मंगळवार, १० जानेवारी, २०२३

144. ... पण नियतीला ते मान्य नव्हतं.

       ही सत्य घटना आहे. मी यंदाच्या सुट्टीत माझ्या काकांच्या घरी गेलो होतो. त्याचं घर गावापासून थोडंसं दूर आहे. काकांचा दुधांचा व्यवसाय आहे. तिथेच त्यांच्याकडे काम करत असलेल्या मुलाची ही कथा आहे. त्या मुलाचं एका मुलीवर खूप मनापासून प्रेम होतं आणि त्या मुलीचंसुध्दा. दोघेही एकाच जातीचे होते पण दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नासाठी विरोध होता. ज्या दिवशी मुलीच्या घरच्यांना त्याच्याबद्दल कळाले तेंव्हा त्यांनी त्या मुलाला खूप मार मार मारले आणि गावाच्या बाहेर नेऊन फेकून दिले. मुलाचं नशीब चांगलं म्हणून तो बिचारा कसाबसा त्यातून वाचला. त्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या एका लांब गावात आपल्या नातेवाईकांकडे उपचारासाठी आणून ठेवले. दोन महिन्यांत तो बरा झाला. पण त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं. त्याने तिला संपर्क केला आणि त्या दोघांचे असे ठरले की गावात त्या मुलाच्या मित्रांची मदत घेऊन पळत जायचं. पण एक अडचण होती की त्या मुलीला अठरा वर्षे पूर्ण होण्यास तीन महिने बाकी होते. त्या मुलाच्या मित्राने त्याला एक कल्पना सुचवली. तुम्ही इथून पळून जा. देवळात लग्न करा आणि तीन महिने मी सांगतो त्या ठिकाणी लपून रहा. माझ्या ओळखीचं एक गृहस्थ आहेत ज्यांचा दुधांचा व्यवसाय आहे आणि त्यांचं घर सुध्दा गावापासून थोडं लांब आहे. (ते गृहस्थ म्हणजे माझे काका) तू त्यांच्याकडं छोटीशी नोकरी कर. तुला माझ्या सांगण्यावरुन रहायला छोटंस घरपण देतील आणि नोकरीपण. ठरल्याप्रमाणे सर्व झालं. देवळात लग्न करुन त्या दोघांना त्यांचा तो मित्र माझ्या काकांकडे घेऊन आला. सर्व प्रकार सांगितला
       काकांनी रहायला घर आणि नोकरीपण दिली. ती मुलगीपण शिकलेली होती. त्यामुळे तिनेही काकांचया मुलांचा होमवर्क घ्यायचं काम केलं. पण त्या दिवशी प्रकरण काही वेगळंच वाटत होतं. मी घरातून बाहेर बघितलं तर तो मुलगा आणि मुलगी खपू टेनशनमध्ये दिसत होते. मुलगा तर खूप घाबरला होता आणि मुलगी खाली मान घालून उभी होती. ते दोघे माझ्या काकांशी काही बोलत होते. काकांना विचारल्यावर मला कळाले की मुलींच्या घरच्यांनी त्या मुलाविरुध्द तक्रार पोलिस स्टेशनमध्ये  नोंदवली आहे. पोलिसांनी तपास करत त्या मुलाचा शोध लावला ज्याने दोघांना पळण्यात मदत करुन काकांकडेआणून सोडले होते. त्यांनी कसून चौकशी केली. खूप मारलं पण तरीही त्या मुलाने आपले तोंड नाही उघडले. पोलिस त्याला सतत त्रास देतच होते. पण त्या मुलाच्या सासूला माहित होते की आपल्या जावयाने त्या दोघांना कुठे लपवून ठेवलेय ते. पोलिस सारखे आपल्या जावयाला त्रास देत आहेत हे पाहून तिने पोलिसांना खरं काय ते सांगून टाकले होते. या सर्व टेन्शनमुळे ते घाबरले होते. पोलिस कधीही तिथे पोहचले असते. त्यामुळे काका आणि काकांचा मोठा मुलगा दोघेही विचारात पडले होते. त्या मुलीला अठरा वर्षे पूर्ण व्हायला अजून एक महिना बाकी होता. अजून एकच महिना कसंतरी लपून रहायचं होतं. तितक्यात काकांना एका मित्राचे घर आठवले जे औरंगाबादला रहायला होते. काकांनी त्यांना सांगितले की, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे निघा. मी माझ्या मित्राला फोन करुन सांगतो. तो तुमची सर्व सोय करुन देईन. एक महिना तिथे थांबा. मग मी तुमचं लग्न लावून देईन. मग इथेच रहा माझ्याकडे. पण ते दोघे खूप घाबरले होते अजूनही. त्यांनी कपडे बॅगेत भरले. आणि मीच त्यांना सोडायला गेलो. त्यांना एस.टी. पकडून स्टेशनला जायचे होते आणि तिथून रात्रीच्या ट्रेनने औरंगाबादला. मी त्यांना माझ्याकडून जमेल तितका धीर देण्याचा प्रयत्न केला. खूप समजावलं आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहोत सांगितले. आणि निरोप घेऊन मी निघालोमी घरी त्यांना सोडून संध्याकाळी घरी आलो. आम्ही सर्व त्यांच्याबद्दल विचार करत बसलो होतो. नंतर रात्री जेवायच्या वेळेस आम्ही एकत्र जेवायला बसलो. पण काका जेवायला नाही आले. म्हणाले, मी नंतर बसतो तुम्ही जेवा. आमचं जेवून झाल्यावर मी काकांकडे आलो जेवायला काकी बोलवत आहे हा निरोप घेऊन. पण पाहतो तर काय? काका रडत होते. मी सर्वांना बोलवले, सर्वजण काकांना विचारत होते की नक्की काय झालंय? तुम्ही का रडत आहात? काका म्हणाले रेल्वे पोलिस स्टेशनमधून फोन आला होता. एका जोडप्याने ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. त्या मुलाच्या खिशात तुमचं विझिटींग कार्ड मिळाले म्हणून कॉल केला. जर तुम्ही यांना ओळखत असाल तर लवकर स्टेशनला या. आम्ही सर्व सुन्न झालो. काका, काकी आणि सर्वच खूप रडत होते. नंतर आम्ही स्टेशनला गेलो. प्रत्यक्षदर्शिने सांगितलं की ते रात्री आठ वाजल्यापासून प्लॉटफार्म बसले होते आणि एकमेकांच्या मिठीत सारखे रडत होते आणि खूप घाबरलेले होते. त्यांना औरंगाबादला जायचं असं तो मुलगा एकदा बोलला. पण अजून काही बोलत नव्हते ते दोघं आणि नंतर अचानक काय झालं आणि एका फास्ट एक्सप्रेसच्या समोर त्यांनी धावत जाऊन उडी मारली. आणि सर्वकाही संपलं. मला तर काहीच समजत नव्हंतं. अजून काय करायला  पाहिजे होते म्हणजे ते दोघे सुखी झाले असते. माझी खूप इच्छा होती की सुखाचा संसार व्हावा, पण नियतीला ते मान्य नव्हते.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...