शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

2297. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

      वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एका ज्येष्ठ मित्राला फोन केला. तो आता निवृत्त झाला आहे. एकुलता एक मुलगा परदेशी असतो. मित्राची पत्नीही काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यामुळे थोडेसे एकाकीपण त्याच्या वाट्याला येणे अगदीच स्वाभाविक. त्याचा एकूण टोन थोडासा निराशेचा. आता काय उरलेय आयुष्यात, अशा प्रकारचा ! 
     असा प्रश्न पडलेला तो एकटा नाही. निवृत्तीनंतर काय करायचं, हा एक अफाट प्रश्न अनेकांसमोर उभा आहे. प्रकृती धडधाकट आहे, पण करायचं काय? नोकरी संपलेली आहे. मुलं आपापल्या पायावर उभी आहेत. त्यांना आपली फारशी गरज नाही. जोडीदार गेलेला असेल, तर हा प्रश्न आणखी अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करतो. आपल्याकडे मुळात आपलं आयुष्य आपण कुटुंबाशी जोडून टाकतो. मुलं रांकेला लागली की आपला कार्यभाग आटोपला. बाकी आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे! महिलांना तर घर-कुटुंबाच्या पलीकडे काही दिसूच नये, अशी व्यवस्था आपण करून टाकली आहे. खरे म्हणजे, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या नोकरी आणि संसाराच्या धबडग्यात करता आलेल्या नाहीत. त्या करण्याची संधी निवृत्तीच्या काळात मिळते. पण, तशी संधी घेणारे फार कमी ज्येष्ठ नागरिक दिसतात. सध्या ज्येष्ठांची संख्या प्रचंड मोठी आहे. पुण्यासारख्या शहरात तर ज्येष्ठांच्या तीन-चारशे संघटना आहेत. प्रत्येक संघटनेत हजारेक जेष्ठ नागरिक आहेत. सध्या भारत हा तरुणांचा देश असला, तरी आणखी काही वर्षांनी ज्येष्ठांची लोकसंख्या वाढणार आहे. प्रामुख्याने शहरांमधील, सोसायट्यांमधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बहुतेकजण चांगल्या नोकरीमध्ये होते. त्यांना चांगले निवृत्तीवेतन मिळते. मुलंही ठीक-ठाक कमावत आहेत. यांच्याकडे पुष्कळ वेळ आहे. आरोग्य उत्तम आहे. या वेळेचं करायचं काय, एवढाच प्रश्न आहे. मग हे म्हातारे सोसायटीच्या बागेमध्ये चकाट्या पिटत बसतात. कुठल्यातरी हास्य क्लबात मोठमोठ्याने हसत सुटतात. एखाद्या गुरु-बाबाच्या नादी लागून त्या बैठकांना जात राहतात. दिवसाच्या चोवीस तासांचं करायचं काय, याशिवाय त्यांच्यासमोर फार मोठी आव्हानं नसतात. एकूणच या ज्येष्ठांच्या वेळेचं काय करायचं, हा एक मोठाच प्रश्न आहे. येणाऱ्या काळात ज्येष्ठांची बाजारपेठ प्रचंड प्रमाणात विस्तारणार आहे. आयुर्मान वाढत चालले आहे. अशा वर्गाला साधारणपणे आरोग्य सुविधाही ठीक मिळत आहेत. अशा वेळी, ज्येष्ठांनी म्हातारपणात प्रवेश करण्याऐवजी ‘सेकंड इनिंग’ सुरू केली पाहिजे. आर्थिक गरज नाही, पण नवं काही करायची इच्छा आहे. वेळ पुष्कळ आहे आणि अनुभव त्याहून अधिक आहे. अशा ज्येष्ठांच्या भरवशावर कित्येक सामाजिक कामं उभी राहू शकतात. चळवळच उभी राहू शकते. ज्येष्ठांना एकत्र बांधून काहीतरी ठोस करता येणे शक्य आहे. तशी एक कल्पनाही माझ्या डोक्यात आहे. ती नंतर सांगतो. 
     मला आज आठवलं, त्याला एक कारण आहे. तुम्हाला विश्वेश्वरय्या माहिती आहेत? सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. त्यांची आठवण आज मला आली ती ‘इंजिनिअर्स डे’मुळे. आज ‘अभियंता दिन’ आहे. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा ‘इंजिनिअर्स डे’ साजरा केला जातो. गंमत म्हणजे, भारत- श्रीलंका आणि टांझानिया अशा तीन देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. 
       विश्वेश्वरय्यांविषयी बोलताना मला एक मुद्दा फार महत्त्वाचा वाटला. हे विश्वेश्वरय्या इंग्रज सरकारकडे नोकरी करत होते. निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी पन्नास वर्षे काम केलं! हा माणूस जगला १०१ वर्षं. प्रकृतीची फार छान काळजी त्यांनी आयुष्यभर घेतली. ते मिताहारी होते. आयुष्यात ना कधी तंबाखू खाल्ली, सिगारेट ओढली, ना दारू प्यायली. दररोज व्यायाम. त्यांनी स्वतःला खूप जपलं. त्यांना विचारलं की, तुम्ही प्रकृतीची एवढी काळजी का घेत आहात? तेव्हा ते म्हणाले, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मला कार्यरत राहायचं आहे. मला खूप काम करायचं आहे. आणि, अक्षरशः या माणसानं अखेरच्या क्षणापर्यंत वेड्यासारखं काम केलं. इंजिनिअर म्हणून सरकारी सेवेतून १९०९ ला ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ठरवलं की, माझ्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग करून मी आता वेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करणार. मग ते म्हैसूर संस्थानाचे दिवाण झाले. आज जे म्हैसूर आहे, त्यावर विश्वेश्वरय्या यांचा ठसा आहे. या माणसाला इंग्रज सरकारने ‘सर’ हा किताब दिला आणि भारत सरकारनेही ‘भारतरत्न’ दिले. 
      मला फार गंमत वाटते. पुण्यामध्ये एक काळ असा असेल की, जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातले चार अभ्यासक एकत्र छान चहा पीत असतील! अर्थात तेव्हाच्या पुण्यात हॉटेलात जाऊन चहा पिणं एवढं सोपं नव्हतं. हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायला म्हणून खुद्द महादेव गोविंद रानडे यांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. पण ते असो. चार अभ्यासक एकत्र बसून गप्पा मारताहेत, असं दृश्य. बरं हे चार अभ्यासक कोण? डॉ. भांडारकर, नामदार गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! रानडे, गोखले आणि विश्वेश्वरय्या हे तसे समकालीन. मात्र, रानडे अठ्ठावन्नाव्या वर्षी गेले. गोखलेंनी तर पन्नाशीही पूर्ण केली नाही. पण, हे चौघेही चांगले मित्र होते. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १८६१ चा. ते गेले १९६२ मध्ये. त्यामुळे काळाचा खूप मोठा तुकडा त्यांच्या वाट्याला आला आणि त्यावर त्यांनी ठसा उमटवला.  
     विश्वेश्वरय्यांचा जन्म म्हैसूरचा. ते वारलेही तिकडेच. पण, दरम्यानच्या काळात त्यांचे महाराष्ट्राशी एक वेगळे नाते तयार झालेले होते. आता पुण्यात ‘सीओइपी’ आहे, त्याच कॉलेजमधून ते इंजिनियर झाले. इंजिनिअर झाल्यावर लगेचच ते सरकारी नोकरीत गेले. त्यांचे पहिले पोस्टिंग होते धुळे. त्या नोकरीच्या काळात त्यांनी धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धुळ्यापासून सात मैलावर तिखी गावाला लागून असलेल्या डेडरगाव येथे एक नाला अडवून तलाव बांधला. आजही तो डेडरगाव तलाव याच नावाने प्रसिद्ध आहे. नद्यांचे पूर रोखायचे कसे, हा मोठा प्रश्न तेव्हा सगळ्यांच्या समोर आ वासून उभा होता. त्यावर त्यांनी खूप काम केले. हैदराबादला पूरमुक्त करण्यात त्यांचा वाटा फार मोठा. दूर कशाला, आपल्या पुण्यातही त्यांच्या खाणाखुणा दिसतात. खडकवासला धरण तुम्ही कधी पाहिले आहे? तिथं त्यांनी ‘फ्लड गेट्स’ म्हणजे पूरनियंत्रक दरवाजे बसवले. पावसाळ्यातील पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ही यंत्रणा खूपच उपयुक्त ठरली. नंतर ही योजना जगभर राबवली गेली. 
     असं बरंच सांगता येईल. भारतातच काय, जगभर त्यांनी काम केले. कावेरी नदीवर कृष्णसागर धरण उभारण्याची योजना मांडली गेली, तेव्हा अनेकांनी ती अशक्य असल्याचं म्हटलं. तांत्रिक साधनं, यंत्रसामग्री मर्यादित होती. निधीची कमतरता होती. बर्‍याच अधिकाऱ्यांनी थेट सांगितले, “हे धरण उभारता येणार नाही. इतका पैसा, इतके परिश्रम वाया घालवू नका.” पण सर विश्वेश्वरय्या शांतपणे म्हणाले, “हे धरण उभारलं गेलं नाही, तर या प्रदेशाचं भविष्य कायमचं अंधारात जाईल. हे बांधायचंच !” १९३१ मध्ये हे भव्य धरण उभारलं गेलं. त्यावेळी लोकांना विश्वासच बसत नव्हता. हे धरण बांधून पूर्ण झालं, तेव्हा महात्मा गांधींनी ते पाहिलं. गांधीजी प्रचंड प्रभावित झाले. विश्वेश्वरय्या यांना ते म्हणाले, “हे एवढंच एक काम तुम्ही केलं असतं तरीही तुम्ही अजरामर झाला असतात!”
      गंमत बघा. ज्या म्हैसूर संस्थानाचे दिवाण म्हणून विश्वेश्वरय्या यांनी काम पाहिले, त्या संस्थानाचा राजा किती मोठा माणूस असेल ! म्हणजे आपल्या राजर्षी शाहू महाराजांची किंवा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांची आठवण यावी, असाच हा राजा. कृष्णराज वोडेयार असे त्याचे नाव. हा राजा गेला, तेव्हा त्याची व्यक्तिगत संपत्ती तेव्हा काही हजार कोटींच्या घरात होती. जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक असा हा राजा. अत्यंत प्रगल्भ आणि पुरोगामी. खुद्द महात्मा गांधींनी त्यांचे अनेक वेळा कौतुक केले होते. त्यांच्यामुळेच म्हैसूर, बंगळूर ही शहरे उदयाला आली. १९०२ ते १९४० अशी जवळपास चार दशके हा राजा सिंहासनावर होता. त्या कालावधीमध्ये अधिकृतपणे अस्पृश्यता उच्चाटन करणारा, बालविवाहावर बंदी घालणारा आणि बालविधवा मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरू करणारा हा संस्थानिक. नोकरीमध्ये २५ टक्के जागा या ब्राह्मणेतर मुलांसाठी राखीव असाव्यात, असा कायदा त्याने १९१८ मध्ये केला. इंग्लंड आणि अमेरिकेत जेव्हा महिलांना मताचा अधिकार नव्हता, तेव्हा तो अधिकार देणारे जे राजे भारतामध्ये होते, त्यापैकी एक सयाजीराव गायकवाड आपल्याला ठाऊक असतात. दुसरा हा मैसूरचा राजा. १९११ मध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ बंगळुरूमध्ये सुरू झाले, त्यासाठी आपली ३७१ एकर जागा त्याने दिली आणि मोठा निधीही दिला. एकीकडे बँक सुरू केली. दुसरीकडे कृषी विद्यापीठ स्थापन केले. तिसरीकडे कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली. कृष्णराज हे बनारस हिंदू विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. सर सी. व्ही. रामन यांच्या संस्थेसाठीही त्यांनी दहा एकर जागा दिली. 
      असा हा द्रष्टा राजा. म्हणून त्याने विश्वेश्वरय्यांना दिवाण म्हणून पाचारण केले. काही वर्षे विश्वेश्वरय्या तिथे राहिले. त्या पदावर रमले. त्यांनी फार महत्त्वाचे काम केले. आरक्षणाला विरोध म्हणून विश्वेश्वरय्या यांनी दिवाणपद सोडले, असा एक आरोप त्यांच्यावर होत असतो. धक्कादायकच आहे हे. पण, विश्वेश्वरय्या एकूणच मोठ्या उंचीचा माणूस. त्यांना ब्रिटिशांनी ‘सर’ म्हटले. गांधींनी कौतुक केले. नेहरूंनी ‘भारतरत्न’ दिले. कृष्णराजाने दिवाण केले. १९६२ ला विश्वेश्वरय्या गेले. त्यांचे शेवटचे पुस्तक १९६० ला आले. ते गेले, तेव्हाही त्यांच्या टेबलवर काही अप्रकाशित लेख दिसत होते.  
     मित्राला मी विश्वेश्वरय्यांची गोष्ट सांगत होतो. निवृत्त झाल्यानंतर पन्नास वर्षे वेगळे काम करणारा असा हा माणूस. निवृत्तीनंतर प्रशासन, राजकारण यातही ते रमले. स्टेट्समन, लेखक, अध्यापक, प्रशासक अशा स्वरूपाचं काम करत राहिले. ज्या सीओईपीमध्ये ते शिकले, ते कॉलेज आता बदलले आहे. ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’मध्ये विश्वेश्वरय्या यांनी डिप्लोमा मिळवला. आता एआयपर्यंत जग पोहोचले आहे. पण तरीही विश्वभरातल्या इंजिनिअर्सना या मोक्षगुंडमचे नाव घेतल्याशिवाय आजही मोक्ष मिळत नाही, ही खरी गंमत आहे ! 
 
- संजय आवटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...