बुधवार, ३१ जुलै, २०२४

1316. विठाई

     कोकणातला धुवाधार पाऊस. मी जेवण करण्याच्या गडबडीत होते. मुलगा रवी सकाळी सातलाच शाळेत गेलेला. हे बँकेसाठी साडेनऊला निघत. जाताना यांना डबा द्यायला लागे. माझे दोन्ही स्टो पेटत होते. एका स्टो वर भाजी शिजत होती. दुसऱ्यावर तवा ठेवून मी चपाती लाटून भाजत होते. एवढ्यात यांचा बाहेरून आवाज आला  
"अगं ये ये, आत ये."
मी बाहेरचा कानोसा घेतला. यांनी दरवाजा उघडला होता, आणि कुणाला तरी आत बोलवत होते. मग माझ्याकडे वळून म्हणाले  " हिच्यासाठी चहा टाक थोडा."
माझी जेवणाची घाई. त्यात यांचे म्हणणे चहा टाक." आत्ता मी चहा टाकणार नाही, माझी जेवणाची घाई चालली आहे. '
"अग... ती पावसात पूर्ण भिजली आहे. कुडकुडते बिचारी."
"कोण" असं म्हणत मी बाहेर आले. पाहते तर एक झाडू घेतलेली म्हातारी बाई बाहेर कुडकुडत होती. त्या कुडकुडणाऱ्या बाईला पाहून मला पण तिची दया आली.
" भिजलीस ग बाई तू. ये आत ये, चहा टाकते तुझ्यासाठी ' म्हणून मी स्वयंपाक घरात आले, आणि चहाचे आधन ठेवले. चहा तयार केला, आणि बरोबर एक कप बशी घेऊन मी बाहेर आले. चहा कपात ओतला आणि तिला द्यायला गेले.
" वहिनीनू, दुसरो फुटको कप देवा, तुमच्या कपातून माका देव नको, मी खालच्या जातीचा गे माय,'
मी म्हंटलं..." अगं असं आम्ही काही मानत नाही, वरची जात खालची जात असं काही नसतं. घे तू चहा '
"नको वैनीबाय, तुमच्या शेरात चलता आसात, आमच्या गावांनी असला चालचा नाय, तू आपलो फुटको कप हाड बघू '
"आता तुझ्यासाठी फुटका कप कुठून आणू? हे म्हणेपर्यंत ती कुठून तरी एक करवंटी घेऊन आली.
"ह्याच्यात घाला चाय 'ती म्हणाली.
मी तिच्या कपात चहा ओतला, आणि बरोबर दोन बटर खायला दिले.
" एवढ्या पावसात इकडे काय करतेस ग... भिजली आहे संपूर्ण ' मी म्हणाले.
"रस्ते, पानांदी झाडायचं काम माझा, गेली वीस वरसा करतय, तेंच माका थोडे पैसे गावातत. '
" बरं बरं, आत्ता माझी घाई आहे, उद्या ये अशीच चहा घ्यायला '. असं म्हणून मी घरात गेले.
दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्ता झाडायचा आवाज आला, मी अंदाजाने ओळखले. आता ती कालची बाई परत येणार, मी स्टो वर चहा ठेवला, आमच्याकडे फुटक्या कानाचा कप नव्हता आणि ती आमच्या कपातून चहा घेणार नव्हती, म्हणून मी एक चांगल्या कपाचा कान फोडला आणि तसा कप तयार ठेवला.
दारावर टकटक झाली, तसे मी दार उघडले. काल ओळख झालेलीच होती. मुलगा रवी सकाळी शाळेत गेला होता. नवरा बँकेत गेला होता, आता मी गप्पा मारायला मोकळी होते.
मी फुटक्या कानाच्या कपातून गरम गरम चहा ओतला, आणि अर्धी भाकरी सोबत दिला. तिने पटपट चहा प्यायला  आणि भाकरी पदराला बांधून घेतली.
" भाकरी बांधून घेतलीस कुणासाठी ग?
"माजी नात आसा पाच वर्षाचा, तेका...
 " घरी कोण कोण असतं ग तुझ्या?
"माझो झील आणि नात '
"आणि सून...'
सून मेली गेल्या साली, झिलाचो काय उपेग नाय, ढोल वाजवता देवळात पन आखों दिवस दारू, दारू पिऊन माका आणि नातीक मारता '
" अरेरे... काय नाव नातीचं? मी विचारलं.
" राधे, असा पाच सहा वर्षाचा.
" आणि तुझं नाव काय ग ? मी विचारायलाच विसरले '
"माका इठा म्हणटत '
हा म्हणजे विठा असणार ' मी म्हणाले.
" तुझ्या नातीला घेऊन ये एकदा, विठाई '.
"काय झ्याक हाक मारल्यात माका, विठाई. अशी हाक कोणीच मारुक नाय '
आणि विठाई रोज येऊ लागली, रस्ता झाडता झाडता आमच्या पानंदीत आली की माझा नवरा मला सांगायचा "तुझी विठाई येतेय, चहा तयार ठेव '.
एकदा मी घरात शेंगदाणे भाजत होते, तेव्हाच विठाई चहासाठी आली होती. मी तिला चहा आणि बटर घेऊन गेले.  तर म्हणाली" वैनी बाय, वास बरो येता, काय भाजतंस? माका थोडे दी गे खाऊक '
मी तिला भाजलेले शेंगदाणे दिले, तिने ते पदराच्या शेवटला बांधून घेतले. "वैनीवाय, आता रस्तो झाडताना एक एक दानो तोंडात टाकीन '.विठाई मला म्हणायची वैनी बाय, माझ्या नवऱ्यला दादा आणि माझ्या मुलाला नातू किंवा नातवा.
काजूचा मोसम सुरू झाला की, विठाई माझ्या मुलासाठी ओले काजूगर आणायची, ते काजूगर सोलताना तिचे हात कुजून जायचे. मी तिला म्हणायचे " विठाई, काजू सोलून तुझे हात कुजून गेले, तू असे सोलू नकोस त्याऐवजी मी सुरीने ते कापते,'
विठाई म्हणायची " वैनी बाय, काजूची फका सूर्यन कापूची नसतत, ती हातानं चिरुची असतांत '
रोज घरी येणारी विठाई दोन दिवस आली नाही, रस्ता झाडायला तिच्या ऐवजी एक दुसरीच बाई दिसली, तिच्याकडे मी विठाईची चौकशी केली. ती म्हणाली विठाईला ताप येतोय, घरी झोपून आहें.'
हे बँकेत निघताच मी भर उन्हात आंबेडकर नगरच्या दिशेने चालू लागले. अंदाजे दोन किलोमीटर चालल्या नंतर आंबेडकर नगर लागले. मी विठाईची चौकशी केली, आणि तिच्या झोपडीत पोहोचले. तिच्या बाजूला तिची नात बसून होती. मी राधेला विचारलं  " केव्हापासून येतोय ग ताप?
"चार दिवस झाले बाई, थंडी वाजून ताप येतोय. दोन दिवस अंगावर काढले. कालपासून अगदी जमीना तेव्हा झोपली आहे' मी विठाईच्या अंगाला हात लावून पाहिले, शरीर तापले होते. मी राधेला बरोबर घेतले आणि तिथून जवळच असणारे आमचे ओळखीचे डॉक्टर नाडकर्णी यांच्या दवाखान्यात गेले. डॉक्टर ना विनंती केली की तुम्ही आंबेडकर नगर मध्ये येऊन विठाईला तपासावे. डॉक्टर माझ्या नवऱ्याचे मित्रच. मी दवाखान्यात गेले म्हटल्यावर ते त्वरित माझ्याबरोबर आले. त्यानी विठाईला तपासले आणि मलेरियाचा संशय व्यक्त केला. आपल्या जवळील थोडी औषधे दिली दुकानातून आणायला लिहून दिली. मी राधेला घेऊन तळ्यापलीकडे असलेल्या औषध दुकानात चालत चालत गेले. तेथे ती औषधे विकत घेतली आणि परत आंबेडकर नगर मध्ये आले. राधेला औषधे कशी द्यायची हे व्यवस्थित समजावले. डॉक्टर नाडकर्णी रोज येऊन एक इंजेक्शन देणार होते. चार दिवसांनी विठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली. आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलावून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती.
" काय हे विठाई, लहान व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवणं शोभून दिसतं का?
"वैनीवाय, तुमी माका परत हाडलात, नायतर मी वर गेललंय यमाच्या राज्यात '
"अस बोलू नकोस विठाई, एकमेकांसाठी करावंच लागतं ' तू माझ्यासाठी एक कर, उद्या राधेला येताना घेऊन ये तिला मी शाळेत घालणार '
" होय वहिनी बाय तेवढा तर जरा करा, आमच्या सारख्या अडाणी रवाने नको तेका '.
मी राधेचं नाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. राधेला दोन फ्रॉक, पेटीकोट,पुस्तके, वही घेतली, राधा शिकू लागली. आमच्या तिघांच्या सुखी आनंदी संसाराला दृष्ट लागायची वेळ होती. खूप दिवसापासून माझे पती पोटात दुखण्याची तक्रार सांगत होते. त्या काळात छोट्या गावात मोठे डॉक्टर नव्हते. आधुनिक सोयी नव्हत्या. डॉक्टर पोटदुखीच्या गोळ्या देत होते, त्या गोळ्या हे घेत होते. एक दिवस सकाळी हे उठले तो त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. मी घाबरले, मुलगा माझा लहान. मी त्याला डॉक्टर नाडकर्णी कडे पाठविले, डॉक्टर आले, त्यांनी यांची परिस्थिती बघून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचे ठरवले. सिव्हिल सर्जनी अंदाज घेऊन तातडीने ऑपरेशन करायचे ठरवले. त्यांच्या अंदाजाने आठ ते 10 रक्ताच्या बाटल्यांची गरज होती. छोट्या शहरांमध्ये रक्ताच्या बाटल्या मिळणे अशक्य होते. फक्त ओळखीच्या माणसांकडून रक्तदान करून बाटल्या जमवणे एवढेच शक्य होत, माझ्या नवऱ्याचा रक्तगट क्वचित मिळणारा होता. मग त्या रक्तगटाची रक्त मिळवायला धडपड सुरू झाली. त्यांच्या बँकेतले सर्व कर्मचारी इकडे तिकडे धावत होते. कशीबशी दोन-तीन बाटल्यांची सोय झाली. अजूनही रक्ताची गरज होती. माझा रक्तगट पॉझिटिव्ह, तर यांचा निगेटिव्ह. दोन दिवस चाललेली माझी धावपळ विठाई पाहत होती.
एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलेली असताना ती दारात बसूनच राहिली. मी घरी आल्यावर ती मला विचारायला लागली  " दादाक काय झाला?'
"त्यांना रक्ताची गरज आहे, योग्य रक्त मिळालं की मग ऑपरेशन करायचं आहे '
पन रक्त गावातला खय?
"असं मिळत नाही कुणाच्यातरी अंगातून रक्त काढावे लागत '
" मग माझ्या अंगातून रक्त काढा ना, नायतर तेचो काय उपयोग आसा माका, माजो दादा बरो होऊक हवंयो '
" पण रक्तगट जमावा लागतो ना,'
" मग जमून टाका, पन बघा हा मजा रक्त तुमका चालत तर, मी खालच्या जातीचा '
"नाही ग विठाई, जातीचा वगैरे काही प्रश्न नाही. पण रक्तगट जमायला पाहिजे ना '
माझ्या मनात आले बघावा प्रयत्न करून. मी तिला सिव्हिल मध्ये घेऊन गेले. तिचा रक्तगट तपासला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या नवऱ्याचाच रक्तगट तो होता.
मी विठाईला म्हणाले " तुझं रक्त तुझ्या दादांना चालेल, तुझं रक्त थोडं घेतलं तर चालेल का?
ह्या काय इचारतास वैनीवाय, माजो जीव व्हयो तरी मी देन दादासाठी ' मी आवेगाने तिचा हात पकडला,
"नको ग विठाई, तुझा जीव नको फक्त थोडा रक्त हवं '.
डॉक्टरनी तिच्या शरीरातून तीन चार बाटल्या काढल्या आणि त्या माझ्या नवऱ्याला चढवल्या. आपल्या शरीरातून रक्त काढत असताना विठाई मोठ्या कौतुकाने बघत होती. आणि त्या बाटल्या आपल्या दादासाठी म्हणून तिला मोठा आनंद झाला. राधा शाळेत जात होती, आपल्या आजीकडे पण लक्ष देत होती. विठाईचे रस्ता झाडणे सुरु होते. माझ्या नवऱ्याची मग कोल्हापूरला बदली झाली. मी तिला आम्ही आता कोल्हापुरात जाणार असे सांगितले. "जावा वैनीवाय, नातवाचो मोठो अभ्यास असतलो, भायर गेल्या शिवाय दादा मोठो होऊचो नाय ' डोळे पुसत विठाई बोलत होती. आम्ही जाणार. त्या दिवशी विठाई पहाटेपासून हजर होती, आमच्या ट्रक चा रस्ता परत परत झाडत होती. कोणी विचारले, तर म्हणत होती 
"माजी वैनीवाय, दादा आणि नातू या रस्त्याने जातले, तेंच्या साठी झाडून ठेवताय '. शेवटी आम्ही निघालोच,
रस्त्याच्या पलीकडे विठाई पदराने डोळे पुसत उभी होती, राधा उभी  होती. मी तिच्याकडे गेले, आणि तिला मिठीच मारली, 
"विठाई, तुला विसरणं शक्य नाही, मी परत येईन तेव्हा तुला आमच्याकडे घेऊन जाईन''
    आमचा ट्रक सुटला, लांब लांब हात हलवणारी विठाई लहान लहान होत गेली. आम्ही कोल्हापुरात आलो, रवीचं कॉलेज सुरू झालं, यांना बँकेत प्रमोशन मिळालं, आता जास्त जबाबदारी आल्या. मी विठाईला परत येईन म्हटलं, तरी मला ते शक्य झालं नाही. पण आता राधा पत्र लिहीत होती. मी पण तिला कार्ड लिहून विठाईची चौकशी करत होते. राधा एसएससी झाली, आणि तिने डीएड ला ऍडमिशन घेतल्याचे कळले, परत विठाई एकटी झाली, दिवस भराभर जात होते, आमचा रवी ग्रॅज्युएट होऊन इन्शुरन्स कंपनीत नोकरीला लागला. त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी त्याने लग्न ठरवलं. आमची लग्नाची घाई सुरू झाली, या लग्नाला मात्र  विठाईला आणायचेच असे मी मनोमन ठरविले. पत्रिका छापून झाल्या, मी यांना म्हटले, एकदा जाऊन विठाई ला घेऊन या. हे गाडी घेऊन मुद्दाम विठाईला आणायला गेले, एक रात्र आपल्या मित्राकडे राहून दुसऱ्या दिवशी परत आले. मी विठाईची वाट बघत होते. पण हे एकटेच आले. मी विठाईची चौकशी केली, तेंव्हा हें म्हणाले "ती फार आजारी आहें, अंथरुणाला खिळून आहें, राधा अधून मधून येते, पण तिचे शेवटचे दिवस राहिलेत. तशाही अवस्थेत तिने मला ओळखले, आणि हें माझ्या हातावर ठेवले "
माझ्या नातवा साठी 'असं म्हणून रडू लागली, मी त्या वस्तूकडे पाहिले. ते चांदीचे निरंजन होते, हें तिला कोणी दिले, हें मला कळेना. मी ठरवले... लग्न झाले, की जाऊन यायचे, शेवटचं डोळे भरून विठाई ला पाहयचे. लग्न झाले, पाठोपाठ सत्यनारायण झाला, मग रवी आणि कविता पांचगणीला गेले, ते शनिवारी येणार होते, मी यांना सांगितलं होतं. रवी आला, म्हणजे आपण त्याला आणि कविताला घेऊन विठाईला नमस्कार करून येऊया. शनिवारी राधेचे कार्ड आले. विठाई गेली. नातवंडाच्या लग्नाची तारीख विचारत होत., लग्न झाले असणार. ते तिला कळले आणि दुसऱ्या दिवशी ती गेली.
आमच्या संस्थान च्या राजाने लग्नाच्या पंचवीस वर्षे झाली म्हणून सर्व आंबेडकर नगर मध्ये चांदीचा रुपया वाटलं हो, विठाईने मला पाठवून त्याचे निरंजन करुंन ठेवले. नातवंडाच्या (रवी) च्या लग्नासाठी. तेंच निरंजन दादा आले, तेंव्हा तिने रवी साठी पाठविले'
माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलंय होत्या. शेवटी माझी विठाई मला भेटली नाहीच. मी माझ्या संसारात एवढी मग्न झाले की माझ्या नवऱ्याला रक्त देणाऱ्या विठाईला विसरले. खूप दिवसांनी मी सावरले. आता रोज संध्याकाळी ते चांदीचे निरंजन मी देवाकडे लावते, तेव्हा विठाई मला भेटल्याचे समाधान मिळते.
 
लेखक -प्रदीप केळूसकर. 9422381299/9307521152

1315. एका अबोलीची गोष्ट

 का गं ! खिडकी बंद केलीस?
सुयोगने संपदाला विचारलं तसं त्यांच्या तीन वर्षांच्या गोंडस सईला त्याच्या मांडीवर ठेवत संपदा तिला रागे भरली. "टेरेसमध्ये जायचं नाही. कित्तीदा सांगितलंय मनू तुला? का हट्टीपणा करतेस !"
मम्माचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून इटुकल्या सईला रडू आलं. तिने चांगलाच सूर लावला. तसं सुयोगने तिचे चिमुकले डोळे पुसले. "सई,चल आपण घोडा घोडा करुया" असं सुयोगने म्हणताच सई खूष झाली व ओणवा राहिलेल्या सुयोगच्या पाठीवर बसली. टबडक टबडक टबडक टबडक करत त्यांचा घोडा चालू लागला. हॉलला दोन फेरे मारताच बाबाघोड्याची ढोपरं दुखू लागली. तसं मग त्यांनी भातुकलीचा थाट मांडला. एव्हाना मम्माचा राग ओसरला होता. मम्माने सईला भातुकलीसाठी सुकी फळं दिली. तिचे आवडते खारट पिस्ताही दिले. "हे बग बाबा येवला मोत्ता खाऊ दिला मम्माने" असं म्हणत सईने तिची इवलुशी खाऊनी भरलेली ओंजळ बाबाला दाखवली. तो खाऊ नीट छोट्या डब्यात ठेवून त्यांची स्वैंपाकाला सुरुवात झाली. अगदी आजीबाईसारखं बसून सईने खोटूखोटूचा वरणभात केला. आईबाबांना पानं वाढली. स्वतःला घेतलं. ते झाल्यावर खोटुखोटूचं आईसक्रीमपण दिलं. मम्माला तर दोन स्कुप दिले तिने. मम्माने सईची पप्पी घेतली. मग टिव्ही पहात खरोखरची जेवणं आवरली. संपदा ओटा वगैरे आवरेस्तोवर सुयोगने सईला खांद्यावर घेऊन जुनी गाणी म्हणत निजवलं. सुयोग गाणी गायला लागला की सईही त्याच्या मानेवर डोकं ठेवून सूर लावायची. हळूहळू तिचा सूर विरत जायचा. चिमुकले डोळे निद्रादेवीच्या अधीन व्हायचे. सई निजली तशी सुयोगने तिला बेडवर कडेला निजवलं व स्वतः हेडफोन लावून गाणी ऐकत बसला. फ्रेश होऊन संपदा बेडरुममध्ये आली व सईला तिने जवळ घेतलं. तिच्या भुरभुरीत केसांवर हात फिरवत तिला म्हणाली,"सॉरी बेटा." सुयोगने संपदाच्या पाठीवर हलकेच हात ठेवला,"का गं मगाशी का लाल झालेलीस? बाकी मला सवय आहे गं तुझ्या रागाची पण पिल्लुला नाही नं."  सुयोग म्हणाला.
"अरे वेडी आहे का मी उगाचच रागवायला!"
"मी असं कुठं म्हंटलं?"
"ऐक जरा नीट. त्या समोरच्या बिल्डींगमधल्या आपल्या समोरचा फ्लेट बंद होता नं त्यात आठवडा झाला एक जोडपं रहायला आलंय."
"बरं मग."
" आपली मनू टेरेसमध्ये खेळत असते ना तर त्या समोरच्या घरातली बाई..जेमतेम चाळीशीची असावी. ती सारखी एक टक मनूकडे बघतच रहाते. मधूनच हसते. मनूला हात दाखवते. मी पहिलंपहिलं बोलायचा प्रयत्न केला तिच्याशी तर डोळे वेगळेच फिरवले तिने व खाली बघू लागली. मी घरात आले की परत तिचं मनूला बोलावणं,तिला हात दाखवणं सुरु. मनूही हल्ली तिला टाटा करते. मला ती बाई जरा विचित्र वाटते रे. उगा नजर
लागायला नको माझ्या पिल्लूला. मला भिती वाटते."
"अगं,चांगली पोस्ट ग्रेज्युएट आहेस तू आणि काय हे नजर वगैरेवर विश्वास ठेवतेस!"
"तुला नाही कळणार. तू गप्प झोप बरं."
"असा कसा झोपू तुला मिठीत घेतल्याशिवाय!" असं म्हणत सुयोगने संपदाला मिठीत घेतलं. 
दुसऱ्या दिवशी रविवार होता. जरा उशिराच उठणं झालं. संपदा न्हाऊन टेरेसमध्ये गेली व तुळशीला हळदीकुंकू वाहू लागली. नकळत तिची नजर समोरच्या टेरेसमध्ये गेली. टेरेसमध्ये आरामखुर्चीत ती बाई बसली होती व तिचा नवरा तिला चहा देत होता. संपदाने निरखून पाहिलं. तिचा नवरा कपातला चहा बशीत ओतून फुंकर मारून गार करत होता व तिच्या ओठांना लावत होता. तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता पण ती बाई ढिम्म होती.  रोज संपदाचं न्हाणं सुयोग ऑफिसला गेल्यावर व्हायचं त्यामुळे तिने हे सारं पाहिलं नव्हतं. तिला वाटलं नक्कीच ही बाई मंद असावी. अरेरे! पण या माणसाने तिच्याशी लग्न का केलं असेल? का ती लग्नानंतर अशी झाली असेल? अनेक विचार संपदाच्या मनात येऊ लागले तितक्यात सईच्या रडण्याचा आवाज आला तशी ती घाईघाईत बेडरुममध्ये आली. तिने सईला उचलून मांडीवर घेतलं व तिला पाजलं तशी सई शांत झाली. तिला परत गाई आली. आत्ता संपदा उठणार व कामाला जाणार तोच सुयोगने त्याच्या पिळदार बाहुपाशात तिला जखडलं. 
"अरे आंघोळ केलेय मी. पुरे तुझा खोडकरपणा" म्हणत संपदाने लटक्या रागाने त्याला बाजूला सारलं. सुयोग तिच्या ओलेत्या केसांतून पडलेल्या जलबिंदूंनी शहारला. शिकेकाईचा मंद सुगंध तिच्या केसांतून येत होता जो सुयोगला नेहमीच वेडं करायचा. संपदाने सुयोगला बळेबळेच बाथरुममध्ये ढकललं व कांदेपोहे बनवू लागली. कांदेपोह्यांचा दरवळ घरभर पसरला. सुयोगने देवपूजा केली व नाश्ता खायला बसला. तेवढ्यात संपदाने सईला उठवलं. तिचं तोंड वगैरे धुवून तिला पोहे भरवू लागली तसं सईने मान फिरवत नन्ना म्हंटलं व टेरेसकडे बोटं दाखवू लागली तसं सई तिला डोळे मोठे करुन म्हणाली,"काल मी सांगितलं नं तुला तिथे जायचं नाही म्हणून."
पण सई हटून बसली तसं सुयोग तिला घेऊन व तिची पोह्याची प्लेट घेऊन टेरेसमध्ये गेला. सई नाश्ता करायला बसली की,  टेरेसमध्ये चिऊताई जमा व्हायच्या. सई आपल्या इवल्या इवल्या बोटांनी चिऊताईला पोहे घालू लागली व बाबा तिला छोटे छोटे घास भरवू लागला. मध्येच त्याचंही लक्ष समोरच्या टेरेसकडे गेलं. ती बाई सईला एकटक पहात होती. सुयोगलाही जरा विचित्र वाटली ती. संध्याकाळी संपदा हेअरकट करून घेण्यासाठी पार्लरमध्ये गेली. सईला छान फ्रॉक घालून सुयोग खाली असणाऱ्या बागेत घेऊन गेला. सईला लॉनवर बसायला फार आवडायचं. आजूबाजूला कण्हेरीची झाडं होती. ती पिवळी लांबडी फुलं हिरव्यागार गवतावर विखुरलेली असायची. सई इतर दादाताईंचे खेळ बघत बसायची. एखादं फुलं तिच्या ओच्यात पडलं की खुदकन हसायची. सुयोग तिथेच बाजूला बसला होता. त्याचं लक्ष बाजूच्या उंचवट्यावर गेलं. तिथं ते समोरच्या टेरेसमधलं दाम्पत्य बसलं होतं. झोका खेळण्यासाठी दोघीतिघी ताई सईला उचलून घेऊन गेल्या. सईला या तायांसोबत झोके घ्यायला फार आवडायचं. त्या तायाही तिला नीट सांभाळायच्या. सुयोगच्या काय मनात आलं ते तो त्या दाम्पत्याजवळ गेला व त्याने त्या दोघांना नमस्कार केला. त्यातल्या नवऱ्यानेही नमस्कार केला पण त्या बाईचं लक्ष नव्हतं. ती एकटीच दुर्वांत बोट हलवत बसली होती. तसं त्या माणसाने त्याची ओळख करुन दिली. तो प्रसन्न वैद्य व त्याची बायको अबोली वैद्य. प्रसन्नाने सुयोगच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह वाचली व त्याला म्हणाला," सांगतो,  उद्या दुपारी चार वाजता घरी याल आमच्या?" सुयोगने प्रसन्नाशी हात मिळवला. 
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. सुयोग व संपदा,सईला घेऊन त्या समोरच्या बिल्डींगमध्ये गेले.  दरवाजावरील पाटीवर नावं होती ,सौ. अबोली प्रसन्न वैद्य व श्री. प्रसन्न श्रीकांत वैद्य. सुयोगने डोअरबेल वाजवताच प्रसन्नने दार उघडलं.
 प्रसन्नच्या म्हाताऱ्या आईने शिरा बनवला होता. तिने स्वतः सईला शिरा भरवला. संपदाला खूप बरं वाटलं. आपल्या जवळच्या माणसाच्या घरी आल्यासारखं. सुयोगने जेंव्हा तिला या घरी जायचंय म्हणून सांगितलं होतं तेंव्हा ती प्रचंड संतापली होती पण सुयोगने बरीच आर्जवं करुन तिला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडलं होतं.
 बऱ्याच दिवसांनी ती असा मायेच्या हातांनी बनवलेला शिरा खात होती. नंतर आजीने साऱ्यांना मसाला दूध दिलं तेंव्हा तर संपदाला तिची आई तिला मसालादूध बनवून द्यायची त्या आटीव,सुगंधी मसालादुधाची आठव आली. सई आजीसोबत रुळली. 
सुयोगनेच मग धाडस करुन विचारलं,"वहिनी दिसत नाहीत त्या?"
प्रसन्न म्हणाला,"निजली आहे. झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात तेंव्हा झोपते. माझी अबोली कोकणातली. मी मामाच्या गावी सुट्टीला जायचो. अबोलीचं घर माझ्या मामाच्या घराशेजारी होतं. अगदी लहानपणापासून आम्ही एकत्र खेळायचो. आमराईत उंदडायचो,चिंचा पाडायचो. गाभुळलेल्या चिंचा पाडून देण्यासाठी अबोली माझ्याकडे हट्ट करायची. मग मीही तिच्या हट्टाला मान देऊन प्रसंगी अगदी लवचिक फांदीवर चढून तिला चिंचा काढून द्यायचो. परकराचा ओचा फाकवून ती त्या चिंचा झेलायची. खिशात तिखटमीठाची पुडी असायची. आम्ही दोघं व इतर भावंड मिळून चिंचा,कैऱ्या तिखटमीठ लावून खायचो.  माझ्या अबोलीला अबोलीची फुलं फार आवडायची. माझ्या मामाच्या परड्यात भरपूर अबोली फुलायची. आम्ही दोघं मिळून फुलं काढायचो. आंब्याच्या झाडाखाली बसून अबोली वळेसर बनवायची. हातभर लांब वळेसर झाला की मी मापून बघायचो. माझ्या मामीला,आईला व अबोलीला असे तीन भाग करायची ती वळेसराचे. तिची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. वडील पोस्टमन होते. केवळ अबोलीसाठी त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नव्हता. माझी मामी,आई दोघीही अबोलीला फार जपायच्या. तिचे लाड करायच्या.  आई तर गावी जाताना मामाच्या मुलांसोबत अबोलीलाही खणाचं परकरपोलकं घ्यायची. काय गोड दिसायची ती दोन वेण्या,त्यांत माळलेला अबोलीचा वळेसर व परकर पोलका घातलेली. शेताच्या बांधावरून धावत सुटायची. मीही तिच्या मागून धावायचो. 
मोकळ्या शेतात वारा घोंघावत असायचा. तोंड उघडं ठेवून तो वारा अंगात भरुन घ्यायचो. कधी शेतातल्या तळ्याकाठी बसायचो. बारीक खडे तळ्यात टाकायचो. त्यामुळे त्या संथ पाण्यावर उमटणारी वलयं बघत रहायचो. पांढरेशुभ्र बगळे शेतात यायचे. ते फार आवडायचे आम्हाला. आम्ही दोघं त्यांच्या जवळ जाऊ लागलो की ते क्षणार्धात उडून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसायचे. आमच्या दोघांत दोन वर्षाचाच फरक होता. मामाची मुलं मात्र सहासात वर्षाने मोठी त्यामुळे त्यांचे खेळ वेगळे होते. ती क्रिकेट खेळायची. मला मात्र अबोलीसोबत भातुकली, विटीदांडू,सारीपाट खेळायला आवडायचं.
 भातुकलीसाठी लागणारा खाऊ आम्हाला मामी,आई द्यायच्या. मी अबोलीला खोट्याखोट्या विहिरीतून पाणी शेंदून द्यायचो. अबोली मग परकराचा बोंगा एकत्र करुन खाली बसायची. सावंतवाडीची लाकडी भातुकली होती तिची. त्यात गेस नव्हता. चुल होती. बारीक काटक्या लावून अबोली चुल पेटवायची. चुलीवर आदण,  ठेवायची. त्यात धुतलेले तांदूळ वैरायची. भात शिजत आला की भात वाळायची. जात्यावर तांदूळ दळून भाकऱ्या थापायला घ्यायची. भाजी,आमटी बनवायची. मला जेवायला वाढायची. स्वतःला वाढून घ्यायची. मग तेवढी भांडी घासायची. मी पाणी शेंदून द्यायचो. मी मुंबईला यायला लागलो की अबोली खट्टू व्हायची. लवकर ये रे प्रसन्ना म्हणून सांगायची. मलाही तिचा निरोप घ्यायला जीवावर यायचं. पुढे मी नववीत गेल्यावर व्हेकेशन क्लासेसमुळे गावी जाणं बंद झालं. ते अगदी नोकरी लागल्यावर मामाकडे गेलो तेंव्हा अबोली फारच बदललेली दिसली. तिच्या डोळ्यांतला अवखळ अल्लडपणा जाऊन त्यात लज्जेचे भाव उमटले होते. माझी अबोली अंगोपांगाने अगदी बहरली होती. ती माझ्यासाठी खास स्वतः बनवलेली ताकाची कढी घेऊन आली. तिला पहाताच मी स्तंभित झालो. ही इतकी सुंदर कशी दिसायला लागली असा मला पडलेला प्रश्न तिच्या नजरेनेच वाचला व लाजून खाली मान घातली.   सुट्टीत आमच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतरण झालं. विहिरीवर ती पाणी शेंदत असताना तिला मी प्रपोज केलं. ती भांबावली व तिच्या हातातला राजू सुटला होता. तिने लाजून तिच्या दोन्ही हातांनी तिचं लज्जित मुखकमल लपवलं होतं. मीही माझ्या दोन्ही हातांनी तिचे हात बाजूला सारुन तिच्या चेहऱ्यावरची लज्जा पहात होतो. तिची नजर जमिनीला खिळली होती.  मी माझ्या तर्जनीने तिची हनुवटी वर उचलली. तिच्या अगदी जवळ गेलो. दोघांचाही श्वासोश्वास दोघांना ऐकायला येत होता. 
इतक्यात पांदणीतून 'कळशी कशी पडली गो' असा अबोलीच्या वडिलांचा आवाज ऐकू आला व आम्ही दूर झालो. मी विहिरीतल्या चिऱ्यांना धरून खाली उतरलो व कळशी काढून दिली तशी विहिरीजवळ आलेल्या अबोलीच्या नानांनी माझी पाठ थोपटली. माझ्या शिक्षणाविषयी आस्थेने चौकशी केली. मीही इंजिनिअर झाल्याचं सांगून गोदरेजमध्ये नोकरीला लागल्याचं सांगितलं व वाकून नानांच्या पाया पडलो. नानांनीही हक्काने पेढे घेऊन ये म्हणून सांगितलं. त्यादिवशी रात्री मामाची म्हैस व्यायली. दोनतीन दिवसांनी मामीने भल्या मोठ्या टोपात खरवस बनवला. मी केळीच्या पानात खरवस बांथून घेतला व अबोलीच्या घराकडे गेलो. अबोली शेणाने होवरी सारवत होती. नाना बाहेरच्या ओट्यावर सुपारी कातरत बसले होते. मी नानांच्या हातात खरवस दिला व म्हशीला रेडी झाल्याचं सांगितलं. डोळ्याच्या कोपऱ्यातून नाजूक बोटांनी जमिनीवर शेणाची वलयं काढणाऱ्या अबोलीकडे पहात होतो. नानांच्या ते लक्षात आलं. ते मिशीतल्या मिशीत हसले व त्यांनी अबोलीला माझ्यासाठी जायफळ घालून कॉफी बनवायला सांगितली. ते मग माझ्याशी आंब्याच्या उत्पादनाबद्दल वगैरे बोलत बसले. अबोली माझ्यासाठी कॉफी घेऊन आली. नाना पान खात होते ते मला बैस सांगून त्यांच्या कामाला गेले.  सारवणं जरासं वाळत आलं तसं अबोलीने करवंटीत पांढरी शेड भिजवून घेतली व तिच्या नाजूक बोटांनी ती गोलं नक्षी उमटवू लागली. कडेलाही तीन बोटांची नक्षी उमटवत जाऊ लागली तसं मी मागूनच तिला माझ्या मिठीत घेतलं. तशी ती अगदीच संकोचली. मग मीच बाजूला झालो. 
दोनेक दिवसांत नाना आमच्या मामाकडे आले. त्यांनी अबोलीसाठी माझा हात मागितला. अबोली माझ्या आईवडिलांना, मामामामीला पसंत होतीच. तिच्यात नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. लग्नाची बोलणी झाली. अवघ्या महिनाभरात आमचं लग्न झालं. लग्न अबोलीच्या खळ्यात झालं. खळ्याला छान सारवलं होतं. आंब्याच्या टाळांचा हिरवागार मांडव घातला होता. प्रवेशद्वारावर केळीचे खांब उभे केले होते. गावातलं  पारंपारिक वाजप होतं. सगळे गावकरी नानांना मानत होते. उभा गाव लग्नासाठी आला होता. जेवणात फणसाची भाजी,अळू,वरणभात,बुंदीचे लाडू ,कांदाभजी होती. सगळं गावातल्याच महिलांनी मिळून रांधलेलं. विकतचं काही नव्हतं. नानांना निरोप देताना अबोली त्यांच्या गळ्यात पडून खूप रडली तेंव्हा साऱ्या गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते. इकडे चाळीतही अबोली सगळ्यांची लाडकी झाली. माझ्या लग्नानंतर सहाएक महिन्यात माझ्या वडिलांच आकस्मिक निधन झालं. माझ्या आईला मानसिक धक्का बसला होता. मी तर आतून तुटून गेलो होतो. अबोलीने आम्हा दोघांना सावरलं,पुन्हा माणसांत आणलं. नानाही महिनाभर येऊन राहिले होते. त्यांनी खूप धीर दिला मला.  या कालखंडात आई व अबोली अधिकच जवळ आल्या. अबोलीने माझ्या आईला पुन्हा हसतंखेळतं केलं.
दोनेक वर्षांनी आम्हाला लेक झाली. बाळंतपण माझ्या आईने केलं तिचं. नाना सहा महिने इथेच येऊन वास्तव्यास होते. त्यांची शेती मामा बघत होता. खूप गोड होती आमची जाई दिसायला. तिच्या येण्याने घराला नवं चैतन्य आलं. जाईला पाय फुटले तसं नानांनी घुंगरुवाले पैंजण घातले तिला. ती एकेक पाऊल टाकत घरभर फिरायची व तिच्या पाठून नाना फिरायचे. चाळीत सगळ्यांची लाडकी होती जाई. पटकन कोणाहीकडे जायची. एकदा मी तिला हवेत  उडवून झेल घेत होतो. असं केलं की खळाळून हसायची ती पण नेमका माझा झेल,  चुकला न् होत्याचं नव्हतं झालं. जाई खाली फरशीवर पडली. मेंदूला मार लागला तिच्या.  तिथेच डोळे फिरवले तिने.  मला काही सुचत नव्हतं. मी जाईला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. अबोलीकडे पाहिलं,अबोली अचेतन झाली होती. तिच्या डोळ्यांतून पाण्याचा टिपूसही गळला नाही. आई, नाना, मी धाय मोकलून रडत होतो. माझे मामामामी आले. मामीने अबोलीला कवेत घेतलं व हंबरडा फोडला पण अबोलीच्या साऱ्या संवेदना थिजल्या होत्या. आत्ता पंधराएक वर्ष झाली या गोष्टीला. अबोलीला माणसात आणण्यासाठी नामवंत डॉक्टर केले. हळूहळू सुधारतेय ती पण हवी तशी नाही. लहान मुलांना पाहून तिच्यात बदल घडेल म्हणून बागेत घेऊन जायचो पण छे! कंपनीने मला घरुन काम करण्याची परवानगी दिली कारण अबोली स्वतःच्या जीवाचीही निगराणी करेनासी झाली होती. तिला न्हाऊमाखू घालणं,तिची वेणी घालणं,सगळं मी करतो. बऱ्याच नातेवाईकांनी, प्रत्यक्ष नानांनीही परत लग्न करण्याचा सल्ला दिला. अबोलीला घेऊन जातो म्हणाले पण मी स्पष्ट नकार दिला. मरेपर्यंत अबोलीची सेवा करेन म्हणालो. 
आमची चाळ बिल्डरने विकत घेतली तसं इथं रहायला आलो. हा टेरेस फार आवडतो अबोलीला. तुमच्या छोटीला पाहून कधी नव्हे ते अबोलीच्या मुखावर हसू उमटलं तब्बल पंधरा वर्षांनी. याला कारण आहे हा फोटो" असं म्हणत प्रसन्नने एका कोरीव पेटीतला फोटो आम्हाला दाखवला. त्यांच्या जाईचा फोटो अगदी हुबेहूब आमच्या सईसारखा. आम्ही दोघं क्षणभर चकीत झालो. वातावरणात एक शांतता पसरली. संपदा अचानक उठली व त्यांच्या बेडरुममध्ये गेली. बेडवर अबोली झोपली होती. तिच्या केसांत हात फिरवत म्हणाली,"खूप सोसलंस अबोलीताई. मला माफ कर. मी तुला चुकीचं समजत होते. तुला यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही तिघंही मदत करु." 
दुसऱ्या दिवशी सुयोग व संपदाने प्रसन्नासोबत अबोलीवर उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ञांची भेट घेतली. डॉ. कांबळे यांनी सुयोग व संपदाला सांगितलं की यात रिस्क आहे. कदाचित अबोली तुमच्या सईला तिची जाई समजेल व तुम्हाला परत देणार नाही पण संपदाने आत्ता पाऊल उचललं होतं अबोलीला माणसात आणायचं. रोज संपदा कामं आवरली की तासभर जाईला वैद्यांच्या घरी नेऊ लागली. आजी सईसाठी लाडू ,चिवडा करुन ठेवायची. सई त्यांच्या घरभर फिरायची. अवचित जाऊन अबोलीच्या मांडीवर बसायची. तिच्या गालांना,ओठांना हात लावायची. हजारोंच्या औषधांनी जे साध्य झालं नाही ते सईच्या इवल्याशा हातांच्या मायेने साध्य होत होतं. 
     एकदा सई आपला टेडी घेऊन आली होती. वरती पलंगावर  उभी राहून ती तो खाली फेकत होती परत उचलून वरती चढत होती परत फेकत होती. भिंतीपाशी बसलेली अबोली हे सारं बघत होती आणि अचानक ती धावत आली व तिने टेडीला उचललं. माझं बाळं..माझी जाई ग..कुठे गेलीस मला सोडून असा आक्रोश करुन रडू लागली. तिचा आक्रोश पाहून सई भेदरली. तिला आजीने उचलून घेतलं व टेरेसमध्ये न्हेलं. संपदाच्या मांडीलर डोकं ठेवून अबोली लहान बाळासारखं रडत होती..कित्येक वर्ष कोंडलेले अश्रु बाहेर पडत होते. डॉ.कांबळ्यांना  हे सांगितलं तेंव्हा ते फार खूष झाले व क्रेडिट गोज टू संपदा मेडम असं म्हणाले. त्यानंतरही संपदा रोज जाईला वैद्यांकडे घेऊन जात राहिली. वर्षभरातअबोली माणसात आली. स्वत:ची कामं स्वतः करु लागली. त्यानंतर वर्षभरात घरातली कामंही करु लागली. नुकतच त्या जोडप्याने अनाथालयातून एका दोन वर्षाच्या मुलाला दत्तक घेतलं. सईला दादा मिळाला. अबोलीच्या मायेमुळे तो थोड्याच दिवसांत तिला हक्काने आई म्हणू लागला. नाना आत्ता अबोलीकडेच रहायला आले. सईला व तिचा छोटू दादा जयेशला ते बागेत घेऊन जातात ,झोपाळ्यावर ,घसरगुंडीवर खेळवतात. अबोली व जाई छान मैत्रिणी झाल्याहेत.  हे सारं पाहून प्रसन्नाची आई आनंदाने डोळे टिपते.

सौ.गीता गजानन गरुड.
कथाविश्व - आपले छान मराठी कथांचे,  विश्व🎉

1314. कोल्ड कॉफी

 आज जवळपास पंधरा वर्षांनी ती दिसली होती त्याला ! त्याच्या मनावर अधिराज्य गाजवणारी  त्याची स्वप्नसुंदरी ! पण आज पंधरा वर्षांनी ही त्याने तिला अचूक ओळखले होते. तोच कमनीय बांधा ज्यामुळे ती चालताना तिच्या लयबध्द हालचालीवर नजर खिळून रहायची. तोच चेहरा ज्याकडे पाहून त्याच्या काळजात थंडावा पसरायचा. तेच गालातल्या गालात हसणं ज्याकडे पाहून तो वेडा व्हायचा. अन् तोच सावळा रंग ज्याची त्याला भुरळ पडायची. तेच कुरळे केस जे तिच्या कपाळावर नागमोडी वळणे घेत तिच्या गालांवर रुळत.तेच काळेभोर गहिरे डोळे ज्यात तो स्वतःला विसरून जात असे. वयाची थोडीफार चाहूल तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. ती वगळता तिच्यात काडीचाही बदल झाला नव्हता. तिचे लक्ष नव्हतेच गेले त्याच्याकडे..त्यानेच मग हाक मारली, 
"मयु."
ही हाक ऐकताच तिने पटकन मागे वळून बघितले. त्याला पहाताच तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंदलहरी उमटल्या.
उत्स्फूर्तपणे ती म्हणाली,
"अय्या तू! इतक्या वर्षांनी"!
"ओळखलेस मयु मला? आठवण आहे म्हणायची माझी"!
"म्हणजे? तुला काय वाटले मी तुला विसरले"?
"सांगून तर तसेच गेली होतीस ना की मला विसरुन जा. यापुढे पुन्हा कधीच भेटू नकोस.".
"पण तू आजही कुठे विसरला आहेस मला? पहाता क्षणी ओळखलेस की इतक्या वर्षांनी ही"!
"आपल्या जीवाला कधी कोण विसरु शकते का? माझा जीव तेव्हा तुझ्यात किती गुंतला होता ते चांगलेच माहीत आहे तुला ".
"हेच तुझे स्वतःला  प्रेमात झोकून देणे मला नको होते. माझ्या प्रेमात तू स्वतःचे अस्तित्व विसरत चालला होतास. तुझे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करु शकले नसते सुमित" !
"उलट तुझ्या सोबतीने वेगळा परिणाम झाला असता मयु. तू सोबत असतीस तर आज मी हिमालयाएवढी उंची गाठली असती."
"माझ्यामुळे तुझे आयुष्य बर्बाद झाले हे जगाकडून ऐकून घ्यायचे नव्हते मला सुमित. म्हणून काळजावर दगड ठेवून मी तो निर्णय घेतला होता.".
"मग आज त्या जगात तू तरी आनंदात आहेस ना मयु, ज्या जगासाठी तू मला दूर केलेस !" 
"चार दिवसांनी तू मला विसरुन जाशील, आपले मन अभ्यासात रमवशील असे वाटले होते मला. आणि तसे झाले ही होते. मी जरी हे शहर सोडून गेले होते तरीही तुझी सगळी चौकशी करत होते मी"."अस्सं? मग मला नोकरी मिळाली तेव्हा का आली नाहीस? तुझी इच्छा तर पूर्ण झाली होती ना! मी माझे शिक्षण पूर्ण करुन चांगली नोकरी ही पटकावली होती."
"हो, पण इतक्या वर्षांत तू मला विसरून गेला असशील असे वाटले मला. कारण तू परत कधीच माझ्याकडे आला नाहीस".
"हे बरे आहे मयु. आधी शपथा घालून तुझ्याजवळ कधीच यायचे नाही असे वदवून घ्यायचे आणि वरुन असे बोलायचे."
"खूप वाट पाहिली मी तुझी.मला वाटले होते तू नक्की येशील परतून तुझ्या मयुकडे. कारण मयु तुझा श्वास आहे हे मी जाणले होते. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तुझ्या परतून येण्याची आशा अंधुक झाली. मी तुझी वाट पहाणे सोडून दिले".
"मयु, तुला दिलेली शपथ मोडावी असे अनेकदा मनात आले. मन खूपदा बंड करुन उठले पण मग प्रेमाला काय अर्थ राहिला असता? मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले होते मयु."
"हं... आता यावर बोलून काय उपयोग? चल काॅफी घेऊया."
समोरच्या काॅफीशाॅप मध्ये दोघे शिरले. समोरासमोर बसल्यावर सुमितने  दोन कोल्डकाॅफीची ऑर्डर दिली.
"माझी आवड आजही  लक्षात आहे तुझ्या"? यावर सुमितने तिच्याकडे पाहून फक्त स्मित केले.
त्याच्या बोटातील अंगठी पाहून तिने विचारले,"काय नाव आहे बायकोचे? बघू फोटो"!
त्याने  हसून पाकीट उघडले आणि तिच्यासमोर फोटो धरला. फोटो पाहून तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
"म्हणजे सुमित तू आजही..."
सुमित ने मान हलवली.
 ते पाहून मयु म्हणाली," माफ कर मला सुमित ! तुझे तारुण्य मी वाया घालवले."
"मयु, असे बोलू नकोस गं. तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं मी. तू माझ्यापासून दूर असलीस म्हणून काय झाले ! ते फक्त शारीरिक आकर्षण नव्हते. तुला वाटले होते की शरीराच्या आकर्षणामुळे मी वाहवत जाईन. पण तू समजूच शकली नाहीस माझ्या प्रेमाची खोली. तुझ्या जवळ नसण्याने ही मला काहीच फरक पडला नाही मयु .कारण माझ्या अंत:र्चक्षुंनी मी तुला कायमच माझ्या हृदयात पहात होतो. तुझी निकटता कायमच अनुभवत होतो. म्हणूनच वेगळ्या जोडीदाराची गरज मला आजवर भासली नाही, इथून पुढे ही भासणार नाही."
" तुझ्या हृदयस्थ मयुचीच सोबत पत्नी म्हणून चालेल का तुला"?
"म्हणजे मयु..तू ही"?
"हो.आजही मी तुझीच वाट पहातेय सुमित !"  
पंधरा वर्षांचे निःशब्द हितगुज करत दोन वेडे आवेगाने एकमेकांच्या हातात हात गुंफून एकमेकांच्या नजरेत  हरवले होते. शेजारी कोल्ड कॉफीचे मग तसेच पडले होते ओठांनी उष्टावण्याची वाट पहात.

©® सौ.हेमा पाटील
दिनांक २४/७/२४

1313. मालती

    आज मालतीला जाऊन एक महिना झाला होता, पण असा एकही दिवस जात नव्हता की ज्या दिवशी मालतीची आठवण आली नाही. आमच्या भावंडात तीच सगळ्यात मोठी. आम्ही तिला लाडाने मालू म्हणायचो. ती जितक्या लवकर सासरी गेली, तितक्याच लवकर माहेरी परत आली. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवस-रात्र हे जरी सारखे असले तरी येणारी माणसं ही मात्र सारखी नसतात,तिला सासरी खूप त्रास झाला. खटल्याच्या घरामध्ये सगळ्या लोकांचं करावं लागायचं. एखाद्या मोलकरीण सारखी ती चार वर्ष राबराब राबली. सकाळी उठल्यापासून तिच्या मागे कामांची रांग लागलेली असे.  एक संपत नाही तर दुसरं तयार. ती नेहमी म्हणायची माणूस कामाने थकत नाही, माणूस थकतो ते विचारांच्या ओझ्याने !!  घरातल्या माणसांची साथ नसेल  तर आपलंच घर आपल्याला   खायला उठत.  मालतीला घरातल्या कोणत्या लोकांपासून त्रास झाला नाही? सासू सासरे, नणंद ,दीर  आणि खुद्द तिचा नवरा. बिचारी कित्येक दिवस परिस्थिती बदलेल, परिस्थिती बदलेल असा विचार करत  दररोज एका नवीन सूर्योदयाची वाट बघत असायची , परंतु एक दिवस मात्र तिच्याच आयुष्याचा सूर्यास्त झाला. बिचारीने सहा महिने कॅन्सरची झुंज देऊन शेवटी प्राण सोडला. तिचे संपूर्ण आयुष्य फक्त लढण्यात गेल.आम्ही लहान असताना ती गरिबीशी लढली. लग्न झाल्यानंतर ती सासरच्या प्रत्येक माणसाशी लढली  आणि मरताना शेवटी कॅन्सरची लढली. आम्हा दोन लहान भावंडांचा सांभाळ करता करता तिचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले, गावाकडच्या घरातील शेतीची कामे,  आई-वडिलांचे थकलेले शरीर,  यातून तिला इच्छा असून सुद्धा शिकता आले नाही.अभ्यासात हुशार असलेली मालती  शेवटी दहावीनंतर तिचे लग्न करावे लागले. लग्नानंतर चार वर्षांनी मालती पुन्हा माहेरी आली होती, यावेळी ती आली ते परत न जाण्यासाठी.
 तिची तब्येत खूपच खराब झाली होती.तिचे आत गेलेले गाल, वजनात लक्षणीय झालेली घट आणि चिंताग्रस्त चेहरा तिला कुठल्यातरी आजाराची लक्षणे सांगत होता, तिला स्वतःलाही ही गोष्ट समजली होती की आपण कुठल्यातरी आजाराने ग्रासलो आहोत. सहा महिन्यापूर्वी तपासणीत तिला ब्लड कॅन्सर असल्यास पुढे आले. जीवन जगण्याची उम्मीद संपलेली मालती हवालदिल झाली होती.  आमच्या भावंडावर आणि आईवर असलेल तिच प्रेम  तिच्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून दिसून येत होत.  काल तिच्या दवाखान्याच्या बिलांची फाईल बघत असताना  मालतीने लिहिलेले एक पत्र मला सापडलं. ते पत्र मलाच लिहलं होतं. नोकरीनिमित्त  बाहेरगावी असल्यामुळे   मी तिला सारखं भेटू शकत नव्हतो, आपल्या भावाची पुन्हा भेट होईल की नाही याची काळजी तिला सारखी असायची. सहा  महिन्यामध्ये फक्त आमची दोनदा भेट झाली होती. तिसरा भेटीची तिला शाश्वती नव्हती.तिने लिहिलेले ते पत्र घेऊन मी वाचायला पलंगावर बसलो. क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर सहा महिन्यापूर्वीची मालती दिसायला लागली.  हॉस्पिटलच्या बेडवर मृत्यूची झुंज देत असलेली मालती  या पत्राच्या रूपाने आज माझ्यासमोर होती. वाचताना तिचा प्रत्येक  शब्द मला तिच्या आवाजात ऐकू येत होता.
प्रिय सतीश,
आपली पुन्हा भेट होईल की नाही हे सांगू शकत नाही. पण मला तुझी, आईची आणि सविताची खूप आठवण येते. माझ्या आयुष्यामध्ये  तुम्ही तिघेही खूप महत्त्वाचे आहात. तुमच्याबरोबर माझे अनेक ऋणानुबंध जुळले होते  पण आज मात्र हे मोकळे करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून कोणीही सुटले नाही त्यातून मी तरी कशी सुटणार?  आयुष्यात मी काही कमावलं असेल तर तुझ्यासारखा भाऊ, सविता सारखी बहीण आणि आई. बाकी काय गमावलं म्हणशील तर, मृत्यूच्या  दारात उभ असतांना बाकी शून्यच उरलेली असते त्यामुळे गमवणार तरी काय? आणि या शेवटच्या क्षणाला  संपूर्ण आयुष्यभर आपण किती चांगले क्षण जगलो हेच महत्त्वाचे. माझ्या आयुष्यात हेच चांगले क्षण तुम्ही तिघांनी मला दिले.
त्याच क्षणी माझे डोळे पाणावले . प्रत्यक्षात आपली बहीण मालती आपल्यासमोर उभी आहे की काय असा भास झाला. तिने लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे रूपांतर  जणू तिच्या आवाजात होऊन मी प्रत्येक्ष ऐकतोय असं वाटलं.  मालती आपल्या शेजारी बसून आपल्याला तिचे दुःख सांगते असं काही क्षण मला जाणवलं.  एका कागद वजा  पत्रा शिवाय त्या ठिकाणी मालतीच कोणतही अस्तित्व नव्हत. मी उरलेला मजकूर पुन्हा वाचायला सुरुवात केली.
प्रिय सतीश,
 माझ्या सासरच्या लोकांना दोष देऊ नको. प्रत्येक जण आपले कर्म स्वतःबरोबर घेऊन येत असतो. चांगल्या कर्माची फळे ही चांगलीच मिळतात आणि वाईट करण्याची फळे ही वाईट. त्यांना त्यांच्या कर्माची फळे बरोबर मिळतील. आज मी मृत्यूला सामोरे जात असताना सुद्धा खूप आनंदी आहे. कदाचित हेच माझ्या चांगल्या कर्माचे फळ असेल. सविताला आणि आईला कधीही अंतर देऊ नकोस. ते दोघेही त्यांचा जीव असू पर्यंत तुझ्या पाठीशी सदैव उभे राहतील. उद्या कदाचित तुझे लग्न होईल तुझाही संसार सुरू होईल पण त्या संसाराच्या चक्रात तू सविताला आणि आईला कधीही विसरू नकोस, हीच अपेक्षा. त्या दोघींचे तुझ्यावर किती प्रेम आहे हे फक्त मीच सांगू शकते. परंतु ते सांगायला मी कदाचित ह्या जीवनात नसेलही त्यामुळे या पत्रात लिहून ठेवत आहे.  माझ्याबद्दल जास्त काळजी करू नकोस. माझा प्रवास इथपर्यंतच होता. प्रत्येकाने आपल्या नशिबात आलेले भोग भोगायचे असतात मला याच समाधान मिळतं की मी माझे भोग भोगून पूर्ण केलेत.  आयुष्यात खूप मोठा हो आणि नाव कमव. माझी काळजी करू नको. 
    हे वाचून मला रडू आवरेना.  मी अगदी हुंदके देऊन रडू लागलो.  मालतीची आणि आपली शेवटची भेट होऊ शकली नाही याची खंत मला आयुष्यभर होती.  मालतीने लिहिलेलं हे  पत्र माझ्याजवळ  एक शेवटची आठवण होती.  याच पत्राच्या रूपाने मालती माझ्या सोबत आयुष्यभर राहणार होती, एक मोठी सखी बहिण म्हणून !!!  मी हळूच त्या पत्राची घडी घातली. तिला  कपाळी लावली आणि घरातल्या देव्हाऱ्यात  तिला आदरपूर्वक  ठेवले.
 आईला आणि सविताला बोलावले, त्या लिहिलेल्या पत्राला हात जोडत  मी  दोघींना म्हणालो ", आज पासून आपल्या देव्हाऱ्यात हे देवाचं फुल असणार" !!!!

- प्रकाश फासाटे.
मोरोक्को.
+212661913052.

1312. लेगसी

 विक्रांतने दारावरची कडीच वाजवली उपड्या हाताने, बेल वाजवणं न जमल्याने. चार पिशव्या होत्या त्याच्याकडे, दोन्ही हातांतून प्रत्येकी दोन अशा. दरवाजा उघडला गेला आतला. विनायकराव जाळीच्या दरवाजातून डोकावले. तोंडभरुन हसले ते, आणि बाहेरचा दरवाजाही उघडला त्यांनी. चारही पिशव्या सोफ्यावर ठेऊन. त्यांच्याच शेजारी विक्रांतने, आपल्या अंगाचं पोतंही टाकलं धाड्डकन.
"दमला असशील रे. थांब पाणी आणतो".
"बाबा गार पाणी.".
"हे घे. बरं आज तू कसा बुवा आलास? हे आठवड्याचे जिन्नस भरुन ठेवायचं काम तर विशाखाचं. कुठेयत सुनबाई?".
"विशाखा जरा...आय मीन... आज जरा...".
"ठिकेय रे... नाही जमत एखाद वेळी... ती ही कामावरुन येते... साहजिकच दमते रे ती ही... पुन्हा घरचं करणं... तुम्हा तिघांच्या तीन तर्‍हा सांभाळणं... आणि वर माझंही इथे काही अडत नाहीये ना, हे आठवड्यातून दोनदा चक्कर मारुन बघणं... फारच करते हो विशाखा... नाही का?".
"अं... हो ना... पण आता यापुढे...".
"बरं मी फक्कड चहा टाकलाय... म्हंटलं होतं विशाखा आल्यावर तिच्या बरोबरच पिऊया... आता तू आलायस तिच्या जागी... तर आपण दोघं पिऊ... विशाखाला फार आवडतो माझ्या हातचा चहा... बस हं जरा... TV लाव हवा असल्यास".
"बाबा... हात - पाय धुऊन घेतो हा जरा... विशाखाने सांगितलंय आजोबा, आजी आणि आई च्या फोटोंना... आठवणीने हार घालायला... सोमवारी घातलेले... एव्हाना सुकले असतील म्हणाली... हो हे काय... सुकायलाच आलेत... मी आणलेत नवे... घालून घेतो".
"हा चहा घे आधी... कमालच आहे पोरीची... सगळं लक्षात असतं... कसा झालाय चहा?... फर्मास जमलाय ना?... विशाखाला खूप आवडतो... तुझ्या आईलाही प्रचंड आवडायचा... संध्याकाळच्या शाळेतून ती आली की म्हणायची, मुलांपुढे ओरडून ओरडून पार गेलेला घसा... तुमच्या हातचा चहा प्यायलाकीच परततो माझ्याकडे... हा हा हा... अगदी सुर्रsss करत प्यायची ती चहा मग, बशीत ओतून".
"म्हणूनच ती आईची चहाची उष्टी बशी, तुम्ही आजही जपून ठेवलीयेत.. न धूता... बाबा आईची सतत आठवण येत असते ना तुम्हाला?... म्हणून सांगतोय चला ना बाबा आमच्याकडे... सगळे एकत्र राहू... आजोबांबरोबर रहायला मिळतंय म्हणून, मुलं ही खुश होतील".
"ए मुला... हे सोडून काहीही बोल रे... मी इथून काही हलणार नाही... अरे इथल्या प्रत्येक कोपर्‍यात तुझ्या आईचा गंध भरुन राहिलाय रे... असंच असतं आणि... तुझे आजोबा तरी कुठे आले होते रत्नागिरी सोडून इथे, तुझी आजी गेल्यावर?... आपल्या वाड्यातच राहिलेकी ते ही, अगदी जाईपर्यंत... मी ही इथेच घेणार शेवटचा श्वास, तुझ्या आईने तिच्या हाताने लावलेल्या, आवरलेल्या ह्या घरात... अरे आणि शेवटी एकत्र जगण्यापेक्षा, एकमेकांसाठी जगणं महत्वाचं नाही का?".
"बाबा... अहो आईला जाऊन आता तीन वर्ष होतील... म्हणजे गेली तीन वर्ष तुम्ही एकटे रहाताय... आधी आई होती, भले शेवटची दोन वर्ष अंथरुणावरच खिळून होती ती... पण तेव्हाही एकहाती तिचं सगळं तुम्हीच केलत अगदी हट्टाने... ना मला काही करु दिलत, ना विशाखाला... अगदी तिला आंघोळ घालण्यापासून, तिचं अंथरुण साफ करेपर्यंत सगळं... एखाद्या बाळासारखं... ते ही अतिशय मनापासून, प्रसन्नपणे... किती स्वच्छ ठेवायचात आईला, अगदी टापटीप... उदबत्ती दाखवायचात तुम्ही देव्हार्‍यातील देवांना, पण ती ठेवायचात मात्र आईच्या खोलीत... हिचं करणं हे देवाचं करण्यासारखंच आहे माझ्यासाठी, असं म्हणायचात".
"तुला माहितीये ना, तुझ्या आजोबांनीही पाच वर्ष केलं तुझ्या आजीचं सगळं... अगदी मनापासून... विना तक्रार... मी आणि ही तर तुला घेऊन, रत्नांग्रीस निघालोही होतो... तेव्हा तुझे आजोबा म्हणाले होते की, माझ्याकडून माझा हक्क हिरावू नका... हिने उभं आयुष्य वेचलंय ह्या घरासाठी, आता हिच्या उरलेल्या आयुष्यातील ह्या काही वर्षांचा सडा... मी प्राजक्तासारखा वेचून माझ्या ओंजळीत भरुन घेणार आहे... पानगळीसारखा तो झाडून, रस्त्याच्या कडेला सारणार नाहीये... मग मी आणि ही नाही गेलो तिथे... दोन महिन्यांकाठी एक चक्कर टाकत असू... चारेक दिवस राहून परतत असू... पण तेव्हाही तुझ्या आजीचं काहीही करण्यास, सक्त मनाई होती आम्हाला".
"आणि आजोबांचं तेच धोरण तुम्ही इथेही राबवलंत... आम्हाला काहीही करु न देत आईचं".
"अरे... वारसा हक्क काय फक्त पैसा - अडका, दाग - दागिने, जमिन - जुमल्यावरच सांगायचा असतो का?... तर नाही... तो सांगायचा असतो आपल्या वाडवडिलांच्या एकमेकांप्रती असलेल्या प्रेमावर, आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून घडलेल्या वर्तनावरही... आणि खरंतर ह्यावरुनच माणूस, श्रीमंत की गरीब हे ठरत असतं... नुसतं सधन असणं काय कामाचं रे?".
"बाबा... ते चांदीचं ताट - वाटी, ज्यातून तुम्ही आईला भरवायचात ते...".
"आहे की... छान जपून ठेवलंय लाॅकरमध्ये... तुला सांगतो ते ताट - वाटी खरं तर तुझ्या आजोबांनी विकत घेतलेलं तुझ्या आजीसाठी, तिच्या डोहाळजेवणावेळी... म्हणजे माझ्याहूनही दोनेक महिन्यांनी, म्हातारंच आहे बरं ते ताट... आईची हालचाल जेव्हा पारच बंद झाली, त्याच ताटातून नाना तिला भरवायचे... तब्बल पाचाहून अधिक वर्ष नानांनी, जेऊ खाऊ घातलंय आईला त्या ताटातून... जेव्हा ही आजारी पडली आणि हिचं चालणं - फिरणं बंद झालं, मी तेच चांदीचं ताट - वाटी बाहेर काढलं... मग मी सुद्धा तुझ्या आईला, त्याच ताटातून जेऊ घालत असे... नानांकडून मिळालेला हा वारसाही, मी अगदी मनापासून जपला... दोन वर्षांहून अधिक काळ".
"बाबा... तुम्हाला खरंतर सांगायचं होतं मला की... की... आता यापुढे मीच येत जाईन तुमच्याकडे... कारण विशाखाला आता शक्य नाही होणार... तिला तिच्या बँकेने सिंगापोरला जाण्याची आॅफर दिलीये, बढतीवर... बँकेची AVP म्हणून... आणि तिच्या करिअरसाठी ह्याचा, तिला खूपच फायदा होणार आहे... मी खरतंर तिला बोललो की, काहीच गरज नाहीये प्रमोशन घ्यायची... आपलं व्यवस्थित मॅनेज होतंय... पण तिला असं वाटतंय की, ही संधी हातची सोडू नये... सो... पण इट्स आॅलराईट... मी आहे ना बाबा... तुम्ही अजिबात काळजी करु नका... तुम्हाला इथेच रहायचंय ना?... रहा तुम्ही... मी दर दोन दिवसांनी चक्कर मारेन... तुम्ही खचू वगैरे नका पण".
विनायकराव काहीच न बोलता शांतपणे जागेवरुन उठले... आणि खिडकीशी जाऊन उभे राहिले. विक्रांतही मग जाऊन त्यांच्या पाठी उभा राहिला... शांतपणेच. तेवढ्यातच वरुन गेलेल्या विमानाच्या आवाजाच्या रोखाने, खिडकीबाहेर पाहिलं विनायकरावांनी. एक विमान दूर दूर जात दिसेनासं झालं.
"काय झालं विक्रांत?... बाबांना का सांगतोयस खचू वगैरे नका... का खचतील बरं बाबा?".
"अरे बाळा तू कधी आलीस?... आम्ही बाप - लेक बोलण्यात एवढे गुंतलेलो की, कळलंच नाही उघड्या राहिलेल्या दारातून... तू कधी आत येऊन पाठी उभी राहिलीस ते... सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन बरं का... खूप मोठी हो... यशस्वी हो... आणि आम्हा कोणाचीही काळजी करु नकोस अजिबात... काय रे विक्रांत?... हो ना?".
"अं... हो... म्हणजे... होच... पण... पण तू कशी इथे आलीस?... तुला उशिर होणारेय म्हणालेलीस तू, सकाळी आॅफिसला जातांना... त्या सिंगापोरला जायच्या सगळ्या फार्मॅलिटीज, तुला आजच पुर्ण करायच्या होत्या ना?".
"अॅक्चुअली येस... पण मग मला वाटलं की, तिथल्या त्या जिंजर घातलेल्या चाऊमीन नी मंचाव सुपला... बाबांच्या आलं घालून केलेल्या चहाची, थोडीच चव असणारेय... सो आय डिसायडेड टू ड्राॅप द प्लॅन, अँड आय रिफ्युज्ड द प्रमोशन अॅज वेल".
"काय?.. खरंच?... बाबा... अहो ही काय बोलतेय बघा".
"बाळा... अगं का करतेयस असं?".
"बाबा... आजोबांनी आजींना सांभाळलं... तुम्ही आईंना सांभाळलंत... मग आता जर विक्रांतने मला सांभाळलं, तरच हा वारसा जपला जाणार खर्‍याअर्थी असं आहे का?... एका सुनेनी तिच्या सासर्‍यांची काळजी घेतली, अगदी मनापासून... देन दॅट विल नाॅट बी कन्सिडर्ड अॅज अ लेगसी... इज दॅट सो?".
"तसं काही नाही गं... पण... अरे विक्रांत तू तरी निदान...".
"बाबा... विशाखा करेक्ट बोलतीये... ते चांदीचं ताट - वाटी फक्त सिम्बाॅलिक आहे, आजोबांकडून चालत आलेल्या ह्या वारशाचं प्रतिक... शेवटी कोणीतरी कोणाचीतरी मनापासून काळजी घेणं, हिच तर खरी 'लेगसी' आहे बाबा... नाही का?".
विनायकरावांनी विक्रांत - विशाखाकडे बघत, हात जोडले. विक्रांत जवळ गेला बाबांच्या, आणि त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं त्याने...तर विशाखाने विक्रांतच्या जवळ जात, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आपलं. एकत्र जगण्यापेक्षा, एकमेकांसाठी जगणं महत्वाचं... हे बाबांचं म्हणणं, आज खर्‍या अर्थाने पटलं होतं विक्रांतला. आज खर्‍या अर्थाने विक्रांत - विशाखा 'श्रीमंत' झाले होते, फक्त 'सधन' होऊन जगण्याचा मार्ग स्वखुशीने टाळत.

---सचिन देशपांडे

1311. आभाळाचं हृदय असलेला उद्योजक

      कुलकर्णी, तुम्ही आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” मी गेलो. सुभाष चुत्तर यांच्या कारखान्यात मुख्यत: Automobile Pressed Components बनवले जातात. धाड-धाड आवाज करणाऱ्या जवळ जवळ तीस-पस्तीस मोठ्या प्रेस ओळीने मांडलेल्या होत्या. मिनिटाला शेकडो components बनवणारी ती मशीन्स आज्ञाधारकपणे कामे करत होती. सगळीकडे आखीव रेखीव मांडणी. हॉस्पिटलसदृश पराकोटीची स्वच्छता. यांत्रिकी कारखान्यात अपवादाने दिसणारा नीटनेटकेपणा तेथे दिसत होता. जागोजागी गुणवत्ता, सुरक्षा आणि उत्पादकता यांचे महत्त्व सांगणारे फलक लावलेले होते. व्यवस्थापक मोठ्या उत्साहाने सर्व दाखवत होते. प्रत्येक मशीनजवळ एक कामगार होता. जाता जाता, एका कामगाराकडे लक्ष गेले. जरा वेगळा दिसणारा तो कामगार मतिमंद आहे हे लगेच जाणवले. आम्ही त्याच्या जवळ गेलो तरी त्याला आमच्या येण्याचे काही अप्रूप नव्हते. तो त्याच्या कामात मश्गुल होता. आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसे अनेक कामगार दिसू लागले. आम्ही म्हणजे ‘तळवलकर ट्र्स्ट’ची विश्वस्त मंडळी. आम्ही कारखाना पाहण्यास वेळ ठरवून आलो होतो. व्यवस्थापक आम्हाला कारखाना दाखवत होते. व्यवस्थापक एका कामगारापाशी थांबले. त्यांनी आम्हाला सांगितले, की तो त्यांच्या कारखान्यातील पहिला मतिमंद कामगार. तो गेली पंचवीस वर्षें त्यांच्याकडे नोकरी करतो. त्याने त्याच्या हिंमतीवर वन बीएचके फ्लॅट घेतला आहे. आई-वडील आणि तो एकत्र राहतात. आई-वडील म्हातारे झाले आहेत. तो त्यांची म्हातारपणाची काठी बनून राहिला आहे. आता तोच रिटायर व्हायला आलाय! पण रिटायर होणार नाही म्हणतोय. आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्स’ मोटरच्या गाड्यांच्या दरवाज्यांसाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. तेथे तर सर्वच कामगार मतिमंद होते, इतके की काही त्यांचे नावदेखील नीट सांगू शकत नाहीत. एक-दोन नॉर्मल माणसाप्रमाणे दिसत होते, पण मतिमंद होते. जुळणी करणाऱ्यांत काही मुलीही होत्या.
     व्यवस्थापक सांगत होते, “या विभागाचे रिजेक्शनचे प्रमाण ‘Zero PPM’ म्हणजे दहा लाखांत शून्य एवढे आहे. यांची उत्पादकता एकशेदहा टक्के आहे. ह्या मंडळींना एकदा काम कसे करावे आणि चांगले काम म्हणजे काय हे शिकवले, की ते काम बिनचूक झालेच म्हणून समजा. तडजोड त्यांना मान्य नाही. काम करणे त्यांच्या इतके सवयीचे होते, की त्यांना दर आठवड्याला साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी घरी राहायचे असते हे पटवणे त्यांच्या आई-वडिलांना अवघड जाते. त्यांना कामावर असताना कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही. मुख्य म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागत नाही. त्यामुळे त्या विभागात सुपरवायझरची गरज लागत नाही. अपघाताचे प्रमाणदेखील शून्य आहे.” 
आम्ही आश्चर्य पाहत होतो!
“ह्यांना पगार किती आणि कसा देता?” मी शंका विचारून घेतली.
“आम्ही ह्यांना नॉर्मल कामगारांसारखा सरकारी नियमाप्रमाणे पगार देतो. ESI आणि PF देखील देतो. शिवाय, कंपनीतर्फे त्यांना नेण्या-आणण्यासाठी बस आहे. बसचा खर्च कंपनी करते. पालक बसस्टॉपपर्यंत सोडतात. त्यांना पैसे कळत नाहीत. पगार बँकेत जमा करतो. आम्ही पूर्वी पगार रोख द्यायचो, तेव्हाची गंमत सांगतो. पूर्वी शंभरच्या नोटा द्यायचो. त्यांना नोटांची किंमत कळत नसली तरी किती नोटा ते कळायचे. एकदा पगारात पाचशेच्या नोटा द्याव्या लागल्या. नोटा कमी भरल्या म्हणून कोणी घेईनात. त्यांची अस्वस्थता ध्यानी आली. त्यावेळी चूक सुधारली. पण मग पगार बँकेत जमा करू लागलो.”
व्यवस्थापकांनी पंचविशीच्या एका मुलाची ओळख करून दिली. थोडासा बुटका, गोरा रंग, व्यवस्थित, रुबाबदार पोशाख केलेला अजय. तो सुभाषसरांचा मुलगा. तो क्वालिटी कंट्रोल मॅनेजर आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे देखील वेगळेपण नजरेस भरले. होय, चुत्तर यांच्या अजयची अभ्यासातील गती कमीच होती. तो जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेऊ शकला. तो वडिलांच्याच कंपनीत काम करू लागला. त्याच्या जबाबदारीची चमक त्याच्या चेहऱ्यावर आलेली दिसत होती. त्याच्याशी बोलताना क्वालिटी विभागात मुरलेल्या अधिकाऱ्याशी बोलतोय असेच जाणवत होते. अजय आमच्याशी पाच मिनिटे बोलून कंपनीची ‘गुणवत्ता मीटिंग कंडक्ट’ करण्यासाठी निघून गेला. जे बघत होतो ते अनाकलनीय होते. गुणवत्ता असलेले उत्पादन मतिमंद करू शकतात हेच आश्चर्य होते. चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेले ते दुर्दैवी चेहरे. त्यांच्या जाणिवा उत्कट होत्या आणि कहाण्या खूपच प्रेरक होत्या. प्रश्न होता तो त्या जाणिवांचा, प्रज्ञेचा शोध घेण्याचा आणि तो घेतला होता सुभाष चुत्तर यांनी. मी फार पूर्वी, कदाचित वीस वर्षांपूर्वी पुण्यातील एका entrepreneur clubच्या मीटिंगला माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. तेथे मित्राने एका गृहस्थांकडे बोट दाखवून सांगितले, की ते समोर बसले आहेत ते सुभाष चुत्तर. त्यांच्या वर्कशॉपमध्ये ते मतिमंद मुले नोकरीस ठेवतात. ती गोष्ट मनात खोलवर लक्षात राहिली. आम्ही २००७ पासून ‘तळवलकर ट्रस्ट’तर्फे ‘अनुकरणीय उद्योजक’ हा पुरस्कार देऊ लागलो, तेव्हा त्या गृहस्थांची परत आठवण आली. त्यांच्या भेटीचा योग शेवटी २०१५ मध्ये आला. संपूर्ण कारखाना बघून झाला. सुभाषसरांची भेटण्याची वेळ घेतली. आम्ही ‘मतिमंदांसाठीच काम निर्माण करावेसे का वाटले?’ हा स्वाभाविक प्रश्न विचारला.
सरांनी सुरवात केली :
“मी मुळचा नगर जिल्ह्यातील नेवाशाचा. मारवाडी कुटुंबातील. लहानपणी खोडकर, अभ्यासात लक्ष नसलेला उनाड मुलगा होतो. परीक्षेत कॉपी करून जेमतेम पास होत असे. दहावी नापास ही पायरी कशीबशी गाठली आणि एका गुरूने तारले. कॉपी करताना नवाथे सरांनी पकडले आणि ते एवढेच म्हणाले, की “तुला काय वाटते, तू आम्हाला फसवतोस? नाही. बाळ, तू तुला स्वत:लाच फसवत आहेस, हे लक्षात ठेव.” हे वाक्य मनात आत लागले आणि अंतर्मनात स्पार्क पडला. मी प्रतिज्ञा घेतली आयुष्यात खोटेपणा करायचा नाही. शाळा अर्धवट सोडली, तसे घरही सोडले. तडक पुण्याला येऊन राहिलो. पुण्यात बी. यु. भंडारी यांच्या गॅरेजमध्ये पडेल ते काम करू लागलो. तेथे असताना विसाव्या वर्षी एका गुजराथी मित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडलो. तिचे लग्नाचे वय सरले होते. तिच्या आईने सांगितले, की ‘तिला हृदयविकार आहे व ती थोड्याच दिवसांची सोबतीण आहे, तरी लग्न करशील?’ मी ‘होय’ म्हणालो आणि लग्न केले. 
नंतर मी बजाज टेम्पोत नोकरीस लागलो. तेथे अजून दोन मित्र मिळाले. आम्ही काही वर्षे नोकरी केली. मग व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. अभय फिरोदियासरांनी चाळीस हजार रुपयांची मदत केली. एक लेथ मशीन घेऊन उद्योग सुरू केला. सचोटी हेच ब्रीद ठेवले. व्यवसाय वाढू लागला. पत्नीचे लग्नानंतर नऊ वर्षांनी निधन झाले. मी तिच्या विरहाने उद्विग्न झालो. विष घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण मृत्यू आला नाही. मग ओशो भेटले. ओशोंना गुरू मानले. मी त्यांच्यासमोर बसून त्यांचे प्रवचन रेकॉर्ड करत असे. त्यांच्या अगदी जवळचा एक झालो. “दुसरे लग्न ज्योत्स्नाशी केले. एक मुलगा झाला, पण तो मतिमंद निघाला. त्याची जाणीव तो तीन वर्षांचा असताना झाली. ओशोंना मनाची व्यथा सांगितली. ते म्हणाले, ‘तू कर्तबगार आहेस. उत्तम कारखाना चालव आणि परोपकार करत राहा. त्यातच तुला समाधान मिळेल.’ समोर अजय दिसत होता. त्याचे शिक्षण ज्योत्स्नाच्या अथक प्रयत्नांनी जेमतेम आठवीपर्यंत होऊ शकले. ज्योत्स्नाने मुलासाठी खूप खस्ता काढल्या. माझा कारखाना उत्तम चालला होता. दिवसेंदिवस भरभराट होत होती. पण मी कायम अजयचा विचार करत होतो. त्याचे आमच्या पश्चात कसे होणार? हा विचार मनात सलत असायचा. मी त्याला कारखान्यात नेऊ लागलो. तो एकेक गोष्ट शिकू लागला. 
मनात आले, पैसा असताना माझी ही अवस्था तर अशा इतरांचे काय होत असेल? अशा मुलांना रोजगार देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करता येईल का? हा विचार मनात आला आणि पहिल्या मतिमंद मुलाला पंचवीस वर्षांपूर्वी नोकरीवर घेतला. त्याच्यावर सहा महिने मेहनत घेतली. होता होता, तो तयार झाला. मग एकाचे दोन झाले. असे वाढत वाढत संख्या साठ-पासष्ट झाली. प्रत्येक मुलावर अपार मेहनत घेतली. माझा स्टाफदेखील बदलला. त्यांनी मला साथ देण्यास सुरुवात केली. एक मुलगा तर आई-वडिलांनी येथे सोडला. मी त्याच्यावर दोन वर्षें मेहनत घेतली. तो माझ्या केबिनमध्ये येई. मी खुर्चीवर बसलेले त्याला आवडत नसे. तो मला खुर्चीवरून उठवे आणि फिरत्या खुर्चीवर बसून फिरत बसे. मला म्हणे, ‘मी तुझा बॉस आहे.’ मी त्याच्यासमोर बसून काम करत असे. असे दोन वर्षें चालले. एके दिवशी मी त्याला रागावलो आणि खाली काम करण्यास नेले, तर त्याने उत्तम drilling करून दाखवले. मी खुर्चीवर नसताना तो drilling बघत बसे. त्याने ते पाहून पाहून drilling आत्मसात केले होते. तो पंधरा वर्षें येथे काम करत आहे. येथील प्रत्येक मुलगा व मुलगी यांची एकेक कहाणी आहे. रानडे आडनावाची मुलगी. तिला नाव सांगता यायचे नाही, पण ती शास्त्रीय गाणे उत्तम गाते. तर दुसऱ्या एका मुलीचा अपघात झाला. वाहनाने धडक दिली. पाय फ्रॅक्चर झाला. तिला दवाखान्यात नेली तर ती डॉक्टरला हात लावू देईना. सरांना भेटायचे म्हणू लागली. मला बोलावले. मी गेलो. तिने मला विचारले, की ‘सर मला नोकरीवरून काढणार नाही ना?’ मी तिला जवळ घेतले. समजावले. तेव्हा तिने डॉक्टरांना माझ्या समोर प्लास्टर घालू दिले.”
चुत्तर यांचे डोळे पाणावले होते आणि आम्ही सुन्न होत होतो.
ज्योत्स्ना तेथेच आमच्यासाठी चहा-फराळाचे घेऊन उभ्या होत्या. चुत्तर म्हणाले, ‘माझी पत्नी ही माझी प्रेरणा आहे.’ ज्योत्स्ना यांच्याकडे बघून जाणवले, की त्या मूर्तिमंत करुणामूर्ती आहेत. “मी नवाथे गुरुजी, भगवान ओशो आणि माझी पत्नी यांच्यामुळे येथे पोचलो. नाहीतर दहावी नापास मुलाला काय भविष्य असणार? आमचे दोन कारखाने आहेत. पुण्यात अडीचशे आणि पिथमपुरला तीनशे कामगार आहेत. तेथे अडुसष्ट मतिमंद काम करतात. एकदा जर्मन बॉश कंपनीचे लोक कारखाना बघण्यास आले. अशा मुलांना काम देता येणार नाही असे त्यांचे म्हणणे. त्यांना सुरक्षितता आणि गुणवत्ता मिळणार नाही अशी त्यांना भीती वाटली. मी आमचे track रेकॉर्ड दाखवले. त्यांना पटवले, की ही मुले ‘ZERO PPM’ काम करतात. त्यांनाही ते पटले. काम मिळाले. ते असा प्रयोग बॉश कंपनीत करणार आहेत.”
चुत्तर यांनी त्यांचा दहा हजार स्क्वेअर फुटांचा बंगला रसिकतेने सजवला आहे. ‘ह्या माझ्या बंगल्याचा मीच आर्किटेक्ट आणि मीच इंटिरियर डेकोरेटर.’ देखणे उंची फर्निचर, किचनमध्ये गृहिणीला लागणाऱ्या स्वयंपाकातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला विचार, हॉलमधील सोफे, शोकेस आणि बेडरूम्स - सगळेच प्रेक्षणीय होते. जोत्स्ना यांची आवड आणि सुभाष यांची सौंदर्यदृष्टी यांचा उत्तम मिलाप झालेले त्यांचे घर हे एक कलेचे लेणे आहे. 
“मी जवळ जवळ निवृत्त झालोय. उरलो उपकारापुरता अशी मनाची भावना झाली आहे. अभय फिरोदिया चारशे खाटांचे एक हॉस्पिटल बांधतायत. मी त्याचा आराखडा आणि बांधकाम बघणार आहे. मंगेशकर हॉस्पिटलचे धनंजय केळकर यांनी सातव्या मजल्यावरच्या बांधकामाची आणि नव्या बिल्डिंगची जबाबदारी मला दिली आहे. मला एकच सुचवावेसे वाटते. पुण्यातील प्रत्येक मोठ्या कंपनीने दोन-तीन मतिमंद कामावर घेतले तरी पुण्यातील पंधरा-वीस हजार मतिमंद मुलांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील.”
सुभाष यांना कै. कृ. ब. तळवलकर यांच्या स्मरणार्थ ‘अनुकरणीय उद्योजक’ पुरस्कार देण्यात आला. पारितोषिक वितरण सोहळ्यात सरांच्या कारखान्याची व्हिडिओ आणि त्यांचे हृद्य मनोगत ऐकून प्रेक्षक हेलावले, प्रत्येकाचे डोळे पाणावले. त्यांनी मतिमंदांविषयी असलेल्या सामाजिक अनास्थेविषयी खंत व्यक्त केली. सुभाष यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराची रक्कम तेथेच त्यांच्या सह-पारितोषिक विजेत्या श्रीमती नीता देवळलकर (सेवाव्रती पुरस्कार) यांच्या ‘स्वयम्’ या संस्थेस दिली. ‘स्वयम्’ ही संस्था ठाण्यात स्पॅस्टिक मुलांसाठी काम करते. सुभाष यांनी, नीताताईंचे काम फार अवघड आहे आणि ते फक्त एक आई करू शकते असे नम्रपणे नमूद केले !
दहावी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय-सगळेच अनाकलनीय. अर्थात यामागे त्यांचे किती कष्ट आणि त्यांनी किती ज्ञान मिळवले असेल. सुभाष चुत्तर यांचा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.

- श्रीकांत कुलकर्णी.

1310. सहज थोडंसं

     तिचं makeup करणं, ब्रँडेड कपडे घालणं, सण समारंभात मुरडणं सारं सारं बंद होतं. अन् अचानक ती सर्वांना "गबाळी” भासू लागते. तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही. कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही. अजूनही तिला मुलांची जबाबदारी असते ! हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत. तिचं साधेपणही खुपायला लागतं. काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात, अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते. पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते. आतून ती मनाला काळजीने स्वतःच वाळवी बनुन पोखरत असते ! आणि तिची पस्तिशी उलटते अन् अचानक ती अतिशय सुंदर भासू (?)  लागते. तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते, तिचं आधुनिक राहणीमान, सुरेख hairstyle, नितळ त्वचा, मनमोकळं हसणं, वागणं, घरातला सहज सुंदर वावर, विविध स्पर्धा जिंकणं, रेसिपीत आवड निर्माण करणं, सर्वात मिसळणं, सारं सारंच सुंदर वाटू लागतं...! पण खरंच ती चाळिशीतच सुंदर दिसते का ? खरं तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी तिची फजिती कमी होते, बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते, टोमण्यांना उत्तर देण्याची धमक तिच्यात येते. सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते अन् मनापासून तिला स्वतः साठी जगावसं वाटतं...! पुनः तरुण व्हावंसं वाटतं, ती गबाळी, गावंढळ कधीच नसते.  फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिलं होतं, हे तिला कळून चुकतं अन् “ती कात टाकते”, इतकं सहज सोपं गणित आहे ते.
मला वाटतं, नवं स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात. होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल...! कॉलेजची अल्लड तरुणी सुंदर नसते का? पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का? चंदेरी बट  सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का? झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो.  मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बरं बदलेल? आणि तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितकं चांगलं होइल का? म्हणूनच बायको गेली माहेरी वगैरे फालतू, रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहेत. त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, hermonal changes अन् बदलते moods सांभाळून ती बदलून घेते स्वतःला चाळीशीत तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते. पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते.
माझ्या सर्व smart मैत्रिणींना व त्यांना समजून घेणाऱ्या मित्रांना सलाम...👍😊

डॉ. सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.

1309. इट्स ओके...आनंदाची गुरुकिल्ली

      परवा एक चित्रफीत बघितली. त्यात छोटी मुलगी रडत होती. तिच्यापेक्षा थोडासा मोठा भाऊ तिला म्हणत होता, "खोल श्वास घे, इट्स ओके !"
बाळ रडायचे थांबले. " मी जवळ आहे ना, आई येतच असेल, रडू नकोस," या त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोचल्या.
ते दोन शब्द खूप आवडले, "इट्स ओके" म्हणायचा छंद लागला. आयुष्यात "इट्स ओके" प्रसंग पावलागणिक येतात. तेव्हा "इतकं तर चालायचंच, ठीक आहे, स्वीकारु आणि होऊ पुढे." म्हणणारे कोणी तरी असावे. नसेल तेव्हा आपणच म्हणावे !     
     कामवाली बाई कधी सांगून, कधी न सांगता येत नाही. चिडून काय करणार? काम करावेच लागते. मस्त गाणी लावून त्या तालावर काम करावे. काम आवरलं की जास्त छान काम झालं वाटतं. थंडी असेल तर मगभर कॉफी, उकडत असेल तर आइसक्रीम घेऊन मजेत खावं आणि म्हणावे, इट्स ओके !     
      घरातल्या कोणी जेवायचे नाही असे स्वैपाक झाल्यावर सांगितले, की उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवावे. ते सुद्धा कोणतीही चिडचिड न करता. आयत्या वेळी जेवायचे नाही सांगितले, त्यांना उद्या खा सांगावे. इट्स ओके !  बरेचदा समोरचा काय सांगतोय ते आपल्याला किंवा आपण काय सांगतोय ते समोरच्याला कळत नाही, लक्षातच येत नाही. त्या वेळी शांत बसावे. थोड्या वेळाने, शक्य असल्यास दुसऱ्या दिवशी सांगावे किंवा विचारावे, लवकर कळते. इट्स ओके !       
    खरेदीला म्हणून खास जावे आणि मनासारखी वस्तू सापडत नाही. वेळ वाया जातो. तेव्हा म्हणावं इट्स ओके! नंतर कधी तरी अचानक ती वस्तू सहजपणे मिळते. कोणाची वाट बघत असू तर ती व्यक्ती वेळेवर येत नाही, भेटत नाही, भेटली तरी भरभरून बोलत नाही. लोकं वेळ पाळत नाहीत त्यामुळे वैताग येतो, विरस होतो. पण म्हणावे, इट्स ओके ! कल्पना केलेली नसते अशी व्यक्ती भेटते, जुनी ओळख असावी अशा अकल्पित गप्पा होतात, मस्त वाटतं. असेही होतेच की !      
      हौसेने आणलेला ड्रेस, साडी एका धुण्यात बाद होते, हरवते किंवा त्यावर काही सांडते. लहान मुलासारखे रडू शकत नाही तरी वाईट वाटतंच. मोठे आहोत म्हणून आरडाओरडा करावा असेही नाही. खोल श्वास घ्यावा आणि म्हणावं, इट्स ओके ! एखादा पदार्थ सगळं नीट असूनही बिघडतो. वैताग येतोच. पण म्हणावे, इट्स ओके ! घरातले, ऑफिसातले, नात्यातले, परिचयातले एकेकदा उगाच लागेल असे बोलतात. आपण हिरमुसतो, ते त्यांच्या गावीही नसते. त्यावर फार विचार करण्यापेक्षा "इट्स ओके" म्हणून सोडून देणे श्रेयस्कर असते.      
     आपण खूप छान तयार झालेले असतो, कुठेतरी गेलेले असतो, म्हणावी तशी आपली दखल कोणीच घेत नाही. त्यावेळी वैतागण्यापेक्षा "इट्स ओके" म्हणणं संयुक्तिक असतं. मन लावून तासनतास खपून घरातली बाई स्वैपाक करते. जेवणात नीट लक्ष ही न देता जेवून आपलीच माणसे निघून जातात. मागचा पसारा आवरत ती एकटी बसते. सोबत म्हणूनही कोणी थांबत नाही. हे घराघरातील चित्र आहे. हे योग्य नसले तरीही मदतीच्या नावाखाली अजून गोंधळ नको असेल तर "इट्स ओके" म्हणाव लागतं.       
     कधीतरी उगाच उदास, निराश वाटते, कशातही मन लागत नाही, रोजचे रूटीन कंटाळवाणे, नीरस वाटते. त्यात थोडासा बदलही शक्य नसतो. त्यावेळी डोळ्यासमोर एखादे आवडते दृश्य आणावे, जसे एखादा किनारा, एखादी टेकडी, एखादा प्रसंग आणि खोल श्वास घेऊन रोजच्या कामांना नव्याने सुरुवात करावी. म्हणावे, इट्स ओके !
माझी सौ. मला म्हणाली, "इतकं आध्यात्मिक आदर्शवादी, समजूतदार वागायची अजिबातच गरज नाही". तिचे म्हणणे असे की मनाला इतका आवर घालता येत नाही. घालूही नये. रडावेसे वाटले तर रडावे. राग आला की चिडावे. भावना इतक्या आवरू नयेत.      
     मला म्हणणं असं की, न आवडणारे किंवा अनपेक्षित काही घडले तरी चिडचिड करून शून्य उपयोग असतो. झालेली गोष्ट बदलता येत नाही, घडणारी गोष्ट आधी कळत नाही, कळली तरी थांबवता येत नाही. फार चिडून, रडून, तक्रार करून फारसा उपयोग नसतो. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वाट बघण्याचा संयम ठेवावा लागतो. मग "इट्स ओके" म्हणावे. सोडून द्यायला लगेच आणि नेहमी जमेल असे नसले, तरी प्रयत्न करायला हरकत नाही. ही आनंदाची गुरुकिल्ली आहे.

संग्रह : आनंद महाजन. 
योग  प्रशिक्षक, साई नगर, 
अमरावती. 9422949564

1308. वर्गमित्र

     तो वर्गात मधल्या बाकावर बसायचा. हुशार नव्हताच पण street smart पण नव्हता . अबोल . घरचा गरीब .वर्गात एक दोन मित्रच .कसाबसा SSC झाला आणि कुठेतरी चिकटला. गरीब,नोकरी पण खास नाही.त्यामुळे  लग्न पण उशिरा झाले. मध्यन्तरी खूप वर्ष गेली. reunion चे दिवस आले.जो तो reunion  करू लागले. ह्याच्या batch चे पण reunion झाले. मित्राच्या आग्रहाखातर हा गेला .मग whatsaapp चे दिवस सुरु झाले . हा पण join झाला. Messages सुरु  झाले. नवीन नवीन विषय,चर्चा. काही messages ह्याच्या डोक्यावरून जायचे. ग्रुप सोडायचा विचार करू लागला. ह्याच्या कडे पाठवण्या सारखे काहीच नव्हते. मग त्याने आयडिया केली. सणावारांना देव देवतांचे फोटो पाठवू लागला. पण त्याची मुलगी खूप हुशार निघाली. नेहमीच पहिली. 12 वित बोर्डाच्या परीक्षेत पहिली आली. त्याने खूप विचार करून ग्रुप वर आयुष्यातली पहिली पोस्ट टाकली. माझी मुलगी 12 वी बोर्डात पहिली आली. मग काय? अभिनंदनाचे messages धडाधड यायला लागले. ती पुढे काय करणार? डॉक्टर का engineer  असे अनेक प्रश्न. तो गांगरला,भांबावला. तासा भराने त्याने दुसरी पोस्ट टाकली ती नोकरी शोधतेय मेडिकलला admission मिळाली आहे पण. फी परवडणार नाही त्यामुळे जाणार नाही. 
     आता मात्र कोणाचाच रिप्लाय आला नाही. तू मुलीला शिकव आम्ही मदत करू म्हणणारे नातेवाईक कधीच पांगले होते. संध्याकाळचे  सात वाजले दाराची कडी वाजली. बघतो तर त्याच्या ग्रुप वरील 5-6 मित्र मैत्रिणी बाहेर उभे होते. तो ओशाळला. घरात इतक्या लोकांना उभे रहाण्यास पण जागा नव्हती. त्यातला एकाने पुढे येऊन त्याचा हातात cheque ठेवला. हि तुझ्या मुलीची मेडिकलची फी. तिच्या शिक्षणाची जबाबदारी आमची. त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि पाणावल्या डोळ्यात त्याला  शाळा, शाळेतला वर्ग,वर्गतली मुले  मुली दिसू लागले.

रवींद्र भुरे

1307. "ही" आणि "ती"

 एक होती “ही” आणि एक होती “ती”.
दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी.
म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या.
पण शेजारधर्म मात्र कायमच होता.
कधी काही लागलं की हक्कानी सांगायच्या एकमेकांना. 
दोन्ही घरचा एक तरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायचीच. 
एके दिवशी “ही” च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. 
मग काय ?? “ही” गेली वाटी घेऊन साखर आणायला “ती” च्या कडे.
“ती”नी सुद्धा “ही” चं हसत स्वागत केलं आणि दिली लगेच साखर. 
“ही” चपला घालत थोडी आडोशाला काय गेली तशी “ती” जोरात पुटपुटली.
“ रोजचाच ताप झालाय हा .. कटकट नुसती !!” .
असं म्हणत वैतागून “धाडकन” दार लावलं जोरात.  
“ही” ला ऐकू गेलंच .. 
बहुतेक ऐकू जाण्यासाठीच जोरात बोलली होती “ती”.
मग “ही” ची पण जरा सटकलीच.  
तणतणत वरती आपल्या घरी आली.
“ एक वाटी साखर काय मागितली तर इतकं ??”.
“ जसं काही इस्टेट मागितली “ती” ची !!”. 
असे ताशेरे झोडत “ही” नी दुप्पट जोरात आपलं दार लावलं. 
इतकंss  की खाली “ती” ला मुद्दाम ऐकू जावं. 
तेव्हापासून कानाला खडा. 
“ही” आणि “ती” यांचं संभाषणच बंद. 
“ती”ला कळलंच नाही नेमकं काय झालंय. 
म्हणून एक-दोनदा गेली बोलायला. 
पण “ही” ढुंकुन सुद्धा बघायची नाही "ती"च्याकडे
दोस्ती मे दरार... 
काहीच दिवसात बिल्डिंगला पालिकेकडून धोकादायकची पाटी लागली.  
मग सगळेच वेगवेगळ्या दिशांना पांगले. 
दोघींचा काहीच संबंध आणि संपर्क उरला नाही. 
काळ लोटला .. वयं वाढली. 
जवळ एक आध्यात्मिक शिबिर होतं चार दिवसांचं.
दोघींनीही तिथे नाव नोंदवलं होतं.  
योगायोगाने दोघींचीही राहायची व्यवस्था एकांच खोलीत. 
खूप गप्पा माराव्या असं वाटत असलं तरीही मनात दुरावा होताच अजून. 
पण “जुनं सगळं सोडून नव्याने संवाद साधा” अशी शिबिरातली शिकवण. 
म्हणून शेवटच्या दिवशी बोलल्या एकदाच्या. 
“ही” ची तणतण मागील पानावरून पुढे.. 
“ काय गं ?? xxxxxxxx .. इस्टेट मागितली होती का ?".. वगैरे वगैरे.
“ का गं ? असं का विचारतेस ??” 
“ मग रोजची कटकट म्हणत इतक्या जोरात तोंडावर दार आपटलंस ते माझ्या ? 
“ती” नी डोक्याला हात लावला.
“ बाप रे !! म्हणून बोलत नव्हतीस होय इतके वर्ष ??”  
“ अगंss  ते मी तुला नाहीss  त्या दाराला म्हणत होते आमच्या !!”
“ आठवतंय ना,  पावसाळा होता तेव्हा ??”  
“ कसलं फुगलं होतं ते “दार”.. लावताना नाकी नऊ यायचे अगदी !!” 
“ त्याला रोजचा ताप म्हणाले होते ss !!”
“ अय्याss हो का?? .. हो बरोबर .. आमचं पण दार खूप फुगलं होतं तेव्हा. 
दोघींचा “रुसवा” कारण दाराचा “फुगवा” 
तेव्हा लक्षात ठेवा “पावसाळ्यात दारं फुगतात”. 
कुणी तुमच्या समोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा. 
बिल्डिंगमध्ये दारांचा असा जोरात आवाज येऊ शकतो. 
 “नवरा बायकोचं भांडण झालं असेल” असे निष्कर्ष लगेच काढू नका. 
आणि हो ss  .. 
आपण सगळ्यांनीच “मनाची दारं” मात्र फुगण्यापासून वाचवूया. 
किलकिली तरी ठेवूया निदान.
चांगले विचार आत यायला आणि वाईट बाहेर घालवायला. 
सरतेशेवटी सगळ्यात महत्वाचं... 
कधीही काही वाटलं तर आडपडदा न ठेवता लगेच बोलूया एकमेकांशी. 
बरेचदा कारण क्षुल्लक असतं पण आपण उगाच गंभीर समजतो. 
बघितलं ना ss  “ही आणि ती”च्या चांगल्या मैत्रीची कितीतरी वर्ष वाया गेली. 
आणि कारण काय तर “घराचं फुगलेलं” आणि “मनाचं रुसलेलं” ...  “दार”

1306. इनर सर्कल

 प्रत्येकाच स्वत:च अस एक इनर सर्कल असत.  मैत्रीच... नातेवाईकांच.. व्यावसायिक ओळखींच...आणि हे इनर सर्कलच खरतर आपल्याही नकळत आपली स्ट्रेंथ असत. he/she or they are there!".. या एका जाणिवेनेच निसरड्या वाटांवरून धडपडलो. उतारावरून घरंगळलो तरि हे सर्कल येईलच. आपल्याला उचलायला.. थांबवायला.. धरायला.. हा विश्वास असतो.. ज्याच हे इनर सर्कल स्ट्रॉग... तो खरा नशीबवान... कारण हे इनर सर्कल.. तुम्ही एकटे असताना, जखमी असताना, चिखलानी बरबटलेले वा घाणिनी माखलेले असतानाही... तुमच्याबरोबर असत.. तुमच्यावर प्रेम करत.. तुमच असत... आता हे इनर सर्कल काही अस रात्री सेट केल आणि सकाळी तयार झाल.. अस नसत... तुमच्या बालपणापासून ते आज आत्ताच्या तुमच्या वागण्या बोलण्याचा अंश.. पाक म्हणजे हे इनर सर्कल... what you give others...it comes to you! IF you have a strong inner circle.. means you are also a part of somebody's inner circle.. life reciprocates!..
कोणाची बालपणीची मित्रमैत्रीण ही त्या घट्ट बंधात असते. कधी काका मामा मावशी...कधी कलीग.. बॉस.. किंवा कोणिही हे इनर सर्कल मधल्या व्यक्ती किंवा गिरूपशी आपण कधीही खोट बोललेलो नसतो.. जे आहे ते तस त्यांना माहित असत.. तिथे मुखवट्याची गरजच भासत नाही... या इनर सर्कलमधल्यांशी रोज आपण नेट फोन किंवा तत्सम माध्यमातून संपर्कात असतोच अस नाही.. त्याची गरजही नसते.. १-२ महिने ते वर्ष.. संपर्कात नसतानाही.. एका फोनवर ते" लगेच कनेक्टही होतात आपल्याशी. या इनरसर्कलला कधीही आपल्याबाबतीत शंका नसतात.. संभ्रम नसतो.. पैसे हवेत म्हटल तर का कशाला कधी परत? वगैरेची काहीही पडलेली नसते ह्यांना.. ओके.. एवढाच तो आश्वासक शब्द असतो. या इनरसर्कलची, आपल्याला सुखाचे ग्लास किनकिनत" चीयर्स"  म्हणताना कधीही गरज भासत नाही. पण तहान लागली तर घोटभर पाणि हेच बनतात.. जे जगायला महत्वाचे ! हे असे इनरसर्कल हवेच.आपल्यालाही व आपणही कोणाचे तरी इनरसर्कल बनण्याचा प्रयत्न करावा.
डीप्रेशन, आात्महत्या, सायकीअँट्री डीसीजेस फिरकतही  नाहीत अशा ठिकाणी जिथे हे इनर सर्कल असत. जागे रहा.. सजग व्हा... या प्लास्टिकच्या फुलांमधे गंध शोधत बसू नका... खरा सुगंध शोधा... त्यासाठी दगडमाती चिखल काटे कुटे चे व्रण अंगावर सोसावे लागतात.. रणरणत्या उन्हातून चाललात की " इनर सर्कल" च्या सावलीच बन मिळत.

1305. घरं मोठीं...पण मनं छोटी

      साधारपणे पंधरा एक वर्षापूर्वी ची ही गोष्ट असावी .सर्व सामान्य माणूस आपल्या स्वप्नांतल घरटं बांधतो. तसाच इमला आम्ही पण बांधलं होता. चार पाच ऐसपैस खोल्याचं घरं काय मी बांधल? पण आता नेपोलियन बोनपार्ट नंतर आपणच असावे या अविर्भावात येणाऱ्या जाणाऱ्या पै पाहुण्यांना मी माझी ही बंगली कथा ऐकवीत असे. मग अगदीच शहरातल्या जवळ मी प्लॉट कसा मिळवला? बांधकाम करतांना किती याता यात मी केल्या? वगैरे ,वास्तविकता येणाऱ्या पाहुण्यांना आता हा तुमचा नवीन पत्ता, या पलीकडे फारसं औत्सुक्य नसायचं पण उग आपलं माझं  समाधान करण्या करता आता सम्राट सिकंदरानंतर तुम्हीच ! असा बनाव ते  मला भासवीत. परंतु पु. ल. च साहित्य वाचतांना ' माझे शत्रू पक्ष'  ही कथा वाचली ( घर नावीन बांधणारे ,आणि नुकत्याच लांबच्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आलेले लोकं ,त्यांना शत्रू सारखेच  भासतात ) अन मग मी माझे बंगली पुराण थांबवले. माझ्या घरात एक मोठी गॅलरी मी बांधून घेतली होती. धुणे भांडे धुण्यासाठी ( मला  नाही...)  आणि कपडे वाळवण्याची अद्यावत सोय मी करून घेतली होती. 
एक दिवस सकाळी नित्या प्रमाणे अंघोळी साठी जात असतांना, मी आपला गॅलरीत कपडे घेण्यासाठी आलो. अन बघतो तर काय?  दोन ,तीन गवताच्या काड्या मला गॅलरीत पडलेल्या दिसल्या. चिमण्यांनी किंवा वाऱ्याने उडून आल्या असाव्या या शंकेने मी त्या लगेचच फेकून दिल्या. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. मग माझ्या लक्षात आले की ,हे काम चिमण्यांच दिसतंय. माझा हा रोज चा कार्यक्रम चालू होता पण चिमण्या ही काही कमी नव्हत्या मला न जुमानता जिद्दीनं  त्यांनी सात आठ दिवसांत माझ्या नव्या घरात आपलं  नवं बिऱ्हाड दोरीच्या  हूक वर  थाटल होत. मला जरा रागच आला. हे काय माझ्या एवढया राजेशाही बंगल्यात असले काटक्यांचे घरटे.  पण मुलांच्या विरोधामुळे थोडे  मी दुर्लक्ष केले. 
     पुढें त्या चिमणा चिमणीना पिल्लं झाली. सकाळ संध्याकाळ त्यांचा चिवचिवाट सुरू झाला. आम्हां कुटुंबियांना मोठी मजा वाटू लागली. पुढं कुठंतरी मी लाकडी खास चिमण्यांसाठी बनवलेली घरटी मी टांगलेली पहिली. माझ्यातल्या  कर्णानातलं दातृत्व जागं झालं. अन मी तसं एक घरटं विकत घेऊन घरी आलो आणि आल्लदपणे चिमण्यांच्या त्या  डालक्याजवळ ठेऊन दिलं. दुसऱ्या च दिवसांपासून चिमण्या त्या घरट्यात कधी जातात याची वाट  पाहू लागलो. एक ना दोन दिवस  आठ दिवस झाले तरी चिमण्या आणि पिल्लं त्यात काही जाईना. अन एक दिवशी अचानक चिमणी आणि पिल्लं  त्यांचं घरटं सोडून उडून गेली. मी मात्र थोडा खिन्न झालो, विचार करू लागलो कि मी एवढं छान घरटं त्यांच्यासाठी आणून लावलं ,पण त्याचा स्वीकार त्यांनी केला नाही. किती स्वाभिमानी ? पक्ष्यांसारखे पक्षी पण मला मोठा धडा शिकवून गेली यदाकदाचित ,ते मला म्हणत असतील
"बाबा रे महिना पंधरा दिवसांपूर्वी तूच आम्हाला उसकावून लावत होता. अन आता शे ,दीडशे रुपयांचं घरटं आमच्या साठी टांगल, आम्ही पक्षी जरी असलो तरी कुणाच्या दयेचं बक्षीस आम्ही घेत नाही. आम्हाला ही स्वाभिमान आहे. तुझ्या ह्या लाकडी कृत्रिम घरट्याला तुझ्या अहंकाराचा, दयेच्या भिकेचा वास त्याला चिकटलाय. सांग त्यात आमची लहान लहान पिल्लं आम्ही कशी वाढवायची? आता पुढं तू असंही म्हणशील कि पण तुम्ही हे  गवताचं घरटं शेवटी माझ्याच जागेत बांधलं ना ! 
पण 
"अरे तू   काय ! ते   दोन पाच लाख रुपये मोजून इथली  जागा काय ती घेतली. पण तुझ्या आधी इथल्या माळ रानात आमचं वास्तव्य होतं. इथल्या डेरेदार झाडांवर आमच्या पिढ्यानपिढ्या वाढल्या. बागडल्या. इथल्या मातीतला वास आमच्या श्वासाश्वासात भिनलाय ,तू सांग आता आम्ही कुठं जायचं ? बरं तुझ्या त्या लाकडी  घरट्याचं म्हणशील तर बाबा , तुम्ही माणसं तुमच्या लेकरां बाळां करता पै पैका कमवता. पुढच्या सात पिढया बसून खातील एवढी मर मर करता. आमचं तसं नसतं  बाबा. आम्ही आमच्या पिल्लांना वाढवतो ते फक्त त्यांच्या पंखात ताकद येईपर्यंत. एकदा की ते उडु लागले. त्यांना आम्ही सोडतो,अवकाशात भरारी घेण्याकरता. त्यांची  लढाई त्यांनाच लढण्याकरता. तेव्हा तुझं ते घरटं तुलाच लख लाभ बाबा ! " 
मी पुन्हा पुन्हा त्या उजाड घरट्या कडे पाहत मनात म्हणालो  पक्ष्यांसारखे पक्षी पण जीवन जगण्याचं मोठं तत्वज्ञान  ते मला शिकवून गेले. खरंच केवळ घरं मोठी असून चालत नाही तर  त्यात  राहणाऱ्यांची मनं ही मोठी असावी लागतात.

सुमंत खराडे

1304. पेरूची गोष्ट

       मधली सुट्टी झाली विद्यार्थ्यांनी डबा खायला गेल्या पटांगणावर खेळण्याचे गप्पा मारण्याचे असण्याचे आवाज यायला सुरुवात झाली केवळ 25 मिनिटाची सुट्टी असते पण मुलींना खूप मजा वाटते. यावेळी सेवा सदन चे बाहेर जाण्याचे गेट मात्र पूर्णतः बंद असते कुणालाही बाहेर जाऊन काही खरेदी करता येत नाही कोणी डबा आणलाच नसेल तर त्याची सोय आम्ही लावतो कारण शाळेमध्ये विद्यार्थिनी भांडार आहे आणि वसतिगृह ही आहे. त्यामुळे कोणी बाहेर जायचं नाही असाच दंडक होता. सुट्टी नंतर शाळा भरल्याची घंटा झाली मुली धावत धावत आपल्या वर्गात निघाल्या आणि नेमकी एक विद्यार्थिनी बाहेर जाताना मला दिसली मी गेटमध्ये तिला पकडलं ती बहुदा सहावीतली असावी म्हणजे अगदी छोटी होती अकरा वर्षाची. ती बाहेर जाऊन आत मध्ये येत होती तिच्या हातात एक पेरू होता आणि तो पेरू आणण्यासाठी ती धडपडून तिथल्या सेवकाचा डोळा चुकून बाहेर जाऊन आली होती. मी तिला बरोबर पकडले तिला रागावले बाहेरून काही आणून खायचं नाही हे कितीदा सांगितले तर तुम्ही अशा का वागता ग? अशी तिची कान उघडणी केली असे नियम मोडायचे नसतात ही शिस्त आहे आणि मी तिला पाच उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली तिच्या हातातला पेरू मी काढून घेतला आणि वर्गात पाठवलं. त्यानंतर मी ऑफिसमध्ये आले पेरू समोरच्या टेबलावर ठेवला आणि कामात गर्क झाले थोड्यावेळाने लक्षात आलं मी त्या मुलीने खाण्याचे आशाने आणलेला पेरू इथे माझ्या टेबलवर पडून होता.
      थोडं वाईट वाटलं जरी मी रागावले असले तरी माझ्या लक्षात आलं की पेरू खाण्याचं तिचं वय आता आपल्याला कुठे पेरू खावासा वाटतो इतक्या प्रकर्षान. मनातून थोडा वाईटही वाटलं आपण तिचा पेरू काढून घ्यायला नको होता असंही वाटलं. ताबडतोब आमची  सेविका शांता आहे तिला मी बोलवले आणि विचारले शांता आपले सापडलेले पैसे किंवा अन्य काही वस्तू वगैरे विकून आलेले पैसे किती जमा झालेत तिने सांगितले आठशे रुपये जमा आहेत बाई अशा पैशांचा उपयोग आम्ही विद्यार्थिनींसाठीच करत असतो मुली वह्या विसरून जातात उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याचे रद्दी घालून आलेले पैसे सापडलेले आणि कोणीही न्यायला न आलेले पैसे  अशी रक्कम आणि मग त्यात अजून तितकीच रक्कम मी घातली त्यात आणि  ज्ञानप्रबोधिनी हराळी त्यांची तेथे शेती आहे त्या शेतीमधून मी पेरू मागवले. 2000 पेरूची ऑर्डर दिली दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता ऑर्डर प्रमाणे प्रबोधिनीतून  आमच्या विद्यार्थिनी साठी अतिशय उत्तम पेरू पाठवले होते शुक्रावारचा शेवटचा तास हा पिटीचा असायचा पण त्या दिवशी मी सर्व विद्यार्थ्यांना वर्गातच थांबायला सांगितले मॉनिटर ना बोलून घेतले खाऊ वाटण्याच्या टोपल्यांमधून वर्गातल्या हजेरी प्रमाणे पेरू भरले आणि सर्व वर्गांमधून पेरू वाटले मुलीना आश्चर्यच वाटलं की पिटीच्या तासाला पेरूचे वाटप का आहे ?आणि आज अचानक काय म्हणजे श्रावण शुक्रवार नाही कोणता सण नाही तरी बाई पेरू वाटताहेत. मग शेवटच्या दहा मिनिटाला मी मुलींना प्रार्थनेच्या जागी बोलावून घेतले त्यांनाही जरा आश्चर्यच वाटलं बाईंनी आपल्या सगळ्यांना पेरू का वाटले असावे. शिक्षकांच्या मनात प्रश्न की बाईंनी अचानक पेरू का वाटले.? मग मी त्यांना सांगितलं की मुलींनो आज पेरू वाटले याच तुम्हाला आश्चर्य वाटल असेलच कारण आज कुठलाही सण वार शुक्रवार किंवा प्रसाद वगैरे असं काहीच नाहीये पण एक घटना घडली काल मधल्या सुट्टीत मी एका मुलीच्या हातातला पेरू काढून घेतला ती शाळेच्या बाहेर जाऊन पेरू विकत घेऊन पळत आली होती मला तो पेरू काढून घेतल्याचे खूप वाईट वाटलं  तुमचे हे वय पेरू बोर चिंचा खाण्याचे पण अशा तऱ्हेने  शाळेचे नियम मोडून  केलेली कृती मला मुळीच आवडत नाही त्यामुळे मी तिच्या हातातून तो पेरू काढून घेतला थोडीशी शिक्षाही मी तिला काल केली होती पण मला ते खूप मनाला लागलं त्यासाठी मी ठरवलं की आपण आज मुलींना पेरू वाटू. या त्यासाठी खास हराळीवरून तुमच्यासाठी उत्तम पेरू आणून वाटप केले आहेत. मुलींना खूप आनंद झाला सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या.मग शिक्षकांनाही पेरू वाटले वसतिगृहात वाटले सेवकांना पेरू दिले तेव्हा कुठे माझ्या मनाला शांतता लाभली. लहान मुलांच्या हातून असं काही काढून घेणं हे खरोखर वाईट आहे पण काय करायचं थोडीशी शिस्त लावण्यासाठी असं कठोर व्हावं लागतं पण त्याची भरपाई मला इतक्या छान पद्धतीने करता आली याचा मला खूप आनंद वाटला. आजही पेरू पाहिला की मला त्या छोट्या मुलीची आठवण येते आणि पेरूची गोष्ट पुन्हा पुन्हा आठवते एवढासा पेरू पण त्या पेरूची एवढी मोठी गोष्ट झाली हे खरे !मी नुसता पेरू काढून घेतला आणि तिला शिक्षा केली इतपत झाल असत तर ते एकाच मुलीपर्यंत पोहोचल असतं पण माझ्या शाळेतल्या सुमारे अठराशे विद्यार्थीनी पर्यंत हा मेसेज पोहोचला की शाळेच्या वेळात नियम मोडून शाळेच्या बाहेर जाऊन असं काही खरेदी करायचं नाही आणि त्याबरोबर माझ्यातल्या संवेदन क्षमतेलाही हे थोडंसं आव्हानच होतं माझी संवेदन क्षमता मला पुन्हा पुन्हा बजावून सांगत होती की बाई तू अशीच रहा नियमात अडकलीस ,खूप कडक शिस्तीची कठोर असलीस  तरी संवेदना हरवू नकोस बरं कारण संवेदनाक्षम माणूस जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेत आणि आनंद देत जगू शकतो किती खर आहे ना? आपल्याला काय वाटतं?

शीला पतकी 
माजी मुख्याध्यापिका
सेवासदन प्रशाला सोलापूर 
8805850279

1303. हिशोब एका चुकीचा

     आज पहील्यांदा अचानक गावी जावून आईबाबांना आश्चर्यचकीत करणार होते. मला त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारा आनंद पाहायचा होता. तब्बल चार महीन्यानी मी गावी जात होते. 'माझ्या असानमेंट पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मला गावी यायला नाही जमत आहे' असे अण्णांना सांगून मी मोबाईल बंद केला आणि मी माझी बॅग भरायला घेतली. हॉस्टेलमध्ये माझ्यासोबत आमच्याच गावातील सरीता असल्यामुळे मला कधीच आई बाबांना आश्चर्यचकीत करता आले नव्हते. पण कालच सरीता तिच्या मामाच्या गावी गेली होती. त्यामुळे हा प्लान मला आखता आला होता. माझ्या मोबाईलवर सरीताचा कॉल आला तेव्हा नाखुशीनेच मी तो उचलला.
"हॅलो, बोल गं"
"मी पोचले, तुझा काय प्लान आहे, शनिवार रविवारचा?" असे सरीताने विचारल्यावर मी सावध पवित्रा घेतला.
"मी नानेघाटच्या ट्रेकला जातेय, नाईट स्टे आहे" मी ट्रेकला जाते म्हटल्याबरोबर तिने तिचे बोलणे आवरते घेतले.
"ठीक आहे, बरं झालं मी मामाकडे निघून आले ते. मस्त आराम करायचा सोडून कसले ते डोंगर चढता कोणास ठाऊक?" असे बोलून तिने कॉल कट केला. 
पिच्छा सुटला एकदाचा हीचा आणि समजा सरीताला बाबांनी कॉल केला असता तरी आई बाबांनाही काही कळणार नव्हते. स्वत:भोवतीच गिरकी घेत मी पलंगावर पडले. सकाळी ५ वाजताची पुणे - कणकवली बस होती. ती चुकवून चालणार नव्हते. मी सकाळी हॉस्टेलवरून बाहेर पडले तेव्हा हवेत खुपच गारवा होता. आज खुप दिवसानी सकाळची शुद्ध हवा अनूभवायला मिळत होती. बस अगदी वेळेवर आली होती. जशी बस चालू झाली तस माझं मन भुतकाळात जाऊ लागले. मनात गोड हूरहूर लागून राहीली. जेव्हा मी डॉक्टर होण्यासाठी पुण्यासाठी गावाहून निघाली होते तेव्हा उर भरून आला होता. सासरी जाणाऱ्या मुलीसारखी मुसमुसत होते मी. शेवटी मला बाबानी पुण्यापर्यंत आणून सोडले होते. सुरूवातीला खुप आई बाबांची खुप आठवण यायची. मी आई बाबांची लाडकी होते. पण अण्णा संस्कार आणि शिस्तीमध्ये कोणतीही तडजोड करत नसत. छोट्याश्या गावी राहून पण मला आज इथपर्यंत घेऊन आले होते. अजुन एका वर्षाने मी डॉक्टर होणार होते. मी डॉक्टर व्हावं ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला मी माझी महत्वकांक्षा बनवली. आमच्या कुटूंबाच्या कमाईचे एकमेव साधन असलेली जमिन विकून मला डॉक्टर व्हायचे नव्हते. पण ते काही केल्या ऐकत नव्हते. माझ्या डॉक्टरकी शिक्षणासाठी लागणारा पैसा त्यांनी रातोरात उभा केला. ज्या जमिनीत हक्काचा संसार होत होता तिथे त्यांना गुलामी करताना मला बघवत नव्हते. लवकरच त्यांना सुखात ठेवणार होते.
     बस सकाळी पाच वाजता पुणेहून निघाली पण कणकवलीत पोहोचेपर्यंत खुप लेट झाली. माझी संध्याकाळची शेवटची एस टी ही निघून गेली होती. अंधार पडला होता. आमच्या गावातले रिक्षावाले पण निघून गेले होते. नेमका मोबाईलही बंद झालेला. मी माझ्या कणकवली शहरात राहणाऱ्या मैत्रिणीकडे जायचे ठरवले. तिच्या घराजवळ पोहोचले तेव्हा तिथेही निराशाच पदरात पडली. तिच्या घराला कुलूप होते. मी परत रिक्षा स्टँडला आले. आमच्या गावात जाण्यासाठी इतर रिक्षावाले अव्वाच्या सव्वा भाडे सांगत होते. माझ्याकडे मोजकेच पैसे होते. मी परत एस टी स्टँडला आले. सावंतवाडी बस लागली होती. ही बस आमच्या गावाजवळून जात असली तरी पुढची वाट अंधारातून चालतच जावी लागणार होते. पण नाविलाज होता. पूर्ण रात्र स्टँडला बसून राहू शकत नव्हते. मी सावंतवाडी बस पकडली. तिठ्यावर मर्गजांच्या दुकानावर कोणीतरी सोबतीला मिळेल असा विचार करून बसमध्ये चढले. बाजुलाच एक गृहस्थ मोबाईलमध्ये कालनिर्णय कॅलेंडर ओपन करून पाहत होते. माझा लक्ष आजच्या तारखेकडे गेला. ती रात्र अमावास्येची होती. एरव्ही धीट असणारी थोडी घाबरले. बसमधून उतरल्यावर मर्गजांच्या दुकानावर कोणी नसले तर आपण एकटे कसे जायचे. हा प्रश्न मला सतावत होता. मनात रामरक्षा म्हणत तशीच बसून राहीले.
      थोड्यावेळाने माझा बसस्टॉप आला तशी मी उतरले. समोर पाहते तर मर्गजांचे दुकान बंद होते. भर थंडीच्या दिवसातही मला घाम फुटला. आई बाबांना आश्चर्यचकीत करायचा प्लान अंगाशी येणार असं वाटू लागले. हायवे वरून जाणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट्स खेरीज कोणताही उजेड तिथे नव्हता. मी हताश झाले होते. माझा मूर्खपणा मला नडला होता. अमावस्येची रात्र , मिट्ट काळोख .. माझ्या मनात नाना विचार येऊ लागले. तिथून घरापर्यंतचा रस्ता सोपा नव्हता. मी काहीवेळ तशीच बसून राहीले. काय करावे सुचत नव्हते. दुरवर एक घर दिसत होते. तिथे जाऊन मदत मागायची ठरवले. मी माझी मोठी बॅग तिथेच ठेऊन हायवेच्या बाजूने चालायला सुरूवात केली. इतक्यात गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडून कोणीतरी येताना दिसले. मी जागीच थांबले.
ती व्यक्ती माझ्याजवळच येत होती. त्या व्यक्तीने माझ्यावर विजेरीचा प्रकाश टाकला. मी डोळ्यावर हात पकडत समोर पाहीले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या समोर साक्षात माझे बाबा उभे होते.
"अण्णा , तुम्ही इथे कसे?" असे बोलून मी त्यांना बिलगायला गेले तर ते थोडे मागे झाले.
"अगं भारती ,मला हात नको लावूस. मी गावात एकाच्या प्रेतयात्रेला गेलेलो, तिथूनच थेट इकडे आलोय."
"तुम्हाला कसं कळले की मी गावी येणार आहे ते?" माझ्या प्लान जरी फसला असला तरी बाबा मला न्यायला आले होते याचा आनंद खुप होता.
"पोरी मी तुझा बाप आहे. काल रात्री तुला फोन केल्यापासून मला सारखं वाटतं होतं की तु गावी येणार." त्यांचे हे बोल ऐकून मला अगदी भरून आले.
खरचं आई बाबा मुलांच्या बाबतीत मनकवडे असतात. त्यांना मुलांनी न सांगताही सारं कळत असते. मी कीती नशिबवान आहे, असं वाटून गेलं.
मी बाबांच्या मागोमाग चालत राहीले. वाटेत माझीच बडबड चालू होती. बाबा शांतपणे सारं ऐकत होते. तसे आमचे अण्णा मितभाषी. जेवढ्यास तेवढे बोलण्यावर भर. मी मात्र आईसारखी बडबडी झाले होते. थोडे पुढे चालत गेल्यावर एका ठीकाणी वळणावर नदीचा किनारा लागतो तिथे वरून कसला तरी जोराचा आवाज झाला. मी घाबरले. बाबांना पकडायला गेले. पण बाबा मात्र दूर झाले. मुलीला जरी डॉक्टर करायला निघाले असले तरी ते स्वत: मात्र जुन्या विचाराचे होते. घरी जाऊन आंघोळ केल्याशिवाय मला शिवायला देणार नव्हते. समोर पाहतो तर रस्त्याच्या वरच्या बाजूने दहा ते बारा डुकरांचा कळप खाली येत होता. अण्णा थांबल्याबरोबर मीही थांबले. विचित्र आवाज करत तो कळप नदीच्या दिशेने खाली गेला. छोटीशी घाटी चढून आम्ही आमच्या गावात आलो. आता अण्णांची पावले झपझप पडत होती. 
"भारती माझ्यासाठी काय आणलस?" अण्णानी विचारले.
"अण्णा तुमच्यासाठी खादीचे सदरा आणि पायजमा आणलाय" अण्णांचे खादीप्रेम मला चांगलेच ठाऊक होते. 
"मला दाखव ना!"
"आता इथे?"
"हो , मला आताच पाहायचे आहे" बाबांचा हट्ट पाहून मी आश्चर्यचकीत झाले. 
वाटेतच थांबून बॅग मधून कपड्याची पिशवी बाहेर काढली. माझ्या हातातून ती पिशवी एखाद्या लहान मुलासारखी खेचून घेतली.
"अण्णा काय केलेत हे. तुम्ही शिवलात ना त्या कपड्यांना" मी लटकेच अण्णांना रागवले.
"राहूदे गं, मला आता घालायचे आहेत ते कपडे." अण्णांचे हे असंबद्ध बोलणे मला कळले नव्हते. 
"भारती तू हो पुढे, मी जरा जाऊन येतो" पांदीमधुन आमच्या वाडीत शिरलो तेव्हा बाबा हाताची करंगळी दाखवत म्हणाले. कपड्यांची पिशवी मात्र स्वत:जवळ ठेऊन घेतली. मला आता उजेडाची गरज नव्हती कारण ठीकठीकाणी ग्रामपंचायतीने सौरउर्जेवर चालणारे दिवे लावले होते. मी आईला भेटण्याच्या ओढीने झपाझप चालू लागले. थोडं पुढे गेल्यावर आमचे घर दिसू लागले. आमच्या घरासमोर जमलेली खुप माणसे पाहून मला काहीच कळेना. इतक्यात ढोल वाजायला सुरूवात झाली. माझ्या काळजात धस्स झालं. ढोलाचा विचित्र लय आणि घरातून येणारा रडण्याचा आवाज ऐकून काहीतरी विपरीत घडलेय याची मला खात्री देवून गेला. मी तिथे धावतच पोचले. पडवीतून लोकं अण्णांचे कलेवर धरून अंगणात आणत होते. ते समोरचं दृश्य पाहून मी जागच्या जागी कोसळले. कोणीतरी माझ्याकडे धावताना दिसले.
मला शुद्ध आली तेव्हा मी एका हॉस्पीटलमध्ये होते. कॉटशेजारी माझा मामा आणि मामी बसल्या होत्या. मी उठायचा प्रयत्न केला तसा मामाने मला परत झोपवलं. मला दोन दिवसापुर्वी घडलेले सारं काही आठवले. माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रु थांबायचे नाव घेईनात. दाटून आलेला हुंदका अनावर झाल्यामुळे मी जोरात हंबरडा फोडला. मला समजवताना मामाही मनातून हादरला होता. त्याच दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. आम्ही रिक्षेतून घरी निघालो. माझ्या मनात बरेच प्रश्न आ वासून उभे होते. अण्णानी या जगातून गेल्यावरही मला दिलेली सोबत मी कधीही विसरणार नव्हते. आता कळत होतं की अण्णा त्यांना न शिवायचे कारण खोटं का बोलले ते. मी घरी पोचले तेव्हा माझी आई एका बाजूला खोलीत पायात डोकं खुपसून बसली होती. तिच्या चारी बाजूला पातळ सोडून तिला आत बसवली होती. मला पाहून ती ओक्साबोक्शी रडू लागली. मी घरी आल्यावर वाडीतील बऱ्याच बायका जमल्या होत्या. घरातील रडारड काळीज हेलावून टाकत होती. आई थोडी शांत झाल्यावर त्या दिवशी काय झाले ते सविस्तर सांगीतले 
"तू गावी येत नाही समजल्यावर अण्णा खुप नाराज झाले होते. त्यांना तू गावी यायला हवं होतं गेले चार पाच दिवस त्यांच्या छातीत दुखत होते. मी हजारदा सांगून पण माझ्यासोबत डॉक्टर जवळ जायला तयार नव्हते. तू आल्यावरच  डॉक्टर जवळ जाईन असा हट्ट धरला होता. नंतर नाराज झालेले अण्णा स्वस्थ न बसता त्यानी सरीताला कॉल लावला जेणेकरून तू खरचं कामात आहेस की आम्हाला आश्चर्यचकीत करण्यासाठी खोटं बोलत आहेस. पण सरीताने अण्णांना तू ट्रेकला जात असल्याचे सांगीतले. ते ऐकून ते खुपच नाराज झाले. त्या रात्री त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही. सगळी रात्र तळमळत काढली. सारखे काहीतरी बडबडत होते. मी त्यांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते खूप दुखावले होते. दुसऱ्या दिवशी ते सावंताच्या बागेत कामाला गेले आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हॉस्पीटलमध्ये नेईपर्यंत ते आपल्याला सोडून गेले होते." असे बोलून आई रडायला लागली.
हे सर्व ऐकून मी परत बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने मी सावध होताच मामीने मला पोटाशी कवटाळत कुशीत घेतले. आईने जे काही सांगीतले होते त्यामुळे घुसमट होत होती.
"आई, अण्णांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे" मी असं बोलल्या बरोबर सगळेजण माझ्याकडे पाहू लागले.
"असा नको बोलाव भारती, तुका कायच म्हायत नाय हूता. इतक्या दिवसानी तू गावाक येणार हूतस आणि थोडा आवशी बापाशीक चकीत करूचा वाटला तर तेतूर तुझो काय दोष?" मामी मला कुरवाळत माझी समजूत काढत होती.
"भारती तुझ्या अण्णाना मी फारसा पसंद करत करत नव्हतो. ते माझ्याशी कधीच नीट वागले नव्हते. आमचे मेहूणा -भाओजीचे नाते कधी खुलले नाही. आमचे नीट पटत देखील नव्हते. किंबहूना आमच्या स्वभावातच भिन्नता होती. पण तुझ्या मेडीकल प्रवेशाच्या वेळी ते स्वत:हून माझ्याकडे आले तेही अडचणीत असताना. त्यावेळी त्यांनी जे काही केले ते पाहून मी अवाकच झालो होतो. तुझ्या मेडीकलच्या ऍडमिशन साठी जमिन विकून पण खुप पैसे कमी पडत होते. जमिनीचे पैसे फारसे आले नव्हते. त्यावेळी ते माझ्याकडे पैशाला आले नव्हते. त्यांनी त्यांची एक किडनी विकली होती समोरचा व्यक्ती त्याचे काही पैसे द्यायला टाळाटाळ करत होता. ते पैसे वसूल करण्यासाठी माझी मदत त्यांना हवी होती. राजकीय ओळखीची मदत घेऊन मी ते पैसे मिळवून दिले. ही गोष्ट कोणालाही सांगू नये असं ते म्हणाले. खरतरं आजही ही गोष्ट तुम्हाला सांगणार नव्हतो पण त्यांचा हा त्याग सर्वांना माहीत असायला हवा." मामा बोलता बोलता भावूक झाला होता. 
"भारती एक गोष्ट मला खटकतेय, ज्या दिवशी तूझे बाबा गेले त्यादिवशी अंगणात तुळशीच्या बाजूला खादीचा सदरा आणि पायजमा कोणी ठेवला? आणि आम्ही तोच सदरा - पायजमा तूझ्या बाबांना नेसवला. खरंतर आम्ही अंत्ययात्रेच्यावेळी लागणारे कपडे आणायला आम्ही विसरलोच होतो. " मामा माझ्याकडे पाहत म्हणाले.
"मामा, ते कपडे बाबांकडे मी दिले होते." मी पटकन बोलून गेले.
" काय? कधी? ते कुठे भेटले तूला?" सगळेच आश्चर्यचकीत झाले होते.
मी गावी येताना घडलेले सारं काही सांगीतले. सगळे जण थक्कच राहीले. 
"तूझ्यावर खुप जीव होता गं" आई आपला हूंदका आवरत म्हणाली.
खरं होतं. माझ्यावर त्यांचा खुप जीव होता. पण त्याची शिक्षा मात्र त्यांनाच झाली होती.
मला काहीच समजत नव्हते. मनातून अपराधीपणाची भावना जात नव्हती. अण्णांनी आपली भूमिका मात्र अगदी चोख बजावली होती आणि मी, माझं कुठे आणि काय चुकलं याचा हिशोब मांडत बसले होते. मन आतल्या आत आक्रंदत होते. अण्णांची मनोमन माफी मागत होते. 

समाप्त...
या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
----------------------------------------
 ~ नितीन राणे

1302. माणसं

      मिटिंग संपली तसा विकास ऑफिसच्या बाहेर आला. पण आल्याआल्या बाहेरच्या दमट उकाड्याने तो घामाघूम झाला. थोड्याच वेळात आपण घामाने ओलेचिंब होणार हे त्याच्या लक्षात आलं आणि झालंही तसंच. मुलूंडला जाणाऱ्या लोकलचं तिकीट काढायला तो सिएसएमटी स्टेशनवर जाईपर्यंत त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. मे महिन्यात मुंबईला यायला त्याला याच कारणाने अजिबात आवडायचं नाही. त्या घामाने त्याचा जीव घाबराघुबरा व्हायचा. कधी एकदा अंघोळ करतो असं होऊन जायचं. पण एकदा अंघोळ केल्यावरही अर्ध्याएक तासात तो परत घामाने ओला होऊन जायचा.
     तिकिट काढून तो प्लॅटफाॅर्मवर आला आणि तिथली अफाट गर्दी पाहून हबकलाच. अर्थात ही गोष्ट त्याला नवीन नव्हती. वीस वर्षांपूर्वी तो मुंबईलाच नोकरी करत होता तेव्हाही गर्दी अशीच जीवघेणी असायची आणि लोकलला लोंबकळून त्यानेही अनेकदा प्रवासही केला होता. पण त्यावेळी तो तरुण होता. गैरसोयी सहन करण्याची त्याच्यात क्षमता होती. आता त्याने चाळीशी पार केली होती आणि त्याचं आयुष्य सुखासीन झालं होतं. माणसांची ही अफाट गर्दी त्याला नकोशी वाटू लागली होती. "माणसं कसली, हे तर वळवळणारे किडे. कसलीही स्वतंत्र ओळख नसणारे. या अफाट गर्दीत चेंगरुन, घुसमटून, कधीकधी खाली पडून मरणारे." स्वतःच दिलेल्या या उपमेने त्याचं मन अस्वस्थ झालं. त्या गर्दीत शिरायला त्याचं मन धजवेना. पण जाणं तर भाग होतं. आजुबाजूच्या लोकांच्या अंगाला घासत तो प्लॅटफाॅर्मवर गेला. लोकल आली आणि ती थांबण्या अगोदरच प्लॅटफाॅर्मवर असणारे जीवाच्या आकांताने उभ्याने का होईना जागा मिळवण्यासाठी दणादण आतमध्ये उड्या मारु लागले. काही सेकंदातच लोकल गच्च भरली. विकास हतबुद्ध होऊन तो प्रकार पहात राहिला. आतमध्ये शिरायची त्याची हिंमत झाली नाही. ती लोकल गेली दुसरी आली. ती गेली तिसरी आली पण तो प्लॅटफाॅर्मवरच होता. आता मात्र आपण आत घुसायलाच पाहिजे या इराद्याने विकास धावपळ करत लोकलच्याआत शिरला खरा पण मागून आलेल्या रेट्याने तो आतमध्ये ढकलल्या गेला. आतमध्ये त्याचा जीव गुदमरु लागला. किंचीतही हलायला आणि मोकळा श्वास घ्यायला जागा नव्हती. असह्य झालं तसा तो आजुबाजूच्या लोकांना ढकलत ,त्यांच्या शिव्या खात प्लॅटफाॅर्मवर उतरला. त्याचक्षणी लोकल हलली." बस, पूरे झाली ही नाटकं. आता आपण टॅक्सीने जाऊ. जातील चारपाचशे रुपये पण आरामात जाता येईल." त्याने निर्णय घेतला आणि स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने टॅक्सीला हात दिला. मागच्या सीटवर बसून त्याने खिडकीच्या काचा खाली केल्या. हवेचा एक झोत अंगावर घेतांना त्याला खुप बरं वाटलं.
मुलुंडला तो त्याचा चुलतभाऊ श्रीकांतच्या अपार्टमेंटला पोहचला तेव्हा सहा वाजून गेले होते. १२ व्या मजल्यावर जाऊन त्याने श्रीकांतच्या फ्लॅटची बेल वाजवली. श्रीकांतच्या मुलाने दार उघडलं. विकासला पाहून त्याला आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं.
" काय रे आहेत का पप्पा मम्मी घरात?"
" हो आहेत "
विकासला " या, बसा" न म्हणता तो आतमध्ये निघून गेला. विकास स्वतःच आतमध्ये जाऊन सोफ्यावर बसला. दोनच सेकंदात श्रीकांतदादा बाहेर आला.
"अरे विकास, आज अचानक कसा काय?"
" अचानक? अरे दोन दिवसांपूर्वीच तर मी तुला येण्याबद्दल फोन केला होता."
" अरे कामाच्या गडबडीत कुणाच्या लक्षात रहातंय ते ! तू आज सकाळी तरी फोन करायचा होतास."
विकासला आपली चुक लक्षात आली. आपण श्रीकांतदादाला गृहीत धरायला नको होतं हे त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात मेघावहिनी बाहेर आली. तिच्या साडीवरुन कळत होतं की ती बाहेर जायला निघालीये.
"विकासभाऊजी असं अगोदर न कळवता अचानक कसं येणं केलंत?" नाराजीच्या सुरात तिनं विचारलं. विकासने श्रीकांतकडे पाहिलं. त्याच्या नजरेतले भाव ओळखून श्रीकांत घाईघाईने म्हणाला.
"अगं त्याने परवा मला सांगितलं होतं पण मी ते तुला सांगायला विसरलो." मेघावहिनी त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकून आतमध्ये निघून गेली. काहितरी गडबड आहे. आपण आलेलं कुणालाच आवडलेलं दिसत नाहिये हे विकासच्या लक्षात आलं आणि तो अस्वस्थ झाला. मग त्याने बॅगेतून फरसाणचं पाकीट आणि कैऱ्यांची पिशवी काढली. श्रीकांतच्या हातात देत तो म्हणाला
"आपल्या शेतातल्या आहेत. आईने आठवणीने दिल्या आहेत लोणच्यासाठी "
"सध्या इकडेही चांगल्या कैऱ्या मिळतात. पण आम्ही त्या आणत नाही. लोणचं टाकायला वेळच कुठे असतो आम्हांला ! सरळ विकतचं लोणचं आणून खातो आम्ही."
विकासचा चेहरा पडला. तरी तो आईला कैऱ्या आणायचं नाही म्हणत होता. एकतर बॅगेचं वजन खुप वाढलं होतं. दुसरं,या लोकांना त्याची किंमत नव्हती. बाजारात तर सगळंच विकत मिळतं पण प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूमागे काहीतरी आपुलकीच्या भावना असतात हे या लोकांना कळत कसं नाही?"
"काय घेतोस? चहा, काॅफी, सरबत?" श्रीकांतदादाने विचारलं
खरं तर विकासला अंघोळ करायची होती. घामाने त्याच्या सर्वांगाला खाज सुटली होती. अंघोळ करुन जेवण झाल्यावर मस्त एसी रुममध्ये ढाराढूर झोपायचं असा त्याचा बेत होता. पण ते आता काही शक्य दिसत नाही हे त्याच्या लक्षात आलं.
"पाणी दे अगोदर, खुप तहान लागलीये आणि सरबत चालेल"
"ओके. अरे जय एक ग्लास पाणी आणि सरबत घेऊन ये रे."
पाणी आणि सरबत पिऊन झालं. श्रीकांतदादा चुप बसला होता. बराच वेळ झाला तो बोलला नाही तेव्हा तो अस्वस्थ आहे हे विकासच्या लक्षात आलं.
"श्रीकांतदादा काही प्राॅब्लेम आहे का? नाही म्हणजे वहिनी नाराज दिसतात म्हणून विचारलं."
" काही नाही रे ! बऱ्याच वर्षांनी आमचं आज मुव्हीला जायचं ठरलं होतं. आमचं म्हणजे मेघाच्या दोन मैत्रीणी आणि त्यांच्या फॅमिलीज असे १४-१५ जण मुव्हीला जाणार होतो. मुव्ही संपल्यावर तिकडच्या तिकडे हाॅटेलमध्ये जेवायला जायचं ठरलं होतं. आज सकाळीच तो प्रोग्राम ठरला. म्हणून तुला म्हंटलं की सकाळी तू मला तुझ्या येण्याबद्दल रिमाईंड केलं असतं तर हा प्रोग्राम ठरवला नसता."
अच्छा !असं आहे का? तरीच मेघावहिनी का चीडचीड करतेय आणि श्रीकांतदादा का अस्वस्थ झालाय ते विकासच्या लक्षात आलं. तो घाईघाईने म्हणाला
"अरे मग जा ना ! मी वैशालीकडे जातो ठाण्याला. तिलाही मी येण्याचं सांगून ठेवलंय."
श्रीकांतदादाचा चेहरा खुलला. मेघावहिनी आणि तिची मुलगी लगेच बाहेर आल्या. दोघींच्याही चेहऱ्यावर आता आनंद दिसत होता.
" अरे पण तू आता तीन वर्षांनी घरी येतोय आणि आम्ही बाहेर जायचं ते बरं वाटेल का आम्हांला?"श्रीकांतदादा औपचारिकता दाखवत म्हणाला.
" काही प्राॅब्लेम नाही दादा. मी पुढच्या महिन्यात येणारच आहे तेव्हा येईन तुमच्याकडे."
"बरं मग नक्की या हं भाऊजी आणि फोन करुन या म्हणजे मग अशी गडबड होणार नाही." मेघावहिनी म्हणाली. विकास उठला तसे सगळेच उठून त्याच्यामागे बाहेर आले.
"अरे पण वैशालीला तू येतोय असं आज कळवलंय की नाही? नाहीतर आमच्यासारखी परिस्थिती व्हायची."
विकास चमकला. त्याने पटकन मोबाईल काढून वैशालीला फोन लावला. पण तिने तो उचलला नाही. त्याने परत लावला पण परत तेच घडलं.
"ती फोन उचलत नाहिये. जसं तुला सांगितलं तसंच तिलाही मी कळवलंय पण मी उद्याचं कळवलंय."
" काही हरकत नाही. तिचे सासूसासरे आजारी असतात त्यामुळे ती कुठेच बाहेर जात नाही. आणि ती माझेही फोन उचलत नाही. आणि दोनतीन दिवसांनी विचारते फोन का केला होता म्हणून. तू बिनधास्त जा तिच्याकडे. ती घरीच असेल " श्रीकांतदादा हसत म्हणाला.
" बरं बरं मी निघतो."
" हो चल. आम्हीही निघतोय."
बेसमेंटमधली कार आणायला श्रीकांत गेला. विकास रिक्षा पकडण्यासाठी निघाला. त्याच्यामागून श्रीकांतची कार येऊन पुढे निघून गेली. साधं रिक्षापर्यंत सोडण्याचं सौजन्यही श्रीकांतदादाने दाखवलं नाही याचा विकासला खुप संताप आला. खरं तर "तुही आमच्यासोबत मुव्हीला आणि पार्टीला चल" असं श्रीकांतदादा म्हणू शकला असता किंवा "तू घरीच थांब. मी बाहेरुन तुझ्यासाठी खायला मागवून देतो. जेवण करुन मस्त झोपून रहा."अशी ऑफरही विकासला चालली असती. पण आपण त्या कुटूंबाला नकोच होतो हे विकासच्या लक्षात आलं. कदाचित "तू सांगितलं पण मी विसरलो." हे श्रीकांतदादाचं म्हणणं म्हणजे निव्वळ बहाणा तर नव्हता?
उद्विग्न मनाने विकास मुख्य रस्त्यावर आला. ठाण्याला वैशालीकडे जायला रिक्षा पकडली. वैशाली त्याची मावसबहिण. ठाण्यात उच्चभ्रूंच्या वस्तीत रहायची. विदर्भातलं बुलडाणा हे तिचं माहेर. तिचा नवरा नामांकित वकील होता. उच्चभ्रू लोकांमध्ये त्याची उठबस असायची. वैशालीही एका कंपनीत जाॅबला लागलेली. त्यामुळे लग्नाअगोदर साधीसरळ, मनमोकळी आणि बडबडी असलेली वैशाली पार बदलून गेली होती. शहरी अहंकार आणि शिष्टपणा तिच्यात शिरला होता. खरं तर लहानपणी तिचं आणि विकासचं फार सख्यं होतं. विकासला बहिण नव्हती म्हणून वैशालीलाच तो सख्खी बहिण मानायचा. दर वर्षी राखी पोर्णिमा आणि भाऊबीजेला तिच्याकडे जाऊन ओवाळून घ्यायचा. तिचं लग्नं झालं तेव्हा विकासच्या गळ्यात पडून ती खुप रडली होती. पण पैसा आणि स्टेटस आलं की काही माणसं नात्यांना किंमत देत नाहीत. वैशालीचं तेच झालं होतं. अर्थातच भाऊबहिणीच्या त्या प्रेमात आता फक्त औपचारिकता उरली होती. विकासला ते आठवलं आणि त्याने घाईने तिला फोन लावला. याहीवेळी तिने उचलला नाही. "काय बाई आहे, अशी कोणती बिझी आहे की फोनही उचलायला तिला फुरसत नाही? की मुद्दामच फोन उचलत नाहीये? काय करावं? तिच्याकडे जाणं कॅन्सल करावं का?" असा विचार त्याच्या मनात आला. पण "निघालोच आहे तर तिचाही अनुभव घेऊन पाहू."असा विचार करुन तो शांत बसला.
रिक्षा तिच्या अपार्टमेंटजवळ येऊन थांबली. रिक्षावाल्याला पैसे देऊन तो शेकडो शंका मनात घेऊन लिफ्टमध्ये शिरला. परत एकदा त्याने तिला फोन लावला पण आताही तिने उचलला नाही. आठव्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडून त्याने तिच्या फ्लॅटची बेल वाजवली. त्याच्या भाचीने दार उघडलं. त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली.
"आई विकास मामा आलाय गं." ती आतमध्ये तोंड करुन ओरडली. मग विकासला म्हणाली
" ये ना आत. बैस"
विकास आत येऊन सोफ्यावर बसला. वैशाली घाईघाईने बाहेर आली.
"अरे विकास, अचानक कसा काय?"
आता मात्र विकासला रागच आला. तो थोडा जोरातच बोलला
"मी परवाच तुला कळवलं होतं. एवढंच आहे की मी उद्या येणार होतो. आज श्रीकांतदादाकडे थांबणार होतो पण त्याला आज कुठल्यातरी पार्टीला जायचं होतं. रात्री यायला उशीर होणार होता म्हणून तुझ्याकडे आलो." 
"ओके. पण मग येण्याआधी फोन तर करायचास."
विकास उपहासाने हसला.
" तुझ्या मोबाईलवर बघ माझे किती मिस्ड काॅल आहेत ते. एकदाही तू फोन उचलला नाहीस."
" अरे बापरे ! हो का? बरोबर. मी तो चार्जिंगला दुसऱ्या रुममध्ये लावला आणि आम्ही दुसऱ्या रुममध्ये गप्पा मारत बसलो होतो."
आतून खुप जोरजोरात हसण्याखिदळण्याचा आवाज ऐकून विकासने तिला विचारलं
"घरी कुणी पाहुणे आलेत का?"
"हो अरे. ह्यांची अमेरिकेची बहिण आणि जपानमधला भाऊ कुटूंबासहित एका लग्नासाठी इथं आले आहेत. घरात खुप गर्दी झालीये.आणि आज ह्यांच्या भाचीचा वाढदिवस आहे.आम्हीही तो सेलेब्रेट करायला हाॅटेलला जातोय."
विकासचा चेहरा पडला. म्हणजे इथेही तो नकोसा पाहुणा होता आणि त्याला आज झोपायला जागा मिळणार नव्हती. सुन्न मनाने त्याने फरसाणचं, पापडांचं पाकीट आणि कैऱ्यांची पिशवी तिच्या हातात दिली.
"आईने पाठवलंय. तुला आवडतात म्हणून पापड करुन पाठवलेत."
" थँक्स " तिने कोरडे आपुलकीशुन्य धन्यवाद दिले.
" कधी आलास मलकापूरहून?"
"सकाळीच आलो "
" अच्छा. तुमच्या त्या ऑफिसर्स रेस्ट हाऊसला उतरला असशील?"
विकास गडबडला. घाईघाईने म्हणाला
"अं? हो हो"
तिचा ताणलेला चेहरा एकदम सैल झाला.
" काय घेतोस? चहा की काॅफी?"
" काहिही नको. श्रीकांतदादाकडे सरबत पिऊन आलोय "
तेवढ्यात वैशालीचा नवरा बाहेर आला. विकासने त्याला नमस्कार केला. त्यानेही हात जोडले. माणूस कमालीचा गर्विष्ठ होता. त्याचा चेहरा तसाच भावनाहीन राहिला." आपल्याला त्याने ओळखलं नाही की काय?"अशी दाट शंका विकासच्या मनात दाटून आली. पण मागे वैशालीसोबत तो मलकापूरला आला होता. चांगला तीन दिवस तो विकासच्या घरी राहिला होता. तेव्हा तर चांगला बडबड करत होता. दोन मुली चांगल्या सजून धजून आतून बाहेर आल्या.
"आँटी,वुई आर रेडी. प्लीज बी क्विक.अदरवाईज वुई विल बी लेट."अमेरिकन उच्चारात एक मुलगी बोलली.
" येस डार्लिंग,जस्ट टू मिनिट "
आता आपल्याला निघायची वेळ आलीये हे विकासच्या लक्षात आलं.
" चल मी निघतो " विकास वैशालीकडे पहात म्हणाला.
"अरे थांबला असता.आमच्या सोबत हाॅटेलला आला असता."
औपचारिक स्वरात वैशाली म्हणाली. अर्थातच त्या म्हणण्यात कोणताही जिव्हाळा नव्हता.
"नको. मला एका मित्राकडेही जायचंय." त्याने थाप ठोकली.
" बरं मग पुढच्या वेळी निवांत ये. साॅरी घरातल्या गडबडीमुळे तुझ्याकडे लक्ष नाही देऊ शकले."
"हरकत नाही." तो उठला. तिच्या नवऱ्याकडे पाहून त्याने परत नमस्कार केला. उत्तरात त्याने फक्त एक हात वर केला. चेहरा तसाच दगडी होता.
विकास खाली आला. बाहेर प्रचंड उष्मा होता. दोन मिनिटातच त्याचं शरीर घामाने चिंब झालं. त्यात वैशालीकडे येण्याच्या पश्चात्तापाची भर पडली आणि त्याचा खुप संताप झाला." समजतात तरी कोण हे लोक स्वतःला? मान्य आहे की पाहूणे आले होते. पण म्हणून काय इतका औपचारिकपणा दाखवायचा? आपल्याकडेही वेगवेगळे पाहुणे एकाच दिवशी येतात पण आपण तर कधी असं वागत नाही. साधं चहा पाजायचं सौजन्यही वैशालीने दाखवलं नाही. अमेरिकेतल्या नातेवाईकांशी त्याची ओळख करुन द्यायचंही वैशालीने टाळलं होतं. जणू तो कुणी परका माणूस होता." हे असा हलकटपणा दाखवतात आणि आईचा जीव या नालायक माणसांसाठी तुटतो. आता तुम्ही या  मलकापूरला. मीही तुमच्यासारखंच वागून दाखवतो की नाही ते बघा."
विकास मनाशीच बडबडत चालला होता. खरंतर तो अनेक बाबतीत श्रीकांत आणि वैशालीपेक्षा वरचढ होता. पिढीजात श्रीमंतीत तो वाढला होता. मलकापूरला त्यांचं तीन मजली कपड्यांचं आलिशान दुकान होतं. त्याचा मोठा भाऊ ते सांभाळत होता. नांदूरा रोडवर पाच हजार स्क्वेअरफुट जागेत दोन मजली आलिशान बंगला होता.तीन फोर व्हिलर्स होत्या. मलकापूरजवळच्या वडोदा गांवात शंभर एकर शेती होती. विकास स्वतः सरकारी अधिकारी असला तरी बायकोच्या नावावर त्याची कन्स्ट्रक्शन फर्म होती. पुर्ण बुलडाणा जिल्ह्यात त्याची कन्स्ट्रक्शनची कामं सुरु असायची. संपत्तीचा विचार केला तर श्रीकांतदादा आणि वैशाली त्याच्यासमोर कुठंच लागत नव्हते. विकास आणि त्याचा भाऊ अनेक वेळा कुटुंबासहीत विदेशवारी करुन आले होते. पण पैसा, प्राॅपर्टीने तुम्ही कितीही श्रीमंत असा, आचार विचारांनी कितीही आधुनिक असा तरी ही पुण्यामुंबईची माणसं तुम्हांला गावंढळच समजतात आणि "गांववाले" म्हणून हिणवतात याचा अनुभव विकासने अनेकदा घेतला होता. फक्त मोठ्या शहरात रहातो म्हणून माणूस खरंच आधुनिक होतो? विकासला अनेकदा हा प्रश्न पडायचा. आज मोबाईल आणि इंटरनेटने इतकी क्रांती घडवली होती की खेड्यातली माणसंही आधुनिक झाली होती. परंपरांचा आणि संस्कारांचा असलेला पगडा सोडला तर त्यांनाही खेडवळ म्हणणं चुकीचं झालं असतं इतकं जग जवळ आलं होतं. मग आधुनिकपणा म्हणजे काय? माणुसघाणेपणा? की स्वार्थीपणा? की आलेल्या पाहुण्यांचा अनादर करणं? त्याला आठवलं की श्रीकांतदादा आणि वैशाली जेव्हाजेव्हा मलकापूरला येत तेव्हा तो आपले अनेक ठरलेले कार्यक्रम रद्द करायचा. त्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही कमतरता नको म्हणून सुटी घेऊन घरी रहायचा. मागच्याच वर्षी श्रीकांतदादा खामगांवला लग्नाला आला होता तेव्हा विकास आपली कामधामं सोडून स्वतः त्याला कारमध्ये घेऊन गेला होता. वैशाली तर जेव्हा जेव्हा माहेरी बुलडाण्याला जायची तेव्हा अगोदर मलकापूरला विकासकडेच उतरायची. मग तिला बुलडाण्याला कारने सोडायचं काम विकासच करायचा. इतकं प्रेमाने वागूनही या माणसांनी आज आपल्याशी असं वागावं? राग आणि दुःख यांचं विचित्र मिश्रण मनात घोळवत विकास ठाण्याच्या स्टेशनकडे निघाला."आता काय करायचं?" त्याला प्रश्न पडला. ऑफिसर्स रेस्ट हाऊसला जाता आलं असतं पण श्रीकांतदादाकडे मुक्काम करायचा म्हणून त्याने ते अगोदर बुक केलं नव्हतं. अर्थातच तिथे रुम मिळण्याची सुतरामही शक्यता नव्हती. हाॅटेलमध्ये जाऊन रहाणं हाच एक पर्याय शिल्लक होता. अचानक त्याला आठवलं त्याचा एक वानखेडे नावाचा बॅचमेट ठाण्यातच होता. दोन महिन्यांपूर्वी विकासला तो भेटला होता तेव्हा त्याने ठाण्याला घरी यायचं निमंत्रण दिलं होतं. ते आठवून तो त्याचा नंबर मोबाईलमध्ये शोधू लागला. शोधताशोधता त्याला अचानक " विठूकाका" नांव दिसलं आणि तो चमकलाच. मागच्याच महिन्यात विठूकाका घरी आले होते तेव्हा म्हणत होते  "विकासदादा सुनीलने कल्याणला नवीन फ्लॅट घेतलाय. मुंबईला आले की जरुर या बरं का आमच्याकडे." 'काय हरकत आहे विठूकाकाकांकडे जायला?आपण गेलो तर त्यांना आनंदच होईल. त्यांच्याकडे रहाण्याची सोय नाही झाली तर तिथेच कल्याणला हाॅटेलला मुक्काम करता येईल." या विचारासरशी विकासने विठूकाकांना फोन लावला.
" हॅलो विठूकाका, मी विकास बोलतोय"
" अरे विकासदादा ! आज कसा काय फोन केला? मुंबईला आलते का?" त्यांच्या स्वरातला आनंद पाहून विकास सुखावला
" हो विठूकाका. सध्या ठाण्यात आहे"
" अहो मग या ना कल्याणला. या !लई आनंद होईन आम्हांला."
त्यांच्या या वाक्याने विकासला खुप आनंद झाला. शेवटी गांवाकडची माणसं ती ! कुणाच्या घरी येण्याने त्यांना आनंदच होणार.
" बरं काका येतो. तुमचा पत्ता पाठवता का व्हाॅटस्अपवर?"
" काही काळजी करु नका दादा. सुनील घरीच आहे त्याला पाठवतो स्टेशनवर तुम्हांला घ्यायला. फक्त डोंबिवली पास झालं की मला फोन करा "
" बरं करतो."
आपल्या येण्याने कुणाला का होईना आनंद होतोय याचं विकासला हायसं वाटलं. त्या समाधानातच तो ठाणे स्टेशनवर आला. टॅक्सी किंवा रिक्षा करुन कल्याणला जायचा विचार देखील त्याच्या मनात आला नाही. सुदैवाने फक्त कल्याणपर्यंत जाणारी लोकल त्याला मिळाली. त्यात त्याला दाटीवाटीने का होईना बसायला जागा मिळाली. बसल्याबसल्या विठूकाकांचा विचार त्याच्या मनात आला. विठूकाका त्याच्या कापड दुकानात पस्तीस वर्षं सेल्समन म्हणून नोकरीला होते. मुलामुलींची लग्नं झाल्यावर शेतीकडे लक्ष देता यावं म्हणून त्यांनी नोकरी सोडली होती. अत्यंत प्रामाणिक,नम्र आणि सज्जन माणूस. कधीही उध्दटपणा नाही, रागाने बोलणं नाही. कोणतंही काम द्या सदैव तयार. विकास आणि त्याचा भाऊ लहान असतांना दुकानात गेले की विठूकाका त्यांचे फार लाड करत. त्यांना चाॅकलेट्स, कुल्फ्या घेऊन देत. विकासलाही इतर सेल्समनपेक्षा ते फार आवडत. गरीब असुनही त्यांनी मुलामुलींना चांगलं शिकवलं होतं. दोन्ही मुली पदवीधर होत्या. एक मुलगी चेन्नईत होती तर दुसरी दिल्लीत होती. दोघींचे नवरेही उच्चशिक्षित आणि चांगल्या पगारावर नोकरीला होते. मुलगा सुनील आय.टी.इंजीनियर होऊन मुंबईतच नोकरीला लागला होता. नुकताच त्याने कल्याणला वन बीएचकेचा फ्लॅट घेतला होता.
"कसा असेल सुनीलचा फ्लॅट? वन बीएचके म्हणजे छोटाच असणार. बहूतेक खाली फरशीवरच झोपावं लागणार. त्यात ए. सी. नसला तर आपल्याला झोप येईल का? मुख्य म्हणजे विठूकाका आपल्याला रहाण्याचा आग्रह करतील की नाही? की चहापाणी झाल्यावर आपल्याला श्रीकांतदादा आणि वैशालीसारखं कटवतील. असंही त्या छोट्या फ्लॅटमध्ये विठूकाकाच्या कुटूंबाची अडचण करणं आपल्याला तरी बरं वाटेल का?" शेकडो प्रश्न विकासच्या मनात उभे राहिले.
डोंबिवली पास झाल्याचं त्याने विठूकाकाकांना कळवलं. कल्याणला उतरुन तो स्टेशनबाहेर आला तेव्हा सुनील त्याची वाटच बघत होता. विकासला पाहिल्याबरोबर पुढे होऊन त्याने त्याला पदस्पर्श करुन नमस्कार केला.
"याला म्हणतात खरे संस्कार." श्रीकांत आणि वैशालीच्या मुलांनी त्याची दखलही घेतली नव्हती हे आठवून विकास मनाशीच बडबडला. सुनील बाईकने त्याला घरी घेऊन गेला तेव्हा अपार्टमेंटच्या फाटकाजवळ विठूकाका आणि काकू आनंदी चेहऱ्याने त्याची वाटच बघत होते. तो विठूकाकांच्या पाया पडायला गेला पण काकांनी त्याला उचलून छातीशी धरलं.
"या विकासदादा " विकासचा हात धरुन विठूकाका त्याला वर घेऊन गेले. तो सोफ्यावर बसत नाही तोच सुनीलची बायको आणि मुलं त्याच्या पाया पडायला आली.
" विकासदादा, तुम्ही आले लई आनंद झाला बघा. आपल्या गावाकडलं कुणी बी आलं की लई छान वाटते." विठूकाका म्हणाले तशी विकासला श्रीकांतदादा आणि वैशालीच्या वागण्याची आठवण झाली. ती दोघंही पण गावाकडचीच. श्रीकांतदादा तर मलकापूरचाच. वरुन नातेवाईक.पण वागणं......?
विकासचं मन विषादाने भरुन आलं.
" दादा आता आलेच आहात तर दोनतीन दिवस मुक्काम करा." विठूकाका आग्रहाने म्हणाले.
" नाही काका. उद्या सकाळी मला परत ऑफिसला जायचंय आणि संध्याकाळी सात वाजताच्या गाडीचं माझं रिझर्वेशन आहे."
"काय दादा !असे घाईगडबडीत काऊन येता? बरं मग आजच्या दिवस इथेच मुक्काम करा."
"अहो सीएसएमटीच्या ऑफिसर्स रेस्ट हाऊसला माझं आजचं बुकींग आहे." विकास आढेवेढे घेत खोटं बोलला. 
"कॅन्सल करा ते दादा. आज आम्ही तुम्हांला अजिबात जाऊ देणार नाही. उद्या नाश्ता झाल्यावर भलेही तुम्ही जा " सुनील आग्रहाने बोलला. त्या आग्रहाने विकास सुखावला.
"बरं बरं. थांबतो "
पाण्यासोबत कैरीचं पन्हं घेऊन सुनीलची बायको आली.
"दादा पन्हं पिऊन झालं की मग छान अंघोळ करुन घ्या. इथल्या घामाने जीव लई कासावीस होते." काका त्याच्या मनातलं बोलले. पन्हं पिऊन झाल्यावर सुनील त्याला बाथरुमकडे घेऊन गेला. विकासकडे खरंतर टाॅवेल, साबण होता पण सुनीलने त्याला नवाकोरा टाॅवेल आणि साबण काढून दिला. अंघोळ झाल्यावर तृप्त मनाने तो बैठकीत येऊन बसला.
मग विठूकाका, काकू आणि सुनीलशी त्याच्या गप्पा रंगल्या. त्याच्या वडिलांच्या आठवणीने विठूकाका हळवे झाले. "दादा गोपाळशेठ म्हणजे लय भला माणूस. आम्ही नोकर असुनही आमच्याशी नेहमी मोठ्या भावासारखे वागायचे. अडिअडचणीत मदत करायचे. दर दिपावळीला सगळ्यांना घरी बोलवून गोडाधोडाचं जेवण द्यायचे. आमच्यासकट आमच्या लेकरायलेबी कपडे करायचे."
विठूकाका म्हणत होते ते खरंच तर होतं. त्याचे वडील पुर्ण मलकापूर शहरात प्रसिद्ध होते ते मोठ्या मनाचा माणूस म्हणून. व्यापारात त्यांनी पैशापेक्षा माणसं कमावली होती. म्हणून तर जेव्हा ते वारले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला अख्खं मलकापूर लोटलं होतं. आजही मलकापूर शहरात विकासच्या कुटूंबाला मान होता तो त्याच्या वडिलांमुळेच. गप्पा रंगलेल्या असतांनाच सुनीलची बायको स्वयंपाक तयार असल्याचं सांगायला आली. तसे विठूकाका आणि सुनील  उठले. त्यांनी हाॅलमध्येच पाटं मांडली. जेवणाचा मेनू एकदम फक्कड होता. पुरणपोळी, मसाला वांगी, आंब्याचा रस, मटकीची उसळ, तळलेले पापड, वरण भात.
"बापरे ! इतके पदार्थ? एवढं करायची काय गरज होती वहिनी?" विकास सुनीलच्या बायकोला म्हणाला तसे विठूकाका म्हणाले
"असू द्या विकासदादा. पहिल्यांदा आलेय तुम्ही आमच्याकडे. पण दादा तुम्ही दोनतीन दिवस राहिले असते तर लय आनंद झाला असता बघा"
" बरं. पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की दोनतीन दिवस राहिन."
" आणि दादा. जेव्हाजेव्हा मुंबईला याल तेव्हातेव्हा आमच्याचकडे उतरायचं बरं का ! तुमच्या त्या रेस्ट हाऊसला रहायचं नाही" सुनील मध्येच म्हणाला.
विठूकाकांनी खुप आग्रह करकरुन त्याला जेवू घातलं. जेवणही खुपच चवदार होतं. त्यामुळे विकासही आडवा हात मारुन जेवला.
दहा वाजले तसे विकासचे डोळे झोपेने मिटू लागले. ते पाहून सुनील म्हणाला
" दादा चला झोपायला. बेडरुममध्ये तुमची व्यवस्था केलीये."
" आणि बाकीचे कुठे झोपणार?"
" इथेच हाॅलमध्ये गाद्या टाकून."
" मग मीही इथेच झोपतो. मला आवडतं खाली झोपायला "
" नाही नाही. पाव्हण्यांना असं खाली झोपवायला आम्हांला चांगलं वाटेल का?"
वन बीएचके असला तरी फ्लॅट बऱ्यापैकी ऐसपैस होता. बेडरुममध्ये गेल्यावर सुनीलने कुलर चालू केला.
"दादा मी या उन्हाळ्यात ए.सी. घेणार होतो पण अप्पा नाही म्हणाले. एकदा ए.सी.ची वाईट सवय लागली की मग ए.सी. शिवाय झोप नाही येत असं म्हणतात ते."
"बरोबर म्हणताहेत विठूकाका "
" पण तुम्ही तर घरी ए. सी. तच झोपत असाल ना ! मग आज तुम्हाला इथे झोप येईल का?"
" कुलर आहे ना !मग नक्की येईल0" विकास म्हणाला खरं पण त्यालाही शंका होतीच.
" काका कुठं झोपताहेत?"
" ते हाॅलमध्येच झोपतील. मी म्हंटलं होतं त्यांना तुमच्या सोबत झोपायला. पण मालकांसोबत एका बेडवर झोपणं काही त्यांना पटलं नाही." सुनील हसत म्हणाला.
सकाळी सात वाजता विकास उठला तेव्हा आपण ए.सी. नसुनही ढाराढूर झोपल्याचं त्याच्या लक्षात आलं. विठूकाकांचं पुर्ण कुटुंब उठलेलं त्याला दिसत होतं. सकाळी लवकर उठण्याचे संस्कार लहान मुलांवरही बिंबवल्याचं कळून येत होतं. चहा नाश्ता,अंघोळ आटोपून विकास निघण्यासाठी तयार झाला तेव्हा नऊ वाजून गेले होते.
"चला काका निघतो मी "तो म्हणाला तसा सुनील म्हणाला
"पाच मिनिट थांबा दादा. डबा तयार होतोय तो घेऊन जा " 
" अरे डबा कशाला? मी दुपारी कॅंटीनमध्ये जेवून घेतलं असतं."
" असं कसं विकासदादा?" विठूकाका म्हणाले "आपलं घर असतांना बाहेर कशाला जेवायचं? काही नाही फक्त पोळी भाजी केलीये ती घेऊन जा."
या कुटूंबाच्या आदरातिथ्यामुळे विकास भारावून गेला. अचानक त्याला आठवलं की या कुटूंबासाठी त्याने काहिही आणलं नव्हतं. कमीतकमी लहान मुलांसाठी तरी चाॅकलेट्स वगैरे आणायला पाहिजे होती. ज्यांना माणसांची किंमत नाही त्यांच्यासाठी तो भरपूर काही घेऊन गेला होता. प्रेमाच्या माणसांसाठी मात्र त्याने काही आणलं नव्हतं. त्याला स्वतःचीच लाज वाटली.
सुनीलच्या बायकोने आणून दिलेला डबा बॅगेत ठेवल्यावर विकास काकाकाकूंच्या पाया पडला तशा काकू म्हणाल्या
"बरं का विकासदादा,आता पुढच्या वेळी मुंबईला याल तवा सुनबाईला आणि पोराईले बी घेऊन येजा."
"हो. नक्की आणेन काकू "
सुनीलची मुलं पाया पडायला आली तसं विकासने पाकिटातून पाचशेच्या दोन दोन नोटा काढून दोघांच्या हातात दिल्या.
"अहो दादा हे काय करताय?"विठूकाकांनी पुढे होऊन त्या नोटा काढून विकासच्या समोर धरल्या.
"अहो काका.राहू द्या. मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो तर काहितरी आणायला पाहिजे होतं. अचानक ठरलं म्हणून काही आणता आलं नाही. आणि आईला मी तुमच्याकडे येतोय असं माहित असतं तर तिने असं मोकळ्या हातांनी येऊ दिलं असतं का?"
" ते खरंय दादा पण दोन हजार रुपये? तुमच्या समाधानाकरता दहावीस रुपये द्या."
" नाही काका. राहू द्या. आईने पाठवलेत असं समजा "
काकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली पण त्या छोट्या मुलांचे चेहरे आनंदाने खुललेत हे पाहून विकासला समाधान वाटलं. काकाकाकूंचं कुटूंबासहित येण्याचं दिलेलं निमंत्रण स्विकारुन विकास सुनीलबरोबर निघाला.
"दादा आता लोकलला जागा मिळणं मुश्किल आहे. तुम्ही एखादी सीएसएमटीला जाणारी एक्स्प्रेस पकडा. त्यात आरामात जागा मिळेल."
" हो बरोबर"
सुनीलने तिकीट काढून आणलं. त्याचे पैसेही त्याने घेतले नाहीत.
"परत या बरं का दादा आमच्याकडे "सुनील विकासचा हात हातात घेऊन म्हणाला.
" हो नक्की येईन."
सुदैवाने विकासला सीएसएमटीला जाणारी एक्स्प्रेस लगेच मिळाली. विशेष म्हणजे तिच्यात भरपूर सीट्स रिकामेच होते. विठूकाकांच्या आदरातिथ्याने भारावून गेलेला विकास कालच्या सगळ्या घडामोडींचा विचार करु लागला. नकळत त्याचं मन श्रीकांतदादा, वैशाली आणि विठूकाकांची तुलना करु लागलं. श्रीकांतदादा आणि वैशालीकडे थ्री बीएचकेचे मोठे ऐसपैस फ्लॅट असुनही त्याला एका रात्रीपुरती जागा मिळाली नाही. मात्र विठूकाकांच्या कुटूंबाने स्वतःची अडचण सहन करुनही त्याची झोपायची सोय करुन दिली. घरं मोठी असून चालत नाही माणसांची मनंही मोठी असावी लागतात हेच खरं. नातेवाईक असूनही वैशाली आणि श्रीकांतदादाने दाखवलेली औपचारिकता मनाला खुप वेदना देऊन गेली." का वागतात अशी ही माणसं?"तो विचार करु लागला आणि त्याच्या लक्षात आलं की ही माणसं आपला कंफर्ट झोन सोडायला तयार नसतात. येणाऱ्या पाहुण्यांनी त्यांना अगोदर दोन दोन वेळा सांगितल्याशिवाय येऊ नये. सांगूनही आलं तरी त्याच्यासाठी आपले ठरलेले कार्यक्रम रद्द करण्याची विशेष म्हणजे पाहुण्यांमुळे होणारी अडचण सहन करण्याची त्यांची तयारी नसते. त्यात आपल्या प्रायव्हसीचं नको तेवढं कौतुक त्यांना असतं. त्या प्रायव्हसीत बाधा आणणारी माणसं त्यांना नको असतात."अतिथी देवो भव " या संकल्पनेशी त्यांना काही देणघेणं नसतं. मग अतिथी मलकापूरसारख्या छोट्या गांवातून आलेले असले की ते त्यांना काहीच किंमत देत नाहीत. विकासला वैशाली आणि श्रीकांतदादाचा खुप संताप आला. ते मलकापूरला आले की आपणही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्यांना अजिबात किंमत द्यायची नाही हे त्याने ठरवलं. माणसांना किंमत देण्यावरुन अचानक विकासला आठवलं की विठूकाकांचं संपूर्ण कुटुंब त्याला पुन्हा पुन्हा परत येण्याचा आग्रह करत होते पण तो एकदाही त्यांना म्हंटला नाही की "मलकापूरला आले की आमच्याकडे जरुर या" "का आपण त्यांना तसा आग्रह केला नाही? मलकापूरला ते आपल्या घरी स्वतःहून येतात पण आपण त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना आपण किंमत देत नाही. वैशाली आणि श्रीकांतदादा जसे आपल्याला गावंढळ आणि कमी दर्जाचे समजतात तसंच आपण विठूकाका आणि त्यांच्या कुटूंबाला तर समजत नाही? की ते आपल्या दुकानात नोकर होते म्हणून आपल्याला ते खालच्या दर्जाचे वाटतात?"
या विचारासरशी विकास एकदम दुःखी झाला. स्वतःच्या वागण्याची त्याला लाज वाटू लागली. आपण चुकीचं वागलो हे लक्षात आल्यामुळे एक विचित्र सल त्याच्या मनाला टोचू लागला."विठूकाकांना आपण ते घरी आल्यावर त्यांना किंमत देत नाही हे त्यांच्याही लक्षात आलं असेल पण तो आकस मनात न ठेवता त्यांनी आपलं प्रेमाने स्वागत केलं आपला उत्तम पाहुणचार केला. माणसं अशी वागू शकतात?" अचानक त्याला एक प्रसंग आठवला. त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यावर त्यांना हाॅस्पिटलमध्ये भेटायला येणाऱ्यांची रिघ लागली होती. पण जवळच्या नातेवाईकांनी तीन दिवस उलटून गेले तरी तोंड दाखवलं नव्हतं. त्याचा संताप येऊन तो वडिलांना म्हंटला होता "बघा तुम्ही त्या लोकांसाठी इतकं करता पण आहे का त्यांना तुमची काही किंमत. येणं तर सोडाच पण साधी विचारपूसही त्यांनी केली नाही."
त्याचे वडिल हसून म्हणाले होते.
" बेटा माणसं ही अशीच असतात. बघ काही माणसं थोडासा पैसा आला की माज दाखवतात, घमेंडी होतात. मी म्हणजे कोण? असं त्यांना वाटू लागतं. तर काही माणसं करोडपती असूनही नम्र असतात. काही माणसं आपण थोडंसं रागाने बोललं तर संबंध तोडून टाकतात पण काही माणसांना शिव्या दिल्या तरी ती अपमान सहन करतात आणि आपलं चांगलं वागणं सोडत नाहीत. स्वतःची पात्रता नसतांनाही काही माणसांचं आयुष्यच दुसऱ्यांना तुच्छ लेखण्यात जातं त्याउलट काही माणसं सर्वार्थाने मोठी असुनही आपला मोठेपणा दुसऱ्यांना जाणवू देत नाहीत. माणसं ही अशीच असतात. ती कशी का वागेनात आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागत रहायचं कारण त्यातूनच आपल्याला समाधान मिळत असतं "
आज विठूकाकांच्या कुटूंबाने हेच तर दाखवून दिलं होतं. ते आठवून विकासचं मन भरुन आलं आणि त्याने मनाशी निश्चय केला की कुणी कितीही खालच्या दर्जाचा असेना का किंवा तो आपल्याशी कितीही वाईट वागला तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. शेवटी तीही माणसंच आहेत. त्यांना माणसाप्रमाणेच वागवलं गेलं पाहिजे.

©️ दीपक तांबोळी
    9503011250
(ही कथा माझ्या "वाटणी"या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...