एका वेश्यालयाच्या गर्द गल्लीतील कोपऱ्यात, तिचे डोळे दररोज वेगवेगळ्या पुरुषांकडे बघत. हसत, पण आतून मरणारा आत्मा लपवत असत.
ती – "सुजाता" दिसायला सुंदर, पण तिचं जीवन काळाने कुरतडलेलं. लाखो रुपयांची कमाई करूनही, तिचं जीवन केवळ नाण्यांच्या खणखणाटाने भरलेलं, पण माणुसकीच्या एका शब्दाने रिकामं.
एक दिवस त्या गल्लीच्या बाहेरून एक टाय घातलेला, कोटातला सरकारी अधिकारी तिला पाहतो.
सगळ्यांना तिच्याकडे एक "सेवा" म्हणून पाहायची सवय होती पण त्याने तिच्या डोळ्यातलं एक "जीवंतपणं" पाहिलं.
त्याने तिला म्हटलं
"सुजाता, या पापाच्या दलदलीतून बाहेर ये. मी तुला सन्मानाने घर देईन, समाजात मानाचं स्थान देईन. तू फक्त 'हो' म्हण."
ती खळखळून हसली होती तेव्हा. पण त्या हसण्यामागे एक अविश्वास होता समाजाच्या खोट्या दयाळूपणावर.
तरीही, कोणीतरी आपल्याला "माणूस" म्हणून स्वीकारायला तयार आहे, या विचाराने ती बधली आणि त्यांनी लग्न केलं.
पण... स्वप्नं जेवढी सुंदर, तितकीच त्या मागची वास्तवाची जळती बाजू होती..
एक काळ गेला साडीतील ती सुजाता आता ऑफिस पार्टीत त्याच्या सोबतीला दिसू लागली. समाजात तिला मान मिळू लागला पण तिचा आत्मा अजूनही कापसासारखा हलका आणि भितीदायक होता. तिने एक नवा अध्याय सुरू केला होता – पण जुन्या पुस्तकाच्या पानांना वास सुटलेला होता.
एक दिवस…
बातमी आली
"IAS अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला गेला. चौकशीत नाव बदनाम झालं. समाजात थू थू झाली."
प्रत्येक बातमीत, त्याच्यासोबत सुजाताचं नाव डकलं गेलं.
"ती वेश्या होती म्हणून त्यानं भ्रष्टाचार केला!" – असंही कोणी बोललं.
सर्वांनी तिच्या नव्या आयुष्याला परत जुन्या ओळखीच्या काळ्या डागाने भरलं.
ती जेलमध्ये गेली एक भेट घेण्यासाठी.
तो हतबल, नजरेला नजर मिळवू शकत नव्हता.
ती थांबली आणि म्हणाली
"तू म्हणाला होतास, मी तुला सन्मानाने जगवीन... पण तूच माझा स्वाभिमान लज्जास्पद केलास.
माझ्या जुन्या आयुष्यात शरीर विकत होते,
पण इथे – तू आत्मा विकलास...
मग सांग… मी चुकले कुठं?
जिथं होते तिथं निदान माझा खोटा मुखवटा नव्हता.
माझं आयुष्य कसंही असो, मी कोणावरही अवलंबून नव्हते.
पण तुझ्यासोबत येऊन मी माझं अस्तित्व गमावलं..."
तेवढं बोलून ती निघाली.
शेवटी वास्तव हेच सांगतं...
सन्मान हा कोणाच्या जात, व्यवसाय, भूतकाळावर अवलंबून नसतो.
तो व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर आणि मनाच्या शुद्धतेवर असतो.
जो स्वतः भ्रष्ट आहे, तो दुसऱ्याला स्वच्छतेचं नाटक फक्त काही काळ दाखवू शकतो.
पण सत्य उघड व्हायलाच हवं आणि एकदा उघडलं की त्याचं पांढरं वस्त्र पारदर्शक होतं…
म्हणून...
"प्रेम हेच सर्वस्व नाही.
ते जर खोट्या आधारावर, ढोंगावर, स्वार्थावर उभं असेल तर ते फक्त सुंदर गोंडस मृगजळ ठरतं."
संदीप चव्हाण

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा