गुरुवार, २५ जून, २०२६

2998. बहर

 “नाथा, जरा माझा पलंग खिडकीकडे लावशील का? सगळे ओरडताहेत, रागवताहेत मला. ‘फालतू हट्ट करू नको’ म्हणून. पण तुला माहितीये ना सगळं. त्याचा बहर बघूनच डोळे मिटतील माझे. पानगळ होऊन फक्त जाड हिरवीगार देठं उभी आहेत ना दिमाखात. फिकट पांढरी मध्येच सुर्यासारखी पिवळी फुलं बहर होऊन त्याचं रूप अगदी सुंदर दिसत असेल, ते पाहू दे जाण्याआधी शेवटचं.”
आजीच्या वाक्यावर नाथा हसला. ‘बरं आजी,’ म्हणत नाथानं आजीच्या डोक्यावर थोपटलं, “तू ऐकणार नाहीसच ग आजे.” म्हणत त्यानं तिच्यासकट कसरत करत तो पलंग खिडकीशी आणला.
आजी म्हणाली, “मानेखाली थोड्या दोन उश्या घाल, म्हणजे दिसेल चाफा नीट.” म्हणत तिनं मान उचलली. त्यानं हसून तिच्या मानेखाली उश्या ठेवल्या. ती त्या झाडाकडे पाहता पाहता झोपली. त्यानंही खिडकीशी डोकावलं. खरंच एकही पान त्यावर नाही आणि फुलांचा बहर असा भरून आलेला. त्यानं हाताशी असलेलं एक फूल तोडलं आणि त्याची अंगठी बनवली. ती आपल्याच बोटात धरून त्यानं आरश्यात डोकावलं. आरश्यानं त्याला मागच्या काळात नेलं.
टोपलंभर फुलं घेऊन आजी आपल्याभोवती फिरत होती. त्यावेळी आपण आठ एक वर्षाचे होतो. ती म्हणत होती, “हे बघ, आज तुझ्या शाळेतल्या स्पर्धेत तुला कृष्ण करते. ह्या फुलांचा हार, टोप, कानातले. त्याचीच अंगठी. तू बघ तर कसा मस्त दिसशील नाथा ! ह्या रुपात तुला कुणी ओळखायचं नाही.” म्हणत आजीनं भराभर ह्या फुलांचे दागिने केले.
आपण जरा रुसलो, तर म्हणाली “अरे असं काय करतोस? तुझ्या मित्रांच्या भारी ड्रेसला. कुणी पोलीस कुणी राजा जरी झालं, तरी आपल्या चाफ्यानं बघ ना तुला कसं छान सजवलंय !”
आपण तोंड फुगवून शाळेत गेलो. वेशभूषा स्पर्धा सुरू झाली. आजीने शिकवलेलं पद आपण मस्त म्हटलं.
“नका दुःखी होऊ जगी,
नसेल जरी सोबत कुणी.
चाफ्यालाही कुणी नसता
बहरून यावे वाटते किनई !
एकटंच येतो जगी माणूस
जातो ही एकटाच तो.
जगण्याचा बहर टिकवा,
हेच सांगतो नाथ कृष्ण तो !”
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मोठ्या बाईंनी तर विशेष कौतुक केलं आणि आजीला बोलावून म्हणाल्या,
“आजी कमाल आहे तुमची ! एवढं दुःख आयुष्यात आहे, तरी त्या नातवासाठी सगळं दुःख गिळून किती आनंदी, उत्साही जगताहात तुम्ही !”
त्यावेळी आजीनं आपल्याला पटकन पोटाशी धरलं होतं आणि बाईंना म्हणाली,
“बाई, मीही सामान्य बायकांसारखी रडत बसले होते. अपघातात ह्याचा आजा, ह्याची आई, माझा एकुलता एक लेक गेला. त्याक्षणी वाटलं आपण का वाचलो?
“खूप दिवस दगडासारखी होऊन बसून राहायचे दारात. एकदा टपकन चाफ्याचं फूल डोक्यात पडलं. सहज वर पाहिलं तर फांद्या नुसत्याच. एकही पान नाही. पण शेंड्याला भरगच्च फुलं !
“खरंतर किती जून ते झाड. पण असा विचार कधी आला नाही आणि तेव्हा आला; त्याक्षणी वाटलं. झाड निमित्त होऊन देवाचा संदेश मला सांगतंय, ‘काहीही झालं तरी जगण्याचा बहर सोडायचा नाही.’
“मग ह्या लेकरसाठी आता अशी भरभरून जगायला शिकले. मला काही साधन नव्हतं पैसे कमवायला. मग ह्या चाफ्यालाच मनात धरलं आणि गोधडीवर तशीच फुलं विणायला घेतली. हातात कला होती. त्याला बहर आला.
“एकटीला हे सगळं जड चाललं होतं. पण बाई, ह्या शाळेतल्या अनेक शिक्षकांकडून भरपूर ऑर्डर मिळाल्या. व्यवसायाला बहर आला. मग हा बहर शिकवायचं केंद्रच बनवलं आणि ते शिकवलं फक्त अनाथ बायांना. एकीला एक मिळत गेली आणि आता चालू आहे, असं बहरून जगणं !”
आजीची ही सगळी वाक्य त्याला आठवली. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. टपकन आजीच्या हातावर एक अश्रू पडलाच. आजीला जाग आली. हातानंच आजीनं त्याला खाली वाकायला लावलं.
“नाथा, असा रडत बसू नकोस. आपण ह्या चाफ्याकडून शिकलो ना, तसाच राहा. कठिण परिस्थितीतही फुललेला ! आपण चालवलेलं ‘अनाथ महिला आश्रम’ आणि ‘चाफ्याची गोधडी केंद्र’ असंच पुढं ने. गेले मी जरी तुझ्या आयुष्यातून निघून तरी, चाफ्याचा बहर असाच आयुष्यभर फुलू दे !” 
आजीनं डोळे मिटले. नाथानं एकदा आजीकडे पाहिलं आणि एकदा बहरलेल्या चाफ्याकडे. दोघंही एकच सांगत होते.
‘जगण्याचा बहर जपायचा...!’

- स्वप्ना मुळे (मायी), छ.संभाजीनगर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...