शनिवार, ७ जानेवारी, २०२३

138. प्रेमाचे एक स्मारक

     पंजाबच्या चिनाब नदीच्या काठी एका गावात कुंभार समाजात सोहनी नावाचे रत्न जन्माला आले. सोहनी अतिशय सुंदर होती. त्याचवेळी एका मोगल व्यापाऱ्याच्या घरी इज्जत बेग याने जन्म घेतला. पुढे हाच सोहनीचा प्रियकर महिवाल म्हणून ओळखला जाऊ लागला. या दोघांची प्रेम कहाणी आज फक्त पंजाबातच नव्हे तर देशभरात प्रसिध्द आहे. इज्जत बेगला फिरण्याची खूप आवड. त्याने आपल्या वडीलांची परवानगी घेऊन देश फिरण्याच्या निर्णय घेतला. दिल्लीत त्याचे मन रमले नाही. मग तो लाहोरला गेला. तिथेही तो लवकरच कंटाळला. मग आपल्या घरी परतण्याचे त्याने ठरविले. रस्त्यातच तो गुजरातमध्ये एका ठिकाणी थांबला. तिथे त्याने सोहनीला पाहिले. तिला पाहिले आणि तो सर्वकाही विसरला. तो तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला की त्याने तिच्या घरी जनावरे पाळण्याची नोकरी पत्करली. पंजाबमध्ये म्हशींना माहिया म्हणतात. त्यामुळे म्हशींना चरायला नेणारा तो महिवाल. म्हणून त्याचे नाव पडले महिवाल. अतिशय सुंदर होता. महिवाल सोहनी दोघही परस्परांच्या प्रेमात पडले.
     पण सोहनीच्या आईला ही बाब कळाली तेंव्हा तिने सोहनीलाच फटकारले. पण त्याचवेळी सोहनीने महिवाल मूळ एका व्यापाराचा मुलगा आहे आणि तो केवळ आपल्या प्रेमासाठी जनावरे चारतो, हे आईला सांगितले. शिवाय त्याच्याशी लग्न झाल्यास आपण जीव देऊ असा इशाराही तिने दिला. सोहनीच्या आईने महिवालला घरातून हाकलून दिले. महिवाल जंगलात राहून सोहनीच्या नावाने रडू लागला. इकडे सोहनीची अवस्था काही वेगळी नव्हती. पण तिच्या विरोधाला जुमानता तिचे लग्न इतर कुणाशीतरी करुन देण्यात आले. पण सोहनीला ते अजिबात मान्य नव्हते.
     इकडे महिवालने आपल्या रक्ताने लिहलेली चिठ्ठी सोहनीला पाठविली. ती वाचून सोहनीने त्याला उत्तर दिले की, मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन. त्यानंतर मग महिवाल साधूचा वेश धारण करुन सोहनीच्या घरी गेला. दोघांच्या भेटी होऊ लागल्या. पुढे सोहनी मातीच्या मडक्याच्या आधारे नदी पार करुन महिवालला भेटायला जायची. दोघेही प्रेमरत अवस्थेत तासन्तास बसायचे. ही बाब सोहनीच्या वहिनीला कळली. तिने मातीच्या पक्क्या मडक्याऐवजी कच्चे मडके ठेवले. सोहनीला ही बाब कळली. पण प्रियकराला भेटण्याच्या खूप आतुरतेने सोहनी ते मडके घेऊन नदीत उतरली. पण अखेरीस ते मडके फुटले आणि ती पाण्यात बुडून मरण पावली. इकडे महिवाल तिची वाट बघत बसला. पण सोहनीचा मृतदेह त्याच्या पायाला लागला तेंव्हा त्याला वस्तुस्थिती कळली. आपल्या प्रियसीचा मृत्यू झाल्याचे कळताच तो वेडा झाला. त्याने सोहनीला बाहूपाशात घेऊन नदीत उडी मारली.
     सकाळी मच्छिमारांनी माशासाठी जाळे टाकले. त्यावेळी जाळ्यात त्यांना सोहनी महिवालचे परस्परांना बाहूपाशात घेतलेले मृतदेह आढळले. गावकऱ्यांनी त्यांच्या प्रेमाचे एक स्मारक बांधले. या स्मारकाला हिंदू लोक समाधी तर मुस्लीम लोक मजार म्हणतात. अर्थात असे असले तरी. प्रेम हे प्रेमच असतं. त्याला धर्म जातीचे बंधन नसते हे खरे !

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...