शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

1412. डोंगरातला झरा

      टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. उभं राहून अभिवादन करणारी गर्दी खाली बसत नव्हती. निवेदक वारंवार विनंती करीत होता, पण गर्दी अनावर झाली होती. विशेष म्हणजे सगळं व्यासपीठ उभं राहून टाळ्या वाजवत होतं. आणि निओफ्लाय व्हीलचेअरवर बसलेला अभिराम भांबावून गेला होता. भांबावल्या नजरेनं तो सर्वांकडे पहात होता, आणि कौतुकभरल्या नजरेनं सगळे त्याच्याकडे पहात होते. हे सगळं कशासाठी चाललंय. हेच त्याला कळत नव्हतं. अशा सत्काराची , कौतुकाची खरंतर गरज नव्हती. फार मोठं काही केलंय , मोठा डोंगर पालथा घातलाय असंही काही नव्हतं. मग हे सगळं का? कशासाठी? हाच भुंगा त्याचं डोकं कुरतडत होता. सैन्यात जाण्याचं आकर्षण अगदी लहानपणापासून होतं. आणि जाणत्या वयात त्या आकर्षणाला ध्यास लागला तो निरीक्षणाचा, तयारीचा. मिलट्री स्कूल, एन सी सी कॅम्प, पोलीस परेड ग्राऊंडवरच्या परेड, सव्वीस जानेवारीचं दिल्लीतील संचलन. सगळं सगळं डोळे भरून पाहायचा तो. स्वतःला त्या जागी कल्पून परेड करायचा. दहा बाय दहाच्या घरात. भिंती त्याला हसायच्या. फाटके कपडे हसायचे. मोलमजुरी करणारे आई बाबा हसायचे. पण तो सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचा. सगळ्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात, एके दिवशी रस्त्यावरून चालताना फोर व्हीलरने त्याला उडवलं आणि हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळताना त्याच्या लक्षात आलं, आता आपण कायम व्हीलचेअरवर असणार आहोत. आपलं करिअर कायम व्हीलचेअरवर.
       नंतरचे त्याचे दिवस पडझडीचे होते. खंत, नैराश्य, परावलंबनाच्या जाणिवेचा मनाला लागलेला भुंगा. म्हाताऱ्या आईवडिलांचे कष्ट. अस्वस्थता , त्यातून येणारी पोकळी, आणि जगण्याचा निरर्थकपणा. व्हीलचेअरवर बसल्यावर खोलीच्या दारातून दिसणारा आकाशाचा तुकडा आणि आईच्या डोळ्यातून ठिबकणाऱ्या आसवात भिजलेला भाकरीचा तुकडा. त्याला त्या दोन तुकड्यांची सांगड कशी घालावी. हेच उमगत नव्हतं, पण भाकरीच्या तुकड्यासाठी आकाशाची हाक ऐकायला हवी असं त्याला मनोमन वाटत होतं. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं निरीक्षण करणं हा त्याचा आता छंदच झाला होता. कोण काय करतं, जगण्यासाठी कोण कसं धडपडत या सगळ्याचं निरीक्षण करता करता त्याला अचानक जाणीव झाली. आपण व्हीलचेअर वरून सकाळी, संध्याकाळी घरोघरी पेपर टाकू शकतो, किंवा व्हीलचेअर वरून चहा विकू शकतो. किंवा शाळेच्या गेटबाहेर, किंवा गार्डनच्या गेटबाहेर गोळ्या, बिस्किट्स विकू शकतो, किंवा मिनरल वॉटर च्या बाटल्या विकू शकतो, किंवा हे सगळं वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी. आता त्याला कमालीचा उत्साह आला. आकाशाचा तुकडा हाती आल्याचा भास झाला, पण पुढच्याच क्षणी तो दाणकन जमिनीवर आला. हे सगळं करायचं तर हाताशी थोडं तरी भांडवल हवं. वस्तू ठेवता येतील अशी  व्हीलचेअर हवी. तिला इंजिन हवं. जरा तरी चांगले कपडे हवेत. कोण देणार हे ? मग त्याची फिरंती सुरू झाली. चौकशीसाठी, मदतीसाठी. बँका, दिव्यांगासाठी साठी असणाऱ्या यंत्रणा. आपापले राजकीय झेंडे आणि कॅमेरे घेऊन काही राजकीय पक्षसुद्धा पुढे आले. त्यांचा राजकीय अजेंडा राबवायला सोयीचा माणूस दिसतोय म्हणून पण त्याने त्यांना नम्रपणे नकार दिला. पंधरा वीस दिवस तो वेड लागल्यासारखा फिरत होता. मग्रूर नोकरशाही , नियमांची बेडी पुढं करून त्याला मदत नाकारणाऱ्या आस्थापना, फिदीफिदी हसणारे समवयस्क आणि खच्चीकरण करणाऱ्या समाजातील नारोशंकराच्या नकारघंटा. स्वाभिमान, बाणेदारपणा यांची पदोपदी कसोटी पाहणारा काळ.
      अभिराम पुन्हा हताश झाला.‌ हतबल झाला. कोलमडून पडलेला अभिराम उदास होऊन झाडाच्या सावलीत व्हीलचेअर वर बसलेला असताना देवदूत धावून यावा तसा ' तो ' आला. ' त्या ' च्या हाती पाण्याची बाटली होती. व्हीलचेअर वरच्या तरुणाला तहान लागली असेल म्हणून  ' तो ' कार मधून उतरून आला होता. अभिरामने नकार दिला, पण ' तो ' जिद्दी होता, ' त्याने ' चौकशी केली , बोलतं केलं. अभिरामनं सगळं सांगून टाकलं.
"हे बघ मित्रा...मी फार मोठा पैसेवाला नाही. पण तू उभा रहावास म्हणून मी तुला नक्कीच मदत करीन. देवाच्या कृपेनं तेवढा पैसा आहे माझ्याकडे. तुला हवी तशी व्हीलचेअर, कपडे, विक्रीसाठी प्रारंभिक वस्तू सगळं देईन मी, पण एका अटीवर. मी तुला मदत करतो आहे हे कुणाला सांगायचं नाही. माझी जाहिरात करायची नाही आणि दिलेल्या मदतीची परतफेड करायची नाही. आपली ओळख नाही पण तरीही मित्र म्हणून आपण आजपासून नवं नातं सुरू करू या, हे माझं कार्ड, उद्या आपण भेटू ."
' तो ' निघून गेला आणि अभिराम बघत राहिला. पुढच्या काही दिवसात त्याला हवी तशी निओफ्लाय व्हीलचेअर मिळाली. आणि अभिराम चं नवं आयुष्य सुरू झालं. महिन्याभरानं अभिराम ' त्याच्या ' ऑफिसात पोहोचला आणि एक हजार रुपये त्याच्या पुढ्यात ठेवले.
' तो ' बघत बसला.
" हे काय ? हे पैसे मी घेणार नाही. मी मदत केली होती. कर्जाऊ रक्कम दिली नव्हती. मैत्री माणुसकी म्हणून काही आहे की नाही?"
अभिरामनं त्याला थांबवलं. " तुम्ही दिलेल्या मदतीचा मी अपमान करत नाही. ही रक्कम परतफेड म्हणूनही आणली नाही. माझ्या आई बाबांच्या शिकवणुकीचा हा भाग आहे. डोंगरावर पडणारा पाऊस, डोंगर साठवून घेतो आणि मग केव्हातरी झऱ्याच्या रूपाने पाणी बाहेर येतं. ते अनेकांची तहान भागवत असतं. झरा वाहता होतो . पुढे त्याला अनेक झरे येऊन मिळतात. मग त्याची नदी होते. आणि असंख्याना जगवू लागते. मला हेच म्हणायचं आहे. मी आता स्थिरावेन. पण माझ्यासारखे अन्य कुणी असतील त्यांना मदतीची गरज असेल. त्यावेळी तुम्ही त्यांना हे पैसे देऊ शकाल. म्हणून घ्या...नाही म्हणू नका. झरा वाहू लागला आहे. तो असाच पुढं जाऊ द्या. मी दरमहा तुम्हाला पैसे आणून देत जाईन माझ्या कुवतीप्रमाणे."
' त्याला ' काही कळायच्या आत अभिराम निघून गेला.
' त्याच्या ' ऑफिस मधल्या लोकांनी हे सगळं ऐकलं होतं. ते सोशल मीडियावर कुणीतरी टाकलं. ते खूप व्हायरल झालं, आणि संवेदनशील संस्था एकत्र येऊन त्यांनी अभिरामच्या सत्काराचा घाट घातला, निःस्वार्थी मदत करणाऱ्या ' त्याच्याच ' हस्ते. अभिराम अजूनही भांबावलेल्या स्थितीत होता. कुणीतरी त्याच्या हाती माईक आणून दिला. आणि मनोगत व्यक्त करण्याची आग्रहपूर्वक विनंती केली.
".मला बोलता येतं नाही. पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो. शक्य असेल तर  डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा. आपण कृतीतून झरा होऊ या. आपल्याला अनेकजण मदत करतात. मूलभूत गरजा भागवण्यासाठी अनेकजण पुढे येत असतात. समाज, शासन , सेवाभावी संस्था. आपण मात्र आणखी कोण काय काय देतोय याची वाट बघत बसतो. फुकट मिळणारी प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारत असतो, मग त्याची गरज असो वा नसो. हे चांगल्या माणसाचं लक्षण नाही. त्यापेक्षा मला जेवढं मिळालं आहे, त्यातून गरज भागली की आपण दुसऱ्याची गरज भागवण्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे. झरा वाहता असला पाहिजे, म्हणजे सगळ्यांचीच तहान भागेल. मी जे काही केलं ते अत्यंत क्षुल्लक आहे, पण आपण सर्वांनी दखल घेतली यात भरून पावलो मी."
तो बोलत होता. प्रेक्षागृहात शांतता पसरली होती आणि ती शांतता सर्वांना अंतर्मुख करत होती.
( सत्य घटनेवर आधारित )

डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी, ९४२३८७५८०६ 
आवडल्यास अभिप्राय द्यालच नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही. त्यातून समाज जागृती होऊ शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...