तो वेड्यासारखा एक एक सोन्याचा मणी वेचत होता. पलंगाखाली, खुर्चीखाली, टेबलाखाली हात घालून शोधत होता. खिशात टाकत होता. मधूनच बडबडत होता, ”सीमे, तुला सांगितलं होतं आता हे मणी काढायचे नाही गळ्यातनं ! प्रत्येक प्रसंग अजून चांगला साजरा झालाय या मण्यांमुळे पण आता नाही. हे मणी तुझ्या गळ्याचीच शान वाढवणार ! का काढलेस तु हे आता?”
आजूबाजूची लोकं बधीर होऊन त्याच्याकडे पहात होती. ज्यांना त्याच्या बडबडीचं कारण माहित होतं ती हळहळत होती. सीमाचा निष्प्राण देह बाजूला पडला होता आणि रमेश शोकावेगाने मणी वेचत जणू त्यांच्या सहजीवनाचे चांगले वाईट प्रसंगच वेचत खिशात भरत होता.
”मी हे मणी कुणालाच देणार नाही, आत्ता परत ओवून आणतो. तू लगेच घाल गळ्यात. कधीच परत काढायची भाषा बोलू नकोस.” तो भ्रमिष्ठासारखा बडबडत सुटला !
महादूनं मोठ्या प्रयत्नाने अश्रू रोखत सीमाची पाठवणी केली. आईविना मोठ्या झालेल्या लेकीच्या लग्नाचा खुप घोर धरला होता महादूनं. पण देवकृपेनं सगळं सुरळीत पार पडलं होतं. दोन पोते बुंदी गाळली होती लग्नात. गावातल्या एकुण एक घराला चूलबंद जेवण केलं होतं खुशीखुशीने. डोक्यावर थोडं कर्ज झालंच होतं पण लेकीच्या आनंदापुढे आणि इच्छेपुढे ते कमीच भासत होतं. सीमाची एकच इच्छा होती, ”बाबा मला काही देऊ नका. कपडे कमी द्या पण पाच तरी सोन्याचे मणी द्या गळ्यात घालायला.”
बापाचं काळीज ! पाचच्या जागी पंचवीस मणी केले सोन्याचे. सोनपावलांनी सीमाचा नव्या घरी प्रवेश झाला. रमेशची परिस्थिती पण साधारणच,पण माणसं चांगली ! हळूहळू सीमा चांगली रूळली नविन घरात. एकदा सासू पाय घसरून पडली. मोठं ॲापरेशन सांगितलं. खर्चही बराच लागणार होता. थोडी तजवीज झाली. थोडी कमी पडली. सीमाने मोठ्या मनाने गळ्यातले सोन्याचे मणी रमेशच्या हाती दिले.
“हे घ्या, सध्याचं भागवा.”
“नको, तुझं स्त्रीधन, शिवाय तुझ्या वडिलांनी दिलयं. राहू दे. मी बघतो काहीतरी.”
“मी अन् आपल्या घरातली माणसं वेगळी थोडीच आता. घ्या, वाटल्यास नंतर सोयाबीन झाली की चार मणी शिल्लक द्या, मग तर झालं.”
मस्त पिक आलं सोयाबीनच पंचवीस चे पस्तीस मणी झाले. संसारही फुलू लागला. गोड कन्येचं आगमन झालं. नव्या लक्ष्मीचंही आनंदाने स्वागत झालं. आता नणंदेच्या लग्नाचे वेध लागले.परत खर्चाला आधार देत सीमाने सोन्याचे मणी गळ्यातून काढत रमेशकडे सोपवले. तीन वर्षांनी परत मण्यांची संख्या वाढवून रमेशने सीमाला गळ्यातलं गंठण करून गळ्यात घातलं.सोन्याचे मणी असेच दरवेळी परिस्थितीचा आधार बनून राहू लागले. अडचणीच्यावेळी कामी येत. चांगले दिवस आले की नव्या झळाळीने परत सीमाच्या गळ्यात समाधानाने रूळत ! एव्हाना सगळ्यांनाच सोन्याच्या मण्यांची सीमाची हौसही माहीत झाली होती आणि वेळप्रसंगी काढून देण्याचं मोठेपणही माहित झालं होतं. त्यामुळे मण्यांच्या संख्येत वाढच होत होती. स्वतःचं बाळंतपण, नणंदेचा बाळंतविडा, दिराचं लग्न, मुलींची शाळा आणि फीस, सासूसासऱ्यांची आजारपणं या सगळ्यांनाच मण्यांमुळे खर्चाला आधार मिळाला होता. मुलीच्या लग्नात रमेशने मुलीसाठी तर मणी केलेच होते पण सीमाने प्रत्येकवेळी दिलेल्या आधाराची शिकवण देउनच मुलीची सासरी पाठवणी केली. सीमालाही सोन्याच्या भरपूर मण्यांचं गंठण देत. भावुक होऊन म्हणाला,
”सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आता ! आता हे मणी कायम तुझ्या गळ्यातच रहातील. देव करो आणि त्यांना विकायची, गहाण ठेवायची पाळी न येवो. तु तुझ्या या मण्याच्या रुपाने मला वेळोवेळी किती समंजसपणे साथ दिली हे तुला नाही कळणार.”
सगळं सुरळीत चालू होतं. पण म्हणतात ना सुखाला कुणाची तरी दृष्ट लागतच असते. इतक्या दिवस गुण्यागोविंदाने एकत्र रहाणारे दिर आणि जाऊ वेगळं रहायचं म्हणू लागले. जमिनीचा तुकडा अर्धा झाला. घरातही एक भिंत उभी राहिली. पण जाऊची नजर वाटण्या झाल्यातरी सीमाच्या सोन्याच्या मण्यांवरून काही हटेना. झालं. वाद होऊ लागले.
“ते तिचे माहेरचे मणी आहेत.”
“माहेरचे तर पंचवीसच होते. आता शंभरावर आहेत.”
“तिने अडचणीत प्रत्येकवेळी काढून दिलेत म्हणून वाढलेत ते.”
“जाऊ द्या नं. मण्याचं काय इतकं, तुमचं प्रेम मला मण्यांपेक्षा जास्त मोलाचं. देते मी माझे पंचवीस सोडून.”
“नाही, ते तू गळ्यातून काढायचे नाहीस. यांच्याही लग्नात, बाळंतपणात कामी आलेत ते.”
बोलाचाली वाढत होती. अचानक सीमा चक्कर येऊन पडली. गळ्यातले मणी इतस्तः विखुरले. सगळे धावले. पण सीमा समाधानाने चीरनिद्रा घेत होती आणि रमेश भ्रमिष्ठासारखा एक एक मणी शोधत होता. त्याला भानावर आणायची हिम्मत कुणालाच होत नव्हती !
©️रश्मी.#rashmi lahoti
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा