बुधवार, २९ मे, २०२४

1181. हरे कृष्ण

     परवा पुण्यात तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना चिरडलं यावर मी लिहावं असं अनेकांनी मला सुचवलं. खरं तर अशा घटनेकडे एक माध्यम म्हणुन मी पहाते. कारण कुठलीही घटना ही उगीच घडत नाही. भगवंताने केलेला तो प्लॅन असतो. या आणि अशा घटनेकडे इमोशनली न पहाता शांत बसून विचार करा. मला कायम वाटतं, चांगल्या मार्गाने भरपुर पैसा कमावता येतो का? त्यामागे अनेकांची हाय असते. कारण अनेकांना मुंडकीवर मारुन जमिनी लुटलेल्या असतात त्यामुळे वाममार्गाने येणारा पैसा हा तसाच जातो पण तो जाताना  आपल्या डोक्यावर पापाचं माप ठेवून जातो. या जन्मात नाही तर नंतर ते माप आपल्या प्रत्येकाला रितं करायचच आहे. इतका साधा विचार केला आणि जगायला लागणारा पैसा प्रामाणिकपणे मिळवला तर फक्त सुखच आहे.
    या केसमधे अशा पध्दतीने आलेला पैसा आणि त्यामुळे आलेला गर्व आणि अहंकार हा क्षणीक होता. या घटनेनंतर त्यांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेकांची अंडीपिल्ली बाहेर आली. त्यामधे पब आहे. त्यामध्ये यंत्रणा आहे. त्यामध्ये गैरव्यवहार करणारे त्यांचे धंदे असतील हे सगळं बाहेर काढायला भगवंताला कोणाला तरी दुख द्यावं लागलं. त्या दोन कुटुंबाना दुख देण्यामागे सुध्दा भगवंताचा काहीतरी विचार असेलच ना. कुठल्याही घटनेकडे एकाच बाजूने विचार करु नका. यामधून आपण सगळे काय धडा घेतो ते महत्वाचे आहे. आपल्या मुलांवर लक्ष देणं असेल. पैसा देताना तो विचार करुन देणं असेल. त्याची संगत कोणासोबत आहे हे पहाणं असेल. त्याला वाचन, व्यायाम याची आवड लावणे असेल. घरी स्वतः कुकींग करुन नवनवीन पदार्थ खाउ घालणं असेल म्हणजे तो बाहेर होटेलींग करणार नाही. त्यासाठी त्या बाईचा पाय घरात टिकायला हवा आणि पालकांनी व्यसनं बंद करुन मुलांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी नाळ जोडायला शिकवणं असेल हे आपल्याच हातात आहे.  पैसा वाईट नाही तर तो कमावण्याचा मार्ग वाईट असु शकतो.  मी कायम अध्यात्मावर यासाठीच लिहीते. अध्यात्माची कास धरली तर आपण अशा विकृतीपासून आपोआप दुर जातो. श्रीमंत मित्र जोडण्यापेक्षा संस्कारी मित्र जोडा आणि श्रीमंत विचारसरणी असु द्या.
      काल संध्याकाळी मी आणि माझे मित्र पराठे घेउन टेकडीवर गेलो. इतकी सुंदर हवा होती. त्या टेकडीवर कोणीही नव्हतं. एका झाडाखालीं बसून खुप गप्पा मारल्या. अनेक विचारांची देवाणघेवाण झाली. मस्त लोणचं पराठे असं डिनर केलं आणि वेळेत घरी येवून झोपलो म्हणजेच काय तर आम्हीही पबला किवा होटेलला जाऊ शकत होतो पण एकही रुपया खर्च न करता घरचं खाऊन आम्ही ऑक्सिजन आणि आनंद घेउन घरी आलो.  निसर्ग आपली वाट पहातोय. वेळ मिळेल तेव्हा झाडाखाली बसुन भाजी भाकरी खा आणि उत्तम आरोग्य मिळवा. या मायावी दुनियेत सुध्दा आपण आपलं वेगळेपण जपू शकतो आणि निसर्गाने दिलेलं सुंदर शरीर आणि मन जपून समाजाला उत्तम आदर्श देउ शकतो. या आणि अशा घटना चार दिवसांत आपण विसरुन जातो. पुन्हा येरे माझ्या मागल्या. आपण यातून काहीही शिकत नाही. पैशाला आपल्यावर हावी होवु देउ नका तर त्याच्याकडे  गरज म्हणून पहा तरच आपल्याला सुख मिळेल.
     या आणि अशा घटनाना खुप वेगवेगळे कंगोरे आहेत पण त्याच्या जास्त खोलात न जाता जसा अर्जुनाने श्रीकृष्णावर विश्वास ठेवला तसाच आपण ठेउन आपल्याला दिलेले कार्य प्रामाणिकपणे करत राहुयात. निष्काम कर्म केल्याने मिळणारं फळ आणि आनंद ही उच्च लेव्हलची तृप्ती आहे. सगळं भगवंताचं आहे आणि मी हे त्याच्यासाठी करते / करतो असा भाव जेव्हा मनात येइल तेव्हा आपण चुकीचे वागणारच नाही. ही संपूर्ण सृष्टी त्याची आहे यावर तर कोणाचं दुमत नसावं. आपण प्रत्येक जीव हा भाडेकरु आहोत. मग इथे अहंकार इगो. माज हे शब्द येतीलच कसे? पहा विचार करुन. ज्याचं आहे त्यालाच ते अर्पण करा. आपल्या लायकीनुसार त्यातील वाटा तो आपल्याला देणारच आहे.
     मी आशा करते की माझ्या लेखणीतून आलेले शब्द सुध्दा त्यानेच सुचवले आहेत यावर तुम्ही विश्वास ठेवाल आणि त्यातून जे जे उत्तम आहे ते वेचुन स्वतःला समृद्ध कराल.
हरे कृष्ण.
 
सोनल गोडबोले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...