सकाळ झाली होती. खिडकीतून येणारा प्रकाश खोलीत पसरत होता; पण त्या प्रकाशाला स्पर्श करूनही विवेकच्या मनात उजेड उतरला नव्हता. आरशात दिसणारा चेहरा ओळखीचा असूनही अनोळखी वाटत होता. डोळ्यांखाली खोल सावल्या, ओठांवर न उमटलेलं हसू आणि छातीत सतत धडधडणारी एक अज्ञात भीती.
तो उठला. नेहमीसारखाच. त्याला कुठेही जायचं नव्हतं. पण संजयला कंपनीत जायचं होतं. विवेकला त्याच्यासमोर खोटं खोटं हसायचं होतं. "सगळं ठीक आहे" असं सांगायचं होतं.
पण आत काहीतरी रोज थोडं थोडं तुटत चाललं होतं. कुणालाही न दिसणाऱ्या फटी मनात पडत होत्या आवाज न करता, रक्त न सांडता.
विवेक आणि संजय लहानपणापासूनचे मित्र. एकाच मातीमध्ये वाढलेले. एकाच शाळेत शिकलेले. स्वप्नंही जवळजवळ तीच. गावात पावसावर अवलंबून असलेली शेती करणारे वडील, घरात कायम तुटपुंजं उत्पन्न आणि मुलांनी शिकावं, पुढे जावं हीच आई-वडिलांची एकमेव आशा. त्या आशेच्या बळावर दोघेही शहरात आले. इंजिनिअर झाले आणि एकाच खोलीत राहू लागले.
पण शिक्षण संपून दीड वर्ष उलटलं...
संजयला नोकरी मिळाली. पगार सुरू झाला आणि त्या पगारातील निम्मी रक्कम तो अभिमानानं गावाकडे पाठवत होता.
विवेक मात्र तिथेच थांबला. नोकरी नाही, उत्पन्न नाही आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी घुसमट.
वडिलांवर अवलंबून राहण्याची लाज त्याच्या मनाला पोखरत होती. मागच्या महिन्यात खोलीचं भाडंही संजयने भरलं होतं. ते ऋण विवेकच्या छातीत दगडासारखं बसलं होतं.
"काय रे, आज थकल्यासारखा दिसतोस?" संजयने विचारलं.
"काही नाही. झोप कमी झाली." विवेक म्हणाला.
पण शब्द गळ्यातच अडकले खरं सांगायचं होतं- मन दमलंय.
दुपारी जेवणाच्या ताटात भाजी भाकरी होती. पण जिभेला कळली नाही. आठवणी मात्र चवीनं येत होत्या अपेक्षांच्या, अपयशांच्या, "तू अजून किती?" या प्रश्नांच्या.
आयुष्य धावपट्टीसारखं धावत होतं; तो मात्र जागीच उभा होता.
बसच्या काचेतून शहर धावताना दिसत होतं. दिवे, जाहिराती, चेहऱ्यांची गर्दी. त्या गर्दीत तो अधिकच एकटा वाटला. छातीत हवा कमी पडतेय असं जाणवत होतं.
हे असंच राहणार का? हा प्रश्न पुन्हा डोकावला.
संध्याकाळी घरी आल्यावर तो खुर्चीत कोसळला. शेजारच्या खोलीत गाणी वाजत होती, पण आवाज ऐकू येत नव्हता. टेबलावर ठेवलेली प्रमाणपत्रांची फाईल परकी वाटू लागली. हाताला कंप सुटला. घुसमट संपली नव्हती. तिचा दाब मात्र वाढत होता.
आणि त्याच क्षणी, कुठून तरी मनात एक विचार अलगद डोकावला-
हे सगळं थांबवता आलं तर?
तो विचार तिथेच थांबला नाही. तो खोलवर रुजला. विवेकच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला.
खोलीत अंधार दाटला होता. दार उघडल्याचा आवाज झाला. संजय आत आला. विवेक पलंगावर बसून शून्यावर पाहत होता.
संजय : (हळूच) विवेक, आज इंटरव्ह्यू कसा गेला?
विवेक काही क्षण काहीच बोलला नाही. मग ओठ हलले.
विवेक : कसा जाणार? नेहमीसारखाच नकार घेऊन आलो...
संजय जवळ येऊन खुर्ची ओढून बसला.
संजय : नकार म्हणजे शेवट नाही रे. ती फक्त पुढच्या प्रयत्नाची सूचना असते.
विवेक : (हसण्याचा प्रयत्न) तुला बोलायला सोपं आहे. तुला नोकरी आहे. पगार आहे. गावाकडे पैसे पाठवतोस. मी काय करतो ? तुझ्या पैशावर खोलीचं भाडं देतो.
संजय : (थोडा कडक, पण प्रेमाने) असं बोलू नकोस. आपण दोघं एकत्र आलोय इथे. आज मी मदत करतोय, उद्या तू करशील. यात लाज कसली?
विवेकची नजर खाली.
विवेक : वडिलांचे कष्ट आठवतात. आईचं शांत राहणं जास्त बोचतं. कधी कधी वाटतं... मी ओझं झालोय.
संजय थोडा पुढे झुकला.
संजय : ओझं? अरे, ज्याच्यासाठी आई-बाप रोज देवाकडे प्रार्थना करतात, तो ओझं कसं असू शकतो? ते बोलत नाहीत, कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे.
विवेक : (डोळे पाणावलेले) पण दीड वर्षं झालं रे... दीड वर्षं !
संजय : मला माहीत आहे. पण एवढंच म्हणजे आयुष्य नाही. आपण एकाच गावातून आलो. एकाच परिस्थितीतून. फरक एवढाच माझी वेळ थोडी लवकर आली, तुझी उशिरा येईल.
विवेक काही बोलणार, तेवढ्यात थांबतो.
विवेक : आज सकाळी एक विचार आला होता... भीतीदायक. असह्य, न सांगता येणारी.
संजय सावध झाला.
संजय : (मृदु आवाजात) कुठलाही विचार असू दे. सांग. मी ऐकतो.
विवेक खोल श्वास घेतो.
विवेक : हे सगळं थांबवावंसं वाटलं.
क्षणभर शांतता.
संजयनें विवेकच्या खांद्यावर हात ठेवला.
संजय : विवेक.. थांबवायचं असेलं - तर त्रास थांबव. स्वतःला नाही. आपण दोघं मिळून मार्ग काढू. आज नसेल, उद्या असेल. पण तू इथे हवास.
विवेकच्या डोळ्यात पाणी आलं.
विवेक : खरंच वाटतं का तुला... मी काहीतरी करू शकतो ?
संजय : (हसत) मला खात्री आहे. कारण मी तुला ओळखतो. तुझं अपयश नाही, तुझा संघर्ष जास्त आहे.
विवेक पहिल्यांदाच त्या दिवशी डोकं हलवत म्हणाला- ठीक आहे. अजून एक प्रयत्न.
खोलीत शांतता होती. पण त्या शांततेत पहिल्यांदाच आशेचा आवाज ऐकू येत होता.
OOO
दुसरा दिवस उजाडला. विवेक झोपेतून उठला खरा, पण काल रात्रीचे विचार अजूनही त्याच्या मनात ठाण मांडून बसले होते. डोळे उघडले होते, शरीर हालचाल करत होत; मन मात्र अजूनही त्या अंधारातच अडकलेलं. संजयने काल दिलेला धीर आठवत होता, पण विचारांची दिशा काही केल्या बदलत नव्हती. आत कुठेतरी एक बोच होती
सकाळची शांतता त्याला अस्वस्थ करत होती. खोलीतल्या भिंती जणू जवळ येत आहेत, असं त्याला वाटत होतं. विचारांची गर्दी पुन्हा उसळली आजही काहीच बदलणार नाही...
तो हळूच खोलीबाहेर पडला. कुणाला न सांगता. पावलं आपोआप टेकडीकडे वळली. शहर मागे पडत गेलं; आवाज कमी होत गेले. वर चढताना श्वास जड होत होता शरीराच्या थकव्यामुळे नव्हे, तर मनावरच्या ओझ्यामुळे.
टेकडीच्या कडेला उभा राहून त्याने खाली पाहिलं. आयुष्य तिथे चालू होतं-वाहतूक, माणसं, घाई, गडबड. टेकडीवर मात्र एक वेगळीच शांतता होती. विचारांचा गुंता इतका वाढला होता की रस्त्यांवरचे जाहिरातीचे बोर्ड, फ्लेक्स यांवरचा मजकूर त्याला दिसतच नव्हता; त्यावर काळे डाग ओढल्यासारखं सगळं अस्पष्ट वाटत होतं आणि त्या शांततेत त्याचे विचार अधिकच मोठे, अधिकच दडपण आणणारे झाले.
हे सगळं इथेच थांबवता आलं तर...
हा विचार पुन्हा मनात घुसला. अंगावर काटा आला. छातीत धडधड वाढली. तो स्वतःशीच कुजबुजला.
"मी थकलोय."
तेवढ्यात थोड्या अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं. विवेक दचकला. तो तरुण ध्यान लावून बसलेला होता. डोळे मिटलेले. चेहऱ्यावर शांतता आणि समाधान. काही क्षण शब्द नव्हते- फक्त दोन श्वास, दोन अस्तित्वं एकाच जागी.
त्या चेहऱ्याकडे पाहताच विवेकला त्याच्या जवळ जावंसं वाटलं. तो थोड्या अंतरावर जाऊन बसला. काही वेळाने त्या व्यक्तीने डोळे उघडले.
अनोळखी (हळू, स्थिर
आवाजात) इथे एकट्याने बसायला, ध्यान करायला बरं वाटतं... कधी कधी.
विवेकने मान हलवली.
विवेक : शांत आहे... पण डोकं शांत होत नाही.
अनोळखी माणूस हलकंसं हसला. उपहास नव्हता त्या हसण्यात समज होती.
"असं का? अशा रम्य सकाळी इथे सगळं शांत वाटायला हवं."
जणू विवेक नकळत बोलून गेला आत साचलेलं ओसंडून बाहेर आलं.
"आयुष्य पुढे जातंय... आणि मी इथेच थांबलोय असं वाटतं. लोक म्हणतात, प्रयत्न कर. पण किती ? कधी कधी वाटतं... आपण नसलो तर सगळ्यांचं सोपं होईल. म्हणून इथे आलो.
क्षणभर शांतता पसरली. त्या अनोळखी व्यक्तीने विवेकला टेकडीच्या कडेवरून जवळ येऊन बसायला सांगितले. विवेक थोडा मागे सरकला आणि जणू विचारांनाच जागा देत खोल श्वास घेतला.
"काल मित्रानं सांगितलं
थांबवायचं असेल तर त्रास थांबव, स्वतःला नाही."
अनोळखी माणसाने त्याच्याकडे पाहिलं. नजरेत सहानुभूती होती.
"शहाणा मित्र आहे. आज मी फक्त तुझं ऐकून घेतो. नंतर मी बोलेन."
तेवढंच वाक्य पुरेसं होतं.
विवेक काही क्षण गप्प बसला. जणू कुठून सुरुवात करावी, हेच कळत नव्हतं. हाताच्या बोटांनी माती कुरतडत तो खाली पाहत राहिला. मग हळूच मान वर केली.
"मला कळत नाही", तो म्हणाला, आवाज थरथरत, "मी नेमकं कुठे चुकलो."
तो श्वास घेतो.
"लहानपणापासून एकच ऐकलं शीक, पुढे जा. वडील शेतात राबले. पावसावर अवलंबून असलेली शेती... कधी पिकायची, कधी नाही. तरी त्यांनी कधी शिकायला कमी पडू दिलं नाही. आईनं प्रत्येक वेळी माझ्या हातात पुस्तक ठेवताना डोळ्यात आशा ठेवली."
तो क्षणभर थांबतो.
"इंजिनिअर झालो. त्या दिवशी वाटलं आता सगळं बदलणार. घरातला चेहरा बदलणार. वडिलांचा थकवा कमी होणार. आईला लोकांसमोर मान उंचावता येणार."
त्याचा आवाज खाली येतो.
"पण आज दीड वर्ष झालं, काहीच बदललं नाही."
तो हसण्याचा प्रयत्न करतो ते हसू वेदनादायक.
"मित्रांना नोकऱ्या लागल्या. कुणी शहर बदललं, कुणी गाडी घेतली. माझा जिवलग मित्र... तोही पुढे गेला. मी आनंदी व्हायचा प्रयत्न केला, पण मनात सतत एक प्रश्न माझंच का नाही?"
विवेक डोळे पुसतो.
"घरी गेलो की बहीण विचारते 'तूच कसा मागे राहिलास?' ती वाईट नाही, पण शब्द बोचतात. आई-बाबा काहीच बोलत नाहीत. आणि तेच जास्त त्रासदायक आहे. त्यांचं शांत राहणं मला अपराधी बनवतं."
तो अनोळखी व्यक्तीकडे पाहतो-जणू खात्री करून घेतो की तो ऐकतोय.
"वडिलांच्या पैशावर जगतोय, ही लाज मला रोज खाऊन टाकते. मित्राकडून मदत घ्यावी लागते- खोलीचं भाडं, खर्च... मी काही करू शकत नाही, ही जाणीव सतत सोबत असते."
आवाज जड होतो.
"मी कुठेही जातो इंटरव्ह्यू, ऑफिस, लोक सगळीकडे मला माझं अपयश दिसतं. प्रमाणपत्रांवर माझंच नाव आहे, पण ते नाव कुणालाच नको आहे, असं वाटतं."
तो क्षणभर गप्प. मग शब्द ओघळतात.
"रात्री झोप येत नाही. सकाळी उठायची इच्छा नसते. डोक्यात तेच तेच विचार- आजही काही बदलणार नाही."
विवेकचा श्वास वेगवान होतो.
"आणि मग... कधी कधी असा विचार येतो- मी नसतो तर? आई-बाबांचं ओझ कमी झालं असतं. मित्रावरचं ऋण संपलं असतं. सगळं सोपं झालं असतं."
तो लगेच मान हलवतो.
"मला मरायचं नाही... पण हा त्रास थांबावा, एवढंच वाटतं. रोज स्वतःशी लढताना मी हरतोय, असं वाटतं."
डोळ्यांत पाणी.
"लोक म्हणतात- धीर धर. पण धीर किती दिवस? माणसाची ताकदही संपते."
तो खोल श्वास घेतो.
"आज इथे आलो... कारण मला कुणीतरी फक्त ऐकून घ्यावं असंच वाटत होतं. सल्ला नको, उपदेश नको. फक्त एवढंच मी वेडा नाही, हे कुणीतरी सांगावं."
विवेक थांबतो. शब्द संपतात. पण त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडीशी हलकेपणाची झलक दिसते जणू ओझ्याचा एक दगड खाली ठेवला आहे.
तो हळूच म्हणतो, "इतकंच... हेच सगळं."
आणि त्या शांत टेकडीवर, ऐकणारा एक माणूस असल्यामुळे, विवेकला पहिल्यांदाच वाटतं - आज तरी मी एकटा नाही.
अनोळखी व्यक्ती काही क्षण गप्प बसली. विवेकच्या शब्दांतली वेदना अजून हवेत तरंगत होती. तो लगेच काही बोलला नाही- जणू त्या शब्दांना नीट जागा देत होता. मग हळूच म्हणाला,
"तू जे सांगितलंस... ते ऐकायला जड आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव असं वाटणं वेडेपणाचं नाही. हे थकव्याचं लक्षण आहे."
तो थोडा पुढे सरकला. आवाज स्थिर होता; डोळ्यात माया.
"आपण लहानपणापासून शिकतो-यश म्हणजे पुढे जाणं, पैसे कमावणं, जबाबदाऱ्या उचलणं. पण कुणीच आपल्याला हे शिकवत नाही की वेळ कधी कधी थांबते. आणि तेव्हा माणूस स्वतःलाच दोष देतो."
क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला,
"तू अपयशी नाहीस, तू संघर्षात आहेस आणि संघर्ष दिसत नाही, तो आत चालू असतो."
विवेकच्या डोळ्यात पाहत तो
शांतपणे म्हणाला,
"आई-बाबा शांत आहेत, कारण त्यांना तुझी धडपड दिसते. त्यांची आशा संपलेली नाहीः ते तुझ्या वेदनेवर मीठ चोळत नाहीत. कधी कधी प्रेम हे शांत असतं."
तो हलकंसं हसला.
"आणि मित्रांनी मदत केली तर ती तुझी कमजोरी नाही. आज तू घेतोयस, उद्या देशील. आयुष्याची देवाणघेवाण अशीच असते."
विवेकचा श्वास हळूहळू सावरत होता.
अनोळची व्यक्ती पुढे म्हणाली,
"तू म्हणालास, मी नसतो तर सगळ्यांचं सोपं झालं असतं. हे वाक्य म्हणायला आणि ऐकायला सोपं आहे, पण खरं नाही. तू नसशील तर त्यांच्या आयुष्यात एक पोकळी राहील जी कुठल्याही मार्गाने भरून निघत नाही."
तो थोडा वेळ खाली पाहत राहिला.
"मीही कधीकाळी इथे आलो होतो... अशाच विचारांसह. तेव्हा मला कुणीतरी एवढंच सांगितलं होतं- आज निर्णय घेऊ नकोस, आज फक्त श्वास घे. उद्याबद्दल आपण उद्या पाहू."
तो पुन्हा विवेककडे पाहतो.
"आजचा दिवस जिंकायचा आहे. फक्त आज, उद्या काय होईल ते उद्या."
मग तो थोडा सावरून बोलू लागला. शब्दांत अनुभवाची धार होती.
"जीवनात अनेक गोष्टींचं आकर्षण असतं, अनेक आवडी असतात. पण प्रत्येक आवड शेवटपर्यंत नेता येतेच असं नाही. अपेक्षेप्रमाणे सगळंच साध्य होत नाही. कधी एखादीच गोष्ट हातात येते आणि त्यातच समाधान मानून ती निष्ठेने करत राहणं हेही मोठं यश असतं."
तो स्पष्ट म्हणाला,
"आई वडिलांचा मुलगा, पत्नीचा पती, बहिणीचा भाऊ हे सगळे केंद्रबिंदू सांभाळतच जीवनाची वाटचाल करावी लागते. केंद्रबिंदूच्या बाहेर गेलं, तर जीवनातूनच बाहेर पडण्याची शक्यता वाढते."
थोडं थांबून तो पुढे म्हणाला,
"या जगात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. तसाच तूही आहेस. प्रतिकूल परिस्थितीतून तू शिक्षण घेतलंस - ती तुझी ताकद आहे. तुझी बुद्धिमत्ता आणि कष्टाळू वृत्ती ही तुझी बलस्थानं आहेत. त्यातूनच तुझं वागणं, जनमानसातील वावर, आत्मविश्वास, संभाषणकौशल्य, निर्णयक्षमता, कोणत्याही प्रसंगात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता - हे सगळं घडवता येतं. त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो; प्रयत्नांची गरज असते."
तो सौम्य पण ठाम स्वरात म्हणाला,
"नम्रता असू दे; पण नेभळटपणा किंवा पळून जाण्याची वृत्ती नको."
शेवटी तो म्हणाला,
"मी तुला 'असं वाग' किंवा 'तसं वागू नकोस' असं सांगणार नाही. निर्णय तुझाच आहे. पण लक्षात ठेव- तुझ्या चुकीच्या निर्णयानं कदाचित तुझा प्रश्न सुटेल; पण तुझ्या घराची, कुटुंबाची फरपट होईल. निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुझ्याजवळ असतील आणि तेव्हाच भान सुटलं तर ती उत्तरं सापडणार नाहीत. उत्तरं बाहेर नाहीतः ती तुझ्याच आत आहेत."
तो हळूच उभा राहिला.
"आज आपण दोघं इथून परत जाऊ या. मार्ग लगेच सापडेलच असं नाही. पण चालू राहायला कारण मिळेल."
विवेक काही वेळ तिथेच बसून राहिला. शब्द संपले होते, पण त्यांचा अर्थ त्याच्या आत खोलवर उतरत होता. छातीतली घट्ट पकड सैल होत असल्याची जाणीव झाली. श्वास जड नव्हता समतोल होता. डोळ्यात पाणी होतं; पण त्या पाण्यात भीती नव्हती, पश्चात्ताप नव्हता
होती एक हलकीशी स्पष्टता.
त्याने पहिल्यांदाच ठामपणे मान हलवली. आज नाही थांबायचं, एवढंच त्याला कळलं.
तो उभा राहिला. टेकडीवरची शांतता तशीच होती.
फरक एवढाच - आता त्या शांततेत एक आश्वासक श्वास मिसळलेला होता.
वाऱ्याचा गार स्पर्श त्याच्या
आणि विवेकच्या मनात, खूप दिवसांनी, चालू राहण्याचा एक छोटासा पण ठाम विचार उगवला होता.
दोघेही टेकडीवरून हळूहळू खाली उतरू लागले.
वर येताना विवेकची पावलं ओझ्याखाली दडपलेली होती; उतरताना मात्र ती जमिनीचा स्पर्श घेत होती.
कड्यावरची ती तीव्र शांतता मागे पडत होती. समोर पायवाट होती-वळणावळणावरची, थोडी खडबडीत, पण खाली नेणारी. प्रत्येक पावलागणिक त्याच्या छातीतला ताण सैल होत गेला.
श्वास आता तुटत नव्हता; तो पुन्हा लयीत आला होता.
कपाळावरून सरकला. डोक्यातला आवाजांचा कोलाहल ओसरत गेला- जणू कुणीतरी हळूच रेडिओ बंद केला असावा. जे विचार थोड्याच वेळापूर्वी भिंतीसारखे उभे होते, ते आता ढगांसारखे विरघळत होते. "हे सगळं इथेच थांबवता आलं
तर..." हा विचार येऊनही टिकला नाही; तो विरून गेला.
अनोळखी माणूस पुढे चालत होता.
दोघांमध्ये शब्द नव्हते पण अस्वस्थतेची जागा समजुतीने घेतली होती. विवेकला अचानक जाणवलं; आपण एकटे नाही आहोत. कदाचित मार्ग लगेच सापडणार नाही; पण चालू राहायला कारण मिळालं आहे-आजसाठी पुरेसं.
खाली उतरताना शहराचे आवाज परत येऊ लागले- दूरचे, मृदू. एखाद्या झाडावरची पानं हलली: पायवाटेवर पडलेले लहानसे दगड बाजूला सरकले. हे छोटे बदल विवेकला मोठे वाटले. कारण आत काहीतरी बदललं होतं. छातीतली घट्ट पकड सुटली होती;
मनातल्या काळ्या पटलावर प्रकाश पडू लागला होता.
पायवाट संपताना अनोळखी माणूस थांबला. विवेकही थांबला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, आभार शब्दांत नव्हते, नजरेत होते.
"आजपुरतं पुरेसं." अनोळखी हळूच म्हणाला.
विवेकने मान हलवली- या वेळी ठामपणे.
त्याला जाणवलं; या भेटीची खात्री नव्हती, पुढची भेट होईल याचीही नाही. तरीसुद्धा या माणसाने दिलेली शांत साथ कुठल्याही जवळच्या नात्यापेक्षा मोलाची होती न उपदेश, न आदेश; फक्त उपस्थिती.
"तू माझा मार्ग बदलला नाहीस, तर मला चालायची हिंमत दिलीस." विवेक म्हणाला, "आज मी इथे उभा आहे ते तुझ्या त्या शांत क्षणांमुळे", त्याच्या बोलण्यात कृतज्ञतेचा सूर उमटला.
त्याने एक पाऊल पुढे टाकले. मग आणखी एक. पाठीमागे टेकडी राहिली. मनातल्या वाईट विचारांची सावली आता त्याच्या पावलांइतकीच लहान, मागे पडलेली. त्याला कळून चुकलंः आयुष्य म्हणजे एक उडी नाही; ती एक वाट आहे- पावलोपावली चालायची.
विवेक चालत राहतो. आता तो थांबलेला नाही.
- अशोक वाळवेकर
बी३/१, 'सोनचाफा'
दामोदर विहार, हिंगणे खुर्द,
सिंहगड रोड, पुणे ४११०५१