साठीनंतर दळवीकाकांची गोष्ट सुरू झाली.
साठीपर्यंत नाकासमोर बघून चालणार्या काकांचं आयुष्य त्यांचा हात धरून संथ गतीनं सरळ रेषेत चाललं होतं. ‘आम्ही कुणाच्या अध्यात ना मध्यात’,' असं फुशारकीनं सांगणार्या मंडळींपैकी दळवी कुटुंब होतं. उषा दळवी यांनी कुटुंबाला वळणच तसं लावलं होतं.
म्हणूनच तर या आदर्श चौकोनी कुटुंबाची दर रविवारची दुपार क्वीन नंतर कव्हर सॉकेट मधे टाकण्यात मजेत जायची. यांच्या बाल्कनीतली झाडं कधी तहानलेली दिसायची नाहीत आणि भिंतीवर कधी जळमटं दिसायची नाहीत.
मुलंही जात्याच हुशार. त्यात उषा दळवींची शिस्त. त्यामुळं मुलं छान शिकली आणि मार्गाला लागली. उषा दळवींनीच पुढाकार घेऊन दोघांची लग्नं लावून दिली आणि इथंच उषाताईंचा अंदाज जरा चुकला. सून वाटली तशी आणि वाटली तेव्हढी या ‘दळवी साच्या’त बसायला तयार नव्हती. जरा खटके उडायला लागले. घरची शांतता, जी उषा दळवींनी आयुष्यभर जपली, ती भंग पावायला लागली.
आणि दळवीकाकांना एकसष्ठीत आणून सोडल्यावर उषा दळवींनी एका उष:काली काही न सांगतासवरता या जगाचा निरोप घेतला. त्यांनी घालून दिलेला नियम त्यांनीच मोडला… कुठंही न सांगता जायचं नाही, हा त्यानी घालून दिलेला दंडक त्यानीच मोडला.
आणि इथं दळवीकाकांची गोष्ट सुरू झाली… एकट्याची गोष्ट. कुणाच्या अध्यात ना मध्यात असलेले दळवीकाका जगाच्या मध्यबिंदूवर येऊन अगदी एकटे पडल्यासारखे झाले. बघितलं तर स्थिर, नाहीतर काहीच…
कारण उषा दळवी जायला कारणही सुनेनं सुरू केलेला वादच होता… तिला वेगळं व्हायचं होतं आणि उषा दळवींच्या तालमीत तयार झालेल्या मुलालाही ते मान्य होतं. तिनं ऑफिसकडून क्वार्टर मधे जागा मिळवली आणि मग घरी सांगितलं. सून खूप बोलली आणि मुलगा गप्प बसला.
उषा दळवींनी आपली हार मान्य केली आणि डाव सोडला. दळवीकाकांना खेळायला कुठला डावच उरला नाही. सून, मुलगा दोघं घरी गप्प असायचे. मुलगी तिच्या संसारात मग्न. सून खरंतर लगेचंच जायची होती… पण ‘नक्को तेंव्हा आई गेल्या’, असा ती त्रागा करायची. काका म्हणाले, “तुम्ही जा… आता तुम्हाला अडवायला कोण आहे?”
पण लोक काय म्हणतील, ही भिती जितकी काल्पनिक तितकीच भक्कम… त्यामुळं सुनेला ते शक्य नव्हतं. मनासारखं करताना ‘चांगलं’ म्हणवून घ्यायची हौसही होती. यात दळवीकाकांची गोष्ट नकळत सुरू झाली…
सासू गेल्याबरोबर सुनेनं आपल्या धाकट्या बहीणीला घरी बोलावलं. तशी ती येणारच होती… पण सुनेच्या जागेत! मात्र, उषा दळवींनी इमर्जन्सी एक्झीट घेतली आणि सगळ्यांचे सगळे प्लॅन्स बदलले… पण हिच्या बहिणीला प्लॅन बदलता आला नाही, कारण तिचा कोर्स सुरू व्हायचा होता.
ती आली, म्हणून काकांना आपल्या खोलीत बसून राहावं लागत होतं. टीव्हीचा रिमोट बहुधा तिच्याच हातात असायचा आणि ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ शिवाय तिला दुसरं काही पाहायला सुचायचं नाही.
नाकासमोर बघून चालणार्या काकांना हे असलं विकृत बिभत्स वास्तव सोसायचंच नाही. त्यांनी सौम्य तक्रार करून पाहिली पण काही उपयोग झाला नाही.
मग दळवीकाका घराबाहेर पडायला लागले… पाण्याची बाटली घेऊन तासनतास सोसायटीच्या मंडपात नाहीतर गेटवरच्या बेंचवर बसायला लागले.
आम्हाला बघवायचं नाही. इतक्या वर्षात कधी कुणाशी संवाद साधला नव्हता, आता कुणाशी बोलणार? पण आम्हीच मग ‘काय काका…’ म्हणत बोलायला लागायचो, त्याना जड जायचं… पण बोलायचे.
मग आम्हीच चोंबडेपणा करून त्यांच्या मुलीच्या कानावर ही बाब घातली. साधारण त्यांच्या घरचा प्रॉब्लेम सांगितला, जो काकाना बोलतं करून आम्ही त्यांच्याकडून काढून घेतला होता.
मुलीला वाईट वाटलं; पण तीही सासुरवाशीण होती. सासू-सासरे सगळे घरी होते. ‘चला पप्पा, माझ्याकडे चला…’ म्हणायची सोय नव्हती आणि काकांनाही ते मान्य झालं नसतं.
मग तीच मुद्दाम येऊन या दोघांशी बोलली… ‘पप्पांना सांभाळायला हवं,’ म्हणाली. सुनेला आयता चान्स मिळाला आणि कांगावा करत बहिणीला घेऊन ती तिनं मिळवलेल्या घरात चालती झाली. मुलगा सोबत गेला, हे वेगळं सांगायला नकोच!
काका आता खरंच घरी एकटे झाले. मुलीची काळजी अधिकच वाढली. आता जबाबदारी तिच्या एकटीवर असल्यासारखी झाली होती; म्हणून तिनं आपल्या मुलाला दिवसभर काकांकडे बसायला सांगितलं, त्यांना सोबत म्हणून.
तो काय, पप्पा-आजोबांकडे दिवस-रात्र रहायला तयार झाला… कारण जे स्वातंत्र्य त्याला त्याच्या घरात मिळणार नव्हतं, ते इथं मिळणार होतं आणि त्यानं मिळालेल्या स्वातंत्र्याचा पुरेपुर फायदा घ्यायला सुरुवात केली.
दिवस-रात्र त्याची चांडाळ चौकडी दळवींच्या घरी पडलेली असायची. कुठं आजीची शिस्त आणि कुठं या नातवाचं वर्तन… तोंड दाबून बुक्क्याचा मार सुरू झाला. परत दळवीकाका मंडपात दिसायला लागले.
यावर जोशीकाकांनी त्याना चांगला पर्याय सुचवला… जोशीकाकांचा मोडी लिपीचा क्लास असायचा. नियमीत आलात, तर क्लास फ्री होता. एक खाडा झाला, तर दहा रुपये. दोन झाले, तर वीस आणि तीन झाले तर बाद! मग तीन महिन्याच्या गॅपनंतर पुन्हा प्रवेश… असे साधे नियम होते. पण क्लासला प्रतिसाद चांगला होता.
आयुष्यभर इंग्रजाळलेलं वातावरण स्विकारलेलं… काकांना ही मोडी लिपी एक आव्हानच वाटलं. त्यानी स्वत:ला त्यात झॊकून दिलं.
नातवाला रान मोकळं मिळालं. शेजार-पाजार्याना त्याचा त्रास व्हायला लागला. एकदा तर पोलीसांना पाचारण करावं लागलं. अती झाल्यावर काकांनी मुलीच्या कानावर घातलं.
आपल्या मुलाची बदनामी तिला कशी सहन होणार? तिनं मुलाचीच बाजू घेतली… “आम्ही वाढलो तुमच्या शिस्तीत. तो कसा राहील? तरूण मुलगा आहे. आपणच सम्जून घ्यायला हवं!” असं म्हणत ती मुलाला घेऊन गेली.
काका पुन्हा एकटे पडले… पण त्यांना एकटेपणा जाणवला नाही; कारण एकतर मोडी लिपीचा व्यासंग होता आणि त्या क्लासमधे त्यांना त्यांच्या शाळेतला मित्र भेटला… रामचंद्र.
परिस्थितीनं त्यांच्यापेक्षा बेताचा… वृत्तीनं सज्जन, संस्कारी… उषा त्याला न चुकता भावजी म्हणायची. इतक्या वर्षांनी भेटल्यावर दोघांची पहिल्यापेक्षा जास्त घट्ट मैत्री झाली; पण एकदा तो म्हणाला, “मला आता इथून जावं लागणार.”
‘का?’ विचारल्यावर म्हणाला, “चाळीच्या जागी मोठी इमारत उभी राहतेय, जागा माझ्या नावावर असली, तरी ‘माझा हक्क आहे’ म्हणून चालणार नाही.
“प्रॉब्लेम काय आहे?” कुणाच्या अध्यात ना मध्यात पडणार्या काकांनी विचारलं.
तो म्हणाला, “माझा धाकटा भाऊ आहे. तो वेडा नाही, पण मंदबुद्धी आहे. जरा उशीरा समजतं. उशीरा प्रतिक्रिया देतो; पण मायेनं समजावलं, तर सगळं ऐकतो… पण आता नव्या ठिकाणी जातांना घरच्यांना तो नकोय. त्याला मिरजेला पाठवायचं म्हणतायत. त्यापेक्षा त्याला घेऊन मी गावाला जातो. आमच्या मालकीचं देऊळ आहे. कसंही आम्ही राहू…”
त्याचं काही न ऐकता दळवीकाका त्या दोघांना घेऊन घरी आले आणि पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला… रामचंद्राच्या भावाला बघून त्यांच्या मनात अनुकंपा निर्माण झाली.
शहाण्या म्हणवणार्या नातवाचे, मुलाचे प्रताप त्यांनी पाहिले होते. त्यानी त्या भावाला जवळ केलं आणि त्यांच्या लक्षात आलं, दीर्घकाळ चालणारं काम त्याला दिलं, की तो रमतो.
मग पेपरच्या रद्दीचा गठ्ठा बांध, भाजी निवड असं करता करता एकदा त्या भावाला देवाजवळची सहाण आणि चंदनाचं खोड मिळालं…
त्याला गावी चंदन उगाळायची सवय होती. तो चंदन उगाळायला बसला. रामचंद्र म्हणाला, “आता दोन तास बघायला नको…!”
आणि दोन तासात त्यानं इतकं चंदन उगाळलं की बाप रे!
दळवीकाकांनी पहिल्यांदा शेजार पाजार्यांशी संवाद साधला… ‘चंदन हवंय का?’ विचारलं.
शेजारच्या आजींनी आठवण करून दिली… “तुमची बायको दर श्रावणात देवळातल्या शिवपिंडीला चंदनानं माखायची… जा, अनायसे इतकं चंदन आलंय, तिचं काम तुम्ही करा. श्रावण नसला म्हणून काय झालं? शिवपिंडी तर तीच आहे…!”
दळवी मनोमन खुश झाले. मग येणाऱ्या श्रावणात हाच नियम त्यानी पाळला. पण तोवर यांच्याकडे आयतं चंदन मिळतं, याचा सुगावा अनेकांना लागला. अनेकजण चौकशी करत आले आणि न मागता भाऊला कोणी पाच कोणी दहा रुपये दिले. तो मंदबुद्धी होता; पण तरी पैसे हातात घेण्याचा आनंद त्यालाही कळत होता.
मग हे स्वरूप अजून व्यापक बनलं… परिसरातल्या एक-दोघांच्या अशाच अडचणी होत्या. अशा व्यक्ती घरात होत्या, की ना त्यांना टाकून देता येत ना सांभाळता येत!
काकांनी काही तास त्यांना सांभाळायची जबाबदारी उचलली. आमच्या सोसायटीनं त्याना प्रोत्साहनच दिलं आणि सोसायटीचा मंडप त्याना वापरायला दिला.
एकाचे दोन, दोनाचे चार, चारचे सहा जण झाले… दळवी काका आवर्जून सांगायचे, “शहाण्या मुलांना सांभाळण्यापेक्षा या मतीमंद मुलांशी संवाद साधणं जास्त मनोहारी आहे!”
एकजात सगळे सहाही जण चंदन उगाळायला बसायचे; तेव्हा एक गती, एक लय प्राप्त व्हायची. शिवालयात शिवशंकर सुखावायचा आणि इथं हे दळवीकाका.
आता त्यांची मुलगी आणि लेक एक झाले होते. ‘म्हातारपणात चाळे सुचतायत…’ असं म्हणून त्यांची हेटाळणी करत होते.
आणि इथं दळवीकाका आपल्या कामात रमून गेले. मोडी लिपीचा प्रसार आणि वर ही घेतलेली जबाबदारी… त्यात ‘निर्मल सदन’सारख्या संस्थेनं त्यांच्या या उपक्रमाला खरी दाद दिली. आठवड्याला उगाळलेल्या चंदनाच्या ठरावीक डब्या घ्यायची तयारी दाखवली.
निर्मल सदनशी जोडलं गेल्यावर तर काकांची गोष्ट चौफेर धावायला लागली. अचानक काकांच्या गोष्टीला खीळ बसली, जेव्हा मध्यरात्री काकांच्या पोटात असह्य दुखायला लागलं आणि त्यांना ॲडमिट करायची वेळ आली. हर्नियाचं ऑपरेशन तातडीनं करायची गरज पडली.
आम्ही त्यांच्या मुलीला कळवलं पण ती नेमकी जयपूरला होती, ती लगेच निघणार होती. रीतीला धरून त्यांच्या मुलाला सांगितलं.
‘शेवटी आमची गरज पडलीच ना!’ अशा भावनेनं जेव्हा मुलगा-सून हॉस्पिटलमधे पोहोचले, तेव्हा न बोलावता पन्नास साठ स्नेह्यांचा गराडा काकांसाठी वेटींगरूममधे जमला होता… ट्रीट्मेंटला सुरुवात झाली होती आणि मंदबुद्धी वाटणार्या त्या व्यक्ती काळजीने स्वैरभैर झाल्या होत्या.
आपल्याला केवळ पद्धत म्हणून कळवलंय; इथं आपली गरज नाही, हे जेव्हा मुलाच्या आणि सुनेच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी काकांची गोष्ट या जमलेल्या समुहाच्या हवाली करून त्यात स्वत:ला वगळून घेतलं.
आणि काका घरी आल्यावर कुणी काय काय जबाबदारी घ्यायची या चर्चेत दळवीकाकांची गोष्ट गजबजून गेली!
- चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा