शनिवार, २५ जुलै, २०२६

3097. पित्याचं सुख हेच तिचं ध्येय

       ती मेडिकलला शिकत होती. तिचा लहान भाऊ शाळेत जात होता. त्यांचं चौकोनी कुटुंब अशा महत्त्वाच्या वळणावर असतानाच काही कारणाने अकस्मात तिच्या वडिलांची नोकरी गेली. 
एके दिवशी ती नेहमीप्रमाणे काॅलेजला जाऊन घरी परत आली. घरी आल्यावर ती दारात सॅंडल काढत असतानाच तिला दिसलं की तिचे लाडके बाबा शून्य नजरेने आढ्याकडे बघत पलंगावर पडले होते आणि आई कोपऱ्यात बसून पदराने डोळे पुसत होती. आईने तिला गहिवरल्या आवाजात सांगितले की बाबांची नोकरी गेली. पण ती खचली नाही. ती खंबीरपणे बाबांच्या शेजारी बसली. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली, 
"बाबा, आजपर्यंत तुम्ही मला जीवापाड सांभाळले. आता माझी पाळी आली आहे. मी दिवसरात्र एक करुन शिक्षण घेत तुम्हाला आधार देईन. माझं शिक्षण पूर्ण करुन मी खूप पैसे कमवून तुम्हाला सुखात ठेवीन. तुम्ही काळजी करु नका बाबा." आपल्या कोवळ्या मुलीचं असं परिपक्व बोलणं ऐकून तिच्या बाबांना अक्षरशः गलबलून आलं. ते म्हणाले,
"कुठे शिकलीस गं पोरी असं मोठ्या माणसासारखं बोलणं? " 
ती म्हणाली, " तुमचेच संस्कार आहेत बाबा. ही तुमचीच शिकवण आहे आणि परिस्थितीसुद्धा माणसाला खूप काही शिकवत असते. "
     मुलीच्या दिलासा देणाऱ्या बोलण्याने बाबांना एक नवी उमेद मिळाली. ते पलंगावरुन उठून पायांत चपला सरकवून दुसरी नोकरी शोधायला बाहेर पडले. बराच वेळ वणवण फिरल्यावर त्यांना कमी पगाराची नोकरी मिळाली. पण तेवढ्या पगारात त्यांच्या कुटुंबाची खूप ओढाताण व्हायला लागली. वेळेचं महत्त्व ओळखून तिने कोचिंग क्लासेसमध्ये पेपर तपासणीसाठी जायला सुरुवात केली. काही काळाने  तिने आईला हप्त्यावर शिलाई मशिन घेऊन दिली. आईसुद्धा थोडाफार संसाराला हातभार लावायला लागली. अशा प्रकारे संघर्ष करत तिचं शिक्षण सुरु होतं.तिला आखाती देशांत जाऊन प्रचंड पैसा कमवायचा होता. ते तिचं स्वप्न होतं. त्यासाठी कितीही कष्ट करायची तिची तयारी होती. तिने रात्रंदिवस अभ्यास करत एम.डी. ची पदवी मिळवली. भारतात काही वर्ष अनुभव घेऊन तिने आखाती देशांत नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले. एका रिक्रूटमेंट एजंटमार्फत तिला ओमानमध्ये जाॅब मिळाला. राॅयल सल्तनत ऑफ ओमानच्या सरकारी हाॅस्पिटलमध्ये महिना तीन लाख रुपये पगार होता. तिचा आनंद गगनात मावेना. पण काही दिवसांतच तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. ओमानचा व्हिसा येत नव्हता. ती इकडं देव पाण्यात घालून बसली होती. या तगमगीच्या काळात तिची मैत्रिण तिला माझ्याकडे घेऊन आली. मी तिची जन्मपत्रिका बघून व्हिसा अंदाजे कधी येईल ते सांगितलं. तिच्या जन्मलग्नकुंडलीतील बारावं स्थान अतिशय मजबूत होतं. त्यामुळे ती परदेशी जाणार हे जवळपास निश्चित होतं. मी दिलेल्या अंदाजाच्या  आसपास तिचा व्हिसा आला. त्याबरोबर ओमानची राजधानी मस्कतचं प्लेनचं तिकीटपण आलं. मग ती प्रचंड उत्साहाने आखाताकडे रवाना झाली.
साधारण एक वर्षाने तिचा मला मेसेज आला  .......
"माझे कामाचे रुटीन व्यवस्थित चालू आहे. खूप पैसा मिळत आहे. पण कमालीच्या एकाकीपणाने मला ग्रासले आहे. इथे सोशल लाईफची वानवा आहे. कोणाचीही ओळख होणं दुरापास्तच आहे. इथली संस्कृती पूर्ण वेगळी आहे. महाराष्ट्र मंडळांचे कार्यक्रम असतात ते नावापुरतेच आणि औपचारिक. त्यामुळे माझी घुसमट होत आहे. कामावरुन घरी आल्यावर एकटेपणा अक्षरशः अंगावर येतो. सुट्टीच्या दिवशी तर वेड लागेल की काय अशी अवस्था होते. इथे चहूबाजूला फक्त अफाट वाळवंट आहे. काय करु??
प्लीज मला काहीतरी मार्ग सुचवा. " 
मी तिला रिप्लाय दिला......
" येईल त्या सुट्टीच्या दिवशी लवकर बाहेर पड. थेट शहराबाहेरच्या रस्त्याला लाग. वाळवंट कापत जाणाऱ्या हायवेवरुन भरवेगात जायला खूप मजा येते. काही वेळ ही मजा लुटल्यावर तुला तो दिसेल. तो युगानुयुगे तुझी वाट पहात वाळवंटात उभा आहे. तो तुला वाळवंटाचं सौंदर्य दाखवेल. भरारणाऱ्या वाऱ्याने वाळवंटात चितारलेल्या नैसर्गिक रांगोळ्या कशा बघायच्या ते शिकवेल.  मृगजळामागं धावण्यात काय थ्रिल असतं ते तो तुला सांगेल. मग मृगजळामागं धावून तुझी दमछाक झाल्यावर तो तुला कष्टाने साठवलेलं पाणी देईल. तेव्हा तुला पाण्याची आणि मैत्रीची किंमत कळेल. तो एकटा , एकाकी दिसत असला तरी निसर्ग त्याचा सखा आहे हे तुझ्या लक्षात येईल. आपल्या प्रत्येकाचं असंच असतं. हे अफाट विश्वच आपलं सोबती असतं. आईवडील , नवरा- मुलं , मित्र- मैत्रिणी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्या सोबत असतात. तिथून पुढे आपण आणि हे विशाल ब्रम्हांड एवढंच उरतं. तेव्हा तू एकटी , एकाकी अजिबात नाहीस तर  निसर्गाचं प्रत्येक रुप तुझं सोबती आहे. निसर्गात , वाळवंटात रममाण हो. रात्री ताऱ्यांशी गुजगोष्टी कर. तुला एकटेपणा कधीच जाणवणार नाही." रिप्लाय देऊन बरेच दिवस झाले. मी माझ्या उद्योगात रमून गेलो. जवळपास सहा महिन्यांनी माझ्या पत्त्यावर एक पार्सल आलं. मी उत्सुकतेने ते उघडलं. आत एक नितांतसुंदर असं कॅक्टसचं पेंटींग होतं  आणि खाली लिहिलं होतं  ........
 " निसर्ग माझा सोबती  " .

-  जितेंद्र अभ्यंकर
     8605396156

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...