सदानंद माने एक सामान्य माणूस. डॉक्टरी पथ्याचे लेबल लावून बिनसाखरेचा चहा पिणारा, शेजाऱ्याचे वर्तमानपत्र अगदी सकाळी सकाळी ढापून अथपासून इतीपर्यंत वाचणारा.
सावित्री ही सदानंदांची पत्नी. मला शंभर मुलांनी मागणी घातली; पण नशीबच फुटकं, या सदानंदाशी लग्न केलं, असं दिवसातून दहा वेळा म्हणणारी.
रविवारची सकाळ, घड्याळाचे काटे बरोबर ९० अंशावर. हातात शेजाऱ्याचा ढापलेला पेपर आणि समोर बिनसाखरेचा चहा.
तेवढ्यात फोन वाजला. नमस्कार सर, मी विश्वनाथ बोलतोय. पुढच्या आठवड्यात माझ्या एका पुस्तकाचे प्रकाशन करायचे आहे आणि त्या कार्यक्रमाला मी तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाईट करतोय. पुढच्या रविवारी सकाळी नऊ वाजता मी तुम्हाला रिमाइंड करण्यासाठी फोन करीन असे म्हणत सदानंदांना बोलण्याची कोणतीही संधी न देता विश्वनाथने फोन ठेवला.
सावित्री, अगं पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला मला चिफ गेस्ट म्हणून बोलावलं आहे, सदानंदांनी सावित्रीबाईंना सांगितले.
सदा अरे तुला आणि चिफ गेस्ट म्हणून बोलावलंय? माझा नाही विश्वास बसत याच्यावर. कदाचित त्यांना दुसरे कोणी सदानंद माने हवे असतील आणि त्यांनी फोन चुकून तुला लावला असेल, सावित्रीबाईंनी त्यांचा संशय व्यक्त केला. आपल्या माहितीत विश्वनाथ कोण आहे? सदानंदांनी विचार सुरू केला. त्यांच्यापुढे दोन नावं आलीत. एक म्हणजे गुंडप्पा विश्वनाथ, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दुसरे म्हणजे त्यांचे काका.
आता गुंडप्पा विश्वनाथ, ज्याला मी कधीच भेटलो नाही, तो मला कसा बोलवेल त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन करायला? पहिला विश्वनाथ सदानंदांच्या यादीतून बाद झाला.
सदानंदांनी त्यांच्या विश्वनाथ काकांना फोन लावला. काका, कसे आहात तुम्ही? हल्ली काही लिहिणं वगैरे? सदा, अरे गेले सहा महिने मी अंथरुणाला खिळून आहे. काय लिहिणार मी? दुसरा विश्वनाथ देखील बाद झाला.
सावित्री म्हणते तेच खरं असावं. सदानंद माने नावाचा कुणीतरी प्रख्यात माणूस असावा आणि नांवातील साधर्म्यामुळेच तो फोन आपल्याला लागला असेल, सदानंदानी चीफ गेस्ट प्रकरण मनातून काढून टाकले.
पुढच्या रविवारी सकाळी बरोबर नऊ वाजता विश्वनाथचा फोन आला, सर मी तुम्हाला घ्यायला संध्याकाळी सहा वाजता गाडी पाठवतो, तुम्ही तयार रहा असे म्हणत विश्वनाथने फोन कट केला.
माने साहेब जायचं ना तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून?
म्हणत सावित्रीबाईंनी चहाचा कप सदानंदांच्या समोर ठेवला.
सावित्री मला खूप भीती वाटते गं, विश्वनाथच्या मनातील सदानंद माने मी नक्कीच नसणार आणि त्यामुळे माझी फजिती होईल, सदानंद म्हणाले.
सदा, अरे, घाबरू नकोस आणि हो जाताना हे नवीन कपडे घालून जा, बरोबर सहा वाजता गाडी घेणार आहे, तू तयार रहा म्हणत सावित्रीबाईंनी सदानंदांचा आत्मविश्वास वाढविला.
काय वर्णावा आजचा सदानंदांचा रुबाब! सावित्रीबाईंनी दिलेले नवे कोरे कपडे, विश्वनाथने पाठविलेली आलिशान गाडी आणि गणवेशधारी ड्रायव्हर.
सदानंद कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले. श्रोत्यांनी भरलेला मोठा हॅाल. भले मोठे व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरील मधली खुर्ची सदानंदांची. सदानंदांना गरगरल्यासारखे झाले. तोल जाऊन पडू नये म्हणून ते नाईलाजानेच खुर्चीवर बसले.
सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सदानंद माने सर यांचे स्वागत करते, एक सुंदर तरुणी बोलत होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वनाथ सरांचे आणि त्यानंतर माने सरांचे भाषण होईल. नंतर माने सरांच्या हातून विश्वनाथ सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होईल आणि त्यानंतर विश्वनाथ सर माने सरांचा सोन्याचे कंगण देऊन सत्कार करतील. विश्वनाथचा चेहरा ओळखीचा वाटत होता पण ओळख अजिबातच लागत नव्हती. विश्वनाथच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होत होते की विश्वनाथ म्हणजे एक बडी असामी. भरपूर गाड्या, बंगले आणि भारतातच नव्हे तर परदेशात देखील व्यवहार. विश्वनाथला हवा असलेला सदानंद माने मी नक्कीच नाही याची सदानंदांना खात्री पटली. आता माझे आदरस्थान असलेल्या सदानंद माने सरांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत. विश्वनाथच्या या वाक्याने सदानंदांच्या पल्स रेटने सेंच्युरी तर ब्लड प्रेशरने डबल सेंच्युरी मारली. त्यांना गरगरू लागले. मी एक सांगायला विसरलो, विश्वनाथ म्हणाला. माझ्या करिअरची सुरुवात मी सातारा येथील मोल्डेड लगेज कंपनीतून केली. विश्वनाथच्या या वाक्याने जादू केली आणि सदानंद क्षणात नॉर्मल झालेत. विश्वनाथ अर्थात् विशीची ओळख त्यांना पटली होती.
विशी साताऱ्या जवळील एका छोट्याशा गावातला. अतिशय हुशार परंतु बिकट आर्थिक परिस्थितीमुळे डिप्लोमा नंतरचे शिक्षण घेऊ न शकलेला. विशी डिप्लोमा केल्यानंतर साताऱ्या जवळील एका मोल्डेड लगेज कंपनीत डिस्पॅच सेक्शन मध्ये कामाला लागला. बरा पगार आणि रोजचा दोन ते तीन तासांचा ओव्हरटाईम असे दुहेरी इनकम त्याला मिळायचे. लग्नानंतर बायकोच्या ओढीमुळे की काय पण विशीचा ओव्हरटाईम मधील रस कमी झाला. सुरुवातीला कधी कधी आई, वडील, बायको आणि स्वतःला आळीपाळीने आजारी पाडून विशीने ओव्हरटाईम पासून स्वतःची सुटका करून घेतली. परंतु हे किती दिवस चालणार? तो विचार करू लागला आणि त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. लोडिंग करताना प्रथम लहान आकाराच्या बॅग्स, नंतर मध्यम आकाराच्या बॅग्ज आणि त्यानंतर मोठ्या आकाराच्या बॅग्ज लोड करण्याची त्यांची पद्धत होती.
विशीच्या मनात आलेली आयडिया अशी होती की, मोठ्या आकाराच्या बॅगमध्ये मध्यम आकाराची बॅग टाकली आणि मध्यम आकाराच्या बॅगमध्ये लहान आकाराची बॅग टाकली तर लोडिंग चा टाईम बराच कमी होईल. आता ही आयडिया राबवायची तर ती मॅनेजर साहेबांना सांगावी लागणार होती आणि विशीची तर मॅनेजर साहेबांकडे जाण्याची हिंमत नव्हती. त्याने ही आयडिया त्याच्या एका सीनियर कलीग मार्फत मॅनेजर साहेबांकडे पोहोचवली. स्वतःची आयडिया म्हणून नव्हे तर विशीची आयडिया म्हणून त्या प्रामाणिक माणसाने सांगितलेली आयडिया मॅनेजर साहेबांना खूप आवडली.
यामुळे कंपनीचा दुहेरी फायदा होणार होता. एक म्हणजे डिस्पॅच सेक्शनचा ओव्हरटाईम कमी होणार होता आणि दुसरा म्हणजे कंपनीचा ट्रान्सपोर्टर बरोबरचा कॉन्ट्रॅक्ट हा व्हॉल्युम बेसिसवर होता आणि बॅग मध्ये बॅग टाकल्यामुळे कंपनीची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मोठ्या प्रमाणात कमी होणार होती. मॅनेजर साहेबांनी विशीची ही आयडिया वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आणि कंपनीने विशीला ५०००/- रुपयांचे बक्षीस देण्याचे ठरविले. हे बक्षीस एका वेगळ्या पद्धतीने द्यायचे असे एच आर मॅनेजर साहेबांनी ठरविले.
दुसऱ्या दिवशी सकाळी विशी कंपनीत आला आहे याची खात्री केल्यानंतर पाच हजार रुपये कॅश, आणि प्रशस्तीपत्र घेऊन एच आर ऑफिसर कंपनीच्या गाडीने विशीच्या साताऱ्यापासून साधारणतः १०-१२ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावी जायला निघाले. गाडी गावात शिरल्यावर विश्वनाथ मराठेंचे घर कुठे आहे? आपल्याला सांगता येईल का? आम्ही त्यांच्या कंपनीतून आलोय, ड्रायव्हरने चार-पाच मुलांच्या घोळक्याला विचारले. हो साहेब, पण काय झालं?मुलांनी उत्सुकतेने विचारलं. ड्रायव्हरने त्यांच्यापैकी एकाला गाडीत घेतलं, उरलेले मित्र विश्वनाथच्या घराकडे पळालेत. विशीच्या कंपनीतून साहेब लोक आलेत, गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेक लोक विश्वनाथच्या घराजवळ गोळा झालेत. हे सर्व बघून विश्वनाचे आई-वडील धावत धावत बाहेर आलेत. साहेब काय झालं? आमच्या मुलाने काही चूक केली का? प्लीज त्याला काही शिक्षा करू नका म्हणून ते साहेबांना विनवू लागले. विश्वनाथच्या बायकोने तर साहेबांचे पायच धरलेत. साहेब, विश्वनाथ ओव्हरटाईम करत नाही ते माझ्यामुळे परंतु मी तुम्हाला वचन देते मी त्याला आडवणार नाही पण तुम्ही त्याला कंपनीतून प्लीज काढू नका.
नक्कीच विश्वनाथने कंपनीत काहीतरी घोटाळा केला असणार, जमलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. एकंदरीत वातावरण खूपच भावूक झाले होते. एच आर ऑफिसरने पुढे येऊन सांगितले, तुम्ही अजिबात काळजी करू नका. विश्वनाथने कोणताही घोटाळा केलेला नाही उलट त्याने कंपनीला एक अतिशय उपयुक्त सूचना दिली आहे जीच्यामुळे कंपनीचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि म्हणूनच पाच हजार रुपये कॅश आणि प्रशस्तीपत्र घेऊन आम्ही येथे आलो आहोत असे म्हणत त्यांनी कॅश आणि प्रशस्तीपत्र विश्वनाथच्या आई-वडिलांना सुपुर्द केले. आपणा सर्वांना एक विनंती आहे की या बक्षीसाबद्दल विश्वनाथ घरी येईपर्यंत त्याला काहीही सांगू नका, हे सर्व त्याच्यासाठी आश्चर्यच राहू द्या. संध्याकाळी विश्वनाथ बसमधून उतरला आणि तीन-चार मित्रांना बस स्टैंड वर बघून त्याने विचारले, अरे मित्रांनो कुठे निघाला तुम्ही? विशी अरे तुलाच घ्यायला आलो आम्ही. मला आणि घ्यायला? का? कशासाठी? माझ्या घरी सगळे ठीक आहे ना? विशीने विचारले. विशी तू घरी चल, मग तुला सांगतो. विश्वनाथच्या प्रत्येक प्रश्नाला तेच ते उत्तर, तू घरी चल मग तुला सांगतो. विश्वनाथला खूप मोठे टेन्शन आले होते. घरापाशी खूप गर्दी जमली होती. आपले आई वडील ठीक असतील ना? आपली बायको ठीक असेल ना?असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेत.
तेवढ्यात विशी आला, विशी आला, कोणीतरी ओरडले. विश्वनाथचे आई वडील आणि बायको बाहेर आलेत. आई-बाबा आणि बायको ठीक आहे मग काय झालं? विश्वनाथला समजत नव्हते.
काय झालं? कोणी मला सांगेल का? विशीने विचारले. कोणीही काहीही बोलत नव्हते. तेवढ्यात शेजारचे साने काका पुढे आलेत आणि त्यांनी सर्व वृत्तांत विशीला सांगितला. कंपनीने दिलेले इतकं मोठं बक्षीस आणि तेही इतक्या अलौकिक पद्धतीने, विश्वनाथ कृतकृत्य झाला. त्यानंतर विश्वनाथने कंपनीत उत्तरोत्तर प्रगतीच केली.
आणि त्या दिवशी माझी आयडिया मॅनेजर साहेबांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले होते सदानंद माने सरांनी. आज मी जो काही आहे तो केवळ सदानंद माने सरांमुळेच. दुर्दैवाने एका अपघातामुळे माने सरांनी कंपनी सोडली आणि मी पुढे त्यांच्या मार्गदर्शनाला मुकलो. विश्वनाथाच्या त्या वाक्यामुळे स्वतःला झिरो समजणारे सदानंद माने सर क्षणात हिरो झाले होते, माने सरांची मान ताठ झाली होती. कार्यक्रमाचे चीफ गेस्ट, पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यानंतर सोन्याचे कंगण, खरोखरच आजचा दिवस सदानंदांचा होता. आपल्या या सत्कारावर सावित्रीचा विश्वास बसेल का? सदानंदांच्या मनात शंका निर्माण झाली. तेवढ्यात विश्वनाथ म्हणाला, सर मी तुम्हाला घरी सोडतो.
थोड्याच वेळात ते दोघेही सदानंदांच्या घरी पोहोचलेत. सावित्रीने विश्वनाथचे मोठ्या आत्मीयतेने स्वागत केले. सावित्रीने लगबगीने सदा आणि विश्वनाथ यांच्यासाठी चहा आणला, थोडी जास्त साखर टाकलेला. अगं चहात साखर जास्त झाली सदानंद म्हणाले. असू द्या हो, विशीला जरा गोड चहाच आवडतो, सावित्रीबाई म्हणाल्यात. तू विशीला ओळखतेस? आश्चर्याने सदानंदांनी विचारले. सावित्री आणि विश्वनाथ दोघेही गोड हसलेत.
सर, खरं तर खूप वर्षांपासून मी तुम्हाला शोधत होतो. मागच्या महीन्यात वहिनींचा आणि माझ्या बायकोचा परिचय झाला. वहिनी आमच्या घरी आल्यात, त्यांच्याकडून तुमच्याबद्दलची सर्व माहिती मिळाली. आजच्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून तुम्हाला बोलवायचं हे मी वहिनींना सांगितलं, तुम्हाला काहीही न सांगण्याच्या अटीवर. रात्री सदानंदांना छान झोप लागल्यामुळे उठायला थोडा उशीरच झाला. आज शेजाऱ्यांचा पेपर ढापता येणार नाही याची मनात खंत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. चार शेजारी हातात पेपर घेऊन उभे होते आणि प्रत्येक जण सदानंदांना सांगत होता, सर आमचा पेपर घ्या.
आजच्या पेपर मध्ये फ्रंट पेजवर सदानंद आणि विश्वनाथ यांचा फोटो होता आणि त्याखाली बातमी होती. सदानंद मानेंची विश्वनाथ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये जनरल मॅनेजर पदावर नेमणूक, भरपूर पगार, गाडी आणि बंगल्यासह.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा