मानखुर्द स्टेशनला उतरल्यानंतर रेल्वे रुळ क्रॉस करुन महाराष्ट्रनगरच्या दिशेने निघालो. समोरच वाकडी तिकडी पसरलेली झोपडपट्टी आणि बाजुलाच चिता कॅंम्पची तारेचं कुंपण घातलेली उंचशी भिंत एकदम विरोधाभास निर्माण करत होती. कुंपणाच्या आतल्या बाजुस असलेल्या मचाणावरती एक बी.एस.एफ. चा जवान शांतपणे बाहेरील बाजुस बघत होता. अंगावरील वर्दी आणि हातातील संगिनी यामुळे तो जास्तच रुबाबदार दिसत होता. पलीकडील दुनिया कश्याना-कश्यात गुंतली असताना हा मात्र संयमाने चाकरी करीत होता. जणु त्याचं विश्वच वेगळ असावं.
"जसे आपलं अंतर्मन कोटगं झालेल्या आपल्या बाह्यमनाच्या काटेरी भिंती पलीकडे शांतपणे बघत असतं. आपल्या विचारांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या गलक्यात ते आपलं शांतपणे ईमान राखुण असतं. फरक इतकाच आपली नजर मात्र कधी कधीच त्या भिंतीपलीकडे जाते."
र्ईतक्यात सात-आठ पोरांचा एक ग्रुप मागुन कल्ला करत पुढे गेला. साऱ्याचे चेहरे आणि कपडे रंगाने माखले होते. बहुधा उद्याची धुलवड त्यांनी आजच साजरी केली असावी. बाजुलाच स्थानिक पोरांनी लाकडी ओंडक्याभवती गवताच्या पेंड्या रचुन होळीची छान तयारी केली होती. तिथल्याच कुठल्याश्या एका गल्लीतुन लाऊड स्पीकरवर मोठ्याने होळीची गाणी चालु होती.
खडीचा एक कच्चा रस्ता रुळालगत सरळ महाराष्ट्र नगरच्या दिशेने जातो. रस्त्यावर बर्यापैकी वर्दळ होती. त्यात जागोजागी फेरीवाले पालांमध्ये निरनिराळे जिन्नस मांडुन बसले होते. त्यांच्यासमोर असलेल्या ग्राहंकाच्या वर्दळी मुळे चालण्यास अडथळा येत होता. त्यात आता बर्यापैकी उन्हही लागत होतं. कच्या रस्त्यापासुन पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला वळालो असता समोरच एक मुतारी दिसली. वाटलं आता हलक होऊन येऊया. परत एकदा आतमध्ये गेलो तर लवकर सटकता येणार नाही.
तिथुन बाहेर येताच सहज मनात विचार आला. भरपुर वेळ झाला तरी बायकोचा किंवा अण्णांचा एक ही कॉल आला नव्हता. दिपकचा मात्र ऑलरेडी रिच्चड, व्हेअर आर यु? असा संदेश होता. बहुतेक सर्वजण आले असतील. मलाच उशीर झाला असावा? मी सकाळपासुन मंदावलेला माझा वेग आता मात्र वाढवायचे ठरवले. झपाझप टांगा टाकत गल्लीतुन आत वळालो. चालता चालताच माझा इनशर्ट बाहेर काढला आणि हातानेच केस वेडे वाकडे केले. अजुन पर्यंत तरी काही वाटत नव्हते पण जसं जसे काकांचे घर जवळ येऊ लागले तसं तशी आपोआपच छाती दडपु लागली. मन कासावीस होऊ लागलं.
दुपारची वेळ असल्यामुळे संपुर्ण गल्ली शांत होती. दोन तीन बायका त्यांच्याच घराच्या पडवीत बसुन काहीतरी निवडत बसलेल्या होत्या. तर बाजुलाच समोरासमोर ठेवलेल्या ड्रमचा आडोसा घेऊन दोन छोटी पोरं पिचकारीने एकमेकांना भिजवण्यात दंग झाली होती. ना कसला गोंधळ ना रडण्याचा आवाज मला जरासे आश्चर्यच वाटले. एखाद्या विभागात मयत झाले तर तेवढ्या पुर्ण भागात एक वेगळीच वसवस जाणवत असते पण येथील एकंदर वातावरणावरुन खरच हे कळायला मुश्कील होतं होते की या इथेच आज्जीचं देहावसान झालय .
दोन घरं सोडुन बाजुच्याच घरात मयत झाले असताना लोकं इतकी कशी निगरगट्टपणे राहु शकतात याचं मला जास्त वाईट वाटु लागलं खचीत रागही आला. पण इथे सकाळपासुन मीच असा टंगळ मंगळ करत पोहचतोय तिथे या परक्यांसुन काय अपेक्षा करणार? पण तरीही शेजार धर्म या नात्याने का होईना आपण विचारतोच. नाही म्हटल तरी काकांच्या घराबाहेर थोड्याफार चपला होत्या त्यातही ओळखीच्याच जास्त दिसत होत्या. पण घराबाहेर एकही तिर्हाईत माणुस दिसत नव्हता ना मर्तिकाचे सामान ना कसली तयारी ह्यांनी पार्थिव नेलं तर नाही ना? पण रस्त्यातुन येताना कुठेच तसं काही आढळल नाही. म्हणजे फुलं, गुलाल, सुट्टे पैसे वा चुरमुरे. की अजुन लोकांना कळवलच नाहीये आणि नसेल तर मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा असं म्हणायाची वेळ यायची. डोक्यात नुसता विचारांचा भुंगा भणभणत होता. पुर्वानुभवानुसार वाटले आता एकदा का घरात पाय टाकला की माझी एखादी काकी अथवा आत्या लगेच गळा काढेल.मला कवटाळेल "अरे लेकरा, तुझी आज्जी गेली रे...अगं उठ बघ तुझा नातु आलाय तुला बघायला. अशी काहीतरी सुरवात होईल.
क्षणाचाही विचार न करता मी माझे बुट काढले आणि तडक आत शिरलो. आणि समोरील दृश्य पाहुन मला रडांव की हसावं तेच कळेणा? आपोआप मला समर्थ रामदासांच्या ओळींचा साक्षात्कार झाला.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे.
घडे भोगणे सर्व ही कर्म योगे मती मंद ते खेद मानी वियोगे.
आमच्या सबंध परिवाराच्या लवाजम्यामध्ये "आज्जी" मधोमध बसुन तंबाखु मळत होती. तर आमचे अण्णा, आप्पा आणि दोन्ही नाना त्यांच्या आईच्या बाजुला सुजान मुलासारखे चिडिचुप बसले होते. तर माझ्या चारही अत्या आज्जीची सेवा करण्यात रमल्या होत्या. मला या प्रकाराचा कसलाच उलगडा होईना. नाही म्हटंल तरी आज्जीला असं जिवंत बघुन आनंदच होत होता. पण काकांनी असं खोट बोलुन हे सर्व उपदव्याप् कशासाठी केले. मी प्रश्नार्थक नजरेणेच त्यांच्याकडे पाहिलं. तेव्हा त्यांनीच मी काही बोलण्याच्या आधी सुरवात केली.
"अरे आज्जीच्या तब्येतीत गेले दोन-तीन दिवस झाले चांगला फरक पडलाय. पण आज सकाळी जेव्हा तुझ्या काकीने तिला आंघोळ घालुन बाहेर ओट्यावर कोवळ्या उन्हात बसवले. तेव्हा एक कावळा येऊन तिला शिवला. आणि आपल्याकडे जिवंत माणसाला असा कावळा शिवणे हे अशुभ लक्षण मानतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला तो कावळा शिवतो तिच्याविषयी वाईट बातमी आपल्या आप्तेष्टांना सांगण्याची प्रथा आहे. त्यामुळे म्हणतात त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते. माझे कान जरी काकांचे शब्द ऐकत असले तरी डोळे मात्र सकाळपासुन घडलेल्या फ्लॅशबॅक मध्ये अडकले होते. या घडलेल्या प्रसंगामुळे क्षणिक का होईना मला अंतर्मनाचा आवाज ऐकायला भाग पाडले होते.
थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा तेथील शोकमग्न वातावरण व एकंदर परिस्थीती पाहता नकळत आपण स्वताला त्या प्रसंगाशी जोडु लागतो. एक ना हजार प्रश्न मनात घोंगाऊ लागतात. आपला जन्म कशासाठी आहे? शेवटी सर्वांना इथेच यायच आहे! मग कशाला नस्ते हेवे दावे हवेत? नात्यांमध्ये कशाला तिढे हवेत? कशाला ही पैशाची हाव हवी? ही जीवघेणी स्पर्धा कशासाठी आणि कुणासाठी? आणि जरी स्वतःसाठी तरी मग जाताना यातलं काय बरोबर नेणार आहोतं? अर्थात हे सर्व त्या मृत आत्म्याला शांती वाहे पर्यंत एकदा का त्या स्मशाण भुमीतुन आपण बाहेर आलो की ते वैराग्य ही अळवावरच्या थेंबाप्रमाणे लगेच गळुन पडते.
आणि सुखासाठी म्हणाल तरं सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. सुख मिळत नसते ते ज्याला त्याला आपआपले शोधायचे असते. गरज आहे ती काटेरी कुंपणाच्या पलीकडे मचानावर बसलेल्या "त्याचा" आवाज ऐकण्याची.
"प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एक वर्तुळ बनवुन जगत असतो. माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझी प्रेयसी/प्रियकर, माझी बायको, माझे मित्र, माझी शाळा/कॉलेज, माझे ऑफिस, माझे घर, माझी गाडी....इति पण आपल्याला हे विसरुण चालणार नाही की "त्या" वर्तुळाची सुरवात पण एका सुक्ष्म बिंदु पासुनच झालेली असते."
माझी बायको चहाचा कप घेऊन समोर उभी राहीली तसा मी भानावर आलो. वाटत होतं काकांना दोन शब्द सुनवावेत. जग कुठे चाललय आणि तुम्ही कोणत्या परंपरांध्ये अडकला आहात म्हणुन, पण आज प्रथमच इतक्या वर्षांनी मी आमचं संपुर्ण कुंटुंब एकत्र पाहत होतो. त्यात एकाच कुटूंबातल्या सात-आठ बायका एकत्र इतक्या शांत बसु शकतात हाही एक प्रकारचा विक्रमच होता. दिपक आत मध्ये चहा घेत शांतपणे माझ्याकडे बघत होता. आईची आणि काकींची जेवणाची लगबग चालु होती. होळीला आज पुरण पोळीचा नैवद्य वाहायचा होता. अण्णा आणि इतर काका आज्जीच्या बाजुला शांतपणे बसल्यामुळे एकदम लहान वाटायला लागले होते.
तेवढ्यात एक कावळा खिडकीपाशी येऊन काव-काव करु लागला. तसा काका ने काकीला मोठ्याने आवाज दिला. "अगं ऐकलस का? तुझे सासरे पण आलेत बघ त्यांच्या बायकोला बघायला त्यांना खायला काहीतरी ठेव ताटात" तसे आज्जी सकट आम्ही सर्वजण हसायला लागलो. हसता हसता मात्र आता महेश मांजरेकर काकस्पर्श दोन साठी आज्जीच्या रोल मध्ये कुणाला कास्ट करतील याचा विचार मी करु लागलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा