जगप्रसिध्द विचारवंत पास्कल यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की,जर माणसांनी अकारण बडबड करणं थांबवलं तर जगातील ९०% प्रोब्लेम्स कमी होतील. आपण दिवसभरात किती अनावश्यक बोलत असतो, हे ज्याचं त्यानं पहावं.मानसशास्त्र असं सांगतं की,वेड्यांना बोलायला खूप आवडतं.किंबहुना अती बोलण्यामुळेच ते वेडे झालेले असतात.वेड्यांच्या इस्पितळात जाऊन पहा,म्हणजे कळेल. सगळेच वेडे काही इस्पितळात असतात,असं थोडंच आहे? काही बाहेर ही मोकाट फिरत असतातच की. फक्त वेड्यांनाच असं वाटत असतं की,आपण वेडे नाही आहोत म्हणूनअसो. मग मौन रहायचं म्हणजे अजिबात बोलायचंच नाही का? तर तसं नाहीये.
मौन म्हणजे गरजेपुरते बोलणे. पण माणसाचं मन नेहमी एका टोकावर जात असतं.एक तर अती बडबड करतील नाहीतर मग अजिबात बोलणारच नाही.काही माणसं फारच हुशार असतात,ते तेंव्हाच बोलतात,जेव्हा त्यांचा काही फायदा असतो. प्रत्येक घरात नवरा बायकोची भांडणे चालू असतात,त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे बोलणं. वाद विवादाच्या प्रसंगी जर दोघांपैकी एक जण मौन राहिला तर वाद कधीच विकोपाला जाणार नाहीत. पण मीच का माघार घेऊ,या अहंकारी विचाराने कुणीच माघार घेत नाही आणि त्याचे शेवटी गंभीर परिणाम भोगावे लागतात. ज्याच्या हृदयांत जास्त प्रेम असतं ना,तोच नेहमी माघार घेत असतो. इथं हरणाराच जिंकत असतो,हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादी स्त्री विवाह करते तेंव्हा ती फक्त पतीशी नातं जोडते,इतरांशी नाही.ती सासू सासऱ्याशी,दिराशी वा अन्य कुणाशीही नातं जोडायला जात नाही.त्याची गरज ही नसते. कारण इतर नाती ही आपोआपच जोडली जातात.तसंच एकदा का मौन साध्य झालं की,बाकीचं सगळं कसं आपोआप जोडलं जातंय ते अनुभव घेऊन पहाच.
प्रत्येक जण असाचं विचार करतो की,दरवेळी मीच का म्हणून गप्प बसायचं? पण ज्याला नातं टिकवायचं आहे ना,तोच मौन होतो.बोलण्याने आपली अध्यात्मिक ऊर्जा त्वरित नष्ट होऊन जाते,हे लक्षात घेऊन तारतम्याने वागलं पाहिजे आणि ह्या गोष्टी साधकाने पाळल्या पाहिजेत. जे साधक नसतील,त्यांच्यासाठी हा लेख नाहीय. त्यांनी याकडे दुर्लक्षच करावे, हे उत्तम. कारण देवाने प्रत्येकालाच आपलं आयुष्य आबाद आणि बरबाद करायचं स्वातंत्र्य दिलं आहे. प्रत्येकाचा तो मुलभूत अधिकार आहे. लोकं तेच समजतात, जेवढी त्यांची समज असते. बोलण्याआधी हा विचार करा की, हे बोलायची खरोखरच गरज आहे का? हो उत्तर आलं तरच बोला. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करूनच बोलावं. मौनात अहंकार नष्ट होतो. प्रयोग करून पहावा ज्याचा त्यानं. एक असीम शांतता हृदयांत स्थिरावत जाते. जितकं मौन रहाल तितकं नामस्मरण ही छान होईल. सवय लावून घ्या, की मौन झाल्याबरोबर लगेच नाम सुरू होईल. मेंदूसंपावर असला की तोंड चालू रहाते.कारण उथळ पाण्यालाच खळखळाट जास्त असतो.मौन झाल्याशिवाय आतला आवाज ऐकूच येणार नाही.जोपर्यंत काही बोलायची उर्मी येत आहे,तोपर्यंत शांतच राहिलं पाहिजे. एकदा का हृदयातील वीणा झंकारु लागली की,मग कळेल मौन साधनेचं महत्व. शब्दांत ब्रम्ह लपलेलं आहे,म्हणून तर मंत्राची निर्मिती झालीय ना? शब्द हे शस्त्र आहे.शब्दाने होणाऱ्या जखमा अनंत काळ ताज्या रहातात. कुणाचंही मन दुखावणे म्हणजे ईश्वरालाच दुखावणे आहे.त्याची किंमत आज ना उद्या मोजावीच लागेल, यात तिळमात्र ही शंका नाही, पण तारतम्य महत्वाचे. जेंव्हा काहीच मनासारखं होत नाही ना,तेव्हा समजून जा की कुणाचं तरी मन दुखावण्याची शिक्षा चालू आहे. ईश्वराला दुखावून त्याच्याकडूनच परत कृपा होण्याची अपेक्षा करणं, याहून दुसरा मूर्खपणा तो काय असेल? मौन ही प्रेमाची भाषा आहे. म्हणून अध्यात्मात ध्यान हेच सर्वश्रेष्ठ आहे.ज्याने कधी कुणावर जीवापाड प्रेम केलं असेल ना, फक्त त्यालाच मौन म्हणजे काय हे रहस्य समजेल.
मौन आणी क्षमा,हे सर्व साधनेचे रहस्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा