शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

884. आदिशक्ती परमेश्वर

     एकदा एका अत्यंत श्रीमंत इस्रायली माणसाची टीव्हीवर मुलाखत घेण्यात आली. मुलाखती दरम्यान त्यांना विचारण्यात आले की, "त्याच्या आयुष्यात अशी कोणतीही घटना घडली आहे का ज्यामुळे त्याला आश्चर्य वाटले?" ते म्हणाले, "होय," एकदा मी भारतातील अयोध्येच्या रस्त्यांवर फिरत असताना अचानक मला एका इस्पितळाच्या बाहेर झाडाखाली बसलेला एक माणूस दिसला, हात जोडून डोळे मिटले होते. पण त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते आणि तो प्रार्थनेत पूर्णपणे गढून गेला होता. त्याची प्रार्थना पूर्ण होण्याची मी धीराने वाट पाहत राहिलो. मग मी त्याला विचारले की तूम्ही इतके अस्वस्थ आणि दुःखी का आहात? त्याने सांगितले की त्याला पत्नीच्या ऑपरेशनसाठी तातडीने 1 लाख रुपयांची गरज आहे, अन्यथा ती मरेल मी विचारले तुम्ही देवाकडे मदत मागत होतात का? तो म्हणाला, हो, मी फक्त माझ्या देवाची प्रार्थना करत होतो. योगायोगाने माझ्याकडे त्यावेळी खूप पैसा होता. म्हणून मी त्याला एक लाख रुपये दिले. त्याने लगेच डोळे मिटले आणि मान वाकवून देवाचे आभार मानले आणि त्यांनी केलेल्या मदतीबद्दल माझे आभारही मानले. त्याच्या हावभावाने मी खूप प्रभावित झालो आणि मी त्याला माझे कार्ड दिले, ज्यावर माझा वैयक्तिक फोन नंबर आणि वैयक्तिक ईमेल लिहिलेला होता. मी त्यांना म्हणालो, "कधीही तुला आणखी कशाची गरज असेल, तू फक्त मला फोन करा तुमच्याकडे मदत येईल."
पण त्याने माझे कार्ड आणि प्रस्ताव दोन्ही नाकारले.
अब्जाधीश म्हणाले, "त्याने सांगितलेले कारण ऐकून माझे आयुष्य बदलले"
तो म्हणाला, मला तुमचा वैयक्तिक फोन नंबर आणि ईमेल पत्ता दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण जेव्हा जेव्हा मला कशाचीही गरज असेल तेव्हा मी तुम्हाला बोलावणार नाही तर माझ्या हृदयात बसलेल्या माझ्या रामाला, ज्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे. त्याच्या राम आणि गुरूवरच्या गाढ श्रद्धेने क्षणात माझ्या अहंकाराचे तुकडे केले. कोणत्यातरी शक्तीने मला तिथं आणलं असा विचार करायला भाग पाडलं आणि त्याला मदत करून मला खूप आनंद झाला, तेव्हापासून जेव्हा मी कोणाला मदत करतो, तेव्हा मी लगेच त्या देवाचे आभार मानतो ज्याने मला यासाठी पात्र मानले.
 
 बोध
आपण सुद्धा आपल्या भगवंताच्या आणि गुरूच्या प्रेमाशी जोडून, ​​भजन, कीर्तन, नामस्मरण आणि सेवा करून आपले जीवन जगले तर जीवनातील प्रत्येक कठीण क्षणात देव आणि गुरु आपल्या पाठीशी उभे आपल्याला संकटातून बाहेर काढतील. .

883. अदृश्‍य पेरू

    एका सात वर्षाच्‍या मुलीला एक शिक्षक गणित शिकवित होते. त्‍यांनी तिला प्रश्‍न विचारला,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' 
मुलीने काही काळ विचार केला आणि बोटे मोजत उत्तर दिले,'' चार पेरू'' 
शिक्षक आश्‍चर्यचकित झाले, त्‍यांना वाटले की मुलीने नीट ऐकले नसावे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न पुन्‍हा विचारला,'' बाळा प्रश्‍न नीट ऐक,'' 
समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' 
मुलगी शिक्षकांच्‍या आश्‍चर्यचकित चेह-याकडे पाहत विचार करू लागली मगाशी मी चार उत्तर दिले तर शिक्षक आश्‍चर्यात पडले आता असे काय उत्तर द्यावे जेणेकरून ते खुश होतील. तिच्‍या डोक्‍यात असा विचार जरा सुद्धा स्‍पर्शून गेला नाही की खरे उत्तर द्यावे तिला फक्त असे वाटत होते आपल्‍या उत्तराने शिक्षक खुश झाले पाहिजेत.
ती पुन्‍हा बोटे मोजू लागली व तिने उत्तर दिले, '' सर चार पेरू माझ्याकडे असतील.'' 
आता शिक्षक निराश झाले व विचार करू लागले की या मुलीला बहुधा पेरू आवडत नसावेत म्‍हणून ती चुकीचे उत्तर देत आहे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न बदलून विचारायचे ठरवले .
बाळा समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि मग पुन्‍हा एक चिकू दिला तर तुझ्यापाशी किती चिकू होतील?'' 
मुलीने परत बोटे मोजली व उत्तर दिले,'' सर तीन चिकू असतील माझ्याकडे''
शिक्षकांना याची मोठी गंमत वाटली कि तीन वेळेला चुकीचे उत्तर देणारी मुलगी चौथ्‍या वेळेला कशी काय बरोबर उत्तर देते.
त्‍यांना वाटले की आता या मुलीला गणिताची गंमत कळाली.
म्‍हणून त्‍यांनी परत आपला पहिलाच प्रश्‍न रिपीट केला,''समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' 
मागच्‍या वेळचे उत्तर बरोबर आल्‍याने मुलीचा आत्‍मविश्‍वास आता वाढला होता तिने फारसा वेळ न दवडता उत्तर दिले,'' सर माझ्याकडे चार पेरू असतील''
हे चुकीचे उत्तर ऐकून शिक्षक संतापले व तिच्‍या दिशेने जात जोरात ओरडले,'' तुला काही डोक्‍याचा भाग वगैरे आहे की नाही, जरा मला पण सांग की चार पेरू कसे काय होतील तुझ्याकडे''.
सरांना असे रागावलेले पाहून ती छोटीसी मुलगी रडू लागली, डोळ्यातून अश्रुंच्‍या धारा वाहत असतानाच ती मुलगी दप्‍तर शोधू लागली, दप्‍तरात हात घालून तीने दप्‍तरातील एक पेरू काढून शिक्षकांना म्‍हणाली,'' सर तुम्‍ही मला तीन पेरू देणार आहात आणि माझ्याकडचा एक पेरू मी त्‍यात मिसळला तर त्‍यामुळे सर मी चार पेरू हे उत्तर देत होते.''
    बहुतांशी असेच घडते. ब-याचदा, समोरच्‍याकडून जर अनुकुल प्रतिसाद आला नाही तर आपण आपला संयम गमावून बसतो पण त्‍याची बाजू काय आहे हे आपण कधीच समजून घेत नाही. त्‍याचा त्‍यापाठीमागील तर्क, त्‍यावेळची परिस्थिती, तो ज्‍या संस्‍कृतीमध्‍ये वाढला आहे त्‍याचे संस्‍कार याचा आपण कधीच विचार करत नाही ना.  जर आपल्‍या मनासारखा प्रतिसाद समोरच्‍याकडून आला नाही तर त्‍याचीही कृपया बाजू समजून घ्‍या. काय सांगावे त्‍याच्‍याजवळ असणारा तो छुपा पेरू आपल्‍याला दिसतही नसेल कदाचित.

'शब्दगंध'

882. अर्धा ग्लास पाणी

         हे फक्त पुण्यातच घडत अस समजुन दुर्लक्ष करु नका. आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलेलो. विषय अर्थातच पाण्याचा होता, गप्पा चालू होत्या, विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक observe करत होतो, अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते. गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही. आमच्याही टेबल वर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे. मनाला काहीतरी खटकत होतं. मिटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेल मध्ये घुसलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा मॅनेजर होता त्याला भेटलो. म्हटलं हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्ध ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं? तो म्हटला ज्या वेटरने टेबल क्लिअर केला असेल त्याने ते पाणी बेसिन मधे ओतून दिलं असणार, तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.
    म्हटलं विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील? तो म्हटला नाही म्हटलं तरी 15 ते 20 जण सरासरी. दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त. म्हटलं. म्हणजे 10 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं तर साधारण सरासरी 250 जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार. म्हणजे सरासरी रोज 350 जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं तर अंदाजे 100 लिटर पाणी बेसिन मधे "रोज वाया". म्हणजे एक हॉटेल कमीतकमी 100 लिटर "अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी" बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेज मधून जाऊन शेवटी नदीच्या इतर 'घाण' पाण्यात मिसळतं. पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून 6000 च्या वर हॉटेल्स आहेत.  म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर,  म्हणजे 6 लाख लिटर प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला. हे झालं एका दिवसाचं , असं आठवड्याचं म्हटलं तर 42 लाख लिटर अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय. या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच. हे एका शहराचं, अशी महाराष्ट्रात कमीत कमी 15 मोठी शहरं आहेत . मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वगैरे वगैरे कित्येक.
       बर हे कोणत्या देशात, कोणत्या राज्यात घडतंय?? तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार जर 4 तासाला एक जण 'शुद्ध पाण्याअभावी' होणाऱ्या डायरिया सारख्या रोगाने मरतोय त्या राज्या देशात. म्हणजे एका बाजूला लोक पाण्यावाचून तडपून मरतायत अन दुसऱ्या बाजूला एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय. बर हे पाणी येतं कुठून तर आपल्या आसपासच्या dams मधून. पुण्याच्या आसपास 7 dams आहेत, पुण्याला दरवर्षी साधारण 13 tmc पाणी लागतं, अन यावर्षी उपलब्ध पाणी आहे 17 tmc,  उरलेलं 4 tmc पाणी शेतीला. यावर्षी मात्र पाऊस कमी झाल्याने अन पुण्याची लोकसंख्या सतत वाढत असल्याने शेवटी राज्य सरकारने आदेश दिलेत की 17 tmc पाणी हे पुण्याला देण्यात यावं  म्हणजे शेतीला उन्हाळी अवर्तनासाठी पाणी जवळ-जवळ नाहीच!!. म्हणजे आपण जे वाया घालवतोय ते या शेतकऱयांच्या हक्काचं पाणी आहे. "उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय". हा क्रूर विरोधाभास आहे! पण हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या "दोन" शब्दांनी.. मोजून दोन. इथून पुढं कधीही वेटर समोर तुमच्या ग्लास मधे पाणी ओतत असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा ... अर्धा ग्लास!!  याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल, हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे "आपलंच..!!" फार छोटी गोष्टय,  फक्त दोन शब्द उच्चारायचेत पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात. 
     लक्षात ठेवा ज्या प्रगत मानवजातीने, सेकंदाच्या दहाव्या भागाच्या प्रिसीजनने परग्रहावर माणूस यशस्वी उतरवलाय, त्याच मानवजातीला अजून पर्यंत 'पाणी' मात्र निर्माण करता आलेलं नाहीये. मग आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी की... तेही आपल्याच माणसांसाठी. सो इथून पुढं हॉटेल मधे असलो की, अर्धा ग्लास पाणी.

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

878. पालवी प्रेमाची

     वैभवीने आपल्या  गाण्याच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आवर्जून शंतनूला दिलं.  विमनस्कतेनेच शंतनूने तिच्या हाथातून पत्रिका घेतली आणी काही न बोलताच तो तिथून निघाला. आज गाडी गॅरेज मधे होती. त्यामुळे रिक्षा किंवा बसमधून घरी न जाता  पाईच जाण्याचं ठरवलं त्यानीं.
      घरी  पोचायची घाई देखील नव्हती त्याला. कोण वाट पाहतय घरी आपली? पूजा होती तोपर्यंत. पूजाची आठवण येताच तो जागच्या जागी थांबला. मनात एक कळ उठली आणी सारं जगच स्थब्ध झाल्यासारखं वाटलं त्याला. डोळ्यातून वाहणारे अश्रू घामाच्या ओघळात मिसळून गेले असले.  त्याचे हाथ आपोआप ते अश्रू पुसण्यास सरसावले. जड झालेल्या पाऊलानां निर्धाराने उचलत तो परत चालू लागला. त्याचं जग जरी काही क्षणांसाठी थांबलं असलं तरिही त्याच्या आसपासचं जग अव्याहत पणे धावत होतं.  रसत्याच्या कडेला  फुलं गजरे विकणार्यांची गर्दी लागली होती. मोगरा, चाफा, गुलाब, जुईच्या फुलांचा सुगंध आज तरी त्याला खिळवू शकला नाही. नेहमी पूजा साठी चाफ्याची फुलं घेणारा शंतनु आज त्या फुलांकडे दुर्लक्ष करून संपूर्ण विखुरलेल्या अवस्थेत चालत जाताना बघून पाणी मारून मारून टवटवीत झालेली फुलं देखील काही क्षण कोमेजली. घरी येताच आमंत्रण पत्रिका सोफ्यावर फेकुन शंतनू खोलीत जाऊन आडवा झाला. झोपण्याचा प्रयत्न विफल होणार आहे हे माहीत होतं त्याला. तसही हल्ली झोपूया म्हण्टलं तरी लगेच झोप तरी कुठे येत होती.  पटकन कुशीत येणारी पूजा गेल्यापासून झोपेनी पाठ फिरवलीये. 
सदैव आपल्या पाठीपुढे करणारी, आपल्या आवडीनिवडी जपणारी, आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी पूजा. कित्ती विश्वास होता आपल्याला की आपण दोघे कधीच एकमेकांपासून दूर होणार नाही ह्याचा.  दोघे एकमेकांमधे एवढे एकरूप झालो होतो की मृत्यू आपल्याला एकदुसऱ्या पासून दूर  करेल हा विचारच मनाला शिवला नव्हता. कित्ती गाफील होतो आपण. पूजा हेच आपलं  जग होतं. पण दैव पण विचित्रच असतं. . जिथे गाफील तिथे मार बसलाच म्हणून समजायचं. असाच मार पूजाला माझ्यापासून लांब नेत क्रूर नियतीने आपल्याला दिला. विचार करता करताच अनावर झालेल्या अश्रूनीं त्याची उशी चिंब भिजवली. काळोख्या खोलीत शंतनूचं मन पण अंधारून गेलं. वैभवीने आपल्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू केली होती. शंतनूने ऑफीसमधे पाऊल ठेवलं आणी त्याच्या लक्षात आलं की ऑफीसचं वातावरण वैभवीमय होऊन गेलय. सकाळी घरून निघताना मुद्दामच त्यानीं सोफ्यावर ठेवलेल्या पत्रीकेकडे दुर्लक्ष केलं होतं. तो चुपचाप आपल्या केबिनमधे जाऊन बसला. कामात काही मन लागत नव्हतं.  चार वर्ष झाली पूजाला जाऊन पण तिच्या आठवणीने मन आजून भिजतं.  पूजा गेल्यापासून इतकी विरक्ती आलीये की  कोणाशीच कसलही नातं नकोस झालय. लग्न झालेल्या वर्षातच झालेला तिच्या मृत्यूनं मन जणू मरून गेलय. निर्लिप्त झालय  असं वाटलं त्याला. पूजाच्या अशा अचानक जाण्याने फक्त तोच नाही घरचे सगळेच हवालदिल झाले होते. शंतनूचं वय पाहता त्याला परत लग्न करण्याच आग्रह घरच्यांकडून होत होता. पण   त्याने लग्नाचा सल्ला धुडकावून लावला.  पण त्याचं  विरक्त मन हल्ली वेगळ्या दुनियेत पाय ठेवायला पाहतय असं त्याला राहून राहून वाटत होतं. आपण नाकारू पाहत असलेली प्रेमभावना परत ह्याच मनात रुजू पाहतीये ही कल्पनाच त्याला कासावीस करत होती.
     वैराग्य पांघरून बसलेल्या मनात परत हिरवी पालवी अंकूरित होताना जाणवत होती. हेच त्याला नकोसं वाटत होतं.  वैभवीचं ऑफीसमधे येणं तिचं खळखळून हासणं. प्रत्येक गोष्टीत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनाचा भरभरून आनंद घेत राहणं हे तिच्या बाबतीत सगळं कसं एकदम नैसर्गिक होतं. तिच्या वागण्यात कुठेच आव आणलेला दिसत नव्हता. जगायचं तर खुल के कुठेही हातच न राखता जगयचं ही तिची पॉलिसी. ऑफीसमधली बरीचशी मुलं तिच्या पाठी तिला इंप्रेस करण्यात  दंग असतानाच ती मात्र हळूच शंतनूच्या मनात जागा शोधत होती. शंतनूसाठी वैभवी म्हणजे गरम तुपाचा घास. गिळू शकत नाही आणी थुकूपण शकत नाही. त्याला जाणवत होतं की वैभवी आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेय म्हणून त्याने तिला निग्रहाने लांबच ठेवलं होतं. आजही बसल्याबसल्या त्याला मागच्या वर्षीचा वॉलंटाईन डे आठवला. ऑफीस मधे डिबेट कांपिटीशन होतं. विषय होता  "प्रेम मनाला उभारी देतं" ऑफीसचा सगळा स्टाफ भाग घेण्यासाठी शंतनूच्या पाठी लागला होता. पण शंतनूने सरळ नाही म्हणजे नाही सांगितलं. हे असलं डिबेट म्हणजे पोरखेळ वाटत होता त्याला. वैभवी भाग घेणार आहे, म्हणटल्यावर तिच्यावर जीव टाकणाऱ्या ऑफीसमधल्या पोरानी हिरीरीने भाग घेतला. त्यादिवशी काहीतरी कारण सांगून ऑफिसमधून लवकर निघायचं असं शंतनूनी ठरवलं. पण नेमकी काही फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटींग निघाल्याने तो अडकला. मीटींग संपवून निघणार एवड्यात त्याचे वरचे बॉस प्रधानानीं त्याला आडवलं आणि डिबेट कांपिटेशन ला घेऊन गेले. चारपाच जणांचं बोलणं ऐकल्यानंतर शंतनूची चुळबुळ सुरू झाली होती. प्रधान सर त्याच्या कानात काहीतरी सांगत होते पण त्याच्या काही डोक्यात जात नव्हतं. तेवढ्यात वैभवीचं नाव अनाऊंस झालं. तिने माईक ताब्यात घेताच त्या खोलीत एक जादूई वातावरण तयार झालं. नकळत शंतनूचं मन पण शांत झाल्यासारखं झालं. पाच मिनिटांपुर्वी तिथून उठून जायच्या मनस्थितीत असलेला शंतनू आता स्थिर झाला होता. आपल्यातला हा बदलस्वीकारताना काही क्षण त्यालाही जड गेले. पण त्यावर विचार करायला वेळ नव्हता कारण वैभवीने आपलं मत मांडायला सुरूवात केली होती.
      मित्रानों,  प्रेम ही प्रत्येक जिवाची सुंदर भावना आहे. भावना कधीच आपल्याला दिसत नसतात. त्याकरता व्यक्त व्हावं लागतं.  जसं राग व्यक्त करतो, द्वेश व्यक्त करतो, तसं प्रेम पण व्यक्त केल्यावरच समोरच्याला ते दिसतं.  प्रेम हे जगातलं एकमेव असं अस्त्र आहे, ज्याने आपण आपल्या शत्रूलाही जिंकू शकतो.  प्रेम ही नैसर्गीक भावना असल्याकारणाने त्याला फक्त आपल्या मनातच लपवून ठेवण्याची गरज नाहीये. जेवढी वाटाल तेवढी ती वाढते. व्यक्त व्हाल तेवढी मनाला शांतता मिळते. जर तुम्ही  प्रेम व्यक्त करू शकत नसाल, तर कोणती अडचण तुम्हाला तसं करण्यापासून रोखते आहे ह्याचा आधी विचार करा. कारण कोणाताही नार्मल माणूस आपलं प्रेम व्यक्त केल्याशिवाय शांत राहूच शकत नाही. आपण सोडवू शकत नाही अशी जगात  कोणतीच अडचण नाहीये. दुखः प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. अंधार प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पण त्या दुखाच्या पलीकडे सुख  वाट पाहत असतं. त्या अंधारातून बाहेर याल, तर एक दिव्य असा उजेड तुमचं आयुष्य उजळायला वाट पाहात असतो. फक्त सकारात्मक विचाराची गरज आहे. माणसाला प्रेम एकदाच होतं असं काहीसं मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकते. ते ऐकून ऐकून बरेच जणं त्या वाक्याला आपलं आदर्श वाक्य मानतात आणी त्यालाच कवटाळून सगळं आयुष्य कुढत काढतात. प्रत्येक जिवाचं मन प्रेमाला आसूसलेलं असतं. जन्मभर ते खऱ्या  प्रेमाचा शोध घेत फिरत असतं. त्याला खरं प्रेम मिळालं तर त्याचं आयुष्य सफल होतं. पण त्या शोधात  तो असफल झाला तर त्याला वैराग्य येतं. नैराश्येचा अंधार मनात दाटून येतो.  पण खरं सांगू का ते खरं वैराग्य नसतं. वैराग्य पाहीजे म्हणून मिळतं नाही. त्यासाठी प्रचंड तपस्या करावी लागते. हे आपलं फक्त तात्पुरतं वैराग्य असतं. काही वर्षानं मन परत उभारी घेतं नवीन प्रेमाच्या शोधात. आता मी जे काही बोलणार आहे ते समजण्यास तुम्ही सर्व सूज्ञ आहात. कदाचीत आपलं मन काहीकाळ वैराग्यात नैराश्येच्या खोल गर्तेत गटांगळ्या खात राहत. फक्त मानाचं जरासं ऐकलं तर प्रश्न चुटकी सरशी सोडवला जाऊ शकतो. प्रेमाची छोटिशी आशा जग जिंकायची ताकत देऊन जाते.  जगायची उभारी येते. मग का नाकारायचं त्या प्रेमाला? फक्त काही कारणानीं मनावर जमलेली धूळ बाजूला सारली की लक्ख उजेडाची वाट दिसू लागते आणी एका आशेनी मन परत उभारी घेतचं. मनाचे खेळ इतके विचित्र असतात की ते कधीच प्रदीर्घ नैराश्येत राहायला बघत नाही. काही काळानी ते स्वतः दुःखातून  बाहेर पडतच पडतं असा विश्वास आहे मला. शेवटी चार ओळींची कविता वाचून मी माझं बोलणं संपवते.
मन तुझे अथांग सागर
मिळतील तुला प्रेमाची
रत्ने त्यात भरपूर.
तुझाच शोध नव्याने होइल
मिळेल तुला नवी  प्रीत         
हीच जगाची रीत.
हीच जगाची रीत.
धन्यवाद.
     टाळ्यांचा कडकडाटानीं ती खोली भरून गेली. शंतनू काही क्षण स्थब्द झाला. त्याचे विचारच खुंटले. प्रधानानीं वैभवीला विजेती घोषित केलं आणी तिला बक्षीस देण्यासाठी शंतनूला उभे केलं. वैभवी आणि तिचे विचार डोक्यात आले की मग तो बेचैन व्हायचा. तिचे विचार ठीक आहेत, पण तिला मनात थारा नाही द्यायचा तिला हे पक्क ठरवून टाकलं त्यानीं. पण काही म्हणा निसर्ग आपलं काम करतच राहतो. वैभवीने हळूहळू त्याच्या मनाचा ताबा  कधी  घेतला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. काही महिन्यांपासून आपल्या ऑफीसच्या कॉबिन मधे नवा बदल पाहत होता तो. आफीसच्या आपल्या केबीन मधे शिरलं की पहिल्यापेक्षा प्रसन्न वाटायचं त्याला. रोज त्याच्या टेबलवरच्या फुलदाणीत सुगंधी फुलं असायची ज्याने त्याचं मन प्रसन्न होई. एयर परफ्यूमचा सुगंध हल्ली वेगळा वाटत होता पण कुणालाच त्याबद्दल त्यानी विचारलं नव्हतं. प्रधान त्यांचे नवीन बॉस होऊन आल्यापासून असे बदल झाले असतील असा कयास त्यानीं बांधला. पण काही महिन्यातच त्याला कळलं की संपूर्ण ऑफीस नाही तर फक्त त्याचीच कॉबीन सुगंधित असते आणी ते श्रेय फक्त वैभवीला जात होतं. हे ऐकून आतून कुठेतरी तो सुखावला पण नको तिथे आपणगुंततोय, ही भिती देखील त्याला वाटत होती. आज ऑफीस मधे बसून हे सगळं त्याला आठवलं. त्याने टेबलावर पाहीलं तर फुलदाणीत नवीन टवटवीत फुलं होती. हळूच त्याने त्या फुलांवरून हाथ फिरवला आणि त्याचं मन फुललं. वैभवी समोर उभी राहून हासतेय असा भास झाला त्याला. अरे मी तर विरक्तीच्या मार्गावर होतो ना? मग हे प्रेमाचे दालन कसे काय माझ्या साठी खुलं झालं? ह्याचा उलगडा त्याला होईना. कालचं त्याने ऐकलेलं संगीत मतस्यगंधा मधलं पद त्याल आठवलं आणी आपलिही आवस्था त्या राजा शंतनूसारखी झालीये का असं काहीसं वाटलं.
देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम 
कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम
मी निष्कांचन निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक 
हिमालयाचा मी तो यात्रिक 
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम
     तशाच बेचैन अवस्थेत त्याने काम संपवलं आणि घरी जायला निघाला. सहज त्याची नजर वैभवीच्या केबीन कडे वळली. वैभवी शेवटची आवरा आवर करताना दिसली. उद्या मी तुमच्या कार्यक्रमाला येत नाही असं तिला सांगावं असं फार वाटलं त्याला पण काहीच न बोलता तो तिथून निघाला. गाडीत बसला आणि परत मन संगीत मत्स्यगंधाचं पद घोळवत होतं. गंगा शंतनूला सोडून गेल्यानंतर शंतनूचं पण मन काही काळासाठी विरक्त झालच होतं ना? पण सत्यवतीला पाहिल्यानंतर तेच विरक्त मन परत उभारी घेतंच की. म्हणजे ही विरक्ती क्षणीक असते का? प्रेमाचा एक धागा पुरेसा असतो त्याला विरक्ती मधून बाहेर काढायला. हे सगळं थोडफार त्याला पटायला लागलं असलं तरिही पूजाच्या प्रेमाशी कुठेतरी प्रतारणा करतोय असं वाटून मन परत पाठी फिरत  होतं. दुसरे दिवशी त्याने ऑफीसला सुट्टी टाकली घरीच आराम केला आणि  संध्याकाळी तो सरळ वैभवीच्या कार्यक्रमाला हजर राहीला. वैभवीचं प्रत्येक गाणं त्याच्या मनाचा ठाव घेत होतं. तो फक्त डोळे मिटून गाणं आपल्या मनात उतरवून घेत होता. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यानीं तिचं आणि श्रोत्यांचं आवडतं सरस्वती चंद्र सिनेमातलं गाणं म्हणायचा आग्रह केला. ती फार थकली होती पण श्रोत्यानां नाराज करु शकत नव्हती म्हणून त्या गाण्याचं एकच कडवं म्हणेन असं स्पष्ट्पणे सांगीतलं. शंतनूने परत डोळे मिटले. तिचा आवाज ते शब्द मनातुन पार आत शिरत होते. 
कितनी हसरत से तकतीहै कलीयां तुम्हे क्यों बहारों को फिरसे बुलाते नही
एक दुनिया उजडही गई है तो क्या दूसरा तुम जहां क्यों बसाते नही. 
दिल ना चाहे भी तो साथ संसार मे चलना पडता है सबकी ख़ुशी के लिये ।
टाळ्यांच्या गडगडाटात शंतनूचं मन संपूर्णपणे साफ आणि हलकं झालं. मनातला अंधार दूर झाला. आणि  एक दिव्य असा प्रकाश आत येताना जाणवत होता. डोळे उघडावेसे वाटत नव्हते त्याला पण एका नाजूकशा स्पर्षाने त्याने डोळे उघडले. वैभवी त्याच्या समोर उभी होती. त्याने आपसूक पुढे केलेल्या हाथात वैभवीचा हाथ विसावला होता. त्या स्पर्षाने दोघांचे डोळे लक्ख चमकले.

@©  अक्षता देशपांडे.

879. गंध

    अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया. धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे. वाचा गंध लावण्याचे फायदे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?'  त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून.' मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे.  त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 
     'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत. या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे, गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात. गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे, गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही, आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत, हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते.  गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे.
    पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते. तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजयतिलक म्हटले जात असे. त्यालादेखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते. अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंत:पुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे

880. श्रीराम आणि श्रीकृष्ण

तसे पाहिल्यास 
"श्रीराम " आणि " श्रीकृष्ण "
 हे  दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत.
एकाने "अयोध्या ते रामेश्वर" पर्यंतचा तर दुसऱ्याने "द्वारका ते आसाम" पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत. गेली हजारो वर्षे ह्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.
तस तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे नाही कां?.
एकाने जन्म घेतला तो  रणरणत्या उन्हात आणि तो ही भरदुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तो  ही मध्यरात्री. 
एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात.
साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिनीच.
एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना.
शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे  हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते. 
ज्यांच्यामुळे यांच्या चारीत्र्याला वेगळे वळण लागले त्यादोघी म्हणजे  कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या.
ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्यां दोघांनी ही आनंदाने स्वीकारले.
एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य मिळवून दिले. तर दुसऱ्याने युधिष्ठिराला
एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.
एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर मानले नाही. तर दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही.
एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले. तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.
एकाने अंगदाकरवी शिष्टाई करुन तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.
एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली. तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.
एकाने झाडामागुन बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली. तर दुसऱ्याने झाडामागुन बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला.
पहिला  Theory.... आहे. तर...दुसरा Practical  आहे.
दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तीरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ह्या देशापुढे  "दीपस्तंभ" बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच रहातील.

    जय श्रीराम / जय श्रीकृष्ण

881. कर्माचे फळ भोगावेच लागते

       तो अत्यंत यशस्वी राजा होता. तो त्याच्या सर्व कामात सर्वोत्कृष्ट होता. त्याने लोकांची खूप काळजी घेतली, त्यांना कधीही कशासाठी त्रास दिला नाही, तो धार्मिक आणि दयाळू होता. त्यांची एक सवय अशी होती की आठवड्यातून एकदा गोठ्याची साफसफाई आणि गायींना आंघोळ घालण्याचे काम ते स्वतः करायचे. एकदा ते गोठ्यात आपल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात एक साधू भिक्षा मागण्यासाठी गोठ्यात पर्यंत आले, त्यांनी राजाकडे भिक्षा मागितली, राजा ध्यान करत असताना साफसफाई करण्यात मग्न होता, कदाचित तो थोडासा चिडला असावा.
त्याने ते दोन्ही हातांनी शेण  उचलले आणि शेण ऋषीच्या पिशवीत टाकले. ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले. काही वेळाने राजाला आपली चूक कळली. राजाने ऋषीचा शोध घेण्यासाठी सैनिक पाठवले पण तो साधु सापडले नाही. यानंतर किती वेळ गेला कळले नाही, एकदा राजा शिकारीसाठी जंगलात गेले होते,राजा खूप थकला तेव्हा तो पाण्याच्या शोधात भटकत एका झोपडी  बाहेर पोहोचले. त्याने झोपडीच्या आत डोकावले तेव्हा त्याला दिसले की एक साधू ध्यानात मग्न बसले होते, त्याच्या जवळ शेणाचा मोठा ढीग होता. राजा आश्चर्यचकित आणि चिंताग्रस्त झाला आणि विचार करू लागला की साधूचा चेहरा किती तेजस्वी आहे, परंतु इथे  शेणची रास का आहे. राजा ऋषीकडे जवळ गेले, त्यांना नमस्कार केला, पाणी मागितले आणि प्यायले आणि ऋषींना विचारले, तुमची हरकत नसेल तर मला कळेल का, तुमच्या चेहऱ्यावरची चमक सांगते की तुम्ही संन्यासी आहात, मग तुमची झोपडी इतकी घाण का आहे, ऋषी म्हणाले, राजन, आपण आयुष्यात जे काही जाणूनबुजून किंवा नकळत करतो, ते चांगले किंवा वाईट करतो. ते आपल्याला या जन्मात किंवा पुढच्या जन्मात अनेक पटीने मिळते. हे शेणही एका दयाळू व्यक्तीने दान केले आहे. झोळीतले शेण पाहून इतर लोकांनीही शेण झोळीत टाकले होते. राजाला धक्का बसला आणि त्याला अनेक वर्षांपूर्वीची घटना आठवली.
राजाने ऋषींची क्षमा मागितली आणि प्रायश्चित्ताचा मार्ग मागितला. ऋषी म्हणाले, "हे राजा, तुला हे शेण खाऊन संपवावे लागेल, एकतर जाळून राख करा किंवा थोडे थोडे खाऊन संपवा."
राजा म्हणाला, "साधू महाराज, कृपया मला दुसरा उपाय सांगा, कारण थोडे थोडे खाऊन पूर्ण व्हायला बरीच वर्षे लागतील." ऋषी म्हणाले, "हे राजा, यापुढे तूम्ही काही उपाय करू शकणार नाहीस.राजा अडला तेव्हा साधू म्हणाले राजन काही अस कार्य करा जेणेकरून तुमची चारही बाजूंनी" बदनाम होईल.
याने या जन्मी तुमच्या कामाचा काही भार नक्कीच कमी होईल. राजा राजवाड्यात गेला, खूप विचार करून, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने राज्यातील सर्वात सुंदर वेश्येला बोलावले, ती चांगली कपडे घालून आली, राजाने त्या वेश्येला घेतले. तो रथावर बसून संपूर्ण राज्याचा दौरा करण्यासाठी निघाले.
ज्याने राजाला वेश्येसोबत पाहिले तो चकित झाला आणि थुं थुं करु लागला. लोक म्हणू लागले की राजाला बुद्धी खराब झाली आहे.
राजाने अनेक महिने असे केले, बरेच दिवस इकडे तिकडे फिरल्यानंतर राजा शेणाचा ढीग पाहण्यासाठी आले तेव्हा त्याला दिसले की आता फक्त तेवढेच शेण शिल्लक आहे जे त्याने ऋषींना दिले होते आणि तेही अजून बरेच दिवस. . एकाच प्रकारची कामे करूनही ते संपत नव्हते.
अचानक एके दिवशी ऋषी राजवाड्यात आले आणि राजाला म्हणाले, राजा, हे मूळ आहे, की ते खाऊन तुम्हाला संपवावे लागेल, राजाने त्या शेणाचे राखेत रूपांतर केले आणि ते खाऊन संपवले.

876. सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो "सावधान"...!

     साधारण ८-१० दिवसांपूर्वीची घटना आहे ही. माझी आई, भाऊ, त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे 2 मित्र अणदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून सोलापूरकडे येत असताना, भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ईटकळ गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने 1 किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना, एक उंच, काळाकुट्ट, भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध हातामध्ये भला मोठा जाड राॅड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला. गाडी भाऊ ड्राईव्ह करत होता. त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली. त्याला लक्षात आले की हा माणुस आता आपल्याला अडवून लूटमार करणार. तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला होता. पण नविन kia seltos च्या ADAS फीचर्सच्या Auto Emergency Breaks या नवीन फीचरमुळे ती व्यक्ति समोर आल्यामुळे अचानक जोरात break लागून गाडी जागेवर थांबली. गाडीचा स्पिड खुप जास्त होता तेवढ्याच जास्त स्पिड मध्ये गाडी जागेवर थांबली. त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला, आईला वगैरे थोडा मार लागला. लागलीच तो दरोडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला. आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलवले. 
      लगेच शेतामध्ये लपलेले ६-७ दरोडेखोर हातामध्ये चाकू, कुऱ्हाड, तलवारी आणि राॅडसारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले. मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर माझी आई बसली होती. तिथे तिच्या साईडला काचेवरती त्यांनी टाकला. पण काच फुटली नाही. त्यामुळे ते आणखी जास्तच चवताळले. त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारण 1 किलोमीटर पर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथे नव्हते. मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेकडे निघालेलो होतो. पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारे एक ट्रक ही असाच दरोडा टाकून त्यांनी उभा केला होता. आणि त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती. आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा, गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोरजोरात धमकाऊ लागला. आजूबाजूने हल्लेखोर चाकू, कोयता, कुऱ्हाडी आणि काठ्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते. गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले होते. तेवढ्यात एकाने पाठीमागे जाऊन मागची काच फोडली. त्याच क्षणी समोर असलेला दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी माझ्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली. आणि कसेबसे सर्वांचे प्राण वाचवले. या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हादरून गेलो आहे.     
     एकतर नविन kia seltos च्या ADAS फीचर्सचा Auto Emergency Breaks हे फीचर आपल्या सुरक्षेसाठी असेल यामुळे अपघात टाळू शकतो अस वाटल, मात्र या घटनेमुळे या फीचर्समुळे किती मोठ्या संकटात सापडू शकतो, किती भयानक किंमत यामुळे मोजावी लागली असती कल्पनाच न केलेली बरी..
      दुसरी गोष्ट म्हणजे... तिथून कसा तरी जीव वाचवत माझा भाऊ आणि गाडीतले इतर सगळे थोडेसे पुढे आले. आणि पुढे येऊन त्यांनी 112 नंबरवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी तिथून अजब उत्तर मिळाले. त्यांनी सांगितले की तिथेच थांबा, आम्ही येत आहोत. त्यांचे उत्तर ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळत नाहीये. तिथेच थांबा म्हणजे त्या दरोडेखोरांकडून जीव गमावून घ्या, मार खावा, तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर येतोच तिथे, असा अजिबात होत नाही बर का
    या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गाडी उभी केली. स्वतःचा जीव एवढ्या भयानक परिस्थितीतून वाचवून आल्यावर कळत नव्हते नेमके काय करावे. यासाठी थोडा वेळ गाडी बाजूला लावली आणि पाणी पिऊन थांबले. तेवढ्यात एक ट्रॅफिक पोलिस तिथे आले, त्यांना माझ्या भावाने सगळी हकीकत सांगितली. विचारले की तुम्ही कोण यावर कारवाई का करत नाही? त्यांनी उत्तर दिले कि आम्ही तिथेच राहतो. त्यामुळे आमचा जीव धोक्यात येईल आम्ही काही बोलू शकत नाही. तुम्ही बोला, तुम्ही आवाज उठवा
आपण जर सोलापूर-उमरगा किंवा उमरगा-सोलापूर प्रवास करत असाल तर सावध राहा. या रोडवर भरदिवसा ढवळ्या गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटत आहेत. तुमचा जीव ही घ्यायला ही लोक पुढे मागे पाहत नाहीत. निव्वळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहेत...
    भयानक घटनेने आम्ही हादरून गेलो आहोत. या हायवेवर प्रवास करणार्‍यांना सावध करावे म्हणुन ही पोस्ट केली आहे. ही घटना फक्त आज घडली असे नाही, या पोस्टनंतर बरेच फोन आणि मेसेज आले आहेत. बर्‍याच जणांना हा अनुभव गेल्या अनेक वर्षापासुन आले आहेत. या रोडवर बर्‍याच जणांचे गाड्या अडवून त्यांना लुटले गेले आहे. आम्ही याची रीतसर तक्रार केली आहे. त्यावर सुरू आहे कारवाई करण्याची त्यांच्या परीने प्रक्रिया... पण आपल्या सर्वांपर्यंत ही घटना पोचवून आपल्याला सावध करावे यासाठी हा लेख प्रपंच.... त्यामुळे विनंती आहे इथून जाता येताना सावध राहा. ही पोस्ट कृपया जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा.

श्वेता हुल्ले 
सोलापूर

877. सासूबाई मी तुमच्या घरात रहाते

     निरजा ऑफीसला जॉइन होऊन नुकतच वर्ष झालं होतं. लहान बाळाला सासूबाईंच्या हाती सोपवून रोज सकाळी ऑफीसला जायची. बाळाला असं सोडून जाताना जीव तुटायचा तिचा. सहा महिन्याचं बाळ. ही जायला निघाली की मोठमोठ्याने रडून आकांत करायचं.  सासूबाई कशातरी गप्प करायच्या त्याला. जीवापाड सांभाळायच्या. पण आताशा त्यांनाही बाळाचं आवरणं झेपत नव्हतं. मग त्यांचा राग निरजावर निघायचा. कधी टोमणे मारुन तर कधी उघडउघड.  नीरजा घरी आली की बाळ तिची पाठ सोडायचा नाही. नुसतं उचलून घे म्हणायचा. त्याला घेऊन तिला स्वैंपाक करता येत नसे. पुन्हा सासूची चिडचिड व्हायची. निरजा विचार करायची,नोकरी सोडायची का? पण मैत्रिणी म्हणायच्या,"अगं,वेडी आहेस का तू निरे. ही बीएमसीतली नोकरी कुणाला सहजासहजी मिळत नाही. थोड्या परीक्षा दिल्यास की बढती मिळेल तुला. बाळाचं काय घेऊन बसलीस. होईल मोठा थोड्या दिवसांत."
त्यादिवशी जरा जास्तच वाजलं तिचं नी सासूबाईचं. तिला घरी जायला अकरा वाजले होते. बाळाने रडूनरडून हैदोस घातला होता. त्याला आईच्या दुधाची तलफ आली होती. शेजारच्या बायांनी येऊन आगीत तेल घातलं,"काय बाई सून तुमची,एवढ्याशा लेकराला सोडून जाते. जाते ती जाते. वेळेत येतपण नाही. आई म्हणून काही कर्तव्य आहे की नाही?" निरजाच्या सासूबाईंनी त्यांची बोळवण केली खरी पण त्यांच्या रागाचा पारा चढत गेला . 
निरजा ट्रेनच्या तुडुंब गर्दीतून कशीतरी येत होती. दुध आल्याने स्तन ठणकत होते. त्यात ट्रेनमधून उतरल्यावर रिक्षा स्टँडवर नेमकी रिक्षा गायब. तशीच थेट धावत निघाली बिचारी. डब्बाही खाल्ला नव्हता तिने, कामाच्या धावपळीत. नवऱ्याची फिरतीची नोकरी त्यामुळे त्याचा बाळाच्या संगोपनात  हातभार लागत  नव्हता.
घरी पोहोचली तेंव्हा बाळ रडूनरडून निजला होता. सासूबाईंनी दार 
उघडलं.
'ही वेळ का गं येण्याची? पदरी लहान बाळ आहे. त्याचीही आठव येत नाही का तुला? इतकी कशी कठोर ग तू?'
'अहो,आई अर्जंट काम आलं. तरी मी साहेबांना सांगत होते पण ऐकले नाहीत.'
'बाजूच्या राण्यांची सून बघ एमटीएनएलमध्ये आहे. वेळेवर घरी येते. राणीन मग भजनाला जाते. सून सगळा स्वैंपाक आवरते. रात्रीची भांडी,ओटा सगळं.नाहीतर तू. माझं मेलं नशीबच फुटकं.'
निरजात भांडायचं त्राण नव्हतं. सासरेबुवांनी तिला नजरेनेच शांत रहाण्यास सांगितलं. एक जमेची बाजू निरजाकडे होती ती म्हणजे तिचे सासरेबुवा. ते समजून घ्यायचे तिला. तिचं काही चुकत असेल तर समजावून सांगायचे तिला. 
सासूबाई प्रेमळ होत्या पण हे असं शांत वागणं जमत नव्हतं त्यांना. दिवसभराच्या दगदगीने आंबून जायच्या बिचाऱ्या. त्यात शुगर डिटेक्ट झालेली त्यांना. त्यामुळे बाळाच्या मागे करावी लागणारी धावपळ झेपत नव्हती त्यांना. सासऱ्यांना संधिवाताचा त्रास,त्यामुळे त्यांनाही बाळापाठून फिरणं जमत नव्हतं.
निरजाला जेवायचीही इच्छा नव्हती पण भांडतभांडत का होईना सासूबाईंनी तिचं पान वाढलं. त्याही जेवायच्या थांबल्या होत्या. डायनिंग टेबलवर दोघींची पान पाहून निरजाला सासूबाईंचं हसू आलं. मनात म्हणाली,"किती प्रेम करतात या माझ्यावर. पण त्यांना बोलून दाखवता येत नाही. प्रेमापोटीच रागावतात."
निरजाचे मन सासऱ्यांनी बरोबर ओळखले. त्यांनीही हसून तिला प्रतिसाद दिला. जेवणात साधी खिचडी होती पण ती तिला अमृताहून गोड लागली. चार घास खाल्ले तितक्यात बाळाने रडायला सुरुवात केली. निरजाचं जेवण होईस्तोवर सासऱ्यांनी त्याला थारवलं. निरजा भांडी घासायला जाणार तोच सासूबाई म्हणाल्या,"मी घासते ग भांडी. तू आधी त्याला जवळ घे."
निरजाने मग हात पुसले व बाळाला कुशीला घेतले. अर्धमिटल्या डोळ्यांनी बाळ अम्रृतधारा पिऊ लागला तसं सासूबाई अनिमिष नेत्रांनी ती मायलेकरांची भेट पाहू लागल्या.
"आज जरा जास्तच त्रास दिला ग गुलामाने. त्यात त्या राणेवहिनी माझे कान फुंकून गेल्या. म्हणून जरा तापले ग तुझ्यावर. घरासाठीच नोकरी करतेस. कळतंय मला. सहा महिने झाले माहेरी ही गेली नाहीस. अधिकउणं बोलले तर मनावर नको घेऊ हं. आम्हाला तरी कोण आहे तुमच्याशिवाय?"
"नाही ओ आई, तुमच्यावर कशी रागावेन मी. आणि रागावले तरी ते आपलंतुपलं लुटूपुटूचं. पण परत मला उशीर झाला तर जेवून घेत जा. औषध घ्यायची असतात नं तुम्हाला."
"अगं त्या पोंक्षेंच्या सुनेने सासूसासऱ्यांची रवानगी गावच्या घरी केली अन् बाळाला पाळणाघरात ठेवलाय. मी अधुनमधून काव्वते तुझ्यावर म्हणून तू नाही नं करणार त्या पोंक्षेंच्या सुनेसारखं? मी नाही ग राहू शकत तुझ्या छकुल्याशिवाय. गुलाम माझ्याजवळपण दुधू शोधतो हल्ली. दे दे म्हणतो."
"नाही ओ आई, मी कोण तुम्हाला गावी पाठवणार आणि ओरड्याचं म्हणाल तर मांजरीचे दात लागतात का पिल्लांना? तुमचंच घर आहे. मी तुमच्या घरात रहाते.  तुम्ही नाही रहात माझ्या घरात. लोन माझ्या नावावर घेतलंय पण घराला घरपण हे घरातल्या माणसांनी येतं. तुम्ही दोघं प्राण आहात या घराचा. सुधीर हा असा नेहमीचा फिरतीवर. तुमचा किती आधार आहे मला! मलाही कळतंय जास्त धावपळ झेपत नाहीत तुम्हाला. मी एखादी बाई बघते वरकामाला व बाळाजवळ लक्ष ठेवायला पण पुन्हा असं काही मनातसुद्धा आणू नका आणि भांडूया आपण पोटभर त्याशिवाय मज्जा नाही ओ येत.तांब्याला कल्हई केल्यावर कसं चकाकतं तसंच भांडून झालं आणिनव्याने एकत्र आलो की आपलं नातं चकाकतं."
सासऱ्यांनी प्रेमाने निरजेच्या डोक्यावर हात ठेवला.

गीता गजानन गरुड.

शनिवार, २० जानेवारी, २०२४

874. फसवणूक

       विपुलच्या अचानक जाण्याने तृप्ती चे भावविश्व पार उन्मळून पडले. आता तर  चालू झाली जीवनाची खरी लढाई. कसे सामोरे जाणार होती ती समाजाला, नातलगांना? जिवाभावाची सखी ही तिची सवत आहे कळल्यावर, त्यातून तृप्तीला सावरायला जवळपास दोन वर्षे लागली. पण आपल्या  मुलीसाठी गाथा साठी तरी सावरणं भाग होतं. तिचे दोनाचे चार हात करायची  वेळ लवकरच येऊन ठेपेल तेंव्हा काय उत्तर देणार होती तृप्ती तिची आई या नात्याने मुलांकडील लोकांना? विचार करून करून तिचं डोकं भणभणायला लागलं होतं. चहाची तल्लफ आल्याने उठून ती किचनमध्ये निघाली , इतक्यात विशाखा तिची जीवलग मैत्रीण. तिची सवत हीचा कॉल आला. खरेतर तृप्तीने तिचा नंबर ही डिलीट केलेला पण विपुल च्या दिवसपाणी कार्यात ती सहभागी झाली व झालं गेलं विसरून तृप्ती तिच्याशी मोजकेचं बोलली. त्यावेळी दोघीही आपल्या आयुष्यात कुठलं वादळ उदभवलेचं नाही या आवेशात वावरत होत्या पण जमलेल्या नातेवाईकांच्या नजरेत सारे भाव स्पष्ट दिसत होते. अस्फुटशी कुजबूज केलेली जाणवत होती. विपुलच्या आईला जेंव्हा या सगळ्या गोष्टी कळल्या तेंव्हा त्या माऊली ने त्याची बरीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर काही काळ विशाखा व विपुल दूर होते. परंतु एकमेकांपासून आपण फार काळ दूर राहू शकत नसल्याने विपुल ने कंपनी टूर च्या नावाखाली पुन्हा बेंगलोर ला व्हिजिट दिली. या सगळ्या प्रकारात मात्र तृप्ती हताश झालेली. सासूबाईंच्या इच्छेला मान देऊन विपुलमध्ये परिवर्तन होण्याची  वाट पहात राहिली. 
     आयुष्याच्या एका टप्प्यावर मात्र आपण फसवले जात असून विपुलच्या मार्गातून , स्वतःहून दूर होण्याचा पर्याय तिने निवडला. त्यावर घरात बराच गदारोळ माजला होता. प्रत्येक वेळी स्त्री ने एक पाऊल माघार का घ्यावी , तिची काहीही चुकी नसताना ? ठरल्याप्रमाणे तिने आपल्या वकील मैत्रिणीशी बोलून फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नात्यातील सहवास कमी झाला की दुरावा जाणवतो. वारंवार पडत असलेले अंतर..त्याचा तरुण वयातील गाथा वर  होणारा परिणाम. या साऱ्या गोष्टींवर पडदा टाकून तृप्तीला आता अलिप्त  व्हायचं होतं.
      तृप्ती एका कॉलेजमध्ये लेक्चरर होती. स्वतःच्या पायावर ठाम उभी होती. लवकरच तिच्या PHD च्या प्रबंध वर शिक्कामोर्तब होणार होते.  अतिशय शांतपणे तिने विपुलशी बोलून जेंव्हा डिव्होर्स चा निर्णय घेतला , तेंव्हा तिच्या या अनपेक्षित निर्णयामुळे मात्र विपुल हादरला होता.या साऱ्या ताणतणावामुळे त्याला हार्ट अटॅक ला सामोरे जावे लागले. अँजिओग्राफी झाल्यानंतर तृप्तीने पत्नीच्या नात्याने तिची सगळी कर्तव्ये पार पाडली होती , अगदी मनाचा कोंडमारा होत असतानाही. खरंतर आता त्या दोघांना एका छताखाली राहणं ही अवघड झालं होतं.
      काही कालावधी नंतर विपुल आजारपणातून सावरला व त्याचे ऑफिस रुटीन चालू झाले मग मात्र तृप्ती. मुलगी गाथासह माहेरी परतली. नातेवाईक चौकशी करत होते पण काळजातलं दुःख लपवत तृप्ती साऱ्याला सामोरे जात होती. वयस्कर आई - वडिलांना जपत होती. या वयात त्यांना हा धक्का पचविणे अवघड जात होते पण तृप्ती व नात गाथा ला आधार देण्याचं  आपलं कर्तव्य ते करत होते. लवकरच तो दिवस येऊन ठेपला. आज विपुल व तृप्तीची लग्नाची अँनव्हर्सरी होती. तृप्ती आज मुद्दाम सुट्टी घेऊन घरी राहिली. दुपारची जेवणं झाल्यावर बेडरूममध्ये आईच्या मांडीवर डोकं ठेवून विसावली होती. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना थोपवणं अवघड जात होतं. बिचारी आई मात्र तिच्या डोक्यावरून आपला मऊशार हात फिरवत तिला शांत करत होती. कसं आणि काय घडलं या विचारात गढून गेली , खरेतर अतिविचार करणे हे तब्येतीच्या दृष्टीने स्ट्रॉंग पॉयझन असते. कोणाला काय वाटेल हा विचार करत बसलो तर. हे आयुष्य संपून जाईल पण Let It Go....! म्हणून झालेली घटना ही विसरता येण्यासारखी नव्हती.
    गतकाळातील घडामोडींचा चित्रपट तृप्तीच्या डोळ्यासमोर तरळला. विपुल एक आयटी इंजिनिअर झालेला हुशार मुलगा. मध्यमवर्गीय कुटुंबातील तृप्तीच्या बघताक्षणी प्रेमात पडला. कुठल्याश्या एका कार्यक्रमात विपुलच्या फॅमिलीने तृप्तीला पाहिलं व मागणी घातली. अगदी रीतसर दाखविण्याचा कांदा पोहे प्रोग्रॅम पार पडला. मेड फॉर इच अदर अशीच त्यांची जोडी दिसत असल्याने , दोघेही यथावकाश बोहल्यावर चढले. सासरी तृप्ती सगळ्यांशी लाडकी झाली. कॉलेजमध्ये जॉब करत सारी कर्तव्ये हसतखेळत पार पाडत होती. पण त्याचवेळी विपुल मात्र कंपनीत यशाच्या पायऱ्या चढत असतानाही भरकटत चालला होता. लग्नप्रसंगी विशाखा चा तृप्तीच्या घरी मुक्काम होता. सगळ्या नातेवाईकांनी , मित्रमंडळींनी लग्न छान एन्जॉय केलेलं. तृप्तीला व तिच्या आईबाबांना तर स्वर्ग दोन बोटे उरलेली. नशीब काढलं होतं पोरीने म्हणून सगळेच खुश होते. पण काही वर्षांनंतर जेंव्हा सत्य कळलं तेंव्हा मात्र विशाखा त्यांच्या नजरेतून पार उतरली. लहानपणी आईचं छत्र हरपल्याने तृप्तीच्या घरच्यांनी   विशाखावर पोटच्या पोरीप्रमाणे प्रेम केलं. पण त्यांना काय माहीत हेच प्रेम पुढं आपल्या तृप्तीचा संसार मोडणारं ठरेल. असो , पण यात विशाखा ला पूर्ण जबाबदार धरणं ही चुकीचे होतं. कारण दोषी तर विपुल ही होता. तरुण वयात स्वतःचा संसार छान फुललेला असतानाही त्याने विशाखा वर आपली मोहिनी घातली. 
      बेंगलोर ला जॉब निमित्त एकटी राहात असलेली विशाखा हळुहळू विपुलच्या प्रेमात गुरफटून गेली. काळवेळेचं बंधन न पाहता आकंठ दोघेही प्रेमात बुडाले. समाज , कायदा हे लग्न मान्य करणार नाही हे माहीत असूनही गुपचूप देवळात देवाला साक्ष ठरवत, त्यांनी एकमेकांना आणाभाका दिल्या.
     तृप्तीला तो दिवस आठवला. लग्नानंतर सात ते आठ वर्षानंतर कॉलेजच्या काही कामानिमित्त तिचा बेंगलोर ला चार ते पाच दिवस अभ्यास दौरा ठरला. त्यावेळी वेळात वेळ काढून ती आवर्जून विशाखाला भेटायला गेली. मध्यंतरीच्या काळात एखादी दुसरी पुण्यात विशाखा ची धावती भेट झाली होती. विशाखा ने कोर्ट मॅरेज केलं सांगून सध्या तिचे मिस्टर यूएस ला असतात असा बनाव रचला. प्रेमाचे अनेक किस्से पेरून तृप्तीला भुरळ घातली. सालस स्वभावाच्या तृप्तीला कसलीही शंका आली नाही. या सगळ्या खटाटोपमध्ये विशाखाने आपलं बिंग फुटू नये म्हणून खूप काळजी घेतली. पण तिचा सात वर्षाचा मुलगा संकेतला जेंव्हा तृप्तीने पाहिलं त्यावेळी ती बुचकळ्यात पडली. का तर? हुबेहूब. तो विपुल सारखा दिसत होता. मनात अनेक कुशंका चे वादळ घेऊन ती घरी परतली. तिने विपुलचे लहानपणीचे फोटो असलेला अल्बम उघडला. तिचं मन हे मान्य करायला तयार नव्हते. तिला बेंगलोरला गेल्यावर विशाखाच्या वागण्यातील अनेक गोष्टी खटकल्या होत्या. पण सोबत कॉलेज मधील मैत्रीण असल्याने तिने फार लक्ष दिलं नाही. आपली अगदी जवळची मैत्रीण विशाखा आपल्याशी अशी का वागत होती? अगदी अंतर राखून.
     तृप्तीने संकेत शी बोलताना त्याच्या पप्पाबद्दल विचारले असता विशाखा ने आपल्या मेड ला खूण करून त्याला आत रूममध्ये न्यायला सांगितलं व तृप्तीजवळ सध्या आमचं नातं अवघड वळणावर असल्याचं सांगितलं. मला इंडिया सोडून तिकडं स्थायिक व्हायचं नाही आणि आता माझे पप्पा ही थकलेत, त्यांना इकडे बेंगलोर ला घेऊन येतेय असे सांगितले. मिस्टर तर तिकडेच राहायचं आहे म्हणतात.
    नात्याची गुंतागुंत उकलण्यात काहीच अर्थ नव्हता पण आता तृप्तीने विपुल वर लक्ष ठेवायला सुरुवात केली. शब्दाने वाद वाढविण्यात अर्थ नव्हता. आपली शंका जर खोटी ठरली तर मुखातून गेलेला एखादा अप्रिय शब्द एखाद्याला अपमानीत करून जातो. विश्वास हा नेहमी माणसाच्या वृत्तीवर ठेवावा.  तात्कालिक शब्दांवर नाही हे तृप्ती जाणून होती. म्हणूनच तिने सावधगिरी बाळगली होती. आपल्या बेंगलोरस्थित मावसभावाला हाताशी धरून तिने या गोष्टीचा छडा लावायचा निर्णय घेतला. सततच्या विपुलच्या बेंगलोर वाऱ्या या नक्की ऑफिस कामानिमित्त होत्या का?  याची शहानिशा तिने त्याच्या बॉस शी बोलून केली. त्यातूनचं जे बेगडी सत्य उलगडत गेलं. तेंव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. संसाराचा सारीपाट उधळला गेला. एखाद्या पत्त्याच्या बंगला कोसळावा त्याप्रमाणे.  इकडे तृप्तीच्या मावसभावाने विशाखाची माहिती काढायला सुरुवात केली. जेंव्हा विपुलचा फोटो शेजाऱ्यांना विश्वासात घेऊन दाखवला तेंव्हा तो पार हबकला. तृप्तीला आता काय सांगायचं. कसं सामोरे जायचं या घटनेला. म्हणून त्याने तिला काही टिप्स दिल्या. जानेवारी चा तो महिना. विपुल पुन्हा प्रोजेक्ट कामानिमित्त बेंगलोर मेन ऑफिसला जाणार असे कळल्यावर तृप्तीने त्याची प्रवासाची हसतखेळत तयारी केली व त्याच्या पाठोपाठ ती  आपल्या मावसभावाकडे बेंगलोरला आली. आपली मुलगी गाथा ला माहेरी सोडून. सासरी घरी अनेक कारणे देताना तिला नाकी नऊ आलेलं. पण सासूबाईंना तिने PHD प्रबंधाची माहिती व व्हिजिट देण्यासाठी मला मुंबईला चार दिवस तरी  राहावं लागेल असे सांगितले.
     बेंगलोरला गेल्यावर डिनर ला हॉटेलमध्ये विशाखा मुलगा संकेत सोबत विपुल ही  बसला असता अचानक तृप्ती समोर आल्याने त्या दोघांची पाचावर धारण बसली. तृप्ती व तिच्या भावाने कोणत्याही प्रकारे वाद न घालता सत्य जाणून घेतले. सुरुवातीला आरडाओरडा करणाऱ्या विपुलला अनेक पुरावे दाखविल्यावर त्याला आपलं हे अफेअर मान्य करण्यावाचून पर्याय राहिला नाही. विशाखा तर फक्त खाली मान घालून उभी होती. तृप्तीच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत ही झाली नाही. चूक कबूल न करता फक्त हात जोडणं हा तिचा एक प्रकारचा बहाणा होता. रिअलायझेशन केवळ माफी मागून, पाय पकडून होत नसते. तृप्तीने बेंगलोरहून परतताना नात्यांच्या या विळख्यातून स्वतःलाचं मुक्त करायचं ठरवलं. आता वेदना हीच तिची जिवाभावाची सखी ठरणार होती. तृप्तीच्या आक्रोशाला शब्दांचं बंधन नव्हतं पण मूकपणानं गिळणं ह्यातच शहाणपण होतं आणि हाच मार्ग तिने स्वीकारला होता. 
     पण आता विपुलच्या जाण्याने सगळेच प्रॉब्लेम नकळत सुटले होते का?  का गुंतागुंत वाढली होती. हे येणारा काळ ठरवणार. काळानं आपलं म्हणवणाऱ्या व्यक्तीला हिरावून नेलं पण त्यांनी केलेली फसवणूक याचं काय? नात्याला गेलेला तडा जोडता येणं , पुन्हा शक्य होईल का? तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातचं तसंच नात्यातील फसवणूक कदापि विसरता येणं शक्य नाही. घोंघावत कोसळणाऱ्या  प्रपातासारखं  नियती खदखदत होती. तृप्तीच्या आयुष्यात झंझावती वळणं आली होती , त्यातही ती ठामपणे उभी राहायला सज्ज झाली. आपल्या लाडक्या लेकीच्या गाथा च्या भल्यासाठी.
     शेवटी काय माणसाचं मन  ही एक अजब सर्कस आहे. मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे ही शोधण्याचा प्रयत्न करू नये कारण मौनातचं त्याचं उत्तर दडलेलं असतं.

©️®️सौ राजश्री कुलकर्णी / भावार्थी
          पुणे
    १९ / ०१ / २०२४

875. आंब्याचे झाड

        एका मुलाला आंबे खूप आवडायचे गावात एक आंब्याचे झाड होते. मोकळा वेळ मिळाला की तो आंब्याच्या झाडाजवळ जायचा. तो झाडावर चढायचा, आंबे खायचा, खेळायचा आणि थकला की त्याच्या सावलीत झोपायचा. त्या मुलाचे आणि आंब्याच्या झाडाचे अनोखे नाते निर्माण झाले. मूल जसजसे मोठे झाले, तसतसे त्याने झाडाजवळ येणे बंद केले. काही वेळाने ते पूर्णपणे थांबले. आंब्याचे झाड त्या मुलाची वाट पाहत राहिले.
एके दिवशी अचानक त्या झाडाला मुल त्याच्याकडे येताना दिसले आणि जवळ आल्यावर तो म्हणाला, "कुठे गेला होतास? मला रोज तुझी आठवण येत होती. आज पुन्हा खेळूया."
मूल आंब्याच्या झाडाला म्हणाले, आता माझे खेळण्याइतके वय नाही, मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे, पण फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत."
झाड म्हणाले, तू माझे आंबे घे आणि बाजारात विक. यातून तुम्हाला जे काही पैसे मिळतील ते तुमची फी भरा."
त्या मुलाने आंब्याच्या झाडावरील सर्व आंबे तोडले आणि तेथून निघून गेले. त्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही.
आंब्याचे झाड पुन्हा त्याची वाट पाहत राहिले.
एके दिवशी तो पुन्हा आला आणि म्हणाला की आता मला नोकरी मिळाली आहे आणि माझे लग्नही झाले आहे, मला स्वतःचे घर बांधायचे आहे, त्यासाठी माझ्याकडे आता पैसे नाहीत.
"काळजी करू नकोस," आंब्याचे झाड म्हणाले. "तुम्ही माझ्या सर्व फांद्या तोडून त्यांसोबत तुमचे घर बांध."
त्या तरुणाने झाडाच्या सर्व फांद्या तोडल्या आणि त्या घेऊन निघून गेला. आता आंब्याच्या झाडाजवळ काहीच नव्हते आणि कोणी त्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. झाडाने अजूनही आशा सोडली नाही की बालक ते तरुण येईल.
मग एके दिवशी अचानक एक म्हातारा तिथे आला. तो आंब्याच्या झाडाला म्हणाला, "कदाचित तू मला ओळखले नाहीस, मी तोच बालक आहे जो तुझ्याकडे वारंवार यायचो आणि तुझे तुकडे होऊन करूनही तू मला नेहमीच मदत करत असत.
आंब्याचे झाड शांत स्वरात म्हणाले, "पण बेटा, माझ्याकडे आता काही नाही जे मी तुला देऊ शकेन."
म्हातारा डोळ्यात पाणी आणत म्हणाला, "आज मी तुझ्याकडून काही घ्यायला आलो नाही, पण आज मला तुझ्याशी मनसोक्त खेळायचे आहे आणि तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपायचे आहे. असे म्हणत त्याने आंब्याच्या झाडाला मिठी मारली. 
आंब्याचे झाड प्रेमाने म्हणाले, "बाळा, काळजी करू नकोस, मी इथे बसलो आहे आणि वाळलेल्या फांदीतून चंदनाचा सुगंध येऊ लागला.
  बोध
आज अनेक पालक आपल्या मुलांची त्या ओसाड झाडासारखी वाट पाहत आहेत. आज आपण त्यांना मिठी मारली तर उद्या आपणही म्हातारे झालो की कुणीतरी आपल्यालाही मिठी मारायला नक्कीच येईल. 

873. अय्यर सर --- एक अविश्वसनीय सत्यकथा.

(आयुष्यभर लॉजच्या खोलीत राहून उरलेला पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार्‍या एका प्राध्यापकाची ही कहाणी)
अय्यर सर ---एक अविश्वसनीय सत्यकथा.
रूम नंबर २०२
श्रीकृष्ण रेस्टार्ंट बारामती.
प्रवासी मुक्कामाला आला आणि त्याने चेक आऊट ३५ वर्षांनी केलयं .....
शेवटची ओळ नाही ना समजली ? नाहीच समजणार. कारण ती आहेच अगम्य.
याचा अर्थ त्या हॉटेलात राहायला आलेला प्रवासी एकाच खोलीत ३५ वर्षे राहिला. ८ बाय १० च्या इवल्याश्या खोलीत. आणि आयुष्यभर फिरत होता सायकलवर. का ? परिस्थिती गरीब होती म्हणून का ? मुळीच नाही. वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणारे ते प्राध्यापक होते. होय. गोंधळ उडावा असंच हे प्रकरण आहे. के.एस.अय्यर. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सेवा केलेले आणि नुकतेच ५ महीन्यापूर्वी निधन पावलेले. पूर्वी एकदा कवीमित्र संतोष पवार यांनी पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करून फकीरी वृत्तीने जगणारा एक प्राध्यापक असल्याचे सांगितले होते. मात्र सर गेल्यावर तपशीलवार माहिती कळली आणि या माणसाला आपण का शोधले नाही, याची जन्मभर व्यापून उरणारी अपराधी बोचणी लागली. नुकताच बारामतीला शारदा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला गेल्यावर आवर्जून सरांनी ज्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात काम केले तिथे गेलो. तिथल्या उपप्राचार्य नेमाडे मॅडम, संजय खिलारे सर, कार्यालय प्रमुख महामुनी, दिपक भुसे हे सारे अय्यर सरांविषयी भरभरून बोलत होते. आपल्याकडे माणूस जिथे राहतो, नोकरी करतो, तिथे त्याच्याविषयी चांगले बोलण्याची प्रथा नाही... पण अय्यर सरांनी सर्वांचे टोकाचे प्रेम आणि आदर मिळवला होता. माझ्यासोबत तिथे आलेल्या मार्तंड जोरी या अभ्यासू शिक्षक मित्राने नंतर मग सरांची माहिती जमवायला मला खूप परिश्रमपूर्वक मदत केली.
आज प्राध्यापकांचे वाढते पगार त्यातून येत चाललेली सुखासीनता, त्यातून कमी होत जाणारी ज्ञानलालसा, मिळणार्‍या पैशातून बदलत जाणारी जीवनशैली आणि कमी होणारे सामाजिक भान. यामुळे अपवाद वगळता प्राध्यापक वर्गाविषयी नाराजी व्यक्त होत असते. अशा काळात एक प्राध्यापक आपल्या ध्येयवादाने अविवाहित राहतो, केरळ मधून महाराष्ट्रात येतो, आपल्या इंग्रजी अध्यापनाने विद्यार्थ्यांना वेड लावतो, आणि माणूस किती कमी गरजांत राहू शकतो,  याचा वस्तूपाठ जगून दाखवतो, हे अविश्वसनीय वाटावे असेच आहे. इतके मोठे वेतन असूनही लॉजच्या ८ बाय १० च्या खोलीत एक कॉट. मोजकेच कपडे, एक कपाट आणि त्यात पुस्तके पुस्तके आणि पुस्तके एवढाच या माणसाचा संसार होता. आयुष्यभर सायकल वापरली. गरजा खूपच कमी. मार्तंड जोरी त्या लॉजच्या वेटरला भेटले, तेव्हा सर केवळ एकवेळ जेवत व एक ते दीड पोळी खात असे सांगितले. त्या वेटरला सुद्धा ते अहो जाहो म्हणून आदराने वागवत. इतक्या फकीरीत राहताना मग वेतन आयोग लागू झाल्यावर या माणसाने पगारवाढ देवू नका मला गरज नाही असे म्हणायचे. मग सहकारी चिडायचे. संघर्षाचा स्वभाव नाही. सर शांतपणे सर्वांचा आग्रह म्हणून पगार नाइलाजाने स्वीकारत. पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी ते नाइलाजाने स्वीकारताना सरांनी फरकाच्या ५०००० रुपये रकमेतून पुस्तके स्वीकारण्याची महाविद्यालयाला उलटी अट घातली. ही निस्पृहता होती. सरांचा जन्म १९३३ साली केरळात झाला. वडील सैन्यात होते. शिक्षण राजस्थान बंगालमध्ये झाले. सुरवातीला सरांनी रेल्वेत नोकरी केली. कुटुंबातील सर्वजण सुखवस्तू आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून १९६८ साली शिक्षक झाले. कराडला नोकरी केली. नंतर बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अखेरपर्यंत राहिले. त्यांच्यात हा साधेपणा व ध्येयवाद कशातून आला याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की, हा गांधींचा प्रभाव आहे. महात्मा गांधींना लहानपणी ते भेटले होते. त्यातून गांधींचा खूप अभ्यास केला. गांधीवादी मूल्य नकळत जगण्यात उतरली. सर आंबेडकरांना आणि गाडगेबाबाबांना भेटले होते. आंबेडकरांची अनेक भाषणे त्यांनी ऐकली होती. त्यातून अभ्यासाची प्रेरणा जागली असावी. स्वातंत्रपूर्व मूल्यांच्या प्रभावातून सरांचे हे सारे साधेपण ध्येयवाद आला होता.
      केवळ साधेपणासाठी कौतुक करावे असेही नव्हते, तर सरांचे इंग्रजी विषयाचे अध्यापन हे अत्यंत प्रभावी होते. सर समजा अगदी गाडी वापरुन बंगल्यात राहिले असते, तरी केवळ इंग्रजी शिक्षणासाठी त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना लक्षात ठेवले असते. त्यांच्या विद्यार्थांना त्यांच्या अध्यापनाची पद्धती विचारली, तेव्हा सरांची काही शिक्षक म्हणून वैशिष्ट्ये लक्षात आली. सर इंग्रजी साहित्यातील नाटक, कविता, समीक्षा सारख्याच सामर्थ्याने शिकवू शकत. विशेषत: समीक्षेवर खूपच प्रभुत्व होते. सलग घडयाळी 3 तास ते शिकवत. घडयाळी ८ तास शिकवण्याचेही रेकॉर्ड केले. इतकी नोकरी होऊनही प्रत्येकवेळी वाचन करून नोट्स काढूनच वर्गात जात. त्या नोट्स च्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना फुकट वाटत. सर कधीच चिडत नसत किंवा कधीच बसून शिकवत नसत. १९९५ नंतर निवृत्तींनंतर त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले पुण्यात ३ दिवस ते अध्यापन करीत व ३ दिवस बारामतीत अध्यापन. मृत्यू झाला त्या महिन्यात ही ८३ व्या वर्षीही ते तास घेत होते. याची तुलना रविंद्रनाथांशीच फक्त होऊ शकते. असा आजन्म शिक्षक म्हणून राहिलेला आणि कधीह निवृत्त न झालेला हा शिक्षक होता. शेकडो PhD चे प्रबंध त्यांनी तपासून दिले. नेट सेट सुरू झाल्यावर मोफत मार्गदर्शन सुरू केले. इंग्रजीसोबत त्यांना अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, खेळ याविषयात विलक्षण गती होती. क्रिकेट चे तर १० वर्षापूर्वीचे तपशील ते अगदी सहज सांगत. सर रिकाम्या वेळेत सतत वाचन करीत. अगदी बँकेत, दवाखान्यात प्रतिक्षा करावी लागे, तेव्हा तिथेही ते पुस्तक वाचत बसत. त्यांच्या लहानशी खोली फक्त पुस्तकांनीच भरली होती. त्यांनी मृत्यूनंतर ही पुस्तके विविध महाविद्यालयांना द्यायला सांगितली होती. सरांनी इंग्रजीत दोन पुस्तके व अनेक संशोधकीय पेपर्स लिहिले. विद्यार्थ्यांवरचे प्रेम पुत्रवत होते. एम.ए.च्या प्रत्येक बॅच नंतर ते हॉटेलात निरोप समारंभ आयोजित करीत. मुलांना जेवण देत. नंतर ग्रुप फोटो काढून तो फ्रेम करून स्वत:च्या खर्चाने प्रत्येक मुलाला देत. महाविद्यालयात असताना त्यांना निरोपसमारंभात भाग घेता आला नव्हता हे त्यांना शल्य होते. या माणसाचे विद्यार्थी हाच त्यांचा संसार. पगारातील उरलेली सर्व रक्क्म पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या फीसाठी ते खर्च करीत. सरांच्या मदतीमुळे माझे शिक्षण पूर्ण झाले, असे सांगणारे आज अनेक विद्यार्थी आहेत. त्यांनी किती विद्यार्थ्यांना काय स्वरूपाची मदत केली, हे त्यांच्या निस्पृह स्वभावामुळे कुणालाच कळले नाही. पण ती संख्या प्रचंड होती.                 
     मला अय्यर सरांचे मोठेपण भारतीय गुरुपरंपरेशी जोडावेसे वाटते. या देशातील ऋषींच्या आश्रमात अगदी राजपुत्र शिकायला असायचे, पण ऋषीच्या जगण्यात फकीरी होती. ज्ञान हीच त्यांची ओळख असायची. कुठेतरी झोपडी बांधून ज्ञानाच्या सामर्थ्याने दीपवणारी ही भारतीय गुरूपरंपरा होती. अय्यर सर हे या परंपरेचे पाईक होते. भारतीय मनाला ही फकीरी भावते. महात्मा गांधी पासून राम मनोहर लोहिया, मेधा पाटकर अण्णा हजारेंपर्यंत भारतीय मन या फकीरीतल्या श्रीमंतीपुढे झुकते. अय्यर सरांनी पुन्हा ही परंपरा जिवंत केली, जगून दाखवली. या माणसाने आपल्या या फकिरीच्या बीजावर प्रसिद्धीच पीक काढलं नाही. निष्कांचन, अनामिक राहून  देवघरातील नंदादीपासारखा हा माणूस तेवत राहिला आणि एक दिवस विझून गेला. आपल्या आयुष्याच्या सन्मानाची किंवा त्यागाच्या वसुलीची कोणतीच अपेक्षा नव्हती. या त्यागातून मिळालेल्या नैतिक अधिकारातून आजच्या चंगळवादी समाजाला किंवा बांधिलकी विसरत चाललेल्या शिक्षणक्षेत्रावर कोरडे ओढण्याचा अधिकार मिळूनही त्यांनी तो वापरला नाही. स्वत:च्या जीवन तत्वज्ञानावर लेख लिहिले नाहीत की भाषणे केली नाहीत. ते फक्त जगत राहिले. त्यांच्या आदर्श बापुजींच्या भाषेत ‘मेरा जीवन मेरा संदेश ‘ पण समाज, शासन, विद्यापीठ म्हणून आपण या माणसाची नोंद घेतली नाही. अय्यर सर गेले. ज्या पुणे विद्यापीठात वयाच्या ८३ व्या वर्षीपर्यन्त त्यांनी शिकविले. त्या विद्यापीठाने किमान या अनामिक जगलेल्या आणि तन मन आणि धनसुद्धा विद्यार्थ्यांना अर्पण केलेल्या या दधीचि ऋषीचे चरित्र प्रसिद्ध करून ते प्रत्येक प्राध्यापक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे आणि ही प्रेरणा संक्रमित करावी. अन्यथा आइनस्टाईन म्हणाला होता तसे  ‘असा हाडामांसाचा माणूस होऊन गेला यावर भावी पिढी  विश्वाससुद्धा ठेवणार नाही.'

हेरंब कुलकर्णी.
phone 8208589195

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

872. वास्तव सत्य

       वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, "पृथ्वीवरील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटूंबीक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे. बसल्या बसल्या ह्या  शेंगातील दाणे काढा ,असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे. वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते  कुटूंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले, नातेवाईक पैसे देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला, कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो, फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता , ह्याला मी किती मदत केली होती. सगळे कटू अनुभव जमा झाले असतील, कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल. नाते बिघडली, सबंध बिघडले , वाट्याला एकटेपण आले , आता कुणाचे फोन येत नाहीत, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही. तरीपण एक नात  टिकून राहते  ते नातं मुलीचं, तितक्यात मुलीचा फोन येतो, ती विचारते--- पप्पा गेले होते का दवाखान्यात? औषधं घेतलीत का? काय म्हणाले डॉक्टर? जेवण झाल काय? नाना प्रश्न काळजीचे, आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात. थोडा पश्चातापही होत असतो, मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे ?
     लोक  मुलगा झाला कि स्वतःला भाग्यवंत समजतात. मला असे वाटते, ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत. एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. मुलगी म्हणते काळजी करू नका मी आहे.     
  
🌹रिटायर्ड सदस्यांना समर्पित🌹

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

871. नात्यात वाद नको संवाद हवा

 नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो...
"हाय, गुड मॉर्निंग डियर"
(मेसेज फ्रॉ मबेबी) सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. 
विचारात पडते, ही "बेबी" कोण आता ?
नवरा बाथरूम मधून आल्यावर बायको त्याला कुण्या बेबीचा मेसेज आल्याचे सांगते.
नवरा हसतो. आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो,"हाय बेबी, हाऊ आर यु ?" आणि आपल्या कामाला लागतो. 
तो रिप्लाय देखील बायको पाहते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात, कोण असेल ही बेबी ? 
संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते, "ही बेबी कोण आहे हो ?
"नवरा केवळ हसतो आणि उत्तरं न देता आपल्या कामाला लागतो.
असेच एक दोन दिवस जातात. पुन्हा एके सकाळी मेसेज येतो, "हाय, आज तरी भेटणार का ? खूप आठवण येतेय तुझी" (मेसेज फ्रॉम बेबी) हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. 
अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे,नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. 
आणि एकेदिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात.
त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते. दोघात कडाक्याचे भांडण होते. तिच्या मनात अढी बसलेली त्यात भांडण पेटलेले. त्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिट्ठी ठेवते "मी घर सोडून माहेरी जातेय, कायमची".
नवरा घरी आल्यावर चिट्ठी वाचून सुन्न होतो.
पंधरा दिवस जातात. आणि एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते, त्या घराची बेल वाजते. 
बायकोच दार उघडते. दारात दहा वर्षाची एक अतिशय गोड मुलगीउभी !!
 ती विचारते, "अमुकच्या मिसेस तुम्हीच न?"बायको "हो" म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू लागते...
"प्रिय सखी, ज्या "बेबी"वरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस, तीच ही "बेबी" आहे. जिने आता तुला हे पत्र दिलेय. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी. हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस कि "हे बेबी कोण आहे?" तेव्हा मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा "बेबी संशय" वाढतच गेला. आणि तिथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस. आणि रागाच्या भरात निघून गेलीस"आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्या समोर उभी आहे न, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे" 
थांब ! दचकू नकोस. शांतपणे पुढचे वाच !! आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षे आधीची घटना. तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्यानेघरी बोलावून तुला कॉफीतून गुंगीचं औषध दिलेलं आणि नंतर "नको ते कृत्य" केलेलं. तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही अबॉर्शन घडलं नाही. इभ्रतीचा बोभाटा नको म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच झाकलेलं. तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोभाटा न होता "नको" ते बाळ जन्मल. पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडलांनी गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेलं !तेच बाळ म्हणजे ही बेबी !! वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असशील. किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे.
(बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून कोसळते. डोळे भरून आलेले. पण पत्र अजून बाकी असतं. ती पुढे वाचायला सुरुवात करते )
"आता हे सगळं मला कस माहित ? तर तुझ्या पापभिरू वडिलांनीच न राहवून आपल्या लग्नाच्या एक महिना आधी मला भेटून हे सांगितलं व वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता, सुचवलं. तरीही मी तुला स्वीकारलं. कारण झाल्या प्रकारात तुझी चूक काहीच नव्हती. आणि आपले लग्न झाले. पण मीच अधून मधून त्या बेबीला जाऊन भेटायचो. तिच्या सहवासात छान वाटायचे. लळा लावला होता पोरीने. बास. माझे सांगून संपलंय सगळं. आता विचार कर आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणि तरच ग्यालरीत ये." सदैव तुझाच 
बायको ताडकन धावत धावत ग्यालरीत जाते. खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख आणि इकडे हिच्या डोळ्यात अश्रूचा महापूर.
कारण कोणतेही असो, दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नका. शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा. कारण जगात "संशय" हा एकमेव असा रोग आहे, ज्यावर अद्याप औषध निघालेले नाही. त्यावर औषध एकच ...नात्यात वाद नको संवाद हवा.......
.
❤️अनिक❤️

870. बीन आडनावाची पोरी

   थोडी कळ काढ! थोडी कळ काढ बाई!!. बाजुला बसलेली सोयीन व दोनचार बायका तिला धीर  देत होत्या. तिला प्रसूती वेदना अगदी असह्य झाल्या होत्या. कारण बाळ फिरल होत. डोक्या ऐवजी पाय खाली आले होते. ती वेदनेने ओरडत होती. कळीने हात पाय मारत होती. शेवटी झाली एकदाची प्रसूती. पण तिला वेदना इतक्या असह्य झाल्या होत्या की प्रसूती होताच ती बेशुद्ध पडली. सोयीनीने बाळ हातात घेतल्या बरोबर ती समजली. हे बाळ राक्षस आहे.. कारण बाळ दिसायला काळेकुट्ट व विचित्र होते. त्याचे डोक बरंच मोठ होत आणि डोळेही. बाळाला दात देखिल आले होते. बाजूच्या बायकांना सोयीनीने ती गोष्ट सांगीतली व दात देखिल दाखवले. बिचारी त्या बाळाची आई. ती तर बेशुद्ध होती. सोयीनीने ही बाब बाळाच्या बापाला  व गावांतील इतर लोकांना सांगीतली. ते बाळ बघून सगळ्यांची खात्री झाली की, हे नक्की राक्षस आहे. रूढी- परंपरे. प्रमाणे गावातील लोकांनी लागलीच बाभळीच्या काटेरी फांद्या तोडून आणल्या व त्यावर ते नुकतच जन्माला आलेले बाळ पातळ कापडात गुंडाळून ठेवले. त्याच बरोबर त्या लहान गोळ्याचे अंग रक्तबंबाळ झाले. बाळ जोर- जोरात रडत होते. मन हेलाऊन टाकणारे भयंकर द्रुष्य होते ते..मात्र त्या निर्दयी लोकांना कसलीही दया-माया नव्हती.. कारण आता पर्यंत असे कितीतरी राक्षस त्यांनी काटयावर नेवून जंगलात टाकले होते. गावकऱ्यांनी त्याही बाळाला तसंच त्या काटयावर ताणत ताणत न्यायला लावले. तान्ह्या बळाचा भयंकर रडण्याचा आवाज. त्या भयानक द्रुष्याचे वर्णन तरी काय कराव? त्याची आई तर बेशुद्धच होती. तिला या विषयी काहीच कल्पना नव्हती. बाप समाजाच्या बंधनात जखडलेला होता मग  ती जर शुद्धी वर असती तर आई म्हणून तिने  याला विरोध केला असता? की, समाजाच्या भीतीने ती देखिल या क्रूर प्रथेला बळी पडली असती? निर्दयी गावकऱ्यांनी ते जिवंत नवजात बाळ काटयावर ताणत दूर जंगलात नेऊन टाकले. आता बाळाचा  रडण्याचा आवाज बंद झाला. काम झाला! अस बोलुन त्यांनी नारळ फोडला व गावकरी परत निघाले. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ते बाळ मेलेलेच जन्माला आले. अस तिला नवऱ्याने संगितले.
      मध्येरात्र झाली . या भयाण अंधाऱ्या रात्री एक सावली त्या बाळा जवळ येत होती. हळू हळू ती सावली त्या बाळा जवळ आली. काटयावरील बाळाला त्या सावलीने चाचपले. बाळ जिवंत होत. त्या सावलीने बाळ उचलले व ती सावली बाळाला  घेऊन गेली.
       हळूच झोपडीच दार उघडले म्हतारीने आणलेले बाळ अंथरूण करुन त्यांवर ठेवले. सुरवातीला म्हातारीने बाळ गुंडाळलेल्या फडक्यात काही मिळते का  पाहिले. फडके उघडल्या बरोबर तिला दिसले ते बाळ एक मुलगी आहे,रक्ताने ती पुर्ण माखली होती. त्या असह्य वेदनन.तीची रडण्याची शक्तीही संपली होती. त्या फडक्यात घरच्यांनी  प्रथा म्हणुन ठेवलेले पाच पन्नास रुपए म्हातारीला मिळाले. ते पाहुन आपली मेहनत वाया गेली नाही याचे समाधान तिला झाले. ती उठली. तिने ते पैसे तिच्या नेहमीच्या पेटीत ठेवले व सकाळी काढुन माचीवर ठेवलेले बकरीचे  दुध चमच्याने त्या मुलीला पाजायला सुरवात केली. आणि काय चमत्कार त्या मुलीने ते दुध घोटले. हे पाहुन म्हातारीला मनोमन आनंद झाला.
       शांता. घरातील सासू-सासरे आणि नवऱ्याच्या त्रासाने अगदी हैराण झाली होती. कारण काय तर तिला मुल नव्हते. आता पर्यंत तिला तीन मुलं झाली पण जन्माला आल्यावर लगेच मेली. ही भुताळी आहे आपल्या मुलांना खाते! असे टोमणे सासु नेहमीच तिला मारे. त्यांत सासरा व नवरा हे देखिल सामील तिला नेहमीच टोचून बोलत. या  रोजच्या जाचाला शांता अगदी कंटाळुन गेली होती. नेहमी तोच तोच विचार करुन ती मनोरुग्ण झाली.. काही - बाही बडबडायला लागली. त्यामुळे घरच्यांनी शांताच्या माहेरच्या  लोकांना बोलवून पंचायत भरवली.ती भुताळी आहे असे ठरवले. व दूर जंगलात दूरवर हाकलून दिले. शांता काहीशी मनोरुग्ण होती मात्र ठार वेडी नव्हती.ती न त्या घनदाट जंगलात. एक तोडकी- मोडकी झोपडी बनवली.  ती जंगलातील फळे व इतर काही बाही खाई. पण त्यामुळे तीच पोट कस भरणार?  तिला भुक असह्य होई. म्हणुन  तिने रात्री स्मशानात जाऊन  टोप ,ताट, ग्लास आणले सुरवातीला तिला भीती वाटली. पण पोटातील भुकेने  तिला हे सर्व करवले. त्यातच ती कंदमुळे शिजवून खाई..आग पेटवायला ती कधी कधी ती स्मशानातील जळक लाकूड घेऊन येई. आता तर स्मशान म्हणजे तीच दुसरे घर झाल होत. कारण तिथे तिला मयतावर टाकलेले पैसे वस्तु तर कधी कपडे मिळत होते.. त्यामुळे मयत पेटवले त्या रात्री ती हमखास फेरी मारी. गावकऱ्यांनी तिला किती तरी वेळा स्मशानात पाहिले होते त्यामुळे आत्तातर शिक्कामोर्तब झाले की, शांता भूताळी आहे.
     शांता झोपडीत राही तीच्या तीच्या गरजा मर्यादित होत्या. तीच्या कडे पैसे देखिल असायाचे त्यामुळे ती बाजुच्या दुसऱ्या गावातुन धान्य व इतर गरजेच्या वस्तु घेऊन यायची. आत्ता तर तिने पैसे जमवून बाजुच्या गावातुन एक गाभण बकरी आणली होती. जंगल भरपुर त्यामुळे तिला चाऱ्याची अडचण नव्हती. अस करता करता आज तीच्या जवळ पाच बकऱ्या होत्या. त्यांना होणारे बोकड ती बाकी बाजुच्या गावातील  खाटकाला विकत असे. तीच्या गावातील लोक तिला भूताळी समजायचे त्यामुळे तीच्या झोपडीच्या आसपास कोणी फिरकत नसे म्हणून तीच्या बकऱ्या सुरक्षित होत्या. शांता. आता बरीच म्हातारी झाली होती. आज तिला पैशांच्या लोभाने का होईना पण  जिवंत बाळ मिळाल होत. आणि शांता त्याला काटयावरून उचलून घरी घेऊन आली. तीची सुप्त ममता आता जागृत झाली होती तिने त्या बाळाला सांभाळण्याचे ठरवले.
     त्या नवजात मुलीला सांभाळताना तिचा वेळ कसा जात असे हे शांताला समजत नसे. तीच्या माये मुळे आता तीच्या मनात इतर विचार येत नव्हते त्यामुळे तीची मानसिक स्थिती सुधारली. तीची स्वतःशीच बडबड करण्याची सवयही बंद झाली.शांता आता बऱ्यापैकी सामान्य झाली.
     दिवस जात होते. शांताची मुलगी म्हणजे तिने काटयावरून आणलेली. आता बरीच मोठी झाली होती. शांता समाजाच्या भितीने. तिला जंगलाच्या बाहेर कधीच नेत नसे.. बाजुच्या गावात कधी धान्य किंव्हा इतर वस्तु आणयला ती एकटीच जाई. ती मुलगी शांताला माय म्हणुन हाक मारी.. मात्र शांताने अजुन तीच नाव देखिल ठेवले नव्हते. पोरी म्हणूनच ती तिला हाक मारत असे.. शांता पोरीला फार फार माया करत असे.. आपल्या नंतर या पोरीचं कस होणार याचा ती नेहमीच विचार करी.. पोरीचं वय जस वाढत होत तसं तीच शारीरिक व्यंग देखिल कमी होत गेले. लहानपणी अंगाच्या तुलनेने मोठ दिसणार डोक लहान झाल होत. डोळे जरा मोठेच आणि काळा रंग कायम होता. बाकी सामान्य झाले. पोरी लहानपणी जितकी विद्रुप दिसायची तितकी आता दिसत नव्हती. आता ती साधरण पाच -सहा  वर्षाची झाली होती.
     मस्टर वर शाळेतील पहिल्या दिवशीची सही करुन मोहन मुख्याध्यापकानां भेटला. या! या!! माळी सर आपले स्वागत आहे.बसा! मुख्याध्यापक म्हणाले. मोहन माळी आत्ताच डी. एड. करुन जि. प. शाळेत  नोकरीला लागला होता. मोहन हुशार मेहनती व विज्ञानवादी होता. तो अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा सदस्य होता. आता पर्यत त्याने समितीच्या अनेक कार्यक्रमात भाग घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले होते. आज त्याचा शाळेचा पहिला दिवस होता. नोकरीची पाहिली सही करुन तो मुख्याध्यापक सरांच्या समोर बसला होता.
     माळी सर!.. आपली ही शाळा आणि गावातील लोकां बाबत थोड सांगतो. या गावातील लोक फार डांबरट आहेत. कोणाचे काही ऐकत नाही. आपल्या शाळेची गाव शिक्षण समिती तर विचारूच नका. त्यामुळे आपण आपले काम भले आणि आपण भले. महिन्याचा पगार मिळाला की झाल. बाकी दुनिया गेली तेल लावत. या तत्वावर काम करा. समजले? मुख्याध्यापक म्हणाले. हो सर! मोहनने मान हलवली .
        दोन तीन महिने मोहनने गावातील लोकांचा अभ्यास केला. मुख्याध्यापक सरांनी सांगितल्या प्रमाणे येथील लोकं खरच डांबरट तर होतीच त्याच बरोबर कमालीची अंधश्रध्दाळू होती. चांगल्या गोष्टीला देखिल नहाक विरोध करायची. राईट टू एजूकेशन कायद्या खाली सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा बाह्य मुलांच्या सर्वेचे  काम मोहनकडे आले. त्याने संपूर्ण गाव फिरून जी जी मुलं शिक्षणापासुन वंचित आहेत त्यांची सर्वांची नावे नोंदवली व त्यां सर्वं मुलांना शाळेत आणले. या साठी मोहनने काय काय कसरत केली ही त्यालाच माहिती होती. कुणी गुरे चरायला जात होत, कोणी पक्षी मारायला, कोणी विटा पाडायला, कोणी मुलं सांभाळायला तर कोणाला पालक पाठवत नव्हते कोणच काय ?तर कोणच काय?. तरी हे सगळं दिव्य पार करुन त्याने सर्वच मुलांना शाळेत आणले.
      मोहनला मिळालेल्या माहिती नुसार जंगलात एक घर आहे.तेथे एक शाळाबाह्य मुलगी आहे. मोहनने अधिक चौकशी केली तेव्हा ती भूताळीची मुलगी असल्याचे समजले व तेथे न जाण्याचा सल्लाही त्याला मिळाला. मोहन आधीच विज्ञानवादी असल्याने त्याचे त्या मुली विषयी कुतूहल जागरुक झाले व उद्या जंगलातील त्या झोपडीत जाण्याचा निर्णय त्याने घेतला.
      पोरी.. माय! माय!! करत धावत येवून  शांताला जाऊन बिलगली.. ती भितीने थर थर कापत होती.. काय झाल ग पोरी? शांताने तिला विचारले. तेव्हा पोरीने झोपडीच्या आवारा कडे बोट दाखवले. शांताने त्या दिशेला पाहिले तर तिला सुद्दा धक्काच बसला. .त्या आवारात चक्क एक माणूस उभा होता. किती किती वर्ष झाली होती झोपडीच्या आस पास कोणी माणूस फिरकला नव्हता आणि आज चक्क आवारात. शांताचाही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पोरी तर दुसरा एखादा प्राणी पाहिल्यासारखे भ्याली होती.
    कोणी आहे का घरात? मोहनने विचारले. तसं त्याला पाहुन आतमध्ये पळताना त्याने त्या मुलीला पहिल होत पण एक शिष्टाचार म्हणून त्याने विचारले. तशी शांता बाहेर निघाली आणि तिला बिलगून पोरीही.
       नमस्कार आजी!..मी मोहन माळी आपल्या गावातल्या शाळेचा शिक्षक! आपल्या गावातल्या? शांताने काहीश्या रागात विचारले.. हो! आपल्या म्हणजे तुमच्या गावातल्या. मोहन म्हणाला हे पहा गुरुजी! ज्या गावाने मला भूताळी ठरवून वाळीत टाकले त्या गावाशी माझा काही संबध नाही समजल? ठीक आहे आजी! पण तुमच्या मुलीचा तर विचार करा ती चांगली शिकली तर तीच भविष्य उज्वल होईल. मोहनने समजावले. तशी शांता नरमली.. कारण तिला देखिल पोरीच्या भविष्याची फार चिंता सतावत होती. शांताने मोहनला आत बोलवले. म्हातारी आणि पोरी नंतर त्या झोपडीत आत जाणारा मोहन पहिलाच माणूस होता. मोहन आत जाऊन पाहतो तर काय?. त्या लहानश्या झोपडीत कमालीची स्वच्छता होती.. घरात मोजक्याच वस्तु होत्या पण व्यवस्थित जागेवर लावल्या होत्या. बाजुला  बकऱ्यानांचा गोठा होता. त्यांत एकदोन पिल्ल म्या.. म्या.. करत होती..म्हातारीने चहा केला त्यांत बकरीचे दुध टाकले.. मोहनने चहाचा पहिला घोट घेतला. त्याला आश्चर्य वाटले.चहा मस्त मसालेदार होता. आजी चहाची चव फार मस्त आहे. भूताळीचा आहे ना म्हणून !.. ती उपरोधिक स्वरात म्हणाली आजीच्या प्रत्येक वाक्यात समाजावर रोष दिसत होता.
    गुरुजी माझ्या पोरीला शाळेत घेतील का? नाहीतर तिलाही भूताळीची मुलगी म्हणून हाकलून लावतील. आजी! काळ बदलला आहे आणि आता तर  सरकार ने कायदाच केला आहे.की, प्रत्येक मुलाने शिकले पाहीजे..आणि फारच अडचण आली तर मी आहे ना आजी.
     बोला!... मुलीचे नाव काय?.. यांवर काहीवेळ आजी शांतच राहुन म्हणाली.. गुरुजी मी या मुलीचे काहीच नाव ठेवलेले नाही... खरतर याची मला कधी गरजच वाटली नाही.. मी तिला पोरी अशीच हाक मारते!.... अस कस आजी?.. कहितरी नाव तर लिहावच लागेल?... तुम्ही तिला पोरी म्हणून हाक मारता मग पार्वती लिहू?... म्हातारीने मान हलवली... वडलांचे नाव?.. पुन्हा आजी शांतच... आजी वडलांचे नाव?.. या प्रश्नावर आजी दचकली....तीन मुद्दामून पोरीला बकऱ्या पहायला बाहेर पाठवले... काय सांगु गुरुजी.?. ..अस म्हणत तिने त्या मुलीची जन्म कहाणी मोहनला थोडक्यात सांगीतली...एखाद्याच्या घरी जर राक्षस जन्माला आला तर.. थोड्याच दिवसांनी तो मोठा होतो आणि घरातील लोकांना व गावातील लोकांना खाऊन टाकतो.. म्हणुन त्याला काटयावर टाकून ताणत नेऊन दूर जंगलात नेऊन टाकतात.. ते राक्षस बाळ जो पर्यत रडत तो पर्यत लोक तेथे थांबतात.. रडणं थांबले की, काम झाला!.. असा शब्द बोलुन एक नारळ फोडतात.. व निघुन येतात...हे सर्वच ऐकून मोहन शॉक झाला...आजी! हे राक्षस वैगरे अस काहीच नसत.. स्त्रीच्या गर्भात काही दोष झाला तर विचित्र दिसणारी मुलं जन्माला येतात.त्यात विशेष असे काही नाही ! जगात आता पर्यत कितीतरी मुलं जन्माला आली असतील.. पण त्यांत कधी ते मुल राक्षस झाल..आणि त्यांनी माणस खाली.. अशी कधी बातमी ऐकिवात नाही आजी!.... हो!...हे मला चांगलच ठाऊक  आहे गुरुजी!..पण हे गावातल्या लोकांना  समजावणार.. कोण?..कारण तसं असत तर पोरीने मला कधीच खाऊन टाकले असते!... आणि आता तुम्हांलाही!...अस सांगुन आजी हसली... आजीचे हे सगळे बोलण ऐकून... मोहनच्या मनात आजी विषयी  प्रचंड आदर निर्माण झाला ...
     ठीक आहे आजी! तुम्ही तुमच नाव लावू शकता.... बरं आडनाव?... पुन्हा शांतता.. आडनाव कोणाचे लावणार गुरुजी?... तीच्या बापाचा तर मला पत्ता नाही.. कारण मी गावात कधी जात नाही.. त्या दिवशी कोणच्या घरी तिचा जन्म झाला हे माहिती नाही..... मोहनने मोठा सुस्कारा सोडला.. आजी मग तुमच आडनाव लिहा?.... माझ आडनाव?.. काय आहे माझ आडनाव?... मला तर नवऱ्याने सोडली... आणि.. माझ्या सख्या आई -वडिलांनी सख्या भावा- बहीनीनी भूताळी म्हणून आसरा दिला नाही... मग माझे आडनाव तरी काय?... आजीचे ते सगळं बोलण मोहनचे काळीज चिरून टाकत होते.... अंधश्रध्देने हा समाज किती खालच्या पातळीला गेला आहे.. याची त्याला जाणीव झाली ..काहीवेळ तो निशब्द झाला....
     ठीक आहे आजी! मी तीच नाव पार्वती शांता.. असच टाकतो आणि आडनावाचा रकाना तसाच ठेवतो...पार्वतीला स्पेशल केस म्हणून मी शाळेत दाखल करतो.  मोहनने रजिस्टर वर पर्वती शांता इतकंच नाव लिहून आडनावाचा रकाना रिकामीच ठेवला. एव्हाना ही बातमी गावात आगी सारखी पसरली की ,नवीन गुरुजी त्या भुताळीच्या मुलीचे शाळेत नाव दाखल करण्यासाठी गेला आहे..
      माळी सर!.. मी तुम्हांला संगितले होते.. थोड नियमात काम करत जा!.. आता त्या भूताळीच्या  मुलीच्या प्रकरणा वरून ग्रामशिक्षण समितीने तातडीची मीटिंग लावायला सांगीतलीय मला... आता तुम्हीच काय ती उत्तरे दया! मुख्याध्यापक रागा - रागात बोलत होते....
     मीटिंग सुरू झाली सगळे सदस्य चिडलेले होते... गुरुजी काय गरज होती त्या भूताळी मुलीचे नाव नोंदवण्याची?..ती मुलगी कोण? तीने कुठून आणली?...याची काहीच कल्पना नाही....आणि तिचे नाव तुम्ही नोंदवले?अध्यक्षांनी विचारले....त्या म्हातारीकडे ती मुलगी कुठून आली याची गावात कुणालाच खबर नव्हती...ती फक्त त्या आजीला आणि आता मोहनला माहिती होती.मात्र या विषयी त्याने कोणालाच काही संगितले नाही... कारण पार्वती  काटयावरच राक्षस बाळ आहे अस समजले तर  या प्रकरणाला वेगळे वळण लागले असते.. व पार्वती  शाळा प्रवेशाचा मार्ग अजुन खडतर झाला असता. साहेब!.. कायद्यानुसार सगळ्याना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे!... आम्हांला कायद्याची भाषा शिकवू नका गुरुजी!.. तुम्ही नवीन आहात.. गावातील कायदे कानून तुम्हांला माहिती नाही!...तुम्ही त्या मुलीचे नाव रद्द करा बस!.. अध्यक्ष रागात म्हणाले..
     तीच नाव रद्द होणार नाही!.. तिलाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे!.. बाकी आपली मर्जी.. मोहनने ठासून संगितले. हे प्रकरण तालुका जिल्हा पातळी पर्यंत गेले.. मोहनने आपली सगळी शक्ती पणाला लावली त्याच्या जोडीला अंधश्रद्धा निर्मुलन समिती होतीच.. शेवटी.. कायद्याचा बडगा उगारला.. शिक्षण समिती आणि विरोध करणाऱ्या सगळ्यावर  कायदेशीर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले तेव्हा कुठे.. पार्वतीला प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला..
      पार्वतीचा शाळेचा पहिला दिवस.. मोहन तिला स्वतः घरून घेऊन आला. कारण म्हातारीला गावात प्रवेश बंदी होती. तसही ती आलीच नसती कारण गावातील लोकांवर तिचा प्रचंड राग होता. पार्वतीने शाळेच्या गेटमधनं मोहन सोबत प्रवेश केला.  त्या कळ्या कुट्ट आणि काहीसे मोठे डोळे असणाऱ्या पार्वतीला पाहुन कोणी हसले तर कोणी घाबरले. तिला पहीलीच्या वर्गात बसवले. बाजूची मुलं तिला घाबरली. त्यामुळे काहीसे दूर सरकली..
    एक दोन महिने तर पर्वतीला सगळं निरिक्षण व समजून घेण्यात गेले. कारण तिच्यासाठी सर्वच नवीन होते. नंतर ती एक एक शब्द बोलु लागली. वर्गातील मुलांचीही आता तीच्या विषयी वाटणारी भीती कमी झाली होती. मोहन तीच्या प्रगतीवर नजर ठेऊन होता. त्या मनाने तिने सर्व लवकर आत्मसात केले. ती फारच कमी बोलायची. मात्र अभ्यासात तीने चांगली प्रगती केली.. दिवस चालले होते. पार्वती आता चवथीच्या वर्गांत गेली. अंतर्मुख असली तरी आभ्यासामध्येही फार चांगली होती. गणित विषयात तर नेहमी तिला पैकीच्या पैकी मार्क मिळत.. पार्वती चवथी अतिशय चांगल्या मार्कांनी पास झाली.. आता मोहनने तिला आजीची परवानगी घेऊन एका दूरवरच्या आश्रमशाळेत प्रवेश घेऊन दिला ..जेणेकरून तीची राहण्याची आणि जेवणाची सोय होईल.आश्रमशाळेत तिचा प्रवेश चवथीच्या दाखल्यावर झाला. त्यामुळे तेथे देखिल तिचे आडनाव नव्हते.
       मोहनने पार्वतीच्या शिक्षणाचाची योग्य ती व्यवस्था केल्या बद्दल  शांताची देखील बरीचशी काळजी मिटली. मोहनची बदली एका दुसऱ्या शाळेवर झाली...त्यामुळे आता  त्याचा पार्वतीशी संपर्क तुटला.
       जूनचा पहिला आठवडा सुरू होता. पार्वतीची शाळा सुरू व्हायला आता थोडेच दिवस शिल्लक होते. पार्वती आता नववीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने पास होऊन आता दहावीत बसणार होती. आश्रमशाळेत ती रुळली होती. मे महिन्याच्या सुट्टीत सध्या ती म्हातारी कडे होती.. आता एक आठवड्यात ती शाळेत जाणारच होती. आज   पर्वतीच्या नकळत. शांताने सगळ्या बकऱ्या खाटकाला विकल्या. पार्वतीने कारण विचारले तेव्हा ती म्हणाली.. पोरी! आता मी म्हातारी झाले. आता कुठे त्यांच्या मागे फिरू? आता तु देखिल दोन चार दिवसांनी शाळेत जाशील. म्हणून विकल्या. रात्री झोपताना. शांता काहीश्या जड आवाजात म्हणाली.. पोरी! आता मी बरीच म्हातारी झाली आहे. आता मी कधी मरेन काही भरवसा नाही. म्हणून तुला काही सांगायच आहे व दाखवायचे आहे. शांता उठली. तिने कपडयात गुंडाळलेली मोठी पत्र्याची पेटी काढली.  त्यांत अनेक वस्तु सोबत अजुन एक कुलप लावलेली लहान पेटी होती. शांताने ती उघडली त्यांत नोटांची थप्पी होती.  पोरी!..हे पैसे आहेत माझ्या आयुष्यभराची कमाई तूझ्यासाठी राखून ठेवली होती. यात तूझ शिक्षण पुर्ण होईल..ते पैसे तिने स्मशानाततुन जे सोन मिळवले होते त्याचे होते. याची खबर मात्र पार्वतीला नव्हती. तिला वाटले हे आज बकऱ्या विकल्या त्याचे असतील. पोरी! ही पेटी नीट जपुन ठेव.
     सकाळ झाली. शांता उठली नाही. पार्वतीने तिला उठवण्याचा भरपुर प्रयत्न केला. पण ती काही उठली नाही.. पार्वती आता मोठी होती.  तिला समजले माय देवाघरी गेली. तशी पार्वती खंबीर मनाची होती. मायला सगळी लोकं भूताळी समजतात हे ती जाणून होती. पण माय भुताळी नाही हे देखिल तिला माहीत होत. कारण इतक्या वर्षाचा सहवास होता तिचा. कधीतरी जाणवलं असत तिला. तीन डोळ्यांतील अश्रू पुसले. कारण तीच्या मदतीला कोणी येणार नव्हते. रात्री म्हातारीने दिलेली पेटी तीन बाहेर काढली. झोपडीतील सर्व लाकडे काढुन तीन तीच्या लाडक्या माय वर ठेवली आणि आपल्या दुःखाचा बांध सावरत तिने ती झोपडीच पेटवून दिली. अशा प्रकारे पार्वतीने आपल्या लाडक्या मायचा अंतिमसंस्कार केला आणि पेटी घेऊन तीच्या आश्रम शाळेकडे निघाली.
      पार्वती शाळेवर पोहचली. शाळा सुरू व्हायला अजुन काही दिवस बाकी होते. मात्र आश्रमशाळा असल्याने अधीक्षक शाळेवर हजर होते. पार्वतीने शाळेवर राहण्याची विनंती केली. अधीक्षकांनी ती मान्य केली. शाळा सुरू होईपर्यंत ती अधीक्षकांच्या घरी भांडी पाणी तसेच कपडे धुवुन देत असे त्यामुळे तीची जेवणाची अडचण दूर झाली. काही दिवसांनी शाळा सुरू झाली. पार्वती यंदा दहावीच्या वर्षाला होती. दिवस जात राहिले.
       आज मोहनच्या शाळेवर लगभग सुरू होती. कारण त्याच्या शाळेत आज तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन होते. यजमान शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्याची जबाबदारी मोठी होती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खुद्द जिल्हाधिकारी यांच्या मार्फत होणार होते. कलेक्टर शाळेत येणार म्हणून मोहन व शाळेतील सर्वच शिक्षक स्वागताची व इतर तयारी करत होते. इतक्यात जिल्हाधिकारी यांची गाडी त्यांच्या लवाजम्या सह शाळेच्या फाटकात आली सुद्दा. मोहन व इतर शिक्षक लगबगीने. त्यांच्या गाडी जवळ गेले..गाडीचा दरवाजा उघडला.. जिल्हाधिकारी मोहन जवळ येऊन  मोहनचे पाय धरून. आशीर्वाद दया सर!  आज मी तुमच्यामुळेच कलेक्टर होऊ शकले. माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत आहेत. पार्वती मॅडम !..हे काय सर? मला नुसत पार्वती म्हणा !. नाही मॅडम !आज तुम्ही कलेक्टर पदावर आहात.  पदाचा मान आहे तो! आणि तुम्हांला मॅडम  सांगतांना मला कमीपणा नाही तर आभिमान वाटतोय. मोहन आपले आनंदाअश्रू आवरत म्हणाला.
      आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पार्वतीने आपला संघर्ष वैगरे त्याचा काही उल्लेख केला नाही. पण ज्या व्यक्तिमुळे आपण संघर्ष करायला शिकलो त्या व्यक्तीचा म्हणजे मोहन सरांचा उल्लेख मात्र तीने आवर्जून आपल्या भाषणात केला आणि सगळ्याना असे शिक्षक मिळो अशी प्रार्थना केली. पार्वतीचे शब्द ऐकून मोहनचे डोळे पाणावले.
      कार्यक्रम आटोपल्यानंतर निरोप घेतांना पार्वती पुन्हा मोहन जवळ येऊन त्याच्या पाया पाडली व पर्स मधुन काढलेला लिफ़ाफ़ा मोहन च्या हाती देत म्हणाली. सर! तुम्ही जो माझ्या आडनावाचा रकाना रिकामा ठेवला होता. तो येत्या पंधरा तारखेला पुर्ण होणार आहे. तुम्ही सह परिवार मला आशिर्वाद देण्यासाठी या.

संग्रही: श्रुती मुंदडा (काबरा)

868. मी कात टाकली.

 आकांक्षा आणि आकाशचे लग्न होऊन वर्ष झालं होतं. राजा-राणी शिवाय आकाशचे आईवडील देखील त्यांच्यासोबत राहत होते. नव्याची नवलाई अर्थातच संपत आली होती. आकाशचे घराबाहेर राहणे वाढले होते. तो सुट्टीच्या दिवशी देखील घरी थांबत नव्हता. सगळे घर आकांक्षावर सोडून मित्रांमध्ये रमायला लागला होता. हल्ली तर तो मित्रांजवळ 'उगाचच लग्नाच्या फंदात पडलो' असे बरळत फिरायचा.
आकांक्षा लग्न करून घरी आल्या आल्याच सासूबाईंनी 'मी रिटायर्ड होतेय ' असे म्हणत सगळ्या घराचा ताबा सूनबाईला दिला. आकांक्षाला हे सगळे अनपेक्षित होते. एकंदरीत सगळ्यात कामाचा जेमतेम अनुभव असलेल्या आकांक्षाची नोकरी आणि घर सांभाळताना त्रेधातिरपीट उडू लागली. घरात सासू सासऱ्यांच्या सूचनांचे रूपांतर मग आज्ञेत होऊ लागले. आकांक्षा देखील सहन करणाऱ्या सूनांपैकी नव्हती. तिही प्रत्यूत्तर देऊ लागली. घरात वारंवार खटके उडू लागले. ते आकाशच्या कानावर आल्यावर तो आई बाबांचीच बाजू घेऊ लागला. आकाशला खरी बाजू ओळखता येत नव्हती.
त्या दिवशी आकाश घरी लवकर आला. त्याचा मूड खराब होता. आकांक्षाने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. तो काही न बोलताच मोबाईल मध्ये डोकं खूपसून बसला. आकांक्षाला वाटायचे लग्नाअगोदर आकाश किती वेगळा होता. भरभरून बोलायचा. स्वप्ने बघायचा. त्यांचा प्रेम विवाह नसला तरी एकमेकांना जाणून घ्यायला पूरेसा वेळ मिळाला होता.
आकांक्षा आता तिच्या मनातील एक महत्त्वाचा विचार सांगणार होती तर त्याचं बिनसलेलं.
शेवटी त्या रात्री तिने धीर करून विचारले.
" आकाश आपण वेगळे राहूया"
" काय ?"
" मला आता सगळं नाही सहन होत रे."
" म्हणजे नक्की काय म्हणायचेय तुला ?"
" अरे, तुला माझा त्रास दिसत कसा नाही रे?"
" मग नोकरी सोड." आकाश सहज बोलून गेला.
" मला शारीरिक त्रासाबद्दल काहीच वाटत नाही रे, मानसिक दृष्टया खचलेय मी, सासू सासऱ्यांशी आई वडीलांसारखे वागून पण ते सासू सासऱ्यांसारखेच वागत असतील आणि नवऱ्याला पण तेच बरोबर वाटत असेल तर आम्ही घरदार, आई वडील , भावंडे अगदी सगळेच सोडून परक्या घरी आलेल्या मुलींनी कोणाकडे पाहावे? आई वडील तर ' दिलीस तिकडेच मेलीस ' असं बोलतात." आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आले होते. तिला वाटले आकाश ते पुसेल आणि जवळ घेईल पण तसे काही झाले नाही. तो आपली उशी घेऊन सोफ्यावर झोपायला गेला.
" हे बघ आकांक्षा , हे सर्वांनाच सोसावे लागते. तू कायम सूनच राहणार आहेस का? कधी तरी सासू होशीलच की. प्लीज मला आता झोपू दे." आकाश गेल्यावर आकांक्षाला हूंदका अनावर झाला.
आकाशचे शब्द तिच्या कानात घुमत राहिले. ती सारी रात्र तिने तळमळत काढली. पहाटे उशीरा तिचा डोळा लागला. इतक्यात सहा वाजताचा अलार्म वाजला. तिला उठावेसे वाटत नव्हते. अंगात कणकण होती. पण तिच्याकडे पर्याय नव्हता.
विनय कॉफीचे घुटके घेत गॅलरीत बसला होता. त्याच्या एका पुस्तकाचे लेखन अंतिम टप्प्यात आले होते. सकाळपासून त्याच्यावरच काम चालू होते. त्या शिवाय त्याला एक महत्त्वाचे काम हातावेगळे करायचे होते. तो मोबाईलमधील नोटस् चालू करून टाईप करू लागला.
प्रिय आकाश,
तू अजूनही माझ्यासाठी प्रिय आहेस. आपली लहानपणापासूनची मैत्री एका शुल्लक कारणामुळे तुटली याला आता वर्ष होईल. आपण दोघांनीही वर्षभरात एकमेकांशी बोलायचा प्रयत्न केला नाही. तो प्रयत्न आज मी करतोय. पण मी जे तुला सांगणार आहे ते वाचून कदाचित मला समजून घेशील अशी आशा करतो. मी हे सर्व गेल्या वर्षभराच्या अनुभवातून सांगतोय.
मी घरजावई झालो हे तुला आवडले नाही हे मला माहीत आहे. पण मी तसं का केलं हे कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलास ? नाही. माझ्या लग्नाला देखील आला नाहीत. नंतर जेव्हा आपण भेटलो तेव्हा तू मला नाही नाही ते बोललास. अगदी बायला, बायकोचा बैल, ऐतखाऊ असं बोलून मला कुठेतरी आतून दुखावलस आणि मी सर्वांदेखत तुझ्या कानाखाली मारली. तू रागाने फणफणत निघून गेलास.
आकाश, मी जेव्हा लग्न करून दिप्तीच्या घरी राहायला गेलो. तेव्हा सुरूवातीला जावई म्हणून खूप लाड झाले. पण हे कोडकौतुक तिकडच्या मंडळींना समजून घेताना कुठेतरी निसटत होतं. पण इथे दिप्तीने मला सांभाळून घेतले. तिकडच्या लोकांनी मला घरजावई म्हणून कधीच वागवले नाही. मी त्यांच्या घरात राहत होतो म्हणून घरजावई होतो. अन्यथा माझे सर्व हक्क आणि अधिकार शाबूत होते. दिप्ती खूप खूश होती. ती तिच्या आई वडीलांच्या जवळ होती आणि त्यांची ती सेवाही करायची. काही गोष्टी स्वतः करून मी केल्या असं तिच्या आईवडिलांना सांगायची. आपण नवरे असं करतो का रे? आपण लग्न झालं की आपल्या आई वडीलांची जबाबदारी आपल्या बायकोवर ढकलून मोकळे होतो. त्यांची सेवा तिने करावी , त्यांच्याशी तिने चांगले वागावे अशी अपेक्षा ठेवतो. ते पहिले आपले आई वडील असतात मग आपण का नाही घेत आई वडीलांची काळजी? तू कितीवेळा बायकोला घरकामात मदत केली आहेस? उलट आपण तिला समजून न घेता तिच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकतो. नवीन घरात नवीन लोकांशी समजून घेताना एखाद्या स्त्रीचे काय होत असेल ते मी जाणलंय वर्षभरात. मला काही काम करावे लागले नाही पण नवीन जागा, नवीन माणसे समजून घेताना माझीही कुचंबना झालीच. जसा आपल्याला स्वाभिमान असतो तसाच त्यांनाही असतोच की. मुलगा घरजावई झाला की लोकं हसतात, कमी पणाचे वाटते मग त्या आपल्या आईवडीलांचे घर सोडून येणाऱ्या मुलीला काय वाटत असेल? मला घरजावई होऊन राहताना कोणी त्रास दिला नसला तरी आत कुठतरी सूप्त सुई टोचत असतेच. आई वडील, मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि शेजारी या सर्वांपासून दूर झालेच्या त्रास असतो तो. असच काही आपल्या बायकोचे होत असेल ना? मग तिने वेगळे राहायचा विचार केला तर चुकते कुठे? तिच्या मनात असा विचार येऊच नये यासाठी काहीतरी करायचे.
आकाश, तुझ्यापासून दूर होतो रे, पण मित्रांकडून तुझी खबर घेत होतो, तुझा मार्ग चुकतोय हे दिसत होते रे मला. तू मी जे काही बोललो त्यावर विचार कर. संसार दोघांचा असतो ना रे. मग एकालाच त्रास का? एका चाकाने धड असून पण हवा गेल्यासारखे का ओढत राहायचे ? मी फक्त एक वर्षासाठी घरजावई म्हणून राहणार आहे. आम्ही लेखक मंडळी लिखाणात खरेपणा येण्यासाठी तो विषय जगायचा प्रयत्न करतो. मी ' स्त्री तुझा जन्म कसा ' या विषयावर एक पुस्तक लिहीतोय. यासाठी मला लग्न झाल्यावर घर सोडून येणाऱ्या एका मुलीची बाजू समजून घ्यायची होती म्हणून मग मीच घरजावई व्हायचे ठरवले. दिप्तीला यातले काहीच माहीत नाही आहे. किंबहुना ती कधीही आमच्या घरी राहायला यायला तयार आहे. मी जेव्हा माझा घरजावई बनण्याचा निर्णय सांगितला तेव्हा तिला ही ते पटले नाही. तिने तीव्र विरोध केला. ती केवळ माझ्या इच्छेपोटी तयार झाली. माझे हे पुस्तक प्रकाशित झाले की मी परत आमच्या घरी राहायला येणार. माझ्या या निर्णयामुळे आई वडील , मित्र मैत्रिणी, नातेवाईक सगळेच दुखावले गेलेत. त्यांची समजूत काढेनही. तूही तुझ्या बायकोला समजून घे. अगदी वेगळेच राहा सांगणार नाही पण तुझ्या बायकोचा स्वाभिमान जप. तिची बाजू ऐकून घे. तिला कामात मदत कर. तिचे दुख समजून घे. काही गोष्टी तिच्या वतीने तू कर. कधी तिचे कौतुक कर. तू तिला मान दिलास तर दुनिया तिला मान देईल.
जास्त लेक्चर देत नाही. बाकी तुझं भलं तू जाणतोस. त्या थप्पडबद्दल मला माफ कर. तिथे माझीच चूक होती. माझा घरजावई होण्याचा बेत तुला अगोदरच सांगितला असता तर तो प्रकार घडला नसता. असो. काळजी घे. लवकरच भेटू.
तुझा मित्र
विनय.
सकाळी सकाळी आलेला विनयचा मोबाईलवरील मेसेज आकाशने वाचून काढला आणि विचारात गढला. मी खरचं असं वागायला नको होते. आता आकांक्षाचे वेगळे राहण्याचे मत बदलले पाहीजे. ती ऐकेल ही माझं. पण आई बाबांचे काय ? ते नीट वागतील का तिच्याशी ? आकांक्षाला सांगू समजावून, ते काही बोलले तर उत्तर नको देऊस. विनयला सांगून आई बाबांसाठीही असंच एक पत्र लिहायला सांगू. डोळे उघडणारे पत्र. माझे नाही का उघडले डोळे? इतके दिवस आकांक्षा सांगत होती ते डोक्यात शिरत नव्हते पण विनयने लग्न झालेल्या मुलीचे मन घरजावई बनून ओळखले आणि पहिल्या थिअरीचा यशस्वी प्रयोग माझ्यावर केला.
आकांक्षा बाबांना पोहे देत होती.
" मला पोह्यात शेंगदाणे आवडत नाही हे माहित आहे ना?" सासरे आकांक्षावर ओरडत होते.
" अहो, आकाशला पोह्यात शेंगदाणे लागतात तर मी काय करू ?"
" त्याच्या पोह्यात घालत जा, माझ्या नको." सासऱ्यांचे हे वाक्य ऐकल्यावर आकांक्षा काही तरी बोलणार एवढ्यात आकाश मध्ये पडला.
" थांबा बाबा, मी निवडून देतो शेंगदाणे." असे बोलून आकाशने बाबांच्या हातातील पोह्याची प्लेट आपल्याजवळ घेतली. बाबांनी आकाशकडे पाहिले. तो पोह्यामधील शेंगदाणे निवडून तोंडात टाकत होता आणि हसत होता. बाबांच्या तोंडातील शब्दही थबकले. वाढणारा वाद संपुष्टात आला होता.
आकांक्षाला आश्चर्य वाटले. एरव्ही कितीही मोठा वाद झाला तरी ढिम्मासारखा बसून राहणारा आकाश आज मध्ये पडून समंजसपणा दाखवत होता आणि कधी नव्हे तो घरी हसताना दिसला.
आकाशचे आईबाबा देवळात गेले होते. घरात ते दोघेच होते.
" अक्षू, ऐक ना." आकाश म्हणाला.
" हं, बोला." चेहऱ्यावरील खुशीचे भाव लपवत आकांक्षा म्हणाली. आज खूप दिवसांनी त्याने तिला अक्षू नावाने हाक मारली होती.
" आपण आज एका कपात चहा पिऊया का ?" तो किचनमध्ये येऊन तिला पाठीमागून कवेत घेत म्हणाला.
" माझा चहा झालाय." दुसरा गोड धक्का लपवत तिने त्याचा विळखा सोडवला.
" अक्षू मला माहीत आहे. तू माझ्यावर रागवली आहेस ते. मला थोडा वेळ दे. मी सर्व काही ठिक करेन. तुझा त्रास मला समजतोय. आपण तो त्रास दोघे मिळून कमी करू. आई बाबांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. "
असा बराच वेळ आकाश आकांक्षाला समजावत राहीला. आकांक्षाला सारं स्वप्नवत वाटत होतं. नवरा आपल्याशी प्रेमाने बोलतोय याचंच अप्रूप होतं. ती आतून खूप सुखावली होती. त्याचे आश्वासक शब्द तिला बळ देते होते. तिच्या मानसिक मरगळीने कात टाकली होती. तिने उभ्या उभ्याच आकाशच्या खांद्यावर आपले डोके ठेवले होते. एकमेकांच्या बाहूपाशात ते जणू कात टाकत होते. एक नवी सुरुवात करत होते. संसार फुलवण्याची स्वप्न बघत होते. रथाची दोन चाके आज मजबूत होत होती. तेवढ्यातच टिव्हीवर ' मी कात टाकली' हे गाणं वाजू लागले.

© नितीन दशरथ राणे
संग्रही: श्रुती मुंदडा (काबरा)

869. आंदण

 आजची सकाळ एकदम शांत होती. नेहमीप्रमाणे आवरणे, कामे करणे चालू असले तरी एक अजबसी गहन गंभीर शांतता पसरलेली होती. काहीतरी निमित्य करून सासूबाई गिरीशला पुन्हा पुन्हा खोलीत बोलावीत होत्या. मग त्याचे काहीतरी हळूहळू आवाजात बोलणे चालत होते. सासरे ते पाहूनही न पाहिल्यासारखे करत होते, वर्तमानपत्राच्या आडून ते देखील हे दृश्य पहात होते... पण बोलत काहीच नव्हते.
सई मनातल्या मनात हसली आणि चहा गाळला. नास्ता आधीच झाला होता.
"चहा..." असे म्हणाली आणि टेबलवर सगळ्यांसाठी चहा ठेवला. 
मग निवांत खुर्चीत बसून स्वतःच्या चहाचा आनंद घेऊ लागली.
सासूबाई आणि गिरीश खोलीमधून बाहेर आले. सासऱ्यांनी वर्तमानपत्र घडी घालून ठेवले आणि उठले. येता येता त्यांची सासूबाईंशी झालेली नेत्रपल्लवी सईने पाहिलीच.
"सई, कधी निघताय तुम्ही?" खुर्चीत बसता बसता अगदी साधारण प्रश्न विचारावा, असे सासूबाईंनी विचारले.
"चहा झाला कि निघूच..काय रे गिरीश?" तिने गिरीशलाच प्रतिप्रश्न विचारला.
"हो...हो...निघुयात! "
"मुले दोघेही संध्याकाळपर्यंत घरी येतील त्यांचा कॅम्प झाला कि! तोवर आम्हीही येऊच." सई म्हणाली.
"मग काय ठरवले आहेस सई तू? काय बोलणार, मागणार आहेस?" सासूबाई म्हणाल्या.
सई सावकाश हसली. तिने सासूबाई, गिरीश आणि सासऱ्यांकडे सावकाश पाहिले आणि म्हणाली, "हो ठरवले आहे पण वेळ आली कि बोलेन."
"अगं पण काय ठरवले आहेस? म्हणजे हे बघ घर मोठे, मोक्याच्या जागी आहे तुमचे. तुझ्या वडिलांनी तसे काही लिहून ठेवले नाही तर मुलीचा काही हक्क आहेच कि त्यावर." सासूबाई ठामपणे म्हणाल्या गिरीशकडे पाहून.
"हम्म..कायदा मलाही कळतो. चल गिरीश...मी आलेच पर्स घेऊन! " सई उठली आणि कप सिंकमध्ये ठेवत म्हणाली.
:
वाटेमध्ये गिरीश शांतच होता.
सईदेखील काहीच बोलली नाही.
महिन्यापूर्वीच सईच्या वडिलांचे निधन झाले होते. आई तर त्याआधीच गेली होती. तिच्या वडिलांचे दोन मजली मोठे घर आहे. मोठा भाऊ खालच्या मजल्यावर राहतो. वरचा मजला भाड्याने दिला होता. वडिलांचे बरेचसे खर्च ह्या भाड्यावरच निभावत होते. अगदी तस्सेच नियोजन करून त्यांनी वरचा मजला बांधला होता. तसा सुहास, सईचा मोठा भाऊ, वडिलांचे सगळे खर्च करतच होता पण त्यांच्या मनाचे समाधान.
सुहासने सांगितले, "बाबांनी मृत्यूपत्र केलेले नाही. तेव्हा एकदा सविस्तर बोलायला ये. येताना गिरीशलाही घेऊन ये."
म्हणूनच सई आणि गिरीश निघाले होते.
:
सई पोहोचली तेव्हा घरातील वातावरण शांत होते... जणू वादळापूर्वीची शांतता! 
"वहिनी, रिद्धी राहुल कुठे आहेत गं?"
"आलीस का सई, गिरीश. या या..." असे म्हणत वहिनी पुढे आली. "अहो, सई गिरीश आलेत.." असे म्हणत ती आतमध्ये पाणी आणण्याकरिता गेली.
आपल्याच घरात एक अजब असे दडपण घेऊन सई सोफ्यात बसून राहिली. नेहमीप्रमाणे पटकन आतही जावेसे तिला वाटेना. भिंतीवर आई-बाबांचा फोटो होता, त्याला ताज्या फुलांचा हार घातला होता. सई तो फोटो पहात होती. तेव्हाच, सुहास सावकाश बाहेर आला. पांढराशुभ्र सलवार आणि झब्बा घातलेला सुहास, त्याला पाहून सईला बाबांची आठवण झाली.
"दादा..."
"दोघेही आलात ते बरं झालं. शांतपणे बोलता येईल..." सईच्या हाकेला उत्तर देण्याचे त्याने टाळले, हे सईला जाणवले. ती अजूनच शांत झाली. 
"आधी जेवणे करायची का आधी..." वहिनी विचारतच बाहेर आली.
"आधी बोलूनच घेऊयात." सुहास पटकन म्हणाला.
"हो हो चालेल, आधी बोलूनच घेऊयात! " गिरीशही म्हणाला.
सुहास आत जाऊन एक फाईल घेऊन बाहेर आला. गिरीश सरसावून बसला. सईदेखील आश्चर्याने पाहू लागली. वहिनी सुहासच्या शेजारी बसली.
"सई, मी काय सांगतो ते सगळे शांतपणे ऐक. भराभर निर्णय घेऊ नकोस. गरज पडल्यास, नीट ऐक, गरज पडल्यास गिरीशशी बोल. पण तू कायद्याने सज्ञान आहेस. तुझे निर्णय तू घेऊ शकतेस, तूच घ्यावेस." सुहास म्हणाला. 
सई अजूनच गंभीर झाली.
गिरीशने फक्त तिच्याकडे पाहिले.
"हम्म.." सईने मान हलविली. 
सुहासने फाईल उघडली.
"बाबांनी त्यांच्या नावाने ह्या तीन FD ठेवल्या होत्या. गरज पडल्यास उपयोगी पडतील म्हणून. त्याचा नॉमिनी म्हणून माझे नाव आहे." सुहासने तीन पेपर हातात धरत सांगितले.
"पण दादा, हे तू मला का सांगतोस? बाबांनी येणारे भाड्याचे पैसे कसे गुंतवले हा त्यांचा निर्णय होता." सई म्हणाली.
"हे बघ, आपण काही श्रीमंत नाही. आपल्याकडे नोकरी करून जे पैसे आले तेवढेच पैसे. निवृत्तीनंतर बाबांना पेन्शन मिळणार नाही, हे माहिती असल्यामुळे त्यांनी आणि मी मिळून हा वरचा मजला बांधला. त्याचे भाडे मी बाबांनाच घ्यायला आणि त्यांच्याकडे ठेवायला सांगत होतो. त्यांनी आयुष्यभर कोणाकडे हात पसरलेले नव्हते. निवृत्तीनंतर त्यांच्याजवळ पैसे असावेत, म्हणून आम्ही मिळून हा निर्णय घेतला होता." सुहासने वहिनीकडे पाहून सांगितले.
"बरं! " सई म्हणाली.
"हि एक FD बाबांनी तुझ्यासाठी केली होती, ५०००० रुपयांची." सुहासने सांगितले आणि पेपर दाखविला. त्यावर नॉमिनी म्हणून 'सई गिरीश xxx' असे नाव होते. खाली सईची सहीदेखील होती.
गिरीशने डोळे चमकले आणि त्याने पेपर हातात घेतला आणि वाचू लागला.
"हो, मला माहितीये. बाबांनी हि FD का केली ह्याचे कारणही मला माहिती आहे."
"मला त्याबद्दल माहिती नाही. तुला सांगायचे असेल तर सांग. हा पेपर आजपासून तुझ्याकडे ठेव. तुझे नाव नॉमिनी म्हणून असल्यामुळे हे पैसे तुला सहज मिळतील." सुहास म्हणाला.
सईने गिरीशच्या हातामधून पेपर घेतला आणि आपल्या बाजूला ठेवला.
"पुढे...?" सईने विचारले.
"आईचे दागिने. इथे काही दागिने आहेत." त्याने वहिनीने दिलेला एक डबा हातात घेतला आणि टीपॉयवर ठेवला. "तुला जे हवे, जितके हवे तितके घे. एकूण किती दागिने वगैरे मला माहिती नाही. हा डबा बाबांकडे होता, तो त्यांनी हिच्याकडे दिला. आम्ही उघडूनही पाहिलेला नाही. तू काय किती घेतले हे मी पाहणार नाही, एक प्रश्नही विचारणार नाही."
"बरं..." सईने डबा हातात घेतला. डबा उघडला. त्यात हिरव्यागार रेशमी ब्लाऊजपीसमध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले होते. सगळे दागिने सई ओळखत होती. आईने घातलेल्या पाटल्या-बांगड्याशी तर ती लहान असल्यापासून खेळत होती. आईचा कंठहार, दोन पदरी बोरमाळ, कर्णफुले, मोत्याची नथ, अखंड सौभाग्यवतीचे मंगळसूत्र.... तिने त्यावरून अलवार हात फिरवला. घशात आलेला आवंढा गिळत तिने वाहिनीकडे पहिले.
तिच्या नजरेत ना असूया होती...ना लालसा...
सईने डबा सावकाश बाजूला ठेवला. म्हणाली "सांगते नंतर...पुढे बोल तू"
"हे घर! बाबांनी आपल्या कष्टाने हि जमीन घेतली. इथे घर बांधले. एक एक सुखसोयी केल्या. आजूबाजूला बाग फुलविली. मग उतारवयाचा विचार करून वरचा मजला बांधला. तो संपूर्ण मजला तेव्हापासून भाड्यानेच दिलेला आहे. दोन बिऱ्हाडे राहतात. त्याचे भाडे नियमितपणे येते." सुहास क्षणभर थांबला.
सई एकटक सुहासकडे पहात होती.
"बाबांनी तसे काही ठरवलेले नव्हते, नाही. तेव्हा तुझा काय विचार आहे. तुला ह्यात कसा वाटा हवाय?" सुहासने विचारले.
सई काहीच बोलली नाही.
तिची शांतता पाहून गिरीश म्हणाला "मी सुचवू का?"
"हो, अवश्य! " सुहास म्हणाला.
"हे बघ, दागिने किंवा बाकी कशात काय घ्यायचे ते सई पाहिलं पण मी काय सुचवतो म्हणजे म्हणतो कि एक भाडे आम्ही घेऊ एक तुम्ही घ्या, म्हणजे काय, काही हिस्सा तिलाही मिळाल्यासारखे होईल कायमस्वरूपी! " गिरीशने सावकाश एक एक शब्द शांतपणे उच्चारत सांगितले.
"सई, तुझे काय म्हणणे आहे?" सुहासने सईला विचारले.
"तू काय म्हणशील तसे करू दादा..." सई म्हणाली. तिने गिरीशकडे दुर्लक्ष केले हे सुहासलाही समजले आणि गिरीशलाही.
"मी काहीच सांगणार नाही किंवा सुचवणारही नाही, तू उत्तर दे आणि काय हवे ते घे." सुहास ठामपणे म्हणाला. त्याचा आवाज करारी झाला तसा वहिनीने त्याच्या हातावर आपला हात ठेवला.
:
काही वेळ शांततेत गेला. 
गिरीशने एक-दोनदा 'आपण बाहेर जाऊन बोलूयात का' असे सईला सुचविले पण सईने नकार दिला.
सगळेच बसून राहिले होते.
मनातला कढ थांबवत सई म्हणाली, "दादा, बरे झाले आज तू आम्हाला असे बोलायला बोलावलेस ते, म्हणजे मलाच माझ्याकडे एका वेगळ्या चष्म्यातून पाहता आले. माझे निर्णय झालेत. ऐक...
बाबांनी माझ्या नावाने ती ५०००० ची FD का ठेवली, ते मी तुला आणि गिरीशला आज सांगते. आमच्या लग्नानंतर घरात लगेचच धुसपूसी सुरु झाल्या. संसार टिकतो का मोडतो, हे समजत नव्हते. तुला आठवत असेल तर दोन-चार वेळा मी घरी म्हणजे माहेरी आले होते, पुन्हा कधी जाणार नाही असे ठरवूनच! आई-बाबांना माझी खूप काळजी असायची. त्यानंतर दोन मुले झाली, संसार टिकला....डगमगत पुढे सरकला. आता स्थिरसावर झालाय संसार. आता हा मोडणारही नाही आणि डगमगणारही नाही. 
पण पुन्हा कधी आयुष्यात परत यायची वेळ आलीच तर... म्हणून बाबांनी हे ५०००० माझ्या नावावर ठेवले होते. हे मला माहिती होते कारण मी ह्या पेपरवर सही केली होती. बाबांनी हे मला स्पष्टपणे सांगितले होते कि तेव्हा मी असेल नसेल, पण अशी वेळ आली तर सुहासवर एकदम दडपण येईल. तुझ्यासाठी तो वाट्टेल ते करेलच पण तरीही..त्याची परिस्थिती कशी असेल, त्याला त्याच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याला एकदम पैसे उभे करता येतील न येतील... म्हणून हे तुझ्या नावावर! तशीच गरज असेल तरच हे पैसे मोड किंवा सुहास, गिरीशलाही सांग. तोवर कोणालाही काही सांगू नकोस.
तर, आता हे पैसे, ह्या FD ची गरज संपलीय. मी आता ठाम उभी आहे, माझ्या पायावर! कारण ह्यासाठी मला जे शिक्षण हवे होते ते बाबांनी दिलंय. मला जे पाठबळ हवे होते ते बाबांनी दिलंय... आणि पुन्हा तशी वेळ आली, तर तू माझ्यामागे ठामपणे उभा असणार आहेस, हे मला माहिती आहे.  
तेव्हा, हि FD मी मोडून तुझी लेक रिद्धी आणि आमची लेक वैदही ह्याच्या नावावर हे पैसे करणार आहे.
"अगं पण सई, ते तुझे पैसे आहेत.आपण वापरू कशाला तरी किंवा तसेच FD म्हणून ठेवुयात." गिरीश म्हणाला
"गिरीश, ते पैसे माझे असले तरी अशी FD करण्याचे कारण तितके सुखावह नाहीये ना? म्हणूनच नकोय ते पैसे मला. ह्या दोघी उद्या सासरी जातील, तेव्हा त्यांना हे पाठबळ असू देत त्यांच्याजवळ."
"बरं, ठीक आहे..." सुहास म्हणाला.
"आता तो दागिन्यांचा डबा...." सईने डबा हातात घेतला. त्या दागिन्यांवरून हात फिरवत म्हणाली "हे सगळे दागिने मला माहिती आहेत. वेळोवेळी आईने घातलेले, वाहिनीने ल्यायलेले आहेत. मी देखील उत्साहाने घालून मिरवायची हे दागिने माझ्या लग्नाच्या आधी. 
मग माझे लग्न झाले. मला माझे स्वतःचे असे दागिने मिळाले, अगदी लग्नात मागून २० तोळे घेतले, त्याचे दागिने...! मला हा अजिबात निर्णय आवडला नव्हता. २० तोळे मागितले माझ्या सासरच्यांनी! सगळी शिकलेली माणसे पण २५ वरून २० तोळ्यावर आली म्हणून भांडणे, कुरबुरी सोसल्या आहेत मी. म्हणजे बाबांनी तेव्हाही २० काय अगदी २५, ३० तोळे सोने दिलेही असते आणि दिलेच २० तोळे सोने तेव्हा... पण ते ज्या भावनेने, ज्या जबरदस्तीने दिले... ते मला आवडलेले नाही.
लग्नानंतर लगेच हा विषय जोर धरू लागला आणि मग...त्यातूनच मी घरी परत आले होते. पुन्हा सासरी जाणार नाही...असे सांगून! बाबा पण खूप चिडले होते, आई तर सतत रडायची. तेव्हा आई म्हणाली होती 'हवे तर माझे सगळे दागिने घेऊन जा...पण सुखाने नांद बाई तिथे'
माझ्या हातात होते का असे एक एक तोळ्यासाठी भांडणाऱ्या माणसासोबत संसार करणे! पण केला संसार... तरले! कशी ते एक मला माहिती नाहीतर दुसरे त्या देवाला आणि आई-बाबांना.
तर ऐक माझा निर्णय, आज माझ्या नवऱ्याची इतकी ऐपत आहे, त्याला इतका पगार आहे कि तो मला हवे तसे हव्या तितक्या तोळ्याचे दागिने कधीही करू शकेल. पण हे माझ्या माहेरचे दागिने माझ्या वहिनीवरच जास्त खुलून दिसतील. ज्या दागिन्यांमध्ये मी आईला पाहिले त्याच दागिन्यांमध्ये मला वहिनीला पहायला आवडेल. आणि दागिने वहिनीकडे राहिले म्हणून माझा हक्क का कमी होणार आहे? त्याच हक्काने मागून घेईन वहिनीकडून एखाद्या दिवशी घालायला."
सईने डोळ्यातले पाणी पुसले तसे वाहिनीने तिचे भरून आलेले डोळे पुसले.
"सई, अगं तुझ्या आईची आठवण म्हणून एखादा तरी दागिना घे." गिरीश धुसपूसत म्हणाला.
"तुझ्या आईची आठवण... माझ्या आईची आठवण ना, आहे माझ्याकडे! आणि या पुढे मी वहिनीला तिच्या रूपात पाहीन. मला त्यासाठी दागिना नकोय." सई शांतपणे म्हणाली.
सईने तो दागिन्यांचा डबा बंद करून सुहासकडे परत दिला. 
"आता मी म्हणतोय तसे एक भाडे तरी घेऊयात. आपल्यालाही उपयोगी पडेल. पुढेमागे वेदांतला ऑफिस किंवा रहायला उपयोगी पडेल." गिरीश म्हणाला.
"हो, मी घेणार आहे ना निर्णय.. मग मला सांगु देत..." सई गिरीशला थांबवत म्हणाली.
एकदम सुहासकडे पहात म्हणाली "किती भाडे येते रे दादा?"
"एका बिऱ्हाडाचे २००० रुपये महिना. वीज आणि पाणी बिल तेच भरतात." सुहासने सांगितले.
"ह्म्म्म...म्हणजे २४००० रुपये वर्षाला. पण फार कमी आहेत रे...."सई म्हणाली.
"तुला हवे असेल, कमी वाटत असतील तर दुसऱ्या बिऱ्हाडाचे पैसेही तूच घे. तुला जे योग्य ते कर, माझी काहीच हरकत नाही. आणि हे मी अगदी सहज सांगत आहे, रागाने सुचवत नाहीये." सुहास लगेच म्हणाला.
"मला माहितीये रे...पण तरीही पारडे जडंच होत नाहीये! " असे म्हणत सई हसायला लागली. तिचे बोलणे न समजल्याने सगळेच तिच्याकडे पहायला लागले.
"काय बोलतीयेस, सई?" वहिनी म्हणाली.
"मला हे घर 'माझे माहेर' म्हणून आंदण हवे आहे. ह्यावर माझा कुठलाही हक्क नाही आणि म्हणले तर माझा संपूर्ण हक्क असेल." सई म्हणाली.
"सई, काय म्हणालीस काहीच समजले नाही." गिरीश चिडत म्हणाला.
"सांगते, अगदी समजावून सांगते तुम्हाला... हे घर मला माझे माहेर म्हणूनच हवे आहे. ह्यावर कायद्याने मला कोणताही हक्क नको. 
माहेर म्हणले मी इथे कधीही केव्हाही येणार, वहिनीला ऑर्डर देणार, खायला करायला सांगणार, हक्काने तिच्या नवीन साड्या नेसणार, दादाला हुकूम सोडणार, रात्री-अपरात्रीपर्यंत भाच्चाशी गप्पा मारणार, गौरी-गणपती, दिवाळी.. माझी हक्काची भाऊबीज सगळे मी आनंदाने उपभोगणार. हक्क मागितला तर ह्यावर पाणी सोडावे लागेल आणि मग ते पारडे जड होणार नाही रे त्या २४००० रुपयांच्या भाड्यापुढे! 
आज कायद्याने हक्क मागितला तर प्रेमाचा हक्क कमी होईल. मान ताठ करून घरात येते तो ताठा कमी होईल. आनंदाच्या प्रसंगी येते तसेच दुःख वाटून घ्यायलापण येते, ते येणं होणार नाही. त्यापेक्षा नकोच हे काही...
(गिरीशकडे पहात सई पुढे म्हणाली) आमचा एक फ्लॅट आहे, सध्या भाड्याने दिलेला. वेदांत अजून शिकतोय. त्याला हवा असेल तर तो वापरू शकेल किंवा तोवर अजून एखादा फ्लॅटसुद्धा घेऊ आम्ही. 
तेव्हा, मला हे घर माझे माहेर म्हणून आंदण हवे आहे. ह्यावर माझा कायद्याने कुठलाही हक्क नाही पण प्रेमाचा हक्क मात्र असेल."
"अगं पण सई..." गिरीशला पुढे काही बोलायला सुचलेच नाही.
सुहासने फाईल मिटली. डोळ्यांमधून येणारे पाणी टिपले.
"मी निर्णय घ्यायचा होता ना, घेतला. संपलं बोलून.....आता जेवणे." वहिनीच्या गळ्यात पडत सई म्हणाली, "मला माहितीये वाहिनीने नक्की मसालेभात आणि श्रीखंड केले असणार, मला आवडते म्हणून! मी काहीही मागितले असते तरी आणि नसते तरी... मला गोडधोड खायला घालूनच माझी पाठवणी केली असती...."
"हे बाकी खरंय हा नणंदबाई ! मसालेभात आणि श्रीखंडच आहे जेवायला...! "
:
आंदण - अर्थ - मुलीच्या वडिलांनी मुलीला वा जावयाला लग्नात हुंड्याव्यतिरिक्त द्यायची गोष्ट.

© सौ आरती अत्रे-कुलकर्णी
संग्रही: श्रुती मुंदडा (काबरा)

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...