राधेयचं वागणं हल्ली बदलत चाललं होतं. घरात कोणाशी धड बोलायचा नाही कि थांबायचा नाही. काही विचारलं तर लगेच फाटकळपणे उत्तर द्यायचा. आवाजही लगेच चढायचा. त्याच्या आजोबांना त्याचं वागणं खटकत होतं. कदाचित आईवडील दोघेही नोकरीनिमित्त बाहेर असतात म्हणून हा असा वागत असणार नाही तसं अजिबात नव्हतं कारण आजोबा घरात असल्यामुळे आईबाबांची कमी त्याला कधी जाणवली नाही. सर्वांच्या सोबत बसून जेवणारा राधेय त्याचं ताट वाढून त्याच्याच खोलीत जेवू लागला..
आजोबांच्या लगेच लक्षात आलं. तो कुक्कुला राधेय राहिला नाही. तो मोठा झालाय. वयाच्या विशिष्ट टप्यात त्याचं पदार्पण झालं. म्हणूनच त्याला बाहेरच जग घरापेक्षा प्रिय वाटतंय. मित्र सवंगडी जीव कि प्राण त्यांच्यासाठी काहीही करायची तयारी. कोषातून बाहेर आलेल्या फुलपाखरासारखी त्याच्या मनाची अवस्था.
मनात...शरीरात विचारात बदल घडून येतो. घसरणाऱ्या पाऊलवाटेवर कोणीतरी तोल सांभाळणार हवं असतं. आजोबानी राधेयचं वागणं त्याच्या आईबाबाला सांगितलं आणि त्याचे मित्र बनून त्याच्याशी बोलायला लावलं. पण त्यांनी हसून टाळलं आणि तशी गरज नाही. प्रत्येकाच्या जीवनात हा टप्पा येतो आणि आजकालची मूलं इतकी हुशार आहेत कि त्यांना कॉन्सलिंगची गरजच भासत नाही. आजोबांना हे मान्य नव्हतं. तो घरापासून दुरावत चाललाय. काही वाईट संगत किंवा सवयी तर ! असले विचार त्यांच्या मनात थैमान घालू लागलेत .
दुसऱ्या दिवशी राधेय बाहेर जातोय बघून, आजोबांनी कुठे जातोय विचारलं? " मला काही गोळ्या घ्यायच्या आहे मेडिकलमधून"असे सांगून आजोबा राधेय बरोबर बाहेर गेले. गोळ्या घेतल्या. समोरच एक बाग होती थोडावेळ तिथे बसुया. राधेय हो म्हणाला .हिरव्यागार गवतावर दोघेही पाय पसरून निवांत बसले.
काय म्हणते तुझं कॉलेज? आजोबांनी प्रस्तावना केली. नवीन मित्र मैत्रिणी. खूप धमाल करत असाल ना रे ! कोणी गर्ल फ्रेंड. अगदी हळुवार ते विषयाकडे वळत होते. राधेयनी गोड हसत उत्तर दिलं, नाही हो आजोबा, तसलं काही नाही. मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो ना. तेव्हा बाबांचा शेविंग क्रीम चोरून चोरून वापरायचो. राधेय अगदी खळखळून हसायला लागला आणि एक गुपित सांगू का ? आमच्या वर्गात एक सुंदर आणि हुशार मुलगी होती बेबी आपल्याला खूप आवडायची ती. मग एक दिवस तिच्यासाठी प्रेमपत्र लिहलं आणि सरळ तिच्या बाकावर फेकलं ते पत्र संगीच्या हातात लागलं. पत्र वाचून तिला वाटलं तिच्याचसाठी आहे आणि मग काय तिनी तिच्या भावाला सगळं सांगितलं. तिच्या पहेलवान भावानी मला धो धो धुतलं. चार दिवस दांडी मारली तेव्हा कुठे सरळ चालता येऊ लागलं आणि चेहऱ्यावरचा नक्षाही अदृश्य झाला.
त्या प्रसंगातून एक शिकलो. भाऊ बहिणीचा खरा रक्षक असतो. आपल्या बहिणीची कोणी छेड काढली तर त्याला पटत नाही. पण त्यानेही दुसऱ्याच्या बहिणीला छेडू नये. तिला आदर द्यावा. सन्मान द्यावा. बरोबर आजोबा राधेयचा प्रतिसाद बघून आजोबा सुखावले.
दुसरी गोष्ट "मित्र नेहमी सूर्यासारखा असावा." आपल्या गुणासोबत अवगुणही सांगणारा. चुकलेली वाट बदलणारा. हेच वय असतं भविष्य उज्वल बनवण्याचं. तुम्ही मुलं सुसाट वेगानी बाईक चालवता. कसली घाई असते रे इतकी ? पडलात किंवा कोणाचा अपघात झाला तर? असे प्रश्न तुमच्या मनात नाही येत कधी. आणि हो हल्ली तू रात्री खूप उशिरा येतोय.
आजोबांनी चेसमधल्या सोंगट्याप्रमाणे चाल खेळून हत्ती. घोडा. उंट. प्यादी सगळं खेळून झालं होतं. आता बारी राधेयची होती. आजोबा, हल्ली जरा टेन्शन मध्ये आहे मी. कदाचित त्यामुळे चिडचिड होते जरा. खरं म्हणजे मी घरात कोणालाच सांगणार नव्हतो. पण तुमचे सर्व सिक्रेट तुम्ही माझ्याबरोबर शेअर केले. म्हणजे मलाही करावे लागेलच नाही का ! आजोबांकडे कटाक्ष टाकत त्यानी गोड स्माईल दिली. आजोबा वाटच बघत होते, राधेय कधी कोडं उलगडतो.
मी आणि माझे मित्र कॉलेज आटोपल्यावर झोपडपट्टीतील मुलांना शिकवायला जातो. बरीचशी मुलं अज्ञानामुळे विद्येला मुकतात. काही मुलं बालमजुरी करतात. घरची परिस्थिती त्यांचं बालपण हिरावून घेते. अशा मुलांसाठी आम्ही तिथेच एक शाळा भरवतो. त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवतो. शिवाय काही मुलांमध्ये सुप्त गुण आढळले तर तेही पुढे आणतो. सुरुवातीला दोनच मुलं यायची हळूहळू संख्या वाढली. तब्बल ५५ मुलं रोज हजेरी लावतात .त्यांना बघून नेहमीच विचार येतो आपलं आयुष्य सुखद आणि यांचं असं का? देवानी हा भेदभाव का बरं केला असावा.
मी इथे येण्याचं कारण, एकदा माझ्या वाढदिवसाला आजोबा तुम्हीच मला इथल्या मुलांना भेटवस्तू द्यायला घेऊन आला होता .त्यादिवशीच ठरवून टाकलं होतं. या मूलांना अशी भेट द्यायची जी कधीच संपनार नाही. मग मी आणी माझे मिञ रोज इथे येवू लागलो. पण हल्ली मूलांना वह्या, पुस्तके, आणी ईतर साहीत्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करावा ते कळत नव्हते. आमचा पाँकेटमनी जमवूनही भागत नव्हते म्हणून व्यावसाइक नाटक करू लागलो .शीवाय मूलांना आणी पालकांना पथनाट्याद्वारे आम्ही शिक्षणाचे महत्व पटवून देवू लागलो. आणी म्हणून घरी यायला वेळ व्हायचा. पण आजोबा हे सगळ आई-बाबांना सध्यातरी सांगू नका. उगाचच काळजी करतील ते. आणी हे सगळ मी माझा अभ्यास सांभाळून करतोय.
आजोबांनी ऱाधेयच्या पाठीवरून हात फीरवला. राधेय,"तूला काही मदत लागली तर नक्की सांग." माझ्याकडून गरजू मूलांसाठी पाच हजार रू. देतोय.आणखी काही हवं असेल ते निसंकोच माग. राधेय म्हणाला फक्त आशीर्वाद द्या.आम्ही जो विडा उचलला त्यामध्ये यशस्वी होऊ."
आजोबांना राधेयचा अभिमान वाटू लागला. त्यावेळी राधेयच्या मनात रुजवलेल्या बिजाचा आज मोठा वटवृक्ष झाला होता. बोलता बोलता वेळ खूप झाला. दोघेही घराकडे जायला निघाले. राधेयनी आजोबांची थट्टा करत विचारलं", आजोबा त्या बेबीचं पुढे काय झालं ते नाही सांगितलं तुम्ही ",अरे लबाडा म्हाताऱ्याची थट्टा करतो का? अरे, सौ .रजनी अरुणराव सावंत म्हणजेच शाळेतली बेबी. अच्छा म्हणजे आपली "आज्जी "...वा आजोबा....पण कसं सांगा ना. त्याचं असं झालं बघ."
दोघेही जोरजोरात हसत हसत एकमेकांना टाळी देत अगदी जिवलग मित्रांसारखे गप्पांमध्ये रंगले. घर आलं पण गप्पा संपल्या नाहीत.
शेवटी काय येणाऱ्या परिस्थितीला आपलंस करायचं असतं. लाईफ हे असच असतं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा