बुधवार, १६ जुलै, २०२५

2054. मुली दान करण्यासाठी नाहीत

काही दिवसांपूर्वी मी लेख लिहिला होता, मी कन्यादान करणार नाही !! 
मग तो विषय माझ्या मनात घुमतच होता..
मागच्या पंधरा दिवसाआधी सिंगापूरला जावून आले. 
मैत्रीणीकडे भेटायला गेले तर तिच्या बहिणीचं लग्न आहे असं कळलं. 
लग्नाच्या दिवशी आम्ही तिथेच होतो. 
तिने खूपच आग्रह केला मग जाण्याचं ठरवलंच. 
तिच्या घरी सगळेच अगदी मॉडर्न. 
लग्नाचा प्रत्येक विधी अगदीच हलक्या पद्धतीने समजून पार पडत होता. 
आमची फॅमिली विशेष अतिथि होती. 
मग आम्ही सगळ्याच विधीत होतोच. 
लग्नाचा अंतिम विधी,  कन्यादान तो करायचा नाही असं कदाचित त्यांच ठरलं  होतं. 
मी माझ्या मैत्रीणीच्या कानाशी लागून तिला विचारलं, 
"आयशा, 
कन्यादानाचा विधी कधी आहे? 
पाठवणी पर्यंत नाही थांबू शकत. तो विधी झाला की आम्ही निघणार, परत जाण्याची तयारी आणि शॉपिंग पण करायची आहे."
ती माझ्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली, 
"तू हा प्रश्न विचारतेस, 
तूच तर मागे मोठ्ठं भाषण दिलं होतंस ह्या विधीवर! 
माझ्या बाबांच्या अजूनही लक्षात आहे... 
ते तर डायरेक्ट म्हणतात, 
माझ्या मुली दान करण्यासाठी नाहीत! 
आम्ही कन्यादान वगैरे नाही करणार. 
मुलगी काय दान करण्याची वस्तू आहे का?"
मला हसूच आलं, मी तिला अवाक होऊनच म्हटलं,
"अरे बापरे, अगं तो चर्चेचा विषय होता त्यावेळेस, पण आपली लोकं काय मानत नाही गं! 
खरा अर्थ माहित नसतो कन्यादानाचा आणि अर्थाचा बेअर्थ करत हा विधी मोठं  पुण्याचं काम म्हणून करतात,  
आणि मुलाकडच्यांना काही आपत्ती नाही का गं ?"
ती म्हणाली, 
"नाही, त्यांना तर तीन मुली आहेत आणि जावईबुवा एकटेच आहेत. 
मुलाच्या बाबांना तर आमचा हा विचार खुपच पटला होता. 
ते तर म्हणाले होते की रीती आणि प्रथेच्या नांवाखाली मी माझ्या मुलींना माझ्या घरातल्या गोष्टींपासून मुक्त करणार नाही. 
लग्नानंतरही त्या इच्छा असल्यास ह्या घरातल्या सर्व गोष्टीत स्वतःचा विचार देऊ शकतात आणि ह्या घरातल्या सर्वच गोष्टीवर त्यांचा अधिकार आहे. 
त्यांना संपुर्णपणे मुक्त करून माहेर परकं करायचं नाही!
आम्ही काय फक्त त्याच्या बाळंतपणात आणि मदतीसाठीच आहोत? 
मुलीकडूनही आईवडिलांच्या अपेक्षा असतातच ना... 
मग सांग, आणि चक्क बोलले, 
मुलगी दान म्हणून घेणार नाही आणि देणारही नाही."
माझं तर बोटच तोंडात गेलं. 
मी हळूच म्हटलं, 
"मला भेटवून दे असल्या महान विचारवंतांशी" 
तसं ती माझा हात पकडून मला मुलाकडल्या लोकांमध्ये घेवून गेली आणि ओळख करून दिली, 
वर मला दोन मुली आहेत हेही तिने सांगितलं. 
ते काका साठच्या जवळपास होते. 
एवढी भली मोठी पर्सनॅलिटी बघून माझे सर्व मोठे मोठे विचार मी गिळूनच टाकले होते. 
माझं नांव ऐकल्यावर तेच मला म्हणाले, 
"तुझे लेख वाचतो मी, 
तुझ्या कन्यादाना वरचं भाषण ऐकलं आहे मी."
मी जरा अवघडतच म्हटलं, 
"काका मी खुपच लहान आहे तुमच्यासमोर, मी भाषण दिलं पण अजून माझ्यावर ती वेळ आली नाही... 
पण तुम्ही ते प्रत्यक्षात आणत आहात! 
त्यावर ते अगदीच शांतपणे म्हणाले, 
"बेटा, मी आधी कन्यादानाचा विधी घडवून आणायचो. 
माझ्या नोकरी व्यतिरिक्त मी भटजी म्हणूनही काम करत होतो. 
पण आयुष्य अशा कांही घटना समोर आणते की मग असले विधी फालतू वाटतात. 
मी घरात लहान होतो. 
माझ्या बहिणीच्या आणि माझ्यात १२ वर्षाचा फरक. 
तिच्या लग्नात म १० वर्षाचा होतो. 
तिच्या कन्यादानाच्या विधीत मध्ये मध्ये करत होतो. आईच्या अकाली मृत्यूनंतर, तीच आई होती माझी. 
वडील खुपच जुन्या विचाराचे होते. 
माझी ताई लग्न होऊन सासरी गेली आणि सासरचीच झाली.
जसजसा मोठा झालो मला माझ्या ताईच दुःख कळत होतं. 
आई नव्हती म्हणून तसं माहेर नव्हतंच तिला आणि वडिलांनी कन्यादान केल्यामुळे ते तिला सरळ म्हणायचे, आता हे तुझं घर नाही, इथल्या गोष्टीत लक्ष देवू नको.... 
नंतर तिलाही तिच्या सासरच्यानी कधी माहेरी येवू दिलं नाही आणि माझ्या बाबांनीही तिच्या कुठल्याच गोष्टी ऐकल्या नाहीत आणि कधी तिच्या घरीही गेले नाहीत आणि माझा खुप जीव तिच्यावर असुन तरीही मला जावू दिलं नाही. 
माहेरचा पाहुणा तिला कधी लाभलाच नाही. 
तिच्या सारखीच घुसमट मी माझ्या बायकोतही पाहिली. 
मग मीच वडिलांना बोलून पुढाकार घेवून माझ्या बायकोला माहेरी घेवून जायचो, तर माझ्या बायकोलाही तिचे माहेरचे म्हणायचे की, तुझं कन्यादान केलंय नां, मग आता तू ह्या घरची नाहीस... फक्त पाहुणी आहेस... घरातल्या गोष्टींवर हक्क दाखवू नकोस...इथे जास्त येवूही नकोस... आलीस तर पाहुणचार घे आणि जा! 
माझी बहीण सहा वर्षांपुर्वी वारली आणि मरतांना बोलून गेली, 
पोरीचं माहेर तोडू नको, त्या कांही वस्तू नाहीत की दान करून पुण्य मिळवायला... 
आणि सुनही दानात घेवू नकोस जेणेकरून तुला, ही जाणीव रहाणार नाही. 
माझी बहीण, सासर आणि माहेर ह्या दोन्ही मध्ये पिसली गेली. 
ना सासरच्यानी तिला आपलं मानलं ना माहेरच्यानी, 
एकाने जिम्मेदारी निभावली आणि एकाने जिम्मेदारी कधी घेतलीच नाही.
त्या दिवशीच ठरवलं बहिणीची घुसमट थांबवू शकलो नाही पण आता सुना आणि मुलींची होवू देणार नाही... 
माझ्या तिन्ही मुलींचं कन्यादान मी केलंच नाही आणि सुनेचंही होवू देणार नाही. 
आता मागच्या वर्षी बायकोने साथ सोडली आणि माझ्या आधीच देवाघरी पोहचली. जातांना सांगून गेली की, 
"मुलींचं माहेर तोडू नका, त्याच्या खांदयावर नेहमीच तुमचा हात असू द्या. इथे 
माहेरी आल्यानंतर त्याना आत्मविश्वास वाटायला हवा की एक खांदा नेहमीच त्यांच्यासाठी ताठपणे उभा आहे, माहेर नावाचा आणि म्हणाली, होणाऱ्या सुनेला दान म्हणून घेवू नका! 
तिचं माहेरपण नक्की जपा. 
एक वडिल म्हणून तिची जवाबदारी स्विकारताना एका वडिलांची माया तोडू नका.
मुली तीन कुळाचे नांव चालवतात. मामाचं, वडिलांचं आणि सासरचं. 
आणि ते जपताना खूप तारांबळ उडते तिची. 
त्यासाठी तिला सर्वांच्या मायेची गरज पडतेच! 
ह्या विधीत ती गरज संपवू नका" 
आणि वचन घेतलं तिने माझ्याकडून...
काका बोलत होते आणि मी निःशब्द झाले होते. 
आज पहिल्यांदाच कथेतली पात्र मला साक्षात भेटली होती. 
काहींच्या लेखांवर प्रतिक्रिया असतात की असं फक्त कथेतच होतं...तर नाही,  असं खरंच प्रत्यक्षांत ही होतं! 
तेव्हाच कथा लिहिल्या जातात... 
नकळत माझे हात त्यांच्या पायावर टेकले, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, 
"तुझ्या मुलींच्या लग्नात येणार हां मी, 
माझ्या नातीच तर कन्यादान होवूच देणार नाही" 
आता मात्र मी हसले तर ते म्हणाले, 
"हसतेस काय ? 
कांहीही होणार नाही मला अजून २०-२५ वर्ष, 
ही जाताना तिचं आयुष्य देवून गेलीय मला!" 
मग माझ्या दोन्ही मुलींना कडेवर उचललं, त्यांचे लाड केले... 
खिशातून दोन लिफाफे काढले आणि म्हणाले, 
"माझ्या नातींना त्या जे म्हणतील ते घेवून दे सिंगापूरातूनच."
परतीचा प्रवास अगदीच विचारात गेला, 
विमान टेक ऑफ करत होतं आणि माझे विचारही...
शेवटी विमान लॅन्ड झालं पण ते विचार अगदीच पक्के झालेत! 
प्रत्यक्ष एक कथा बघून... 
खूप वेळा विचार आला की, 
असा विचार करणारे खूप कमी असतात. 
मग वाटलं बहुतेक ते विदेशात राहत असणार म्हणून. 
मग लगेच मनाने उत्तर दिलं... नाही !! 
काका तर मुंबईचे आहेत आणि इथे लग्नासाठी आलेले. 
मनात वाटलं त्याचं तर निभावलं, 
आता अजून माझी वेळ आली नाही. 
पण जेव्हां येईल तेव्हां माझ्या मुली मी दान म्हणून देणारच नाही. 
कन्यादान करणार नाही! 
पण कन्यांचं आदान मात्र
नक्की सुरु करणार...
अगदी लग्नाच्या दिवसापासून...
तुम्हांला काय वाटतं? 
अभिप्राय नक्की कळवा. 
ह्या रुढी परंपरेत आजही मुली पिसल्या जातात.
अर्थात अपवाद ही आहेत. 
मुलींना माहेरच्या गोष्टीत बोलण्याचा अधिकार संपतो आणि सासरी त्यांना अधिकारच मिळत नाही. 
आपण आता त्या घरच्या नाही आणि ह्या घरात आपली अजूनही जागा नाही हा विचार खाऊन टाकतो मनाला.
मनाला होणारा त्रास आणि शारीरिक त्रागा व्यक्त होत नाही, नी मग अकाली म्हतारपण येतं स्त्रियांच्या नशिबी.
काय म्हणता? 
असल्या विषयवार चर्चा हवी ना... 
जो मुळ मुद्दा आहे,
ज्यावर असंख्य गैरसमजाची वलयं आहेत... 
मग व्हाच व्यक्त...
ही कथा नक्की वाचा जी माझ्या प्रत्यक्ष पहाणीतली आहे आणि माझ्या लेखणीतून उतरली आहे. 
मी कन्यादान करणार नाही !
🙏😢🙏😢🙏😢🙏😢🙏
 © ऊर्मिला देवेन 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...