नीता आज नेहमीच्या आठ तीसच्या लोकलला जाऊन बसली. बाजूला लिमये बाई येऊन बसल्या. लिमये बाई म्हणाल्या,"काय नीता,आहेस कुठे? चारदिवस दिसलीच नाहीस?"
नीता म्हणाली,"अग ताई,माझं लग्न ठरलं. त्यासाठीच काकांनी शुक्रवारी रात्री आम्हाला बोलावून घेतलं. मी, आईबाबा व भाऊ आमच्या गाडीने गेलो. चिराग वझे, नाव त्या मुलाचं. मुलगा दिसायला वगैरे चांगला आहे.पण...
ताई त्याच्या घरात त्याचे आईवडील व लहान भाऊबहीण आहेत. एकवेळ मी रत्नागिरीला बदली करुन घेईन. पण एवढ्या माणसांचं करायचं म्हणजे टेंशनच आलंय मला. त्यात हल्ली एकएक असं ऐकतेय मी नेटवर, मैत्रिणींच्या गप्पांतून की सासुबाई म्हणजे एक चेटकीण असेल असं वाटत होतं मला. पण पाहताक्षणी गच्च भरलेल्या आनंदाच्या झाडासारख्या वाटल्या त्या मला. त्यांनी मला जवळ बसवलं. माझ्या शिक्षणाची, आवडीनिवडीची चौकशी केली. मला फार त्रुप्त,समाधानी वाटल्या त्या."
लिमये ताई म्हणाल्या,"अगं मग चांगलंच आहे की. घोडं अडतय कुठे?"
नीता म्हणाली,"ताई, माझ्या हाफिसातल्या मैत्रिणी म्हणतात की कशाला ती सासू, सासरे, दिर, नणंद असली लचांड गळ्यात ओढून घेतेस. दुसरा एखादा विनापाश बघ. ह्या सासवा, नणंदा पहिल्या अशाच वागतात. नंतर त्यांचे रंग दाखवतात."
लिमये ताई म्हणाल्या," अगं आजकाल सासू या पात्राबद्ल एवढी नकारात्मकता भरवून ठेवली आहे की नव्या सुनेला आपली सासू म्हणजे एखादी हडळ,चेटकीण वाटली तर नवल न लगे. स्त्रीच स्त्रीची बदनामी करते. आमच्या मजल्यावरची सुलू अचानक आजारी झाली. दोन्ही किडन्या फेल म्हणून सागितलं डाक्टरांनी. तिच्या सासूने लगेच स्वत:ची तपासणी करुन घेतली व रिपोर्ट फेवरेबल येताच आपली किडनी आपण सुनेस देण्यास तयार आहोत असे डाक्टरांना सांगितले. तिथल्या सगळ्या स्टाफच्या डोळ्यांत पाणी तरळलं. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. दोघी गोडीगुलाबीने रहात आहेत.
माझ्या गावी एक सून, अवघं दोन महिन्याचं बाळ असताना अचानक देवाघरी गेली. पण तिच्या सासूने त्या बाळाला जीवापाड जपलं. नणंदेने आपलं दूध पाजून मोठं केलं. असली चांगली उदाहरणं कोणी सांगत नाहीत. वाईटच पसरवतात. त्याच्या वडिलांचं दुसरं लग्नसद्धा झालं. नवीन आईही फार चांगली आहे. तिला एक मुलगी आहे. पण हा गुलाम आपल्या आजीलाच आई संबोधतो.
माझ्याच सासुबाईंचं बघ. करतात चिडचिड माझ्यावर. म्हातारवयात होतं तसं. मी दुर्लक्ष करते. पण आज श्रावणी सोमवार. मला केळ्याचा शिरा आवडतो म्हणून काल संध्याकाळी जाऊन वेलची केळी घेऊन आल्या व मला डब्यात शिरा भरुन दिला. आत्ता सांग मला मी त्यांच्या ओरड्याकडे लक्ष देऊ की त्यांनी मायेने दिलेला शिरा खाऊ व घरी जाताना त्यांचे आवडीचे कानिटकरांकडचे बटाटेवडे व सोनचाफी घेऊन जाऊ?
नीता अगं माणसं वाईट नसतात. परिस्थिती वाईट असते. कधीकधी आजारपणाने किंवा सासूने केलेल्या छळाचा वचपा काढण्यासाठी काही सासवा असे करतात. पण आपल्या प्रेमळ वागणुकीच्या सहाय्याने त्यांच्या मनावरील जळमटं आपण सुना काढून टाकू शकतो."
नीता म्हणाली ,"खरंच ताई किती छान समजावलतं. मी घरी गेलेकी बाबांना माझ्या होकाराबाबत वझे कुटुंबियांना कळवायला सांगते. हो आणि ताई मला ते रुखवताचं सगळं रुमाल, तोरण वगैरे तुम्ही शिकवणार आहात."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा