बुधवार, ३ जुलै, २०२४

1243. ९०/१० तत्व

      फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो. उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे. या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे. 
      उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला. हे फक्त १०% झालं. यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे. तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस." असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत. तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली. तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे. तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात. तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली. २० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं. तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला. दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे  संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले. आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय. का?
कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद. 
तुमचा दिवस वाईट का गेला?
* त्याला कारण कॉफी होती?
* त्याला कारण मुलगी होती?
* त्याला कारण पोलीस होते?
* त्याला कारण तुम्ही स्वतः होता?
उत्तर
तुम्ही स्वतः
कॉफी चं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं. त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला. काय करायला हवे होते? कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली. तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे." आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता. मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता. तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात. फरक पहा. दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा. खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो. उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.
९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे?
* जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका. पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा. त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या. चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे  मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.
* रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता? तुम्हाला राग येतो? तुम्ही दात ओठ खाता? स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता? मुठी आवळता? भांडायला जाता? तुमचा श्वासोत्वास वाढतो?
*तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे? ९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा. तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काची ऑर्डर तुम्हाला न मिळता दुसऱ्याला गेली आहे असे तुम्हाला कळले तर?
* मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका.
* तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा. बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले. 
* संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
•  पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे. 
* वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा.
* आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा.
९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुया .

" तणावाचे व्यवस्थापन" 
आनंद महाजन.
योग प्रशिक्षक, अमरावती.
९४२२९४९५६४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...