मीटिंग सुरू असतानाच टेबलवर ठेवलेला फोन वायब्रेट झाला आणि संपूर्ण हॉलमध्ये लक्ष वेधलं गेलं की कुणाचा तरी फोन आला आहे. मोठ्या पदावर असलेले अधिकारी अत्यंत सौम्यतेने म्हणाले,
"फोन सायलेंट करून बसा प्लीज."
दीपक अचानक गोंधळून गेला. त्याने पटकन फोन उचलला, कॉल कट केला - न पाहताच की कॉल कोणाचा होता.
"सॉरी सर.." असं म्हणत त्याने लाजून फोन बंद केला आणि पुन्हा त्या पांढऱ्या बोर्डाकडे लक्ष दिलं, जिथे पुढच्या वर्षाचे टार्गेट्स दाखवले जात होते. पण त्या एका वायब्रेशनने त्याच्या मनाची एकाग्रता नकळत तोडून टाकली होती. दीपक मध्यमवर्गीय कुटुंबातून होता. ७ वर्षांपासून नोकरीत होता आणि मेहनत, प्रामाणिकपणा आणि नम्र स्वभावामुळे सगळ्यांचा लाडका होता. एका खासगी कंपनीत सीनियर ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून तो काम करत होता. त्या दिवशी ऑफिसमध्ये रीजनल मीटिंग होती, ज्यात हेड ऑफिसमधून मोठे अधिकारी आले होते. संपूर्ण टीमचं लक्ष दीपककडे होतं कारण त्यालाच प्रेझेंटेशन द्यायचं होतं. प्रेझेंटेशन संपलं, आणि टाळ्यांच्या गजरात त्याच्या मेहनतीचं कौतुक ऐकू आलं. मीटिंग यशस्वी झाली. अधिकाऱ्यांनी त्याची स्तुती केली. मीटिंगनंतर सगळे रिफ्रेशमेंटकडे वळाले, पण मात्र दीपक तसाच खुर्चीत बसून राहिला. डोकं खाली, डोळे टेबलकडे. जिथे त्याचा फोन अजूनही बंद पडला होता. अचानक त्याच्या मनात ती आठवण जागी झाली. फोनचं वायब्रेशन. तो एक कॉल. आईचाच तर नव्हता ना? दीपकने घाईने फोन ऑन केला.
फोन ऑन होताच पहिला मेसेज झळकला,
"दीपक, पटकन कॉल कर. आईची तब्येत अचानक बिघडली आहे. हॉस्पिटलला नेत आहोत."
भाऊ राकेशचा मेसेज. १२:१७ PM.
घड्याळ पाहिलं . २:०५ PM.
म्हणजे जवळजवळ १ तास ४८ मिनिटं. अनवधानाने त्याने आईचा कॉल दुर्लक्षित केला होता. थरथरत्या हातांनी त्याने राकेशला कॉल केला. रिंग वाजली. राकेशने उचलला, पण त्याचा आवाज भरून आलेला होता.
"दीपक... आई गेली रे यार..."
त्याच्या कानात जणू काही स्फोट झाला.
"क...काय म्हणालास?"
"मी... मी फक्त फोन कट केला होता... मी पाहिलंच नाही..."
"तू ये रे... आता काही बोलण्यासारखं नाही उरलं..."
फोन हातातून पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिथेच मीटिंग रूममध्ये. लोक रिफ्रेशमेंटमध्ये व्यस्त होते. कुणाचं लक्ष नव्हतं. पण दीपकला आता काहीच दिसत नव्हतं. फक्त एक चेहरा दिसत होता. आईचा, तिचा तो हसरा चेहरा, जेव्हा तो घरी यायचा तेव्हा. आणि त्याला आठवलं. सकाळी तो लवकर निघाला होता, आईला कॉल करायचा वेळ नव्हता, म्हणून म्हणाला होता,
"अगं आई, आज मीटिंग आहे. संध्याकाळी निवांत बोलतो."
आई म्हणाली होती,
"ठीक आहे बेटा, पण नीट कर प्रेझेंटेशन आज. देव तुझ्या प्रयत्नांना यश देवो...! "
तेच शेवटचे शब्द होते आईचे. कदाचित आईने शेवटचा प्रयत्न केला होता. मुलाचा एकदा तरी फक्त आवाज ऐकायला. पण मुलगा. त्या दिवशी ‘प्रेझेंटेशन’मध्ये जिंकला… पण ' आई' ला हरवून बसला.
दीपक त्या संध्याकाळच्या ट्रेनने गावी रवाना झाला. जेव्हा घरी पोहचला, तेव्हा पांढऱ्या चादरीखाली झाकलेला आईचा शांत देह पाहून त्याचे हृदय तडफडले. राकेश म्हणाला,
"आईला सकाळी थोडी चक्कर आली मग अचानक श्वास जड झाला. हॉस्पिटल मध्ये नेत असताना, त्यांनी तुझं नाव घेतलं."
दीपकने आईचा फोन पाहिला. त्यात एकच आउटगोइंग कॉल होता. दीपकला. त्याच्या नंतर आईने फोन हातात घेतलाच नव्हता. पुढचे कित्येक दिवस दीपक फक्त एकच विचार करत राहिला.
"जर मी त्या क्षणी कॉल पाहिला असता. जर मीटिंगमधून बाहेर जाऊन कॉल घेतला असता... तर..."
असं खूप "जर-तर्" आता त्याच्या जीवनाचा भाग झाले होते. बाहेरच्या जगात लोक त्याच्या कामाचं कौतुक करत होते. पण आतला दीपक रोज रात्री आईची माफी मागत होता.
आज आईला जाऊन दोन वर्षे झाली आहेत. दीपक अजूनही त्याच कंपनीत काम करतो, पण त्याने आता एक सवय बदलली आहे. कधीही फोन वाजला, वायब्रेट झाला. तो आधी पाहतो की कोणाचा आहे. कधी कधी कॉल्स महत्वाचे नसतात, पण "माणसं" महत्वाची असतात. एकदा ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा होता - सौरभ.
मीटिंग सुरू होती. त्याचा फोन वाजला. तो उठून बाहेर जायला लागला. दीपकने अधिकाऱ्यांकडे पाहून सौम्यपणे सांगितलं,
"सॉरी, तो एक महत्वाचा कॉल असू शकतो. थोडा वेळ द्या त्याला."
मीटिंग थोडी थांबली. सौरभ बाहेर गेला, मग परतला. डोळ्यांत अश्रू होते.
"सर. बहिणीचा अपघात झाला आहे. हॉस्पिटलला जातोय."
दीपकने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हटलं,
"जा सौरभ. तुझी सगळ्यात महत्वाची मीटिंग तिथेच आहे आत्ता."
एक मीटिंग, एक प्रेझेंटेशन, एक नोकरी हे सगळं आयुष्याचा भाग आहे. पण जे लोक आपल्याला निस्वार्थ प्रेम करतात. आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र. त्यांचा एक फोन कधीही दुर्लक्षित करू नका. कारण.
"कधी कधी एक मिस्ड कॉल एक आयुष्यभर बोचणारी अपूर्ण गोष्ट बनून जाते...!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा