शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

1403. उतराई

 अरे बापरे, नऊ वाजले. निघायला हवं..... दिवाकर दवाखाना बंद करून निघण्याच्या तयारीत असतानाच, धनगरवाड्यातील सुषमा अक्षरशः धापा टाकतच दरवाजातून आत आली. तिच्या हातात तिचे आठ महीन्याचे बाळ होते..... डाक्टर मले वाचवा. मले साप डसलाय. ..... कसे बसे, बाळाला बाजुच्या बाकड्यावर ठेवत, डॉक्टरांच्या समोरील खुर्चीवर बसत सुषमा म्हणाली..... कोण चावलं? किती वेळ झालाय?.... दिवाकरने विचारले..... कोन चावले, मले नाही कळलं. पण दोन घंटे झालं डाक्टर ...... दोन वाक्य बोलतानाही तिला धाप लागली होती..... दिवाकरला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. त्याने पटकन त्याच्याकडील सर्पदंशावरील तात्काळ द्यावयाचे इंजेक्शन सुषमाला दिले. पण तेवढ्याने भागणार नव्हते. तिला अॅडमिट करावे लागणार होते. त्याने लगेचच तिला आपल्या गाडीत नेऊन बसवले. आणि बाळाला तिच्या बाजुच्या सीटवर ठेवले. मग त्याने परत दवाखान्यात जावून लाईट बंद केला आणि कुलुप लावून धावतच तो गाडीत येवून बसला आणि तो जवळच्याच इस्पितळाच्या दिशेने निघाला. वाटेतच त्याने त्या इस्पितळातील, त्याच्या ओळखीच्या डॉक्टर रविकांतला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. 
दिवाकर रानडेला या गावात प्रॅक्टीस सुरु करून साधारण दहा वर्षे झाली होती. गावातील प्रत्येक पेशंटला तो ओळखत असे. गावातील प्रत्येक कुटुंबाचा, तो जणु एक सदस्यच बनला होता. सुषमाच्या नवऱ्याचे सहा महीन्यापुर्वीच एका अक्सिडेंटमध्ये निधन झाले होते. तिला जवळचे दुसरे कोणीच नव्हते. तिला अॅडमिट केल्यावर, बाळाला कुठे ठेवायचे हा प्रश्नच होता. दिवाकरने पटकन रेवतीला म्हणजे त्याच्या बायकोला फोन लावला आणि इस्पितळात येण्यास सांगितले. 
एका खांद्यावर बाळाला घेवूनच त्याने सुषमाला इस्पितळात दाखल करण्यासाठीचे सर्व सोपस्कार पार पाडले आणि तो डॉक्टर रविकांतला त्याने दिलेल्या इंजेक्शन बद्दल सांगुन पुढील ट्रिटमेंटबद्दल डिस्कस करू लागला. 
.... अहो काय झालंय. मला असं घाईघाईत का बोलवले? आणि हे बाळ कोणाचे? ... धावतच आलेल्या रेवतीने विचारले.... सांगतो. सांगतो. आधी या बाळाला घे आणि बाहेर थांब..... त्याने त्याच्याकडील बाळ रेवतीकडे सोपविले आणि तो परत डॉ. रविकांत बरोबर चर्चा करू लागला. सुषमाचे सर्व शरीर निळे पडले होते. तिची शुद्ध हरपायला लागली होती. तिची परिस्थिती गंभीर होत होती. डॉ रविकांतने पुढील ट्रीटमेंट सुरु केली पण तोही थोडा साशंकच होता..... सर तुम्ही जा घरी. मी बघतो पेशंटकडे.... डॉ रविकांत म्हणाला...
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सुषमा अत्यवस्थ असल्याचा  
इस्पितळातून फोन आला. दिवाकर, पाचचं मिनिटात इस्पितळात पोहचला होता. पाठोपाठच रेवती बाळाला घेवून पोहचली. 
...... डाक्टर या माझ्ये पोराची काळजी घ्या. मले जवळचं कोन नाय हाय. आमच्ये धनगरवाड्याले कोन नाय त्याची काळजी घेणार....... मरणाच्या दारातील सुषमाच्या डोळ्यात आईचं वात्सल्य दाटुन आलं होतं. कदाचित हे सांगण्यासाठीच तिचे प्राण अडकले असावेत..... तु नको काळजी करू. तुला काही होणार नाही .... दिवाकरने, सुषमाचे मरण दारात दिसत असुनही, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला ...... डाक्टर, माझ्या पोराले सांभाळा ...... असं म्हणतच सुषमाने प्राण सोडला .... दिवाकरला गलबलून आले. मरणपंथाला टेकलेल्यानंतरही, तिच्यातील आईने, दिवाकर आणि रेवती येईपर्यंत मृत्युला थांबवून, आपल्या बाळाच्या पुढील आयुष्याची तजवीज केली होती. डॉक्टर आपल्या बाळाचा नक्की सांभाळ करतील या विश्वासानेच तिने अखेरचा श्वास घेतला होता.
सुषमाचे अंत्यसंस्कारही, दिवाकरनेच इस्पितळातील लोकांच्या मदतीने पार पाडले. 
आज सुषमाला जावून आठ दिवस झाले होते तरीही धनगरवाड्यातुन कोणीच पुढे आले नव्हते. सुषमाचे म्हणणे खरे ठरले होते. 
रेवती, बाळाचे सर्व काही करत होती पण त्यामध्ये वात्सल्याचा अभाव दिसत होता. तिचं मन या बाळाला सांभाळण्यास तितकसं तयार नव्हतं. दिवाकरच्याही ते लक्षात आलं होतं. 
...... रेवती अगं आज आपल्या लग्नाला आठ वर्षे झाली. आपण सर्व डॉक्टर केले तरी आपल्याला मुल नाही झाले. कदाचित म्हणूनच ईश्वराने हे बाळ आपल्या पदरात टाकले असावे .... दिवाकर, रेवतीला समजावण्याचा प्रयत्न करत होता..... हे बाळ आपल्याला नाही सुट करत .... सुट नाही करत? अगं, काय बोलतेयस काय, रेवती? अगं भगवान श्रीकृष्णही सावळाच होता...... अहो पण तरीही..... रेवती अग आपल्या भरवशावरच, या बाळाच्या आईने शेवटचा श्वास घेतलाय. आता आपल्याला माघार नाही घेता येणार. या बाळाला आपल्याला सांभाळावेच लागेल. दिवाकरच्या निग्रहापुढे रेवतीचे काही चालेना. महीनाभरातच त्यांनी बाळाचे बारसे केले आणि त्याचे नाव पराग  ठेवले. जस जसे दिवस पुढे जावु लागले, तसे रेवतीलाही बाळाचा लळा लागला होता. रेवती त्याचे सर्व प्रेमाने करू लागली होती. सुषमाचे बाळ रेवती आणि दिवाकरच्या वात्सल्याने चिंब नाहुन निघत होते. रेवतीमधील हा बदल दिवाकरलाही सुखावणारा होता. 
दोन वर्षांनंतर दिवाकरने शहरामध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. थोड्याच दिवसात त्याचा या शहरातही चांगलाच जम बसला होता. त्याची प्रॅक्टीस चांगलीच चालत होती. 
पराग एव्हाना तीन वर्षाचा झाला होता. लग्नानंतर जवळ जवळ अकरा वर्षांनी रेवतीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. रेवती आणि दिवाकरच्या आनंदाला पारावारच नव्हता. छोटा परागही त्या गोऱ्या गुबऱ्या बाळाला पाहुन हरखुन गेला होता. रेवतीची आई लेकीच्या बाळंतपणासाठी त्यांच्याकडे आली होती. सतत आईच्या पदराला धरून असणाऱ्या परागला पाहून रेवतीच्या आईची म्हणजे सुनंदाबाईंची चांगलीच चरफड होत असे. नेहमी आईच्या कुशीत झोपणाऱ्या परागला आता दिवाकरकडे झोपावे लागत असे. त्याच्या प्रेमाला आता वाटेकरी आला होता. रेवतीच्याही नकळत रेवतीचे परागकडे थोडे दुर्लक्षच होवु लागले होते. पण नवीन बाळाचं सगळं करण्यामुळे तसं होत असावं म्हणून दिवाकरही त्याकडे दुर्लक्ष करत होता. 
महिन्याभरातच नवीन बाळाचे बारसे, अगदी धुमधडाक्यात साजरे झाले होते. रेवती आणि तिच्या आईच्या उत्साहाला नुसते उधाणच आले होते. रेवतीच्या आईनेचं, बाळाचं नाव अमेय ठेवलं होतं. परागच्या पाठोपाठ आलेल्या ह्या बाळाचं नाव, दिवाकरला प्रसाद  ठेवायचं होतं पण रेवती आणि तिच्या आईला ते नको होतं.
अमेय आता दोन वर्षाचा झाला होता. रेवतीची आई मदतीला होती तरीही पराग आणि अमेय दोघांचं करता करता रेवतीची खुपच तारांबळ होत होती. 
...... रेवती अग परागला आता शाळेत अॅडमिशन घ्यायला हवी. हल्ली शाळा डोनेशन शिवाय अॅडमिशन देतचं नाहीत..... नाही हां. अजिबात डोनेशन घ्यायचे नाही. तीन वर्षांनी अमेयची अॅडमिशन आहे. SSC बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत घ्या अॅडमिशन. तिथे नाही लागणार डोनेशन..... अग पणं इंग्लिश मिडीयम घ्यायचं ठरलं होतं ना आपलं..... अहो पण त्याला डोनेशन लागेल ...... डोनेशनच्या विरोधात असलेल्या दिवाकरला रेवतीचं पटलं होतं. शेवटी दिवाकरने मराठी माध्यमाच्या SSC बोर्डाच्या साने गुरुजी शाळेत परागला अॅडमिशन घेतली. 
परागला शाळेत नेणे व शाळेतून आणणे ही जबाबदारी दिवाकरवर आली होती. छोट्या परागला मात्र, शाळेत सोडायला आई हवी असायची. सर्व मुलांच्या आई त्यांना शाळेत सोडायला आणि न्यायला येतात, आणि मला मात्र बाबा. अशी तो नेहमी तक्रार करायचा म्हणुन आज दिवाकरने रेवतीकडे हा विषय काढण्याचे ठरविले. 
.... रेवती अग, अमेय आईंकडे राहील थोडावेळ. तु परागला शाळेत सोडायला तरी जा ना. तो नेहमी निघताना हट्ट करतो. पाहतेस ना तु. अगदी शाळेत पोहचेपर्यंत रडत असतो..... दिवाकर रेवतीला समजावत होता...... नाही हां. मला नाही जमणारं. मला सकाळी खुप कामे असतात. 
...... रेवतीने झुरळं झटकावं तसं दिवाकरची सुचना झटकली होती....... दिवाकरनेही मग वाद वाढवला नव्हता. अमेयच्या जन्मानंतर झालेला, रेवतीच्या वागण्यातला हा बदल दिवाकरला अगदी स्पष्ट दिसत होता. पण तो हतबल होता. छोट्या परागला आताशा, दिवाकरच्या कुशीतच झोपावे लागत असे. त्या निरागस मनाला समजावता समजावता दिवाकरची खुपच तारांबळ उडत होती. रोज रात्री नवनवीन गोष्टी सांगुन तो परागला झोपवत असे.
परागच्या अॅडमिशनच्या वेळी, डोनेशन द्यायला विरोध करणाऱ्या रेवतीने अमेयच्या अॅडमिशनसाठी डोनेशन द्यायला, दिवाकरला भाग पाडले होते. तिने हट्टाने दोन लाख डोनेशन आणि वर्षाला जवळपास लाखभर रुपये फी भरून, ICSE बोर्डाच्या युनिव्हर्सल स्कुल मध्ये अॅडमिशन घेतली होती. 
तिच्या या निर्णयाला दिवाकरने खुप विरोध केला होता, पण रेवतीच्या हट्टापुढे त्याचे काही चालले नव्हते. खरेतर रेवतीच्या या निर्णयाला विरोध केला तर परागची आबाळ होईल, अशी त्याला भीती वाटत होती. म्हणूनच तो रेवतीचे हट्ट पुरवत होता. अमेय आणि परागला आता लहान असल्यामुळे फारसे कळत नव्हते पण उद्या थोडे मोठे झाल्यावर दोघांमध्ये एक दरी निर्माण होण्याची त्याला भीती वाटत होती. 
वर्षामागुन वर्ष जात होती. परागची अभ्यासातील प्रगती वाखाणण्याजोगी होती. त्याने कधीच पहिला नंबर सोडला नव्हता. याउलट अमेयचे होते. त्याची बुद्धीमता सामान्यच होती. त्यामुळे त्याला हा अभ्यासक्रम जरा जडच जात होता. 
शेवटी एक दिवस धीर करून दिवाकरने विषय काढलाच....... रेवती अग आपण अमेयला साने गुरुजी शाळेत घालुया का? त्याला हा अभ्यासक्रम झेपत नाहीये. अग तो हिरा असेल तर तो कुठच्याही शाळेत गेला तरी चमकेलचं ....... नाही हां. त्या तसल्या शाळेत, माझ्या मुलाला मी कधी घालु देणार नाही.... रेवती म्हणाली...... त्या तसल्या शाळेत !! आणि माझ्या मुलाला !! रेवती अगं, तुला काय, झालय काय. तुझ्या या वागण्यामुळे परागच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलास कधी? त्या दोन भावांमध्ये किती भेदभाव करतेयंस तु? जावुदे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही..... असं म्हणून दिवाकर उठुन झोपायला गेला. पण रेवतीच्या ह्या हट्टापायी अमेयची चांगलीच कुचंबणा होत होती. 
ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला होता. 
पराग दहावीला राज्यात सातवा व बारावीच्या परिक्षेत राज्यात दुसरा आला होता.  NEET परिक्षेतही तो राज्यात पहिला येवून ग्रॅन्ड मेडीकल कॉलेज मधुन एम. बी. बी. एस. करून पुढे तिथेच एम. डी. करून आज आपल्या शहरात एक नामांकीत कार्डिओलॉजिस्ट म्हणून नावारुपाला आला होता. पण अमेय मात्र निटला चार वेळा बसुनही, ती क्लीयर नाही करू शकला होता. शेवटी बी. एसी. करून एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करत होता. दोघांच्या कर्तृत्वात एवढी तफावत असुनही दोन्ही भावांमध्ये राम लक्ष्मणासारखेच प्रेम होते.  दोघांची जोडगोळी ब्लॅक अँड व्हाईट म्हणून शहरात प्रसिद्ध होती. 
पराग आणि अमेयचे दोघांचेही लग्न होवुन दोघेही आपापल्या व्यवसायात आणि संसारात चांगले रमले होते. परागला आणि अमेयला दोघांनाही एकेक पुत्ररत्न झाले होते. अमेय, आई वडीलांच्या बरोबर, त्यांच्याच फ्लॅटमध्ये रहात होता तर पराग त्याच्या टुमदार बंगल्यात रहात होता. परागचं हॉस्पीटल, आज शहरातील नामांकित हॉस्पीटलमध्ये अव्वल होतं. 
त्याच्या हॉस्पीटलला 'हेल्थ एड' स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाले होते. परागने इथेही पहिला नंबर सोडला नव्हता. त्यानिमित्ताने आज त्याने सर्व मित्रमंडळी आणि कुटुंबियांना आपल्या बंगल्यावरतीच एक जंगी पार्टी दिली होती. 
...... आई, बाबा तुम्ही सगळे आजची रात्र इथेच रहा ना. सहा वर्षापूर्वी वास्तुशांतीच्या वेळी तुम्ही इथे राहीला होता. अमेय अरे तु तरी सांग ना आईंना ..... परागच्या सुरात त्याच्या धर्मपत्नीने म्हणजे प्रियांकानेही सुर मिसळला....... नाही. नको. खुप उशीर झालाय. अमेयला उद्या ऑफीसला जायचेय..... रेवतीने नेहमीप्रमाणेच नकार दिला होता....... आई अग, उद्या रविवार आहे. ऑफिसला सुट्टी आहे ...... अमेयने रहाण्यास आपली काहीच अडचण नाही हे स्पष्ट केले होते....... तरी नको..... रेवती आपल्या निर्णयावर ठाम होती..... मी, अनुजा आणि सोहम थांबतो. तु आणि बाबा जा घरी....... अमेयने आपली बाजु मांडली....... ठीक आहे. चला हो. असं म्हणतं रेवती निघाली....... येतो रे आम्ही. आता जास्त वेळ जागरण करू नका. अकरा वाजलेत....... असं म्हणत पाठोपाठ दिवाकरही निघाला...... बाबा अहो चावी तर घ्या गाडीची...... अमेयने गाडीची चावी दिवाकरकडे दिली. 
...... आजची रात्र राहीलो असतो तिथे तर काय बिघडले असते. कित्येक वेळा पराग आणि प्रियांकाही आपल्याला बोलावते पण तु जात नाहीस. आजच्या पार्टीमध्येही तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेलाच होता. रेवती तुझी ही परागबद्दलची असुया हल्ली स्पष्ट जाणवु लागलीय. अग तो अमेय बघ. आपल्या भावाच्या यशामध्ये किती आनंदीत असतो. आपल्याला दादासारखे डॉक्टर होता नाही आले म्हणून त्याने कधी भावाचा द्वेष नाही केला. आज आपला भाऊ एक मोठा कार्डीओलॉजिस्ट, एका मोठ्या हॉस्पीटलचा मालक आणि आपण मात्र एका कंपनीत साधीशी नोकरी  करतो, याचा लवलेशही त्याच्या मनात नसतो. राम लक्ष्मणासारखी, अगदी दृष्ट लागेल अशी जोडी आहे त्यांची. त्याला असुया वाटायला हवी गं पण ती तुला वाटते आणि ते आता अगदी नजरेत येवु लागलेय. अमेयच्या जन्मानंतर तुझ्यातील हा बदल त्या छोट्या मुलाला पण समजत होता. पराग मला नेहमी विचारायचा, " बाबा आई मला कुशीत झोपायला का नाही घेत? गोष्टी का नाही सांगत ? शाळेत सोडायला का नाही येत ?" पण प्रत्येक वेळी काहीतरी सांगुन मी वेळ मारून न्यायचो. तुझ्याशीही ह्या विषयावर बोललो. पण तुझ्यात काहीच बदल नाही झाला. वाटले वयोपरत्वे बदलशील पण तुझं आपलं तेच....... दिवाकरने एवढी वर्षे दाबुन ठेवलेली खदखद आज मोकळी केली होती. रेवतीने काहीच प्रतिसाद दिला नव्हता. 
साधारण एक वर्षानंतर.... 
आज रेवतीला अस्वस्थ वाटत होतं. दिवाकरने गोळी दिली होती पण काहीच फरक नव्हता....... रेवती मला वाटतं आपण तुझ्या सगळ्या टेस्ट करून घेवुया. मी परागला फोन करतो..... नको. आपण बाजुच्याच इस्पितळात करूया टेस्ट. एवढ्या लांब परागच्या हॉस्पीटलला जायचे माझ्यात त्राण नाहीये....... बरं तसं करू. 
दिवाकरने मग त्या हॉस्पीटलमध्ये रेवतीच्या सर्व टेस्ट केल्या. दुसऱ्या दिवशी दुपारीच, रिपोर्ट घेवून तो घरी आला. रिपोर्ट वाचुन त्याच्या लक्षात आले होते. 
.... रेवती, तसे घाबरण्याचे काही कारणं नाही आहे पण आपल्याला लवकरात लवकर तुझी अँजिओप्लॅस्टी किंवा बायपास करावी लागेल. आजकाल हे फारच सोपे झालयं. मी मघाशीच परागला रिपोर्टस व्हॉटसअॅप केलेत. तो करेल सर्व व्यवस्था....... कशाला केलेत व्हॉटसअॅप त्याला. मला त्याच्याकडून ऑपरेशन नाही करून घ्यायचे. तसाही त्याचा अनुभव फक्त दहा बारा वर्षांचा आहे. आपण डॉ सहस्रबुद्धेंकडे करू. खुप अनुभवी आहेत ते..... अगं आपल्या घरात दोन दोन डॉक्टर असताना, आपण दुसरीकडे जायचे. आणि तो ही शहरातला नंबर वनचा कार्डीओलॉजिस्ट असताना, दुसरीकडे जायचे म्हणजे...... मी एकदा सांगितलं ना, आपण डॉ सहस्रबुद्धेंकडे ऑपरेशन करायचे. मग फायनल. 
आईच्या काळजीपोटी हॉस्पीटलमधुन, हातातलं काम टाकुन धावत आलेला पराग, आई बाबांचा हा संवाद ऐकुन जागीच थिजून गेला. त्याने उगाचच उघड्या दारावर टकटक केली....... आई कशी आहेस तु. काळजी करू नको. एकदम सोपं असतं हे ऑपरेशन. मी आहे नां..... असं म्हणताना डोळ्यात आलेल्या अश्रुंना मागे सारत, चेहऱ्यावर कसलेही भाव न दाखवता त्याने आईला धीर दिला. थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारून तो निघाला. 
आईवेडा असलेला पराग, एवढी वर्षे, आईचे आपल्याबरोबरचे हात राखुनचे वागणे दुर्लक्ष करीत होता. खरेतरं आईवरच्या प्रेमापोटी त्याला कधी ते जाणवलेही नसावे. पण आज मात्र आई बाबांचा संवाद ऐकुन अचानक त्याला काहीतरी विचित्र वाटु लागले होते. 
पराग आज दुपारीच घरी आला होता. त्याचे मन कशातच लागतं नव्हते. 
.... आज दुपारीच कसे काय. तब्येत बरी नाही का?.... प्रियांकाने विचारले. 
.......नाही सहज. बरी आहे तब्येत......... असं म्हणत तो हॉलमध्येच सोफ्यावर बसला. प्रियांकाने आणुन दिलेलं थंड पाणी प्यायल्यावरही, त्याला स्वस्थ वाटेना. त्याने खिशातून फोन काढून बाबांना फोन लावला..... हॅलो बाबा. .... हा बाळा बोलं...... बाबा तुम्ही आईच्या खोलीतून बाहेर या. मला तुम्हाला काही विचारायचे आहे....... अरे मी हॉलमध्येच आहे. रेवतीचा नुकताच डोळा लागलाय..... बाबा एवढी वर्षे मी नाही विचारले तुम्हाला. पण आज तुम्हाला विचारतोय. बाबा, आई माझ्याशी असं फटकून का वागते. माझ्या कुठच्याच गोष्टीचा तिला आनंद का नाही वाटतं...... तसं काही नाहीये बाळा. तिचा स्वभावच तसा आहे....... असं समजूनच बाबा मी एवढी वर्षे दुर्लक्ष केले. पण आज तुमचा संवाद मी ऐकलाय. सहस्रबुद्धे डॉक्टरांकडे ऑपरेशन करण्याचा आईचा निर्णय मी ऐकलाय. बाबा मला आज तुमच्याकडून सर्व जाणून घ्यायचयं. तुम्ही माझ्यापासुन काहीतरी लपवताय..... परागच्या हट्टापोटी दिवाकरला आज सर्व सांगणे भाग होते. बाळा रेवती तुझी खरी आई नाहीये. त्याने परागला मग सर्व स्पष्टपणे, कसलाही आडपडदा न ठेवता सांगुन टाकले. 
परागने फोन ठेवला, तेव्हा त्याचा शर्ट त्याच्या अश्रुंनी भिजला होता. हजारो पेशंटचे हृदय ठीक करणारा तो आज स्वतःच्या हृदयाला बसलेला हा पीळ मात्र ठीक करू शकत नव्हता. अचानक हातातुन काहीतरी निसटल्याच्या भावनेने तो अक्षरशः लहान मुलासारखा रडत होता. त्याची ती अवस्था बघुन प्रियांकाने त्याला मिठी मारली आणि ती ही रडु लागली. आज एवढ्या वर्षानंतर, आईच्या आपल्याबरोबरच्या फटकून वागण्याचा, त्याला अर्थ लागला होता. ती आपली खरी आई नाही आहे, ह्यापेक्षाही ह्या कारणासाठी ती आपल्याशी असं वागते, हे कळल्यामुळे तो जास्तच अस्वस्थ झाला होता. एवढ्या वर्षांच्या प्रश्नांची, त्याला आज उकल होत होती आणि त्याने तो तिळ तिळ तुटत होता. प्रियांकालाही त्याच्या फोनवरील बोलण्यावरून सर्व अंदाज आला होता. ती आपल्या परीने त्याला समजावत होती. .
आज दुपारी बारा वाजता रेवतीचे ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन सक्सेसफुल झाले होते. संध्याकाळी साधारण तीन वाजता ती शुद्धीवर आली होती.  ती शुद्धीत येण्याची वाट बघत, तिच्या रुममध्ये दिवाकर थांबला होता. बाकी सर्व बाहेर लॉबीमध्ये बसले होते. त्याने बेल वाजवून नर्सला बोलावले. नर्सबरोबरच परागही आत आला होता. नर्सने ब्लडप्रेशर चेक केले. .... सर एकशे पंचवीस, ऐंशी आहे ...... नर्स तिनशे दोनच्या पेशंटला साडे तीनला ओटी मध्ये घ्या....... पराग नर्सला सुचना देत असतानाच दुसरी नर्स आत आली होती..... सर, बाहेर मिसेस सहस्त्रबुद्धे आल्यात. त्या म्हणतायत, "डॉ सहस्रबुद्धेंचं ऑपरेशन तुम्हीच करा म्हणून"...... त्यांना सांगा मीच करणार आहे. आताच मी यांना तीनशे एक च्या पेशंटला म्हणजेच डॉ सहस्रबुद्धेंना ओटी मध्ये घ्यायला सांगितलेय...
शुद्धीत आलेल्या रेवतीला काहीच कळेना. त्याही स्थितीत तिने दिवाकरकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. दिवाकरने तिला हातानेच खुणावले..... आई ऑपरेशन एकदम मस्त झालयं. आता थोडे दिवस इथे रहायला लागेल. मग तु एकदम पुर्वीसारखीच ठणठणीत होशील..... आई, बाबा, येतो मी....... पराग नर्सला काही सुचना देवून निघाला. पाठोपाठ नर्सही गेली. 
.... अहो हा काय प्रकार आहे..... रेवतीने विचारले..... रेवती, अग, डॉ सहस्त्रबुद्धेंनी तुझे ऑपरेशन करायला सुरुवात केली, आणि त्यांनाच ॲटॅक आला. ते खाली कोसळले. ज्युनिअर डॉक्टरांनी त्यांना बाजुच्या रुममध्ये नेऊन बेडवर झोपवले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना स्टेबल केले. पण तुझे ऑपरेशन कोण करणार हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा होता. दुसरे कोणी डॉक्टरही अॅव्हेलेबल नव्हते. तुला अनास्थेशिया दिलेला होता. ऑपरेशनला सुरुवातही झालेली होती. अशा पारस्थितीत मग ओटी च्या बाहेर उभ्या असलेल्या परागलाच तुझे ऑपरेशन करावे लागले. 
रेवती अग परमेश्वरानेच तुझ्या पदरात श्रीकृष्णाला घातले. पण तुला काही यशोदा होणे नाही जमले. तु त्याला नेहमीच आश्रितासारखे वागवलेस. मुल आईच्या ऋणातून कधीही उतराई नाही होऊ शकत. पण आश्रिताला आश्रयदात्याच्या ऋणातून मुक्त व्हावेच लागते. कदाचित म्हणून नियतीनेच, तुझ्या ऋणातून उतराई होण्याची संधी त्याला दिली असावी.....
 रघुनंदन.  ✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...