सोमवार, २९ एप्रिल, २०२४

1093. अंडे, दूध आणि नारळ !

     माझा एक कारागिर मित्र आहे. हार्मोनियम ट्यून करणं आणि दुरूस्तीची कामं तो करतो. साधारण दहावी पर्यंत शिकला असेल. अमराठी आहे. पण, पेटीदुरूस्तीच्या कामात मात्र तरबेज आहे. दिवसाला केवळ दोन-तीनच कामं तो करतो. कामातली गुणवत्ता उत्तम आहे. स्वभावात प्रामाणिकपणाही आहे. बोलणं गोड आहे आणि आवळा देऊन कोहळा काढण्याचा स्वभाव नाही. त्यामुळं कामाला तोटा नाही. तसाच आमचा एक सुतारकाम करणारा मित्र आहे. गडी एकदम चलाख आहे. हिकमती आहे. शालेय शिक्षण झालेलं नाही. पण, कामातली गुणवत्ता उत्तम आहे. त्यानं मला नुकत्याच केलेल्या एका कामाचा फोटो दाखवला. फ्लॅटच्या दरवाजाचं काम होतं. कोरीवकाम बरंच होतं.तो दरवाजा तयार करून बसवण्याचे त्याने जवळपास पन्नासएक हजार रूपये घेतले होते. त्याच्याकडे आत्ता अशी जवळपास आठ-दहा कामं सुरू आहेत. कामाची मागणी वाढतेच आहे.  अशी खूप उदाहरणं समाजात आहेत. पण, आपल्याला ती दिसत असूनही आपलं मात्र तिकडे लक्ष जात नाही. 
     माझ्या मनात वारंवार एक प्रश्न येतो, पण त्याचं समाधानकारक उत्तर मात्र सापडत नाही. मला सांगा - दरवाजा तयार करणाऱ्या माणसाला जर तो केवळ ३५% च करता आला तर? किंवा हार्मोनियम दुरूस्त करणाऱ्याला ती केवळ ३५% च दुरूस्त करता आली तर? अशा माणसांना आपण ‘अर्धवट’ म्हणतो आणि त्यांना आपण काम देत नाही. व्यवहारात ३५% या आकड्याला गुणवत्तेच्या दृष्टीनं काडीचीही किंमत नाही. मग ती शिक्षणात का दिली जात आहे? “३५% गुण मिळाले की परीक्षेत पास करणं” हेच बहुतांश प्रश्नांचं मूळ आहे. ६५% कच्चा राहिलेला आलू पराठा, ६५% कच्ची राहिलेली इडली, ६५% कुजलेली पालेभाजीची जुडी, डझनातली ८ केळी खराब असणं, अशा गोष्टींकडे आपण ढुंकूनही पाहत नाही. का? तर आपल्या दृष्टीनं अशा गोष्टींचा दर्जा अत्यंत खराब असतो. मग जरा विचार करूया : ६५% चा पत्ताच नसलेल्या आणि ३५% जेमतेम मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात कसं काय पाठवलं जातं? ६ पैकी ४ विषयांत नापास होऊनही विद्यापीठ त्या विद्यार्थ्यांना पुढची ॲडमिशन कशी काय घेऊ देतं? आपण शिक्षण घेतोय, ते नेमकं कशासाठी? याची पुरेशी स्पष्टता विद्यार्थ्यांना असते का? या विषयी आपण खोलात जाऊन शोध घेतला तर धक्कादायक निष्कर्ष मिळण्याची शक्यता आहे. “केवळ भरपूर पैसा कमावण्याकरिता शिक्षण घेणं हा शिक्षणाचा एकमेव उद्देश आहे आणि तोच असला पाहिजे” अशी सध्याची मानसिकता होत चालली आहे का?  जगभरातील विकसित देशांच्या प्रगतीची कारणं काय आहेत? याचा धांडोळा घेणं आपल्याला गरजेचंच वाटत नाही. शिक्षण महत्वाचं आहेच. पण, व्यावहारिकतेशी  जोडता आलं तरच त्याचा खरा उपयोग होतो. परीक्षेत विचारलेल्या आठ पैकी तीन ते चार प्रश्नांची उत्तरे लिहून जर किमान गुण मिळवून विद्यार्थी वरच्या वर्गात जात असेल तर, त्या विद्यार्थ्याकडून उत्तम भवितव्याची अपेक्षा करायची का? 
     खरं तर, विवेकबुद्धी आणि दैनंदिन जीवनातील शिस्त याही शिक्षणाशी खूप जवळच्या गोष्टी आहेत. या पैकी एकही गोष्ट नसेल तर, त्याचा फार मोठा तोटा त्या व्यक्तीला आयुष्यभर सोसावा लागतो. हा फटका बसलेल्यांची संख्या प्रगत समाजात खरं तर कालानुरूप कमी कमी होत जायला हवी. पण, वस्तुस्थिती निराळीच आहे. केवळ ‘शिस्तीचा लवलेशही नाही’ या एका कारणामुळं सुद्धा अनेकांचं करिअर धोक्यात आलेलं आहे. याविषयी एखाद्या सामाजिक संस्थेनं संशोधन केल्याचं आढळत नाही. वस्तुस्थितीतले दोष आपण मान्यच केले नाहीत तर त्यातून सुटका होऊन प्रगती तरी कशी होणार? म्हणूनच, वस्तुस्थिती स्वीकारणं आणि त्यावर उपाययोजना अंमलात आणणं आवश्यक आहे. माझ्या माहितीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलानं यावर्षी बीकाॅम ला प्रवेश घेतला. त्याला स्वत:ला खरं तर जिम इन्स्ट्रक्टर व्हायचंय. पण, “असावी एक डिग्री नावापुरती तरी” असा विचार करून त्यानं बीकाॅम ला प्रवेश घेतलाय. हे एकच उदाहरण नाहीय. अशी अक्षरश: लाखो उदाहरणं आहेत. आपल्या आजूबाजूला “साईड बाय साईड एखादी डिग्री जाता-जाता घ्यावी” म्हणून शिकणारी मुलं-मुली ढिगानं सापडतील. ती दरवर्षी साधारणपणे पास होण्याइतपत मार्क मिळवून पुढे-पुढे जातात आणि तीन वर्षात पदवीधर होतात. पदवी पर्यंत शिकलेल्या मुलांकडून समाजानं कोणकोणत्या अपेक्षा कराव्यात? यासंबंधी आपल्याकडे कुणी काही लिहून ठेवल्याचं आढळत नाही. पण, उद्योग-व्यवसाय किंवा नोकरी मध्ये मात्र काम देण्याकरिताच्या अपेक्षा स्पष्ट ठरलेल्या असतात. म्हणूनच, शिक्षण घेतलं तरी त्या क्षेत्रात काम मिळेलच, याची शाश्वती अजिबातच देता येत नाही. सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न यातूनच गंभीर रूप धारण करतो. 
     कोणत्याही डिग्री कोर्सचं उदाहरण घेऊन पहा. १०० विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी त्या विषयात उत्तम नैपुण्य प्राप्त करतात, हे शोधून पहा. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आणि निपुण विद्यार्थ्यांची संख्या यात बरीच तफावत आहे, असं दिसेल. म्हणूनच, शिक्षण घेऊनही भवितव्याविषयी शाश्वती वाटत नाही. एक साधं उदाहरण पहा : नवजात बाळाला अभ्यंग कसा करावा आणि आंघोळ कशी घालावी? या एका गोष्टीकरिता पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रूपये मोजावे लागतात. या करिता आपल्या शिक्षणव्यवस्थेत एखादा कोर्स आहे का? नाही. कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता, तान्ह्या बाळाला तेल मालिश आणि आंघोळ या एका कामामुळं एखाद्या महिलेला साधारणपणे तीस-चाळीस हजारांपर्यंत मासिक उत्पन्न मिळू शकतं, आणि पदव्या घेतलेले तरूण-तरूणी मात्र वर्षानुवर्षं बेरोजगार राहतात? याचाच अर्थ, कुठेतरी काहीतरी चुकतंय, हे निश्चित. कोणत्याही विषयाचं शिक्षण घेण्याच्या अगोदर त्या गोष्टीची उपयुक्तता किती आहे, कशी आहे,कोणत्या स्तराची आहे हे नीट पाहणं गरजेचं आहे. समाजाला नेमकी कोणकोणत्या गोष्टींची निकड असते, आवश्यकता असते, हेही पाहिलं पाहिजे. जर या गोष्टी आधीपासून पाहिल्या तर, आपलं शिक्षण आणि समाजाची गरज यांची सांगड व्यवस्थित जुळून येते आणि करिअर नीट यशस्वी होतं. आणि दुसरं म्हणजे, अंगभूत क्षमतांच्या अभावी पुस्तकी शिक्षणाला मर्यादा येतातच. मग जिथं आपल्या क्षमतांचा स्वत:च्या प्रगतीसाठी उपयोग होईल, अशा क्षेत्रातलं शिक्षणच का घेऊ नये? संगीत, नृत्य,नाट्य, चित्रकला, अशा विषयांमध्येच करिअर करू इच्छिणाऱ्यांनी केवळ ‘लोक काय म्हणतील?’ या एकाच विचारापायी विद्यापीठाची पदवी घेणं अनिवार्य आहे का? पाॅटरी मध्येच आवड असणाऱ्या मुलाला किंवा मुलीला ‘नावापुरती का होईना, पण डिग्री मात्र हवीच’ असा हट्ट धरून शिकायला का लावलं जातं? ओरिगामीची आवड आणि त्यातच उत्तम गती असणाऱ्या मुलीला ‘स्थळ कसं मिळणार?’ म्हणून ग्रॅज्युएट व्हायला का लावलं जातं? तबला उत्तम वाजवणाऱ्या आणि त्यात १३-१४ वर्षं गुरूंकडे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेल्या, अलंकार पर्यंत शिकलेल्या मुलाला ‘यावर तुला मुलगी कोण देणार?’ म्हणून डिग्री घ्यायला का लावलं जातं? प्रत्येकानं ग्रॅज्युएट झालंच पाहिजे, या हट्टाला नेमका कुठला तार्किक आधार आहे? या प्रश्नांची उत्तरं आधुनिक भारतातले तथाकथित सुजाण नागरिक कधी विचारताना किंवा चर्चा करताना दिसत नाहीत मला..! 
     चला, आता दुसरीही बाजू बघूया - न शिकलेला माणूस आम्हाला मुख्यमंत्री म्हणून चालतो, महापौर म्हणून चालतो, नगरसेवक म्हणून चालतो. न शिकलेल्या माणसाला केवळ त्याच्या वयाच्या आधारावर मतदानाचा अधिकार मिळतो, ड्रायव्हींग लायसेन्स मिळतं. न शिकलेल्या माणसाला सामाजिक संस्था, शिक्षण संस्था काढता येते. न शिकलेल्या माणसाला कारखाना काढता येऊ शकतो. न शिकलेला माणूस बिल्डर होऊ शकतो, डेव्हलपर होऊ शकतो, व्यापारी होऊ शकतो. न शिकलेल्या माणसाचं हाॅटेल उत्तम चालू शकतं, त्याची पतसंस्था चालू शकते, त्याचं झेराॅक्स दुकान चालू शकतं, त्याचं कपड्यांचं-मिठाईचं-भांड्यांचं-मोबाईल फोन्सचं-लाॅन्ड्रीचं- वाणसामानाचं दुकानही बिनबोभाट चालू शकतं. न शिकलेल्या माणसाला निरनिराळ्या गोष्टींच्या एजन्सीज् मिळू शकतात. न शिकलेल्या माणसाचं आॅटोमोबाईल शोरूम असू शकतं, त्याचं मल्टीप्लेक्सही असू शकतं. न शिकलेल्या माणसाला मंगल कार्यालय चालवता येऊ शकतं, वसतिगृह चालवता येऊ शकतं. न शिकलेल्या माणसाला स्वत:चं विमानही विकत घेता येऊ शकतं, आयपीएल ची टीम ही विकत घेता येऊ शकते. यातली कोणतीही गोष्ट करण्याकरिता औपचारिक शिक्षणाची पात्रतेची अट आहेच कुठे? 
       न शिकलेल्या माणसांचं जर वर उल्लेखलेल्या सगळ्या मूलभूत गोष्टींमध्ये कुठेही, काहीही कणभरानंही अडत नसेल तर मग केवळ औपचारिकता म्हणून डिग्रीचा अट्टाहास कशाकरिता? याचाच अर्थ असा की, शिक्षणाची मूळ आवश्यकताच आता नेमकेपणानं निश्चित करण्याची नितांत गरज आहे. हा नेमकेपणा एकदा सापडला की, साक्षरतेकरिता शिक्षण की सुसंस्कृततेकरिता शिक्षण? या प्रश्नाचंही उत्तर आपोआपच मिळून जाईल. ३५% गुण मिळाले की उत्तीर्ण होता येतं पण त्या गुणांवर पुढचं काहीच ठरवता येत नाही. असेच गुण असतील तर, पदव्युत्तर शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच असं नाही. मग, यावर उपाय काय? उपाय एकच आहे : तो म्हणजे - शिक्षणाची नेमकी गरज नव्याने निश्चित करणे आणि शिक्षणातली उत्तीर्ण होण्याविषयीची धोरणं बदलणे...!  माणसानं शिकूच नये, असा या मागचा दृष्टीकोन अजिबात नाही. माणसानं आपली अंगभूत क्षमता आणि खरी आवड यांनाच प्राधान्याने महत्व देऊन शिक्षण निवडावं, असं माझं मत आहे. आणि समाजानंही हा विचार आता स्वीकारला पाहिजे. वाढत्या स्पर्धेत आपण बेडकाचाही बैल करायला निघालो आहोत, यातला भविष्यातला अनर्थ वेळीच लक्षात घेतला पाहिजे. अगदी साध्या शब्दांतच सांगायचं झालं तर- कोंबडी, म्हैस आणि नारळाचं झाड यांच्यापैकी कुणाकडे अंडं, दूध आणि नारळ मागायचा, याचं लाॅजिक समजलं तरी पुष्कळ झालं. नारळाच्या झाडाकडं अंडं मागू नये, म्हशीकडून नारळाची अपेक्षा करू नये आणि कोंबडीकडे दूध मागू नये. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नैसर्गिक वकुबाप्रमाणं मनसोक्त वाढू द्यावं, फुलू-फळू द्यावं आणि आनंदानं जगू द्यावं, इतकं सरळ, साधं आणि सोपं गणित आहे हे.
     समाज म्हणजे तरी कोण हो? तुम्ही, मी, आपण सगळे म्हणजेच समाज ना? मग आपण आपला दृष्टीकोन बदलला तर आपसूकच समाजाचा दृष्टीकोन बदलायला सुरूवात होईलच ना..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...