गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2754. वाढदिवस

   चैत्रातील कोवळे ऊन आसमंतात पसरलेले असते, वसंत ऋतूच्या आगमनाने झाडे नव्या पालवीने न्हाऊन निघालेली असतात आणि अशातच उजाडतो तो 'चैत्र शुद्ध नवमीचा' पवित्र दिवस!
गावागावांतून पहाटेपासूनच एक वेगळीच लगबग सुरू होते. घराघरांच्या उंबरठ्यावर आंब्याच्या पानांची तोरणे डोलू लागतात आणि अंगणात काढलेली रंगीबेरंगी रांगोळी त्या वास्तूचे मांगल्य वाढवते. गावाच्या मध्यभागी असलेल्या त्या जुन्या राममंदिरात तर आज चैतन्याचा महापूर आलेला असतो. गाभाऱ्यातील ती सावळ्या रामाची मूर्ती. जिला नुकताच जलाभिषेक करून भरजरी पीतांबर परिधान केलेला आहे. आज अधिकच प्रसन्न आणि तेजपुंज भासत असते. सभामंडपात शेकडो भाविक अत्यंत शांतचित्ताने बसलेले असतात, जणू अखिल ब्रम्हांड त्या क्षणाची प्रतीक्षा करत असते.
सूर्य बरोबर माथ्यावर येतो, दुपारचे बारा वाजतात आणि अचानक! टाळ-मृदंगाच्या गजरात आणि सुवासिनींच्या कंठातून श्रीराम जन्माचा पाळणा घुमू लागतो— 
... "कुशल्या राणीला जाहले पुुत्र ।
अयोध्येत सुखाचा उजळला नेत्र ॥
रत्नजडित पाळणा लाविला साजा ।
त्यात निजला श्रीराम माझा ॥" ... 
त्या स्वरातील भक्ती आणि वात्सल्य मंदिराच्या भिंती ओलांडून साऱ्या ब्रह्मांडाला कवेत घेण्याचा प्रयत्न करते. गुलालाची उधळण होते, सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो आणि आनंदाश्रूंनी भक्तांचे डोळे पाणावतात. ही अनुभूती केवळ एका दिवसाची नसते, तर ती हजारो वर्षांपासून भारतीयांच्या रक्तात भिणलेली एक 'सांस्कृतिक ओळख' असते.
हा जन्मोत्सव आपण इतक्या उत्साहाने का साजरा करतो? कारण श्रीराम हे केवळ एक 'ऐतिहासिक चरित्र' नाहीत, तर ते या राष्ट्राचे 'मर्यादा पुरुषोत्तम' आहेत. त्यांनी घातलेली नीतिमत्तेची मूल्ये, एकवचनी बाणा आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून दिलेला आदर्श आजही समाजाला दिशा देतो. त्यांच्या जन्माने केवळ अयोध्येचा उद्धार झाला नाही, तर एका महान मानवी मूल्याचा जन्म झाला. जेव्हा आपण रामाचा वाढदिवस साजरा करतो, तेव्हा आपण एका शरीराचे नव्हे, तर त्या शरीराने धारण केलेल्या 'कर्तृत्वाचे' पूजन करत असतो. वाढदिवस हा केवळ काळाच्या प्रवासातील एक टप्पा नसून, ती एका महान ध्येयाप्रती व्यक्त केलेली 'कृतज्ञता' असते.
माणसाचा जन्म होणे ही निसर्गप्रक्रिया आहे, पण त्या जन्माचे 'उत्सवात' रूपांतर होणे हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते. रामाचे चरित्र आपल्याला हेच शिकवते की, प्रतिकूल परिस्थितीतही धर्माची साथ न सोडणे हाच खऱ्या अर्थाने 'वाढ' होण्याचा मार्ग आहे. म्हणूनच, अशा महापुरुषांचे जन्मदिन साजरे करताना, आपण केवळ औपचारिकता पाळत नाही, तर आपण स्वतःच्या अंतर्मनाला विचारतो— "त्यांच्या आदर्शांमधील किमान एक कण तरी आपण आपल्या आयुष्यात उतरवला आहे का?" 
   रामनवमीच्या त्या सात्विक आणि भक्तीमय वातावरणात अकंठ बुडून जाताना, मानवी प्रज्ञेला पडलेला एक मूलभूत प्रश्न म्हणजे— नक्की ह्या 'जन्मदिन' शब्दाचा गाभा काय आहे? मानवी संस्कृतीच्या प्रवासात या शब्दांचे स्वरूप केवळ काळाची मोजणी करण्यापुरते मर्यादित न राहता, ते एका गहन तत्त्वज्ञानाचे प्रतीक बनले.
भारतीय वाङ्मयाचा आणि संस्कार परंपरेचा मागोवा घेतल्यास, 'जन्मदिन' हा शब्द केवळ एका शरीराच्या उत्पत्तीचा दाखला नाही. संस्कृतमधील 'जन्' धातूपासून सिद्ध झालेला हा शब्द, 'प्रकट होणे' किंवा 'नवनिर्मिती' या अर्थाचा वाहक आहे. प्राचीन ग्रंथांत याला 'वर्धापन' असे संबोधले गेले आहे. 'वर्ध' म्हणजे वाढणे आणि 'आपन' म्हणजे मिळवणे; अर्थात, केवळ वयाने नव्हे तर प्रज्ञेने, गुणांनी आणि पुण्याने वाढणे, तोच खरा 'वर्धापन दिन'. ज्याला आपण आज 'वाढदिवस' म्हणतो, तो मुळात शरीराच्या वृद्धीपेक्षा आत्मिक विकासाची पाऊलखूण आहे.
याच संकल्पनेतून 'अभिष्टचिंतन' हा शब्द जन्माला आला. 'अभि' म्हणजे सर्व बाजूंनी आणि 'इष्ट' म्हणजे जे कल्याणकारी आहे, जे शुभ आहे; अशा शुभ गोष्टींचे चिंतन करणे म्हणजे अभिष्टचिंतन! प्राचीन 'षोडश संस्कारां'मध्ये वाढदिवसाच्या दिवशी 'आयुष्य सूक्ताचे' पठण करण्याची आणि 'औक्षण' करण्याची परंपरा होती. औक्षण करताना वापरले जाणारे निरंजन हे मानवी आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याचे प्रतीक आहे. डोक्यावर अक्षता टाकणे म्हणजे अक्षुण्ण अशा आशीर्वादाची पखरण करणे. या विधींमागे केवळ 'उत्सव' नव्हता, तर "हे मानवा, तुला मिळालेले हे आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी अधिक तेजस्वी होवो," ही उदात्त प्रार्थना होती.
काळाच्या ओघात आपण 'जन्मदिन' हा शब्द भौतिक आनंदाशी जोडला असला, तरी त्याचे मूळ तत्त्वज्ञान 'कृतज्ञतेत' दडलेले आहे. ज्या मातीने आपल्याला जन्म दिला, ज्या निसर्गाने आपल्याला पोसले आणि ज्या समाजाने आपल्याला घडवले, त्यांच्या प्रती कृतज्ञ राहून "पुढचे आयुष्य अधिक सत्कारणी लावण्याचा संकल्प" म्हणजे खरा वाढदिवस! हा केवळ एक दिवसाचा सोहळा नसून, तो दरवर्षी स्वतःचा स्वतःशी होणारा एक वैचारिक संवाद आहे, जो आपल्याला आपल्या ध्येयाची आठवण करून देतो. 
   भारतीय संस्कारांतील या प्रगल्भ तात्विक बैठकीचा मागोवा घेतल्यावर, जेव्हा आपण आपली नजर जागतिक क्षितिजाकडे वळवतो, तेव्हा लक्षात येते की— 'जन्मदिन' साजरा करण्याची ओढ ही मानवी संस्कृतीतील एक सार्वत्रिक आणि आदिम आदिबंध राहिली आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही टोकाला गेले तरी, काळाच्या या विशेष क्षणाला कवेत घेण्याची पद्धत जरी वेगळी असली, तरी त्यामागची भावना मात्र एकच होती.
प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत वाढदिवसाची मुळे सर्वात आधी सापडतात. तिथे मात्र वाढदिवस हा केवळ सामान्य माणसाचा नसे, तर जेव्हा तिथला 'फॅरो' (राजा) गादीवर बसत असे, तेव्हा त्याला देवाचा पुनर्जन्म मानून तो दिवस मोठा उत्सव म्हणून साजरा केला जाई. इजिप्तच्या त्या अवाढव्य पिरॅमिड्सच्या सावलीत मानवाने प्रथम 'वेळेचा सन्मान' करायला सुरुवात केली. पुढे ग्रीक संस्कृतीने या उत्सवात एक वेगळीच भर घातली. त्यांनी आपली चंद्राची देवता 'आर्टेमिस' हिच्या सन्मानार्थ चंद्राच्या प्रकाशासारखे दिसणारे 'गोल केक' बनवले आणि त्यावर मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. त्या मेणबत्त्यांचा धूर आपल्या प्रार्थना स्वर्गातील देवापर्यंत घेऊन जाईल, अशी त्यांची एक सुंदर आणि काव्यात्मक समजूत होती. आजच्या 'बर्थडे केक'चा उगम हा याच ग्रीक संस्कृतीच्या अथांग श्रद्धेत दडलेला आहे.
      रोमन साम्राज्याने तर वाढदिवसाचे लोकशाहीकरण केले. त्यांनी प्रथमच राजघराण्याबाहेरच्या सामान्य पुरुष नागरिकांचे जन्मदिन साजरे करण्याची प्रथा सुरू केली. जरी सुरुवातीला महिलांना या अधिकारापासून वंचित ठेवले गेले होते, तरी काळाच्या प्रवाहात मानवी संवेदनांनी सर्व भेद ओलांडले. चिनी संस्कृतीत मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला 'झुआ झोउ' (Zhua Zhou) नावाचा एक आगळावेगळा विधी आजही पाळला जातो, जिथे मुलासमोर विविध वस्तू ठेवल्या जातात आणि तो जी वस्तू उचलतो, त्यावरून त्याचे भविष्य आणि कल ओळखला जातो. ही संस्कृती मानवी आयुष्यातील पहिल्या वर्षाच्या 'वाढीला' समृद्धीचे प्रतीक मानते.
       प्राचीन काळापासून मध्ययुगापर्यंत, जगातील बहुतांश संस्कृतींमध्ये वाढदिवसाचा संबंध 'दुष्ट शक्तींपासून संरक्षणाशी' जोडला गेला होता. वाढदिवसाच्या दिवशी व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी मित्र आणि नातलगांनी एकत्र येणे, हा केवळ आनंदाचा भाग नव्हता, तर ती एक प्रकारची संरक्षणात्मक साखळी होती. "आपली माणसे आपल्याभोवती आहेत, म्हणून कोणतीही वाईट शक्ती आपले नुकसान करू शकणार नाही," ही भावना त्यामागे होती. अशा प्रकारे, भारतीय संस्कारांतील 'अभिष्ठचिंतन' असो वा पाश्चात्य जगातील 'ग्रिटिंग्स', मानवाने नेहमीच काळाच्या प्रवाहावर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवण्यासाठी आणि सहजीवनाचा आनंद साजरा करण्यासाठी 'जन्मदिना'चे औचित्य साधले आहे. 
     ❣️स्मार्ट किट❣️    
       मानवी इतिहास हा केवळ वर्षांच्या गणनेचा खेळ नाही, तर तो काही असामान्य विभूतींनी आपल्या कर्तृत्वाने काळाच्या पटलावर कोरलेल्या स्वाक्षऱ्यांचा दस्तऐवज आहे. भारतात प्रभू रामाची 'नवमी' असो, श्रीकृष्णाची 'अष्टमी' असो किंवा शिवछत्रपतींची 'जयंती'— हे केवळ कॅलेंडरमधील तारखांचे सोहळे नसून, ते एका महान मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचे क्षण आहेत. श्रीमत भगवत गीतेचा उद्गाता, भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन, 'जन्माष्टमी' किंवा 'कृष्णाष्टमी' म्हणून मोठ्या दिमाखात सर्वत्र साजरा होतो. मथुरेच्या काळकोठडीत जन्मलेल्या या महामानवाने आपल्या आयुष्यात कधीही सत्तेची अभिलाषा धरली नाही तर, न्याय आणि धर्माची स्थापना करण्यासाठी अविरत संघर्ष केला. त्यांच्या 'अष्टमी'चा सोहळा म्हणजे केवळ लोणी चोरणाऱ्या बालकृष्णाचे स्मरण नसून, ति संकटांच्या छातीवर पाय देऊन उभ्या राहणाऱ्या एका वैश्विक मार्गदर्शकाच्या प्रति, खरी कृतज्ञता आहे.
      करुणा मूर्ती गौतम बुद्धाचा जन्मदिन म्हणजे, वैशाखात साजरी होणारी 'बुद्ध पौर्णिमा'. राजवैभवाचा त्याग करून करुणेचा शोध घेणाऱ्या तथागतांच्या 'जयंती'ने जगाला शांतीचा मार्ग दाखवला. ज्यांच्या विचारांनी मानवी मनातील द्वेषाचा अंधार दूर केला, त्यांचा जन्मदिन म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतेच्या प्रकाशाचा उत्सव आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन म्हणजे, महाराष्ट्रातील महत्त्वाचा उत्सव 'शिवजयंती'. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या या लोककल्याणकारी राजाचा जन्मोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार आहे. ज्यांच्या एका शब्दासाठी मावळ्यांनी प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या 'जयंती'निमित्त होणारा जल्लोष हा केवळ एका राजाचा सन्मान नसून, तो रयतेच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा सोहळा आहे. फुले-शाहू-आंबेडकर आणि इतर विभूतींचा जन्मदिन म्हणजे खऱ्या अर्थाने कर्तुत्वाचे स्मरण. समाजउद्धारासाठी आणि आधुनिक राष्ट्रनिर्मितीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या या महापुरुषांच्या जयंत्या म्हणजे सामाजिक न्यायाच्या आणि समतेच्या चळवळीचे ऊर्जास्त्रोत आहेत. त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आजही कोट्यवधी लोकांसाठी जगण्याचे संचित आहे.
     जनता या महापुरुषांचे वाढदिवस इतक्या उत्कटतेने का साजरा करते? याचे कारण त्यांच्या 'व्यक्ती' असण्यात नसून त्यांच्या 'कर्तृत्वात' दडलेले आहे. या व्यक्तींनी आपल्या हयातीत स्वतःसाठी काहीही न मागता, समाज आणि राष्ट्रासाठी जे महान कर्म केले, त्याचा लाभ आजही आपण घेत आहोत. म्हणूनच, त्यांचा जन्मदिन हा केवळ कुटुंबाचा उत्सव न उरता, तो संपूर्ण विश्वाचा उत्सव होतो. त्यांच्या कर्माचे ऋण मानणे आणि त्यांच्या आदर्शांचा वसा घेऊन पुढची वाटचाल करणे, हाच या जन्मोत्सवाचा खरा आणि उदात्त हेतू असतो. 
  परंतु, ज्या महापुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी, समतेसाठी आणि विज्ञानासाठी वेचले, त्यांच्याच वाढदिवसाचे निमित्त करून, आज जे 'इव्हेंट' साजरे होत आहेत, ते पाहून त्या आत्म्यांनाही स्वर्गात वेदना होत असतील. ज्यांच्या तलवारीने अन्यायाचे मस्तक छाटले, त्यांच्या जयंतीला आज 'डीजे'च्या कानठळ्या बसवणाऱ्या तालावर तरुण पिढी थिरकताना दिसते, तेव्हा तो आनंद नसून तो 'बौद्धिक दिवाळखोरीचा' नंगानाच वाटतो. महापुरुषांची जयंती हा मुळात त्यांच्या विचारांचे सिंहावलोकन करण्याचा दिवस, पण दुर्दैवाने तो आज केवळ 'शक्तीप्रदर्शनाचा' आणि 'धांगडधिंग्याचा' बाजार झाला आहे.
चौकाचौकांत लागणारे ते अवाढव्य फ्लेक्स आणि त्यावर झळकणारे तथाकथित 'भाई-दादांचे' फोटो पाहून प्रश्न पडतो— ही जयंती त्या महापुरुषाची आहे की या गल्लीतल्या नेत्याच्या 'अहंकाराची'? महापुरुषांनी हातात लेखणी घ्यायला शिकवले, पण आम्ही त्यांच्या जयंतीला हातात 'तलवारी' घेऊन नाचण्याची विकृती जोपासतोय. ज्यांनी व्यसनमुक्तीचा आणि सदाचाराचा संदेश दिला, त्यांच्याच नावाने रात्रीच्या अंधारात मद्याच्या बाटल्या रिकाम्या केल्या जातात, हा त्या थोर चरित्रांचा घोर अपमान नाही का? तरुणाईचा हा भरकटलेला उत्साह सामाजिक तणावाला जन्म देतोय. साध्या कारणावरून होणारे वाद, रस्त्यावरची गुंडगिरी आणि उत्सवाच्या नावाखाली घातला जाणारा गोंधळ यामुळे सामान्य माणसाच्या मनात आदराऐवजी 'दहशत' निर्माण होत आहे. केवळ तरुणच नव्हे, तर सुशिक्षित म्हणवणारे प्रौढ आणि महिलाही या 'तमाशात' मागे नाहीत. अंधश्रद्धेचे निर्मूलन करणाऱ्या संतांच्या नावाने आपण पुन्हा त्याच कर्मकांडांच्या गर्तेत अडकतोय. "जयंती आहे म्हणून आज अमुक एक गोष्ट केली तर पुण्य मिळेल," अशा बाळबोध समजुतींतून आपण महापुरुषांना केवळ 'कर्मकांडाच्या' चौकटीत बंदिस्त केले आहे. परिणामी, त्यांचे 'विचार' आत्मसात करण्यापेक्षा त्यांचे 'पूजन' करण्यातच आपण धन्यता मानतोय. ही मानवी दांभिकता आज सामाजिक मूल्यांचा ऱ्हास करत आहे. ज्या वयात हातांत पुस्तके आणि डोळ्यांत स्वप्ने असायला हवीत, त्या वयात आमची मुले राहडा संस्कृती जोपासत आहेत. 
     हा केवळ उत्सव नाही, तर हा 'वैचारिक आत्मघात' आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जर आपण ग्रंथदिंडी काढण्याऐवजी गोंधळ घालत असू, रक्तदान शिबिराऐवजी फटाक्यांची उधळण करत असू आणि अनाथालयाला मदत करण्याऐवजी मेजवान्या झोडत असू, तर आपण त्यांचे 'अनुयायी' म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाही आहोत. हा धांगडधिंगा म्हणजे त्या महापुरुषांनी दिलेल्या बलिदानाची क्रूर थट्टा आहे. जर आपण आजही त्यांच्या विचारांच्या प्रकाशात आपले आचरण सुधारू शकत नसू, तर सालाबादप्रमाणे होणारे हे जन्मोत्सव म्हणजे केवळ 'काळाचा अपव्यय' आणि 'शून्याची बेरीज' आहे! 
    ❣️स्मार्ट किट❣️.   
   इतिहासातील महापुरुषांचे स्मरण हे त्यांच्या त्यागासाठी होते, पण आजच्या गल्लीबोळांतील 'वाढदिवसांचे' अर्थच बदलले आहेत. ज्यांचे चारित्र्य संशयाच्या भोवऱ्यात आहे, ज्यांच्या संपत्तीचा स्रोत अनैतिकतेच्या दलदलीत रुतलेला आहे आणि ज्यांच्या दहशतीने सामान्य माणूस थरथर कापतो, अशा 'स्वयंघोषित' जननायकांचे वाढदिवस आज समाज चवीने साजरे करू लागला आहे. हे वाढदिवस नसून, ते सत्तेचे आणि धनाचे एक 'बीभत्स प्रदर्शन' आहे. एखाद्या राजकीय नेत्याचे किंवा गावातील दबंग गुंडाचे ते अक्राळविक्राळ फ्लेक्स जेव्हा महापुरुषांच्या स्मारकांपेक्षाही उंच लागतात, तेव्हा समजून जावे की, आपल्या समाजाची नैतिक उंची पाताळात गेली आहे. या 'धनाड्य' आणि 'दबंग' मंडळींना आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नक्की काय साध्य करायचे असते? हा केवळ वाढदिवस नसून, ते एक 'मानसिक कडेलोटाचे लक्षण आहे. 
     शक्तीचे हे प्रदर्शन म्हणजे मानवी मूल्यांचा 'लिलाव' आहे. उद्योगपती असोत वा सेलिब्रिटी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चैनीचे प्रदर्शन जेव्हा 'इव्हेंट' म्हणून लोकांसमोर येते, तेव्हा त्यातून केवळ मत्सराची आणि भौतिकवादाची विषवल्ली पेरली जाते. कर्तृत्वाचा कोणताही आधार नसताना, केवळ पैशाच्या जोरावर हे 'प्रतिष्ठा' विकत घेऊ पाहतात. या प्रक्रियेत 'पब्लिक'चा वापर केवळ एक 'मतपेढी' किंवा 'गर्दी' म्हणून केला जातो. ज्यांच्या वाढदिवशी गोरगरिबांच्या घरांत दिवा लागणार नाही, त्यांच्यासाठी आपण रक्ताचे पाणी करून उत्सव साजरा करणे, ही वैचारिक दिवाळखोरी आहे.
      येणाऱ्या पिढीवर आपण काय संस्कार करत आहोत? "सत्ता आणि पैसा असेल तर वाट्टेल ते करता येते," हाच संदेश आज या वाढदिवसांच्या माध्यमातून दिला जात आहे. जर चारित्र्यापेक्षा 'चमकोगिरीला' महत्त्व मिळत असेल, तर भविष्यात या देशाला थोर महापुरुष नव्हे, तर केवळ 'भाडोत्री अनुयायी' मिळतील. हा सत्तेचा आणि शक्तीचा जो माज आपण वाढदिवसांच्या निमित्ताने जोपासत आहोत, तो उद्या आपल्याच संस्कृतीचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. वेळ आली आहे या 'बॅनर संस्कृती'च्या पलीकडे जाऊन, खऱ्या कर्तृत्वाचा आणि माणुसकीचा शोध घेण्याची! 
   वाढदिवसाच्या संकल्पनेचा विचार करताना, बालपणातील त्या साध्या, पण अत्यंत 'संस्कारक्षम' स्मृती डोळ्यांसमोर तरळतात. पूर्वी वाढदिवस असला की आई भल्या पहाटे उठवायची. स्नान उरकून, देवादिकांचे दर्शन घेऊन आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तो पाटावरचा सोहळा सुरू व्हायचा. निरंजनाच्या शांत तेजातील ते 'औक्षण', कपाळावरचा तो टिळा आणि आईने मुखात घातलेला साखरेचा तो गोड घास— यात केवळ आनंद नव्हता, तर त्यात "तुझे आयुष्य या दिव्यासारखे प्रकाशमान होवो," हा आशीर्वादाचा प्रसाद  होता. रामरक्षेचे ते सूर आणि घराघरातील ते मांगल्याचे वातावरण मुलाच्या मनावर 'कृतज्ञतेचे' पहिले बीज पेरत असे.
     पण आज वाढदिवसाचे *'इव्हेंट'*मध्ये रूपांतर झाले आणि घराघरांतील मांगल्याचा नूरच बदलला. नाना प्रकारचे क्रीम, अंडी आणि रसायने घातलेला तो भलामोठा 'केक', रंगीबेरंगी मेणबत्त्या आणि कानठळ्या बसवणारा डीजे! दोन-तीन वर्षांच्या त्या चिमुरड्याला, ज्याला अजून जगाचे भान नाही, त्याला ऐटीत खुर्चीवर बसवले जाते. भविष्यात त्याने अहिंसा स्वीकारावी किंवा माणसे जोडावी, हे शिकवण्यापूर्वीच आपण त्याच्या कोवळ्या हातात 'सुरा' देतो आणि त्याला तो केक कापायला शिकवतो. ज्याच्या आयुष्यात अजून ज्ञानाचा प्रकाश यायचा आहे, त्याला आपण 'मेणबत्ती विझवायला' (अंधकार करायला) लावतो. ही विसंगती आपल्याला कशी टोचत नाही?
      कौटुंबिक वाढदिवसाच्या या 'दिखाऊपणात' मुलापेक्षा पालकांचाच 'अट्टाहास' अधिक असतो. कर्ज काढून किंवा ऐपत नसतानाही केवळ नातलगांसमोर मिरवण्यासाठी केलेली ही मेजवानी नेमकी कोणासाठी? तो छोटा जीव तिथे रडत असतो, कंटाळलेला असतो, पण आई-बाप मात्र स्वतःच्या सजावटीत आणि पाहुण्यांच्या पाहुणचारात इतके दंग असतात की त्यांना आपल्या मुलाच्या भावनांची तमा नसते. ज्या वयात त्याला 'दातृत्वाचा' आनंद मिळायला हवा, तिथे त्याला आपण 'गिफ्ट' स्वीकारण्याची हाव आणि हव्यास शिकवतो. हीच ती वेळ आहे जिथे कुटुंबाने सावध व्हायला हवे. कुटुंब ही समाजाची पहिली शाळा आहे. जर आपण आपल्या मुलांना वाढदिवसाच्या निमित्ताने दिखाऊपणा शिकवला, तर आपण त्यांच्याकडून 'चरित्र संपन्न' होण्याची अपेक्षा कशी करू शकतो? वाढदिवस हा मुलावर 'संस्कार' करण्याचा दिवस असायला हवा. केक कापण्याऐवजी एखाद्या झाडाला पाणी घालणे, मेणबत्त्या विझवण्याऐवजी अनाथालयात एखादा दिवा लावणे किंवा एखाद्या गरीब मुलाला शैक्षणिक साहित्य देणे, अशा कृतींतून त्या मुलाला 'माणुसकीची' दीक्षा मिळेल.
आपल्याला आपल्या मुलाला केवळ 'शारीरिक वाढ' झालेला माणूस बनवायचे नाही, तर त्याला 'कर्तृत्ववान' आणि 'चरित्रसंपन्न' बनवायचे आहे. मुलाचा वाढदिवस म्हणजे त्याच्या भविष्यातील महान कार्याची 'पाऊलखूण' असायला हवी. जर कुटुंबाने हा वैचारिक बदल स्वीकारला, तरच उद्याच्या समाजाची नाडी सुधारेल. मुलाला महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा, त्याला 'मूल्यांची' भेट द्या. कारण वस्तू खराब होतील, पण संस्कार मात्र त्याला आयुष्यभर पुरतील. 
   एकीकडे वाढदिवसाच्या नावाखाली रस्ते अडवून होणारी बॅनरबाजी, रात्रीचा धांगडधिंगा आणि शक्तीप्रदर्शनाच्या गर्तेत जेव्हा समाज भरकटताना दिसतो, तेव्हा काही व्यक्ती आणि संस्था आपल्या कृतीतून एक 'आदर्श वस्तुपाठ' जगासमोर उभा करतात. हा उत्सव केवळ स्वतःच्या अस्तित्वाचा जल्लोष नसून, तो समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक 'महामुहूर्त' कसा होऊ शकतो? हेच ते दाखवून देतात. 
जेव्हा मैदानाचा राजा सचिन तेंडुलकर आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोट्यवधी चाहत्यांना 'रक्तदानाचे' आवाहन करतो, तेव्हा त्या एका शब्दाखातर देशातील हजारो तरुण स्वेच्छेने पुढे येतात; त्या रक्ताच्या थेंबाथेंबातून अनेकांचे प्राण वाचतात, तेव्हा त्या खेळाडूचा वाढदिवस खऱ्या अर्थाने 'अमर' होतो. निसर्गाच्या वाढत्या ऱ्हासाची चिंता वाहणाऱ्या अनेक संवेदनशील मनांनी आता 'वृक्षारोपणाचा' वसा घेतला आहे; केक कापण्याऐवजी मातीत एक रोपटे लावून ते जगवण्याची ही 'हरित' शपथ, आपल्या वाढदिवसाला पृथ्वीच्या भविष्याशी जोडून देते. बाबा आमटे आणि साने गुरुजींसारख्या विभूतींच्या प्रेरणेतून आज अनेक तरुण आपला वाढदिवस आनंदवन किंवा सेवा आश्रमांत 'अन्नदान' करून साजरा करतात; मेजवान्यांवर हजारो रुपये उडवण्यापेक्षा एखाद्या भुकेल्याच्या तृप्त ढेकरातून मिळणारे समाधान, वाढदिवसाच्या साऱ्या सुखापेक्षा मोठे ठरते. इतकेच नव्हे, तर मध्यमवर्गीय कुटुंबांतून आता 'विद्यार्थी दत्तक' घेण्याची एक नवी क्रांती सुरू झाली आहे; पार्टीचा अकारण खर्च टाळून ग्रामीण भागातील एका गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, हा केवळ वाढदिवस उरत नाही, तर तो एका पिढीचा 'कायापालट' करणारा यज्ञ ठरतो.
     लक्षात घ्या मित्रांनो, ज्या दिवशी तुमच्या वाढदिवसाचे निमित्त होऊन दुसऱ्याच्या आयुष्यातील 'अंधार' दूर होतो, तोच दिवस खऱ्या अर्थाने 'मंगल' असतो. वाढदिवस साजरा करणे म्हणजे केवळ स्वतःच्या वयाची बेरीज करणे नव्हे, तर आपल्या कर्माने समाजाच्या आनंदात भर घालणे होय. म्हणूनच, उत्सवाचा दिखावा करण्यापेक्षा उपयोगाचा दिवा लावा; कारण कर्माच्या या सुगंधानेच तुमच्या आयुष्याची खरी व्याप्ती मोजली जाईल! 
   15 ऑक्टोबर 2002 ची ती संध्याकाळ. दिल्लीच्या एका शाळेतील सभागृह खचाखच भरलेले होते. पिंजऱ्यातल्या पाखरांसारखी मुले उत्साहाने थिरकत होती. समोर मंचावर एक विलक्षण तेज पुंज व्यक्तिमत्त्व बसलेले होते— विस्कटलेले रुपेरी केस, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यांत साऱ्या विश्वाचे कुतूहल!
तो दिवस त्या महामानवाच्या वाढदिवसाचा होता. फुलांचे गुच्छ, शुभेच्छांची पत्रे आणि कौतुकाचा वर्षाव होत होता. पण त्यांच्या मनाला मात्र काहीतरी वेगळेच खुणावत होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. अचानक, शेवटच्या रांगेतून एक दहा-बारा वर्षांचा मुलगा उभा राहिला. त्याचे पाय थोडे थरथरत होते, पण डोळ्यांत विलक्षण चमक होती. त्याने माईक हातात घेतला आणि थेट त्या महापुरुषाच्या डोळ्यांत बघत विचारले— "सर, आज तुमचा वाढदिवस आहे, जग तुमचे कौतुक करत आहे... पण सांगा ना, या देशाला खरोखर महान बनवण्यासाठी मी आज, याच क्षणी काय करू शकतो?"
     त्या प्रश्नाने संपूर्ण सभागृहात नीरव शांतता पसरली. मंचावर बसलेले ते दिग्गज व्यक्तिमत्त्व क्षणभर थबकले. त्यांच्या मनात क्षेपणास्त्रांच्या गतीपेक्षाही वेगाने विचारचक्र फिरू लागले. त्यांनी त्या मुलाकडे पाहिले आणि त्यांना साक्षात्कार झाला की— खरी शक्ती माझ्या क्षेपणास्त्रांत नाही, तर या मुलाच्या प्रश्नात आणि त्याच्या ध्येयवेड्या नजरेत आहे!
आपला वाढदिवस मुलांसवेत साजरा करणाऱ्या, भारताच्या मिसाईल मॅन आणि तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी, त्या दिवशी निर्णय घेतला की, माझा वाढदिवस हा हार-तुरे स्वीकारण्यासाठी नसेल, तर तो तरुणांच्या मनात 'स्वप्नांची ठिणगी' टाकण्यासाठी असेल. त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावले आणि सांगितले— "बाळा, तू आज एक स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कंबर कस, हाच माझा खरा वाढदिवस !" तिथूनच त्यांच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला. वयाने वृद्ध असूनही ते मुलांमध्ये 'बालक' होऊन वावरले, कारण त्यांना माहित होते की— शरीराची वाढ निसर्ग करतो, पण स्वप्नांची वाढ माणसाला स्वतः करावी लागते. मित्रांनो, डॉ. कलामांचे हे जीवन आपल्याला एकच गोष्ट शिकवते की, वाढदिवस म्हणजे केवळ कॅलेंडरमधील एक तारीख बदलणे नव्हे. वयाची वर्षे मोजणे ही तर केवळ भौतिक बेरीज आहे. खरी वाढ ती असते जी तुमच्या विचारांत होते, तुमच्या कर्तृत्वात होते आणि तुमच्या दातृत्वात होते.
ज्या दिवशी तुमच्या अस्तित्वामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाशाचा एक किरण येईल, तोच तुमचा खरा 'जन्मदिन'! म्हणून, वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्त्या विझवून अंधार करण्यापेक्षा, ज्ञानाचा आणि संस्कारांचा एक दिवा लावा. शरीराची वाढ तर होईलच, पण बुद्धीची आणि कर्तृत्वाची वाढ जिथून सुरू होते, तोच खरा 'अभिष्ठचिंतनाचा' क्षण असतो. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला केवळ वयाने मोठे व्हायचे आहे की आपल्या कार्याने काळालाही जिंकणारा महापुरुष बनायचे आहे? 

 सर्वाधिकार, ©® मनोज आहेर, नाशिक,    
 दिनांक 29 मार्च 2026..  
  कृपया, सदर लेख, लेखकाच्या नावासह, कुठलाही बदल न करता प्रसारित,    करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...