शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

1411. प्रेमाचा चक्रव्यूह !

      महाभारतात अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आतपर्यंत गेला पण परत येण्याचे ज्ञान नसल्यामुळे कौरवांनी त्याची हत्या केली हे आपल्याला माहित आहेच.म्हणजेच चक्रव्यूह हे हिंसेचे प्रतिक आहे.मग तुम्ही म्हणाल की याचा प्रेमाशी काय संबंध?
     मुळात प्रेम म्हणजे एक अतिशय उदात्त अशी ईश्वर निर्मित प्रक्रिया.अतिशय पवित्र असे हृदयस्पंदन ! पण टीनएजरमधील मुले भिन्नलिंगी व्यक्तीमत्वाकडे आकर्षित होतात आणि दुर्दैवाने त्या आकर्षणालाच प्रेम समजू लागतात. मग त्यांना बाकी जगाचा जवळजवळ विसरच पडतो. ही एक निसर्गदत्त प्रक्रिया आहे. नशीबाने सरकारचा १८/२१ असे वयाचे बंधन असणारा कायदा आहे म्हणून आईवडीलांचे आपल्या पाल्यावर निदान तोपर्यंत तरी नियंत्रण असते. वयात येणारी मुलं -मुली एकमेकांकडे आकर्षित होतात आणि ते केवळ शारीरिक आकर्षण असते. त्यात कोणतेही पावित्र्य, भल्याबुऱ्याचा विचार नसतो. केवळ बाह्य रुपावर भाळून ते केले जाते. कोणतीही उदात्त अशी भावना त्यामागे शक्यतो नसते. उदाहरणच द्यायचे झाले तर एखादा रुपवान मुलगा केवळ शारीरिक सौंदर्य न पाहता मनाने अतिशय सुंदर असणाऱ्या पण शरीराने कुरुप, अपंग असणाऱ्या एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करेल काय?
एकदा एकमेकांच्या प्रेमात पडले की मग चोरून गाठीभेटी सुरू होतात. मग ते तथाकथित प्रेम फुलवायला मोबाईलचा वारेमाप उपयोग सुरू होतो. आपले आद्य कर्तव्य काय याचा विसर पडू लागतो. जग गुलाबी दिसू लागते. आपले 'पिलू 'किंवा 'बेबी'बरोबर प्रेमाच्या आणाभाका सुरू होतात. "तुझ्याविना जगणे केवळ अशक्य" अशा अर्थाची बोलणी सुरू होतात. हळुहळू या गोष्टी दोन्ही घरी समजतात आणि दोन्ही कुटुंबे प्रचंड तणावात येतात. मग आपला पाल्य सरळपणे सांगून समजला तर ठीक नाहीतर शिवीगाळ, मारझोड चालू होते. काही कारणाने जर एखाद्या मुलीने मागे फिरण्याचा निर्णय घेतला तर तिच्या प्रेमवीराचा इगो दुखावतो ! मग 'माझी झाली नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही 'या जिवघेण्या अट्टाहासापायी आपल्या प्रियतमेवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत मजल जाते!मोबाईलच्या गॅलरीत सेव्ह केलेले मटेरीयल दाखवून ब्लॅकमेल केले जाते ! अशाप्रकारे हिंसेचे आगमन होते. दोन्हीकडचे पालक ही गोष्ट समाजात पसरु नये याची काळजी घेतात. पण कुटुंबाची घडी थोडीफार विस्कटतेच! त्यातही जर मुले सज्ञान असतील तर पशचातापाशिवाय पालकांच्या हाती काहीच उरत नाही !
     लग्न हीच जर प्रेमाच्या यशस्वितेची लक्ष्मणरेषा मानली तर लग्नाअगोदर एकमेकांशिवाय एक क्षणही न जगण्याची शपथ घेणारी जोडपी, कायद्याचा आधार घेऊन, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानंतर, 'नव्याचे' नऊ दिवस संपल्यावर एकमेकांवर खरोखरच पहिल्यासारखे प्रेम करतात का? अर्थात जे करत असतील त्यांचे मनापासून अभिनंदन ! आता सगळेच नातेवाईक दुरावलेले असतात. जगण्यासाठी प्रेम नव्हे तर पैसा लागतो. संसारोपयोगी वस्तू लागतात. राहण्यासाठी भाड्याने का होईना पण सुरक्षित जागा लागते. त्यासाठीही पुन्हा पैसाच लागतो. जगात कुठलाच माणूस पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट नसतो. ज्यावेळी ठरवून लग्न केले जाते त्यावेळी त्याला एक सामाजिक अधिष्ठान प्राप्त होते. दोन्हीकडचे नातेवाईक एकमेकांना जमेल तितके पारखून घेतात. त्यातूनही काही चुकीचे निघाले तर दोन्हीकडून शक्यतो ते मिटवण्याचे, लग्न टिकविण्याचे प्रयत्न होतात पण ज्यावेळी एखादे 'प्रेमाळू' जोडपे सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न करते तेंव्हा ती दोघेच एकमेकांना जबाबदार असतात. आतापर्यंत 'दूरून डोंगर साजरे 'या उक्तीप्रमाणे, गुडी गुडी वातावरण एकमेकांना फारसे खोलात न जाता बघितलेले असते. घर सोडले की अंगण परदेश या अर्थाची एक म्हण आहे. ज्यावेळी हे नवदाम्पत्य खऱ्याखुऱ्या जगात उतरते. आर्थिक ओढाताणीने ग्रस्त होते तेव्हा छोटेमोठे खटके उडायला सुरुवात होते. भांड्याला भांडे लागते. मग एकमेकांचे माहिती नसलेले दुर्गुण हळूहळू डोकावतात आणि मग हळूहळू प्रेम आटत जाते आणि मी हे काय करुन बसलो याची जाणीव व्हायला सुरुवात होते. उसवलेले शिवायला जवळचे कोणीही नसते ! जर कोणीतरी अशा नवदाम्पत्याची साधारण एकदोन वर्षांनंतर काय परिस्थिती आहे याचा सर्व्हे केला तर अतिशय भीषण वास्तव समोर येईल !
nnnnnअगदी मनापासून एकमेकांवर आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत तितकेच प्रेम करणारीही काही जोडपी असतील. त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन ! माझ्या एका मित्राची मुलगी.रंगाने सावळी तर तीने ज्याच्यावर प्रेम आणि लग्न केले तो मुलगा गोरापान. लग्नाला बारा वर्षे होत आली पण त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही ! मुलांनो, प्रेम करणे ही अतिशय सुंदर आणि उदात्त भावना आहे. फक्त ते योग्य वयात आणि तोलून मापून करता आले पाहिजे. कारण आयुष्यात रिटेक घेता येत नाही. दुर्दैवाने आपण हट्टाने केलेले प्रेम असफल झाले तर त्याचा आपल्या मनावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. जीवन नरक बनते. जगणे अशक्य होते. आतापर्यंत दाताच्या कण्या करुन तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला वाढवलेले असते. त्यांचीही काही स्वप्न असतात. अपेक्षा असतात. त्यामुळे आभासी प्रेमापेक्षा जर आपल्या करियरवर लक्ष दिले तर पुढे जाऊन आपल्या पायावर उभे राहता येते. मग उरलेल्या जीवनाचे तुम्हीच स्वामी असता. स्वभावात प्रगल्भता आलेली असते. मग 'कर लो दुनिया मुठ्ठीमे 'अशा अवस्थेत आपण पोहोचतो. आपल्या हट्टापायी आपलेच नव्हे तर घरच्यांचे ही जीवन उध्वस्त होते. (येथे मी कोणत्याही जातीचा उल्लेख केलेला नाही.)
     जीवन अतिशय सुंदर आहे. पण ते कधी चालू होते आणि कधी संपते हे कळत नाही. त्यामुळे आपला जीवनाचा जोडीदार अतिशय पारखून निवडा. प्रेम जरुर करा पण ते जगण्याला उर्जा देणारे असावे. शक्य असेल तर त्यासाठी विश्वासात घेऊन आपल्या आईवडिलांशी बोला. कारण जगातले कोणतेही आईवडील आपल्या पिलाचे वाईट व्हावे असे कधीच चिंतणार नाहीत. त्यांना तुमचा उत्कर्षच हवा असतो. पालकांनीही हे लक्षात घ्यायला हवे की आपला जमाना गेला. येणाऱ्या लाटेला कोणीही थोपवू शकत नाही. त्यामुळे 'खानदान की इज्जत का सवाल'बाजूला ठेवून आपल्या पाल्याशी मनमोकळेपणाने बोलणे, पुढे येणाऱ्या खाचखळग्यांची त्यांना जाणीव करून देणे  गरजेचे आहे. माझ्या मुलग्याने सगळ्यांच्या विरोधात जाऊन तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. आम्ही आमच्या परीने दोघांनाही समजवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पण आमच्याही विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले. त्यावेळी तो डीग्रीच्या शेवटच्या वर्षाला होता. या भानगडीत त्याचे दोन विषय गेले. शेवटी डिप्लोमाच्या आधारावरच नोकरी शोधावी लागली. शेवटी मोठ्या मनाने आम्ही त्यांना जवळ केले. एक सुंदर मुलगी झाली. पण आज त्यांच्यातले ते प्रेम आटले आहे. दोघेही एकमेकांना दोष देताहेत. ज्यावेळी तो आमच्यासमोर आपल्या एकेकाळच्या जिवश्चकंठश्च प्रेमिका असणाऱ्या आमच्या सूनबाईला हाडतूड करतो तेव्हा आमच्या जीवाला खूप खूप वेदना होतात कारण आम्ही शेवटी आईबाप आहोत ! मुलग्याचे आणि सूनेचेही !
त्यामुळे माझी आजच्या तरुण पिढीला कळकळीची विनंती आहे की, प्रेम करा पण डोळसपणे ! प्रेमाच्या चक्रव्यूहात शिरताना शंभरदा विचार करा. कारण यातून परतीचा मार्ग नाही !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...