मला नेहमी वाटतं की बाह्य सौंदर्य क्षणिक असतं. ते काळाच्या प्रवाहात बदलत जातं, कधी कमी होतं, कधी निस्तेज होतं, तर कधी पूर्णपणे हरवूनही जातं. पण माणसाचं खरं मोल ठरतं ते त्याच्या मनामुळे, विचारांमुळे आणि वागणुकीमुळे. सुंदर दिसणं ही एक देणगी असू शकते, पण त्यावरच माणसाची किंमत ठरवणं योग्य नाही. कारण चेहरा पाहून माणूस ओळखता येत नाही, पण त्याच्या स्वभावातून तो कायम लक्षात राहतो.
समाजात आजही सौंदर्याला फार मोठं स्थान दिलं जातं. सुंदर चेहरा म्हणजे यश, प्रेम, मान सन्मान यांची हमीच जणू एखादी व्यक्ती सुंदर दिसत नसेल तर तिला अनेकदा दुर्लक्षित केलं जातं. तिच्या विचारांकडे, तिच्या संवेदनशीलतेकडे किंवा तिच्या प्रामाणिक प्रयत्नांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. ही मानसिकता खूप वेदनादायक आहे. कारण ती माणसाला त्याच्या बाह्य रूपापुरतंच मर्यादित करते.
खरंतर सौंदर्य ही संकल्पना खूप व्यापक आहे. ती केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीपुरती मर्यादित नाही. एखाद्याचं बोलणं, वागणं, दुसऱ्याच्या दुःखाला समजून घेण्याची क्षमता, वेळप्रसंगी कोणासाठी तरी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवण्याची तयारी हेदेखील सुंदरतेचेच प्रकार आहेत. पण दुर्दैवाने आपण या सुंदरतेकडे फारसं पाहत नाही.
काहीजण असेही बोलतात, “जो सुंदर नाही, त्याला सौंदर्याचं महत्त्व काय कळणार.” ही टिप्पणी वरवर साधी वाटते, पण तिच्या मागे असलेली मानसिकता खूप टोचणारी असते. जणू सुंदरतेबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त सुंदर दिसणाऱ्यांनाच आहे. पण खरं तर माझ्या मते सौंदर्याच महत्त्व दिसण्यात नाही तर असण्यात आहे. कारण कितीही सुंदर असलं तरी स्वभाव गुण हा कायमस्वरूपी असतो...
बाह्य सौंदर्य हे क्षणिक पाळण्यासारखं असतं. लहानपणी ते डोलतं, तरुणपणी ते झुलतं आणि काळ जसजसा पुढे जातो तसं ते हळूहळू थांबतं. पण स्वभाव हा कायमस्वरूपी असतो. तो माणसाच्या आयुष्यभर सोबत असतो. चेहऱ्यावरच्या रेषा बदलतात, रंग बदलतो, पण मनातल्या भावना, विचारांची खोली आणि वागणुकीची शिस्त जर चांगली असेल तर माणूस कायम सुंदरच राहतो.
खऱ्या आयुष्यात आपण पाहतो की काही लोक दिसायला फारसे आकर्षक नसतात, पण त्यांच्यासोबत वेळ घालवताना मन शांत होतं. त्यांचं बोलणं दिलासा देतं, त्यांची उपस्थिती सुरक्षित वाटते. उलट काही लोक अतिशय सुंदर असतात, पण त्यांचा अहंकार, असंवेदनशीलता किंवा खोटेपणा मनाला त्रास देतो. अशा वेळी प्रश्न पडतो खरं सौंदर्य नेमकं कुठे आहे?
व्यक्तिमत्त्व हीच माणसाची खरी ओळख असते. संकटात तो कसा वागतो, यशात तो किती नम्र राहतो, अपयशात तो किती संयम ठेवतो यातून त्याचं सौंदर्य प्रकट होतं. संवेदनशील माणूस स्वतः सुंदर असतोच, पण तो आजूबाजूचं जगही सुंदर करतो. त्याची माणुसकी इतरांच्या जखमांवर फुंकर घालते.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात बाह्य सौंदर्याला अजूनच अवास्तव महत्त्व मिळालं आहे. फिल्टर, एडिटिंग, कृत्रिम प्रतिमा यामुळे सौंदर्याची एक खोटी मोजपट्टी तयार झाली आहे. अनेक तरुण-तरुणी स्वतःला त्या मोजपट्टीवर मोजून कमीपणाची भावना बाळगतात. पण हे विसरतात की खरी किंमत लाईक्समध्ये नसते, तर माणसाच्या चारित्र्यात असते.
आपण जर समाज म्हणून व्यक्तिमत्त्व, सच्चेपणा आणि संवेदनशीलतेवर प्रेम करायला शिकलो, तर अनेक समस्या आपोआप सुटतील. माणसं एकमेकांना चेहऱ्याऐवजी मनाने स्वीकारतील. तेव्हा नात्यांमध्ये खोली येईल, विश्वास वाढेल आणि माणुसकी टिकून राहील.
सुंदर दिसणं चांगलं आहे, त्यात गैर काहीच नाही. पण सुंदर दिसण्यावरच आपली किंमत ठरवणं धोकादायक आहे. कारण जेव्हा सौंदर्य कमी होतं, तेव्हा आत्मविश्वासही कमी होतो, जर तो फक्त बाह्य रूपावर आधारलेला असेल. पण ज्याचा आत्मविश्वास त्याच्या विचारांवर, मूल्यांवर आणि स्वभावावर उभा असतो, तो माणूस कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत ताठ उभा राहतो.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, चेहरा पाहून प्रेम करणं सोपं असतं, पण स्वभावावर प्रेम करणं हीच खरी परिपक्वता आहे. सौंदर्य डोळ्यांना भुरळ घालतं, पण स्वभाव मनावर राज्य करतो कायमस्वरूपी.
©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी,९७६७३२३३१५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा