दुपारच्या उन्हाचा तडाखा जोरात हुता. रानातली पाखरं सुदीक झाडाच्या सावलीला चोची उघडून बसली होती. पण गावातल्या मोठ्या वाड्यापुढं मात्र आज वेगळीच धामधूम होती. नामदेवच्या घरी पोरगी झाली होती. वाड्यात पाळणा हलणार होता, पण घरात आनंदाचा लवलेश नव्हता
नामदेवची आई, जिजाक्का, कपाळावर आठ्या घालून ओट्यावर बसली होती.
"काय नशीब घेऊन आलीय काय माहिती ! हिच्या पाऊल पडायच्या आधीच वाड्यातली दुभती गाय मेली आणि नामदेवच्या पायाला बी फॅक्चर झालं. कसलं हे पायगुण?" जिजाक्काचं हे बोलणं पलंगावर निस्तेज पडलेल्या सखूच्या कानावर गेलं आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.
सखूने आपल्या लेकीला, त्या चिमुरड्या जीवाला पोटाशी धरलं.
लेकीचं नाव ठेवलं 'लक्ष्मी', पण अख्ख्या गावाने तिला 'पांढऱ्या पायाची' म्हणून शिक्का मारला.
दिवस जात होते. लक्ष्मी जशी जशी मोठी होत होती, तसं तसं नामदेवच्या घरावर संकटाचं आभाळ फाटत होतं. कधी अतिवृष्टीने पीक गेलं, तर कधी घरातलं कुणी ना कुणी आजारी पडू लागलं. जिजाक्का तर आता उघडपणे म्हणू लागली,
"ह्या पोरीचा पायगुणच असा हाय, की घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाय!"
बिचारी लक्ष्मी. पाच-सहा वर्षांची झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावर बालपण कधीच दिसलं नाही. तिला समजायचं की घरात जे काही वाईट होतंय, त्याला आपणच जबाबदार आहोत. ती गुपचूप कोपऱ्यात बसायची. कुणाशी खेळायला जायची नाही, कारण तिला भीती वाटायची की आपला स्पर्श कुणाला झाला तर त्याचं काही वाईट होईल.
एकदा तर हद्दच झाली. नामदेवचा बैल अचानक वारला. नामदेव रागात घरात आला आणि त्याने चिमुरड्या लक्ष्मीला हाताला धरून घराबाहेर काढलं.
"चालती हो इथून! तुझा पाय पडला आणि माझी सगळी बरकत गेली!" सखूने खूप रडून विनवण्या केल्या, पण कुणीच ऐकलं नाही.
त्या रात्री गावात मुसळधार पाऊस पडत होता. लक्ष्मी गोठ्याच्या एका कोपऱ्यात भिजत बसली होती. अचानक तिला कुबट वास आला आणि काहीतरी जळाल्याचा आवाज आला. तिने पाहिलं तर काय? पावसाच्या कडकडाटात शॉर्ट सर्किट होऊन गोठ्याला आग लागली होती!
तिथंच जवळच नामदेव आणि जिजाक्का गाढ झोपले होते. लक्ष्मी ओरडली, पण आवाजात जोर नव्हता. तिने विचार केला नाही, तिचे इवलेसे पाय आगीच्या ज्वाळांकडे धावले. तिने जीवाची पर्वा न करता घरातल्या सर्वांना उठवलं.
पण आगीचा एक मोठा लोळ जिजाक्काच्या अंगावर पडणार इतक्यात लक्ष्मीने आजीला जोरात ढकललं आणि ती स्वतः आगीच्या विळख्यात सापडली. नामदेवने कसाबसा तिला बाहेर काढलं.
लक्ष्मी शुद्धीवर आली तेव्हा ती दवाखान्यात होती. तिचे पाय भाजले होते. जिजाक्का तिच्या उशाशी बसून धाय मोकलून रडत होती.
"माफ कर बाळा... आम्ही तुला पांढऱ्या पायाची म्हणलं, पण तू तर साक्षात लक्ष्मी होऊन आमचे प्राण वाचवले ग!" जिजाक्काने तिचे पाय हातात धरून पापण्या ओल्या केल्या.
नामदेवने रडत रडत डॉक्टरांना विचारलं,
"साहेब, माझी पोरगी चालेल ना पुन्हा?"
डॉक्टर हसले आणि म्हणाले,
"नामदेवराव, हिच्या पायगुणामुळेच आज तुम्ही जिवंत आहात. नशिबाचे खेळ माणसाच्या कर्मात असतात, पोरीच्या पायात नसतात."
त्या दिवशी पावसाचा जोर ओसरला होता आणि त्या वाड्यात खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा गृहप्रवेश झाला होता. सखूच्या डोळ्यात आज पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, तर अभिमानाचं होतं.
दवाखान्यातून लक्ष्मी घरी आली, पण ती आधीची चुलबुली लक्ष्मी राहिली नव्हती. आगीत तिचे पाय चांगलेच भाजले होते, त्यामुळे ती आता काठी टेकवत चालू लागली होती. जिजाक्का आता तिचे पाय चेपून द्यायची, नामदेव तिच्यासाठी शहरातून खाऊ आणायचा, पण लक्ष्मीच्या डोळ्यातली ती जुनी भीती अजून गेली नव्हती.
एके दिवशी दुपारी वाड्याच्या ओट्यावर जिजाक्का आणि शेजारच्या काकू गप्पा मारत बसल्या होत्या. लक्ष्मी आतल्या खोलीत भिंतीला कान लावून ऐकत होती. शेजारची काकू म्हणाली,
"जिजाक्का, पोरगी वाचली ते ठीक झालं, पण आता हिचं लगीन कसं होणार? पाय तर निकामी झाले अन नशिबाचा तो डाग पुसणार कसा? लोकांच्या तोंडाला कुलूप नसतं बघा!"
हे ऐकून लक्ष्मीच्या काळजात लख्खकन चमकलं. तिला वाटलं,
'माझ्या पायगुणामुळे आधी घराचं नुकसान झालं आणि आता माझ्या पाय अधू झाल्यामुळे मी जन्मभर आई-बापावर ओझं बनून राहणार का?'
त्या रात्री पावसाची रिपरिप चालू होती. नामदेव आणि सखू गाढ झोपले होते. लक्ष्मी हळूच उठली. काठी टेकवत ती गोठ्यापाशी आली. तिने त्या अंधारात आपल्या भाजलेल्या पायांकडे बघितलं. तिला वाटलं, जर मीच नसेन, तर बापाच्या डोक्यावरचं हे ओझं कायमचं मिटून जाईल.
ती वाड्यामागच्या विहिरीपाशी गेली. पाय थरथरत होते. तिने विहिरीच्या काठावर हात ठेवला आणि डोळे मिटले. तोंडातून शब्द फुटला,
"देवा, पुढच्या जन्मी मला असा पायगुण देऊ नको, ज्यानं माझ्या बापाला रडावं लागेल..."
इतक्यात पाठीमागून एक थरथरणारा हात तिच्या खांद्यावर पडला.
लक्ष्मी दचकून मागे फिरली. मागं नामदेव उभा होता. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं.
"काय करत होतीस पोरी?" नामदेवचा आवाज फाटला होता.
लक्ष्मी रडत म्हणाली, "बाबा, मी 'पांढऱ्या पायाची' हाय ना?
माझ्यामुळं तुमचं लय नुकसान झालं. आता तर मी लंगडी बी झाली. मी जगून तुम्हाला अजून किती त्रास देऊ?"
नामदेवने तिला गच्च पोटाशी धरलं. तो ढसाढसा रडू लागला, जसा एखादा डोंगर कोसळावा. तो म्हणाला,
"अगं वेडे, तू पांढऱ्या पायाची नाय, तू तर माझ्या काळजाचा तुकडा हायस! तो बैल गेला, शेती गेली, घर जळालं तरी चालेल गं... पण तू गेल्यावर हा बाप कोणासाठी जगणार? तुझा पायगुण न्हाई, तू माझं पुनर्जन्म हायस!"
तिथंच कोपऱ्यात उभी असलेली जिजाक्का पुढे आली. तिने लक्ष्मीचे ते भाजलेले पाय आपल्या हातात घेतले आणि त्यावर आपली आसवं ढाळली. जिजाक्का म्हणाली,
"बाळा, ज्या पायांनी आम्हाला मरणाच्या दारातून खेचून आणलं, ते पाय कधी 'अभागी' असूच शकत नाहीत. आजपासून तू या घरची लेक नाय, तू या घरची खरी 'मालकीण' हायस!"
त्या रात्री काळोख खूप होता, पण त्या बापाच्या डोळ्यात आपल्या लेकीसाठी जे प्रेम होतं, त्यानं अख्खा वाडा उजळून निघाला होता. लक्ष्मीला उमजलं होतं की, जगातला सर्वात मोठा 'पायगुण' हा नशिबात नसून, एकमेकांवर असलेल्या जीवापाड प्रेमात असतो.
पण नियतीचा खेळ अजून संपला नव्हता. लक्ष्मीच्या मनातलं ते शल्य, की आपण आपल्या बापावर ओझं आहोत, ते पूर्णपणे गेलं नव्हतं.
काही महिने उलटले. लक्ष्मी आता काठीच्या आधाराने अंगणात चालू लागली होती. एक दिवस गावात जत्रा होती. नामदेवने लेकीसाठी नवीन परकर-पोलकं आणलं होतं.
"लक्ष्मी, चल गं जत्रेला! तुला पाळण्यात बसवतो," नामदेव आनंदाने म्हणाला. पण लक्ष्मीने नकार दिला. तिला भीती वाटत होती की लोक आजही तिला बघून कुजबुजतील, तिच्या पायांकडे बघून नाकं मुरडतील.
नामदेव तिला समजावत असतानाच अचानक गावात गलका झाला. कुणीतरी ओरडत धावत आलं,
"नामदेव! पळ... पळ लवकर! खालच्या वस्तीला आग लागलीय अन वारं सुटल्यानं ती आग आता तुझ्या शेताकडं वळलया!"
नामदेवच्या काळजात धस्स झालं. त्याचं उभं पीक, ज्यावर त्याने लक्ष्मीच्या लग्नासाठी आणि उपचारासाठी स्वप्नं रचली होती, ते आगीच्या विळख्यात जाणार होतं. नामदेव, सखू आणि जिजाक्का सैरावैरा धावले. लक्ष्मी अंगणात एकटीच उभी होती. तिने पाहिलं, काळपट धूर आकाशात पसरला होता.
लक्ष्मीला राहवलं नाही. तिने आपली काठी उचलली आणि लंगडत लंगडत शेताच्या दिशेनं धावू लागली. तिला माहित होतं, त्या शेतात बापाचं रक्त आणि घाम सांडलाय. वाटेत तिला गावकरी भेटले, कुणीतरी ओरडलं,
"बघा, ही पांढऱ्या पायाची पोरगी बाहेर आली अन पुन्हा अघटित घडलं!"
ते शब्द लक्ष्मीच्या काळजात सुरीसारखे खुपसले. ती रडत होती, पण थांबली नाही. शेतापाशी पोहचली तर आग रौद्र रूप धारण करत होती. नामदेव हताश होऊन जमिनीवर बसला होता. त्याचं सगळं आयुष्य जळून खाक होणार होतं.
तेवढ्यात आकाशात अचानक ढग दाटून आले. कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला! काही मिनिटांतच ती आग विझली. नामदेवचं पीक वाचलं होतं.
सगळं गाव थक्क होऊन बघत होतं. जो पाऊस महिनाभर पडला नव्हता, तो आज अचानक कसा पडला? जिजाक्का धावत आली आणि तिने लक्ष्मीला घट्ट मिठी मारली. तिचे पाय चिखलाने माखले होते, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
जिजाक्का गावकऱ्यांसमोर ओरडून म्हणाली,
"बघा रे डोळे उघडून! जिला तुम्ही पांढऱ्या पायाची म्हणताय, तिने आज पुन्हा आमचं घर आणि शेत वाचवलंय. तिच्या पायात 'अपशकुन' न्हाई रे, तिच्या पायात साक्षात विठ्ठलाची माया हाय! ती धावत आली म्हणून आभाळ फाटलं अन पाऊस पडला!"
नामदेव धावत आला आणि त्याने लक्ष्मीला उचलून घेतलं. तिचे ते भाजलेले आणि चिखलात माखलेले पाय त्याने आपल्या हातात घेतले. नामदेव रडत म्हणाला,
"माफ कर बाळा... आजवर लोक म्हणायचे तुझा पायगुण वाईट हाय, पण आज मला समजलं, तुझा पायगुण असा हाय की प्रत्यक्ष देवाला सुद्धा तुझ्या डोळ्यातलं पाणी बघवलं नाय!"
लक्ष्मीने बापाच्या गळ्याला मिठी मारली. तिच्या गालावरून वाहणारं आसू आज पहिल्यांदाच 'दुःखाचं' नव्हतं. अख्ख्या गावाचं मान खाली गेली होती. ज्या पोरीला त्यांनी आयुष्यभर हिणवलं, तिच्याच अस्तित्वामुळे आज गाव सुखी होतं.
त्या दिवशीपासून लक्ष्मी 'पांढऱ्या पायाची' राहिली नव्हती, ती साऱ्या गावाची 'देवमाणूस' झाली होती.
लक्ष्मी आता मोठी झाली होती, पण तिच्या पायातले ते आगीचे वळ आणि मनावरचे ते 'पांढऱ्या पायाचे' शिक्के अजूनही पूर्ण पुसले गेले नव्हते. नामदेवने तिच्या लग्नासाठी पुंजी जमवली होती, पण जो कुणी पाहायला येई, तो तिच्या अधू पायांकडे बघून नाक मुरडायचा. कुणी म्हणायचं,
"पोरगी देखणी हाय, पण नशिबानं मारलंय तिला!"
एक दिवस गावातलं एक स्थळ आलं. मुलगा सुशिक्षित होता, नाव विठ्ठल. विठ्ठलचे वडील जुन्या विचाराचे होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं,
"नामदेवराव, तुमची पोरगी पसंत हाय, पण लोकांच्या तोंडून तिच्या पायगुणाबद्दल ऐकलंय. उद्या आमच्या घरात काही बरं-वाईट झालं तर जबाबदार कोण?"
नामदेव हात जोडून रडू लागला,
"मालक, माझी पोरगी साक्षात लक्ष्मी हाय, नका असं बोलू!" पण लक्ष्मी हे सगळं आडोश्याला उभी राहून ऐकत होती. तिचे डोळे पुन्हा डबडबले. तिने ठरवलं, आपल्यामुळे बापाला आता अजून अपमान सोसायला लावायचा नाही.
ती शांतपणे बाहेर आली आणि विठ्ठलच्या वडिलांसमोर उभी राहिली. ती म्हणाली,
"बाबा, माझ्या पायगुणामुळे माझं घर जळालं, माझा बाप भिकेला लागला असं लोक म्हणतात ना? मग आज एक शेवटचा प्रयोग करून बघा." तिने अंगणातली तुळस दाखवली जी उन्हाने पार सुकली होती.
"जर माझ्या स्पर्शाने ही तुळस हिरवी झाली, तरच मी तुमच्या घरात पाऊल ठेवीन, नाहीतर मी माझं आयुष्य संपवून घेईन."
सगळे स्तब्ध झाले. लक्ष्मी लंगडत त्या सुकलेल्या तुळशीपाशी गेली. तिने आपले दोन्ही हात त्या करपलेल्या फांद्यांवर ठेवले आणि डोळे मिटून मनापासून प्रार्थना केली,
"देवा, आज माझ्या बापाची इज्जत तुझ्या हातात हाय. मला जगवायचं का मारायचं हे तूच ठरव!" तिचे डोळे एवढे वाहत होते की, तिची आसवं त्या तुळशीच्या मुळाशी झिरपू लागली.
आणि काय आश्चर्य! काही क्षणातच त्या सुकलेल्या तुळशीला जणू पालवी फुटल्याचा भास झाला. आकाश पुन्हा एकदा भरून आलं आणि हलकीशी सर आली. विठ्ठल पुढे आला आणि त्याने लक्ष्मीचा हात धरला. तो आपल्या वडिलांना म्हणाला,
"बाबा, पायगुण माणसाच्या नशिबात नसतो, तो त्याच्या काळजात असतो. जिला देव सुद्धा रडताना बघू शकत नाही, ती पोरगी ज्या घरात जाईल तिथे स्वर्गच होईल!"
विठ्ठलच्या वडिलांनी शरमिंदं होऊन मान खाली घातली. त्यांनी लक्ष्मीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,
"लेकी, आम्हाला माफ कर. आम्ही दगडात देव शोधला, पण माणसातला देव ओळखलाच नाही."
नामदेवने लक्ष्मीला जवळ घेतलं. आज पहिल्यांदाच लक्ष्मीला स्वतःच्या पायांचा अभिमान वाटला. तिचे ते भाजलेले पाय आज जगासाठी 'पांढरे' राहिले नव्हते, तर त्याची आज'सोन्याची पावलं' झाली होती.
सख्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि साऱ्या गावात एकच चर्चा होती—
"लक्ष्मी आली, आणि साऱ्यांचं नशीब फळफळलं!"
©️ कैलास मोरे ✍️✍️✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा