आज मला रक्षाबंधनाच्या दिवशी योगेश ची आठवण आली. योगेश. माझा भाऊ, दोन वर्षांनी माझ्यापेक्षा लहान होता. लहानपणापासून अगदी खोडकर पण तितकाच जीव लावणारा..!! आम्हा दोघा बहिणींचा तो लाडका भाऊ. लहानपणी त्याने कोणाला त्रास दिला नाही? आम्हा बहिणींना तो वेड करून सोडायचा. रोज आईवडिलांचा मार खाल्ल्याशिवाय त्याचा दिवस संपत नव्हता. आज त्याच्या सगळ्या गोष्टी आठवल्या. लहानपणी अभ्यासाला बसलं की त्याला खोड्या काढल्याशिवाय चैन पडत नव्हत. तो अभ्यास करायचा फक्त आई-वडिलांच्या धाकाने, बाकी आम्ही बहिणी मोठ्या असून सुद्धा तो घाबरत नव्हता, त्याला कारणही तसंच होतं, तो आमचा लाडका होता. संध्याकाळच्या वेळेस अभ्यासाला बसलं की हळूच वेण्या ओढणारा योगेश मग आई त्याला फटके मारून बाजूला बसवायची. जसं जसं वय वाढत गेलं, तो खुप शांत झाला, समजदार झाला.
मोठी बहीण मीनाच्या लग्ना मध्ये त्याला नोकरीला लागून तीन वर्ष झाली होती. कोणालाही न सांगता तिला एक तोळे सोन्याचं गिफ्ट आणून सर्वांना त्याने आश्चर्याचा धक्का दिला. त्याला सरप्राईज द्यायला खूप आवडायचं. तो नेहमी म्हणायचा, सरप्राईज दिल की प्रेम वाढतं. मीना लग्नानंतर सासरी निघाली तेव्हा त्याचे डोळे भरून आले होते.
त्या दिवशी तो माझ्याजवळ खूप रडला. भरल्या डोळ्यांनी मला म्हणाला, "तायडे, मिनी गेली ना,आता घर आपल्याला खायला उठणार. बहिणी घरातून सासरसाठी उंबरठा सोडतात ना, तेव्हा घरातील प्रेम, संस्कार, आपुलकी सगळं सगळं त्यांच्याबरोबर जातं. घरातल्या माणसांना त्या परक करून जातात."
मीना निघाली तेव्हा त्याचे डोळे अश्रू अडवू शकले नाही. तिला मिठी मारत तो हुंदके देऊन रडत होता.
" मीने, काळजी करू नकोस, हा भाऊ तुझ्या पाठीशी कायम उभा राहील."
आणि खरोखर तो शेवटपर्यंत आमच्या पाठीशी उभा राहिला. पुढे दोन दिवस तो लग्नाच्या अति कामामुळे आजारी सुध्दा पडला होता. मीनाच्या लग्नाच्या वेळी दहा दिवस सुट्टी काढून आलेला योगेश त्याने दिवस रात्री एक केल्या होत्या. काही वर्षांपूर्वी मीनाच्या घरी झालेला कुटुंबातील वाद त्याच्या कानापर्यंत गेला. योगेश कुणालाही न सांगता सरळ तिच्या सासरी पोहोचला. मीनाला माहीत होतं योगेश खूप हळवा आहे. तिच्या नवऱ्याला एकांतात योगेशने हात जोडले.
"दाजी, काही पण करा पण बहिणीची चूक झाली असेल तर तिच्या चुका पदरात घ्या, तिच्याकडून काही चुकलं असेल तर मी तुमची माफी मागतो ".
आपल्या बहिणीसाठी कोण चूक, कोण बरोबर या वादात पडण्यापेक्षा विचारा बहिणीसाठी स्वतःहून माफी मागून मोकळा झाला. असे भाऊ खूप कमी बहिणींच्या नशिबात असतात. तो कमजोर होता असं नाही, पण एखाद्याच्या प्रेमापोटी कमजोर व्हावं लागतं. एखाद्याच्या सुखासाठी हात जोडावे लागतात. मग ते वडील असो किंवा भाऊ यांचं प्रेमच वेगळं असतं. पुढे माझं लग्न झालं, पण दुर्दैवाने मलाही सासरची लोक चांगली मिळाली नाही. एका वर्षामध्ये मला घटस्फोट देऊन माझा नवरा वेगळा झाला. माझ्यासाठी सुद्धा त्याने त्या लोकांचे हात पाय धरले, त्यांना विनवण्या केल्या पण काहीही फायदा झाला नाही. आई वडील आणि मी, आम्हा तिघांची त्याच्यावर जबाबदारी होती. एक दिवस असंच तो माझ्या शेजारी बसला आणि अचानक मला म्हणाला
"तायडे,मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय.." मी तर भांबावून गेले.
"अरे, असं वेडपटासारखं काही करू नकोस आणि तू आमची काळजी करू नको, मी आहे आई-बाबांना सांभाळायला." मी त्याला समजावले .
"तसं नाही गं..."
"पण मला तुम्हा तिघांची पण काळजी आहे."
पुढे कित्येक दिवस मी,आई-बाबा आणि मीना आम्ही त्याला समजावून सांगितले पण त्याने कधीही आमचे ऐकले नाही. तो नेहमी त्याने घेतलेल्या निर्णयावर ठाम असायचा. तो कदाचित विचार करत असेल की माझ्या लग्नानंतर ह्या तिघांचा सांभाळ मी पाहिजे तसा करू शकणार नाही. मी जर माझ्या संसारात अडकून गेलो तर यांच्याकडे लक्ष कोण देईल? माझी घरात आलेली पत्नी, आणि या तिघांचं सूत जमेल का? कारण यांच्यापासून वेगळं होणं ही कल्पनाच मी करू शकत नाही असं त्याला नेहमी वाटत असेल. माझी मोठी बहीण आणि माझ्या संसारात आलेल्या अडचणी, त्याने बघितलेली आणि अनुभवलेली विक्षिप्त लोक, कदाचित ह्या लोकांना बघून तो या संसाराच्या दृष्टचक्रात पडू शकत नव्हता. म्हणूनच त्याने स्वतःचा संसार थाटण्यापेक्षा आमच्या सुखाला जास्त महत्व दिलं.
मागच्या वर्षीचा ऑगस्ट महिना !! खूप वाईट दिवस योगेशच्या नशिबात आला होता. त्याने कित्येक दिवस दुखणं अंगावर काढल होत. त्याच्या आजाराचं निदान शेवटपर्यंत होऊ शकलं नाही. पण जेव्हा कळलं तेव्हा मात्र वेळ निघून गेली होती. त्याचा ब्लड कॅन्सर हा शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. केवळ आमच्या सुखासाठी सर्व गोष्टी लपवणारा योगेश आज मात्र आमच्यापासून काहीही लपवू शकत नव्हता. आम्ही सर्वजण हवालदील झालो होतो. आम्हा सर्वांना धीर देणाऱ्याचा कॅन्सर पुढे तोच धीर खचला होता.
बेडवर पडलेल्या योगेश ने मला विचारलं ", तायडे, रक्षाबंधन कधी आहे?
"अरे, परवाच आहे बघ."
"मिनी ला म्हणावं राख्या घेऊन ये ".
मीना त्यादिवशी राखी घेऊन हॉस्पिटललाच झाली.
मीना त्याची अवस्था बघून खूप रडली.
आमच्यासाठी कष्ट काढणारा, आयुष्य संपवणारा भाऊ आज त्याच्या स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता.
मीना आल्या आल्या तिच्याशी हसून बोलला.
तिला म्हणाला,"मिने, काहीही झालं तरी चालेल, पण रक्षाबंधन झालच पाहिजे. आम्ही दोघेही बहिणीने त्याला बेडवर राख्या बांधल्या आणि ओवाळला सुद्धा. आमच्या दोघींच्याही डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नव्हते. जगात सगळ्या बहिणींना भाऊ मिळावा तर असा !! खरंच आम्ही खूप नशिबी होतो, परमेश्वर आपल्या सोबत कोणत्या रूपाने वास करतो हे आम्हाला आज समजलं होतं. आमचा भाऊ परमेश्वराचच एक रुप होत. असं कोणी का कुणासाठी आपला आयुष्य दान करत? त्यासाठी तुम्हाला असामान्य व्हावं लागतं. तुम्हाला त्या नात्यात समर्पण कराव लागतं. आमच्या आई-वडिलांची तर परिस्थिती विचारायला नको. ते तर निशब्द होते.
रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी योगेश ची प्राणज्योत मालवली. कदाचित त्याला त्याच्या मृत्यूची कल्पना आली असणार, त्यामुळेच तर त्याने मला रक्षाबंधन कधी आहे हे विचारलं. खरोखर माणसाला आपल्या मृत्यूची चाहूल लागत असेल का? आपल्या इच्छा तो त्याआधी पूर्ण करून घेतो का? त्याने घेतलेला लग्न न करण्याचा निर्णय खरोखर योग्य होता का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं त्याने खूप आधीच शोधली होती. आमचं शेवटचं रक्षाबंधन झालं होतं. परंतु एक भाऊ म्हणून तो आयुष्यभर यापुढे आमच्या स्मरणात राहणार होता.
©® -प्रकाश फासाटे.
मोरोक्को.
+212661913052
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा