मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2601. पाप आणि पुण्य

  गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती.ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला डॉ. जगदाळे बसले होते. मागील बाजूला त्त्यांची पत्नी विजया आणि मोठी मुलगी अश्विनी बसली होती. सर्वजण उसासे टाकत होती. डॉ. सतत मोबाईलवर कुणाशीतरी बोलत होते. मागील बाजूला अश्विनी पण मोबाईलवर हळूहळू बोलत होती.. विजयाबाई फक्त हुंदके देत होत्या..
डॉ. जगदाळे यांच्या मुलाला.. हेरंबला ऍक्सीडेन्ट झाला होता.त्याच्या कॉलेजवरुन रूमवर येताना मोटरसायकल स्लिप झाली होती.. आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली त्याचे पाय चिरडले होते. तो रुबी नर्सिंगमध्ये ऍडमिट होता.. आणि तातडीचे ऑपरेशन सुरु होते..
रात्री विजयाबाई आणि अश्विनी जेवत असताना पुण्याच्या पोलीसस्टेशनवरुन फोन आला.. विजयाबाई तर बेशुद्ध पडल्या.. रडत रडत अश्विनीने आपल्या वडिलांना बातमी कळवली.. तेंव्हा ते मित्राबरोबर ड्रिंक्सची मजा घेत होते. त्यानी पुण्याला फोन लावले.. त्त्यांचे अनेक जुने सहकारी डॉक्टर्स पुण्यात होते.. त्याच्याशी संपर्क करुंन त्याना रुबीमध्ये जायला सांगितले आणि ते घरी आले..
त्त्यांचा ड्रायव्हर जयदेव आला होता.
भराभर घर बंद करून तिघे गाडीत बसले. गाडी चेंबूरच्या पुढे आली आणि डॉ. देशमाने यांचा फोन डॉ. जगदाळे यांना आला..
'डॉ. मी देशमाने बोलतोय..
'बोला.. पोचलास काय तू रुबीमध्ये? काय परिस्थिती आहे?
'आत ऑपरेशन सुरु आहे.. मुख्य सर्जन स्वतः ऑपरेशन करत आहेत,, या हॉस्पिटलमधील अजून दोन सर्जन त्याना मदत करत आहेत..
'पण हेरंबची काय स्थिती आहे?
'सुदैवाने त्याच्या ब्रेनला काहीही इजा झालेली नाही.. त्यामुळे तो शुद्धीत आहे, पण पाय ट्रकखाली गेल्याने त्याला खूप वेदना होत होत्या.. पण आता त्याला कंपोझचे इंजेकशन दिले आहे.. शिवाय पेनकिलर पण दिले आहे.. त्यामुळे..
'कसा आहे माझा बाळ? एव्हडावेळ साडीचा पदर तोंडात बोळ्यासारखा घेऊन रड आवरलेल्या विजयाबाईंनी हुंदके देत देत विचारले..
'आई.. आता देशमानेकाका म्हणाले ना त्याला झोपवून ठेवलंय म्हणूंन आणि आता ऑपरेशन सुरु केल आहे.. तू रडू नकोस.
आपलं रडू आणि अश्रू आवरत अश्विनी म्हणाली.
गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती.. कितीही घाई केली तरी अजून दोन तास लागणार होते.. रडून रडून विजयाबाई सुन्न होऊन बसल्या होत्या.. पुढील बाजूला बसलेले डॉ. सुद्धा मनातल्या मनात रडत होते.. पण बाहेरून दाखवत नव्हते. अश्विनी विचार करत होती.. माझ्या आयुष्याची दुर्दषा झालीच आहे.. आणि परत सर्वांच्या लाडक्या हेरंबवर आलेले हे संकट?
अश्विनीच्या डोळ्यसमोर मिलिंद आला.. तिचा नवरा.. तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा.आपल्या मनात नसताना बाबांनी आपले लग्न त्याच्याशी लावले.. लग्न लागले आणि दोन दिवसात आपल्याला कळले तो पुरुषच नव्हता. मोठा धक्का होता. त्याचे म्हणणे डॉक्टरी उपाय सुरु आहेत.. म्हणून खोटे हसू तोंडावर आणुन दिढवर्षे आपण राहिलो त्या घरात... पण काहीच प्रगती नाही हे पाहून तो नवरा आणि ते घर सोडले. आईला मोठा धक्का.. बाबा चिडले आपल्या मित्रावर पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. आपले आयुष्य मात्र उध्वस्थ झाले..
आणि आज हेरंब? काय चालले आहे?
मध्यरात्रीनंतर गाडी पुण्यात शिरली आणि थोडयावेळात रुबी नर्सिंगजवळ आली.. डॉ. देशमाने वाट पाहतच होते...
'अजून ऑपरेशन सुरूच आहे.. आपण वर जाऊ..
ती तिघ आणि डॉ. देशमाने ऍक्सीडेन्ट वार्ड मध्ये पोचले. रात्री तीन वाजता मुख्य डॉक्टर बाहेर आले..
थोडयावेळाने त्यानी डॉ. जगदाळेना भेटायला बोलावले.. नको म्हंटले तरी विजयाबाई केबिनमध्ये गेल्याच.. अश्विनी पण सोबत होती..
' डॉ. जगदाळे.. मला कळले तुम्ही डॉक्टर आहात.. त्यामुळे तुम्हाला कल्पना आहेच.. तुमच्या मुलाचा जीव वाचला आहे पण त्याचे पाय..
'पाय कसे आहेत डॉक्टर? विजयाबाईंनी जोरात विचारले.
'मला सांगायला वाईट वाटते ... की त्याच्या दोन्ही पायाचा चुरा झाला होता, त्यामुळे..
'त्यामुळे काय डॉक्टर?
'पाय कापावे लागले दोन्ही.. पुढे त्याच्यातून मार्ग काढता येईल.. डॉक्टर तुम्हाला माहित आहेच.. जयपूर फूटने चालू लागेल.. पण सध्या मात्र..
काय कळायच्या आत विजयाबाई खाली कोसळल्या..
'आई.. आई करत अश्विनी आईला जाग करू पहात होती.. पण तिची आई बेशुद्ध झाली.
अश्विनीची आई खुर्चीवरून छाती दाबत खाली पडली हे पहाताच अश्विनी आणि जगदाळे तिच्याजवळ धावले, त्याचबरोबर त्या केबिनमधील बाकी डॉक्टर्स धावले.. एकाने नाडी पाहिली.. दुसऱ्याने ब्लडप्रेशर चेक केले आणि धावत व्हीलचेअर आणली आणि आयसीयू मध्ये आणले.. मुख्य डॉक्टर आले.. त्यानी कार्डीओग्राम घेतला आणि छातीमध्ये तीन इंजेकशन दिली.
     अश्विनी डोक्याला हात लाऊन बसली होती. काल रात्री तिच्या भावाला अपघात झाला होता, त्याचे दोन्ही पाय कापावे लागले होते आणि मध्यरात्री आईच्या हृदयाला झटका बसला होता.. तिची तब्येत नाजूक होती.
दुसऱ्या दिवशी मुख्य डॉक्टरनी विजयाबाईच्या आणखी टेस्ट केल्या आणि बायपास करायची गरज असल्याचे सांगितले.
आठ दिवसांनी त्याच हॉस्पिटलमध्ये विजयाबाईची बायपास झाली. त्याच हॉस्पिटलमध्ये हेरंब पण उपचार घेत होता.. त्याला आता कुबड्या देण्यात येणार होत्या.
  डॉ. जगदाळे चिंतेत होते.. आयुष्यभर ज्या कुटुंबासाठी आपण धडपडलो.. बऱ्या आणि बुऱ्या मार्गाने पैसे जमा केले.. मुंबईत श्रीमंतवस्तीत तीन मोठे फ्लॅट घेतले.. सोनेचांदी, गाड्या, बँकबॅलन्स सर्व काही होते.. पण.. आपण हे वैभव योग्य मार्गाने जमवले का? आपण DHO( डिस्ट्रिक हेल्थ ऑफिसर ) असताना औषध खरेदीत.. बरेच पैसे कमिशन मिळविले.. त्या दोन नंबरच्या पैशामुळे तर आपल्या कुटुंबाला त्रास होतोय का?
अश्विनीची झोप उडाली होती... तिचे वैवाहिक आयुष्य संपले होते, तिच्या नवऱ्यापासून तिला वेगळे व्हायचे होते.. त्याचा विचार सुरु असताना भावाला अपघात आणि आईची बायपास..तिचे बाबा अनैतिक पद्धतीने पैसे जमा करत होते... आईला ते आवडत नव्हते... ती वारंवार नवऱ्याला सावध करत होती.. पण तिचा नवरा ऐकत नव्हता..
एक महिना हॉस्पिटलमध्ये राहून हेरंब कुबड्याघेऊन घरी आला.. विजयाबाई बायपास करून नाजूक तब्येत सांभाळत घरी आल्या.. दोन खोल्यात दोन पेशंट. डॉ. जगदाळेची पैशाची गुर्मी उतरली होती. ज्या कुटुंबासाठी त्यानी पैसे मिळविले होते.. त्यापैकी दोघे बेडवर होते आणि कन्या...
तिचे वैवाहिक जीवन अर्ध्यावर थांबले होते..हे कुणामुळे? आपल्यामुळे?
    जगदाळेच्या कुटुंबातील वातावरण गढूळ झाले होते.घरात कामाला माणसे होती.. पैसे होते.. समृद्धी होती.. पण सुख नव्हते.
डॉ. जगदाळे याचे पिणे सध्या वाढले होते. पूर्वी त्यान्च्या पिण्याला त्यांची पत्नी अडथळा आणत होती.. पण आता तीच बेडवर आणि कुटुंबातील सर्वांचीच काळजी.
अश्विनी धावपळ करत होती. आपले वैयक्तिक दुःख विसरून आपल्या आईची, भावाची काळजी घेत होती.
घरातील सर्वांकडे पहाता पहाता अश्विनीला थकायला होई.. शारीरिक आणि मानसीक.. त्यात तिला एका पुरुषाचा वाईट अनुभव आल्याने तिला समग्र पुरुषजातीबद्दल तिटकारा आला होता.. या परिस्थितीत तिची अपेक्षा होती, तिच्या वडिलांनी तिला आधार द्यावा.. पण तिचे वडील डॉ. जगदाळे डोळ्यात पाणी आणत होते आणि बाटली जवळ करत होते. 
    वीस वर्षाचा हेरंब बेडवर झोपून छताकडे पहात राही.. या वयात आपण अपंग झालो.. तर पुढील आयुष्य कसे जाईल?
एका बेडरूममध्ये विजयाताई झोपल्या होत्या.. त्यांना कमालीचा थकवा आला होता..शारीरिक आणि मानसिक.. लाडकी लेक वैवाहिक जीवनात फसली होती आणि मुलाचे दोन्ही पाय कापावे लागले होते.. कुटुंबाची अशी परिस्थिती का व्हावी? आपल्या नवऱ्यामुळे? प्रत्येक वेळी आपण सावध करत होतो, पण आपल्या नवऱ्याने जणू डोळयांवर पट्टी बांधली होती स्वार्थाची.त्या मिळणाऱ्या टक्क्याच्या पुढे त्याला काही दिसत नव्हते..
डॉ. जगदाळे यांच पिणे फार वाढले होते.. ते एकसारखे डोळे पुसत आणि ग्लास तोंडाला लावत.. अश्विनीला ही परिस्थिती बघवेना.. तिला आयुष्यभर आपल्या पित्याचा राग आलेला असे.
पण तिची आई तिला गप्प करी.. पण आता ती गप्प राहणार नव्हती..
      अशीच एक दिवस तिने आपल्या भावाला त्याची औषधे दिली.. मग दुसऱ्या खोलीत येऊन आईची औषधे दिली आणि ती ग्यालरीत आली.. तिने पाहिले तिचे वडील डॉ. जगदाळे शून्य नजरेने बाहेर पहात होते.. आणि एक एक घोट व्हिस्की पित होते.. तिने पाहिले दुपार पासून पिणे सुरु होते आणि बाटली खाली होत आली होती.   
   अश्विनीला संताप आला.. या आपल्या बाबाचे काय करावे तिला समजेना.. घरात तिघेजण अशा परिस्थितीत असताना हा माणूस दुःख झाल्याचे दाखवून बाटली संपवू लागला?
   तिने रागाने आपल्या बाबासमोरची बाटली बाहेर फेकून दिली. ती चिडली... रागाने बोलू लागली..
'आता रडून आणि दारू पिऊन काय उपयोग? मी लहान होते त्यावेळी पण आई कळवळून सांगत होती.. हे बरे नाही.. हे भोगावे लागेल आपल्याला... तुम्ही उस्मानाबादला 
DHO म्हणून बदलून गेलात आणि बिघडलात.. एक सिंधी औषध सप्लायर तुम्हाला भेटायला आला... जिल्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल ची औषध खरेदी तुमच्या हातात..पैशाची बंडले त्याने तुमच्या हातात कोंबली आणि तुम्ही त्याला ऑर्डर दिलात.. त्याने डुप्लिकेट इंजेक्शन्स पुरवली आणि मग एका लहान PHC हॉस्पिटल मध्ये दोन मुले दगावली. बिचारी ती गरीब आईबाबा ची मुले... कुठे तक्रार करणार?  रडली दोन दिवस आणि गप्प बसली. त्या काळी सोशल मीडिया नव्हती की आजच्या सारखी वर्तमान पत्रे नव्हती..फिट येऊन दोन मुले दगावली असा तेथल्या डॉक्टरनी रिपोर्ट लिहिला कारण तो डॉक्टरपण तुम्ही दिलेल्या पैशाने तृप्त झाला होता... आई हे पहात होती.. तिला समजत होते.. आणि मग तुमची अशी औषध खरेदी सुरु झाली. एन्टीबीओटीकच्या कॅपशुल मध्ये हळद पावडर दिसू लागली.. कुणीतरी जालना भागात हे पेपरमध्ये लिहिले.. गुपचूप त्याचे खिसे गरम करून त्याचा आवाज तुम्ही गप्प केलात...
'पण अश्विनी.हे सारे मी तुमच्याच साठी करत होतो ना? तुम्ही दोघांनी चांगले शिक्षण घ्यावे.. चांगल्या घरात राहावे..
माझ्या आईला असले पैसे नकोच होते. एका वारकऱ्याची मुलगी ती.. ती तुमच्या पगारात खूष होती.. पण हे आयते मिळणारे पैसे तुमची नैतिकता बिघडवत होते.. दुर्दैवाने तुम्ही सहीसलामत सुटत होतात.
त्यामुळे गरज नसतानाही तुमची औषधंखरेदी वाढत होती. त्यातून मिळालेल्या पैशाने हे मुंबईतील प्लॅट्स.. गाड्या येत होत्या. तुमचे पाप वाढत होते. आई बेचैन झाली होती.. मग थोडे तरी पुण्य मिळावे याकरिता तिने तुमच्या भावाच्या मुलांना, बहिणीच्या मुलीला आपल्याघरी शिक्षणासाठी बोलावले आणि आमच्याबरोबर त्याना पण शिक्षण दिले. ती माझी चुलत भावन्डे हुशार निघाली आणि आता स्वतःच्या पायावर उभी राहिली. आई मंदिरात फारशी जायची नाही पण अनाथाश्रमात जायची आणि ज्या मुलांना शिक्षणासाठी ज्या गोष्टीची गरज असेल ते पुरवायची. तुमच्या पापाचे पैसे असे वापरून ती पुण्य मिळवायचा प्रयत्न करायची.
तुमचे पाप जास्त झाले त्यामानाने आईचे पुण्य कमी पडले असेल, त्यामुळे आपल्या कुटुंबाची अशी वाताहात झाली. तुम्ही खरेदी केल्यामुळे किती लोक आंधळी झाली असतील, बहिरी झाली असतील.. काहींच्या किडन्या फेल झाल्या असतील... आठवा उस्मानाबाद मधील दोन बालक.. भेसळ इंजेकशनमुळे फिट्स येऊन ती गेली. सांगलीतील एक आजोबा.. ब्लडप्रेशरच्या गोळया घेत असूनही त्याचे ब्लडप्रेशूर कमी झाले नाही आणि शेवटी ते गेले. किती मुलांचे डायरीय कमीच झाले नाही..शेवटी अंगातील ताकद संपून त्यानी राम म्हंटले.. आठवा.. आठवा..
'पुरे पुरे अश्विनी.. मला मागची आठवण नको..
'तुम्हाला आठवण नको मग त्या पेशंटच्या नातेवाईकांनी काय केल असेल.. एव्हडे करूनही तुम्ही कधी सापडला नाहीत.. निवृत्त होऊन सरकारी पेन्शन घेत आहात.
त्या निरापराध लोकांचा आक्रोश आम्हाला भोवतोय.. माझी, माझ्या आईची किंवा हेरंबची काही चूक नसताना दुर्दैवाचे फटके आम्हाला बसत आहेत... तुमच्यामुळे.. तुमच्यामुळे..
'चूक झाली ग अश्विनी.. कैफ चढलेला मला.. पैसे कमवण्याचा, एका पोस्टमनचा मुलगा मी, कष्टाने डॉक्टर झालो खरा.. पण हॉस्पिटल काढण्यासाठी पैसे नव्हते म्हणून सरकारी नोकरी पकडली. पण आपले  क्लासमेंट हॉस्पिटल थाटून एव्हडे पैसे मिळवितात याचे वैष्मय वाटे मला.. मग DHO या पदावर आलो आणि पैसे कमवण्याचे दार मला दिसलें.. तुझी आई नको नको म्हणत असताना मोह आवरेना.. आणि..
'त्या मोहापाई मन आवरेना.. प्रॉपर्टीज, सोने.. म्हणजे सुख वाटलं तुम्हाला बरोबर?
'होय ग..
'पण तुम्हाला नियतीने धडा दिला.. तुमच्या मुलीला सुख नाही.. मुलगा अपंग केला.. पत्नी अंथरुणाला खिळली..
'त्याचेच मला दुःख आहे.. म्हणून मी..
'म्हणून दारू प्यायची नसते.. खूप पाप केलात ना.. त्याला उतारा म्हणून पुण्य करा..
'काय करू मी?
'तुम्ही डॉक्टर आहात बाबा.. सर्जन.. तुमच्या शिक्षणाचा गरिबांसाठी उपयोग करा.. आपल्या पालघर जिल्ह्यात आदिवासी पाडे आहेत, कोणी डॉक्टर तेथे पोचत नाही.. पाहिजे तर मी माझ्या मैत्रिणीना सांगते, त्या भागात त्या काम करतात.. त्या भागात डॉक्टर्सची गरज आहे.. तुम्ही तिकडे जा.. आईची किंवा हेरंबकडे लक्ष दयायला मी आहे.. तुम्हाला पुण्य मिळेल.. त्यानी तुमचे पाप थोडीतरी कमी होईल.
'मी जाईन अश्विनी.. मी जाईन.. मी त्या गरीब पेशन्टवर उपचार करीन. मला जर त्याने समाधान मिळतं असेल तर मला दारूची काहीच गरज नाही.. 
ठीक आहे.. माझी आई नेहेमी म्हणायची ते वाक्य..'या जन्मीचे पाप या जन्मीच फेडायचं असत..
        
प्रदीप केळुस्कर 9422381299 / 9307521152
17/01/ 26.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...