गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2793. अक्षय नातं

 “आजही उठायला उशीरच केलास ना? अग आज अक्षयतृतीया. माझ्या लेकाला पाणी पाजायचं. करा, केळी घेऊन यायची…निदान मेल्यावर तरी त्याला वेळेत दे सगळं.” मालतीबाईंचा तोंडाचा पट्टा सुरूच झाला, अवनीला उठलेलं पाहून. तिनं आपले लांबसडक केस बांधले आणि दोघींचा चहा टाकला. त्या कितीही घालून पाडून बोलत असल्या तरी ती शांत असायची. चहा त्यांना देत ती म्हणाली,
“रात्रीच ताईचा फोन आला होता. करा, केळी तिचा मुलगा आणून देणार आहे. बाकी काय करायचंय सांगा. मग मला लवकर निघायचं आहे आज.”
त्यांनी रागारागानं सगळा स्वयंपाक सांगितला. ती पटकन पळाली आंघोळीला. लगेच स्वयंपाक घरात वळाली, कुकर लावला, कणिक भिजवली, आंबे पाण्यात टाकले आणि शिट्ट्या होईपर्यंत ती आपल्या आवडत्या अंगणात पळाली. खिडकीतून कितीवेळ खुणावणाऱ्या मोगऱ्याजवळ आधी गेली. मोगरा गच्च बहरला होता. त्या घमघमाटानं तिला एकदम प्रसन्न वाटलं. पटकन पाण्याचा पाईप घेऊन सगळ्या तहानलेल्या झाडांना पाणी द्यायला लागली. कडकडीत उन्हामुळं झाडांची जमीन सुकून गेलेली होती. अवनीला वाटलं, ‘आपल्याला संध्याकाळी लवकर येणं होत नाही, तर आईंना झाडांची सुद्धा कीव येत नाही. त्यांना पाणीही देत नाहीत !’
हा विचार मनात सुरू होता आणि एकीकडे ती रखरखीत माती गटागटा पाणी पीत होती आणि अहाहा. मातीचा सुंदर सुगंध आला ! अवनीनं आपले डोळे मिटले आणि तो गंध श्वासात भरून घेतला. तिला त्या क्षणी, भोवताली अवीच्या श्वासाची जाणीव झाली.
     त्यानंच तर शिकवलं होतं आपल्याला. निसर्गात येऊन त्याचे आनंद घ्यायला. आपलं पहिलं मूल पोटातच गेल्यावर आपलं नैराश्य त्यानंच तर साथ देऊन पळवून लावलं. नाहीतर डॉक्टर म्हणाले होते, 
“ह्या अश्याच शॉक्ड राहिल्या तर अवघड आहे… सतत मिळणारा आंनद शोधा !”
त्यांच्या ह्या वाक्याला अवीनं उचललं आणि सुरू केला असा आनंद मिळवण्याचा शोध. एके दिवशी ही सगळी रोपं आणली आणि म्हणाला, 
“चल, आज आपल्या घरामागच्या मोकळ्या जागेत आपण आपला टी पॉईंट बनवू…” म्हणत त्यानं ओढत आणलं आपल्याला. आपण मरगळलेल्या मनानं आणि चेहऱ्यानं आलो होतो. अशीच कोरडीठाक माती. त्यानं खड्डे बनवले आणि ही रोपं आईकडून आणि आपल्याकडून लावून घेतली. त्यानंतर ह्या पाईपनं पाणी मारलं त्यानं आणि असाच सुंदर सुगंध आला होता. मग सगळ्या झाडांवर पाणी मारलं आणि म्हणाला, 
“बघ कशी छान चकचकीत दिसताहेत… त्यावरचे थेंब बघ जरा…”
बळंच ह्या मोगऱ्याजवळ बसवलं. खरंच, आपणही हरखलो मग ह्या आनंदात. मग रोजचंच झालं हे. अवी आवर्जुन पकडून आणायचा इथं. आई रोज येत नव्हत्या. अगदीच त्यानं आग्रह केला तर आणि आता तर नाहीच येत. ह्या मोगऱ्याला आणि ह्या लडिवाळ चाफ्याला कळी आली तेव्हा तर किती खूश झाला होता. अगदी लहान लेकरसारख्या उड्या मारत आपल्याला दाखवल्या होत्या. आपणही असंच खूश झालो होतो आणि आपल्यालाही आवडायला लागलं होतं हे सगळं. रोपटी छान फुलं द्यायला लागली होती. त्या फुलांचे गंध, देवासाठी अशी झाडावरची ताजी फुलं घेताना किती प्रसन्न वाटायचं. त्या लडिवाळ चाफ्याखाली त्यानं हौसेनं आणून मांडलेल्या त्या केनच्या खुर्च्या, तो सोबतीचा चहा. सगळं अगदी छान !
      पण अविला लिव्हर सोरायसिस झाल्यावर मात्र आपण हादरून गेलो. प्रत्येक वेळी डॉक्टरकडून आलं की अवी बागेत यायचा.
“हे माझं खरं औषध आहे ग ! हा आयुष्यातला अक्षय आनंद आहे अवनी…! हा पैसा, आता तर शरीरही काही कायम टिकणार नाही. पण हा मातीचा सुगंध, हा फुलांचा गंध हा तर कधीही न संपणारा आहे बघ.”
अवनीच्या जवळ येत तो म्हणायचा, “अवनी, आज डॉक्टर म्हणाले, ‘आता फार तर महिना आहे हातात.’ मला जर बेडवर पडून राहायची वेळ आली, तर बागेजवळच्या खोलीत माझा बेड टाक तू. असं झाडांना तृप्त केलं की ती माती आपल्याला सुखावेल. शेवटी नातं तिच्यापाशी संपतं आपलं; हेही किती छान ना ! शेवटी आपला देह सोडून आत्म्याचं अक्षय जगणं तिच्यात एकरूप होऊन सुरू होत असेल, म्हणून तर हा तिचा सुगंध हा मला कायम अक्षय आनंद देणारा वाटतो.”
मग आपला हात हातात घेत म्हणाला होता, “अवनी, मी जाणार हे तर आता नक्की आहे. तू दुसरं लग्न कर किंवा नको करू, तू ठरव. आई जगेल तिला जशी परमेश्वर बुद्धी देईल. माझ्या आजारपणात एवढं घर सोडलं, तर तसं हाताशी काही नाही. त्यामुळं मी तुला, मला गवसलेल्या ह्या अक्षय आनंदाशिवाय दुसरं काही देऊ शकत नाही ग…!” म्हणत अवी अक्षरशः ढसाढसा रडला होता. आपण कोलमडून गेलो नाही कारण सहा महिन्यांत तशी अवीनं आपली मानसिक तयारी करून घेतली होती.
”राहिलीस ह्या घरात, तर भेटू रोज ह्या जागेत आणि गेलीस जरी इथून, तरी ह्या सुगंधा सोबत आठवेन मी तुला आनंद द्यायला…!”
म्हणून तर आताही तिला वाटलं, तो आहेच सोबत. कारण आज तर अक्षय तृतीया ना !
मनात ती म्हणाली, ‘अवी, रितीप्रमाणं पितरांना पाणी तर दिलं जाईलच. पण मला तर आताच ह्या सगळ्या आठवणी आणि ह्या सुगंधानं तुला तृप्त केल्यासारखं जाणवलं रे !’ म्हणत तिनं आपले पाणावलेले डोळे पुसले. घरात येताच तिला सासुबाईंची चिडचिड जाणवली. मनात तिला फार वाईट वाटलं. ह्यांच्यासाठी मला नाही थाटावा वाटला संसार, त्यांच्यासाठी तर आपण ही नोकरी करतोय. पण ह्या मात्र सतत आपल्याला त्यांच्या मुलाची मारेकरी म्हणून बघतात !
पण असो. पोटातलं न पाहिलेलं बाळ गेलं, तर आपण उद्ध्वस्त झालो होतो. त्यांचा तर एवढा मोठा मुलगा गेला म्हणून अश्या वागत असतील. मनातला विचार बाजूला करून त्या सांगतील तसं सगळं आटपून ती निघाली. सासूबाईंनी आपल्या खास मैत्रिणीला फोन करून बोलावलं होतं जेवायला. जेवण सगळं छान झालेलं बघून मैत्रीण म्हणाली,
“मालती, अगं लेक गेला तरी ह्या सुनेच्या रुपातल्या लेकीनं तुला नाही सोडलं. अगं, अक्षय साथ दिलीय तिनं तुला. आज तिच्यासाठी काहीतरी सोनं घे. परवा तुला माहेरच्या शेतीचे पैसे आलेत ना? मग काय करणार आहेस ते बँकेत ठेवून? तिला छोटेसे कानातले तरी कर. तुझ्या लेकाच्या आजारात सगळं मोडलं ना तिनं? चल, मला आज माझ्या सुनेसाठी बांगड्या करायला जायचंय, तू ही चल आणि तिथं बघ आवडलं तर.”
मैत्रिणीच्या वाक्यावर चिडत मालती म्हणाली, “काही नको. माझ्या लेकाला खाल्लं आणि आता नोकरीच्या नावाखाली हिंडतेय बाहेर. ‘काय करते’, मी तर कधी विचारलं नाही. पण नट्टापट्टा करून जाते घरातून. मी तुझ्या सोबत येते, पण मला तिच्यासाठी काही घ्यायला लावू नको. तशी मला पोसते ती. पण उगाच लाड नको भटकभवानीचे !”
मालतीचं वाक्य ऐकून मैत्रिणीला वाईट वाटलं. अवनी खूप कष्टाळू मुलगी. अवीनंतर सासूची जबाबदारी झटकून पळाली नाही, उलट एका सोन्याच्या शोरूम मध्ये कामाला लागली. पण हिला कधी विचारायचं नसतं तिला, 
‘काय काम करते?’ ‘कसे पैसे आणते?’ उलट तिच्याविषयी मनात वाईट विचार करते.
मग मैत्रिणीला वाटलं, हिला तिच्याच शोरूम मध्ये घेऊन जाऊ. दोघी रिक्षात बसून शोरूम समोर आल्या, तसं दोन मिनिटं मालतीला तिथंच उभं करून मैत्रीण आत गेली. अवनीला म्हणाली,
“आम्हाला दागिने दाखवायला तू येऊ नकोस. तुझ्या सासूला घेऊन आलेय मी. इथल्या तुझ्या एखाद्या छान मैत्रिणीला सांग आम्हाला अटेंड करायला.”
अवनी हसत ‘बरं’ म्हणून गेली. मालतीबाई शोरूम बघून जरा बिचकल्या. मैत्रिणीला जवळ ओढत म्हणाल्या,
“एवढ्या मोठ्या दुकानात कशाला? किती गार आहे इथं आणि लखलखाट तर बघ उगाच जीव दडपल्यासारखं झालंय मला !”
हसत मैत्रीण म्हणाली, “अग आपल्याला कुठं इथं नोकरी करायचीय? मस्त बस ह्या खुर्चीत आणि बघ, इथं ह्या बायका कशी नोकरी करतात.”
मालतीनं सभोवती पाहिलं. अगदी सुंदर. सगळ्या जणी मस्त साड्या, लांब बाह्यचे ब्लाऊज, त्यावर छान हेअरस्टाईल, हलका मेकअप आणि अगदी तरतरीतपणे त्या गुळगुळीत फरशीवर अगदी पटपट चालत होत्या. हसऱ्या चेहऱ्यानं कस्टमरशी बोलत होत्या. प्रत्येकीवर त्या सोन्याची जबाबदारी होती. ती अगदी सजगपणे त्या निभावत होत्या.
मालती म्हणाली, “बघ किती छान राहतात आणि कामही किती चपळतेनं करतात. इतक्या नजरा त्यांच्यावर पण त्यांना फक्त कामपुरतं बोलून आपली नोकरी सांभाळणं सोपं नसेल. नाहीतर आमची भटकभवानी कुठं हिंडतेय की.”
तेवढ्यात त्यांच्या समोर बांगड्या डिझाईन ट्रे आले. मैत्रिणीनं सुनेला व्हिडीओ कॉल करून डिझाईन निवडलं. मालती मध्येच एकदोन डिझाईनवर बोट फिरवत होती. मध्येच ती मैत्रिणीला म्हणाली,
“कशाला ग सुनेला घेतेस? स्वतःला घे.”
मैत्रीण हसून म्हणाली, “अग झाली आपली हौस. आता ह्या लेकरांचे दिवस. आणि ह्या पोरी आपल्या पोरांना एवढी साथ देतात म्हणून तर आपली पोरं समाजात एवढी सोन्यासारखी चमकतात! मग खरं सोनं ह्या पोरी…! हे वस्तुरूपी सोनं गौण आहे ग त्यांच्यापुढं. म्हणून ही नात्यातली अक्षय प्रेमाची भेट मी या वेळी सुनेला द्यायची ठरवलीय.”
मालतीबाईनं सवयीप्रमाणे तोंड वाकडं केलं. तेवढ्यात त्या समोरच्या मुलीला कुणीतरी, 
‘जेवायला चल कुणाला तरी उभं करून…’ असं म्हणताच मालतीनं विचारलं,
“दुपारचं जेवण चार वाजता का…?”
तशी ती मुलगी म्हणाली, “हो काकू, आज अक्षय तृतीयेची गर्दी आहे ना, म्हणून. पण रोजही असाच वेळ होतो. तासन् तास उभं राहून पाय दुखतात. पण काय करणार ! त्याशिवाय पैसे कोण देईल आम्हाला?”
ती निघून गेली, तश्या मालतीबाई सभोवती काचेवर हात फिरवत त्यातले चमकणारे दागिने बघू लागल्या. एका मोहरी दाण्याच्या माळेवर त्यांची नजर थबकली. तिथल्या एका लेडीजला बोलवून त्यांनी किंमत विचारली. मैत्रिणीला दाखवत त्या म्हणाल्या,
“मंगळसूत्र तर तारुण्यात उतरलं अंगावरून. आता ही माळ आवडली. पण फार महाग आहे. चाळीस हजार म्हणे…! बरं चल, झालं का तुझं सगळं?”
ती म्हणाली, “हो, ऑर्डर दिलीय. आठ दिवसांनी मिळतील.”
दोघी निघाल्या. रात्री अवनी उशिरा आली. दोघी न बोलताच जेवल्या. झोपताना अवनी त्यांच्याजवळ गेली.
“आई, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा !” म्हणत तिनं ती माळ त्यांच्या समोर धरली, तश्या त्या पहातच राहिल्या.
“तुला कसं कळलं मला ही आवडली म्हणून? आणि खूप महाग आहे ग ती !”
अवनी म्हणाली, “आई, त्या शोरूममध्येच मी काम करते. तुम्ही ही माळ निवडलीत, त्याच्या काचेपलीकडे होते मी. तुम्हाला पहात होते. खरंच खूप दिवसांनी तुम्हाला काहितरी आवडलं ना आई? आणि पैश्याची काळजी करू नका. स्टाफला अक्षय तृतीयेच्या निमित्त हप्त्यानं सोनं घेता येत होतं, म्हणून घेतलं !”
त्या दुकानातली अवघड वाटणारी नोकरी आपली सून करते. जेवते उशिरा. दिवसभर उभी आपल्यासाठी आणि आपण वाट्टेल ते बोलतो. हे सगळं मनात येऊन सासुबाईंना आता घळाघळा रडू आलं. अवनीला त्यांनी घट्ट मिठी मारली.
“अगं मी अशी वागते, तरी तू नातं अक्षय्य टिकवलंयस गं !”
मनापासून दोघी रडत होत्या अश्रू जमिनीवर पडत होते आणि आताही मातीचा सुगंध आला. अवनी मनात म्हणाली, ‘आलास का आमचं अक्षय प्रेम बघायला…!’
तिच्या कानात आवाज घुमला, ‘हो तर, ह्या प्रेमातला दुवा मी अक्षय नसलो, तरी तू टिकवलंस नातं अक्षय. खूप थँक्स अवनी…!’
त्या जमिनीवर पडलेल्या अश्रुतूनही अवनीला घमघमणारा सुगंध आला. आयुष्यातलं अक्षय नातं टिकवणारा !

- स्वप्ना मुळे (मायी), छ.संभाजीनगर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...