शनिवार, २५ जुलै, २०२६

3044. भक्तासाठी धावला विठूराया

    विठू माऊलीचा गजर, टाळांचा कडकडाट, आणि मृदंगाचा तो नाद. ८२ वर्षांच्या तात्यांच्या कानात हा एकच आवाज गुंजत होता. आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर आली होती. संपूर्ण गाव, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी केव्हाच दिंडीत सामील होऊन पंढरीच्या वाटेला लागली होती. पण तात्या मात्र आपल्या घराच्या ओसरीवर, एका खाटेवर पडून होते.
गेली साठ वर्षे तात्यांचा एकच नियम होता. पायात चप्पल न घालता, गळ्यात तुळशीची माळ घालून, खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरपूरची वारी करायची. पाऊस असो, चिखल असो वा कडक ऊन, तात्यांची पावले कधी थकली नाहीत. पण यंदा नियतीला हे  मान्य नव्हते. वारीच्या अवघ्या चार दिवस आधी तात्यांना जोराचा ताप भरला, त्यातच त्यांचा पाय घसरून पडल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली होती, 
"तात्या, आता जागेवरून हलायचं नाही. वारीचा विचार यावर्षी मनातून काढून टाका."
तात्यांचे शरीर घरात होते, पण त्यांचे मन चंद्रभागेच्या वाळवंटात फिरत होते. वारी चुकल्याची एक मोठी चुटपूट, एक अनामिक हुरहूर त्यांच्या मनाला पोखरत होती. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्यांनी भिंतीवर लावलेल्या विठूरायाच्या फोटोकडे पाहिले. सावळ्या परब्रह्माचे ते रूप पाहून तात्यांचा कंठ दाटून आला.
ते हात जोडून विठ्ठलाला आळवू लागले:
"अरे विठूराया...काय रे हा तुझा खेळ? साठ वर्ष तुझ्या दारात आलो, कधी अडविले नाहीस. यंदाच असं का केलंस बाबा? माझं शरीर थकलं असेल रे, पण माझं मन अजूनही तुझ्याच नामात नाचतंय. मला पंढरपूरला येता येत नाही ना? मग तूच ये की रे माझ्याकडे ! तेवढं तुझं रूप दाखव, दर्शन दे आणि या जिवाचं सार्थक कर..."
तात्यांची ही विनवणी अत्यंत आर्त होती. तो कोणताही बडेजाव नव्हता, तर एका निस्सीम भक्ताने आपल्या देवाकडे मांडलेला हट्ट होता. तात्यांचा नातू, राहुल, आजोबांची ही अवस्था पाहून मनोमन हळहळत होता. तो तात्यांना म्हणाला, "आजोबा, काळजी नका करू. देव सगळीकडे असतो. तुम्ही आराम करा." पण तात्यांचे लक्ष कशातच नव्हते. ते देवाच्या ध्यानात मग्न झाले होते.
दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा वाढला होता. तात्यांचे डोळे पांढऱ्या शुभ्र भिंतीकडे लागून राहिले होते, जिथे त्यांना केवळ विठ्ठलाची मूर्ती दिसत होती. अचानक घराच्या अंगणातून एक आवाज आला—
"नारायण... नारायण... कोणी आहे का घरात? जरा पाणी मिळेल का?"
आवाज खूपच थकलेला पण आवाजात एक अजब गोडवा होता. राहुलने बाहेर जाऊन पाहिले. अंगणात एक वृद्ध गृहस्थ उभे होते. अंगावर एक मळका, फाटलेला पांढरा कुर्ता, डोक्यावर जिर्ण झालेली पांढरी टोपी, हातात एक जुनी काठी आणि पाठीवर एक लहानसे गाठोडे. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक विलक्षण तेज आणि शांतता होती. त्यांचे डोळे अगदी काळेभोर आणि प्रेमळ होते. राहुलने त्यांना आत बोलावले आणि ओसरीवर बसवले. तात्यांनी खाटेवरूनच त्या अनोळखी वृद्धाकडे पाहिले. त्या वृद्धाने तात्यांकडे पाहून एक अतिशय मधुर आणि ओळखीचे हसू दिले.
तात्यांनी विचारले, "बाबा, कुठून आलासा? आणि या उन्हातान्हात कुठे चाललासा?"
तो वृद्ध माणूस म्हणाला, "अहो काय सांगू तात्या, मी पंढरपूरला निघालो होतो वारीला. पण वाटेत माझी दिंडी मागे राहिली आणि माझी तब्येतही जरा बिघडली. खूप भूक आणि तहान लागलीये. या गावात आलो तर लोकांनी तुमच्या घराचा पत्ता दिला. म्हणाले, तिथे एक मोठे वारकरी राहतात, ते नक्की मदत करतील."
'पंढरपूर' आणि 'वारी' हे शब्द ऐकताच तात्यांच्या अंगावर काटा आला. त्यांनी तात्काळ राहुलला सांगितले, 
"राहुल, बाबांना आधी थंड पाणी दे. आणि यांच्यासाठी गरम जेवणाचे ताट घेऊन ये."
राहुलने आजोबांच्या आज्ञेचे पालन केले. त्या वृद्ध माणसाला प्रेमाने जेवायला दिले. तो माणूस अगदी तृप्त होऊन जेवला. जेवताना तो सारखा विठ्ठलाचे नाव घेत होता आणि तात्यांकडे बघून हसत होता. त्याचे ते हसणे तात्यांच्या काळजाला कुठेतरी स्पर्श करून जात होते. तात्यांना वाटत होते की त्यांनी या माणसाला कुठेतरी पाहिले आहे, पण कुठे ते आठवत नव्हते.
जेवण झाल्यावर त्या वृद्धाने तात्यांच्या खाटेजवळ येऊन विचारले, 
"तात्या, तुम्ही यंदा वारीला का नाही गेलात? तुमची भगवी पताका तर कोपऱ्यात तशीच उभी आहे."
तात्यांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आले. ते म्हणाले, "काय सांगू बाबा, या पापी शरीराने साथ दिली नाही. पाय निकामी झाला. यंदा विठूरायाची वारी चुकली. माझे डोळे त्याचे रूप पाहण्यासाठी तहानलेत, पण काय करणार? देवाची इच्छा नसेल."
त्यावर तो वृद्ध माणूस खळाळून हसला. तो म्हणाला, "तात्या, देव कधी कुणाला अंतर देत नाही. तुम्ही पंढरपूरला नाही जाऊ शकलात, म्हणून काय झाले? तुमची वारी तर इथेच पूर्ण झाली."
तात्यांनी आश्चर्याने विचारले, "ते कसं काय बाबा?"
तो वृद्ध गृहस्थ उठून उभा राहिला. त्याने तात्यांच्या पायाला स्पर्श केला. जसा त्याचा हात तात्यांच्या पायाला लागला, तशी तात्यांच्या पायातील वेदना एका क्षणात गायब झाली ! तात्यांना एकदम हलके वाटू लागले.
तो वृद्ध माणूस मागे सरकला आणि म्हणाला, "तात्या, तुम्ही ज्याला पंढरपुरात शोधत आहात, तो भुकेल्यांच्या रूपात, तहानलेल्यांच्या रूपात तुमच्या दारात येतो. तुम्ही आज मला जेवू घातलंत, माझी सेवा केलीत. हीच तर खरी वारी आहे. जरा नीट बघा."
त्याच क्षणी खोलीमध्ये एक अद्भूत प्रकाश पसरला. त्या प्रकाशात तो मळके कपडे घातलेला वृद्ध माणूस हळूहळू बदलू लागला. डोक्यावरची टोपी नाहीशी होऊन तिथे हिरेजडित मुकुट आला. हातातील काठी जाऊन तिथे कमरेवर हात आले. गळ्यात कौस्तुभ मणी आणि तुळशीच्या माळा चमकू लागल्या. सावळे सुंदर रूप, सम पाऊले विटेवरी... साक्षात पंढरीचा राणा, श्री विठ्ठल तात्यांच्या समोर उभा होता !
तात्यांचे डोळे दिपून गेले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. विठ्ठलाने मंद हसून तात्यांना आशीर्वाद दिला. तात्यांनी खाटेवरून उठून थेट देवाच्या पायावर डोके ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या पायाने चालता येत नव्हते, त्या पायावर तात्या अगदी सहज उभे राहिले होते.
विठ्ठल म्हणाला, "तात्या, तुमची आळवणी मी ऐकली. तुमचा नियम मोडू नये म्हणून मी स्वतः तुमच्याकडे आलो. माझी खरी वारी पंढरपुरात नाही, तर तुमच्यासारख्या खऱ्या भक्ताच्या हृदयात आहे."
क्षणार्धात तो प्रकाश लुप्त झाला. खोली पूर्ववत झाली. तो वृद्ध माणूस तिथे नव्हता आणि देवही नव्हते. पण खोलीत तुळशीचा आणि चंदनाचा एक अद्भूत सुगंध दरवळत होता.
राहुल बाहेरून आला, तो तात्यांना खाटेवरून उठून उभे राहिलेले पाहून थक्क झाला. 
"आजोबा ! तुम्ही उभे कसे राहिलात? आणि ते बाबा कुठे गेले?" त्याने विचारले.
तात्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी भिंतीवरील विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिले, मूर्तीच्या चेहऱ्यावर तेच गोड हसू होते, जे त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर होते.
तात्या गदगद नजरेने म्हणाले, "राहुल, ते बाबा नव्हते. तो स्वतः पांडुरंग होता रे ! माझी वारी चुकली नाही. माझ्या विठ्ठलाने मला घरात येऊन दर्शन दिलं."
तात्यांनी कोपऱ्यात ठेवलेली भगवी पताका हातात घेतली आणि आनंदाने नाचू लागले. यंदाची वारी पंढरपूरला न जाताही तात्यांसाठी सर्वात मोठी आणि अविस्मरणीय वारी ठरली होती. देवाने भक्ताचा मान राखला होता आणि भक्तीचा विजय झाला होता.
"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय !" या गजराने पूर्ण घर घुमू लागले.

चंद्रकांत पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...