बुधवार, १७ जुलै, २०२४

1279. दर्शन

     नित्यनेमाची पूजा आटोपुन राव साहेब देवघरातून बाहेर आले. समोर नेहमीप्रमाबे २० - २५ माणसं येऊन बसलेली होतीच. कुणी अनुभव सांगायला, तर कुणी कीर्तनाची बोलणी करायला. रावसाहेब म्हणजे पंचक्रोशीत किर्तनासाठी प्रसिद्ध. त्यांचं कीर्तन म्हणजे अस्सल अध्यात्म सांगणारं. ज्याने मनापासून ऐकलं आणि आचरणात आणलं, तो हा भवसागर तरला म्हणून समजायचं ! रावसाहेबांच्या घराला अध्यात्माची जणू त्या पांडुरंगाने स्वतः दीक्षा दिली असावी. रावसाहेबांची ही पाचवी पिढी जी की, ही धुरा सांभाळत होती. त्यांच्या वडिलांनी तर वारीतच वैकुंठागमन केलं. आईचं वय आज ८५ वर्ष. राव साहेब घरात सर्वात लहान मात्र अध्यत्माच्या ओढीने त्यांनी त्यांचं एक वेगळं वलय आणि स्थान समाजाच्या मनात निर्माण केलं होतं. रोजची पहाट पांडुरंगाच्या स्मरणातच आणि रात्र सुद्धा त्याच्याच समरणात व्हायची. आज सुद्धा पांडुरंगाची यथाशक्ती पूजा करून ते बाहेर आले. समोर बसलेल्या सर्वाना त्यांनी हात जोडून नमस्कार केला. सर्वाठायी तोच एक ईश्वर आहे हेच अध्यात्म सांगते आणि तेच ते इतरांना सुद्धा सांगत.
महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
म्हणत म्हणत ते त्यांच्या आसनावर बसले. समोर बसलेले ५ जण सहज पुढे आले. त्यातील दोघांनी एक कागद पुढे केला. रावसाहेबांनी तो वाचला. त्यांच्या एका सेवकाकडे दिला. आणि म्हणाले, 
“ही तारीख रिकामी असेल तर ह्यांना दे.” रावसाहेब कधीच कुणाला अडुन बघत नव्हते. नेहमी शांत आणि समाधानी होते. त्यांच्या अध्यात्माचं तेज त्यांच्या चेह-यावर दिसून यायचं. कीर्तनाची बोलणी करायला आलेले बाजूला झाले. एक परिवार पुढे आला. म्हतारीने पटकन नातवाला रावसाहेबांच्या पायावर घातलं. पांडुरंग पांडुरंग म्हणत त्यांनी त्या तान्हुल्याला उचलून घेतलं. हातात ५० रुपये दिले. म्हातारी बोलू लागली, 
“तुमचाच आशीर्वाद आहे, सून आणि लेक घटस्फोट घेणार होते, तुम्ही समजावलं आणि दोघपण नीट संसार करू लागले, आज गुण्यागोविंदाने नांदत आहेत ! माझ्या घराचं गोकुळ झालं. असेच आशीर्वाद आणि कृपा असू द्या !”
“माझे कसले आशीर्वाद आणि कृपा, सगळी कृपा आणि आशीर्वाद त्या विठुरायाचे आहेत.”  बाळाला त्याच्या आजीजवळ परत देत रावसाहेब म्हणाले. त्या दाम्पत्याने जोडीने महाराजांना नमस्कार केला. रावसाहेबांनी त्यांच्या हातावर खडीसाखरेचा प्रसाद ठेवला. तो परिवार सुद्धा आनंदाने निघून गेला. रावसाहेबांचं लक्ष गेलं. मागे एकजण कितीतरी वेळेचा अस्वस्थ होऊन बसलेला होता. आणखी एक दोन जण रावसाहेबांना भेटून गेले. पण तो काही केल्या पुढे सरकेना. तितक्यात कीर्तनाची बोलणी करायला आलेल्यांना त्यांना हवी ती तारीख रावसाहेबांची मिळाली. त्यांना अतिशय आनंद झाला. ते निघतो म्हणाले. त्याच वेळी रावसाहेब म्हणाले, 
”जेवून जा, तुम्ही लांबून आला आहात. बाहेरचं काही खाऊ नका !”
“कशाला उगीच आमचा त्रास करून घेता” त्यातील एकजण पुढे येत म्हणाला.
“तुम्ही बाहेगावहून आलात हे आधीच सांगितलं होतं. त्याचवेळी तुमच्या जेवणाची सोय करून ठेवली आहे. सावकाश जेवण करून जा." रावसाहेबांनी त्यांना सांगितलं. “जशी तुमची इच्छा” असं म्हणते ते जेवायला निघून गेले. आता कुणीच नाही हे बघून केव्हाचा मागे बसलेला इसम पुढे आला.
“नाव आणि गाव कोणतं? आणि काय  समस्यां आहे?” रावसाहेबांनी चेहऱ्यावर अतिशय शांत भाव ठेवत विचारलं. इतक्या आत्मीयतेनं विचारल्यावर आलेल्या व्यक्तीला फार बरं वाटलं. “मी रेमश महाराज, म्हणजे नाव रमेशच आहे पण लोकं महाराज पण म्हणतात ! मी इथलाच आहे; पण कधी आपली भेट झाली नाही. आज भेटावं वाटलं तुम्हाला म्हणून आलो.” रमेश महाराज सगळं सांगू लागले. 
त्याच्या पेहरावरून रावसाहेबांच्या लक्षात आलं की, भागवत संप्रदायच्या वाटेवर पाऊल चालणारी व्यक्ती आहे. डोक्यात टोपी, अंगात कुर्ता पायजामा,  कपाळावर अष्टगंध - बुक्का लावलेला. 
 “वाह ! महाराज का म्हणतात लोकं?” रावसाहेबांनी विचारलं.
“रोज हरिपाठ घेतो. कीर्तन करतो सेवा मिळाली तर आणि नियमितपणे ज्ञानेश्वरीचं पारायण देखील करतो; म्हणून मला अनेकजण महाराज, माऊली असं संबोधतात !” रमेश महाराज सांगू लागले.
“छान वाटलं, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या मार्गावर चालता हे ऐकून माऊली”, रावसाहेब म्हणाले. हात जोडत “पांडुरंग ! पांडुरंग !” सुद्धा म्हणाले.
“हे सगळं १८ वर्षे म्हणजेच दीड तप झालं करत आहे. परंतु विठ्ठलाने दर्शन मात्र काही दिलं नाही अजून?” खाली मान घालत नाराजीच्या सुरात रमेश महाराज म्हणाले.
“का अभिलाषा आहे विठ्ठलाच्या दर्शनाची?” रावसाहेबांनी प्रश्न केला.
“का म्हणजे? मी इतकं त्याचं नामस्मरण करतो. रोज हरिपाठ म्हणतो. त्याची पूजा करतो. न चुकता वारीला जातो. असं सगळं करूनही त्याने एकदाही अनुभव देऊ नये का?”  रमेश महाराजांनी सगळं सांगून प्रश्न केला.
रमेश महाराजांच्या डोळ्यात विठ्ठल दर्शनाची तळमळ रावसाहेबांच्या नजरेतून चुकली नाही.
“घरात कोण कोण आहे?” रावसाहेबांनी प्रश्न केला.
“ह्याचा विठ्ठलाच्या दर्शनाशी काय संबंध?” रमेशमहाराजांनी प्रतिप्रश्न केला.
“आहे तर !” रावसाहेबांनी गोड हसत उत्तर दिलं.
“म्हतारे आई-वडील आहेत, बायको दोन मुलं, असे आम्ही ६ जणं आहोत घरात !” रमेश महाराजांनी संगीतलं.
“वाह ! भाग्यवान आहात ! इतकं सर्वांचं करून तुम्ही परमार्थ सुद्धा साधता. फार कौतुक वाटलं ऐकून”  रावसाहेब उद्गारले.
“नाही, आई-बाबांकडे बायको बघते. मुलं मोठी आहेत त्यामुळे त्यांचं ते सगळं करतात. मला फार लक्ष घालावं लागत नाही.” रमेश महाराजांनी सांगितलं.
“छान, तुम्हाला विठ्ठल दर्शन देईल पण एक त्याग करावा लागेल तुम्हाला. कराल का? माऊली.” , रावसाहेब म्हणाले.
“विठ्ठलाच्या दर्शनासाठी मी काहीही करू शकतो !” रमेश महाराज पटकन म्हणाले.
“बघा हो, नंतर म्हणू नका की हे शक्य नाही म्हणून !” रावसाहेब चेहरा थोडा गंभीर करत म्हणाले.
“नाही...नाही म्हणणार काही विनातक्रार सगळं ऐकेन तुमचं आणि तसंच आचरण करेन.” रमेश महाराज म्हणाले.
“बरं ! मन घट्ट करा आणि ऐका.......” 
“सांगा पटकन माउली सांगा....” रमेश महाराज रावसाहेबांचं वाक्य तोडत म्हणाले.
“ह्यावर्षी वारीला जाऊ नका !” रावसाहेबांनी वाक्य पूर्ण केलं.
“काय ? वारीला जाऊ नको !” रमेश महाराज खिन्न झाले.
“होय, ह्यावर्षी वारीला न जाता घरीच सर्व वेळ आई वडिलांना, मुलांना बायकोला द्या.” रावसाहेब म्हणाले.
“पण वारीला न जाता विठ्ठल दर्शन कसं देईल?” रमेश महाराजांनी पुन्हा प्रश्न केला.
“तो कसा देईल हे नाही सांगू शकत मी. पण दर्शन देईल इतकं नक्कीच !” हे सांगत असताना रावसाहेबांच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास होता. तो आत्मविश्वास रमेशमहाराजांना सुद्धा जाणवला. ते उठले. रावसाहेब सुद्धा उठून उभे राहिले. रमेश महाराज रावसाहेबांच्या पायापडले. रावसाहेब सुद्धा रमेश महाराजांच्या पाया पडले. सर्वाठाई तोच आहे ह्या जाणिवेने रावसाहेब त्यांच्या पाया पडणाऱयां च्या सुद्धा पाया पडायचे. नाहीच शक्य झाले तर हात जोडून पांडुरंग पांडुरंग !
रमेश महाराज घरी जायला निघाले. त्यांच्या मनात विचार चक्र सुरू झाले.
“वारीची तर तयारी सुरू केली होती. आता काय कारण देऊन थांबावे पांडुरंग रागावणार तर नाही ना ! पण आजवर रावसाहेबांनी लोकांना जो काही उपदेश केला त्यांना चांगली प्रचिती आलीच आहे.” हा सगळा विचार करून रमेश महाराजांनी ह्यावर्षीच्या वारीला जायचं टाळलं. ते घरीच थांबले. रोजचं नामसमरण त्यांचं काम आणि ह्या कामातून त्यांनी अगत्याने वेळ काढून आई वडिलांची सेवा केली. त्यांच्या पत्नीला आणि मुलांना आश्चर्य वाटलं. की गेली १८ वर्षे झाले ह्यांनी वारीत खंड पडला नाही. त्यांनाही सगळं चुकल्या सारखं वाटू लागलं. रोज वरीच्या बातम्या बघून रमेश महाराजांचं मन थोडं अस्वस्थ होतं होतं. पालखी मागून आणखी तिकडे पंढरपूच्या दिशेने जात होती. वारीचा सोहळा रंगला होता. रिंगण, पालख्यांच गावोगावी होणारं स्वागत. ह्या सर्वांचा १८ वर्षांचा अनुभव रमेश महाराजांना होताच. पण तरीही वारीत नाही ह्याच थोडं दुःख वाटत होतं. रोज विठ्ठल दर्शनाची ओढ मात्र वाढत होती. आषाढी एकादशीच्या पहाटे रमेश महाराज उठले. घरातील इतर सदस्य सुद्धा उठले होते.
“तुम्ही सगळे का उठले इतक्याक्ष लवकर?” रमेश महाराजांनी प्रश्न केला.
“आम्ही दरवर्षी गावातील विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेता.”  मुलांनी उत्तर दिलं.
“बरं ! तुम्ही या जाऊन तिघे मी आई बाबांजवळ थांबतो.” रमेश महाराज म्हणाले.
ते तिघे निघून गेले. रमेश महाराजांनी आई बाबांना उठवलं त्यांना आंघोळ घातली. दूध प्यायला दिलं. एका खुर्चीत बसवलं. देवाला अंघोळ घालायचं पात्र घेतलं. घरातील पुजेचं सर्व साहित्य घेतलं. आई-बाबांचे चरण धुतले. त्यांची पाद्यपूजा केली. आई-बाबांनी लेकराच्या पाठीवर आशीर्वाद म्हणून हात ठेवला. तो स्पर्श जणू आज पहिल्यांदा रमेश महाराज अनुभवत होते. आशीर्वादाचा हात पाठीवर ठेवता बरोबर रमेश महाराजांचे अष्टभाव जागृत झाले. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या अश्रूंचा आई वडिलांच्या चरणावर अभिषेक होऊ लागला. कानी टाळ – मृडुंग वीणा आणि हरीनामाचा गजर येऊ लागला. अनाहत नाद हाच ह्याची प्रचिती आली. त्या भक्तिरसात रमेश महाराज न्हाऊन निघत होते. इकडे आई वडिलांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक होत होता आणि तिकडे पंढरीत विठुरायावर अभिषेक सुरू झाला होता. इतक्या वर्षात प्रथमच अष्टभाव जागृतीचा अनुभव रमेश महाराज घेत होते. आई वडिलांच्या चरणावरून डोकं उचललं. बघतात काय तर घरात सर्वत्र एक दैदिप्यमान प्रकाश होता. तुळशीचा सुगन्ध घरात सर्वत्र पसरला होता. आईवडिलांच्या मागे साक्षात विठोबा रखुमाई उभे होते. रमेश महाराज्यांच्या आनंदाश्रूना थारा उरला नव्हता. विठ्ठला , पांडुरंगा. समोर दिसणारं दिव्य स्वरूप डोळ्यात साठवून घेतलं आणि गजर केला.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
ही कथा पांडुरंगाच्या चरणी समर्पित.

लेखक- अज्ञात...🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...