सुजलेले होते.​
पारूने विचारलं, "काका, साहेब न्हाय आले?"
ड्रायव्हर रडवेल्या आवाजात म्हणाला, "पोरी, साहेबांचा लय मोठा अपघात झालाय. ते १० दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत. आज त्यांची तब्येत लय बिघडली, डॉक्टर म्हणत्यात वाचणं कठीण हाय. रक्ताची गरज हाय, पण त्यांचं रक्त कोणाशी मॅचच होत न्हाय."
​हे ऐकताच पारूच्या पायाखालची जमीन सरकली. तिने विचार केला नाही, हातातले गजरे तिथेच टाकले आणि ड्रायव्हरला म्हणाली, "काका, मला न्या हॉस्पिटलला. माझा जीव गेला तरी चालंल, पण साहेबाला काय होऊ देणार न्हाय मी. माझं रक्त घ्या म्हणावं डॉक्टरांना!"
​पारू धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. विक्रम आयसीयूमध्ये होता. डॉक्टरांना तिने विनंती केली, "डॉक्टर साहेब, हे माझं रक्त घ्या, पण त्या साहेबाला वाचवा. तो देव माणूस हाय हो."
​डॉक्टरांनी तिचं रक्त तपासलं आणि चमत्कार झाला! तिचं रक्त विक्रमच्या रक्ताशी तंतोतंत जुळलं. डॉक्टरांनी घाईघाईने रक्त चढवलं. काही तासांनंतर विक्रमची प्रकृती स्थिर झाली.
​पारू बाहेर बाकड्यावर बसून देवाची प्रार्थना करत होती. तेवढ्यात तो ड्रायव्हर आणि विक्रमचे आई-वडील तिथे आले. विक्रमची आई पारूजवळ आली आणि तिच्या पाया पडू लागली.
"पोरी, तू उपकार केलेस ग माझ्या लेकावर. तू कोण आहेस?"
​तेवढ्यात शुद्धीवर आलेला विक्रम आतून क्षीण आवाजात बोलला, "आई... तिला पाया नको पडू देऊस... ती आपलीच आहे."
​सगळे विक्रमच्या बेडजवळ गेले. विक्रमने डोळे उघडले आणि पारूकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते.
तो म्हणाला, "पारू... तुला वाटायचं ना, मी गजरा न घेता पैसे का देतो? तुला वाटायचं मी तुझ्या प्रेमात आहे?"
​पारूने मान खाली घातली.
​विक्रम रडत हसला, "अगं वेडे, मी प्रेमात नव्हतो... मी शोधत होतो तुला. १५ वर्षांपूर्वी जत्रेत माझी छोटी बहीण हरवली होती, ती तूच आहेस. तुझ्या हातावरचा तो जन्मखूण बघून मी तुला पहिल्याच दिवशी ओळखलं होतं."
​पारूला धक्काच बसला. "काय? तू माझा दादा हाय?"
​विक्रमचा बाबा पुढे आला आणि त्याने पारूला मिठी मारली. "होय बाळा... आम्ही तुला किती शोधलं.
विक्रमला तू सापडली होतीस, पण त्याला तुला अशी 'भिकारी' अवस्थेत घरी नेण्याची लाज वाटत नव्हती, तर त्याला भीती होती की अचानक श्रीमंत घरात नेलं तर तू घाबरशील. म्हणून तो रोज तुला भेटायला यायचा, तुझी सवय करून घ्यायचा. या येणाऱ्या रक्षाबंधनाला तो तुला सन्मानाने घरी आणणार होता... पण त्याआधीच हा अपघात झाला."
​पारूच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ज्याला ती 'प्रेमी' समजत होती, तो तिचा सख्खा भाऊ निघाला. तिने विक्रमचा हात हातात घेतला आणि गावरान भाषेत रडत म्हणाली,
"दादा... आरं म्या काय काय विचार केला व्हता रं... अन तू तर माझा देव निघालास! तू मला पैसे नव्हता देत, तू मला माझं हक्काचं प्रेम देत व्हतास. आता बरी झाली ना तुझी तब्येत? आता न्हाय सोडणार बघ तुला."
​काही दिवसांनी पारू त्याच डेक्कनच्या सिग्नलवर आली, पण गजरा विकायला नाही. ती लाल कारमध्ये बसून आली होती. तिने गाडीची काच खाली केली आणि तिथे उभ्या असलेल्या तिच्या जुन्या मैत्रिणींना आवाज दिला. "ए पोरींनो, हा बघ माझा 'राजपुत्र' न्हाय, हा माझा राजा दादा हाय!"
तिच्या गळ्यात सोन्याचा हार होता आणि हातात विक्रमने बांधलेला राखीचा धागा होता. रक्ताची ओढ शेवटी रक्तालाच वाचवून गेली होती.

2519. भार्गवी

 "भार्गवी ताई, अहो बाहेर 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड लागलाय... लोकं ब्लॅकने तिकीट मागायला लागल्यात. त्या पहिल्या रांगेतली 'ए-१' (A-1) नंबरची खुर्ची आपण रिकामी का ठेवतोय? एकाने तर त्या सीटसाठी ५००० रुपये फेकले तोंडावर!"
"रघू काका, ती खुर्ची विकायची नाय... ती माझ्या 'लकी चार्म'ची हाय."
"कोणाची हाय ताई? कलेक्टर साहेब येणार आहेत का?"
"नाय ओ काका... त्या खुर्चीवर माझा 'देव' बसलाय, जो डोळ्यांना दिसत नाय, पण काळजाला जाणवतोय."
पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर. नाटकाची तिसरी घंटा वाजायला काही मिनिटं बाकी होती. ग्रीन रूममध्ये प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी साठे आरशासमोर बसली होती. बाहेर प्रेक्षकांचा गोंगाट सुरू होता. भार्गवी आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी नटी होती, पण तिच्या चेहऱ्यावर यशाचं तेज नसून एक जुनी खंत होती.
तिसरी घंटा वाजली. "टण... टण... टण..."
पडदा उघडला. भार्गवी स्टेजवर आली. टाळ्यांचा कडकडाट झाला. पण तिने संवाद सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे स्टेजच्या अगदी कडेला येऊन, पहिल्या रांगेतील त्या रिकाम्या 'ए-१' खुर्चीकडे बघून हात जोडले आणि वाकून नमस्कार केला. प्रेक्षक कुजबुजले, "हिला काय वेड लागलंय? रिकाम्या खुर्चीला का वाकतेय?"
कुणालाच माहित नव्हतं की त्या रिकाम्या खुर्चीमागे एक भयानक भूतकाळ दडला होता.
भार्गवी एका खेडेगावातली. तिचे वडील, 'आबा', हे गावातले कडक शिस्तीचे मास्तर. त्यांचा शब्द म्हणजे कायदा. भार्गवीला लहानपणापासून नाटकाचं वेड होतं. पण आबांचा त्याला सक्त विरोध होता.
"नाचणारी करायचं हाय का तुला? आपल्या खानदानात आजवर कुणी स्टेजवर जाऊन तमाशा केला नाय. हे नाटक-बिटक बंद कर, नाहीतर टांगा मोडीन तुझा!" आबांनी एकदा ताटावरून उठवत तिला झापलं होतं.
पण भार्गवीचं रक्त कलाकाराचं होतं. तिने लपून-छपून पुण्यातल्या एका स्पर्धेत भाग घेतला आणि तिला पहिलं बक्षीस मिळालं. ही बातमी आबांना समजली तेव्हा घरात महाभारत घडलं.
आबांनी भार्गवीच्या थो*बाडीत मा*रली आणि घराचा दरवाजा उघडून गरजले, "आजपासून तुझा अन माझा संबंध संपला. तुला ती नाच-गाणीच करायची आहेत ना? मग जा... पण पुन्हा या उंबऱ्याच्या आत पाऊल टाकू नकोस. माझ्यासाठी तू मेलीस!"
त्या रात्री भार्गवी रडत रडत घर सोडून पुण्यात आली. तिला जिद्द होती, "एक दिवस मोठी नटी होऊन दाखवेन आणि आबांनाच माझ्या नाटकाला बोलावून घेईन."
भार्गवी मोठी नटी झाली. तिचं नाव झालं. पण ती १० वर्षं घरी गेली नाही. तिला वाटत होतं, आबा अजूनही रागात असतील.
एका दिवशी तिला गाववरून निरोप आला, "आबा गेले. हृ*दयविकाराच्या झटक्याने वा*रले."
भार्गवीला धक्का बसला. ती सगळं काम सोडून गावी गेली. घराच्या अंगणात आबांचं पार्थिव पडलं होतं. १० वर्षांपूर्वी ज्या बापाने घराबाहेर काढलं होतं, त्याचा चेहरा बघून ती धाय मोकलून रडली. "आबा... मी जिंकले ओ, पण तुम्हाला हरवून काय उपयोग झाला?"
अंत्यविधी पार पडला. भार्गवी घरातल्या जुन्या वस्तू आवरत होती. आबांच्या खोलीत गेल्यावर तिने त्यांचे कपाट उघडले. तिथे कपड्यांच्या खाली एक जुनी डायरी आणि एक फाईल होती.
भार्गवीने ती फाईल उघडली आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली.
त्या फाईलमध्ये भार्गवीच्या नाटकाच्या प्रत्येक बातमीचे पेपर कटिंग्ज होते. तिने कधी काय बक्षीस मिळवलं, तिचा कोणता फोटो पेपरमध्ये आला, हे सगळं आबांनी कात्रण करून जपून ठेवलं होतं.
आणि डायरीच्या शेवटच्या पानावर आबांनी थरथरत्या हाताने लिहिलं होतं:
"माझी भार्गवी... माझी लेक.
लोकं म्हणतात ती खूप मोठी नटी झालीय. मला लय अभिमान वाटतो ग तुझा. त्या रात्री तुला घराबाहेर काढलं, कारण मला भीती वाटत होती की या क्षेत्रात लोक तुला त्रास देतील. पण तू वाघीण निघालीस.
पोरी, आज तुझं पुण्यात बालगंधर्वला पहिलं मोठं नाटक हाय. मला यायचंय ग तुला बघायला. मी तिकीट पण काढलंय - पहिल्या रांगेतलं, 'ए-१' नंबरचं. पण... मी आत येणार नाही. जर तू मला समोर बघितलंस, तर तुला जुना राग आठवेल, तू नर्व्हस होशील. तुझा खेळ बिघडेल. माझा चेहरा तुझ्या यशाच्या आड नको यायला.
मी बाहेर उभा राहून फक्त टाळ्यांचा आवाज ऐकेन. तू लढ पोरी... तुझा हा खडूस बाप बाहेर उभा राहून तुझ्यासाठी टाळ्या वाजवेल."
त्या डायरीसोबत त्या दिवशीच्या नाटकाचं 'न वापरलेलं' तिकीट होतं. सीट नंबर ए-१.
भार्गवीला समजलं की आबा त्या दिवशी आले होते, बालगंधर्वच्या बाहेर उभे होते, पण फक्त लेकीच्या प्रेमापोटी ते आत आले नाहीत. त्यांनी स्वतःच्या इच्छा मारल्या, जेणेकरून लेकीचं स्वप्न पूर्ण व्हावं.
त्या दिवसापासून भार्गवीने शपथ घेतली.
"जोपर्यंत मी जिवंत आहे आणि या स्टेजवर उभी आहे, तोपर्यंत प्रत्येक शो ला पहिली सीट 'ए-१' माझ्या आबांसाठी राखीव असेल."
स्टेजवर भार्गवीचा डायलॉग संपला. तिने पुन्हा त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहिलं. डोळ्यातून एक थेंब ओघळला. तिला भास झाला की त्या खुर्चीवर पांढरा सदरा आणि धोतर घातलेले आबा बसले आहेत आणि अभिमानाने टाळ्या वाजवत आहेत.
तिने मनाशीच म्हटलं, "बघा आबा... आज अख्खं जग माझ्यासाठी टाळ्या वाजवतंय, पण माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद तुमची ती रिकामी खुर्चीच हाय!"
प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला, पण भार्गवीची नजर फक्त त्या एका जागेवर खिळली होती.

2518. सर्व कृतींच्या पाठीमागील शक्ती

 विज्ञानाच्या पलीकडे जे काही आहे, ते सर्व म्हणजेच परमेश्वर आहे, हे सिद्ध करणारी ही कहाणी आहे. आपण कर्ता असलो तरी करविता केवळ 'तो'च असतो हे दाखवून देणारा हा लेख आहे.
जीवनाचा खरा अर्थ आणि त्यापलीकडचे सत्य म्हणजे ‘देव’च आहे.
मी MRI स्कॅनकडे पाहिलं आणि अंगावर काटा आला. तो हॉस्पिटलच्या एअर कंडिशनरमुळे नव्हता, तर समोर दिसणाऱ्या दाहक सत्यामुळे होता. तो साक्षात मृत्यूचा आदेशच होता — काळ्या-पांढऱ्या अक्षरांत छापलेला.
या हॉस्पिटलमध्ये मला एक दंतकथा म्हणतात.
मी डॉ. सरवनन — व्हॅस्क्युलर सर्जरीचा निवृत्त प्रमुख.
चाळीस वर्षं मी मानवी शरीराच्या आत काम केलं आहे. चेन्नईच्या रस्त्यांपेक्षा मला माणसांच्या रक्तवाहिन्यांचा नकाशा अधिक चांगला माहीत आहे. धडधडणारी हृदयं मी हातात धरली आहेत, छतावर रक्त उडवणाऱ्या नसा मी शांत केल्या आहेत. पण त्या स्कॅनकडे पाहताना, इतक्या दशकांनंतर पहिल्यांदाच, मला स्वतःला मी सर्जन आहे असं वाटलं नाही. मला स्वतःचीच फसवणूक झाल्यासारखं वाटलं.
रुग्णाचं नाव गौरी होतं.
वय अवघं सव्वीस. एकटी आई. दोन शिफ्ट्समध्ये एका छोट्या उपहारगृहात काम करून घर चालवणारी. कॉफी ओतताना ती अचानक कोसळली. तिच्या मेंदूमधील अ‍ॅन्युरिझम (रक्तवाहिनी ज्या ठिकाणी कमजोर होते, त्या ठिकाणी नसतील रक्तदाबामुळे येणारा फुगीर भाग. रक्तदाब अधिक वाढला तर ही नस फुटू शकते आणि असीमित रक्तस्त्राव होऊ लागतो.) फक्त मोठा नव्हता — तो राक्षसी होता. मेंदूच्या अतिशय नाजूक भागाभोवती तो अजगरासारखा विळखा घालून बसला होता.
“हे ऑपरेशन शक्य नाही, वरदन,” न्यूरोलॉजी विभागप्रमुखांनी मान हलवत सांगितलं.
“आत गेलात तर टेबलवरच ती मुलगी रक्तस्राव होऊन मरेल. हात लावला नाहीत तरी ४८ तासांत नस फुटेल. दोन्ही मार्गांनी मृत्यूच.”
वैद्यकीय व्यवस्थेत आम्हाला जोखमी तोलून पहायला शिकवलं जातं. कायदेशीर जबाबदाऱ्या, यशाची टक्केवारी — सगळं.
तर्क सांगत होता, वहात लावू नकोस. निसर्गावर सोड. मागे फिर.' 
पण मग मी गौरीच्या डोळ्यांत पाहिलं आणि वेटींग रूम मध्ये बसलेली तिची चार वर्षांची चिमुकली मुलगी दिसली. वहीत चित्रं काढत, फाटके बूट घातलेली. गौरी गेली, तर ती मुलगी एकटी पडणार होती. बाहेरच्या जगात तिचे आईविना किती हाल होतील या विचारानेच तिच्याविषयी वाटणाऱ्या करुनेने माझे मन भरून गेले होते. मी प्रशासनाला ऑपरेशन थिएटर ठरवायला सांगितलं.
मी केस घेणार असल्याचं जाहीर केलं. ते मला वेड्यात काढत होते. कदाचित मी होतोही.
ऑपरेशनच्या आदल्या रात्री, मी  माझ्या अंधारलेल्या ऑफिसमध्ये बसलो होतो. बाहेर शहर झगमगत होतं — आत टांगणीला लागलेल्या एका जीवाबद्दल पूर्णपणे उदासीन असलेलं.
मी घाबरलो होतो. दगडासारखे स्थिर असणारे माझे हात थरथरत होते. स्कॅन पुन्हा पुन्हा पाहिला.
कुठलाच मार्ग नव्हता. कुठलीच आशा नव्हती. हे आत्मघातकी मिशन होतं.
मी विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस आहे.
स्कॅलपेल, टाके, रक्तदाब — ह्यांवर. पण माझ्या टेबलावर, वैद्यकीय जर्नल्सच्या ढिगाऱ्यामागे, एक लहानसं, प्लास्टिक लॅमिनेट केलेलं वैद्येश्वराचं चित्र आहे. माझ्या आजीनं मेडिकल कॉलेज सुरू करताना दिलं होतं.
ती म्हणाली होती —
“औषध शरीरावर उपचार करतं, पण माणसाला देव बरा करतो.”
मी ते चित्र हातात घेतलं. कोणतीही औपचारिक प्रार्थना केली नाही.
फक्त गौरीची फाईल हातावर ठेवली, देवाच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि अंधारात हळूच बोललो —
“हे प्रभो…
या वेळेला माझे हात अपुरे पडतायत.
मी इथे फक्त एक मेकॅनिक आहे.
उद्या सकाळी तुम्हालाच ऑपरेशनमध्ये यावं लागेल.
मी हात देतो…
पण बुद्धी तुम्ही द्या.
आज सर्जन तुम्हीच आहात.”
दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर मध्ये गोठवून टाकणारं थंड वातावरण होतं. तणावानं भरलेलं. नर्सेस शांत होत्या. भूलतज्ज्ञ माझ्याकडे पाहायलाच तयार नव्हते.
सगळ्यांना माहित होतं — आपण एका अटळ सत्याकडे चाललो आहोत. तिचा मृत्यू अटळ होता.
ऑपरेशन सुरू झालं. स्कॅनपेक्षाही परिस्थिती वाईट होती. रक्तवाहिनी कागदासारखी पातळ, आणि जणू संतापून धडधडत होती. एक चुकीचा श्वास, एक सूक्ष्म कंप — आणि सगळं संपणार होतं.
मी मायक्रो-कात्री उचलली.
तो क्षण होता. Widowmaker क्षण. या क्षणाच्या अलीकडे होतं जीवन आणि पलीकडे उभा होता केवळ मृत्यू!
आणि ते घडलं. खोलीत पूर्ण शांतता पसरली.
फक्त शांत नाही — पोकळी.
मॉनिटर्सचे आवाज दूर कुठेतरी विरून गेले.
माझ्या खांद्यांवरून एक विलक्षण उब पसरली, हातांमधून बोटांपर्यंत वाहत गेली. तो अ‍ॅड्रेनालिन नव्हता. ही होती… शांतता.
गंभीर, भारलेली शांतता.
माझे हात वेगाने हलू लागले. स्पष्टच सांगतो —
मी ते हलवत नव्हतो, मी ते हलताना पाहत होतो.
मी यापूर्वी कधीच न शिकलेली कौशल्ये वापरत होतो. सत्तर वर्षांच्या माणसाला अशक्य असलेली गती आणि अचूकता माझ्या बोटांत कुठूनतरी आली होती. मेंदूच्या देठाजवळ, मिलिमीटर अंतरावर, क्षणाचाही संकोच न करता काम चालू होतं. दिसतही नसणाऱ्या ठिकाणी मी नेमक्या क्लिप्स लावत होतो — कुठलीतरी दैवी जाणीव मला मार्ग दाखवत होती.
“BP स्थिर आहे…” भूलतज्ज्ञ आश्चर्याने कुजबुजला.
मी उत्तर देऊ शकलो नाही.
मी एका तंद्रीत होतो.
माझ्या मागे कुणीतरी उभं आहे, माझ्या कोपरांना दिशा देत आहे, मनगट स्थिर करत आहे — अशी तीव्र जाणीव होती.
क्षणभर वाटलं, खरंच दुसराच कोणी डॉक्टर टेबलजवळ उभा आहे.
पंचेचाळीस मिनिटांनी मी शेवटचं उपकरण ट्रेमध्ये ठेवलं.
“अ‍ॅन्युरिझम संपलं आहे, नसेवर आलेलं फुगीरपणा गेला आहे.” मी म्हणालो.
“आता बंद करा.”
थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. नर्सेस रडत होत्या.
रेसिडेंट्स मॉनिटर्सकडे अविश्वासाने पाहत होते.
एक थेंबही रक्त गेलं नव्हतं.
ते अशक्य होतं — पण परिपूर्ण होतं.
मी गाऊन काढून हात धुण्याच्या ठिकाणी गेलो.
आरशात पाहिलं. अशा ऑपरेशननंतर मी नेहमी थकलेला, घामाघूम, पाठ दुखणारा असतो. आज मला यापैकी काहीही जाणवत नव्हतं. मी शांत होतो. अजिबात थकलो नव्हतो. मी माझ्या सुरकुतलेल्या, वृद्ध हातांकडे पाहिलं. आज त्यांनी एका आईला वाचवलं होतं. एका छोट्या मुलीला अनाथ होण्यापासून वाचवलं होतं.
पण सत्य मला माहीत होतं.
मी ऑफिसमध्ये परत गेलो, वैद्येश्वराचं ते छोटंसं चित्र उचललं आणि खिशात ठेवलं. एका आठवड्यानंतर मी डिस्चार्जच्या कागदावर सही केली. गौरी तिच्या मुलीचा हात धरून बाहेर पडली. डोळ्यांत अश्रू, मला हिरो… किंवा देव म्हणत होती. मी हसलो आणि मान हलवली.
“मी एकट्याने नाही केलं,” मी म्हणालो.
तिला वाटलं, मी टीमबद्दल बोलतोय.
पण त्या दिवशी मुख्य सर्जन कोण होता, हे मला माहीत होतं.
विज्ञान 'कसं' हे सांगू शकतं. रक्तप्रवाह, नसांचं जाळं — सगळं सगळं.
पण 'का' — हे कधीच सांगू शकत नाही.
अशक्याच्या समोर उभा असलेला माणूस अचानक मार्ग कसा शोधतो, हे विज्ञान समजावू शकत नाही. कधी कधी स्वीकारावं लागतं —
आपण फक्त एक साधन आहोत. आणि त्या मंगळवारी, ऑपरेशन थिएटर क्रमांक ४ मध्ये,
खरा वैद्य — परमवैद्य — स्वतः हजर होता.
कधीही आशा सोडू नका.
स्कॅन काळा असला तरी,
जग संपलं असं म्हणत असलं तरी.
चमत्कार नेहमी वीज-गडगडाटासह येत नाहीत.
कधी कधी ते फक्त स्थिर हातांमध्ये…
आणि शांत प्रार्थनेत येतात.
जय वैद्येश्वर.
सर्व कृतींच्या पाठीमागील शक्ती दाखवणारी अतिशय सुंदर कथा.  

2517. घर चिमुकले ....आनंदाने हसले....

    रात्री आठ सव्वा आठची वेळ, अमित ऑफिस मधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देवू  लागला. मुग्धा, ए मुग्धा अगं ऐक ना उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरलं आहे आपल्याकडे. प्रतिक आणि प्रिया आले आहेत गोव्याहून एका लग्नासाठी, फक्त दोनच दिवस आहेत ते इथे मग काय आपल्या अख्ख्या गॅंगलाही आमंत्रण देऊनच टाकलं. अनायसे रविवारच आहे उद्या धम्माल करूया सगळे मिळून आणि हो प्रतिकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी काही तरी अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून खाऊन खाऊन त्याच्या पोटाचं पार गोडाऊन झालय म्हणे, असं म्हणून अमित खळखळून हसला. त्याला असं खुश बघून मुग्धाही सुखावली. खरंच किती दिवसांनी असा दिलखुलास हसतोय हा ? नाहीतर नेहमीच कामाच्या व्यापात नको तेवढा बुडालेला असतो . मैत्रीची जादूच खरं आगळी, सळसळत्या चैतन्याने ओथंबलेलं निखळ निरागस हास्य ही मैत्रीचीच तर देणगी असते ना? बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती. एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्यांच्या बायका ह्या सगळ्यांसोबत मुग्धाची छान घट्ट मैत्री जमली होती आणि नेहमीच्या रुटीनला फाटा देवून कधीतरी फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल्ल रिचार्जच  त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता . 
      हा हा म्हणता रविवारची संध्याकाळ उगवली आणि चांगली दहा बारा जणांची चांडाळचौकडी गॅंग अमित व मुग्धाकडे अवतरली. हसणे, खिदळणे, गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता. घरात कितीतरी दिवसांनी गोकुळ भरलेलं पाहून अमितचे बाबा म्हणजेच नानाही खूपच खुश होते. घरी कुणी चार जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे आणि लहान मुलांसारखं अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज  मिक्स होत असत.  मुग्धाने मस्तपैकी व्हेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ, वेलदोडा व सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी असा शॉर्ट , स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता .  
      गप्पा तर रंगात आल्याचं होत्या पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव ह्यावरही यथेच्छ ताव मारला जात होता. सगळेच जण हसण्या - बोलण्यात व खाण्यात मश्गुल असताना अमित जोरात ओरडला , नाना अहो हे काय नीट धरा तो बासुंदीचा बाऊल, सगळी बासुंदी सांडवली अंगावर नविन स्वेटरचे अगदी बारा वाजवले नाना तुम्ही . जा तुमच्या रूम मध्ये जावून बसा  पाहू . भेदरलेले नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली. असू द्या नाना धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर काही काळजी करू नका असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूच मऊ रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूम मध्ये घेवून गेली .  
          थोड्याच वेळात मैफिलही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले तस प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला व म्हणाला वा ! मुग्धा पुलाव काय , बासुंदी काय , तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब होत ग . खरंच खूप छान वाटतंय आज मला . फक्त एक गोष्ट ह्यापुढे लक्षात ठेव मुग्धा , अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आता नको इन्व्हॉल्व करत जावू काही उमजत नाही ग आताशा त्यांना . उगाच ओशाळल्यासारखं वाटतं मग . अमितचा बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून शांत राहिलेली मुग्धा आता मात्र भडकली. हो रे अगदी बरोबर आहे तुझं कशासाठी त्यांना आपल्यात येवू द्यायच ? पडलं राहू देत जावूया एकटच त्यांना त्यांच्या रूम मध्ये , नाही का ? मला एक सांग अमित तू ही कधीतरी नकळत्या वयाचा होताच ना रे ? तू ही त्यांना क्वचित कधीतरी ओशाळवाणं वाटेल असं वागतच असशील मग तुलाही असं एकट ठेवायचे का रे तुझे आई बाबा? नाही ना? लहानपणापासून तर अगदी आता आता पर्यंत कितीतरी वेळा तुला त्यांनी सावरलं असेल.  जन्मदाता बाप, तुला वाढवताना ज्याने रक्ताचं पाणी केलं प्रेमाने मंतरलेला चिऊ काऊचा घास तुला भरवला . वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं . तू दिलेला शी - सू चा आहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला . तुला फ्रिडम दिलं ,  उच्च  शिक्षण , उत्तम करियर , परफेक्ट लाईफ दिली आणि तू मात्र ?... असो तुला हवं तस वागायला फ्री आहेस तू . पण माझंही जरा स ऐकून घे .  
       मी ह्या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांची मला साथ लाभली ते म्हणजे नाना. नविन नविन खूप रडायला यायचं आईची आठवण त्रस्त करायची, तू कामात बिझी असायचा अश्या वेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचे ते नाना. एखाद्या वेळी आईंचा ओरडा खाल्ल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच, कधीतरी उदास वाटलं तर जिवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना , आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे मुळे बरेच थकले, गांगरून गेले अश्या अवस्थेत त्यांना मी दूर लोटायचं? हे मुळीच शक्य नाही अमित. त्यांचा अपमान मी मुळीच खपवून घेणार नाही. उभं आयुष्य मुलांसाठी वाट्टेल तश्या  खस्ता खाऊनही आई वडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो. पण त्यांच्याही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येत जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते मग अश्या वेळी  काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं तर कुठे बिघडलं ?    
      अमितचे डोळे भरून आले, तो नखशिखांत गहिवरला. त्याला त्याची चूक उमगली तसा तो म्हणाला, मुग्धा अगं मी काय नानांचा शत्रू आहे का? पण त्यांच्या अश्या अवस्थेत कुणी त्यांना नावं ठेवलेले किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार. बस ह्याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर . अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची? आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपसूकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपलाही मान वाढतो अशाने आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपलीही पत कमीच होते अमित. अमितला मुग्धाच म्हणणं तंतोतंत पटलं. अनावधानाने का असेना पण त्याच चुकलंच होत . 
    नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडतच उठला आणि नानांच्या रूम मध्ये शिरला . नाना अजूनही जागेच होते. अमितची चाहूल लागताच ते उठून बसले. अरे अमित तू?  ये बाळा ,  झोपला नाहिस का अजून? अरे आताशा हात जरा थरथरतात रे माझे म्हणून मघाशी बासुंदी सांडली अंगावर पण आता हं नाही येणार बाळा तुमच्या मित्रमंडळीत मी. नानांनी असं म्हणताच अमितच अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान लेकराप्रमाणे रडू लागला. नाही नाना असं नका म्हणू मी चुकलो . उलट यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं  पडू देणार नाही. आतापर्यंत जाणते अजाणतेपणी खूप त्रास दिला मी तुम्हाला पण यापुढे फक्त जीवच लाविन नाना तुम्हाला मी. लेकाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या नानांना जणू आभाळच ठेंगणं झालं आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातले दोन टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या त्यांच्या लेकाच्या खांद्यावर खळकन निखळले. केव्हापासून बापलेकाच्या उदात्त प्रेमाचा सोहळा हृदयात साठवत दारात उभ्या असलेल्या मुग्धानेही गालात हसत समाधानाने डोळे पुसले आणि.. चिमुकले घरही मग आनंदाने हसले.

रुपाली पुराणिक

2516. केरसुणी

 समिरा माळकर. वय वर्ष एकोणतीस. पदवीधर आणि विवाहित. दिसायला सुरेख. कुणालाही आवडेल अशी. लग्नाला तीन वर्ष झाली. तशी संसारात सुखीच पण मुळात लग्नच मनाविरुद्ध झालं. दिनेशचं स्थळ सांगून आलं, तेव्हा फोटो बघूनच ती नाही म्हणाली. पण दादानं ग्वाही दिली, “फार चांगला मुलगा आहे. मी बरीच वर्षं त्याला ओळखतो. दिसण्यावर जाऊ नकोस. अंगानं जरा भरला की बघ कसा दिसेल.”
तिनं दिनेशचा विचार केला नाही; आपल्या घराचा विचार केला. बाबा हार्ट पेशंट, आई थकलेली. त्या तिघी बहिणी. दादानं जिद्द धरली म्हणून तिघींची शिक्षणं झाली. तरी धाकटी अजून शिकतेच आहे. आपलं लग्न वेळेत झालं तर मधलीचं वेळेत बघता येईल. धाकटीच्या लग्नाला तसा वेळ असला, तरी आमच्या दोघींची लग्न झाल्यावर आई दादाच्या लग्नाचा विचार करेल. त्याचंही वय उलटत चाललंय आणि घाईघाईनं उरकायचं, म्हणून काही दादा आम्हाला कुणाच्या ही गळ्यात बांधणार नाही, हा विश्वास तिघी बहिणींना होता म्हणून सगळा विचार करून समिरा बोहल्यावर चढली.
सासरचं फार कुणी नव्हतंच. सासरे नुकते वारले होते आणि सासूबाईंनी खूप आधी आजाराला कंटाळून आत्महत्या केली होती. तेव्हा दिनेश खूप लहान होता. तो बाबांच्याच शिस्तीत वाढला. शिक्षण, नोकरी, संस्कार सगळं चांगलं होतं… फक्त आवडून जावा असा तो नव्हता, म्हणजे नाही.
तरी ती संसारात रमायचा प्रयत्न करायची… पण दिनेशचं वागणं काहीसं गोंधळात टाकणारं होतं. म्हणजे ही म्हणते, “आमच्या घरची परिस्थिती सामान्य, दादा एकटा कमावता तरी दादानं-आईनं आमच्या हौशी जपल्या. झेपतील तेवढे लाड केले. मतं मांडायला मोकळीक दिली. आमच्या मतांचा आदर केला.
“आताही मी नाहीच म्हणाले असते, तर दादानं फोर्स केला नसता; उलट आईला समजावलं असतं, ‘जाऊ दे! नको म्हणते, तर राहू दे. लग्नासारखी गोष्ट अशी जबरदस्तीनं लादण्यात अर्थ नाही.’”
पण समीरानं दादाचा विचार केला. त्यानं कुणाला सांगितलं नव्हतं; पण कॉलेजमधे असल्यापासून त्याचं जमलेलं होतं. 
निव्वळ घरची जबाबदारी तो नाकारत नव्हता. म्हणून स्मितानं समंजसपणे निर्णय घेतला. फक्त तो आता निभावून नेणं गरजेचं होतं, नाहीतर अशा अस्थिर वृत्तीनं भेदरलेल्या माणसासोबत संसार करणं सोडा, वावरणंही कठीण होतं.
लग्न नवीन असताना, रंगात आलेलं असताना तो बावचळायचा. कधी अंमळ अंथरूणात पंधरा मिनिटं जास्त निजला, तर भेदरून जायचा. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचा पण कधी ते वेळेत वाळले नाहीत, तर असा अस्वस्थ व्हायचा. आणि सगळ्यात कठीण आणि अगम्य गोष्ट म्हणजे त्याला घरातली केरसुणी कायम नवी आणि भरगच्चच लागायची ! हिच्या घरी नाईलाजानं असेल पण केरसुणीतल्या शेवटच्या पाच काड्या राहिल्या की नवीन केरसुणी आणायची चर्चा व्हायची आणि तीन काड्या उरल्या की नवी आणली जायची.
या विरूद्ध हा. केरसुणी आणून पंधरवडा नाही झाला की येताना नवी केरसुणी घेऊन हजर ! घरच्या कामवालीची भर. ती काय, जवळ जवळ नवी केरसुणी मजेत घेऊन जायची.
या वरून एक दोनदा वादही झाले… पण तो हट्टालाच पेटायचा. पण या वेळी हिनंच जरा ताणून धरलं. ऑफिसच्या व्यापामुळं दिनेशला घरी यायला उशीर व्हायचा. त्यामुळं दिनेशनं हिला केरसुणी आणायला सांगितलं. ती ‘हो हो’ म्हणत राहिली.
पण झालं काय, तेव्हाच मधलीचं लग्न ठरलं. हिच्या लग्नाला तीन वर्षं होत आली होती. म्हणजे आईच्या मते ही अनुभवीच बाई होती. मग काय आईच्या मदतीला हिच्या माहेरच्या फेऱ्या वाढल्या… त्यात साखरपुडा ठरला. मग तर बघायलाच नको. त्यात हिच्याकडून नवीन केरसुणी आणायची राहून जात होती. त्यात मुख्य काय, समिराला ते एवढं आवश्यक वाटत नव्हतं.
पण त्याचा परिणाम असा झाला की, एकदा येताना हा एकदम एकावेळी सहा केरसुण्या घेऊन आला. म्हणाला, “थोडे दिवस तुझे घाई गडबडीचे असतील, नवीन केरसुणी आणायची राहून जायला नको!”
मग भांडण पेटलं. झाडूशिवाय तिला खरं तर ह्याला झाडायचं होतं… पण भांडणही याला जमत नाही. त्या धुमसत्या वातावरणात ती साखरपुड्यासाठी आधी येऊन रहायला नाही म्हणत होती; ती तीन दिवस आधी आली. आईलाही बरं वाटलं. बहिणीही खूष झाल्या.
त्यात रितीनुसार मधलीच्या सासूबाई नात्यातल्या चार बायका घेऊन सुनेच्या माहेरी साखर भेट द्यायला आल्या. त्यांच्या घरची तशी रीत होती. स्वागताला आईसोबत समिरा होतीच. मुलीच्या सासूबाई आल्या. सगळं त्या सांगतील तसं पार पडलं आणि चहा घेताना त्या हिला म्हणाल्या,
“तू आमच्या दिनेश माळकरची बायको ना? नशीब काढलंस होऽऽ…! लाखात एक आहे मुलगा. मला मुलगी असती, तर जावईच करून घेतला असता!”
मती कुंठीत होणं म्हणतात, तसं हिचं झालं. सासूबाई बोलतच होत्या… “माझा लाडका विद्यार्थी आहे तो. आठवी-नववी मीच त्याची वर्गशिक्षिका होते. बापाच्या भितीनं सदैव धास्तावलेला असायचा. याचा एक मोठा भाऊ पण होता… तो लहानपणीच घरातून बापाच्या भितीनं पळून गेला; तो परत आलाच नाही.
“आईनं गळफास लावून घेतला आणि हे कोवळं पोर त्या खविसाच्या तावडीत सापडलं. झडलेल्या केरसुणीनं वाट्टेल तसा तो तावडीत सापडलेल्या मुलाला मारायचा. बघावं तेव्हा घराच्या कोपऱ्यात झडत चाललेली केरसुणी ठेवलेलीच असायची. कारण काही असो… आधी केरसुणी हातात घेणार.
“एकदा मार चुकवताना दिनेशच्या डोळ्याखाली जखम झाली. जेमतेम डोळा वाचला. हा काही बोलला नाही पण शेजाऱ्यांनी झाला प्रकार मला सांगितला. तश्शीच उठले आणि पोलिस घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले…
“मी एकटी नव्हते, चार शिक्षक होते सोबत. तमाशा करायचा ठरवलंच होतं तसा केला. बापाला पळता भुई थोडी झाली. पोलीसांनी उत्तम कारवाई केली. सुतासारखा सरळ आणला.
“पण म्हणावा तसा दिनू खुललाच नाही. त्या वर्षी परीक्षा होईपर्यंत तीन महिने मी त्याला माझ्याकडेच घेऊन गेले. बाप गयावया करत आला होता, पण म्हटलं परीक्षा झाल्यानंतर पाठवेन…
“पोलिसांची करडी नजर होती. मुलाला घरी नेल्यास दर महिन्याला वैद्यकीय अहवाल जमा करायची अट घातली. त्याशिवाय दिनूला नेता येणार नाही म्हणून बजावलं.
“तिथं तो हेकेखोर इसम ढेपाळला. पण दिनूवरही त्याचा फार परीणाम झाला…”
म्हणून केरसुणीच्या बाबतीत तो आग्रही झाला होता. झडलेली केरसुणी त्याला डोळ्यासमोर नको असेल, पण नेमकी तीच त्याच्या डोळ्यासमोरून जात नसेल. 
समिरासमोर अचानक सगळा उलगडा झाला. रडून आक्रोश करायचा असताना ती थरथरत उभी राहिली. रहायला आलेली माहेरवाशीण तातडीनं घरी जायला निघाली.
काय झालं हे जसं समिरा कुणाला सांगू शकत नव्हती, तसं ही घरी गेल्यावर काय होईल? काय घडेल? हे मी तुम्हाला सांगू शकत नाही… तुम्हीच समजून घ्या…!

— चंद्रशेखर गोखले

2515. बाळा , गाऊ कशी अंगाई

 देवघरात देवासमोर तेवणाऱ्या समईच्या ज्योतीसारखा तिचा शांत , सात्विक चेहरा याक्षणी चिंताग्रस्त दिसत होता. ती माझ्यासमोर बसली होती तरी पाळण्यात झोपलेल्या तिच्या बाळाच्या आठवणीने तिचे डोळे सारखे भरुन येत होते. त्याच्या भवितव्याच्या काळजी तिला भेडसावत होती. त्याला कारणही तसेच होते. 
साधारण सहा वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर तिच्या पतीने उपजीविकेसाठी एक छोटासा डायनिंग हाॅल टाकला होता. त्या डायनिंग हाॅलचे किचन सांभाळण्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी त्याने स्वतःच्या पत्नीवर म्हणजेच तिच्यावर टाकली होती. कोणतंही हाॅटेल किंवा डायनिंग हाॅल त्याच्या फर्निचर , सजावट , थाटावरुन ओळखला जात नसतो. डायनिंग हाॅल हा तेथे मिळणाऱ्या जेवणाच्या चवीवरुन ओळखला जात असतो. ही गृहिणी तर साक्षात अन्नपूर्णा होती. तिने स्वयंपाकासाठी काही महिला ठेवल्या. त्यांना ती सूचना देत असे. प्रत्येक भाजी , चटणी , कोशिंबीर कशी बनवायची , त्यात तिखट , मीठ , मसाले किती आणि कसे टाकायचे हे ती स्वतः किचनमध्ये उभी राहून त्या मदतनीस महिलांना सांगत असे. तिचे मसाल्यांचे ज्ञान केवळ अफलातून होते. त्यामुळे त्या डायनिंग हाॅलची ख्याती लवकरच दूरदूरपर्यंत पसरली. 
मग गिऱ्हाईकांना बसण्यासाठी जागा अपुरी पडायला लागली. म्हणून त्या दांपत्याने बॅंक लोन काढून खूप मोठा डायनिंग हाॅल सुरु केला. तोही जोरात चालू लागला. 
अशा सुखी संसारात रममाण असलेल्या त्या अन्नपूर्णेला एक दिवस बाळंतपणाची चाहूल लागली. त्यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर लवकरच एक टवटवीत नवे फूल उमलणार होते. तरीही डायनिंग हाॅलच्या जेवणाची चव बिघडू नये म्हणून ती पोटातील बाळाचं ओझं सहन करत किचनमध्ये उभी राहायची. शेवटी डॉक्टरांनी तिला आराम करण्याची सक्त ताकीद दिल्यावर ती माहेरी गेली.
ती माहेरी गेल्यावर काही दिवसांतच इकडे नाट्यमय घडामोडी सुरु झाल्या. त्याच परिसरात राहणाऱ्या एका सुंदर पण अनैतिक वर्तणूक असलेल्या महिलेने ती माहेरी गेल्याची संधी साधून तिच्या स्खलनशील नवऱ्याला जाळ्यात ओढले. कित्येक दिवसांपासून तिचा त्याच्या पैशांवर डोळा होता. तिचा नवरासुद्धा त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले निरतिशय प्रेम विसरुन त्या स्त्रीच्या नादी लागला. तो इतका खुळावला की त्याने चक्क तिला स्वतःच्या घरात आणून ठेवले.
त्याची पत्नी बाळंत होऊन तिला मुलगा झाला. त्याला घेऊन ती स्वतःच्या घरी आली तेव्हा तिथे दुसरीच स्त्री पाहून तिला जबरदस्त धक्का बसला. तिने तिच्या नवऱ्याला जाब विचारल्यावर तो निर्लज्जपणाने तिला म्हणाला की तिला घरात राहायचे असेल तर त्या दुसऱ्या स्त्रीसोबत राहावे लागेल अन्यथा तिला तिचा मार्ग मोकळा आहे. हे ऐकल्यावर त्या अन्नपूर्णेला अश्रू अनावर झाले. पण ती स्वाभिमानी स्त्री तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन तडक माघारी फिरली.
ती तिच्या आईकडे परत आली तरी ती आईवर ओझं होऊन राहिली नाही. तिने तशाही अवस्थेत टिफीन सर्व्हिस सुरु केली. तिच्या बाळाच्या भवितव्यासाठी ती कितीही कष्ट उपसायला तयार होती. त्या काळात तिला कुणीतरी माझे नाव सुचवले. तिच्या आईकडे त्या दोघा पतीपत्नीच्या जन्मपत्रिका होत्या. त्या घेऊन ती माझ्याकडे आली होती. 
मी दोन्ही पत्रिकांचा बारकाईने अभ्यास केला. तिच्या चतुर्थ स्थानात राहूचे गोचर भ्रमण सुरु असल्याने तिचे हक्काचे घर तिला दुरावले होते. अर्थात आणखी वर्षभरात राहू त्याचा मुक्काम हलवणार होता. त्यामुळे एका वर्षाने ती परत तिच्या हक्काच्या  घरात जायची शक्यता होती. तिच्या नवऱ्यावर मात्र काही दिवसांतच शनिचा अंमल सुरु होणार होता. त्याने केलेल्या प्रत्येक वाईट कर्माचे पुरेपूर माप न्यायदेवता असलेला शनि त्याच्या पदरात टाकणार होता.
मी तिला समजावून सांगितले , " तू अजून वर्षभर धीर धरावास असं मला वाटतं. तू तुझं काम चालू ठेव. तुला परत तुझ्या घरी जायची संधी येऊ शकते. पण तसा प्रस्ताव आल्यावर तू डायनिंग हाॅल तुझ्या बाळाच्या नावे करुन देण्याची अट घाल. तसेच तो सज्ञान होईपर्यंत डायनिंग हाॅलचे व्यवहाराचे हक्क तुझ्याकडे असतील अशी तरतूद करुन ठेव. या कामासाठी तू चांगल्या वकीलाची मदत घे. "
ती मोठी धीराची होती. तिने खंबीरपणे तिचा टिफीन सर्व्हिसचा व्यवसाय करत शांतपणे वाट पहाण्याचं ठरवलं.
या प्रसंगाला दहा - बारा वर्षे लोटली.
रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो होतो.
एक दिवस मी शहरातील एका श्रीमंत वसाहतीतून काही कामानिमित्त चाललो होतो. तेव्हा अचानक एका बंगल्यातून एक वाॅचमन पळत आला.  मला त्या बंगल्याच्या मालकिणीने बोलावले होते. मी मनाशी आश्चर्य व्यक्त करत आत गेलो.
आत आलिशान सोफ्यावर तीच बसली होती........  तीच अन्नपूर्णा. 
तिने उठून मला नमस्कार केला व थोडक्यात तिची हकीकत सांगितली , 
" ती मला भेटून गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे तिच्या नवऱ्याचे ग्रह फिरले होते. घरच्या लक्ष्मीला बाहेर काढून बाहेरची अवदसा घरात आणणाऱ्या माणसाचं कधी भलं होत नसतं. 
अन्नपूर्णा बराच काळ गैरहजर असल्याने डायनिंग हाॅलच्या जेवणाची चव पूर्वीसारखी राहिली नव्हती. त्यामुळे गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणावर कमी झालं होतं. कर्जाचे हप्ते थकत चालले होते. डायनिंग हाॅलच्या स्टाफला पगार देणं मुश्किल झालं होतं. ती दुसरी सुंदर स्त्री तिच्या नवऱ्याकडून भरपूर पैसा उकळून त्याला कायमचा सोडून गेली. मग असं संपूर्ण एकाकी पडल्यावर त्याला बायको आठवली. तो पत्नीला परत न्यायला आल्यावर तिने ठरल्याप्रमाणे  ती अट घातली. ती त्याला मान्य करावीच लागली कारण ती आली नसतो तर डायनिंग हाॅल पूर्ववत चालला नसता.
मग वकीलाने सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करुन दिल्यावर ती अन्नपूर्णा पुन्हा पदर खोचून उभी राहिली. आता ती तिच्या बाळासाठी जिवाचं रान करणार होती. प्रचंड मेहनत करुन तिने डायनिंग हाॅल पुन्हा नावारुपाला आणला आणि आज ती अतिशय सुखात होती. "
तिची हकीकत ऐकून मला खूप आनंद झाला.
तिने तिच्या बाळासाठी अंगाई गीत गायले होते.  पण तिचे अंगाई गीत हे तिच्या जिवापाड कष्टाचे होते  , तिच्या असीम धैर्याचे होते. 
मग तिच्याशी काहीवेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो. 

जितेंद्र अभ्यंकर 
8605396156

2514. पोरांना थोडंस घासू द्या

 कामानिमित्त नेहमीप्रमाणे औरंगाबाद गेलो होतो. 
बड्या व्यापाऱ्याच्या मुलानी...  नेहमीचे संबंध असल्यामुळे "चहा मागवला"..
आज शॉप मध्ये गर्दी कमी होती म्हणून ...थोड्या गप्पा झाल्या.....
मी त्याला विचारले..." कितवीत आहेस? "
त्यावर तो मुलगा म्हणाला .."मी बारावीत आहे"
 मी थोडं खोलात जाऊन ...त्याची दिनचर्या विचारली तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या मुलाने आपली दिनचर्या सांगितली.........
बघा त्यातून काही बोध घेता येईल का.......
तो मुलगा आपली दिनचर्या सांगू लागला .......
 "हर्षल संचेती सर, मै सवेरे  मॉर्निंग मे ९ बजे शॉप ओपन करता हू.. साथ मे खाने  का टिफिन भी लाता हू,  फिर ११ बजे डायरेक्ट शॉप से कॉलेज जाता हू.... फिर श्याम ५.३० बजे कॉलेज छुटने के बाद फिर मै शॉप पर आता हू.....
और ९ बजे शॉप बंद करके... हम सब घर जाते है.....
मैने पुछा .."पढाई कब करते हो,"
उस लडके ने कहा रात को और सुबह जल्दी  उठकर करता हू....."
फिर मैने पुछा..." त्योहार को जब छुटी होती है, तब आप क्या करतो हो"....
उस लडके ने कहा ..." सर मै शॉप पर ही रहता हू  
 
म्हणजे लक्षात घ्या ...करोडो रुपयांची संपत्ती त्या व्यापाऱ्याच्या मुलाकडे असूनही त्याला काम करून शिक्षण घ्यावे लागते....
त्याचे वडील त्याला नोकराच्या तोडीचे काम सांगत होते.....
आणि तो मुलगा ते काम आवडीने करीत होता...
**********
आणि या उलट छटाकभर संपत्ती असणारे आपले नोकरी वाले लोकं.... आपल्या मुलांना  अजिबात शारीरिक धक्का लागू देत नाहीत ...पाहिजे ती गरज रेडिमेड उपलब्ध करून देतात ........
जवाबदारी ची जाणीव होईल अश्या कामांपासून कोसो दूर ठेवतात.......
फुकटात कोणतेही काम न करता ..पॉकेट मनी देत असतात.........
आणि मग जेव्हा पोरगं निव्वळ शरीराने मोठं होते आणि अक्कल  कवडीचीही दिसत नाही... हुशारी दिसत नाही ,तेव्हा हेच आई वडील पोराला दोष देतात.....
त्यालाही जबाबदारी येऊ द्या... जबाबदारी ची जाणीव होऊ द्या........
      लाड पुरवा परंतु...! त्याची थोडीशी जिरवतही जा.....
छोट्याश्या ,..कोवळ्या.. एक दोन वर्षांच्या वयातील बाळाला   जेव्हा आई वडिलांनसमोर इंजेक्शन  दिले  जात असते.... तेव्हा बाळाला होणाऱ्या त्रासाकडे आईवडील दुर्लक्ष करीत असतात....*कारण पोराचा जीव महत्वाचं असतो.... कारण तो आजार  दूर होणं महत्वाच असतं .......
अगदी त्याच प्रकारे...... आपल्या मुलांना थोडंस त्रास होऊ द्या.... मग येईल अक्कल हळूहळू....
मुलगा  शाळेच्या मार्कशीट वर किती मार्क घेतो, यापेक्षा महत्वाचे म्हणजे.. जीवनात किती यशस्वी होतो याला जास्त महत्व असायला पाहिजे .......
 पहा पटतंय का ? ......... 👍🏼

2513. ८ व्या वर्षी 'पॅड' सांभाळणारी तुमची मुलगी..ही प्रगती की अधोगती?

 परवाची गोष्ट. ओपीडीत एक आई-बाबा आपल्या आठ वर्षांच्या मुलीला घेऊन आले. मुलीच्या एका हातात अजूनही तिची आवडती 'गोड डॉल' होती आणि दुसरीकडे आईच्या डोळ्यात पाणी.
तक्रार काय?
"डॉक्टर, तिला 'पाळी' (Periods) सुरु झाली आहे." 🩸
हे वाचून तुमच्या काळजात धस्स झालं ना?
मला नाही झालं. कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजचं झालंय. ज्या वयात मुलींनी दोरीच्या उड्या मारायच्या, त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅड्सची कटकट आणि पोटाचे क्रॅम्प्स सांभाळावे लागत आहेत.
"आई, मला रक्त का येतंय?" हा ८ वर्षांच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीज फाटलं होतं आणि एक डॉक्टर म्हणून माझं डोकं सुन्न झालं होतं.
हे बालपण हिरावून घेणं नाही, तर काय आहे?
एक बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) म्हणून मी तुम्हाला अत्यंत कडू सत्य सांगतो, जे पचवायला तुम्हाला जड जाईल:
आपण आपली मुलं 'वाढवत' नाही आहोत, आपण त्यांना 'फुगवतोय'. 🐔
जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन ४० दिवसांत 'ब्रोयलर चिकन' तयार केलं जातं, तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्याची केली आहे. ही 'वाढ' नाही, ही शरीराची 'सूज' आहे!
याला जबाबदार कोण? आपली 'मॉडर्न' लाईफस्टाईल आणि पालकांची सोयीस्कर वृत्ती!
बघा आपण नकळत त्यांच्या आयुष्याशी कसं खेळतोय: 👇
🔥 ५०० रुपयांचा पिझ्झा की आयुष्याची होळी?
विकेंडला मॉलमध्ये ५००-८०० रुपयांचा पिझ्झा/बर्गर खाताना तुम्ही फोटो काढून 'इन्स्टा'वर टाकता... "फॅमिली टाईम!"
अहो, तो 'फॅमिली टाईम' नाही, ती तुमच्या पोरांच्या आरोग्याची 'होळी' आहे! तो रबरासारखा मैदा आणि 'प्रोसेस्ड चीझ' म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे.
शरीरात जेवढी चरबी जास्त, तेवढं 'इस्ट्रोजेन' जास्त तयार होतं. आणि हेच जास्तीचं हार्मोन त्या ८ वर्षांच्या मुलीच्या कोवळ्या मेंदूला सांगतं, "बाळा, तुझं बालपण संपलं, आता तू बाई झालीस!"
🔥 गरम अन्नासाठी प्लॅस्टिकचा डबा?
स्टीलचा डबा जड वाटतो आणि प्लास्टिकचा डबा फॅन्सी दिसतो, म्हणून तो मुलांच्या माथी मारताय?
जेव्हा तुम्ही त्यात वाफाळलेली गरम भाजी टाकता, तेव्हा त्यातील 'झिनो-इस्ट्रोजेन्स' (Xenoestrogens) अन्नात उतरतात. हे रसायन शरीरात गेल्यावर 'बहुरुपिया' (Imposter) सारखं वागतं. शरीराला वाटतं हे इस्ट्रोजेनच आहे आणि शरीर अकाली वाढायला लागतं. 
तुमच्या 'फॅन्सी' सवयीने तुम्ही निसर्गाचं घड्याळच बिघडवून टाकलंय!
🔥 दूध-चिकन की 'हार्मोनल बॉम्ब'?
"डॉक्टर, पोरगी खूप बारीक आहे, तिला नॉन-व्हेज देऊ का? दूध किती पाजू?"
तुम्ही तिला खायला नक्की घाला, पण बाजारातलं ते ४० दिवसात फुगलेलं 'ब्रॉयलर' कोंबडं आणि पिशवीतलं 'केमिकल' दूध देताना शंभर वेळा विचार करा.
 * चिकन: त्या कोंबडीला लवकर मोठं करण्यासाठी 'ग्रोथ हार्मोन्स'चे हेवी डोस दिले जातात. तेच तिच्या पोटात जातात. यामुळेच आजकाल चौथीतल्या मुलींच्या ओठांवर लव (Facial Hair) येते. हे PCOD चं पहिलं लक्षण आहे!
 * दूध: गाई-म्हशींना जास्त दुधासाठी दिलेली 'ऑक्सिटोसिन'ची इंजेक्शन्स दुधावाटे तुमच्या मुलीच्या इवल्याशा गर्भाशयाला 'मोठं होण्याचे' चुकीचे सिग्नल देतात.
तुम्ही 'प्रथिने' समजून जे खाऊ घालताय, ते प्रत्यक्षात 'हार्मोनल बॉम्ब' आहेत!
💉 सर्वात भयानक वास्तव:
या वयात पाळी सुरू झाली म्हणजे तिची हाडं लवकर जुळणार आणि उंची कायमची थांबणार. हे थांबवण्यासाठी मग उपाय काय? "हार्मोन सप्रेशन थेरपी!"
कल्पना करा... त्या ८ वर्षांच्या कोवळ्या फुलाला, तिची पाळी थांबवण्यासाठी पुढची ३-४ वर्षे दर महिन्याला एक वेदनादायक, जाड सुईचं इंजेक्शन घ्यावं लागणार! 💉😭
 तुमची लाडकी लेक दर महिन्याला त्या सुईच्या भीतीनी थरथर कापणार आणि तुम्ही हतबल होऊन ते बघणार.
विचार करा पालकांनो...
१० वर्षांनंतर जेव्हा ती तुम्हाला विचारेल: "आई-बाबा, तेव्हाच का नाही लक्ष दिलं? त्या पिझ्झा-बर्गरपेक्षा माझं आयुष्य महत्त्वाचं नव्हतं का?” तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असेल?
अजूनही वेळ गेलेली नाही... सुधरा! ⚠️
✅ किचनमधून 'व्हाईट पॉयझन' (मैदा, साखर) फेकून द्या.
✅ प्लॅस्टिकच्या डब्याला काडी लावा: फक्त स्टील वापरा.
✅ मुलांना 'ब्रॉयलर' बनवू नका: त्यांना मातीत खेळू द्या, उन्हात धावू द्या.
✅ लाड करणं म्हणजे विष खाऊ घालणं नाही, हा निष्काळीजपणा आता थांबवा!
हा लेख वाचून विसरू नका. ही माहिती प्रत्येक फॅमिली ग्रुपमध्ये पोहोचवणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे. 
आपल्या मुलींचं बालपण वाचवण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवं.
तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती दिसते का? तुमचे अनुभव खाली नक्की मांडा.

डॉ. सुजित भरत पाटील
बालरोगतज्ज्ञ, पुणे


2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...