मित्राबरोबर हॉटेलात चाळीस रुपयांची कॉफी पिली आणि निरोप देऊन घराकडे निघालो.
कराडात रिमझिम पाऊस पडत होता.
पन्नाशितला माणूस ओल्या भुईमुगाच्या शेंगा ढीग घालून रस्त्यावर विकत होता.
मी गाडीवरून थांबलो आणि विचारलं — “शेंगा कश्या दिल्या ?”
तो म्हणाला — “100 रुपये किलो.”
मी म्हटलं — “कमी करा की जरा…”
तो हसला — “पाच कमी द्या.. घ्या.”
मी पुन्हा म्हणालो — “80 ने दया.”
तो शांतपणे उत्तरला — “नाही वो… 90 द्या अन न्या.”
मी म्हणालो — “नको, 80 ने परवा नेल्या होत्या.”
बरं, म्हणत त्यानं वजनकाटा हातात घेतला आणि शेंगा पिशवीत भरल्या. वजन केलं.
मी दोन शेंगा खात विचारलं — “घरच्या आहेत का?”
तो म्हणाला — “नाय, विकायला अनल्या. पोटासाठी कायतरी करायचं...सकाळपासन पाऊस हाय… त्यामुळं विक्री कमी झाली. नाहीतर 90 च्या आत कुणाला नायत दिल्या.”
मी 2 किलो शेंगा घेतल्या आणि 200 रुपये दिले.
त्याने खिशातून चाळीस रुपये माघारी द्यायला हात पुढे केला.
मी म्हणालो — “नको राहू द्या.”
तो हळू दचकत म्हणाला —
“काय? नको नको… हे घ्या सुट्टे हायत की…”
मी थांबवायचा प्रयत्न केला,
“नको अहो, तुम्हाला असू दया.
मला कशाला? मी शेंगा 80 ने दिल्यात तुम्हाला…”
तो हट्टाने पुढे आला, माझा हात धरला आणि पैसे देत म्हणाला
मी म्हणलो
“नको, मला 100 नेच पाहिजेत.”
तो हसला… पण त्यांचा आवाज कापरा झाला.
“नको वो… धरा पैसे…”
मी हातात पैसे घेतले आणि पुन्हा त्यांच्या वरच्या खिशात ठेवले.
क्षणभर थांबून तो म्हणाला —
“काय रजेव… ही कसली पद्धत…?”
त्यांचे डोळे पाणावले.
घ्या वो तुमच्या कष्टाचे आहेत.. मी म्हणालो.
“सकाळपासन बसलुय… पावसामुळं शेंगात पाणी… गिऱ्हाईक नाय… आता साडेसात वाजले,..गाराठलोवतो...
घरी जायचं म्हणून चहा घेतला...तेवढ्यात तुम्ही आला… खोटं बोलत नाय...मी 70 नं घेतल्यात... पण गिऱ्हाईक नाय…उद्या परत तेवढच विकत बसायचं....तुम्ही 80 न मागितल्या… म्हणलं 10 अन् 10 रुपये मिळून 20 मिळत्याल...तेव्हडीच दुधाची पिशवी घिऊन घरी जाईन... म्हणून 80 न दिल्या… अन् तुम्ही आशी आयडिया किली व्हय....!
जेवढं मिळालं तेव्हड्यात समाधान होतं की मला… कशाला तुम्ही 100 न घेताय…”
त्यांचे शब्द ऐकून माझं मन चटका लागल्यासारखं झालं.
कारण त्या चाळीस रुपयांची खरी किंमत काय असते ती लहानपणापासून मी भोगलीय...!
हॉटेलात नुसत्या दोघांच्या कॉफीसाठी पाच मिनिटात 40 रूपये घालवणारे आणि 20 रुपयांचे दुध नेऊन त्यात दोन दिवस चहा करून पिणारे घर यातला फरक प्रत्येकाला मोजता आला पाहिजे.
अश्या 10,20,30,40 रुपयांत अख्ख्या घराला मिळणारा आनंद…तो मी माझ्या घरात अनुभवत मोठा झालोय...!
आपण कुणाची तरी वेळ काढतो.त्याला अर्थीक मदत करतो पण आपल्याला धडा शिकवणारी आपली जवळचीच माणसं असतात.
अर्थीक व्यवहारात आपल्यालाच फसवून जवळचीच माणसं आपला घात करतात. असं असताना
फुकटच नको व्यवहाराने ठरलय तेच घेणारी मोठया मनाची व्यवहारी माणसं आता सहजासहजी बघायला मिळत नाहित.
✍️ लेखक : अमोल अ. पवार उंब्रज
9970773576
writer.amolpawar@gmail.com
©️ copyright ™️
#मनाचेरत्न 💎 #मानवतेचीकिंमत ❤️ पावसातलीकथा 🌧️ #AmolPawar ✍️
हि कथा चाळीस रुपयाची नाही. एका व्यवहारी प्रामाणिक मनाची आहे. स्वाभिमानाची आणि प्रामाणिक पणाची वात अशीच तेवत राहीली पाहिजे. 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा