एक असाच माणूस होता. त्याची ५,००,००० रुपयाची थेली हरवली. त्यानं गावात जाहीर केलं की, 'जो कोणी थैली आणून देईल, त्याला ५०,००० रुपये बक्षिस.'
एका प्रामाणिक माणसाला, ती सापडली. तो म्हणाला, "मी एरवी सुद्धा तुला आणून दिली असती. पण तू जाहीर केलं आहेस, तर मला ५०,००० रुपये दे."
आता याला ५०,००० रुपयाचाही लोभ सुटला. त्यानं ते पैसे मोजले; आणि म्हणाला,
"यात ५०,००० रुपये कमी आहेत. ते ५०,००० रुपये तू मला दे; नाही तर, तुला मिळाले असे समज."
तो थैली आणून देणारा माणूस प्रामाणिक होता. तो म्हणाला, हे बरोबर नाही. चोरी न करता माझ्यावर हा चोरीचा आरोप करतो आहे. तेव्हा, तो न्यायाधिशाकडे गेला. न्यायाधिशाला जे लक्षात यायचं ते आलं.
प्रामाणिकपणे हा हातात धन येऊनही परत करायला गेला होता. त्याच्यावर विश्वास जास्त बसणार, हे साहजिकच आहे. त्यागावर नेहमी लोकांचा विश्वास जास्त बसतो. ज्यानं त्याग केला हे सिद्ध झालं, त्याच्यावर शत्रू सुद्धा विश्वास ठेवतात.
धर्मराज खोटं बोलणार नाही हा द्रोणाचार्याचा कौरवांचाही विश्वास होता. तेव्हा, त्यागावर, प्रामाणिकपणावर, शत्रूचाही विश्वास असतो. अशा परिस्थितीत, न्यायाधिशानं त्या सावकाराला विचारलं, "तुझ्या थैलीत किती रुपये होते?" तो म्हणाला, "५,००,००० रुपये होते." "या पिशवीत ४,५०,००० रुपये आहेत, हे सिद्ध झालं आहे. त्या अर्थी, ही तुझी पिशवी नाही. ही पिशवी कोणाची आहे, हे शोधून काढणं माझं काम नाही: ती इकडे दे."
न्यायाधिशानं, ती पिशवी, त्या प्रामाणिक माणसाला देऊन टाकली.
स्वतःलाच माणूस अप्रामाणिकपणे नाकारतो कसं, ते पहा. प्रत्येक खोटा माणूस, आपल्या विरुद्ध आज ना उद्या पुरावा तयार करून ठेवतो. सत्यापुढे अधिक चलाख माणूस अजून निर्माण झाला नाही. सत्य झाकणारं झाकण, अजून कोणीही निर्माण केलेलं नाही. पण इथे स्वार्थाशी माणूस एकरूप होतो. 'जिथे स्वार्थ तिथे मी,' असं नाही, तर 'जे जे सुष्टीचं रुप असेल. ते ते मी. मग ते चांगलं असो अथवा वाईट असो; ते ते मला सारखं आहे. कृष्णानं सांगून टाकलं, "जुगाराचा फासासुद्धा मी आहे." ही सर्वत्रता जी आहे, ती ठसवण्याची, दहाव्या अध्यायातली गोष्ट आहे. अर्जुनानं अनेकप्रश्न विचारले; पण हा प्रश्न नाही विचारला. तो विचारला असता, तर कृष्णानं आणखी सूक्ष्म उत्तर दिलं असतं.
शेवटी स्वतःलासुध्दा स्वार्थानं नाकारलं जातं. स्वार्थ हा आयुष्य संपवत असतो.
- स्वामी विज्ञानानंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा