एका सात वर्षाच्या मुलीला एक शिक्षक गणित शिकवित होते. त्यांनी तिला प्रश्न विचारला,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?''
मुलीने काही काळ विचार केला आणि बोटे मोजत उत्तर दिले,'' चार पेरू''
शिक्षक आश्चर्यचकित झाले, त्यांना वाटले की मुलीने नीट ऐकले नसावे म्हणून त्यांनी प्रश्न पुन्हा विचारला,'' बाळा प्रश्न नीट ऐक,''
समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?''
मुलगी शिक्षकांच्या आश्चर्यचकित चेह-याकडे पाहत विचार करू लागली मगाशी मी चार उत्तर दिले तर शिक्षक आश्चर्यात पडले आता असे काय उत्तर द्यावे जेणेकरून ते खुश होतील. तिच्या डोक्यात असा विचार जरा सुद्धा स्पर्शून गेला नाही की खरे उत्तर द्यावे तिला फक्त असे वाटत होते आपल्या उत्तराने शिक्षक खुश झाले पाहिजेत.
ती पुन्हा बोटे मोजू लागली व तिने उत्तर दिले, '' सर चार पेरू माझ्याकडे असतील.''
आता शिक्षक निराश झाले व विचार करू लागले की या मुलीला बहुधा पेरू आवडत नसावेत म्हणून ती चुकीचे उत्तर देत आहे म्हणून त्यांनी प्रश्न बदलून विचारायचे ठरवले .
बाळा समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि मग पुन्हा एक चिकू दिला तर तुझ्यापाशी किती चिकू होतील?''
मुलीने परत बोटे मोजली व उत्तर दिले,'' सर तीन चिकू असतील माझ्याकडे''
शिक्षकांना याची मोठी गंमत वाटली कि तीन वेळेला चुकीचे उत्तर देणारी मुलगी चौथ्या वेळेला कशी काय बरोबर उत्तर देते.
त्यांना वाटले की आता या मुलीला गणिताची गंमत कळाली.
म्हणून त्यांनी परत आपला पहिलाच प्रश्न रिपीट केला,''समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?''
मागच्या वेळचे उत्तर बरोबर आल्याने मुलीचा आत्मविश्वास आता वाढला होता तिने फारसा वेळ न दवडता उत्तर दिले,'' सर माझ्याकडे चार पेरू असतील''
हे चुकीचे उत्तर ऐकून शिक्षक संतापले व तिच्या दिशेने जात जोरात ओरडले,'' तुला काही डोक्याचा भाग वगैरे आहे की नाही, जरा मला पण सांग की चार पेरू कसे काय होतील तुझ्याकडे''.
सरांना असे रागावलेले पाहून ती छोटीसी मुलगी रडू लागली, डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत असतानाच ती मुलगी दप्तर शोधू लागली, दप्तरात हात घालून तीने दप्तरातील एक पेरू काढून शिक्षकांना म्हणाली,'' सर तुम्ही मला तीन पेरू देणार आहात आणि माझ्याकडचा एक पेरू मी त्यात मिसळला तर त्यामुळे सर मी चार पेरू हे उत्तर देत होते.''
बहुतांशी असेच घडते. ब-याचदा, समोरच्याकडून जर अनुकुल प्रतिसाद आला नाही तर आपण आपला संयम गमावून बसतो पण त्याची बाजू काय आहे हे आपण कधीच समजून घेत नाही. त्याचा त्यापाठीमागील तर्क, त्यावेळची परिस्थिती, तो ज्या संस्कृतीमध्ये वाढला आहे त्याचे संस्कार याचा आपण कधीच विचार करत नाही ना. जर आपल्या मनासारखा प्रतिसाद समोरच्याकडून आला नाही तर त्याचीही कृपया बाजू समजून घ्या. काय सांगावे त्याच्याजवळ असणारा तो छुपा पेरू आपल्याला दिसतही नसेल कदाचित.
'शब्दगंध'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा