दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर शिकागोहून आलेलं विमान उतरलं आणि हवाई सुंदरीनं अतिशय गोड आवाजात घोषणा केली.
“काही तांत्रिक कारणांमुळे मुंबई ला रवाना होण्यापूर्वी हे विमान इथे अडीच तास विश्रांती घेईल.”
आणि जीत नं चरफडत “ओह् नो डॅम इट !” अशी निराशा व्यक्त केली. इतर कुठल्या विमानप्रवासात जर दुबईच्या विमानतळावर असा अडीच तासाचा मोकळा वेळ मिळाला असता, तर त्यानं नक्कीच मनसोक्त खरेदी केली असती किंवा एअरपोर्टचा फेरफटका मारत काहीबाही खाण्याचा आस्वाद घेतला असता. पण आज मामला वेगळा होता. आज त्याला वेध लागले होते ते त्याच्या जन्मगावी म्हणजे बडोद्याला जाण्याचे !
‘बडोदा.’ जन्मापासून ते अगदी नवतारुण्यापर्यंत त्याचं आयुष्य याच शहरात व्यतीत झालं होतं. कित्येक आठवणी मनात रुंजी घालत होत्या. त्यामुळंच अमेरिकेत स्थायिक झाल्यापासून म्हणजे जवळ जवळ पंधरा वर्षांनी तो मायदेशी येत होता. म्हणूनच त्याला कधी एकदा बडोद्याला पोहोचतोय असं झालं होतं.
परंतु आता नाईलाजास्तव अडीच तास व्यतीत करावे लागणार होते. मग नकळत त्याची पावलं कॉफी शॉपकडे वळली. एक कॉफी घेऊन शांतपणे तो लाउंजमधल्या एका सोफ्यावर विसावला.
विमान अडीच तास तिथं रखडलं होतं. पण मनाला आठवणींचे पंख लावून जीत मात्र केव्हाच पुढं जाऊन बडोद्याला पोहोचला होता.
मणीनगरची ती गल्ली, गल्लीच्या मागं असणारी गर्द आमराई. रोजचा तो डझनभर मुलांचा दंगा आणि कोलाहल. होळीत उडणारे रंग आणि संक्रांतीचे पतंग. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतली ती धमाल आणि त्या वेळचा सर्वांचा आवडता तो लपंडावचा खेळ. हे सर्व त्याच्या मनात आणि डोळ्यांसमोर एखाद्या स्लाईड शोप्रमाणं झरझर पुढं सरकत होतं.
मणीनगरची ती गल्ली तशी जादुईच होती मुळी. उणीपुरी वीसेक घरं असतील, पण सर्वांमध्ये विलक्षण एकोपा आणि मुलांमध्ये जिवलग मैत्री होती.
सगळे सण आणि उत्सव एकत्र येऊन साजरे केले जायचे. या मैत्रीला आणि उत्साही उत्सवांना मग जातीची, धर्माची बंधनं नव्हती… गरिबी आणि श्रीमंतीची कुंपणं आड येत नव्हती. दिवाळीचा फराळ आणि ईदचा शिरखुर्मा सर्व मिळून फस्त करायचे.
‘शिरखुर्मा’ आठवला तसा जीत थोडासा कासावीस झाला. त्याला चटकन त्याचा जिवलग दोस्त जावेद आठवला…
जावेद… गल्लीतल्या रहमत चाचाचा मुलगा आणि जीतचा जिवलग दोस्त. त्यावेळी जीत आणि जावेदची जोडीच होती मुळी! नेहमी एकत्र खेळणं आणि मस्ती करणं. ईदच्या नमाज नंतर जावेदच्या घरी जाऊन हक्कानं पोट भरून शीरखुर्मा चापणारा जीत दिवाळीत आग्रह करून करून जावेदला चकली लाडूचा फराळ खायला घालायचा.
जीत अतिशय बोलक्या स्वभावाचा आणि बिनधास्त होता त्यामुळं जावेदच्या आई वडिलांना तोही ‘अम्मी-अब्बू’ म्हणूनच हाक मारायचा. सहजपणे त्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचा.
त्यामानानं जावेद मात्र फारच शांत, भिडस्त आणि मितभाषी होता. त्यामुळं जीतच्या घरात जाताना त्याला कमालीचा संकोच वाटायचा. तिथं काही खाताना त्याला लाज वाटायची. अर्थात यामागचं एक कारण म्हणजे जीतचे वडील, म्हणजे हिरालाल देसाई हेही होते.
त्यांना जावेद घरी आलेला फारसं रूचायच नाही. त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी मग त्रासिक आठ्या उमटायच्या. जावेदला त्यावेळेस खूप अवघडल्यासारखं व्हायचं.
अर्थात ‘जीत-जावेद’च्या प्रामाणिक आणि निखळ मैत्रीवर याचा काही परिणाम व्हायचा नाही… कारण घराबाहेर त्यांची मैत्री जीवाला जीव देणारी होती.
जावेदच्या अब्बुंचं म्हणजे रहमत चाचांचं मणीनगरच्या गल्लीतच पतंग आणि खेळण्यांचं दुकान होतं. सगळे जण त्यांना ‘पतंग चाचा’ नावानंच ओळखायचे… कारण अतिशय सुंदर सुंदर आणि रंगीबेरंगी असे वेगवेगळ्या आकारांचे अनोखे पतंग तयार करण्याची कला त्यांच्यात होती.
त्यांनी बनवलेल्या पतंगांना संपूर्ण शहरातून मोठी मागणी असायची. उत्तरायण आणि विविध पतंग उत्सवांमध्ये त्यांच्या सुंदर सुंदर पतंगांनी आकाश व्यापून जायचं.
असंच एकदा रहमत चाचांच्या दुकानात शाळकरी जीतला पतंग घेऊन देण्यासाठी त्याची आई त्याला घेऊन गेली होती आणि तिथंच बसून आपल्या अब्बूला पतंगांना खळ लावायला मदत करणाऱ्या जावेद आणि त्याच्या लहान बहिणीशी म्हणजे झीनतची त्याच्याशी ओळख झाली. आणि मग तेव्हापासून पतंग आणि मांज्याप्रमाणं ही मैत्री अतूट झाली होती.
परंतु गेल्या पंधरा वर्षांपासून मात्र मांज्यापासून विभक्त होऊन पतंग कुठंतरी हरवून गेला होता. लपंडावातला भिडू असा कुठंतरी लपला होता की, सापडतच नव्हता… असं वाटतं होतं की, कधी ही मागून येऊन ‘धपका’ असं म्हणत तो भिडू येईल आणि पाठीवर थाप मारून आऊट करेल!
बडोदा सोडून जीतला पंधरा वर्षांचा काळ लोटला होता… पण या पंधरा वर्षांत त्याला जावेदशी कधीच संपर्क करता आला नव्हता. त्याच्याशी साधं बोलणंही होऊ शकलं नव्हतं.
लहानपणी म्हणजे अगदी मिसरूड फुटायच्या वयापर्यंत जावेद मात्र एखाद्या सावलीसारखा जीत सोबत रहात असे… जीतचं बोलणं, त्याचा आत्मविश्वास जावेदला खूप आवडत असे. तो जीतची काळजीही घेत असे.
असाच एका उन्हाळी सुट्टीच्या दुपारी आमराईत लपंडावाचा खेळ रंगला होता… जीत लपण्यासाठी कोपऱ्यातल्या एका दाट झुडूपामागं जाण्याचा प्रयत्न करत होता.
“जीत… तिथं नको जाऊ त्या सांद्रीत… साप असतात तिथं!” जावेद त्याला समजावण्याचा प्रयत्न करत सांगू लागला.
“अरे काही नाही होत यार… इथं लपलो तर आपण सापडणारच नाही बघ!” असं म्हणत त्या झाडीतून वाट काढत जीत आत जाऊ लागला.
त्याच्या काळजीपोटी जावेद तिथंच लक्ष ठेवून उभा राहिला आणि त्यामुळं तो आऊट देखील झाला. पाच-दहा मिनिटांनी मुलांना जीतच्या ओरडण्याचा आवाज आला आणि जीत जिवाच्या आकांतानं त्या झाडीतून बाहेर पळत आला आणि चक्कर येऊन पडला…
जावेदनं निरखून पाहिलं, तर त्याला जीतच्या पायावर सापाच्या दंशाच्या खुणा दिसल्या. तसं बाकी सगळ्या मुलांची भितीनं गाळण उडाली… पण जावेद मात्र शांत होता. त्यानं प्रसंगावधान दाखवून पटकन स्वतः च्या गळ्यातलं कापड त्याच्या पायावर घट्ट बांधलं आणि धाडस करून स्वतःच्या तोंडानं जखमेच्या जागेतून विष शोषून ते थुंकायला सुरुवात केली.
इतर सगळी मित्र मंडळी मात्र हे पाहून भांबावून गेली. त्यानंतर जावेद इतर एक-दोन मित्रांच्या मदतीनं जीतला उचलून गल्लीतल्या हकीमाकडे घेऊन गेला.
जीतच्या घरी हे समजलं आणि त्याचे वडील तडक तिथं दाखल झाले… पुढचा मागचा काही विचार न करता जावेदच्या कानाखाली जोरदार लावून दिली आणि जीतला त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले.
अर्थात जावेदनं बरचसं विष आधीच काढून टाकल्यानं जीतच्या जीवाला फारसा धोका नव्हता आणि थोड्या वेळात त्याला बरंही वाटू लागलं… पण आपल्यामुळं काहीही चूक नसताना जावेदला मात्र मार खावा लागल्याचं शल्य त्याला बोचू लागले.
त्या अवस्थेतही तो रात्री जावेद कडे माफी मागायला गेला आणि जावेदनं देखील काही झालंच नाही या आविर्भावात “अरे त्यात काय… चालायचंच तेवढं. अंकलना टेन्शन आलं असेल तुझं, म्हणून रागावले असतील…तू विसरून जा.” असं म्हणत त्यालाच समजावलं.
असा हा जावेद मात्र गेल्या पंधरा वर्षांपासूनच्या आयुष्याच्या लपंडावात कुठं लपून बसला होता कुणास ठाऊक…
हे सगळं आठवून जीतचे डोळे नकळत पाणावले. तेव्हढ्यात त्याच्या विमानाच्या पुढील प्रवासाच्या प्रयाणाची घोषणा झाली आणि त्याची पावलं एक्झिट गेटकडे चालू लागली…
‘आता काहीही करून जावेदला शोधून काढायचंच…’ अशी त्यानं खूणगाठ मनाशी बांधली होती. जीत अमेरिकेत असताना त्यानं जावेदला खूप वेळा फोन केला होता पण जावेदच्या घरातला फोन बंदच झाला होता आणि स्वतः च्या घरी फोन करून चौकशी केली, तर जावेद आणि त्याचं कुटुंब ही गल्ली सोडून दुसरीकडे कुठंतरी गेल्याचं जीतच्या वडिलांनी मोठ्या आनंदानं त्याला कळवल होतं.
जीतसाठी मात्र ही गोष्ट वेदनादायक होती… कारण जावेदचे त्याच्यावर खरोखर अनेक उपकार होते!
जीतचे अनेक नातेवाईक अमेरिकेत स्थायिक झाले होते, त्यामुळं जीतचं ग्रॅज्युएशन पूर्ण होताच तिथं हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून त्यांच्या कुटुंबाचा हॉटेल्सचा व्यवसाय सांभाळण्यासाठी जीतला देखील तिथं पाठवायची खटपट त्याचे वडील करू लागले होते.
अखेर मनासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला प्रवेश मिळाला. अमेरिकेला जाण्याची तारीख नक्की झाली. तिकिटं देखील आली. गमनाची सर्व तयारी पूर्ण झाली आणि ज्या दिवशी मुंबईला विमान पकडण्यासाठी जाण्यासाठी म्हणून बडोद्याहून त्याची रेल्वे होती, त्याच सकाळी संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगे उसळले! सर्वत्र जाळपोळ आणि दगडफेक सुरू झाली आणि अखेर सरकारला सेना तैनात करून शहरात कडक कर्फ्यु जाहीर करावा लागला.
तरीही दंगल नियंत्रणात येण्याची काही चिन्हं दिसेनात त्यामुळं ‘दिसता क्षणी गोळ्या घालण्या’चे आदेश प्रशासनानं दिले आणि अमेरिका वारी करू पाहणाऱ्या जीत आणि त्याच्या कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं.
घरातून बाहेर पडणं शक्य नव्हतं. रेल्वे स्टेशन घरापासून आठ किलोमीटर लांब असल्यानं तिथपर्यंत प्रवास करून जाणं जीवाला धोकादायक होतं. जीतच्या वडिलांनी त्यांची ओळख वापरून जीतला रेल्वे स्टेशनपर्यंत सुखरूप पोहोचण्याची सोय करण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण सर्वांकडून केवळ नकार घंटा ऐकायला मिळाली कारण आता बाहेरील परिस्थिती चिघळली होती.
त्यामुळं आता हा प्रवास रद्द समजून निराशेनं जीत त्याच्या खोलीत जाऊन बसला होता… तेव्हढ्यात त्याच्या खोलीच्या खिडकीतून जावेद त्याला हाक मारताना दिसला…
“काय रे जावेद…?? तू काय करतोयस इथं?” खिडकीजवळ जात जीतनं त्याला विचारलं.
“अरे तुझी ट्रेन आहे ना साडेआठची?” जावेदनं दबक्या आवाजात त्याला विचारलं.
“अरे हो रे… पण आता जाता येणार नाही. बाहेर काय अवस्था आहे बघतोयस ना तू…??” निराश होत जीतनं उत्तर दिलं.
“ऐक माझं… असा चान्स आयुष्यात एकदाच मिळतो रे! सोडू नकोस… तुला जायलाच हवं!” त्याचा हुरूप वाढवत जावेद म्हणाला.
“अरे पण कसं शक्य……”
जीतचं वाक्य मध्येच तोडत जावेदनं विचारलं, “तुझ्याकडे किती सामान आहे? म्हणजे बॅगा किती आहेत?”
“का रे…??” काहीच न समजुन जीतनं विचारलं.
“हे बघ, मेन रोडनं रेल्वे स्टेशनवर जाणं अवघड आहे… मी तुला माझ्या स्कूटरवरून आमराईच्या मागच्या रस्त्यानं उस्मानपुराच्या इकडून सोडतो रेल्वे स्टेशनला… चल लवकर!”
इतर वेळी अडखळत बोलणाऱ्या जावेदनं हे वाक्य मात्र एका दमात बोलून दाखवलं.
“अरे वेडा आहेस की काय…?? नको नको… अजिबात नको. अमेरिकेत काय नंतर पण जाता येईल… पण आत्ता बाहेर पडलो, तर गोळ्या घालतील आपल्याला!” जीतनं स्पष्ट नकार दिला.
“अरे, काही नाही होणार… मला रस्ता ठाऊक आहे व्यवस्थित पोहोचू आपण. फक्त तुझ्या मोठ्या बॅगा तुला नीट पकडून स्कूटरवर बसावं लागेल.” जावेद आता इरेलाच पेटला होता.
अखेर बराच वेळ हो-नाही, हो-नाही करून त्यानं जीतला पटवलंच. परंतु जाण्यात धोका असल्यानं घरी न सांगता जाण्याचं दोघांनी ठरवलं. जीतनं मात्र आईला विश्वासात घेऊन हा धाडसी निर्णय सांगितला आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर फोन करण्याचं वचन देऊन दोघं हळूच मागच्या गल्लीतून रवाना झाले.
…आणि खरोखरच एखाद्या निष्णात वाटाड्याप्रमाणं गल्ली बोळातून वाट काढत काढत जावेदनं जीतला वेळेत रेल्वे स्टेशन वर पोहोचवलं. पण तिथंही भरपूर पोलीस बंदोबस्त असल्यानं स्टेशनबाहेरच थांबून जावेदनं कडकडून मिठी मारून भरल्या डोळ्यांनी त्याच्या जिवलग मित्राला निरोप दिला… आणि जीतनं देखील स्टेशनच्या पायऱ्या चढत चढत डोळ्यांमध्ये जावेदला भरून घेतलं, तेच शेवटचं… त्यानंतर मात्र जावेदची काहीच खबर मिळाली नव्हती.
मुंबईला उतरून रेल्वेनं जीत बडोद्याला पोहोचला. या पंधरा वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं… मणीनगरच्या गल्लीचं रुपडं आता पालटलं होतं. जुन्या घरांची जागा अपार्टमेंट आणि शॉपिंग सेंटर्सनी घेतली होती. सर्व मुलाची आवडती आमराई आता एका ‘जॉगिंग ट्रॅक’मध्ये रुपांतरीत झाली होती.
नकळत त्याची पावलं स्वतःच्या जुन्या घराकडे वळण्याआधी जावेदच्या घराकडे वळली. ते घर आता आजूबाजूच्या चकाचक इमारतींच्या मध्ये, थोरा-मोठ्यांच्या कार्यक्रमात गरिब मुलानं अवघडून बसल्यासारखं दबून गेलं होतं. पतंगचाचाचं दुकान आता पाडण्यात आलं होतं.
एकंदरीत ती गल्ली आधुनिक आणि चकाचक झाली होती, तिथला ओलावा, आपलेपणा मात्र नाहीसा झाला होता. जुने रहिवासी फारसे शिल्लक नव्हते आता… त्यामुळं जावेदबद्दल ‘काही माहीत नाही बुवा… पण चौदा-पंधरा वर्षांपूर्वी ती लोकं ही गल्ली सोडून गेले पहा…’ एव्हढीच बिनकामाची अन् त्रोटक माहिती मिळाली.
मग जीतनं आपल्या जुन्या घराकडे मोर्चा वळवला आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणी मनात ताज्या झाल्या… त्याला हे घर बिल्डरला विकायचं होतं आणि त्याच व्यवहारासाठी तो खास भारतात आला होता कारण त्याचे आईवडिलही पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले होते आणि जीत देखील लग्न करून तिथंच स्थायिक झाला होता त्यामुळं हे घर तसच बंद अवस्थेत पडून होतं. दोन वर्षांपूर्वी वडील देवाघरी गेले आणि माय-लेकांनी हे घर विकायचा मानस केला.
बिल्डरसोबत मीटिंग झाल्यावर तो शहरातच राहणाऱ्या त्याच्या मावशीकडे राहायला गेला. मग जुन्या गप्पा, आठवणी… ‘बडोदा आता पूर्वी सारखं राहिलं नाही…’ अश्या पालुपदानं सुरू झालेल्या माहितीची देवाणघेवाण झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी चहा, पोहे आणि खाकरा अश्या नाष्ट्यासोबत वर्तमानपत्राचा आस्वाद घेत असताना एका बातमीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं…
अहमदाबादच्या वार्षिक ‘पतंग महोत्सवा’ची बातमी होती. ती वाचून एका अनामिक आशेनं त्याचे डोळे चमकले. त्याचा आतला आवाज त्याला सांगू लागला, ‘बहुधा जावेद इथं भेटणार… या पतंग महोत्सवात तो नक्की असणार…’
असंही बिल्डर सोबत कागदपत्र आणि इतर व्यवहार दोन तीन दिवसानंतर होणार असल्यानं त्याच्याकडे वेळ होताच. मग मावसभावाची गाडी घेऊन त्याने तडक अहमदाबाद गाठलं. तिथं पोहोचून पाहतो तर, महोत्सवात माणसांची आणि आकाशात रंगीबेरंगी पतंगांची भव्य गर्दी होती. जीतची नजर मात्र भिरभिरत जावेदला शोधत होती.
‘कसा दिसत असेल तो आता? जाडा झाला असेल का…? तो मला ओळखेल का…??’ असे अनेक प्रश्न मनात तरळत होते. त्यानं संपूर्ण मैदान पालथं घातलं. सगळे स्टॉल पाहून घेतले पण जावेद काही दिसला नाही.
अखेर निराश होऊन तो एके ठिकाणी थांबला. डोक्यावर ऊनाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. थंड पाण्याची बाटली घेण्यासाठी तो एका खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे आला… तेव्हढ्यात त्याला जमलेल्या प्रेक्षकांचा गोंगाट, शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज ऐकू आला.
त्यानं पाहिलं तर एक वीस पंचवीस फुटी भव्य असा भारताच्या नकाशाच्या आकाराचा तिरंगी पतंग आकाशात झेपावत होता आणि त्या पतंगाच्या दोरीला असंख्य छोटे छोटे पतंग चिटकवून एक पतंगांची लांब लचक माळच जणू तयार झाली होती. प्रेक्षक भारावून गेले होते…
ते पाहून मात्र जीतचे डोळे एकदम चमकले. खुश होऊन शीळ वाजवत तो पाण्याची बाटली तिथंच विसरून मैदानाकडे पळाला.
ही अशी पतंगाच्या दोरीला छोटे छोटे पतंग लावून माळ बनवण्याची खासियत रहमतचाचा म्हणजेच पतंगचाचाची होती… येस…! जावेद सापडला…!!!
त्यानं उत्साहानं गर्दीतून वाट काढत काढत त्या पतंगाला नियंत्रित करणाऱ्या दोघा मुलांना विचारलं, “हा… हा पतंग कुणी बनवला सांगू शकाल का?”
त्यावर जीतकडे आपादमस्तक पहात त्यातल्या एकानं उत्तर दिलं… “जावेदभाई ने बनाया है!”
आता मात्र जीतच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. अखेर त्याला त्याचा जीवाचा सखा सापडला होता.
“कहां मिलेंगे जावेद भाई?” त्यानं खुशीत येत विचारलं.
“वो है ना उधर… रहमत काईट शॉप में… ऑफिस के बाजू…” त्या मुलानं डाव्या बाजूला हातानं निर्देश करून सांगितलं आणि पुन्हा पतंग नियंत्रणात गुंग झाला.
झपझप पावलं टाकत जीत त्या रहमत काईट शॉप मध्ये दाखल झाला. दुकानात पतंग विकत घेणाऱ्यांची गर्दी होती . जीतच्या शोधक नजरेला सर्वात आधी एका लहान मुलाला पतंग देणारी ‘झीनत’ दिसली आणि तिथंच पलीकडे एका टेबल खुर्चीचं काउंटर करून पैसे मोजत बसलेला ‘जावेद’ही दिसला…
त्या रात्री रेल्वे स्टेशनवर भरल्या डोळ्यांत दिसल्यानंतर आज पंधरा वर्षांनी पहिल्यांदा… पुन्हा एकदा काहीही न बोलता जीत केवळ एकटक त्याच्याकडे पाहत होता…
थोडा जाड झाला होता तो… पण काळ्या रंगाचा पठाणी, त्यावर पिवळं जरीचं जाकीट अश्या पेहरावात छान दिसत होता. पूर्वीची खुरटी दाढी आता व्यवस्थित आणि कोरीव दिसत होती.
तेव्हढ्यात झीनतचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि नकळत, “जी बाबूजी, क्या चाहिए?” असा प्रश्न तिच्या तोंडून निघाला.
“पतंगाच्या दोरीला एव्हढी पण ढील देऊ नये जावेद भाई… की पतंग आकाशात कुठंतरी हरवून गेला, तरी लक्षात येणार नाही!”
जीतच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलं आणि जावेदनं एकदम चमकून वर पाहिलं… हातातले पैसे तसेच टेबलवर टाकून स्तंभित नजरेनं तो आ वासून जीतकडे पाहू लागला.
“जीत…! जीत…!!!” असे उसासायुक्त उद्गार त्याच्या तोंडून बाहेर निघाले. डोळ्यात पाणी आणि घश्यात आवंढा आल्यानं तोंडून शब्द फुटेना.
झीनतलाही आता चटकन ओळख पटली आणि
“या अल्ला…! जीत भाई…!!!” म्हणत डोळे पुसत पुसत ती पुढं आली आणि झटकन जीतला बिलगली. दुकानातलं संपूर्ण वातावरण भावपूर्ण झालं होतं.
जावेदकडे पाहत जीत म्हणाला, “साल्या, कुठे हरवून गेला होतास रे? इतक्या वर्षांत एकदा पण मला शोधण्याचा प्रयत्न केला नाहीस तू…?? नालायका… अरे, कुठं कुठं शोधलं मी तुला! बघ शेवटी मीच तुला शोधून काढलं की नाही?”
उत्स्फूर्तपणे मनसोक्त बोलून झाल्यावर आता मात्र जीतचा आवाजही जड झाला होता. त्यानं दोन्ही हात पसरून “लेका, आता तिथंच काय बसून राहिलायस…? ये बाहेर… भेट मला…” असं आवाहन केलं आणि झीनत अन् जावेद एकमेकांकडे पाहू लागले.
जीतला काही समजलं नाही आणि तोही या दोघांची तोंड पाहू लागला आणि तेव्हढ्यात… एका क्षणी त्याची नजर जावेदच्या खुर्चीला टेकवून उभ्या केलेल्या कुबडीवर पडली आणि दुसऱ्या क्षणाला त्याला जावेदच्या ‘पठाणी’च्या पायजम्याचा गुडघ्यापासून खाली हवेत मोकळा हलणारा भाग दिसला, तसं जीत पूर्णपणे हलून गेला.
मोठा धक्का बसला त्याला… “ओह माय गॉड…!” असं चित्कारत तो पुढं जाऊन जावेदच्या तुटलेल्या पायापाशी खाली बसला.
“अरे हे काय…??? हे कधी झालं? आणि काय झालं…?? जावेद, झीनत… का नाही कळवलं मला…???” आता जीत कळवळून बोलत होता.
“ते सोड ना यार… चल, भेट मला…” असं म्हणत जावेद टेबलच्या साहाय्यानं उभा राहिला आणि दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली, पाठीवरून हात फिरवला… डोळ्यातले अश्रू आता त्सुनामीसारखे वाहू लागले.
दुकानातले लोक मैत्रीचा हा अनोखा सोहळा पाहू लागले. झीनत देखील गहिवरली होती. थोडा आवेग ओसरल्यावर जीतनं जावेदला खाली बसवलं आणि डोळे पुसत पुन्हा तोच प्रश्न झीनतला विचारला.
“जीत भाई… ते मागे दंगलीच्या वेळी…” एक डोळा जीतकडे आणि दुसरा जावेदकडे करून चाचपडत बोलणाऱ्या झीनतला मध्येच थांबवत जावेद म्हणाला,
“छोड ना यार… होत असतं असं… जिंदगी म्हटलं की हादसे होतातच! ते जाऊ दे, तू कधी आलास ते सांग जीत. घरी कसे आहेत सगळे…?? आणि किती दिवस राहणार आहे तू आता?”
पण नेहमीच्या सवयीनुसार तो विषय टाळायला पाहतोय हे जीतच्या लक्षात आलं.
“तू गप्प बस रे! मार खाशील नाही तर. हं… तू सांग झीनत …” पाहिलं वाक्य जावेदला आणि दुसरं झीनतला उद्देशून होतं.
झीनत सांगू लागली… “जीत भैया, त्या रात्री तुला रेल्वे स्टेशनला सोडून भाई परत येत होता… उस्मानपुराच्या कॅनाल जवळ त्याची स्कूटर एका जमावानं अडवली आणि त्याला मारहाण केली. त्याची स्कूटर जाळून टाकली…” आता पुढं बोलताना मात्र झीनतला रडू आवरेना.
जीत तिचं सांत्वन करायचा प्रयत्न करू लागला… पण तिचं पुढचं वाक्य ऐकून मात्र तो पूर्णपणे हबकून गेला. त्याला बोलण्यासाठी शब्दही सापडेना…
“त्या लोकांनी लाठीनं आणि तलवारीनं भाईच्या पायावर वार केले… तेव्हढ्यात पोलिसांची गाडी आली आणि त्याची सुटका झाली… पण… पण त्याच्या गुडघ्याखालचा पाय मात्र कायमचा गेला…”
काही क्षण तिथं जीवघेणी शांतता पसरली.
“…पण मग आपल्या गल्लीत… किंवा इतर कुणालाही कसं कळलं नाही?” जीतनं मौन सोडलं.
“भैया… त्या रात्री जावेदभाईला अश्या अवस्थेत गल्लीत आणलं आणि पुन्हा दोन्ही समाजातल्या लोकांमध्ये दंगे सुरू झाले… अखेर अम्मी-अब्बूनी ती गल्ली आणि बडोदा पण सोडायचं ठरवलं आणि आम्ही इथं अहमदाबादमध्ये आस्मां खालाच्या घरी राहायला आलो…
“अब्बूनी इथं पतंग दुकान सुरू केलं, पण त्यांना इथं फारसं मानवलं नाही… दोन वर्षांतच अब्बू वारले आणि तीन वर्षांपूर्वी अम्मी पण...” झीनतला पुढं बोलवेना.
जीत बराच काळ शांतपणे बसून होता. मनात लाखो विचार एकाच वेळी वादळ घालत होते. एक प्रचंड अपराधीपणाची भावना त्याला टोचू लागली. आपल्यामुळं जावेदची आणि त्याच्या कुटुंबाची ही अवस्था झाली होती, हा विचार त्याला खूप त्रासदायक ठरत होता.
त्या दिवशी त्या दोघांना भेटून तो बडोद्याला परतला. अमेरिकेत फोन करून आईशी आणि पत्नीशी बोलून त्यांना ही सर्व घटना त्यानं सांगितली आणि एक महत्त्वाची चर्चा केली.
नंतर पुन्हा तीन चार दिवसांनी तो पुन्हा अहमदाबादला परतला आणि जावेद-झीनतला समोर बसवून आपल्या मनातील विचार मांडला…
“हे बघ जावेद, आता तुम्ही दोघांनी इथं राहायचं नाही. माझ्या सोबत शिकागोला चला. तिथं आमच्या फॅमिली बिझनेसमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. बिझनेस मोठा आहे. त्याला सांभाळण्यात मला तुझी मदत हवीय. व्हिसा आणि इतर कामं मी पूर्ण करतो. अजुन दीड महिन्यांनी तुमची दोघांची तिकिट पाठवतो. तुम्ही आता माझ्यासोबत राहायचं. बास झाला हा लपंडाव…!!”
जावेदनं मात्र स्पष्ट नकार दिला कारण त्याला कुणावर अवलंबून राहायला अवघड वाटत होतं. पण सहजासहजी ऐकेल तर तो जीत कसला? त्यानं लहानपणीची रामबाण युक्ती म्हणजे शपथ घालून अखेर त्याला पटवलंच आणि हेही स्पष्ट केलं की, ही कसली ही मेहेरबानी किंवा उपकार नाहीत. एक बिझनेस पार्टनरशीप आहे !
आणि नंतर यथावकाश वचन दिल्याप्रमाणं जीत त्या दोघांना स्वतःकडे कायमचं घेऊन गेला आणि हा लपंडावाचा खेळ अखेर संपला. या खेळात विजय झाला तो मात्र मैत्रीचा !
- सागर जोशी, पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा