भर पावसाळ्यात जून महिन्यात सारिकाची बदली मुलुंड येथे ब्रँचमॅनेजर म्हणून झाली. पावसाची रिपरिप, ट्रेनमधील गर्दी याने सारिका त्रासून गेली. कशीबशी वेळेत बँकेत पोचली. ब्रँचला गेल्यावर ग्राहकांची ओळख, कर्मचाऱ्यांची ओळख, कामाचे हॅण्डओव्हर यात जेवणाची वेळ कधी झाली हे तिला समजलेच नाही. तिने डब्बा आणलाच होता. आधीचे ब्रँचमॅनेजर, श्री गोरे ह्यांच्याबरोबर ती डब्बा खायला बसली. ग्राहकांची गर्दी ओसरली. आता दरवाजात फक्त 'ती' एकटी उभी होती. लक्ष जावं किंवा लक्षात राहावी अशी ती नव्हतीच. लांबूनच ती सारिकाला न्याहाळत होती. शेवटी शटर बंद करायची वेळ अली तेव्हा ती निघून गेली. ती कोण? हे सुद्धा सारिकाने विचारलं नाही, इतकी ती नगण्य होती. चार दिवसांनी गोरे सर गोरेगाव ब्रँचला, जिथे त्यांची बदली झाली होती, तेथे निघून गेले. ‘काही अडलं तर नक्की फोन करा’ असं सांगून गेले. जाताना एवढेच म्हणाले ‘त्यादिवशी ती दरवाजात उभी राहून तुमच्याकडे बघत होती, त्या बाईला उभी करू नका. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कुठचे तरी जुने पैसे मागत असते व त्रास देते’. मी सुटलो. सारिकाने फक्त 'हो' म्हंटल.
दुसऱ्या दिवशी पासून सारिकालाच ब्रॅन्चचे व्यवहार बघायचे होते. पावसामुळे जून, जुलै महिना कंटाळवाणा गेला. ग्राहक आणि बँकेचा धंदा दोन्ही कमीच होत. मात्र झोनची मिटिंग होऊन ब्रॅन्चच टार्गेट दिल गेलं. सारिकाने मार्केटिंग साठी वेगळी टीम बनवली आणि कामाला सज्ज झाली. आठ दिवस लख्ख ऊन पडलं. सारिका एका कर्मचाऱ्याला घेऊन काही मोठ्या ग्राहकांना भेटून आली. अशारितीने कामाला सुरवात झाली. ह्या ब्रॅन्चमध्ये स्त्री कर्मचारी जास्त होत्या. त्यामुळे साड्या, दागिने, ड्रेस, मुलबाळ हे विषय सतत चालू असायचे.
सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणपतीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज दिले.ते समोर ठेऊन काम कोणाला वाटून द्यायची ह्याचा सारिका विचार करत असताना कोणीतरी धाडकन दार उघडून आत आलं आणि धप्पकन समोरच्या खुर्चीवर बसलं. सारिकाने मानवर करून बघितलं तर ती 'तीच' होती. पाहिल्या दिवशी दाराकडे उभं राहून सारिकाला न्याहाळणारी. सारिकाने तिला नीट निरखून बघितलं. ती शरीराने कृश, काळीसावळी, गालावर देवीचे खडबडीत व्रण, चेहेर्यावर उदासीनतेची छटा असा तिचा चेहेरामोहरा होता. तिने पांढऱ्या केसांची बारीकशी वेणी घातली होती. वेणीला काळी रिबीन बांधली होती. अंगावर कॉटनची विटकी पण स्वच्छ क्रीम रंगाची साडी, काळ्या रंगाचा ढगळ ब्लाउज व पायात रबरी चप्पल असा एकंदरीत तिचा अवतार होता. तिला अशी अचानक केबिन मध्ये घुसलेली पाहून सारिका म्हणजे मी दचकलेच. बाहेरून सगळे कर्मचारी माझ्याकडे पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते. मी अनिच्छेनेच तिला विचारले काय काम आहे? ती म्हणाली 'माझे हरवलेले पैसे पाहिजेत'. मला काहीच समजेना. पैसे कधी हरवले? किती पैसे हरवले? पैसे कोणी हरवले? असे प्रश्न मी तिला पटापट विचारले. ती म्हणाली दहा वर्षांपूर्वी मी भरलेले पैसे बँकेने हरवले. मी तिला सांगितले पुरावा घेऊन ये आणि माझ्या कामाला लागले. ती तशीच बसून राहिली. मी तिला परत विचारले, आता काय राहील? पुरावा मिळाला की बँकेत ये. तिच्याकडे काहीही पुरावा नव्हता. बँकेचे पासबुक देखील नव्हते. मी तिला सांगितले बँकेचे पासबुक घेऊन ये मगच आपण बोलू आणि आता तू निघू शकतेस, मला खूप काम आहे. ती निराश होऊन निघून गेली. मी तिचे नाव माझ्या डायरीत लिहून घेतले. पासबुकच नसेल तर मी देखील काय करणार होते.
घरोघरी गणपती उत्सव दणक्यात पार पडले. सर्व कर्मचारी सुट्या संपवून कामावर रुजू झाले. कामाने जोर धरला. पंधरा दिवसात मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली ती बाई धाडकन दार उघडून आत आली आणि धप्पकन माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. हातातली विटक्या कापडाची पिशवी तिने माझ्या समोर उपडी केली. त्यात बऱ्याचशा पैसे भरलेल्या पावत्या होत्या व एक फाटके आणि भिजून पुसट झालेले पासबुक होते. माझ्या महत्वाच्या कामाच्या मध्येच या बाईने हा पसारा घातला होता. ती बाई मला म्हणाली घरात होत ते सगळं मी शोधून आणलं आहे. आता माझे पैसे द्या. मी चिडलेच, मी तिला म्हणाले, तू हे सगळं इकडेच ठेऊन जा. मला वेळ मिळाला की मी बघीन, ती बाई हुशार होती मला म्हणाली, 'मला याची पोचपावती द्या'. मी तिला सांगितलं, 'ह्या चिठ्या उचल, एका कागदावर सगळं व्यवस्थित लिही.त्याची एक प्रत काढून मला दे, मग मी त्या प्रतीवर तुला बँकेच्या शिक्यासह पोचपावती देते. शेवटी ती तो पसारा तसाच टाकून निघून गेली. ह्या वेळी आठवणीने मी तिचा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे असलेला जुना मोबाईल मी पिशवीतले जिन्नस माझ्या टेबलावर ओतताना टेबलावर पडलेला बघितला होता.
मी त्या पावत्या एका लोनच्या रिकाम्या डॉकेट मध्ये भरल्या आणि त्यावर त्या बाईचे नाव लिहून ते डॉकेट मी माझ्या खणात ठेऊन दिले.आठ दिवस मी त्या डॉकेट कडे ढुंकून देखील बघितले नाही. पण का कोण जाणे मला त्या बाईची रोज एकदा तरी आठवण येत असे. एका शनिवारी ग्राहकांची वर्दळ बंद झाल्यावर मी ते डॉकेट खणातून वर काढून टेबलावर ठेवले. कर्मचाऱ्यांना घरी जायला अजून एक तास होता. एका कर्मचाऱ्याला माझ्या केबिन मध्ये बोलावले. मी प्रथम त्या सगळ्या पावत्या डॉकेट मधून टेबलावर ओतल्या. मी आणि त्या कर्मचाऱ्याने त्या तारखे प्रमाणे लावून घेतल्या. ह्या पावत्या दहा वर्षा पूर्वीच्या होत्या.आमच्या ब्रान्चला एवढा जुना डेटा नव्हता. कर्मचाऱ्याने सरळ हात वर केले. 'मॅडम एवढा जुना डेटा अकौंट्स डिपार्टमेंटला ट्रान्स्फर झाला आहे. आता हे काही मिळणार नाही. त्या दिवशी इथेच ते काम थांबलं.
सोमवारी बँकेत आल्यावर मी अकौंट्स डिपार्टमेंटला फोन लावला. त्यांना सगळी केस सांगितली. मी तारखे प्रमाणे पावती वरील रक्कम एका कर्मचाऱ्याकडून टाईप करून घेतली. दुसऱ्या दिवशी तो कागद मी अकौंट्स डिपार्टमेंटला पाठवून दिला व काहीही झालं तरी ह्या पैशाच्या एन्ट्री शोधायला सांगितल्या. त्या बाईला फोन करून तुझं काम चालू आहे असा निरोप दिला. आता मी निवांत झाले. माझी जबाबदारी मी पार पाडली होती.
माझ्या लक्षात आलं पूर्वीच्या ब्रँच मॅनेजरने एवढे सुद्धा कष्ट घेतले नव्हते आणि त्या बाईला सगळ्यांनी वेडी ठरवलं होत. आठ दिवसाने मला अकाउंट्स डिपार्टमेंटहून एक मेल आलं. त्यात म्हंटल होत. या बाईचा खात नंबर ५००१ आहे आणि या बाईने सगळे पैसे ५०१० या खात्यात भरले आहेत. सगळ्या पावत्यांवर खाते नंबर ५०१० असा घातला असून नाव सीमा कुलकर्णी असं घातलं आहे. ते खाते तर शहा नावाच्या माणसाचं आहे. या शहाने हे पैसे दहा वर्षांपूर्वीच काढून घेतले आहेत आणि खात बंद केलं आहे. मी शहांचा पत्ता पाठवत आहे तुम्ही ब्रान्चला हे प्रकरण सोडवा. अशारितीने अकौंट्स डिपार्टमेंटने हात झटकले.
मला एकदम वैताग आला. या प्रकरणात हात घातला व डोक्याला भलताच ताप झाला. एक मन म्हणाल, ‘तिचीच चूक आहे. खाते क्रमांक चुकीचा का घातला?’ दुसरं मन म्हणाल ‘कर्मचाऱ्याने आणि चेकिंग करणाऱ्या ऑफिसरने देखील का बघितलं नाही?’, त्रास मात्र माझ्या डोक्याला झाला होता.
मी प्रथम कुलकर्णी बाईला बोलावून घेतलं. आज सुद्धा ती त्याच साडीत, तशीच गबाळी आली होती. आज प्रथमच मी तिच्या डोळ्यात माझ्या बद्दलचा विश्वास बघितला. मी तिला अकौंट्स डिपार्टमेंटच लेटर प्रिंट काढून वाचायला दिल..मी तिला विचारले, 'तू पासबुक का भरून घेतलं नाहीस?, वेळेत पासबुक भरलं असत तर तेव्हाच समजलं असत. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडीथोडकी नाही तर सव्वा लाख रुपये एवढी होती.
तिने मला तिची कहाणी सांगितली. तिचा नवरा दहा वर्षांपूर्वी मलेरियाने वारला. तो मुन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक होता. घरी गरिबी असली तरी वातावरण शिस्तीचं आणि सचोटीच होत. मुलगा दहावीत शिकत होता. शिकायला बरा होता. नवराच त्याचा अभ्यास घेत असे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या येणाऱ्या तुटपुंजा पेन्शनवर तिने आपल्या एकुलत्या एक मुलाला वाढवला. मुलगा इंजिनिअर असून बंगलोर येथे आपल्या बायको मुलां बरोबर राहतो. त्याने स्वतःच लग्न जमवलं. मी त्याच्या घरी सहा वर्ष मोलकरणी सारखी राहिले. अगदीच सहन झालं नाही म्हणून आमच्या घरी परत आले. आता आमचा संबंध नाही. नवऱ्याचं पेन्शन मला पुरत. पण हे पैसे माझ्या नवऱ्याचे कष्टाने कमावलेले होते. तो नोकरी नंतर शिकवण्या करीत असे व दर महिन्याला मी ते पैसे खात्यात भरत होते. मी परत आल्यावर मला मी भरलेल्या पैशाची आठवण झाली. मी गेली तीन वर्ष बँकेत खेपा घालत आहे, कोणीही माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही व मला वेड्यात काढलं.
तुम्ही मला पुरावा आणायला सांगितला आणि मी घर धुंडाळल, तेव्हा जुन्या हिशोबाच्या वहीत मला ह्या पावत्या मिळाल्या. आता माझे पैसे मला मिळवून द्या. मी तिला स्पष्टच सांगितलं मला पंधरा दिवसाची मुदत हवी, मला प्रथम त्या शहा नावाच्या इसमाला शोधायला लागेल. नंतर त्याने दहावर्षांनंतर तुझे पैसे दिले तर बरच आहे. कुलकर्णी बाईंनी डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे बघितले व हात जोडून मला म्हणाली मॅडम काहीतरी करा, मी तुमच्या कडे खूप आशेने आले आहे.
माझ्या रोजच्या कामात मला एक नवींन काम मागे लागलं. मी शहांच्या पत्यावर दहिसरला माणूस पाठवला. शहा फॅमिली ते घर विकून मोठ्या घरात कांदिवली येथे राहायला गेली होती. माझ्या मनात आलं, दहिसर येथून हा माणूस मुलुंडला बँकेत का येत असावा? 'शोधा म्हणजे सापडेल' या उक्ती प्रमाणे त्याच ऑफिस मुलुंड येथे आहे हे समजलं. माहिती काढली असता तो माणूस मुलुंड येथील ऑफिसात मोठ्या हुद्यावर आहे व तो काही महिन्यात रिटायर होणार आहे असे समजले. आता मात्र मला लवकरात लवकर स्वतःच शहाची भेट घ्यावी लागणार होती. मी एकदा दुपारी लंच टाइम मध्ये त्याच्या ऑफिसात गेले. रिसेप्शनिस्टला मी बँकेतून आले असे सांगून शहांची भेटीची वेळ मागितली. शहांनी चार दिवसांनी मला संध्याकाळी सहा वाजताची वेळ दिली. त्यांना भेटणार कधी व मी मुलुंडहून मालाडला माझ्या घरी पोचणार कधी हा विचार माझ्या मनात आला.
चार दिवसांनी गुरुवारी मी त्यांना भेटायला गेले. मला बघितल्यावर ते म्हणाले,'मी तुमच्या बँकेतील खाते कधीच बंद केले आहे, पण तुम्ही स्वतः आलात म्हणून मी तुम्हाला वेळ दिली,.'मी त्यांना थोडक्यात सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिला, त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी बँकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले. 'बर झालं मी असल्या बँकेतील खात बंद केलं असं देखील ते म्हणाले. त्यांनी दुसऱ्याचे पैसे त्यांना मिळाले ही गोष्ट अमान्य केली. ते म्हणाले माझ्या खात्यात लाखोने रुपये पडून असतात. ठराविक रक्कम सोडली तर मी पैशाला हात देखील लावत नाही. माझा प्युन पासबुक भरून आणून माझ्या खणात ठेवतो. माझे हे एकच खाते नाही. माझी वेगवेगळ्या बँकेत चार खाती आहेत. आमचे किराणामालाचे दुकान आम्ही भाड्याने चालवायला दिले आहे. त्याचे पैसे कोणी इथे भरत असेल. मी पैशाचे व्यवहार फारसे बघत नाही. दहा वर्षापूर्वी माझ्या सीएने सुद्धा ह्या छोट्या रकमांवर आक्षेप घेतला नाही. मला कस समजणार हे माझे पैसे नाहीत ते. ही संपूर्ण बँकेची चूक आहे.
मी सुद्धा मुरलेली होते. मी त्यांच्या खात्याचं स्टेटमेंट घेऊन गेले होते. मी त्यांना कुलकर्णी बाईंनी दिलेल्या पैसे भरलेल्या पावत्यांची झेरॉक्स कॉपी दाखवली. त्या बाईचे आणि तिच्या सद्यःपरिस्थितीचे वर्णन केले व तुमच्या सद्सदविवेक बुद्धीला पटेल तेच करा असे सांगून सात वाजता त्यांच्या ऑफिसातून निघाले. घरी जाताना माझ्या डोळ्यासमोर कुलकर्णी बाईचा चेहेरा उभा राहिला. पै पै साठवून चुकीचा खाते नंबर घालणारी ती बाई दोषी, की भरमसाट पैसे मिळवून देखील फारशी व्यवहारी वृत्ती नसलेले, बँकेचे खाते न तपासणारे हे शाह दोषी, की दहा वर्षांपूर्वी चुका करणारे बँक कर्मचारी व ऑफिसर दोषी.
दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णी बाईला मी शहांना भेटल्याचे सांगितले. पुढे काय करायचे ते नंतर बघू म्हणून फोन ठेऊन दिला. पंधरा दिवसांनी दिवाळी होती. बँकेने कार लोन साठी नवीन ड्राइव्ह काढली होती. कमी इंटरेस्ट रेट ठेऊन नवीन ग्राहक शोधा असा बँकेचा आदेश होता. कमीतकमी पाच कार आणि पन्नास लाख रुपयाचे लोन डिसबर्स करावे असे बँकेने फर्मान काढले होते. बॅंकभर लोनचे पोस्टर लावले होते. दारातच कार लोनच्या जाहिरातीचा स्टँडी होता. मी सहा कार साठी लोन दिले पण लोनची रक्कम पचेचाळीस लाख होती. मी सुद्धा खूप धावपळीत होते. एक पाच लाखाचं लोन डिसबर्स केलं की माझं टार्गेट होणार होत.अजून दोन दिवस माझ्या हातात होते.
या गडबडीत ग्राहकांचा वेळ संपला बँकेचं शटर बंद केलं व आम्ही सगळे डबा खायला बसलो. तेवढ्यात गुरखा सांगायला आला, एक माणूस तुम्हाला भेटायला आला आहे. गाडीत बसला आहे. मी डबा बंद केला आणि त्या इसमास आत पाठवायला सांगितले. दोन माणसांनी त्या इसमास उचलून आणून माझ्या समोरच्या खुर्चीत बसवले. त्या माणसाच्या पायात ताकद नव्हती ते नुसतेच लोमकळत होते. जवळ आल्यावर लक्षात आलं पाय नाही तर घातलेल्या पँटचे पाय लोमकळत होते. त्या माणसाला पायच नव्हते. ते दुसरे तिसरे कोणी नसून शहा होते. त्या दिवशी तर मला त्यांना पाय नाहीत हे समजलच नव्हतं. मी त्यांना पाणी दिल. त्यांच्यासाठी चहा मागविला. मला काय बोलावं ते क्षणभर सुचलंच नाही. ते का बर आले असतील? ह्याचा मी विचार करू लागले. त्यांनी खिशातून एक लाख पंचाहत्तर हजाराचा चेक काढून दिला. खात्यातील एकलाख पंचवीस हजार आणि दहा वर्षाचं त्यांनी पैसे वापरले त्याचे मूल्य म्हणून पन्नास हजार. चेक सीमा कुलकर्णीच्या नावाने होता. शहा म्हणाले मी आजच रिटायर झालो. काल रात्री मला झोप आली नाही. अनावधानाने का होईना मी दहा वर्ष कोणाचे तरी पैसे वापरले ह्याचे मला वाईट वाटले. तुम्ही बाईचे केलेले वर्णन ऐकून तिला पैशाची किती निकड असेल आणि हे तिचे हक्काचे पैसे आहेत. हा चेक तुम्ही तिला द्या. त्यांचे पाय ऍक्सीडेन्ट मध्ये कापावे लागले असे त्यांनी सांगितले. चहा पिताना ते ब्रँच मधील पोस्टर न्याहाळत होते.
ही माझी गाडी ऑफिसची आहे. मी दहा लाखाची नवीन गाडी बुक केली आहे.' नोकरीत असतो तर तुमच्या कडून लोन घेतलं असत' असं ते म्हणाले.मी म्हणाले तुम्ही दहा लाखाच फिक्स्ड डिपॉझिट माझ्या बँकेत ठेवलं तर मी दहा लाखाचं लोन तुम्हाला स्पेशल केस म्हणून सॅंक्शन करून देईन. तुम्ही ते लोन तीन वर्षात फेडा. तुमची रिसीट बँकेकडे सिक्युरिटी म्हणून राहील. शहा लगेच तयार झाले. सगळ्या फॉर्मॅलिटी पटापट झाल्या माझे पाच कार व पन्नास लाख लोन हे टार्गेट पूर्ण झाले. शहांचे नवीन खाते उघडून घेतले. शहा सारख्या निर्मळ मनाच्या माणसाची ओळख झाली.
दुसऱ्या दिवशी मी कुलकणी बाईला बोलावून घेतले. तिच्या हातात मी एक लाख पंचाहत्तर हजाराचा चेक ठेवला. तिला झालेला आनंद वर्णनातीत होता.आज ती आनंदाने रडत होती.तिचे डॉरमन्ट झालेले खाते मी सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून नॉर्मल केले, जेणेकरून ती तो चेक तिच्या खात्यात भरू शकणार होती.
दोन दिवसाने दिवाळी होती. ब्रँच कंदील लावून व दिव्यांची रोषणाई करून सजवली. दिवाळीच्या दिवशी आम्ही सगळे जण नटून थटून ब्रँच मध्ये आलो होतो. सालाबादप्रमाणे ग्राहक मिठाईचे बॉक्स आणि भेटवस्तू आणून देत होते. साधारण बारा वाजत कुलकर्णी बाई आली. आज ती क्रीम कलरची सिल्कची साडी नेसली होती. डोक्यात गुलाबाचे फुल होते. गळ्यात मोत्याची माळ होती. छान प्रसन्न दिसत होती. मला म्हणाली मुलाकडून आल्यापासून तीन वर्षांनी माझ्या घरी तुमच्या मुळे दिवाळी साजरी झाली. हे घ्या बक्षीस म्हणून तिने एक छोटीशी भेटवस्तू माझ्या हातात दिली आणि आली तशीच ती निघून गेली. मी ती भेटवस्तू बाजूला ठेऊन दिली. निघताना सगळ्या भेटवस्तू तश्याच ठेऊन कुलकर्णी बाईने दिलेली भेटवस्तू मी घरी घेऊन गेले. घरी जाऊन वरील पेपर काढल्यावर आतमध्ये पितळेचा छोटासा पेढेघाटी डबा होता. त्यात पाच बेसनाचे लाडू होते. आत एक चिट्ठी होती. 'माझी दिवाळी आनंदी केल्या बद्दल प्रेमपूर्वक भेट'. आता डोळ्यात पाणी यायची वेळ माझी होती. मला आता पर्यंतच्या दिवाळीत मिळालेली ही सर्वात मौल्यवान भेट होती.
माझं आणि कुलकर्णी बाईचं आणि माझं आणि शहांचव व्यवहारा पलीकडचं नातं निर्माण झालं होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा