सकाळीच तिची लगबग सुरू झाली.
मुलांना शाळेत पाठवून ती तयार झाली. पिशवीत काहीतरी कोंबून ती बाहेर पडायला निघालीच की आतून आवाज आला "कुठं मरायला चालली?".
रात्रीची ढोसून पडलेला तिचा नवरा अजूनही खाटेवरच होता.
शेजाऱ्यांसोबत कालच भांडण झाले होते याच्या धिंगाण्यामुळे. मार सुद्धा खाल्ला होता.
आज कामावर जाणार नव्हता तो. हिने सुद्धा आज मालकीणीला सुट्टी मागितली होती. हिने दारातूनच आत डोकावले. "जाऊन येते जरा कामावर, मालकीण ने लवकर यायला सांगितले आज. जेवण तयार करून आहे. सायंकाळी येईल लवकर". तो तसाच ऐकून पुन्हा तंगड्या वर करुन पडला.
ही पिशवी घेऊन निघाली. बस स्टँड वर आली. बस लागली. सुटायला वेळ होती. तेव्हढ्यात बस स्टँड वरील दुकानाकडे तिचे लक्ष गेले.
खोबर्याचे लाडू दिसले. तिने पर्स उघडली. आतील संपत्ती मोजली. पुन्हा विचार केला. बस चे येण्या जाण्याचा खर्च वगळता, 10 रु शिल्लक राहणार होते. आतून समाधान झाले तिचे.
तशीच दुकानात जाऊन तिने 1 लाडू कागदात गुंडाळून पिशिवीत कोंबला. बस सुरू झाली. मागे पडणारे गाव आता तिला अनोळखी वाटू लागले.
रस्ता परिचयाचा होता. मनातील ओढ वाढत चालली होती. धकधक वाढत चालली होती.
फार दिवसांनी तिने तो रस्ता मापला होता. डोळ्यांत पाणी जमा व्हायला लागले की ती पदराने पुसून काढत होती. त्यातच तिला तंद्री लागली.
दोन तास गाढ झोपी गेली.
तेव्हड्यात कानावर आवाज पडला, "बाई, आलं तुमचं गावं".
दचकून उठली आणि खाली उतरली.
धुळीचे लोट उठवत बस निघून गेली. मात्र हिच्या मनातील धूळ आज न्याहून निघाली होती. तो वास तिला परिचयाचा होता. नाक्यावरचे डोळे जणू तिला कशी आहेस हे विचारत होते. ती निघाली.
गावाच्या वेशीपाशी आली पण कुठे जायचे या विचारात पडली.
तिने तसाच मार्ग बदलला. झपझप चालू लागली. शेतीचे बांधे नजरेत पडले. एक एक शेत ओलांडत ती पुढे निघाली. श्वासाची अधीरता वाढतच चालली होती.
एका शेतीजवळ ती येऊन थांबली. एक माणूस विहिरीची मोट धरून होता. अंगाची काडी झालेला होता तो. ती त्याच्याकडे बघतच राहिली.
हळूहळू चालत ती मागे येऊन उभी राहिली. "दादा" एवढेच शब्द फुटले.
त्याने वळून बघितले. डोळे पाणावले. अनेक वर्षांनी बहीण आलेली. काय बोलू काय नको असे झाले दोघ्यांना. पण सध्या फक्त बघतच राहिले.
"चल घराकडे तिकडेच बोलूया" तो पुटपुटला.
"नको दादा. घाईने आलोय. सायंकाळ पर्यन्त घरी पोहोचायला हवे. मुलं येईल शाळेतून. म्हणुन सरळ इकडे आले".
"बर, बस इथेच. बाकी येणे कसे झाले?".
तिने पिशवीत हात टाकून एक पाकीट काढले. ते उघडून लाल धाग्याची एक राखी बाहेर काढली.
"अरेच्या, आज राखी होय"
गेली अनेक वर्षे हा सणच विसरायला झाला होता. आई वडील गेले. मागे कर्जाचे डोंगर. त्यात हाती असलेली शेती विकावी लागली. त्यातही बहिणीच्या नवऱ्याने मागितलेला हिस्सा, आपल्या बायकोने घातलेला धिंगाणा. यात कुणाच्याच हाती काही लागले नाही. ताटातूट मात्र झाली. कर्ज फेडून शिल्लक एवढी सुद्धा उरली नाही की वाटणी करून दोघांचे समाधान होईल. त्यानंतर आज दोघे एकमेकांना बघत होते.
त्याने हात पुढे केला. तिने राखी बांधली. आरतीचे ताट नव्हते मात्र तिच्या भरल्या डोळ्यांनी भावाचे औक्षण होत होते. बस स्टँड वरील दुकानातून आणलेला भावाच्या आवडीचा खोबर्याचा लाडू तिने भरवला. त्याचे सुद्धा डोळे भरून आले नवे जुने सर्व बाहेर पडले. सुख दुःखांच्या गप्पा रंगात आल्या. आज दोघेही लहान झाले होते. तुटलेली नाळ पुन्हा जुडली होती. दुपार उलटून गेली होती.
तिने विहिरीवर जाऊन चेहऱ्यावर पाणी मारले. अनेक दिवसांपासून मनावर साचलेली धूळ धुवून निघाली होती.
पदराने चेहरा पुसतच ती म्हणाली "येतो दादा आता, बस मिळाली की सायंकाळआधी घरी असणार".
राहून जा आज असे त्याला म्हणायचे होते. पण त्याला माहित होते. ही घरी येणार नाही आणि परत गेली नाही तर हिचा नवरा धिंगाणा घालणार.
"बर, सांभाळून जा"
"नमस्कार करतो" म्हणत तिने त्याच्या पायाला हात लावले.
तिला वर उचलताना त्याची नजर तिच्या फाटल्या ब्लाउजमधून डोकावणाऱ्या तिच्या पाठीकडे गेली.
तिला ते कळले, तसेच तिने लगबगीने ते दारिद्र्य झाकण्याचा प्रयत्न केला.
त्याचे डोळे डबडबले. तिने मान खाली टाकली. भरून आलेले डोळे भाऊ बघू नये म्हणून तशीच चालायला निघाली.
हा मात्र स्तब्ध उभा होता. तिच्या पाठमोऱ्या देहाचे दूर जाण्याचे ते क्षण त्याला असह्य होत होते.
थोडे दूर जाताच तीने मागे वळून बघितले.
त्याचे डोळे भरून आले होते.
दोन्ही हात त्याने पायजमाच्या दोन्ही खिशात घातले.
तसेच रिकामे खिशे बहिणीला दाखवले.
ती हसली आणि तशीच पुढे चालायला लागली. त्याला तिचे हसणे कळलेच नाही.
ती नाक्यावर आली.
बस मध्ये बसली. बस चालायला लागली. तिच्या नेहमीच्या जीवनाकडे तिचा पुन्हा प्रवास सुरु झाला.
बस मध्ये शेजारची बाई सुद्धा माहेरी जाऊन येत होती.
"काय ग, भावाने काय दिले राखीला?"
ती फक्त हसली.
आज तिला तिचा भाऊ परत भेटला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा