एका नामांकित कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली. २३ वर्षीय अनुज याला ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले, तर ३२ वर्षीय राम यांना सुपरवायजर म्हणून अनुजच्या तीन स्तर खाली नियुक्त केले गेले. अनुजने एका नावाजलेल्या महाविद्यालयातून नुकतीच पदवी पूर्ण केली होती. राम एक पदवीधर असुन त्याच उद्योगात १२ वर्षांपर्यंत काम करत होता, तो एक निष्ठावान कर्मचारी होता, आणि त्याच्या नोकरीबद्दल तसेच अशा कंपन्यांच्या कामकाजाविषयी त्याला भरपूर ज्ञान होते. एके दिवशी अनुजचा रामसोबत वाद झाल्याने, कमी दर्जाचा, कमी शिक्षित कर्मचारी म्हणून त्याने रामचा अपमान केला. राम हसला आणि निघून गेला. वर्षभरानंतर एके दिवशी कंपनीमध्ये अचानक एक समस्या निर्माण झाली. ही समस्या इतकी मोठी होती की संचालक, सीईओ आणि अध्यक्षांना त्वरित बैठक आयोजित करावी लागली. निर्यात होणाऱ्या संपूर्ण मालामध्ये एक दोष आढळला होता, आणि दोष इतका मोठा होता की, निर्यातीनंतर त्यांच्या सर्वात मोठ्या ग्राहक कंपनीने त्यांना सोडले असते आणि कंपनीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असते. संचालक, अनुजसह इतर अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पुढे काय करायचे ते कळत नव्हते. संध्याकाळ झाली होती, बहुतेक कामगार निघून गेले होते. रामने पूर्वपरवानगीशिवाय सीईओच्या केबिनचे दार ठोठावले. सीईओनी रागाने आणि काहीश्या निराशेने रामला विचारले की "तू अजून येथे काय करीत आहेस?" रामने ही चूक सुधारण्यासाठी एक सोपी युक्ती सांगितली, त्यासाठी साधारण एक महिना लागला असता, आणि काही जास्तीचा खर्च देखील करावा लागला असता. त्याने सांगितले की, "त्याच्या आधीच्या कंपनीत असाच प्रोब्लेम सोडवण्यात त्यांना यश आलं होतं."
मुख्य कार्यकारी अधिकारी शांत झाले आणि त्यांनी उत्तर दिले की, ग्राहक हे मान्य करणार नाही. रामने किमान एकदा प्रयत्न करण्याचा आग्रह केला. सीईओने ताबडतोब आपल्या सेक्रेटरीला बोलावून, उत्पादनातील काही भाग बदलण्यासाठी पाठविला आणि रामला बसण्यास सांगितले. एका तासात आवश्यक ते बदल करून आणल्यानंतर त्यांनी फोटोज क्लिक केले आणि ग्राहक कंपनीच्या गुणवत्ता विभागासोबत व्हिडिओ कॉलची व्यवस्था केली. ग्राहककंपनीने थोड्या विवादानंतर, खात्री करून घेतल्यावर त्यांची ऑफर स्वीकारली. सीईओच्या चेहऱ्यावरचा घाम क्षणात सुकून गेला. एका वर्षात रामला अनुजच्या तीन स्तर वर पदोन्नती देण्यात आली आणि ऑपरेशन संचालक म्हणून नियुक्त केले गेले. राम यांच्याशी केलेल्या वादामुळे कामावर परिणाम होईल अशी भीती अनुजला वाटत होतीे, परंतु एके दिवशी रामने त्याला केबिनमध्ये बोलावून सांगितले की, जे काही घडले होते त्याबद्दल आणि अनुजबद्दल त्याच्या मनात अजिबात राग नाही. एक पद आपल्याला चांगली सुरुवात करून देते, परंतु ज्ञान आणि अनुभव हेच सर्वात मौल्यवान असतात. जर तुमच्याकडे चांगली पदवी असेल, तर चांगलंच आहे... पण त्यातच समाधानी राहू नका, अजुन शिकत रहा, आणि नवनवीन अनुभवासह समृद्ध व्हा. आणि जर तुमच्याकडे चांगली पदवी नसेल, तर काळजी करू नका. काम करत रहा, शिकत रहा, आपलं मन मोठं असेल आणि स्वत:वर विश्वास असला की, कोणीही तुम्हाला गर्दीतुन पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा