सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

520. स्वावलंबनाची आणि स्वाभिमानाची आत्मविश्वासू धार

 आज केसांत माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध नाही तर अभिमान सर्वत्र दरवळत होता.           
गाडी चालवताना त्याच दरवळीच्या विचारांसोबत  युक्ता मागे भूतकाळात गेली..
.....सहा-सात वर्षांपूर्वी एका शिक्षिकेच्या तीन महिन्यांच्या मेडिकल रजेमुळे नववी 'अ' चा वर्ग तिच्याकडे आला होता. तशी ती ज्युनिअर कॉलेजची अध्यापिका, पण शालेय कामकाज आणि शैक्षणिक गोष्टी गरजेनुसार सर्वसमावेशक असतात. असे मानून तिने ज्यादा भार सांभाळला होता.
नुकतीच परीक्षा संपल्याने पेपरचे गठ्ठे तपासत कॉम्प्युटर लॅबमध्येr बरेच शिक्षकवृंद बसले होते. आपापल्या टेबलावर भरगच्च गठ्ठ्यांत गढून गेलेले प्रत्येकजण, उरक कामं उरकण्यासाठी धडपडत होते.
युक्ता शांतपणे चिमुकल्यांच्या दुनियेत हरवायची. छोट्यांचं जगच अदभुत!
कुतूहल, दंगा, गोंगाट, सर्वमान्य मारामारी-भांडण, एकत्र डबा खाणं आणि जाताना पुन्हा खांद्यावर हात टाकून मस्तीत ‘मैतर’ होऊन जाणं... दुनियेच्या हर तऱ्हेच्या गहन, संभ्रामक, विचारांच्या पलीकडल्या निरागस दुनियेचा युक्ता मनमुराद आस्वाद घ्यायची. शिक्षकी पेशा शिक्षकाला खूप खूप काही दररोज नवीन शिकवतो. महिनाअखेरच्या पगारापेक्षा अनंतकाळ टिकणारी, जगणं शिकवणारी ही मानाची संपत्ती असते.
        युक्ता पेपर तपासत होती आणि त्यामध्ये एक पेपर पेन्सिलीने लिहिलेला होता. आवर्जुन लक्ष गेले तिचे, पेपर मधील उत्तरे अचूक आणि धारदार होती. पैकीच्या पैकी गुण मिळवणारा हा नग कोण असावा? आणि पेपर पेन्सिलने का लिहिला असावा ? नाव व नंबर पाहून त्या मुलाला शिपाईकाकांना सांगून वर्गातून बोलावून घेतले. 
थोड्याच वेळात तिच्या समोर सावळा, उंच, मध्यम बांध्याचा, सरळ नाक, टपोरे तपकिरी डोळे असलेला, अंगात टापटीप, सुरकुतलेला पण स्वच्छ गणवेश यातला एक मुलगा मागे हात टांगून घाबरलेल्या चेहऱ्याने उभा होता. तिच्या हातात पेन्सिलने लिहिलेला त्याचा पेपर पाहून थोडा बिचकला. आता मॅडम रागवणार! शिक्षा करणार! असं काहीतरी तो विचार करत असावा.
तिने विचारलेच, "तुला माहिती आहे तू काय केलं आहेस ?" 
तो नुसतीच मान हलवून हो म्हणाला.
"तुला पैकीच्या पैकी गुण आहेत वर्गात तू या विषयांमध्ये पहिला आला आहेस." 
तो पुन्हा नुकताच मानेने हो म्हणाला.
पेन्सिलने पेपर लिहिला म्हणून मॅडम रागवतील अशाच काही प्रश्नांमध्ये अडकलेला-- तिने तोच प्रश्न त्याला विचारला, "पेपर पेन्सिलने का लिहिला ?"
थोडा संकोचून हळू आवाजात म्हणाला, "मॅडम, माझ्याकडे पेन नाही." आम्हाला विद्यार्थ्यांच्या अशा कारणांची सवय झाली होती पण आज या कारणामध्ये खरेपणा जाणवला, त्याच्या आवाजात आणि डोळ्यांतही.....
"आता कशाने लिहितोस?" 
"पेन्सिलने."  तेवढेच उत्तर.
 "जा, ती पेन्सिल घेऊन ये."
तो दारापर्यंत गेला. थोडं थांबून वळून तिच्याकडे पाहून तो पळत गेला. ती पुन्हा पेपर चाळू लागली. 
थोड्या वेळाने तो आला. पेपर पाहिला तेव्हा त्याच्या बोटांची करामत त्याच्या हातांतून कळली होती. बोथट झालेल्या पेन्सिलने सुद्धा इतकं वळणदार सुंदर, सुबक आणि स्वच्छ अक्षर काढता येऊ शकतं! 
खाडाखोड नव्हती आणि प्रत्येक उत्तर अचूकच होतं.
त्याने युक्ताकडे पेन्सिल दिली. अडीच-तीन इंचाची पेन्सिल, तिच्या हातात होती; आणि 'आता मी कशाने लिहू?' असं काहीतरी प्रश्न घेऊन गोंधळलेल्या चेहऱ्याने तो समोर उभा होता.
        तेवढ्यात शिपाई काका आले थोड्या वेळापूर्वी त्याला वर्गात पेन्सिल आणायला पाठवून शिपाई काकांकडे तिने पैसे देऊन एक कंपास बॉक्स आणि दोन पेन आणायला सांगितले होते. त्या वस्तू घेऊन ते आले होते.
वस्तू ठेवून ते निघून गेले.
"हे नवीन कंपास बॉक्स आणि दोन पेन तुझ्यासाठी, घे " ती म्हणाली.
तो मागे हात टांगून नुसताच उभा होता. 
एरवी कोणाला असं काही विद्यार्थिदशेत मिळालं असतं तर उड्या मारल्या असत्या पण हा तरीही उभाच होता. शांत चेहऱ्याने.. फक्त त्याच्या मनात चाललेली चलबिचल डोळ्यांतून दिसत होती.
 
माणसाचे डोळे कधी कधीच खोटे बोलत नाहीत. आणि इतक्या वर्षांच्या शिक्षकी अनुभवाने तिला विद्यार्थी डोळ्यांतून वाचायला नक्कीच शिकवले होते.
"मॅडम, याचे किती पैसे द्यायचे?"
"अरे हे तुझ्यासाठी आणले आहे याचे पैसे नकोत."
"फुकट मला काही नको, माझी पेन्सिल मला परत द्या."
         आता तिला राग यायला हवा होता पण नाही आला. थोड्यावेळापूर्वी त्याच्याकडून त्याची पेन्सिल मागवली तेंव्हा जाताना त्याने मागे वळून पाहीले त्याचा अर्थ आता तिला कळाला होता. स्वाभिमानी होता तो.
युक्ताला त्याचा स्वाभिमान दुखवायचा नव्हता.
" ठीक आहे, हि पेन्सील मला दे. त्या बदल्यात हे सर्व घेऊन जा."
"मी त्याचे पैसे दररोज एक-एक रुपया देऊन पूर्ण करू का?"     
आता तिची सटकली होती! पण मनातून आनंद आणि अभिमान वाटत होता. हा काही ऐकणार नाही आणि तिला त्या चिमुकल्याचं स्वाभिमानी मन मोडावंसं वाटेना. "बरं जा." म्हटल्याबरोबर तो त्या वस्तू घेऊन पळत सुटला.
      बऱ्याच वर्षांतून तिच्यासारखा स्वाभिमानी तिला कोणी भेटला होता.
गुरू-शिष्याचं स्वाभिमानी नातं असं तयार झालं.
त्या दिवसापासून पैसे पूर्ण होईपर्यंत एक-एक रुपया येऊन तो दररोज युक्ताकडे देत होता. न चुकता.              
युक्ताने त्या स्वाभिमानी फंटरची माहिती काढली. त्याचे आई-वडील पूर्वी नर्सरीची राखण करत होते. दररोज फुलझाडांची निगराणी करणे, खत-पाणी घालणे, अनावश्यक छाटणी करणे, फुले तोडून ती मार्केटला पोहोचविणे इत्यादी कामे आवडीने करत असत. तेंव्हा तो मुलगा पाच वर्षांचा असेल फुलांची, रोपांची गाडी मार्केटकडे घेऊन जाताना रस्त्यात अपघात होऊन त्यामध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याची आई त्याला घेऊन मामाच्या घराजवळ खोली घेऊन राहत होती. इतरांच्या घरी जाऊन आई घरकाम करत होती.
हा दहा-बारा वर्षांचा असल्यापासूनच कष्टाळू आणि जाणीव ठेवणारा होता. सकाळी सायकलवर जाऊन पेपर वाटायचा. शाळा सुटल्यानंतर वाण्याच्या दुकानात कामाला जायचा. आईला मदत करायचा.
         त्यानं खूप शिकावं हे स्वप्न बाळगून आई खूप कष्ट करत होती. आता अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून आईने वाण्याच्या दुकानातील नोकरी सोडायला लावली.
         तो गप्प बसणारा नव्हताच. आता तो सकाळी मार्केटमधून फुले आणून घरी द्यायचा. आई गजरे बनवायची आणि शाळा सुटल्यानंतर सिग्नल चौकांमध्ये संध्याकाळपासून रात्री साडे नऊ पर्यंत गजरे विकायचा.
          फुलझाडांना जोपासून फुलांच्या सुगंधाने दुनियेला सुगंधी दरवळीचा आनंद देणारे त्याचे बाबा फुलांच्या साक्षीने त्याच्यासोबत असतात असा त्याचा बालसमज होता. 
बुद्धिवंताला परिस्थितीचा शाप असतो म्हणतात.
खरे आहे!!           
     ह्या गोष्टीला सात वर्षें होऊन गेली. आज सिग्नलला युक्ताने गाडी थांबली तेव्हा चेहरा पूर्ण बांधलेला असूनही त्याने तिला ओळखलं. पळत पळत आला आणि दोन गजरे पुढे करून, "मॅडम, तुमच्या साठी." म्हणाला. तिने पर्समधील पैसे काढले त्याने पुन्हा दोन्ही हात मागे केले. ती हसली तो ही हसला. मागची आठवण तरळून गेली..
        एम. कॉम. करतो आहे आणि एका सहकारी बँकेमध्ये जॉब करत असल्याचं त्यानं सांगितलं.
त्याने पैसे घेतले आणि म्हणाला, "मॅडम, ही वीसची नोट मी जपून ठेवीन. तुम्ही माझी पेन्सिल अजूनही जपून ठेवलीत तशी.." 
..आणि हसत हसत गर्दीत निघून गेला.
डोळ्यात विद्यार्थी वाचणारी ती आज तिच्याच एका विद्यार्थ्याने तिच्यातील आर्द्र, हळवं मन वाचलं होतं.
तिच्याच एका विद्यार्थ्याने तिच्यातील गुरुपण वाचलं होतं.
चिमुकल्या मुठीत छोटीशी पेन्सिल घट्ट धरणाऱ्या हातातला हा गजरा आज तिला स्वाभिमानाची साक्ष देत होता, जाणीवेची भाषा बोलत होता. बोथट परिस्थितीच्या पेन्सिलीला स्वावलंबनाची आणि स्वाभिमानाची आत्मविश्वासू धार आलेली दिसत होती...

519. 'जीवनचक्र'

          शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट  एकदम शांत झाला. आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं . 
 मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले.  सरांनी आपला वर्ग सुरू केला.
" फुलपाखराचे जीवन चक्र "
शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं. पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं . त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं. ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत  होतं.  त्याची ती धडपड , वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते . 
तितक्यात वर्गात पिऊनने  येऊन सांगितलं .." सर , तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .."
शिकवणं थांबवून सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले  ," मुलांनो , मी जरा भेटुन येतो सरांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची , फुलपाखरु कितीही त्रासात आहे  असं वाटलं,  तरीही ते त्याच्याच चांगल्यासाठी असणार आहे, तेव्हा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करु नका. तुमची मदत त्याला हानीकारक होऊ शकते . "
शिक्षक निघुन गेले. जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले . आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले . 
आता  त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती . " ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय "
"अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना ."
" बापरे , कीती दुखत असेल त्याला  "
" काही होणार नाही त्याला , काढ तो कोष बाजुला ," 
अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला आणि कोष बाजुला केला ..
  मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते .. पण ते तसे न होता भलतेच झाले ....फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडले गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही .....दुसर्याच क्षणी ते कोलमडुन पडले .....
  मुलं घाबरली. आता आपल्याला रागावणार सर...!
शांतपणे जागेवर जाऊन बसली.
सर परत आले ...
वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे. उत्तर समोरच दिसलं  ...
   फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं ...
         शिक्षकांनी त्यात जास्त विचारपूस न करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ..ते म्हणाले ..."मुलांनो, जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या  बळावर पंख पसरवू दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते. कारण ते कष्ट , त्या यातना त्याला ती सक्षमता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढचं  जीवन जगायचं बळ मिळत जात असतं, जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात. आयष्यात सगळंच एकसारखं , सोप्प , सुंदर , मनाजोगं मिळेलच असं नाही , ते मिळालं नाही म्हणून निराशा मनात बाळगुन उदास होण्यापेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं. जीवनातले  कष्ट  हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे." पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मुलांना आज आपण जे संगोपन देतोय ते काहीसं अशाच प्रकारचं आहे.   सुरक्षितता आणि सुखसोई द्यायच्या नादात आपण त्यांचा कोष हातानेच काढू बघतोय .  बाहेरच्या जगात वावरताना मुलांना जी हुशारी , जी समयसुचकता , जो संयम  हवा आहे तो मुलांमधे कमी आढळतो. त्यामुळेच की काय मुलं थोडाश्या निराशेने , अपयशाने खचून जातात .  सगळ्या वस्तु त्यांना सहज उपलब्ध झाल्याने त्यांना वस्तुंची किंमतही उरत नाही . प्रत्येक वेळी एक आधारस्तंब म्हणुन आपण त्यांच्या मागे आहोतच पण प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत आपलं  राहणं अशक्य आहे. म्हणून मुलांना त्यांच्या कोषातुन स्वत:च बाहेर पडु द्यावं. त्रास होईल पण तो हिताचा राहील त्यांच्याचसाठी.

518. मी काय म्हणतोय पोरा, तु येणार हायेसा तर गाव...

 मी काय म्हणतोय पोरा, तु येणार हायेसा तर गाव शिवाराला वळसा घालुन ये !!
पोरा.., 
बऱ्याच दिसापासनं येतो येतो म्हणून खोटे वायदे करुन आखीर तु येणार म्हुनशान मी लई आनंदलो...पांढऱ्याफेक हायफाय गाडीतून येताना बायकुपोरांना  बी सोबत आण... मातुर येता येता वाकडी वाट करुन रानात जावून ये,  पिक मान टाकतं म्हंजी काय व्हतं हे स्वता बगुन घे.. शेतात जरा जपून चाल.. पावसानं गुंगारा दिल्यानं रान भेगाडलंय.. तुझ्या बायकुची उच टाचाची वहाण त्या भेगात गुतली तर साऱ्या गावात बोंबाबोंब व्हईल.. पोरांना बोटाला धरुन ठेव.. वाळलेलेली बुडखं पायात घुसतील... तुला तर ल्हानपणापासुन हे समदं माह्यती हायेस...सुकलेली पिकं बघ, मातीत गेलेला खर्च बघ...पिकाला एखाद्या अट्टल जुगाऱ्यासारखे आवंदा बी फुक्कट पैसे लावले म्हुणशान मला बोल लावू नकोस...कितीतरी येळा जुगार हारलो पण हार मानली नाही... मिरीग नक्शत्र लागलं की जुगाराचा एक डाव खेळुन बघायचाच, असं अंगात वारं भरतं बग.... पण जव्हा जव्हा जितलो व्हतो तो पैका तुझ्या मायच्या औषधपाण्याला कात्री लावून तुझ्या शिक्शनालाच लावला व्हता....माझ्या अंगावर कापडं चोपडं हायेत का नाही याची मला कधीच फिकिर नव्हती.....हां, एवढं मातुर खरं हाये की मला जुगार खेळायचं लई येसन लागलंय.... ते वाईट का चांगलं हे समजत नाय मला... पण ते काय सुटता सुटणार नाय बग.. या जुगाऱ्याचं पोरं शिकुन मोठ्ठा सायेब झालं एवढ्या आठवणीनं सुदीक मी हरखुन जातो.... आरं,, मी आख्खं आयुष्य ह्योच जुगार खेळतोय... जुगार खेळता खेळता एक दिस सरणावर जाईल बघ...जमलंच तर थोडंसक पुढं जाऊन गोठ्यात चाऱ्याविना टाचा घासणारी गायीम्हसरं बघ, बांधावर आभाळाकडं डोळं लावून बसलेली भावकीतली माणसं बघ, पण कोणाशी काही बोलू नको, तत्वज्ञानाच्या गप्पा, दुप्पट उत्पन्नाचे सल्ले तर देवूच नको, सेंद्रिय शब्दाचा उच्चार सुदीक करु नकोस...बियानं, खतं, औषधं, मशागतीवर लंब्याचौड्या गप्पा मारु नकोस..... शेतमालाचे पाडलेले भाव, चढवलेले भाव, सबसिडी, साठेबाजी, रस्त्यावर फेकलेले दुध आणिक कांदे टमाटे, आयात, निर्यात, चाळीस टक्के कराच्या चौकश्याच्या भानगडीत पडु नको...चार महिने कांदा खायचा का नाही खायचा या ईषयाला तोंड फोडु नको... ते पिकईमा, कर्ज माफी, गारपीठ, अतिवृष्टी, हमीभाव, आत्महत्या, बळीराजा, पोशिंदा, पंचनामे, स्वामीनाथन असल्या वांझोट्या ईषयाच्या वाट्याला जाऊ नकोस..."साल्या शेतकऱ्यांना कितीबी दिलं तरी बोंबाच मारत्यात...भाव आकाशाला भिडले शेतकरी मालामाल हुणार" पेपरात असलं भलतं सलतं छापुन आलेलं त्यांना सांगु नकोस.... लोक तुझं खेटरानं थोबाड रंगवतील... तोंडात शेण घालतील.... पायाखाली तुडवून रक्तबंबाळ करतील...ते गरीब हायेती पण स्वाभिमानी हायेती... लाचार नाहीती....मरेस्तोवर काळ्या आईबरोबर निष्ठा बाळगुन राहाणारी हायेती....निष्ठेचा धंदा करुन पैका कमावणारी जात नाय त्यांची.......काही लय वंगाळ बोलला तर तुझ्या आयचा पण उध्दार करायला कमी करणार नाय ते......आयुष्यात काहीही कर फक्त आईचा उद्धार होईल असं वागू नको... सारं आयुष्य करपलं तरी तरी खानदानाची इज्जत म्हत्वाची असती बघ ...तव्हा जिभेला लगाम र्‍हाऊदे...उगीच बिन वाऱ्याचं उफनीत बसु नको !! 
        गुदस्ता तू मागितलेल्या शेतीचा हिशोब तुला नी तुझ्या बायकोला द्यायचाय तसाच राह्यला व्हता .या जुगारी बापानं आयुष्यभर सुपारीचं खांडही खाल्लं नाय की पायाला पायतान आणलं नाही.  उरली सुरल्या शिळ्या भाकरीचे  कोरक्यावर दिसभर नांगर हाकलाय म्या ... माला फक्त एकच व्यसन होतं  ते दर वरसाला दर हंगामात जुगाराचं....हां बरोबर ऐकलंस तु... पुन्ह्यांदा सांगतुया.. तोच जुगार, शेतीचा...नांगरणी केली..बियानं आणुन पेरणी केली... पण पेरललं उगवलंच नाही, उगवलेलं ते सुकुन गेलं.. खळ्यात फकस्त भुस्काट आलं.... त्याच्यात थोडंफार दाणं आलं...पण भाव मिळाला नाही.... ठरुन पाडला बग... दरवर्षीच्या हिशोबाचा ताळेबंद उणे जातोय, दरवर्षी कर्जाचा डोंगर होतोय.... एक दिवस याच डोंगरात गडप होईल, कायमचा... नाय म्हणायला फुगुशान वर आल्यावर नायतर वढ्याच्या बांधावरच्या बाभळीच्या फांटीला दिसंल एखाद्या वाटसरुला !! 
       पोरा.. मन मोकळं करायचंय म्हुण सांगतोय मी तुला.... पावसाने दगा दिलाय तुझ्या बापाच्या इश्वासाला...लई आशा धरुन व्हतो मी... पेरलेलं सुकून गेलंय, वावटळी उठू लागल्यात नी पिकं मुळासकट उलटून चाललीयत.... उन्हाळ्यागत हंडाभर पाण्यासाठी तूझी माय नाय ते आठ परसाच्या हिरीत दररोज खोल उतरतीय.... हे कवतीक म्हुण सांगत नाय म्या...कधी कधी वाटतं मी फसवलं की काय तिला... तव्हा मी हा नसतो म्हणलो तरी बिचारी दुसरीकडे कुठं तरी सुखात पडली आसती....माझ्या पायी वणवण झाली तिची... सोसीक अन् लई कष्टाळू ,मायाळु, धिराची लक्ष्मी हाये बघ ती.... तिच्यामुळंच तर मी इथवर आलोय.... तु बारिक व्हतास तव्हा वाटलं व्हतं, सायब झाला तर हिरीतून पाणी काढायचं चुकल तीचं.. काट्याकुट्याचं सरपण तोडायचं बंद व्हईल.. अंगावरील धुडकं जाऊन इरकली पैठणी येईल.....धुराच्या चुलीपुढं धुपणं संपल... पाणी शेंदायचं बंद व्हईल..... पण अजुन तरी ते सपानच राहिलंय.... असो, चार दिसाखाली, आपल्या पल्याड र्‍हाणाऱ्या बायजा काकूचा हिरीत तोल गेला नी ती जिवंत परतली नाही.... मला तुझ्या मायीचीबी लई भीती वाटतीय....तुला पाठकुळी घेणारा तो कुशाभाऊ वावराला चकरा मारून बेजार झालाय....रोज  दावं हातात घेतो, मारोतीच्या पाराला येढा हानतो अन् हात जोडत शेवटाचा आलोय असे सांगतो ...पण लेकीच लगीन राहिलंय म्हणून तो मागे फिरतो. गुदास्ता लेकीच लगीन झालं असतं तर आज त्याच्या बापाच्या थडग्याला चिटकून ह्याच्याही थडग्याला निवद दाखवायची येळ आली असती !! बापाचे हाल बघुन लेकीनं जीवाचं काय बरं वायट करु नये म्हुण मी देवाला साकडं घातलंय !! 
        तुझी शिकली सवरलेली बायको दरवरसाला येवून शेतीचा हिशोब मागते, तलाट्याकडे चवकशी करते, भावकीत खरंखोटं करते, पै पाव्हण्यात काय बी बोभाटा करते आन् तु मातुर एक शबद सुदीक बोलत नाय तव्हा माझ्या जिंदगीचाच हिशोब चुकलाय अस मला वाटून जातं. कधीतरी पाप केलेलं फेडतोय असं बारामस वाटत असतं मला. "हे थेरडं काहीच कामाचं नाहीत , खायला काळ भुईला भार, किती दिस जगतंय अजुन कुणास ठाऊक.. उगीच आमच्या डोक्याला ताप" असं जव्हा ती बाहेर सांगत फिरते  तव्हा तर विशाची बाटली घ्यावी नी संपूस्तर खाली टाकू नये, असंच वाटतं मला . पन तुला आडचण आली तर कोण सोडविल म्हणून तीचं विशारी बोलनं गिळून घेतो, गोड समजून.... आदली पायलीनं घरात आलेल्या धान्याचा हिशोब तरी देणार कसा, तूच सांग.... तरी दोन वेळचा विचार न करता तुला दरवर्षी चार पोते टेम्पोत पाठवून देतोय मायेच्या ममतेन. पिकलं नाही तरी उसनवार करुन इकत घेवून पाठवत असतो आणि पुढंही जीवात जीव हाये तोपर्यंत पाठवंत राहील त्याची काळजी करू नको, फक्त गावात लै मज्जा हाय , सुखसमाधान हाय, गावाशिवाय जिंदगी नाही, मोकळं ढाकळं हवापाणी हाय, डोंगरझाडी झॅक हाये, मोप गारेगार रानवारा हाय, असलं दिशाभुल करणारं काय बाय खोट्टं नाटं शहरात बसून तिथल्या लोकास्नी सांगु नकोस, इतकीच हात जोडून सांगणं हाय तुला !!
तुझाच बापमाणूस बाप 

उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग

517. जुन्या वाड्याच्या आठवणी

 अनेक कुटुंबे गुंफणारा
वाडा म्हणजे हाराचा धागा असतो, 
समूहगानातला मल्हार असतो
तो भूप असतो आणि भैरवीही असतो. 

वाड्याचे अंगण म्हणजे नंदनवन असते
छोट्यांचे क्रिडांगण असते, 
महिलांचे वृंदावन असते, 
पाणवठा असते, शिळोपा असते, 

मोठ्यांचे कधी कुरुक्षेत्रही बनते
अंगण सगळ्यांनाच बोलावत असते. 
वाड्यात अनेक बिऱ्हाडे असतात
कुटुंब मात्र एक असतं, 

एका घरातल्या फोडणीची चर चर
सगळीकडे पोहोचत असते
वाड्यात कुणाचेच काही खाजगी नसते. 
जोशाचं बाळ कुलकर्ण्यांकडे झोपते

बंडुला घरच्यापेक्षा शेजारच्यांची भाजी आवडते, 
मिनी लोखंडयांकडे अभ्यासाला बसते
देसाईआजी पावशांची भाजी निवडत असते. 
भावाकडे मुंज आहे ना, मग अशी कशी जाते

माझ्या पाटल्या घेऊन जा, 
नव्या साडीची घडी मोडायचिये घेऊन जा
कुणाचे दागिने, कुणाची पैठणी
कुणाची वेळ कशी साजरी करायची ते वाड्यालाच माहित. 

जा रे , शेजारून वाटीभर डाळीचे पीठ आण
देसाई वहिनी थोडं दूध द्या, 
तुमचा गॅस संपलाय, आमचा घेऊन जा, पाहुणे आलेत तुमची मोठी सतरंजी द्या
हे संगीत केवळ वाड्यातच गायलं जातं. 

जोशी वहिनींचे वडील वारले कोकणात
तार मिळताच वातावरण बदललं, 
जोशी वाहिनिंचे घर माणसांनी भरलं
वाड्यासह अंगणही गहीवरलं, 
सुख दुः खाचं वाटप केवळ वाड्यातच असतं. 

वाडा प्रेमळ होता, त्याचा धाक होता
कुणालाच एकाकी ठेवत नव्हता, 
वाडे गेले, फ्लॅट आले, घरे मोठी पण मने छोटी झाली, 
सोयी वाढल्या , रुबाब वाढला
कुटुंबाची संख्या वाढली, 
एकाकी कुटुंबाच्या गर्दीची आता सोसायटी झाली. 

वाडा गेला, नुसताच गेला नाही
माणसामाणसांना बांधणाऱ्या रेशीम धाग्याच्या गाठी उकलून गेला, 
वाडा गेला, वाडा गेला
उरला फक्त आठवणींचा पाला. 

516. खजिना

 कुठं गेलं चुलीचं धुराडं
अन कोंबड्याचं खूराडं//१//

दुर्मिळ झाली पुरणाची पोळी
अन हुलग्याची शेंगोळी//२//

मिळतय का प्यायला माडगं? 
गेलं कुठं जनावरांचं वाडगं? //३//

गाडगं तर लोपच पावलं
ऊखळ मुसळ केरात गेलं//४//

किती पौष्टिक होती राळ्याची खीर,
आणि रुखवातातील सारनाची पुरी//५//

कधी गायब झालं घरातलं जातं,
लाकडी नांगर, शिवळाटीचं पातं//६//

आता सांगा बांधील का कोणी
गाडीची साकन,औताचं यठण//७//

गेला कुठं पायातला तोढा
अन् ऊधळणारा घोडा //८//

कुठं गेली वावरातली पंगत
 पत्रावळीच्या जेवणाची रंगत//९//

खरोखर विहिरीतच बुडाली
ना पाणी शेंदन्याची बादली//१०//

कसं शोधायचं झऱ्याचं पाणी
आणि पाखरांची मंजूळ गाणी//११//

लोप पावली नऊवारी साडी
अन् मांजरपाट धोतराची जोडी//१२//

गायब झाला हा सारा ऐना
 त्यामुळेच झाली माणसाची दैना//१३//

खरच हरवलं जात्याचं पीठ
अन पांढऱ्या खड्याचं मीठ//१४

गव्हाच्या लापशीचा वास कुठं गेला...
खरच हा खजिना कोणी लुटून नेला? //१५//

515. मला एकटं वाटतय...!

     आपल्या व्यक्तिमत्वविकास च्या समूहावरुन एका मैत्रिणींचा मेसेज आलाय,माझा स्वभाव थोडासा फटकळ आहे,म्हणून मी लोकांच्यात मिसळत नाही पण आता मला खूप एकटं एकटं वाटतयं...! 
      तर.... कांही लोक लहानपणापासूनच एकलकोंडे असतात.अर्थातच ते तस असण्यामागे ब-याच वेळा कौटुंबिक परिस्थिती अवलंबून असते. पण अशा लोकांनी स्वतःवर मेहनत घेणं फारच गरजेच असतं. आयुष्यात एखादी जवळची व्यक्ति प्रत्येकाला हवीच. कारण ह्या एकलकोंड्या व्यक्ति मनमोकळेपणांनी बोलत नाहीत.यांनी जवळच्या व्यक्तिजवळ बोललं तर पाहिजेच पण रडलही पाहिजे.कारण रडल्याने तुमचा ताण हलका होतो.
निम्मे दुःख,अडचण तिथेच संपेल.स्वतःचे विश्लेषण करत रहावे म्हणजे माणसं आपल्यापासून दूर का जातात याची कारणं कळत रहातात.
    कांही लोक स्वतःला न्यायाधीश समजून समोरच्याला फाडकन बोलून जातात..सतत तुम्ही समोरच्याचा अपमान करत राहिला तर कधीतरी त्याची सहनशिलता संपतेच ना...! 
  आणि अशी फटकळ माणसं एकटी पडतात...मी फार तोंडावर बोलतो किंवा बोलते अशी घमेंड करणारे लोक एकटे पडतात.कारण दुराग्रही लोकांना समोरच्याची बाजू कधी ऐकून घ्यायची ,समजून घ्यायची गरज भासत नसते.
     मग ही माणसं एकटी पडतात.त्यांना आयुष्यभर एकटं रहावं लागत...
खरतरं या माणसांना स्वतःवर काम करायला हव,
दुसरों को कहां तराश रहे हो...? 
 तराशो पहले खुद को...
अगर तुम्हे हिरा बनना है...! 
         मनाच्या कोपऱ्यात एखादा न्युनगंड आहे का ? कुठली वेदना राहिलीय का ? कारण तुम्ही स्वतःवर काम करुन लोकांच्यात मिसळण्यासाठी स्वतःला समाजाभिमुख करायला हवं. तुसडेपणाचा,दुसऱ्यांचा मत्सर करण्याचा मुखवटा टाकून द्यायला हवा. कारण मुळात कोणीच खूप चांगला किंवा खूप वाईट नसतो.माणूस काळ्या पांढऱ्या गुणांचे मिश्रण असते.आता आपल्या अंतरंगातील कुठल्या झाडाला खतपाणी घालायचे ते तुम्हीच ठरवायचे .
कारण सतत दुसऱ्यांवर जळत राहिलात, कौतुकाचे दोन शब्दही बोलला नाहीत...तर या नकारात्मक स्वभावाचा तुमच्या शरीरावर,मनावर परिणाम होत असतो. तुमच्या जवळच्या व्यक्तिजवळ स्वतःच्या अडचणींबद्दल मनमोकळेपणाने बोला,मनसोक्त रडा इथेच तुमचे अर्धे प्राॕब्लेम संपत जातील.सतत स्वतःचे विश्लेषण करा.
डायरी लिहीत रहा.प्रसंगातून शिकायचा प्रयत्न करा. खरतरं वेळ काढून नियमित माणसांच्यात मिसळायला हव.    कारण वेगवेगळ्या विचारसरणीच्या माणसात गेल्यामुळे आपला विचारांचे क्षितिज विस्तारायला मदत होते.
आपण सतत विद्यार्थी असायला हवं. आपण जेव्हा मला सगळ कळतं,येतं अस जेव्हा म्हणतो तेव्हाच आपला विकास थांबतो,हे स्वतःला सतत बजावत राहिला हवं.  मी असचं बोलते किंवा बोलतो असा वृथा अभिमान न बाळगता आपल्या बोलण्याच्या पध्दतीत सुधारणा करा. ठामपणे बोला पण शब्दात आणि स्वरात नम्रपणा असू दे...! 
वागण्याबोलण्यातून सहकार्याची भावना समोरच्या माणसापर्यंत पोहचली पाहिजे.शांतपणे मोकळेपणानं वागा.
तुम्ही किती मोठ्या पदावर आहात,किती श्रीमंत आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात.हे महत्त्वाचे आहे नाही का ? ?  असे वागला तर तुम्ही एकटे पडणार नाही,आंब्याच्या झाडाच्या सावलीला लोक येतात मंडळी ...
बाभळीच्या झाडाच्या खाली कोणी विसाव्याला जात नाही...!
     कसंही असलं तरी..एकीकडे जगणं सुंदर आहेच पण दुसरीकडे प्रसिध्दीने वलयांकित झालेल्या, पण 'जगण्याची कमालीची धास्ती' घेतलेल्या, माणसांचा प्रवाहही आहे. आणि अशाच प्रवाहामधुन 'आत्महत्येच्या मार्गाला' कवटाळुन अशा जीवांच्या कडु-गोड आठवणींची प्रेतं वाहुन येऊन, आपल्या अंर्तमनाच्या काठाशी येऊन अचानकपणे जेंव्हा थडकतात..तेंव्हा आपल्यातल्या 'काळजीवाहु माणसाला' अमुक माणुस हे जग सोडायचा निर्णय कसा काय घेऊ शकतो? अरेरे असं कसं काय होऊ शकतं? ह्या अविश्वसनीय प्रश्नाचे ऊत्तर काही केल्या मिळत नाही. याच्या माध्यमातुन, 'एकटेपणं' घेऊन जगायलाही 'जिगर' लागतं..! या बांडगुळी तत्त्वाचा अक्षरश: मारा आपल्या 'मनावर व मेंदुवर' होत राहतो. माणसांचे कडु अनुभव घेतल्यामुळे अशा माणसांपासुन आपण कसे दुर राहिले पाहिजे..त्यांच्याकडे कसे दुर्लक्ष केले पाहिजे..कशा पध्दतीने आपण ' एकटे' जगायला शिकले पाहिजे? याचा पध्दतशीर ' रिसर्च' काहीजण करुन आपल्यासमोर 'रिझल्ट' मांडत राहतात. काहींच्या बाबतीत हे लागु असु शकतं पण..सगळीच माणसं अशी कडु नसतात. प्रैक्टीकली राहायच्या-बोलायच्या व प्रायव्हसी जपायच्या नादात आपण आपल्या आयुष्यातल्या 'गोड' माणसांनाही अनुभवाच्या पातळीवर 'पास' / 'नापास' ठरवायला जातो व शेवटी आयुष्याच्या हजेरीपटावरच्या ख-याखु-या आनंदाला गमावून बसतो. नेहमी माणसांत राहणा-या, माणसांशी नातेसंबंध जोडणा-या, ते टिकवुन ठेवण्यासाठी स्वत:चा वेळ, पैसा, स्वत:चे विचार खर्ची करणा-यांना आजकालच्या जगात 'हा बावळटयं..! हा ना स्वत:साठी जगुच शकत नाही.. हा एकटा जगुच शकत नाही,' हा 'बिझी' नसतो ना..!' म्हणुन माणसांच्या नादी लागुन स्वत:चा टाईम वेस्ट घालवतोय'..! असा संकुचित विचार करणारी 'कुजकट जमातही' आपल्या आजुबाजुला राहते. त्यामुळे होतं काय की..वैयक्तीक आयुष्य जगताना आपण काही 'सामाजिक जबाबदारींचेही' देणे लागतो हे विसरतो. आपण 'बीझी' आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटु लागतो. 
       प्रसंगी माणसांना टाळु लागतो. एकाकीपणा मध्ये आपण स्वत:लाच शोधतो..व स्वत:लाच सापडतो..आपल्या आतील काही चांगल्या गुणांचा यामुळे सुर गवसतो ह्यात वावगं काहीच नाहीय पण हे एकाकीपण इतकही बोजड असु नये की त्याच्या ओझ्याखाली दबुन आपण आपलं आयुष्य संपवुन टाकावं. आत्महत्येचे कारण कितीही वास्तवाला धरुन असले तरीही..शेवटी नियतीची घटका भरण्याआधी आपण स्वत:ला संपविणे हा कोणत्याही वास्तविक प्रश्नांपासुन सुटण्याचा मार्ग नाहीय असेच वाटते..!  रोज भेटणारा मित्र एखाद दिवस भेटला नाही..चार दिवसांआड का होईना पण आवर्जुन फोन करणा-या मैत्रीणीने आठ-दहा दिवस झाले तरी फोन केला नाही..रोज सकाळी न चुकता काळजी करणा-या आई-बाबांची दुस-या रात्रीही ख्याली-खुशाली कळली नाही..रोज दारामध्ये, जिममध्ये, बागेमध्ये दिसणारे शेजारी किती दिवस झाले तरी दिसलेच नाहीयत..तर मित्रांनो, थोडं का होईना 'कासावीस' व्हायला शिका. इतरांसाठी राहुदेत पण जर आपल्यावर प्रेम करणा-या माणसांसाठीही 'कासावीस' होणं, 'कसंतरी होणं अशी लक्षणं तुमच्यात दिसत नसतील..तर सावध व्हा. अतिव्यावहारिकतेचे डोस पाजणा-या अतिशहाण्या संगतीपासुन दुर रहा.  पण 'एकटेपणाचा शाप' घेऊन जगु नका. कोणत्या ना कोणत्या मार्गाने 'व्यक्त' व्हायला शिका अर्थात तेही योग्य माणसांसमोरच. म्हणजे आपल्या गोतावळ्यातील एखाद्या घुसमट होणा-या जीवाची 'अव्यक्त एग्झीट' तुमच्या व्यक्त होण्याने, संवाद साधण्याने टळल्याचे समाधान तुमचं जगणं आणखीन खुलवेल..

514. दोन घास...

       नुकतेच लग्न झाले होते आणि सासू सासऱ्यांकडे मी राहात होते. सासरे रेल्वेतील निवृत्त अधिकारी पेन्शनर होते. पूर्ण वेळ देवाचे नाम घेणे, जप करणे, घरातील सर्व सामान मंडईतून स्वतः आणणे, ज्योतिषाचा व्यासंग जपणे वगैरे गोष्टीत सासरे मन रमवायचे. सासूबाई घरची सर्व कामे पहाणे, स्वैंपाक करणे, येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणे यातच नेहमी व्यस्त असायच्या. सासू सासरे अत्यंत देवभक्त व धार्मिक वृत्तीचे होते.
नवरा डॉक्टर व कमवता असल्याने घरी ठीक चालत होते. मी तेव्हा लग्नानंतरही शिकत होते.
त्या वेळी आमच्याकडे सुमन नावाची मोलकरीण धुणी-भांडी, व घरची साफ-सफाईची देखील कामे करायची. पूर्ण चाळीत चार पाच जणांकडे ती कामे करायची. माझ्या सासूबाईंना एक सवय होती. त्या गरम गरम चपात्या करायच्या तेव्हा रोज सुमनला अगत्याने बोलवायच्या आणि "खा गं सुमन" म्हणून सुमनला अगत्याने तव्यावरची गरम चपाती चहाबरोबर द्यायच्या. तोपर्यंत कुणीच सकाळी जेवलेले नसायचे, पण सुमन मात्र सासू बाईंच्या हातच्या गरम चपाती व चहाची हिस्सेदार व्हायची. दारावर पारू आणि तिची मुलगी मीना मासे विकायला यायच्या. एवढी मोठी टोपली दूरवरून ट्रेननी आणायची आणि दारोदार विकायची हे या कोळीणींचे हेच तेव्हढे उदरनिर्वाहाचे साधन होते.
मी सासूबाईंना 'अहो आई' म्हणत असे. आई पारू, व मिनालाही जेऊ घालायच्या. 'अगं ! थोडी भाजी चपाती खा, दूरून आलीस तू, दोन घास तरी खा" म्हणून अगत्याने बसवून आई त्यांना खायला द्यायच्या.
घरी माणसांची आवक मोठी होती, सतत पाहुण्यांचा राबता असायचा. कुणीही जेवल्याशिवाय जायचे नाही, दोन घास खाऊनच जायचे हा जणू आमच्या आईंचा नियमच होता. त्यावेळी माझा नवरा एकटा कमवता आणि असे सर्वाना आई का खायला घालत सुटल्या आहे ह्याबद्दल माझे सरंजामी मन अनेकदा खट्टू व्हायचे. कधी कधी चीडही यायची. जेव्हा बघावे तेव्हा कधी भाजीवाली, कधी मोलकरीण ऐसपैस बसून दोन घास खात आहेत.
तेव्हा मी तरुण विशीतील युवती होते, थोडाफार एक शिक्षणाचा आत्मविश्वास आणि अहंकारही होता. त्या अहंकारातून मुसमुसुन राग यायचा. त्या फुकटच्या पत्रावळी आणि दोन घास आदरातिथ्याचा.
म्हणता म्हणता दिवस सरले. सासूबाई आणि सासरे हे काळाच्या आड गेले आणि नकळत काळाने मलाही बदलले.
आज लोणावळ्याच्या घरी तिकडची नोकर जयश्री आली. तिला मी नकळत बोलले, जयश्री "दोन घास" खाऊन जा गं. ताकाची कढी केली आहे". आताशा कुणीही आला आणि आपल्याकडे दोन घास खाऊन गेला नाही हे गणित माझ्या हिशेबात जुळत नाही. परिस्थितीच्या अनेक आवर्तनात माझा तारुण्यातील सरंजामी अहंकार कधी गळला तेच कळले नाही.
आपण अंगमेहनत न करता खातो ही कुणकुण सतत राहते. कोळीण, भाजीवाल्या एवढ्या मोठ्या टोपल्या वाहतात, घरी येणारी मोलकरीण सर्व काम मेहनतीने करते आणि मी फक्त टेबलावर बसून कामे करते या भावनेची सतत जाणीव होते.
आईंना आणि माझ्या सासऱ्यांना "दोन घासात" माणसं जुळवण्याचे गणित कळले होते.
"दोन घास" आपण कमी खावे परंतु अन्न हे दान करण्यातच खरे सुख असते, आनंद असतो. त्या आनंदाचे संस्कार नकळत आईंनी आणि सासरेबुवांनी माझ्यावर केले. त्यांची उतराई कशी होऊ ?
कर्णाला तू सर्व दान केलेस पण फक्त अन्न दान केले नाहीस म्हणून पृथ्वीतलावर जा आणि अन्न दान कर अशी स्वर्गात आज्ञा होते.
तो पृथ्वीवर येऊन दान करतो तोच "पितृ पक्ष"आणि मग कर्णाला मोक्ष मिळतो हे सर्वज्ञात आहे.
हा मोक्ष दुसरीकडे नाही, तर या जन्मी आणि याची डोळा दुसऱ्याला जेवून "दोन घास" भागीदारी करताना कृतार्थ होतांना बघण्यात आज  आणि येथेच आहे.
आपण एखाद्याला पैसे देऊ शकतो, कपडे देऊ शकतो, परंतू स्वतःच्या ताटातील अन्न देणे हे वेगळे आहे.
अन्न हे अनेक वासनांचे बीज आहे, माणसाचे मन हे अन्नाशी निगडीत आहे. म्हणूनच अन्न आणि वृत्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा अतूट संबंध आहे.
जेव्हा आपण दुसऱ्याशी "दोन घासाची" भागीदारी करतो तेव्हा अहंकाराचा, वासनांचा त्याग करत असतो.
अश्याच एखाद्या मौळीत मी गेलेली असते. छपरातून पाणी टपटप पडत असतं. घरात पोरं उघडी बसलेली असतात. वयात आलेली एखादी तरणी थोडीशी चिंधी गुंडाळून बसते आणि घरची अठराविश्व दारिद्र्याची मालकीण मला म्हणते,"मॅडम दोन घास आमच्याबरोबर खा" तेंव्हा माझे डोळे पाणवतात. माझ्या कधी काळच्या सरंजामी अहंकाराची, माझीच मला घृणा येते.
माझ्या वृद्ध, गरीब आईंना कळलेली दोन घासांची माणुसकी मला पुन्हा पुन्हा दाद देऊन जाते. 
आपणास देखील "दोन घास" हा मेसेज आवडला तर या पुढे आपण देखील आपल्या ताटातले दोन घास नक्की द्या धन्यवाद...

513. बाप......!!!

 हि कहाणी आहे मला भेटलेल्या एका बापाची.
त्याचं नाव? बापच म्हणु त्याला.
तर असा हा बाप, चार पिढ्यांची गरीबी ! एका गोंडस मुलीला पदरात टाकुन तीची आई देवाघरी गेलेली.
मुलीचं नाव काहीही असलं, तरी तीला तो चिमणी म्हणायचा. तो तीचं सगळं करायचा. वेणी फणी पासुन जेवणापर्यंत.
तो राजा नव्हता, पण त्याच्या झोपड्यातली राजकन्या होती ती.
या बापानं तीला शिकवलं तीच्या शिक्षणासाठी स्वारगेट स्टँडवर हमाली केली, भवानी पेठेतल्या गोडावुनचा मालगाडा ओढत दुकानात पोचवला, आणखीही बरंच काही.
एके दिवशी ही चिमणी शिकुन मोठी झाली, आयटिमध्ये जॉब मिळाला.
मधल्या काळात या बापाला कुष्ठरोग जडला, औषधं चालु करेपर्यंत बोटं झडायला सुरुवात झाली. बसला नशिबाला दोष देत.
चिमणीने फ्लॕट घेतला आफिसजवळ आता ती झोपड्यात कशी राहील?
आता झोपड्यात उरला हा बाप आणि त्याची झडलेली बोटं.
एके दिवशी चिमणीनं बापाला रस्त्यावरच भेटुन सांगितलं (झोपड्यात नाहीच आली ही चिमणी), आण्णा, मी लग्न करणाराय, आमच्या कंपनीतलेच मॕनेजर आहेत.
बाप आनंदला, म्हणाला मला पण भेटव जावईबापुंना....!
चिमणी म्हणाली, तुम्हाला झालेला कुष्ठरोग त्यांना समजला, तर लग्न करतील ते माझ्याशी? नेहमीप्रमाणेच बापाला हे सुद्धा पटलं.
लेकीचं लग्न हॉलबाहेरुन त्यानं पाहिलं, हॉलमध्ये त्याच्यासारख्या कुष्ठरोग्याला आत तरी कोण सोडेल..?
झडलेली बोटं आता डोळे पुसायच्या पण लायकीची राहिली नव्हती ! डोळ्यातलं,पाणी घेवुन आला पुन्हा झोपड्यात. कामं सगळी सुटली होती.
नाही म्हणायला, संपुर्ण आयुष्यात चिमणीच्या लग्नासाठी साडेपाच तोळे सोनं त्यांनं पोट मारुन साठवलं होतं, पण आता काय उपयोग..?
एके दिवशी चिमणीनं पुन्हा रस्त्यावरच बापाला भेटायला बोलावलं, यावेळी तोंडावर स्कार्फ होता, कुणी बघितलं असतं या कुष्ठरोग्याशी बोलतांना, तर लोक काय म्हणाले असते? तीनं सांगितलं, आम्ही आता अमेरिकेला जात आहोत, बघु पुन्हा केव्हा येईन ते सांगता यायचं नाही.
घशात आलेल्या आवंढ्यामुळे बापाला हे सुद्धा सांगता आलं नाही कि, चिमणे तोंडावरचं फडकं काढ, एकदा तरी बघु दे तुला !
डोळ्यांनी पण दगा दिला, ओघळणाऱ्या पाण्यानं तीची पाठमोरी आकृती पण अस्पष्टच दिसली आणि डोळे पुसायला बोटंच नव्हती चिमणी डोळ्या देखत भुर्र उडुन गेली.
आता हा झोपडीतला राजा बसतो मंदिराबाहेर, आपली झडलेली बोटं घेवुन, कुष्ठरोग मिरवत, चिमणीच्या येण्याची वाट पहात..!
इथंच माझी आणि त्याची भेट झाली... !
दरवेळी मला विचारतो, डाक्टर , माजी चिमणी येइल का वो परत? आणि मी दरवेळी तोंड लपवत सांगतो, नक्की येईल आण्णा. म्हाताऱ्याच्या डोळ्यात डोळे घालुन खोटं बोलण्याचं धाडस माझ्यातही नसतं.
डॉक्टर, आमेरीका किती लांब आसंन वो? इमानाला लई पैशे लागत आसत्याल ना? किती येळ लागत आसंन? चिमणीला माजी आटवण येत आसंन का? मी ही प्रश्नोत्तरे टाळतो. एका बापाशी मी तरी किती खोटं बोलु रोज रोज..!
एके दिवशी मला हा बाप म्हणाला, डाक्टर, समजा साडेपाच तोळं सोनं मी मोडलं आणि पेशल गाडी करुन आमेरिकेला गेलो तर? काय फकस्त डिजेलचाच खर्च हुयील, इमानाचा खर्च तरी वाचंल. चिमणी आन जावाईबापुला म्हागल्या सीटवर बसवुनच आणतो, येत कशी न्हाई त्येच बगतो...!
कसं समजावु या "वेड्या बापाला"? कि त्यांच्या चिमणीनं तीचा वेगळा संसार केलाय आणि त्यात आता तुम्हाला स्थान नाही..!
पण हल्ली ते मला कुठलाही प्रश्न विचारत नाहित, बहुधा त्यांना हे कळलं असावं.
हल्ली एका कोपऱ्यात बसुन ते  कोणाशीही न बोलता आभाळाकडे एकटक बघत बसलेले असतात.
कदाचीत त्यांना वाटत असावं, अमेरीकेतुन उडत उडत त्यांची चिमणी परत येईल.
मी खुप बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनी बोलणंच सोडुन दिलं.
पुन्हा त्या मंदिरात जायला बरेच दिवस मलाही जमलं नाही.
आज पुन्हा त्या मंदिरात पेशंट तपासायला आलो, ते बसत होते, तो कोपरा रिकामा दिसला, शेजारच्या आज्जीला विचारलं, आण्णा कुठे गेले? म्हणाली, म्हाईत न्हाई बा. 8-10 दिस झालं दिसलाच न्हाई, म्हणला, लेकिकडं जावुन येतो.
माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी आभाळाकडं पाहिलं, उंच आभाळात उडणारा एक पक्षी दिसला. लेकिच्या ओढीनं तीला शोधणारा हा आण्णा नावाचा तोच बाप असावा का?

512. मी... माझा बाप... आणि माझी आई... !!!

 हि मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी ... ! 
वय साधारण 35,  सोबत 5-6 वर्षांचा मुलगा...! 
एका धार्मिक स्थळाबाहेर मागुन खायची. 
औषधं देता देता ... चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली ! 
दरवेळी मला कोडं पडायचं... हा मुलगा कुणाचा ?  जर तीचा असेल, तर याचे वडिल कुठं  आहेत ?  याला वडिल असतील, तर मग हि एकटीच कशी दिसते ? 
एकेदिवशी मी विचारलंच... ! 
.... लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही... पुर्णतः निराधार. 
जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम  निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधुन झोपायचं, हा रोजचा दिनक्रम !
रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात. 
मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात ! 
अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली... आरडाओरडा केला... पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता... ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं... ! 
या झटापटीत एक मुल हिच्या पदरात पडलं... !
एकटीची जगायची भ्रांत, त्यात अजुन एकाची भर पडली. 
ठिक आहे, जगात आपलं असं कुणीच नव्हतं, आता आपलं म्हणावं, असं आपलं मुल तरी आपल्याबरोबर आहे, आधार होईल भविष्यात जगण्याचा या सकारात्मक  विचारानं तीनं आईपण जपलं... मुलाला जमेल तसं ती त्याला वाढवत गेली  ! 
आणि याचवेळी मला ती भेटली होती.... तीनेक वर्षांपुर्वी ! 
'काम का नाही करत गं ?' मी तीला तेव्हा विचारायचो. 
ती फक्त मान डोलवत गुढ हसायची. 
वेगवेगळे व्यवसाय मी तीला सुचवायचो... मदत करतो असं म्हणायचो... पण ती ऐकल्यासारखं करायची... आणि पोराला हाताला धरुन दुर जायची ! 
उदास होवुन शुन्यात बघत रहायची ! 
बरोबर आहे, इतक्या मोठ्या विश्वासघाताची भेट मिळाल्यानंतर तीनं माझ्यावर तरी का विश्वास ठेवावा ? 
भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशी पोटी पचत नाही हेच खरं !
गाण्यातले सुर हरवतात तेव्हा ते गाणं बेसुर होतं... आणि जगण्यातला नुर हरवला की ते जगणं भेसुर होतं... ! 
असं सर्वच हरवलेलं ती...!
एकट्या राहणाऱ्या या तरुण मुलीला सांभाळुन घेणारा, मनासारखा कुणीतरी जोडीदार मिळाला, म्हणजे ती डिप्रेशन मधुन बाहेर येईल असं मला डाॕक्टर म्हणुन सारखं वाटायचं.
डिप्रेशन च्या पेशंटला औषध न लगे... ! 
औषध "नल" गे तीजला !
औषध फक्त त्या पेशंटचा हक्काचा "नल" ! 
अत्याचार झालेल्या, भीक मागणा-या मुलीला तीच्या मुलासह कोण स्विकारणार ? हा मोठा प्रश्न होता. तीला हा हक्काचा  "नल" कधी सापडणार.... ? कसा ? 
दिवसांवर दिवस जात होते. अशात मला एक तरुण भेटला. चुणचुणीत आणि गोड बोलणारा. 
यानेही आयुष्यात खुप थपडा खाल्ल्या होत्या, ढोलासारख्या !
थपडा मारुनही ढोल नाद निर्माण करतो.... ! 
हा सुद्धा त्या ढोलासारखाच ! 
थपडा खावुनही बोलणं आणि वागणं अतिशय नम्र आणि गोड, एक नाद निर्माण करणारं ! 
आपल्या शब्दांत नम्रता आणि गोडवा असेल तर  शब्दांना वजन प्राप्त होतं. 
शब्दांतली नम्रता आणि गोडवा हरवला की याच शब्दांचा स्वतःला भार होतो आणि दुस-याला ओझं !
असो, तर, यालाही मी काम करण्यासाठी विनवलं...! 
याला भीक मागायचीच नव्हती... कमीपणा वाटायचा याला भीक मागण्यात... व्यवसाय सुरु करण्याची जिद्द होती याच्यात, पण संधी मिळत नव्हती ! 
मी हात देतोय म्हटल्यावर, झट्दिशी त्याने तो पकडला. व्यवसाय सुरु केला... आणि बघता बघता छान चालायलाही लागला... ! 
अतिशय प्रामाणिक आणि मनमिळावु असलेला हा मुलगा मला आवडायचा. 
एकदा गंमतीने याला म्हटलं... 'काय मालक ? आता लग्न करा की राव ...!'
'करु की सर, तुम्ही बघा मुलगी... सांगाल त्या मुलीशी लग्न करतो...' तो म्हणाला होता. 
हसुन हा विषय तिथं संपला खरा...
पण "सांगाल त्या मुलीशी लग्न करतो..." या त्याच्या वाक्यानं मला रात्र रात्र झोप यायची नाही...! 
एकदा मनाचा हिय्या करुन याला "ती" ची सर्व परिस्थिती सांगितली.
हात जोडुन म्हणालो... करशील का रे लग्न तीच्याशी ?
क्षणभर विचार करत, माझ्या नजरेला नजर भिडवुन म्हणाला, 'माझ्यासारख्या भीक मागणा-याला तुम्ही हात देवुन बाहेर काढलंत सर, मी रोज विचार करायचो की या डाॕक्टरच्या उपकाराची परतफेड कशी करायची ?' 
'उभं असलेल्या माणसाला पाडायला फार ताकद लागत नाही, पडलेल्या माणसाला उठवायला जास्त ताकद लागते, हे मी तुमच्याकडनं शिकलो सर...' 
'तुम्ही मला तेव्हा उठवलंत... आता पडलेल्या कुणालातरी उठवायची पाळी माझी आहे... तुम्ही जे माझ्यासाठी तेव्हा केलंत, आज ते मी पुन्हा करणार तुमच्यासाठी ...!'
माझ्या डोळ्यात पाणी ठरेना! 
तो तीच्याशी लग्नाला तयार झाला या पेक्षाही आपण सावरल्यावर, दुस-याला हात द्यायचा असतो, हे तो शिकला यात मला जास्त आनंद होता...!
माझ्यापेक्षा लहान आहे तो... पण मला त्याचे पाय धरावेसे वाटले...!
 पाय तरी कसं म्हणु ? 
चरण म्हणणंच जास्त योग्य ! 
भरकटतं ते पाऊल, घसरतात ते पाय... आणि दिशा दाखवतात ते चरण... ! 
अत्याचारीत मुलीला तीच्या मुलासह स्विकारण्याची तयारी आणि तीच्या मुलाला आपलं नाव देवुन त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा विचार करणा-या त्या तरुणाचे पाय मला जणु चरणच भासले... !
यानंतर दोघांची भेट घडवुन आणली !
दोघांनी एकमेकांना समजुन घेवुन, पुर्ण विचाराअंती निर्णय घ्यावा. कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे, कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली. 
एकेदिवशी दोघांनी हसत हसत येवुन निर्णय दिला... आम्ही दोघेही स्वखुशीनं लग्नाला तयार आहोत... ! 
तरुण मुलीच्या लग्नाची काळजी असणा-या वधुपित्याची काय गत होत असेल हे मी त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलं ! 
आयुष्याच्या या नाटकात यावेळी सगळ्याच भुमिका मलाच पार पाडाव्या लागल्या. हे नाटक मी खरोखर जगलो...! 
मीच पुरोहीत होवुन कधी लग्नाची तारीख काढली... तर मीच माझ्याशी बैठक घेवुन दोन्ही बाजुची यादीही केली ..!
मुलाची बहिण होवुन मीच माझ्याशी भांडलो... तर मुलीची आई होवुन स्वतःशीच उगीच रडलो...! 
या लग्नात मी वरातही झालो... आणि वरातीची  म्हातारी घोडीही झालो...!
मुंडावळ्या बनुन कधी कपाळावर झळकलो तर पायताण बनुन पायातही सरकलो... !
भर लग्नात मीच माझ्यावर रुसलो आणि मीच माझी समजुत काढुन पुन्हा खोटंखोटं हसलो ... !
आणि त्याच्याबरोबर जातांना, ज्या क्षणी दादा म्हणत मला तीनं गळामिठी मारली त्याक्षणी त्या  मी तीचा बापच झालो... !
आज या लग्नाला दोन वर्षे झाली. 
दोघंही आनंदात आहेत, तीच्या अगोदर असलेल्या मुलासह ! 
या मुलाचं मला कौतुक वाटतं... आपल्या आईच्या लग्नाला तो हजर होता...! 
कळता झाल्यावर लोक त्याला टोचुन बोलतील का... ? सध्या माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही !
असो ! 
जमिनीवर पडते ती सावली... ! हि सावली कुणाला आधार देते तेव्हाच ती छाया होते !!!
हे दोघेही एकमेकांना आधार देत, मुलाची छाया बनले आहेत. बीनबापाच्या मुलाला त्याने आपलं नाव दिलं आहे, ख-या अर्थानं तो बाप झाला आहे...! 
बेसुर आणि भेसुर आयुष्य आता संगीत झालंय !
संगीत ऐकायला दरवेळी त्यातलं काही कळावंच लागतं असं नाही... मैफिल जमली की गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते... ती ऐकु आली म्हणजे झालं... ! 
पहिली दाद या झंकाराला दिली...की कागदावरचे शब्द मोहरुन कविता होतात... ! 
या कवितेत गाणा-याचा आणि ऐकणा-याचा भाव एकरुप झाला की त्याचं भावगीत तयार होतं... ! 
या दोघांच्या या गाण्याला दाद देणारा मी फक्त रसिक !!! 
आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे...
"ती" अजुन एकदा आई होणार आहे हे मला "त्या"ने जानेवारी 2020 मध्ये सांगितलं. म्हणाला सर आत्ता चौथा महिना सुरु आहे तीला... 
'होय बाबा, आता सगळे कामधंदे सोडुन दुपटी शिवत बसतो मी ...' माझ्या या बोलण्यावर "तो" लाजला होता. 
यानंतर दवाखान्यात नोंदणी, तपासण्या वैगेरे आटोपुन 19 जानेवारी 2020 ला ती प्रसुत झाली. मुलगा झाला ! 
"त्या"ला आणि "ती"ला भेटायला आज 20 जुन ला मी पेढे घेवुन गेलो. 
दोघांच्या डोळ्यातला आनंद  लपत नव्हता.
लाॕकडाउन मुळे याचा व्यवसाय ठप्प आहे, भल्याभल्यांची गाळण उडाली आहे, याचा कसा टिकाव लागणार ?
पण हरकत नाही, ये भी सही ! 
चालतांना कधीतरी काटेही टोचलेलं बरं असतं, म्हणजे माणुस त्याच जागी रेंगाळत नाही... काटे बोचायला लागले की, ती जागा सोडण्यासाठी का होईना, पण चालणाराचा वेग वाढतो... ! 
तो, नको नको म्हणत असतांना, त्याच्या खिशात साडेचार हजार रुपये कोंबले. 
तो म्हणाला, 'सर, हाॕस्पिटलची बिलं, औषधांचा खर्च आणि बाकीचंही सगळं तुम्हीच करताय, वर अजुन हे पैसे कशाला... ?' 
'पहिली डिलीव्हरी माहेरीच असते बाबा, पोरीच्या बापालाच करावं लागतंय सगळं...' मी खळखळुन हसत म्हणालो... 
मी हसत होतो आणि मागं मला तीच्या हुंदक्यांचा आवाज जाणवत होता ... !
ती नाहीच बोलली काही... पण तीचे डोळे बोलायचे थांबत नव्हते... ! 
मी बाळाकडे पाहिलं... इतकं देखणं बाळ... ! 
कमळ चिखलात उगवतं हेच खरं... !
'तुझ्यासारखंच आहे गं बाळ' मी म्हटलं. 
पालथ्या मुठीनं डोळे पुसुन ती हसायला लागली... !
कोणत्याही रडणा-या आईजवळ जावुन बाळाचं कौतुक करावं, स्सेम तुझ्यावरच गेलंय बघ म्हणावं...  ती हसणारच !
कारण वजन फुलांचं होत असतं, सुगंधाचं नाही...!
एखाद्या आईच्या ममतेचं वजन कसं करणार ? 
ते ही या न दिसणाऱ्या सुगंधासारखंच !
"बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलंय ?" निरोप घेत मी उठत सहजच विचारलं. 
अगदी सहज आवाजात ती म्हणाली, 'हो ठरवलंय ना ! अभिजीत नाव ठेवणार आहे आम्ही बाळाचं ... !' 
'क्काय ... ?' खुप जोरात मी हे वाक्य ओरडुन बोललो असेन. कारण दवाखान्यातल्या अनेकांनी चमकुन पाहिलं माझ्याकडं ! 
जीभ चावत, हळु आवाजात म्हटलं...,'का गं  ? अभिजीत का ?'
म्हणाली, 'दादा, मला ना आई, ना बाप, ना भाऊ ना बहिण...पण तुम्ही माझी आई, बाप, भाऊ आणि बहिण होवुन ती उणिव भरुन काढली ! 
आज माझ्या मुलाचं नाव मी जर अभिजीत ठेवलं तर मला त्याला सतत जाणिव करुन देता येईल...
कितीही मोठा झालास तरी कधीतरी, तान्हं बाळ होवुन, मुल नसलेल्या आईचं मुल हो....
अनाथ एखाद्या बहिणीचा भाऊ हो...
रस्त्यांत तळमळत पडलेल्या पोराची कधीमधी आई हो...
आणि माझ्यासारख्या रस्त्यांवर पडलेल्या एखाद्या पोरीचा आयुष्यात कधीतरी बाप हो...
मी शिकवीन त्याला...
पुढचं तीला बोलता येईना... 
आणि मलाही ऐकु येईना....
जगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार होता... !
माझा सन्मान होता !
दवाखान्यातुन मी निघालो... तर "तो" आडवा आला, म्हणाला, 'सर, ठेवु ना तुमचंच नाव बाळाला... ? तुमची परवानगी हवीय... !' 
म्हटलं, 'येड्या, परवानगी कसली मागतोस, माझा बाप झालास की रे आज... बाप परवानगी मागत नाही... ! 
तो माझ्या पायाशी झुकला... ! 
आणि मी, नव्यानंच मला जन्म देणाऱ्या माझ्या आईबापाच्या पायाशी नतमस्तक झालो... !

डाॕ. अभिजीत सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स

511. मुलीच्या संसारात किती नाक खुपसायचं, हे कळायला हवं -

 तू मला वेळीच समजावलं असतंस तर आज माझ्यावर एकटं पडण्याची वेळ आली नसती. आई म्हणून तुला काळजी होती पण त्यामुळे उठसुठ काही झालं की मला माहेरी यायला सांगायचीस. 
आई तू कधीच आमचं भांडण सोडवायचा प्रयत्न केला नाहीस. मी जेव्हा जेव्हा तुला फोनवर आमच्यातील वाद सांगायचे तेव्हा तू माझ्या नवऱ्याला फैलावर घेऊन पोरीला कायमची घरी घेऊन जाईन अशी धमकी द्यायचीस.
 शेवटी तू तेच केलंस. 
आज दहा वर्षांनी मला या गोष्टीची सल जाणवतेय. कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात सुखी आहे. तुम्ही दोघे सुना नातवंडांसोबत आनंदात आहात. 
दादा वाहिनीचा छान संसार सुरु आहे. मी मात्र तुमच्या घरात आश्रितासारखी राहत आहे, असं मला वाटतंय." हे सगळं बोलताना राजलच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.
"आमची पोरगी आम्हाला जड नाही." हे वाक्य लग्नानंतर अनेक पालकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. मात्र सासरी मुलीचा छळ होतोय, सासरचे लोक किंवा नवरा तिला सतत त्रास देतोय असं मानून लगेच तडकीफड निर्णय घेणे चुकीचे आहे. 
टाळी जशी एका हाताने वाजत नाही तसेच तुमच्या मुलीचा देखील थोडा फार दोष असू शकतो हे समजून घ्या. सासरचे लोक विनाकारण त्रास देत असतील तर मुलीला घटस्फोट घे म्हणून सांगणे योग्य आहे. मात्र छोट्या कारणाने तिला संसार मोडायला लावणे अजिबात बरोबर नाही. 
तुम्ही सुद्धा नवरा बायको म्हणून संसार करताना चार गोष्टींवरून वाद  तुमच्यातही झालेच असतील की. त्यामुळे लग्नानंतर नवरा बायकोत उडणारे खटके त्यांना सोडवू द्यात. लगेच मध्यस्थी करायला जाऊ नका.
लग्न ठरतानाच मुलीला सांगितले जाते, ‘सासरची माणसं खडूस असतात. सासू खाष्ट असते. नवऱ्याला मुठीत ठेवायचे.’ त्यामुळे मुलगी सासरी जातानाच डोक्यात पूर्वग्रह ठेवून जाते. सासू कितीही चांगली असली तरी तिच्याशी तुमची मुलगी फटकून वागू लागते.
 नवऱ्याला आपल्या तालावर नाचवायला पाहते. असे जर झाले नाही तर त्यांच्यात वाद होऊ लागतात. तेव्हा पालक म्हणून तुम्ही जळत्या निखाऱ्यावर पाणी घालायचे सोडून त्यावर आणखी फुंकर घालून आग अधिकच चेतावता हे तुमच्या लक्षात येत नाही.
 मुलीला कायमची माहेरी निघून ये असा सल्ला देता. यामध्ये तुमच्या मुलीचे आयुष्य पणाला लागलेले असते हे तेव्हा दिसत नाही. मुलीला सुद्धा त्या क्षणी आईवडिलांचा निर्णय योग्य वाटतो. कारण ती त्यावेळी मानसिक तणावातून जात असते.
काही वेळेस जावई माफी मागायला घरी आला तरी सुद्धा त्याला माफ केले जात नाही. ‘मी तिला घरी न्यायला आलोय, तिला माझ्यासोबत पाठवा,’ असे सांगितल्यावर त्याच्या समोर अटी ठेवल्या जातात. यामुळे जावयाचा अपमान होऊन या नात्यासाठी मी एकटाच पुढाकार का घेऊ असे त्याला वाटू लागते. प्रकरण चिघळले जाते आणि ते जावयाच्या अहंकारावर येते. मग तो सुद्धा नातं तोडण्याचाच विचार करू लागतो.
 घटस्फोट झाल्यानंतर काही पुरुष दुसरा संसार थाटून आपले जीवन जगू लागतात. ज्या मुली आईकडे जाऊन राहतात त्यांना मात्र कालांतराने एकाकीपणा नकोसा होतो. ज्या आईने मुलीला साथ देऊन माहेरी आणले असते त्याच आईसोबत जेव्हा मुलीचे सुद्धा वाद होऊ लागतात.
 तेव्हा मुलीला आपली चूक उमगते.
पालकांनी मुलीचा संसार तोडायचा नाही तर जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. एकदा का मुलगी सासरी गेली की तिचे उगाचच कान फुंकणे बंद करायला पाहिजे. उठ सुठ फोनवर बोलणे टाळावे.
 मुलगी नवऱ्याविषयी काही सांगू लागली तर छोटीशी गोष्ट आहे तुम्ही दोघे मिटवून घ्या असा सल्ला तिला द्या. 
भांडण खूप विकोपाला गेले तरच तुम्ही मध्यस्थी करून त्यांच्यात समेट घडवा.
 तुमच्या अहंकारामुळे मुलीचे आयुष्य उध्वस्त होईल अशी कोणतीच भूमिका घेऊ नका.
 तिचे लाड करा चार दिवस माहेरपणाला आल्यावर हट्ट पुरवा. मात्र तिच्या संसारात नाक खुसण्याचा प्रयत्न करणे टाळा. पटतंय ना ?
डी.पी.एस.बी सागर

510. नागपंचमी ...नागपुजेच्या पलिकडे....

 साप आपले मित्र आहेत, निरुपद्रवी आहेत हे प्रत्यक्ष कृतीतून निलिमकुमार खैरेंनी दाखवले...त्यासाठी किती मोठे धाडस केले...त्याचा हा छोटासा वृत्तांत... 
       थोड्याच दिवसांत प्रकाश कर्दळे (निवासी संपादक,इंडीयन एक्सप्रेस) यांनी ही बातमी देशभर व्हायरल केली. 'नीलिमकुमार खैरे बहात्तर विषारी सापांच्या सान्निध्यात बहात्तर तास राहून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करणार....'
बातमी देशभर पसरली. आम्ही सगळेच जोशात तयारीला लागलो. अण्णा (निलिमकुमार खैरे) त्या वेळी ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. जगप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांचे धाकटे बंधू कै. पी. एल. किर्लोस्कर हे त्या वेळी ब्लू डायमंड हॉटेलचे कार्यकारी संचालक होते. खूपच सरळमार्गी आणि  सज्जन उद्योगपती असा त्यांचा लौकिक होता. अण्णाच्या आगामी विश्वविक्रमाची योजना आम्ही त्यांच्यासमोर मांडली. त्यांना ती पसंत पडली. आपल्या कंपनीचा एक तरुण कर्मचारी जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करतोय याचं त्यांना समाधान वाटलं. त्यांनी आर्थिक साहाय्य करण्याचंही मान्य केलं. माझा मित्र सुहास बुलबुले तेव्हा बी. जे. मेडिकल कॉलेजचा 'कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह' होता. त्याच्यामुळे बी.जे.च्या मैदानावर हे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ठरलं. आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि आम्ही खोली बांधण्याच्या मागे लागलो. ॲक्रिलिक शीट्स वापरून १० फूट बाय १० फूट आकाराची पारदर्शक खोली तयार केली. खाली वाळू पसरली. आतमध्ये बसण्यासाठी एक आरामखुर्ची ठेवली. दुसरीकडे विषारी साप गोळा काम सुरू होतं. आमचा सर्पप्रेमी मित्र राजन शिर्के याच्या नेतृत्वा खाली पुण्यातल्या सर्व सर्पमित्रांनी विषारी साप जमवायला सुरुवात केली. कलकत्ता स्नेक पार्कचे संस्थापक दीपक मित्रा अण्णाबद्दलची बातमी वाचून त्यांच्याकडचे विषारी साप घेऊन स्वतः पुण्यात आले. अखेर ठिकठिकाणाहून नाग, माया घोणस, फुरसं आणि पट्टेरी मण्यार अशा एकूण ७२ विषारी सापांची जमवाजम झाली. दरम्यान, मी इंग्लंडच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या कंपनी संपर्क साधून होतो. या रेकॉर्ड्ससाठी त्याच क्षेत्रातील दोन व्यक्तींची रेफरी किंवा पंच म्हणून नेमणूक केली जाते. मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे उपसंचालक तसंच सर्पविषतज्ज्ञ डॉ. नीलकंठ वाड आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. वाय. परांजपे या दोन प्रतियश शास्त्रज्ञांची अण्णाच्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी रेफरी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी एक रजिस्टर तयार केलं होतं. दर तासाला अण्णाच्या आणि सापांच्या हालचालीच्या डोळ्यात तेल घालून नोंदी घेऊन त्यावर दोघांना सह्या करायच्या होत्या.
अखेर सगळी तयारी झाली आणि २० जानेवारी १९८० रविवारी या दिवशी दुपारी चार वाजता अण्णाने सापांच्या खोलीत प्रवेश केला. पुढचे बहात्तर तास नाट्यमय असणार होते. अण्णाला काही होणार नाही याची मनोमन खात्री होती. तरीही थोडी धाकधूक होतीच. अण्णा आत गेला तेव्हा त्याच्या आरामखुचीवर काही साप आरामात विराजमान झालेले होते. बऱ्याच वेळाने अण्णाला खुर्चीवर बसायला जागा मिळाली. या काळात काही सापांनी एकमेकांशी भांडणं उकरून काढली. अण्णानेच ती सोडवली. थंडीमुळे काही साप त्याच्या टी- शर्टमध्ये घुसले. अण्णाने एकेका सापाला हलकेच धरून बाहेर काढलं पण एकाला काढलं की त्याच्या जागी दुसरा हजर! शेवटी हताश होऊन अण्णा तसाच झोपून गेला. दहा-बारा सापही त्याच्या टी-शर्टमध्येच झोपले. आम्हालाही बाहेर डोळा लागला. सकाळ झाल्यावर अण्णाने एकेका सापाला हलकेच बाहेर काढून बाजूला ठेवलं आणि चहा घेतला. नियोजित वर्ल्ड रेकॉर्डच्या बहात्तरपैकी चौदा तास संपून गेले होते. अजूनही अठावन्न तास बाकी होते. दरम्यान, ब्लू डायमंड हॉटेलमधून खास अण्णासाठी सॅण्डविचेस आणि फुट ज्यूस आला होता. अण्णाने फक्त थोडा ज्यूस घेतला. सॅण्डविचेस आम्ही संपवली.
   आता अण्णा आणि साप जणू एकमेकांसोबत एकरूप झाले होते. सुरुवातीला त्या खोलीत ७२ साप आणि एक माणूस होता. पण आता मात्र एका खोलीत एकत्र नांदणारे ते ७३ प्राणी होते.
अण्णाचा हा विक्रम बघण्यासाठी तीनही दिवस पुणेकरांची प्रचंड गर्दी होत होती. एवढे विषारी साप अंगाखांद्यावर खेळत असूनही माणसाला चावत नाहीत, हा लोकांसाठी चमत्कारच होता. त्यामुळे थक्क होऊन लोक त्याकडे पाहत राहत. ज्या कारणासाठी आम्ही काम करत होतो आणि ज्यासाठी अण्णाने हा जागतिक विक्रम करण्याचा घाट घातला होता तो सफल होताना पाहून समाधान वाटत होतं. अत्यंत थरारक आणि नाट्यमय असे तीन दिवस होते ते. अण्णासाठी तर होतेच, पण आमच्यासाठीही होते. त्या तीन दिवसांत आई-दादांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. ते दोघंही खाणंपिणं आणि झोप -सोडून घरीच थांबले होते. आई तर तीन दिवस देव पाण्यात ठेवून बसली होती.
अखेर ७२ तास संपत आले. जागतिक विक्रम घडण्याची वेळ आली! या आगळ्यावेगळ्या विक्रमाच्या पूर्ततेप्रसंगी शंतनुराव किर्लोस्कर स्वतः जातीने हजर होते. पुण्यातले आणि राज्यातले आमचे सर्प आणि प्राणिमित्रही गोळा झाले होते. दीपक मित्रांसारखी राज्याबाहेरून आलेली मंडळीही होती. बुधवारी, २३ जानेवारीला दुपारी चार वाजता दीपकने केबिनच्या दाराची कडी काढली. बाहेर येताच अण्णाने त्याला आलिंगन दिलं. त्या दोघांचे आणि आमचेही डोळे आनंदाश्रूंनी भरून वाहत होते. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. अण्णाचे अनेक फोटो काढले गेले. त्यानंतर मी 'गिनीज बुक'च्या लंडनमधल्या मुख्य कार्यालयात जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्याचं वृत्त विश्रामबाग- वाड्याजवळच्या ऑफिसमधून तारेने कळवून टाकलं. अण्णाने जागतिक विक्रम कला होता. ७२ तासांपूर्वी माणसांचा एक प्रतिनिधी सापांच्या सान्निध्यात रहायला गेला आणि ७२ तासांनंतर तो सापांचा प्रतिनिधी बनून माणसांत आला होता! पुढे आयुष्यभर अण्णा सापांचा अन् प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणूनच काम करत राहिला. आजही करतो आहे.
 
'सोयरे वनचरे' (ले.अनिल खैरे) या पुस्तकातून.
(माहिती संकलन : सतीश खाडे,पुणे )

509. इस्त्री केलेलं म्हातारपण !

 
ट्रेनमधून लांबच्या प्रवासाला चाललो होतो. 
समोरच्या सीटवर एक काका होते. टी शर्ट, जीन्स, स्पोर्ट्स शूज, कानात pods, मनगटावर डिजिटल घड्याळ, पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, तुकतुकीत चेहरा.  
कुतूहल चाळवून मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. प्रवासात आमच्या गप्पा सुरु झाल्या. काका भलतेच गप्पिष्ट होते. आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो. राजकारण, क्रिकेट, प्रवास…गंमत म्हणजे ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते. 
गप्पांमध्ये मी हळूच काकांना त्यांचं वय विचारलं. त्यांनी सांगितलं. मी उडालोच. 
‘सॉरी ! मी तुम्हाला आजोबा म्हणायला हवं होतं का?’ मी गमतीत म्हणालो. 
काका जोरात हसले. ‘तुम्ही मला रवि म्हटलंत तरी I am fine !’      
आम्ही दोघेही हसलो. 
काकांचं स्टेशन जवळ आलं. एक कडक शेकहॅण्ड करत काकांनी आमच्या दोघांचा एक सेल्फी घेतला. 
गाडी पुढे निघाली. मी ट्रेनमध्ये आजूबाजूला पाहिलं. सगळे म्हातारे खंगलेले ! इस्त्री गेलेल्या कपड्यासारखे. वैभव उडून गेलेल्या एखाद्या राजवाड्यासारखे ! 
योगायोग बघा. मी तेव्हा गुलज़ारच्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐकत होतो. 
गाणी ऐकताना आपसूक गुलज़ारसाहेब डोळ्यासमोर येत होते. एका क्षणी एकदम मनात आलं, अरे या माणसाने इतकी वर्षं कशी सांभाळली असेल स्वतःची ‘इस्त्री’? 
आपण स्वतः कशी सांभाळणार आहोत स्वतःची इस्त्री? विचार ट्रेनच्या पुढे धावू लागले. 
एक म्हणजे स्वतःची तब्येत उत्तम ठेवणं. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप.
सध्याचं माहीत नाही, पण गुलज़ारसाहेब नियमित टेनिस खेळतात. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका स्पर्धेत ते जिंकले वगैरे होते. 
दुसरं म्हणजे, कार्यरत असणं. बँकेची पासबुकं भरायला स्टेट बँकेत लाईन लावणं याला मी कार्यरत नाही म्हणणार. आताच्या काळात तो वेळेचा अपव्यय आहे. टाईमपास आहे. कार्यरत म्हणजे तुमच्या आवडीच्या कामात creatively गुंतून राहणं. लिखाण, संगीत, शिकवणं, चित्रकला, स्वतःच्या गाडीचं सर्व्हिसिंग, बागकाम, वाचन… असं काहीही. रोजचं एक रुटीन असणं. रुटीन म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत बिनडोक टीव्ही सिरियल्स बघणे नव्हे. स्वतःला enrich करणारं, बुद्धीला आव्हान देणारं काहीतरी करत राहणं. गुलज़ारसाहेब रोज नियमितपणे लिहितात. ते कोणी वाचो वा न वाचो. 
तिसरं म्हणजे कुतूहल टिकवून कालसुसंगत असणं. टी शर्ट- जीन्स घालून मॉडर्न होता येत नाही. काळाशी सुसंगत राहण्यासाठी बाहेरचा वारा आत येण्यासाठी मनाच्या खिडक्या उघड्या ठेवणे पण वाऱ्याने त्या खिडक्या उडून जाणार नाहीत याची काळजी घेणे. आमच्या - वेळी - असं - नव्हतं हे चार शब्द आपल्या डिक्शनरीमधून फाडून टाकणे म्हणजे कालसुसंगत राहणे. बिमल रॉय, सलील चौधरी, हेमंत कुमार यांच्याबरोबर काम केलेले गुलज़ारसाहेब विशाल भारद्वाज, रेहमान, शंकर-एहसान-लॉय यांच्याबरोबर तितक्याच सहजतेने काम करताना दिसतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतात. जग बदललं. लोकांच्या sensibilities बदलल्या. तरीसुद्धा ऐंशी उलटून गेल्यावरही स्वतःचा दर्जा जराही घसरू न देता गुलज़ारसाहेब लिहिते राहिलेत. आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी ना त्यांनी कधी जीन्स घातली ना त्यांना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याची गरज भासली. आधुनिक वाऱ्यांनी त्यांची पिंपळपाने सळसळत राहतात पण त्यांचा सोनेरी पिंपळवृक्ष आपली मुळे मातीत घट्ट पाय रोवून उभा आहे.       
शेवटचं म्हणजे, आर्थिक स्वातंत्र्य. पैशाचा लोभ नव्हे, तर पैशावर प्रेम असणे. उत्तम जगण्यासाठी पैसा हवाच आहे. गुलज़ार  साहेब फाळणीनंतर मुंबईत आले. खिशात पैसे नव्हते, पण स्वप्नं होती. लेखणीच्या आणि बुद्धीच्या बळावर एका कवी, लेखक, दिग्दर्शक पाली हिलमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो, याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय.          
आपण सगळेच वयाने म्हातारे होण्याच्या मार्गावर आहोत. 
Growing old is mandatory but getting old is optional, असं म्हणतात. 
प्रत्येकाची आयुष्यं वेगवेगळी असतात. Circumstances वेगवेगळे असतात. त्यामुळे इच्छा असूनही काही लोकांच्या आयुष्याची इस्त्री बिघडतही असेल. पण बाकीच्यांनी आपलं म्हातारपण कडक इस्त्रीचं कसं राहील, याचा विचार आजपासूनच करायला काय हरकत आहे !    
गुलज़ार, राकेश मेहरा आणि विशाल भारद्वाज अशा तिघांचा एक कार्यक्रम Youtube वर आहे. कार्यक्रमाचं नाव होतं: 
कल आज और कल ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुलज़ारसाहेब हातात माईक घेतात आणि म्हणतात, ‘कल आज और कल में ये दो कौन है पता नहीं, लेकिन वो ‘आज’ मै हूं !’  
इस्त्री केलेल्या म्हातारपणाची इस्त्री कधीच मोडत नाही, ती अशी !

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

508. दुधावरची साय...

 आजोबा!!!! आर्यन स्कुल बस मधून उतरल्यावर धावत नानांना बिलागला...
"आजोबा आज काय केलंय स्पेशेल" 
"तू ओळख बघू".
"अ अ अ...पुरी-भाजी??"  
"बरोब्बर..   कस ओळखले रे लब्बाड"....हें संभाषण जवळपास रोजचंच.. रोज नाना दुपारी आर्यन ला नाक्यावर घ्यायला जायचे आणि येताना हीच चर्चा दोघांची चालायची. माई गेल्या नंतर पुण्यातील घर अगदीच सूनं वाटायला लागलं म्हणून सुनील-शीलाने नानांना त्यांच्या सोबत मुंबईत येण्याचा आग्रह केला. नानांच्या मनात नव्हते; पण मुलाच्या सोयी करता त्यांना हे मान्य करावे लागले. त्यांना इथं अजिबातच करमत नव्हते; एकतर माईची साथ नव्हती आणि जागाही बदलली होती. एकटं एकटं वाटायचं. पण थोड्याच दिवसात नानांना आर्यनचा लळा लागला. आता त्यांचा दिवस आर्यनला स्कुल बस पाशी सोडायला जाण्यापासून सुरू व्हायचा आणि त्याच्याच भोवती फिरायचा. आता कपडे बदलून हात-पाय धुवून जेवून घे...दप्तर ठेव जागेवर... ते दप्तर नाही स्कुल बॅग असत आजोबा!!!  हो रे बाळा तेच ते.
      आर्यन जेवला की होमवर्क करून झोपायचा; मग ५ वाजता नाना स्वतः चा चहा आणि त्याला दूध प्यायला लावून  क्लासला घेऊन जायचे...तिथेच एक तास बसून रहायचे; खाऊचा डब्बाही घेऊन जायचे कारण त्यानंतर जवळच मैदानात त्याला खेळायला न्यायचे असायचे. ७.३० वाजता दोघे मस्त गप्पा मारत, भाजी घेत घरी यायचे. तो पर्यंत शीला आलेली असायची ऑफिस मधून. सुनील 9 पर्यंत आला की सगळे एकत्र जेवायचे.  थोडा  timepass करून स्कुल बॅग भरायची आणि आजोबांकडून एक गोष्ट ऐकून झोपून जायचे. नाना इथं आल्यापासून शीलाला बरिच मोकळीक मिळू लागली होती. नाहीतर आर्यन स्कुल मधून आला का? क्लास ला गेला का? तिथून मैदानावर त्याला घ्यायला जायची आणि मग घरी आल्यावर सगळे आवरायला लागायचे.  तिची बरीच कामं नाना करून ठेवायचे. भाजी आणली की निवडून ठेवणे, कपड्यांचे मशीन लावणे, ते वाळत घालणे आणि मुख्य म्हणजे आर्यन ची पूर्ण काळजी घेणे. नानांचा खूप आधार वाटायचा तिला. शीलाही त्यांची काळजी घेत असे...त्यांना हवे नको ते पाहणे आणि त्यांच्या आवडी प्रमाणे सगळं करायची. 
सुनिल-शीला बहुतेक वेळा शनिवार- रविवारी बाहेर जायचा प्लॅन करायचे...रोजच्या धावपळीपासून विश्रांती साठी....कधी लोणावळा तर कधी अलिबाग अश्या ठिकाणी जाऊन मस्त आराम करून यायचे...नाना इथे आल्यावर त्यांनाही सोबत घेऊन जायचे...कधीच त्यांना एकटं पडून दयायचे नाहीत. नाना !! आज मला उशीर होईल यायला; लक्ष्मीला संध्याकाळीही बोलावलंय जेवण करायला.
अग मी केलं असत; कुकरमध्ये भात आणि आमटी, तिला कशाला परत फेरी? भाजी पण केली असती मी; तेवढाच वेळ जातो माझा.
बर बरं; असु दे पुढच्या वेळी करा आत्ता ती येईल तेव्हा तुम्ही दोघेही जेवून घ्या; हे आले वेळेत तर ठीक नाही तर तुम्ही तुमच उरकून घ्या.असे म्हणून शीला धावपळीत निघाली. 
नेहमी प्रमाणे दिवस गेला...संध्याकाळी घरी आल्यावर नाना आणि आर्यन दोघेच... मग गप्पां गोष्टी झाल्या, गाणी झाली, साप शिडी झाली ९.३० होऊन गेले तरी सुनील आला नाही पाहून या दोघांनी जेवून घेतलं... आर्यन झोपून गेला...११ वाजून गेले होते...नानांनीही त्यांच्या गोळ्या काढून ठेवल्या..कारण त्या घेतल्यावर त्यांना लगेच झोप येते आणि अजून दोघे आले नाहीत म्हणून काळजी ही वाटत होती. 
वेळ जावा यासाठी टीव्ही वर काहीतरी पाहत बसावे म्हणून बाहेर आले.कोणता तरी न्युज चॅनल चालू होता... त्यावर ट्रेन ऍकॅसिडेंट ची बातमी दाखवत होते.
नानांच्या मनात आता नको नको ते विचार येऊ लागले. इतक्या उशिरा कोणाला फोन करायचा. या दोघांचे नंबर असून उपयोग नव्हता; कारण लँडलाईन तर नव्हताच आणि नानांच्या कडे मोबाईल असावा असे कधी वाटलेच नाही. 
नाना या विचारात असतानाच दार उघडून सुनील-शीला आत येतात;  त्या दोघांना पाहून नानांच्या डोळ्यात पाणी येते.
अहो; नाना शांत व्हा..तुम्ही झोपला नाहीत अजून!!
सुनील त्यांना पाणी देत विचारतो.
कस झोपणार रे बाबा!! तुम्ही याल तेव्हा दार उघडले पाहिजे या करता जागा होतो शिवाय या बातम्या पाहून मनात नकोते विचार येऊ लागले; बर फोन करायचा तर माझ्या कडे फ़ोन नाही आणि या वेळी कोणाला त्रास द्यायचा अशा असंख्य विचारात होतो.
का रे बाबा उशीर झाला दोघांना?? 
अहो नाना!!! शीलाची आत्या आजारी आहे, सगळ्यांनी भेटून जा असा निरोप आला, व्हेंटिलेटरवर आहेत त्या आणि कदाचित २४ तास कसेबसे काढतील असे डॉक्टर म्हणालेत म्हणून घाईत जाऊन आलो.
पण तसं कळवत जा रे बाबांनो मी एकटा या बाळाला घेऊन कुठे शोधू तुम्हाला रात्री अपरात्री... 
 नानांना मुंबईत येऊन जेमतेमच एक-दोन महिने झाले असतील; फोनची अशी गरज भासली नाही कधी; शिवाय शीलाही वेळेत घरी यायचीच.
पहाटेच आत्या गेल्याचे कळलं त्यामुळे आज परत घरी आजोबा आणि आर्यन...
दोघांची आता इतकी गट्टी झाली होती की आर्यन प्रत्येक गोष्ट आजोबांना येऊन सांगत असे...तो स्वतःच्या रूममध्ये नसायचाच. आजोबांचे कपाट, त्यात ठेवलेल्या वस्तू, त्यांची औषधांची पेटी, जेवणा नंतरचे चूर्ण; हे सगळ् बघण्यात त्याला मजा येत असे. जशा आजोबांना आर्यनच्या वेळा माहिती होत्या तशा यालाही त्यांच्या वेळा पाठ होत्या.
एका संध्याकाळी सुनिल लवकर घरी आला आणि सगळ्यांना नानांच्या रूममध्ये बोलावलं. 
नाना हे उघडून पहा !! असे म्हणून त्यांच्या हातात चक्क मोबाईल ठेवला....
अरे मला कसं जमेल हे...
आजोबा मी शिकवींन तुम्हाला सोप्प असतं..तुम्ही गेम पण खेळा यावर; आर्यन आजोबांना सांगायला लागला.
नानांना मुंबईत येऊन एक वर्ष होऊन गेले. आर्यनमुळे माईच्या दुःखातून पटकन सावरले याची जाणीव होती त्यांना. कोणी नसताना एकटे माईचा फोटो घेऊन बोलत बसायचे. कधी संध्याकाळी येताना तिच्या साठी गजरा आणायचे. कोणाला कळू नये म्हणून देवाला वाहायला म्हणून घेऊन यायचे. आर्यन लहान असला तरी या गोष्टीं कडे त्याचे बरोबर लक्ष असायचे.
चला, उद्या आपण अलिबागच्या रिसॉर्टला जायचंय.
मस्त चार दिवस लागून सुट्ट्या आल्यात धम्माल करून येऊ. नाना तुमची पण बॅग भरा.. 
आजोबा बरमुडा घ्या आपण सी मध्ये जाणारे!!!
आर्यनने आजोबांच्या बॅगेत आठवणीने गोळ्या, चूर्ण, चष्मा, मफलर, बाम  हे सगळे भरायला मदत केली. कारनी जाताना आजोबांनी कधी काही पहिलेच नाही असं आर्यन त्यांना सगळं दाखवत होता आणि तेही नव्याने बघितले असे करत त्याच्या निरागस बालीश बोलण्याचा आनंद घेत होते. तिथे सुनीलचे अजून दोन मित्र आणि त्यांच्या परिवार असे एकूण १०-१२ जणांनी मिळून एक रिसॉर्ट बुक केलं होतं. दोन-तीन दिवस अगदी मजेत जातात. मुलं समुद्राच्या लाटांवर मनसोक्त डुंबत राहायची, वाळूत माखून जायची. आजोबा सगळ्यांचे कपडे आणि मोबाईल सांभाळत मजा पहात बसायचे. एकूणच सगळे धम्माल करत होते. सगळयांचे आवरले की सुनील आणि त्याचे मित्र यांची ड्रिंक्स चालायची, या बायकांच्या गप्पा आणि मुलं गेम झोन मध्ये नुसता धुडगुस घालायचे.
नाना मात्र जेवून त्यांच्या रूम मध्ये आराम करत. आजकाल त्यांचे थोडे पाय बोलू लागले होते... त्यामुळे पटकन उठताना किंवा खूप वेळ बसून चालताना त्यांना त्रास व्हायचा. पण एकूणच तिथले वातावरण छान असल्याने नाना स्वतःही दुखणे विसरून या सगळ्यात आनंद घेत होते. 
कधी एकत्र बसले की तेही सुनीलच्या मित्रांसोबत गप्पां मध्ये रमत असत... कोणत्याही वयाच्या सोबत त्यांच्या प्रमाणे गप्पा मारायला नानांना आवडायचे. असे चार दिवस सुट्टीचे आटपून सगळे निघायच्या तयारीत होते.
रिसॉर्ट चेक आऊट करून निघायचं आणि वाटेत जेवून मग थेट घर असा प्लॅन होता.
चला आता मस्त आराम झालाय उद्या पासून कामाला लागा.
आर्यन उद्या स्कुल आहे बरं! शीला ने आर्यनला थोडे दटावले. सगळ्यांनी निरोप घेतला आणि जेवणासाठी कुठे थांबायचं हे ठरवत होते.
वयोमाना प्रमाणे नानांना परत वॉशरूमला जाऊन यावे असे वाटले कारण आता परत किती वेळ लागेल आणि तिथे सोय असेलच असे नाही.
आजोबा मी येतो तुमच्या सोबत असे म्हणून आजोबांना घेऊन ही बच्चेकंपनी निघाली....
बाबा!! बाबा करत सगळी मुलं धावत ओरडत होती. धापा टाकतच आर्यन म्हणाला; आजोबा स्लिप झाले ते उठत नाहीत; असे बोलून रडायलाच लागला. सुनील आणि त्याचे मित्र धावत गेले.
 नाना !! अरे बापरे..जरा प्रयत्न करा, 
थोडं हलता येतंय का?? असे बोलून उठवण्याचा प्रयत्न केला पण नानांना कम्बरेला आणि गुढघ्याला मार बसल्याने हालचाल केली की मस्तकात कळ जायची. शेवटी सगळयांनी मिळून उचलून नानांना हॉटेलच्या वैटिंग रुम मध्ये झोपवलं आता इतक्या लांब ४-५ तास प्रवास करून कसे नेणार. त्यांना सहन नाही होणार. 
बाबा आपण जोशी Dr. ना बोलवून घेऊयात. आर्यन  रडत बोलला. जवळपासचे डॉक्टर बोलवून मोघम उपचार करू आणि घरी जाऊन बाकी ट्रीटमेंट घेऊ असे ठरले. आर्यन आजोबांच्या उशाशी बसून होता. त्यांना सांगत होता बरं वाटेल हा तुम्हाला; आत्ता जोशी डॉक्टर येतील आणि एक टुचुक दिला की एकदम बरे होणार तुम्ही. 
त्याला जसं समजावलं जायचं तसंच तो आजोबांना समजावत होता. प्रवासात त्रास झाला खरा पण सगळे घरी पोचले.  
नाना सगळ्यांना सारखं बोलत होते माफ करा रे बाळांनो तुमच्या ट्रिपची मजा घालवली मी.
आल्या आल्या सुनीलने नानांना डॉक्टर कडे नेलं.
एक्स-रे , स्कॅनिंग सगळे झाल्यावर नानांना पूर्ण बेड रेस्ट सांगितली; अजिबात उठायचे नाही.
नानांना अगदीच अपराधी वाटत होतं.
आता कसं होणार रे??  आर्यनचे कोण करणार?? शिवाय खर्च वाढलाय तो वेगळाच; उगाच आलो मी, घरी राहिलो असतो तर ही वेळ आली नसती. असे बोलून सारखे त्यांच्या डोळ्यात पाणी येत होते.
शीला आणि सुनील आळीपाळीने आठवडाभर सुट्टी घेऊन नानांचे सगळं बेड वर करत असतात.
सुनील तर मुलगाच पण शीलाही त्यांच्या जेवणाच्या वेळा, औषधं अगदी बेड पॅन देणं सुद्धा ती सख्या मुली सारखं करायची. आर्यन तर बघायलाच नको, स्कुल मधून आल्यावर थेट आजोबांना बिलगायचा, त्यांना भरवायला काय यायचा, गोळ्या सुद्धा यालाच कळायच्या..आजोबा ती पिंक वाली गोळी नाई घेत आता?? 
हो रे बाळा डॉक्टरनी काही गोळ्या बदलून दिल्यात....
या तिघांची धावपळ बघून प्रत्येक वेळी नानांना भरून यायचे स्वावलंबी असलेल्या या पिढीला त्यांच्या करता कोणी काही केलं तर अवघडल्या सारखे होतं आणि  वयोमानानुसार मन अगदीच हळवं झालेलं असत.त्यामुळे त्याची समजूत काढणं कठीण असते.
आठवड्यानी डॉक्टरांनी फॉलो up साठी बोलावले होते. चेक केल्यावर थोडं उठून बसायला आणि physiotherapy सुरू करायला सांगितले.
नाना !! उद्या पासून आम्ही दोघे ऑफिसला जाऊ. 
एक वॉर्डबॉय आहेत त्यांना  दिवसभर तुमच्या सोबत ठेवलंय. फिजीओ साठी एक डॉक्टर येतील त्यांच्या कडुन व्यायाम करायचे, लक्ष्मीने येऊन जेवण केलं की तुम्हाला वाढून आवरून जाईल आणि आर्यन ला आधी सारखं डी विंग मधल्या काकूंकडे ठेऊ.
अरे बापरे हे माझ्या मुळे सगळेच वाढले रे!! 
मी असं करू का पुण्यात जाऊ का?
तिथं हाताशी आहे सगळंच  सखाराम येऊन एकटा सगळं करून जाईल माझं. 
तुमची खूपच अडचण केली मी.
अहो नाना कसला त्रास यात ; सगळी सोय आहे.
तुम्ही आरामात रहा आणि डॉक्टर जे सांगतील तसे करत जा. आम्हाला काही त्रास नाहीये !! 
आजोबा मी करिन स्वतःचं मी मोठा झाला आत्ता 
तुम्हाला पण संभालीन..आर्यन त्यांना खात्रीने सांगत होता.
नानांना जे लागेल ते सगळं शीला टेबल वर काढून ठेवायची; लक्ष्मी जेवण वाढून सगळेच आवरून जायची...वोर्डबॉय आला की तोच त्यांची अंघोळ, दाढी आणि औषधं अशी  सगळी काळजी घ्यायचा...फिजिओ डॉक्टर सकाळी ११ वाजता यायचे त्याच्या आत यांचं आवरायचं सगळं. 
दिवसभर आर्यनची खूप उणीव जाणवायची. तो पण लबाड असा होता की स्कुल मधून काहींना काही कारण काढून त्यांना येऊन भेटून जायचा.
जवळजवळ दीड वर्ष दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती..आर्यन शीला सोबत घरीं येताना रस्त्यात गजरेवाले काका दिसताच तो ओरडला आई!!! ते  बघ आजोबांचे फुलवाले uncle... चल त्यांच्या कडून फ्लोवर्स घेऊ...ते आजीला घालतात...शीलाला हे माहीत होतं की ते गजरे आणतात पण हे आश्चर्य वाटलं की ते फक्त देवाला नसून माईना असतात आणि आर्यन नी हे लक्षात ठेवलय...
नाना ७.३० झाले की डोळे लावून बसायचे आर्यनसाठी आजोबा!!! एक सरप्राइज आहे...असे म्हणून त्यांच्या हातांत गजऱ्याची पुडी ठेवली. नानांच्या डोळ्यात पाणी आले त्याला कवटाळून रडु लागले.
अहो नाना !! आधी माहीत असते की हे तुम्ही माईसाठी घेता तर मी आणत जाईन एकदिवसा आड.
हळूहळू नानांना जे अवघडल्या सारखं होत होतं ते कमी होऊ लागलं. बऱ्याच वेळा सगळे त्यांच्या रूममध्ये जेवायला आणि गप्पा मारायला बसायचे.आर्यन त्यांच्या सवयी प्रमाणे कधी भेळ तर कधी बटाटे वडे घेऊन जायचा. नाना आता धरून धरून  चालायला लागले. बरेच पटकन रिकव्हर झाले. तरी सहा-सात महिने गेलेच. स्वतःला खूप जपू लागले कारण उगाच आपल्या मुळे लेकाला आणि सुनेला त्रास नको.
या त्यांच्या आरामाच्या दिवसात आर्यननी त्यांना मोबाईल पूर्ण शिकवला तसेच त्यांच्या रूममध्ये लॅपटॉप पण ठेवला होता; तो ही या पठयाने त्यांना शिकवलं.... बराच वेळ त्यांचा गाणी ऐकण्यात आणि छान छान कार्यक्रम बघण्यात जाई. सोसायटीच्या काही जणांची ओळख झाल्याने बागेत बसून गप्पा रंगायच्या.
आता ते पूर्वी सारखं सगळं करायला लागले होते.
अहो; या वर्षी नानांचा ७५ वा वाढदिवस आहे.आपण त्यांना सरप्राईज देऊ या!! असे म्हणून सुनील आणि शीला दोघे तयारी ला लागले.
सगळयांना आमंत्रण करताना सांगून ठेवले होते की  नानांना कळून देऊ नका. 
त्यांच्या आवडीचा मेनू ठरवला, नवीन झब्बा लेंगा घेऊन झाला. सकाळ पासून काय करायचे ते सगळं ठरलं. आर्यनलाही सांगितले होते की अजिबात आजोबांना सांगायचे नाही.
तारीख जवळ आली तरी घरात शांतता होती.नानांनीही फार मनावर घेतले नाही कारण सुनील आणि शीला त्यांच्या साठी सगळेच व्यवस्थित करत होते त्यामुळे कशाला अपेक्षा करायची.
आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जागे होते; कोणी १२ वाजता आले नाही पाहून माईचा फोटो उराशी घेऊन खूप रडले...यासाठी नाही की कोणी विश केले नाही पण या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माईची सोबत नाही.
त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माई त्यांना उटण्यानी अंघोळ घालायची. नवीन कपडे काढून ठेवायची. त्यांच्या आवडीची बासुंदी-पुरी करायची. माई स्वतःला गजरा आणून ठेवायच्या आणि नानांच्या हातून डोक्यात माळून घ्यायच्या,  दिवसभर आनंदात जायचा. जुने फोटो बघत आठवणीत रमायचे दोघं. 
नाना उठले; माईचा फोटो टेबलावर ठेवला, तिला टपोऱ्या मोगऱ्याच्या आणि अबोलीच्या फुलांचा हार घातला... ठसठशीत कुंकु लावलं आणि माईंच्या आवडीचा गुलाबजाम समोर ठेवला. याच आठवणीत कधी डोळा लागला समजलेच नाहीं त्यांना.....
सकाळी सुंदर धून कानावर पडली आणि जाग आली..... दार उघडलं तर दारावर ग्रिटींग लावलं होतं....त्यावर आर्यननी त्याला सुचेल तस  चित्र काढलं होतं आणि खाली त्याच्या अक्षरात लाडक्या आर्यन कडून पहिली भेट असे लिहिले होते.... नानांना ते पाहून खूप आनंद झाला.... 
तिघे त्यांच्या भोवती फेर धरून Happy Birthday To You गाऊ लागले.....
त्यांना काय बोलावं कळेना....
मग शीलाने मस्त ट्रे मध्ये चहा, बिस्कीटस, एक गुलाबाचं फुल आणि त्या दोघांकडून ग्रिटींग ठेवलं होतं....
सगळ्यानी मिळून चहा घेतला आणि आजोबांना सांगितलं तुम्ही अंघोळीची तयारी करा; आपण बाहेर जाऊ जेवायला....
शीलाने उटणं, नारळाचे दूध, छोटा दिवा आणि चाफ्याची फ़ुलं असे तबक तयार केले होते.... 
सुनील आणि आर्यननी आजोबांना मस्त रगडून  आंघोळ घातली...आजोबा दिवाळीत आलोय आपण...आर्यन हे सगळं पहिल्यांदाच पहात होता.... मग त्यांचं आवरे पर्यंत सुनीलने नवीन झब्बा-लेंगा त्यांच्या बेडवर ठेवला....
नानांना आता अश्रू आवरेनात किती करताय रे बाळांनो!! काय चाललंय तुमचं...आता असे सुखद धक्के नाही सोसवत रे!! असे म्हणत सुनीलला मिठीच मारली त्यांनी...आनंदाश्रूने तिघांचे डोळे भरून आले होते...
चला आजोबा अजुन गंमत आहे पुढे.....जेवणाच्या निमित्ताने तिघे एका मस्त पॉश हॉटेलमध्ये पोहोचले.... स्वागत आरतीने केले गेले... फुलांच्या पाकळ्या त्यांच्यावर उधळत होते आणि सनईचे सूर ऐकू येत होते....
अरे ! किती मोठा घाट घातलास रे बाळा...सुनीलला पाठ थोपटून बोलत होते.....पूर्ण हॉल नानांच्या जवळचे मित्र परिवार आणि नातेवाईकानीं भरला होता.... 
सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या....
७५ दिव्यांनी औक्षण केलं....केक कापला...
आर्यन आजोबांना काही सोडत नव्हता... 
आत्ता पर्यंत त्याने स्वतःचे असे लाड पाहिले होते पण मोठ्यांचे सुध्दा असे लाड करतात हे त्याला माहीतच नव्हते....
मग प्रत्येकजण नानाच्या सोबत असलेल्या आपल्या आठवणी सांगत होते...कोणी गाणी लिहून आणलेली तर कोणी त्यांना पैशांचा हार घातला. 
मग नानांनीही बोलण्यासाठी माईक हातात घेतला दाटलेल्या कंठातून बोलणे कठीण जात होते, माईक धरलेले हात थरथरत होते.
आजचा दिवस माझ्या आठवणीतील सोन्याचा दिवस...सुनील-शीला आणि या छोट्या आर्यनने मला दिलेली अनमोल भेट आहे. तुम्ही सर्वांनी इथे येऊन मला जो आनंद दिलात त्याबद्दल मी तुमचे आभार कसे मानू. आज माई असती तर खूप खुश झाली असती. 
हे अचानक ठरवलं त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी मी तयारीच केली नाही.एक गाणं जे मी आर्यन साठी लिहिलंय ते म्हणून दाखवतो.....
( चूप चूप खडे हो जरूर कोई बात है... या चालीत बसवावी )
येईल का रे आठवण तुला माझी तू सांग ना?? 
मोठा झालास की तुला आजोबांची सांग ना?? 
कसे आपण दोघे जण खूप खूप खेळायचो 
गोष्टी आणि गाण्यामध्ये खूप खूप रमयचो!!! 
मध्येच अबोला धरून कट्टी-फु करायचो; 
पुन्हा बट्टी करून खूप मस्ती करायचो....
येईल का रे आठवण तुला माझी तू सांग ना?? 
मोठा झालास की तुला आजोबांची सांग ना??
टोपीवाला, कृष्ण बाप्पाच्या गोष्टी तुला आवडायच्या!! 
कधी चेंडू कधी सायकल, बॅट-बॉलही आवडायचे!! 
कधी फिरत फिरत वसंत विहारला जायचो!!
 दगडावर बसून आईस्क्रीम खायचो !! 
येईल का रे आठवण तुला माझी तू सांग ना?? 
मोठा झालास की तुला आजोबांची सांग ना??? 
आई-बाबा रागावले की माझ्या पुढ्यात झोपायचास; 
गोष्टीत रमयचास आणि गुडूप झोपयचास !! 
दिवसभर माझ्या पाठी तुरु तुरु फिरायचास, 
खेळायला चला म्हणून भुणभुण करायचास !! 
गोलगोल फिरून थकून गेलास की 
गोड पापा देऊन लपून बसायचास....
येईल का रे आठवण तुला माझी तू सांग ना??? 
कविता नानांनी संपवली आणि आर्यन त्यांना घट्ट मिठी मारून त्यांचे डोळे पुसत होता....आजोबांनी पण त्याला घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाले गोड गोड बाळ माझं...जशी दुधावरची साय...माझी दुधा वरची साय ##
समाप्त
© सोनाली देवळेकर

507. शिक्षित आणि सजग सुशिक्षित नागरिक यातील फरक

 आई : काय झालंय?
वडील : काही नाही.
आई : मग नाराज का वाटतोय?
वडील : आपल्या युवराजांचा व्हॉट्सॲप स्टेटस पाहिला?
आई : हो.
वडील : आश्चर्य नाही वाटलं?
आई : कसलं?
वडील : त्याच्या स्टेटसचं?
आई : त्यात काय एवढं?
वडील : म्हणजे?
आई : म्हणजे असू शकतो एखादा राजकारणी त्याचा आदर्श.
वडील : एखादा?
आई : हो.
वडील : त्याने ज्या माणसाचा स्टेटस ठेवलाय, तो माझा क्लासमेट होता.
आई : ठाऊक आहे.
वडील : दहावीपर्यंत मी वर्गात पहिला असायचो आणि तो शेवट.
आई : मग?
वडील : तो फक्त बारावीपर्यंत शिकला आणि मी इंजिनिअरिंग केलं.
आई : मग?
वडील : तरी आज माझ्या मुलाला तो आदर्श वाटतोय.
आई : एवढंच ना?
वडील : नाही.
आई : मग?
वडील : मागच्या महिन्यात आमच्या बॅचचं गेट टुगेदर झालं.
आई : फोटो पाहिले ना मी.
वडील : त्या कार्यक्रमातही..
आई : काय?
वडील : तो राजकारणी आल्यावर सगळेजण उठून उभे राहिले.
आई : लोकप्रतिनिधी असल्याने आदर..
वडील : तो प्रमुख पाहुण्यांसह स्टेजवर आणि..
आई : आणि काय?
वडील : आणि आम्ही सगळे खाली.
आई : त्याचं वाईट वाटतंय?
वडील : हो.
आई : का बरं?
वडील : कधीकाळी ज्या शाळेत पहिला नंबर मिळवल्यावर माझा दरवर्षी सत्कार व्हायचा..
आई : त्याच काय?
वडील : त्याच शाळेत आज माझ्या टॅलेंटला शून्य किंमत..
आई : असं का बरं वाटतंय तुला?
वडील : कारण जो पोरगा कसाबसा बारावी शिकला, तो त्यांना आमच्यापेक्षा ग्रेट वाटतोय.
आई : कोण आम्ही?
वडील : आम्ही मेहनतीने सरकारी अधिकारी, इंजिनिअर, शिक्षक, पत्रकार, शास्त्रज्ञ, डिझायनर, आर्किटेक्ट आणि डॉक्टर झालेलो.
आई : इगो हर्ट झाला?
वडील : होणारच.
आई : का बरं?
वडील : इतरांच ठीक आहे, मात्र माझ्या मुलालाही..
आई : काही प्रश्न विचारू?
वडील : हो.
आई : दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड झालं.
वडील : हो.
आई : त्यावेळी तू त्या विकृत घटनेचा निषेध नोंदवलेला?
वडील : नाही.
आई : का?
वडील : सर्वजण तर त्याबद्दल बोलत होते, म्हणून मी टाळलं.
आई : बरं.
वडील : हो.
आई : भारत सरकारने जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारं कलम 370 रद्द केलं.
वडील : हो. माहिती आहे.
आई : त्यावेळीही तू सरकारच्या निर्णयाचा विरोध किंवा समर्थन केलं नाही.
वडील : कारण मग मित्र नाराज झाले असते.
आई : कोणते?
वडील : सरकारचा विरोध आणि समर्थन करणारे.
आई : बरं.
वडील : मला वाद घालायला आवडत नाही.
आई : CAA नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC वरून देशभर आंदोलनं होत असतानाही, तू काहीच बोलत नव्हतास.
वडील : हो. कारण माझा त्याबद्दल अभ्यास नव्हता.
आई : बरं.
वडील : कामाच्या ताणामुळे मला इतर काही वाचायला वेळ मिळत नाही.
आई : चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतरही तू काही प्रतिक्रिया दिली नव्हती.
वडील : त्यात काय प्रतिक्रिया द्यायची?
आई : मागच्या आठवड्यात मणिपूरमधील माणुसकीला काळीमा फासणारा व्हिडिओ व्हायरल झाला.
वडील : हो. ठाऊक आहे. 
आई : २ महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार..
वडील : चूकच आहे ते.
आई : तरी त्या निंदनीय घटनेबद्दलही तू तोंडातून चकार शब्द काढला नाही.
वडील : आपली मुलगीही ९ वर्षांची आहे.
आई : मग?
वडील : त्यामुळे मलाही तो व्हिडिओ पाहून राग आलेला.
आई : मग व्यक्त का नाही केला?
वडील : म्हणजे?
आई : म्हणजे घरात चर्चा करून किंवा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून तुला राग व्यक्त नाही करावा वाटला?
वडील : नाही.
आई : का?
वडील : पुन्हा मग इकडचे किंवा तिकडचे नाराज झाले असते.
आई : सोशल मीडियावर नाही, पण किमान घरी तरी..
वडील : काय घरी तरी?
आई : तुला एकदाही कोणत्याच चालू घडामोडीवर चर्चा करावी नाही वाटली?
वडील : त्याने काय फरक पडणार होता?
आई : त्यामुळे कदाचित मुलांना तुझ्याही जाणीवा आणि टॅलेंटची कल्पना आली असती.
वडील : पण प्रत्येकाला प्रत्येक विषयातील कळतच असं नाही.
आई : किमान पालक या नात्याने, त्या विषयाची माहिती घेण्याचा एकदा प्रयत्न तरी करायचा होता ना.
वडील : माझा व्हॉट्सॲपवर विश्वास नाही.
आई : मग इंटरनेट, न्युज पेपर किंवा पुस्तकाच्या माध्यमातून का नाही माहिती मिळवली?
वडील : गांभीर्य नव्हतं.
आई : तूझ्या याच निष्काळजीपणामुळे, आज तूझ्या मुलाला स्वतःच्या बापाला आदर्श मानावं वाटत नाहीये.
वडील : अरे पण मी तर नियमितपणे मतदान करतो.
आई : तेवढं पुरेसं आहे?
वडील : म्हणजे?
आई : आपल्या आजूबाजूला, राज्यात किंवा देशात घडणाऱ्या घटना नकळत आपलं आयुष्य बदलवत असतात.
वडील : मग?
आई : त्यावर प्रतिक्रिया न देणं, हे मुर्दाडपणाचं लक्षण आहे.
वडील : तोंड सांभाळून बोल..
आई : वाईट वाटलं?
वडील : हो.
आई : मग या वेदना इतर वेळी कुठे जातात?
वडील : इतर वेळी?
आई : एखाद्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतरही असंवेदनशीलपणाने शांत कसं बसवतं तुला?
वडील : कारण मी कट्टर नाही.
आई : अरे मग खऱ्याला खरं अन खोट्याला खोटं म्हणण्याचं धाडस तरी दाखव.
वडील : कळतंय.
आई : फक्त कळून फायदा नाही..
वडील : मग?
आई : वळायलाही हवं.
वडील : हो.
आई : तुझ्यासारखे लाखो शिकले सवरलेले हुशार तरुण निरुत्साही असल्याने, बऱ्याच ठिकाणी आज नको ते लोक समाजाचं नेतृत्व करत आहेत.
वडील : मग काय करू?
आई : कोणताही विषय असो, मिळेल त्या माध्यमातून त्याविषयी माहिती मिळव.
वडील : मग?
आई : मग त्यावर घरात चर्चा कर आणि शक्य झाल्यास समाजातील इतरांपर्यंत ती व्हेरीफाईड माहिती पोचव.
वडील : मग काय होईल?
आई : तरच आजच्या पिढीला चूक आणि बरोबर यातील फरक कळेल.
वडील : नाहीतर?
आई : नाहीतर समाजात विष पसरविण्यासाठी पुरवलेल्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊन, संपूर्ण पिढी भरकटत जाईल.
वडील : अरे पण..
आई : एक पिढी भरकटली, तर संपूर्ण देशाचा विकास भरकटेल.
वडील : मग?
आई : मग मुलं नको त्या गोष्टींना महत्व देतील आणि देशाच्या सर्वांगीण उन्नतीचे प्रमुख विषय बाजूला राहतील. 
वडील : अनुभवतोय.
आई : म्हणूनच जबाबदारी घे आणि बदल घडव.
वडील : नक्कीच.
आई : कारण..
वडील : कारण काय?
आई : कारण हीच वेळ आहे, फक्त एक शिक्षित आणि सजग सुशिक्षित नागरिक यातील फरक अधोरेखित करण्याची.
वडील : ज्जे बात! 
©️अक्षय भिंगारदिवे,
१० ऑगस्ट २०२३

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

506. नातं म्हणजे काय ?

एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. 
एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन ssssss"
आतून एका मुलीचा आवाज आला, "जरा थांबा, मी येतेय"
दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. 
दार काही उघडेना. 
शेवटी पोस्टमन वैतागला आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे"
आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते"
पोस्टमन.... "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"
पाच मिनिटे पुन्हा शांतता.
आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. 
दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !
दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. 
काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. 
हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.
असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे.
असेच दिवस जात होते. 
दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. 
ती काही बोलली नाही. 
मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. 
नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.
रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. 
अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. 
हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? 
बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे. 
पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला.
मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. 
तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. 
पण घरी जाऊन बॉक्स उघडा"
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, तोही त्याच्या मापाचा पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.
दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. 
आणि म्हणाला, "मला फंडातून  कर्ज हवे आहे."
साहेब म्हणाला," अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?
पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."
साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?
पोस्टमन : "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. 
माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. 
तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे.
साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!
नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही ! 
तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. 
ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही !!

ही कथा व्यंकटेश माडगूळकर यांची आहे त्या कथेचे नाव अनवाणी आहे.

505. तत्सम गोष्टींचे ज्ञान असेल तरच...

         वकिलांनी गेली कित्येक वर्षे आयपीसी सीआरपीसी आणि इंडियन एव्हडन्स ऍक्टची कलमं मुखोद्गत केली, आता त्यांचे अस्तित्वच संपलं आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर्सचे नॉलेज जेमतेम चाळीशी पर्यंत नवीन रहाते पुढे भलतीच कुठलीतरी टेक्नॉलॉजी येते आणि हे शून्य होऊन बसतात. ऑपरेशन्स करणारे अतिशय तज्ञ सर्जन, नवीन बायोटेक्नॉलॉजी मधून कुठलीतरी ऑर्गन डेव्हलपमेंटची टेक्नॉलॉजी धंदा बंद करून जाते. नवं नवीन टेक्नॉलॉजी बाजारात येण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. आज शिकलेले कौशल्य उद्या उपयोगात येईल याची कोणतीच खात्री देता येऊ शकत नाही. टॅक्सेशनचे कायदे बदलले तर एवढे प्रचंड कष्ट करून सीए झालेल्या लोकांना काहीच काम उरणार नाही. आजकाल माणसाने स्वतःची बुद्धी बहुपेडी विकसित करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. व्यवसायात रुपांतरीत होऊ शकेल अशी एक दोन कौशल्ये स्वतःमध्ये विकसित करणे अनिवार्य झालेले आहे. बँकिंग सेक्टरमध्ये माझ्या देखत चेक पास होण्याच्या कंटाळवाण्या प्रकारापासून ते यूपीआयच्या इन्स्टंट पेमेंट पर्यंत आमूलाग्र बदल घडलेला आहे.
         आयसी इंजिन, कारब्युरेटर, एक्सझोस्ट, गियर्स अशा किचकट रचनेतून ऑटोमोबाईल इंडस्ट्री झटक्यात बाहेर पडली आणि बॅटऱ्यांवर चालू लागली आहे. जुन्या मेकॅनिकच्या धंद्याचे वाटोळंच करून गेली. कन्स्ट्रक्शन मध्ये प्री कास्ट, प्री टेन्शन येऊ लागल्यानंतर जुने ठेकेदार जॉबलेस झाले आहेत. एकाच प्रॉडक्टच्या ट्रेडिंगच्या आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या मागे लागायचे आणि त्या प्रॉडक्टची मार्केटमधून अचानक गरजच संपून जाते, असे प्रकार तर खूपच घडताना दिसून येतात. एखाद्या मटेरियलवर सरकारी बॅन येतो आणि असंख्य कारखाने बंद पडायच्या मार्गाला लागतात, हे प्लास्टिक इंडस्ट्रीने चांगलेच अनुभवलेले आहे. वॉटर प्रूफिंगच्या बाबतीत तर केमिकल्स आल्यामुळे जुने ब्रिक बॅट कोबा करणारे कंत्राटदार आणि गवंडी अक्षरशः शून्य झाले. आता माणसाला एकच एका कौशल्यावर अवलंबून राहून चालण्याचे दिवस संपले आहेत. अगदी सुरक्षित अशी समजली जाणारी बँकेतली सर्व्हिस सुद्धा युपीआय आल्यानंतर सुरक्षित राहिलेली नाही. आपणच जगाची एखादी गरज ओळखून ती आपल्याला पूर्ण करता येईल असा व्यवसाय शोधणे आवश्यक झाले आहे. त्यामध्येही आपले वैशिष्ठ्य कायम राखून आपले कॉम्पिटिटर्स आपल्या जवळही फिरकू न देणे हा सुद्धा एक कौशल्याचाच भाग आहे. आपले उत्पन्न जपून वापरणे, आपले राहणीमान कमीतकमी खर्चिक ठेवणे, आपले पैसे फक्त उत्पन्नासाठीच खर्च करणे, हे आर्थिक नियमन कसोशीने पाळणे आजकालच्या दिवसात अनिवार्य झालेले आहे. आज दोन पैसे हातात आले तर त्याचा विनियोग अनुत्पादित खर्चासाठी न करता ते साठवून ठेवणे आणि उत्पादन खर्चाची संधी आली की त्याचा विनियोग करणे आता आवश्यक बनलेले आहे. व्यवसायात आलेल्या उत्पन्नात, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट्स आणि सिंकिंग फंड्सचा  समावेश असतो, तो बाजूला काढून ठेऊन प्रॉफिट घेण्याची सवय स्वतःला लावून घेणे गरजेचे आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या हातात एकदम ग्रॉस उत्पन्न मिळते, त्यातले सात ते आठ टक्के उत्पन्नच फक्त आपले आहे, हे बांधकाम व्यावसायिकाने कायम लक्षात ठेवणे गरजेचे असते. अनेक बांधकाम व्यावसायिक भपका हि मार्केटिंगची गरज समजतात आणि अतिशय महागड्या गाड्या, भपकेदार ऑफिसेस आणि प्रचंड पगार देऊन भरपूर स्टाफ गोळा करून ठेवतात. एक दिवस उंटाच्या पाठीवर शेवटची काडी ठेवली जाते आणि सगळा उंट कोसळून पडतो. फायनान्शियल मॅनेजमेंट आणि मॉब सायकॉलॉजी भाषेचे ज्ञान एखादी कला आणि त्याच्या जोडीला इंजिनियरिंग मेडिसिन किंवा तत्सम गोष्टींचे ज्ञान असेल तरच आजकाल माणूस सर्वाईव्ह होऊ शकतो.

504. गोरक्षनाथ आणि नागपंचमी

     सर्व योग्यांमध्ये ताऱ्याप्रमाणे चमकणारे एक नाव म्हणजे गोरक्षनाथ. प्रचंड योगसामर्थ्यामुळे आणि कठोर तपसाधनेमुळे यांची तुलना साक्षात “शिवां”बरोबर केली जाते. नवव्या शतकाच्या कालखंडात गोरक्षनाथ भारत परिक्रमा करत असताना ‘श्रीयाळ पूर / श्रीयालय/ शिराळे/ बत्तीस शिराळा येथे आले होते. तो काळ श्रावण महिन्याचा होता.   
        दिवसा शिराळा गावात भिक्षा मागून पुरेसे अन्न गोळा झाल्यानंतर नाथ आपल्या साधनेत लीन होत असत. शिराळा गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या टेकड्यांवर तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांचे वास्तव्य होते. आज अस्तित्वात असलेला गोरक्षनाथ मठ जेथे दोन ओढ्यांचा संगम आहे तेथे, तसेच दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या ओढापात्रातील कातळात (काळे  पाषाण) ते ध्यानधारणा करत असत. नाथमंदिराच्या दक्षिणेला असणारा भाटशिरगाव येथील चंद्राकार डोंगराला ‘नाथाचा डोंगर‘ असे संबोधतात. तेथे पायथ्याला भैरवाचे तर वर पठारावर नाथाचे दुर्गम मंदिर आहे. या पावन परिसरात कठोर तपश्चर्या करून गोरक्षनाथांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या. त्या काळात अष्टांग साधना प्रचलित होती. त्यामधील ‘यम’ आणि ‘नियम’ ही साधनेची अंगे वगळून नाथांनी ‘षडंग’ साधना म्हणजेच ‘हटयोग’ साधला. ज्या काळात भारतीय अध्यात्मिक साधना ‘मद्य, मांस, मैथुन, मुद्रा आणि मत्स्य’ या पंच 'म’कारात अडकून पडली होती, तेंव्हा तिला नैतिक आविष्काराचा मार्ग गोरक्षनाथांनी दाखविला. ‘अलख निरंजन’ चा बोध प्राप्त करून नाथपंथाच्या गुरु-शिष्य परंपरेत चैतन्य निर्माण केले. पशु, पक्षी, प्राणी आणि निसर्ग यांच्याशी ते समरूप झाले. त्यांची दुखे जाणून त्यावर मार्ग काढला.  
         ‘जिवंत नागांची पूजा’ ही त्यापैकीच एक परंपरा. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मळभ गळत असताना म्हणजेच प्रचंड पाऊस पडत असताना, ‘वारणा’ आणि ‘पंचगंगा’ या नद्या दख्खनचे अश्रू बनून दुथडी भरून आवेशात वाहू लागतात. अनेक वृक्ष, प्राणी, सरीसृप निवाऱ्यासहित वाहून जातात. पाण्याच्या वाढत्या पातळीबरोबर अनेक नाग, साप किनाऱ्यापासून दूर सरकू लागतात. पण शेवटी नाईलाज होतो, निसर्गाच्या या रुद्र रुपासमोर हे बिचारे जीव हतबल होतात. सर्पांच्या अनेक बिळांमध्ये पाणी शिरते. बिळाची तोंडे पावसाच्या माऱ्याने ढासळतात आणि परिणामी बिळे मुजतात. कित्येक दिवस हे सरीसृप त्यात अडकून राहतात. बाहेर पडता न आल्याने मरून जातात तर काही प्रवाहाबरोबर वाहून जातात. निसर्गाचे अगदी बारकाईने निरीक्षण करणाऱ्या गोरक्षनाथांच्या ध्यानात शेकडो वर्षांपूर्वी हा प्रकार आला, त्यांच्यातील भूतदया करुणा जागृत झाली आणि त्यांनी या जीवांना अभय देण्याचे ठरवले. भीतीपोटी लोक नागांना मारतात त्यामुळे लोकांमधील भय नष्ट करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी जीवदान दिलेला एक नाग आपल्या झोळीमध्ये घेतला आणि नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी ते शिराळा गावात आले. सुदैवाने तो नागपंचमीचा दिवस होता.  
         शिराळ्यातील महाजनाच्या घरासमोर येवून त्यांनी भिक्षा मागण्यासाठी ‘अलख नाद’ केला. बराच वेळ घरातून कोणी बाहेर येईना. गोरखनाथांनी पुन्हा एकदा मोठ्याने ‘अलख निरंजन’ असा आवाज दिला. तेवढ्यात एक स्त्री बाहेर आली. तिने नाथांना सांगितले कि आज नागपंचमीचा दिवस असल्याने ती मातीच्या नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यात व्यस्त होती. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले ‘माई तू जिवंत नागाची का पूजा करत नाहीस?’ असे म्हणून त्यांनी आपल्या झोळीतील नाग बाहेर काढला आणि त्याची पूजा करण्यास सांगितले. हा नवखा प्रकार पाहून अनेक लोक जमा झाले. तेंव्हा गोरखनाथांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले. तो नाग पुन्हा आपल्या झोळीत टाकला आणि प्रत्येकाच्या घरी घेवून गेले, आणि नंतरच भिक्षा ग्रहण केली. लोकांच्या मनातले भय नष्ट झाले. तेंव्हापासून आत्तापर्यंत घरोघरी  ‘जिवंत नागांची पूजा’ करण्याची ही परंपरा गेल्या १२०० वर्षांपासून सुरु आहे. त्यानंतर दर बारा वर्षांनी गोरक्षनाथ या स्वयंभू ठिकाणी आपल्या शिष्यांसमवेत अनेक दशके येत होते.
        गोरक्षनाथ आपल्या मार्गात परिक्रमा करत निघून गेले पण त्यांच्या अनेक आठवणी आजही शिराळा येथील गोरक्षनाथ मठात जिवंत आहेत. त्यांनी १२०० वर्षापूर्वी लावलेले “गोरक्ष चिंचेचे” दुर्मिळ औषधी झाड आजही त्यांच्या आठवणीची साक्ष देत दिमाखात उभे आहे. त्यांच्या पश्चात दर बारा वर्षांनी येथे भारत परिक्रमा करत नाथपंथीय दर्शनी साधूंची झुंड येते. त्यांच्या दृष्टीने हे स्वतः गोरक्षनाथांच्या तपःसामर्थ्याने पावन झालेले अतिशय महत्वाचे तीर्थ आहे. दर बारा वर्षांनी झुन्डीतील एका अनुभवी आणि सक्षम साधूंची मठाधिपती म्हणून नेमणूक होते. जुने मठाधिपती राजसिक मोह सोडून पुन्हा ‘आदेश’ करून झुन्डीतील साधूंबरोबर मार्गस्थ होतात. जर बारा वर्षांचा कालावधी संपण्या-अगोदर एखाद्या मठाधिपतीचे निर्वाण झाले तर मठाच्या प्रांगणातच त्यांची समाधी निर्माण केली जाते. अशा अनेक सिद्धपुरुषांच्या समाध्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात आहेत आणि हे सर्व गुरु येथे सूक्ष्मरूपाने वास करतात अशी लोकांची धारणा आहे. येथेच विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर आहे. एकादशीच्या दिवशी गोरक्षनाथांची भेट घेण्यासाठी ‘विठ्ठल’ म्हणजेच पांडुरंग येथे येतात. पंचक्रोशीत हे क्षेत्र ‘प्रतीपंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या चैतन्याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. शिराळ्याचे मुळ नाव ‘श्री आलय’ होते. श्री म्हणजे लक्ष्मी आणि आलय म्हणजे निवासस्थान. कोल्हापूरची आदिशक्ती अंबामाता हिचे मुळ ठिकाण म्हणजे श्रीयालय. कोल्हासुराचा वध केल्यानंतर ती करवीरनिवासिनी झाली. या अंबामातेचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर शिराळा येथे असून ती शिराळ्याची ग्रामदैवत आहे. या मंदिरात अम्बामातेला तेल वाहण्यासाठी गोरक्षनाथ येत होते. आजही त्यांच्या शिष्यामधील एक शिष्य (कि गोरक्षनाथच?) अंबामातेच्या दर्शनासाठी झुंडीच्या वेळेस आवर्जून येतात. अनेक संत महंत जसे कि समर्थ रामदास, निवृत्तिनाथ, जंगली महाराज येथे येउन गेल्याचे दाखले आहेत आणि त्यांनी आपल्या अभंगातून, डफ गाण्यातून या लक्ष्मीच्या शिराळ्याची आणि येथील नागपंचमीच्या परंपरेची महती वर्णिली आहे. मुस्लीम शासकांनीही या परंपरेला दिलेले संरक्षण अनेक शिलालेखातून सापडते. “करवीर महात्म्यः करवीर खंड”, ”पद्मपुराण”, आदिनाथानी लिहिलेला “नाथ लीलामृत” अशा अनेक ग्रंथांमध्ये नागपंचमीचा उल्लेख आढळतो. ‘पन्नग’ या शब्दाचा अर्थ ‘नाग’ असा होतो. दहाव्या शतकात शिलाहार राजांनी बांधलेल्या ‘पन्नग गडावर ‘ म्हणजेच ‘पन्हाळगडावर’, पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ  ‘नागझरी’ नावाचे तीर्थ आहे. या कुंडाजवळ असणाऱ्या शिलालेखात शिराळा येथील ‘नागपंचमी’ उत्सवाचा उल्लेख आहे. शिराळा ते पन्हाळा यामधील घनदाट जंगलाचा भाग हा या नागांचा नैसर्गिक अधिवास आहे. येथे हजारोंच्या संख्येने नाग सापडतात.   
           शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या हजारो नागांचे, ही परंपरा आजही रक्षण करत आहे. या दिवशी स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची मनापासून पूजा करतात. या दिवशी स्वयंपाकामध्ये काहीही कापले किंवा चिरले जात नाही. नाग सूक्ष्मरूपाने आला तर मारला जाईल अशी सर्व स्त्रियांची भावना असते. ‘नाग हा प्राणी नसून आमचे दैवत आहे’ ही प्रत्येक शिराळकराची भावना असते. नाग पकडण्यापासून ते पुन्हा मूळ जागेवर आसऱ्याच्या ठिकाणी सोडण्यापर्यंत शिराळकर नागांची जीवापाड जपणूक करतात. त्याला कसलीही इजा होऊ देत नाहीत. जर एखादा नाग जनावरांचा पाय पडून जखमी झाला असेल, किंवा मोर, मुंगुस यांनी त्याला इजा पोहोचवली असेल तर त्याच्यावर उपचार केले जातात आणि नंतरच त्याला सुरक्षित अधिवासात सोडले जाते. येथे कधीही नागाला मारले जात नाही, त्यांचे दात किंवा विष काढले जात नाही. एकाच बांधाला पाच ते सहा नाग सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे शेतकरी आणि नाग गुण्यागोविंदाने नांदतात असेच आपणास म्हणावे लागेल.
         नाग पकडणे ही एक कला आहे आणि तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपारिक ज्ञानाविष्कार आहे. त्याला भावनेची जोड आहे. या भावनेने भारीत होवून, जंगलातून, रानावनातून, काट्या-कुट्यातून दिवसभरात तीस ते चाळीस किलोमीटरचे अंतर तुडवून अनवाणी पाय कधी विसावतात ते कळतही नाही. नाग पकडताना होणारी भटकंती एक वेगळाच आनंद देते. हातामध्ये काठी घेउन एक वेगळ्याच प्रकारचे सम्मोहन पांघरून आम्ही शिराळकर नाग धरायला बाहेर पडतो. सगळा आशेचा आणि आस्थेचा खेळ आहे. जेंव्हा उन्हाची तिरीप पडते तेंव्हा नाग बाहेर पडण्याची शक्यता वाढते. हा उनपावसाचा लपंडाव आमच्यासाठी फलदायी असतो. दूरवर घोळक्याने किलबिलाट करणारे पक्षी आमचे लक्ष वेधून घेतात. माग (नागाच्या जाण्याचे चिखलात उठलेले ठसे किंवा व्रण) शोधण्यासाठी ग्रुप केले जातात, बांध वाटून घेतले जातात. आणि शोध मोहीम सुरु होते. प्रत्येक निवाऱ्याचे ठिकाण, बीळ पालथे घातले जाते. शेतातला एक इंचही आमच्या नजरेतून सुटत नाही. नागाने तोंड दाखवल्यास किंवा ताजा माग सापडल्यास आपोआपच तोंडातून बाहेर पडते “अम्बाबाई च्या नावानं चांगभलं’ कि लगेच सगळे बांध सोडून त्या दिशेने वेड्यासारखे पळत सुटतात. ही घोषणा आमच्यासाठी प्राण आहे. जेथे माग सापडला तेथे थोडा गुलाल टाकला जातो आणि ‘बीळ चालवायला’ सुरुवात होते. तशी शिराळकरांची एक वेगळीच परिभाषा आहे जसे 'माग काढणे, बीळ चालवणे, अवती लावणे, नागाडी', हे त्या शब्दावलीतले काही शब्द.पण खरा सांगू का, लय भन्नाट मज्जा असते आणि ती अनुभवण्यासाठी शिराळाला जायाला लागतं.

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...