शुक्रवार, २८ जून, २०२४

1241. अवघा रंग एक झाला

"माई मी निघते. पोळी भाजी करून ठेवली आहे. दुपारी मावशी येतील. त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा. रात्रीचं मी बघेन आल्यावर."
माई मख्ख चेहेऱ्याने अनुजा च्या सुचना ऐकत होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. म्हणजे आजपण दिवसभर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लासला जाईल. तिथून आली की खेळायला मैत्रिणी कडे पळेल. अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं
"काय झालं माई? नाराज आहात का? कसला राग आलाय का? माझं काही चुकलंय का?"
"तुझं काही चुकलं नाहीये ग बाई. माझंच चुकलंय, मीच एक अडगळ होऊन राहिले आहे तुमच्या घरात."बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला. आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा. त्या सहसा असा त्रागा करत नाहीत. अनुजा ने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं
" काय झालं माई? मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल."
माईंनी एकदा अनुजा कडे बघितले. तिच्या आवाजात, नजरेत आर्जव होतं. त्यांना एकदम अपराधी वाटलं. खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती. घरात सगळ्या सोयी होत्या. मुलगा, सून, नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती. त्यांचं औषधपाणी ,व्यवस्थित होत होतं. फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरा सारख्या पसरलेल्या वेळेचा.
"कंटाळा येतो ग दिवसभर, काही काम न धाम. टीव्ही बघितला की डोकं दुखतं. तुम्ही सगळी आपापल्या व्यापात. दिवस खायला उठतो बघ. पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये. तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता. 'सुख दुखतं' म्हणतात ना तसं झालय माझं"
अनुजा जरा विचारात पडली ,मग म्हणाली" तुम्हाला वाती करायला जमतील का?
"हो. बोटं दुखतात त्याने सुद्धा. पण थांबून थांबून करीन"
"ठीक आहे. मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा."
अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली
"निघू मग मी आता?रात्री लवकर येते.
अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या. इतक्यात बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा  कापूस घेऊन आला होता. अनुजाच्या तत्परतेच त्यांना कौतुक वाटलं. त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली. जेवण झाल्यावर त्यांनी पिशवीतून कापूस पुढे काढला. तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं. एवढ्या कापसाच्या हजार- दीड हजार वाती होतील आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं. काय उपयोग इतक्या वाती करून? विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली. इतक्यात  ऋत्विका तिथे आली
"आजी मी पण करू?"
"नको तुला नाही जमणार."
"तू शिकवं ना मला."
त्या दाखवतील त्या प्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या. तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या. पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योगच झाला. वाती वळण्याचा पण वेळही चांगला जात होता. वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वाती सुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या. एवढी कशी अश्रद्ध माणस? एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना? अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे ती संध्याकाळीच परते. आज तर सात वाजून गेले तरी अनुजा चा पत्ता नव्हता. शेवटी ७.३० ला आली. खूप थकलेली वाटत होती, हातात कसली तरी गुंडाळी होती. आल्या आल्या तिने माईंना हाक मारली. माई आल्या. अनुजाने गुंडाळी उलगडली आणि माईंच्या अंगावर काटा उभा राहिला. ते विठ्ठलाचे चित्र होते. मूर्तिमंत  पांडुरंग. त्यांच्या कडे फ्रेम होती. अगदी तसाच विठोबा रेखाटला होता. वत्सल,आश्वासक माईंचे हात जोडले गेले. स्वतःच्याही नकळत.
"कोणी काढलं हे चित्र?" भानावर येत माईंनी विचारलं.
"माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नावाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय."
 तिला दोन्ही हात नाहीयेत. पायाने काढलंय तिने हे चित्रं. तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते  पंधरा दिवस."
"अगं किती सुरेख चित्र काढलंयन. आपल्याकडे एक तसबीर होती पांडुरंगाची. अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे."
"अगदी बरोबर, कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलय. मीच नेली होती तिला दाखवायला. तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं. "
"आता ह्या चित्राचं काय करणार?"
"काही नाही. खास तुम्हाला दाखवायला आणलंय."
"मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटी च्या लॉबी मध्ये लावूया. बाजूला चित्र कोणी काढलं त्याचीही माहिती लिहू. नाहीतरी उद्या एकादशी आहे..."
"अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली. फक्त सेक्रेटरिंची परवानगी घेऊ म्हणजे झालं."
झालं. सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं. बाजूला करुणाची माहिती आणि बाजूला एक वही ठेवली. त्यात अभिप्राय लिहायचे होते. 
माई तुम्ही नेहमी म्हणत असता ना की आम्ही अश्रद्ध आहोत. तसं नाहीये माई. आमची श्रद्धा आहे. पण देवावर. देवाच्या मूर्तीवर नाही. माई तुम्ही आणि ऋत्विकाने वाती केल्या होत्यात ना त्या मी देवळा जवळच्या दुकानात विकायला दिल्या त्याचे पैसे मिळाले त्यात थोडी भर घालून, देवळा जवळच एक मुलगी रस्त्यावर फडकं टाकून हार, फुलं विकायला बसायची, तिला एक स्टूल, टोपली, हार अडकवायला स्टँड असं समान घेऊन दिलं. इतकी खुश झाली. पुन्हा पुन्हा आभार मानत होती. आज तुमच्या रुपात तिला पांडुरंग भेटला. त्या मुलीसाठी तुम्ही, ऋत्विका, करुणासाठी मी आणि माझ्या साठी माझे बाबा 'पांडुरंग' होते. ज्यांनी मला माणसा मधला पांडुरंग ओळखण्याची 'नजर' दिली. माई हसल्या.
"अगं भल्या माणसाची ओळख आम्हाला पण पटते. देवमाणसा पुढे आम्ही कायमच लीन असायचो आणि गरजू माणसाला मदत करायची बुद्धी देवाने आम्हाला ही दिली. पदराला खार लावून सुध्दा  मदत केली आहे आम्ही. पण तरीही मला परंपराही पाळावीशी वाटते गं."
परंपरा देवासाठी नाही तर स्वतः साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी पाळायची. आता इथे शहरात सगळी कडे उजेडच उजेड असतो, पण खेडेगावात संध्याकाळ झाली की, धड अंधार नाही. धड उजेड नाही अशा वेळी खूप उदास वाटत,मन कातर होतं. अशा वेळीच देवाशी निरांजन लावायची पद्धत होती,तुळशी जवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणायला लागलं की मन शांत,आश्वस्त होतं. अशा परंपरांमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकतं. सणा उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातली माणसं एकत्र येतात, नाती टिकतात, किरकोळ रुसवेफुगवे विसरले जातात. अनुजा श्रद्धा ही बावनकशी सोन्यासारखी असते. पण सोन्याची लगड दोऱ्याला बांधून गळ्यात घातली तर कशी दिसेल? परंपरा त्या लगडीचा सुंदर हार करते. विस्तारते. सर्वांना सामावून घेते. श्रद्धेला एक लोभस रूप देते."अनुजा चकित होऊन ऐकतच राहिली.
आपण माईंना देवभोळ्या फारसा विचार न करता प्रथा पाळणाऱ्या समजत होतो. जरा विचार करून अनुजा म्हणाली,
"माई तुम्ही दमला असाल ,जरा आराम करा ,जेवायच्या वेळी हाक मारते तुम्हाला."
माई त्यांच्या खोलीत जाऊन आडव्या झाल्या , त्यांचा डोळा लागला.
त्यांना जाग आली ती अनुजा त्यांना उठवायला  आली तेव्हा. त्या उठल्या. त्यांनी ठरवलं आपल्या उपासाचे काही बोलायचे नाही. नाही केला उपास तर काय बिघडतं? नाहीतरी ह्या प्रथा स्वतः साठीच असतात, असं आपणच नाही का सांगितलं अनुजाला. घरात निरांजन लागत नाही म्हणून आपण नाराज होतो. पण आज एका मुलीच्या आयुष्यात एक दिवा लागला. मग नाराजी कशाची? त्या बाहेर आल्या. ऋत्विकाने त्यांना हात धरून किचन मध्ये देव्हाऱ्याजवळ नेलं. माई बघतच राहिल्या. विठोबाची तसबीर ठेवली होती. हार घातला होता आणि निरांजन लावलं होतं. माईंनी हात जोडले नि त्या डायनिंग टेबल जवळ आल्या. ताटात वरी तांदूळ, दाण्याची आमटी,बटाट्याची भाजी.  सगळा उपासा चा मेनू. आज धक्क्यावर धक्के बसायचा दिवस होता. त्यांनी अनुजा कडे पाहिलं.
"माई ,तुमचं पटलं मला, प्रथा आपल्या साठी पाळायची. खरं सांगू मला पण बरं वाटलं हे सगळं करून. कारण
जे काही मी केलं त्या मागचा हेतू मला आज कळला."
माई हसून म्हणाल्या "आणि आज मी परंपरा सोडायचं ठरवलं होतं. तुझ्या सारखा माणसातला पांडुरंग शोधायचा ,असं ठरवलं होतं."
"चला. म्हणजे आज आपल्या श्रद्धेचे वेगवेगळे रंग एकत्र आले आणि
 'अवघा रंग एक झाला'
दोघी एकदम म्हणाल्या.

मेधा दीक्षित

1240. एका सैनिकाच्या पत्नीची वटपौर्णिमा !

प्रिय विक्रांत,
कसा आहेस?  मी ठीक. सॉरी, काल लिहू शकले नाही. काल आपल्या पियुची शाळा सुरु झाली. मागच्या आठवड्यात जमलं नाही, म्हणून काल रात्री तिच्या वह्या पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा 'सोहळा’ पार पडला. 'सोहळा’च तो ! कोऱ्या करकरीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पडणारा ! थोडक्यात...म्हणून काल लिहिणं जमलं नाही. आज वटपौर्णिमा होती. तू 'गेल्या' नंतरची पहिली. काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला. मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोखात बघत बसले. आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला - वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात? 'वडा-पाव' ! तुझ्या तोंडून प्रथम ऐकला तेव्हा केव्हढी हसले होते मी ! आठवतंय नं ? आणखी एक प्रसंग आठवला. आपलं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या एकंदरीत 'उत्साहावरून' सासुबाईंनी माझं मन ओळखलं असावं. माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या. मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथे येऊन पूजा करायची आहे. मी म्हटलं 'माझा विश्वास नाही'. तर म्हणाल्या,’या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा. इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे. परंपरेपेक्षा मला ही कृतज्ञतेची भावना जास्त भावली.मी सासूबाईंबरोबर दर वर्षी पूजा करू लागले. आज सकाळी पुजेची थाळी घेऊन वडाजवळ गेले. सोबत सासूबाई होत्या. वडाजवळ उभी राहिले. बराच वेळ निःशब्द ! अचानक काय वाटलं माहित नाही - भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक salute ठोकला ! Afterall, तू मेजर होतास, विक्रांत ! सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या, पण आता त्यांचाच बांध फुटला.  आधीच सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या. आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबुज सुरु झाली.  'हिला आणायचं का इथे ? सबनीस काकींना तरी कळायला हवं होतं!'  गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणालं. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती, कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता. 
विक्रांत, 
आपण या जन्मात भेटलो खरे - पण तू 'मला असा' किती मिळालास? पुढचे सात जन्मच काय- सगळे जन्म तू मला हवा आहेस. हे, खरं तर, घरी बसून देखील मागता आलं असतं. पण का कोणास ठाऊक, मला वडाजवळ जावसं वाटलं. घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा-रूढी, प्रतीकं तुम्ही माना किंवा मानू नका, पण तुमच्या एकूण 'असण्याला'च या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात. तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता. पण एक सांगू ? विश्वास-अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो. मी त्याला 'instinct' म्हणते. भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादवेळी पट्कन कुणालातरी भीक देऊन मोकळे का होतो, याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीसं. अशावेळी आपण फक्त आपल्या 'instinct' ने दिलेली आज्ञा पाळत असतो. सोळा डिसेंबरच्या रात्री बॉर्डरवर शत्रूशी चकमक झाली. फारशी कुमक जवळ नसताना तू तुझ्या सिनियर च्या आज्ञेने लढलास... आणि शहीद झालास?  Vikrant, you just followed your instinct ! वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही, पण गंमत वाटते. सो कॉल्ड प्रगतीच्या नावाखाली मुलींच्या हातात सिगरेट, बियर आणि दारूचा ग्लास खपवून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो. आपल्या मुलीबाळी गणेशोत्सवात 'शीला की जवानी' म्हणत आचकट विचकट नाचलेल्या चालतात पण पिरियड्स चालू असलेल्या स्त्रीला देवघरात यायचा मज्जाव असतो ! हा paradox मला मान्य करावा लागतो. तुम्ही कितीही शिका, पदव्या मिळवा, जग जिंका.! माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातल्या या विसंगतीला पर्याय नाही. आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिविलीयन्सना नेहमी नावं ठेवायचास. 'तुम्हाला जगण्याची शिस्त नाही' म्हणायचास. नसेल आम्हाला शिस्त. पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते. मी ही रोज लढते. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाचं रक्षण करण्यासाठी. माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगत राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही. हे माहित असून लढते. पियु, सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी 'अभिनय' करते त्याबद्दल कुठलंही award मिळणार नाही. हे माहित असून लढते. आपल्या पियुच्या न संपणाऱ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही. हे माहित असून लढते. I am a soldier, I fight where I am told, and I win where I fight ! तूच म्हणायचास ना?  थांबते. 
पियुला गोष्ट सांगायची वेळ झाली. उद्या भेटू. 
बाय!
💐🙏
शहीद विक्रांत सबनीस यांच्या सुविद्य पत्नीने २-३ वर्षापूर्वी एका  blog वर लिहिलेला भावूक लेख.

मंगळवार, २५ जून, २०२४

1239. शिक्का

      रविवार सकाळ उजाडली. पावसाचा रंग गडद झाला होता. सिंथिया आणि व्हिन्सेंट डी'मेलो मात्र उठले होते. त्यांची रविवार सकाळ चर्चमध्ये जायची. तिथल्या प्रेअर्स , सर्व्हिसेस दोघांना मनापासून आवडायचे.  फादर काय बोलले? त्यांनी आज काय सांगितले याचा विचार करत ते घरी परतायचे. दर रविवारी कोणीना कोणी भेटते, खुशाली कळते हा सिंथियाच्या आवडीचा भाग होता. आठच महिन्यांपूर्वी व्हिन्सेंटने नोकरी बदलली होती. नविन कंपनीने त्याला आलिशान गाडी दिली होती. नवऱ्याबरोबर या गाडीतून जाताना तिला वेगळाच आनंद व्हायचा. तिच्या या वागण्याला ' सिली गर्ल' असे म्हणत मान डोलवून हसायचा. रविवारी दुपारी त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीच्या एडिथच्या मैत्रिणीकडे जायचे होते. येतायेता बांद्र्याहूनच तिला द्यायला गिफ्टस् घ्यावीत असे दोघांनी ठरवले. त्याप्रमाणे दोघे गिफ्ट घ्यायला एका चांगल्या दुकानात शिरले.  खरेदी चालू असतानाच व्हिन्सेंटला ऑफिसमधून दोन फोन आले. सिंथियाला आश्चर्य वाटले. रविवारी का फोन आले असतील? दुसऱ्या फोनच्या वेळी व्हिन्सेंट दुकानाबाहेर जाऊन पाचेक मिनीटे बोलत होता. तो आत आला तेव्हा त्याचा चेहरा थोडा तणावात वाटला. सिंथियाने हळू आवाजात विचारले ," एनी प्राॅब्लेम इन ऑफीस? यु लुक वरीड्.." व्हिन्सेंटला विषय वाढवायचा नव्हता. ऑफिसमध्ये ऑडीट चालू आहे आणि त्यासंदर्भात त्याला फोन आला होता असे त्याने सांगितले. नंतर दिवसभर व्हिन्सेंट विचारातच होता. दुपारी बराच वेळ लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला सिंथियाने पाहिले. तिने परत काही प्रश्न न विचारायचे ठरवले होते. संध्याकाळी एडीथ आणि केविनला जाणवले डॅडीला टेन्शन आले आहे. लिझाच्या घरी त्या चौघांनी मजेत वेळ घालवला. दोन्ही मैत्रिणी एकदम खुश होत्या. घरी परत येताना डॅडीचे वागणे नेहमीसारखं नाही हे दोन्ही मुलांना परत एकदा जाणवले. घरी यायला उशिरच झाला होता. चौघे भरभर आटपून झोपी गेले आणि नव्या आठवड्यासाठी सज्ज झाले. सोमवारी सकाळी नवा आठवडा सुरू झाला. एडिथ आणि केविन शाळेत गेले. आपापल्या वेळी व्हिन्सेंट ऑफिस आणि सिंथिया बँकेत गेले. लंचच्या आधी व्हिन्सेंटचा फोन आलेला बघून सिंथियाला वाटले व्हिन्सेंटच्या पप्पांची तब्येत वगैरे बिघडली असेल चेकअपला न्यायचे असेल..पण तिचा नवरा अगदी रडवेला झाला होता.
       थोडसं अस्पष्ट काहीतरी बोलला तिला काय प्रकार झाला असेल ते समजेना. " They have trapped me. I'm innocent. " हेच तो परत परत बोलत होता. नीटसा उलगडा झाला नाही पण त्याचा तो घाबरलेलाआवाज ऐकून सिंथिया चिंतेत पडली. तिने तिच्या मैत्रिणीला झाला प्रकार सांगितला. व्हिन्सेंटच्या ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा समजले की पोलिस त्याला चौकशी करता पोलिस स्टेशनवर घेऊन गेले आहेत. सिंथियाच्या पायाखालची जमिनच सरकली. तिने धावतच पोलिस स्टेशन गाठले. तिथले एकूण वातावरण बघून तिच्यातले होते नव्हते ते त्राणच गळून पडले. तिच्या घशाला कोरड पडली. तिचे ते घाबरणे वागणे बघून भोवतीच्या नजरांनी ' ही नविनच दिसते इकडे ' चा कयास बांधला. तिथल्या एका लेडी काँन्स्टेंबलचे तिच्याकडे लक्ष गेले. तिने सिंथियाची विचारपूस केली. एकूण मामला लक्षात आल्यावर तिने सिंथियाला घरी जायला सांगितले. " रूटिन चौकशी करता बोलावलंय. डिपार्टमेंटच्या प्रोसिजर असतात मॅडम. तुमच्या हजबंडने काही केले नसेल तर सुटतील की ते. इथे काय पार्टी आहे का सर्वांना बोलावून घ्यायला?" अगदी बेफिकीरीने काँन्स्टेंबल बोलत होती. पर्समधल्या रूमालाने डोळे पुसत सिंथीया पोलिस चौकीबाहेर आली. तिच्याकडे बघून सहज अंदाज येत होता काहीतरी विचित्र घडलय. बस करता थांबण्यापेक्षा तिने सरळ टॅक्सीला हात केला. ती टॅक्सीत बसली. घरी येता येता तिने तिच्या मम्मीला डॅडीबरोबर घरी यायला सांगितले. ती घरी पोचली तेव्हा ते दोघे आधीच आले होते. व्हिन्सेंटचे पप्पा आजारी असतात उगाच मम्मीच्या डोक्याला नवा ताण नको म्हणून तिने नंबर डायल न करताच फोन पर्समध्ये ठेवून दिला. सिंथियाने रडतरडत झालेला सगळा प्रकार तिच्या मम्मी डॅडींच्या कानावर घातला. सिथिंयाचे मम्मीडॅडी- जेनिफर आणि विल्सन सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले दांपत्य होते. त्यांनी दुनिया पाहिली होती. सिंथियाला वाटले त्यापेक्षा ते दोघे अगदी शांत स्थिर वाटले. व्हिन्सेंटचे कालपासून बदलले वागणे लक्षात आल्याचे एडिथ आणि केविनने पण सांगितले. व्हिन्सेंट लालची नाही हे सर्वांना माहिती होते पण तेच आता पटवून द्यावे लागणार होते. सिंथियाचा मोठा भाऊ डेव्हीड पण तिकडेच आला. डॅडीना त्यांच्या एका मित्राकडून ॲडव्होकेट ताहिल्यानीचा नंबर मिळाला. डॅडींनी ताहिल्यानीला फोन केला. काप-या आवाजात आणि नेमक्या शब्दात त्यांनी घडलेला सर्व प्रसंग त्यांच्या कानावर घातला. ताहिल्यानीने दिलेला सल्ला ऐकून सिंथिया आणि डॅडींना हायसे वाटले. तरी आज काही करता येणारच नव्हते. उद्या सकाळची वाट पहावी लागणार होती. 
     मम्मीने डिनरची तयारी केली.  एडिथ होतीच तिच्या ग्रॅनीच्या मदतीला. केविन मात्र खूप घाबरून गेला होता. तिने मुलांना खायला लावले. होमवर्क करायला पाठवले. कोणाचेच मन लागत नव्हते. डेव्हिड पण आजचा दिवस तिकडेच रहातोय हे समजल्यावर सर्वांना बरे वाटले. सिंथिया आणि जेनीने प्रेअर म्हटली. व्हिन्सेंट परत येऊ दे त्याला त्रास नको असे हात जोडून विनवताना सिंथिया सतत रडत होती. सन्मार्गाने चालणाऱ्याला हा असा ठपका देखील खूप मोठा बट्टा वाटतो. मुले पण खूप केविलवाणी झाली होती. " Edie, you  know something? The police are very cruel they beat innocent and make them accept the charges and then put them behind bars ." केविन असे म्हणाल्यावर एडिथ खूप घाबरली. तिने मूव्हीज् मध्ये हे पाहिले होते. तिला खूप रडू येऊ लागले. तिने डोक्यावरून पांघरूण घेतले आणि आपले अश्रू लपवायचा प्रयत्न केला. रात्री खूप उशिरा दोनच्या सुमारास बेल वाजली. सगळे जागेच होते. डेव्हिडने दार उघडले समोर व्हिन्सेंट होता. विस्कटलेले केस, शर्टची बिघडलेली इस्त्री बरच काही सांगून गेली. घरी आल्यावर त्याला फार बरे वाटले. बायको, मुलांचे चेहरे बघून तो पण हळवा झाला. मम्मीने थोडं पाणी प्यायला लावले. तो मान खाली घालून सोफ्यावर शांत बसून होता. अचानक उठला आणि सरळ आंघोळ करायला बाथरूममध्ये घुसला. त्याने शाॅवर सुरू केला अंगावर गरम पाणी पडताच झालेल्या सगळ्या गोष्टी एकानंतर एक आठवत गेल्या. नविन नोकरी , नविन जग आठेक महिन्यापूर्वी तो ज्या आनंदात होता त्याच्या अगदी विरुद्ध आज घडले होते. 
     ऑफिसमध्ये बराच मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. बरीच मोठी रक्कम हळूहळू करत ऑफिसबाहेर नेली होती. खोटी चलान्स, खोटी बिले, चुकीच्या खात्यात रक्कम भरली जात होती. अगदी दिवसा ढवळ्या फसवणूक झाली होती. अगदी सुरुवातीला एकाने लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता पण त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नव्हते. हे सर्व व्हिन्सेंट या कंपनीत कामाला लागण्या आधीपासून घडत होते पण तरीही व्हिन्सेंटचे नाव मुद्दाम यात गोवले गेले. अधिका-यांना आधीच थोडी कुणकुण लागली होती. शनिवार रविवारी ऑफिसमधल्या काही सिनीयर लोकांनी या प्रकाराचा छडा लावायचा ठरवले होते. म्हणून शनिवारी मेलवर आणि रविवारी फोनवर व्हिन्सेंटला प्रश्न विचारले गेले. त्यावेळी त्याला कल्पना दिली नव्हती. त्याच डिपार्टमेंटला असल्याने व्हिन्सेंटला चौकशीकरता पोलिस स्टेशनवर जावे लागले. पण तिकडे, चौकशी करताना एका काँन्स्टेंबलने त्याची काॅलर धरली तेव्हा त्याला खूप राग आला, खूप अपमान वाटला. अब्रूदार माणूस नेहमीच बेइज्जतीला घाबरतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नुसतेच बसून होते. डेव्हिड घरी गेला. मम्मी डॅडी मात्र तिथेच राहिले होते. व्हिन्सेंट निर्दोष होता याची त्याला खात्री होती पण कालपासून त्याला असे जाणवले की नुसते आपल्याला माहिती असून चालणार नाही. हे कागदावर लिहून आले पाहिजे , सिद्ध झाले पाहिजे. त्याने समोरच्या येशूच्या फोटो फ्रेमकडे पाहिले. येशूच्या डोळ्यातली करूणा त्याला आधार देऊन गेली त्याने समोर उभे राहून प्रार्थना केली. मागे उभ्या असलेल्या  सिंथियाने " आमेन!" म्हणताच त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिले. 
" Don't worry, Vinn ! God is Great, He will take us out of this difficult time." तिने नवऱ्याला आश्वास्त केले. तिने आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. त्याने तितक्याच स्नेहभराने तिला पाठीवर थोपटले. या दोन क्षणांमुळे व्हिंसेंटला आपले सर्व कुटंब आपल्या बरोबर आहे याची खात्री पटली. व्हिंसेंटला पोलिस स्टेशनवर जावे लागले ही बातमी पसरायला फारसा वेळ लागला नाही. आपले वाटणारे किती परके किंवा अलिप्त होते हे चौघांना समजू लागले होते. 
"कुछ तो किया रहेंगा, इसके वास्तेच पुलिस ले गयी होगी.." 
" इतना बडा गफला किया तो दे दिया होगा पोलिस को २% और आया निकल के बाहर.." 
"कितना शरीफ लगता था.." 
अशी वाक्य ऐकू येतील अशा बेताने मोठ्याने बोलली जात होती. एडिथ आणि केविनने बाहेर जायचेच बंद केले होते. त्यांच्याकरता ही परिस्थिती अक्षरशः परिक्षा बघणारी होती. घरात ताण , ताणातून आलेली शांतता होती. एडिथचे ना कुठे जायचे प्लॅन होते ना केविन मोठमोठ्या आवाजात गाणी म्हणत होता. ना हट्ट होते ना भांडणे..घरातले वातावरण पार बिघडून गेले होते. सिंथियाचे मम्मी डॅडी घरी परत गेले होते.  सिंथिया घर, नवरा, मुले, तिची बँक अशा सगळ्या आघाड्यांवर लढत होती. पहिले काही दिवस व्हिन्सेंट ऑफिसला गेला नव्हता. त्याला सारखे वाटत होते राजीनामा पाठवून द्यावा परस्पर. सिंथियाने त्याला बजावले होते, " नोकरी सोड पण तू निर्दोष आहेस हे सिद्ध झाल्यावरच. एकदम उजळ माथ्याने. हा माझा माझ्या नवऱ्यावरच्या विश्वासाचा प्रश्न आहे." आपली बायको इतके बळ कुठून आणते असा प्रश्न त्याला सतत पडत होता..आठवडाभराने त्याला ऑफिसला परत पुन्हा यायची मेल आली. घरातले वातावरण जरा निवळले. हे तीन आठवडे डी'मेलो कुटूंबाकरता खूप अवघड होते. नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आर्थिक घोटाळ्यामागचे सर्व लोक पकडले गेले. त्यांनी व्हिन्सेंटचे नाव मुद्दाम गोवल्याची कबूली दिली. सिंथीयाच्या डोक्यावरचे मणामणाचे ओझे उतरले. त्यादिवशी चर्चमध्ये जाऊन डोकं टेकवत भरपूर रडून घेतले. एडिथ आणि केविन पण खूप खूश झाले. त्यांना देखील खूप ताण आले होते.  " पोलिस डॅडीला घेऊन जाणार.. त्रास देणार.." असा भयगंड त्याला त्रास देत होता. व्हिन्सेंटने आता कुटूंबाची विस्कळीत झालेली घडी परत बसवायचे ठरवले. संध्याकाळी ते त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेले. चौघांकरता अतिशय गरजेचा बदल होता.  ते घरी आले तेव्हा परेरा कुटूंब खाली पार्किंगमध्ये भेटले नंतर लिफ्टमध्ये आदिल भेटला. दोन्ही वेळा सिंथियाला जाणवले की लोकांना खूप कुतूहल आहे नक्की काय घडले हे जाणून घ्यायचे किंवा थोडा संशयही ! नेहमी आपल्याभोवती रहाणारी लोकं आपल्याला ओळखू शकली नाही याचे तिला खूप वाईट वाटले. मुलांना देखील असाच अनुभव येत होता. 
"डॅडी, आपण इथून निघून जाऊ..दुसरीकडे अजून मोठ्या घरात."  केविन उसळून म्हणाला. 
व्हिन्सेंट शांत राहिला. शनिवारी रात्री त्याने एडिथ, केविन आणि सिंथियाला एकत्र असताना विषय काढला. तिघं तो काय सांगतोय ते ऐकत होती. 
"एडि, केविन आपण इथून जाऊ शकतो. नविन घर घेऊ शकतो पण असे करणे म्हणजे पळून जाणे होईल. परत कधी ना कधी कोणाला तरी समजले की काय परत तिथून जाणार का आपण? आणि जर माझी चूक नव्हती तरी आपण इथून गेलो तर उलट लोकांना अधिक संशय येईल. खरंतर आपण कोणाला उत्तर द्यायची गरजच नाही. कोणी विचारले तर माझ्याशी बोलायला सांगा. मी बोलीन. तुम्ही जितके लवकर नेहमीसारखं वागायला लागाल तितके लवकर लोकं विसरतील." 
" No Daddy, they won't let us forget.." एडिथ म्हणाली. 
" Eddie, Let them remember their part and better you conquer this guilt." 
मुले आणि सिंथिया ऐकत होती त्यांना व्हिन्सेंट जे सांगतोय ते पटले होते. एक मोठा धडा त्यांना मिळाला होता. रविवारच्या मास प्रेअर करता दोघांनी आपणहून मम्मी डॅडी बरोबर जायचे ठरवले होते. सगळे शिक्के पुसून टाकणे गरजेचं होते.  आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्यावर लादलेल्या शिक्क्यांचे ओझे घ्यायचे नसते. ते त्यांच्या सोयीने मत बनवतात, मते पसरवतात ती त्यांची ' नियत ' असते. काहींना सूक्ष्म असूया, द्वेष असतो. आपण त्याला फशी पडलो तर त्यांचे फावते. त्यामुळे असे शिक्के हसत पुसून टाकत पुढे जाणे हेच योग्य असते. आयुष्यातला सर्वात अवघड धडा मुले शिकली होती..


 #अनघा_किल्लेदार  ✍️
 पुणे.  २२/०६/२०२१

1238. ती, आरसा आणि मी

     नापास शाळेच्या ऍडमिशन सुरू झाल्या. पालक विद्यार्थी हितचिंतक अशा नापास मुलांना घेऊन माझ्याकडे येत असत. कुणाकडे पैसे नाहीत कोणी खूप गरीब आहे दहावी मध्ये नववी मध्ये नापास होऊन शिक्षण थांबले आहे असे खूप विद्यार्थी येतात. सकाळी नऊ वाजता माझे काम सुरू  झाले आणि एक रिक्षावाले गृहस्थ आले. त्यांनी आपली ओळख करून दिली आणि म्हणाले "माझी मुलगी येथील एका कन्या शाळेत होती पण शाळेने तिला काढून टाकले आहे. इयत्ता नववी मध्ये शिकत होती. तेव्हापासून ती घरीच आहे."
मी त्यांना मध्येच थांबून विचारलं, "अहो पण शाळेतनं काढायचं कारण काय?"
त्यावर ते दोन मिनिट गप्प राहिले आणि मग त्यानी मला सांगायला सुरुवात केली. म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी माझी मुलगी तळत्या तेलात पडून गंभीर जखमी झाली. तिचा चेहऱ्याचा भाग, मानेचा भाग, हात, म्हणजे जवळपास अर्ध शरीर भाजून निघाले तिचे. सात आठ महिने दवाखान्यातच गेले. ती जगेल असे मुळीच वाटत नव्हते पण माहित नाही आमच्या सुदैवाने की तिच्या दुर्दैवाने ती जगली. त्यानंतर तिचा चेहरा, कातडी विद्रूप झाल्यामुळे तिच्या बाई म्हणतात की त्यांच्या शाळेतील मुली तिला घाबरतात आणि अशी विद्रूप मुलगी आम्हाला वर्गात नको".हे सांगताना त्यांना अक्षरशः रडायला येत होते. त्यांनी हुंदका दिला. मी उठून त्यांना पाण्याचा ग्लास पुढे केला. पाठीवरती थोपटलं आणि म्हणलं, "काळजी नका करू, आपण करू काहीतरी. ..तुम्ही मुलीला घेऊन या ! "
ते म्हणाले, "बाई ती खूप निराश झाली आहे. आता दीड दोन वर्ष झाले ती घरीच आहे. कोणाशी फार बोलत नाही, मिसळायचा तर प्रश्नच नाही. तिला कोणी मिसळूनच घेत नाही. घरातली खोली आणि ती ! बरं, लहानगा जीव, काय समजते हो 14/ 15 वर्षाच्या मुलीला. आमच्या डोळ्यासमोर तिचं सगळं भविष्य उभं रहातं."
मलाही थोडं आश्चर्यच वाटलं "भाजली आहे ना, एवढं काय काळजी करण्यासारखं, होईल बरं. हल्ली प्लास्टिक सर्जरी वगैरे करतात." 
ते म्हणाले, "हो, पण त्याला ठराविक कालावधी जावा लागेल. मुलगी बऱ्यापैकी हुशार आहे. घरी बसून खूप कंटाळली आहे. तुम्ही तुमच्या शाळेत प्रवेश दिला तर फार उपकार होतील."
मी म्हणाले, "उपकाराची भाषा करू नका.  शिक्षण घेणं हा तिचा हक्क आहे. आपण तिला शिकवूयात."
माझ्या शब्दाने त्यांना खूप धीर मिळाला. मी म्हणाले, "मुलीला घेऊन या. मी तिच्याशी बोलते आधी, आणि मग आपण ठरवू."
     ते थोडे सुखावले होते. त्यांना कुठेतरी खात्री वाटत होती की इथे माझ्या मुलीला प्रवेश मिळेल. ते तातडीने घरी गेले आणि एका तासाभराने आपल्या मुलीला आणि बायकोला घेऊन माझ्या ऑफिस मध्ये आले. तोपर्यंत काही ॲडमिशनचे इंटरव्यू चालले होते. मी मुलांशी, पालकांशी बोलत होते, त्यांचे समुपदेशन करत होते. त्यानंतर समोरचे पालक बाहेर पडले. मी खाली वाकून काही फॉर्म वरती टिपणं करत होते आणि हे  रिक्षावाले गृहस्थ पुन्हा ऑफिसमध्ये प्रवेश करते झाले. सोबत त्यांची पत्नी ही होती. त्यानी सांगितले, "बाई, मुलीला घेऊन आलो आहे. आपण तिच्याशी बोला." 
     सुरुवातीला तीची आई माझ्याशी बोलली. त्या म्हणाल्या, "दिवाळीचं तळण तळत होते हो, आणि ही पोरगी धावत आली आणि त्या मोठ्या कढईत पडली." ते सगळं ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता. त्या वेदना, ते हॉस्पिटल, सगळं त्या वर्णन करून सांगत होत्या. मी म्हणलं, "एवढ्या लहान लेकराने हे कसं सोसलं असेल ना ?" 
इतक्यात ती मुलगी आत आली. सुरेखा तिचं नाव होतं आणि मीही इतर मुलांना जसा दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावाने हाक मारते ये ये. तसं मी हिला हाक मारली "ये ये सुरेखा."
 सुरेखा आत आली. तिला पाहिलं आणि मी खुर्चीवरून नकळत उठले. समोर तिच रूप पाहून मला काय वाटलं मी सांगू शकत नाही. भीती, किळस, भयानक चेहरा होता. डोळे बाहेर आलेले, गालाची हाडं वर आलेली, त्याच्यावर जळलेलं मास थोडसं लोंबणारे. जागोजागी असंख्य जळकट सुरकुत्या, मानेभोवती अशाच सुरकुत्यांचे जळकट जाळे, केस तुटके तुटके भुरे, डोक्यावर थोड्याशा जखमा भाजलेल्या. ओठ भाजल्याने किंचित पुढं आलेले, कानाच्या पाळ्यांची तीच अवस्था. मी तिच्या हाताशी पाहिलं, हातावरचं मांस दिसावं तसा तांबूस रंग होता. दोन्ही हाताची बोटं आतून मुडपलेली होती आणि अगदी बारीक बारीक बोटं म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या पक्षाच्या पिलाचा जसा रंग असतो ना आणि शरीर असतं तसं ते सगळं होतं.
      मी एक क्षणभर म्हटलं हे रोज बघू शकतो का आपण?  मुळात तिच शरीर अतिशय कृष होतं. म्हणजे हाड आणि लोंबणारी कातडी बाहेर आलेले डोळे तुटके केस हे थोडक्यात वर्णन आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारला 'शीला पत्की, सामाजिक सेवा करायला निघाला आहात, हे सोसणार आहे का तुम्हाला? दररोज नुसतं बघणं तरी काय भयानक होतं ते, छे छे, हे होणे नाही!'  पण माझ्या दुसऱ्या मनाने मला सांगितलं. 'मग तू समाजसेवेचा खोटा आव आणतेस का? इतकं साधं तुला सोसता येत नाही. फक्त बघायचे तर तुला एवढी किळस आली. ती कशी ते सगळं रूप घेऊन समाजात मिरवेल ना? काय सांगणार आहेस तिला तू ' आणि मग कुठून अवसान आलं माहित नाही, आतून एक आवाज आला. 'नाही नाही, हीच माझी परीक्षा आहे' आणि मी मलाच आजमावण्यासाठी असेल बहुदा.. तिला म्हणलं "हाय सुरेखा." आणि तिचा तो मांसल वेडा वाकडा हात मी हातात घेतला. तो स्पर्श अगदी थंड होता. कुणीतरी पहिल्यांदा तिचा हात प्रेमाने हातात घेत होतं. कुणीतरी तिला स्पर्श केला होता आणि तिच्या त्या चेहऱ्यावर ओठामधून एक छानसं हसू फुटलं. म्हणजे डब्यात ठेवलेल्या जाईच्या कळ्या उमललेल्या असाव्यात आणि एखादी तळातली कळी न उमललेली. वरची फुलं काढल्यावर अलगद आणि पटकन उमलते ना तशी तशी ती हसली..! मला वाटतं खूप दिवसांनी ती हसली असावी.    
       मी माझी स्वतःची परीक्षा घेणं किंवा स्वतःला आजमावणं याच्यासाठी तो हात तिच्या हातात तसाच ठेवला आणि दोन मिनिटांनी त्या स्पर्शात काय संवेदना होती माहित नाही, मी तिच्या दुःखाशी तद्दूप झाले. क्षणभरात दिसणारे विद्रूप रूप माझ्यासमोरून नाहीस झालं आणि माझ्यासमोर दिसत होती एक छोटी मुलगी, तिला पुन्हा एकदा आपलं आयुष्य फुलवायचं आहे, माझ्या थोड्या मदतीची याचना ती करत होती. बस्, मी ठरवलं आणि तिला प्रवेश दिला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. बहुदा मी स्वतःला तिला सहन करू शकते का हे आजमावत होते. तिला प्रवेश दिल्या मुळे तिचे आई-वडील दोघेही रडायला लागले‌. "बाई फार उपकार झाले. आज तुम्ही माझ्या मुलीला जवळ घेतलेत."
       मी त्यांच्याही पाठीवरून हात फिरवला. त्यांना धीर दिला. शाळेचे नियम समजावून सांगितले आणि सुरेखाचा प्रवेश झाला ..!  पण इथे मुद्दा संपला नव्हताच. आमच्या मुख्याध्यापकांना मी तिचा विषय समजून सांगितला. त्या दोघी खूप चांगल्या होत्या. मी त्यांना सांगितले, "आपल्याला त्या मुलीला समजून घ्यायचे आहे." तिथे मुख्याध्यापक म्हणून काम करणारी माझी मैत्रीणच होती आणि त्या माझ्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका होत्या, वयाने मोठ्या होत्या. आई होत्या. त्यानी त्या गोष्टी समजून घेतल्या ! शाळा सुरू झाली. मुलींचा वर्ग, मुलांचा वर्ग सुरुवातीला एकत्रच असे. मग ऍडमिशन सगळ्या झाल्या की मुला मुलींचे वर्ग वेगळे करत असू.  मी तेव्हा सेवासदन मध्ये नोकरी करत होते. मी एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी शाळेमध्ये उपस्थित राहत असे. बाकी सगळे व्यवस्थापन माझा स्टाफ पाहत होता. शाळा माझी अगदी माझ्या संस्थेला लागूनच होती त्यामुळे मुख्याध्यापकांच्या परवानगीने मधल्या सुट्टीतही मी एक चक्कर टाकून जात असे. त्याप्रमाणे मी मधल्या सुट्टीत गेले. मुख्याध्यापिका म्हणाल्या, "बाई बरं झालं तुम्ही आलात. एक प्रॉब्लेम आहे."
मी म्हणाले, "काय झालं ..?"
त्या म्हणाल्या, "ह्या मुलीबरोबर कोणी डबा खायला तयार नाही, हिला कोणी एक एकत्र बसून घेत नाहीत. आम्ही खूप समजून सांगितलं दोन-तीन दिवस, पण मुली ऐकायलाच तयार नाहीत. तुम्ही काही करता का पहा."
      मी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळेला मुलींना सांगितले की, "..मुलींनो समाजातले एक दुर्दैवी मुल आपण स्वीकारू शकत नसू तर तुम्ही पुढे जाऊन काय करणार. एखाद्याला मानसिक आधार देणे, मदत करणे हे आपण करायला नको का...? बरं, तिला कुठला रोग नाहीये. तो अपघात झाला होता आणि त्यामध्ये तिच्या शरीरावर हे वैगुण्य आले आहे. हे तुमच्या बाबतीत घडले असते आणि न करो पण पुढे  तुमच्या एखाद्या मुलाच्या बाबतीत घडले, नातेवाईकाच्या बाबतीत घडले तर तुम्ही अशा वागणार आहात का? तुमच्या सहकार्यामुळे तिला मानसिक उभारी मिळणार आहे मुलींनो.. आणि मी तुमच्या विश्वासावरच तिला शाळेत प्रवेश दिला आहे. मला खात्री आहे की तुम्ही माझ्या सगळ्या मुली.. एका मुलीला समाजामध्ये शिक्षण घेण्याच्या कामी नक्कीच मदतीला उभे रहाल. पण तुम्ही तर मला निराशच केलं. मला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. अगं दहावी काय, तुम्ही पास व्हाल, पण आयुष्यामध्ये ज्या अनेक परीक्षा द्यायच्यात ना, त्याच्यामध्ये सामोरे जाताना द्याव्या लागणाऱ्या अनेक परीक्षांची तयारी आहे, त्यात तुम्ही नापास होणार आहात का? मुळीच नाही. तुम्ही पतकी बाईंच्या विद्यार्थिनी आहात हे लक्षात ठेवा. संकट आणि दुःखाशी सामना करणाऱ्या प्रत्येक माणसा बरोबर उभे रहाण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे...." आणि मी बरंच बोलत राहिले.
       मुली खाली मान घालून बसल्या होत्या. "तुम्हाला डबा खायचा नसेल तर उद्या मधल्या सुट्टीत मी इथे येईन  तिच्याबरोबर डबा खायला.. कारण तिला मी शाळेत घेतले आहे, ती माझी जबाबदारी आहे, तुमची नाही. आणि मी तुम्हाला याबाबत सक्ती करू शकत नाही."
      दुसऱ्या दिवशी मी माझा डबा घेऊन संस्थेत गेले. मी, मुख्याध्यापक आणि ती मुलगी असा मी डबा माझ्या खोलीत खाल्ला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी परत मधल्या सुट्टीत गेले त्यावेळी मात्र मला दृश्य वेगळे दिसले. माझ्या सगळ्या मुलींनी त्या मुलीला आपल्याबरोबर डब्यामध्ये बसवले होते आणि त्या आनंदाने गप्पा मारत डबा खात होत्या. ते दृश्य पाहून माझे डोळे वाहिले. त्यांच्या डब्याच्या मध्ये जाऊन मी म्हणलं. "तुम्ही माझ्या मुली आहात हे सिद्ध केलेत गं. खूप छान वाटलं. दहावी होण्यापेक्षा ह्या अशा गोष्टी शिकणं खूप गरजेचे आहे. खूप मोठ्या व्हाल. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला."
   मुलीनाही खूप आनंद झाला. आपण चुकलो याची जाणीव झाली आणि वर्गात पुन्हा प्रश्न निर्माण झाला नाही. शाळा सुरळीत चालू झाली काहीच प्रॉब्लेम नव्हता. सुरेखाच्या डोळ्यात मला हळूहळू आत्मविश्वास दिसायला लागला. अभ्यासाला ती बरीच होती पण फार कृश होती. मी तिच्या पालकांना 'डॉक्टरांना दाखवून एखादं टॉनिक घ्या' असा सल्ला दिला. त्यानंतर नागपंचमीचा सण आला. म्हणजे साधारण ऑगस्ट महिना. शाळा सुरू होऊन दीड एक महिना झालेला. माझी मुलींची शाळा असल्यामुळे सेवासदनला सुट्टी होती. शाळेला सुट्टी असली की पूर्ण वेळ मी नापास मुलांच्या शाळेत थांबत असे. आमच्या नापास शाळेला सुट्ट्या अगदी कमी. म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि रविवार याखेरीस सुट्ट्या नाहीत. कारण मला नऊ महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करायचा असे. त्यामुळे या दिवशी शाळा चालू होती. अर्धी शाळा झाल्यानंतर मुलांना सोडून देण्यात आले आणि त्यानंतर चार वाजता मुलींसाठी फेर धरण्याचा कार्यक्रम होता. मुलींना असे कार्यक्रम फार आवडायचे‌. त्यानंतर आम्ही त्यांना खाऊही देत असू.  माझ्या त्या शाळेची रचना अशी होती की एक मोठा हॉल होता, त्याच्या बाजूला एक छोटी खोली, नंतर अगदी एंट्रन्स लाईक छोटा व्हरांडा आणि त्याच्या बाजूला माझं ऑफिस. त्यावेळी संस्था लहान जागेत कार्य करत होती. ती जागा भाड्याची होती. त्याच्या व्हरांड्यामध्ये माझ्या बंधूनी भिंतीला एक मोठा आरसा बसवून दिलेला होता. कारण सकाळी तिथे लहान मुलांची शाळा म्हणजे नर्सरी होती. ती मुले आले की आरशात बघून मग प्रवेश करीत असत. 
       त्या दिवशी मधल्या सुट्टीनंतर डबा खायला एक वेळ दिलेला होता. तेव्हा या सगळ्या मुली एकमेकींच्या हातावर मेंदी काढत होत्या. आज त्यांना काहीही करायला मुभा होती. गटागटांनी मेहंदी काढण्याचे काम चालू होते. मी सहज आत डोकावले तर सुरेखा च्या हातावर दोन मुली मेंदी काढत होत्या. मला खूप आनंद झाला. तिची ती दुमडलेली बोटं, तो भाजलेला हात पण त्याच्यावर मुली आनंदाने मेंदी काढत होत्या. मला कुठेतरी मनात समाधान वाटले‌. मुलींचे आतमध्ये ड्रेसिंग चालले होते, लिपस्टिक लावत होत्या. वेण्यांमध्ये  गजरे घालत होत्या. कुणी फेराच्या गाण्याची प्रॅक्टिस करत होत्या. त्यांच्या शाळेत त्यांना संधी मिळाली नव्हती. आज इथे त्यांना ते मुक्तपणे अनुभवता येणार होते.
      माझ्या ऑफिसमध्ये बसून मी समोर व्हरांड्याकडे पाहत असताना मला आरशासमोर सुरेखा दिसली. ती ही नटून आली होती. छान गुलाबी पंजाबी ड्रेस घातला होता. हाताला नुकतीच मुलींनी मेंदी लावलेली होती, आणि तिने गळ्यामध्ये एक हार घातला होता ज्याच्यावर आर्टिफिशियल खड्यांचे डिझाईन होते. तो हार ती व्यवस्थित करून आपल्या स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि आनंदीत होत होती. ती हार पुन्हा पुन्हा व्यवस्थित करत होती. मी आश्चर्यचकित झाले. मुळात सुरेखाने आरशात आपल्याला पहावं हे धाडस होते आणि ती पुन्हा पुन्हा आपला तो गळ्यातला हार सारखा करून आपल्या छबीकडे पाहत होती. अर्थात आरशात बघायचे तिचे वयच होते, परंतु पूर्वी दुर्दैव हे की आरशातले रूप तिला आनंद देत नव्हते पण आता मात्र तसे नव्हते. त्या सुरकुतलेल्या भाजक्या जळक्या मानेवर रुळणाऱ्या त्या हाराला ती व्यवस्थित करत होती आणि पुन्हा पुन्हा तो नीट बसलाय ना हे निरखत होती. कदाचित तिला आपल्या चेहऱ्यात एक नवीन सौंदर्य दिसत असावे. 
      मी ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होते. मी मनात म्हणत होते हिला त्यात जळक्या कातडीवर दिसणाऱ्या त्या हारातले कोणते सौंदर्य जाणवत होते ठाऊक नाही, पण तिला जगण्यातली सुंदरता मात्र जाणवली होती. तिचं ते आरशात पाहणं मला मोहून टाकणारे होते. सुरेखला समवयस्क मुलींनी स्वीकारणे. तिच्या कुरूपतेचा मनापासून सर्वांनी स्वीकार करणे. तिला थोडे प्रेम देणे आणि पुन्हा वर्गात बसून शिकायची संधी मिळणे. या सर्व कृतींमुळे सुरेखाच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आला होता त्या आत्मविश्वासाचे विलोभनीय सौंदर्य मी पाहत होते. आज सुरेखाच काय, मला सगळे जग सुंदर दिसत होते. त्या आरशासमोरची मुलगी मला सर्वात सुंदर दिसत होती. कारण तिला जगणे सापडले होते. खूप आनंदाचा क्षण होता. कदाचित त्या आरशानंही तिला सांगितलं असेल "सुरेखा, आज तू खूप सुंदर दिसतेस" 
      नंतर सुरेखा अगदी सहज रुळली, उत्तम गुणांनी पास झाली. त्यानंतर तिच्या त्वचारोपणाच्या ऑपरेशनसाठी एक सामाजिक संस्था पुढे आली. त्यांनी मदत केली. पुढे सुट्टीमध्ये तिची तीन-चार ऑपरेशन झाली आणि सुरेखाचे हात छान काम करायला लागले. बोटं सरळ झाली. चेहऱ्यावरचे आणि मानेवरच्या, गळ्यावरच्या सुरकुत्या कमी झाल्या ! 'सुंदर मी होणार' चे सेशन दोन-चार महिन्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले. एका स्थानिक आमदाराने या कामी खूप मदत केली. सुरेखा पास झाली आणि त्यानंतर तिने जवळच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती बीए झाली. बालवाडीचा कोर्स केला. एका अंगणवाडी मध्ये ती आता शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
      आता माझे आरशात पाहण्याचे वय नाही, तरीही मी जेव्हा जेव्हा आरशात पाहते तेव्हा तेव्हा माझ्या आधी मला तिची प्रतिमा दिसते. कारण मला नेहमी जाणवत राहतं की आरशावर सुरेखाचा पहिला हक्क आहे. त्यानेच तिला सांगितलं, 'तू खूप सुंदर दिसतेस', आणि तिथूनच तिचा आत्मविश्वास वाढला. मुळतः आरशात बघण्याचे धाडस तिच्यात निर्माण झाले आणि आमची सुरेखा सुंदर झाली, अगदी अंतर्बाह्य..!

©️®️शीला पतकी, सोलापूर. 8805850279
(आवडल्यास शेअर करताना सत्यकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती. )

सोमवार, २४ जून, २०२४

1237. राग

 "साहेब चला, पाटील साहेब बोलावताहेत."
महत्वाच्या कामात गुंतलेल्या अजितला शिपाई म्हणाला तसं अजितने मान वर करुन त्याच्याकडे रागीट नजरेने पाहिलं
"आता काय काम निघालं साहेबांचं? मी कामात आहे जरा. येतो थोड्या वेळाने "
"अर्जंट आहे असं म्हंटले साहेब. घेऊनच ये म्हणे साहेबांना ताबडतोब."
"ठिक आहे. तू चल पुढे, मी येतोच आवरुन." मोठ्या नाराजीने अजित म्हणाला. शिपाई गेला तसा त्याने लॅपटाॅप बंद केला. खरं तर त्याचा कामाचा मुडच गेला होता. पाटीलसाहेबांनी बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट सुनावण्यासाठी बोलावलं असणार याचा त्याला अंदाज होता. कारण पाटीलसाहेब चुकूनही त्याच्याशी कधी चांगलं बोलल्याचं त्याला आठवत  नव्हतं. आपल्याकडून काय चुक झाली असावी याचा विचार करतच तो साहेबाच्या केबिनजवळ पोहचला." संतोष पाटील, प्राॅडक्शन मॅनेजर" या पाटीवर त्याची नजर गेली. "संतोष" या नावाचं त्याला हसू आलं." कसला संतोष? हा तर असंतोष फैलावणारा माणूस" त्याच्या मनात आलं. दारावर टकटक करुन तो आत गेला. नाकावर घसरलेल्या चष्म्याने पाटील साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं.
" सर तुम्ही मला बोलावलंत?"अजितने शक्य तितक्या नम्रतेने विचारलं.
"मि. शेवाळे कलकी डे शिफ्टमें प्राॅडक्शन कम क्यू हूँआ?"
मराठी असुनही साहेबाने पुन्हा त्याच्याशी हिंदीत बोलावं हे पाहून अजितचं डोकं सणकलं.
" सर मशीन खराब झाली होती ती रिपेअर करण्यात दोन तास गेले. तसा रिपोर्टही मी सबमिट केलाये."
" मशीन क्यूँ खराब हुई? आप लोग मशीनको मेंटेन नही रखते हो इसलिए ना?"
"सर मशीन जुनी झालीये. तिचे बरेच पार्टस गंजलेत. तिला रिप्लेस करणं आवश्यक आहे." अजित समजावत म्हणाला
"मेरेको सिखा रहे हो क्या? और मैने तुमको कितनी बार बोला है की हिंदीमें बात करो लेकीन तुम्हारी तो मनमानी चल रही है. "
साहेब उर्मटपणे बोलला तशी संतापाची एक तिडीक अजितच्या डोक्यातून गेली. तो जरा जोरातच बोलला
" साहेब तुम्ही मराठी मी मराठी. मग आपण हिंदीत बोलायचं कशाला?"
"इस कंपनीचा मालिक बिहारका है तो वो जिस भाषामें बात करता है उसी भाषामें हमे बात करना है."
"साहेब असा कुठे नियम आहे? आपले जी. एम. साहेब तर साऊथ इंडियन आहेत ते तर नेहमी इंग्रजीतून बोलतात. आपल्या एच.आर.ही साऊथ इंडियन आहेत त्यांच्याशी ते तामिळ भाषेत बोलतात. मग दोन मराठी माणसांनी आपसात हिंदीत कशाला बोलायचं ?"
"इसका ये मतलब हुआ की मै गलत हूॅ यार मेरेको तुमसे कोई बहस नही करनी. मैने जिस कामके लिये तुम्हे बुलाया है वो सुनो. झारखंड के रांचीमे अपना एक प्लांट एस्टॅब्लिश हो रहा है वहाॅ कुछ इंजीनियर्स की जरुरत है. मैने तुम्हारा नाम प्रपोज किया है. तय्यार रहो, एक हफ्तेंमे तुम्हारे ऑर्डर आ जायेंगे"
ते ऐकून अजित एकदम सुन्न झाला. त्याच्यावर जणू आकाशच कोसळलं.
"साहेब माझी आई खेड्यावर रहाते तिला कॅन्सरच्या ट्रिटमेंटसाठी वारंवार मुंबईला न्यावं लागतं. घरात चार महिन्यांचं बाळ आहे. कसं शक्य आहे मला इतक्या दुर जाणं? आणि आपल्याकडे दुसरे बिहारी इंजीनियर्स आहेतच की, त्यांना पाठवा ना तिकडे. ते एका पायावर तयार होतील."अजित गयावया करत म्हणाला
"मै कुछ नही सुनना चाहता.अपने यहाॅ इतने बिहारी काम करते है.इनकी भी तो कोई प्राॅब्लेम होगी ! क्या उनको माॅ-बाप, बिवीबच्चे नही है? ये तो कभी तुम्हारे जैसी कहानियाॅ सुनाते नही."
"साहेब ही कहाणी नाही."
"तुम मराठी लोगोमें यही तो  प्राॅब्लेम है. तुम लोगोंको सब चीजे घरके घर में चाहिये. देखो भाई तुमको जाना तो पडेगा. नही तो नोकरी छोडके घरपे बैठ जाना. तुम्हारे जैसे निकम्मोकी कंपनीको कोई जरुरत नहीं है. जाओ अपना काम करो ऑर्डर के लिए तय्यार रहना."
अपमानित झालेला अजित खचलेल्या मनाने तिथून बाहेर पडला. संताप, निराशा आणि रांचीला गेल्यावर आईवडिलांचे,बायकोचे होणारे हाल यांच्या चित्रांनी त्याच्या मनात वादळं निर्माण होत होती. ही कंपनी एका बिहारी मालकाची होती. स्थापन केल्यानंतर त्याने अगोदर स्थानिक मराठी कामगार आणि सुपरव्हायजर्सची भरती केली होती. अजित त्याचवेळी इथं एका बिहारी मित्रामुळेच जाॅईन झाला होता. काही दिवसांनी मराठी कामगार आणि सुपरव्हायझर्सची गळती सूरु झाली. मराठी कामगार काम करत नाहीत असं मालकाचं म्हणणं होतं. काम सोडून गुटखा, तंबाखू खाणं, गप्पा मारणं, टाईमपास करणं, सुपरव्हायझर्सला दमदाटी करणं असे प्रकार कामगारांकडून सुरु होते. सुपरव्हायझरही या गुंड कामगारांना घाबरुन असत. अजून काही दिवसांनी स्थानिक राजकीय नेते कंपनीत युनियन स्थापण्याच्या प्रयत्नात आहेत असं समजल्यावर मालकाने मराठी कामगारांना डच्चू द्यायला सुरुवात केली. अजितचं काम चांगलं होतं. खेड्यातल्या शेतमजुराच्या गरीब कुटुंबातून तो आला असल्यामुळे त्याला नोकरीची नितांत गरज होती. त्यामुळे तो आपलं काम इमानेइतबारे करत होता. शिवाय तो मेहनती आणि हुशारही होता. त्यामुळे कंपनीने त्याला धक्का लावला नाही. हळूहळू कंपनी बिहारी कामगार आणि सुपरव्हायझर्सनी भरुन गेली. अजित एकटाच मराठी इंजीनियर तिथे उरला. मागच्या वर्षी संतोष पाटील नावाचा प्राॅडक्शन मॅनेजर कंपनीत रुजू झाला तेव्हा अजितला आपला मराठी माणूस आल्याचा खुप आनंद झाला होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. संतोष पाटील इतर बिहारी सुपरव्हायझर्सशी प्रेमाने बोलायचा. त्यांना शाबासकी द्यायचा. पण अजितशी तुसडेपणाने वागायचा. त्याच्या कामात मुद्दामच चुका काढून कामगारांसमोरच पाणउतारा करायचा. अजित त्याच्याशी मराठीत बोलायला लागला की तो हटकून हिंदीत बोलायचा. मराठीत बोलण्यावरुन त्याने अजितला" मेरे मराठी होनेका गलत फायदा उठानेकी कोशीश मत करना." अशी अनेकदा ताकीदही दिली होती. बिहारी मालकाला इंप्रेस करण्यासाठी तो हे करतोय हे अजितला समजत होतं.तो मनातल्या मनात त्याला खुप शिव्या घालायचा. पण बाॅस असल्याने मर्यादेने वागणं भाग होतंच. शिफ्ट संपली. अजित कंपनीतून निघाला तो डोक्यात राग घेऊनच. एका मराठी माणसानेच दुसऱ्या मराठी माणसाचा जाणूनबुजून छळ करावा याचा त्याला राहूनराहून संताप येत होता. ऐका वळणावर तो डावीकडे वळणार तोच राँगसाईडने एक बाईकवाला येऊन त्याला धडकला. अजित वाचला पण त्याची बाईक खाली पडली.
"काय रे हरामखोर. ट्रॅफिक रुल माहित नाहिये तर गाडी चालवतोच कशाला?" अजित त्याच्यावर ओरडला. तसा तो बाईकवाला बाईकवरुन खाली उतरला.
" हरामखोर कुणाला म्हणतो रे ×××××"
दोघांची बाचाबाची सुरु झाली. शब्दाला शब्द वाढत गेला. दोघांभोवती गर्दी जमा होऊ लागली. लोक दोघांना समजावू लागले. पण दोघं पेटले होते. दोघांची हाणामारी सुरु होणार इतक्यात ट्रॅफिक पोलिस पळत आला. दोघांना समजावून बाजुला केलं. अजित जायला निघाला. पोलिसाने गर्दी पांगवली आणि राँग साईड घुसणाऱ्या पोराला बाजूला कोपऱ्यात  नेलं. त्या पोराने पाचशेची नोट काढून पोलिसाच्या हातात ठेवली आणि बाईकला किक मारुन तो निघून गेला. अजितने ती देवाणघेवाण पाहिली आणि तो अधिकच संतापला. पण स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत आपल्या बाईकचं तुटलेलं मडगार्ड पाहून त्याने बाईक उचलली आणि घराकडे निघाला.
तो घरात शिरला तेव्हा बेडरुममधून बाळाच्या रडण्याचा आवाज त्याला आला. बॅग ठेवून तो बेडरुममध्ये गेला तेव्हा अनू बाळाला कडेवर घेऊन त्याला थोपटत फिरत होती.
" काय झालं का रडतोय तो?"अजितने विचारलं. त्याच्या स्वरातला कठोरपणा पाहून ती चकीतच झाली पण शांत स्वरात त्याला म्हणाली
"अहो काही नाही त्याने सू केलीये म्हणून रडतोय. बदललेत मी त्याचे कपडे. जरा बेडवरची चादर बदलायची राहिलीये. जरा धरता का याला. थोडं फिरवा. तोपर्यंत मी चादर बदलून घेते"
अजितने त्याला कडेवर घेतलं आणि त्याला घेऊन बाहेरच्या हाॅलमध्ये आला. त्याच्या पाठीवर थोपटत त्याला शांत करायचा प्रयत्न करु लागला. पण आज बाळानेही त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घ्यायचं ठरवलं असावं. तो थांबायचं नाव घेत नव्हता. दिवसभर घडलेल्या घटनांनी तापलेल्या अजितच्या डोक्यात आता संताप शिरु लागला.
"ए बाबा, बस कर ना आता. किती रडशील? आधीच डोकं तापलंय माझं. बस कर "
तो बाळावर ओरडत म्हणाला पण बाळ शांत व्हायचं नाव घेत नव्हता. अजितने जरा जोरातच त्याच्या पाठीत चापट मारली.
"पटकन शांत हो म्हंटलं ना तुला. बस कर" अजित त्याच्यावर खेकसला. पण चापट मारण्याने आणि अजितच्या खेकसण्याने बाळ अजुनच जोरात रडायला लागला. अजितचा आता संयम संपला. बाळाला दोन्ही हाताने त्याने समोर धरलं आणि तो मोठ्याने ओरडला
"बंद कर तुझं रडणं"
एक क्षण बाळ शांत बसलं. दुसऱ्याच क्षणी त्याने दुप्पट आवाजात भोकाड पसरलं. अजितचा संताप अनावर झाला आणि त्याने बाळाला सोफ्यावर फेकून दिलं.अजितच ओरडणं पाहून बाहेर येत असलेल्या अनूने ते दृश्य पाहिलं आणि ती जोरात किंचाळली
"अहो काय करताय?" आणि ती सोफ्याकडे धावत गेली. इतक्या वरुन फेकल्यामुळे क्षणभर स्तब्ध  झालेलं बाळ आता किंचाळू लागलं.अनूने पटकन त्याला उचलून छातीशी धरलं.
"असं फेकतात होय बाळाला?"अजितकडे रागाने आणि दुःखाने पहात ती म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.
" लवकर शांत कर त्याला. त्याच्या रडण्याने डोकं फाटतंय माझं."अजित तिच्यावर ओरडला.
"अहो आजारी आहे तो. ताप आहे त्याला. तापात रडतातच मुलं." रडतरडत अनू म्हणाली आणि बाळाला घेऊन बाहेर अंगणात गेली. अजित कपडे न काढताच बेडरुममध्ये गेला आणि बेडवर त्याने स्वतःला झोकून दिलं. मणामणाचे घाव त्याच्या डोक्यात पडत होते. दिवसभरातल्या घटनांनी त्याचं मानसिक संतुलन पार बिघडून गेलं होतं. बराचवेळ तो तळमळत पडला होता. एक तासाने त्याला मन शांत झाल्याने जरा बरं वाटू लागलं. त्याने कानोसा घेतला. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. आपण मगाशी बाळाला फेकल्याचं त्याला आठवलं आणि भीतीची एक शिरशिरी त्याच्या शरीरातून निघून गेली. बापरे ! त्याला काही झालं तर नाही ना? अनू त्याला दवाखान्यात तर नाही घेऊन गेली? खरंच त्याला काही झालं असेल तर? मानेला काही झटका बसून.....!त्याविचारासरशी तो घाबरून ताडकन उठला. बाहेरच्या हालमध्ये आला.अनू आणि बाळ दोघंही तिथे नव्हते. तो बाहेर अंगणात आला मग गेट उघडून तो बाहेर रस्त्यावर आला. पण कुठेही त्या दोघांचा पत्ता नव्हता.तो परत आत आला. मोबाईल उचलून त्याने अनूला फोन लावला. रिंग वाजली पण अनूचा मोबाईल समोरच टेबलवर होता.ती मोबाईल घरातच ठेवून गेली होती. बाळाच्या काळजीने आता अजितला घाम फुटला. त्याचा तो गोड ,हसरा चेहरा आठवून त्याच्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. जीव कासावीस होऊ लागला. तिरीमिरीत तो उठला. अनूला आता शोधणं भाग होतं. न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.
"कुठे गेली होतीस?" त्याने विचारलं पण त्याला उत्तर न देता ती बेडरुममध्ये गेली. बाळाला पाळण्यात टाकून त्याला झोपवलं. अजित आत आला.
" बरं वाटतंय का त्याला?"त्याने विचारलं. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तोंडावर हात दाबून ती रडायला लागली. मग बेडवर जाऊन उशीत डोकं खुपसून मुसमुसत राहिली.
" साॅरी अनू आज खुप टेंशन होतं गं.त्यामुळे....."
उत्तर न देता अनू रडत राहिली. अजितने पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे पाहिलं. त्याच्या निरागस गोड चेहऱ्याकडे पाहून त्याला उचलून घ्यायचा मोह त्याला झाला. पण अनू रागावेल या भितीने तो त्याला न घेताच बाहेर आला. रात्री दोन वाजता त्याला जाग आली. अनू आणि बाळ दोघंही जागेवर नव्हते पण कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. तो उठून बाहेर आला. अंगणातला दिवा सुरु होता आणि अनू बाळाला थोपटत झोपवायचा प्रयत्न करत होती.
"मी घेऊ त्याला?"त्याने अनूला विचारलं. तिने मानेनेच त्याला नकार दिला आणि फेऱ्या मारणं सूरु ठेवलं. अजित थोडावेळ थांबून परत बेडरुममध्ये येऊन झोपला. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली.आई ती आई असते. मुलांनी कितीही त्रास दिला तरी ती रागवत नाही, ओरडत नाही. प्रेमाने त्यांची सेवा करणं ती सुरुच ठेवते. बाप कितीही चांगला असला तरी तो आई होऊ शकत नाही. त्याला आठवलं लहानपणी तो एकदा आजारी पडला होता त्यावेळी त्याच्या आईने ७-८ रात्री अक्षरशः जागून काढल्या होत्या. दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरु झालं. पण अनू त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती. फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच देत होती, तीही तुटक. तीन दिवसात तर तिने त्याला बाळाला हातसुध्दा लावू दिला नाही. अजितला न घेताच ती बाळाला दवाखान्यात घेऊन जायची. कंपनीत आलं की अजितला आज ऑर्डर येणार तर नाही ना याची सतत भिती वाटायची. त्याचं कामावरचं लक्ष उडालं. एकदा तर क्वालिटीकडे लक्ष न दिल्यामुळे बरंच मटेरिअल वाया गेलं. नेहमीप्रमाणे पाटीलने सर्व कामगारांसमोर त्याचा पाणऊतारा केला. राचीची ऑर्डर लवकरच देण्याची धमकीही तो देऊन गेला. चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाटील प्लांटमध्ये आला नाही तेव्हा अजितला आश्चर्य वाटलं. त्याने  चौकशी केली तर पाटील मुंबईच्या ऑफिसमध्ये गेल्याचं कळलं. नक्कीच तो आपली ऑर्डर काढायला गेला असावा याची त्याला खात्री पटली. पण आता त्याने मनाची तयारी केली होती. किंबहूना त्याशिवाय पर्यायच नव्हता. अनू आणि बाळाला राचीला घेऊन जायला त्याला हरकत नव्हती. पण एकदा तिथं गेल्यावर तिथून महाराष्ट्रात परतणं सोपं नाही हे त्याला माहित होतं. आईच्या ट्रिटमेंटसाठी त्याला वारंवार सुटी घेऊन यावं लागणार होतं. धावपळ होणार होती पण इलाज नव्हता. सध्याच्या बेरोजगारीच्या काळात अशी चांगली नोकरी लगेच मिळणं फार फार कठीण होतं. तिसऱ्या दिवशीही पाटील कंपनीत आलाच नाही.अजितचं टेंशन वाढलं होतं. त्यात दुपारी शिपाई जी. एम. साहेबांनी बोलावल्याचा निरोप घेऊन आला. जड पावलांनी तो त्यांच्या केबिनजवळ पोहचला.
" मे आय कम ईन सर"
" येस कम ईन" 
तो जी. एम. साहेबांसमोर जाऊन उभा राहिला.
" हॅव अ सीट माय बाॅय "
अजित बसला. जी.एम. साहेबांनी ड्राॅवरमधून एक लिफाफा काढून टेबलवर ठेवला.
"धीस इज युवर ऑर्डर"
शेवटी जी येऊ नये असं वाटत होतं ती ऑर्डर आली होती. पाटीलने त्याला छळायचं सोडलं नव्हतं. अजितच्या पायातलं त्राण गेलं. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. संताप,निराशा,अपमान या मनातल्या भावनांवर तो ताबा मिळवायचा प्रयत्न करु लागला.
"काँग्रॅच्युलेशन्स फाॅर युवर प्रमोशन " त्याच्या कानावर जी.एम. साहेबांचे शब्द पडले तसे त्याने खाडकन डोळे उघडले.
"प्रमोशन? विच प्रमोशन?"त्याने आश्चर्याने विचारलं.
"येस ! यू हॅव बीन प्रमोटेड टू दी पोस्ट ऑफ प्राॅडक्शन मॅनेजर."
अजितला फारसा आनंद झाला नाही. राचीच्या प्लांटमध्ये प्रमोशन मिळणं फारसं आनंददायी नव्हतं कारण नवीन प्लांटला आणि तिथल्या स्टाफला सांभाळणं सोपं काम नव्हतं.
" सर राचीका प्लांट कैसा है? जस्ट आस्कींग टू हॅव अ नाॅलेज बिफोर जाॅयनिंग"
"यु आर नाॅट गोईंग टू राची. यु विल वर्क हिअर ॲज प्राॅडक्शन मॅनेजर" 
"व्हाॅट?"अजित खाडकन उभा राहिला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.
"येस माय बाॅय" जी. एम. साहेब हसत म्हणाले.
"व्हाॅट अबाउट मिस्टर संतोष पाटील सर?"
"उनको कंपनीने निकाल दिया है. ही वाॅज व्हेरी ॲरोगंट पर्सन. ही नाॅट ओन्ली इन्स्ल्टेड मी बट आल्सो अवर एम.डी. ही हॅड सबमिटेड मेनी कंप्लेंटस् रिगार्डिंग युवर वर्कींग बट आय वाॅज व्हेरी मच नाऊन अबाऊट युवर हार्ड वर्क अँड डेडीकेशनस्. सो आय रिकमेंड युवर नेम फाॅर धीस पोस्ट "
जी.एम.साहेब बऱ्याच वेळ पाटीलबद्दल बोलत होते. पाटील फार अहंकारी होता शिवाय कामापेक्षा इतर भानगडीत त्याला जास्त रस होता. त्याच्या कालावधीत प्राॅडक्शनचा दर्जा घसरला होता त्यामुळे कंपनीचं खुप नुकसान झालं होतं. म्हणून कंपनीने त्याला डच्चू दिला होता. आनंदाच्या भरात अजित घरी यायला निघाला. वाटेत त्याने पेढे घातले. घरात तो शिरला तर बाळ हाॅलमध्येच खाली सतरंजीवर पहुडला होता. अनू किचनमध्ये काहितरी करत असावी. अजित बॅग ठेवून बाळाकडे गेला. बाळाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो गोड हसला. त्याच्या हसण्याने हुरळून जाऊन अजित त्याच्याशी गप्पा मारु लागला. त्याच्या गोबऱ्या गालांवर हात फिरवू लागला. त्याच्या उघड्या पोटावर बोटांनी गुदगुल्या केल्यावर बाळ खळखळून हसला. त्याच्या गालाचा मुका घेण्यासाठी अजित खाली वाकला तेव्हा बाळ त्याचे गबगुबीत मऊ हात त्याच्या गालांवर फिरवू लागला. अजितला आता रहावलं नाही.अनावर प्रेमाने त्याने बाळाला उचलून घट्ट छातीशी धरलं आणि त्याच्या डोक्यावरून,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागला. मग अजितने त्याला दोन्ही हातांनी हवेत उडवलं आणि परत झेललं तसा बाळ खळखळून हसला. त्याला आता अजितची थोडीही भिती वाटत नव्हती.
"द्या इकडे त्याला माझ्याकडे " अनूच्या बोलण्याने तो अचानक भानावर आला.
" राहू दे ना थोडावेळ. बघ कसा छान खेळतोय.खळखळून हसतोय."
"नको. तो रडायला लागला की परत फेकून द्याल त्याला कुठेतरी. चल रे बेटा,चल दुध प्यायचंय ना." अनूने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले पण बाळाचा मुड वेगळाच होता. त्याने क्षणभर तिच्याकडे आणि अजितकडे पाहिलं आणि त्याने मान फिरवली. आपले दोन्ही हात अजितच्या गळ्यात टाकून तो त्याला बिलगला. अनूने जबरदस्तीने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मान फिरवून अजितला मिठी मारत होता.
" बदमाश ! विसरला वाटतं बाबांनी त्यादिवशी कसं तुला फेकून दिलं होतं ते." हताश होऊन अनू म्हणाली.
"अनू ,बाळ विसरला बघ ती गोष्ट. तुही विसर ना प्लीज" अजित कळकळीने म्हणाला
"तो विसरेल. तुम्हीही विसराल हो. पण मी कशी विसरेन. नऊ महिने वाढवलंय मी त्याला पोटात. त्याला जन्म देतानांच्या वेदना मी सहन केल्यात. तुमच्या संतापामुळे एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं असतं. बरं तरी सोफ्यावर आदळलं,फ रशीवर आदळलं असतं तर..." बोलता बोलता तिचा स्वर गहिवरला.
" चुकलंच माझं अनू.फार टेंशन होतं गं त्यादिवशी. त्यातून बाळाच्या रडण्याने मी कातावून गेलो होतो."
" पण म्हणून तुमचा राग त्या निरागस जीवावर काढायचा तुम्हांला काही हक्क नव्हता आणि टेंशन कुणाला नसतात हो? मीही नोकरी केलीये. तिथे काय टेंशन असतं मलाही माहितेय. पण ऑफिसमधला राग मी कधीही घरातल्या व्यक्तीवर काढला नाही. त्यादिवशी मीही टेंशनमध्ये होते. एक जिवलग मित्र अचानक वारल्यामुळे बाबांना हार्ट अटॅक आला होता. त्यांना आय.सी.यू.त भरती केल्याचा आईचा फोन आला होता "
"अरे बापरे ! अगं मग सांगायचंस ना ! आपण गेलो असतो त्यांना भेटायला"
" काय सांगणार? मी काही सांगण्याआधीच तुम्ही नको ते करुन बसलात. मग तुम्हाला सांगायची हिंमतच नाही झाली."
" आय ॲम एक्स्ट्रिमली साॅरी अनू. खरंच मी त्यादिवशी तसं वागायला नको होतं. खुप पश्चाताप होतोय गं. माफ कर ना मला प्लीज" 
" मी काय माफ करणार तुम्हांला? जगात जेव्हा जेव्हा क्रोध निर्माण झाला त्यात निरागस आणि निष्पापांचाच बळी गेला आहे. माझं बाळ माझं विश्व आहे अजित. त्या विश्वाला तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तुमच्यासारख्या शांत व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून मला खुप जबरदस्त धक्का बसला होता. बस. परत असं करतांना शंभर वेळा विचार करा एवढंच माझं म्हणणं आहे."
" तुझी शपथ, अनू मी परत असं कधीही करणार नाही"
बाळाचा हसल्याचा आवाज आला तसं अनूने त्याच्याकडे पाहिलं. आता मात्र बाळाने तिच्याकडे झेप घेतली.
"एक आनंदाची बातमी आहे अनू.माझं प्रमोशन झालं आणि विशेष म्हणजे मला त्रास देणाऱ्या आमच्या प्राॅडक्शन मॅनेजरचीही कंपनीने हकालपट्टी केली. बरं चल अगोदर आपण तुझ्या बाबांना बघायला जाऊ. त्यांना बरं वाटत असेल तरच मी आणलेले पेढे खाऊ."
"अहो त्यांना माईल्ड अटॅक आला होता. तीन दिवसातच त्यांना डाॅक्टरांनी घरी पाठवलं."
"मग तर पेढे खायलाच पाहिजे." असं म्हणून अजितने बॅगेतला पेढ्यांचा बाॅक्स काढून अनूला एक पेढा भरवला. अनूनेही एक पेढा अजितला भरवला. शेवटी सगळं गोड झालं हे पाहून की काय अनूच्या कडेवरचा बाळही खुदकन हसला.

©️ दीपक तांबोळी
     9503011250
      (ही कथा माझ्या " गिफ्ट-भेट हृदयस्पर्शी कथांनी "या कथासंग्रहातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )

1236. लग्नापूर्वी

      आपल्या मुलांच्या लग्नापूर्वी शांत विचार करूनच निर्णय घ्या. समाजात नवीनच प्रथा पडू लागल्या आहेत, आणि त्याचा मुलांच्या वैवाहिक जीवनावर फार मोठा परिणाम होऊन एक भयंकर विदारक चित्र तयार होत आहे, याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. अवास्तव अपेक्षा असणाऱ्या वर किंवा वधु पित्यानी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे स्थळ शोधणे सुरू करण्या अगोदर तुम्ही जिथे वास्तव्यास असाल त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील फॅमिली कोर्टात फक्त एकदा तरी फेर फटका मारून यायला हवा. आणि मग घरी येऊन विचार करा की नेमके कसे स्थळ तुम्हाला पाहिजे ते? तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत स्थळ तुम्हाला हवे, की सर्वसाधारण असले तरी चालेल परंतु संस्कारी सुन-जावई, चांगली माणसे हवीत ! कायद्याचा अभ्यासक म्हणून माझे बरेचदा कोर्टात जाणे येणे असते. सद्यस्थितीत कोर्टात वादविवाद, गुन्हेगारांपेक्षा जास्त प्रकरणे ही घटस्फोट घेणाऱ्या मुला-मुलींची दिसायला लागली आहेत. थोडं खोलात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात येतं. घटस्फोट कां हवा आहे, तर मुला मुलींकडून खूप मजेशीर उत्तरे मिळतात. मागच्याच वर्षी लग्न झालेल्या एका जोडप्याला जज साहेबांनी विचारले. तुमच्या लग्नाला किती वर्षे झालीत व तुम्ही किती काळ सोबत होते, त्यावर दोघांचे उत्तर होते, आमचे मागील वर्षी लग्न झाले व आम्ही २ महिनेच एकत्र होतो. दोघेही खूप शिकलेले. त्यात मुलगा प्रायव्हेट जॉबला चांगल्या पोस्टवर, तर मुलगी शासकीय जॉबला ! जज साहेबांनी विचारले. मग तुम्हाला वेगळे का व्हायचे आहे? त्यावर दोघांचे उत्तर होते.आमचे विचार जुळत नाहीत.  मुलगा व मुलीच्या तोंडून हे उत्तर ऐकूण जज साहेबांच्या कपाळावर आठ्या पडतांना दिसल्या. 
     एक काळ होता, जेंव्हा आपल्या आई-वडिलांची लग्न झालीत तेव्हा त्यांना मुलगा किंवा मुलगी आवडते का हे ही विचारले जायचे नाही. आमच्या वेळेस फारच फार तर मुलगी कशी वाटली. एवढेच विचारल्या जात असे. घरातल्या मोठ्या व्यक्तींनी ठरवले तर विवाह होत असत आणि ते विवाह शेवट पर्यंत टिकत होते. मग आजच्या मुला-मुलींना इतके स्वातंत्र्य असल्यावर ही वेळ का येऊ लागली आहे? अजून एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली. गरीब कुटुंबातील व हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबातील, जेमतेम शिक्षण असलेल्या मुला-मुलींची भांडणे कोर्टात आलेली दिसत नाहीत. कोर्टात घटस्फोट घेण्यासाठी आलेली जास्त जोडपी एकतर जास्त शिकलेली, नवश्रीमंतीच्या काल्पनिक प्रतिष्ठेच्या कोषात वावरणारी, लग्नाच्या वेळी अवास्तव मागण्या केलेली व त्या पूर्ण न होऊ शकल्यामुळे कोर्टात येणारी मंडळी दिसतात. केवळ मुलाच्या बापाकडे खूप प्रॉपर्टी आहे व मुलगा खूप शिकलेला असून चांगल्या नोकरीला आहे म्हणून आपली मुलगी सुखात राहील? ही कल्पनाच मुळात मूर्खपणाची ठरते. मग पुढे भविष्यात जावई व्यसनी आहे, तो आता मुलीला रोज त्रास देतो, म्हणून मग आता घटस्फोट ! जावयाला लाख भर पगार आहे, परंतु शहरात मोठा फ्लॅट किंवा गाडी घ्यायची आहे, म्हणून मुलीला सासुरवास केला जातो. तिचा छळ केला जातो, म्हणून घटस्फोट हवा. दोन चार महिने सासरी राहिलेली मुलगी जिच्या अंगावरची हळद ही निघालेली नसते, मुलगी सुखात राहावी म्हणून आपले सर्वस्व पणाला लावून देणारा बाप जो आपल्या मुलीचे लग्न लावून देताना पार भिकेला लागतो. तो बाप आणि पोर जेव्हा कोर्टात येते, त्या वेळेस डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही. 
     म्हणून सांगतो मुलाचे असो वा मुलीचे स्थळ शोधताना माणसे चांगली शोधा. केवळ पैसा, प्रॉपर्टी, पॅकेज, उच्चशिक्षण, गाडी, फ्लॅट पाहू नका. मुलगा कमी पॅकेजवाला, टेम्पररी नोकरीला असलेला असो की व्यवसाय करणारा. फक्त त्याच्या मनगटात जोर असलेला, सुसंस्कारी निर्व्यसनी हवा. आपल्या मुलीला दोन वेळचे खाऊ घालून सुखात ठेवणारा असावा. नाहीतर महाल विकून झोपड्यात येणारे ही बहाद्दर समाजात आहेत हे लक्षात घ्या. मुलाच्या परिवारा कडे किती प्रॉपर्टी आहे? हे पाहण्या पेक्षा तो मुलगा स्वतःच्या हिमतीवर काय करू शकतो हे पारखा. त्याच्या आई-वडिलांचे स्वभाव, संस्कार, वळण लक्षात घ्या ! सुसंस्कृत, निर्व्यसनी, होतकरू, कष्ट करणारा मुलगा असेल आणि गरीब जरी असेल, तरी असे स्थळ हातचे जाऊ देऊ नका. नक्कीच तेथे तुमची मुलगी सुखात राहील यावर विश्वास ठेवा. मुला-मुलीच्या आई वडिलांनी याचा नक्कीच जरूर विचार करायला हवा. हे जरा कटू आहे पण सत्य आहे. 
     मुलीच्या बाबतीत सुद्धा केवळ तीचे रंग रूप शिक्षण जॉब पॅकेज न बघता, तिच्या परिवाराचे संस्कार, संस्कृती, संवयी, स्वभाव व वर्तमानात घरापासून लांब जॉब करणारी मुलगी कुठल्या संस्कृतीत वावरत आहे, ते मुलाकडच्यांनी लक्षात घ्यायला हवे. चमकतं ते सगळंच सोनं नसतं, याचे भान ठेवायला हवे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, मुलीच्या संसारात मुलीच्या माय-बापाचा गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप टाळायला हवा. बहुतांश  प्रकरणात मुलीचा संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत "तिची अती महत्वाकांक्षी, अती हुशार जन्मदात्री आईच" आढळून येते. आयुष्य खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा. तसेच दुसऱ्यालाही आनंदात जगू द्या. एकमेकांना प्रेम द्या, अडचणीत एकमेकांना समजून घ्या, मदत करा, संकटसमयी धीर घ्या, आधार द्या.
स्वतःची व आपल्या कुटुंबाची, परिवाराची व सामाजिक स्वास्थ्याची काळजी घ्या.

1235. उष्ट आणि शिळं अन्न

       बाहेर खाताना काळजी घ्या आम्ही कधीच उष्ट आणि शिळं अन्न खात नाही. पुढल्या वेळेस हे लोकांना सांगण्या अगोदर जरा विचार करून बोला. काही दिवसांपूर्वी आमचे एक परिचित आम्हाला एका अतिशय प्रसिद्ध अशा रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन गेले होते. मी बहुधा नेहमीच बाहेर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळते. परंतु सामाजिक दबावाखाली कधी कधी जावं लागतं. आजकाल जेवणात पनीरचे पदार्थ खाणं हे श्रीमंतीचे लक्षण समजलं जातं. म्हणून त्यांनी सुरुवातीला पनीरच्या काही डिशेस मागवल्या. प्लेट मध्ये ठेवलेले पनीरचे वेगवेगळ्या आकारांचे तुकडे बघून मला थोडसं विचित्रच वाटलं. असं वाटलं की त्या तुकड्यांना मुद्दाम कापून शिजवलेलं आहे. मी वेटरला बोलावून त्या हाॅटेलच्या कुकला बोलावून आणण्यास सांगितलं. कुक आल्यावर त्याला मी विचारलं, "पनीरचे तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे का बरं आहेत?" तेव्हा तो बोलला, "ही आमची स्पेशल डिश आहे." त्यावर मी त्याला म्हटलं की मी आणखीन एक डिश माझ्याकरता पॅक करून घरी घेऊन जायचा विचार करतेय. पण मला ही तुमची स्पेशल डिश  माझ्यासमोर बनवून दाखवा. आख्ख रेस्टोरंट माझ्या वाढलेल्या आवाजानं जणू हादरून गेलं होतं. हॉटेलमधील अनेक लोक आपलं जेवण थांबवून माझ्याकडे बघू लागले. हाॅटेलचा स्टाफ वेगवेगळ्या सबबी सांगू लागला. शेवटी पोलीसच्या भीतीने वेटरनं कबूल केलं की जेवणारे लोक अनेकदा प्लेटांमध्ये अन्न, भाज्या कोशिंबीरी आणि पोळ्या वगैरे टाकून निघून जातात. हॉटेलमधल्या स्वयंपाक घरातून हे सारं फेकून दिल्या जात नाही. पनीर व भाज्यांमधील मोठे तुकडे एकत्र करून व पुन्हा त्यांची भाजी बनवून ग्राहकांना डिश दिली जाते. बशांमध्ये शिल्लक राहिलेली कोशिंबीर नवीन ऑर्डर साठी वापरली जाते. बश्यांमध्ये टाकून दिलेले सुक्या चिकन व मांसांचे तुकडे पुन्हा कापून ते करीमध्ये नव्यानं टाकले व शिजवले जातात. शिळ्या आणि सडक्या भाज्या सुद्धा करीच्या रूपाने पुन्हा वाढल्या जातात. हे मोठमोठ्या हॉटेलमधलं वास्तव आहे. यापुढे जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये खायला अथवा जेवण करायला जाल तेव्हा उरलेलं अन्न एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून सोबत घेऊन जा आणि बाहेर जाऊन एखाद्या जनावराला तरी खाऊ घाला किंवा मग ती पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हीच स्वतः फेकून मगच पुढे जा. अन्यथा कदाचित तुमचं उष्ट अन्न दुसरा कुणी खाईल किंवा तुमच्या प्लेट मधील अन्न कदाचित दुसऱ्या कुणी प्लेटमध्ये टाकून दिलेलं उष्ट अन्न असू शकेल.
      दूसरा किस्सा भगवान कृष्णाची जन्मभूमि वृंदावन येथील आहे. वृंदावनवा पोहोचल्यावर, मी मंत्रमुग्ध होऊन तिथल्या पवित्र भूमीकडे पाहात होते. दिल्लीहून लांबचा प्रवास करून आल्यावर आम्हा सर्वांनाच कमालीची भूक लागली होती. म्हणून एका स्वच्छ दिसणाऱ्या उपहारगृहामध्ये आम्ही प्रवेशलो. उगीच ऑर्डरला वेळ लागू नये म्हणून आम्ही डिश ऐवजी जेवणाच्या थाळ्या मागवल्या. एका स्वच्छशा ट्रे मधून वरण, भाजी,भात, रायतं व सोबतच एक टोपलीतून चपात्या आणल्या गेल्या. सुरुवातीचे काही घास घेताना लक्षात आलं नाही, पण मग नंतर मला काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. मग लक्षात आलं की पोळी थोडी आंबूस लागते आहे. मग भाजीकडे माझं लक्ष गेलं तेव्हा लक्षात आलं की भाजीतील प्रत्येक तुकड्याचा रंग वेगळा आहे. मग भाताची चव घेऊन बघितली. तिथेही काहीतरी गडबड वाटली. सगळं जेवण तसेच टाकून आम्ही उठलो आणि मग काउंटर वर मी जेवणाचं बिल किती झालं म्हणून विचारलं तर हाती साडेसहाशे रुपयांचे बिल ठेवल्या गेलं.
मी म्हटलं, "भाऊ! पैसे तर मी देईन. पण एकदा मला तुमचा भटारखाना दाखवा." तो एकदम गडबडून गेला आणि मला विचारू लागला, "कां? काय झालं?"
मी म्हटलं, " जो पैसे देतो त्याला जेवण साफ बनतंय की नाही हे पाहण्याचाही हक्क आहे." 
तो काही बोलण्या आधीच मी हॉटेलच्या भटारखान्यात शिरले. आत शिरल्यावर स्वयंपाक घरात कसलाही पदार्थ शिजत नाहीये हे पाहून माझ्या आश्चर्याला काही पारावार उरला नाही. एका टोपलीत कांही पोळ्या ठेवल्या होत्या. फ्रिज उघडून बघितला तर आंत उघड्या भांड्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या शिजलेल्या भाज्या ठेवलेल्या दिसत होत्या. कांही भाज्यांना तर चक्क बुरशी लागली होती. फ्रिजमधून सडका वास बाहेर पडत होता. आचाऱ्याला दरडावून विचारल्यावर ह्या साऱ्या भाज्या एक आठवड्याइतक्या शिळ्या असल्याचं त्यानं कबूल केलं.  वाढताना याच शिळ्या भाज्यात तेल टाकून  व कढईत गरम करून आपण त्यात कोथिंबीर व टमाटू टाकून डिशमध्ये ग्राहकांना सर्व्ह करीत असतो हेही त्यानं मान्य केलं. कणिक आपण केवळ एक दिवसाआडच मळतो. किती किती तास वीज जाते तेव्हा खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. ते लपविण्यासाठी त्यांत तिखट आणि भरपूर मसाले टाकून डिशेस सर्व्ह केल्या जातात. तिंबलेली शिळी कणिक खराब झाली असेल तर तीच नान साठी सर्रास वापरली जाते.
मी रेस्टॉरंटच्या मालकास बोलले "तुम्हीही कधीतरी यात्रा करीत असालच, ईश्वर करो, जेव्हा पुढील यात्रेच्या वेळेस तुम्ही भुकेनं अगदी व्याकुळ झाला असाल तेव्हा तुम्हाला बिलकूल असंच जेवण मिळावं जसं तुम्ही तुमच्या ग्राहकांना खाऊ घालता." माझं हे बोलणं ऐकून त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. 
     आज आपल्याला संकटं, धोके व फसवणूकीपासून केवळ आपली जागरूकताच वाचवू शकते. कारण आता देवालाही दुष्टांनी घेरलेलं आहे. भारतातून योग्य आणि अयोग्य यांतील फरक संपत चालला आहे. प्रत्येक दुकानात वा प्रतिष्ठानात एका कोनाड्यात देवाचं मोठं वा लहान मंदिर पहायला मिळेल, व्यापारी सकाळी येताच देवाच्या मूर्ती समोर धूप, दीप लावतो, गल्ल्याला नमस्कार करतो आणि मग दुकानातील सामानासोबतच स्वतःचा आत्मा विकण्याचा धंदा सुरू होऊन जातो. देवाजवळ मागणं मागताना दुकानदार हा विचार करीत नाहीत की ते स्वतः जगाला काय देतायत !
       ही परिस्थिती सर्वच ठिकाणी असेल असे नाही. कारण काही ठिकाणी अनेक हॉटेल्स प्रामाणिकपणे त्यांच्या स्वकष्टावर चांगला व्यवसाय करत असतात. परंतु बऱ्याच अनोळखी ठिकाळी कदाचित तुम्हाला असा वाईट अनुभव येईल. त्यामुळेसावध व्हा !जागरूक रहा !  बाहेरचं हाॅटेलचं खाणं टाळा. 🙏
घरचं अन्न सर्वात चागलं.

1234. अशी पाखरे येती

 (श्री अजय कटारिया यांना सादर समर्पित) 
     पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया. बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली. बोलता बोलता ते म्हणाले, 'माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या.' भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन, त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच. कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो; तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच, सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली. त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले. बॉक्स उघडून पाहिला, आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते. आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या. मी त्यांना फोन करून म्हणालो, 'कटारिया साहेब, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे. हि आमची लिस्ट नव्हे ! ते हसून म्हणाले, 'असू द्या हो डॉक्टर, अनाथ पोरांना शिकवताय. थोडं इकडे तिकडे चालणारच. पोरं आहेत. घ्या आमच्याकडून डोनेशन समजून.' एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली, त्यांनी ती हसत खिशात ठेवली. पुढच्या वर्षी म्हणजे साधारण 2021 ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली. पुन्हा पाचपट सामान जास्त होते. मी पुन्हा तोच फोन केला. पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले. एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली. ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली. एकावर एक फ्री. हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो, पण एकावर पाच फ्री? 
      मग 2022 साल उजाडले. यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो. दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली. मी बारकाईने पाहत होतो, माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते. मी त्यांना म्हणालो साहेब, आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या. यावर ते माझ्याकडे न बघता, स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, 'डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो !  ए त्या चौथा कप्प्यातला, नवीन माल काढ. त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे. तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो,  पण हा आपला व्यवसाय आहे साहेब, मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे ! मी आवंढा गिळत म्हणालो.  तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, 'साहेब धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा, कारोबार म्हणा. जे काही करायचं ते नफ्यासाठी. मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी. 
'आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच, नफ्यामंदीच आहे.' चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले. 
मागितलेल्या गोष्टीपेक्षा, पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत ' हे कसं काय बुवा ?' हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता. माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा ! 
'छोटू, आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे?  शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये!' हात झटकत ते बोलले. माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा. नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला.
'डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही? तो माझा नफा. 
दहा पोरं नाही, आता तुम्ही 50 पोरांना सामान देऊ शकता, त्या पोरांना आनंद होतो की नाही? तो माझा नफा.
कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही. पण 50 पोरं शिकत आहेत,  याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा.
जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो, हा खरा तोटा. 
"तोटा" या शब्दावर जोर देत, डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली..! 
आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब, पक्का व्यापारी आहे मी.' काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, 'ए चाय सांगा रे डॉक्टरला ! '  तोट्याची शेती करून, आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो ! चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो, 
'सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे.' 
ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही. पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते. गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा. मंग खर्च झालाच कुठे? आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही. सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी ! मी खर्च केला नाही सायबा. फक्त गुंतवणूक केली. माझ्या पोरांवर गुंतवणूक केली. बघा भरभक्कम परतावा येणारच. 
"येणारच" म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली ! 
मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात? 
अनाथ कशानं हो. पालक म्हणून तुम्ही आहे. मी आहे. काय डॉक्टर तुम्ही सुद्धा ! 
'चहा संपवा तो...'  म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला.
तो तबला होता? की माझ्या हृदयाची धडधड ? माझं मलाच कळलं नाही.
शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !  सर्व साहित्य घेऊन मी आलो. दहा ऐवजी 50 मुलांना ते वाटले. तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती. भावनेच्या भरात हा "वेडा माणूस" स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती. याच प्रेमाच्या भावनेतून, 2023 साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही, आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली. लिस्ट नीट लिहून आणायची, अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत. वेळ किती लागेल म्हणून काय विचारता?  इतकं एकच काम आहे का? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही. ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा.  असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला. यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही ! हरकत नाही.  जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार? असो. हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला. 
       एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले. चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती. 
'डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ?  सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का?  थोडीफार सेवा आम्ही करत होतो, आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?' सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मी तुम्हाला माफ नाही करणार. ते रागानं थरथर कापत बोलत होते. या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो. पायावर डोकं टेकवलं आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला ! तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे, हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले, क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करतात. सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी. माझ्याशी ??? भांडला... !!!  यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या. 
   आता साल उजाडले 2024. यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर "चॉईस" मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही "चॉईस" नव्हता...!  मी 13 जून 2024 ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला. पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय... !  चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र, चार्टर्ड अकाउंटंट आहेत ! 
' हॅलो चिराग सर, कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..' 
'सर बाबा गेले' पलीकडून मंद आवाज आला. 
आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी, कोणाच्यातरी पाठी धावतच असतो, सतत फिरत असतो, हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो.
'अच्छा गेले का?  बरं पुन्हा कधी येतील ?' मी हसत बोललो.
'बाबा गेले सर. परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत. तुम्हाला माहित नाही ?'  
माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी सुन्न झालो. मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना. भानावर आलो, तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली. 
पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो. मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची, निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ? 
भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ? 
आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? 
हे...हे... असं... काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ? 
कटारिया साहेब, आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार...! 
'सर काही काम होतं का ?' फोन अजून चालूच होता, पलीकडून चिराग सरांचा आवाज आला. 
'शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती.' मी शांतपणे बोललो. 
'ठीक आहे सर, दोन दिवसात पाठवतो.' तितक्याच शांतपणे उत्तर आले. 
दोन दिवसांनी सामान आले, मी बॉक्स खोलले. 
आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या. मी चिराग सरांना फोन केला, म्हणालो, 'चिराग सर, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे, काहीतरी चूक झाली असावी ! 
चिराग सर म्हणाले, 'सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी !' 
'अहो पण, चिराग सर... एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला...' 
'अच्छा... हां... हां.... त्या एक्स्ट्रा वस्तू का ?  त्या मी नाही. बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर.'  
फोन कट झाला ...!!! 
इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला. कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले. पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले. या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे?  चिराग... व्वा...!!! 
      यानंतर 15 जून 2024 ला सर्व चिल्ल्यापिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले. नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या. या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू . बाळांनो, आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा... !!! 

21 जून 2024
डॉ अभिजीत सोनवणे 
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे 
9822267357
sohamtrust2014@gmail.com

1233. मैत्री

 प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे "मैत्री" बद्दलचे सुंदर लेखन..!!!  ✊👌✌️👍

ज्यांना मित्र असतील, 
त्यांनी ते जपावेत.

ज्यांना मित्र नसतील, 
त्यांनी ते शोधावेत.😀

मित्राशिवाय 
जगण्याची वेळ 
शत्रूवरही येऊ नये...☝️

आपल्या तोडीचाच किंवा त्यापेक्षा थोडा 
वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर असणारं फ्रेंड सर्कल असणं 
ह्यासारखं दुसरं भाग्य नाही...👏

आणि आपण मारलेला एखादा पंच 
समोरच्याला समजावून सांगायची वेळ येणे 
ह्यासारखं दुर्भाग्य नाही...😔

वयाच्या बंधनाला अमान्य करून 
वाह्यातपणा चालू ठेवला, की.
बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू 
अखंड क्रिएटिव्ह राहतो...😊

"अरे तुझं वय कांय, बोलतोयस काय?"
हा प्रश्न ज्याला पडतो,  ती माणसं 
अकाली वृद्ध होतात...😃

येता जाता केलेला फालतूपणा 
हा आपले हॅप्पी हार्मोन्स अबाधित ठेवतात... 😘

एखादी गोष्ट सिरियसली न घेता 
अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं 
ज्याला जमतं तेच खरे मित्र....! ☝️

एकमेकांवर कडी करून मिष्किलपणाची, 
बालीशपणाची किंवा टारगटपणाची.
एवढच कांय थोडी फाजिलपणाची हद्द
गाठणे, हेच खरं जीवन....! 👦

एक दोस्त ने क्या खूब लिखा है कि -
"मरने के बाद मुझे जल्दी ना जला देना,
मेरे दोस्तों को देर से आने की आदत है" ... 😟
मुझे जलाने से पहले मेरा दिल निकाल लेना,
कहीं दोस्त ना जल जायें जो दिल में बैठे हैं !

दोस्ती शब्द का अर्थ 
बड़ा ही मस्त होता है, (दो+हस्ती)  😎
जब दो हस्ती मिलती हैं ..,
तब दोस्ती होती है ... 🤝

1232. निर्णय चुकलाच माझा

      श्वेताने घरचे काम आवरले व निवांत पेपर घेऊन बसली. पेपर उघडताच पहिल्या पानावर MPSC टॉप केलेल्याची फोटो व पोस्ट दिलेलं होतं. सर्व नावे वाचताना एका नावावर येउन तिची नजर खिळली. ही तिचं का याची शहनिशा करून पुन्हा श्वेता त्या फोटोकडे बघू लागली. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि पेपर ओला करू लागले. त्यानंतर आतील पानावर काही मुलाच्या MPSC टॉपरच्या मुलाखती होत्या..त्या बघताना पुन्हा तीला हवं असलेलं नाव दिसलं आणि ती वाचू लागली.
”माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या आईला देते माझी आई सौ. रेखा वरद कपले.  माझ्याघरचे सगळेच बाबा, आजोबा, आजी  यात सामील आहेत. शिक्षक मार्गदर्शक म्हणून मला ज्यांनी मदत केली प्रोत्साहन दिले त्या सर्वांची मी आभारी आहे. माझी मेहनत तर होतीच या DC च्या पोस्ट साठी. पण जी जिद्द हवी होती ती मला माझ्या आईने दिली. आज मला सर्वांसमोर आईला धन्यवाद म्हणायची संधी मिळते आहे तर ती मी गमावू शकत नाही. Thanks आई & I love you so much.. आई “ही मुलाखत होती वैष्णवी वरद कपले ची. जी आज DC (Deputy Collector ) झाली होती.  हे वाचून तर श्वेताला आणखीच रडायला आलं. आणि ती 22वर्ष मागे विचारांच्या, भूतकाळाच्या गाभाऱ्यात गेली आणि स्वतःच्या खाणाखुणा शोधू लागली सुरुवात झाली ती  वरसंशोधनापासून.
(श्वेता स्वतःच आपला पाढा गिरवू लागली तो पुढील प्रमाणे… तिच्याच तोंडून )
     वरद एक साधा सरळ पण रग्गड शेतकरी. मी जरा सावळी त्यामुळे वरदच्या घरचे नाही नाही म्हणत होतें. वरदला मी आवडली म्हणून सगळ्यांनी होकार दिला. आमच्यात  10….12 वर्षाचं वायाच अंतर होतं. माझ्या  बाबांना वाटलं श्रीमंत घर आहे काय फरक पडतो. मला  विचारलं तर मीही होकार दिला. सगळ ठरलं व पार पडलं लग्न एकदाच. आणि मी  वरद च्या घरी नवीन स्वप्नांसोबत गृहप्रवेश केला.  नवीन सुन आली म्हणून वरदच्या आईने सर्व जबाबदारी सुनेला देऊन दिली. एकुलता एक मुलगा व सुन, त्यांनीच सगळं करावं ही माफक अपेक्षा होती  माझ्या  सासू -सासऱ्यांची. (आता वाटत काय चुकलं होतं त्यांचं ). मला माहेरी जाण्याची व फिरण्याची भारी हौस होती. माहेरी जाताना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला खुप आवडायच मला. मग कधी कपडे, गिफ्ट, खायचं सामान न्यायचे. सुरुवातीला वरद पण यायचे. शेतीची कामे वाढली त्यामुळे त्यांना ही वेळ मिळत नव्हता आणि त्यातच माझी good news आली त्यामुळे प्रवास कमी झाला. दोघांन मधे वयाच अंतर जास्त होतं. त्यामुळे की काय हळू हळू  काही गोष्टी त्याला खटकायला लागल्या होत्या  (वरदला वाटायचं आपलीच पसंत आता काय करायचं.) म्हणून वरद मला नेहमी समजवायचा. पण इकडे माझा स्वार्थीपणा वाढत होता. सासू -सासरे नको. राजा -राणीचा संसार करायचे स्वप्न मी रंगवू लागले होतें. “एकदाच बाळ झालं की आपण वरदला वेगळं राहण्यासाठी तयार करू “असं ठरवलंच होतं मी . वाट होती बाळ होण्याची. बाळ झालं “चार महिन्याचं”  आणि माझं झालं सुरु “सगळे वेगळे राहतात आपणही वेगळं राहूया. माझ्यानी इतक्या लोकांचे काम होतं नाही."
माझं हे बोलणं ऐकून वरदला रागच आला. तो मला दिसत होता पण मला तो काहीच बोलला नाही कदाचित त्याने विचार केला असेल मनात  “कुणापासून वेगळं व्हायला लावते ही मला. आई -बाबांपासून? या वयात त्यांना एकटं सोडायचं?  मुलगा हा म्हातारपणात आपल करायला पाहिजे असं म्हणतात आणि मी त्यांच्यापासून वेगळं कस राहू. ” (त्यांच बरोबर होतं हे आता पटतंय ). हाच वेगळं होण्याचा मुद्दा घेऊन कितीदा वाद केला मी. किती भांडले. घरातील वातावरण दूषित केल आणि एकदिवस वरदनी माझ्यावर हात उचलला. रागाच्या भरात. झालं माझा ego आडवा आला मी जेवनच बंद केल. आजही स्पष्ट आठवत सासूबाई कितीदा आल्या मला “जेवण कर ग. बाळ दूध पीत. चक्कर येईल तुला ”  मी मात्र माझ्या रागात होती, कुणाच ऐकलं नाही. शेवटी यांनी माझ्या माहेरी फोन करून सांगितलं “ही अशी वागतेय, जेवण करत नाही तुम्ही तिला जरा समजवता का? “
  वरदनी साधेपणाने फोन केला व माझे बाबा. पाच पंच घेऊनच आले. नको -नको ते बोलले वरद व माझ्या सासरच्याना. शेवटी मला माहेरी न्यायचं ठरवलं पण आलेल्यापैकी एक जण म्हणाला “यांना चांगला धडा शिकवूया  चला पोलीस स्टेशनला ” मग काय खोटे आरोप करून रिपोर्ट करायला गेलो तर मेडिकल चेकअप शिवाय रिपोर्ट लिहिणार नव्हते. माझा मेडिकल चेकअप झाला त्यात काहीच निघालं नाही. कारण काही त्रास नव्हताच न. त्यामुळे रिपोर्ट दाखल झाली नाही.. तिथून सरळ मी 10 महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी आले. मधे -मधे वरद फोन करायचा, “अग राग शांत झाला असेल तर ये परत घरी ” म्हणायचा. माझा igo जरा जास्तच मोठा झाला होता न. मी एकच म्हणायचे ”वेगळ राहत असाल तर मी येते नाहीतर नाही “ असं करता करता दोन महिने झाले. बाळाचा पहिला वाढदिवस इकडे करूया असं वरद म्हणाले. माझी अट तिचं होती. मुलीच्या प्रेमासाठी इकडे वरद आई -बाबाला, बहिणीला एकत्र बोलावून सांगत होता.
“मी आता  वेगळं राहतो आणि मला बाबांच्या संपत्तीतला हिस्सा नको. श्वेताला कळलं पाहिजे की सासू-सासरे नाही तर त्यांची संपत्ती पण नाही.“ अशांनी तरी मी एकत्र राहायला तयार होईल असं सगळ्यांना वाटत होतं.वरदचा कॉल आला. “मी वेगळा राहायला तयार आहे तू परत ये. मी बाबांच्या संपत्तीमधला हिस्सा घेणार नाही. आपण आपला संसार नव्याने उभा करू. ते जर आपल्याला नको तर त्यांचे शेत/संपत्ती  घेऊन काय उपयोग. तू लवकर ये आपण बाळाचा वाढदिवस इकडे अपल्या नवीन घरी करूया.“
     मी हे घरी सांगितले तेंव्हा घरच्यांचे हावभावच बदलले. मला माहेरी आणताना जे पाच लोकं बाबा घेऊन आले त्यांना बोलावून विचारले तर ते म्हणाले आता “दोन हातावर बायको पोरीच कस काय भागेल.”
दुसरा म्हणाला  “तुमची मुलगी आहे तुम्ही बघा.“
तिसरा म्हणाला ” त्यांचा इतका अपमान केला आता परत त्या घरी जायचं नाक राहील का” असं बोलून ते निघून गेले. घरी मग त्यावर विचार सुरु झाला.मी म्हंटल “मला जायचं आहे परत.“
बाबा -“तुला जायचं असेल तर तुझ्या भरवशावर जा. इथून पुढे भांडण झाले व मला फोन आला तर मी येणार नाही तुझ्या घरी.“
भाऊ – ” किती अपमान केला तुझ्या सासरच्यांचा. त्यांच्या समोर जायची लाज नाही का वाटणार. मी तर कधी येणार नाही तिथे. “
आई -“पोरी आधी विचार करायचास न आता तू परत गेलीस तर तुझ्या बाबांचा पण मान जाईल न.”
बाबा – “तुला जायचं तर जा परत माहेरी येऊ नकोस “
    सर्वांचे बोलणे ऐकून मी गोंधळले होतें यात बाळाचा पहिला वाढदिवस झाला तरी मी सासरी गेले नाही. विचार सुरु होता. “सासरी गेले तर माहेर तुटेल. माहेरी राहिले तर नवरा सुटेल..काय करू..?
जेंव्हा मला राग आला तेंव्हा का नाही समजावलं यांनी मला. हे लोकं सरळ माहेरी घेऊन आले आणि आता तुझं तू बघ म्हणतं आहेत. मी जरा जास्तच केल का वेगळं राहण्यासाठी? मी मूर्खपणा केला का?  या विचारात होतें तोच भाऊ म्हणाला काय ठरवलंस. जातेस स्वताच्या भरवंशावर की वकील बघायचा. माहेर मला महत्वाचे होतेच. घरच्यांनी आणलं आता त्यांच्याच मताने वागायचं ठरवलं व वकील बघून वरदला घटस्फोटाचा नोटीस पाठवला. नोटीस मिळताच घरचे (सासरचे )हादरले. वेगळं राहायला तयार असूनही ही अशी का वागतेय.. सगळे (सासरचे) पुन्हा समजवायला आले. पण मी कुणाचाच ऐकलं नाही (आता वाटत ऐकलं असत तर परिस्थिती वेगळी असती.) वरदने नोटीसला उत्तर दिले. “मी तुला नांदवायला तयार आहे तुझ्या सर्व अटी मान्य करून. तू परत ये."
मी...मी म्हंटल्या पेक्षा माझ्या घरचे घटस्फोट घेण्यावर जोर देत होतें. या नोटीस च्या प्रकरणात तीन वर्ष निघून गेली. केस जागच्या जागेवर. शेवटी वकिलांच्या मध्यस्तीने घटस्फोट घेण्यावर शिक्कामोर्तब झाली. घरच्यांनी मुलीची दुसऱ्या लग्नात अडचण होईल म्हणून तिला वडिलांकडे देण्याचं ठरवलं मला मान्य करावं लागल. शेवटी त्या घटस्फोटच्या कागदावर दोघांनीही सह्या केला त्यात मुलीला भेटण्याची तरतूद पण केली नाही वकिलाने. म्हणजे माझं बाळ तुटलं मला नेहमीसाठी. बाळाला वरदला सोपवून मी जे निघाले ते पालटून एकदाही मागे बघितलं नाही. किती रडत होती वैष्णवी. आता पर्यंत आईला बघितलं. आणि 3 वर्षानंतर अनोळखी चेहरे दिसलें तिला म्हणून ती खुप रडत होती. मी कसलाही विचार केला नाही तेंव्हा. सही करण्याआधी जरी मी माझा निर्णय घेतला असता तर….?  आज खरच काहीतरी वेगळीच परिस्थिती असती.
     आज 22 वर्षांनी ती वैष्णवीला फोटोत बघतेय व मुलाखती मधे ऐकतेय.. “तिच्या यशाचे श्रेय तिच्या आईला जाते. मला नाही जन्मदात्रीला नाही तर पालनकर्तीला. आज माझी चिमुरडी D.C. झाली त्यात आनंदच आहे.. पण… त्या वेळी 22 वर्षाआधी जर मी योग्य निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती काही वेगळीच असती. हे शंभरदा डोकयात आलं पण आता  वेळ निघून घेल्यावर.
       इतक्यात… आत्या कितीवेळचा आवाज देतेय कुठे हरवलीस म्हणून तनुजा (माझ्या भावाची मुलगी ) आली आणि मी भूतकाळातून निघून भानावर आले. श्वेता...
समाप्त…..
  
       खरच वेळ निघून जाते व निर्णय चुकत जातात. रागाच्या भरात नाते तुटत जातात. “साप गेल्यावर काडी मारण्यात काय अर्थ आहे ” या म्हणी प्रमाणे लोकांचं जीवन होतं. जसं श्वेताच. अशा बऱ्याच श्वेता आहेत ज्या विभक्त झाल्या व काहींची केस अजूनही सुरु आहे… 5वर्ष.. 6वर्ष झालीत बऱ्याच जणींना.  अशा स्त्रियांच्या मनातलं श्वेताच्या पात्रातून सांगण्याचा प्रयत्न केला. लिहिताना “मी ” हा शब्द खास वापरला तो यासाठी की ज्यांच्यावर ही परिस्थिती आहे त्यांना ही स्टोरी स्वतःची वाटावी. आजूबाजूच्या घटनेवरून प्रेरित होऊन लिहिण्याचा प्रयत्न केला मी. ही स्टोरी वाचून जर कुणाचे चुकलेले निर्णय योग्य होईल तर फारच छान व कुणी चुकत असेल व वेळीच सावध होतील तर आणखीनच छान. 
    तर वाचकांनो वाचण्यासाठी धन्यवाद 🙏… Like करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आणि शेअर करायचा असेल तर नावासकट शेअर करा.

📝जयश्री कन्हेरे-सातपुते.. 🙏

शुक्रवार, २१ जून, २०२४

1231. ट्रान्झिस्टर

     नचिकेत जवळजवळ सहा महिन्यांनी घरी परत आला होता. बोटीवर ऑफिसर चा जॉब म्हटल्यावर भरपूर पगार होता पण हो गैरसोय होती. सहा शहा महिने घरच्यांचं तोंड दिसत नव्हतं. आजोबा गेल्यानंतर जवळजवळ तीन महिन्यांनी तो घरी आला होता. तो आला. बॅग वगोरे ठेऊन आजीला भेटायला तिच्या खोलीत गेला। आजीने त्याला बघितलं आणि तिला  हुंदके आवरेनासे झाले. "नचिकेत, अरे पोरा चांगले ठणठणीत होते रे. असे कसे अचानक गेले ते?" आजी इतकंच बोलली आणि पुन्हा रडू लागली. त्याने तिचं कसंबसं सांत्वन केलं. दरम्यान आईने त्याला आणि आजीला पाणी आणून दिलं. "बाबा गेल्यापासून हे असं आहे रे. काय सांगायचं त्यांना आता? तूच बघ." नचिकेत ची आई, सुनीला त्याला म्हणाली. 
        नचिकेत आजीशी बोलता बोलता खोली बघत होता. आजोबा असताना खोलीला एक चैतन्य होतं. आता मात्र पार रया गेल्यासारखी झालेली खोलीची. त्याची नजर भिरभिरत एका गोष्टीवर स्थिर झाली. त्या खोलीत असणारी जवळजवळ प्रत्येक गोष्ट त्याला परिचीत होती. पण एक वस्तू सोडून. आरामखुर्ची च्या बाजूला असलेल्या खिडकीत असलेला ट्रान्झिस्टर. हे काहीतरी नवीन आहे हे त्याला दिसत होतं." ते होय, यांच्या एका मित्राने आणून दिलंय." आजी म्हणाली. तो उठला आणि ट्रान्झिस्टर हातात घेऊन जवळून त्याचं निरीक्षण करू लागला. मेड इन जपान म्हटल्यावर विषय संपत होता. त्याने तो उचलला आणि तो घेऊन  हॉल मष्ये घेऊन बसला.  इतक्यात त्याचे वडील, जे त्यांच्या मित्राकडे गेले होते, ते परत आले. त्यांना बघून त्याने ट्रान्झिस्टर बाजूला ठेवला.
    "अरे नची, कधी आलास तू?" वडिलांनी विचारपूस करायला सुरुवात केली. नचिकेतने पूर्ण सहा महिन्यांचा अनुभव थोडक्याग सांगितला. जॉईन झाल्यानंतरची ही त्याची पहिली सुट्टी. आजोबांचं दुःख होतं आणि सहा महिन्यांनी सगळ्यांची भेट होते ही जरा चांगली गोष्ट होती. थोड्या वेळाने त्याची धाकटी बहीण, समिहा घरी आली. आल्या आल्या तिने नचिकेत च्या खांद्यावर एक दणका दिला. ते त्या दोघांची आक्रमक प्रेमाची भाषा होती," काय दादा, हं? सहा महिन्यांनी होतेय भेट आपली. घरापासून जास्ती कधी लांब गेला नाहीस आणि आता इतके दिवस?" नचिकेतने तिला आपल्या जवळ बसवलं आणि बॅगेतून एक गिफ्ट बॉक्स काढून तिच्या हातात दिला." माहितीये मला. तुला दूर रहावत नाही. बडबड कोणाशी करणार आता तू इतकी? हाहाहा . व्हिडिओ कॉल वगैरे आहेत पण ते तात्पुरते." तो बोलत होता. समिहाने तो बॉक्स उघडला. आत एक छोटं गिटार सारखं वाद्य होतं." हे उकुलेले आहे. गिटार सारखं वाजतं. सुंदर वाद्य आहे." तो तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे बघत म्हणाला. तिने ते हातात घेतलं. गिटार वाजवता येत असल्यामुळे तिने त्याच्यावर एक धून वाजवून पाहिली. "चला रे, जेऊन घ्या सगळे. भूक लागली असेल नचि ला" आईने फर्मान काढलं आणि समिहा लगेच आईच्या मदतीला गेली. भराभर ताटं वाढली गेली आणि आई बाबा आजी समिहा आणि तो असे सगळे जेवायला बसले. 
 "वाह, सहा महिन्यांनी घरचं जेवण." पुरणपोळीचा घास खात खात नचिकेतने आईकडे बघत म्हणाला.
"होय बाळा, त्या बोटीवरच्या जेवणाला कसली आलीय मेली चव?" इति नचिकेतची आजी. 
"आजी, अगदीच असं नाहीये ग. पण जे घरचं ते घरचं." नचिकेत हसत हसत म्हणाला. 
"दादा, बोटीवरचे किस्से सांग ना काही." समिहाने आग्रह धरला.
"ए, त्याला जेवू देत जरा, मग सांगेल तो किस्से." नचिकेचच्या आईचा दम मिळाल्यावर सगळे गप्प माना खाली घालून जेवू लागले.
     आपला दादा सहा महिन्याने परत येणार आहे ही समिहासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. समिहा आणि तिचा भाऊ नचिकेत यांच्यात इतकं चांगलं बॉंडिंग होतं की कोणतीही गोष्ट समिहा त्याच्याशी शेअर करू शकत होती. अगदी शाळेतला पहिला क्रश पण तिने शेअर केला होता. तसं दोघांमध्ये चार वर्षाचं अंतर पण आदर आणि मैत्री यांचं बरोबर संतुलन साधलेलं आदर्श भाऊ बहिणीचं नातं. कॉलेज आणि गिटार क्लास आटोपुन ती घरी आली तेंव्हा नचिकेत आलेला होता. तिने नेहमीप्रमाणे एक दणका पाठीवर देत त्याचं तिच्या पद्धतीने स्वागत केलं. नचिकेत ने येताना तिच्यासाठो आणलेलं गिफ्ट तिला खूप आवडलं. नंतर  नचिकेत ने सांगितलेली बोटीवरची वर्णनं, तिथले अनुभव ऐकता ऐकता बारा वाजले. "चला ,झोपा आता" अशी आईची आज्ञा आल्यावर सगळे झोपायला गेले.
     समिहाला नचिकेतशी बोलायचं होतं. पण तो नेमका  एकटा सापडत नव्हता. आजोबांच्या मृत्यू हा दिसायला वरकरणी श्वासोश्वास थांबल्यामूळे झालेला दिसत असला तरी त्यांच्या मृत्यूचं कारण वेगळं असावं असं तिला राहूंन राहून वाटत होतं. कारण आजोबा आजारी नव्हते. ते ज्या पहाटे गेले त्या रात्री ते ट्रान्झिस्टर वर काही ऐकत होते. आणि जेंव्हा सकाळो त्यांना उठवायला आजी उठली आणि तिने तिचं मशीन कानाला लावलं तेंव्हा तिला पहिला आवाज ट्रान्झिस्टरच्या खरखरीचा आला होता. हे समिहाला माहिती होतं. त्या ट्रान्झिस्टरचा आणि आजोबांच्या मृत्यूचा काही संबंध असावा असं समिहा ला वाटत होतं. तिच्या या बोलण्याबर कोण विश्वास ठेवणार नाही हे समिहाला पकक ठाऊक होतं. पण नचिकेत नक्की ऐकेल असा तिला विश्वास होता. दुपारी शेवटी तो तिला मोकळा सापडलाच. 
"दादा, एक बोलायचं होत मला." ती हळू आवाजात म्हणाली. 
"बोल ना, काय झालं? " नचिकेत हातातलं पुस्तक बाजूला ठेवत म्हणाला. 
"दादा, आजोबा गेले ते संशयास्पद आहे खूप माझ्यासाठी. त्यांचं जाण असच जाण नव्हतं. त्या रात्री ते ट्रान्झिस्टर वर गाणं ऐकत होते." समिहा ने तिला जे माहीत होतं ते सगळं सांगितलं.
"हं, हे पटायला कठिण आहे पण या जगात अनेक अविश्वसनीय गोष्टी घडू शकतात. आपण आज तो ट्रान्झिस्टर लावून बघूया. मी काल बघितला होता तो आल्या आल्या. पण नंतर चालू करायचा राहून गेला. आता बघूया." अस म्हणून तो उठला. ते दोघे बाहेर आले. समिहाला थोडं बरं वाटत होतं. तीन महिन्यानंतर ती कोणालातरी हे बोलून दाखवत होती. 
    ते दोघे हॉल मष्ये आले. नचिकेत ने ट्रान्झिस्टर हातात घेतला. जरा नीट निरीक्षण केलं आणि त्याने तो चालू केला. खरखर करत तो सुरू झाला. वेगवेगळे चॅनल्स चालू झाले. जवळजवळ तीन महिन्यानंतर कोणीतरी तो चालू केला होता. गाणी वाजत होती. आवाज ऐकून आजी आणि आई दोघी हॉलमध्ये आल्या.
"हा का काढला आता?" आईने बडबड सुरू केली. नचिकेत ने हाताने थांबवलं. समिहा पण ऐकू लागली. कसले तरी कु कु असे आवाज येत होते. हे असलं काही तिने कधीच ऐकलं नव्हतं. तिला काही अर्थ लागत नव्हते, पण मचिकेतच्या चेहऱ्यावर भावनांचे जे बदल होते त्यामुळे काहीतरी वेगळं आहे हे समिहाल कळत होतं. आपल्या बहिणीने सांगितलेल्या गोष्टीवर नचिकेत कधीही अविश्वास दाखवत नसे. तर्क वगैरे गोष्टी असतील तरी त्या थोडावेळ तो बाजूला ठेवायचा. आताही तिने सांगितलेल्या गोष्टोला त्याने उडवून लावलं नव्हतं. त्याची सत्यासत्यता पडताळायला नचिकेतने तो ट्रान्झिस्टर चालू करून ऐकायला सुरुवात केली होती. खरखर करत तो ट्रान्झिस्टर सुरू झाला. वेगवेगळे चॅनल्स नचिकेत फिरवून बघत होता. समिहा सुद्धा बाजूला बसलेली होती. तो आवाज ऐकून त्याची आई आणि आजी पण बाहेर येऊन बसली. गाणी वाजत असताना अचानक ट्रान्झिस्टर ला पुन्हा खरखर सुरू झाली. नचिकेत काही करणार इतक्यात त्यातून कु कु असे आवाज सुरू झाले. हे रेडिओ संदेश होते. नचिकेतला ती भाषा समजत असल्यामुळे तो ताठ बसला.
 "काय झालं रे?" त्याचे चिंतीत आविर्भाव पाहून नचिकेतच्या आईने त्याला  विचारलं. 
"आई, ही मदतीची हाक आहे. पाचशे लोक जहाजावर अडकलेले आहेत. जहाजाच्या इंजिनात बिघाड झालेला आहे. कधीही स्फोट होऊ शकतो अशी स्थिती आहे." तो उठून उभा राहिला. 
" काय रे? त्याच्या आजीने त्याला विचारलं.
 "मला माझ्या सिनियर्स ना कळवायला हवं हे. काही मदत पाठवता येते का पाहू. " नचिकेत ने फोन करायला फोन बाहेर काढला पण नेटवर्क पूर्ण डाउन. रेंजसाठी तो बाहेर आला. बाहेर पूर्ण रेंज होती. त्याने आपल्या सिनियर्स ना फोन केला. पलिकडे कॅप्टन महेश नाडकर्णी नावाचे अधिकार होते. नचिकेतने त्या बोटीबद्दल, तिच्या स्थानाबद्दल, अक्षांश रेखांशब्दल सगळं सांगितलं. 
"मि. नचिकेत. ताबडतोब तो ट्रान्झिस्टर डिसमेंटल करा. नष्ट करा ते यंत्र. किती वेळ झालं हे चालू आहे?" नाडकर्णींचा आवाज गंभीर होता. 
"एक सात आठ मिनिट झाली असतील." नचिकेत म्हणाला. 
"तिथे आजूबाजूला कोणी आहे का?" नाडकर्णी गंभीर पणे बोलत होते. 
"हो, आई बहीण आणि आजी आहेत." नचिकेतने सांगितलं. 
"मि. नचिकेत, ताबडतोब जा तिकडे. त्यांचे प्राण संकटात आहेत. पहिलं ते तोडून टाका आणि. जा." फोन कट झाला होता.
      नचिकेत पळत पळत आत आला. आत मध्ये मोठा स्फोट झाल्यासारखं दृश्य होतं. त्याची आई, आजी, बहीण तिघीही खाली जमिनीवर पडल्या होत्या. ट्रान्झिस्टर आजूनहो वाजत होता. नचिकेतने पुढे जाऊन तो बंद केला. तरीही तो बंद न होता वाजत होता. नचिकेतला अचानक अंगाचा दाह जाणवू लागला. त्याला श्वास घेणं कठीण वाहायला लागलं. कशीबशी तिथे पडलेली एक पक्कड घेऊन त्याने ट्रान्झिस्टरवर वार केला. ट्रान्झिस्टर थांबायला तयार नाही. शेवटी नचिकेत ने ट्रान्झिस्टर उचलला आणि जोरात जमिनीवर आपटला.  त्याचे तुकडे झाले. तो आवाज थांबला. आता कुठे त्याला शांत वाटलं जरा. त्याने त्या दोघींची नाडी गती बघितली. नाडी बंद होती. श्वासही बंद झालेला होता. नचिकेतच्या पायाखालची जमीन सरकायची बाकी होतो. इतक्यात त्याचा फोन वाजला. तेच मघाचं कॅप्टन नाडकर्णी होते. 
"तिथले अपडेट्स?" त्यांनी विचारलं. 
" सर, आई आजी, आणि बहीण बेशुद्ध आहेत श्वास बंद नाडी बंद" कसं बस नचिकेत म्हणाला.
"शेवटी तेच झालं जे व्हायला नको होतं. मि नचिकेत, हा ट्रॅप आहे. हा कोणी कसा चालू केला माहीत नाही. पण ज्या घटनेचा उल्लेख तुम्ही करता किंवा ज्या जहाजाचे अक्षांश रेखांश सांगता, ते सत्तर वर्षांपूर्वी तिथे बुडालेलं आहे. त्या जहाजाचा अत्यंत करुण अंत झालाय. पाचशे साडेपाचशे लोक त्यात मारले गेले. त्यानंतत दोन तीन वर्षापासून या घटना सुरू झाल्या. जबाबदार लोक मेसेज देऊ लागले. पण नंतर आम्हला कळत गेलं की जे हे जहाजकडून आलेले संदेश ऐकत आलेत त्यापैको कोणीही वाचलं माही. अगदी विरळ केसेस. सो मि. नचिकेत. सावरा स्वतःला. पुढचं सगळं आता तुम्हाला बघायचंय. काही लागलं तर नक्की सांगा." एवढं बोलून नाडकर्णीनी फोन ठेऊन दिला. नचिकेत मटकन खाली बसला. काही मिनिटात होत्याच नव्हतं झालं होत. नचिकेत रडत होता आणि बाजूला तो ट्रान्झिस्टर पडला होता. बऱ्याच वेळाने नचिकेत सावरला आणि त्याने लोकांना फोन करायला सुरुवात केली. शेवटी आता सगळं त्यालाच निभावाचं होतं. तो तयारीला लागला.
     नचिकेत बाबत जे झालं त्याला काय स्पष्टीकरण देता येईल हा एक मोठा प्रश्न आहे पण एक सांगता येईल. त्या जहाजाच्या बाबतीत जे काही झालं ती फार करुण घटना होती. अनेक लोकांच्या इच्छा आकांक्षा त्या दाहक अग्नी मध्ये भाजून निघाल्या. तयातून एक तीव्र नकारात्मकता निर्माण झाली. परिणामी विश्व अशांत करू पहाणाऱ्या शक्तींना एक खेळणं मिळालं. ज्याचा उवयोग ते स्वतःची ऊर्जा वाढवण्यासाठी करत आलेले आहेत. नचिकेत बाबत हेच झालं.
      ट्रान्झिस्टर हे फक्त निमित्त झालं. एक द्वार ज्यांतून प्रवेश केला आणि हवी असलेली गोष्ट मिळवली. हा ट्रॅप किंवा सापळा काही विशिष्ट वेळी उघडत असतो. उद्या वेळ काहीही असू शकेल. उद्या निमित्त काहीही असू शकेल. आपण सगळे सध्या घरो आहोत. आपण करमणूक मोबाईल मधून एफ एम लागू शकतो. चुकूनही असं काही ऐकू आलं तर मोबाईल पासून लांब दूर जा. कारण जीव महत्वाचा. कोणी सांगावं तो ट्रॅप उघडला असेल तर.
 
अभिषेक अरविंद दळवी 
 (धारप पंथी)  ✍️

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...