आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढल्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा.
घरांतील माणसे जिवाला जीव देणारी असतात. प्रकृती बिघडली तर पहिली धाव घेऊन डाॅक्टरांकडे नेतात ती आपली घरांतील माणसे. नंतरही ती सेवा करतात. आई, पत्नी, मुले जी काळजी घेतात तशी हाॅस्पिटलमध्ये घेतली जात नाही. त्यात 'ड्युटी' असते, आपुलकी नसते. म्हणून रुग्णाला लवकर डिस्चार्ज घेऊन घरी यावेसे वाटते. कारण घरात वात्सल्यमूर्ती आई असते. 'मदर' नसते. प्रेमळ बहिण असते, 'सिस्टर' नसते.
आपल्या आईला रागाच्या भरात ओरडताना मुलामुलींनी आठवावे की आपल्या आजारीपणात आपल्याला उठवतही नव्हते, एकहीजण जवळ येत नव्हता तेंव्हा फक्त आईने रात्र रात्र जागून आपले स्पंजिंग केले, घाम पुसला, मलमूत्र स्वच्छ केले, चहा पाजला, जेवण भरवले, सारखे खोलीत येऊन डोक्यावरून हात फिरवला तर या आईचा असा अपमान ? मातृसौख्याला बालपणीच मुकलेल्यांना विचारा मातृवियोगाचे दु:ख काय असते. म्हणून आपल्या प्रेमळ मातेचे, कष्टाळू पित्याचे, भावंडांचे, मित्रांचे, गुरुंचे ऋण कधीही विसरू नये. घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे. वडील खूप ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत.
घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृष्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो.
शुभ लहरींचे ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.
एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. सफाई कामगाराला बक्षिस दिले तर तो हात उंचावून आशिर्वाद देणार नाही, थँक यु म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंदलहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फिल्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतीलच. म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे.
फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते. म्हणून मंत्रपठण करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा. घरातही असा भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडा ओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.
"शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो असे भगवान दत्तप्रभू सांगतात."
|| श्री गुरुदेव दत्त ||
लेखक : शरद उपाध्ये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा