"वॉव...
अक्षु किती मस्त ठिकाण आहे ना गोवा !!! मी खूप उत्साहित आहे यार... आपण खूप धमाल करायची हा, इथले
सगळे बीच पालथे घालायचे." गोव्याला येऊन प्रिया खूप उत्साहित झाली होती. आज
खूप दिवसांनी आकांक्षाही बाहेर पडली होती. रोजच्या कामातून तिला कधी वेळच मिळत नसे
आणि स्वप्नीललाही मनात असूनसुध्दा तिला वेळ देता येत नसे. याही वेळी त्याला जमल
नाही म्हणून त्याने तिला प्रियाबरोबर पिकनिकला जायला सांगितलं होतं. कारण त्याला
कामानिमित्त 4-5 दिवसांसाठी बाहेरगावी
जावं लागणार होतं. हो-नाही करता करता आकांक्षाही तयार झाली आणि ती प्रियाबरोबर
गोव्याला आली. प्रिया ही आकांक्षाची खूप चांगली मैत्रिण होती. दोघींनी
पार्टनरशिपमध्ये पुण्यात एक बुटीक ओपन केलं होतं. लग्न झाल्यानंतर आणि कॉलेज
संपल्यानंतर पहिल्यांदाच आकांक्षाला प्रियासारखी जीवलग एक जीवलग मैत्रिण मिळाली
होती आणि स्वप्नील आकांक्षाचा नवरा. खूप चांगला मुलगा, आकांक्षावर त्याचं अगदी
जीवापाड प्रेम होतं. दोघांच्या लग्नाला नुकताच 1 वर्ष झालं.
दोघांचीही भेट फेसबुकवरती झाली होती 3 वर्षांपूर्वी.
आकांक्षाचा स्वभाव खूप आवडल्यामुळे त्याने
तिला न बघताच प्रपोज केलं होतं. आकांक्षाही तितकीच गोड स्वभावाची आणि सुंदर होती.
कोणीही सहज तिच्या प्रेमात पडलं असतं. म्हणूनच आकांक्षाला स्वप्नीलला वाईट वाटेल,
त्याचं मन दुखवलं जाईल असं काहीही आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यायची
म्हणूनच तिने मनात असूनही स्वप्नीलला आपल्या भूतकाळाबद्दल सांगितलं नाही. कारण
तिला भीती होती की स्वप्नीलचा तिच्यावर विश्वास उरणार नाही आणि मग ती त्याला
कायमचं गमाऊन बसेल आणि हेच तिला नको होतं. कारण तिचंही तितकंच प्रेम होतं
स्वप्नीलवर. आणि तसंही या गोष्टी पुन्हा उकरुन काढण्यातही काही अर्थ उरला नव्हता.
समीरला ती पूर्णपण नाही पण बऱ्यापैकी विसरली होती. कधी-कधी स्वप्नीलच्या वागण्यातून,
त्याच्या बोलण्यातून आकांक्षाला समीरची आठवण व्हायची आणि मग तिला तिचा भूतकाळ जो
ती खूप मागे ठेवून आली होती तो समोर येत असे. दोघी गोव्याच्या एका बिचवर आल्या
होत्या फिरायला. प्रिया तिच्या इतर मैत्रिणींबरोबर मौजमजा करत होती आणि आकांक्षा
मात्र एका ठिकाणी वाळूवर शांतपणे बसून समुद्राकडे पहात बसली होती. समोर एक जोडपे
बसलेले होते. आकांक्षा त्यांच्याकडे टक लावून पहात होती. त्यांच्यात काही बोलणं
चालू होतं. मग त्या मुलाने हसत हसत वळ पडलेल्या एका नारळाच्या झावळीच्या पानाचा एक
तुकडा घेतला आणि त्याला पीळ देऊन त्याची एक लहानशी रिंग बनवली आणि मग ती त्याने
त्या मुलीच्या बोटात घातली आणि म्हणाला, "हे बघ. आता आपली इंगेजमेंट झाली.
आजपासून तू माझी झालीस. लवकरच लग्न करुया आपण !!!" असं
म्हटल्याबरोबर त्या मुलीने हसून त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं आणि दोघे
त्या निळ्याशार अथांग समुद्राकडे पाहू लागले. "अक्षु, एकटीच काय बसलीयेस. चल
ना आमच्याबरोबर जरा एंजॉय कर, चल...!!!" प्रिया तिला
बोलवत होती. पण आकांक्षाच तिकडे लक्षच नव्हतं. आकांक्षा कुठल्यातरी आठवणीत हरवली
होती आणि हळूच तिच्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. जणू समीरच्या तिच्या जुन्या
आठवणी त्यांच्याकडे पाहून जाग्या झाल्या होत्या. आणि मन म्हणत होते,
"तू परत
येऊ नकोस, जुन्या आठवणी जागवायला.
आधीच खूप
दिवस लागलेत, मनावरची जखम भरायला.
मन गुंतायला
वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही.
लागतो तो
गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला !!!"
आकांक्षा
मनात असा विचार करत होती की, "हॅलो !!! मॅडम मी तुझ्याशी बोलतेय. कुठे हरवलीस??" प्रियाच्या आवाजाने आकांक्षा भानावर आली. तिच्या डोळ्यांत पाणी
बघून प्रियाला काळजी वाटली आणि म्हणाली, "काय झालं अक्षु??? तुझ्या डोळ्यांत पाणी? स्वप्नीलची खूप आठवण येते का
तुला???" प्रिया काळजीच्या सुरात म्हणाली. "नाही
गं... काही नाही.. बसं असंच !!! तू जा... एंजॉय कर. मला बसू
दे थोडा वेळ इथे खूपच शांत वाटतय." म्हणून तिने विषय टाळला. मग प्रियाही
निघून गेली. तेवढ्यात प्रियाला कुणाचातरी कॉल आला. मग ती थोडावेळ काहीतरी फोनवर
बोलली. मग हळूच प्रियाकडे बघून हसली. मग पुन्हा मैत्रिणींमध्ये निघून गेली आणि
आकांक्षा पुन्हा तिच्या भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेली.
आकांक्षा मुंबईतल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये
शिकत होती. वाणिज्य शाखेचे शेवटचे वर्ष बाकी होते. डिसेंबरचा महिना उजाडला होता.
वर्षभर मौजमस्ती केल्यानंतर आता परीक्षेचा अभ्यास सगळ्यांना आठवत होता.
आकांक्षेचेही काही वेगळे हाल नव्हते. मग शेवटी तिच्या ग्रुपने कॉलेजची लायब्ररी
जॉईन केली. पण तिथे अभ्यास कमी आणि मस्ती जास्त असायची त्यांची.... "समीर...
वाणिज्यच्या शेवटच्या वर्षाला असताना त्याची ओळख झाली. तिच्या कॉलेजच्या लायब्ररीत
असिस्टंट म्हणून काम करायचा. काहीतरी 2 महिन्यांपूर्वीच रुजू झाला होता. दिसायला तसा हँडसम होता अगदी
गोरापान. कॉलेजच्या काही मुलींचा त्याच्यावर जाम क्रश होता. पण आकांक्षा मात्र
याला अपवाद होती. कॉलेजमध्ये असताना आकांक्षाचाही स्वभाव थोडा खोडकरच होता.
एक दिवस तिच्या एका मैत्रिणीलाही ही लायब्ररी जॉईन
करायची होती म्हणून ती तिच्यासोबत तिथल्या ऑफिसमध्ये गेली आणि तिथून एक फॉर्म घेऊन
तो भरण्यासाठी दोघी समोरच्याच एक टेबलवर बसल्या, तेवढ्यात समीरही काही कामानिमित्त
तिथे आला होता. तिथेच त्याने पहिल्यांदा आकांक्षाला पाहिलं, पाहिल्याच नजरते ती
त्याला खूप आवडली म्हणून तो त्याचं काम संपल्यानतरही मुद्दाम तिथेच एका
पुस्तकांचया कपाटाजवळ काहीतरी खुडबुड करत उभा राहिला व मधून मधून चोरुन
आकांक्षाकडे पाहत होता. इतक्यात आकांक्षाच सहज त्याच्याकडे लक्ष गेलं. तसं त्याने
लगेच दुसरीकडे बघायला सुरवात केली. आकांक्षा त्याला पाहून मस्करीच्या मूडमध्ये
येऊन तिच्या मैत्रिणीला म्हणाली, "मिनु, मी काय म्हणते हा मुलगा किती स्मार्ट
आहे ना, असाच मुलगा जर माझा बॉयफ्रेंड असता तर किती छान झालं असतं ना." "हो का?"
मग जाऊन बोलणी करु का त्याच्याशी तुझ्यासाठी, तसाही तो मघापासून तो तुला चोरुन
चोरुन बघतोय." मिनू म्हणाली. त्याचं बघण मिनुच्या नजरेतून सुटलं नव्हतं. लगेच
आकांक्षा म्हणाली, "नको काय !!! मला गरज नाहीये त्याची.
मी तर मस्करी करत होती." आणि दोघी हसायला लागल्या तसं समीर त्यांच्याकडे पाहू
लागला. "ए मिनु गप बस हसू नको. ! तो बघ इकडेच
बघतोय." आकांक्षा त्यांच्याकडे पाहून म्हणाली. मग लगेच दोघी गप्प बसल्या आणि फॉर्म कांऊंटरवर
जमा करुन निघून गेल्या. पण समीर मात्र त्यांना त्या बाहेर जाईपर्यंत बघत राहिला.
आकांक्षा तर नाही पण समीर नक्कीच तिच्या प्रेमात पडला होता. असेच काही दिवस निघून
गेले जानेवारीचा महिना उजाडला, आकांक्षाचा अभ्यास जोरात चालू होता. इकडे समीर
मात्र आता नेहमीच काही न काही काम काढून लायब्ररीत सारखा यायचाच. आकांक्षाला लपूनच
का होईना, तिला बघण्याचा प्रयत्न करायचा
पण आकांक्षाला याची जराही कल्पना नव्हती. हळू हळू तिच्या मैत्रिणींना मात्र ही
गोष्ट जाणवू लागली आणि त्यांनी आकांक्षाला तसं सांगितलही. पण आकांक्षा मात्र
त्याकडे दुर्लक्ष करत होती. कारण तिला दुनियेची कधी पडलेलीच नसायची. ती नेहमी
स्वत:च्याच धुदीत असायची. तिच्याच क्लासमधल्या एका मुलीचा भाऊही तिथेच काम करत
होता. हळूहळू समीरने त्याच्याकडेही आकांक्षाची चौकशी सुरु केली आणि ही गोष्ट
क्लासमधल्या मैत्रिणीलाही कळली आणि अचानक एक दिवस आकांक्षा तिच्या मैत्रिणींबरोबर
कँटीनमध्ये बसलेली असताना ती मुलगी ओरडतच कँटीनमध्ये आली, "ए आकांक्षा, अगं
एक गोष्ट सांगायची आहे तुला !!! यार आपल्या कॉलेजध्ये एक
मजनू आहे तुझा !!!" "काय????"
आकांक्षा जवळ जवळ ओरडतच उठली आणि म्हणाली, "ए जरा हळू बोल आणि हे काय म्हणतेस
ते जरा नीट सांग मला. कोण आहे माझा मजनू आणि तुला कुठे भेटला???" मग तिने काय ते सगळं आकांक्षाला सांगितलं की तो कसा तिच्यामागे
फिरतोय आणि तिच्याविषयी सगळ्यांना लायब्ररीत विचारपूस करतोय आणि त्याचं वर्णन
सांगितलं तेंव्हा हे ऐकून मिनू म्हणाली, "अगं... हा तो तर नाही न त्या दिवशी
आपण फॉर्म भरत असताना तिथे उगाच उभा राहून तुला बघत होता तो?"
आता सर्व मैत्रिणी आकांक्षाला रोजच चिडवू लागल्या. आता तर तिनेसुध्दा 3-4 वेळा त्याची दखल घेतली होती आणि त्यालाही ते कळलं
होतं म्हणून आता तो मुद्दामच तिच्यासमोर येऊन उभा राहत असे. हळूहळू तिथल्या
स्टाफलही याची भुणभुण लागली होती. असं करता करता एक दिवस त्याने ठरवलंच की
आकांक्षाला त्याच्या मनातली गोष्ट सांगायचीच म्हणून. एक दिवस परीक्षेचा फॉर्म
भरायचा होता आणि शेवटची तारीख होती म्हणून कँपसमधून धावत ती ऑफिसमध्ये जात होती.
तेंव्हा कशात तरी तिचा पाय अडखळला आणि आकांक्षा जोरात खाली पडली आणि तिचा पाय
मुरगळला. पायाचा अंगठाही चांगलाच फुटला होता. त्यातून खूप रक्त वाहत होतं. लगेच
तिच्या मैत्रिणींनी तिला मेडीकल डिपार्टमेंट मध्ये नेलं आणि तात्पुरती मलमपट्टी
केली. पाय मुरगळल्यामुळे आकांक्षाला खूप
त्रास होत होता. त्यामुळे ती रडत होती थोडा वेळ. ती खालीच कँपसमध्ये बसून राहिली.
इकडे लायब्ररीत अजूनही आकांक्षा न दिसल्यामुळे समीर अस्वस्थ झाला होता. कारण तिला
पाहिल्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता. इकडे तिचा फॉर्म तिच्या मैत्रिणींनी भरला
आणि तिला लायब्ररीत घेऊन आले. तेंव्हा नेमका समीर तिथेच एका मुलाबरोबर बोलत उभा
होता. त्याने आकांक्षाला पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी
तिच्या डोळ्यांतलं पाणी बघून तो काळजीत पडला. मग त्याने तिच्या पायाकडं बघितलं तर
अंगठ्याला पट्टी बांधलेली होती. तिचा रडवलेला चेहरा बघून त्यालाही कससंस
झालं. आकांक्षाने त्याच्याकडे पाहिले आणि
खाली मान घालून आत निघून गेली.
पण समीर
मात्र खूप अस्वस्थ झाला होता. स्वत:च जाऊन विचाराव की काय झालं तिला. पण त्याला
धरी होत नव्हता. म्हणून त्याने त्याच्या एक मित्राला विचारायला सांगितलं कारण
त्याची तिच्या मैत्रिणींनिशी चांगली ओळख होती. मग त्याने तसं विचारल्यावर काय झालं
ते समीरला सांगितलं.
मग 2-3 दिवसांनी कॉलेजमध्ये दरवषीप्रमाणे
कसली तरी पूजा होती. त्याच दिवशी समीरने आकांक्षाला विचारायचं ठरवलं. म्हणून तो
त्या दिवशी संधी शोधत होता. समरी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरती एका मित्राशी बोलत
उभा होता तेवढ्यात "समीर-अजय चला खाली देवाच्या पाया पडायला.. इथे काय बोलत
उभा राहिलात." एका सिनिअर मॅडमनी त्यांना सांगितले आणि त्या निघून गेल्या. पण
समीरला खाली जायचा कंटाळा आला होता. "चल कोण जातंय खाली मला खूप कंटाळा आलाय
आता!!! नंतर जाऊया." असं म्हणून तो पुन्हा मित्राशी
बोलत तिथेच रेंगाळला. इतक्यात खाली कँपसमध्ये आकांक्षा तिच्या मैत्रिणींबरोबर
येताना दिसली. तिने आज जांभळ्या रंगाचा सलवार आणि मेहंदी रंगाचा चुडीदार घातला
होता. तिचा रंग गोरा असल्याने तो ड्रेस तिच्यावर खूपच उठून दिसत होता आणि केसांना
एक लहानशी क्लीप लावून केस मोकळे सोडले होते. एका हातात एक छानसं घड्याळ आणि एका
हातात सुंदर नाजूक कडा घातला होता. खरच आज आकांक्षा नेहमीपेक्षा खूपच सुंदर दिसत
होती. तिला पाहताच समीर खूश झाला. आणि खाली कँपसकडे निघाला. "अरे समीर कुठे
निघालास?" त्याच्या मित्राने त्याला अडवले. "अरे
खाली पूजा आहे ना, तिथे पाया पडायला चाललो आहे. चल तू पण." समीर बोलला.
"काय??? अरे आता तर तू नाही म्हणालास ना... मग अचानक
काय झालं." मित्राने विचारलं. "काही नाही रे.. असंच... चल लवकर..."
असं म्हणत तो मित्राला खेचतच खाली घेऊन गेला. देवाची आरती झाल्यानंतर आकांक्षा
पाया पडली आणि जशी मागे वळली तशी ती एकदम दचकली. मागे एका खुर्चीवर समीर आणि
त्याचे मित्र ऐटीत बसले होते आणि समीर तिच्याकडे टक लावून वेड्यासारखा पाहत होता
आणि हसत होता. आकांक्षालाही खूप अवघडल्यासारखे वाटले. कारण तिच्या पायाची जखम अजून
बरी झाली नव्हती. म्हणून ती थोडी लंगडतच चालत होती. शेवटी कशीबशी ती तिथून निघून
गेली. आता मात्र तिच्या मैत्रिणी तिला जास्तच चिडवू लागल्या. आकांक्षाही थोडी
लाजली. कारण हळूहळू समीरही तिला आवडू लागला होता. नेहमीपेक्षा आज समरी जरा जास्तच
तिच्यासमोर फिरत होता आणि सोबत त्याचे मित्रही होते. पण आज त्याच्या मित्रांची
टवाळी जरा जास्तच वाढली होती. म्हणून आकांक्षाला समीरचा थोडा रागही आला होता. जरी
आकांक्षा खोडकर असली तरी तिला आपल्याबद्दल सर्वत्र चर्चा झालेलं आवडलेलं नव्हतं.
कँपसच्या एका कट्ट्यावर आकांक्षाचा ग्रुप गप्पा मारत
बसला होता. मन मिनू म्हणाली "ए चल आता खूप टाईमपास झाला. आता लायब्ररीत जाऊन
अभ्यास करुया. चल गं अक्षु." मग लगेच मिनू आणि आकांखा लायब्ररीकडे निघाल्या.
त्यांना तिकडे जाताना समीर ने पाहिलं आणि त्याचे मित्र त्याला सांगू लागले की
"जा बोल... तिला काय ते." म्हणून समीर त्यांच्या पाठोपाठ गेला. आज पूजा असल्यामुळे लायब्ररीकडे कोणी जास्त
फिरकलही नव्हतं. समीरने दोघींना पहिल्या मजल्याच्या जिन्यावरच अडवलं. त्याला असं
अचानक बघून दोघीही दचकल्या. मग तो पुढे जाऊन उभा राहिला. आकांक्षा जवळ येताच
त्याने तिला स्माईल देत विचारलं, "हाय !! तुझे नाव काय
आहे?" अचानक या प्रश्नाने बावरल्याने ती काही उत्त्र न
देताच पुढे निघून गेली. पुन्हा समीर त्यांच्या मागून दुसऱ्या मजल्याच्या जिन्यावर
आणखी पुढे जाऊन थांबला पुन्हा त्या जवळ येताच त्याने परत विचारले, "प्लीज
थांब ना... मला काही सांगायचे आहे तुला."
"काय सांगायचे आहे?" मिनूने पुढे होऊन त्याला प्रश्न
केला. "मला तिला सांगायचं आहे, तुला नाही." समीर जरा रागानेच मिनूला
बोलला. मग मिनू जरा मागे झाली. मग पुन्हा समीर आकांक्षाकडे वळून तिला म्हणाला,
"हे बघ मला नक्की नाही माहीत की तुझ्या मनात काय आहे ते पण मला तू खूप आवडतेस.
तुझं नांव तरी नाही माहीत पण तुझा नकार नक्कीच नसेल." आणि पुढे तो आणखी काही
बोलणार इतक्यात खालच्या मजल्यावरुन कोणीतरी येण्याचा आवाज आला. तसा समीर लगेच
तिथून निघून गेला. आकांक्षा स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. थोड्या वेळासाठी काय
घडलं ते तिला कळलंच नाही.
"अगं काय झालं? तो गेला पण निघून." असं म्हणत मिनूने
तिला हलवलं. तशी ती भानावर येऊन मिनूकडे बघत होती तेंव्हा मिनू तिच्याकडे बघून हसत
होती. "काय मुहूर्त शोधला आहे गं मिस्टर मजनू ने." आणि मिनू ने
आकांक्षाला डोळा मारला. तशा दोघी हसायला लागल्या. मग दोघी लायब्ररीत आल्यावर बॅग
ठेवण्याच्या काऊंटर जवळ येऊन थांबल्या पण आकांक्षाला खरंच विश्वास बसत नव्हता की
समीरने तिला प्रपोज केलंय ते. तेवढ्यात पुन्हा समीर फोनवर बोलत अचानक तिथे आला व
हळूच तिच्या कानात "आज खूप सुंदर दिसतेस" अस म्हणून मुद्दाम
आकांक्षाच्या बाजूने निघून गेला. पण आज आकांक्षाला मात्र धक्क्यावर धक्के मिळत
होते. आता लायब्ररीत काही मन लागणार नव्हते म्हणून आकांक्षाने घरी जायचे ठरवले. पण
मनातून मात्र तिला तिथेच थांबावसं वाटत होतं. मग मिनूबरोबर खाली कँपसमध्ये आल्यावर
तिथे मुलांचा एक ग्रुप उभा होता. तिथून काही कुजबूज तिच्या कानी पडली. "अरे
विचारलं रे त्याने पण तिनेच काही उत्तर दिलं नाही." आकांक्षाने रागाने एक नजर
टाकताच सर्वजण चिडीचूप झाले. पण आता मात्र आकांक्षाला समीरचा खूपच राग आला होता.
तिला वाटलं की समीर तिची मस्करी करतोय आणि त्याचे मित्रही त्यात शामिल आहेत.
म्हणून ती जरा रागानेच मिनूबरोबर कॉलेजच्या बाहेर पडली.
थोडे पुढे जाताच तिला जाणवलं की कोणीतरी
त्यांचा पाठलाग करतंय म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर मागून थोड्या अंतराने समीर
आणि त्याचा मित्र येता आहेत. आता मात्र आकांक्षा जाम घाबरली आणि मिनूला म्हणाली,
"अगं मिनू, ते बघ. ते दोघे आपल्या मागून येत आहेत आता. ह्या बाळवटाचं लक्षण
काही चांगलं दिसत नाही."
"लक्षण
चांगलं दिसत नाहीये म्हणजे???"
मिनूने प्रश्न केला.
"म्हणजे
मी त्याला नाही म्हणणार." आकांक्षा म्हणाली.
"काय??? खरंच नाही म्हणणार की फक्त माझ्यासमोर
असे म्हणतेस??" मिनू जरा तिची मस्करी करण्याच्या
उद्देशाने म्हणाली. "गप्प बस आता चल लवकर !!!" आणि
दोघी पटापट निघून गेल्या. समीर मात्र दूरपर्यंत नजरेआड होईपर्यंत तिला पाहत उभा
राहिला.
दिवसभर आकांक्षाच्या नजरेसमोरुन सकाळचा क्षण
जात नव्हता. दिवसभर आणि रात्रभर ती समीरचाच विचार करत होती. जरी आकांक्षाच्या मनात
समीरचे विचार सुरु असले तरी तिला एका गोष्टीची भितीही वाटत होती की खरंच समीर
तिच्यावर प्रेम करतोय का? की उद्या
घरच्यांनी नकार दिला तर तो माघार घेईल? आणि जरी ती हो
म्हणाली तर पुढे तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल? असे
अनेक प्रश्न तिच्या मनात गर्दी करत होते. न राहवून तिने मिनूला कॉल केला. मिनूने
तिला समजावलं, "अश्रू तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस आणि तू पण घाईघाईने काही मनात
ठरवून ठेऊन नकोस. उद्या कॉलेजला आल्यावर बोलू आपण." आणि मिनूने फोन ठेवून
दिला.
इकडे समीरचेही काही हाल वेगळे नव्हते. मनातली
गोष्ट आकांक्षाला सांगितल्यामुळे त्याला जरा मोकळे मोकळे वाटू लागले. पण
आकांक्षाचं उत्तर काय असेल याचीही खूप काळजी त्याला वाटत होती. पण त्याला स्वत:वरच
जास्त या गोष्टीचा राग आला की तो साध तिला तिचं नावही विचारु शकला नाही. कारण इतकी
विचारपूस करुनही त्याला आकांक्षाचं नांवही कळू शकलं नव्हतं. शेवटी दुसरा दिवस
उजाडला. आकांक्षा आणि तिची मैत्रिण कॉलेजला आल्या होत्या. मग कॉलेज सुटण्याच्या
वेळेपर्यंत त्यांनी अभ्यास केला. पण आज आकांक्षाला समीर कुठे दिसलाच नाही
कॉलेजमध्ये आल्यापासून न जानो कित्येक वेळा तिच्या नजरेने त्याचा शोध घेतला असेल
पण आज त्याचा कुठे पत्ताच नव्हता.
"काय गं, आज मिस्टर मजनू कुठे दिसलाच
नाही. काल तू काही उत्तर दिलं नाही म्हणून राग आला की काय त्याला???" मिनूने मुद्दाम आकांक्षाला छेडलं.
"गप्प गं. येऊ दे राग आला तर. नाहीतरी काल कसा वागला होता तो." खोट्या
रागानेच आकांक्षा म्हणाली. पण तरी तिचे डोळे त्यालाच शोधत होते.
"काय झालं आकांक्षा तुला? अशी का वागतेस तू? का
त्याची इतकी वाट बघतेस?" असे अनेक प्रश्न आकांक्षा
स्वत:च्याच मनाला विचारत होती. मग मिनू म्हणाली की त्याच्या मित्रालाच जाऊन
विचारु. दोघी त्याच्या मित्राजवळ आल्या. मिनू, "काय काल काय चाललं तुझ्या
मित्राचं आणि तुझं?" मित्र," कुठे काय? आम्ही काय केलं." "हो का? काल आम्ही बाहेर
पडल्यानंतर तुम्ही दोघे आमचा पाठलाग का करत होतात?"
"नाही... अगं कुठे... नाही. आम्ही तर असाच बाहेर फिरत होतो." "खरं
खरं सांग. असं करताना काहीच कसं वाटत नाही रे तुम्हा मुलांना." मिनू म्हणाली.
आकांक्षा बाजूला शांत उभी होती. खरं तर तिला त्याच्या मित्राकडे बघून खूप हसायला
येत होतं पण तिने स्वत:ला आवरलं. "मी काल काही उत्तर दिलं नाही म्हणून त्याला
राग आला का?" न राहवून शेवटी मधेच आकांक्षा बोलली.
"काय तू आकांक्षा जरा शांत बस ना. लगेच काय घाई पडलीय तुला." असं म्हणून
मिनू तिला तिथून खेचतच घेऊन गेली आणि नंतर खूप ओरडली. मग तिला समजावलं की,
"अक्षु, प्लीज. लगेच अशी घाई करु नकोस. आधी नीट त्याच्याशी बोलू. मग पुढचं
पुढे बघू." "ठीक आहे." आकांक्षानेही शहाण्या मुलीसारखी मान हलवली
आणि परत दोघी अभ्यास करायला निघून गेल्या.
सोमवार उजाडला. समीर मोठ्या ऐटीत लायब्ररीत
आला. आज तो खूप खूश दिसत होता. आल्याआल्या तो आकांक्षाला शोधू लागला. बघतो तर मिनू
आणि आकांक्षा दोघी आतमध्ये अभ्यास करत बसल्या होत्या. दोघींचेही लक्ष त्याच्याकडे
नव्हते. तिला बघून त्याला जरा समाधान वाटलं. जणू त्याचा दिवस आज खूप मजेत जाणार
होता. मग त्याने त्याच्या मित्राकडे चौकशी केली तेंव्हा त्याला शनिवारच्या
गोष्टीबद्दल घडले आणि त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला. मग बाहेरुन
त्याने हळूच मिनुला इशारे करायला सुरवात केली. अचानक दोघींचाही लक्ष त्याच्याकडे
गेल. त्याचबरोबर आणखी दोन-तीन नजरही त्याच्याकडे वळल्या तसा तो गप्प बसला आणि एका
बाजूला जाऊन उभा राहिला. मग काही काम आलं म्हणून तो निघून गेला. थोड्या वेळाने परत
तो काऊंटरजवळ आला आणि पुन्हा हळूच त्याने इशारा करुन मिनुला बाहेर यायला सांगितलं.
मिनुच आता घाबरली की हा तिला का बोलावतोय म्हणून आणि ती आकांक्षाला म्हणाली,
"ए तुमच्या भानगडीत हा मला खेचतोय, जा तूच भेटून ये त्याला जा !!" आकांक्षा तिला विनवणी करु लागली,
"प्लीज मिनू. जा न बघून तर ये तो काय म्हणतोय ते." मग मिनू बाहेर गेली.
बाहेर गेल्यानंतर त्याने एक चिठ्ठी मिनुच्या हातात दिली आणि म्हणाला, "ही
चिठ्ठी तिला दे." "काय लिहलंय यात?आणि मी का
म्हणून देऊ. तूच जाऊन दे ना तिला. आणि काय रे! तुझं नांव काय
ते तरी सांग." मिनू खूप बिनधास्त होती. "प्लीज दे ना. यात माझा नंबर आहे
तिला मिस कॉल द्यायला सांग आणि त्या दिवशी तुला बोललो म्हणून राग आला असेल तर
सॉरी. पण प्लीज मला ती खूप आवडते गं. तिचं नांव काय आहे सांग ना !!!" "काय !!! नांव माहित नाही आणि प्रेम
कसलं करतोस रे, मी नाही नांव सांगणार तिचं. खर प्रेम करत असशील तर स्वत:च शोध तिचं
नांव." मिनू म्हणाली आणि लायब्ररीत निघून गेली. मग तिने ती चिठ्ठी
आकांक्षाकडे दिली. मग आकांक्षाने ती चिठ्ठी उघडली तर त्यात असं लिहीलं होतं,
".... सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर... तू नक्कीच आहेस... पण...
त्यापेक्षाही सुंदर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे... आय लव यू डिअर..." आणि
खाली त्याचा नंबर होता. आकांक्षाला काय करावं हेच सूचत नव्हतं. तिने समीरकडे
पाहिलं तर तोही तिला एकटक पहात होता. आकांक्षाचं नांव समजावं म्हणून समीरने एका
सिनिअर मॅडमना विनंती करुन बी. कॉम शेवटच्या वर्षाचे ॲडमिशन फॉर्म मागितले. त्या
दिवशी दिवसभर समीर आकांक्षाच्या मिस कॉलची वाट पहात होता. पण तिचा फोन काही आला
नाही. समीरला खूप भिती वाटू लागली की तिला राग तरी आला नसेल ना? पण मग तिने लाजून हसून का बघितलं काहीच कळत नव्हतं. ती रात्र समीरने कशी
घालवली त्यालाच माहित. एक एक क्षण त्याला एक एक वर्षासारखा भासत होता. रात्री
उशीरा झोपल्यामुळे त्याला उठायलाही उशीर झाला होता. घड्याळात 8.30 वाजले होते. घाईघाईत त्याने आवरले आणि कॉलेजला
निघाला. तो स्टेशनवर पोहोचला असेल इतक्यात त्याचा फोन वाजला. एक अनोळखी नंबर होता.
समीर, "हॅलो !!! हॅलो !!!"
समोरुन एका मुलीचा आवाज ऐकू येत होता. "समीर स्पिकींग... आपण कोण बोलताय???" "तीच जिच्याकडे तू काल लव लेटर दिलं होतंस" मिनू
म्हणाली. "तू !!!" समीरला एकदम आनंद झाला. त्याचा
स्वत:च्या कानावर विश्वासच बसेना. "खरंच तू बोलतेस का? कशी
आहेस.. सॉरी मला तुझं नांव माहित नाही पण..." त्याचं बोलणं मधेच थांबवत मिनू
म्हणाली, "एक मिनीट... किती घाई करतोस, मी ती नाहीये जी तू समजतोस."
"मग कोण बोलतेयस?" समीर गोंधळून म्हणाला. "मी
तिची मैत्रिण बोलते मिनू. थांब तिला फोन देते." आणि मिनू ने आकांक्षाकडे फोन
दिला. "हॅलो !!!" आकांक्षा म्हणाली. समीरला तिचा
आवाज ऐकून खूप आनंद झाला. "हाय, गुड मॉर्निंग, कशी आहेस?" "मी बरी आहे. गुड मॉर्निंग." ती म्हणाली. "मला तुझं
नांव माहित नाही. प्लीज सांगशील? खरं तर मला तुझ्याशी खूप
काही बोलायचं आहे. पण फोनवर नाही जमणार. जर तुझी हरकत नसेल तर कॉलेजपासून जवळच एक
हॉटेल आहे. तर आपण तिथे भेटूया का?" समीर थोडा धीर धरुन
बोलला. "अगं मिनू, तो भेटायचं आहे म्हणतोय. नाही म्हणून सांगू का? मला खूप भिती वाटतेय गं." आकांक्षाने लगेच फोनवर हात ठेवून मिनूला
सांगितलं. "अगं अशी काय तू मग जा ना भेटायला, तुला काही खावून नाही टाकणार
आहे तो." मिनू चिडून म्हणाली. "ठीक आहे. चालेल... पण मी काही जास्त वेळ
थांबणार नाही. ओके." आकांक्षाने त्याला सांगितलं. "ठीक आहे. चालेल...
काळजी घे, बाय." म्हणत समीरने फोन ठेवला. थोड्या वेळाने आकांक्षा आणि मिनू
त्या हॉटेलजवळ आल्या. हॉटेलमध्ये मस्तपैकी चहाचा सुगंध दरवळत होता. तेवढ्यात
समीरही तेथे पोहोचला पण मिनूला पाहून त्याचा हिरमोड झाला. त्याला वाटलं की ती
एकटीच येईल. मिनुला ते लगेच कळलं. "आकांक्षा मला एक काम आहे इथेच. आली मी
लगेच झेरॉक्स घेऊन तू थांब इथे." असं म्हणून मिनू तिथून लगेच निघून गेली. मग
समीर आणि आकांक्षा एका हॉटेलमध्ये गेले आणि एका टेबलावर बसले. काहीवेळ कुणीच काही
बोलत नव्हतं. मग समीरनेच सुरवात केली, "तुझं नांव?"
"आकांक्षा... आणि तुझं?" ती म्हणाली. "सुंदर
नांव आहे अगदी तुझ्यासारखं." समीर हसत म्हणाला. "माझं नांव समीर. दोन
महिन्यांपूर्वीच इथे जॉबला लागलो. वाटलं नव्हतं, आयुष्यात असाही टर्निंग पॉईंट
(वेगळे वळण लावणारा प्रसंग) येईल म्हणून." समीर अजूनही तिच्याकडे बघत होता.
आकांक्षा लाजली. "एक विचारु?" "हो... विचार
ना?" मग समीरकडे बघत तिने विचारलं, "याआधी तुझ्या
आयुष्यात कोणी होतं का?" तिच्या या प्रश्नाने समीर
क्षणभर गोंधळला. त्याला या प्रश्नाची आकांक्षाकडून अपेक्षा नव्हती. "हो...
नाही म्हणजे.... हो !!! होती एक मुलगी. दोन वर्षांपूर्वी
आमचं ब्रेकअप झालं." समीर म्हणाला. "काय??? मग
कशामुळं झालं तुमचं ब्रेकअप?" तिने प्रश्न केला.
"तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं आणि आता तिचं लग्नही झालं." समीर
म्हणाला. "मग अजूनही तुझं तिच्यावर प्रेम आहे की......" आकांक्षा
बोलता-बोलता थांबली. "आकांक्षा माझं तुझ्यावर खर प्रेम आहे. म्हणूनच तुला हे
मी सांगतोय. जरी ती माझं पहिलं प्रेम असली तरी आता ती माझ्या आयुष्यात नाहीये.
पूर्णपणे नाही पण थोडाफार तिला विसरु शकलोय मी. आज 2 वर्षांनी
मला तूच एक अशी मुलगी भेटलीस जिने मला पहिल्यांदा तिला विसरायला आणि पुन्हा
प्रेमात पडायला भाग पाडलंस." समीर म्हणाला. मग आकांक्षा बोलली, "हे
बघ समीर. मी इतर मुलींसारखी नाहीये जी फक्त स्वत:लाच मन रमवायला
4 दिवस हे अफेअरचं नाटक
करेल. खरं तर तूही मला आवडतोस आणि म्हणूनच मी तुझ्याकडे माझा जीवनासाथी म्हणून
पाहतेय. कारण तू जर माझ्या आयुष्यात येऊन पुन्हा निघून गेलास तर मला हे सहन होणार
नाही. मग मी काय करुन बसेन माझं मलाही माहित नाही." आकांक्षाकडून हे ऐकूण आता कुठे
समीरच्या जीवात जीव आला होता. तो म्हणाला, "तू काही काळजी करु नकोस. मी तुला
कधीच फसवणार नाही. त्याऐवजी मी हे करुच शकत नाही गं. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर
आणि तुला वचन देतो की शेवटपर्यंत तुला साथ देईन." हे ऐकताच आकांक्षाल खूप
आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं.
मग थोडा वेळ दोघांनी गप्पा मारल्या इतक्यात
मिनू तिथे आली. "काय??? झाल्या
गप्पा मारुन की बाकी आहेत अजून..." मिनू मुद्दाम दोघांना चिडवत म्हणाली. मग
आकांक्षा लाजून तिला म्हणाली, "हो हो झाल्या गप्पा मारुन चल आता." आणि
ती उठली आणि मिनूचा हात धरुन तिला खेचतच तिथून निघून गेली. जाता जाता तिने हळूच मागे वळून समीरकडे पाहिले.
समीर तिच्याकडेच पाहून हसत होता. मग हातानेच त्याने तिला फोन करायचा इशारा केला.
आता रोजच आकांक्षा आणि समीर एकमेकांना फोन
करत, मॅसेज करत आणि कधी जमलच तर फिरायलाही जात. पण तिला भेटल्यानंतर कधीही समीरने
त्याची मर्यादा ओलांडली नाही आणि आकांक्षाने त्याला कधी तशी परवानगी दिली
नाही. पण तरीही दोघांचं एकमेकांवर खूप
प्रेम होतं. पण अचानक एक दिवस आकांक्षाच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला आणि
तिला कळलं की काही पाहुणे तिला बघायला
येणार आहेत. ती खूपच घाबरली होती. तिने
लगेच समीरला फोन लावला. "समीर..." "हा सोना बोलतोय, बोल... कशी
आहेस? कॉलेजवरुन घरी आल्यावर तुझी
खूप आठवण येते गं. असं वाटतंय की कधी आपलं लग्न होतंय आणि तू कायमची माझ्याकडे
येतेयस." समीर मोठ्या आनंदात तिला म्हणत होता.
"समीर, मी त्यासाठीच तुला फोन केला आहे
रे. माझ्या आई-बाबांनी माझ्यासाठी एक स्थळ पाहिलंय आणि उद्याच ते मला पहायला येणार
आहेत. समीर, मला खूप भिती वाटते रे. काय करु, काहीच सूचत नाहीये मला. प्लीज,
काहीतरी कर ना रे." आकांक्षा खूप रडत होती फोनवर." हे ऐकून समीरलाही
धक्काच बसला. त्यालाही काय करावं हे कळेना. "आकांक्षा, हे तू काय बोलतेस? हे बघ तू काही काळजी करु नकोस. सगळं ठीक
होईल. तू एक काम कर. उद्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. मग आपण बघू काय करायचं
ते." समीर तिला धीर देत म्हणाला.
इतक्यात आकांक्षाने कॉल कट केला. कदाचित तिची
आई तिथे आली होती. इकडे समीर मात्र खूप टेन्श्ानमध्ये आला होता. त्याच
टेन्शनमध्ये तो आपल्या बाईक वरुन पडला आणि हाय वे वरुन जाताना त्याने तिथला
ट्रॉफिक सिग्नल तोडला. ट्राफीक पोलिसाने त्यांना आडवलं. "काय रे... जास्त
हिरोगिरी करतोस काय रे हा, समोरचा सिग्नल दिसत नाही वाटतं. चल पावतीच फाडतो तुझी.
चल फाईल काढ चल." आणि त्याने समीरकडून फाईल घेतल्या आणि त्याला सोडलं.
रात्रभर समीर तळमळत राहीला.
दुसऱ्या दिवशी आकांक्षाला पाहुणे बघायला आले
होते. बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिने सरळ सरळ आपल्या आई-बाबांना कळविला. ही
वेळ तर तिने कशीबशी निभाऊन नेली. पण पुढे काय? किती वेळा आणि किती दिवस असा नकार देत बसणार."
कॉलेजला गेल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर आकांक्षा
समीरला भेटली. "समीर, ही वेळ तर मी कशीबशी मारुन नेली पण नकार देऊन देऊन तरी
मी कुणाकुणाला देणार अशाने एक दिवस माझ्या घरच्यांना संशय येईल रे. तू काहीही कर
पण...." आकांक्षा काकुळतीला येऊन सांगत होती. समीरही तिला धीर देत होता.
शेवटी तो म्हणाला, "आकांक्षा माझ्याकडे अजून चांगली नोकरी पण नाहीये आणि न
इथे स्वत:चं घर. मी तुला मागणी तरी कशी घालू गं. तुझ्या घरचे तर मला दारात पण उभे
करणार नाहीत." "मग शोध ना चांगली नोकरी. पण जे काही करशील ते लवकर कर
नाही तर मग... तुला माहीतच आहे तुला काय होऊ शकते ते." आकांक्षा म्हणाली आणि
रडू लागली. थोड्याच दिवसांत आकांक्षाने खूप मोठी स्वप्ने पाहिली होती. पण या
स्वप्नांना इतक्या लवकर ग्रहण लागेल हे
तिला माहित नव्हतं. थोडे दिवस निभावून नेण्यासाठी तिने आपल्या आई-वडीलांना
सांगितलं की किमान तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी तिच्यासाठी स्थळ शोधू नयेत.
इकडे समीरही चांगल्या नोकरीसाठी खटपट करु लागला. आकांक्षा खूप भोळी होती. त्याला
चांगली नोकरी मिळावी आणि दोघांचं आनंदानं लग्न पार पडावं म्हणून रोज देवाकडे
प्रार्थना करु लागली. कधी नव्हे ते उपास तापास करु लागली. समीरला पाहताच त्याला
हरवण्याची भिती तिच्या मनात दाटून यायची. समीरलातिची ही अवस्था बघवत नव्हती. तिला
रडताना पाहिलं की त्याच्याही मनात कालवाकालव व्हायची.
असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस समीरने
आकांक्षाला फोन केला आणि घाईघाईने भेटायला बोलावले. आकांक्षा घाबरली की आता काय
नवीन संकट आलं म्हणून. मग ती त्याला भेटायला गेली. भेटल्यानंतर समीरचा चेहरा थोडा
गंभीर वाटत होता. आता आकांक्षा आणखीनच घाबरली. ती म्हणाली, "काय झालं समीर? इतक्या घाईघाईने मला भेटायला का बोलवलंस?
काय झालं, सांग ना लवकर..." समीर थोडा वेळ तसाच गाभीरपणे बघत
राहिला आणि म्हणाला, "आकांक्षा... मी आता इथला जॉब सोडून जातोय."
आकांक्षा उडालीच, "काय??? पण का?"
तिला खूपच भिती वाटू लागली. नको नको ते विचार तिच्या मनात येऊ लागले. "हो...
खरंय मी इथून हा जॉब सोडून जातोय कारण मला...... " आणि समीर शांत झाला.
"कारण काय समीर?..." सांग ना लवकर. असा गप्प आहेस
तू?" आणि आकांक्षा आता रडायच्या स्थितीत आली होती.
"कारण आकांक्षा मला एका मोठ्या
कंपनीत चांगला जॉब मिळालाय म्हणून." समीर म्हणाला. "काय मग तू जाणार?" आणि बोलता बोलता आकांक्षा थांबली आणि पुन्हा तो नक्की काय बोलला ते
आठवू लागली आणि लगेच तिने समीरकडे पाहिले तर तो तिच्याकडे बघून हसत होता. मग
आकांक्षा त्याला म्हणाली, "काय खरंच... तुला जॉब मिळालाय का?..." आणि आकांक्षाने त्याला मिठी मारली. आणि हलकेच त्याला मारत
म्हणाली, "समीर... मुद्दाम तू मला घाबरलंस ना रे." मग समीरनेही तिला
मिठी मारली आणि मग हळूच तिचा चेहरा आपल्या हातांनी पकडून तिच्या डोळ्यांत पहात
म्हणाला, "सॉरी... पण काय करु... ही बातमी ऐकवल्यानंतरचा तुझ्या चेहरऱ्यावरचा
आनंद मला माझ्या डोळ्यांनी पहायचा होता. आकांक्षाला आता कुठे छोटासा आशेचा किरण
दिसू लागला होता. आज कितीतरी दिवसांनी आकांक्षाच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्नता
होती. आज ती खूप खूश होती. देवाने तिचं गार्हाणं ऐकलं होतं. आता तिला विश्वासच
झाला होता की तिचं प्रेम यशस्वी व्हावं असं देवाच्याही मनात आहे. मग समीरने तिथली
नोकरी सोडली आणि तो त्या नवीन कंपनीत काम करु लागला.
इकडे आकांक्षाचीही परीक्षा जवळ आली
असल्यामुळे तिनेही अभ्यासाला सुरवात केली होती पण आता प्रेमात पडल्यामुळे मध्ये
मध्ये तिला समीरची खूप आठवण यायची. नवीन कंपनी मोठी असल्याने समीरला तिच्याशी
जास्त बोलता येत नव्हतं. रोजचं बोलणं आता कधीतरीचं बोलणं झालं आणि आकांक्षा आता
समीरवर त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम करु लागली होती. कित्येक स्वप्न ती रंगवू
लागली होती. आता समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड द्यायला ती तयार होती. पण
दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. समीरचे तिला येणारे कॉल आता खूप कमी झाले होते.
आकांक्षाने कधी मॅसेज पाठवले तर कधीतरी तो रिप्लाय देऊ लागला. सुरवातीला
आकांक्षानेही हे सगळं समजून घेतलं. नवीन कंपनीत कामाला लागल्यामुळे कदाचित त्याला
जमत नसेल असं समजून दुर्लक्ष केलं. आता तिची परीक्षाही संपली होती आणि मग लगेच
पुन्हा तिच्या घरच्यांनी स्थळ बघायला सुरवात केली. आता आकांक्षा पुन्हा अस्वस्थ
झाली होती. मग तिने समीरला हे सगळं फोन करुन सांगितलं. तर त्याने एकदम थंडपणे
रिॲक्शन दिलं. तो म्हणाला, "तू काळजी करु नकोस गं. मी करीन काहीतरी. पण
इतक्यात बोलणी करणं मला जमणार नाही. त्यासाठी मला माझ्या घरच्यांशीही बोलावं लागेल
की नाही, काय माहीत ते तयार होतील की नाहीत ते." समीर हे सगळं सहजपणे म्हणत
होता. त्याचा थंडपणा बघून आकांक्षाल खूप आश्चर्य वाटलं. "म्हणजे, तुझं म्हणणं
आहे की तुझ्या घरच्यांचाच आपल्या लग्नाबद्दल प्रॉब्लेम असेल? अरे पण तू तर म्हणाला होतास न की त्यांचं
काही ऑब्जेक्शन नसेल मग. प्लीज समीर, लवकर कर काहीतरी . माझा जीव इथे टांगणीला
लागलाय." आकांक्षा काळकुळतीला येऊन म्हणाली. "हो... मला कळतंय पण...
ओके... चल मी फोन ठेवतो. मला थोडं काम आलंय." आणि त्याने फोन ठेवूनसुध्दा
दिला. आकांक्षाला त्याच्या या वागण्याचं खूप वाईट वाटलं. पण ती एक समजूतदार मुलगी
होती. त्यामुळे तिला या लहान-लहान गोष्टींची मोठी गोष्ट करायची नव्हती. कुठल्याही
परिस्थितीत तिला तिचं नातं जपायचं होतं आणि तिचं प्रेम मिळवायचं होतं.
नवीन कंपनीत कामाला लागल्यापासून समीर खूप
बदलला होता. नेहमी आकांक्षाच्या नावाची माळ जपणारा समीर आता मात्र तिच्याशी
बोलताना मात्र तिच ऐकून घेणं कमी आणि त्याच्यावर किती मुलींचा क्रश आहे. त्याच्यावर
किती मुली फिदा आहेत हेच सांगत बसायचा. पण आकांक्षा मात्र गुपचूप सर्व ऐकून
घ्यायची. नेहमी याकडे दुर्लक्ष करायची. कॉलेजमध्ये असताना तिच्यावर इतकं प्रेम
करणारा समीर तो उरलाच नव्हता. लग्नाचा विषय काढला की नेहमी उडवा-उडवीची उत्तर
द्यायचा. फक्त त्याला कधी भेटावंस वाटलं तरच तो वेळ काढायचा ते पण फक्त 15-20 मिनिटे.
भेटल्यानंतरही त्याचं तेच पुराण सुरु असायचं. मग जाताना तो तिला तिथूनच बाय करुन
जायचा. तिला साध स्टेशनपर्यंतही तो सोडायचा नाही. आता मात्र मनातल्या मनात
आकांक्षाला खूप त्रास व्हायचा या सर्व गोष्टींचा. कधी-कधी रात्रीचीच उठून रडत
बसायची पण तिला कुठेतरी या सर्व गोष्टींची आशा होती की समीरचं अजूनही तिच्यावर
प्रेम आहे.
आकांक्षाने या सर्व गोष्टी मिनूला
सांगितल्या. मिनूलाही तिचं हे असं वागणं बघवत नव्हतं. तिलाही खूप वाईट वाटायचं
म्हणून तिने 2-3
वेळा तिला हे नातं इथेच थांबव म्हणूनही सांगितलं. पण आकांक्षाला हे
मान्य नव्हतं. एक दिवस समीर लग्नाबद्दल बोलायचं म्हणून गावी गेला. तो खरंच गावी
गेला होता की मुद्दाम खोटं बोलत होता हे त्यालाच माहित. तिकडून आल्यावर दुसऱ्याच
दिवशी त्याला कंपनीतर्फे बाहेरगावी जायची ऑफर आली होती. त्याने आकांक्षाला फोन
केला. आकांक्षा त्याच्याच फोनची वेड्यासारखी वाट पहात होती. "हॅलो,
आकांक्षा.. मी बोलतोय... समीर. कशी आहेस?" त्याने
विचारले. "ठीक आहे. तुझ्याशिवाय नाही रे करमत मला. तुला नाही का रे आठवण येत
माझी." आकांक्षा थोडी रडवेली झाली होती. "समीर, तू गांवी गेला होतास ना
आई-बाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलायला... काय झालं, काय बोलले आई बाबा !!!" ती म्हणाली. "आकांक्षा, मी बोललो आई-बाबांबरोबर त्यांना
तुझ्याबद्दल सांगितलंही, पण......" आणि मधेच थांबला. "पण काय समीर, बोल
ना..." ती काकुळतीने म्हणाली. "आकांक्षा, त्यांनी आपल्या लग्नाला नकार
दिला आणि मला घराबाहेर काढण्याची धमकीही दिली." समीर म्हणाला. "काय हे
समीर, काय म्हणतोयस तू, अरे तूच तर म्हणाला होतास ना की तुझे आई-बाबा लग्नाला नकार
देणार नाहीत. मग असं का केलं त्यांनी?" आकांक्षा फोनवर
रडत होती. इतक्या दिवसांत समीरसाठी रडून रडून आकांक्षाने स्वत:ची खूप खराब अवस्था
करुन घेतली होती. कॉलेजमधली ती खळखळून हसणारी खोडकर आकांक्षा आता उरलीच नव्हती.
आता उरली ती फक्त एक शांत, चेहऱ्यावर कसलाही तेज नसलेली आकांक्षा. मग समीर पुढे
म्हणाला की, त्याला त्याच्या कंपनीतून बाहेरगावी जाण्याची ऑफर आलीय आणि त्याला
तिकडे सक्तीने जावं लागणार होतं आणि त्याचे घरचेही आकांक्षाबाबत माहित पडल्यापासून
तिकडे जाण्यासाठी मागे लागले होते. आता आकांक्षा एकदम हतबल झाली होती. तरीही ती
थोडा धरी करुन म्हणाली की, "मग समीर, तुझं म्हणणं काय आहे?" "आकांक्षा, कसं सांगू गं आता तुला. मलासुध्दा पुढे बोलवत
नाहीये आणि काय करावं तेच सूचत नाही. याच टेन्शनमध्ये काल रात्रभर मी घराबाहेर
फिरत होतो. तूच सांग की मी काय करु? आणि कंपनीची ही ऑफर मी
नाकारु शकत नाही. कारण हे खूप महत्वाचे आहे. नाहीतर माझी नोकरी जाऊ शकते यामुळे."
मग काही क्षण कोणीच काही बोलत नाही. मग आकांक्षाने मन घट्ट केलं आणि त्याला
म्हणाली, "ठीक आहे मग समीर. मला वाटतं आपण आपलं नातं आता इथेच थांबवलेलं बर,
उगाच माझ्यामुळे तुझ्या नोकरीवर संकट नको आणि तुझ्यात आणि तुझ्या आई-वडीलांमध्ये
गैरसमजही नकोत आणि तसाही तू न सांगताच मला तुझं उत्तर कळलंय." "हे काय
म्हणतेस तू आकांक्षा. तू प्लीज, मला चुकीचं समजू नकोस. अक्षु माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. पण मी नाही
काही करु शकत गं. प्लीज, मला माफ कर. एखादा चांगला मुलगा बघून त्याच्याशी लग्न
करुन तू सुखी हो अक्षु. तो तुला माझ्याही पेक्षा जास्त प्रेम करील आणि आयुष्भर
तुझी साथ देईल." समीर म्हणाला. का कुणास ठाऊक पण आकांक्षाला आता त्याच्यावर
विश्वास उरला नव्हता. म्हणून ती त्याला म्हणाली, "समीर तू किती साथ देतोयसं.
मला जो उद्या तो जो कोणी असेल तो देईल माझी साथ. खैर तुझ्या सल्ल्याबद्दल आभारी
आहे. पुढे माझं मी पाहून घेईन काय करायचं ते आणि म्हणूनच आजचं हे आपलं शेवटचं
बोलणं असेल. इथून पुढे आपण कसलाही संपर्क ठेवायचा नाही. बरं... काळजी घे स्वत:ची,
आणि .... जमलं तर विसरुन जा मला." आणि तिने फोन कट केला. कारण कुठेतरी
आकांक्षाला पटलं होतं की हे नातं टिकावं अस फक्त तिलाच वाटत होतं. पण समीरला नाही.
समीर आता खूप बदलला होता. त्या दिवशी आकांक्षा दिवसभर आणि रात्रभर खूप रडली. तिला
थोडा तापही भरला होता. समीरलाही खूप वाईट वाटलं पण... मग तो काही दिवसांनी
बाहेरगावी निघून गेला. जाताना त्याने आकांक्षाला फोन केला पण तिने तो उचलला नाही.
असेच काही महिने निघून गेले आकांक्षाला. सगळं एकदम विसरुन जाणं कठीण होतं. म्हणून
मग तिने नोकरी करायला सुरवात केली. तरीही कधी कधी तिला समीरची खूप आठवण येत असे पण
तिने स्वत:वर खूप नियंत्रण ठेऊन स्वत:चं लक्ष दुसरीकडे गुंतवायची.
अशातच एक दिवस फेसबुकवर तिची स्वप्नीलशी ओळख
झाली आणि तिच्या आयुष्याला एक नवीन वळणं मिळालं. स्वप्नीलचा स्वभाव खूप बोलका
होता. अगदी जसा आकांक्षाचा स्वभाव कॉलेजमध्ये होता तसा. तो पुण्यात एका मोठ्या
कंपनीत चांगल्या हुद्यावर कामाला होता. त्याच्याशी बोलताना आकांक्षाला कुठेतरी जे
काही हरवलं होतं ते परत मिळाल्याची जाणीव होत होती. त्याच्याशी बोलताना तिच्या
मनात समीरची जराही आठवण येत नसे. हळू हळू आकांक्षा पुन्हा पहिल्यासारखी हसू लागली
होती. बऱ्यापैकी ती तिच्या दु:खातून सावरली होती. पण स्वप्नील आकांक्षासाठी फक्त
एक चांगला मित्र होता. पण स्वप्नीलला मात्र आकांक्षाचा स्वभाव खूप आवडायचा म्हणून
तीही त्याला आवडू लागली होती. एकदा बोलता-बोलता त्याने तिला प्रपोजही केलं. आधी हे
आकांक्षाला अजिबात आवडलं नाही म्हणून ती त्याच्यावर रागवली. पण नंतर त्याने तिची
माफी मागितल्यानंतर ती पुन्हा त्याच्याशी बोलू लागली. पण स्वप्नील मात्र मनातल्या
मनात तिच्यावर खूप प्रेम करत होता. पण ती रागवेल म्हणून त्याने पुन्हा असं बोलणं
टाळलं. तिला वाईट वाटेल अशी प्रत्येक गोष्ट करायची तो टाळायचा. तिचा अजून होकारही
मिळाला नव्हता की याने तिच्याबद्दल आपल्या घरी सांगितलं होतं. त्याच्या
घरच्यांनाही आकांक्षा खूप आवडली होती. पुण्यातच एक सुंदर घरही घेतलं होतं. कारण
त्याला विश्वास होता की कधीकधी आकांक्षाही त्याच्यावर प्रेम करेल आणि लग्नासाठी
त्याला होकार देईल.
एक दिवस त्याने आकांक्षाला सरप्राईज द्यायचं
ठरवलं आणि म्हणून तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अचानक मुंबईत येऊन तिला भेटायला
बोलावलं पण एकदम असं अचानक बोलावल्याने ती थोडी गोंधळली. तिला असं अचानक कामातून
निघणं शक्य नव्हतं. म्हणून त्याने तिथेच स्टेशनवर तिची दिवसभर वाट बघितली. मग संध्याकाळी ऑफिसमध्ये सांगून ती लवकर निघाली
आणि स्टेशनवर त्याला भेटली तर समोर स्वप्नील एका बाकावर बसला होता तिची वाट बघत.
मग आकांक्षा त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. समोर आकांक्षाला पाहून स्वप्नीलला खूप
आनंद झाला होता. आकांक्षा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली,
"स्वप्नील तू अचानक इकडे कसा रे?" "अगं, तू माझी बेस्ट फ्रेंड ना. मग तुझा वाढदिवस
मी तिकडे बसून सेलिब्रेड करु का? म्हणून तुला सरप्राईज
द्यायला आलो होतो. कसं वाटलं माझं सरप्राईज !!!!"
स्वप्नील हसून म्हणाला. ज्या गोष्टी आकांक्षाने समीरकडून अपेक्षित केल्या होत्या
त्या गोष्टी स्वप्नील करायचा. प्रत्येक लहान लहान गोष्ट... ती खूश कशी राहील याचाच
प्रयत्न तो करायचा. मग दोघे एका कॉफीशॉपमध्ये गेले आणि तिकडे दोघांनी वाढदिवस
साजरा केला. "खरंच आकांक्षा, आता असं वाटतंय की सकाळपासून मी जी तुझी वाट
पाहिली ना ती सार्थ झाली." स्वप्नील म्हणाला. "म्हणजे?" आकांक्षाने विचारले. "म्हणजे असं की किती मस्त वाढदिवस
सेलिब्रेट केला ना आपण तुझा. आणखी एक सांगू आकांक्षा तुला... जसं मी तुझी
कल्पनाशक्ती केली होती ना, तू
त्यापेक्षाही आज खूप सुंदर दिसतेस." स्वप्नील तिच्याकडे पहात म्हणाला.
आकांक्षा थोडी लाजली. मग स्वप्नील म्हणाला, "आकांक्षा मला तुला एक गोष्ट
विचारायची आहे." "काय विचारायचं आहे रे स्वप्नील... विचार ना."
आकांक्षा सहज म्हणाली. "आकांक्षा आज खरंच तुला मनापासून सांगतोय मी, मला तू
खूप आवडतेस. मला माहित आहे आधीही तू या गोष्टीपासून रागवली होतीस माझ्यावर पण
विश्वास ठेव माझ्यावर. मी इतर मुलांसारखा नाहीये गं. हे बघ... मला माहित नाही की
तुला प्रेमापासून इतकी ॲलर्जी का आहे. पण एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन तर बघ.
तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही मी.
आणि मी हे फक्त तुला इंप्रेस करण्यासाठी बोलत नाहीये. मी आधीच माझ्या घरच्यांना
तुझ्याबद्दल सांगितलंय आणि त्यांनाही तू खूप आवडली आहेस. अक्षु, मला आता तुझं
उत्तर हवंय." स्वप्नील बोलत होता आणि आकांक्षा शांतपणे सर्व ऐकत होती आणि
तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, "खरंतर माझा विश्वासच
उरला नाही प्रेमावर. भीती वाटते की आपण एखाद्यावर इतकं जीवापाड प्रेम करायचं आणि
एक दिवस खूप सारी स्वप्नं दाखवून तोच एखाद्या अनोळख्यासारखा अर्ध्या रस्त्यावर
आपला हाथ सोडून गेला तर?" "एक विचारु अक्षु? तुझ्या आयुष्यात आधी असं काही घडून गेलंय का?"
स्वप्नीलने विचारले. आकांक्षाला पुन्हा दु:ख उकरुन काढायचं नव्हतं. ती म्हणाली,
"नाही. माझ्या आयुष्यात असं काही घडलं नाही पण कित्येक उदाहरण डोळ्यांसमोर
पाहिली आहेत म्हणून भिती वाटते मला." "नाही आकांक्षा. मी असं कधीच करणार
नाही. असं करायचं असतं तर तुझा होकार मिळविण्याआधीच मी तुझ्याबद्दल माझ्या
घरच्यांशी बोललो नसतो. आणखी एक, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अक्षु. आज जितक प्रेम
करतोय ना तुझ्यावर, तितकंच कायम करत राहीन. कधीही तुला वाईट वाटेल असं कधीच करणार
नाही मी आणि हे फक्त मी नुसतं बोलत नाहीये. मी हे खरंही करुन दाखवीन."
स्वप्नील तिला विश्वासाने म्हणाला आणि तिचे डोळे पुसले. का कोण जाणे, पण
आकांक्षाला त्याच्या डोळ्यांत एक सच्चेपणा दिसला. स्वत:बद्दल अमर्याद प्रेम दिसलं.
पण तिला सहजासहजी हे सगळं स्वीकारणं सोपं नव्हतं. म्हणून तिने त्याच्याजवळ थोडा
वेळ मागितला आणि म्हणाली, "इतक्यात लग्नाची घाई नको करायला. आधी एकमेकांना
भेटून एकमेकांचे स्वभाव समजून घेतले पाहिजेत. खरंच आपण अख्ख आयुष्य एकत्र
घालवण्याइतपत खरंच इतकं घट्ट नातं, इतक घट्ट होईल का हे पाहिल्याशिवाय मी हो म्हणू
शकत नाही आणि त्यानंतर तुला माझ्या घरच्यांशी भेटावं लागेल मगच मी हो म्हणेन कारण
माझ्या घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न करायचं नाही असं ठरवलंय."
आकांक्षा म्हणाली. "ठीक आहे आकांक्षा. मला तुझे विचार खूप आवडले. कोणताही
निर्णय घेण्याआधी तू किती खोलवर त्याचा विचार करतेस न आणि हाच तुझा स्वभाव मला खूप
आवडतो कारण तू तुझ्या मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलतेस. ठीक आहे मग. मी माझ्या
घरच्यांना तुझ्या घरी येवून, तुला मागणी घालेन मग तर तयार होशील की नाही? हा तसाही माझ्यात नकार देण्यासारखं काही कारण नाहीये. मी हँडसम आहे.
चांगली नोकरी आहे आणि तुझ्यासाठी छानंसं घरही घेऊन ठेवलंय पुण्यात."
स्वप्नीलने हसत तिला विचारले. "काय? अरे पण तुला काय
माहित मी तुला हो बोलेन की नाही ते?" तिने प्रश्न केला.
"अगं माझं खरं प्रेमच मला सांगत होतं की आज ना उद्या तू मला हो म्हणशील
म्हणून. पण त्याआधी मी असाच तुला अधूनमधून भेटायला येत जाईन, चालेल ना."
स्वप्नील हसत म्हणाला. आकांक्षाने मान हलवून त्याला हो म्हटलं. मग आकांक्षा
स्वप्नील बरोबर त्याची पुण्याची ट्रेन येईपर्यंत बोलत उभी राहिली. मग स्वप्नीलनेच
तिला उशीर होईल म्हणून परत घरी जायला सांगितले. पुण्याला गेल्यानंतर स्वप्नीलने
घडलेली सगळी घटना आपल्या आई-बाबांना सांगितली. त्याच्या आई-बाबांना फार आनंद झाला.
त्यानंतर स्वप्नील अधूनमधून तिला मुंबईत भेटायला येत राहिला. दोघांनी एकमेकांना
समजून घेतले. त्याला भेटल्यानंतर आकांक्षाला जाणीव झाली की ह्यावेळी स्वप्नीलची
निवड योग्य आहे. कारण हा तिचा नक्कीच चुकीचा निर्णय नाहीये. त्यानंतर आकांक्षाने
त्याला आपला होकार कळविला मग काही
दिवसानंतर स्वप्नीलने सहपरिवार आकांक्षाच्या घरी जाऊन तिला मागणी
घातली. तिच्या घरच्यांना स्वप्नीलचं स्थळ
आवडलं. मग एका छानशा मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात दोघांच लग्न पार पडलं.
या लग्नामुळे आकांक्षा खूप खूश होती. कारण
ज्या ज्या अपेक्षा तिने समीरकडून केल्या होत्या त्या सर्व गोष्टी स्वप्नील तिच्या
नकळत करत असे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या व्यस्त असलेल्या वेळापत्रकामधून
वेळात वेळ काढून तो तिला भेटायला येत असे आणि ते ही कोणतही कारण न देता आणि हे
फक्त त्याने त्यावेळीच केलं नाही. तर लग्नानंतरही त्याचं तितकंच प्रेम आकांक्षावर
होतं आणि आताही तो कसं का होईना पण थोडातरी वेळ तिच्यासाठी काढतच असे आणि म्हणूनच
आकांक्षाही हळूहळू त्याच्यावर प्रेम करु लागली होती. आता फक्त तिच्या या सुखी
संसारावर तिच्या भूतकाळाची सावली पडू नये आणि स्वप्नील तिच्यापासून दूर जावू नये म्हणून तिने त्याला आपल्या भूतकाळाबद्दल सांगणं
टाळलं. कारण तिच्या नजरेत आता समीरबद्दल तिळमात्रेही प्रेम उरलं नव्हतं. म्हणून
तिने त्या कडू आठवणी आपल्या आयुष्यातून कायमच्या काढून टाकायच्या ठरवल्या."
हाच विचार करत असताना अचानक आकांक्षाला मागून कुणीतरी मिठी मारली. तशी स्वप्नातून भानावर येत आकांक्षाने उठून
मागे वळून पाहिलं तर समोर स्वप्नील उभा होता. त्याला पाहून आकांक्षाला आश्चर्य आणि
आनंद दोन्ही झाला होता. "स्वप्नील, तू इथे अचानक कसा?" आश्चर्याने तिने स्वप्नीलला विचारले.
"बायको !!! तुझ्यावरचं
प्रेमच मला इथेपर्यंत खेचून घेऊन आलं म्हणून आलो." स्वप्नील तिच्या खांद्यावर
हात ठेवत म्हणाला. "गप्प बस... मस्करी करु नकोस रे. सांग ना, तू इथे कसा?
तुझी महत्वाची मिटींग होती न मग?" पुन्हा
तिने विचारलं. "अगं होती पण मधेच ती कँसल झाली मग म्हटलं चला इकडेच येऊन तुला
सरप्राईज देऊयात. खरं तर मी तुलाच फोन करुन सांगणार होतो म्हणून तुझा नंबर लावत
होतो तर तुझा नंबरच लागत नव्हता. म्हणून मी प्रियाला फोन केला तर ती म्हणाली की तू
खूप दु:खी आहेस म्हणून. तू अचाकच इकडे येऊन तिला सरप्राईज दे. म्हणून आलो..."
"मला सकाळीच जिजूंचा कॉल आला होता. मी तुला सकाळीच सांगणार होते. पण मॅडम
तुम्ही तर उदास होता ना. म्हणून म्हटलं जीजूंनाच इथे बोलवून घेऊयात." प्रिया
हसत म्हणाली. आकांक्षा तिच्याकडे पाहून हसली मग प्रिया म्हणाली, "बघितलं का
स्वप्नील जीजू, हिचे गाल कसे लाजून लाल झालेत ते. चल मी तर जाते बाबा इथून. उगाच
कबाब मध्ये हड्डी कशाला." आणि आकांक्षाला डोळा मारुन प्रिया तिथून निघून
गेली. दोघेही तिच्याकडे पाहून हसत होते. मग स्वप्नील म्हणाला, "ये यडू !!! काय झालं उदास व्हायला. पण आता
उदास व्हायचं नाही, स्वप्नील इथे असताना त्याच्या बायकोने असं उदास होणे म्हणजे माझ्यासाठी
किती लाजीरवाणं आहे हे." "नाही रे स्वप्नील. तूच तर पुन्हा हसायला
शिकवलयस मला. मग आता का उदास होईन मी." आकांक्षा त्याच्या डोळ्यांत पाहत
म्हणाली. "म्हणजे???" स्वप्नीलने तिला विचारले.
आकांक्षा त्याच्याकडे पहातच उभी राहिली. मग तिने स्वप्नीलला मिठी मारली आणि
म्हणाली, "म्हणजे !!! मी खूप नशीबवान आहे जो मला
तुझ्यासारखा जोडीदार मिळाला." "आह !!! नशीबवान तू
नाहीस, मी आहे जी मला इतकी गोड बायको मिळाली. माझं तुझ्यावर प्रेम आहे
अक्षु." आणि मग आकांक्षाने हळूच स्वप्नीलच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि दोघे
त्या समुद्राकडे काहीवेळ पाहत उभे राहिले. आज खऱ्या अर्थाने आकांक्षाला तिला हवं
असलेलं खरं प्रेम आणि प्रेम करणारा जोडीदार मिळाला होता. खूप सुंदर क्षण होता तो.
समोर सूर्यास्ताच्या वेळी ढळणारा लालसर सूर्य आणि दोन प्रेमी आपल्या गोड स्वप्नात
रंगून गेले होते.
लेखिका
: ईश्वरी
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील